मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग 2

शशिकांत ओक · · जनातलं, मनातलं

पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग 2

पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र 3

नव्या प्रमेयाप्रमाणे -

1. शिवाजी महाराजांनी आग्र्याची नजरकैद हवेली 22 जुलैलाच सोडली! 2. महाराज नंतर धौलपुर, ग्वालेर, नरवर, सिरोंज, शिवपुरी, कोलारस, बदरवास करून 15 दिवसाच्या प्रवासात 250 मैल अंतरावर शहादरा गावात सुखरूप पोहोचले. त्यानंतर त्यांनी कळवल्यावर संभाजीराजांना हवेली बाहेर सुरक्षित स्थळी म्हणजे मथुरेला पाठवण्याचे संदेश महाराजांनी दिले. हा गुप्त संदेश 15 ऑगस्टला आग्र्यात मिळाला व सर्व लगेच कामाला लागले. 16 ऑगस्टला निराजी रावजींनी तोवर शिवाजी महाराजांचा वेश उतरवला व हिरोजी फर्जंदास तो पोषाख व दागदागिने चढवले. निराजी रावजी आपल्या स्वतःच्या म्हणजे ब्राह्मण कारभाऱ्याच्या वेषात खोलीच्या बाहेर पडले. संभाजी राजे व प्रल्हाद निराजी (निराजींचा संभाजीराजेंच्या समवयस्क मुलगा) दोघेही 15 ऑगस्ट रोजी रामसिंहाकडे त्याच्या हवेलीत राहण्यास गेले होते. संभाजीराजे तसे आधीपासून हवेली बाहेर पडून जात असत. कारण त्यांच्यावर कैद नव्हती. नजरेत असावेत असा संकेत होता. 3. त्यांच्याबरोबर रघुनाथपंत कोरडे, व्यंकटपंत डबीर, राघो मित्र मराठा, दत्ताजी त्र्यंबक असे तीर्थयात्रेसाठी चाललेले ब्राह्मण व त्यांची दोन मुले असे पुर्वी तयार करवून घेतलेले दस्तक होते. हिरोजी फर्जंदचे ‘राजांचे रूप’ किती काळ यशस्वीपणे पार करेल याची शंका होती म्हणून हिरोजी ‘राजांना’ मदत करायला रघुनाथपंत व त्र्यंबकपंत 17 ऑगस्टला मथुरेतून परत 18 ऑगस्टला आग्र्याला आले. नंतर संभाजी राजे वाराणसीकडे रवाना झाले. नंतर ते अलाहाबाद, गोंडवन, मंगलगढ, देवगढ मार्गे 20 नोव्हेंबर 1666 रोजी स्वराज्यात राजगडावर इतरांसह पोहोचले... 4. बातमी फुटली - इकडे हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर आग्र्यातील हवेलीतून निघून गेल्याने ती रिकामी झाली. रिकाम्या हवेली भोवती फौलादखानाची व रामसिंहाची माणसे पहारा देत राहिली. 18 ऑगस्टला बातमी फुटली... त्या दिवशीच्या अखबारात मधील मजकूर सांगतो, ‘सीवा पळून गेला...’ फौलादखान, ज्याच्यावर सीवाच्या नजरकैदेची पूर्ण जबाबदारी होती तो, आपल्या अर्जात म्हणतो, ‘मलाही कळेल नाही. त्याच्या पलायनाचे रहस्य... एक बांधलेली पगडी, आरसा व जोडे पडलेले आहेत.’... ‘कुमार रामसिंह घुसल खान्यात बसलाय ...’ त्याला हुकूम आला. ‘तू सीवाचा जामीन आहेस. तू त्यास हजर केले पाहिजेस...’ शिवाजी महाराजांच्या डेऱ्यात अधूनमधून येणाऱ्या कवी कलश - कवीश्र्वर व सक्सेना कायस्थ यांना साखळदंडात अडकवण्यात आले. नंतर एक दोन दिवसांनी काही विचार केल्यावर मोगल सरदारांनी असा निष्कर्ष काढला की ‘शिवाजी पेटाऱ्यातून पळाला. हे पेटारे काठ्यांना लटकवून आतबाहेर येत जात असत. ..’19 ऑगस्टला हसन अलीच्या हेरांनी बातमी दिली ... ‘शिवाजीराजांचे वकील राघो पंडित, त्र्यंबक पंडित व दोन नोकर सापडले. ते हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर असावेत...’ बळीराम पुरोहित, जीवा जोशी, श्री किशन, हरिकिशन असे चौघे रामसिंहाचे लोक पहाऱ्यावर होते. त्यांना चाबकांचे फटके व नाकात मीठ भरायची धमकी देऊन सत्य उगलायचा प्रयत्न झाला. ‘आम्ही त्याला एक घडीच्या आधी असताना पाहिले... सकाळी त्यांने सुका मेवा मागितला आणि खाल्ला. अशी जबानी त्यांनी दिली...’ 5. औरंगजेब ऱघुनाथ पंत व व्यंकटपंत हे मोगलांच्या दरबारी शिवाजी महाराजांचे वकील म्हणून दहावर्षापासून माहिती होते म्हणून त्यांच्या शब्दाला ग्राह्य मानून फौलादखान वाचला पण रामसिंहाची मनसब बडतर्फ केली गेली... 6. 19 ऑगस्टला बादशहाने नेताजीला पकडण्याचे आदेश जयसिंगाला दिले. 7. इकडे परतताना चांदवड (जि. नाशिक) ला शिवाजी महाराजांचा मनोहरगडावर मुक्काम होता. त्या आधी नरवरच्या घाटीत नाट्य रंगले. पुर्वी ठरवल्या प्रमाणे शिवाजीमहाराजांची माणसे छोट्या छोट्या तुकड्या करून चौकी किवा ठाणे संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी ओलांडत. काही तुकड्या शिवाजीरायांच्या मागे तर काही पुढे. नरवरची चौकी औलांडताना चौकीवरील पहारा देणाऱ्या शिपायांनी सर्वांचे दस्तक पाहिले. सर्वांनी आम्ही शिवाजीची माणसे आहोत असे सांगितले. शिपायांनी दस्तक पाहून परत केले व पुढे जाण्याची खूण केली. पुढे जाताना वेषांतर केलेल्या शिवाजीराजांनी खोचकपणे म्हटले, ‘आम्ही शिवाजीच आहोत.’ चौकीवरील शिपायांना राजांच्या या बोलण्याचा अर्थ नीट समजला नाही. पण नरवरच्या फौजदाराला पाठवायच्या बातमीपत्रात यासर्व घटनेची नोंद केली. 8. शिवाजी महाराज सिरोंज – हांडिया इथे नर्मदा ओलांडून – पुढे चारवा – छानेरा – असीरगढ करत बऱ्हाणपुरकडे निघाले. नंतर ते बहुधा जळगाव - एरंडोल - मालेगाव करत चांदवडला साधारण 5 सप्टेंबरला मराठी सरदाराच्या वेषात आले असावेत. 9. मनोहरगड उर्फ कौलदेहेर येथे हे गुप्त निवासस्थान निवडले. (मुंबई-आग्रा महामार्गावर राजदेहेर, इंद्राई तसेच चांदवड किल्ले जवळून दिसतात. परंतु, कौलदेहेर उर्फ मनोहरगड हा जरा लांब डोंगरात लपला आहे!) 10. शिवाजी महाराज मनोहरगडावर पोहोचल्यानंतर 10-15 दिवसांनी सुमारे 20 सप्टेंबरला शिवाजीराजांचे सैन्य नाशिक-त्र्यंबक प्रांतात शक्यतो कोणास समजून न देता जमू लागले. सुमारे 5000 घोडदळ जमा झाले. सुरतेवर हल्ला करायची अफवा त्यामुळे निर्माण झाल्याची न्यूज डच पत्रातून पसरली होती. 11. निराजी रावजी ज्यांनी 22 जुलै ते 16 ऑगस्ट पर्यंत आग्र्याच्या हवेलीत शिवाजींचे रूप घेतले होते ते व अन्य मंडळी 17 ऑगस्टला मथुरेहून निघाली. सुमारे 900 मैलाचा प्रवास करून 20 ऑक्टोबरला चांदवडला व पुढे कौलदेहेर उर्फ मनोहरगडावर गुप्तपणे गेले. तेथे त्या सर्वांची शिवाजीमहाराजांबरोबर भेट झाली. 12. राजे 1 नोव्हेंबर तर संभाजीराजे 20 नोव्हेंबरच्या सुमारास राजगडावर पोहोचले. अशा रीतीने राजांची माणसे स्वराज्यात परतली. मात्र नेताजी पालकर व त्याचे नातेवाईक सुमारे दहा वर्षे मोगलांकडेच अडकले.

नवीन प्रमेया प्रमाणे शिवाजीमहाराज निसटले कसे ? ते पुढील भाग 3 मधे...

1

वाचने 18464 वाचनखूण प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

प्रचेतस 17/03/2015 - 22:32
हाही भाग आवडला. काही शंका १. २२ जुलै ते १५ ऑगस्ट इतके दिर्घकाळ निराजी रावजी शिवाजी महाराजांच्या वेषात वावरू शकतील हे संभवनीय वाटत नाही. ह्या घटनेला तसेच उपरोल्लेखित तारखांना ऐतिहासिक पुरावा काय आहे? २. महाराजांचा मनोहरगडावर मुक्काम होता असे लेखात आलेले आहे पण कौलदेहेर अथवा कोळधेर हाच मनोहरगड असे कुठेही वाचल्याचे आठवत नाही. तसेच ह्यावेळी चांदवड तसेच अजिंठा सातमाळ रांगेतील किल्ले हे मुघलांच्या ताब्यात होते त्यामुळे हे तर्काधिष्टित होत नाही. महाराजांच्या कोकण (कुडाळ) स्वारीच्या वेळी ते मनोहरगडावर मुक्कामासाठी आल्याचे उल्लेख आहेत मात्र तो मनोहरगड म्हणजे सावंतवाडीनजीकचा मनोहर मनसंतोष ही जोडगोळीतील एक.

शशिकांत ओक 17/03/2015 - 23:02
या बाबत मी काही बोलणे योग्य नाही. कारण या दोन्ही बिंदूंवर भरपूर ओहापोह लेखकाने केलेला आहे. कौलदेहेर म्हणजेच मनोहरगड यावर बराच खल त्यांनी केलेला आहे. शिवाय निराजी रावजी इतके दिवस सर्वांंना कसे झुलवत ठेवू शकले व त्यांनाच तसे करता येणे कसे संभवनीय आहे असे लेखकाचे म्हणणे सयुक्तिक वाटते. पण त्यासाठी पुर्ण पुस्तक वाचावे.

In reply to by शशिकांत ओक

प्रचेतस 18/03/2015 - 11:50
सध्यातरी पुस्तक विकत घेउन वाचण्यास सवड नाही तेव्हा तुम्हीच संक्षिप्त स्वरूपात माहिती पुरवल्यास बरे होईल.

रमेश आठवले 18/03/2015 - 05:37
शिवाजीचे आग्र्याला जाणे आणि तेथून ( कसेही करून ) जिवंत परत येणे या घटनेला जयपूरचे महाराज मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचे युवराज रामसिंग हे दोघे साक्षीदार होते. जयसिंगानी सुखरूप परतीची ग्वाही, ते स्वत: दक्षिणेत असताना, शिवाजीला दिली होती, असे ही मानले जाते. ही ग्वाही त्यांनी बादशाहाशी लेखी मसलत केल्याशिवाय दिली असेल असे मानण्याचे कारण नाही. तरी त्यांनी आणि रामसिंग यांनी कसे ही करून शिवाजीच्या परतीची सोय केली असणार असे गृहीत धरता येइल. . जयसिंग हे मातबर सरदार असल्यामुळे त्यांनी दिल्लेल्या वचनाचा भंग करण्यास बादशाहा धजावला नसेल . जयपूर राज्याच्या जुन्या दस्तावेजामध्ये या महत्वाच्या घटनेचा उल्लेख सापडण्याची शक्यता आहे. या पुस्तकाचे लेखक अजित जोशी यांनी किंवा आधीच्या लेखकांनी जयपूर दप्तराचा वापर केला की नाही याची माहिती मिळायास हवी.

In reply to by उमेश येवले

सुनील 18/03/2015 - 15:31
नुसते शिवाजी म्हटले तर अनादर. शिवाजी महाराज असे म्हटले तर आदर. आणि छत्रपतीजी महाराजजी शिवाजीजी असे म्हटले तर अती-आदर, असे काही आहे काय?

In reply to by रमेश आठवले

हाडक्या 18/03/2015 - 15:51
आधीच सांगतो की शिवाजी म्हणा नाहीतर शिवाजी महाराज त्याने आदर/अनादर यांवर काही फरक पडत नाही. तरीपण,
शिवाजीचे आग्र्याला जाणे आणि तेथून ( कसेही करून ) जिवंत परत येणे या घटनेला जयपूरचे महाराज मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचे युवराज रामसिंग हे दोघे साक्षीदार होते. जयसिंगानी सुखरूप परतीची ग्वाही, ते स्वत: दक्षिणेत असताना, शिवाजीला दिली होती, असे ही मानले जाते.
इथे "मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचे युवराज रामसिंग" यांच्याबद्दल "अहो जाहो" (जे की आपल्या मराठी भाषेत आदरार्थीच समजले जाते) आणि शिवाजीचा उल्लेख "शिवाजी" हा दुजाभाव, ही विंसंगती खटकत नाही काय?
या पुस्तकाचे लेखक अजित जोशी यांनी
वर्तमानातल्या लोकांबद्दल बोलताना आपल्या संकेतानुसार आदरार्थी संबोधन समजू शकते. परंतु इतिहासातल्या लोकांच्या बाबतीत एकास एक न्याय आणि त्याच वाक्यात दुसर्‍यास दुसरा ही गोष्ट मग नक्की काय दर्शवते ? (फक्त एक लिखाणातली चूक? तसे असेल तर स्पष्टपणे मान्य करा आणि पुढच्या वेळेस काळजी घ्या.)

In reply to by हाडक्या

आदूबाळ 18/03/2015 - 16:20
हाडक्याभौ, म्हणणं एवढंच आहे, की आदरार्थी शब्दांचे रिकामे खुळखुळे वाजवण्यापेक्षा आदर कृतीतून प्रतीत होऊ द्या. जवळच्या माणसाला प्रेमाने एकेरीत संबोधणे हाही मराठी भाषेचा विभ्रम आहे. उदा. "काय खेळलाय आज सचिन!" किंवा "लताचा आवाज म्हणजे सवालच नाही!" किंवा "झाकिरला ऐकण्यासाठी आलो." त्यात आदरार्थी संबोधनाने आदरापेक्षा कृत्रिमपणा जास्त वाटेल. आदरार्थी संबोधनच वापरा वगैरे खुळचटपणा आपल्या भावाला "पराक्रमाचे तमाशे दाखवा" असं खडसावणार्‍या शिवबांबद्दल आला की ते वरून हसत असतील असा भास होतो.

In reply to by आदूबाळ

हाडक्या 18/03/2015 - 17:04
आदरार्थी संबोधनच वापरा वगैरे खुळचटपणा आपल्या भावाला "पराक्रमाचे तमाशे दाखवा" असं खडसावणार्‍या शिवबांबद्दल आला की ते वरून हसत असतील असा भास होतो.
अगदी अगदी आदूभौ.. (ते आपला कट्टा कधी करुयात बादवे?) प्रतिसाद मूळ प्रतिसादास उद्देशून होता आणि ढिश्लेमर पण टाकला होता म्हणून की "शिवाजी म्हणा नाहीतर शिवाजी महाराज त्याने आदर/अनादर यांवर काही फरक पडत नाही" पण त्यांच्या प्रतिसादातली विसंगती दाखवून द्यायचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर, हे ही खरे की शिवरायांच्या नावावर दहशतवाद करणार्‍यांचा भयंकर तिटकारा येतो. अगदी त्रास होईल इतका हा बर्‍याचदा क्षुल्लक असा अस्मिता-गळवांचा प्रकार पाहून तर शिवबांच वरून हसत असतील हे पटतं अगदी.

रमेश आठवले 18/03/2015 - 21:57
जाणता राजा असा गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख ब मो . पुरंदरे यांच्या सारख्या जाणत्या माणसाने केला आहे. आपण आपल्याला जवळचे वाटणार्या व्यक्तींचा एकेरी उल्लेख करतो, असा प्रघात आहे. उदा: आई, विठोबा. अनोळखी किंवा अपरिचित व्यक्तींचा उल्लेख अहो-जाहो अशा संबोधनाने करतो. हे सवयीने आणि अनावधानाने घडते. बाकी वरच्या काही साद प्रतिसादावरून माझ्या प्रतिसादातील मूळ मुद्द्याला कात्रज चा घाट दाखवण्यात आला आहे असे दिसते .

शशिकांत ओक 20/03/2015 - 16:34
तो शिवाजी म्हणावे की शिवाजी महाराज असे आदरार्थी संबोधावे यावर ज्यांच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रश्न असे म्हणत सोडून द्यावे...

काळा पहाड 20/03/2015 - 22:21
जगात 'महाराज' म्हटले की एकच आठवतात. तेव्हा फक्त महाराज म्हणायलाही हरकत नाही. बाकी नुस्तं शिवाजी म्हटलं तर तोरणेश्वरावर प्रतिज्ञा घेणारा टीनएजर शिवाजी नजरेसमोर येतो (हे चित्र आमच्या इतिहासाच्या पुस्तकात होतं) आणि तो सुद्धा तितकाच जवळचा वाटतो. आमचा तर शिवाजी म्हणतो असा काहीसा एक खेळ सुद्धा होता. कुणाला आठवतोय का तो?

In reply to by काळा पहाड

बाकी नुस्तं शिवाजी म्हटलं तर तोरणेश्वरावर प्रतिज्ञा घेणारा टीनएजर शिवाजी नजरेसमोर येतो
करेक्ट. महाराजांचा पूर्ण आयुष्यपट प्रत्येक मराठी माणसाने अभ्यासलेला आहे व त्याने प्रेरितही झालेला आहे. एरवी कंटाळवाणा वाटणारा इतिहास इथे मात्र स्फूर्तिदायक व मनोरंजक बनतो. इतिहासतले नेहेमी एकेरी उल्लेख होणारे दुसरे स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व म्हणजे राणा प्रताप. राणा प्रतापाचा ही कुठे असा अहो जाहो होणारा उल्लेख मी तरी वाचला नाही.(आदरार्थी हा शब्द मुद्दाम वापरला नाही. एकेरी उल्लेखाने ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांबद्दल असणारा आदर कुठेही कमी होत नाही.) मुळात इतिहासाचे अ‍ॅनालिसिस करताना सगळ्याच पात्रांना एका लेवलला आणुन असे अ‍ॅनालिसिस करणे बरोबर (अनबायस्ड (मराठी शब्द ?) वाटते.

शशिकांत ओक 21/03/2015 - 08:20
आता अमुक अमुक करा की त्याच्या सवंगड्यांनी ती गोष्ट त्वरित आणून द्यायची... पार्टी गेम मधे यात फाटका मोजा किवा लेडीज पर्समधून न वापरातील रंगाचे लिप स्टिक, वगैरे आणताना केलेली धावाधाव आठवते....

आपण शिवाजी महाराजांना तो शिवबा असे म्हणतो तसेच फ्रांस मध्ये नेपोलियनला तो 'चिमणा शिलेदार' असे संबोधिले जाते ...(इति अपूर्वाई). बाकी 'बघतोस काय मुजरा कर' वगैरे बोकाळलेले आहेच ...

In reply to by Ram ram

शशिकांत ओक 25/03/2018 - 20:25
शिव किंवा शिवा असे असणार.... जी हे आदर दर्शक उपपद जोडलेले आहे. जी इतका जुडला आहे की तो नावाचा भाग झाला आहे... ब्राह्मणांत मारुती नाव पटकन सापडत नाही तसेच... असे साईड इशूत न पडता ध्यातील विषयावर प्रतिसाद मिळेत तर आवडेल....

In reply to by Ram ram

पैसा 25/03/2018 - 20:37
तुम्हीही इथे जातीय विष ओकायाला आला आहात का? अनेक अप्रसिद्ध लोक माहीत आहेत. पण प्रसिद्ध नाव हवे असेल तर आचार्य विनोबा भावे यांच्या भावाचे नाव शिवाजी होते.

Ram ram 04/04/2018 - 13:12
मी जातपात मानत नाही मी ज्या मराठा समाजात जन्मलो त्यात अनेक नीच लोक पाहिलेत. बाळ ठाकरेंविषयी का उत्तर दिले नै. दोनतोंडे लेकाचे.