अशीच एक फँटसी..(२)
अशीच एक फँटसी..(१)
सोमवारी सकाळी अर्णवला भलतेच फ्रेश अन उत्साही वाटत होते. उर्मि अन तो आपापल्या किल्ल्या घेऊन एकमेकांना टाटा करून आपापल्या दुचाक्यांवरून बाहेर पडले तेव्हा, आपण आज एकही वस्तू विसरलो नाही, ही गोष्ट मात्र अर्णव विसरून गेला. इतकेच नव्हे, ऑफिसात पीसीसमोर बसल्यावर त्याच्या हातांनी न चुकता सराईतपणे पासवर्ड टाईप केलेलंही त्याच्या लक्षात आलं नाही. आणि बॉसच्या केबिनमध्ये जाताना आपण त्याने मागितलेली फाईलच हातात घेतली आहे हेही त्याच्या बऱ्याच उशिरा लक्षात आले.
'क्यो, क्या लाये हो आज डिब्बेमें ?'
नेहमीप्रमाणे मुरुगन ने लंचटाईमला प्रश्न टाकला.
पण नेहमीप्रमाणे आज अर्णव ते विसरला नाही, हे त्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडल्यावर त्याच्याच लक्षात आले.
'अरे बैगनकी सब्जी, यार !'
मुरुगनला सुमारे दीडशे व्होल्टचा धक्का बसला.
'अबे आईनस्टाईनके बाप, आज दुध की जगह कुछ और पिया क्या ?'
मग त्याला श्री श्रींची आठवण झाली.
हायला ! खरंच पॉवरबाज आहेत वाटतं गुरुदेव !
अर्णवने मग एक एक गोष्टी मुद्दाम आठवून पाहिल्या. बाईकच्या किल्ल्या, चहा पिलेला कप ठेवलेली ठिकाणे, बॉसने एकाच वेळी सांगितलेली नऊ कामे इतकेच नव्हे, तर आज उर्मिने घातलेल्या ड्रेसचा कलरही जेव्हा त्याला स्पष्ट आठवला तेव्हा मात्र त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. आनंदाने त्याला ऑफिसातच भांगडा करावासा वाटू लागला.
तरीपण पूर्ण खात्री पटल्याशिवाय ही गोष्ट उर्मिला सांगायची नाही असे त्याने ठरवले.
ऑफिसच्या कामातून थोडा निवांतपणा मिळाल्यावर त्याने आठवणींचा परीघ आणखी थोडा वाढवण्याचा प्रयत्न केला. जसे की, अपार्टमेंटच्या जिन्याच्या पायऱ्यांची संख्या, शेजारच्या सोमाणीच्या कारचा नंबर, ऑफिसच्या एकूणएक कर्मचाऱ्यांची संपूर्ण नावे, इतकेच नव्हे तर उर्मिच्या चुलत अन मावसबहिणींची नावे, त्यांच्या नवऱ्यांची नावे अन व्यवसाय हे सगळे आपल्याला तपशीलवार सांगता येते आहे असे त्याच्या लक्षात आले.
संध्याकाळी घरी गेल्यावर जेव्हा उर्मिने त्याच्या नव्या स्मरणशक्तीची कसून परिक्षा घेतली तेव्हा तिचीही खात्री पटली की नवऱ्याचा स्क्रू 'टाईट' झाला आहे. याचे श्रेय नवऱ्याला नव्हे तर गुरुदेवांना द्यायला ती आर्यपत्नी अर्थातच विसरली नाही.
रात्री झोपताना डोळे मिटण्यापूर्वी मात्र अर्णवला एक भुंगा उगीचच कुरतडत होता. साली ही स्मरणशक्ती जरा जास्तच स्मार्ट झालीये का ?
या प्रश्नाचे उत्तर काळाच्या पोटात दडले होते !
अर्णवला झोप गाढ लागली, तरी स्वप्ने तुफान पडत होती. म्हणजे तशी ती आधीसुद्धा पडायची. पण याआधी जाग आल्यावर ती आठवत नसत. आता एखाद्या सिनेमापेक्षासुद्धा स्पष्ट सगळी आठवू लागली.
...एका स्वप्नात तो सहस्रावधी लोकांना जेवणावळी घालत होता, दुसऱ्या स्वप्नात कुणाचीतरी शिकार होऊन जंगलातून पळत होता. आणखी एका स्वप्नात पोपट होऊन पिंजऱ्यात गुटुर्गु करत होता, तर एकदा चक्क नवयौवना होऊन घट डोईवर घेऊन पाणी भरत होता !
पहाटे जाग आल्यावरसुद्धा या स्वप्नस्मृती त्याच्या मनात इतक्या स्पष्ट कोरल्या गेल्या होत्या की जणू तिथे जाऊन आल्यासारखा प्रत्येक तपशील तो सांगू शकत होता. आवरून ऑफिसला जाताना तो नेहमीपेक्षा गप्प पाहून उर्मीने त्याला एकदोनदा छेडलेही. पण तीही आवरून कॉल सेंटरला जायच्या गडबडीत असल्यामुळे तिला फार लक्ष देणे शक्य झाले नाही.
ऑफिसातही दिवसभर त्याच्या मनाच्या मोबाईल स्क्रीन वर या सगळ्या व्हिडीओ क्लिप्स आलटून पालटून धावत राहिल्या. अखेर संध्याकाळी झालेल्या फायनान्सर्स मिटिंगमध्ये त्याचे डोके व्यस्त झाल्यावर तो त्यांच्यापासून थोडा सुटा झाला.
रात्री घरी येताना त्याच्या डोक्यात मिटिंगचे विषय घोळत होते. अंथरुणावर अडवा झाल्यावर मात्र त्याच्या मन:पटलावर सकाळपासून अर्धवट, अव्यक्त असलेली एक स्मृती साकार झाली.
....विस्मृतीच्या सागरामध्ये एक गोष्ट त्याला ठळक आठवत असे. लहानपणापासून त्याला अधूनमधून एक ठराविक स्वप्न पडत असे. प्रथम एका सौंदर्यवतीचा हसरा चेहेरा दिसत असे अन नंतर एक युद्धाचे दृश्य दिसे. त्यात बंदुक हातात घेऊन दूर शत्रूच्या ठाण्यावर अंदाधुंदपणे धावून जाणारा एक शूरवीर दिसे. अन पुन्हा तोच शूर शत्रूने घेरून ठार झालेला दिसे. त्याच्या मृत चेहेऱ्यावर एक गूढ स्मित असे. अन अंत:करणात एक खोल शोक अन वियोगाची छाया दाटून येई. ..अन एक अपराधी भाव.
मन अस्वस्थ असताना झोपेत हे स्वप्न त्याला नेहमी पडे. खूप प्रयत्न करूनही यापेक्षा जास्त काहीच आठवत नसे.
...आज त्याला ते स्वप्न आठवले अन त्याचे कुतूहल जागे झाले.
...ही धारदार झालेली स्मृती त्या स्वप्नाचे संदर्भ शोधू शकेल का ?
झोपताना त्याच्या मनात स्वप्नाचेच विचार होते.
..अन झोपेत ते स्वप्न पुन्हा एकदा त्याच्या मन:चक्षुंसमोर साकार झाले..
..ते दोघे जिवलग मित्र. दोघेही सैन्यात लेफ्टनंट होते. ती, अर्णवची, म्हणजे शशांकची प्रिया होती. पण त्याचाच जिवलग मित्र सुनील तिचा चाहता होता, हे त्याला फार उशिरा समजले...
..जेव्हा सुनीलने शत्रूच्या ठाण्यावर एकट्याने जाऊन हाराकिरी केली, तेव्हा.
शशांकने धावत जाऊन त्याला ओढून आणेपर्यंत तो मृत्युमुखात होता. जाताना त्याच्या चेहेऱ्यावर असलेल्या स्मिताचा उलगडा नंतर तिच्याकडून झाला.
'ती' सुनीलची नव्हतीच कधी. पण सुनीलचे मन तिच्यावर आहे हे समजल्यावर शशांकने सुनीलशी लग्न करायला तिला भाग पाडले असते. हे तिलाही माहिती होते. हे तिने एकदा सुनीलला बोलून दाखवले. अन , आपल्या जिवलग मित्राचे तिच्याशी लग्न होण्यात कसलाच अडथळा नसावा, म्हणून त्या वेड्या दोस्ताने ते केले..चक्क आत्महत्याच ती !
..पहाटे जाग आल्यावर एखादा चित्रपट डोळ्यासमोर सरकावा तसे हे स्वप्न त्याच्या मनासमोर होते.
..पण तो तर अर्णव होता. मग शशांक कोण ?
हे पूर्वजन्मीचे लफडे तर नव्हे ना ?
..दिवसभर एखाद्या पार्टीचा हँगओव्हर असावा तसे हे स्वप्न त्याच्या डोक्यात भिनून राहिले !
उर्मीशी या स्वप्नाची चर्चा करावी तर ती थट्टा करेल अशी भीती वाटली.
असेच चार-पाच दिवस गेले.
त्या दिवशी तो क्लायेंट कंपन्यांचे इ-मेल पाहत होता तेव्हा अचानक अरविंद आला. अरविंद त्याचा क्लासमेट. दोघांच्या मालक कंपन्यांची तीव्र स्पर्धा असली तरी त्यांच्या मैत्रीत त्यामुळे बाधा येत नसे.
'काय काय नवीन ?' अरविंदने नेहमीप्रमाणे सुरुवात केली.
'काही विशेष नाही. आमचा एम डी इटलीला निघालाय. त्याच्या दौऱ्याची तयारी चाललीय. तुझ्याकडे काय ? संकेतची तब्येत कशीये ?'
अरविंदचा चेहरा एकदम वितळल्यासारखा झाला.
'काही फरक नाही रे ! आहे तशी आहे.'
'ट्रीटमेंट ?'
'नेहमीची औषधे आहेतच. शिवाय आता आयुर्वेदिक सुरु केलेय. बघूया काय फरक पडतो का..'
दोनतीन महत्वाचे विषय बोलून झाल्यावर अरविंद निघून गेला.
संकेतचा विषय उगाच काढला असे अर्णवला वाटून गेले.
अरविंद अन रेवती यांच्या यशस्वी कौटुंबिक जीवनाची एक दु:खद बाजू म्हणजे संकेत. निकेत आणि संकेत दोन मुलं अरविंदला. मोठा निकेत पाचवीत. संकेत सहा वर्षाचा. पण जन्मत: अपंग आणि मतिमंद. उठू अगर चालू-बोलू शकत नव्हता. मांसाचा गोळा नुसता. त्याचे सगळे काही अंथरुणात करावे लागे रेवतीला. खूप उपाय झाले. काही फरक नाही. काय एकेक पंचेस मारलेले असतात एखाद्याच्या जीवनात ..अर्णवच्या मनात सहज येऊन गेले.
पीसीवर नव्या प्रोजेक्टची रूपरेषा उमटवताना किंचित थांबून तो खुर्चीत मागे रेलला. शिणल्यागत त्याचे डोळे मिटले.कामातून किंचित विश्रांती अशा त्या पाच-सात मिनिटात तो जरासा सैलपणे विसावला. अन त्याच्याही नकळत स्मृतींचे नाजूक पाश भूतकाळात मागे मागे सरकले. अनायास मन:चक्षुसमोर एक दृश्य साकार झाले...
....तो डोंगरउताराच्या हिरवळीवर उभा होता. समोर दोघेजण. असं वाटत होतं की ते एका डोंगराच्या कड्यावर उभे होते. एक चेहेरा अगदी ओळखीचा. जाड भिवया, मिशीची झुपकेदार रेघ, नेहमीच्या तपकिरी डोळ्यात आता मात्र एक तांबूस झाक. तो समोरच्या माणसाशी काहीतरी बोलत होता. बोलता बोलता एकाएकी त्याचा चेहेरा आकसला. रेषा क्रूर झाल्या. त्याचा एक हात एकाएकी पुढे झाला अन त्याने दुसऱ्या माणसाला मागे ढकलले. मागे काहीच नव्हते..एक किंकाळी पुरी व्हायच्या आताच ढकलला गेलेला माणूस कड्याखालच्या कातळावर हातपाय पसरून लाल थारोळ्यात पडला होता. त्याचा मेंदू कवटी फुटून बाहेर सांडला होता..
...अर्णवने दचकून डोळे उघडले. जणू एखादा सिनेमातला क्लायमॅक्स पहावा तसे आत्ता पाहिलेले दृश्य त्याच्या मनात ठसून राहिले. तो जाड भिवयांचा चेहेरा... ओह नो ! अरविंदचे ओठ थोडे जाड असते अन मिशा असत्या तर तो असाच दिसला असता ! नव्हे, अरविंदच तो ! मागच्या जन्मीचा ...?
अन तो दुसरा ? संकेत तर नव्हे ..?
एक धक्का बसून अर्णवच्या लक्षात आले की त्याच्या मिटल्या डोळ्यांनी जो चित्रपट पहिला, त्याचे धागेदोरे विचारांच्याही खालून खोल कोणत्या तरी अतितरल पातळीवरून जुळले जात आहेत. अन , वळणांच्या वाटेवर चालता चालता पुढचा रस्ता दिसावा , तसा दृश्यामागच्या घटनांचा पट आपोआप त्याच्यासमोर उलगडू लागला.
त्याला उमजले ते असे.
त्याला अरविंदने पूर्वी (पूर्वजन्मी ?) मारले होते ! त्याचा मेंदू निकामी झाला होता. अन तो निकामी मेंदू घेऊन तो संकेतच्या रुपात पुन्हा अरविंदच्याच पोटी जन्माला आला होता !
बाकी चुकती करण्यासाठी !
अरे देवा ! हे काय आहे ? अर्णव विचार करत होता. हे सगळे माझ्या मनात एखादे पुस्तक वाचावे तसे का उलगडत आहे ? ही काय स्मरणशक्तीची उच्चतम पातळी आहे की काय ?
ओह नो ! रविवारी गुरुदेव कृष्णदेवस्वामींची भेट घेतलीच पाहिजे !
*क्रमशः*
Book traversal links for अशीच एक फँटसी..(२)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बापरे.......... हे भलते अवघड
असेच म्हणतो.
मस्त
वॉव!
आँ.....कथा संपली आहे..कारण...
अरे, खरंच की!
कसला अन्याय अन कसले काय?
एकदम कहानीमें ट्विस्ट!
आयला...स्नेहांकितातै, तुमच्या
ओये! फकस्त रुटीन चालण्यापुरतं
व्वा.. !
ओह सॉरी
>>>
आयला मस्त आहे की हे :).
एखाद्या हिंदी शिणुमाची
+००७
वाचतोय.
हुश्श्... टाकलं ना क्रमशः..
कथेने एकदम वेगळेच वळण घेतलेय!
*क्रमशः*
कथा छान उलगड्ते आहे .
स्नेहांकितातै
खूप छान....