Skip to main content

आक्रोश! - (द्विशतशब्दकथा)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 21/08/2015 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
"अच्छा हुआ वो पाववालेका दुकान जला दिया. बच्चा देखके बेवकूफ बनाता था वो. ऐसाहीच मांगता था उसको. अब कलसे हम चाचाके दुकानसे पाव लेंगे..." सायंकाळच्या वेळी शहर जाळपोळींनी उजळून निघाले होते. तसाच उजळलेला तो एक निरागस चेहरा. पाववाल्याला धडा मिळाला, आणि उद्या सुद्धा शाळेला सुट्टी असणार, या दुहेरी आनंदात झोपी गेला.. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे, शहर पुन्हा उठले. पुन्हा पेटले. उजाडता उजाडता काही दिवे, पुन्हा मालवले.. कायमचेच.. त्याचे मात्र आज काहीतरी बिनसले होते. आवळलेल्या मुठी अन चिमुकल्या डोळ्यात फुललेला अंगार, ज्यात एक अख्खा जमाव जाळायची ताकद होती. पण एक मूक आक्रोश करत त्याने ईतकेच विचारले, ओये ऽऽ, चाचा को क्यू मारा??.. ............................................. ..................................... ......................... ............. ..... एक नजर त्याने फलाटावरच्या ईंडीकेटरवर टाकली. टाय ठिकठाक केला आणि स्वत:ला समोरच्या गर्दीत झोकून दिले. बांद्रा येईपर्यंत त्याला बसायला जागा मिळाली. क्षणभरासाठी त्याने डोळे मिटले. आईवडील, बहिणीचा साखरपुडा, ईंजिनीअरींगची डिग्री, सारे काही चित्रफितीसारखे डोळ्यासमोरून सरकले. ‘अगला स्टेशन अंधेरी..’ आवाजाने भानावर आला, तसे लगबगीने ऊतरला. मगाशी जे ओझे त्याच्या हातात होते, ते ट्रेनमध्ये तसेच मागे सोडले होते. तरीही कसलेसे ओझे अजूनही उरावर, शिरावर बाळगल्यासारखे वाटत होते. ईतक्यात .......... धडाम धूडूम .. क्षणार्धात हलके झाले. लगोलग काही ओळखीच्या, तर काही अनोळखी.. रक्तमिश्रित किंकाळ्या कानावर आदळल्या.. काम फत्ते झाल्याची ग्वाही देणारा आक्रोश..!! ओये ऽऽ, चाचा को क्यू मारा??.. कधीकाळी त्यानेच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर, आज त्याच्याकडेही नव्हते. - तुमचा अभिषेक
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3395
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

मुंबईकरांना सगळ्याची सवय झालीय, हे वाक्य घासून गुळगुळीत झालंय... खरं नाही पण ते. याची सवय नाही होत... त्रासच होत राहतो...

In reply to by माधुरी विनायक

हे माध्यमांनी आणि भरताड विचारवंतानी मनानेच ठरवलयं अगदी असं वाटत्यं. टांगत्या तलवारीची कधी सवय होते का? यावर मार्मीक भाष्य वेन्स्डे चित्रपटात आहे.

In reply to by पैसा

हो सहमत. पण इथे अगदी तोच आशय नव्हता. जेव्हा एखादा सामान्य निरपराध माणूस दंगलीत भरडला जातो तेव्हा त्याला आपली काय चूक होती जे आपल्याशी असे झाले हा प्रश्न पडतो.. आणि मग तोच जेव्हा याचा बदला घ्यायला म्हणून उतरतो (अतिरेकी बनूनच असे नाही तर दंगलीच्या एका जमावाचा हिस्सा बनूनही असेन) तेव्हा तो देखील समोरच्या गटातील अश्याच एका सामान्य निरपराध माणसाला लक्ष्य करतो..