Skip to main content

खीर

लेखक भानस यांनी सोमवार, 06/09/2010 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
तिचे हात एक एक टाका सफाईदारपणे घालत होते. झरझर. एकसारखा. टपोरा. लवकरात लवकर तिला ही दुलई पुरी करून द्यायची होती. शक्य झाले तर आजच. त्या बदल्यात मिळणार्‍या शंभर रुपयात तिच्या जागोजागी फाटलेल्या संसारात निदान मीठ-मिरची-तेलाचे ठिगळ लागले असते. दोन्ही पोरींच्या तोंडात चार दिवस दोन घास पडले असते. दिवसभर मान मोडून पाठीचा काटा पुरा ढिल्ला करून एकदाची दुलई पुरी झाली. जोरदार झटकून तिवर अजूनही लोचटासारखे चिकटलेले धागेदोरे तिने काढले. वरच्या तारेवर दुलई टाकून निरखून पाहू लागली. दुलई सुंदरच झालेली. मऊमऊ. निगुतीने टाचलेली. एकही ओळ वाकडी नाही का एकाही तुकड्याचा तोल ढळलेला. यावेळी रंगीबेरंगी तुकड्यातुकड्यातून तिने फुले-पाने, पक्षी, सूर्य, गुंफलेले. दुकानदार म्हणाला होता, थोडी कल्पकता दाखवा. खरंय रे बाबा तुझं, माल खपायला रोज नवीन काहीतरी हवेच. पण, उपाशीपोटी कल्पकता कशी सुचावी? डोळ्यापुढे फक्त डाळभात दिसत राहतो, त्याचं काय करावं..... पाणी पिऊन पिऊन पोट फुगतंय निसतं. अन्नाशिवाय काय बी सुचना झालंय. तरी कल्पकता दाखवायलाच हवी. नाहीतर हे कामही हातातून जाईल. तिने मान झटकली, चटदिशी दुलईची घडी घालून पिशवीत अलगद ठेवली. पदर सावरला अन पायात टाचेपाशी झिजलेली चप्पल अडकवली. " शरे, येते गं मी लगेच माघारी. तोवर अभ्यास करा बरका. उगाच रिकाम्या पोटी एकमेकींशी झोंबू नका. पोटात आग फारच भडकली तर मोठा पेला भरून पाणी प्या गं." शरीचे, हो नाही उत्तर ऐकायच्या आतच ती वाटेलाही लागली. दुकान बंद व्हायची वेळ झालेली. आज पैसे मिळाले नाहीत तर उपाशीच झोपवावे लागेल लेकरांना. धापा टाकत दुकानात शिरली. " किती उशीर केलास? आता मी बंदच करणार होतो. पाहू दे. हां.... बढिया! ती मेहता, दोन वेळा विचारून गेली आज. आता घरी जाता जाता देतो पोचवून. तिची लेक खूश होईल. हे घे शंभर रुपये. काय झाले? बरं, हे अजून दहा घे वरती. आणि जातांना दोन दुलयांचे कापड, दोरे, लागतील ते तुकडे घेऊन जा. चटचट हात चालव जरा. पोरींना घे की मदतीला. नीघ आता. " असे म्हणून दुकानदाराने नोटा अंगावर फेकल्या आणि दिलीपला दुलयांची कापडे काढायला सांगत तो गायबही झाला. शंभरावर दहाची अजून एक नोट. तिला खरेच वाटेना. चार दिवसांची सोय तर झाली. लेकी भुकेल्या आहेत. बाजार उठायची वेळ झालीच आहे. संपता संपता गेलं की जरा भाव पाडून मिळतोय. बरेचदा रस्त्याच्या कडेला गिऱ्हाईकांच्या हातून पडलेले चांगले कांदे-बटाटे, वांगी अन थोडेसे दबलेले-मार लागलेले तमाटेही मिळून जातात. पण उशीर झाला पोचायला तर तिच्यासारखे कोणीतरी हात मारते. आज तसे होऊन चालणार नाही, मिळायला हवेच म्हणत तिने दिलिपकडून न बघता माल उचलला. बाकीचे उद्या येऊन पाहीन रे असे म्हणत ती रस्त्यालाही लागली. जड पिशवी काखोटीला मारून ती झरझर पाय उचलत होती. आज थोडा रवा, साखर आणि अर्धा लीटर दूध घेईन. शरीला, रव्याची खीर खूप आवडते. पोरीचे डोळे लकाकतात नुसते खिरीचे नाव काढले तरी. दहा रुपये जादा मिळालेत नं. आज खीर करायचीच. इतकुश्या माझ्या पोरी पण किती समज आहे त्यांना. कधी हट्ट करत नाहीत. जितकी जमेल तितकी मदत करतात बिचाऱ्या. देवळाला वळसा घालून जाता जाता शंकराकडे न पाहताच तिने हात जोडले. प्रदक्षिणा घातली. एक क्षण टेकावे म्हणून खांबापाशी पाठीचा कणा खेटला. डोळे मिटले. " देवा, माझं मेलीचं राहू दे रे पण पोरींवर तरी दया कर. जास्त काही नाही निदान दिसाच दोन घास तरी पानात पडू देत म्हणजे भरून पावलं. कष्टाला मी डरत नाही रे. कामं मिळू देत म्हणजे रात्रीचा दीस करून निभावीन बघ. इतक्या मोठ्या जगाच्या खटल्यात आमच्यावर लक्ष ठेव रे बाबा." असे म्हणत पुन्हा पुन्हा नमस्कार करून ती बाजाराकडे निघाली. बाजार जवळपास गुंडाळलाच होता. सराइतासारखी तिची नजर खाली पडलेल्या कांद्या-बटाट्यावर पडत होती. पिशवी फुगत होती. लसणाचे थोडेसे कुजलेले दोन गड्डे व लिंबेही मिळून गेली. आलं- मिरच्या, तमाटेही मिळाले. ती खूश झाली. बाजारातल्या देवीपाशी प्रसादाची नारळाची कवड होती. इकडे तिकडे पाहत देवीला नमस्कार करून अंगारा लावायचे निमित्त करून तिने ती कवड पटदिशी पिशवीत सारली. वाट्यावर लावलेली वांगी व तोंडली घासाघीस करून दोनाच्या भावात तीन वाटे तिने मिळवले. मनोमन ती आनंदली. आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितल्यालं..... अजून जवळपास सगळे पैसे जशेच्या तशे कनवटीला होते आणि तरीही पिशवी भरलेली. देवा, लय उपकार झाले बघ तुझे. असे म्हणत वाण्याकडे जाऊन तिने रवा, साखर घेतले. डेअरीतून अर्धा लीटर दूध घेऊन ती घराकडे निघाली. डोळ्यासमोर स्टोवर मोठ्या पातेल्यात शिजत असलेली खीर व पातेल्याकडे आशाळभूतासारखे डोळे लावून बसलेली शरी अन भुकेने कळवळलेली कुसुम दिसत होती. झोपडी दिसायला लागली तशी चालण्याचा वेग अजूनच वाढला. तोच, हाकारा ऐकू आला. " पोरी, वाईच जरा थांब गं. दोन थेंब पाणी तरी घाल तोंडात." कण्हत कण्हत कोणी बोलत होते. तिने निरखून पाहिले तर कचऱ्याच्या कुंडीपाशी एक मुटकुळं पडलेलं. त्यातूनच कण्हण्याचा आवाज येत होता. ती जवळ गेली. म्हातारी पाय पोटाशी घेऊन कलंडली होती. गेल्या आठवड्यातच हिला कुठेतरी पाहिल्याचे तिला स्मरत होते. कुठे बरं? हां, त्या मोर का कायसे नाव असलेल्या मोठ्याश्या दुकानापाशी ही भीक मागत होती. " म्हातारे, अशी इथे का गं लवंडलीस? असे म्हणत तिने म्हातारीला हालवले. अगागा, किती तापली आहेस गं. मरशील नव्ह का अशी तू. माझ्याशिवाय कोणी तुला दिसलं न्हाई व्हय हाकारायला. आधीच चुलीत खडखडाट तशात तुझी भर. काय करावं आता? तुला हितच टाकून गेले तर उद्या सरकारी गाडीतूनच जाशील हे नक्की. शिवाय ते पाप माझ्यामाथीच पडायचं. देवा, तुझ्या मनात तरी काय हाय बाबा? चल म्हातारे, ऊठ बरं. माझ्या आधाराने हळूहळू उभी राहा म्हणजे तुला माझ्या घरला घेऊन जाते. " म्हातारी हो नको म्हणण्याच्या पलीकडे गेलेली. तिला आधार देत, लळतलोंबत कशीबशी घरी आणली. " शरे, अगं कांबंळ हंतर बिगीबिगी. आज्जी लय तापलीये. कुसे, ग्लासात पाणी भर आणि आज्जेला पाज. तोवर मी स्टोला काकडा लावते. पयला ’ चा ’ करते. लयी दिसांनी साखर आणि दूध घालून केलेला ’ चा ’ पिऊ सगळे. " असे म्हणत ती कामाला लागली. थोड्याच वेळात ’ चा ’ झाला. एकीकडे डाळतांदूळाची खिचडी व दुसरीकडे खिरीचे पातेले स्टोवर रटरटू लागले. झोपडीभर अन्नाचा दरवळ पसरला. शरी, कुसुम आणि आजीचे प्राण कंठाशी आलेले. आता लवकरच तोंडात घास पडणार हे सत्य अजूनही त्यांच्या गळी उतरत नव्हते. तोच, जरासा गोडमिट्ट दुधाळ गरम चा चार पेल्यांमध्ये तिने भरला अन लेकींच्या पुढे ठेवत आजीला बसते करून ती पाजू लागली. फुर्रर्रर्र..... फुर्रर्रर्र.... आवाज करत चौघीही मन लावून चा फुरकू लागल्या. पेले रिकामे झाले तशी खंगलेले चेहरे जरासे उजळले. आजीशी दोघी लेकी बडबडू लागल्या. पेले धुऊन तिने पानं घेतली. पानात खिचडी, तिवर थोडासा खोबऱ्याचा चव आन वाडग्यात खीर वाढताना नवीन दुलईचे डिझाइन डोक्यात घुमू लागले. आज चौथा कोना भरला व्हता. हे ठिगळ वाईच भारी व्हतं खरं. खाणारं एक तोंड वाढवणारं. पण, जीवात अजून धुगधुगी आहे म्हटल्यावर कचऱ्यात कसं मरू द्यावं म्हातारीला. तिच्या लेकरांनी टाकली तिला म्हणून मीबी डोळे झाकायचे? नाय नाय. माझी माय असती तर राहिलीच असती नं माझ्यापाशी. पोरींनाही माया मिळल. व्हईल काहीतरी सोय. त्यो देव बसलाय नग का वरती, त्यानेच तर आज्जेला माझ्याकडे पाठवलीय. आता तोंड वाढवलंय तर जिम्मेवारी त्याचीच नव्हं का. उद्याचं उद्याला पाहू. "चला गं पोरींनो, हे ताट आजीला द्या आधी आणि बसा आपापल्या ताटावर. " तिघींचे पटापट घास घेत चवीचवीने मिटक्या मारत हालणारे तोंड, आनंदाने लकाकणारे डोळे पाहून रिकाम्या पोटीच ती भरून पावली. जगातलं सारं सुख या दोन घासातच सामावलेलं. काही करून यांच्या तोंडात हे दोन घास मी घालेनच. असा स्वत:शीच करार करत डोळ्यात आलेले पाणी निपटून काढत ती म्हणू लागली, " शरे, अगं खीर घे की अजून..... उद्याला नग ठेवायला. आजची येळ प्वाट भरून जेवा गं सगळी. कायमच अर्धपोटी राहायच नसतं. कधीतरी तडस लागू दे की. मन आणि प्वाट तुडुंब भरू द्या. " असे म्हणत पोरी व आजीकडे पाहत आनंदाने तिने खिरीचा भुरका मारला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7096
प्रतिक्रिया 52

प्रतिक्रिया

जगातलं सारं सुख या दोन घासातच सामावलेलं कथा खूप आवडली भानस! (तडस लागलेला) सुनील

भानस, अतिशय सुंदर , गुढ असलेल्या मानवी मनाचा एक रेशमी कंगोरा दाखवणारी कथा, केवळ अप्रतिम. कोणत्या प्रसंगी कोण कशी प्रतिक्रीया देईल ते सांगणे अशक्य असते. अशा प्रसंगात आयुष्यभर झालेले संस्कार ठळक पणे समोर येतात, तीला मनापासुन सलाम. माणसा कडे पैसा नसला तरी सुध्दा तो श्रीमंत असु शकतो, ही मनाची श्रीमंती फार मौल्यवान असते. भल्या भल्यांना जमत नाही असे वागायला.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माणसा कडे पैसा नसला तरी सुध्दा तो श्रीमंत असु शकतो, ही मनाची श्रीमंती फार मौल्यवान असते. ऑप्टिकल झूम वापरली, तर गांडूळ देखील भल्या मोठ्ठ्या नागासारखे भासते. अगदी बरोबर. आणखी असेच येऊ द्या. म्हणजे मराठी मनाचे खच्चीकरण ( अर्र, मनश्रीमंतीकरण) साध्य होईल.

लेखन आवडले. गरीब मुलांना शाळेत जेवायला / खायला देतात असे ऐकले होते. चुकीचे ऐकले बहुतेक.

In reply to by सहज

लेखन आवडले.
असेच म्हणतो. सहजराव, बाकीच्या शाळांच माहित नाही, पण मनपाच्या शाळेंत खाउ वाटप होत. पण त्यातल ७० % शिक्षक लाटतात अस ऐकुन आहे.

अत्यंत हृदयस्पर्शी कथा. पुनःपुन्हा वाचावी अशी. तुझ्याप्रमाणेच मीही माणसातच रमणारा म्हणून फार फार आवडली. जियो !! अरुण दादा

हृदयस्पर्शी कथा, माणसातला ओलावा दाखवणारी, अर्धपोटी असताना आपल्या चतकोरातला घास देण्याची दानत दाखवणारी. फार दिवसांनी एक चांगली कथा वाचली. -रंगा

फार दिवसांनी एक चांगली कथा वाचली. रंगाशेट सारखेच म्हणते. स्वाती

वा!! केवळ सुंदर! माणुसकी असणर्‍या एका कुटुंबाचं अतिशय यथार्थ वर्णन! बारा मावळातल्या एका शेंगटेवाडीत मी असं एक कुटुंब पाहिलं आहे. "उद्या काय" हा तर दररोजचा प्रश्न, पण दारी आलेला पाहुणा उपाशी जाणार नाही याची पुरेपुर काळजी घेणारे श्री. व सौ. हेबळे आणि त्यांचे दोनही चिरंजीव यांचा उल्लेख केल्याशिवाय रहावलं नाही! जगण्याची लढाई अशी पदोपदी जिंकणार्‍या या श्रीमंतापुढे आपण फक्त नशिबाचे धनी, कर्तृत्वाने शून्य! --असुर

हीच खरी श्रीमंती ! पोटापुरतं खाणं म्हणजे प्रकृती ! गरजेपेक्षा जास्त खाणं म्हणजे विकृती ! आणि आपला घास दुसर्‍याला देणे म्हणजे संस्कृती !

>> फार दिवसांनी एक चांगली कथा वाचली. रंगाशेटशी सहमत आहे! इतके दिवस नुस्ता कचरा झाल्यासारखा वाटत होता बोर्डावर! आज चिखलात हे कमळ उमललंय जणू! सुंदर कथा!

छान आहे. हे वाचून मराठीच्या पाठ्यपुस्तकातल्या लाल चिखल, स्मशानातलं सोनं वगैरे धडे (गोष्टी) आठवल्या.

स्पा, सुनिल, पैसा, ज्ञानोबाचे पैजार, सहज, अनुराग, अरुणदादा, रसराज, चतुरंग, स्वाती दिनेश, मदनबाण, मिसळभोक्ता, जगताप, मीनल, असुर, जिप्सी, मेघवेडा, Pain सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या अभिप्राय उत्साह वाढवणार्‍या आहेत. आनंद वाटला. :)

जगण्याची लढाई अशी पदोपदी जिंकणार्‍या या श्रीमंतापुढे आपण फक्त नशिबाचे धनी, कर्तृत्वाने शून्य!
+१ डोळे भरुन आले वाचताना.. सुंदर!

प्राजू, माजगावकर, मितान, चिगो व कुसुमिता अभिप्रायाबद्दल अनेक आभार. कथा आवडल्याचे वाचून आनंद झाला.

छानच. आधी वाचायची राहून गेली होती वाटते. कथा चांगली जमलीये. ज्यांच्याकडे खूप असतात आणि ज्यांच्याकडे अजिबात नसतात तेच लोक पैशांचा विचार न करता दुसर्‍याला मदत करू शकतात.

In reply to by नगरीनिरंजन

नागरीनिरंजन, उशीराने आभार्स मानतेय.. क्षमस्व! कथा आवडल्याचे वाचून आनंद वाटला. :)

आधी वाचायची राहून गेली होती वाटते हेच म्हणते (म्हणून हे खोदकाम), सकारात्मक कथा आणि शेवटही.

In reply to by सखी

सखी, आवर्जून वाचलीत आणि आवडल्याचेही सांगितलेत खूप छान वाटले. धन्यवाद! :)

In reply to by भानस

अरे वा स्वागत आहे परत मिपावर. आम्ही आठवणच काढत होतो, उचक्या लागल्या असतील :) इमेल मिळाली का?

कथा लिहिलित. इतरांविषयी सहानुभुती असणे ही एक नैसर्गिक प्रव्रुत्ती आहे. ती मुळात असावी लागते. तरच आपला घास दुसर्~याला देण्यात आनंद वाटतो. अन्यथा ही भावना समजणे आणि समजावणे कठीण.

सुंदर कथा. पराकोटीच्या गरीबीत, पोटच्या मुलींच्या उपाशीपणाची सततची टोचणी मनात बाळगतही कथानायिकेचे समतोल आणि परदु:ख संवेदनशिलता खरोखर वाखाणण्याजोगी आहे. कथा अ़जून फुलविता आली असती असे शेवटी वाटत राहिले पण कदाचित लेखिकेला हाच शेवट सुयोग्य वाटला असेल तर त्यातही गैर नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर, आपल्या अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद! तुम्हाला आवडल्याचे वाचून छान वाटले. :)