मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयुष्य आणि करीअर...

संदीप डांगे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
career
चिनार यांच्या माझं करीयर मार्गदर्शन (!) या लेख व प्रतिसादांवरून सुचलेले व कायम साचलेले विचार आणि निरिक्षण (काही चुकत असेल तर अवश्य सांगा): एखाद्या विद्याशाखेचं पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर 'आता काय करू?' हा प्रश्न जर उभा राहत असेल तर आडातच समस्या आहे असं माझं मत आहे. दहावीचा निकाल लागेपर्यंत लोक्स निर्धास्त असतात. "पुढे काय करणार?" असं विचारल्यावर "किती मार्क्स मिळतात त्यावर ठरवू" असं उत्तर देतात. जणू आयुष्यात पहिल्यांदाच कुठलाही अभ्यास न करता थेट दहावीचीच परिक्षा दिली असते. शाळेतल्या पूर्वपरिक्षेच्या निकालावरून साधारण अंदाज तर येतो ना? फारतर ५% अगदीच १०% फरक असू शकतो. पण 'शाळेत ९८-९५ मिळवत होता हो पण बोर्डात बघा फक्त ४५ मिळाले' असं तर नसतं ना? निकाल लागताक्षणी आधी कागदपत्रे मिळवण्याची हातघाई. कागदपत्रांच्या आधी ते 'कोणते, कसे आणि कुठे मिळतील' याच्या चौकशीपासून सुरुवात होते. अरे दहावीची आख्खी सुटी पोरं टवाळक्या करत घालवत होती ना? त्यांना धाडायचं ना माहिती काढायला. जरा दुनियादारी पण कळेल तेही एकही पैसा न घालवता. कारण नंतर 'तुमचं काम १० मिनिटांत करून देतो' असं म्हणून कागदांसकट दोन-तीन हजार रुपये घेऊन गायब होणारे जी दुनियादारी शिकवतात ती भारी पडते. हा वेंधळेपणा ८०च्या दशकात होता आणि अजूनही आहेच बरंका. यानंतर येते विद्याशाखा निवडायची पाळी. तेथे खरी मदर ऑफ ऑल गोंधळ असते. बाब्याने आणि बाब्याच्या बाबाने जे काही ठरवलं असतं ते सत्यात उतरत नाही असं दिसायला लागतं. काही सुपुत्र जिथे मित्र तिकडे आम्ही शेपूट हलवणारे कुत्रं याच भुमिकेवर ठाम असतात. जरा बरे मार्क्स असतील तर शहरातल्या सर्वोत्तम आणि विज्ञानशाखेच्या कॉलेजमधेच जायचे असते. मग इकडे विचार, तिकडे विचार करत अक्षरशः दोन-पाच दिवसांत 'पुढची पन्नास वर्षे कोणत्या विद्याशाखेत आयुष्य घालवणार' याचा निर्णय घेतला जातो. त्यात काय गल्त हाय बाप्पा? लगीन करतांनी बापाने नाय का आयला ५ मिनिटांत पसन केल्ती? पुढच्या ५० वर्षाचा थो इचार करत बसला आसता तर आज हे दिवस दिसलं असतं का? असो. सामाजिक दबावाखातर, मित्रांच्या आग्रहाखातर, कुठल्यातरी स्नेहींच्या यशस्वी कारकिर्दीकडे पाहून (खरेतर त्याच्या बंगला-गाडीकडे पाहून) मला याच शाखेत अकरावीसाठी प्रवेश घ्यायचाय हे निश्चित होतं. ज्यांना यथातथा मार्क्स असतात ते काहीतरी भयंकर गुन्हा केल्यासारखे आपले मार्क्स, आपली विद्याशाखा आणि आपलं कॉलेजचं नाव लपवत फिरत असतात. काही नातेवाईक आपण स्वतः काय तीर मारलेत ते पार विसरून ते पार टोचून टोचून पोराला हैराण करतात. लग्नकार्यात, समारंभात, "जाऊबाइंच्या मुलाचं काही खरं नाही बघा, अहो काय शिकतोय, शिकतोय का नाही काहीच सांगत नाही. आमच्या मुलांनी मात्र नाव काढलं हो. एक इंजिनीअरींग करतोय, दुसरा डॉक्टर झालाय बरं का." वैगेरे वैगेरे. ही टोचून जखमी झालेली पोरं चिवट आणि जिद्दी असतील तर याच लोकांना डोळे बाहेर काढायला लागतील अशी प्रगती उत्तरआयुष्यात करतात. तो भाग वेगळा. पण दहावीनंतर बारावी होईस्तोवर फारच ताण सहन करावा लागतो. चला पुढे: दहावी पास. आता घुसा विज्ञान शाखेत, मग वाणिज्य आणि फारच काय नाय जमलं कुठे तर मजबूरी का नाम महात्मा गांधी म्हणून कलाशाखेत. काय करणार, गावात अशी तीनच कॉलेज असतात ना? याच्यापार बापाला माहितही नसतं आणि शक्तीही नसते माहित करून घ्यायची. कसंबसं, भरमसाठ शिकवण्या लावून, फिया भरून पोरं मार्कांच्या स्पर्धेत पळत असतात. अरे याला १० मार्क आहेत, हा घ्या, याला दोन मार्क्स आहेत हा ऑप्शनला टाका. परिक्षेचं तंत्र आत्मसात करताकरता आयुष्याचं तंत्र आत्मसात करायचं राहून जातं. त्यात कुठे प्रेमप्रकरणाची झुळूक आली की समोरची पुस्तकं उडून जातात. परिक्षा तोंडावर आली की झोंबीसारखे अभ्यासाला लागून बारावीची खिंड पार करायच्या कामाला लागतात. झाली बारावी? ओके. आता परत जिथे दहावीच्या निकालाच्या वेळेस होतो तिथेच आलोय बरंका. फक्त एक अजून अ‍ॅड झालंय. विविध शाखांच्या प्रवेश परिक्षा (यानेकी सरकारचे हमखास व राजरोस पैसे खाण्याचे कुरण). ज्याचा अभ्यास बारावीसोबतच केल्या जातो. काहीतरी उचकपाचक करून या परिक्षा पास होऊन पोरं इंजिनिअरिंग, मेडीकल ला प्रवेश घेती होतात. सुपरटेक्निकलमधे (पक्षी: इंजि. मेडी.) पहिल्यांदा कळतं की आपण नक्की काय शिकायला आलोय इथं तेव्हा धाबं दणाणतं. अभ्यासक्रम अंगावर यायला लागतो आणि मग उपरतीची भावना तयार व्हायला लागते. अरे ये मै कहां आ गया? खरंच मला हेच करायचं आहे का? हा धक्का बसेपर्यंत बाब्याने शांतपणे कधी विचारच केलेला नसतो. एवढं होऊ दे, पुढंचं पुढे बघू असं करतच, दहावी-बारावी-पदवी, वन-स्टेप-अ‍ॅट-अ-टाईम म्हणत धावत असतो. केट्या बसत बसत कसंबसं पदवीचं शिक्षण पूर्ण होतं. मूल मोठं झालेलं असतं. दुनियादारी चांगलीच समजायला लागते. मग स्वत:चे निर्णय स्वतः घ्यायचे असतात. पण वेळ निघून चालली असते. पटकन नोकरी शोधायची असते. कारण बाप हे सुपरटेक्निकलचे खर्च पुरवता पुरवता पुरता टाचा घासायला लागला असतो. आतातरी गप्पकन पोरगा नोकरीला लागेल आणि भप्पकन घरात भगिरथाची गंगा लक्ष्मीच्या रुपात उसळ्या घेत अवतरेल याची स्वप्नं रंगायला लागलेली असतात. मागचा पुढचा विचार न करता पोरगं जे समोर येईल ती नोकरी पकडून घेतं. ठेचकाळत, थांबत, धावत, रक्त ओकत 'सेटल्ड' आयुष्याचं स्वप्नं पुरं करत असतो. इथं व्यक्तिगत आवडीनिवडीला कुणीच विचारत नसतं आता. नोकरी पाहिजे हाताला तरच लग्नाच्या बाजारात उभं राहता येतं ना भावाला? कसलं हिडन टॅलेंट अन् कसलं काय. लग्न होतं, वर्षा-दोन वर्षात लेकरू येतं. बाब्याचं आयुष्य एम-सील लावून एका पाइपातून सरळच वाहणारं पाणी होऊन जातं. थोडंफार सोडलं तर आपल्याकडे हे असंच चित्र आहे. एका लेखात सगळ्याच कारणमीमांसा शक्य नाहीत. त्यामुळे जेवढं जमलं तेवढं लिहिलं. या लोंढ्यांमधून काही तरूण आपला बाज ओळखून लगेच त्या मार्गाला लागतात आणि यशस्वी होतात. असे करणार्‍यांची टक्केवारी १-५ टक्क्याच्या आसपास असेल. बाकीचे जे धन देतंय त्याचंच ऋण मानून आयूष्य काढतात. पण काही मुलं पुर्वीच्या पीढीपेक्षा प्रचंड हुशारी व मेहनतीने काम करतायत. त्यांची निर्णय घेण्याची, समस्यांवर उपाय शोधण्याची प्रवृत्ती अद्भूत आहे. काहीतरी खास आहे जे आधीच्या पीढ्यांकडे नव्हतं. पण अशा मुलांची संख्याही तशी कमीच आहे हे तेवढंच खरं आहे. आणि प्रत्येक आई-बापाला आपलं मूल हे त्या 'खास' मध्येच आहे अशी पक्की खात्री असते हेही तितकेच खरे बरं का. मला कायम प्रश्न पडत आलाय तो हा की करीअर मार्गदर्शन नेमकं कोणत्या वयात व्हावं? त्याची शास्त्रीय पद्धत (मेथाडॉलॉजी) काय असावी किंवा आहे का? त्याचा उपयोग होतोय का? कळव्यात राहत असतांना आमचे घरमालक एका इंजीनीअरींग कॉलेजमधे नोकरीस होते. त्यांनी मुलीला जबरदस्ती झेपत नसतांना त्याच कॉलेजात सीवीलला टाकले. कारण काय तर मुलगी डोळ्यासमोर राहील. त्या मुलीला नृत्याची आवड आणि खरोखर उत्तम नृत्य करता येत होते. पण वडीलांच्या दबावामुळे आणि झेपत नसलेल्या अभ्यासाने ती मुलगी कायम खंगलेली असायची. आजारी आणि कृश असायची. कधी नृत्य वैगेरे करायची तेव्हाच काय तो हसरा चेहरा आणि उत्साही वाटायची. आम्ही त्यांचे वर्षभर मागे लागून त्या मुलीची अवस्था कशामुळे झाली हे पटवून दिले. तीला परफॉर्मींग आर्टचं शिक्षण घेऊ द्या म्हणून त्यांना बरेच मार्गदर्शन केलं. तेव्हा कुठे ते आपला हेकेखोरपणा सोडायला तयार झाले. पुढे काय झालं ते कळलं नाही कारण नंतर आम्ही तिथून दुसरीकडे राहायला गेलो. मी अशा दोन डॉक्टरांना भेटलोय ज्यांना मेडीकलला जायचेच नव्हते. एक गायनॅकोलॉजिस्ट जीचा आर्कीटेक्टसाठी जेजे मधे नंबर नाही लागला, पण मेडीकलमधे लागला म्हणून तेवढ्यासाठी आर्कीटेक्ट व्हायचं स्वप्न सोडून डॉक्टर झाली. दुसरी आयुर्वेद डॉक्टर तिला चित्रकलेची आवड होती, जेजेत शिकायचं होतं पण कोणा जवळच्या हितचिंतक महाभागाने तीला सल्ला दिला की हे फार वाईट क्षेत्र आहे, पुढे काही स्कोप नाही. म्हणून ती बापडी नाइलाजाने डॉक्टर झाली. अशांना भेटलो की बरेच प्रश्न उभे राहतात मनात. केवळ भरमसाठ पैसा कमावण्यासाठी काहीही करावं? जे मनाविरूद्ध आहे तेही? त्याची अनैसर्गिक सवय करून घ्यावी? खरंच आयुष्य जे मिळालंय ते एक शिक्षा म्हणून भोगतो का आपण? 'बस एवढं झालं की नंतर सुखच आहे' असं प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजवत राहायचं? ते 'नंतर' कायम 'आता' मधे नाही का बदलता येणार? पहिल्यापासून आपल्या आवडीनिवडींना शास्त्रशुद्ध पद्धतीने ओळखून त्याच्याशी संबंधीत क्षेत्रात व्यवसाय नोकरी मिळवणे शक्य आहे. गरज आहे एका दूरदृष्टीची, मेहनत घेण्याची, समाजाच्या विचित्र नजरा आणि प्रश्न झुगारून द्यायची. कुठल्याही क्षेत्रात पारंगत व्हायला, व्यावसायिक कौशल्य प्राप्त करायला आणि त्यातून अर्थाजनाचा कायम स्त्रोत मिळवण्याच्या पात्रतेचे व्हायला फक्त सात वर्ष कसून मेहनत, अभ्यास लागतो. चार वर्षे शिक्षण आणि तीन वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव. हे सात वर्षे जो कुणी आयुष्याच्या कुठल्याही वळणावर आपल्या आवडीनिवडीला अनुसरून देईल त्याला मनशांती, पैसा आणि शाश्वत आनंद मिळेल असं वाटतं. जगात प्रत्येकासाठी काम आहेच. कारण निसर्गात ज्याची गरज असते तेच उत्पन्न होत असतं. फक्त जे उत्पन्न झालंय त्याला जिथे गरज आहे तिथवर पोचायला प्रचंड कष्ट लागतात. पण शिखरावर गर्दी कमी असते. या सर्वांचा विचार आजच्या पालकांना करायलाच लागेल. कारण लोकसंख्या भरमसाठ आहे. शासन बेरोजगारांचा शिक्का नको म्हणून कॉलेजांच्या जिलेब्या पाडत आहे. त्यातून इतके पदवीधर बाहेर पडतायत की त्यांच्यात प्रचंड स्पर्धा नोकरी मिळवण्यासाठी वाढते आहे. एकीकडे कुशल मनुष्यबळ तीव्र टंचाई आणि दुसरीकडे उच्चशिक्षित, अकुशल व भ्रमित मनुष्यबळाचे लोंढे. आपलं मूल या लोंढ्यात असणार नाही याची काळजी घ्यायलाच लागेल. शेवटी एक उदाहरण देतो. माझा एक शाळा-वर्गमित्र जो सिविल इंजिनीअर आहे (आणि ते त्याचं खरंच वेड आहे) तेव्हा रीलायन्सच्या तेलसंशोधन विभागात होता. त्याने त्याच्या ऑफीसमधल्या एकाला आमच्या सोबत तीसरा रूमपार्टनर म्हणून आणले होते. हे साहेब आसाममधले नॉर्थ-इस्ट एथनिसिटीवाले. हा त्याचा पहिलाच जॉब. पगार ८० हजार (२००७) मी म्हटलं 'बाबारे, असं तू काय शिकलायस की तुला एवढा पगार आहे?' तो म्हणाला, 'भूगर्भ-शास्त्रात एमएस्सी केलंय. आणि मला अजून मोठ्या तेल कंपन्यांकडून दीड-दोन लाखाच्या ऑफर्स येत आहेत. मला फक्त निर्णय घ्यायचाय कुठली कंपनी निवडू.' मी माझ्या वर्गमित्राला म्हणालो, "बघ निल्या, आपण इथं महाराष्ट्रासारख्या अतिप्रगत भारतीय राज्यामधे राहून असं काही शिक्षण घेता येतं आणि त्याला एवढी मागणी आहे हे आपल्यापर्यंत पोचत नाही, तर खरंच आपण पुढारलेले आहोत का?" निल्याकडे तेव्हा सिवीलची डीग्री आणि चार वर्षाचा अनुभव आणि ३० हजार रुपये पगार होता. माझ्याकडे दोन डीग्र्या आणि सहा हजार पगार होता. तो आसामी आमच्या पेक्षा २ वर्षांनी लहान होता. आणि मी नुकतीच आवडत्या क्षेत्रात करीअरला सुरुवात केली होती.
त्या क्षणी 'योग्यवेळी केलेल्या करीअरप्लानींग आणि गायडन्सचा आयुष्यात मोलाचा वाटा आहे' हे जे कोरल्या गेलं ते कायमचंच.

वाचने 18570 वाचनखूण प्रतिक्रिया 81

श्रीरंग_जोशी 02/07/2015 - 05:20
करिअरमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे व काय जमतं हे मलाही कळलेलं नव्हतंच. त्यात शिक्षणाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही असा न्युनगंड असणारी पालकांची मानसिकता. हा ताण सहन न झाल्यामुळे शैक्षणिक गाडी दहावी बारावीत घसरलीच. नशिब बलवत्तर म्हणून सॉफ्टवेअर क्षेत्र भारतात त्याच वेळी जोम धरू लागलं (तसं काही वर्षे आधीपासूनच) म्हणून नंतर गाडी परत रुळावर येऊ शकली. अजुनही वेड्यागत भरपूर पैसे करून खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांतून मुलांना इंजिनिअरींग करवणारे पालक मोठ्या संख्येने दिसतात. त्यातही इलेक्ट्रॉनिक्स शाखा घ्यायला लावतात. त्यातून निघालेले बरेच लोक सॉफ्टवेअरमध्ये आले की त्यांना एकतर पटकन नोकरी मिळत नाही किंवा मिळाली तर काम झेपत नाही. मग सी-डॅक वगैरेला शरण जातात. मारुन मुटकून इंजिनिअरींग करायचच आहे अन सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून करिअर करायचय तर सरळ कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी ब्रॅन्च घ्यावी नं. २००३ साली स्व. श्रीकांत जिचकार यांचे करिअर मार्गदर्शनाचे व्याख्यान ऐकण्याचे भाग्य लाभले होते. लौकिकार्थाने प्रसिद्ध असणार्‍या क्षेत्रांकडे आवड नसताना वळू नका हे त्यांचे सोदाहरण सांगणे लोक मंत्रमुग्ध होऊन तीन तास ऐकत होते. पण त्या श्रोत्यांमध्ये तसं काही अंमलात आणणारे अगदी बोटावर मोजण्याइतके असतील.

In reply to by श्रीरंग_जोशी

तुम्ही २००३ साली अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात झालेल्या स्व. जिचकार यांच्या कार्यक्रमाविषयी बोलत असाल तर तिथे मीपण होतो. तो कार्यक्रम साधारण दहावी ते बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी होता. पण अख्खा गाव लोटलं होतं तिथे.. इयत्ता तिसरी ते पदवीधर अशी सगळे जनता होती..

In reply to by कंजूस

राजेंद्र मेहेंदळे 07/07/2015 - 14:59
मी पण श्री. श्रीराम गीत यांचे ते सदर नियमित वाचतो. मुलगा पाचवीत गेलाय. पुढे उपयोगी पडेल. अवांतर-आजकाल आय.आय .टी. प्रेप चे क्लासेस आठवीपासुनच सुरु होतात म्हणे?

मुक्त विहारि 02/07/2015 - 09:29
जबरदस्त लिहीले आहे..... "लग्नकार्यात, समारंभात, "जाऊबाइंच्या मुलाचं काही खरं नाही बघा, अहो काय शिकतोय, शिकतोय का नाही काहीच सांगत नाही. आमच्या मुलांनी मात्र नाव काढलं हो. एक इंजिनीअरींग करतोय, दुसरा डॉक्टर झालाय बरं का." वैगेरे वैगेरे. ही टोचून जखमी झालेली पोरं चिवट आणि जिद्दी असतील तर याच लोकांना डोळे बाहेर काढायला लागतील अशी प्रगती उत्तरआयुष्यात करतात." ही अशी उदहरणे बरीच आहेत. "मला कायम प्रश्न पडत आलाय तो हा की करीअर मार्गदर्शन नेमकं कोणत्या वयात व्हावं?" ह्याला ठराविक असा नियम नाही.पण माझा अनुभव सांगतो, स्त्री ही माता असेल तर,पुरुषाला पिता होणे भाग आहे.आपल्या मुलाची/मुलीचा कल कुठे आहे, ते बापाला समजलेच पाहिजे.कारण कितीही नाही म्हटले तरी, मुले/मुली बापाच्या म्हणण्याकडे लगेच कानाडोळा करत नाहीत. त्यामुळे जेंव्हा जेंव्हा मुलाचा अर्जून होईल, तेंव्हा-तेंव्हा बापाने श्रीकृष्ण शोधावा.जगात असे श्रीकृष्ण बरेच आहेत. त्याची शास्त्रीय पद्धत (मेथाडॉलॉजी) काय असावी किंवा आहे का? त्याचा उपयोग होतोय का? शास्त्रीय पद्धतीबद्दल अनभिज्ञ आहे (कारण मला त्यातले ज्ञान नाही आणि त्याचा अधिकार पण नाही.).पण मुलाचा कल नक्की कुठे आहे, हे ओळखायला ह्या शास्त्रीय पद्धतीचा फायदा, निदान माझ्या इडियड्सना तरी झाला. (टु इडियट्सचा येडा बाप) मुवि

पगला गजोधर 02/07/2015 - 09:41
चुमान्डस सर ! यु आर सिम्पली चुमान्डस.

सिरुसेरि 02/07/2015 - 09:54
माणसाचे मन हे खुप चंचल असते . कितीही आवडीच्या क्षेत्रात असला तरी त्याला आपले क्षेत्र चुकलेच असे वाटत असते. याला अपवाद म्हणजे - लताजी , आशाजी , भिमसेनजी , सचिन , सुनील इत्यादी. पण ही सर्व थोर माणसे . सर्व सामान्य माणसांनी यांच्याशी आपली तुलना करु नये . व जे कुठले क्षेत्र आपल्याला लाभले त्यामध्येच नवीन काहीतरी करुन दाखविण्याचा ध्यास बाळगावा . खुद्द पु.ल. देशपांडे यांचेही शिक्षण बी.ए. , एम्.ए. , एल्.एल.बी. असे झाले होते .व कथा , नाट्य - साहित्य लेखन , वाचन , संगीत - गायन , वादन , गीत , अभिनय ,दिग्दर्शन ,चित्रपट , ध्वनी , छायाचित्रण ,प्रवास, भाषा ,प्राध्यापकी , सादरीकरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचीही मुशाफिरी झाली होती . व त्यांनीही हे सर्व वेळोवेळी मनापासुन एन्जॉय केले होते .

In reply to by सिरुसेरि

असंका 03/07/2015 - 20:10
माणसाचे मन हे खुप चंचल असते . कितीही आवडीच्या क्षेत्रात असला तरी त्याला आपले क्षेत्र चुकलेच असे वाटत असते.
द ग्रास इज ऑल्वेज ग्रीनर ऑन द अदर साइड..! सहमत...!

सुबोध खरे 02/07/2015 - 09:59
एक सुदैवी माणूस --मी मी मराठी माध्यमाच्या शाळेत( पुरंदरे हायस्कूल मुलुंड) १० वि पर्यंत शिकलो.पण आमची शाळा काळाच्या मानाने पुढारलेली होती. शाळेच्या उप मुख्याध्यापकांना (देशमुख सर) शाळेने एक वर्ष व्यवसाय मार्गदर्शन अभ्यास करण्यास पाठवले. नववीच्या परीक्षेनंतर या सरांनी आमच्या तिन्ही तुकड्यांची चाचणी घेतली आणि दहावीची परीक्षा झाल्यावर मुलांना गटा गटाने मार्गदर्शन करायला बोलावले. माझा अतिशय आळशी स्वभाव पाहून आमच्या आई वडिलांनी तू कॉमर्सला जा असे सुचवले होते. मी तसा हुशार म्हणून गणला जात असे (४ थी आणि ७ वि ची शिष्यवृत्ती हि मिळाली होती) त्यामुळे हे गुण कमी मिळाल्यामुळे नव्हते. पण माझ्या चुलत भावाची कॉमर्सची पुस्तके मी आणून समजण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सरांचे व्यवसाय मार्गदर्शन लाभले. त्यांनी सांगितले कि बुद्धिमत्ता(INTELLIGENCE) तुझ्याकडे आहे म्हणून कॉमर्समध्ये तू यशस्वी होशील पण तुझा कल(APTITUDE) मेडिकल कडे आहे. मग मी जीवशास्त्राची पुस्तके आणली ती मला फारच भावली. आमच्या आईने सांगितले कि मला विचारशील तर डॉक्टर होऊ नको डॉक्टरला खाजगी आयुष्य राहत नाही. पण मी त्यांच्या सूचना डावलून डॉक्टरच व्हायचे ठरवले. आळशी स्वभावाला अनुसरून रेडियोलॉजि हा विषय घेतला. आजतागायत मला डॉक्टर झाल्याचा पश्चात्ताप होत नाही. पुढच्या जन्मी काय व्हावेसे वाटते तर डॉक्टर हेच उत्तर आहे. सरकारी नोकरी, कोर्पोरेट रुग्णालयात नोकरी आणी आता खाजगी व्यवसाय असे माझे करियर झालेले आहे. माझ्या गरजेपेक्षा मला नक्कीच जास्त पैसा मिळतो आहे. अफाट पैसा मिळवण्यासाठी कष्ट करण्याची माझि तयारी नाही. आयुष्य सुखात आणी समाधानात चालले आहे. स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यापासून रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी येणारे नैराश्य आयुष्यातून बाद झाले आहे. CNBC TV १८ वर माझी मुलाखत झाली होती तेंव्हा तेथील अर्थतज्ञानी विचारले कि तुम्ही कितव्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार करत आहात त्याप्रमाणे अर्थ नियोजन करता येईल. मी त्यांना सांगितले जोवर हात पाय चालते आहेत तोवर निवृत्त होण्याचा विचार नाही. कारण मी जे करतो आहे त्यात मला मजा येते तर ते मी का सोडावे? त्यांचा उडालेला गोंधळ हा पाहण्यासारखा देखावा होता. ( यावर पुन्हा केंव्हा तरी) यातून घेण्यासारखे -- १) नववीची परीक्षा झाली कि मुलाला व्यवसाय मार्गदर्शनासाठी तज्ञांकडे घेऊन जा. २) अकरावीला जाण्यापूर्वी जी शाखा निवडणार त्या शाखेची पुस्तके (जुनी चालतील) आणून मुलाला वाचायला द्या. त्याला त्यात रस निर्माण होतो का ते पहा. ३) आपल्या मुलाचे करियर हा आपला प्रतिष्ठेचा विषय बनवू नका. या तीनही गोष्टी मी माझ्या मुलांबाबत केल्या आहेत मुलगी कॉमर्सला आहे आणी मुलगा स्वताहून सिव्हील इन्जीनियारीन्ग्ला गेला आहे. पहिले वर्ष संपले असताना सुट्टी चालू असूनहि स्वतहून दुसर्या वर्षाची पुस्तके विकत घेऊन आला आहे आणी वाचून पाहतो आहे. असे असूनही एखाद्याचा मार्ग चुकला असेल तर तो बदलण्यास लाजू नये. चार वर्षे इंजिनियरिंग करूनही आपल्याला शेफ व्हायचे असेल तर खुशाल करा. चुकीची बस पकडली असेल तर जवळच्या पहिल्या स्थानकावर उतरा आणी परत या. उगाच तिकिटाचे पैसे फुकट जातील म्हणून दिशाहीन भरकटू नका.

In reply to by सुबोध खरे

राजेंद्र मेहेंदळे 07/07/2015 - 15:03
वा डॉक्टरसाहेब!! मान गये!! चुकीची बस पकडली असेल तर जवळच्या पहिल्या स्थानकावर उतरा आणी परत या. उगाच तिकिटाचे पैसे फुकट जातील म्हणून दिशाहीन भरकटू नका.>>

प्रमोद देर्देकर 02/07/2015 - 11:32
डांगे साहेब अगदि तंतोतंत वर्णन केलय तुम्ही. घरो घरी मातीच्या चुली. सगळीकडे हेच होतं. गुण किती मिळताहेत त्यावर पुढल्या शाखेत प्रवेश घेतला जातो. फक्त मार्गदर्शन मिळवणार्‍या संस्थांची जर कोणाला माहिती असेल तर ती इथेच द्यावी म्हणजे हा लेख परिपुर्ण होईल. धन्यवाद.

वाचन प्रेमी 02/07/2015 - 12:14
सध्या शिक्षण हे शिक्षण राहिलेलं नसून ते एक पैसा कमावण्याचे साधन झालेलं आहे ! करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली कोणत्या शाखेत किती पैसा हेच सांगितल आणि विचारलं जात ! माझ्या मते शिक्षण हे कलेच साधन आहे, जर आपण शिक्षणाला कला म्हणून आत्मसात कराल तर नक्कीच सुखी राहाल ! कलाकार हा नेहमीच सुखी असतो ! चित्रकार,संगीतकार याचं उदाहरण आहेच समोर. आणि शेवटी बरोबर काय येत ? पैसा तर नाहीच नाही ! आज कालच्या मुलांना याची अनुभूती म्हातारपणीच येते ! आयुष्यभर पैसाच कमवण्याच्या मागे लागतात ! छंद आवडी निवडी आणि आयुष्यातली मजा ते विसरत आहेत !

In reply to by वाचन प्रेमी

प्रसाद१९७१ 03/07/2015 - 11:54
सध्या शिक्षण हे शिक्षण राहिलेलं नसून ते एक पैसा कमावण्याचे साधन झालेलं आहे !
सध्या? गेली १००-१२५ वर्ष तरी हाच उद्देश आहे शिक्षणाचा.

In reply to by वाचन प्रेमी

बॅटमॅन 03/07/2015 - 18:28
सध्या शिक्षण हे शिक्षण राहिलेलं नसून ते एक पैसा कमावण्याचे साधन झालेलं आहे !
कुठल्या काळी एक पैसा कमावण्याचे साधन म्हणून बघत नव्हते? अगदी ब्रिटिशपूर्व काळातही कारागीर वंशपरंपरागत ट्रेनिंग पैशांसाठीच घ्यायचे, भले मग तो कुंभार असेल नायतर चांभार नायतर लोहार...जुन्या काळी ब्राह्मणही पैशे व प्रतिष्ठा मिळते म्हणून अरबीफारसी भाषा शिकून यावनी दरबारात कारकुनी करू लागले, मुलूखगिरीला, त्यातून नवीन जहागिरी इ. ला चांगला स्कोप यावनी दरबारात म्हणून मराठा सरदारांचीही गर्दी तिथेच होऊ लागली. किनारपट्टीकडचे व्यापारीही दूर देशांशी हडप्पा काळापासून व्यापार करत आले आहेत. का तर संपत्ती इ. मिळते म्हणूनच ना? अशी चार वाक्ये फेकली की फेक नॉस्टॅल्जियाचा अनुभव येतो, बाकी काही नाही. बाकी शिक्षणासाठी शिक्षण घेणारे लोक तेव्हाही होते अन आत्ताही आहेत.

In reply to by बॅटमॅन

सुबोध खरे 03/07/2015 - 20:12
पैसा कमावणे हे अगदी पाप नसेल तरी फारसे चांगले नाही या मनोवृत्तीतून मराठी माणसाने बाहेर पडणे आवश्यक आहे. पैसा हे सहावे इंद्रिय आहे परंतु त्याशिवाय पहिली पंचेंद्रिये व्यवस्थित काम करीत नाहीत. भरपूर पैसा कमावण्यासाठी उत्तम शिक्षण घेणे आवश्यक आहे. कारण भरपूर पैसा असेल तर तुम्ही तुमच्या आवडी जास्त चांगल्या तर्हेने जोपासू शकता. उत्तम संगीत ऐकण्यासाठी उत्तम म्यूझिक सिस्टीम असणे आवश्यक आहे नाहीतर पानाच्या टपरीवर पण एफ एम लावलेले असतेच.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 03/07/2015 - 20:14
भरपूर पैसा कमावण्यासाठी उत्तम शिक्षण घेणे आवश्यक आहे. या वाक्याचा उत्तम शिक्षण घेतल्यास भरपूर पैसा मिळतो असा अर्थ मला म्हणायचा आहे. नाही तर छिद्रान्वेशी लोक याचा बरोबर उलटा अर्थ काढण्याची शक्यता आहे.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 03/07/2015 - 21:32
(मी सोडून दुसर्‍याने) पैसा कमावणे हे अगदी पाप नसेल तरी फारसे चांगले नाही या मनोवृत्तीतून मराठी माणसाने बाहेर पडणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात प्रचंड पैसा मिळवण्याची हाव प्रत्येकालाच आहे. मराठी माणसाचा प्रॉब्लेम आहे की त्यासाठी नखरे न करता केलेले कष्ट आणि विचारपुर्वक, दूरदॄष्टीने निर्णय घेणारं डोकं लागतं या सत्याला तो सोयिस्करपणे नाकारतो. मुळात बहुसंख्य मराठी घरांमधे याचे संस्कारच नसतात. खूप पैसा कमवायचा तर लाख भानगडी असतात, लांड्यालबाड्याच कराव्या लागतात कोण त्या निस्तरत बसणार त्यापेक्षा चटणी-भाकरी मिळते ती गुमान खावी अन् सन्मानाने कसे जगावे याचे जगाला उपदेश देत फिरावे हाच एकमेव कार्यक्रम. मला वाटते पानिपताच्या तिसर्‍या युद्धात बसलेल्या भयानक दणक्याने मराठी माणसाची विचारवृत्तीच झटक्यात बदलली. ती अजूनही शेलशॉक अवस्थेतच आहे. अन्यथा पानिपताआधीची मानसिकता आणि नंतरची यात जमीन-अस्मानाचा फरक दिसला नसता. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. कारण समस्येचे मूळ कळल्याशिवाय उपाययोजना निरर्थक आहेत असं वाटतं. तसेच दुसरा भाग असा की शासकीय अधिकार्‍यांमधे बहुसंख्य मराठीच आहेत आणि भ्रष्ट मार्गाने दहा रुपयांपासून ते कितीही करोड रुपयांपर्यंत पैसा मिळवणे त्यांना अजिबात गैर वा पाप वाटत नाही. कारण तो कष्ट न करता मिळवलेला पैसा आहे. त्याचे अप्रूप असतेच. या पैशाच्या बाबतीत मराठी माणूस पाप वैगेरे मानतो असे दिसत नाही. असो. सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिलेत. आभार. सवडीने त्यावर उत्तर देतो.

In reply to by संदीप डांगे

श्रीरंग_जोशी 03/07/2015 - 23:35
शासकीय अधिकारी हे वाचल्याने एक आठवण. मी शाळेत शिकत होतो तेव्हा, दहावी बारावीची गुणवत्ता यादी वगैरे असायची. गुणवत्ता यादीतील अनेकांच्या थोडक्यात मुलाखती वगैरे यायच्या. भविष्यात काय व्हायचे आहे या प्रश्नावर बहुतेकवेळी डॉक्टर किंवा आयआयटीमधून इंजिनिअर व्हायचे आहे अशी उत्तरे दिली जात. क्वचित एखादा गुणवंत आयएएस अधिकारी व्हायचे आहे असे सांगायचा(ची). माझा चुलतभाऊ यावर म्हणायचा, ह्म्म्म भरपूर पैसा खायचा आहे वाटतं... :-) . बाकी मराठी माणसांच्या वृत्तीबाबतच्या मताशी सहमत.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 06/07/2015 - 18:29
पानिपताचा शेलशॉक आणि सध्याची मराठी मानसिकता यांचा काहीएक संबंध नाहीये साहेब. पानिपतोत्तर काळातही मराठ्यांनी खूप शौर्य गाजवलेले आहे. इतकेच नव्हे तर अगोदरच्या पराभवाचा वचपाही अनेक ठिकाणी आणि अनेक वेळेस काढलेला आहे. आणि हे सगळं पानिपतानंतर दहापंधरा वर्षांत झालेलं आहे. एका लढाईत मोडून पडावं इतकं तकलादू मराठी राज्य कधीच नव्हतं. जर तसंच बोलायचं झालं तर साधारणपणे टिळकोत्तर काळापासून आणि त्यातही स्वातंत्र्योत्तर काळापासून आपली "अधोगती" सुरू झाली असे म्हणता येईल.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 06/07/2015 - 18:40
असं आहे का? तरी पण हे आकाश-पाताळ स्थित्यंतर कधी आणि कसे सुरु झाले त्याची कारणं काही आहेत का? नेमकी अटकेपार झेंङा रोवणारी मानसिकता आणि स्वतःच्या गल्लीत वडापावचं दुकानही न चालवू शकणारी मानसिकता येवढं जबरदस्त स्थित्यंतर फक्त गेल्या पन्नास वर्षात झालं? हे तर अजून इंटररेस्टींग होतंय. असो. हा विषय लेखाच्या विषयाला धरूनच आहे असे समजतो.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 06/07/2015 - 18:55
या विषयाचा माझा फार अभ्यास नाही. पण वाचन आणि आजूबाजूला जे ऐकतो त्यामधला अंतर्विरोध खूप जाणवतो हे खरंय. व्यापारात मराठी सहभाग बर्‍यापैकी होता, पण आपली मुख्य अचीव्हमेंट म्हणजे ब्राह्मणी-क्षत्रिय छापाची असे माझे मत आहे. ब्रिटिश राज्यात सर्व भारतात पुनरुज्जीवन घडून आले तसे ते महाराष्ट्रातही झाले, अनेक विचारवंत आणि अनेक पोलिटिकल नेते उदयाला आले. टिळकोत्तर काळात देशाच्या राजकारणाची सूत्रे महाराष्ट्राकडून हळू हळू उत्तरेकडे सरकत गेली. नंतरचे नेते प्रभावशाली होते पण एक मोठे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी होण्याइतके कधी डॉन झाले नाहीत. पुढे स्वातंत्र्योत्तर काळातही तोच प्रकार झाला. गांधीवधोत्तर काळात हळू हळू महाराष्ट्रातून ब्राह्मणांची राजकीय इन्व्हॉल्व्हमेंट कमी होत गेली आणि त्या वर्गात हतबलतेची जाणीव वाढीस लागली. शिवाय साहित्य निर्मिती करणार्‍यांत यांचाच भरणा बहुसंख्येने असल्यामुळे यांच्या जाणिवा = अखिल मराठी जनतेच्या जाणिवा असे काहीसे समीकरण झाले. कारण किती जरी श्या घातल्या तरी १९८०-९० पर्यंत महाराष्ट्र देशात सर्वच बाबतींत पुढे होता, आजही आहे. सहकार चळवळ, अमुक तमुक, इ.इ. त्यात परत मुंबईवरती राजकीय वर्चस्व असले तरी आर्थिक वर्चस्व नसल्याने आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे व्हिक्टिमहूड मेंटॅलिटीला कायम खतपाणी घालत राहण्याने आपण म्हणजे गरीब बिचारे, कुणीही या आणि टपली मारून जा असे वाटण्यात झालेय असे मला वाटते. भूमिपुत्रांसाठी उभे राहण्याचा दावा करणार्‍या पक्षांचा यात मोठा वाटा आहे. हा सर्व प्रकार म्हणजे तथ्यापेक्षाही मुख्यतः पर्सेप्शनचाच खेळ आहे. यात थोडे तथ्य आहे, नाही असे नाही- पण ते थोडेसे सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफसी सारखे आहे असे माझे मत आहे.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 06/07/2015 - 20:36
खरं आहे तुमचं. साहित्य निर्मिती, शिक्षण आणि प्रसार यात असलेल्या एकाच समूहाच्या प्राबल्यामुळे काही गृहितके ही नियम म्हणूनच बघितली जातात. मुळात आज मराठ्यांच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा आजच्या ग्लोबलायझेशन, प्रचंड उलाढाल असलेल्या उद्योगधंद्यातून श्रीमंत झालेल्यांकडे पाहण्याचा बदललेला दृष्टीकोन, पैशातून सुख-सोयी विकत घेता येऊ शकतात, पैशामुळे कामं होतात, लोक पैशापुढं लोटांगण घालतात हे माहित झालेलं सत्य इत्यादी कारणांमुळे बदलला आहे असं वाटतं. म्हणजे पुर्वी सरकारी नोकरीला एवढा मान मिळत नसेल, कदाचित १९०० चे सुरुवातीला वैगेरे. नंतर समाजकारणात असणार्‍यांना मान मिळत होता. त्यानंतर सहकार चळवळीत असणार्‍यांना मान मिळत होता. ६०नंतर नेहरूंनी इंजिनीअर डॉक्टर्सची गरज ओळखून त्या संबंधी चालना दिली. सरकारात बी.ए. बीकॉम झालेल्यांना पटापट नोकर्‍या मिळू लागल्या. तसाही मनुष्याचा कल कमी श्रमात जास्त पैसा मिळवणे असा आहे त्यामुळे हा नोकरीवाला पैसा भाव खाऊ लागला असेल. आणि धंद्यासाठीही अतिशय घातक वातावरण ९५ पर्यंत होतं. अगदी जीवावर उदार होऊन ज्यांच्यात खरंच गट्स होते त्यांनीच धंदे केलेत असं म्हणू शकतो. त्यामुळे सोयिस्कर व सुरक्षित अशा नोकरीस प्रथम प्राधान्य देण्याची मानसिकता १९७० नंतर कायमच राहिली आहे. आज आपल्या वाईट स्थितीचं खापर पुर्वजांनी केलेल्या चुकांवर (खरंतर त्या चुका आहेत हे ही आपणच म्हणायचं) फोडायचं अशी एकंदर मनोवृत्ती दिसते. बाकी मुंबईत राजकिय संघटनांनी भुमीपुत्रांच्या भावनांना फक्त अस्मितेची टुकार फुंकर घातली आहे. मुंबईचा इंग्रजांनंतरचा इतिहासच माझ्या मते तिच्या आजच्या स्थितीला कारणीभूत आहे. माहिमला कुणी राजा होता तेव्हाची आणि सात बेटं जोडल्यानंतरची मुंबई ही एकच गोष्ट नाही आहे हे तुम्ही मुंबईचा इतिहास बारकाईने वाचाल तर लक्षात येईल. तिथे एखादं दुसरे मराठी लोक दिसतील पण मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्याचे श्रेय खरे तर पारशी-गुजरात्यांना जाते. (भारतात मवाळ स्वातंत्र्य चळवळ सुरू करण्याची गरजही याच पारशी-गुजराती उद्योगघराण्यांना सर्वात आधी वाटली. कारण इंग्रज उत्पन्नातला बराच भाग उगाच खातात असं यांना वाटायला लागलं. म्हणून पैसा ओतून सनदशीर स्वातंत्र्यचळवळ उभी केली असं माझं मत आहे. शेवटी आधुनिक इतिहासात खरे राज्यकर्ते उद्योगपतीच आहेत. त्यांनी ठेवलेले नेते, राजकारणी नावाचे राखणदार हे राज्य आपलंच आहे असं जनतेला भासवत असतात. तीच त्यांची खरी ड्युटी असते,) माझ्या मते 'मराठी माणुस धंद्यात मागे' ही हाकाटी धंद्यात चांगला पैसा मिळवण्याची सोयीस्कर वेळ आल्यावर मराठी माणुस यात कुठे दिसत नाही म्हणून अचानक उपरती झाल्याने आली असेल. पण असं म्हणणारांना एक कळत नाही की विक्टरी लव्ज प्रीपरेशन. पिढ्यांपिढ्या धंद्यात असणार्‍यांना काही मूलभूत तत्वे कळलेली असतात. नव्याने धंदा करणारे बुडतात ते त्यामुळेच. तरी धंदा करणारी मराठी माणसंही काही कमी नाहीत. त्यामुळे आता ही हाकाटी बंद करून मराठी माणसाला धंद्यासाठी प्रोत्साहन द्यावे ही वेळ आली आहे.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 07/07/2015 - 12:19
आणि धंद्यासाठीही अतिशय घातक वातावरण ९५ पर्यंत होतं. अगदी जीवावर उदार होऊन ज्यांच्यात खरंच गट्स होते त्यांनीच धंदे केलेत असं म्हणू शकतो. त्यामुळे सोयिस्कर व सुरक्षित अशा नोकरीस प्रथम प्राधान्य देण्याची मानसिकता १९७० नंतर कायमच राहिली आहे.
आयला हो की. हा मुद्दा लक्षातच आला नव्हता. इतर मुद्यांपेक्षा बर्राच महत्त्वाचा आहे हा मुद्दा. धन्यवाद.
माहिमला कुणी राजा होता तेव्हाची आणि सात बेटं जोडल्यानंतरची मुंबई ही एकच गोष्ट नाही आहे हे तुम्ही मुंबईचा इतिहास बारकाईने वाचाल तर लक्षात येईल.
हो अर्थातच. वैसेभी तो मुद्दा अवांतर होता. तो उद्धृत करण्याचे कारण इतकेच की हा मुद्दाही चर्चेत रहावा, नाहीतर मुंबई आणि मराठीचे नाते इ. बद्दलच्या चर्चेत कुणी याचा वापर करताना दिसत नाही.
दुसरे मराठी लोक दिसतील पण मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्याचे श्रेय खरे तर पारशी-गुजरात्यांना जाते. (भारतात मवाळ स्वातंत्र्य चळवळ सुरू करण्याची गरजही याच पारशी-गुजराती उद्योगघराण्यांना सर्वात आधी वाटली. कारण इंग्रज उत्पन्नातला बराच भाग उगाच खातात असं यांना वाटायला लागलं. म्हणून पैसा ओतून सनदशीर स्वातंत्र्यचळवळ उभी केली असं माझं मत आहे. शेवटी आधुनिक इतिहासात खरे राज्यकर्ते उद्योगपतीच आहेत. त्यांनी ठेवलेले नेते, राजकारणी नावाचे राखणदार हे राज्य आपलंच आहे असं जनतेला भासवत असतात. तीच त्यांची खरी ड्युटी असते,)
मुंबैला आर्थिक राजधानी बनवण्यात गुजराती-पारशांचा वाटा आहे खरा- पण स्वातंत्र्यचळवळीशी जोडलेले नाते तसेच आहे किंवा कसे, हे जरा तपासून पाहिले पाहिजे. हा दृष्टिकोन रोचक आहे, अगोदर कधी ऐकला नव्हता.
माझ्या मते 'मराठी माणुस धंद्यात मागे' ही हाकाटी धंद्यात चांगला पैसा मिळवण्याची सोयीस्कर वेळ आल्यावर मराठी माणुस यात कुठे दिसत नाही म्हणून अचानक उपरती झाल्याने आली असेल. पण असं म्हणणारांना एक कळत नाही की विक्टरी लव्ज प्रीपरेशन. पिढ्यांपिढ्या धंद्यात असणार्‍यांना काही मूलभूत तत्वे कळलेली असतात. नव्याने धंदा करणारे बुडतात ते त्यामुळेच. तरी धंदा करणारी मराठी माणसंही काही कमी नाहीत. त्यामुळे आता ही हाकाटी बंद करून मराठी माणसाला धंद्यासाठी प्रोत्साहन द्यावे ही वेळ आली आहे.
अगदी अगदी!

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 07/07/2015 - 13:32
मुंबैला आर्थिक राजधानी बनवण्यात गुजराती-पारशांचा वाटा आहे खरा- पण स्वातंत्र्यचळवळीशी जोडलेले नाते तसेच आहे किंवा कसे, हे जरा तपासून पाहिले पाहिजे. हा दृष्टिकोन रोचक आहे, अगोदर कधी ऐकला नव्हता.
हा दृष्टीकोन आधी कुणी मांडलेला नसावा अशी शक्यता आहे. मध्यंतरी मुंबईवर एक वेबसाईट बनवत होतो. तेव्हा काही उत्खनन केले होते. त्यात मुंबईतून होणारा व्यापार आणि व्यापार-घराणी यांचीही काही माहिती वाचली. हिंदुस्थानी व्यापार्‍यांसाठी इंग्रजांपुर्वीची सरकारे फारशी तापदायक नव्हती. मात्र इंग्रजांचा 'व्यापार' हाच मूळ कारभार असल्याने त्यांची हिंदुस्थानी व्यापार्‍यांच्या व्यवहारात मनमानी लूडबूड होत होती. हजारो वर्षांपासून निर्धोक धंदा करणार्‍यांना हा इंग्रजी अंमल मानवत नव्हता. त्यामुळे भुमिपुत्रांच्या अस्मितेला फुंकर घालून त्यांना इंग्रज सरकारविरुद्ध उचकवण्याचे काम ह्या उद्योगघराण्यांनी सुरु केले. (अगदी तेच जे खळ्ळखट्याकवाले आज करत आहेत) कुठल्याही लहान/मोठ्या चळवळीला आर्थिक पाठबळ लागतंच. नुसत्या लोकसहभागावर इतकी मोठी स्वातंत्र्यचळवळ उभी राहणे शक्य नाही. इंग्रज काळात सामान्य माणसाला तसा काही फार त्रास होता असे आढळत नाही. कारण जुने लोक नेहमीच इंग्रज बरा होता म्हणतांना दिसतात. खरा त्रास उद्योगधंद्यांना, अर्थव्यवस्थेला होता. अर्थात त्यांनी स्वातंत्र्यचळवळ त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी उभारली असे म्हणायचे नाहीये. एकंदर आपल्या देशावर आपल्या लोकांचा अंमल असावा अशीच त्यांची धारणा होती. स्वातंत्र्यचळवळीचे सगळेच सत्य आपल्यासमोर कधीच येणार नाही. नेहमी राष्ट्रवादाने भारावून टाकेल अशीच माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचली आहे. मी उपलब्ध माहितीवरून फक्त बिंदू जोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे फक्त तर्क लढवला आहे. पण अभ्यासकांसाठी हा चांगला मुद्दा आहे. स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक पुरवठा करणारे कोण कोण होते ह्याबद्दल जाणून घेतले पाहिजे.

In reply to by संदीप डांगे

हिंदुस्थानी व्यापार्‍यांसाठी इंग्रजांपुर्वीची सरकारे फारशी तापदायक नव्हती. मात्र इंग्रजांचा 'व्यापार' हाच मूळ कारभार असल्याने त्यांची हिंदुस्थानी व्यापार्‍यांच्या व्यवहारात मनमानी लूडबूड होत होती.
इंग्रजांनी भारताचे अनेक परंपरागत उद्योगधंदे बंद पाडले ही वस्तुस्थिती आहे. मात्र युरोपियन प्रवेशानंतर भारतीय व्यापार्‍यांना अनेक मार्ग नव्यानेही खुले झाले हे विसरता येत नाही. उलट नव्या व्यवस्थेला (म्ह. इंग्रज) सढळ हाताने मदत करणार्‍यांपैकी अनेकजण व्यापारीच होते (त्र्यं.शं.शेजवलकरांचा एक लेख पहावा. त्याचे शीर्षक विसरलो पण त्यात इंग्रजांना पैसे किंवा मॅनपॉवर, धान्य, दारुगोळा, इ. रूपात नेपाळपासून ते दक्षिणेपर्यंत मदत करणार्‍या एका गुजराती घराण्याबद्दल विवेचन आलेले आहे.) असे दिसते. त्यामुळे व्यापार्‍यांचे असे कुठले हितसंबंध जपले जात नव्हते ते कळत नाही. पारशी व्यापारी तर त्या वेळेस युरोपमध्येही घुसले होते. हे सर्व इंग्रजांच्या कॄपेमुळेच शक्य होतं. असं असताना अचानक यांना काय झालं?
कुठल्याही लहान/मोठ्या चळवळीला आर्थिक पाठबळ लागतंच. नुसत्या लोकसहभागावर इतकी मोठी स्वातंत्र्यचळवळ उभी राहणे शक्य नाही. इंग्रज काळात सामान्य माणसाला तसा काही फार त्रास होता असे आढळत नाही. कारण जुने लोक नेहमीच इंग्रज बरा होता म्हणतांना दिसतात.
आर्थिक पाठबळ लागतं ही गोष्ट खरी आहे, आणि अनेक धनिक लोक त्यांच्या मागे उभे राहिले. पण स्वातंत्र्यासाठीचे इनिशिएटिव्ह व्यापारी वर्गाकडून आले होते असे वाटत नाही. अन जुने लोक इंग्रज बरा होता म्हणतात तेही फसवं आहे. दुसर्‍या महायुद्धाआधीची आणि नंतरची स्थिती यात खूप अंतर आहे- युद्धामुळे खूप ताण आला होता भारतावर. त्यामुळे साहजिकच अगोदरचा काळ भारी असे म्हणणे साहजिकच आहे. शिवाय इंग्रज भारी असे म्हणणारे लोक नक्की कोण आहेत ते देखील पाहिलं पाहिजे- अ‍ॅज़ इन, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांकडून असे ऐकायला मिळते का? की फक्त विशिष्ट स्तरातील लोकांकडून ऐकायला मिळते? तेही तपासले पाहिजे. माझा कयास आहे की सर्व स्तरांतील लोक असे म्हणत नसावेत.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 07/07/2015 - 15:30
यावर सविस्तर लिहावं लागेल असं दिसतंय. मी या निष्कर्षावर का आलो ते जरा परत धुंडाळून वेगळ्या लेखात मांडतो. म्हणजे व्यवस्थित चर्चा करता येईल. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाला खूप अप्रकाशित कंगोरे आहेत. इंग्रज फारफार जुलमी होता असे आपण शाळेपासून ऐकत आलो आहोत. त्यातच दादासाहेब फाळके मस्त चित्रपट काढत होते, लोक चित्रपटांना गर्दी करत होते असे काही वेगळेच समाजजीवन ऐकले की प्रचलित पूर्वग्रहांना धक्का बसतो.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 07/07/2015 - 15:36
इंग्रज फारफार जुलमी होता असे आपण शाळेपासून ऐकत आलो आहोत. त्यातच दादासाहेब फाळके मस्त चित्रपट काढत होते, लोक चित्रपटांना गर्दी करत होते असे काही वेगळेच समाजजीवन ऐकले की प्रचलित पूर्वग्रहांना धक्का बसतो.
:) वाईटपणा हा सर्वंकषच असला पाहिजे असे नाही. औरंगजेबालाही शिव्या घातल्या जातात त्या त्याच्या धर्मवेडामुळे. बाकी राजाची कर्तव्ये तो व्यवस्थित पार पाडतच होता. फाळक्यांना पिच्चर काढायची मुभा दिली म्हणून इंग्रज चांगला होत नाही. मुळात, वाईट असणे म्हणजे सर्व प्रजेला रोज गुरासारखे बडवत राहणे अशी काहीशी इमेज असते लोकांच्या मनात. समजच तसा झाला तर काही इलाज नसतो.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 07/07/2015 - 15:47
इतिहास लिहिणारे (पक्षी: जेते वा राज्यकर्ते) तसा समज होईल याची सतत काळजी घेतात. हिटलरबद्दलही अमेरिकन आणि दोस्त राष्ट्रे ज्याप्रमाणे गळा काढतात त्यावरून इमेज बनवणे म्हणजे काय हे लक्षात येतं.

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 07/07/2015 - 15:55
इंडीड. इंग्रजांचीही कल्याणकारी इ. इमेज बर्‍याच प्रयत्नपूर्वक बनवल्या गेली आहे. त्याचेही अर्थात अनेक पदर आहेत- १. १८५७ च्या अगोदर की नंतर? २. अधिकारी इंग्लिश आहे की स्कॉटिश की वेल्श? ३. अधिकारी अप्परक्लास की लोवरक्लास? हे काही ठळक निकष आहेत - एका इंडिव्हिज्युअल अधिकार्‍याचे विचार आजमावण्याच्या पातळ्या आहेत रादर. शेवटी वाईटपणा म्हणजे तरी काय, भारतीयांना डावलून ब्रिटिशांना झुकते माप देणे, भारतीय संस्कॄतीबद्दल अनेक पूर्वग्रह भारतीयांच्या मनात भरवून देणे, इ.इ. एक ना दोन अनेक पदर आहेत त्याला. त्यात परत या ब्रेनवॉशिंगला अभ्यासाची जोड असल्याने अनेक पूर्वग्रह एकदम खोलवर जाऊन बसले. इतके की ते पूर्वग्रह आहेत असे म्हटले तरी लोक अंगावर येतात.

In reply to by संदीप डांगे

अस्वस्थामा 07/07/2015 - 15:57
उत्तम चर्चा आणि चर्चाविषय.. याबद्दल अजून वाचायला/बोलायला आवडेल पण इथे अवांतर नको. डांगे साहेब, वेगळा धागा काढता का ?

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 06/07/2015 - 23:25
'भूमिपुत्रांसाठी उभे राहण्याचा दावा करणारे पक्ष' हा फारच महत्त्वाचा मुद्दा आहे. यात मराठी माणसाला आधी न्यूनगंड निर्माण करवणं आणि तो तसाच पोसत राहणं, त्याला ठसठसत ठेवणं आणि आपल्या तुम्बड्या भरणं हां उद्योग सातत्यानं झालाय. मराठी माणूस वडापाव च्या गाड्या चालवणे आणि चतुर्थ श्रेणीची कामं करणे याव्यतिरिक्त काही करू शकत नाही अशी भावना निर्माण करुन मराठी माणसांचं काय नि कसं भलं झालं ते एक आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज च जाणोत!

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 07/07/2015 - 12:21
पूर्ण सहमत. मराठी जनतेच्या अस्मितांची मोनॉपॉली घेतलेल्यांची मांदियाळीही बाकी अतिरोचक असते. तर्क वगैरे चालतच नाही, फक्त खळ्ळखट्याक केले की झाले असा सोयीस्कर समज करून घेणार्‍या यांचे भविष्य आजिबात उज्ज्वल नाही. आय मीन पुढार्‍यांचे काही वाकडे होत नाही, पण बाकी जन्तेचे काही भले तरी काय होणार काय की.

In reply to by बॅटमॅन

नाखु 07/07/2015 - 14:14
राजकारणी आणि धोरणी पुढार्यांच्या दृष्टीने कुठल्याही सामाजीक-समस्येचे निराकारण निपटारा होण्यापेक्षा गुंता (भिजत घोंगडे) होणे जास्त फायदेशीर असते आणि त्यासाठीच ते प्रयत्न करीत असतात. बिहारात जनता निरक्षर आणि जाती वरचस्व वादी रहावी म्हणून तर, महाराष्ट्रात शेतकरी मसीहा आपले स्थान अबाधीत रहावे म्हणून शेतकर्‍यांना नव्य वाटा/तंत्रज्ञान मिळू नये यासाठी तर बंगालात कामगार नेत्यांना कारखानदार कायम तुमची फक्त पिळवणूक करतात असेच सांगण्याचे काम राजकारणी करीत असतात. १९८० नंतरचे किमान एक क्षेत्र असे दाखवा जिथे राजकारणी कांगाव्खोर लोकांनी माती केली नाही. सहकारी चळवळ , लोकजागर या सार्‍या बाबी १९८० च्य अगोदर्च्या आहेत जेव्हा विरोधकांप्रतीही आदर असायचा.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 06/07/2015 - 23:25
'भूमिपुत्रांसाठी उभे राहण्याचा दावा करणारे पक्ष' हा फारच महत्त्वाचा मुद्दा आहे. यात मराठी माणसाला आधी न्यूनगंड निर्माण करवणं आणि तो तसाच पोसत राहणं, त्याला ठसठसत ठेवणं आणि आपल्या तुम्बड्या भरणं हां उद्योग सातत्यानं झालाय. मराठी माणूस वडापाव च्या गाड्या चालवणे आणि चतुर्थ श्रेणीची कामं करणे याव्यतिरिक्त काही करू शकत नाही अशी भावना निर्माण करुन मराठी माणसांचं काय नि कसं भलं झालं ते एक आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज च जाणोत!

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन 06/07/2015 - 18:35
अगदी पूर्ण सहमत डॉक्टरसाहेब. भारतभर जाऊन साम्राज्य स्थापणार्‍या मराठी सरदारांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र असा घरकोंबडा झाला तो मोस्टलि स्वातंत्र्योत्तर काळापासूनच, कारण तेव्हापासून हळूहळू घरबसल्या नोकर्‍या इ. मिळू लागल्या. जुन्या पिढीतली आत्मचरित्रे काढून बघा म्हणावं जरा, अगदी १८५७ पर्यंत जायची गरज नाही- अगदी १९४० पर्यंत पाहिले तरी समजून येईल की कसे तेव्हाचे मराठी लोक लीलया भारतभर फिरत होते- अन हे फिरणारे सगळेच कै अद्वितीय भास्कराचार्य किंवा क्षत्रियकुलावतंस वगैरेही नव्हते. सामान्यच लोक, पण आरामात फिरत होते- सध्याच्या काळात बिहारी फिरतात तसे. गेल्या दोनेक पिढ्यांत ते कमी झालं आणि मुंबईवर आर्थिक दबदबा न राहिल्याने न्यूनगंड हीच मराठी माणसाची डिफॉल्ट स्थिती आहे असे लोक मानू लागले. पण असं आजिबात नाहीये. हे कितीजणांना सांगितलं तरी झेपत नाय राव. असोच.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 06/07/2015 - 18:50
माझ्या माहितीप्रमाणे मुंबईचं आर्थिक महत्त्व गेल्या दिडशे वर्षातच उभारीस आलंय. त्याआधी मुळात मुंबई कधीच मराठी माणसांची नव्हती. इथे फक्त काम करायला मिळते/भाकरी मिळते म्हणून कामकरी वर्ग स्थलांतरित झाला, मुंबईला आर्थिक ओळख आणि दबदबा निर्माण होण्याइतकं मोठं करण्यात मराठी लोक होते का? दुसरं असं की मराठी माणसाची नोकरीस प्रथम पसंती आणि धंद्यास अपवादात्मक/नकारात्मक पसंती ही वस्तुस्थिती नाही आहे का?

In reply to by संदीप डांगे

माझ्या माहितीप्रमाणे मुंबईचं आर्थिक महत्त्व गेल्या दिडशे वर्षातच उभारीस आलंय. त्याआधी मुळात मुंबई कधीच मराठी माणसांची नव्हती.
या चर्चेत हे अवांतर आहे. पण "महिकावतीची बखर" नामक पुस्तक मिळाल्यास वाचून बघावे असे सुचवतो. माहीम येथील मराठी राजाबद्दल बरेच रोचक तपशील आहेत. शिवपूर्वकालीन समाजात या छोट्याश्या राज्यात प्रथम "महाराष्ट्र धर्म" सांगितला गेला. त्यामुळे मुंबै कधीच मराठी माणसाची नव्हती हे चूक आहे. हिस्टॉरिकल मेमरी देखील कुठली जिवंत राहते त्यावर बरेच काही अवलंबून असते. असो.
इथे फक्त काम करायला मिळते/भाकरी मिळते म्हणून कामकरी वर्ग स्थलांतरित झाला, मुंबईला आर्थिक ओळख आणि दबदबा निर्माण होण्याइतकं मोठं करण्यात मराठी लोक होते का?
होते की, बरेच लोक होते. जगन्नाथ शंकरशेठ विसरलात का? अर्थात भरणा गुज्जू-पारशांचा होता हे मान्य.
दुसरं असं की मराठी माणसाची नोकरीस प्रथम पसंती आणि धंद्यास अपवादात्मक/नकारात्मक पसंती ही वस्तुस्थिती नाही आहे का?
अगदी बरोबर आहे, पण हे चित्र थ्रूआऊट तसंच होतं असं वाटत नाही - किमान जुनी पुस्तके, आत्मचरित्रे, इ. वाचून. जेव्हा युनिव्हर्सिटी शिक्षणाचा प्रसार जास्त होऊ लागला, तेव्हा ते आधी शिक्षण मग नोकरी असा एकसुरी रस्ता उदयास आला. त्याच्या अगोदर फुल आँत्रप्रीन्यर होते लोक. काय करतील बापडे, दुसरा उपायच नव्हता.

In reply to by बॅटमॅन

वाचन प्रेमी 04/07/2015 - 09:10
त्याला व्यावहारिक ज्ञान अस म्हनाव ! जिजा माते ने शिवरायांना कुठे पैसा जास्त मिळतो अस सांगितलेलं ऐकल आहे का ? शिक्षण तेच ज्याने मनुष्याचा विकास( आर्थिक नव्हे) होतो.कामी येतात ती मुल्ये आणि विचार. ५०००रु कमविणारा पण खुश असू शकतो.

In reply to by वाचन प्रेमी

बॅटमॅन 06/07/2015 - 18:26
मुळात जिजाऊसाहेबांनी शिवरायांना काय काय सांगितले हे नक्की कुठेही उपलब्ध नाही एखाददुसरे बखरींतले उल्लेख वगळता. ते एक असोच. बाकी पैशे जास्त मिळावेत असा खटाटोप महाराजांनी कायमच केलेला आहे. महाराजच नव्हे तर जगातील प्रत्येक राजाने तेच केलेलं आहे. ज्याच्या त्याच्या वकुबानुसार कमीअधिक यश मिळतं हा भाग वेगळा, पण डोके जागेवर असलेल्या राजाचा उद्देश संपत्ती मिळवणे हा नसतो असं कुणीही सांगावं राव. बाकी ५००० रु. वगैरेबद्दल एक वाक्य आठवलं ते सांगतो- "पैशाने सगळेच विकत घेता येत नसले तरी तो पुरेसा मिळवल्यावरच अशी बडबड करावी." एकदम पटलं हे.

In reply to by बॅटमॅन

आदिजोशी 06/07/2015 - 20:20
भरल्या पोटी आणि भरल्या खिशाने 'पैशाचे मागे धावणं हेच आयुष्य नाही' अशी दवणे छाप वाक्य ऐकली की डोक्यात जातात.

In reply to by आदिजोशी

नाखु 07/07/2015 - 11:56
दोन्ही अवतरणांचा अनुभव+प्रत्यवाय, पदोपदी (वयक्तीक्/सामाजीक्/कौटुंबीक स्तरावर ) येत असूनही बोटचेपे धोरण स्वीकारले जाते. म्हणजे ज्याने (नवख्याने) व्यापार-उदीमात पैसा मिळवला तरी काही लांडी-लबाडी शिवाय शक्यच नाही असा एकतर्फी विचार केला जातो.

In reply to by वाचन प्रेमी

संदीप डांगे 06/07/2015 - 18:33
@वाचन प्रेमी, सद्यस्थितीत आपण मुल्ये आणि विचार या संकल्पनांचा इथे विचार करत नाही आहोत. 'मनुष्याचा विकास म्हणजे नेमकं काय' यावर तुमचं मत ऐकायला आवडेलच पण आर्थिक विकास सगळ्या प्रकारच्या विकासांचा पाया आहे हेही लक्षात असू द्यावे. उपाशीपोटी कुठलेही मुल्ये व विचार कामी येत नाहीत.

In reply to by वाचन प्रेमी

टवाळ कार्टा 06/07/2015 - 18:41
शिक्षण तेच ज्याने मनुष्याचा विकास( आर्थिक नव्हे) होतो.कामी येतात ती मुल्ये आणि विचार. ५०००रु कमविणारा पण खुश असू शकतो.
रडावे सगळ्यांनाच लागते फक्त १ बीएच्के मध्ये रडण्यापेक्षा बीएम्ड्ब्लु मध्ये रडावे

In reply to by वाचन प्रेमी

काळा पहाड 07/07/2015 - 15:57
शिवरायांना महान करण्यासाठी आपण त्यांच्या मानवी भावनांवर आपली आदर्श मतं लादतोय असं बर्याच वाचना अंती वाटतं. उदाहरणार्थ, औरंगजेबाशी संधी करण्याची महाराजांचॆ खरोखरच इच्छा होती आणि सप्त हजारी (चू. भू. द्या. घ्या. ) मोगली मनसबदारा ची वस्त्रं महाराजांनी सात मैल (पुन्हा चू. भू. द्या. घ्या. ) अनवाणी जावून आणि तिथून वस्त्रं आणि बादशाहा चं पत्र शिरोधारी आणून स्वीकारली होती या बद्दल लोकांना काहीच माहिती नसते. औरंगजेबाबरोबर संधी ची इच्छा हे एक कारण होतं ज्यामुळे महाराज आग्र्या मधून तातडीनं बाहेर पडले नाहीत (आणि औरंगजेबानं सुद्धा त्यांना तातडीनं कैद केलं नाही).

In reply to by काळा पहाड

बॅटमॅन 07/07/2015 - 16:07
मोगली मनसबदारा ची वस्त्रं महाराजांनी सात मैल (पुन्हा चू. भू. द्या. घ्या. ) अनवाणी जावून आणि तिथून वस्त्रं आणि बादशाहा चं पत्र शिरोधारी आणून स्वीकारली होती
माझे स्मरण बरोबर असेल तर संभाजीराजे मनसबदार होणार होते, शिवाजीराजे नव्हेत. बाकी आग्र्यास दरबारात महाराजांनी मुजरा केला होता असे वाचल्याचे आठवते. पण नंतर जसवंतसिंग राठोडास पुढे पाहिल्यावर त्यांना राग आला. बाकी आग्र्याहून बाहेर न पडण्याचे कारण म्हणजे तहाची इच्छा हे नव्हते. आग्र्याहून सुटून राजगडावर पोहोचल्यावरही त्यांचा पत्रव्यवहार झाला होता बहुधा.

In reply to by बॅटमॅन

काळा पहाड 07/07/2015 - 17:10
कदाचित पंचहजारी मनसबदारी असावी.
माझे स्मरण बरोबर असेल तर संभाजीराजे मनसबदार होणार होते, शिवाजीराजे नव्हेत.
कुठल्यातरी जालावरील कागदपत्रातून: Shivaji accepted the suzerainty of the Mughuls but, instead of personal attendance at the court, deputed his son, Shambhuji with 5,000 horse at the Mughul-court.
पण नंतर जसवंतसिंग राठोडास पुढे पाहिल्यावर त्यांना राग आला.
बरोबर. माझ्या आठवणीनुसार जसवंतसिंग सप्त हजारी मनसबदार असून पुढच्या रांगेत उभा होता. महाराजांना बहुधा पंचहजारॆ मनसबदारी होती त्यामुळे त्यांना मागे उभं केलं होतं.
बाकी आग्र्याहून बाहेर न पडण्याचे कारण म्हणजे तहाची इच्छा हे नव्हते. आग्र्याहून सुटून राजगडावर पोहोचल्यावरही त्यांचा पत्रव्यवहार झाला होता बहुधा.
महाराज भडकले होते. पण रामसिंगानं त्यांची समजून काढली. महाराजांनी बहुधा या प्रसंगाकडे दुर्लक्ष्य करायचं ठरवलं होतं. औरंगजेबानं रामसिंगाला सांगितलं होतं की शिवाजीची समजूत काढ. पण औरंगजेबाच्या सल्लागारांनी त्याला भडकावून महाराजांवर सुरवातीला पहारे बसवायला लावले आणि मग त्यांना कैदेत सुद्धा टाकायला लावलं. ही गोष्ट अर्थातच तातडीनं झालेली नाही. औरंगजेबाकडॊन शिवाजी महाराजांचा झालेला अपमान ही सुद्धा एक चुकामुकीची कहाणी आहे. विजय देशमुखांचं शककर्ते शिवराय (भाग १ आणि २) पुस्तक मिळालं तर वाचावं.

In reply to by काळा पहाड

बॅटमॅन 07/07/2015 - 17:31
औरंगजेबाकडॊन शिवाजी महाराजांचा झालेला अपमान ही सुद्धा एक चुकामुकीची कहाणी आहे.
पूर्णत: नाही, कारण चुकामूक झाली ती फक्त महाराजांना रिसीव्ह करायला आलेला मेन माणूस त्यांना भेटू शकला नाही तेव्हा. पुढे दरबारात जे झाले त्याचे कारण फक्त मुघली ढिसाळपणा हेच आहे असे वाटते खरे. जदुनाथ सरकारांचे "शिवाजी'ज़ व्हिजिट टु औरंगजेब अ‍ॅट आग्रा" नामक अस्सल मारवाडी पत्रे इन्क्लूड केलेले पुस्तक आहे, ते पुनरेकवार वाचून पाहतो. मेहेंदळे सरांचे इंग्लिश शिवचरित्रही आहे त्यात जरा पाहतो.

In reply to by काळा पहाड

नाखु 08/07/2015 - 08:44
पहाड यांचेशी तीव्र सहमत. या धाग्या इतकाच पण लक्ष्यवेधी विषय वेगळ्याने पटलावर घ्यावा. सध्या तुकड्या-तुकड्यातला "फिल्मी" शिवाजीच पोहोचलाय घरोघरी!!!

सुप्रिया 03/07/2015 - 11:51
मुलगा आता नववित गेला आहे. जात्यातून सुपात येत आहोत. वाचनखूण साठवली आहे.
संदीप भाऊ , लय मोठ्या विषयाला हात घातला राजेहो..माझे विचार मांडायचा प्रयत्न करतो. थोडे विस्कळीत होतील. सांभाळून घ्या आपल्या इथे मुलाचं करीयर हा विषय पालक फार गांभीर्याने घेतात. पण 'गांभीर्याने घेणे' हेच मुळात त्यांना गांभीर्याने घेत येत नाही. मुलांच्या करीयरविषयी सतत चिंता करत राहणे, त्यांना स्पर्धेत ढकलणे, वाट्टेल तेवढा पैसा खर्च करणे, शेजारपाजारच्या- नातेवाईकांच्या मुलाचे अनुकरण करणे ह्यालाच आपल्या इथे गांभीर्याने घेणे म्हणतात( तारे जमीन पर सिनेमात 'खयाल करना' ह्यावर एक संभाषण आहे. तसंच काहीसं हे आहे). गांभीर्याने घेणे म्हणजे आपल्या मुलाला हवं तिथे प्रवेश मिळणे इथपर्यान्त्तच मर्यादित नसते. मुलाला आपण ज्या करीयर मध्ये ढकलतो आहे किंवा त्याला जिथे जायचे आहे तिथल्या आयुष्याचे चित्र त्याच्यासमोर मांडणे आवश्यक आहे. माझं उदाहरण देतो, वडील इंजिनियर आहेत आणि मेडिकल मध्ये मला रस नव्हता म्हणून मी इंजीनीयरिंगकडे वळलो. पण हे दोन सोडून अजूनही काही वाटा आहेत ह्याचा ना मी विचार केला ना माझ्या पालकांनी. बर इंजीनीयरींग करण्यासाठी देशात IIT आणि अन्य काही चांगल्या संस्था आहेत हे आमच्या गावीही नव्हतं. वडील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात होते ..मला सुद्धा तिथेच प्रवेश मिळाला. हीच आमच्यासाठी गौरवाची बाब होती. अर्थात IIT मध्ये जाण्याची माझी पात्रता नव्हतीच पण किमान त्या दिशेने प्रयत्न तरी करू शकलो असतो. IIT मध्ये जाण्यासाठी IIT JEE नावाची परीक्षा असते हेच मला इंजीनीयरींग द्वितीय वर्षात कळलं. माझ्या मते आठवी -नववी हे मुलांचा कल ओळखण्यासाठी उचित वय आहे. या वयात्त त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरवात करावी. पण लगेच त्यांच्यावर करीयर वैगेरे भारी शब्दांचा मारा करू नये. साधारण त्यांची कुवत आणि कल यांचा अंदाज घ्यावा. त्यांना त्याविषयीची पुस्तक आणून द्यावीत. शक्य असल्यास त्या विषयाशी निगडीत काम करणाऱ्या संस्था किंवा तत्सम ठिकाणी त्यांना घेऊन जावे. यातून कल्पना आणि वास्तव यातला फरक तरी त्यांना उमजेल. उदा. पशु वैद्यकीय शास्त्रात जर एखाद्याला जायचे असेल तर त्याला आस पासच्या पशु वैद्यकीय किंवा संशोधन संस्थेत घेऊन जावे. हे नाहीच जमले तर गेला बाजार जवळच्या म्हशीच्या गोठ्यात तरी घेऊन जावे. पशु शास्त्राचा पुस्तकी अभ्यास करणे आणि त्यांच्याबरोबर काम करणे ह्यातला फरक कळल्यावर तो/ ती निर्णय घेऊ शकतील. ते अनुकूल असतील तर त्यांना पाठींबा द्यावा. मुलांना वास्तवाचे भान येणे गरजेचे आहे. आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते , ती म्हणजे सतत त्यांच्याकडून यशाची अपेक्षा ठेऊ नये. यशापेक्षा अपयश जास्त काहीतरी शिकवून जाते. अपयशातून काहीच शिकले नाहीत तरी ,'आपल्याला अपयश येऊ शकते' हे तरी त्यांना कळेल.

In reply to by चिनार

टवाळ कार्टा 03/07/2015 - 12:56
ती म्हणजे सतत त्यांच्याकडून यशाची अपेक्षा ठेऊ नये. यशापेक्षा अपयश जास्त काहीतरी शिकवून जाते. अपयशातून काहीच शिकले नाहीत तरी ,'आपल्याला अपयश येऊ शकते' हे तरी त्यांना कळेल.
+१

मदनबाण 03/07/2015 - 13:51
विचार आवडले... @ चिनार यशापेक्षा अपयश जास्त काहीतरी शिकवून जाते. अपयशातून काहीच शिकले नाहीत तरी ,'आपल्याला अपयश येऊ शकते' हे तरी त्यांना कळेल. अगदी पूर्णपणे सहमत ! मी जेव्हा आजुबाजुला पाहतो तेव्हा अनेक गमती-जमती आणि अनुभव पहावयास मिळतात... एखाद्या क्षेत्रात राहुन त्यात आयुष्यभर आनंदी असणारे. एखाद्या क्षेत्रात अभ्यास करुन वेगळ्याच क्षेत्रात नंतर वळणारे. { डॉक्टर होउन सिंगर / अ‍ॅक्टर झाल्याची बरीच उदा. तुम्हाला लगेच डोळ्या समोर आणता येतील.यात प्रकारात मी सुद्धा येतो.} अजुन एक प्रकार म्हणजे शिक्षण घेतलेल्या विषया पेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रात सातत्याने बदलत जाणारे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. असा किंवा अश्याच अर्थाचा quote सुनीलरावांच्या सहीत बराच काळ होता तो या निमित्त्याने आठवला. जाता जाता :- का कोणास ठावुक पण मॅट्रिक्स रिलोडेड मधला मॉर्फिअस चा खालचा एक संवाद आठवला ! Morpheus: All of our lives, we have fought this war. Tonight I believe we can end it. Tonight is not an accident. There are no accidents. We have not come here by chance. I do not believe in chance. When I see three objectives, three captains, three ships. I do not see coincidence, I see providence. I see purpose. I believe it our fate to be here. It is our destiny. I believe this night holds for each and every one of us, the very meaning of our lives. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة

पैसा 03/07/2015 - 15:01
खूप छान लिहिलंय! चिनार डॉ. खरे आणि मुवि यांचे प्रतिसादही आवडले. याबद्दल जास्त "उपदेश" न करता आधी केले मग सांगितले म्हणून माझ्या मुलीचे उदाहरण देते. ती शाळेत असल्यापासून तिला सर्व भाषा आवडतात आणि उत्तम येतात हे लक्षात आले होते. जरी दहावीला सर्व विषयात जवळपास सारखे गुण पडले होते आणि तिच्या तेवढेच मार्क्स असलेल्या मैत्रिणी इंजिनिअरिंग, सी ए. अशा क्षेत्रांचा विचार करत होत्या, तेव्हा मैत्रिणीच्या पिअर प्रेशरमुळे ती कॉमर्सला जाऊ का असा विचार करत होती. आम्ही (मी आणि नवर्‍याने) ठामपणे असे कोणीतरी गेले म्हणून तिकडे न जाता काय आवडते ते कर असे सांगितले आणि तिने कलाशाखेला प्रवेश घेतला. पुन्हा मानसशास्त्र आणि इंग्लिश दोन्हीत सारखेच मार्क्स होते. बारावीला ती कलाशाखेत बोर्डात दुसरी आली. पुढे मानसशास्त्र सोडून संपूर्ण इंग्लिश निवडले. बी.ए. ला पुन्हा युनिव्हर्सिटीत दुसरी आली. फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश मिळवून एम.ए. पुरे केले. कंपनीत वगैरे नोकरी आपल्याला आवडणारी नाही मात्र शिकवायला आवडते हे लक्षात घेऊन तिने यावर्षी बी.एड. पुरे केले. यूजीसी नेट परीक्षेला बसायचे आहेच निदान पी एच डी ला प्रवेश घ्यायची इच्छा आहे. आता नोकरी शोधायची अशा तयारीत असताना तिला नोकरी करायची आहे हे समजल्यानंतर ती बी ए ला शिकली त्याच कॉलेजने तिला सध्या लेक्चर बेसिसवर अपॉइंटमेंट दिली आहे. महिन्याचा पगार ३०००० च्या घरात जाईल. त्यापेक्षाही तिथे तिला पुढे शिकण्याचा ऑप्शन समोर आहेच. कॉलेजमधील डिपार्टमेंटचे जुने प्राध्यापक त्यासाठी मदत करणार आहेत. दुसरीकडे जावे लागणार नाही हे जास्त महत्त्वाचे. तिच्या गुणांवर अवलंबून अशी बर्‍यापैकी नोकरी तिची तिने मिळवली. याबद्दल मला तिचा सार्थ अभिमान आहे. यानंतरची गंमत म्हणजे बी. एड. चा निकाल लागल्यानंतर गेल्या १५ दिवसात ५/६ कॉलेजेस, हायर सेकंडरीजमधून आतापर्यंत फोन येऊन गेले की इंग्लिश विषय शिकवण्यासाठी व्हेकन्सी आहे. तू येतेस का म्हणून! चौकशी करता इंग्लिश शिकवणार्‍या शिक्षक्/प्रोफेसर्सची कमतरता गोव्यातही आहे असे समजले. गोव्यात सर्वांना थोडेफार तरी कामचलाऊ इंग्लिश येते तरी ही अवस्था असेल तर महाराष्ट्रात तर याहून जास्त कमतरता असावी. तात्पर्य काय तर तुम्ही कोणत्या शाखेत जाता यावर पुढची करियर अवलंबून नसते तर तुम्ही त्या शाखेचे शिक्षण किती गंभीरपणे घेता हे महत्त्वाचे. उत्तमप्रकारे घेतलेले शिक्षण हे कोणत्याही करियरचा पाया असते.

खटपट्या 03/07/2015 - 15:08
तात्पर्य काय तर तुम्ही कोणत्या शाखेत जाता यावर पुढची करियर अवलंबून नसते तर तुम्ही त्या शाखेचे शिक्षण किती गंभीरपणे घेता हे महत्त्वाचे. उत्तमप्रकारे घेतलेले शिक्षण हे कोणत्याही करियरचा पाया असते.
१००% सहमत
फारच जिवंत विषय आहे, आणि उत्तम मांडला आहे. प्रतिसादांमधली अनेक वाक्ये (वानगीदाखल दोनच देत आहे) -
चुकीची बस पकडली असेल तर जवळच्या पहिल्या स्थानकावर उतरा आणी परत या. उगाच तिकिटाचे पैसे फुकट जातील म्हणून दिशाहीन भरकटू नका.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness
आजही अंतर्मुख करुन गेली. आत्ता वेळ कमी आहे, म्हणून एकच विचार मांडतो, आवड, क्षमता, समाजमान्यता आणि आर्थिक मुल्य या चारही निकशांवर एखाद्याने आपले क्षेत्र निवडावे - intersection आवडच नसेल तर सगळे करियर एक शिक्षा वाटु शकते (उदा. मार्क मिळाले म्हणून इंजिनियर झालेले काही). जमतच नसेल तर कायमच बोंबाबोंब, अपयश वगैरे (उदा. पालकांच्या प्रतिष्ठेसाठी डिग्री घेतलेले). समाजमान्यता नसेल (उदा आळस / चोरी) तर आवडुन वा जमुन उपयोग नाही. आणि आर्थिक स्थैर्य कमावण्याची खात्री नसेल तरी (उदा. काही कला / समाजसेवा इ.) तसे क्षेत्र निवडायला धाडस पाहिजे. तरीही आर्थिक पाया पक्का करुन हौसेखातर अन्य क्षेत्रात भरारी मारता येते असे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आहेत (उदा. पुल., एक फॅमिली फिझिशियन ज्यांनी अलिकडे संस्कृत मधे सर्वोच्च पदवी घेतली)

अभिजीत अवलिया 04/07/2015 - 22:52
खूप सुंदर लेख संदीप. चिनार, खरे साहेब, श्रीरंग_जोशी, मुक्त विहारि , पैसा ताई सर्वांचे प्रतिसाद अतिशय उत्तम आहेत. आपल्याकड़े शिक्षण हे ज्ञानापेक्षा पैसा कमावण्यासास महत्व देते. सतत आयुष्यभर एकाच गोष्टीचा विचार 'लोक काय म्हणतील ?' जर एखाद्याला १० विला ९०% मिळाले आणि तो/ती जर आर्ट्स ला जाणार असे म्हणाला तर जणू काही मोठा गुन्हा केलाय अशा नजरेने बघितले जाते. एवढे मार्क मिळाले तरी पण आर्ट्स ला ? असे प्रश्न. थोडक्यात कुठले शिक्षण घ्यायचे हे मार्क ठरवतात,आवड नाही. मेडिकल किंवा इंजिनीरिंग हेच आयुष्याचे सर्वस्व आहे नाहीतर काही खरे नाही हीच मानसिकता. कारण ह्या क्षेत्रात जास्त पैसा मिळू शकतो. पण केवळ जास्त पैसा जास्त समाधान किंवा सुख देऊ शकत नाही ही गोष्टच लोक ध्यानात घेत नाहीत.
एका अकरावीत शिकणा-या मुलाची आई म्हणून लेख मुद्दाम प्रतिक्रिया जास्त येईपर्यंत वाचायचा ठेवला होता!अर्थातच सर्व जाणत्या मिपाकरांनी निराश केलं नाहीच.खूप छान चर्चा सुरु आहे. याचबरोबर माझ्याही करिअरचा विचार करत होते.मुलगा इंजिनिअर तर मुलगी डाॅक्टर अशा विचारातून अगदी सहज मार्कांवर शासकिय काॅलेजला जाऊन डेन्टिस्ट्री शिकले.तेव्हा मेडिकलची अॅडमिशन प्रायव्हेट काॅलेजला मिळत होती.ती नको असल्याने हा पर्याय स्विकारला होता.आता इतक्या वर्षांनी माझ्या गायनॅक आदि क्षेत्रातल्या मैत्रीणींची धावपळ,व्यावसायिक असुरक्षितता बघते तेव्हा वाटतं बरा आहे की आपला चाॅईस.मला माझ्या सर्व छंदांसाठी वेळ मिळतो,आवश्यक तेवढा पैसा मिळतो,कोणाच्या उपयोगी पडता येतं.मुख्य म्हणजे मला हवं तसं जगता येतं.हे सर्व श्रेय माझ्या व्यवसायाचंच.मी कमी वेळ काम करते.कदाचित जास्त वेळ ठेवुन जास्त कमवेन पण आत्ताचे माझे निवांत आयुष्य मला सोडावे लागेल.त्याची माझी तयारी नाही!कुठेतरी एक रेघ ओढुन घ्यावीच लागते.सारखं पैशासाठी पळत सुटणं माझ्या स्वभावात नाही.मग कशाला त्यामागे जा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness!! हे मी आता जगते आहे!!

नाखु 07/07/2015 - 12:05
वर्षभरातील सर्वोत्तम धागा आणि एकापेक्षा एक वाचनीय प्रतीसाद. आनंदीत पालक नाखु

मितान 07/07/2015 - 17:50
विषयाची मांडणी आणि त्यावरील प्रतिसादात झालेली चर्चा दोन्ही आवडले. व्यवसायाचा भाग म्हणून करियर गायडन्स च्या काही केसेस घेते. दहावीचा बारावीचा निकाल लागेपर्यन्त काहीच विचार केला नाही असेच लोक आयते पर्याय समजण्यासाठी येतात. यासाठी हिस्ट्री घेताना साधारणपणे कौटुंबिक पार्श्वभूमी, पालकांची मानसिकता, मुलाच्या आवडीनिवडी या कळतात. यानंतर काही शास्त्रीय / प्रमाणित कसोट्या वापरते. याचे मुख्य कारण - पालकांचा बहुतांश वेळेला असलेल्या ठराविक विद्याशाखेचा आग्रह, आपल्या मुलाबद्दलचे चांगले वाईट चुकीचे ग्रह आणि अपेक्षा यांना जागा दाखवणे हाच असतो. बुद्ध्यांक चाचणी, व्यक्तिमत्व प्रश्नावली, अभिक्षमता चाचणी, वैयक्तिक रुची स्पष्ट करणारी चाचणी ( आय क्यू,पर्सनॅलिटी इन्वेंटरी, अ‍ॅप्टिट्यूड आणि इंटरेस्ट इन्वेंटरी ) अधिक शालेय गुण, या सर्वांची हिस्ट्री घेताना कळालेल्या गोष्टींची सांगड घालून ३-४ वेगवेगळे पर्यात सुचवले जातात. माझ्या मते अनोळखी मुलांना आयुष्यातला एवढा महत्त्वाचा निर्णय घेताना मदत करण्यासाठीचा हा कमीत कमी धोका असणारा मार्ग आहे. ज्या मुलांना लहानपणापासून पाहिलंय, कुटुंब ओळखीचं आहे अशांना या चाचण्या एखादेवेळी नाही वापरल्या तरी चालतात. अजून एक - एखाद्या क्षेत्रात इंटरेस्ट असेल पण अ‍ॅप्टिट्यूड नसेल अशा क्षेत्रात काम करणे आनंददायी असू शकते. पण अ‍ॅप्टिट्यूड खूप चांगला आहे पण त्या क्षेत्रात शून्य इंटरेस्ट आहे अशा क्षेत्रात पोत्यांनी पैसा कमावला तरी आनंद समाधान असेलच असे नाही.

In reply to by मितान

संदीप डांगे 07/07/2015 - 18:17
एखाद्या क्षेत्रात इंटरेस्ट असेल पण अ‍ॅप्टिट्यूड नसेल अशा क्षेत्रात काम करणे आनंददायी असू शकते. पण अ‍ॅप्टिट्यूड खूप चांगला आहे पण त्या क्षेत्रात शून्य इंटरेस्ट आहे अशा क्षेत्रात पोत्यांनी पैसा कमावला तरी आनंद समाधान असेलच असे नाही. >> म्हणजे प्रकरण गुंतागुंतीचं असू शकतं खरंतर...

In reply to by मितान

प्यारे१ 07/07/2015 - 19:28
एक शंका : मानवी मेंदू ची क्षमता योग्य मार्गाने एका मर्यादेपर्यंत ताणावी तितकी खेचली/ताणली जाऊ शकते हे दहावी मध्ये 54 60 % मिळवलेल्या अथवा अगदी नापास झालेल्या लोकामधून पुढं येऊन डिग्री PG किंवा आय ए एस झालेल्या लोकांच्या उदाहरणांवरून आपण पाहतो. अशा परिस्थितीत केवळ एखाद्या चाचणीवरून आपण एखादा मार्ग स्वीकारणं (ज्यामध्ये आपल्याच उत्तरांवरून रिपोर्ट बनवून आपल्या हाती मारला जातो. सरसकटीकरण नाही.) कितपत योग्य आहे. पोत्यानं पैसे आधी मिळवून किंवा समांतर पणं एखादी गोष्ट करायला काय बंदी आहे??? उदाहरणार्थ: पूर्वी क्रिकेटर विद्यापीठांनंतर व्यावसायिक खेळायचे. एका सचिननंतर 8-10-100 किंवा आइपी एल नंतर 1000 लोकांना संधी मिळाली पण त्याबरोबरीनं किती अयशस्वी लोक असतील? कितीही नाही म्हटलं तरी आर्थिक गणित आयुष्यात जमणं आवश्यक असतंच. अशा परिस्थितीत वर महतल्याप्रमानं दोन्हीचा बॅलन्स साधलं तर वाईट काय आहे? आधी पोत्यानं पैसा मिळवून किंवा पैसे मिळवत आपल्या आवडी जोपासणं करता येऊ शकेल ना?

In reply to by प्यारे१

संदीप डांगे 07/07/2015 - 19:56
आपल्याच उत्तरांवरून रिपोर्ट बनवून आपल्या हाती मारला जातो. कितपत योग्य आहे. आपल्याकडे साधारण असे रिपोर्ट बनवण्याचा दृष्टीकोन असा आहे की एखादा निर्णय घेतला ना मग तो सगळ्या कसोट्यांवर तपासून पाहावा. म्हणजे कसोट्यांमधून जो निर्णय येईल तो मान्य न करता आपण ठरवलेला निर्णय कसोट्यांतून आला पाहिजे असा काहीसा प्रयत्न असतो. त्यामुळे चाचणी देतांना ती बायस्ड असण्याचा संभव असतो. परत काही चाचण्या तर इतक्या विचित्र असतात की बास! उदा. प्रश्नः "तुम्हाला सांघिक पद्धतीने काम करायला आवडते का? एखाद्या अडचणीच्या प्रसंगात तुम्ही स्वतःहून मार्ग काढता का? तुम्हाला इतरांना मदत करायला आवडते का?" असले प्रश्न विचारणारी जी काही चाचणी असेल ती सपशेल नापास होते हे वेगळे सांगायलाच नको. कारण ती विशिष्ट बायस किंवा व्यवसाय-आधारित प्रश्नावली असते फक्त. म्हणजे ब्लड-गॄप टेस्ट करण्यासारखे. त्यातून फारसे काही हाती लागत नाही. साधारण लग्नात कुंडली जुळत नसेल तर ज्योतीषाला "काहीतरी बघा ना गुरुजी, काय पुजा-शांती असेल तर करून टाकू" असे म्हणत कुंडली जुळत नसतांना तिरपागडी प्रमेयं लावून स्वतःला काय पाहिजे तेच करणारे असतात. तसंच काहीसं. करीअर ठरवतांना बरेच लोक ज्योतिषाचाही सल्ला घेतांना दिसतात. त्यात मुलाला अमुक एक कॉलेजलाच अ‍ॅडमिशन मिळेल का, अमुक एका कंपनीत प्लेसमेंट मिळेल का असंही ज्योतिषाला विचारणारे आहेत. अशा चाचण्यांबद्दल अजून मोकळा दृष्टीकोन समाजात दिसत नाही. माझ्यामते अशा चाचण्यांचे वेगवेगळ्या वयात वेगवेगळे टप्पे असावेत आणि त्यांचे स्वरूप कृती-आधारित व निरिक्षणात्मक असावे, मुलाखत किंवा प्रश्नोत्तरात्मक नसावे. बाकी ६० टक्क्याच्या आसपास गुण मिळवणारे शालेय परिक्षापद्धतीत तेवढे तंत्रकुशल नसावे. तेच आयएएस किंवा तत्सम परिक्षांमधे शालेय परिक्षांपेक्षा फार जास्त मेहनत घेऊन यशस्वी होतात. किंवा शालेय परिक्षेचे तंत्र या परिक्षांपेक्षा वेगळे असावे. शिवाय आकलन, प्रकटन आणि उद्देश यातही दोन परिक्षांमधे फरक आहे. माझ्यामते तरी शालेय अभ्यासक्रम हा सर्वप्रकारच्या बुद्धीच्या लोकांसाठी नाहीये. ती एक पुर्वग्रहदुषित चाळणी आहे. त्याला फार महत्त्व देऊ नये.