Skip to main content

खारघर टोल नाका

मंगळवार, 06/01/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सायन - पनवेल - १० पदरी मार्ग अंतर पार करण्यास लागणारा कालावधी - १ तास अधिक टोल नाक्यावर लागणारा वेळ वाशी टोल नाका - अर्धा तास खारघर टोल नाका - अर्धा तास एकूण वेळ - २ तास एवढ्या वेळेत तर पूर्वी आम्ही लोणावळ्याच्या पुढे पोचायचो कुठे नेऊन ठेवलात ' वेळ ' माझा … । सत्तेत आल्यावर आम्ही टोल बंद करू , खारघर टोल नाका कदापि चालू होऊ देणार नाही इ . आश्वासने देऊन निवडून आलेल्या भाजपा ( सेना ) सरकारने आज अखेर खारघर टोल नाका चालू केला . टोलनाक्याच्या पलीकडील ५ गावाना ( पनवेल, कळंबोली, कामोठे, कोपरा , खारघर ) सूट मिळणार असे कळते . मग अलीकडील गावाना ( सीबीडी, नेरूळ , उलवे) सूट का नाही दिली जाणार हा अनुत्तरीत प्रश्ण . असो आम्ही स्वत: सीबीडी बेलापूरला रहात असल्याने , आमच्या दृष्टीने हा टोल कसा बायपास करता येईल याचा विचार करता काही नवीन मार्ग सुचला तो असा . खारघरटोल नाका बायपास करण्याचा मार्ग ……. १) पुणे / पनवेल कडे जाणा-यांसाठी …… या मार्गाने गेल्यास पैशाची बचत होणार नाही ( जेवढे टोलचे पैसे वाचवाल तेवढेच डिझेल / पेट्रोलसाठी खर्च होतील ) मात्र टोल नाक्यावरची लांबच लांब रांग रांग वाचून वेळेची बचत होण्याची शक्यता . मुख्य करून विकेंडला / लागून आलेल्या सुट्ट्यांच्या वेळी जेंव्हा पुण्या कडे जाण्यासाठी वाहनांचा ओघ वाढलेला असतो त्यावेळी अवश्य या मार्गाचा उपयोग करता येऊ शकेल . तसेच सुट्ट्यासंपून मुंबईला परताना रविवारी रात्री हा बायपास रोड वापरता येईल . परत एकदा हा बाय पास मार्ग पैसे वाचवण्यासाठॆ नसून वेळ वाचवण्यासाठी आहे याची नोंद घ्यावी खारघर उड्डाणपुलावर न जाता खालच्या बाजूने जाऊन खारघर सर्कलला डावीकडे वळावे. तसेच सरळ प्रसिध्द उत्सव चौका पर्यंत जाऊन त्या चौकाला वळसा मारून उजवीकडे जाणे. हा रस्ता सेंट्रल पार्क / पांडवकडा येथून जातो . तेथून तसेच सरळ जाणे जो रोड तुम्हाला तळोजा ( पनवेल - कल्याण रोडला ) इथे आणून सोडेल . त्या ठिकाणी ( जिथे पनवेल - कल्याण रोड, या रोडला मिळतो ) उजवीकडे वळल्यास तुम्ही कळंबोली कडे येता आणि तिथून परत एक्स्प्रेस हायवेवर जाण्यासाठी डाव्या बाजूने रस्ता दिला आहे. या बायापासमुळे साधारण ७ ते ८ किमी अधिक प्रवास होऊ शकतो मात्र सुट्टीत टोलनाकयावर लागणा-या रांगेचा विचार करता वेळेत बचत मात्र होऊ शकते २) पेण/ अलिबाग/ कोकणात जाण्यासाठी …। सायन - पनवेल महामार्गावर नेरुळ गेल्यानंतर उरण फाट्याचा उड्डाणपूल न वापरात खालच्या बाजून जाऊन उजवीकडे उरणला जाण्यासाठी वळावे किंवा वाशीहून येत असाल तर पाम बीच रोड ने येऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवीन इमारतीपासून उजवीकडे वळावे. उरणला जाणारा हा रोड पनवेल - उरण रोडला मिळतो. तिथे उजव्या बाजूस वळावे आणि लगेचच काही मिटर अंतरावर चिरनेर गणपती कडे असा फलक दिसेल तिथे डावीकडे वळावे . हा रस्ता मोठी जुई , चिरनेर मार्ग तुम्हाला सरळ पनवेल - पेण रस्त्यावर कर्नाळा पाशी आणून सोडेल हा रस्ता मात्र नक्कीच पैसे आणि वेळ यांची बचत करणारा आहे. अधिक माहितीसाठी गुगल नकाशाचा वापर करता येईल धन्यवाद अमोल केळकर

वाचने 9632
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

आम्ही टोलचे बांधकाम सुरु झाल्यापासुनच पळस्पा,उलवा,पामबिचरोेड वापरायला लागलो आहोत.किंवा कळंबोली सर्कल,उजवीकडे वळुन तळोज्याच्या रस्त्याने खारघर मध्ये शिरतो. याच टोलचं राजकारण करुन पनवेलच्या निवडणूका झाल्या!त्या झाल्यावर टोलधाड अपेक्षित होतीच.ती पडली एकदाची.

ठाण्याहून पुणे अथवा कोकणात जाणारांसाठी - भिवंडी बायपास रोड - (टोल भरून) मुंब्रा रेतीबंदर - शिळफाटा - तळोजा - (हाच रस्ता पुढे लेखात दिलेल्या क्रमांक १ ह्या पर्यायाच्या रस्त्याला येऊन मिळतो). ह्यामुळे काय होते? टोल वाचतो? नाही (एक वाचतो, दुसरा येतो) अंतर कमी होते? नाही (२-४ किमी इकडे-तिकडे) वेळ वाचतो? नाही तळोज्याच्या 'नॅशनल'ची बिर्याणी खायला मिळते? होय मंडळी, निवडा पर्याय!!

छान माहिती...!! २) पेण/ अलिबाग/ कोकणात जाण्यासाठी …....हा रस्ता मोठी जुई , चिरनेर मार्ग तुम्हाला सरळ पनवेल - पेण रस्त्यावर कर्नाळा पाशी आणून सोडेल परवा चिपळूणवरून येत असताना मी या मार्गाचा वापर केला. मी पेण-कर्नाळ्याच्या मध्ये असलेल्या टोलनाक्यावर यू टर्न मारून चिरनेर/उलवे वरून पामबीच मार्गे वाशीला आलो. हेच जर कर्नाळा-पनवेल मार्गे आलो असतो तर फक्त ४ किलोमीटर जास्तीचे पडले असते पण चिरनेरवरून आल्याने वेळ खूप वाचला असे वाटले.

In reply to by मराठी_माणूस

कोल्हापूरच्या लोकांइतकी टोलबद्दलची चीड आणि प्रश्न लावून धरण्याचा संयम / वेळ मुंबईतील माणसाकडे नाही. फार फार तर पब्लिक २-४ दिवस बोंब मारेल आणि झक्कत टोल भरेल. गेल्या महिन्यात मला कामानिमित्त ठाण्यावरुन चाकणला जायचे होते. टुरीस्ट गाडीच्या ड्रायव्हरला सांगीतले की गाडी जुन्या मुंबई पुणे रस्त्याने घे तर त्याने तोंडाचा मोठ्ठा आ वासला. पण जुन्या रस्त्याने गेल्यास जवळपास २००-२५० रु. टोल आणि ३०-४० किमी अंतर वाचते (चाकणसाठी, नॉट फॉर पुणे) हा माझा स्वानुभव आहे. वेळ थोडा जास्त जातो पण तेवढे चालीन जाते. एकूण जवळपास ७०० ते १००० रुपये वाचतात. शिवाय फुडमॉलचे महागडे बेचव अन्न खाणे टाळता येते. त्याच्यापेक्षा थोड्या कमी पैशात खंडाळ्यात कामतमधे छान नाष्टा / जेवण मिळते. शिवाय लोणावळा खंडाळ्याची मजा लुटता येते ती वेगळीच.

दुसरा रस्ता मी स्वतः वापरलेला आहे. पाम बीच - जे एन पी टी - तर नेहमीचाच आहे. इथे ३० रुपये टोल लागतो पण रस्ता लोणी आहे. मी शक्यतोवर खारघर वरून जात नाही गेल्या महिन्यात मात्र तो नवीन रस्ता झाला असल्याने गेलो होतो. टोल नव्हता म्हणून. हा पाम बीच - चिरनेर - पेण रस्ता aaa

मुख्य करून विकेंडला / लागून आलेल्या सुट्ट्यांच्या वेळी जेंव्हा पुण्या कडे जाण्यासाठी वाहनांचा ओघ वाढलेला असतो
यांना पुण्यात शिरायला बंदी घालता येईल का? सध्या पुण्यात वीक एन्ड ला एम एच १ ते ४ गाड्या फारच दिसतात. उगीच ट्रॅफिक जाम करतात. तिकडं मुंबईतच मरायला काय होतं?

In reply to by काळा पहाड

दहा बारा स्फोट झाले तरी मुंबईत मरता नाही येत किंवा घाबरत नाही मंबईकर्,त्या मूळे येतात काळा पहाड ला शोधत पुण्याला मंबईकर :)

हा टोल होणार नाही, म्हणून चाकणफाट्याच्या टोलनाक्याचे दर वाढवले होते, ते पूर्ववत करणार का???

http://m.youtube.com/watch?v=LzWtB1yxDcw तिसर्‍या मुंबैत स्वागत. उळवे रस्ता आता आठ किंवा दहा प्दरी होणार आहे. कदाचित त्यावरही टोल लागेल.

आजच्या लोकसत्ता मधल या विषयावरच संपादकीय भारी आहे . राजवट बदल्याने आपले प्रश्न चुटकीसरशी सुटतील असे वाटणार्या भाबड्या लोकांनी तर जरूर वाचाव

आपण एकत्र होऊन कधी लढलोच नाही ! हे वाक्य सद्ध्या टीव्हीवर घुमतंय. लोकमान्यांनी म्हटलेलं हे वाक्य इतकं खरं आहे की त्याची प्रचीती रोज रोज येते. मुळात आपण लढत नाही. गळ्याशी पाणी आल्याशिवाय हातपाय हलवत नाही. टोलचंच बोलू. कोल्हापूर पॅटर्न म्हणा किंवा आणि काही. पण कोल्हापुरात आले ना लोक एकत्र? दिला ना हिसका? इथे का नाही होऊ शकत? इच्छा नाही. का नाही एक दिवस फेसबुक व्हॉट्सॅप वर असा संदेश फिरत आणि का नाही एक दिवस हजारोंचा जनसमुदाय आपापल्या गाड्या घेऊन खारघर टोल नाक्यावर जात? का नाही तिथे गाड्या बंद करून शांतपणे बसून रहात? का नाही टोल, पोलिस, शासन सगळ्यांचं धाबं दणाणून सोडत काहीही न बोलता तोडता? उत्पन्नातले ३० टक्के शासनाला द्यायचे. आणि शिवाय मूलभूत सोयींना पैसेही मोजायचे? कुठला हिशोब आहे? असो. या संदर्भात एक ब्लॉगपोस्ट लिहिली होती आज, पण इंग्रजीत आहे. त्यामुळे फक्त दुवा देतो इथे. बाकी काहीतरी केलं पाहिजे. १० जण जरी आले एकत्र तरी पुढचे १०० येतील. १००० होतील. http://www.apurvaoka.com/2015/01/protest-unity-toll-mumbai.html

In reply to by वेल्लाभट

उत्पन्नातले ३० टक्के शासनाला द्यायचे.
हा फक्त प्रत्यक्ष कर झाला. उपभोक्ता म्हणून आपण ज्याचा बोजा उचलतो (पक्षी: ज्या वस्तू विकत घेतो) त्यावरचा अप्रत्यक्ष कर वेगळाच. तो पकडता साधारण ४५-५०% व्हावेत असा माझा अंदाज आहे. पुन्हा शेतीमालावरच्या क्रॉस-सबसिडीज वगैरेचा विचारच दूरचा आहे.