व्यक्त : कारण आणि परिणाम
माणसाचं शरीर हा एक भव्य कारखाना आहे. या कारखान्यात बाहेरून कच्चा माल मागवला जातो, जो श्वासाच्या, अन्नाच्या, आणि कुठल्याही प्रकारच्या अनुभवाच्या रूपाने येतो. त्यावर प्रक्रिया होते. अन्नाचं पचन होतं. श्वास मंदज्वलनासाठी ऒक्सिजन पुरवतो. आणि अनुभवावर बेतलेली विचारप्रक्रिया मनात सुरू होते. या प्रक्रियांच्या अंताला आपल्या शरीराकडे बरीच उत्पादनं तयार झालेली असतात. काही वापरण्यासाठी, म्हणजे कृती करण्यासाठी; तर काही उत्सर्जित करण्यासाठी - ज्यांना आपण टाकाऊ म्हणतो. पण खरंच ती टाकाऊ असतात का?
टाकाऊ म्हणजे नेमकी कुठल्या प्रकारची उत्पादनं असतात ही? उच्छवासातून - शरीराला न चालणारे वायू, विष्ठेतून - पचन न झालेले घटक, मूत्रातून - अतिरिक्त पाणी आणि त्या पाण्याबरोबर शरीराला न पचलेली इतर द्रव्यं. सामान्यत: शरीर हे अगदी सुरुवातीपासून ठरवून टाकत नाही, की अमूक अमूक गोष्टच मी पचवणार, इतर गोष्टी मी बाहेर फेकून देणार. ते सगळंच पचवायची तयारी करतं. पण कितीही प्रयत्न केला तरी काही बाबी नाही पचवता येत, त्यांचं करायचं काय हे शरीराला कळत नाही आणि म्हणून हे न पचलेले पदार्थ ते पुढे पाठवतं, बाहेर पाठवतं - जिथून ते पदार्थ आले त्या जगाला ते परत करतं, आणि म्हणतं की बाबा बाकी सगळं मी सामावून घेतलं, पण याचं काय करावं हे मला समजलं नाही, तू काय ते बघून घे. कधीकधी मात्र शरीर कुठलीच गोष्ट पचवण्याच्या मनस्थितीत नसतं. मग आपल्याला उलट्या, जुलाब, वाताचा त्रास असे विकार होतात. आपल्याला न पटलेले विचार, आपल्या मनात मूळ धरू न शकलेल्या भावना, आणि अनुभवाचं आकलन करताना न समजलेल्या गोष्टी आपण काहीशा अशाच पद्धतीत उत्सर्जित करत असतो. पण अशा म्हणजे नेमक्या कशा? कोणत्या?
आपल्याला आलेल्या अनुभवांवर प्रक्रिया करताना आपण जे विचार करत असतो ते आपल्याला पुरतं गोंधळात टाकतात. आपल्याला दुवाच सापडत नाही आणि आपण सतत भरकटत राहतो नाहीतर चकव्यात अडकल्यासारखे हरवून जातो. लहानपणी आपल्याला बेरीज वजाबाकी मनातल्या मनात करता येत नाही तेव्हा आपण बोटांवर आकडे मोजतो. मग मोठ्या संख्या आल्या की त्या आपण कागदावर लिहून काढतो आणि सोडवतो, ‘हातचे’ सुद्धा लिहीतो. मोठं झाल्यावर आपण आपल्या ज्या तर्क वितर्कांबाबत साशंक असतो ते आपण आपल्या आप्तेंष्टांकडे बोलून दाखवतो. बोलायला कोणी नसलं तर प्रसंगी स्वत:शीच मोठ्याने बोलतो. थोडक्यात, ज्या विचारप्रक्रिया त्या त्या वेळी आपल्याला झेपत नाहीत त्या आपण उत्सर्जित करतो, म्हणजेच व्यक्त करतो.
सामान्यत: व्यक्त होणं हे दुस-यांना आपल्याविषयी माहिती सांगण्यासाठी, आपली बाजू समजावून सांगण्यासाठी गरजेचं असतं असा एक बहुमान्य समज आहे. हाच समज मनाशी बाळगून मी गेली कित्येक वर्षं लोकांसमोर व्यक्त होत राहिलो. पण आपल्या शंका, आपल्या समस्या व्यक्त करताना त्यांच्यावरचे उपाय माझे मलाच उमजत गेल्याचं मला तेव्हाच लक्षात यायचं. तरीही ‘ज्या अर्थी आपल्याला व्यक्त होण्याची गरज भासते, त्या अर्थी आपल्या मनात आत्ता उमटलेली उत्तरं बरोबर नसणार’, असं माझं मलाच समजावून मी माझ्या मतांऐवजी समोरच्या माणसाच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायचो. समोरच्याला शष्प काय बोलावं ते ठावूक नसायचं. एवढं सगळं ऐकल्यानंतर काहीतरी बोलायचं म्हणून तो माणूस बोलायचा. ते माझ्या लक्षात यायचं, आणि व्यक्त होऊनही मला उत्तरं सापडत नाहीत म्हणजे माझी समस्या खूपच बिकट आहे असं मला उगाचच वाटत राहायचं. उत्तरं मला ठावूक असायची पण मीच ती नाकारायचो. मग माणसांकडून मदत मिळत नाही म्हणून वैताग दूर करण्यासाठी सगळं लिहून काढायचो. लेखन करताना समोर दुसरी व्यक्ती नसायची. मी व्यक्त केलेले माझेच विचार मला दिसायचे, अजूनही दिसतात. त्यामुळे आपण जी उत्तरं दुसरीकडे शोधत बसतो ती आपल्याकडेच आहेत हे ढळढळीतपणे मला दिसायला लागलं आणि हळूहळू मला ते नाकारता येईनासं झालं. मी लेखन करतो, कोणी कविता करतं, कोणी चित्रं काढतं, कोणी शिल्पं घडवतं. मनाच्या अवस्थेची प्रतिकृती जो तो आपापल्या परीने तयार करत असतो, आणि स्वत:च स्वत:कडे व्यक्त होत असतो. व्यक्त होणं हे दुस-याला दाखवण्यासाठी नसून ते स्वत:च्या समजुतीच्या सुलभीकरणासाठी असतं. व्यक्त होण्यासाठी लागतं ते फक्त एक माध्यम. हे माध्यम माणसांमध्ये शोधताना व्यक्त होण्यामागचा हेतू साध्य न होण्याची जोखीम असते. कारण माणसांना स्वत:ची मतं असतात, त्यांचे दृष्टिकोन वेगळे असू शकतात, जे आपल्याला भरकटवू शकतात. ज्यामुळे आपण आपल्या विचारांचं व्यक्त प्रतिबिंब जसंच्या तसं निर्माण करू शकूच असं नाही. म्हणूनच अब्जावधी लोक असणा-या जगात आपली नाळ अगदी मोजक्या लोकांशीच जुळते. तर कधीकधी कोणाशीच जुळत नाही. निर्जीव वस्तूंचा वापर करून मात्र आपण आपल्याला हवं असतं तसं प्रतिबिंब उभारू शकतो. आपल्या कामात आपल्याला आनंद आणि समाधान कधी मिळतं, जेव्हा आपण आपल्या कृतीतून समाधानकारकरित्या व्यक्त होतो आणि स्वत:ला समजतो तेव्हा. जेव्हा कामातून व्यक्त होऊनही आपले विचार त्या कृतीशी जुळत नाहीत, तेव्हा आपल्याला समाधान मिळत नाही. म्हणूनच प्रामाणिक कृतींतून व्यक्त होण्याचा प्रयत्न करावा.
व्यक्त होण्यामागचं हे खरं प्राथमिक कारण असतं. व्यक्त होणं हा आकलन प्रक्रियेतला एक महत्त्वाचा घटक असतो. जसजसे आपले अनुभव वाढत जातात, तसतसं बोटांवर आकडेमोड करणं सोडून देणं अपेक्षित असतं. जास्तीत जास्त गोष्टींत जास्तीत जास्त आत्मनिर्भर होणं अपेक्षित असतं. विचारप्रक्रिया पूर्ण करून जेव्हा आपण आपल्या मतांवर ठाम होतो, तेव्हा त्या मतांनाही व्यक्त व्हावं लागतं, कृतीतून. याच कृतीसाठी आपण ओळखले जातो. ही आपल्या मतांची पडताळणी असते. आपल्या कृतींच्या परिणामांवरून आपलं यश-अपयश आपण ठरवतो आणि त्याच्या अनुभवानुसार आपली भविष्यातली विचारसरणी ठरवतो. शरीराच्या इतर उत्सर्जित पदार्थांच्या बाबतीतही तेच होत असतं. म्हणूनच शरीराला विकारांनी ग्रासल्यावर आपल्या मलमूत्राची, रक्ताची तपासणी केली जाते.
व्यक्त होण्यामागची कारणं शोधता शोधता, ‘माणसाने व्यक्त होणं’ हेच
माणसाच्या जगण्यामागचं कारण आहे हे मला हा लेख लिहिताना जाणवलंय. मी काही व्युत्पत्तीशास्त्रज्ञ नाही. पण ‘व्यक्ती’ हा शब्दसुद्धा कदाचित त्या भावनेतूनच आला असावा. पाहा, लेखनाद्वारे व्यक्त होत असताना मला माझ्या शंकांची उत्तरं मिळतायत. माझ्या वर मांडलेल्या विचारांना पुष्टी देणारं याहून चांगलं उदाहरण कसं मिळेल मला? मी व्यक्त झालो, लिहीण्याची कृती केली, लिहीता लिहीता मी स्वत:च्या लेखनाचं परीक्षण केलं, दुरुस्त्या केल्या, आणि माझे विचार ठाम झाल्यावर लेखाच्या या अंतिम मसुद्यावर शिक्कामोर्तब करतोय. व्यक्त होणं हे कारण आहे, ज्यातून आपण उत्तरं शोधतो. आणि याचा परिणाम म्हणून आपण अजून व्यक्त होत असतो, फक्त यावेळी व्यक्त होणं म्हणजे शोधलेल्या उत्तरांची पडताळणी असते.
- © कौस्तुभ अनिल पेंढारकर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी जवळपास अडीच वेळा पूर्ण
व्यक्त होणं म्हणजे शोधलेल्या उत्तरांची पडताळणी असते!
_/\_
माझा फोकस दुस-या पैलूवर आहे
पण अशी `पडताळणी करणारी' अभिव्यक्ती प्रामाणिक हवी
पण अभिव्यक्तीला एक दुसरा पैलू
घंटा कायच कल्ला नाय
मूळ
आपल्या सार्यांचे मूळ
लिहाच लेख !
(No subject)
लेखन अतिशयच आवडले. खूपच आभार!
खूपच आवडलं.
@ दशानन
तुझ्या आतापर्यंत लिहीलेल्या