Skip to main content

पुणे पासपोर्ट ऑफिसचा त्रास

लेखक कपिलमुनी यांनी बुधवार, 08/04/2015 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
मानसिक त्रास काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती. १.व्यवस्थित भरलेला फॉर्म २.रीसीट ३.आधार कार्ड ४ पॅन कार्ड ५. शाळा सोडल्याचा दाखला ६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट ७. अ‍ॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी) ८.अ‍ॅनेक्चर ए ( जन्मगाव ) ९. लाइट बिल १०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने) वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अ‍ॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते. प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्‍या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले . एवढे होईतो ७ वाजत आले होते. पुढील माणसाने कोणतीही माहिती न देता "insuffiecient documents" असा शेरा मारला . त्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे हे विचारले असता. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि दुसर्‍या काउंटरवर पाठवले ( त्याला मराठी येत नव्हते आणि आइचे हिंदी- इंग्लिश कच्चे आहे). आणि त्याने पुढची तारीख २१ मे टाकली आणि निघून गेला. दुसर्‍या काउंटरवर तिथल्या महिलेने कागदपत्रे तपासली आणि योग्य असल्याचा निर्वाळा दिला. पण तोवर हा मनुष्य सीस्टम बंद करून निघुन गेला होता. त्या महिलेने सांगितले एकदा तुमचा अ‍ॅप्लीकेशन ऑन होल्ड स्टेटस वर गेले तर पुन्हा त्या तारखे शिवाय काहीच करू शकत नाही. या प्रकारात ८ वाजून गेले होते. प्रंचंड मनस्ताप झाला होता आणि पासपोर्ट ची पुढची तारीख २१ मे ( ४५ दिवसानंतरची) मिळाल्यामुळे बर्‍याच प्लॅनवर पाणी फिरले आणि यात कोणतीही चूक नसताना ! दुर्दैवाने या विरूद्ध कुठेही तक्रार करायची सोय नाही . फीडबॅक मधे लिहा किंवा कॉल सेंटरला कॉल करा ठराविक साच्याची उत्तरे मिळतात पण बेजबाबदार कर्मचार्यांची तक्रार करण्याची आणि कारवाईची सोय कुठेही नाही. अशा गोष्टी टाळण्यासाठी १. महाराष्ट्रात मराठी भाषिक कर्मचारी / अनुवादक असावेत. २. प्रत्येक कर्मचार्‍याने काम न होण्याचे कारण लिखित स्वरूपात द्यावे. ३. तक्रार नोंदणी आणि कारवाइ विभाग असावा (अशी दिवास्वप्ने आहेत). प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29665
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

In reply to by श्रीरंग_जोशी

मी मान्य करते की चुक आमच्याकडुन झाली आहे. पण मला असं एखाद्या अधिकार्‍याने "आम्ही काहीच करु शकत नाही" असे म्हणुन हात वर करणे बरोबर नाही. सर्वांकडेच सर्व कागदे बरोबर असतीलच असे नाही. म्हणुनच तर हे अधिकारी तिथे बसले आहेत मदतीला. तर त्यांनी मदत करावी. अशाने मला नाव बदलायला नशिबाने भागु पाडु नये म्हणजे झालं..

In reply to by पिलीयन रायडर

महानगरपालिका बर्थ सर्टिफिकेट बदलून देत नाही हा कधीचा नियम आहे? मी कालच मित्राला विचारले. त्याने मागील वर्षी मुलीचे बर्थ सर्टिफिकेट हॉस्पिटलमधून (व नंतर महापालिकेतून) बदलून घेतले. त्याने त्यावेळी एका वकीलाला विचारले होते तेव्हा अॅफिडेविट वगैरे करावे लागेल असे त्याचे मत होते. मात्र तसे करावे लागले नाही.

In reply to by पिलीयन रायडर

जन्मदाखला घेण्याचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही. त्यासाठी नवजात बाळाच्या आई वडिलांना किंवा त्यापैकी एकाला रितसर फॉर्म भरावा लागतो का? तो तुम्ही किंवा तुमच्या नवर्‍याने भरला असल्यास अन त्यात तुमचे सासरचे आडनाव लिहिले गेले असल्यास ती प्रत्यक्ष तुमची चूक आहे असे म्हणता येईल.

In reply to by पिलीयन रायडर

पिलीयन रायडर ताई जिथे चूक झाली असेल तिथे दुरुस्त करा. मला सांगा बाळाच्या जन्मदाखल्यावर कोणते नाव आहे आईचे(म्हणजे सासरचे की माहेरचे) आणि पासपोर्टवर तुमच्या आणि पतीच्या कोणते नाव आहे. ते कळले तर बरे होइल

In reply to by आशु जोग

जन्मदाखला - आईचे सासरचे नाव (वापरत नाही) बाकी माझा पासपोर्ट / नवर्‍याचा पासपोर्ट / इतर कोणतेही कागदपत्र - माहेरचे नाव. आइचे नाव असे वेगळे असल्याने पासपोर्ट मध्ये प्रश्न येतील. जन्मदाखला पि.चि.मनपा कडुन मिळालेला आहे. तो बदलता येत नाही असा रुल आहे. मी एकदा गुगल केलं होतं तर मिळाला होता. आता मात्र तो मला सापडत नाहीये. पण सारथीला संपर्क करुन मी ह्याची पडताळणी केली आहे. आता ज्या सरकारी रुग्णालयातुन हा दाखला दिला (तालेरा रुग्णालय) तिथे वैद्यकीय विभागात काही मदत मिळते का ते पहावे लागेल. जन्मदाखला मिळण्याची पद्धत :- बाळाच्या जन्मानंतर सर्व माहिती हॉस्पिटल घेते - त्यावर तुमची सही घेते (इथे आमची चुक आहे. ही माहिती धांदलीत नीट न वाचताच सही केल्या गेली) - हीच माहिती सरकारी रुग्णालयात पाठवली जाते. आणि मग जन्मदाखला दिला जातो. माझ्या सुपीक डोक्यातला प्लान A - अ‍ॅफिडेविट करुन पेपरला जाहिरात देणे की माझे जुने नाव (सासर) बदलुन नवे नाव (माहेरचे) आहे. / मी सासरचे नाव वापरत नसुन माहेरच वापरत आहे / सासर-माहेरच्या नावाची व्यक्ती एकच असुन मी माझ्या मुलाला ह्या ह्या दिवशी जन्म दिलाय. B - सगळं सोडुन हरी हरी करत बसणे

In reply to by पिलीयन रायडर

म्हणजे सगळीकडे माहेरचेच नाव आहे. बदललेले नाही. शैक्षणिक कागदपत्रांतही तेच नाव असणार. म्हणजे फक्त जन्मदाखल्यावर सासरचे नाव आहे... कारण तिथे नाव टाकताना कोणी कागदपत्र मागत नाही. आता फक्त जन्म दाखला बदलून घ्या म्हणजे त्यावरचे आईचे नाव(जे माहेरचे हवे आहे) जन्मदाखला पि.चि.मनपा कडुन मिळालेला आहे. तो बदलता येत नाही असा रुल आहे. पि.चि.मनपा भारतातच येते म्हणावं... सगळ्या भारतात नियम सारखेच आहेत. अर्थात तुमच्यासारखा प्रॉब्लेम तिथेही अनेकांना आला असेल त्यामुळे दाखल्यात बदल विषयीची माहिती देणारी पाटी बाहेरच लावलेली असायला हवी. नाही म्हणायचे कारणच नाही. आणखी एक- येवढ्यासाठी स्वतःचे नाव बदलून घेण्याच्या फंदात पडू नका आणि ते पॅन पासपोर्ट बॅक अकाऊंट सगळीकडे करणेही शक्यही नसते त्यामुळे गोंधळ वाढेल ... आपल्या देशात सरकारी नियम हे फारच काटेकोर आणि लाखो केसेसचा विचार करुन केलेले असतात हा विश्वास बाळगा

In reply to by आशु जोग

आपल्या देशात सरकारी नियम हे फारच काटेकोर आणि लाखो केसेसचा विचार करुन केलेले असतात
कृपया हा लेख वाचावा - विश्वास ठेवायला शिका - संदीप वासलेकर या लेखात मांडलेल्या मुद्द्यांविषयी आपले काय मत आहे हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

वासलेकर हे महान असतीलच पण म्हणून आम्हाला मिळालेले फर्स्ट हँड ज्ञान कसे नाकारायचे. आपल्याकडचे नियम विशेषतः बँक, इन्शुरन्स, प्रॉपर्टी, सिटी सर्व्हे हे अत्यंत काळजीपूर्वक बनवलेले असतात. आता एखादा अपराधी यातून सुटू नये यासाठी ते जाचक वाटत असतील तर त्याला इलाज नाही. सॉफ्ट वेयर इंजीनयर असाल तर हे नियम नीट पहावेत. लक्षात येइल किती इफ एल्सची काळजी घेतलेली आहे. (या लेखा निमित्ताने मनातल्या वासलेकरांच्या मूर्तीचे भंजन व्हायला सुरुवात झाली आहे)

In reply to by आशु जोग

नियम काटेकोरपणे बनवले गेले असतील यावर शंका व्यक्त करत नाही आहे. परंतु या सर्व नियमांच्या मुळाशी असलेल्या गृहीतकाचे काय.ते गृहीतक म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य माणूस सरकारला फसवणारच आहे हे समजूनच नियम बनवले गेले असणे. या सर्व नियमांची सुरुवात इंग्रजांच्या काळात झाली. परक्या लोकांवर नियंत्रण ठेवायचे असल्याने तेव्हा असे नियम असणे काही आश्चर्याची गोष्ट नव्हती. पण स्वतंत्र भारताने त्यात फारसा धोरणात्मक बदल केला नाही हे सर्व समस्यांचे मूळ आहे. तुम्ही म्हणता तशी परिस्थिती असती तर लालफीतशाही, नोकरशहा, लायसन्स / परमिट राज, सरकारी काम चार महिने थांब अशी विशेषणे / वाक्प्रचार / म्हणी तयार झाल्या नसत्या. सरकारी विभागांच्या अडवणुकीमुळे होणार्‍या सामान्य जनांच्या शोषणावर कितीतरी कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपट निघाले असतील. जी व्यक्ती (खास करून पहिल्या) नोकरीमुळे दुसऱ्या शहरात स्थिरावत असते तिला गॅस कनेक्शन, बँक खाते उघडणे, पासपोर्ट काढणे अशी कामे करताना किती नाकी नऊ येतात हे विचारून बघा. मी या सर्व गोष्टींमधून गेलो आहे. पहिल्या नोकरीच्या वेळी बहुतेकांची आर्थिक बाजू अगोदरच लंगडी असते अन अशा अनेक सरकारी नियमांचा जाच सहन करावा लागतो. सरकारी नियमन लागू असलेल्या खाजगी सेवांमध्येही सरकारी खात्यांची सावली पडलेली असते. भारतातून परदेशात गेल्यावर बहुतेकांना आश्चर्याचे सुखद धक्के बसतात ते तिथे सहजपणे होणारी सरकारी खात्यासंबंधीची कामे बघून. अमेरिकेत बरेचदा सरकारी कार्यालयात आपले ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कुठले फोटो ओळखपत्र सोबत नेले अन अर्जावर स्वतःचा सोशल सिक्युरिटी नंबर टाकला की तुमच्या तर्फे फारसे अधिक काही करावे लागत नाही. ओळखपत्राची छायाप्रतही न्यायची गरज नसते. त्या कार्यालयातील कर्मचारी स्वतः छायाप्रत काढून ओळखपत्र लगेच परत करतात. छायाप्रतिंचे साक्षांकन नावाचा प्रकारच नाही. (सध्याच्या पंतप्रधानांनी छायाप्रतींच्या स्व-साक्षांकनाला सरकारी पातळीवर स्वीकारार्ह करून चांगला पायंडा पाडला आहे). मी भारतात अन अमेरिकेत गृहकर्ज घेऊन घर खरेदी केले आहे. दोन्हीकडल्या अनुभवांमध्ये जमीन असमानाचा फरक आहे. अमेरिकेत मी त्यांचा नागरिक नसतानाही इतक्या सहजपणे मला या प्रक्रियांमधून जाता आले तसे भारतात एका पिढी नंतरही होईल का याविषयी शंका वाटते.

In reply to by श्रीरंग_जोशी

या नियमांमुळे जो चोर आहे त्यालाच त्रास होइल आणि तो पकडला जाईल. पण चोरही पास व्हायला लागला तर तो आपल्यावर अन्याय नाही का... सरकारी काम चार महिने थांब मी स्वतः या सगळ्याचा अनुभव घेतला आहे अगदी मोठ्या शहरापासून तालुक्यापर्यंत आणि भारतात काही प्रांतात. पण बहुतेक ठिकाणी जिथे वेळ लागतो तिथे सरकारी कार्यालयाला कामही प्रचंड असते. ऑफिसच्या वेळेनंतर आणि सुटीच्या दिवशीही येऊन कित्येक ऑफिसात काम चालते. आणि प्रायवेटमधे फार उत्तम काम चालते असे वाटत असेल तर त्यांनी एयरटेल, आयडीया, रिलायन्स कम्युनिकेशनचा गोड अनुभव घ्यावा. जाता जाता तुम्ही एकटे प्रामाणिक असलात तरी बाकी सगळी जनता प्रामाणिक आहे अशी खात्री देता येइल का भारतात आणि अमेरिकेतही

In reply to by आशु जोग

https://arogya.maharashtra.gov.in/Site/Uploads/GR/FAQs-on-Registration-… पान ५ पहा. मला काहीच नीट कळाअले नाही त्यातुन की बाबा नाव बदलु शकतो की नाही... (बॉल्पेन वापरावा की शाईपेन ह्यावर पण एक प्रश्न आहे.. पण आईच्या नावाबद्दल काय लिहीलय ते कळायला मार्ग नाही..) हे ही पहा:- http://www.censusindia.gov.in/2011-FAQ/FAQ-CRS.html#M M.Whether a correction is allowed after registration? /strong> Corrections or Cancellations are allowed under the provision of Section 15 of the Act and the corresponding Rules made there under. However, corrections are allowed only if it is proved to the satisfaction of the Registrar that any entry of a birth or death in any register kept by him under this Act is erroneous in form or substance, or has been fraudulently or improperly made. हे ही पहा:- http://www.prsindia.org/uploads/media/Registration%20of%20births%20and%… f it is proved to the satisfaction of the Registrar that any entry of a birth or marriage or death in any register kept by him under this Act is erroneous in form or substance, or has been fraudulently or improperly made, he may, subject to such rules as may be made by the State Government with respect to the conditions on which and the circumstances in which such entries may be corrected or cancelled, correct the error or cancel the entry by suitable entry in the margin, without any alteration of the original entry, and shall sign the marginal entry and add thereto the date of the correction or cancellation. सगळीकडे करेक्शन होऊ शकते असंच लिहीलय पण १. तालेरा सरकारी रुग्णालय - दाखला देण्याची खिडकी २. सारथी - पिंचिमनपाची हेल्पलाईन / आरोग्य विभागाला केलेला फोन ह्या दोन्ही ठिकाणी मला असे करेक्शन होणार नाही हेच सांगण्यात आले. अगदी जन्म मृत्यु नोंदणी विभागाचे प्रमुख एकाच्या ओळखीचे होते, त्यांनी सुद्धा हेच सांगितले..

In reply to by पिलीयन रायडर

ह्या दोन्ही ठिकाणी मला असे करेक्शन होणार नाही हेच सांगण्यात आले म्हणून तुम्ही स्वतःचे नाव बदलायच्या फंदात पडू नका. पुढचे गोंधळ निस्तरता येणार नाहीत. करेक्शन करता येत नाही असे तोंडाने सांगत असतील तर त्यांना अर्ज द्या. त्यांचे लेखी उत्तर घ्या आणि मग त्यांच्या बापाकडे जा. आणि हेच बेसिक आधारभूत डॉक्यूमेंट असल्याने ते करेक्ट मिळाल्याशिवाय त्यावर आधारीत दुसर्‍या कामाला हात घालू नका. बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते बर्थ सर्टिफिकेट बदलून मिळते भारतात सर्वत्र नियम सारखेच आहेत. हे मी अनुभवाने सांगत आहे.

In reply to by आशु जोग

थांबाच आता.. ह्याचा काय तो सोक्षमोक्ष लावतेच.

एका महिलेने घटस्फोट घेतला होता. पण बरेच वर्षे संसार झाल्याने तिची कागदपत्र सासरच्या नावाने होती. ती पासपोर्ट रीन्यू करायला गेल्यावर तिला घटस्फोटानंतर सासरचे नाव लावता येणार नाही असे पासपोर्ट ऑफिसकडून सांगितले गेले . त्यावर तिला कोर्टात जाउन लढा द्यावा लागला. संबधित बातमी

In reply to by कपिलमुनी

घटस्फोटानंतर सासरचे नाव लावण्याची परवानगी देणारा निर्णय पटला नाही. असो.

In reply to by आजानुकर्ण

तात्विकदॄष्ट्या केवळ लग्न झाले म्हणून एखाद्या स्त्रीने आपले नाव किंवा आडनावासकट नाव बदलणे पटत नसले तरी हा निर्णय मला पटतो. लग्न झाले म्हणून असतील तिथे नाव बदलण्याच्या प्रक्रीया पूर्ण करायच्या (बँक खाती, पासपोर्ट इत्यादी) अन घटस्फोट झाला की लगेच त्याच्या विरूद्ध काम करायचे. अन हे सर्व करणे कधीच सुटसुटीत नसते. वरून भविष्यात अधिक गोंधळ होण्याची शक्यता असतेच. कुणी सरकारी अधिकारी म्हणणार की ही व्यक्ती एकच आहे कशावरून? मला वाटते स्मिता ठाकरे यांचे अनुभवकथन वर्तमानपत्रांत आले होते काही वर्षांपूर्वी. स्त्रियांनी लग्न झाले म्हणून आपले नाव आपोआप बदलणे ही परंपरा थांबायलाच हवी असे माझे मत आहे. आपल्या समाजात या मुद्द्यावर जागॄती जवळजवळ नसल्याने फार वाइट वाटते.

In reply to by श्रीरंग_जोशी

तात्विकदॄष्ट्या केवळ लग्न झाले म्हणून एखाद्या स्त्रीने आपले नाव किंवा आडनावासकट नाव बदलणे पटत नसले
खरंय. मूल हे नवरा व बायको हे दोघांचे असते. मुलाने केवळ नवऱ्याचेच आडनाव घेणे हेही मला तात्त्विकदृष्ट्या पटत नाही. तिथे नवरा व बायको दोघांपैकी एकाचे नाव निवडण्याचा पर्यायही हवा.

In reply to by आजानुकर्ण

माझ्या ओळखीतल्या एका दांपत्याने मुलांना मध्यनाव म्हणून वडिलांचे नाव अन शेवटचे नाव (लास्ट नेम) आडनाव नाही म्हणून आईचे नाव वापरली आहेत. भारतात मुलांच्या शाळेत वगैरे अनेकदा त्यांना विचित्र प्रश्नांना व किंचित हेटाळणीला सामोरे जावे लागले. ते सध्या अमेरिकेत राहतात. तिथे काय अनुभव आहे हे मात्र ठाऊक नाही. एक जुनी आठवण - मी पहिलीत असताना तिमाही परिक्षेत एका वर्गमित्राने प्रश्नपत्रिकेवर (नाव लिहिण्याच्या ठिकाणी) आपले संपूर्ण नाव लिहिल्यावर 'मालू' असे त्याच्या आईचे घरचे नाव पण लिहिले होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

बहुतेक सरकारी नियम हे बहुतांश प्रजेला सोयीचे वाटतील अशा पद्धतीने बनवलेले असतात. कुणाला हट्ट धरून आईचेच नाव लावायचे असेल तर तिथली अडथळ्याची शर्यत पार करण्याची मानसिक तयारी हवी. तीच गोष्ट माहेरच्या/सासरच्या आडनावाची. वेगवेगळ्या कोर्टांचे निकाल हे त्या त्या वेळच्या केसीनुसार बदललेले पाहिले आहे. एखाद्याला हट्टाने अमुकतमुकच प्रकारचे नाव हवे असे वाटत असेल तर त्याची किंमत ही अशा स्वरुपाच्या मनस्तापातून द्यावी लागते. हे योग्य आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. मात्र परिस्थिती ही अशी आहे.

In reply to by आजानुकर्ण

पण काळानुसार परंपरा सोडून काही बदल घडायला हवेतच. आपण ज्या सुधारणांचा लाभ घेतोय त्या घडवून आणण्यासाठी पूर्वी कुणीतरी किंमत मोजली असतेच.

@ श्रीरंग जोशी आणि आजानुकर्ण असं नाही की सरकार माहेरचे नाव लावणार्‍यांना त्रास देतं. असा कुठे नियम नाही की नाव बदलावेच लागते / आपोआप बदलते. तुम्हाला पुर्ण मुभा आहे तुमचे नाव काय आहे हे ठरवण्याची. नवरा बायकोचे आडनाव वेगवेगळे आहे म्हणुन पासपोर्ट / व्हिजा / होमलोन / नोकरी ... कुठेही त्रास होत नाही. त्रास होतो तो काही कागदप्त्र माहेरच्या न काही सासरच्या नावावर असण्याचा. हा अनेक बायकांचा प्रॉब्लेम असतो. अशावर केवळ एका अ‍ॅफिडेविटने उत्तर काढता यायला हवे की ह्या दोन नावांच्या व्यक्ति एकच आहेत. माझ्या केस मध्ये किमान माझे नाव तरी तेच आहे, काही बायकांचे तर संपुर्ण नाव - आडनाव बदलते. त्याला कसे सिद्ध करणार की मीच ती व्यक्ति आहे. काही तरी तर उत्तर असेलच की..

In reply to by पिलीयन रायडर

सरकार ठरवून त्रास देत नसेल पण माझा मुद्दा आहे की एखादी स्त्री विवाहीत असल्यास तिचे मध्य नाव (नवर्‍याचे प्रथम नाव) व आडनाव (नवर्‍याचे आडनाव) असे असणे गृहीत धरणे. बाळाच्या जन्मदाखल्याचा फॉर्म हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी स्वतः भरला व त्यावर तुमची सही घेतली असे या प्रतिसादावरून दिसते. प्रसुतीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये भरती होताना तुमचे जे नाव अन ओळखपत्राची छायांकीत प्रत जमा केली असेल त्यावरून ते नाव लिहिले असते तर ही चूक झाली नसती. त्यांनी स्वतःच तुमचे प्रथम नाव व बाकीचे तुमच्या नवर्‍याचे नाव वापरले असावे असा अंदाज आहे. बरेचदा प्रसुतीनंतर मातेची किंवा नवजात बाळाची प्रकृती बरी नसणे अशा कारणांमुळे बाळाचे पालक घाई गडबडीत अशा फॉर्म्सची पडताळणी न करता सही करण्याची शक्यता असते. जर विवाहित स्त्रीचे मध्यनाव + आडनाव बदलले आहे हे गृहीत धरण्याची पारंपारिक सवय बदलल्यास असे घडण्याची शक्यताच शिल्लक राहत नाही.

पिरा अॅफिडेविट करणे आणि गॅझेटमधे ते डिक्लेअर करणे एवढे पुरावे पुरेसे आहेत.पासपोर्टच्या वेबसाईटवरची अॅनेक्शर्स बघुन घे.आणि अॅप्लाय कर.ही कागदपत्र सोबत लाव .आणि फाॅर्मवर तुला हवे तसे नाव लिहुन दे.होईल काम. काही दिवसापूर्वीच माझ्या मैत्रीणीचे जिचे दुसरं लग्न झालंय आणि पहिल्या नवर्याचा एक मुलगा आहे,त्या मुलाचा पासपोर्ट ठाण्याला केला.काहीही कटकट न होता काम झालं.

In reply to by पिलीयन रायडर

मी संपूर्ण चर्चा डीटेल मधे वाचलेली नाही, पण असे दिसते आहे की तुमचे नाव चुकून पण चुकीचे लागलेले आहे. जर पाहीले नसेल तर खालील दुवा आणि प्रश्न-उत्तर अवश्य पहा: (प्रश्न संबंधीत नसेल पण उत्तर आहे असे वाटते...) . http://passportindia.gov.in/AppOnlineProject/online/faqServicesAvailable Q29: I recently got married/divorced. How do I change my name on my passport? A: To change the name in the passport, you have to apply for a "Re-issue" of passport and get the specified change done in the personal particulars. To check the complete list of documents to be submitted along with the application form, please click on "Documents Required" link on Home page.

In reply to by विकास

पासपोर्ट वर नाव बदलता येतेच.. रिइश्यु करुन घेता येईल.. पण ते करायचं नाहीये. मला मुलाच्या जन्मदाखल्यावर माझं जे नाव लागलं आहे (सासरचं) ते बदलायचं आहे कारण मी ते वापरत नाही.

सरकारी रुग्णालय शनिवारी जाऊन इथे चौकशी केली. हातात एक कागद देण्यात आला ज्यावर काय काय करावे लागेल हे लिहीले होते:- १. मी १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र. २. मला ओळखणार्‍याने / शेजार्‍याने १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र. (दोन्ही प्रति़ज्ञापत्र "नागरी सुविधा केंद्रातुन"च करायचे) ३. दोघांचेही रेशनकार्ड - प्रभारी अधिकार्‍याला ओरिजिनल दाखवुन स्वाक्षर घेणे . ४. नावात बदलाचे पुरावे - रेशनकार्ड / लायसन्स / पॅन कार्ड / मतदानकार्ड / बँक पासबुक (ह्यात ६-७ कागदपत्रांची लिस्ट आहे पण पासपोर्ट लिहीलेला नाही..!!) ४. मा. उपनिबंधकांना विनंती अर्ज ५. मा. उपनिबंधकांसमोर जबाबी आज नागरी सुविधा केंद्रातील अनुभव - आकुर्डी येथील नासुकें मध्येच हे काम होते. तिथे गेलो तर म्हणे तुम्हाला तुमचा स्टॅम्प पेपर आणावा लागेल. मग जाउन तो घेऊन आलो. मग म्हणे खाली साहेब बसलेत त्यांना जाऊन आधी विचारा सही करतील का? विचारलं.. तर आम्ही... आमची काकुळतीला आलेली थोबाडं.. आमच्या हातातले कागद.. कशाकडेही पहायची तसदी न घेता साहेब वदले ... "स्कुल लिव्हिंग सर्टीफिकेट आणा..." " पण साहेब, पासपोर्ट आहे.." " स्कुल लिव्हिंगच पाहिजे.." आणि नायब तहसीलदार हुडुत करुन निघुन गेले.. पासपोर्ट हा पोलीस व्हेरीफाईड असल्याने त्याला सर्वोच्च महत्व असते असल्या भ्रमात मी ते घेऊन फिरत होते. पण घरात असलेल्या स्कुल लिव्हिंगने हातातल्या पासपोर्टच्या थुतरीत मारली.. आणि पडेल चेहरे घेऊन आम्ही परत आलो.. मी एकटीच हे करायचं असतं तर मी केलंही असतं.. पण ओळखीच्या कुणाला तरी सोबत न्यायचं म्हणजे त्याही माणसाला फिरवायचं.. त्यात तिथल्या बाईने विचारल्च की हा सोबतचा माणुस साक्षिदार आहे का म्हणे मुलाच्या जन्माचा? अरे???? तुम्हाला कशाची साक्ष हवीये? माझं नाव काय आहे ह्याची? की मुलाच्या जन्माची?? म्हण्जे नक्की काय चाललय काय? परवा मित्र आणि एक फॅमेली मेंबर आणि स्कुल लिव्हिंग ते परवा काढलेले पी.एम.टीचे तिकीट.. सगळं सोबत नेणारे..

In reply to by पिलीयन रायडर

धन्य तो स . कर्मचारी ! बाकी ४. नावात बदलाचे पुरावे - रेशनकार्ड / लायसन्स / पॅन कार्ड / मतदानकार्ड / बँक पासबुक (ह्यात ६-७ कागदपत्रांची लिस्ट आहे पण पासपोर्ट लिहीलेला नाही..!!) या मुद्द्यावर बोट ठेउन लोका तुम्हालाच वेड्यात काढणार ! पण पासपोर्ट का चालत नाही याचा उत्तर मिळणार नाही.

बाकी नागरी सुविधा केन्द्र म्हणजे राजकारणी लोकांनी त्यांच्या खास माणसांचे पोट भरण्याचे केलेली सोय आहे. मी ५० रुपयात रेशन कार्ड काढलं होतं. ते पत्ता बदलल्याने आधीच कॅन्सल करुन नवीन काढायच होतं. नुसत आधीच कॅन्सल करायला ५०० रुपये मागितले होते. मी त्याला हुडुत करुन आलो. आधीचा पत्ता आकुर्डीतला, नवीन चिखलीतला. चिखली हे पिंची महानगरपालिकेत येवुन सुद्धा रेशन कार्डाच काम करायला हवेली तालुका तहसील स्वारगेटला जावं लागत. ग्रामीण भाग पकडतात. त्यामुळेच आकुर्डीतुन चिखलीत कार्ड ट्रान्स्फर होत नव्हते. च्यामारी, प्रोपर्टी टॅक्स हिशेबात बरोब्बर महानगरपालिकेच्या हिशेबाने लावतात. पावसाळ्यात आमच्या येरीयाच चिखली नाव सार्थ होतं. असो. तो एक वेगळाच वैताग.. इथे नको.

काही प्रश्न १. प्रतिज्ञापत्र करुन मग पेपर मध्ये तशी जाहिरात देऊन ते पासपोर्टसाठी पुरावा म्हणुन दाखवणार आहे. पण जन्मदाखला बदलायची जी प्रोसेस आहे, ती सुद्धा करायची असल्यास, आज आला तस अनुभव वारंवार येऊन त्रास होण्याचीच शक्यता वाटत आहे. सरकारी कार्यालयात, कारण न देता सतत वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करुन अडवल्या गेले तर काय करता येते? (जसे की पासपोर्ट गृहीत धरता येत नाही, स्कुल लिव्हींग आणा.. ह्या पद्धतीची मनमानी) २. मला आडुन लाच मागितली तर मी काय करु शकते?

In reply to by पिलीयन रायडर

१. मी १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र. आणि तरी तुम्ही घेवून गेला नाहीत याला जग काही करु शकत नाही. दुसरी गोष्ट मुलाच्या जन्मदाखल्यात आईचे नाव चुकले आहे(किंवा जे आहे ते कोणत्याही कागदपत्रावर नाही) त्यामुळे तेवढेच बदला. म्हणजे सगळी कागदपत्रे एकसारखी होतील. बस्स या पलिकडे काही नको आणि पेपरमधे जाहिरातीची काय गरज. तुम्ही नाव बदलत नसून. दाखल्यात करेक्शन करत आहात. लोक बेजबाबदारपणे अनेक उलटे पालटे सल्ले देतील त्याकडे दुर्लक्ष करा नाहीतर अभिमन्यू होइल

In reply to by आशु जोग

अहो हो.. स्टॅम्प पेपरच नक्की माहित नव्हतं मला कारण डोमेसाईलच्या वेळेस तिथेच प्रतिज्ञापत्र करुन त्यावर बहुदा १०/- चा स्टॅम्प लावतात. फोटोही तिथेच काढतात हे पाहिलं होतं. म्हणुन चक्कर मारुन पाहिली. तेव्हाच मला ह्या साहेबांनी सांगितलं असतं की तुम्हाला स्कुल लिव्हींग लागेल तर मी आणलं नसतं का? शिवाय स्कुल लिव्हिंगच का ह्याचं उत्तर काय?? ते नेल्यावर नवीन काही मागणार नाही कशावरुन?
त्यामुळे तेवढेच बदला. म्हणजे सगळी कागदपत्रे एकसारखी होतील. बस्स या पलिकडे काही नको आणि पेपरमधे जाहिरातीची काय गरज. तुम्ही नाव बदलत नसून. दाखल्यात करेक्शन करत आहात.
वरचं सगळं वाचुन तुम्हाला काय वाटतं? काय जास्त सोप्पं आहे? नासुकें - सरकारी रुग्णालय - महानगरपालिका - बॅक टु सरकारी रुग्णालय - मध्ये कधी तरी उपनिबंधकांसमोर जबानी - मग फायनली पापो ऑफिस की नोटरी - पेपर अ‍ॅड - पापो ऑफिस

In reply to by पिलीयन रायडर

पकडलाय मार्ग तोच योग्य आहे. दुसरं काही करायला जाल तर त्या गोंधळाच्या विचारानेही माझ्या अंगावर काटा येतोय. आपली कागदपत्रे पूर्ण ठेवा. अडचण आली तर बापाला(वरच्या साहेबाला) भेटा.

पुढच्यास ठेच मागचा शहाणा ! तुमच्या स्वतःच्या नावामधे , पालकांच्या नावामध्ये कुठे कॄ , मॄ असेल बाळकृष्ण , अमृता तर त्याचे इंग्रजी नाव तपासून पहा . काही ठिकाणी बाळकृष्ण चे स्पेलिंग balkrishna तर कुठे balkrushna तसेच अमृता चे amrita किंवा amruta असेही लिहितात. पण पासपोर्ट काढताना जर तुमच्या कोणत्याही डॉक्युमेंटवर या पैकी दोन्ही नावे असतील जसे की शाळेच्या दाखल्यावर amrita आणि मॅरीज सर्टिफिकेटवर amruta तर तुम्हाला अ‍ॅफेडेव्हिट करून द्यावे लागते. ते सुद्धा अ‍ॅनेक्शचर ई आणि ते २ पेपर मधे छापावे लागते. आणि सदर पेपर सोबत घेउन जावे लागतात. असेच तुमचे नाव वेगवेगळे कागदपत्रांवर दिपक किंवा दीपक असेल तरी करावे लागते. --------------------------------------------------------

इथ माझ्या प्रश्नावर अनेकांनी खुप मदत केली. इथे खुप माहिती मिळाली तसंच व्यनि करुनही अनेकांनी आवर्जुन माहिती दिली. ह्याबद्दल धन्यावाद!! "जन्मदाखला बदलुन मिळतोच" हे ठामपणे सांगितल्याबद्दल आशु जोग ह्यांचे विषेश आभार!! इथुन प्रेरित होऊन मी परत तालेरा रुग्णालयात जाऊन चौकशी केली तेव्हा १. मी १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र. २. मला ओळखणार्‍याने / शेजार्‍याने १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र. (दोन्ही प्रति़ज्ञापत्र "नागरी सुविधा केंद्रातुन"च करायचे) ३. दोघांचेही रेशनकार्ड - प्रभारी अधिकार्‍याला ओरिजिनल दाखवुन स्वाक्षर घेणे . ४. नावात बदलाचे पुरावे - रेशनकार्ड / लायसन्स / पॅन कार्ड / मतदानकार्ड / बँक पासबुक (ह्यात ६-७ कागदपत्रांची लिस्ट आहे पण पासपोर्ट लिहीलेला नाही..!!) ४. मा. उपनिबंधकांना विनंती अर्ज ५. मा. उपनिबंधकांसमोर जबाबी हे देऊन काम होइल म्हणाले होते. नागरी सुविधा केंद्रात जाऊन काय अनुभव आला हे इथे लिहीले आहेच. तर दोन दिवसांनी स्कुल लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन गेलो परत नागरी सुविधा केंद्रात. बरोब्बर १० वाजता गेलो तरी तिथे स्मशानशांतता होती. तिथल्या शिपायांना विचारुन आधी खात्री केली की जे साहेब पटकन सही देतात ते आज ११ पर्यंत का होइना पण येणार आहेत. मग आम्ही प्रतिज्ञापत्र करायला वरच्या मजल्यावर गेलो. १० वाजता कार्यालय सुरु होईल म्हणजे १० ला आम्ही फरशा पुसायला घेऊ असा अर्थ होतो हे मला माहित नव्हतं! शटर अर्धवट उअघदुन आत साफसफाई चालु होती. १० मिनिटांनी मग लोकच ते उघडुन आत घुसले. मी पळत जाऊन योग्य काउंटर गाठुन तिथल्या बाईला सांगितलं की आज माझ्याकडे सर्व कागदपत्र आहेत. द्या मला प्रतिज्ञापत्र. ओके म्हणुन मॅडम खुर्चीवर बसल्या. मग विचारलं की नक्की प्रॉब्लेम काय आहे. मी सांगितल्यावर म्हणे "का पण? नाव का नाही बदलत तुम्ही?" "अहो मॅडम, तसा नियम नाही कुठे. तुम्ही द्या ना" "नियम माहितीये हो.. पण तुमचं नवर्‍याशी पटत नाही का??" "अहो..... तसं काही नाहीये.. तुम्ही द्या ना" आता मला परत एकदा "बरं असतं नाव बदललेलं.." हे प्रवचन परत एकदा गरज नसताना १२६२७ व्यांदा ऐकावं लागणार काय... पण नाही.. मॅडमना तेवढयात फोन आला न मी सुटले. मग पुढची २० मिनिटं मॅडम फोनवर बोलत.. एका हातानी टाईप करत कसं बसं काम करत होत्या. १५ लोक तुम्हाला टक लावुन पहात असताना "अय्या हो.. कै तरीच बै तुमचं..!! ही ही ही... असं नाही जा... तुम्ही तर बुवा फारच फनी... ही ही ही" अस मुरके मारत, पापण्यांची पिटपिट करत कसं काय बोलता येतं देव जाणे. पण शेवटी २ प्रतिज्ञापत्र हातात आली. खालच्या साहेबांनी १५ सेकंदात त्यावर सही केली. मग संपुर्ण सेटची झेरॉक्स करुन स्वतःकडे ठेवली आणि सर्व कागदपत्र तालेरा मध्ये सबमीट केले. पोच म्हणून झेरॉक्स सेट्वर सही घेतली. हे झालं २९ एप्रिल २०१५ ला. मध्ये ३-४ चकरा मारुन शेवटी आज २७ मे २०१५ ला मनपा कडुन आदेश आला की नावात दुरुस्तीस हरकत नाही!! त्याला परत एकदा जन्मदाखला मिळावा म्हणुन अर्ज जोडला. आता ४-५ दिवसात मिळुन जातील दाखले!!! २. मला माझा पासपोर्ट रिइश्यु आणी मुलाचा नवा पासपोर्ट करायचा आहे. एकंदरीत आजवर मला माहित नसलेली माहिती जी कदाचित तुमच्याही उपयोगी पडु शकेल. अ. तत्काळ रिइश्यु साठी Annexure F (Letter Class 1 officer ) लागत नाही. आ. लहान मुलांच्या तत्काळ्साठी सुद्धा Annexure F (Letter Class 1 officer ) लागत नाही. इ. तुमचे नाव असलेले एक तरी अ‍ॅड्रेस प्रुफ लागतेच. बायकांना नवर्‍याच्या नावावरचं लाईट बिल किंवा इतर कागद चालत नाहीत. तुमचं लग्न झालय (विवाह नोंदणी) आणि नवरा अमुक ठिकाणी रहातो (अ‍ॅड्रेस प्रुफ) एवढेच ह्यातुन सिद्ध होते. तुम्ही तिथे रहात आहात हे सिद्ध होत नाही. म्हणून एकतरी अ‍ॅड्रेस प्रुफ तुमच्या नावचे हवे (सगळ्यात सोपे म्हणजे बँकेचे पासबुक) ई. मुलाचे आई/ वडील परदेशात असतील तर परदेशातल्या पालकाची संमती मिळवायला तिथल्या एम्बसी मधुन sworn affidavit मिळवावे लागते. (ह्याबद्दल अजुन माहिती असल्यास सांगावी)

सगळा लेख वाचला.. मला 11 जून तारीख मिळाली आहे. ठाणे पासपोर्ट ऑफीस... वरील सुचनांचा चांगला फायदा होईल असे वाटते.... तयारी करूनच जातो.... बघुया काय होतय...पत्नीच्या नावाच्या बदलाच्या पुराव्याबाबत माहीती मिळाली तयारी करून जातो....आल्या नंतर पुन्हा सांगतो काय झाले ते...........धन्यवाद