Skip to main content

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग ३ ओरिजनल प्रेम पत्र ...

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 16/02/2015 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३

अरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत पंजाबातून जातात तेंव्हाच्या कथा भागातील मजेदार प्रसंग सादर... पठाणकोट डमताल ..

१८५००

ओरिजिनल प्रेम पत्र!

पान२२५ ...आता नुसतचं बसून काय करायचं म्हणून म्हटले झाडावर चढता येते का पाहू... प्रचंड'सालढोम' इतर वृक्षांच्या गर्दीत पांढराफटक वेगळा वाटत होता. सगळ्या अंगाला त्याच्या गुळगुळीत बुंध्याचा पांढरा भुस्सा लागू लागला. वर जायला ही फारसा आधार नव्हता. म्हणून नाद सोडला. तेवढ्यात बुंध्याच्या चुंबळीसारख्या खोलगट गाठीत हाताला एक खोचून ठेवलेला कागद लागला. इतक्या जंगलात झाडावर कागद सापडतो म्हणजे काय म्हणून पाहिलं तर कोपऱ्यात दिलची (बदामी आकाराची) खूण! साहजिकच उत्सुकतेने वाचून पाहिलं. आणि उडालोच! गंमत म्हणून ते ओरिजिनल पत्र इथे देतो... (पुस्तकात स्कॅन करून सादर) . . . . . ७ अपरील प्यारे इंदर कल शाम नू मै नानू दे खेत विच नई आ सकी. उसका बुरा मत मान्यो. पापाजी दी मेरे उप्पर नजर हैगी. रत्त भर त्वाडी यद आंदी रही सी. मै आरामनाल सो भी नही सकी. पर्सो श्याम ६ बजे तुस्सी ओई पुरानी जग्गा विच आ जाना. साथ ओ चीज भी ले आई. मै लकडी काटने दे बहाने मुन्नी साथ उत्थे आ जावगी. त्वाडी पगली कुठल्या तरी इंदर नामक तरुणाची वाट पाहून मरगळलेलं ते एक पंजाबी भाषेत देवनागरी लिपीतलं पागल प्रेमपत्र होतं! पत्रावर ७ एप्रिल तारीख होती आता ११ मे म्हणजे आता कुणी ते न्यायला येणार नव्हत हे नक्की!... तरीही ज्यांच्या नावाचं त्याला ते पत्र न मिळता चार प्रांत ओलांडून नेमक्या त्याच झाडा खाली आलेल्या 'भलत्याच 'रसिक' माणसाला सापडतं... या योगायोगाला काय नाव द्यायचं? एवढासा कागद महिनाभर राहिलाच कसा? तो दोघांपैकी कुणीच कसा काय नेला नाही? समजा ते परस्पर भेटले असतील तर त्यांना हे पत्र नष्ट करायची गरज कशी वाटली नाही? की घरच्यांना समजताच त्यांनी दुसरीकडेच जुळवून दोघांची जोडी फोडली असावी? त्यांचं काही बरं वाईट? किंवा कदाचित कोणीतरी अजुनही ते पत्र न्यायला येणार असेल काय? पत्रातील ती विशिष्टन चीज कोणती? आपल्या मनात आहे तीच तर नाही ना? कसलचं काम नसलेल्या माझ्या रिकाम्या मनात साहजिकच अशा कूट प्रश्नांची ही ~~ थप्पी लागली. त्यात तळाशी दबलेला 'आपण एखाद्या'पग्ली'चे इंदर केंव्हा होणार? हा प्रश्न अंमळ होताच! परंतु खरा प्रश्न तर पुढेच होता. ते खाजगी पत्र पुन्हा इथेच ठरवायचं की आपल्या नावाचं करून घ्यायचं? ज्यास्त झंझट न करता,मी टॉस केला. 'पत्र घेऊन म्हणून जा आदेश मिळाला होता!' माझ्या सारखा 'माणूस' ही प्रसंगी कसा विचार बदलतो पहा.... .' टॉस अनुकूल पडला नसता तरीही मी ते पत्र साध्या योगायोगातून अनपेक्षितरित्या मिळालेली चटकदार आठवण म्हणून हक्काने नेलेच असते. आता तर काय दैवाची साथच मिळाली होती.... (अन आता आपल्या सारख्या रसिक वाचकांना ते वाचायला मिळत आहे! जेंव्हा जिने ते लिहिलं तेव्हा पग्ली ला कुठे माहिती होत कि ते असे सायकलवरील सफरनाम्यात छापून येईल!... कंस माझा... ) पुढे सायकल चक्क रस्त्यावरील एका दगडाला खेटून उभी केली पिकलेल्या जांभळांचा गोड चुरचुरीत वास लागून होता. सातवणाच्या झुडपामधून वाऱ्यानं पडून फुटलेल्या जांभळांचा नुसता खच पडला होता. तो रानमेवा खायला मात्र तिथं कुणी फिरकत नव्हतं. ती धुवून मनसोक्त खाल्ली. काही वरून पाडली. प्लास्टिक पिशवीत सुद्धा भरून घेतली.... पुढे सुगरण पक्षांची घरटी लटकताना दिसली. या ठिकाणी आपल्याच तंद्रीत घरट्यांवर भराऱ्या मारणाऱ्या बायांच्या पिवळ्या टोळ्या मुद्दाम वेळ देऊन पाहिल्या. पुढे रस्त्याची जीभ सापासारखी दुभंगलेली! नेमकं जायचे कुठे अक्षरशः 'रानभूल 'झाल्यासारखा गोंधळलो. जंगलात कुठं कुठं 'भुलनवेल' नावाची वेल जमिनीवर पसरलेली असते. असं म्हणतात की या वेलीच्या संपर्कात आलेल्यांचं दिशाज्ञान काही काळाकरता नष्ट होतं कारण तिच्यातून निघणारा वायू श्वासावाटे शरीरात गेला की त्यांच्या मेंदू वर परिणाम होऊन माणूस भरकटतो.... ... पुढे चालू...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4420
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सरदारांच्या राज्यात....बाईक वरून जाणाऱ्रया सरदाराची स्त्यात पडलेली पर्स व महत्वाची कागदपत्रे परत करताना ... 10 रुपयाची नोट मिळवतो.... पुढील भागात

हा प्रसंग खासंच. इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.

लै भारी अनुभव आहेत!