मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंत्र दिला राम कॄष्ण हरि

देवदत्त परुळेकर · · जनातलं, मनातलं
आज माघ शुद्ध दशमी. वारकरी सांप्रदायात या तिथीला विशेष महत्व दिले जाते. कारण या दिवशी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना गुरुकॄपा होवून "राम कॄष्ण हरि" या महामंत्राची प्राप्ती झाली. खुद्द तुकाराम महाराजांनी आपला अनुभव कथन केला आहे तो असा- सत्यगुरुरायें कॄपा मज केली । परि नाहीं घडली सेवा कांही ॥१॥ सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥२॥ भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥ काय कळे उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा झाली ॥४॥ राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खूण माळीकेची ॥५॥ बाबाजी आपुले सांगितलें नाम । मंत्र दिला राम कॄष्ण हरि ॥६॥ माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥७॥ तुकाराम महाराज सांगतात- गुरुमहाराजांनीं माझ्यावर कृपा केली, हे खरे आहे. गुरुरायांनी माझ्यावर सत्य कॄपा केली. तसेंच ज्या गुरुनें माझ्यावर कॄपा केलीं, ते गुरुराज सत्य आहेत. परंतु माझ्याकडून कांही त्यांची सेवा घडली नाहीं. मी स्वप्नामध्यें गंगेचे स्नान करण्याकरितां जात असतांना श्रीगुरुंनी मला वाटेत सापडविलें म्हणजे गाठले आणि दर्शन दिले. मी नमस्कार केल्याबरोबर माझ्या मस्तकावर त्यांनी अभयकॄपा हस्त ठेवला, असें तुम्ही जाणून घ्या. त्यांनी भोजनासाठी माझ्याजवळ पावशेर तूप मागितले. परंतू मला त्याचा विसर पडला. हे सर्व स्वप्नात घडले. माझ्याकडून सेवेत कांही अंतर पडले कीं काय? कोण जाणे, म्हणून त्यांनी जाण्याची त्वरा केली. राघव चैतन्य, केशव चैतन्य अशी आपल्या गुरु परंपरेची खूण त्यांनी मला सांगितली. स्वत:चे नाव बाबाजी असे सांगून त्यांनी मला "राम कॄष्ण हरि" हा मंत्र दिला. या दिवशी माघ शुद्ध दशमी, गुरुवार हा पुण्यदिवस होता. तो पाहूनच त्यांनी माझा स्विकार केला. ( योगायोगाने यावर्षी माघ शुद्ध दशमी ही तिथी गुरुवारी आली आहे.) तुकाराम महाराजांनी ज्या गंगेच्या स्नानाला जाणारी वाट असा उल्लेख केला आहे ती गंगा कोणती? ग्रामीण भागात आजही आपल्या गावा जवळील नदीला आदराने आणि प्रेमाने गंगा असेच म्हणतात. गोदावरी काठावर रहाणारे लोक गोदावरीला गंगाच म्हणतात. संत जनाबाई म्हणतात- भीमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणीच्या गंगा ॥ म्हणुन देहू जवळील नदी इंद्रायणी हिच नदी ही गंगा असावी असे मानतात. श्री. वा. सी. बेंद्रे यांच्या मते हा गुरुपदेश तुकोबांना ओतुर या गावी गंगावाट नावाच्या वाटेस तुकोबा असताना झाला. सद्गुरुंच्या स्पर्शाने तुकोबांना भावावस्था प्रप्त झाली असावी असाही स्वप्नाचा अर्थ त्यांनी केलेला आहे. या भावानंदात तुकोबा पुर्णपणे मग्न झाले असल्यामुळे खूप वेळ झाला तरी त्यांना जाग आली नाही. एवढ्यात बाबाजी चैतन्य निघून गेले. मग सावध झाल्यानंतर तूप द्यायचे विसरून राहून गेले म्हणून तुकारामबुवांना वाईट वाटले. साधु, संन्याशी, बैरागी यांना तुप देण्याची प्रथा असे. तुकोबांचा हा गुरुपदेश इंग्रजी कालगणनेप्रमाणे २३ जानेवारी १६४० या दिवशी झाला असल्याचे बेंद्रे यांनी म्हंटले आहे. डॉ. प्र. न. जोशी यांचे प्रतिपादन असे - राघव चैतन्यांचे मूळचे नांव रघुनाथ. गिरिनारच्या एका भागात शौर्यकुळात यांचा जन्म झाला. वडिलांच्या आज्ञेवरून रघुनाथाने श्रीदत्ताची उपासना केली. दत्ताच्या अनुग्रहानंतर त्यांच्याच प्रेरणेवरून हे जुन्नर जवळच्या ओतुरच्या डोंगरात व तपोवनात अनुष्ठान करु लागले. पुष्पावती नदीच्या तीरावर शिवाची कडक उपासना यांनी केली. शेवटी व्यासांनी यांना दर्शन दिले व यांचे नाव राघव चैतन्य असे ठेऊन ’ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा मंत्र दिला. दत्तानेही चतु:श्लोकी भागवताची शिकवण देऊन संप्रदाय वाढविण्यास सुचविले. त्यांचा संचार महाराष्ट्र, उत्तर हिंदुस्थान, तेलंगण इत्यादि भागात नेहमी असे. केशव चैतन्य हे राघव चैतन्यांचे प्रमुख शिष्य होत. यांचा जन्म राजर्षी कुळात झाला. हा मोठा राजकारणी व शुर असून यांस राघव चैतन्यांच्या सहवासांत वैराग्याचे महत्व पटले. राघव चैतन्यांकडून गुरुदीक्षा मिळाल्यानंतर यांचे नांव केशव चैतन्य म्हणून प्रसिद्ध झाले. सन १५६२ च्या सुमारास राघव चैतन्यानी जिवंत समाधी घेतली. त्यानंतर केशव चैतन्य हे ओतुर परिसरात राहत असत व तेथे गंगावाटेवर त्यांचा मठ असे. त्यांना मोठा शिष्य परिवार लाभला. सन १५७१ मध्ये त्यांनी समाधी घेतली. राघव चैतन्य यांनी ब्रह्मस्वरुप, योगनिद्रा, त्रिगुणलीला इत्यादि अनेक ग्रंथांची रचना केली. तर केशव चैतन्य यांनिही भक्तिप्रकाश, वैकुंठपद, गीताभागवतसार अशा ग्रंथांची रचना केली आहे. बाबाजी चैतन्य हे केशव चैतन्य यांचे प्रमुख शिष्य होत. यांचा मान्यहाळीसही एक मठ असे. यांची उपासना भक्तीप्रधान होती. मुख्य़ म्हणजे या तिघांनाही अनेक हिंदू मुसलमान शिष्य मिळाले. मुसलमान परंपरेत राघव चैतन्यांना हजरत लाडले मकायकही उर्फ राघव दराज आलंद शरीफ या नावाने, केशव चैतन्यांना हजरत ख्वाजा बंदे नवाज व बाबाजी चैतन्यांना हजरत शेख शहाब्बुद्दिन साहेब मान्यहाळ अशा नावांनी प्रसिद्धी होती, असे डॉ. प्र. न. जोशी म्हणतात. निरंजन बुवांनी लिहिलेल्या ’चैतन्य कल्पतरु’ या ग्रंथात तुकोबांची गुरु परंपरा श्रीविष्णु-ब्रम्हदेव-नारद-व्यास-राघव चैतन्य- केशव चैतन्य-बाबाजी चैतन्य-तुकोबा चैतन्य अशी सांगितली आहे. अभंगातील काही शब्दांचा परंपरेत पारमार्थिक भावार्थ सांगण्यात येतो तो असा - ज्या गंगेचा उल्लेख अभंगात आहे ती गंगा म्हणजे भक्तिगंगा किंवा ज्ञानगंगा होय. तिच्यात स्नानाला जायची वाट सापडली नाही तर संत कॄपेने सापडविली म्हणजे संतांनी दाखविली. या वाटेवरून महाराज चालले होते यावरून गुरुकॄपेपूर्वी तुकाराम महाराज काय साधना करत होते व याच मार्गावर त्यांना सद्गुरुची कशी प्राप्ती झाली हे स्पष्ट होते. गुरुदेवानी तुप मागितले म्हणजे स्नेहयुक्त अंत:करण मागितले. अंत:करणाचे चार भाग मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. यातील पाव भाग म्हण्जे परमार्थाचे मुख्य साधन चित्त तेच मागितले. माघ म्हणजे मा=नाही अघ=पाप म्हणजे पवित्र आणि दशमी म्हणजे पंच कर्मेंद्रियांचा व पंच ज्ञानेंद्रिये अशा दहा इंद्रियांचा हा पवित्र देह पाहून गुरु कॄपेस योग्य समजून बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना गुरुपदेश केला. गुरुंनी शिष्याच्या मनातील भाव जाणून त्याला सोपा आणि आवडिचा मंत्र सांगितला. तोच तुकाराम महाराजांनी सर्वांसाठी खुला केला - राम कॄष्ण हरि. - देवदत्त परुळेकर मो. ९४२२०५५२२१

वाचने 3002 वाचनखूण प्रतिक्रिया 1

अर्धवटराव 30/01/2015 - 02:32
तुकोबांना चैतन्य महाप्रभूंनी मंत्रदीक्षा दिली असं कुठेतरी वाचलं होतं...