Skip to main content

कोणते हे "मुल निवासी नायक" दैनिक ज्याने स्वामी समर्थ, गजानन महाराज, आणि साईबाबा संत नव्हेत असे म्हटले

लेखक प्रमोद देर्देकर यांनी सोमवार, 16/12/2013 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचनात एक अनुदिनि आली की जिने फक्त ब्राह्मण ह्या जाती विरुद्ध लिहण्याचा जणु विडा उचलला आहे. या अनुदिनीने मला अजुन एक दैनिक "मुलनिवासी नायक" जे औरंगाबाद येथुन प्रसिद्ध होते या वृत्तपत्राचे एक पान डकवले ज्यात असे लिहले होते की , साईबाबा नेमके कोण होते, त्याच बरोबर श्री गजानन महाराज आणि अक्क्लकोट स्वामी महाराजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केलेले आढळले त्या पानास इथे डकवले आहे. या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे, आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले (इंग्राजांपासुन दुर पळण्याण्यासाठी) आणि त्यातील तात्या टोपे हे श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे. तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दुसरे कोणी नसून पानिपतच्या युद्धभुमी वरुन पळालेले सदाशिवराव भावु आहेत असा शोध लावाला आहे. तर वर उल्लेखलेल्या अनुदिनीचा पत्ता अनिता पाटिल.ब्लोगस्पॉट असा आहे. सदर अनुदिनीमध्ये सवर्णद्वेष सहज पणे दिसुन येतो. खालील काही लेखाचे फक्त शिर्षक मी उदाहरणे देत आहे. १). शिवरायांचा अवसानघात करणारा 'कु'मंत्री मोरोपंत २). रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता ३). शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला ४). शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे ५). एका लेखातील हा उल्लेख "औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला." ( हसायला येते). ६). शेफारलेले बाळे आणि बाळ्या ( इथे सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा दद्वेष) ७). हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही! ८). या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या ९). ब्राह्मणांच्या अश्लिल शिव्या १०). सनी लिओनला भारतरत्न का नाही? Why Bharat Ratna Not Been Conferred On Sunny Leone (हसून हसून पुरी वाट :-))) ) ११). अटल अटल, बोलत सुटल (वाजपेयीं विषयी द्वेष) १२). लोकमान्य नव्हे भटमान्य ११). प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का? सावरकर : फाळणीचे गुन्हेगार ही अनुदिनी संपूर्णपणे ब्राह्मणद्वेषी लिखाण करण्यास वाहलेली आहे. माझी आपल्या मी.पा.वरिल श्री. जयंत कुलकर्णी , श्री. इन्द्रजित पवार या इतिहासप्रेमी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी यावर काही प्रकाश टाकावा. धन्यवाद

वाचने 45050
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

माझ्या वाचनात एक अनुदिनि आली की जिने फक्त ब्राह्मण ह्या जाती विरुद्ध लिहण्याचा जणु विडा उचलला आहे
आता हे लिहील्यावर पुढे ब्लॉगचा नाव पत्ता नसता लिहीलात तरी चालले असते.. सोडा हो.. चर्चेच्याही लायकीचा नाहीये हा ब्लॉग..

In reply to by पिलीयन रायडर

कश्याला असल्या ब्लॉग वर जाता आणी इथे चर्चा करता . त्या पेक्षा हिथ हाटीलात येऊन मस्त मिसळपाव चापायची .

या असल्या ब्रिगेडी ब्लॉग्स आणि सायटींच अस्तित्व बहुतांश लोकांना माहीत असतं आणि त्यात काय प्रकारचं लिहिलं जातं हे पण ! तुम्ही त्यांच्या लिंक्स असलेले धागे काढून त्यांचा प्रसार करत आहात. you are playing into their hands.

बरं त्यानं हे तिघे संत नैत म्हटलं. त्यानं का या तिघांच्या रेप्युटेशनमध्ये काही फरक पडणारे का? अलीकडे तशा प्रकारच्या दैनिकांतून फक्त आणि फक्त एक नपुंसक जळजळ दिसते, दुसरे काही नाही. तस्मात तशी दैनिके वाचून एञ्जॉय करावयास शिकलो आहे.

In reply to by बॅटमॅन

एञ्जॉय करावयास शिकलो आहे.
बायदवे…अनिता पाटील नावाची व्यक्ती अस्तित्वात नाहीये…तो ब्लॉग दुसरंच कोणीतरी लिहितं…'पाटील' आडनाव लावून त्याला वेगळं काहीतरी साध्य करायचं असावं

महाराष्ट्र हा अनेक विचारधारांचा प्रांत आहे. येथे अनेक विचारधारांनी जन्म घेतला आहे. आणि महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या पार्श्वभूमीवर त्या त्या विचारधारा रूजल्यासुध्दा आहेत. अश्या विचारधारांचे लोक आपापला लोकसंख्येचा पाया वाढवण्यासाठी त्यांच्या मते जी मते योग्य आहेत ती मते, मुल्ये समाजात रूजवण्यासाठी शक्य त्या मार्गाने प्रबोधन, बौध्दीक वगैरे करीत असतात. त्यापैकी शिबीरं घेणे, दैनिक, साप्ताहिक, पाक्षी़क, मासीक काढणे, आदी मार्गांचा अवलंब केला जातो. ज्या विचारधारांना तार्कीक अर्थ असतो किंवा खर्‍या अर्थाने पुरोगामी (महाराष्ट्रातील सध्याच्या अर्थाने नव्हे) आहेत त्यांचे लेखन बर्‍यापैकी सहनीय आणि विचारांना चालना देणारे असते. मात्र खुपदा अनेक विचारधारा मानवी इगोच्या संमीश्रणाने टोकाला जाताना दिसतात. अश्यावेळी त्यात दिलेले लेख किंवा विचार हे 'आधी निष्कर्ष ठरवून मग संशोधन केले' अश्या पठडीतील असतात. ज्यांना ह्या विचारधारा आवडतात त्यांच्यासाठी हे लेख म्हणजे अनमोल ठेवा असतात आणी ज्यांच्या विरोधात असतात त्यांना असे लेख म्हणजे डोक्यात जाणारे असतात. त्रयस्थमानसाला सुध्दा असे आधीच ठरवून केलेले संशोधन अपील करीत नाही, त्यामुळे ते त्या लेखनाला किंमत देत नाहीत. गंमत येथे असते की जे त्या विचारधारेचे असतात त्यांना असं वाटतं की हे... हे... एवढे धडधडीत सुर्यप्रकाशासारखे सत्य लिहीले असूनसुध्दा सामान्य मानुस पेटून का उठत नाही? बुर्झ्वा कुठले ! आणि ज्यांच्या विरोधात ते लेखन असते ते त्यांच्या डोक्यात तिडीक जाऊन प्रश्न विचारतात की , हा, असला डबक्यातील कचरा ज्याने संशोधन म्हणून लिहीला आहे त्याला कवडीचा तरी आधार आहे का? सामान्य मानसाला याची जरासुद्धा चीड येत नाही का? आमची मानसीकताच गुलाम आहे...! वरील लेखाच्या संदर्भातील ब्लॉग बघावासुध्दा वाटला नाही. कारण हे मूलनिवासींचे ब्लॉग, सनातनचे वृत्तपत्र, आजच्या पुरोगाम्यांची धर्मनिरपेक्षता, मार्क्सवाद्यांचे आर्थीक आकलन, माओवाद्यांचे शेतकरी आदीवासींवरचे अन्याय, यात अन्य काही नावे घेता येतील. हे सर्व मला एक सारखेच आहेत. झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांवर शक्ती खर्च करून काही अर्थ नाही. - नीलकांत

In reply to by नीलकांत

खरंय नीलाकांतजी , आपल्या प्रतिसादाने आम्ही आपला पंखा झालो आहे.साष्टांग दंडवत. धन्स

In reply to by नीलकांत

महाराष्ट्र हा अनेक विचारधारांचा प्रांत आहे. येथे अनेक विचारधारांनी जन्म घेतला आहे. आणि महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या पार्श्वभूमीवर त्या त्या विचारधारा रूजल्यासुध्दा आहेत.
हे विधान कुठल्या आधारावर आहे हे माहीती नाही. जी काही वैचारीक मोकळीक आणि सामाजिक जाणिव महाराश्ट्रात होती ती इंग्रजांच्या काळात. महाराष्ट्र कीती जातीयवादी आहे ते १९४८ च्या गाधी खुनाच्या वेळेला दाखवुन दिलेच आहे. महाराष्टाचे एक दिवंगत ( ६०,७०,८० )आणि एक जीवंत जाणते राजे कीती जातीपातीच्या राजकारणात मग्न आहेत हे ही पाहीले आहे. उगाचच स्वताची पाठ थोपटून घेउ नका. इथे पुरोगामी हा शब्द ब्राह्मणद्वेशा चा प्रतिशब्द आहे.

In reply to by प्रसाद१९७१

कारण हे मूलनिवासींचे ब्लॉग, सनातनचे वृत्तपत्र, आजच्या पुरोगाम्यांची धर्मनिरपेक्षता, मार्क्सवाद्यांचे आर्थीक आकलन, माओवाद्यांचे शेतकरी आदीवासींवरचे अन्याय, यात अन्य काही नावे घेता येतील. हे सर्व मला एक सारखेच आहेत. >>> +१०००००० मला सुध्दा ...

In reply to by प्रसाद१९७१

मी विचारधारा असा उल्लेख केलाय. महाराष्ट्रात अनेक विचारधारा जन्मल्या व रूजल्या. नवीन विचार रूजवण्यात महाराष्ट्र अन्य भारताच्या तुलनेत अग्रेसर आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे वैचारीक मोकळीक इंग्रज राजवटीत जास्त होती हे खरं आहे. यावर मला तरी असं वाटतं की त्यावेळी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधि़कार सरकारकडून अन्बायस्ड दिल्या जात असावा. मात्र अशी मोकळीक आज नसेल असं गृहीत धरूया तरीही महाराष्ट्रात नव्या विचारधारा जन्माला येत आहेतच की ! स्वातंत्र्याआधी प्रबोधनात्मक, सत्यशोधक, क्रांतीवादी, समाजवादी, नेमस्त अश्या अनेक विचारधारा महाराष्ट्रात एकतर रूजल्या किंवा भारतीय मातीच्या आविष्कारात घडल्या. स्वातंत्र्यानंतरही संयुक्त महाराष्ट्रवाद, मराठीवाद, दलीत चेतना, हिंदूत्वाचे राजकारण, धार्मीक ध्रुवीकरण, जमीनीचे समान वाटप, सर्वोदयी, समता सैनीक, सनातन, मराठा महासंघ, शिवधर्म, विद्रोही चळवळ अश्या एक ना अनेक विचारधारा महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत. त्या आपल्याला आवडोत अथवा ना आवडो त्या विचारधारा आहेत. ह्या आकलनच्या आधारावर मी वरील विधान केले. जातीपातीच्या राजकारणाचा विचार केला तर खूप लिहीता येईल. सध्याच्या तुम्ही उल्लेखलेल्या आणि तुमचा रोख असलेल्या प्रकाराकडे तिसरा व्यक्ती होऊन मी जेव्हा बघतो तेव्हा हा प्रकार ज्याच्या हाती ससाण तो पारधी असा आहे असं मला वाटतं. आधी ज्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा त्यांनी जे प्रकार केले आता त्यांच्या विरूध्द तसेच प्रकार होत आहेत, उद्या कदाचित परिस्थिती बदलली आणि सत्तेचे पारडे बदलले तरी असाच प्रकार होईल असे वाटते. पुरोगामी हा शब्द ब्राम्हणद्वेशाचा प्रतिशब्द आहे असं किमान माझं तरी मत नाहीये. मी पुरोगामी हा शब्द सुधारणावादी अश्याच अर्थाने वापरतो आणि भविष्यात वापरेन. - नीलकांत

In reply to by नीलकांत

नीलकांत - या आपल्या पोस्ट मधल्या विचारांबद्दल काहीच वाद नाही. मात्र पुरोगामी हा शब्द गेल्य काही वर्षात खूप वाढत्या प्रमाणात ब्राह्मणविरोधी अशा अर्थाने वापरला गेलेला आहे. अगदी ढळढळीत उदाहरण म्हणजे २००९ च्या मराठी साहित्य संमेलनातील कौतिकराव ठाले पाटील यांचे अध्यक्षीय भाषण. या पेक्षा आणखी "अधिकृत" उदाहरण शोधून सापडणार नाही. त्यात त्यांनी ब्राह्मण साहित्यिक म्हणजे "पारंपारिक मानसिकता" व अ-ब्राह्मण म्हणजे पुरोगामी अशी सोपी वाटणी केली होती. येथे भाषण मिळेल ऐकायला http://www.maayboli.com/node/7802

In reply to by फारएन्ड

पुरोगामी आणी प्रतिगामी याशब्दांत आपण किमान सन १८९९ पासून (वेदोक्त) अडकलो आहोत असं वाटतं. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सध्या पुरोगामी म्हणजे ब्राम्हणेतर किंवा ब्राम्हणविरोधी असा रंग या शब्दाला येतोय हे मला पटतंय. मात्र केवळ कौतीकराव म्हणतात म्हणून नव्हे तर मी एकंदरीतच महाराष्ट्राचा सामाजीक इतिहास वाचत असताना. वेदोक्त प्रकरणांनंतर महाराष्ट्राच्या समाजाची जी विभागणी करण्याचा प्रयत्न झाला. त्यात त्यावेळी आपल्या उच्चवर्णाच्या अहं मध्ये अडकलेल्या ब्राम्हण वर्गाला एकटं पाडण्यासाठी व एकून सर्व समाज ब्राम्हणेतर या शब्दासोबत उभे करण्याचा प्रयत्न झाला. पुढे हा शब्द सुध्दा नकारात्मक किंवा विरोधीपक्षाला महत्वदेणारा म्हणून त्याजागी पुरोगामी शब्द वापरायला सुरूवात झाली. मात्र केवल पुरोगामी म्हटल्याने कुणी पुरोगामी होत नाही. त्यासाठी आपली वैचारीक बैठक बदलायला हवी ना? ती तशी होताना दिसत नाही. वर सध्याच्या जाणत्या राजाचं उदाहरण आहे. सर्वांना तो रोख कुणाकडे आहे हे स्पष्ट आहे असं मी गृहीत धरतो, अशी व्यक्ती जी जातीपातीचंच राजकारण करते किंवा अत्यंतीक द्वेशाचं राजकारण करते अश्या लोकांना तुम्ही आम्ही, केवळ ते म्हणतात म्हणून पुरोगामी म्हणायचं का? मी बर्‍यापैकी सुधारणावादी आहे पण साधना किंवा अनिस ज्या प्रमाणात पुरोगामी आहेत त्यांची मते मला झेपत नाहीत. त्यांच्यात, अनेक लोक जन्माने ब्राम्हणसुध्दा आहेत. त्यांना पुरोगामी म्हणू नये? मला तुमचं मत पटतंय की सध्या या शब्दाचा अर्थ आणि संदर्भ बदललाय. यापुढे मी काळजी घेईन. पण तरी सुध्दा किमान मी हा शब्द कुठे वापरला तर त्याचा अर्थ व संदर्भ हा असा घेऊ नये ही विनंती. - नीलकांत

In reply to by नीलकांत

मी फक्त काही लोक तो तसा वापरतायत हे दाखवत होतो. तुम्ही ज्या संदर्भात वापरलाय त्याबद्दल काहीच वाद नाही.

In reply to by फारएन्ड

>>>>>> पुरोगामी हा शब्द गेल्य काही वर्षात खूप वाढत्या प्रमाणात ब्राह्मणविरोधी अशा अर्थाने वापरला गेलेला आहे. असे काही नाही. किमान श्ब्दाबद्दल तरी गैरसमज असू नये 'पुरोगामी' शब्दाचा अर्थ 'प्रगातिपर' असा आहे बाकी चालु दया....! -दिलीप बिरुटे

In reply to by नीलकांत

ए १ प्रतिसाद. एक जुनाट झेरॉक्सचं मशीन आहे प्लेटसवालं. ते एका अंधा-या खोलीत ठेवलंय. त्याला एक प्रिंटर जोडलाय. एका कळकट कॉम्प्युटर वर एक गालफाड बसलेला, जाड भिंगाचा मनुष्य त्या कॉम्युटरवर बसलेला असतो. कॉम्प्युटरकडे बघून तो समाधानाने हसतो आणि एक प्रिण्ट सोडतो. प्रिण्ट झाल्या कि उजव्या टेबलावरच्या माणसाला देतो. तो समाधानाने मान हलवतो. मग ती प्रिण्ट घेऊन त्याची झेरॉक्स काढतो. या मशीनमधे मजकुराची उलटापालट होते. जी कॉपी बाहेर पडते ती डाव्या टेबलावरच्या माणसाला देतो. त्याने समाधानाने मान हलवली कि.... तो कळकट, जाड भिंगाचा चष्मा घेतलेला मनुष्य एक भगवा स्केच पेन घेऊन पहिल्या प्रिण्टवर नाव टाकतो - सनातन प्रभात आणि रिव्हर्स कॉपीला स्टेपल मारत निळा स्केच पेन घेऊन नाव टाकतो मूलनिवासी !!

In reply to by नीलकांत

कारण हे मूलनिवासींचे ब्लॉग, सनातनचे वृत्तपत्र, आजच्या पुरोगाम्यांची धर्मनिरपेक्षता, मार्क्सवाद्यांचे आर्थीक आकलन, माओवाद्यांचे शेतकरी आदीवासींवरचे अन्याय, यात अन्य काही नावे घेता येतील. हे सर्व मला एक सारखेच आहेत. झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांवर शक्ती खर्च करून काही अर्थ नाही. यादी अजून वाढवता येईल नवोदारमतवाद्यांनी भुलवलेले मध्यमवर्गीय फॅसिस्टांनी जागवलेल्या भाषिक अस्मिता जागतिकीकरण समर्थकांनी/ची के/झालेली ससेहोलपट अमेरिकनांनी लादलेली गुलामगिरी उच्चवर्णीयांनी उभा केलेला इंग्लिशचा बागुल्बुवा इंग्रजी इतिहासावरुन उच्चवर्णियांना झोडपणारे बहुजन यादी खुप मोठी होऊ शकते... असो.

प्रमोद जी अशा ब्लॉग कडे दुर्लक्ष करायचे असते. तुम्ही कधी एकदा त्याची दखल घेताय व त्यानिमित्त आपल्या विचारांचा कसा प्रसार होतो आहे हेच ते पहात असतात. प्रेम जशी भावना आहे तशी द्वेष ही पण एक भावना आहे. जात धर्म प्रांत भाषा यावर आधारलेल्या अस्मिता या त्याला कारणीभूत असतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बाबरी मशीदीचं पतन हा माणसाच्या द्वेषाचा परमोच्च बिंदू होता, त्यातून प्रतिक्रियावादी द्वेषाची नव्या रंगांची रोपटी उगवलीत. जर हे अ‍ॅक्सेप्टेबल नसेल तर काहीच बोलायचं नाही. गुजरात दंगली आणि मुंबईच्या दंगली या आत्यंतिक द्वेषातून नरसंहाराच्या हेतून झालेल्या आहेत. या निव्वळ राजकिय हेतूने नाहीत तर द्वेषाची परिसीमा कळसाला पोहोचलेल्यांच्या उन्मादाला हवा घालणा-या कत्तली आहेत. मुंबईच्या दंगलींच्या आधी बाँबस्फोट आणि अतिरेकी हल्ले हे देशाला (पंजाब सोडून) माहीतच नव्हते.

In reply to by खटासि खट

या प्रतिसादात सध्या भारतातील स्थानिकांची परकीय सत्तेसोबत हातमिळवणी करून जो आतंकवाद चालला आहे त्यांच्या कृत्याचं छुपं समर्थन करण्यासाठी बाबरी मशिदीच्या पतनाचा वारंवार उल्लेख होतो असं मला वाटतं. त्यामुळे आजच्या या परिस्थितीला केवळ बाबरी मशिदीचे पतन हाच एक मुद्दा असेल असं मला वाटत नाही. अगदी माझ्या माहिती प्रमाणे मुंबई बॉम्ब्स्फोटातील बारूद हे ६ डिसेंबर आधी भारतातील रायगडमध्ये पोहोचलं होतं. ( संदर्भ - अविनाश धर्माधिकारी यांचे भाषण) भारतात ८०च्या दशकात जे अनेक बदल घडले आणि त्यावेळच्या नेतृत्वाला त्याचा अंदाज आला नाही म्हणून पुढील अनेक बदल झालेत त्यात धार्मीक धृवीकरण हा महत्वाचा बदल होता. पण बाबरी मस्जिदीचे पतन घडले नसते तर देशातील काही लोक या परकीय शक्तीच्या हातचे खेळणे बनले नसते असे आपले मत असेल तर ते फार धाडसाचे आणि ८०च्या दशकाच्या मागे पुढे आणि विशेषतः सोव्हियत रशीयाच्या पतना नंतर जगातील बदलांचा अभ्यास न करता केलेले विधान आहे असे मला वाटते. थोडा जाता जाता उल्लेख करतो की श्रीपेरांबदुरची घटना बाबरी पतनाच्या आधीची होती. - नीलकांत

In reply to by नीलकांत

आम्ही पसरवतो तो द्वेष नाही असं समर्थन दोन्ही बाजूंनी होऊ शकतं. बाबरीच्या आधी बाहेरच्या देशातल्या शक्तिंना भारतात बाँबस्फोट करणं शक्य झालं होतं का ? (पंजाब + जम्मू काश्मीर ही दोन राज्ये वगळून म्हणा). श्रीपेरांबदुरच्या घटनेचा उल्लेख करतच आहात तर तिचा इतिहास पण सांगा. त्याची तुलना इथे करता येणार नाही. ज्या संघटनेने ही हत्या केली तिची स्थापना कुणी केली याची माहीती घ्या. चुकीच्या माहीतीवर मतं बनवू नयेत. शेतकरी संघटना द्वेष करते या नव्या माहीतीची ज्ञानात भर पडली. कांद्याचे भाव वाढले तर फेसबुकवर संताप व्यक्त करणारे आता भाव कोसळल्यानंतर शेतकरी मेला तरी आम्हाला काय त्याचे अशा थाटात कोषात मग्न झालेली आहेत. त्याबद्दल शेतक-यांनी विचारलं तर तो द्वेष होतो होय ? एकंदर विचारांची दिशा लक्षात येतेय.

In reply to by खटासि खट

नीलकांत यांचा या विषयाचा अभ्यास माहित करून घेतला असतात तर त्यांना अभ्यास वाढवा असं तुम्ही नक्कीच म्हणाला नसतात! मुंबई बॉम्बस्फोटात वापरलेले आरडीएक्स बाबरी मशीद (राममंदिर) पडण्याआधी भारतात आलं होतं असं नीलकांतने सांगितलं तर मी डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवीन!! समजा बाबरी पाडली गेली नसती तर ते काय दिवाळीत उडवायला आणलं होतं का? बरं हे जसं तुम्ही म्हणताय, तसंच गुजरात दंगे सुद्धा गोध्रा ट्रेन जळीत प्रकरणाची प्रतिक्रिया होती असं कोणी म्हटलं तर आपण त्याचा प्रतिवाद करू शकणार नाही. हल्लीच मुजफ्फरनगर इथे सरकार प्रायोजित दंगे झाले त्यामागे काय प्रेरणा होती असं तुम्हाला वाटतंय? या सगळ्या दंगली, बॉम्बस्फोटांच्या मागे बर्‍याच गोष्टी काम करत असतात. एक इमारत पाडली म्हणून द्वेष भडकला इतकं हे साधं अजिबात नसतं!

In reply to by पैसा

केवळ एक इमारत पडली इतकी साधी घटना होती का ती ? त्याआधी बॉम्बस्फोट आणि दहशतवादी घटना झाल्यात असं आठवतं का ? हा मुद्दा मी द्वेष कसा पसरवला जातो त्यासाठी सांगितला. आपण केला तर तो द्वेष नाही, आपला केला तर द्वेष असं समीकरण झालंय.

In reply to by खटासि खट

तेच म्हटलं ना! त्याच्या मागच्या घटना सुद्धा केवळ तेवढ्यापुरत्या मर्यादित नाहीत. मुंबई बॉम्बस्फोटांची तयारी खूप आधीपासून सुरू होती, त्याचा बाबरी मशिदीशी संबंध जोडणे बरोबर नाही. दहशतवादी घटना आणि बॉम्बस्फोट त्याआधीही सुरू होतेच पण एवढ्या व्यापक प्रमाणात नव्हते. काश्मिरमधला दहशतवाद यात मिक्स करू नका असं म्हणता येणार नाहीच. कारण पाकिस्तानचा भारतद्वेष हा त्यापासून वेगळा काढता येणार नाही. भारतात होणारे बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया, धार्मिक दंगली या सगळ्याची मुळं बहुतेक वेळा सीमेपलिकडे सापडतात. जेव्हा भारताबरोबर युद्ध करणे कठीण आहे हे पाकिस्तानच्या लक्षात आले आणि अफगाणिस्तान मधून रशियाने माघार घेतली तेव्हा त्यांनी हा दहशतवाद पोसायचा मार्ग अवलंबला. जे काही आहे ते निव्वळ आंतर्राष्ट्रीय दहशतवाद आहे. नाहीतर सामान्य माणसांकडे मुझफ्फरनगर दंग्यात एके४७ कुठून आल्या? प्रेमाने धार्मिक विद्वेषाला उत्तर देता येईल असा तुमचा भाबडा समज तर नाही ना?

In reply to by पैसा

पण बाबरी नंतर अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे हे नक्कीच. एक सिंबॉलिक गोष्ट म्हणून चेतवायला लै वर्षांपर्यंत वंगण पुरलं लोकांना. हे मान्य करायला अडचण नसावी. त्या अर्थाने पाहता ती घटना चूक होती हे नक्कीच. पेनी-वाईज होण्याच्या भानगडीत पाउंड-फूलिश नाही झाले म्हणजे मिळवली.

In reply to by बॅटमॅन

चूक होतीच यात काही शंका नाही. नंतर हायकोर्टाने दिलेला निकाल पाहता ते अधोरेखित झालंच. जे कोर्टात मिळालं असतं त्यासाठी एवढे वातावरण तापवायची गरजही नव्हती. या पाडापाडीच्या मागे केवळ रामजन्मभूमी मुक्त करणे एवढा हेतू नव्हता, तर बरेच राजकारण होते. जे कोणाही सुजाण नागरिकाला कधीही आवडण्यासारखे नाही.

In reply to by पैसा

अर्थातच. प्युअरलि राजकीय मूव्ह होती ती. राजकारणाचे वावडे नै पण त्यापायी असे काही केले तर भांडवल करायची संधी फार मिळते. त्यामुळे वाईट वाटते. बाकी सहमत आहेच.

In reply to by खटासि खट

येथे शेतकरी संघटना कुठून आली? आणि विषय कुठे निघालाय? असो... इतर मुद्यांकडे वळूया. श्रीपेरांबदूरच्या घटनेचा उल्लेख एवढाच की पंजाबाशिवायही भारतात विस्फोटक प्रकार झालेत. त्याची पार्श्वभूमी सविस्तर सांगता येईलही. आणि मी वर बोलल्या प्रमाणेच ८०च्या दशकातील नेतृत्व येत्या काळाची पाऊले ओळखण्यात कमी पडल्यामुळे भारतात सत्ताकांक्षी अनेक घटकांना जनमतावर आपलं गारूड चालवता आलं. याच अश्या नेतृत्वापैकी एका नेतृत्वाच्या स्वतःच्या अपरिपक्वतेमुळेच शेवटी परिणीती श्रीपेरांबदूरची झाली. शेवटी नुकसान भारताचंच झालं. याच वेळी ८० च्या दशकातील आसाम व ईशान्य भारताचंही उदाहण देऊनच ठेवतो. मी केवळ बॉम्बस्फोट भारताच्या दक्षीणेसही झाले होते एवढं म्हणालो यावरून माझा सदर घटनेबद्दलचा आवाका तुमच्या लक्षात आला म्हणजे तुम्ही ग्रेटच आहात असं वाटतं. मूळात ७१ च्या युध्दा नंतर भारताच्या विरोधी परकीय शक्तींनी आपला पावित्रा बदलला होता. त्यांना ताबडतोब सुपीक जमीन पंजाबची सापडली होती. मात्र भारतात अनेक फॉल्टलाईन्स होत्या आणि आहेत त्यांचा फायदा घेण्यासाठी आपल्या प्रत्यक्ष शत्रु व अप्रत्यक्ष शत्रुंच्या यंत्रणा कार्यरत होत्या व आहेतही. त्याच वेळी ओपेक व अन्य घटनांमुळे सौदीला पडलेली पॅन इस्लामची स्वप्ने आणि वहाबीझमचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या योजना आदी अनेक गोष्टींचा एकत्रीत रिझल्ट हा बाबरी नंतरच्या प्रतिक्रियात्मक आविष्काराला कारणीभूत आहे असं मला वाटतं. बाबरी झाल्याने त्यापैकी काही तात्काळ ट्रिगर झाल्या असतीलही मात्र बाबरी झालं नसतं तरीसुध्दा सध्या सुरू असलेला प्रकार सुरूच असता असं मला वाटतं. कारण सध्या जे भारतात सुरू आहे त्याला केवळ भारतीय पार्श्वभूमी आहे आणि काहीच जागतीस संदर्भ नाही असं मला मुळीच वाटत नाही. त्यामुळे कुठला पक्ष योग्य आणी कुठला अयोग्य ही सापेक्षता सोडून भारताचा विचार केल्यास हे दोन्ही वाईटच आणि दोन्ही पक्षाचे आपल्या कृत्यांवरचे पांघरून असमर्थनीयच. (म्हणजेच अतीशय ठामपणे मी पुन्हा असं म्हणतोय की ) -
'सध्या भारतातील स्थानिकांची परकीय सत्तेसोबत हातमिळवणी करून जो आतंकवाद चालला आहे त्यांच्या कृत्याचं छुपं समर्थन करण्यासाठी बाबरी मशिदीच्या पतनाचा वारंवार उल्लेख होतो'.
माझ्या विचारांची दिशा नेमकी कुठली हे तुमच्या लक्षात आल्यास मलाही कळवा. मला मदत होईल. :) आता कुठे लिहीता होतोय. - नीलकांत

In reply to by नीलकांत

येथे शेतकरी संघटना कुठून आली? आणि विषय कुठे निघालाय? >> अहो असं काय करताय ! तुम्ही त्या पोस्टला लाईक सुद्धा केलय. मला .................... आणि शेतक-यांचे प्रश्न हे सगळं एकच वाटतं. त्याला उत्तर दिलं तर असंबद्ध का ? मला रुल्स कळायला वेळ लागेल असं वाटतंय

In reply to by नीलकांत

तुम्ही नक्कीच लिहा. मला तुम्ही या पिढीचे वाटल्याने श्रीपेरांबदुर च्या घटनेबाबत तसं म्हणालो. त्याबद्दल क्षमस्व ! श्रीपेरांबदुरची घटना ही कशाची परिपाक आहे आता यावर बोलण्यात अर्थ नाही. मात्र त्याचा संबंध देशात पडत चाललेल्या सामाजिक दरीशी जोडता येणार नाही हे माझं अजूनही मत आहे. त्याआधीही इंदिरा गांधींच्या बाबतीत अशी घटना घडली होती जिचा पंजाबशी संबंध होता. दोन्ही घटनांमधे सामाजिक दरी रुंद झाली असं झालं नाही. दिल्लीच्या दंगली हा एका राजकिय पक्षाने घेतलेला फायदा होता. त्याने शीख - हिंदू अशी कायमची फूट पडलेली नाही. शिखांचा राग हिंदूंवर आहे, कारण शिखांची हत्या झाली याला मेडीयातून व्यवस्थित न्याय मिळाला. याउलट बाबरी मशीद पडल्यानंतर जे काही झालं त्याने कायमची फूट पडली. तसंच लगेचच जे मुंबईचे दंगे झाले त्यामुळे परकीय शक्तींना स्थानिकांची मदत मिळायला लागली असं माझं मत. तुम्ही बदलू शकलात तर मुद्यांचा विचार करायला तयार आहे.

In reply to by खटासि खट

शिखांचा राग हिंदूंवर आहे, >>> हे वाक्य अर्धवट आहे. त्यापुढे कि एका विशिष्ट पक्षावर ?? असं वाचावे. माफ करा. माझ्याकडच्या एका विशिष्ट तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा काही शब्द पोस्ट होताना डिलीट होतात.

In reply to by खटासि खट

>>> मुंबईच्या दंगलींच्या आधी बाँबस्फोट आणि अतिरेकी हल्ले हे देशाला (पंजाब सोडून) माहीतच नव्हते. मुम्बई दंगल किंवा बाबरी मशीद पाडापाडी झाली नसती तरी देशात बॉम्बस्फोट व अतिरेकी हल्ले झाले असते. फक्त त्या हल्ल्यांमागे काश्मिर हे कारण दिले गेले असते. १९४७ ते १९९२ पर्यंत पाकिस्तानने काश्मिर हे कारण वापरले. १९९२ ते २००२ या काळात बाबरी मशीद व मुम्बई दंगली हे कारण वापरले गेले. २००२ पासून गुजरात दंगली हे कारण वापरले जात आहे. १९९२ पूर्वी देखील भारतात बॉम्बस्फोट व अतिरेकी हल्ले होत होते. पाकिस्तानने १९७१ पर्यंत काश्मिरवरून ३ युद्धे केली. पण काश्मिर घेण्यात पाकिस्तानला अपयश आले. त्यामुळे १९७८ पासून पाकिस्तानने भारताशी प्रत्यक्ष युद्ध न करता भारतात अतिरेकी हल्ले व बॉम्बस्फोट करणे सुरू केले. १९८९ पर्यंत शीख अतिरेक्यांकरवी हे कारस्थान सुरू होते. १९८९ मध्ये रशिया अफगाणिस्तानातून परत गेल्यावर पाकिस्तानने तिथल्या मुजाहिदीनना अतिरेकी कारवायांसाठी भारतात पाठविले. त्यामुळे १९८९-९० पासून भारतात सर्वत्र अतिरेकी हल्ले व बॉम्बस्फोट सुरू झाले. १९९०-१९९२ या काळात सुद्धा पंजाब वगळता भारतात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट व अतिरेकी हल्ले झालेले आहेत. डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पडल्यावर या अतिरेक्यांना आयतेच नवीन कारण मिळाले. १९९२ किंवा २००२ झाले नसते तरी भारतात अतिरेकी हल्ले व बॉम्बस्फोट झालेच असते. १९९२ व २००२ हे फक्त एक निमित्त आहे.

अशाना अनुल्लेखाने मारणे हा उत्तम उपाय. त्यांच्या ओरडण्याने जे संत होते त्याना फरक पडत नाही. समजा साईबाबा किंवा गजानन महाराज हे भुमीगत झालेले क्रांतीकारी असतील. त्यामुळे आत्ता शंभर दीडशे वर्षाम्नन्तर त्याने काय फरक पडणार आहे.

नीलकांत यानी दिलेल्या यादीतील एक दोन पानी माझ्याकडे नियमित येते.कुणीही न वाचता ते रद्दीत जाते. मला केशरी व निळा रंग आवडेनासा झाला आहे !

In reply to by चौकटराजा

नीलकांत यानी दिलेल्या यादीतील एक दोन पानी माझ्याकडे नियमित येते.कुणीही न वाचता ते रद्दीत जाते. फुकट येते का पैसे देऊन? पैसे देऊन येत असेल तर ते बंद का नाही करत? आणि जर पैसे न देऊन येत असेल तर मलाही घ्यायला आवडेल. रद्दीलाही चांगला भाव आहे. :-)

मी वरिल सर्व प्रतिसाद पाहता असे दिसुन येते की पाणी आपल्या गळ्यापर्यंत येत नाही तो पर्यंत गप्प राहवे असे सुचित होते. दुसरे कारण असे की जर तुम्ही त्यांना जबाब दिला नाहीत तर ते उलट जास्त चेकळातील, त्यांची भीड वाढेल आणि मग खटासि खट यांच्या म्हणण्याप्रमाणे माणसाच्या द्वेषाचा परमोच्च बिंदू होईल आणि आत्यंतिक द्वेषातून अंतर्गत दंगली वर उफाळुन येतिल. ज्याच्या फायदा मग बाहेरिल लोकांना होइल (परकीय शक्ती), म्हणजे शिवाजी महाराजांनी, पेशव्यांनी आपाप्सातली लढाई घडुन न येंण्याच्या जो आटोकाट प्रयत्न केला ती शिकवण मग व्यर्थ होती असे समजयचे काय? इतिहास साक्षी आहे की परकीय आक्रमाणांपेक्षा अंतर्गत कलहच सर्व विनाशास करणीभुत ठरला आहे. अवांतर :- मला दर्दुकाका पेक्षा "पम्या" म्हटलेले जास्त आवडेल.

स्वामी स्मर्थ म्हणजे पानिपतातील भाऊ हा समज तर अनेक लोकांमध्ये आहे. यात नवीन काही नाही.

In reply to by उद्दाम

या चर्चेत आपले स्वागत आहे.. आपल्या विचारांनी या चर्चेला एक निराळीच उंची मिळेल यात शंका नाही.

In reply to by आनन्दा

हम गया नहीं , हम अभी जिंदा है

In reply to by उद्दाम

हा समज पहिल्यांदा ऐकतोय. स्वामी समर्थ ऊर्फ श्री. बापट (नाव माहिती नाही) हे १८५७ च्या उठावात सहभागी असून नंतर मार्ग बदलला असे वाचले आहे.

In reply to by बॅटमॅन

श्री स्वामी समर्थ म्हणजे कर्दळीवनात जाऊन गुप्त पणे राहीलेले नृसिंह सरस्वती. असेच ऐकलेले आहे आणि ते योग्यही वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक कमीतकमी. आता औतारबितार म्हण्णार असाल तर आमची अळीमिळी गुपचिळी.

In reply to by बॅटमॅन

आपला अभ्यास वाढ्वा मालक असे सुचवायची माझ्या सारख्या पामराची काय कुवत नाही,असो

In reply to by अनिरुद्ध प

ऑं? कोणाला होता हा प्रतिसाद बॅट्ञाला तर नाही ना? विचारायचे कारण एवढेच की माझ्या अल्प माहितीनुसार पनिपताची लढाई १७६१ साली झाली त्यावेळेस सदाशिवरावभाऊ साधारण ३० वर्षाचे होते. तर स्वामी समर्थांचा काळ साधारण १८५० चा आहे चू.भू.द्या.घा. भाऊ १२० - १५० वर्षे जगले असे जर आपले म्हणणे असेल तर गोष्ट वेगळी.

In reply to by मृत्युन्जय

मृत्युन्जयजी पण ज्याने कोणी हे लिहले आहे त्याने स्वतःहाचा फोन नं दिला आहे. आपण त्याच्या शी चर्चा करु शकतो. तसेच तो म्हणतात की स्वामी चे निर्वाण हे इ.स.१८०० साली झाले म्हणजे स्वामी ७१ वर्षे जगले. दुसरे असे की ते अक्कलकोटला पण जावुन आलेत आणि आवाहन केले की हे खरेखोटे करुन दाखवा म्हणुन म्हाणजे मी तसे अनिता पाटिलच्या ब्लॉग वर वाचले होते.

In reply to by प्रमोद देर्देकर

स्वामींचे निर्वाण १७६१ सालीच झाले आणि ते आलटुन पालटुन सदाशिव राव भाऊ आणि स्वामी समर्थ हा खेळ खेळायचे असे नाही लिहिले म्हणजे मिळवली. उद्या हे महान लोक बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच शिवाजी महाराज असे लिहायलाही कमी करणार नाहित.

In reply to by मृत्युन्जय

उद्या हे महान लोक बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच शिवाजी महाराज असे लिहायलाही कमी करणार नाहित.
अरे देवा.. दोघांबद्दलही नितांत आदर असूनही ह्या शक्यतेचा विचार करुनच अशक्य हसायला होतंय.. =)) =))

In reply to by प्रमोद देर्देकर

>>> तसेच तो म्हणतात की स्वामी चे निर्वाण हे इ.स.१८०० साली झाले म्हणजे स्वामी ७१ वर्षे जगले. श्री स्वामी समर्थांनी महासमाधी शके १८०० मध्ये म्हणजेच इसवी सन १८७८ मध्ये घेतली. ते जर पानपतातले भाऊसाहेब असते, तर १८७८ साली त्यांचे वय कमीतकमी १५० वर्षांचे असते.

In reply to by अनिरुद्ध प

साहेब, दत्त संप्रदाय हा कै आमच्या अभ्यासाचा विषय नव्हे. ऐकीव अन वाचीव म्हायतीवरच काय ते बोलतो. त्यानुसार नृसिंह सरस्वतीनामक साधू/संत हे बहामनी/आदिलशाही काळातले होते तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे एकोणिसाव्या शतकातले होते. अवतार वैग्रे कल्पना इथे लागू होतील/नै वैग्रे मला कल्पना नाही. किमान या दोघांच्या लैफटैममध्ये शेकडो वर्षांचे अंतर आहे इतकेच सूचित करावयाचे होते.

In reply to by बॅटमॅन

तीच तर गंमत आहे. नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यात ३०० वर्षे की कितीतरी जास्त काळ आहे. पण 'तेच हे ' असे मानायला लोकांना प्रॉब्लेम नसतो. पण सदाशिवभाउ म्हणजे स्वामी समर्थ असे कुणी म्हटले की हेच लोक उद्गारतात ! आँ ! १२० वर्ष माणूस कसा जगेल? :)

In reply to by उद्दाम

सदाशिवराव भाऊ १२० वर्ष जगले असतील तर त्याबद्दल काहीच आक्षेप नाही. त्यांची जात काढण्याला आहे. हं.. आता सदाशिवरावभाऊ भूमीगत होऊन १२०+ वर्षे धडधाकटपणे जगले होते असे मान्य करायचे असेल तर प्रश्नच नाही. चित भी मेरी पट भी मेरा... ब्रिगेडी लोकांच्या वाट्याला मी जात नाही ते त्याच्यामुळेच.

In reply to by बॅटमॅन

शेकडो वर्षांचे अंतर होते,हे मान्यच आहे,कारण श्री स्वामी समर्थ यांना प्रत्यक्ष पाहीलेल्यांनी सुद्धा त्यान्ची कातडी(skin) ही खूप जुनी वाटत असल्याचे वर्णन केले आहे ते सुद्धा KODAK या कम्पनीच्या विदेशी माणसाने त्यांचा फोटो काढला होता असे ऐकुन आहे,बाकी काही नाही.

In reply to by अनिरुद्ध प

ते सुद्धा KODAK या कम्पनीच्या विदेशी माणसाने त्यांचा फोटो काढला होता असे ऐकुन आहे
कसे शक्य आहे? श्री समर्थांचे निर्वाण १८७८चे तर कोडॅक कंपनीची स्थापना १८८८ची आहे.