Skip to main content

एलिझाबेथ एकादशी

एलिझाबेथ एकादशी

Published on शनीवार, 22/11/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
Elizabeth Ekadashi परवाच 'एलिझाबेथ एकादशी' पाहिला, थोडयाफार त्रुटी असल्या तरी एकूण चांगला आहे. कर्जामुळे वडिलांनी बनवलेली सायकल 'एलिझाबेथ' विकावी लागणार आणि तिला वाचवण्यासाठी त्या दोन्ही मुलांचे प्रयत्न, त्यातला अस्सल प्रामाणिकपणा हा चित्रपटाचा प्राण - आणि त्यात येणारे पंढरपूरच्या छोट्या गल्ल्या-बोळांचे, लहान घरांचे आणि त्यांच्या भावविश्वाचे दर्शन हा भाग मस्त जमून आला आहे. ते घर एखादे पात्रच असल्यासारखे कथेत फिट्ट बसले आहे! "आईचा हात लागतो का?" किंवा ती आज्जी, ती घर-मालकीण हे अगदी तपशीलांसकट मस्त जमलेत आणि कुठेही ओढून-ताणून आणलेले किंवा कृत्रिम संवाद वाटत नाही. छोटे-छोटे प्रसंग जसे - संत न्युटन, दाभोळकरांची हत्या आणि जादूटोणा कायद्याविषयी गैरसमज आणि ते गण्याचे शिव्या देणे, आणि तसेच त्याच्या वडिलांचे शिव्या देणे, रक्त तपासणीच्या वेळेस कुठे उच्चारही न होता त्यांना कशाची काळजी वाटते हे आपल्याला कळतं! 'डेंजर वस्तीतून' कॉट आणण्याचा प्रसंग किंवा शेवटी एकादशीला "यंदा 'आमचा' धंदा चांगला झाला" हे त्या गणिकेने म्हणणे - हे खास परेश मोकाशीचे स्पेशल टच. अगदी सहज आणि सुचकपणे (subtly) तो बरेच काही सुचवून जातो. नाही म्हणायला सायकल 'एलिझाबेथ' आणि ज्ञानेशचे नाते अजून फुलवायला हवे होते, आणि एलिझाबेथ फारच नवीन (न वापरलेली) दिसते, अगदी रोज स्वच्छ केली तरी सायकलचे टायर झिजतातच!:P आणि उंचावलेल्या अपेक्षांच्या तुलनेत शेवट अगदी सपाट वाटतो. पण तरीही एकूण मस्त जमला आहे - थोडा वेगळा विषय, कोणीही नावाजलेला/ली अभिनेता/अभिनेत्री नसतांनाही छान जमून आलेला सगळ्याच मुलांचा अभिनय, त्यांची ती उर्जा आणि धमाल, तसेच अगदी अस्स्ल वाटणार्‍या आई, आज्जी आणि व्यापारी हेही खासच! चित्रपटातला हायलाईट आहे मुलांचे पैसे कमविण्याचे प्रयत्न, त्यांचा तो बांगड्या विकायचा छोटा स्टॉल, आणि ती सगळी धावपळ बाहेर पडल्यावरही लक्षात राहते!(रेटींगः ३.५/५) हो! ह्यात काही काडीमात्रही आक्षेपार्ह नाही. देवांचा, संतांचा किंवा न्युटनचा कसलाही अपमान होत नाही! कशाला विरोध आहे नक्की?? कशानेही भावना दुखावतात का?
लेखनप्रकार

याद्या 7264
प्रतिक्रिया 32

छान परिक्षण !!! चित्रपट पाहिला आहे. आवडला. मात्र "जग झालिया वन्ही, संते सुखे व्हावे पाणी" म्हणणार्या मुक्तेच्या वारकरी पंथातील "वारकर्यांच्या" या चित्रपटाने "भावना दुखावल्या" जाऊन त्यांनी "आम्ही रस्त्यावर उतरु" अशी जी विचारमौक्तिके उधळली त्याने व्यथितही झालो.

In reply to by सतिश गावडे

अगदी, अगदी!! वारकर्‍यांच्या नावाने दुसरेच कोणीतरी हे करत असावे का अशी शंका येते...

In reply to by सतिश गावडे

वारकरी पंथातील "वारकर्यांच्या" या चित्रपटाने "भावना दुखावल्या" जाऊन त्यांनी "आम्ही रस्त्यावर उतरु" अशी जी विचारमौक्तिके उधळली त्याने व्यथितही झालो.
>>> हे वारकरी मुक्तेच्या पंथातील नाहीयेतच हो भाऊ ! सारासारविचार नीरक्षीरविवेक सर्परज्जुन्याय वगैरे काही भानगडी राहिलेल्याच नाहीयेत ह्यांच्यात ! गर्दी असली की राडा करता येतो हेच काय ते तत्त्वज्ञान शिल्लक राहिले आहे ! अद्वैत फद्वैत गेलं तेल लावत ... अरे त्या एलिझाबेथ राणीचा आत्मा अन आपला आत्मा अन परमात्मा भिन्न नाहीच मग वादाला कसली जागा उरली हे ह्यांना सांगुनही कळणार नाही . संत कसा असला पाहिजे ...
"उत्तमा ते धरिजे | अधमा ते अव्हेरिजे | ऐसे काहीच नेणीजे | वसुधा जेवी || गाईची तृषा हरु | अन व्याघ्रा विष होवुनि मारु | ऐसे नेणीजे करु | तोय जैसे ||"
असा सर्वांभुती साम्यावस्थेने पाहणार ... पण हे पटणार कोणाला ... अन आपण तरी पटवुन द्यायच्या भानगडीत का पडा . असो. नुकताच आम्हालाही "भावना दुखावल्या" प्रकाराचा जोरदार चटका बसल्याने आम्ही निराशेने धर्मत्याग केला आहे ... आपण बरे अन आपला विठ्ठल बरा बस्स !!
"तुका म्हणे ह्यांचा संग नव्हे भला | शेधीत विठ्ठला जाऊ आता ||"
_____________________________________ ए गणपत चल दारु ला :D

In reply to by प्रचेतस

त्रोटक झालाय खरा! नेहमीप्रमाणे फार ऐस-पैस लिहिण्यापेक्षा थोडक्यत परिचय करून फ्यावा असा विचार होता. लहान मुलांसाठी हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही!

In reply to by मनिष

चित्रपट परिक्षण असेच त्रोटक हवे. सखोल परिक्षणात परिक्षकाची वैयक्तिक मते मांडण्यात येवून त्याचे समिक्षेत रूपांतर होते. चित्रपट चांगला आहे. पहा पण चित्रपटग्रुहातच.

In reply to by प्रचेतस

>>>>चित्रपट परिचय त्रोटक वाटला पण छान लिहिलंय. असेच म्हणतो.कालच विटी दांडू पाहिला. -दिलीप बिरुटे

चित्रपट पाहिला ..... खुप आवडला आम्ही गेलो तेव्हा हाउसफुल होता ह्या सिनेमा मधे कुणाच्याही भावना दुखावण्यासारख काहीच नाहिये

चित्रपटाचे नांव असे का? हे एक वेगळेच रहस्य ह्या चित्रपटात आहे आणि प्रेक्षकवर्ग चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी वापरलेले आहे. त्याची उकल व्हायला नको होती. बाकी परिक्षण ठीक आहे. नांवामुळे एक उत्सुकता होती चित्रपटाबद्दल ती मात्र मावळली आणि चित्रपटाने एक प्रेक्षक गमावला.

In reply to by प्रभाकर पेठकर

म्हणने बरोबर आहे, परंतु पिक्चर बघायचा ठरवला की त्या संबधी कुठलीही विश्लेशन वाचायचेच नाही. पिक्चर पहायचा आहे, आजच विट्टी दांडु पाहिला, मस्त मजा आली.

आता एडवर्ड शिमगा येईल तुळचापूरचे बोळ दाखवता येतील. त्यानंतर आईनस्टाईन शिवरात्र -भाऊ दाजी लाडाची मुंबई, बाणगंगा आणि चिँधी गल्ली-चोरबाजार-गोल देऊळ दाखवायला एक निमित्र.

In reply to by कंजूस

कंजूसा, अरे तुला तो यश चोप्रा पंजाबमधली मिट्टी की खुशबू व सरसो की खेती चालते मग हे चालायला काय रे?

कौतुक करतात तेवढा ग्रेट नक्कीच नाही परेश मोकाशी आपण कुणीतरी प्रयोगशील असल्याचा आव आणतात

नावापासूनच मला हा चित्रपट पकाऊ वाटला

In reply to by आशु जोग

प्रत्येक मराठी चित्रपट हा काहीतरी धीरगंभीर कथानक व जगाला,समजाला 'संदेश' देणारा असलाच पाहिजे ही अपेक्षा ह्यांचीही असायची. तुझीही तशीच अपेक्षा दिस्तेय.एक मनोरंजन म्हणून बघ की. दबंग-रावडी राठोडसारखे चित्रपट तुमच्या त्या मल्टिप्लेक्समध्ये पॉप्कॉर्न खात २/३ वेळा बघतोस मग हा चित्रपट बघितल्यावर अशी प्रतिक्रिया का?

एकदा बघायला हरकत नाही. असाच अचानक टीव्हीवर 'चिल्लर पार्टी' बघायला मिळायला होता आणि आवडला होता.

परीक्षण त्रोटक आहे, पण सिनेमा चांगला आहे. अगदीच पकाऊ वगैरे नक्कीच नाही. थेटरात बघावा असाच सिनेमा आहे. प्रत्येक सिनेमा काही धीर-गंभीर विषय घेऊनच यावा अशी अपेक्षा का असते? :)

In reply to by सुहास झेले

एकदम मान्य! :-) पुढच्या वेळेस लिहितांना थोडक्यात लिहीले तरी परीचय इतका त्रोटक होणर नाही ह्याची काळजी घेईन.

सामान्य सिनेमा आहे. मराठी सिनेमा कधी मॅच्युअर होणार आहे कळत नाही. मला तर बर्‍याच वेळा वाटते की दिग्दर्शकांना सिनेमा हे काय मिडियम आहे तेच कळले नाहीये.

In reply to by प्रसाद१९७१

मला तर बर्‍याच वेळा वाटते की दिग्दर्शकांना सिनेमा हे काय मिडियम आहे तेच कळले नाहीये.

In reply to by कपिलमुनी

तुमच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत
उद्या एखाद्या राजकीय पक्षावर टीका केली की तुमचा पक्षाच्या प्रतिक्षेत.. असं म्हणण्यासारखं आहे हे.

In reply to by अनुप ढेरे

अहो , ज्या त्या क्षेत्रामधल्या अनुभवी माणसांवर टीका करताना तारतम्य बाळगणे अभिप्रेत आहे. दिग्दर्शकला हे माध्यमच कळत नाही या सारखी टोकाची विधाने करतात तेव्हा त्यांची मते तरी काय आहेत हे सांगावे . राजकीय पक्षावर टीका करताना विरुद्ध बाजू मांडतात त्याचप्रमाणे इथे टीका करताना त्यांनी चित्रपट कसा असावा हे लिहावे . नुसत ह्याला कळत नाही त्याला कळत नाही चा काय उपयोग !!

In reply to by कपिलमुनी

सिनेमा हा केव्हडा मोठा कॅनव्हास आहे, कीती प्रचंड शक्यता असु शकतात. त्याचा ५% तरी उपयोग केला आहे का दिग्दर्शका नी? आउटडोअर ला शुटींग केलेली नाटके म्हणजे सिनेमा नव्हे. तसेच सिनेमा म्हणजे १ किंवा दिड तासाची टीव्ही चॅनेल साठी तयार केलेली छोटी फिल्म नव्हे.

In reply to by प्रसाद१९७१

सिनेमाची नक्की अशी काय व्याख्या आहे तुमच्या दृष्टीने ते तरी सांगा ? परेश मोकाशीला जे भावलं ते त्याने मांडलं , प्रत्येकाला ते पटेल अस मुळीच नाही पण यावरून
मराठी सिनेमा कधी मॅच्युअर होणार आहे कळत नाही.
मला तर बर्‍याच वेळा वाटते की दिग्दर्शकांना सिनेमा हे काय मिडियम आहे तेच कळले नाहीये.
असे स्टेट्मेंट देणे चुकीचे आहे .
आउटडोअर ला शुटींग केलेली नाटके म्हणजे सिनेमा नव्हे.
आउटडोअर , इनडोअर चा प्रश्न येतोच कुठे ? कथा , पटकथा , संवाद , नेपथ्य, दिग्दर्शन आणि अभिनय असेल तर इन्डोअर सुद्धा चांगला चित्रपट बनवता येतो उदा : कोर्टरूम ड्रामा . मराठे सिनेमा हा पूर्वीच्या अलका कुबल किंवा बेर्डे - सराफ यांच्या विनोदीपटांपेक्षा खूप मॅच्युअर झाला आहे हे मागच्या ५ वर्षामधल्या विषय , तंत्र , जाहिरात आणि कमाई यावरून दिसते.
तसेच सिनेमा म्हणजे १ किंवा दिड तासाची टीव्ही चॅनेल साठी तयार केलेली छोटी फिल्म नव्हे.
मी तर एक - दीड तासाचे खूप चांगले चित्रपट बघितले आहे . लांबी हा चित्रपट चांगला असण्याचा निकष असेल तर मग _/\_
सिनेमा हा केव्हडा मोठा कॅनव्हास आहे, कीती प्रचंड शक्यता असु शकतात. त्याचा ५% तरी उपयोग केला आहे का दिग्दर्शका नी?
हॉटेलमधे आहे ते सर्व खायचे का ? कि मॉल मधल्या सर्व वस्तू विकत घ्यायचया ? सर्व घटक घुसडले तर खिचडी , काला झाला असता .. असो .

उत्तम आहे. कुणाच्याही भावना दुखावल्या जाव्यात असं काहीही या चित्रपटात नाही. एलिझाबेथ हा शब्द उत्सुकता चाळविण्यासाठी वापरला असेल तरी मला त्यात गैर वाटत नाही. काही जण असंही म्हणतात कि काहीतरी वेगळं केल्याचा आव मोकाशी आणतात. भौ.. वेगळं तर करतातच ना. हरिशचंद्रसुद्धा चांगल्या अर्थाने वेगळाच होता. बोंबीलवाडीसुद्धा वेगळे होते. बल लगानेसे कार्य होता है... गोष्टी येतात पण आपल्याकडे ते गुरुत्वाकर्षण हवं... किती सुंदर मेसेज सहज दिलाय. आणि तरीही ज्यांना आवडला नाही त्यांना तो फक्त दीड तासच सहन करावा लागला असेल त्यात काही फार नुकसान नाही.

कुणाच्या भावना कशाने दुखावल्या जातील काही नेम नाही. दुखावल्या गेल्यात हे कळायची तरी बुद्धी असते का अशी शंका येते. नॉनसेन्स

कालच चित्रपट बघितला. नाही आवडला. आपणही सगळे कष्ट करून आपल्या परीने पैसे उभे करायचा प्रयत्न करतच असतो.फक्त आपला आकडा ५ हजार नसतो तर मोठा असतो.तेव्हा आपल्या आयुष्यात आपण जी गोष्ट करतच असतो तीच गोष्ट वर पैसे देऊन पडद्यावर बघायला मला स्वतःला अजिबात आवडत नाही.भले ती त्या चित्रपटाची मुख्य थीम नसली तरी.

परेश मोकाशींकडून बर्‍याच अपेक्षा आहेत. पण त्यांचा चित्रपट तेवढा भावला नाही. कथा पडद्यावर उलगडवताना पंढरपूर देवस्थान आणि त्या नजीक घडणार्‍या बर्‍याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न चांगला आहे. बाल कलाकारांचा अभिनयही चांगला आहे. पण पटकथा तितकी खरीखूरी वाटली नाही.

कालच एलिझाबेथ एकादशी पाहिला ! आवडला !! आगळी-वेगळी कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, सर्व कलाकारानी जीव ओतून केलेला अभिनय या मुळे सिनेमा मस्त झालाय! वाडा-गल्लीबोळांचे आजपर्यंत कधीही चित्रीत न केले गेलेले पंढरपुर दर्शन, वारी हे एक या सिनेमाचे खास वैशिष्ट्य. सिनेमा रसिक प्रेक्षक आणी समिक्षक दोघांच्या ही पसंतीस उतरत आहे ही दिलासा देणारी गोष्ट !