✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नास्तिक आणि विकृती

A
arunjoshi123 यांनी
Tue, 09/09/2014 - 16:24  ·  लेख
लेख
संकल्पना: नास्तिक म्हणजे कोण? तर मूलतः ईश्वर न मानणारे. म्हणजे हे जग निर्मिणारी, चालवणारी कोणी शक्ती नाही नि तिला अभिप्रेत असे कोणते संकेत जगात नाहीत असे मानणारे लोक. हे लोक बाकी काही मानोत न मानोत, इतके तत्त्वज्ञान तरी जरूर मानतात. आता अस्तिक म्हणजे कोण? तर देव म्हणून कोण्या शक्तीने जग निर्माण केले, ती ते चालवत आहे, ते कसे चालावे याचे तिला अभिप्रेत असे संकेत आहेत असे मानणारे लोक. हा देव नक्की काय आहे, कसा आहे आणि हे संकेत कोणते आहेत याबद्दल अस्तिकांत प्रचंड घोळ आहेत, भांडणे देखिल आहेत. पण असे काही ना काही देव नावाचे प्रकरण आहे हे मात्र नि:संशय आहे. दोन भिन्न प्रकारच्या अस्तिकांमधील भांडणांचे स्वरुप मुख्यतः माझा देव, धर्म जास्त चांगला कि तुझी जास्त अशा प्रकारचे असते. परंतु तरीही सर्वसाधारणपणे ईश्वर हा अनादि आहे, अनंत आहे, दयाळू आहे, त्याचे नियंत्रण असते, इ इ ते मानतात. प्रत्येक गोष्टीचा संदर्भ ते ईश्वरामधे देतात. असं का, तसं का तर देवाला अभिप्रेत आहे म्हणून. देवाचा स्रोत, त्याच्या गुणधर्मांचा स्रोत इत्यादिंबद्दल नास्तिकांनी विचारले असताना ते सार्‍या भौतिक संकल्पना ईश्वरास गैरलागू आहेत म्हणून त्यांची बोळवण करतात वा वर्तुलीय संदर्भ देतात. आजपावेतो जगात हमेशा बहुतांश लोक अस्तिक राहिले आहेत नि त्यांचे वर्तन संतोषजनक राहिले आहे काय याचे उत्तर प्रत्येकजण भिन्नपणे देऊ शकतो. ते एक असो. मूल्यांचा स्रोतः परंतु सांप्रत (चांगल्या) मानवी मूल्यांचा स्रोत काय असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर पटकन देणे थोडे कठीण वाटते. गुणसूत्रे? ईश्वर? गुणसूत्रे ही मानवी सन्मूल्यांचा आधार मानायला जावीत तर एक दोन समस्या येतात. पहिली म्हणजे मूल्ये जितकी धडाधड बदलत आहेत तितक्या वेगाने जीन्स बदलत नाहीत. गेल्या शतकात प्रचंड वेगाने मूल्ये बदलली आहेत. अगदी व्यक्तिची चांगली मूल्ये म्हणजे काय ते त्याचं चांगुलपण किती हे देखिल खूप बदललं आहे. पण गेल्या शतकात मानवाचे जैविक म्यूटेशन्स होऊन ही मूल्ये बदलली आहेत म्हणणे धाडसाचे ठरेल. दुसरे म्हणजे मानवाची गुणसूत्रे काही लाख वर्षांपासून तीच आहेत. त्यांत मूल्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समाविष्ट आहेत असे म्हणायचे झाले तर मग मानवाची बरीच मूल्ये ही सनातन आहेत हे मान्य करावे लागेल. ही मूल्ये कोणती हे शोधावे लागेल आणि आपण स्वतःत जो मूल्यबदल करवून घेत आहोत तो प्राकृतिक आहे वा नाही हा प्रश्न अभ्यासावा लागेल. कोणता एखादा मूल्यबदल प्राकृतिक नसल्यास तो इष्ट आहे वा नाही याबद्दल समाजात (जसे जी एम फूडबद्दल होते तशी) चर्चा व्हायला हवी. ईश्वराचे म्हणाल तर अस्तिकांचे हे सोपे उत्तर आहे. नास्तिकांसाठी मात्र तो पर्याय नाही. नास्तिकांसमोरची समस्या: अस्तिक लोकांसाठी मूल्यस्रोत ही समस्या तितकीशी कठिण नाही, कारण ईश्वर नि ईश्वरप्रणित मूल्ये सनातन नि शाश्वत आहेत असे ते मानतात. कोणत्याही का चे उत्तर ते प्रचंड गोलगोल देतात. सन्मूल्यांचा स्रोत निश्चित माहित असला तरी त्याचा अर्थ अस्तिकांना नेहमी नीट लावता येत नाही. पण त्याची आवध्यकता क्वचित पडते. प्रश्न उरतो नास्तिकांचा, त्यांची मूल्ये काय असावीत आणि का? मानवी शरीराची आणि मनाची एक जैविक घडण आहे. त्यातून (तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे त्यापलिकडे) सुटका नाही. मग उरते ते उत्स्फूर्त वर्तन. ते कोणत्या दिशेने असावे? मास्लोच्या पिरॅमिडचा पाया जैविक गरजांचा आहे. त्या पूर्ण करताना कोणती सीमा बाळगायची? कोणती नाही? मास्लोचे वरचे मनोरे जैविक आहेत कि नाहीत? ते पूर्ण करायचे कि नाही? आणि त्यासाठी कोणत्या स्तराला जायचं? त्याच्या सीमा स्वतःच आखायच्या? कोणत्या सूत्रांनी? हे वर्तन अस्तिकांचे मते "अग्राह्य (and in extreme case pervert)" ठरले तर? अपवादः अगदी अस्तिकवाद्यांच्या कळपात, ते ज्या इतक्या दयाघन इश्वराला मानतात, तिथे ईश्वरप्रणित संकेताप्रमाणे वागण्याचा अतिरेकी अट्टाहास आणि चूकीचा अन्वयार्थ, भलत्याच विकृती घेऊन आला आहे. मग जेव्हा पृथ्वीवर मूळातच ज्या तत्त्वज्ञानाचा आधारच "निर्मूल्यावस्था" आहे, ते किती विकृती घेऊन यायची संभावना आहे? अस्तिकांमधे आपले राजकीय, आर्थिक स्वार्थ साधणारे नास्तिक लपून बसलेले असतात. त्यांचा स्वतःचा देवावर, पापपुण्यावर विश्वास नसतोच, पण ते देवाच्या नावाखाली लोकांना नाडतात. नास्तिकांतही बरेच नास्तिक खरे नास्तिक नसतात. देव नाही तर मग जग कसं आहे याच्यावर त्यांची ४-५ वाक्यांनंतर ततपप होऊ लागते. स्वतःस नास्तिक भासवणारे लोक स्वतःच्या वाणिज्यिक हितांसाठी समाजास नास्तिक बनवत असू शकतात. उदाहरणार्थ, मुसलमानाची धर्मातली श्रद्धा गेली तरी तो (बाजारातली) दारू प्यायची जास्त असते. या चर्चेत मला हे अपवाद चर्चिणे टाळायचे आहे. (कोणाला हीच चर्चा करायची असेल तर अशुद्ध अस्तिकता वि शुद्ध नास्तिकता अशी करू नये. व्यवहारातल्या अशुद्ध नास्तिकता आणि अशुद्ध अस्तिकता यांचीच तुलना करावी) बहुतांश लोक त्यांचे त्यांचे तत्त्वज्ञान सरल, लौकिक अर्थाने पाळतात. या पार्श्वभूमीवर "सामान्य नास्तिक" इतर सामान्य व्यक्तिपेक्षा (आता आजच्या मूल्यांच्या परिप्रेक्ष्यात म्हणावे लागेल)गैरवर्तन करण्याची अधिक संभावना आहे का असे विचारले तर उत्तर सत्कृतदर्शनी हो असे दिसते. इतिहासः नास्तिकांचा, स्वतःस तसे म्हणवणार्‍या वा न म्हणवणार्‍या, इतिहास अस्तिकांपेक्षा खूप महान राहिला आहे. अगदी बौद्धिक, यशाच्या संबंधित बाबी वगळल्या तरी नास्तिक लोक इतिहासात केवळ वर्तनाच्या बाबतीत महान राहिले आहेत. बाबा आमटे यांचे उदाहरण घेता येईल. पण अशा नास्तिकांचे सृजन हे आजपावेतो अस्तिकांच्या व्यवस्थेतील अनर्थांना कंटाळून किंवा खास त्याला विरोध करण्यासाठी झाले आहे. पश्चिमेतही नास्तिकांनी केलेली लोकसेवा वाखाणण्यासारखी आहे. त्याला टेक्निकल अँगल कमी आणि सामाजिक अँगल जास्त राहिला आहे. नास्तिक राहिलेच आहेतच अत्यल्प. त्यामुळे नास्तिक म्हणजे "ईश्वर मानणारांच्या मांदियाळीतली लूट पाहून निषेध करणारा" इतकेच समजते. कधी कधी असे वाटते या लोकांना केवळ या लूटीविरोधात ओरडायचे होते, त्यात त्यांना ईश्वर आहे कि नाही या टेक्निकल आर्ग्युमेंट मधे काही रस नव्हता. पण समजा उद्या नास्तिकच जगात ९०-९५% झाले तर? नाते: अस्तिक लोक सारे काही(सजीव, निर्जीव) ईश्वरापासून आले आहे असे मानतात. साधारणतः त्यांना जगात सर्व गोष्टींत एक 'इंटेंडेड' कनेक्ट आहे असे म्हणायचे असते. अशा कनेक्टचे जे काही रुप आहे त्याचा त्यांना आदर असतो. नास्तिकाचे काय म्हणणे असते? एकूण जगच एक रँडम उद्भव आहे नि आपण त्यात एक रँडम घटक आहोत. आपण, आपले अस्तित्व, आपले गुणधर्म, मानवी देहामनाचे, जीवनांचे स्वरुप, हे सगळे रँडम ठरले आहे. हेच असंच सगळ्या आजूबाजूंच्या सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींचं आहे. निसर्गाचे काही कारणांनी काही नियम आहेत आणि त्यामुळे हे सगळं असं आहे. मग नास्तिकाचं अशा इतरांशी ममत्व कोणत्या स्वरुपाचं असेल? असेल का? आत्मोन्नती, अव्याहत आत्मोन्नती हीच मानवी प्रेरणा असेल तर तिच्या आपूर्तिसाठी काही करताना कुठे थांबावं हे कसं ठरवावं? भविष्यः समजा नास्तिक लोकच (९०-९५%) जगात सर्वत्र आहेत. (असं मानणं फार अग्राह्य नाही. आजच लोक देव, धर्म फार नॉमिनल लेवलवर मानतात. त्यांना फार जास्त विचार करायला वेळ नाही. केवळ लेगसी आहे म्हणून स्वतःस अस्तिक म्हणतात. पण अस्तिकत्वाचे/धर्माचे तत्त्वज्ञान, नियम, अटी, इ इ शी लोकांचे नाते तुटत चालले आहे. एक-दोन पिढींनंतर देव मानतो म्हणणाराची मते देखिल अगदी उथळ असतील. काळाप्रमाणे आपल्या वर्तनात ईश्वराला जर कोणी नेहमी बाजूला ठेवत असेल तर त्याला ठिकपणे अस्तिक म्हणता येणार नाही.) समजा अस्तिक फार कमी आहेत, नाहीत किंवा असले तरी भाष्य करावं असं काही गैर वागत नाहीत. मग नास्तिकांची पहिली प्रेरणा -अस्तिकांचे जे काही वाइट आहे त्याचा विरोध करत राहणे - ती नसेल. त्यानंतर दुसरी प्रेरणा म्हणजे समाज, त्याचे वर्तन, त्याचा इतिहास. आता ते देखिल अभ्यासाचा विषय झाले, प्रश्नांकित झाले, तर काय होणार? नास्तिकांना आपल्या स्वतःच्या अशा मूल्यांची गरज पडणार. त्यातले पहिले मूल्ये येते वैज्ञानिक सत्ये! पण वैज्ञानिक सत्ये प्रत्यक्ष जीवनात सारे मार्गदर्शन करण्यासाठी पुरेशी नसतात.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
27492 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

मूल्ये बनण्यासाठी

मार्मिक गोडसे
Wed, 09/10/2014 - 11:33 नवीन
मूल्ये बनण्यासाठी आस्तिक व नास्तिकचा संबंध कसा येतो. लेखाचे शिर्षक " नास्तिक आणि विकृती" असे का ठेवले ते समजले नाही. मुल्य बनवायच्या प्रक्रियेत नास्तिकांमुळे अडथळा येतो असे तुम्हाला वाटते काय? ईश्वर न मानणारे म्हणजे नास्तिक असे तुम्हाला कोणी सांगितले ?
  • Log in or register to post comments

मूल्ये बनण्यासाठी आस्तिक व

arunjoshi123
Wed, 09/10/2014 - 13:34 नवीन
मूल्ये बनण्यासाठी आस्तिक व नास्तिकचा संबंध कसा येतो.
अर्थशास्त्री जगाच्या धावपळीचं कितीही वर्णन करोत, प्रत्येक माणूस नेहमी 'आपण आणि विश्व (कोण, काय, कसे, इइ)' विचार थेट, अप्रत्यक्ष करत असतोच. या प्रश्नांची किमान चौकट बसवल्याशिवाय आयुष्यातले कामाचे निर्णय देखिल घेता येत नाहीत. प्रत्येक माणूस स्वतः सारा विचार करत नाही, तो फक्त समाज वागतो तसे वागतो. पण वागण्याचे निर्णय कसे घ्यायचे हे कधी ना कधी पूर्वजांनी नि सुधारकांनी 'साराच्या सारा विचार करून' ठरवले आहेत. सबब माणसाच्या प्रत्येक वागण्यात, मूल्यात - स्व आणि विश्व यांचं- एकूण ज्ञान/विचार/गृहितकं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आहेत असे वाटते. ------------------ उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. मला तहान लागली आणि माझ्याकडे पाणी आहे तर मी पिईन. हे जैविक आहे नि यात मूल्याचा संबंध येत नाही. पण माझ्या दारी कोण्या तहानेल्या माणसाने मला पाणी मागितले तर मी काय करावे? मी त्याला पाणी का द्यावे? असे करण्यास कारणच नाही म्हणून मी तसे करणार नाही. दुसरीकडे समजा असे पाणी दिल्याने योग्य वेळी सर्व (कधी मला स्वतःला सुद्धा) तहानेल्यांना मदत होते असा संकेत आहे. मग हा संकेत मी का पाळावा? प्रामाणिकपणे का पाळावा? "मदत करावी अशी आत्मिक वृत्ती असणे" वेगळे आणि "व्यवस्थेचा भाग म्हणून आपला कमित कमी शक्य मदत यांत्रिकपणे करणे" वेगळे. माझ्यामते दुसरी व्यवस्था ही हाईली प्रोन टू करप्शन, फेल्यूअर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

एक शेतकरी पोळ्याला

मार्मिक गोडसे
गुरुवार, 09/11/2014 - 12:10 नवीन
एक शेतकरी पोळ्याला बैलाची पूजा करतो व वर्षभर त्या बैलाकडून शेतीची कष्टाची कामे करुन घेतो. (पुर्वपार तसे चालत आले आहे म्हनून) दूसरा शेतकरी पोळ्याला बैलाची पूजा करत नाही परंतू भूतदयेमुळे बैलाकडून शेतीची कष्टाची कामे करून घेण्याऐवजी तो ट्रॅक्टरचा वापर करतो. दूसर्‍या शेतकर्‍याने परंपरा मोडली, पहील्याने टिकवली. तुमच्या मते कोणाची कृती योग्य आहे ? ह्यातील कोणता शेतकरी तुमच्या मते आस्तिक किंवा नास्तिक आहे ? व का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

सोपे उत्तर

हुप्प्या
गुरुवार, 09/11/2014 - 03:17 नवीन
माणूस हा समूहाने रहाणारा प्राणी आहे. अशा प्राण्यांमधे इतरांना मदत करण्याची उपजत प्रवृत्ती असते. एखाद्या तहानलेल्याला मी पाणी दिले तर उद्या मी तहानलेला असताना मलाही कुणी पाणी देण्याची शक्यता आहे असा तर्कशुद्ध हिशेब आहे. माझी प्राणीजात टिकली तर मी टिकण्याची शक्यता जास्त आहे असा ह्यामागचा विचार आहे. लहान मूल, वृद्ध ह्या लोकांना मदत करावी असे बहुतेक सगळ्या संस्कृतीत आढळते. ईश्वर मानण्यामुळे, धर्म मानण्यामुळेच हे होते असे मानणे भोळसटपणाचे आहे. आपल्या जातीची नवी पिढी असहाय असेल तर मी त्या गटाला मदत केली पाहिजे. तरच ती जात टिकून राहिल. किंबहुना ज्या समूहाने रहाणार्‍या, तुलनेने दुर्बळ असणार्‍या प्राण्यांमधे अशी उपजत बुद्धी (इन्स्टिंक्ट) नव्हती ते कालांतराने नामशेष झाले. तेव्हा दया, सहानूभूती. अनुप्रीती ह्या भावना निव्वळ धार्मिक, आध्यात्मिक नसून त्यांना एक व्यावहारिक बैठक आहे.
  • Log in or register to post comments

+१

कवितानागेश
गुरुवार, 09/11/2014 - 12:23 नवीन
तेव्हा दया, सहानूभूती. अनुप्रीती ह्या भावना निव्वळ धार्मिक, आध्यात्मिक नसून त्यांना एक व्यावहारिक बैठक आहे>> अगदी पटतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

मग हे ही पटेल की...

चौकटराजा
गुरुवार, 09/11/2014 - 16:06 नवीन
काम ,क्रोध, मोह, मद ,लोभ मत्सर हे माणसाचे शत्रू नसून ते मानव काय सर्वच जीवांचे एक अविभक्त असे वैशिष्ट्य आहे.त्यांचे अस्तित्व हे अपरिहार्य व जगाचा गाडा चालायला आवश्यक ही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

क्या बात

विवेक्पूजा
गुरुवार, 09/11/2014 - 11:25 नवीन
+१११
  • Log in or register to post comments

नानासाहेब नेफळे - स्त्रोत

arunjoshi123
गुरुवार, 09/11/2014 - 22:57 नवीन
नानासाहेब नेफळे - स्त्रोत निर्जीवच आहे मार्मिक - मूल्ये बनण्यासाठी आस्तिक व नास्तिकचा संबंध कसा येतो. हुप्प्या - माणूस हा समूहाने रहाणारा प्राणी आहे. अशा प्राण्यांमधे इतरांना मदत करण्याची उपजत प्रवृत्ती असते. चौकटराजा - काम ,क्रोध, मोह, मद ,लोभ मत्सर हे माणसाचे शत्रू नसून ते मानव काय सर्वच जीवांचे एक अविभक्त असे वैशिष्ट्य आहे.त्यांचे अस्तित्व हे अपरिहार्य व जगाचा गाडा चालायला आवश्यक ही आहे.
आपण सर्वांना मला एक प्रश्न करावा वाटतो. पदार्थामधे भौतिक गुणधर्म कोठून येतो? कारण आपण सर्वांनी निर्जीव स्रोतामधून मानवाकडे ईष्ट ते गुणधर्म आले आहेत वा जे काही गुणधर्म आले आहेत ते इष्ट आहेत असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सुचित केले आहे? ईश्वर नसेल तर संयोगवश जगातले काही पदार्थ (इलिमेंटस म्हणा वा त्याहून लहान मोठी समान वा भिन्न जिनसा म्हणा)एकत्र आले असे म्हणावे लागते. त्यांच्या संयुंगाचे वा संयुगसमूहाचे किचकटीकरण होत गेले. शेवटी असा संयुगसंच तयार झाला ज्याला आज आपण माणूस म्हणतो. उदाहरणार्थ मी जेव्हा मला राग आला म्हणतो तेव्हा मला उद्दिपित करणारी सारी जैविक न्यूरोट्रान्समीटर्स, माझ्या बदललेल्या गती, इ इ जे काय ते पुरेसे वर्णन केले तर त्या भौतिक वर्णनाच्या पलिकडे माझ्या क्रोधाला काही नैसर्गिक अर्थ नाही असे होते काय? निसर्गात राग असं काही नाहीच, आणि एक विशिष्ट प्रकारच्या भौतिक घटनांना आपण राग हे नाव ठेवलं आहे असं आहे का? असंच सगळ्याच गोष्टीचं?
  • Log in or register to post comments

निसर्गात राग असं काही नाहीच,

कवितानागेश
Fri, 09/12/2014 - 00:02 नवीन
निसर्गात राग असं काही नाहीच, आणि एक विशिष्ट प्रकारच्या भौतिक घटनांना आपण राग हे नाव ठेवलं आहे असं आहे>> नक्की माहित नाही हेच खरं उत्तर आहे. अजून तरी स्पष्टपणी भावनांचा स्त्रोत समजलेला नाही. 'निसर्गात भावना नाहीत' या पेक्षा 'निसर्गात भावना आहेत की नाहे, हे अजून नक्की सापडलेलं नाही' असं म्हणता येइल. त्यामुळे विकृती नक्की का तयार होते, हे सांगणं देखिल कठीण आहे. त्यामुळे तिचा नास्तिकतेशी/आस्तिकतेशी संबंध असू शकेल असं वाटत तरी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

आपल्याला काही गोष्टी क्लीअर

नानासाहेब नेफळे
Sat, 09/13/2014 - 21:48 नवीन
आपल्याला काही गोष्टी क्लीअर नसाव्यात, राग हा emergent phenomenon आहे, whole is greater than sum of its parts असे तत्व जाणीवेच्या(consciouness) बाबतीत लावता येते. या न्यायाने राग हा neuronal processपर्यंत व अगदी क्वांटम मेकॅनीक्सपर्यंत causally रिड्युस करता येईल, परंतु राग एक इमर्जंट' प्रॉपर्टी' आहे ,या अनुषंगाने property dualism सर्च करुन बघा. http://www.wikipedia.org/wiki/Emergentism स्वाध्याय कमी पडतोय, कृपया वाढवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

whole is greater than sum of

बॅटमॅन
Sat, 09/13/2014 - 21:57 नवीन
whole is greater than sum of its parts असे म्हटले की मग याचे कारण देव आहे अशी तर्कटे येतील, तयारीत र्‍हावा नेफळेसाहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

मी लिंक दिलेली आहे, त्यावरुन

नानासाहेब नेफळे
Sat, 09/13/2014 - 22:15 नवीन
मी लिंक दिलेली आहे, त्यावरुन जो तो निष्कर्ष काढू शकतो. emergence असतो, emergent phenomenon's like consciousness, are causally reducible to material stuff, but not ontologically. असे तत्व आहे.यातूनच 'प्रॉपर्टी' डेव्हलप होते.एखाद्याला यात देवच शोधायचा असल्यास शोधू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

क्रोध किंवा जाणिव यासारख्या

arunjoshi123
Mon, 09/15/2014 - 11:50 नवीन
क्रोध किंवा जाणिव यासारख्या उद्भवी प्रक्रिया या द्रव्यकारणपरत्वापर्यंत अभ्यासिता येतात, परंतु अस्तित्वशास्त्राने नव्हे असे म्हणत पुढे यात देव पाहायचा तर पाहा म्हटले तर मी काय म्हणू. अस्तित्वशास्त्र (शास्त्र, तत्त्वज्ञान नव्हे) काय म्हणते? जगात कशाचाही (भावना, मूल्ये जाऊच द्या; अगदी द्रव्याचा उद्भव कसा होतो?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

शोधाचं स्टॅटस हेच असेल तर

arunjoshi123
Sat, 09/13/2014 - 15:32 नवीन
शोधाचं स्टॅटस हेच असेल तर किमान आज तरी मी कस्साही वागलो तरी मला दोषी ठरवता न यावं.
  • Log in or register to post comments

अरुणजी , माझेही दोन शब्द

vikramaditya
Sat, 09/13/2014 - 21:01 नवीन
अनेक लोक नैसर्गिकरीत्याच (उपजत) देव, धर्म, कर्मकांड मानत नाहीत. यात काहीच गैर नाही. व्यक्ति तितक्या प्रक्रुती. यांचे बरेचदा असे असते की "मला यात गोवु नका, तुमचे काय ते चालु द्या." हा एक भाग झाला. परंतु कधी कधी काही प्रसंगी त्यांना फार ठामपणे हा पवित्रा घ्यावा लागतो. अशा वेळी त्यांना majority मध्ये असलेल्या तथाकथित आस्तिकांकडुन हेटाळणी, कुचेष्टा वगैरे सहन करावी लागते. यातील काही लोक इतरांची मने कशाला दुखवा वगैरे विचार करुन निर्विकार पणे धर्मविधिंमध्ये सामील होतात. जरी त्यांचे मन त्यात रमले नाही तरी आपले आक्षेप ते स्वतः कडेच ठेवतात. काही लोक मात्र ह्याला कडाडुन विरोध करतात आणि आपल्या मताशी प्रामाणिक राहतात. आता त्यांना सर्वसाधारण पब्लिक "नास्तिक" म्हणुन ओळखु लागते.इथुन एक वेगळा अध्याय सुरु होतो. आता ह्या लोकांना आपल्या "समाजाने ठरवलेल्या नास्तिकतेची" झींग चढते. बहुसंख्य असलेल्या आस्तिकांमध्ये, आपण वेगळे आणि स्पेशल आहोत आणि नास्तिक असणे हीच आपली आयडेंटटीटी असल्याचा त्यांना साक्षात्कार होतो. प्रत्येक गोष्ट तर्काच्या आधारावर तपासुन बघण्याचा त्यांचा खरा मूळ मुद्दा बाजुला पडतो आणि नास्तिकतेचे डंके पिटण्याचे कार्य सुरु होते. कुठलाही मुद्दा, चर्चा घुमवुन फिरवुन नास्तिकतेकडे आणुन "बघा बघा मी कसा तर्कनिष्ठ आहे आणि देव बीव झुठ आहे" हे सतत सांगण्याकडे कल जातो. मग समजा एखाद्या सांजवेळी एखाद्या छोट्याश्या देवालयात समईच्या मंद प्रकाशात कोणीतरी म्हणत असलेली रामरक्षा वा एखादे आर्त भजन ऐकुन त्यांच्या पापण्या क्षणभर ओलवल्या तरी हे कबुल करणे आता त्यांना शक्य नसते. कारण नास्तिकतेचा पांघरलेला झगा त्यांनी आता क्षणभरही दूर करणे म्हणजे स्वतःच्या इमेजला तडा जावु देणे होय. आस्तिकांच्या कर्मठपणावर टीका करणारे स्वतःच हेकेखोर आणि अप्रामाणिक बनतात.
  • Log in or register to post comments

तुमचा प्रश्न आणि इथले सगळे प्रतिसाद, एका ओळीत इतकंच आहे का?

संजय क्षीरसागर
Sat, 09/13/2014 - 21:03 नवीन
देव न मानणार्‍याची वॅल्यू सिस्टम काय असते?
  • Log in or register to post comments

हा हा हा. अगदी नेमके सार

बॅटमॅन
Sat, 09/13/2014 - 21:46 नवीन
हा हा हा. अगदी नेमके सार काढले आहे. पण धागाकर्त्यास असा प्रश्न पडलेला नसून, त्यांनी देव न मानणारा = कुठलीही मूल्यव्यवस्था न मानणारा असा प्रचंड विनोदी निष्कर्ष काढलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>>> प्रचंड विनोदी निष्कर्ष

प्यारे१
Sat, 09/13/2014 - 22:06 नवीन
>>> प्रचंड विनोदी निष्कर्ष काढलेला आहे. अगदी. फक्त विनोदी असंच म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पडलेला नसून??????????????????

arunjoshi123
Mon, 09/15/2014 - 11:52 नवीन
पडलेला नसून?????????????????????? मूल्ये काय आहेत आणि का आहेत हे दहादा तरी लिहून झाले आहे आतापर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लिहायाला वेळ नाही म्ह्ण्णून

अंतरा आनंद
Mon, 09/15/2014 - 16:37 नवीन
लिहायाला वेळ नाही म्हणून उत्तराला उशीर झालाय . थोड विस्क्ळीतही आहे. पुन्हा मुद्दा काय? तर (1) देव बदला मूल्ये बदलतील. (2) देव नसेल तर RANDOM PROGRAMMING होऊन गोंधळ माजेल . RANDOM PROGRAMMING म्हणजे काय आणि ते कोण करणार ? निसर्गच ना ? मग विकृती येणं येईल कुठून ? माझ्या आधीच्या प्रतिसादात हे मी म्हटलं आहे. मी नास्तिक असेन तर माझी कृत्यं ही मी माझ्या जबाबदारी वर करेन . ‘जोपर्यत ---- हरकत नाही` हे तुमचं वाक्य आस्तिकांच्या बाबतीत “जोपर्यंत माझ्या वर्तनाची जबाबदारी घेणारा वर बसलाय--- हरकत नाही’ असं बदलता येतं. मग हिंदूच्या बाबतीत तर मागच्या जन्माची फळं / पूढ्यच्या जन्माची भोगना वैगेरे गोष्टी आहेत. ह्या सर्व गोंधळात आस्तिक त्यांच्या कोणत्याही कृत्याच समर्थन करू शकतात. “निसर्गाच्या कडक... सार्वभौम वाटू असेच ते नियम आहेत “ हे तुमचं प्रतिसादातलं वाक्य. निसर्गाचे कुठलेच नियम असे नाहीत की माणूस स्वत:ला सार्वभौम समजेल . कुठले आहेत सांगाल? इथे आपण सर्व ऊहापोह करताना विद्यान म्हणजे भौतिक, रासायन वैगेरेचाच विचार का करतोय ? सृष्टीविज्ञानही आहेच ना. त्याच्याही उपशाखा आहेतच. सृष्टीतील घटकांचे एकमेकावरील अवलंबित्व आणि एकमेकानां होणारा ऊपयोग ह्याचं महत्व अभ्यासणार्‍या शाखा ही आहेत. मग माणूस स्वत:ला सार्वभौम कसा समजेल? “आजच्या....विश्वास उडाला “ हे वाक्य मुळातच चुकीचं आहे. कुठल्याही पाठ्यपुस्तकात ईश्वर नाही ही शिकवण नाही . माझ्या मुलीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात फक्त देवावरच्याच कविता आहेत. देव नाही असे सांगू शकणे हे समाजातही अलिकडे जास्त प्रतिष्ठेचे व बुद्धिमत्तेचे निदर्शक बनले आहे, त्याउपरी देवाशी जोडून टाकलेल्या अनेक बिनमहत्त्वाच्या आणि अनिष्ट पारंपारिक संकल्पनांचा तंत्रज्ञानाने फुगा फोडल्याने लोकांचा देवावरचाच विश्वास उठत आहे. असं नसून हल्ली प्रत्येकाला गुरु असतात. मी कॉलेजला असताना देवळात जायचं झालं तर कोणी बघेल, हसेल असं वाटायचं. आता देवाच्या रांगेत कॉलेज्कुमार/री च जास्त आढळतील. माझ्या आईपेक्षा माझ्या पुढच्या पिढीतले लोकं जास्त धार्मिक आहेत . आणि वाईट म्हणजे आपल्या कुठल्याच वर्तनाचा विचार करण्याची त्यांची तयारी नाही तर “जाऊदे ना काय बिघडतय ? करायचं प्रथा म्हणून “ हा विचार असतो जो मला घातक वाटतो. आणि तुमच्या परंपरांना धक्का बसेल म्हणून शास्त्राने शोधही लावू नयेत काय? नुकतेच आलेलं जील बोल्त टेलर या मेन्दूविकाराच्या डोक्टरने ब्रेन हॅमरेजला सामोरं गेल्यावर लिहीलेलं "my stroke of insight" हे पुस्तक वाचलतं तर ध्यानधारणा वैगेरेवरचाही उहापोह सापडेल आणे ते काय याचीही उत्तरे शास्त्राच्याप्रमाणे मिळतील. “ ईश्वर आहे, त्याला अभिप्रेत असे शाश्वत चांगले आणि वाईट आहे, एकतर ते काय आहे हे आपल्या इंस्टिंक्टमधे आहे किंवा त्याचा शोध चालू आहे असे म्हणणे जास्त श्रेयस्कर नाही का? नाही कारण तो आहे म्हटलं की तो कसा आहे आणि त्याला काय अभिप्रेत आहे ह्यावर एकाच धर्मातही मतमतांतरे आहेत. आणि वैद्यांनिक प्रगती झाली तरी ही मतांतरे कमी होण्या ऐवजी वाढता आहेत. देव बदला मुल्ये बदलतील हे वाक्य वेगळ्या अर्थाने खरय माझा देव ब्रह्माहा, विष्णू, महेश आहे का आकाशातला बाप आहे का अल्ला आहे की आजून कोणी आहे यावर माझी जगण्याची मुल्ल्ये ठरत असतील तर ती केवळ निसर्गनियमावर ठरवणायाला देणारं नास्तिकपण ईष्ट आहे. वर कोणीतरी म्हटलयं की देव नाही हे सांगण्यासाठी नास्तिक तांडव करतात. (१) चार्वाकापासून आताच्या "देव रिटायर करा" म्हणणार्‍यांपर्यंत सगळय़ांचे पंथ-उपपंथ किती? कोणत्या गोष्टी त्यांच्यामुळे समाजावर लादल्या गेल्या? (२) कोणते नास्तिक "देव नाही" हे लाउड्स्पीकरवर ओरडून, ढोल ताशे बडवून सांगतात? रहदारी अडवणारे मंड्प घालून "देव नाही" यावर प्रवचने देतात? आस्तिकच ’हा देव खरा तो खोटा म्हणत एक्मेकांच्या देवांना पाण्यात बघतात. नास्तिकांना त्याची गरज नसते. नास्तिक लोकांची एक कलेक्टिव फिलॉसोफी असेल का? तर हो. ती काय? देव नाही...बिग बँग्...उत्क्रांती...मास्लो...भौतिकशास्त्राचे नियम...सार्‍या शास्त्रांचे सारे नियम्...स्वतः केलेली सारी निरीक्षणे...त्यातून काढलेले अर्थ. सगळे नास्तिक एकजात शास्त्रज्ञ असतात का ? गरज नाही ना. "जगा आणि जगू द्या" हे कोणत्याही कळपाने राहाणार्‍या प्राण्यांचे मुख्य मुल्य़ तेच नास्तिकांचे असेल हे तरी मानण्यास तुमचा विरोध नसावा. आस्तिक मात्र "ज्याच्या निष्ठा माझ्या नुसार तोच जगायला पात्र" असं मानतात. मग कोणी सुरा काढून मारतात, कोणी निंदेने तर कोणी मीच श्रेष्ठ हे दाखवून एवढाच काय तो फरक.
  • Log in or register to post comments

या धाग्यावर चाललेली गहन चर्चा

स्वप्नांची राणी
Wed, 09/17/2014 - 17:37 नवीन
या धाग्यावर चाललेली गहन चर्चा माझ्या रोखठोक बुप्रावादी , सर्रीयलिस्टीक नास्तिक विचारसरणिच्या फार फार पलिकडची आहे त्यामुळे 'तसही आपण विकृत..आपल्याला काय घंटा कळतय त्यातल' हे मान्य करुन बसले होते. पण अगदी आजच आस्तिकतेचा जो खोटारडेपणा दिसला, जी दांभिकता दिसली, आस्तिक मनांचा कमकुवतपणा दिसला, त्यामुळे मी माझ्यापुरती अशी म्हण बनवली की 'लेच्यापेच्या आस्तिकतेपेक्षा धट्टीकट्टी विकृत नास्तिकताच बरी'. निदान तुम्ही कोणाची फसवणूक तरि करत नाही. तर झाले असे की माझ्या उत्तर भारतीय शेजारणीने आज आम्हाला सपतीक जेवायला बोलावले. मला खूप आश्चर्य वाटल कारण हे लोक अगदी प्रत्येक पाउलही मुहुर्ता-मुहुर्ताचा कौल घेऊन टाकतात. आज काय निमीत्त असे विचारले तर 'काही नाही, खूप दिवसात भेटलो नाही, तर गप्पा मारुया' असे ऊत्तर आले. मी विचारात पडले कारण चक्क श्राद्धपक्ष चालू आहे (नोट प्लीज...मी नास्तिक आहे, अज्ञानी नाही, आणि स्वतः वाचून उत्तरे मिळवणार्‍या कॅटॅगरीतली असल्याने आस्तिकांच्या ह्या मुर्ख प्रथा त्याम्च्यापेक्षा मला खुपवेळा जास्त चांगल्या महित असतात.) अर्थात आम्ही लोक जेवायला गेलोच कारण माझ्यासाठी सगळेच दिवस, महिने वर्षे सगळे सारखेच आहेत. शुभ अशुभ ई.ई. काही माझ्या मनात येऊच शकत नाही. मला प्रश्ण पडला की हे लोक जेवायला बोलावायचे कारण का सांगू शकले नाहीत. जशी मी त्यांना छान् ओळखते तसेच तेही आम्ची मते जाणून आहेत. मग आम्हालाच बोलवायचे कारण काय, की नाहितरी हे नास्तिकच आहेत, विकृतच आहेत असं काही आहे का..? बरं, असे काही विचार असु शकतात, हे मला कसे कळले तर, आम्च्याच एका कॉमन मैत्रिणीलाही त्यांनी बोलावले होते पण ति सश्रध्ह असल्याने तिने हे आमंत्रण साफ नाकारले आणि मला तसे सांगितले. सश्रद्ध लोक दुसर्‍यांच्या दु:खातही सहभागी होऊ शकत नाहित का? विकृतपणा नेमका कुठे आहे मग?...म्हणुनच त्या सर्वोच शक्तीला, देवाला त्यांच्या वागण्याचे नियम घालून द्यावे लागलेत का? कारण हे लोक ईतके कमकुवत, ढिसाळ बनतील कि सद्सदविवेक्बुद्धीही वापरणार नाहित याची देवाला खात्रीच होती..? ४ वर्षांपुर्वीच त्यांचा तरणाताठा मुलगा कॅन्सरने गेला आणि हे दोघेही जगणच विसरलेत. २४ तास चालू असणारे आस्था चॅनॅल त्यांना आणखीनच काळोखात ढकलतयं हे माझं प्रामाणिक मत आहे. त्यांची आस्तिकता त्यांना कसलीही मनाची उभारी घेऊ देत नाहिये. 'हे आमच्याच बाबतीत का...?' या मोठ्ठ्या प्रश्नचिन्हात ते दिवस कसेबसे ढकलतायेत. बर..याबाबतीत त्यांचे समविचारि पण त्यांना कसला आधार देतायेत, हे ही कोडच आहे माझ्यासाठी. कारण 'अमका म्हणतो कि तुम्ही पुर्ण घर पाडून बांधायला घेतलत त्यामुळेच असं घडल, किंवा 'तुमचे वास्तूस्थान तुमच्या जेष्ठ मुलासाठी योग्य नव्हतं', असे बरेच तर्क-वितर्कही ऐकते मी त्यांच्या कडून सतत. त्यांनी त्यांच्या दु:खात मलाही सहभागी करुन घेतलं हे आणि फक्त हेच माझ्यासाठी महत्त्वाच आहे आणि मी त्यांच्या दु:खात पुर्ण सहभागी आहे हे ही तितकच खर. फक्त त्यांच्या आस्तिकतेने त्यांना थोड आत्मबळ द्याव हिच सदिछ्छा. (मनात आलेले विस्कळीत विचार आहेत हे, कोणाला दुखविण्याचा अजिबात हेतू नाही. तरिही कोणाला काही स्पष्टीकरण हवे असल्यास देण्याचा प्रयत्न करिन.)
  • Log in or register to post comments

सबब प्रतिसादाचा आणि

arunjoshi123
Wed, 09/17/2014 - 19:15 नवीन
सबब प्रतिसादाचा आणि धाग्याच्या विषयाचा काही एक संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

"नक्की प्रश्न काय आहे ?

स्वप्नांची राणी
Wed, 09/17/2014 - 19:47 नवीन
"नक्की प्रश्न काय आहे ? "आस्तिक श्रद्धावान असल्याने विक्रृत असण्याचा संभव कमी तर नास्तिकांकडे श्रद्धा नसल्याने त्यांच्यामध्ये विकृती आढळण्याचा संभव जास्त " असं तुमचं म्हणणं आहे असं मानून मी पुढे लिहीतेय." असे एक वाक्य वाचले वरच्या चर्चेत. पण घडलेल्या घटनेत विरोधाभास दिसला म्हणून हा प्रतिसाद. अर्थात संबध नाकारण्याचा तुम्हाला पुर्ण अधिकार आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

बापरे...चर्चा फारच उच्च

स्वप्नांची राणी
Wed, 09/17/2014 - 19:58 नवीन
बापरे...चर्चा फारच उच्च पातळिवरुन सुरू होती की काय..? नाहि, ते आस्तिकांची ठोस मुल्ये ई. वाचले पण प्रत्यक्षात पोकळच दिसली म्हणून एका उर्मित प्रतिसाद देऊन टाकला. वेल, इग्नोरास्त्र मारा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा