Skip to main content

विहिरींत पाव

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 28/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने १७३९ साली उत्तर कोकणातून धर्मांध आणि क्रूर पोर्तुगीजांची कायमची हकालपट्टी केली आणि तेथील जनतेला दोनशे वर्षापासून चालत आलेल्या ‘इनक्विझीशन’ नावाच्या सैतानी वरवंट्यातून सुटका केली. इनक्विझीशन म्हणजे कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माला अनुसरण्यास नकार देणाऱ्या माणसांची प्रथम चाप लावून नखे खेचून काढणे, जीभ कापणे, यंत्राने हाडे चुरणे, शरीर सोलणे अश्या शारीरिक छळांपासून सुरूवात करून त्याचा शेवट तेलात भिजवलेली गोणती अंगावर घालून माध्यान्हीच्या भर उन्हात सार्वजनिक स्थळी जिवंत जाळण्यात होत असे. साने गुरूजींनी ह्या प्रथेला मध्ययुगीन रानटीपणा असे नाव दिले आहे. Inquisition Cruelty युरोपात चालू केलेली ही भीषण प्रथा पोर्तुगीजांनी येताना आपल्या सोबत आणली. सहासष्ट गावांचा समूह असलेला सहासष्टी (साष्टी) प्रांत तसेच गोवा, दीव-दमण हे पोर्तुगीज अमलाखालील प्रदेश त्यात भरडून निघाले. पोर्तुगीजांच्या जुलमाच्या कथा ऐकून लोक खचून जात होते. मनात येईल त्यावेळी लोकांना पकडून आणायचे आणि कॅथॉलिक ख्रिश्चन बनण्याची सक्ती करायची आणि विरोध करणाऱ्यांवर पाशवी अत्याचार करायचे हे ठरूनच गेलेले होते. असे असताना प्राणभयाने ख्रिस्ती होणारे किती आणि विहिरीत पाव टाकल्याने ख्रिस्ती झालेले किती हे संशोधन करायची वेळ आली आहे. माझ्या स्वतःच्या मते पाव टाकलेल्या विहिरींतील पाणी प्यायल्याने हिंदुंनी धर्माबाहेर काढले ही सांगोवानगीची गोष्ट आहे. एकतर मैद्याचा पाव म्हणजे गोमांस नव्हे. तसेच कोकण, गोवा ह्यां सारख्या प्रांतांमध्ये जिथे घरटी एक विहिर होती तिथे नक्की किती विहिरींमध्ये पोर्तुगीज लोक पाव टाकत बसले असतील ते कळायला मार्ग नाही. एक गाव एक पाणवठा अशी स्थिती असती तर आपण म्हणू शकलो असतो की विहिरींत पाव टाकल्याने मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. असे घडलेच नसेल असे नाही पण त्याचे प्रमाण किती हे तपासायला हवे. कारण सैतानी पोर्तुगीज अत्याचारांना धीराने तोंड देणारी आणि तरीही जमेल तसा आपला धर्म शिल्लक ठेवणारी हिंदु जनता मैद्याचा पाव खाल्ल्याने कोणाला धर्माबाहेर काढेल हे जरा कठीणच वाटते. एकुणात विहिरीत पाव टाकल्याने बाटणे ही दुर्मिळ घटना असावी. हिंदुंनी धर्म न सोडण्यासाठी जे हाल सोसले ते पाहता ही अफवाच जास्त वाटते. केतकर ज्ञानकोश लिहितो - एखाद्या विहिरीत पावाचा तुकडा टाकून सबंध गावचा गांव बाटवीत असे “म्हणतात”. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानकोशही असे काही घडले आहे असे छातीठोकपणे म्हणत नाही. आज हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे सध्या गोवा आणि उत्तर कोकणात काही धर्मांतरित ख्रिस्ती लोकांमध्ये पोर्तुगीजांविषयी प्रेम उचंबळून आले आहे. त्यांनी इतिहासाचे सोयीस्कर पुनर्कथन चालू केले आहे. त्यांच्या दृष्टिने धर्मभीरू पोर्तुगीज हे प्रेमळ आणि वत्सल होते आणि त्यांचे झालेले धर्मांतर (पाव टाकलेल्या विहिरींतील पाणी प्यायल्याने) हिंदुंनी धर्माबाहेर काढल्याने नाईलाजास्तव झालेले धर्मांतर आहे. पोर्तुगीजांचा ख्रिस्ती धर्म म्हणजे दया, क्षमा, शांती, करूणा ह्यांचे प्रतीक आहे.
अवांतर – ह्या नव्याने उत्पन्न झालेल्या पोर्तुगीज प्रेमाची एकच कथा सांगते - मध्यंतरी वसई किल्ला परिसरात एक मोठ्या आकाराची मानवी कवटी सापडली. त्या कवटीचे कार्बन डेटिंग न करता काही पाद्री मंडळींनी तिची पालखीतून मिरवणूक काढली आणि सर्वांना सांगत सुटले की बघा पोर्तुगीज लोक कसे शरीराने धिप्पाड होते, (अंगाने किरकोळ असलेले) मराठे ह्यांना हरवणे शक्यच नाही. ती पालखी जेव्हा वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिराबाहेर ठेवली गेली तेव्हा नागेश्वर मंदिराचे पुजारी ती पाहायला गेले. त्यावेळी त्यांना तीच कथा ऐकवली गेली. त्यावर त्या मंदिराचे पुजारी म्हणाले की ही कवटी पोर्तुगीजांची असेल ही पण मी ते मनगट शोधतो आहे ज्याने ही कवटी धडावेगळी केली. त्यानंतर त्या पाद्री लोकांनी पुन्हा कधी त्या कवटीचा पालखीत घालून प्रचार केला नाही.
असो. मी माझ्या अनेक इतिहासप्रेमी मित्रांना त्याकाळच्या मोडी तसेच उर्दू कागदपत्रांत ‘विहिरीत पाव‘ नावाच्या दंतकथेविषयी काही उल्लेख मिळतो का ते पाहायला सांगितले आहेच. पण आपणापैकी कोणास असा लिखित पुरावा माहित असल्यास कृपया विनाविलंब त्याविषयी इथे सांगावे ही विनंती.

वाचने 51510
प्रतिक्रिया 137

प्रतिक्रिया

विहिरीत पाव टाकला असता तो पाण्यात बुडेल की तरंगेल?

ईतिहास प्रेमी /तसेच अभ्यासक मंडळींच्या उत्तराच्या प्रतिक्षेत.

अ.का.प्रियोळकरांच्या गोवा इन्क्विझिशन नामक अप्रतिम पुस्तकात याबद्दल काही माहिती वाचल्याचे आठवते. घरी जाईन तेव्हा त्यात पाहून सांगेन.

गोव्यामधील जी देखणी मोठमोठाली चर्चेस आहेत, त्यांच्या तळघरांत तुम्ही लेखात नमूद केले आहे तसे छळ होत असत, हे तर खरेच...

In reply to by यशोधरा

नुकताच प्रसिद्ध इतिहास संकलक श्रीदत्त राऊत ह्यांच्यासोबत वसई-पालघर परिसरातील १६ गडकोटांचा ट्रेक केला. ह्या छळाविषयी बोलताना ते इतकेच म्हणाले की कशाप्रकारे अनन्वित छळ झाला ते ऐकणे सुद्धा क्लेशदायी आहे आणि तुम्हा लोकांसोबत बरीच लहान मुले असल्याने मी ह्या बाबत मोजकेच बोलेन. पण धर्माच्या नावाखाली अतिशय पाशवी छळ केला गेला हे सत्य आहे.

माझ मुळ गाव विरार आहे. तिथले 'कुपारी' लोक "आम्ही विहीरीत पाव टाकल्याने बाटलो" असच सांगायचे. खर खोट माहीत नाही. पण आजही पैसे घेउन क्रिस्ती धर्म स्विकारणार्यांची कमी नाहीये तिथे याच खर दुख आहे.

In reply to by शिल्पा नाईक

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, पूर्वोत्तर राज्यात अनुभव येतोच आहे. कुपारी म्हणजे कुप ज्यांचा अरि आहे (होता) असा घ्यावा लागेल बहुधा.

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग

नुस्ता मैद्याचा पाव नाही. पोर्तुगीझ 'उष्टा पाव' विहिरीत टाकायचे. विहिर हा पिण्याच्या पाण्याचा एकच स्रोत असल्याने अशा 'उष्टा' पाव टाकलेल्या विहिरीतील पाणी प्यायले की हिन्दूचे धर्मांतर होऊन ते ख्रिश्चन होत असत. ह्यात हिन्दूंची खुप मोठी चुक होती. अशा लोकांना ते धर्मबाह्य ठरवत आणि पुन्हा हिन्दू धर्मात परतायला मनाई करायचे. त्यांच्या बरोबरचे सर्व रोटी बेटी व्यवहार बंद केले जायचे. त्यांना अक्षरशः वाळीत टाकलं जायचं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिन्दूंच्या ह्या विचारसरणीला कडाडून विरोध केला होता. सावरकर म्हणाले होते, ह्या धर्मांतराने एक व्यक्ती त्या धर्मात जात नसून पुढच्या सर्व पिढ्या त्याच धर्मात जन्माला येतील. ज्यांनी एखाद्या धर्माचा अभ्यास करून त्या धर्माची तत्वे पटली म्हणून धर्मांतर केले त्यांना जाऊ द्या. पण ज्यांना उष्ट्या पावाने वगैरे फसविले आहे त्यांना हिन्दू धर्मात परत यायचे असेल तर परत आपल्या धर्मात सामाऊन घ्या. त्यांच्या पुढच्या पिढ्या अन्य धर्मात जाण्यापासून वाचवा. हिन्दू धर्म इतका दुबळा नाही की कोणी फसवून उष्टा पाव खाऊ घातला म्हणून बुडायला. ते हिन्दूच आहेत आणि हिन्दूच राहूद्या त्यांना तुम्ही जबरदस्तीने मुसलमान किंवा ख्रिश्चन बनवू नका. अंदमानच्या तुरुंगात असताना अशाच फसवणूकीतून दुसर्‍या धर्मात गेलेल्या कैद्यांना हिन्दू कैदी आपल्या पंगतीस जेवायला बसू देत नव्हते. त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून सावरकर जेवले आणि इतर कैद्यांचे प्रबोधन केले. -संदर्भ- माझी जन्मठेप- स्वातंत्र्यवीर सावरकर.

In reply to by प्रभाकर पेठकर

तत्कालिन लेखी पुरावा आहे का हा पहिला प्रश्न आणि माझे दुसरे म्हणणे असे की कॅथॉलिक धर्मांतरे (पोर्तुगीज कालखंड) ही शारीरिक छळातून होत तर प्रॉटेस्टंट (इंग्रज कालखंड) धर्मांतरे ही फसवणूक, आमिषे आणि प्रलोभने ह्या द्वारे होत असत. विहिरीत पाव हे पिल्लू इंग्रजांचे असावे. अर्थात् त्याविषयी अजून अभ्यास करूनच नक्की काय ते सांगता येईल. सध्या मसुराश्रमात स्वगृही परतण्याचा कार्यक्रम होत असतात. वसईकरांना स्वगृही आणण्यासाठी शंकराचार्य ही आले होते असे इतिहास संकलक श्रीदत्त राऊत म्हणाले. बजाजी निंबाळकरांना स्वधर्मात परत आणण्याची जी दूरदृष्टि शिवाजी राजांनी दाखवली ती पुढे कोणीही दाखवली नाही हे खेदाने म्हणावे लागेल. असो. लेखाचा मूळ मुद्दा तो नाही. विषयांतर झाले तर परत मूळ मुद्द्यावर येणे कठीण होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

याविषयीचा माझ्या पूर्वीच्या लेखातील एक उतारा:
पाद्री मंडळींनी आपला मोर्चा भारत, आफ्रिका, वगैरे देशांकडे वळवून गावाच्या विहिरीत पावाचा वा गोमांसाचा तुकडा टाकणं, इस्पितळं, अनाथालयं चालवणं, अश्या क्लुप्त्या लढवून हजारो लोकांना आपल्या कळपात ओढलं... अहो, त्यांनी गोमांस टाकून विहीर बाटवली, तर तुम्ही लगेच गोमूत्र शिंपडून ती पवित्र नाही का करून घ्यायचीत? त्यांच्याच चर्च वर गंगाजल शिंपडून ती मंदिरं झाली, असं सांगून, त्यांच्या गळ्यातील क्रूस काढून त्या ऐवजी जानवी अडकवून त्यांनाच आपल्या कळपात ओढायचं होतं, पण तुम्ही पडलात अडाणी आणि भित्रट.
संपूर्ण लेख इथे वाचा: http://www.misalpav.com/node/23698

In reply to by चित्रगुप्त

>>अहो, त्यांनी गोमांस टाकून विहीर बाटवली, तर तुम्ही लगेच गोमूत्र शिंपडून ती पवित्र नाही का करून घ्यायचीत? त्यांच्याच चर्च वर गंगाजल शिंपडून ती मंदिरं झाली, असं सांगून, त्यांच्या गळ्यातील क्रूस काढून त्या ऐवजी जानवी अडकवून त्यांनाच आपल्या कळपात ओढायचं होतं अगदी सहमत!! आपल्याच लोकांनी आधी मिशनर्‍यांतून आलेल्या लोकांनी शिवलं तरी बाटले म्हणून आपल्याच लोकांना बाजूला केलं त्याला कोण काय करणार. आपल्या लोकांनी मिशनर्‍यांना हे काम जास्त सोपं करुन दिलं असं मला वाटतं. जिथं हे काही चालेना तिथे वर म्हटलेले बळजबरीचे मार्ग पोर्तुगीजांनी अवलंबले असतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

सर जी आपले विचार स्तुत्य आहेत.. पण आपल्या हिंदू धर्माचा प्रॉब्लेम हा आहे की धर्मांतरित व्यक्तीला कोणत्या जाती मधे adjust करायचे..??

सावरकर म्हणाले होते, ह्या धर्मांतराने एक व्यक्ती त्या धर्मात जात नसून पुढच्या सर्व पिढ्या त्याच धर्मात जन्माला येतील. ज्यांनी एखाद्या धर्माचा अभ्यास करून त्या धर्माची तत्वे पटली म्हणून धर्मांतर केले त्यांना जाऊ द्या. पण ज्यांना उष्ट्या पावाने वगैरे फसविले आहे त्यांना हिन्दू धर्मात परत यायचे असेल तर परत आपल्या धर्मात सामाऊन घ्या. त्यांच्या पुढच्या पिढ्या अन्य धर्मात जाण्यापासून वाचवा. हिन्दू धर्म इतका दुबळा नाही की कोणी फसवून उष्टा पाव खाऊ घातला म्हणून बुडायला. जबरदस्त. एकदम पटलं

आम्ही "आमचें गोंय" या लेखमालिकेसाठी जे वाचले त्याचा सारांश http://www.misalpav.com/node/17873 या लेखात आणि प्रतिक्रियांमधे आहे. तेच परत लिहीत नाही. छळ करून बाटवलेल्या लोकांची आकडेवारी पोर्तुगीजांनी मोठ्या अभिमानाने लिहिल्यामुळे उपलब्ध आहे. ख्रिश्चनांनी विहीरीत पाव टाकून हिंदूंना बाटवले असे वाचले आहे, पण त्याची नक्की आकडेवारी कुठे वाचली नाही. त्यामुळे पुढच्या भागाबद्दल काही बोलू शकत नाही. मात्र या काळात हिंदू धर्मात काही चित्रविचित्र रूढी शिरल्या होत्या, उदा. समुद्रपर्यटनासाठी प्रायश्चित्त घेणे इ. तेव्हा अशा तर्‍हेने बाटवाबाटवी अगदीच अशक्य वाटत नाही. अर्थात, श्री शिवाजी महाराजांनी गलबतातून अनेकदा समुद्रात प्रवास केला होता. त्याबद्दल प्रायश्चित्त घेतल्याचेही कुठे वाचले नाही. म्हणजे हे नंतर कधीतरी सुरू झाले असावे, ही प्रायश्चित्ताची प्रथा गोव्यात अजून काही देवळांत चालू आहे.

In reply to by पैसा

आपला लेख मी दोन आठवड्यांपूर्वीच वाचला (तो लेख अतिशय माहीतीपूर्ण आहे). अशी बाटवाबाटवी अशक्य आहे असे मी म्हणत नाही पण त्याचे प्रमाण किती होते आणि जीवाच्या भीतीने, नरक यातना भोगायला लागू नयेत म्हणून ख्रिस्ती झालेले किती हा मूळ प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की त्याविषयी तत्कालिन कागदपत्रांत कुठे उल्लेख आढळतो का... तिसरा प्रश्न असा की पाव/उष्टा पाव म्हणजे गोमांस नव्हे., तुमच्या लेखात जागोजागी आपला धर्म टिकावा म्हणून गोवेकर आणि साष्टीकर जनतेने केलेले प्रामाणिक प्रयत्न दिसतात, असे असताना मैद्याच्या पावासाठी खरोखरच कोणाला धर्म बहिष्कृत केले जात असेल का... कदाचित् प्रायश्चित्त घ्यायला लावत असण्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by सृष्टीलावण्या

कागदपत्रातले उल्लेख "अमूक हिंदूना ख्रिश्चन केले" "अमूक हिंदूंना मारले" "अमूक देवळे पाडली" अशा प्रकारचे आहेत. कोणत्या प्रकारे धर्मांतरे केली याचा उल्लेख कुठेही मिळणार नाही. मुख्यत्वे इन्क्विझिशनच्या नावावर छळ करून, जवळच्या नातलगांना ठार मारण्याच्या धमक्या देऊन अशी धर्मांतरे करण्यात आली. उच्च वर्गातल्या लोकांना बाप्तिस्मा जबरदस्तीने दिला गेला आणि खालच्या वर्गातल्या अशिक्षित लोकांना विहिरीत पाव टाकून आता तुम्ही ख्रिश्चन झालात असे "बजावण्यात आले" असे मोघम उल्लेख वाचले आहेत. म्हणूनच म्हटले की अचूक आकडे कुठे मिळत नाहीत. जरा अवांतर होईल, पण अशा प्रकारे धर्मांतरित झालेल्या लोकांची रहाणी मनोरंजक होती. मुख्यतः गावडोंगरी वगैरे अगदी दुर्गम भागात असे लोक होते. त्यांची नावे अंतोन गावकर वगैरे हायब्रीड असत. फक्त कागदोपत्री नाव ख्रिश्चन आणि घरात सगळे रीतीरिवाज हिंदूंचे. १९२८ साली मसूराश्रमाच्या महाराजांनी अशा ७८१५ लोकांचे शुद्धीकरण केले. अगदी स्वातंत्रानंतरही काही गावेच्या गावे पुनर्धमांतरित झाली.
मैद्याच्या पावासाठी खरोखरच कोणाला धर्म बहिष्कृत केले जात असेल का... कदाचित् प्रायश्चित्त घ्यायला लावत असण्याची शक्यता जास्त आहे.
रास्त शंका आहे. पण तेव्हा त्या धर्मांतरितांना कोणी बहिष्कृत करायचा प्रश्नच नव्हता, कारण बहिष्कृत करायला गावात कोणी हिंदू शिल्लकच राहिले नव्हते. ही परिस्थिती साष्टी, तिसवाडी आणि बार्देश या ३ तालुक्यात होती. प्रायश्चित्त कोण देणार? आणि कुठे? कारण भटजी/देवळे शिल्लक नव्हती. हिंदू लोक आपले सण सुद्धा साजरे करू शकत नव्हते. मराठ्यांनी पोर्तुगीजांना रोखले म्हणून या हैदोसाची व्याप्ती फक्त ३ तालुक्यात राहिली. मात्र राण्यांच्या एका नातलगाला ख्रिश्चन बनवले गेले. त्यांच्यावर इतर मराठ्यांनी बहिष्कार घातला होता. परंतु छत्रपती संभाजी यांनी त्यांना पंक्तीपावन केले असेही एका ठिकाणी वाचले आहे. बहिष्कार वगैरे उच्च वर्णीयांत घडत होते असे दिसून येते, पण गरीब जनतेची अवस्था फार कुठे लिहिलेली नाही. तसेही मराठ्यांचे राज्य लयाला गेल्यानंतर सर्व गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात आला, त्यानंतर मराठ्यांचा इतिहास जाणीवपूर्वक पुसला गेला. स्वातंत्र्यापूर्वी अगदी कार्निव्हाल मधे जी दृश्ये दाखवली जात त्यात संभाजीराजांचा पोर्तुगीजांनी पराभव केला अशी दृश्ये दाखवली जात, जे तद्दन खोटे होते. संभाजीराजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून तिसवाडीचा काही भाग वगळता सर्व गोवा जिंकून घेतला होता. परंतु एकावेळी अनेक आघाड्यांवर लढत असल्याने त्यांना वेळ कमी पडला. नाहीतर गोव्याचा इतिहास संपूर्ण वेगळा लिहिला गेला असता.

In reply to by पैसा

हा पण प्रतिसाद अतिशय माहितीपूर्ण. संभाजी राजांनी खरोखरच पोर्तुगीजांचा डाव आटपत आणला होता. त्याविषयी अधिक माहिती इथे वाचायला मिळाली. अचूक आकडा आणि योग्य कारण पोर्तुगीज कागदपत्रांत (राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांप्रमाणे) कधीच सापडणार नाही. पण कदाचित् मराठा किंवा मुघल दप्तरांमध्ये उल्लेख सापडण्याची शक्यता जास्त. तुम्ही सांगितलेला वर्ग निहाय मुद्दा पण विचार करण्याजोगा आहे. (तसेच गोरेगावच्या मसुराश्रमात स्वगृही परत आणण्याचे प्रयत्न होत असतात. विशेषकरून प्रेमविवाह करू इच्छिणारा मुलगा किंवा मुलगी हिंदु झाल्याच्या बातम्या धर्मभास्कर मासिकात एका विशेष रकान्यात येत असत पण प्रमाण अगदी थोडे होते. परत त्या आश्रमावर १-२ वेळा गुंडांकरवी हल्ले सुद्धा झाले होते.) अवांतर - गोव्यातील कार्निव्हलचा तुम्ही उल्लेख केलात तसे गोव्यात पोर्तुगीज प्रेमाचे अजून एक उदाहरण म्हणजे दक्षिण गोव्यात मराठी आणि देवनागरी ह्या दोन्हीला विरोध आणि कोंकणी भाषा रोमन लिपीत लिहिले जावी ह्यासाठी आंदोलने. तसाच वसई परिसरात सध्या पोर्तुगीजांचा उदो उदो चालू आहे. नाथाराव सिंदा भोंगळे ह्या कोळी सरदारानेच चार बुरुजांचा वसईचा किल्ला बांधला होता असा कागदोपत्री उल्लेख सापडला असताना इथे तो पोर्तुगीजांनीच बांधल्याचे दाखवण्यासाठी आटापिटा होत आहे. त्यासाठी अंतर्राष्ट्रीय स्तरावर स्वतःची पाठ थोपटून घेणे पण चालू आहे. असो. लिहावे तितके कमीच.

In reply to by सृष्टीलावण्या

संभाजी राजांनी खरोखरच पोर्तुगीजांचा डाव आटपत आणला होता.
conde_de_alvor मा.कौंट डी अल्वोर साहेब खरोखर…७५% गोवा मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला होता…पूर्ण गोवा जिंकण्याची संधी होती पण कौंट अल्वोर (व्हाईसरॉय) शंभूराजेंच्या तावडीतून वाचला. वसई,चौल,बार्देश,साष्टी,सांत एस्तेहाव किल्ला अशी अनेक ठिकाणी मराठ्यांनी संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली आघाडी उघडल्याने पोर्तुगीजांच्या तोंडचं पाणी पळालं… २४ नोव्हेंबर १६८३ ते नाताळ सुरु होईपर्यंत आणीबाणी जाहीर झाली. युद्धाच्या शेवटी तर गोवा (ओल्ड गोवा सिटी) शहराला करकचून वेढा टाकून शंभूराजे वेशीवर तर…हातभार फाटलेले व्हाईसरॉय कौंट अल्वोर,आर्चबिशप प्रिमस दो म्यनुअल,सेक्रेटरी लुइस गोन्जाल्वीस आणि इतर पोर्तुगीज लोक सेंट झेवियर चर्च मध्ये करुणा भाकत आहेत असे विनोदी चित्र निर्माण झाले होते. व्हाईसरॉयने आणि आर्चबिशप ने संपूर्ण गोवा झेवियरच्या पदरात टाकून संकटातून मुक्तता करण्याची प्रार्थना केली आणि तिथेच बसून राहिले. औरंगजेबाचा मुलगा शाहआलम मोठी सेना घेऊन बिचोलीम कडे येत आहे अशी बातमी मिळाल्याने शंभूछत्रपतींनी वेढा उठवला. इकडे ऐन नाताळच्या सुरुवातीला हा अशक्यप्राय वेढा उठल्याने हर्षवायू झालेल्या आर्चबिशपने हा सेंट झेवियरचा दैवी चमत्कार असल्याचे जाहीर केले आणि आनंदोत्सव केला :))

बाटुन ख्रिश्चन झालेली गोव्यातील काही गौड सारस्वत घराणी रेंगो (रेगे), डेंपो (ढेपे), माँटेरिओ (मंत्री) वगैरे.. हिंदुंच्या संकुचित व्रुत्तीचा परिणाम नाहीतर कोकणपट्टीतील कितीतरी मुसलमान आणि गोव्यातील ख्रिश्चन घराणी अजुनही हिंदु राहिली असती. इतिहासात कोणी हिंदु धर्म स्वीकरल्याचे एखादे उदाहरण आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

माँटेरिओ हे खरोखरचे पोर्तुगीज आडनावही आहे असे दिसते. कारण ब्राझीलमध्ये त्या नावाची एक नगरपालिका आहे. http://en.wikipedia.org/wiki/Monteiro

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शिवाजीमहाराजांनी नेताजी पालकरांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले होते ना? खालील माहिते आंतरजालावर मिळाली - विजयनगर साम्राज्याचे हरिहर आणि बुक्क - इस्लाम स्वीकारला पण पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश. खुस्रो खान - जबरदस्तीने इस्लाम स्वीकारावा लागला, पण पुन्हा हिंदू धर्म प्रवेश हरिलाल गांधी - इस्लाम स्वीकृती, पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश सरमद - पर्शियाहून भारतात आलेले संत. काही काळासाठी इस्लाम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश. अजूनही हल्लीच्या काळातीलही उदाहरणे दिसली पण इतिहासातील विचारली म्हणून.

In reply to by यशोधरा

शिवाय पुरातन काळी (इसपू २ रे शतक) हेलिओदोरस नामक एका ग्रीक राजदूताने हिंदू धर्म स्वीकारला होता. हा हेलिओदोरस वासुदेवाचा भक्त होता. त्याने वासुदेवाला अर्पण केलेला एक दगडी स्तंभ मध्य प्रदेशात बेसनगर इथे अजूनही बघायला मिळतो. त्यावर स्पष्ट शिलालेखही लिहिलेला आहे की "तक्षशिलेत राहणार्‍या, यवन राजाच्या हेलिओदोरस नामक भक्ताने हा स्तंभ अर्पण केला असे." http://en.wikipedia.org/wiki/Heliodorus_pillar

In reply to by यशोधरा

विजयनगर साम्राज्याचे हरिहर आणि बुक्क - इस्लाम स्वीकारला पण पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश. मी लहान पणी 'किशोर' मध्ये वाचल होत यांच्या बद्दल, कि एक राजकिय खेळी म्हणून त्यांनी इस्लाम स्विकारला होता.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

इतिहासात नाही पण आत्ता या क्षणी "आनंदमार्गी" (नेटवर यांची माहीती उपलब्ध नाही. पण मी या साधुंना/कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटले आहे. आपले "निनाद" याबद्दल जास्त माहीती देतील.) हा एक पंथ सार्‍या जगभरात कार्यरत आहे. हिंदु धर्म म्हणजे काय हे सुलभतेने सांगुन अगदी निग्रोज जे इस्लाम स्विकारलेले आहेत त्या ठिकाणी सुद्ध त्यांनी हिंदु धर्मांतर केले आहे. कोणतेहे लोभ्,जोर अंधश्रद्धा न वापरता फकत चर्चेतुन हे घडते.

In reply to by स्पंदना

नीग्रो हा शब्द ऑफेन्सिव समजला जातो. कोणाला तरी म्हारड्या म्हणून हिणवण्याप्रमाणे. कृष्णवर्णीय हा प्रतिशब्द वापरावा ही विनंती.

In reply to by राजेश घासकडवी

ओके. पण मग तुम्ही इंग्लिश मध्ये त्यांना काय ब्लॅक म्हणता? येथे लिहीताना निग्रो का नाही लिहायच? आपल्याबद्दल उल्लेख "देशी" अथवा "करी पिपल"असा सर्रास होतो. तो ऑफेन्सिव्ह नाही का?

In reply to by स्पंदना

काळ्या लोकांना ब्लॅक म्हणणं हे जवळपास वाईट समजलं जात नाही, पण निगरो किंवा निग्गर म्हणणं हे फारच वाईट समजलं जात. 'आफ्रिकन अमेरिकन्स' हा सर्वमान्य सभ्य शब्दप्रयोग आहे. अमेरिकन इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या वंशांसाठी आता त्यांचं मूळ कुठचं याप्रमाणे नावं आहेत. इथे लिहिताना का लिहायचं नाही हा चांगला प्रश्न आहे. मराठी लोकांसाठी तशा उच्चनीचतेच्या भावना त्या समाजाविषयी अस्तित्वात नाहीत. असे शब्द बदलून नक्की कितपत चांगले बदल होतात याबद्दल मी साशंक आहे. कारण शब्द काय हेतूने वापरला आहे हे महत्त्वाचं ठरतं. तुमचा मूळ वापर योग्य हेतूने होता. तरीही केवळ शब्दामुळे कोणाच्या भावना दुखवू जाऊ शकतील, किंवा गैरसमज होतील ते टाळण्यासाठी सूचना केली. मी तरी काळे, कृष्णवंशीय असे शब्द मराठीत वापरतो. देसी हा शब्द मी आपल्याआपल्यातच - म्हणजे भारतीय, पाकिस्तान्यांमध्येच वापरलेला ऐकलेला आहे. मिक्स्ड कंपनीत उल्लेख झाला तर अमेरिकनांना देसीचा अर्थ समजावून द्यायला लागतो. करी पीपल हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. हा अमेरिकेत तरी प्रचलित नाही.

In reply to by राजेश घासकडवी

मला वाटते त्यांचा उल्लेख आता "अफ्रिकन अमेरिकन्स" किंवा इतरांसाठी "अफ्रिकन्स" असा करायची पद्धत आहे. कृष्णवर्णीय हा उल्लेख सुद्धा अपमानास्पद मानला जातो. अर्थात तुम्ही तिकडे रहात असल्याने तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल त्यामुळे माझी माहिती चुकीची असण्याचा संभव आहे

In reply to by स्पंदना

हिंदुची प्रार्थनेची कोणती एक विशिष्ट पद्धत नाही वा कोणते एक दैवत/पुस्तक नाही. त्यामुळे धर्मांतरासाठी विशेष प्रयत्न केले गेलेले नाहीत. लोक भारतीय धर्मांकडे आकर्षित झाले असलेच तर ते केवळ तत्त्वज्ञान पटल्यामुळे, मुख्यतः चर्चेद्वारे, अहिंसक पद्धतीने.

हे विहीरीत पाव टाकणे म्हणजे "अन्नाची नासाडी" नव्हे का?

हा लेखाचा मूळ मुद्दा नाही. हौशी लेखकांनी त्यासाठी वेगळा धागा काढावा ही विनम्र विनंती. कृपया परखड लिहिले त्याबद्दल राग मानू नये.

हिंदू धर्मात आणि इतर धर्मांत दोन फार मोठे मूलभूत फरक आहेत... १. कुठल्याही क्षुल्लक कारणाने धर्मातून बाहेर काढणे... याला पाव खाणे हे एक क्षुल्लक कारण पुरेसे होते. याविरुद्ध बहुतेक इतर धर्मांत धर्माबाहेर पडाणारा आणि त्याला मदत करणारा या दोघांनाही विरोध केला जातो. २. जर जर कोणी स्वतःहून धर्मात येतो म्हणाला तर पहिला प्रश्न, "आँ, का म्हणून?" याविरुद्ध इतर अनेक धर्मात साम, दाम, दंड, भेद वापरून इतराना आपल्या धर्मात ओढायला संघटीत प्रयत्न होतात. यावरून हिंदू धर्मियांनी आत्मपरिक्षण करून खूप काही शिकण्यासारखे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नक्कीच! तरी आर्यसमाजी लोक त्या दिशेने प्रयत्नशील आहेत. नुकतेच त्यांनी कोलकात्यात शंभरेक मुसलमानांचे हिंदूकरण केल्याचे वाचले. तूनळीवर "आर्य समाज-मुस्लिम्स बिकम हिंदूज़़" असे काहीसे सर्चवले तर व्हिडिओ दिसेल.

In reply to by बॅटमॅन

बाटलेल्या लोकांचे हिंदु धर्मात परतणे हा लेखाचा विषय नव्हे. अवांतर प्रतिसाद येत राहिल्यास लेखाचा मूळ मुद्दा बाजूला पडतो. कृपया नवीन धागा उघडावा.

हिंदूंतल्या नीचतम जातीच्या स्पर्शानेही भ्रष्टाचार होत असे, पाणवठा अपवित्र होत असे हे वास्तव तर अगदी आपल्या डोळ्यांसमोरचे आहे. एक गाव एक पाणवठा हे मिशन अद्यापही साध्य झालेले नाही. मिशनर्‍यांसोबत चहापान केले म्हणून पंचहौद मिशन प्रकरणात खुद्द टिळकांवर ग्रामण्य घातले गेले होते. हे शिवाशिवीचे प्रस्थ फारच होते. त्यामुळे म्लेंच्छाच्या हातचा पाव, पाणी प्यायल्यामुळे बहिष्कृत व्हावे लागण्यासारख्या गोष्टी प्रत्यक्ष घडल्या असाव्यात असे मानायला जागा आहे. सक्तीने धर्मांतरे झालीच असणार पण इतर धर्मांतरांमध्ये परित्यक्ता, विधवा आणि त्यांची विवाहबाह्य संतती यांचाही वाटा खूप मोठा आहे. अनाथ, भुकेकंगाल लोकांना मिशनमध्ये आसरा मिळत असे आणि त्यांची मुलेबाळे आपोआपच क्रिस्टिअन बनत. आजही कोल्हापूर-कर्नाटक सीमाप्रदेशात खालच्या जातीच्या अनेक लोकांचे धर्मांतर होत आहे. आमच्या भागात काम करणारे खाजगी सफाईकामगार हे गेल्या वीस-पंचवीस वर्षांत क्रिस्टिअन झाले आहेत. आमच्या इथल्या कचरावाल्याचे वडील एका रोगाच्या साथीत क्रिस्टिअन झाले. ते जमातप्रमुख होते. लगोलग त्यांची मुलेबाळे, लेकीसुना सर्वच धर्मांतरित झाले. या बाबतीत आंध्रही आघाडीवर आहे. ओदिशा आणि आदिवासी पट्टा त्यांचा स्ट्राँगहोल्ड आहेच. भूतकाळात सक्ती झाली असेल पण आज गोडीगुलाबी आणि समानतेचे स्वप्न अथवा आमिष हीच खरी कारणे आहेत.

In reply to by राही

विहिरीत पाव ह्या पद्धतीने धर्मांतर हे जर इतके सोपे असते तर मुसलमान शासकांनी अशीच एखादी क्लृप्ती योजली असती. मग त्यासाठी संभाजी राजे आणि इतरांचा इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी इतका शारीरिक छळ झाला नसता. खुद्द पोर्तुगीज अमलाखालील प्रदेशांत हिंदु नावालाही शिल्लक उरले नसते.

ही इंग्रज कालखंडातील घटना असू शकते आणि ती सर्व इंग्रज अमलाखालील सर्वच प्रदेशांना लागू झाली असावी. पण सोळाव्या, सतराव्या शतकांत असे काही घडल्याचे मोडी, फारसी वा अन्य कागदपत्रांत पुरावे आहेत का हा प्रश्न आहे.

In reply to by परिंदा

ते धर्मांतर कोणी केले असावे, पोर्तुगीजांनी की इंग्रजांनी. जर पोर्तुगीजांनी केवळ विहिरीत पाव टाकून धर्मांतर केले असेल तर साष्टीच्या आणि गोव्याच्या जनतेने वेळोवेळी शिवाजीराजे, संभाजीराजे आणि शाहूमहाराजांना साकडे का घातले असावे बरे...

महाबळेश्वर सैल या लेखकाची "तांडव" नावाची एक अत्यंत वाचनीय कादंबरी आहे गोव्यात पोर्तुगीजांनी केलेले सर्व प्रकार ,आणि मानवी स्वभावाचे अत्यंत सुंदर वर्णन या कादंबरीत आहे. गोव्यातील जनतेने दिलेला लढा, इन्क्विझिशन, देव व देऊळ वाचवण्यासाठी केलेली प्रयत्नाची शर्थ,इत्यादी फार सुरेख वर्णन आहे. गोडीगुलाबीने धर्मांतर करू पाहणारा एक पाद्रीबाबा सुद्धा, इन्क्विझिशन या शिक्षेला कसा पात्र ठरतो,आणि त्याचा जेल मध्ये होणारा अंत इत्यादी इत्यादी. अंगणातील तुळस उपटून एका रात्रीत तेथे क्रूस उभारला जात असे. पण "पाव" प्रकरण वाचल्याचे आठवत नाही. हि कादंबरी कोंकणी आणि मराठी या दोन्ही भाषेत प्रकाशित झाली आहे. एक चांगले पुस्तक वाचल्याचे समाधान नक्की मिळेल.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

विहिरीतील पाव हा विषय अशासाठी अभ्यासला पाहिजे की बरेच ख्रिस्ती धर्मोपदेशक बाटलेल्या ख्रिस्ती बांधवांना सांगतात की बघा शुल्लक कारणासाठी हिंदुंनी तुम्हाला कसे धर्माबाहेर काढले पण त्याचवेळी पोर्तुगीजांनी केलेल्या क्रूर अत्याचारांविषयी बोलायला सोयीस्कर विसरतात. मग आपोआप ख्रिस्ती धर्म शांतीचे प्रतीक होतो आणि लाखो लोकांना वेदनादायी मृत्यु देण्यास कारणीभूत असलेला फ्रांसिस झेवियर संतमहात्मा होतो. पण ह्यात आश्चर्य काहीच नाही. साने गुरूजी लिहितात - शार्लमननें एका दिवसांत साडेचार हजार लोकांची कत्तल करून शेवटीं त्यांच्या गळीं ख्रिश्चन धर्म उतरविलाच. जे जिवंत राहिले त्यांनीं ख्रिस्त हा दयाळू आहे हें मुकाट्यानें कबूल करून बॅप्टिस्मा घेतला व ख्रिश्चनांचा धर्म स्वीकारला. पुढें तीनशें वर्षांनी ख्रिश्चन चर्चनें त्याच्या कामगिरीचा गौरव करून त्याला संत केलें. पण ख्रिस्तानें अशांचा अन्तर्भाव आपल्या मित्रांत खचित केला नसता. ख्रिश्चन धर्म वाढविण्याची त्याला इतकी तहान लागली होती कीं, त्या भरांत ख्रिस्ताच्या शिकवणीचा आत्माहि तो विसरून गेला. ईश्वराच्या नांवाआड स्वत:चीं पापकृत्यें लपविणार्‍या दांभिक गुंडांमधला तो मुकुटमणि होता!

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

हे पुस्तक छान माहितीपूर्ण आहे हिंदूंनीच दूर लोटल्याने निरुपाय झाल्याचेही दिसते. पण त्यात त्यांचे काही चूक आहे असेही म्हणता येत नाही. धर्म बदलणार्‍याची सहज हिम्मत होवू नये, सर्व समाजाने एकवटून त्याचा विरोध करावा... धर्मांतरापेक्षा लोकांचं वाळीत टाकणं भयंकर वाटावं असा हेतु असावा...

>>संभाजी राजे आणि इतरांचा इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी इतका शारीरिक छळ झाला नसता. बाकी जौंद्या. संभाजी राजांचा छळ "इस्लाम स्वीकारण्यासाठी" झाला होता असे वाटत नाही. म्हणजे त्यांनी इस्लाम स्वीकारायला होकार दिला असता तर त्यांना सोडून दिले असते यावर विश्वास बसत नाही. पक्षी औरंगजेब धर्मांध वगैरे काही असला तरी राजकारणात इतका कच्चा नव्हता.

In reply to by नितिन थत्ते

एखादा राज्यकर्ता जर दुसर्‍या एखाद्या धर्माला स्विकारतो तेंव्हा त्याच्या राज्यातील त्या धर्मियांना अभय मिळतं तसेच इतर धर्मियांना राजाच्या (नव्या) धर्मात प्रवेश करण्यास प्रोत्साहन मिळते. त्याकाळी राजाला देव मानायचे. त्याने तो धर्म स्विकारला म्हणजेच तो धर्म चांगला असला पाहिजे. आपणही तो स्विकारला म्हणजे आपण राजाच्या नजरेत चांगले ठरू आणि आयुष्य सुखी होईल अशी कल्पना असायची त्यामुळे राजाला मुसलमान करून घेण्यात घाऊक फायदे असायचे. त्या विचारांनीच औरंगजेबाने प्रयत्न केला असावा. शत्रु प्रदेशातील प्रबळ राजघराण्यास नमविणे हाही उद्देश असू शकतो. त्यामुळे शिवाजी राजे हाती नाही लागले तरी त्यांच्या वारसाला मुसलमान बनवून त्या प्रदेशाला आपले अंकित बनविण्याचा उद्देश असू शकतो. औरंगझेबाची एक मुलगी संभाजी राजांच्या प्रेमात होती असे कादंबर्‍यातून वाचले आहे. औरंगझेबाने, मुसलमान होण़्याच्या अटीवर, संभाजीचे लग्न (निकाह) तिच्याशी लावून देण्याचे आमिष दाखविले होते असे म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

इस्लामचा स्वीकार केला नाही म्हणून संभाजीला जीवे मारीला तसेच औंरगजेबाची मुलगी झेबुन्निसा संभाजीराजांच्या प्रेमात होती असे चिटणीसाची बखर म्हणते तथापी ह्याला काहीही आधार नाही. औरंगजेबाविरूद्ध शहजाद्या अकबराने १६८१ रोजी बंड केले तेव्हा तिने अकबराला सहाय्य केले होते मग औरंगजेबाने तिला सलिमगड येथे कैदेत ठेवले, अकबराशी झालेला तिचा पत्रव्यवहार उघडकीस येतास तिचा तनखाही बंद होऊन सर्व मालमत्ताही जप्त झाली बंदिवासातच ती २६ मे १७०२ रोजी मरण पावली त्यामुळे ती दक्षिणेत यायचा प्रश्नच आला नाही. संभाजीराजांनी केलेली मोगलांच्या प्रदेशाची नासाडी, अनेक मुसलमानांचा केलेला वध यामुळे बरेच इस्लामी धर्मपंडित त्यांजवर चिडूनच होते. तस्मात राजांना मारावे असाच फतवा त्यांनी काढला होता. संभाजीराजांच्या वधाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला औरंगजेबाचा इतिहासकार ईश्वरदास नागर म्हणतो - फतवा काढल्यावर दोन दिवसांनी (पेडगावच्या बहादूरगडावर) बादशाहाने सरदार रूहुल्लाखानास आज्ञा केली की संभाजीकडे जाऊन खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कोठे आहे तसेच बादशाही सरदारापैकी कोण कोण संभाजीस सामिल आहेत याची चौकशी कर. पण संभाजी गर्विष्ठ होता. जीविताची आशा सुटल्यामुळे त्याने बादशहाविषयी घाणेरडे शब्द उच्चारिले, त्याची निंदानालस्ती केली. संभाजी जे काही बोलला ते जशेच्या तसे न सांगता तशा आशयाचे बोलणे रुहुल्लाखानाए औरंगजेबास सांगितले. त्याच दिवशी बादशहाने आज्ञा दिली की ह्याला नवी दृष्टी द्यावी त्याच रात्री संभाजीचे डोळे काढण्यात आले. त्यानंतर राजांनी जेवणखाण सोडले असे बरेच दिवस उपवास घडल्यानंतर ही गोष्ट बादशाहास कळवण्यात आली. त्यानंतर त्यास वढू बुद्रुक येथे नेऊन त्यास ठार करण्यात आले.

In reply to by नितिन थत्ते

आपले सर्वांचे खास मराठी मतभेद टळावेत म्हणून संभाजी राजांऐवजी गुरू गोविंद सिंह आणि त्यांच्या मुलांचे नाव घेऊया.

विहिरीत पाव ह्या पद्धतीने धर्मांतर हे जर इतके सोपे असते तर मुसलमान शासकांनी अशीच एखादी क्लृप्ती योजली असती. मग त्यासाठी संभाजी राजे आणि इतरांचा इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी इतका शारीरिक छळ झाला नसता.
विहिरीत उष्टा पाव टाकून धर्मांतरे झाली ही शुद्ध अफवा आहे असे आपले म्हणणे आहे का? किंवा अशा पद्धतीने एकही धर्मांतर झाले नाही अशी तुमचा विश्वास आहे का? संभाजी राजांच्या काळात भारतात पाव प्रचलीत होता का?
खुद्द पोर्तुगीज अमलाखालील प्रदेशांत हिंदु नावालाही शिल्लक उरले नसते. >ही इंग्रज कालखंडातील घटना असू शकते आणि ती सर्व इंग्रज अमलाखालील सर्वच प्रदेशांना लागू झाली असावी.
मग १५० वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीत अशा सोप्या पद्धतीने धर्मांतरे करून भारत हा सुद्धा एक ख्रिश्चन देश व्हायला पाहिजे होता. पण तसे झाले नाही. तरी पण 'उष्टा पाव' प्रथा इंग्रजांच्या काळात असू शकते असे तुम्हाला वाटते आहेच. जर इंग्रजांच्या काळात असू शकते तर पोर्तुगिझांच्या काळात तशी प्रथा नसेलच असे ठामपणे कसे म्हणता येईल? धर्मांतराचे अनेक मार्ग होते. त्या पैकी 'उष्टा पाव' हा फक्त एक मार्ग. गरीबीत अन्न धान्य, पैशाची मदत, वैद्यकिय मदत, ब्रेन वॉशिंग, धाकदपटशा, दहशत असलेल्या पोर्तुगिझांच्या शत्रू राज्यकर्त्यांपासून संरक्षण, आंतरधर्मिय विवाह, एखाद्या विशिष्ट धर्मातील चमकधमक, आर्थिक किंवा सामाजिक फायदे अशा अनेक कारणांसाठी आणि अनेक मार्गांनी धर्मांतरे झाली. आजही होत आहेत. पेशवे काळात, पेशव्यांच्या अनेक सरदारांनी सारा वसुलीसाठी आपापल्या अखत्यारीत अनन्वित अत्याचार केले. त्या पासून वाचण्यासाठी कोकणात अनेकांनी मुसलमान धर्म स्विकारला. मुस्लिमांना हात लावल्यास मुस्लिम राज्यकर्ते मदतीला धावून यायचे आणि त्यांच्याशी पंगा नको म्हणून हे सरदार मुसलमान झालेल्यांचे छळ करायचे नाहित. कोकणात असे अनेक मुसलमान आहेत जे पेशव्यांच्या सरदारांपासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी मुसलमान झाले आहेत. असे ऐतिहासिक कादंबर्‍यातून वाचले आहे. इथे मस्कत मध्ये आजच्या घडीलाही कांही आर्थिक आणि सामाजिक फायद्यांसाठी मुसलमान धर्म स्विकारलेली अनेक गुजराथी व्यापारी घराणी आहेत. त्यांची नांवेही बदलण्यात आली आहेत, ते अरबांचाच वेश करतात (तसे कंपल्सरी आहे) पण भारतिय गोतावळ्यात ते हिन्दू नांवानेच प्रसिद्ध आहेत. अजून पाच सहाशे वर्षांनी कोणी म्हणेल कि, 'आर्थिक आणि सामाजिक फायद्यासाठी त्या काळची (म्हणजे आजची) सर्व भारतिय हिन्दू जनता अरब कशी नाही झाली?' तर त्या काळी (भविष्यात) पुन्हा तो खमंग चर्चेचा विषय होऊ शकेल. त्याकाळच्या इथल्या सर्वसामान्य भारतिय जनतेजवळ (तेंव्हाही भारतिय जनता इथे अस्तित्वात असेल तर..) लेखी पुरावे नसतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेशवे काळात, पेशव्यांच्या अनेक सरदारांनी सारा वसुलीसाठी आपापल्या अखत्यारीत अनन्वित अत्याचार केले. त्या पासून वाचण्यासाठी कोकणात अनेकांनी मुसलमान धर्म स्विकारला. मुस्लिमांना हात लावल्यास मुस्लिम राज्यकर्ते मदतीला धावून यायचे आणि त्यांच्याशी पंगा नको म्हणून हे सरदार मुसलमान झालेल्यांचे छळ करायचे नाहित. कोकणात असे अनेक मुसलमान आहेत जे पेशव्यांच्या सरदारांपासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी मुसलमान झाले आहेत. असे ऐतिहासिक कादंबर्‍यातून वाचले आहे.
याची शक्यता कमी वाटते. कारण त्या काळात कोकणात आंग्रे प्रबळ होते. सावंतवाडीकडे सावंतांचे राज्य होते आणि मुंबईला इंग्रज आलेले होते. सारावसुलीसाठी मराठ्यांनी अत्याचार केल्याच्या कहाण्या बंगाल आणि मध्य प्रांतात सांगितल्या जातात पण ते फार उशिराच्या काळात. पेशवाईपूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात गुलाम करण्यासाठी सिद्द्यांनी धरून नेलेल्या बाळाजी आवजी चित्रेला त्याच्या आईसह शिवाजी महाराजांनी सोडवून आश्रय दिला आणि नंतर चिटणिशी दिली. आदिलशाही फौजा आणि जंजिर्‍याचा सिद्दी हेही रयतेचा जमेल तसा छळच करत असत. लोकांना पकडून जहाजात घालून गुलाम म्हणून विकणे वगैरे प्रकार ते करत असत. त्यांचा अनुभव घेतलेला कोणीही आपणहून मुस्लिम झाला असेल अशा शक्यता वाटत नाही. रत्नागिरीजवळ बरीच मोठी मुस्लिम वस्ती पूर्वीपासून आहे पण ते शिवाजी महाराजांच्या काळापासून तिथे आहेत असं ऐकलं आहे.

In reply to by पैसा

सहमत. कोकणातील त्यातही वरच्या कोकणातील बहुसंख्य मुसलमान हे जंजिर्‍याच्या सिद्दीने प्रचंड छळ करून बाटवलेले आहेत. सिद्दी छळाच्या बाबतीत पोर्तुगीजांसमच होता.

In reply to by प्रभाकर पेठकर

आपल्या प्रतिसादावर सविस्तर प्रतिसाद लिहिनच. पण आता सकाळी बरीच कामे असल्याने प्रतिसाद राखून ठेवत आहे.
संभाजीच्या काळात पाव
- पोर्तुगीज भारतात इ.स. १५३६ साली आले. येताना त्यांनी पाव आणलाच असेल. असो. पाव हे एक धर्मांतराचे लाक्षणिक साधन मानले तर माझे म्हणणे असे की मुसलमान शासकांनी अशीच एखादी क्लृप्ती योजली असती.

In reply to by प्रभाकर पेठकर

'उष्टा पाव' प्रथा इंग्रजांच्या काळात असू शकते असे तुम्हाला वाटते आहेच. जर इंग्रजांच्या काळात असू शकते तर पोर्तुगिझांच्या काळात तशी प्रथा नसेलच असे ठामपणे कसे म्हणता येईल?
त्यासाठी प्रथम इंग्रज आणि पोर्तुगीज ह्यांच्या मधील फरक समजून घ्यावा लागेल. इंग्रज हे प्रॉटेस्टंट पंथाचे होते ज्या पंथाला त्या मानाने मवाळ आणि कमी धर्मवेडे समजले जाते (जसे शिया हे सुन्नींपेक्षा थोडे मवाळ जास्त असतात). भारतात आल्यावर इंग्रज म्हणाले की आम्ही मसाल्यांसाठी (व्यापारासाठी) भारतात आलो आहोत. तर पोर्तुगीज कॅथॉलिक पंथाचे होते जो जास्त जहाल होता. त्याविषयी मी वर दुवा दिलेला आहेच. पोर्तुगीज आले तेव्हा ते म्हणाले की आम्ही धर्मप्रचार आणि मसाल्यांसाठी आलो आहोत. पण हळूहळू धर्मवेडाने राजसत्तेवर ताबा मिळाला आणि व्यापारापेक्षा धर्मांधतेला जोर आला. जेम्स डग्लस लिहितो की दुष्ट पोर्तुगीजांचा नाश त्यांच्याच कर्माने झाला आणि तो अटळ होता - The crying evil of Bassein (it was the same with Goa) was intolerance, and for this wanton offence which she offered to free inquiry and private judgement, one of the most sacred instincts of our nature, she has suffered a terrible retribution. That sin of intolenee never goes unpunished. It was against Nature, and Nature in another form has had her revenge. - James Douglas in Bombay and Western India (1893).

In reply to by सृष्टीलावण्या

इथे थोडी सुधारणा .. इंग्रज हे प्रॉटेस्टंट पंथाचे होते ज्या पंथाला त्या मानाने मवाळ आणि कमी धर्मवेडे समजले जाते (जसे शिया हे सुन्नींपेक्षा थोडे मवाळ जास्त असतात) पोर्तुगीज कॅथॉलिक पंथाचे होते जो जास्त जहाल होता. गल्लत होते आहे मुळात ख्रीस्ती धर्मियामध्ये कॅथॉलिक हा मवाळ पंथ आहे अन प्रॉटेस्टंट हा जहाल पंथात मोडतो कॅथॉलिक धर्मामधील काही तत्वाना / मान्यतांना तिव्र विरोध / निषेध करुन जो गट या पंथातुन बंड करुन बाहेर पडला अन नविन पंथ स्थापित झाला तोच प्रॉटेस्टंट पंथ .

In reply to by पियुशा

केतकर ज्ञानकोश म्हणतो - मार्टिन ल्यूथरने १५१७ मध्ये व्हिटन्बेर्क (जर्मनी) येथील चर्चच्या दारावर ९५ मुद्यांचे (थेसिस) पत्रक लावले तेव्हापासून प्रॉटेस्टंट चळवळीला ऐतिहासिक दृष्ट्या सुरुवात झाली, असे समजतात. ह्या चळवळीचे परिणाम मात्र ल्यूथरच्या अपेक्षेबाहेर झाले. ती एक स्वतंत्र व फार दूरवर परिणाम करणारी चळवळ ठरली. ह्या चळवळीमुळे चर्चची शकले होतील, असे ल्यूथरलाही त्यावेळी वाटले नव्हते. कॅथलिक चर्चची काही धर्मतत्त्वे व आचारपद्धती ह्यांच्यात सुधारणा व्हावी एवढीच ल्यूथरची मर्यादित अपेक्षा होती; परंतु विक्लिफ आणि हस ह्या विचारवंतांनी तयार केलेल्या वैचारिक भूमिकेमुळे ल्यूथरच्या विरोधाला (प्रोटेस्ट) जागतिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. हे बंड नव्हते; सुधारणेची चळवळ होती, तरी तिचा परिणाम क्रांतीसारखा झाला. कारण तिच्यामुळे केवळ ख्रिस्ती धर्मातील चर्चव्यवस्थाच बदलली असे नाही, तर एक वैचारिक नवचैतन्य निर्माण झाले. >ख्रिस्ती लोकांचा दृष्टिकोन त्यामुळे पुरोगामी बनला. ह्या उलट कॅथॉलिक हे अतिजहाल होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेशवे काळात, पेशव्यांच्या अनेक सरदारांनी सारा वसुलीसाठी आपापल्या अखत्यारीत अनन्वित अत्याचार केले. त्या पासून वाचण्यासाठी कोकणात अनेकांनी मुसलमान धर्म स्विकारला. माहिती पूर्णतः नवीन आहे. केवळ पेशवे म्हणणे म्हणजे सामान्यनाम वापरल्यासारखे होईल. कोणते पेशवे, कोणता कार्यकाल आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अशा पुराव्यांसाठी लेखी पुरावा, पुस्तकी संदर्भ द्यावा ही विनम्र विनंती. मी स्वतः इथे प्रत्येक प्रतिसादात माझे म्हणणे मांडताना जास्तीत जास्त ऑनलाईन दुवे देण्याचा प्रयत्न करते हे आपण पाहिलेच असेल. त्याने वाचकांनाही दिलेला प्रतिसाद वाचताना तो विश्वसनीय वाटतो.

In reply to by सृष्टीलावण्या

कोणते पेशवे, कोणता कार्यकाल आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे अशा पुराव्यांसाठी लेखी पुरावा, पुस्तकी संदर्भ द्यावा ही विनम्र विनंती. मी स्वतः इथे प्रत्येक प्रतिसादात माझे म्हणणे मांडताना जास्तीत जास्त ऑनलाईन दुवे देण्याचा प्रयत्न करते हे आपण पाहिलेच असेल.
माझे लेखन हे आंतरजालावरून उतरवलेले नसल्याने लिखीत पुरावा देऊ शकत नाही. मी हे सर्व कादंबर्‍यातून वाचलेले आहे. पेशव्यांचा काळ हा मुळतः माधवराव पेशव्यांचा काळ असावा. माधवराव पेशव्यांच्या काळात ब्राह्मणाब्राह्मणामध्येही वितुष्ट होते. देशस्थ आणि कोकणस्थ असे दोन प्रबळ पक्ष एकमेकांविरूद्ध कार्यरत होते. शिवाय ब्राह्मण-मराठा वाद तर होतेच. बहुतेक सरदार मराठा होते. ह्या सर्व वितुष्टाची झळ सामान्य जनतेस पोहोचायची. असो. माझे ज्ञान कादंबर्‍यातून मिळविलेले असल्याने आणि मी कुठले पुरावे देऊ शकत नसल्याने ते ग्राह्य धरता येत नसेल तर माझी कांही हरकत नाही. मी नुसता वाचनमात्र राहण्यातही आनंद मानेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

कादंबऱ्या हा ऐतिहासिक पुरावा होऊ शकतो का? तरीही २-३ कादंबऱ्यांची नावे सांगाल का म्हणजे मी त्या बाजारातून मिळवण्याचा प्रयत्न करेन. मी पण तसे काही प्रत्यक्ष घडले होते का ते पाहीन. तसेच पेशवाईचे अभ्यासक कौस्तुभ कस्तुरेंशी पण बोलेन. आपण पण थोडी शोधाशोध करावी ही विनंती. तसेच पुरावे मिळाले नाहीत तर मोठ्या मनाने आपली विधाने पाठी घ्यावीत ही विनम्र विनंती. नाहीतर लोकांना वाटेल की आपण पूर्वग्रहातून ही टीका केली आहे.

In reply to by सृष्टीलावण्या

कादंबऱ्या हा ऐतिहासिक पुरावा होऊ शकतो का?
'हा ऐतिहासिक पुरावा आहे' असे मी माझ्या प्रतिसादात कुठे म्हंटले आहे का?
तरीही २-३ कादंबऱ्यांची नावे सांगाल का म्हणजे मी त्या बाजारातून मिळवण्याचा प्रयत्न करेन.
कुठल्याही कथा-कादंबर्‍यांच्या दुकानात नुसते पेशवाईवरील कादंबर्‍यांची विचारणा केली तरी ५-६ कादंबर्‍या हाती लागतील. कांही कादंबर्‍यांची नांवे तुम्हालाही ठाऊक असतीलच. मी वाचलेल्या ५-६ कादंबर्‍यांपैकी नेमक्या कुठल्या कादंबरीत हे उल्लेख आहेत हे आठवत नाही. पण मराठ्यांच्या इतिहासातही शिवाजी महाराज औरंगझेबाच्या वाढदिवसा निमित्त पुण्याहून दिल्लीस निघाले असता वाटेत एका शिरजोर सरदाराचे धाबे दणाणले आणि त्याने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी मुस्लीम धर्म स्विकारल्याचा उल्लेख आहे.
आपण पण थोडी शोधाशोध करावी ही विनंती.
वेळे अभावी शक्य नाही.
तसेच पुरावे मिळाले नाहीत तर मोठ्या मनाने आपली विधाने पाठी घ्यावीत ही विनम्र विनंती.
ही विधाने, कुठल्याही दिशेने, आपणाविरुद्ध वैयक्तिक विधाने नाहीत, तेंव्हा आपली विनंती मान्य करता येत नाही.
नाहीतर लोकांना वाटेल की आपण पूर्वग्रहातून ही टीका केली आहे.
इतर सदस्यांचा माझ्याबद्दल तसा समज होईल नं? होऊ दे. आपण काळजी करू नये.

दुद्रेवाची गोष्ट ही आहे की हे जे परिवर्तीत किंवा बाटवलेले ख्रिश्चन आहेत त्यांना त्यांच्या धर्माबद्दल नको तेव्हढा अभिमान अन हिंदु धर्माबद्दल पाद्र्यांनी फिड केलेला नको तेव्हढा तिरस्कार आहे. सिंगापुरात सपना म्हणुन एक ख्रिश्चन माझ्या ओळखीची होती. उगा हिंदि धर्मात हेच वाईट तेच वाईट अस चालायच. दिसण भारतिय, नाव भारतिय. त्यातच ते क्षेपणास्त्र की काहीतरी एक चाचणीबद्दल चालल होतं. मग ही लागली (पुरी पाश्च्यात्त म्हणजे अगदी देव्हार्‍यातले अशी समजूत) नॉर्थ कोरीया प्रकरण. हे लोक दर रविवारी जे एकत्र जमुन भाषण ऐकतात त्याचा परिणाम शुक्रवारच्या भाषणांपेक्षा कमी नसतो हे लक्षात घ्या. तर काय म्हणे नॉर्थ कोरीयाचे ते क्षेपणास्त्र जर जपानवर पडल तर? किती लोक मरतील? मी विचारल 'जपान? ते दोन अणुबऑम्ब टाकलेलं?" पडला चेहरा काही बोलता येइना. मग सांगायला लागली जर ब्रिटीश आले नसते तर भारत अजुन मागासलेलाच राहिला असता. मी म्हंटल भारत सुधर्वायला ब्रिटीश आले होते का? की लुटायला आले होते? आणि लुटत कोण? ज्यांच्याकडे काहीही नसते तो. धर्मांतरामुळे किती लोकांनी जीव दिले माहीते आहे का? तुला हे धर्मांतर मिअरवायला लाज कशी वाटत नाही? जाम भडकली. म्हणे उखडुन टाका ती रेल्वे मग. कशाला हवि. ती तुमच्या प्रॉस्पेरीटीसाठी केली गेली ना? हसुन हसून पुरेवाट माझी. म्हंटल लुटलुट जलद व्हावी म्हणुन रेल्वे आणली गेली. तुम्ही लोक चायनात पोहोचला नाहीत म्हणुन चायनाची प्रगती थांबली का काय? उद्दंड असतात हे लोक. चर्च मध्ये राजकिय अन सामाजिक प्रवचने दिली जातात. त्यातलच एक शिखांना चिथावणी देणारा भाग म्हणजे "शिख हे एक बेट होते आणि ते भारताला येउन चिकटले" अडाणी ऐकतात म्हणुन आश्चर्य नाही वाटत पण जेंव्हा शिकलेले सुद्धा असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात तेंव्हा खरच खेद वाटतो. आत्ता माझ्याबरोअबर वॉलेंटिअर म्हणुन काम करणार्‍या दोन बायका आहेत. एक ख्रिश्चन दक्षिण भारतिय, एक चायनिज. या चायनिजला फार हौस भारतातल्या घडामोडी घेउन भारताचा अपमान करण्याची. अश्यावेळी मला अपमान वाटतो,पण या ख्रिश्चन बाईला नाही. ती गप्प बसुन हा हा म्हणत असते.

In reply to by स्पंदना

दुद्रेवाची गोष्ट ही आहे की हे जे परिवर्तीत किंवा बाटवलेले ख्रिश्चन आहेत त्यांना त्यांच्या धर्माबद्दल नको तेव्हढा अभिमान अन हिंदु धर्माबद्दल पाद्र्यांनी फिड केलेला नको तेव्हढा तिरस्कार आहे.
बाटगा नेहमी जोरात बांग देतो असे म्हणतात ते उगाच नाहि.

In reply to by स्पंदना

यात उद्दंडपणा काय आहे हे समजले नाही. काही वर्शांपूर्वी काही लोकाना सक्तीने बाट्वले गेले. पण त्यानंतरच्या पिढ्यांना तो धर्म जन्माने मिळालेला असतो आणि त्या धर्माबद्दल त्याना प्रेम वाटणं यात काही गैर नाही.

In reply to by उद्दाम

आपल्या धर्माचा अभिमान असणे कधीही चुक नाही पण "हिंदु धर्माबद्दल पाद्र्यांनी फिड केलेला नको तेव्हढा तिरस्कार आहे." हे सुध्धा त्यातच??? हा "उद्दंडपणा" न समजण्याइतके "reading between the lines"???

In reply to by नितिन थत्ते

भूतकालातल्या अप्रिय आठवणी उगाळणं हे गेलेल्या माणसाला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यासारखं आहे.

In reply to by नितिन थत्ते

या असल्या धाग्यांतून काय फीड केलं जातंय एकवीसाव्या शतकात? >>> काय दिवस आलेत ?? इतक्या प्रतिसादांमधुन या एका प्रतिसादाशी सहमत , ते ही चक्क थत्ते चाचांच्या .....सुर्य कुठुन उगवला आज ? अरे हो , आज उगवलाच नसावा बहुधा ... मी वरील प्रतिसादाशी हज्जार्वेळा सहमत आहे आणि स्ट्रॉन्गली सहमत आहे .

इन्॑क्विज़िशन ही युरोपीय मध्ययुगात पुरेपूर बदनाम झालेली संस्था आहे. भारतात पोर्ट्युगीज़ांच्या ताब्यातल्या इटुकल्या प्रदेशात इतके अनन्वित अत्याचार झाले, मग युरोपात किती हाहा:कार उडाला असेल? या जाचाला कंटाळून प्रॉटेस्टंट्स वेगाळे झाले, रनाय्सांसचे नवे युग अवतरले, योरपला नव्या जगाचा शोध लागला, वसाहती झाल्या हा सर्व इतिहास चांगल्या दस्तैवजांनिशी ग्रंथबद्ध आहे. मेक्सिको, (मेहिको) ब्रझील सारख्या वसाहतींमध्ये प्रचंड लुटालूट झाली. माया, अ‍ॅझ्टेक, इंका या संस्कृती धुळीस पावल्या. हे नवे आक्रमक ताज्या दमाचे आणि आधुनिक शस्त्रांनी सज्ज होते. टोळ्याटोळ्यांच्या (ट्राय्बल) जीवनशैलीहून वेगळी जीवनपद्धती आचरीत होते. नव्या जगातल्या टोळीप्रमुखांना यांच्या शस्त्रांचे आकर्षण वाटे. सोन्याचांदीसारख्या मौल्यवान वस्तूंच्या बदल्यात त्यांनी ती घेतली. टोळीयुद्धातल्या वर्चस्वासाठी या शस्त्रांचा स्वजनविनाशकारी उपयोग झाला. टोळ्यांतले वैमनस्य हे जबर असते हे आजही आपल्याला अफ्घान वॉर-लॉर्ड्स किंवा आपल्या अब्रूहत्यांवरून दिसतेच. मेक्सिकोमध्ये कोंक्विस्टेडॉर्स्नी धुमाकूळ घातला. ते पेशाने स्पॅनिश साम्राज्यशाहीचे धंदेवाईक सैनिक (प्रोफेशनल वॉरियर्स) आणि धर्माने कॅथलिक होते. त्यांच्या मोहिमा या सुरुवातीला संपत्तीसाठी होत्या, धर्मप्रसार हे उद्दिष्ट नव्हते. आधुनिक युगात अशी लुटालूट आणि सक्तीची धर्मांतरे थोडी कमी झाली तरी पाश्चात्य संस्कृती आणि समृद्धीची इतकी भुरळ जगावर पडली की थोड्याश्याच मेंदूमार्जनाने धडाधड धर्मांतरे होऊ लागली. विसाव्या शतकाचे मृदू लक्ष्य बौद्धप्रदेश हे होते. फिलिपीन्स मॅगेलनच्या आगमनापासूनच क्रिस्टिअनिटीच्या रडारवर होता, तो आणि कोरिया आता पूर्णपणे क्रिस्टिअन झाले. पॅसिफिक आणि पॉलिनेशियामध्ये क्रिस्टियन धर्माने चांगलाच जम बसवला आहे. आफ्रिकेमध्येआल्बेर्ट श्वाय्त्झर यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत सेवाकार्याद्वारे क्रिस्टियन धर्माची मुहूर्तमेढ रोवली. उत्तर आफ्रिकेत इस्लामच्या प्रखर विरोधाला तोंड देत क्रिस्टिअन धर्माची आगेकूच चालू आहे. पोर्ट्युगेज़ांनी त्यांच्या ताब्यातल्या इटुकल्या प्रदेशात धर्मछळ केला हे खरेच. पण बाकी भारताचे काय? अडाणी गरीब जनतेचा गैर्फायदा त्यांनी घेतला हेही खरेच (मानू). पण ही जनता अडाणी का राहिली? या दरिद्री प्रदेशात विकासाचे वारे आणि नारे का घुमले नाहीत याची उत्तरे शोधायला हवीत आणि ती त्या काळच्या भारतीय आणि जागतिक अशा सामाजिक-राजकीय वास्तवाशी निगडित आहेत. ता.क. ही चर्चा फक्त पावाच्या आख्यायिकेच्या खरेखोटेपणापुरतीच मर्यादित रहावी हा उद्देश धागाकर्तीने पुरेसा स्पष्ट केला आहे. पण इतर आनुषंगिक मुद्देही बरेच आहेत आणि प्रतिसादांतून दिसले, म्हणून लिहिले आहे.

In reply to by राही

पूर्णपणे सहमत.
आफ्रिकेमध्ये आल्बेर्ट श्वाय्त्झर यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत सेवाकार्याद्वारे क्रिस्टियन धर्माची मुहूर्तमेढ रोवली.
पण ह्या सेवाकार्यांचा मूळ उद्देश काय होता ते पाहाणे महत्त्वाचे आहे. द. अफ्रिकेत (कृष्णवर्णीय) डेसमण्ड टूटू नावाचा पाद्री होऊन गेला. त्याची अर्थगर्भ अवतरणे वाचण्याजोगी आहेत. तो म्हणतो - १) When the missionaries came to Africa they had the Bible and we had the land. They said "Let us pray." We closed our eyes. When we opened them, we had the Bible and they had the land. २) Be nice to the whites, they need you to rediscover their humanity.

ईशान्य भारतातदेखिल तेरेसा बाईंमुळे अनेक लोकांनी ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला होता असे वाचले आहे. पुर्वी बहुसंख्य हिंदु, बौद्ध असणार्‍या या प्रदेशात आता ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या ख्रिश्चन आहे म्हणे. (तो अर्थात गोडीगुलाबीमुळे झाला होता.) केरळातदेखिल बरेच लोक बाटुन ख्रिश्चन झाले ते गोव्याच्या पद्धतीने का ईशान्य भारताच्या?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आदर असणाऱ्यांनी एकदा हेल्स एन्जल हे पुस्तक वाचावे किंवा त्यावर बीबीसी ने काढलेली डॉक्युमेंटरी पाहावी. दारात आलेल्या मरणासन्न माणसाला उपचार देण्याआधी ख्रिस्ती करून घेतले जायचे असे ऐकून/वाचून आहे.

बरीच मौलिक माहिती मिळाली. पाच सहा वर्षांपूर्वी एका ऑफिस पार्टीमध्ये एक डिमेलो/डिकास्टा/डाकुन्हा (तत्सम) नावाचा इसम भेटला होता. त्याने ही कथा आणि आजही अशा धर्मांतरित लोकांना "माँ का पाव" म्हणतात वगैरे व्यथा सांगितली होती. मला वाटलं त्याचं विमान हवेत गेलं असल्यामुळे सेंटी झाला असावा.

In reply to by आदूबाळ

अशा धर्मांतरित लोकांना "माँ का पाव" म्हणतात
"माँ का पाव" हे पहिल्यांदाच ऐकले!!! हां, किरिस्ताव मंडळी चर्चमध्ये जाऊन, "देवा माका पाव" अशी प्रार्थना करतात, असे ऐकले आहे! अवांतर १ - देवा माका पाव (कोंकणी) = देवा मला पाव (मराठी) अवांतर २ - इथे पाव हा शब्द खाण्याचा पदार्थ ह्या अर्थाने वापरला नसावा, असे वाटते ;)

In reply to by आदूबाळ

ते "माका पाव" असावं! म्हणजे "देवा मला पाव" (प्रसन्न हो). थोडक्यात म्हणजे तो देवाला म्हणत होता, की "देवा सॉरी, पण हे बोललो म्हणून रागावू नको."

In reply to by पैसा

`आजकल पाव जमींपर नही पडते मेरे' अशी गोष्ट असेल तरच सॉरी म्हणावं लागेल. कारण पाव जमीनी ऐवजी `विहीरीत' पडलायं म्हणून.

In reply to by संजय क्षीरसागर

याचा खरा उच्चार "म्हाका पाव" असा आहे. देवाला (येशूला)सॉरी म्हणण्याचं कारण हे की तो आता जन्माने ख्रिश्चन आहे पण पूर्वजांच्या हिंदू धर्म आणि देवाबद्दल आपुलकी दाखवतो आहे. गोव्यात हे अगदी कॉमन आहे. आपण करतोय हे बरोबर की चूक अशा गोंधळात कोणीही पडतो तेव्हा बोलताना "देवा तू पाव" असे शब्द सतत वापरतो.

In reply to by पैसा

पाववाले हा शब्दप्रयोग या लोकांसाठी सर्रास होताना ऐकला आहे.

कोंकणीत आणि जुन्या मराठीतही पावणे म्हणजे पोचणे, अलीकडच्या मराठीत मिळणे, भेटणे. वस्तू पोचल्याचा दस्त म्ह्णजे पोच-पावती. धाव पाव सावळे विठाई म्हणजे विठूमाउली, तू धावत येऊन मला भेट, माझ्यासमोर येऊन ठेप, मला दर्शन दे. प्रसन्न होणे हा मराठीतला अर्थविस्तार नंतरचा आहे.

In reply to by राही

महाराष्ट्रीय क्रिस्टियनांमध्ये देव, देऊळ, माउली, सण हे शब्द सररास वापरले जातात. त्यांच्या धर्मात येशु हा मसीह, प्रेषित असला तरी पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ही ट्रिनिटीसुद्धा आहे.

In reply to by राही

दिवसांनी हे लोक दया, क्षमा, शांती, करूणा, प्रभु इ. शब्दांचे पण स्वामित्वाधिकार मिळवणार आहेत.

सृष्टिलावण्या यांच्या काही लेखनाशी मी अनेकदा असहमत झालो आहे. मात्र, यावेळी अतिशय मार्मिक लेखन आहे.. पटले.. आवडले. यादृष्टिकोनातून (धर्मातंरात पावाचा वाटा किती नी छळाचा किती?) अधिक माहिती वाचायला उत्सूक आहे

मुसलमान गाईचे मांस तोंडात कोंबत असे ऐकले आहे.

इनक्विझीशन साठी निघालेली पुर्तुगिज पाद्री आणि सैन्याची पलटण, १७८३ सालचे हे चित्र आहे. हे प्रयत्न चौल शेजारच्या मराठी मुलखात झाले म्हणून संभाजीराजांनी २ पाद्र्यांची मुंडकी छाटली आणि अनेकांना कैदेत टाकले. १६८२ साली चौल बंदर आणि किल्ल्यावर मराठ्यांनी केलेला हल्ला याच संदर्भात होता. वसई,कोकण, गोवा या भागात इनक्विझीशन ज्या संस्थेने अथवा धर्मसत्तेने केले ती म्हणजे La Compañía de Jesús (चर्च ऑफ दि सोसायटी ऑफ जिजस), आजही याचं अस्तित्व जगातील ६९ देशात आहे.

In reply to by मालोजीराव

जबरा आहे, कुठे मिळाले...

In reply to by मालोजीराव

अविनाश धर्माधकारी यांनी सांगितल्या प्रमाणे पाद्रयांची मुंडके शिवाजी महाराजांनी छाटली होती.. संभाजी महाराजांनी नव्हे.

सौन्दाळा यांच्या मुद्द्याला अनुसरून, आज भारतीय लोकसंख्येचे जे चित्र दाखवले जाते ते खरे आहे का असा प्रश्न पडतो. ८०$ हिंदू ,१३% मुस्लीम, ४& ख्रिश्चन वगैरे आकडे हे हिंदुना व हिंदू-हितवादी संघटनांना भ्रमात ठेवण्यासाठी फेकलेले आकडे वाटतात . प्रत्यक्षात हा भ्रमाचा भोपळा फोडून सत्य आकडे कोणास माहित आहेत का? माझ्या मते हिंदू ६०% पेक्षा कमी असून मुस्लीम २५% व ख्रिश्चन १२% पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे . खांग्रेस सारखे राजकीय पक्ष मुस्लीम व ख्रिश्चन व्होट बँक साठी एवढे लांगुलचालन करतात ते उगाच नाही ! बाकी लेख व चर्चा फारच उद्बोधक आणि विचारप्रवर्तक होत चालली आहे ,यात संशय नाही.

येशु असे म्हणतो की पाव हे माझे मांस आणि वाईन हे रक्त. असे असल्याने विहीर बाटली (आणि पाणी पिणारे लोकही) ... संदर्भः आजीच्या गोष्टी, लिखीत पुरावा नाही.

त्यावर त्या मंदिराचे पुजारी म्हणाले की ही कवटी पोर्तुगीजांची असेल ही पण मी ते मनगट शोधतो आहे ज्याने ही कवटी धडावेगळी केली.
कडक त्याच्यामायला!

हे प्रकरण जगाला सुपरिचित, वेल-डॉक्युमेंटेड आणि इतिहासाने मान्य केलेले असे आहे. आपण नव्याने सिद्ध करण्याजोगे असे यात काहीही नाही. आपल्याला विचार करण्याजोगी गोष्ट ही की सोळाव्या सतराव्या अठराव्या शतकानंतरही क्रिस्टिअन धर्म जगभर झपाट्याने का वाढला? आफ्रिकेतल्या टोळ्यांचे धर्मांतर का झाले? ईशान्य भारतात का झाले? आंध्रात का झाले? आता ओडिशात का होत आहे? हेमलकसाच्या अरण्यात नागर वस्तीतले कोणी बाबा आमटे पोचण्याआधी नागेपळ्ळी येथे मिशन कार्य का आणि कसे सुरू झाले? आजही तुळूभाषक कोळी क्रिस्टिअन बायका का करीत आहेत? आमच्या खंडप्राय भारतात बाबा आमटे नामक एकुलत्या एक संताला जी गोष्ट विसाव्या शतकाच्या मध्यावर सुचली, ती त्याआधी दीडशे वर्षे कुणाला का सुचली नाही? अज्ञानी भोळसट लोकांचा गैरफायदा घेतला गेला असे मानले तर हा सामना ज्ञानी आणि हुशार विरुद्ध अडाणी आणि भोळेभाबडे असा होता हे कबूल करावे लागते. म्हणजे हे'युद्ध' (या जागी हा शब्द मला योजावासा वाटत नाही) उरू होण्यापूर्वीच हरले गेले होते. ह्या भोळ्या लोकांकडे जे जुने ज्ञान होते त्या जोरावर ते ह्या नव्या लोकांवर मात का करू शकले नाहीत? योरपमधल्या लोकांकडे असे काय होते म्हणून ते जग पादाक्रांत करू शकले? त्यांना कोणती नवी विद्या मिळाली होती, त्यांच्या रहाणीत, आचारविचारात असे कोणते बदल झाले होते की ज्यामुळे हे शक्य झाले? इतर जगातील, विशेषतः भारतातील जनता अडाणी का राहिली? ती या लोकांच्या भूलथापांना का बळी पडली? या सर्वाचा विचार जोवर आपण करीत नाही, आत्मपरीक्षण करीत नाही तोवर मिशनर्‍यांचे हेतू शोधत बसल्याने काहीही साध्य होणार नाही. हे म्हणजे मेलेल्या सापाला पुन्हा पुन्हा बडवण्यासारखे किंवा साप निघून गेल्यावर भुई धोपटण्यासारखे आहे. ता.क. बाबा आमटे एकटेच नव्हेत, रास्वसंघाचे, रामकृष्ण मिशनचे, इतरही संस्थांचे कार्य आहे हे मला ठाऊक आहे. पण या प्रश्नाची व्याप्ती पहाता ते 'फार थोडे आणि फार उशीरा' या स्वरूपाचे आहे.

In reply to by राही

मूळ उद्देश ख्रिश्चन धर्मावर टीका नसून पोर्तुगीजांच्या द्वारे तो ज्या प्रकारे पसरवण्यात आला त्याविषयी लोकजागृति तसेच आपल्या पूर्वजांच्या भूमित अत्याचारांचे थैमान मांडणाऱ्या पोर्तुगीजांविषयी केवळ समान धर्मीय म्हणून काही साष्टीकर नागरिकांच्या व ख्रिस्ती मिशनरीज् द्वारे दाखवले जाणारे ममत्व हा आहे. आफ्रिकेतील टोळ्या ख्रिश्चन नक्कीच झाल्या पण त्यातल्या ज्या शिल्लक राहील्या त्या ख्रिश्चन झाल्या (वा ज्या ख्रिश्चन झाल्या त्याच शिल्लक राहील्या) हे सांगायचे आपण विसलेले दिसता. आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे वंशच्छेदासाठी प्रसिद्ध आहेत. वंशच्छेद आणि मानवी गुलामांची तस्करी ह्यात अफ्रिका पोळून निघाला. वर मी डेसमंड टूटूंची अवतरणे दिलीच आहेत. श्रीलंकीय कर्णधार अर्जुन रणतुंग अगदी मार्मिक पणे म्हणाला होता, आम्हाला अडीच हजार वर्षांची संस्कृति आहे आणि ऑस्टेलियाची (वंशविनाशाची) संस्कृति सर्वच जाणतात.

In reply to by सृष्टीलावण्या

माझा प्रतिसाद हा 'मूळ लेखात किंवा प्रतिसादांत क्रिस्टिअन धर्मावर टीका आहे' या गृहीतकावर आधारित नव्हता किंवा त्या धर्माची भलामण करण्यासाठीही नव्हता. किंबहुना मी हे गृहीतक मानलेच नव्हते. माझा रोख इतकाच होता की हे लोक आपल्यापर्यंत सात समुद्र ओलांडून पोचलेच कसे, परक्या भूमीत त्यांनी बस्तान बसवलेच कसे, इतकी क्षमता त्यांच्याकडे कशी आली आणि आम्ही त्यांच्यापुढे इतके दुबळे का ठरलो यावर आता विचार व्हावा. गोवा-वसई हा संपूर्ण भारताच्या मानाने फारच छोटा प्रदेश आहे आणि तिथे धर्मछळ झाला हे सर्वांनाच मान्य आहे. मुंबई-ठाण्यातल्या साष्टी प्रांतातल्या ईस्ट इंडिअनांविषयी म्हणाल तर आमचा त्यांच्याशी नित्य संबंध होता. त्यांच्या बहुतेक चालीरीती ह्या ठाणे जिल्ह्यातल्या आगरी-भंडारी-सोमवंशी क्षत्रियांसारख्या आहेत. गेल्या पिढीपर्यंत त्यांच्यात मराठीतूनच शिक्षण घेण्याचा आग्रह असे. तिथल्या हिंदू जमीनदारांनी जमिनी विकल्या तरी (चर्चच्या सहाय्याने का होईना) बिल्डरांचे आक्रमण परतवून लावण्यात हा समाज बराच काळ यशस्वी झाला. तिथे हिंदू आणि क्रिस्टिअनांमध्ये वैमनस्य नव्हते. 'हरित वसई' आंदोलन हे मुख्यतः याच लोकांच्या पाठबळावर दीर्घकाळ चालू शकले. ते अजूनही आपल्या शेतात खपतात.आणि त्यामुळेच स्वभूमीविषयी त्यांना अभिमान आहे. इतके लिहिण्याचे कारण म्हणजे त्यांच्या वागण्याबोलण्यात हिंदुद्वेष कधी फारसा दिसला नाही. मुंबईतही काही ईस्ट इंडिअन गावठाणे आहेत, तिथे हा समाज आता अगदी अल्पसंख्य आहे आणि काळाच्या रेट्याविरुद्ध आपल्या जुन्या (मूळच्या आगरी-भंडारी) परंपरा, चालीरीती जपतो आहे. आता तर मुंबईच्या आजूबाजूचा मोठा परिसर महानगरे म्हणून विकास पावताना यांची मूळ गावठाणे अधिकच संकोच पावत आहेत. आणि परप्रांतीयांच्या आगमनामुळे अल्पसंख्य होत गेल्यामुळे निवडणुकांवर प्रभाव टाकण्याइतकी ताकद त्यांच्याकडे राहिलेली नाही. भ्रष्टाचार,खाबूगिरी याला या लोकांचा विरोध असतो आणि सद्य परिस्थितीचा कानोसा घेता यांचा कल स्वच्छ कारभार देण्याचे आश्वासन देणार्‍या (promising) मोदी यांच्या बाजूने आहे. धर्मछळामुले ते क्रिस्टिअन झाले असतीलही, पण त्याचे आता काय? २) अर्जुन रणतुंग यांच्या 'त्या' विधानाचा रोख हा ऑस्ट्रेलिया हे युरोपातल्या, विशेषतः इंग्लंड मधल्या तडीपार लोकांनी वसवलेले आहे याच्याशी होता. त्यांच्या गुन्हेगार पार्श्वभूमीशी होता.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद. आपलेही लेखन वाचनीय, माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे अभिनिवेशरहित असते आणि अर्थात माझ्याकडून उत्सुकतेने वाचले जाते.

In reply to by राही

वसई-विरार-उमराळा ह्या ठिकाणच्या काही ख्रिस्ती बांधवांशी आमचे पण घरगुती संबंध आहेत. इतकेच नव्हे तर आमच्याकडे पण सुवार्ता अंक येत असे. हरित वसई ह्या आंदोलनाविषयी पण बरेच वाचले आहे. माझा आक्षेप केवळ काही मंडळींच्या द्वारे पोर्तुगीजांच्या उदात्तीकरणाला आहे. इन्क्विझिशन हे सत्य आहे आणि त्यासाठी त्या परिसरातील (तसेच गोव्यातील) चर्चेस नी पोर्तुगीज सरकार कडे माफिनाम्याची जाहीर मागणी केली पाहिजे. तसेच ह्या छळांसाठी जबाबदार लोकांना देण्यात आलेले संतपद काढून घेण्यात यावे अशी जाहीर मागणी केलीच पाहिजे. धर्माचे प्रेम वेगळी गोष्ट आहे आणि आक्रमकांचे प्रेम ही गोष्ट वेगळी आहे. अर्जुन रणतुंग कोणता विचार घेऊन बोलला हे क्षणभर बाजूला ठेवले तरी ऑस्ट्रेलियातील वंशसंहार हा प्रत्येक सहृदय मानवाकडून आजही तिरस्कृत आहे. From the beginning of the British invasion of Australia (justified on the myth of terra nullius), the Indigenous people were slaughtered on a grand scale. In Tasmania between 1804 and 1834, the Aboriginal population was reduced from an estimated 5000 people to just 200, which represented a 90% reduction in just 30 years. In Victoria it has been estimated that the Koori population declined by about 60% in just 15 years between 1835 and 1850 as more than 68 individual ‘massacres’ were perpetrated in that period. Indeed, according to representative of the North West Clans of Victoria, Mr Gary Murray, of the 38 clans that lived in Victoria B.C. (Before Cook) only 24 today have living descendants. By 1850 virtually all active resistance to the invasion had been quelled in Victoria. Census figures published in March 1857 showed that only 1,768 Aborigines were left in all of that state. So comprehensive was the ‘ethnic cleansing’ of Australia that out of an estimated 500 language groups on mainland Australia when the British arrived, barely half that number of languages were to survive.

In reply to by राही

प्रचंड वेगाने शाकाहारी सोसायट्यांच्या ताब्यात चाललेल्या मुंबईत या मांसाहारी अल्पसंख्यकांचे कसे निभावणार बरे? बाय द वे, प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेला ग्रामण्यांचा इतिहास देखील वाचनीय आहे. पेशवाईमध्ये नेमके काय घडले याचा हा एक छोटासा नमुना.
पेशवाईत पहिले ग्रामण्य दैवज्ञ (सोनार) जातीविरुद्ध करण्यात आले. त्यांचा वेदोक्ताचा अधिकार काढून टाकण्यात आला. दुस-या ग्रामण्याच्या वेळी पुण्यातील प्रमुख दैवज्ञांच्या घरांवर गारद्यांनी धाडी घातल्या. दैवज्ञांना बेड्या ठोकून त्यांच्या घरातील धार्मिक विधीच्या चीजवस्तू जप्त करण्यात आल्या. मग दैवज्ञांना खरपूस मारहाण करून कोठड्यात कोंडले. दोन-दोन दिवस अन्नोदकही त्यांना नाकारले. या भयंकर शिक्षेचे कारण काय तर दैवज्ञ आपणास ब्राह्मण म्हणवीत आणि वेदोक्त पद्धतीने स्वज्ञातियांच्या वृत्ती चालवीत. त्यांच्या मुसक्या बांधून नाना फडणीसासमोर सुनावणी झाली. कित्येक दिवस त्यांना कोठडीत ठेवून प्राणांतिक मारहाण चालू ठेवण्यात आली. पंडीत बोलावण्यात आले. काहींच्या मते त्यांना ब्रह्मकर्म करायचा अधिकार आहे, असा कौल झाला. इतर काहींनी विरोध केला. अय्याशास्त्री यांनी विरोधी कौल देऊन वेदोक्त नाकारले. ताबडतोब गारद्यांनी दैवज्ञांची जानवी तोडविली, धोतरे फाडून पंचे करवून नेसविले व गंध पुसून टाकून पुन्हा कोठडीत डांबले. प्रबोधनकार म्हणतात की, दैवज्ञ सोनारांनी वेदोच्चार करू नये, देवळात जाऊ नये, वेदोच्चार केल्यास जिव्हा छेदून काढावी. संध्या केल्यास शेंड कापावी, आडवे उभे गंध लावू नये, मौजीबंधन केल्यास हद्दपार करावे, वरात मिरवू नये, असे केल्यास सहा महिने दारिद्र्य येईल. ज्या गावात मिरवेल तिथे महामारीची साथ येईल, अशी अनेक क्षेपके धर्मग्रंथात घुसडलेली आहेत. परशुरामभाऊ पटवर्धन तासगावला देवळात गेले असता दैवज्ञ ब्राह्मण तेथे अनुष्ठानास बसलेले पाहताच त्यांनी आपल्या सैनिकांकडून त्यांना मरमरेतो मारविले. त्यांचे प्राण कासावीस झाले. पण त्यांनी परशुरामभाऊंच्या हातचे पाणी पिण्यास नकार देताच त्यांनी त्या सर्वांस ठार मारण्याचा हुकूम देऊन सर्व इसमांस ठार मारण्यात आले व आजुबाजूच्या गावातील सोनारांच्या जिभा कापून टाकण्यात आल्या. पंढरपूरच्या ग्रामण्यात सोनार ब्राह्मण म्हणवितात म्हणून त्यांची गाढवावरून धिंड काढण्यात आली व हत्तीच्या पायाशी बांधून त्यास ठार मारवावे अशी शिफारस करण्यात आली. श्रीमंत नाना शंकरशेट कृष्णेच्या स्नानाकरिता वाईस गेले असताना तेथच्या भटांनी त्यांना शूद्र शूद्र म्हणून त्यांचा फार उपमर्द केला व कृष्णा नदीत उतरू देणार नाही, असा दम भरला. नानांनी सातारच्या प्रतापसिंह महाराजांपाशी फिर्याद दाखल केली. महाराजांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना शिक्षा ठोठावल्या व नंतर मोठा दरबार भरवून नानांना भरजरी शाल देऊन त्यांचा गौरव केला. नानांवर असाच प्रसंग नाशिकमध्येही आला. नानांनी हत्यारी पोलिस पार्टी आणून भटांचा बंदोबस्त केला. वसई व साष्टी प्रांतात चित्पावन पेशव्यांचा अंमल बसताच हजारो चित्पावन स्थायिक झाले व त्यांनी शुक्ल यजुर्वेद्यांच्या वृत्त्या बळकविण्यास प्रारंभ केला. स्वतःचे ब्राह्मण्य हिणकस असताही हे शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणच नव्हेत अशा उलटा शंख फुंकण्यास त्यांनी सुरुवात केली. १७४२मध्ये वसई येथील चित्पावन ब्राह्मणांनी अग्निहोत्र उच्छेद करून श्रौताग्नी कुंडांचा उच्छेद केला. पळशीकर आदी शुक्ल यजुर्वेद्यांना श्रौताग्नी अग्निहोत्राचा अधिकार नाही, असे सांगून कुंडाचा विनाश केला. १७६५मध्ये अग्नहोत्राचा दुसरा खटला झाला. चित्पावन नारायण जोशी याने, यजुर्वेदी अनंत जोशी यांची हौत्राग्नीकुंडे विच्छिन्न केली. १७७५साली श्री त्र्यंबकेश्वराच्या नव्या देवालयाच्या प्रासाद प्रतिष्ठेत दक्षिणद्वार यजुर्वेदास देण्याऐवजी चित्पावनांस देण्याचा पेशव्यांचा मानस होता. त्यावरून मोठा दंगा झाला. तेव्हा सुमारे शे-सव्वाशे शुक्ल यजुर्वेद्यांस कैद करून कर्नाटकात रवाना करण्यात आले.
अधिक माहितीसाठी हे पहा.

In reply to by अवतार

हे जातिद्वेषाच्या चष्म्यातून एकांगी लिहिण्यासाठी प्रसिद्ध होते. इतिहासकार म्हणून कितपत गांभीर्याने बघावे हा प्रश्नच आहे.
वसई व साष्टी प्रांतात चित्पावन पेशव्यांचा अंमल बसताच हजारो चित्पावन स्थायिक झाले व त्यांनी शुक्ल यजुर्वेद्यांच्या वृत्त्या बळकविण्यास प्रारंभ केला.
इतिहास सांगतो की वसई व लगतचा प्रांत पेशव्यांनी आधीच गंगाजी नाईक व बुबाजी नाईक ह्यांचे वतन असल्याचा कबुल केले होते. इथे त्याविषयी प्रत्यक्ष पत्र आहे. ही दोघे भाऊ नावारून तरी चित्तपावन वाटत नाहीत. तसेच १७३९ ला वसई मोहिम आटपली आणि १७४० व १७४१ ह्या दोन लागोपाठ वर्षी थोरले बाजीराव आणि चिमाजी अप्पा ह्यांचे निधन झाले. त्यानंतर आलेल्या पेशव्यांनी ह्या भागाकडे अजिबात लक्ष दिले नाही/ते देऊ शकले नाहीत असे श्रीदत्त राऊत ह्यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ संवादात त्यांनी म्हटले.
पाहावी.

In reply to by सृष्टीलावण्या

यांचे सर्वच लेखन आंधळेपणाने मान्य करावे अशी अपेक्षा नाही. पण पेशवाईच्या काळात धार्मिक अत्याचारांना ऊत आला होता हे अमान्य करण्याचेही काही कारण नाही. इथे पेशव्यांना टार्गेट करणे हा हेतू नसून धार्मिक छळाची परंपरा ही एका विशिष्ट धर्माची मक्तेदारी नाही हे सत्य दाखवून देण्याचा प्रयत्न आहे. राहिला प्रश्न जातीद्वेषाचा. प्रबोधनकार यांच्या घरात वीर आणि ब्राह्मण असे दोन चांदीचे टाक पूजले जात होते. गांधीहत्येनंतर झालेल्या दंगलीत स्वत: प्रबोधनकारांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ब्राह्मण कुटुंबाचे प्राण वाचवले होते. ज्या शाहू छत्रपतींनी प्रबोधनकारांना सर्व सहाय्य केले त्या शाहूंना देखील प्रबोधनकारांनी प्रसंगी त्यांच्या चुका दाखवून दिलेल्या आहेत. संत एकनाथ यांच्या जीवनावर आधारित खरा ब्राह्मण हे नाटक देखील प्रबोधनकारांनी लिहिले आहे. त्यामुळे ज्यांच्या आसपास स्वजातभाईंचीच गर्दी होती अशा इतिहासकारांपेक्षा प्रबोधनकारांची विश्वासार्हता निश्चितच अधिक आहे.

In reply to by सृष्टीलावण्या

>>त्यांच्या लेखनात कोणतेही संदर्भ, पुरावे आढळत नाहीत. तुम्हाला कोणते पेशवे, कोणता कालखंड हे हवं होतं नै का? आता तो तपशील आहे तर तुम्ही संदर्भ, पुरावे शोधताय. छान !!. योग्य-अयोग्य, खरंखोटं जर तुम्हीच ठरवणार असाल तर मग चांगलंच आहे. चालू द्या

In reply to by सूड

प्रबोधनकारांचे समकालिन पुढारी एकदा जाहीर सभेत म्हणाले होते की दोन पैशाचा गांजा ओढला की आपोआप नवनव्या कल्पना सुचतात, कल्पनांची विमाने आकाशात घिरट्या घालायला लागतात. ऐतिहासिक विषयांमध्ये कागदी संदर्भ, पुरावा सोडून केलेले लिखाण हे त्याच पठडीतील नव्हे का?

In reply to by सृष्टीलावण्या

>>प्रबोधनकारांचे समकालिन पुढारी एकदा जाहीर सभेत म्हणाले होते की दोन पैशाचा गांजा ओढला की आपोआप नवनव्या कल्पना सुचतात, कल्पनांची विमाने आकाशात घिरट्या घालायला लागतात. आता हे असं बोलणारे जे कोणी पुढारी होते त्यांच्या बोलण्यात किती तथ्य होतं याचे पुरावे तुम्ही मिळवले असतीलच!! ते इथे प्रस्तुत कराल आम्हालाही समजून घ्यायला मदत होईल.कसं??

In reply to by सूड

कोणीच म्हणाले नव्हते (नाहीतर संदर्भ नसते का दिले?) पण एरवी संदर्भहीन गोष्टींचे समर्थन करणारे तुम्ही साळसूदपणे दुसऱ्याकडून कसे लगेच पुरावे मागता ते तर लोकांना कळले. ;) तोच हेतु होता. हे हे हे.

In reply to by राही

+ १ इन्क्विज़िशन ह्या प्रकाराचा अवलंब करुन बर्याच हिंदुना ख्रीस्ती केले गेले मान्य ! पण आपल्या पुर्वजांची जी वर्ण व्यवस्था होती तीदेखील धर्मांतराला तीतकीच कारणीभुत आहे , अन्न , वस्त्र , निवारा ह्या मुलभुत गरजापुर्तीसाठी दलितांना फार संघर्ष करावा लागला , अन्न मागायला आलेल्या दलिताकडुन मणभर लाकडे फोडुन घेणे , इतर अशी बरीच अवजड कामे करुन घेणे , त्यांना सर्व सुविधापासुन चार हात लांब ठेवणे, मंदिरात प्रवेश दिल्याने देव किंवा धर्म बाटेल अशा बालिश रुढी जो समाज पाळतो अशा समाजातील दलितांना दुसरे कुणी सहजासाजी अन्न वस्त्र निवारा उपलब्ध् करुन देत असतील तर ते स्वतःहुन त्या धर्मात का नाही प्रवेश करणार ? बळजबरी करायची काय गरज आहे ? आपला समाज आपल्याला काय वागवतो आहे यापेक्षा हे लोक तरी बरे, म्हणुन पुर्वी स्वतःहुन बरीच दलीत ख्रीस्ती झाले.

In reply to by पियुशा

हे निश्चित सांगितलेत तर बरे कारण इंग्रज राजवटीत म्हणाल तर अनेक ब्राह्मण पण स्वतःहून प्रलोभनांना बळी पडून (तुमच्या भाषेत सांगायचे तर सहजासहजी अन्न, वस्त्र, निवारा मिळतो म्हणून) ख्रिस्ती झाले. (संदर्भ - धनुर्धारी कृत वाईकर भटजी पुस्तक) ह्याच उलट पोर्तुगीज काळात अनेक मागासवर्गीयांनी, कोळ्यांनी, भंडाऱ्यांनी आणि इतर लढवय्या जातींनी प्राण दिला पण स्वतःचा धर्म जाऊ दिला नाही. खेदाची गोष्ट अशी की जे दलित जातिभेदाला कंटाळून ख्रिस्ती झाले त्यांना धर्मांतरानंतर अधिकच खडतर जातिभेदाचा अनुभव आला.

In reply to by सृष्टीलावण्या

खेदाची गोष्ट अशी की जे दलित जातिभेदाला कंटाळून ख्रिस्ती झाले त्यांना धर्मांतरानंतर अधिकच खडतर जातिभेदाचा अनुभव आला.
हो का? तुमचा बराच अभ्यास दिसतो आहे, मग जरा उदाहरण देऊन स्पष्ट करा बरं.

In reply to by अधिराज

गोव्यात ख्रिश्चन समाजात हिंदूंप्रमाणेच जाती आहेत. ते नाईक किरिस्तांव, बामण किरिस्तांव, खारवी किरिस्तांव इ नावाने ओळखले जातात. बामण आणि नाईक किरिस्तांव इ उच्च वर्णातून धर्मांतरित झालेले खारवी आणि तत्सम ख्रिश्चनांना खूप कमी दर्जाचे समजतात आणि आपसात लग्नेही करत नाहीत.

In reply to by पैसा

मिसळपाववरील गोव्यासंदर्भातील लेखामध्ये ही ह्याचे एक उदाहरण दिले आहे ते आठवले.

In reply to by पैसा

धन्यवाद पैसाताई माहितीबद्दल. मला ह्या बद्दल तितकी माहिती नव्हती पण तुम्ही सांगत आहात म्हणजे त्यात तथ्य असेलच. शेवटी धर्म बदलला तरी जातीभेदाची परंपरा लोकांनी चालूच ठेवली म्हणायची.

In reply to by अधिराज

फाऊस्टिना बामा असं नाव असलेली ही लेखिका बामा या नावाने लिखाण करते. तामीळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातल्या ओनगूर या गावातल्या शाळेत ती शिक्षिका आहे. गेल्या जवळजवळ वीस वर्षांपासून बामा लेखन करते आहे. तिच्या लिखाणाची सुरुवात आत्मकथेने झाली. बामाच्या गावातील विशिष्ट दलित जातीतील सारेजण ख्रिस्ती झाले होते. ती ख्रिश्चन धर्मातील दलित आहे. तिच्या आजोबांच्या काळातच हे धर्मांतर झालं होतं, म्हणजे फार जुनी गोष्ट नाही. धर्म बदलला तरी दलितत्व पुसलं जात नसल्याने आलेले अनुभव बामाच्या मनात घर करून बसले. हे दलितत्व ख्रिश्चन धर्मातील लोकही विसरत नाहीत हा अनुभव तर अधिकच त्रासदायक होता. बामाला जोगीण (नन) व्हायचं होतं, पण रोमन कॅथॉलिक चर्चमधल्या ननच्या प्रशिक्षणाच्या वेळी आलेल्या भेदभावाच्या वागणुकीने तिला हादराच बसला. नन बनायला जाताना तिच्या मनात असलेला तळागाळातल्या लोकांचा विचार तिला तिथे कुठेच दिसला नाही. चर्च आणि कॉन्व्हेंटचे विचार आणि संकल्प काही वेगळेच असल्याचं तिच्या लक्षात आलं. आपला अभ्यासक्रम अर्ध्यावरच सोडून ती गावात परतली. मग धर्मपीठाकडून होणारा जाच, अन्याय आणि शोषण याला वैतागून तिने नन होण्याचा मार्गच सोडून दिला. अजून गूगलून अजून लिंक मिळतील. कळावें...

In reply to by अधिराज

संजय सोनवणी म्हणतात - धर्म बदलला तर जातिसंस्था नष्ट होईल असा प्रचार करण्याचा काही कथित विचारवंतांचा कल दिसतो आहे. जाती हे हिंदू धर्माचे अविभाज्य अंग असल्याने हा धर्मच सोडला तर जातिसंस्था व तदनुषंगिक विषमता नष्ट होईल असा यामागील तर्क आहे. हा तर्क तसा नवीन नाही. बाबासाहेबांनीही धर्मांतराची घोषणा केली व प्रत्यक्षातही आणली ती हिंदू धर्मातील अन्याय्य व अस्पृष्यता बाळगणा-या जातिव्यवस्थेवर लाथ मारण्यासाठीच. तटस्थपणे पाहिले तर या तर्कात फारसा अर्थ नाही हे आपल्याला धर्मांतरीत बांधवांकडे पाहून लक्षात येते. धर्म बदलला म्हणुन जात बदलत नाही हे वास्तव अधिक ठळक होते. भारताबाहेर मुस्लिमांत पंथ असले तरी जाती नाहीत. परंतु भारतात मध्ययुगातच जे धर्मांतरीत झाले तेही आजतागायत आपल्या मुळच्या जातीभावना जपून आहेत असे आपल्या लक्षात येईल. म्हणजे गेल्या पाच-सहाशे वर्षांतही येथील मुस्लिमांची जात नष्ट झालेली नाही. खरे तर असे होणे हेच मुळात इस्लामच्या मुलतत्वांविरोधात आहे. ख्रिस्त्यांची व बौद्ध धर्मियांचीही अवस्था वेगळी नाही. आपापल्या पोटजातींचेही निर्मुलन धर्मांतराने साध्य झालेले नाही तर मग जाती कशा नष्ट होणार? आजही असंख्य मुस्लिम/ख्रिस्ती धर्मीय ओबीसी/एस.सी/एस.टी. अंतर्गत गटांत विभागले गेलेले आहेत हे एक वास्तव आहे. मुस्लिम-ख्रिस्त्यांतील जातीव्यवस्था हिंदूएवढी अन्यायकारक नाही असा तर्क अनेकदा दिला जातो, पण ते तेवढे वास्तव नाही.दक्षीणेत दलित ख्रिश्चनांसाठी स्वतंत्र चर्चेस व दफनभुम्या असतात. उत्तरेतही वेगळी परिस्थिती नाही.

सेवाकार्याच्या बाबतीत आत्मपरीक्षण करायला हवे ह्या विधानाशी मी ही सहमत. आता आपल्याकडे वैयक्तिक पातळीवर अनेक जणांकडून सेवाकार्ये घडत आहेत. पण त्यांचा धर्माशी आपण संबंध जोडत नाही हे पण खरेच आहे. कारण आपली सेवा बऱ्याच प्रमाणात निरपेक्ष असते. तरीही मोठ्या प्रमाणात समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे हे खरेच अगदी.

इनक्विझिशन विषयी अजून एक गोष्ट. वसई किल्ल्यात खोदकाम करताना एक विहिर मिळाली. त्या विहिरीला कोणताही जिवंत पाण्याचा स्रोत नाही. मात्र त्या विहिरीत काही मानवी हाडे मिळाली. त्यावर श्रीदत्त राऊत ह्यांचे म्हणणे असे की पुरातत्त्व खात्याने त्या हाडांचे कार्बन डेटिंग करावे आणि तेथील मातीचे रासायनिक पृथक्करण करावे. कारण त्यांना असा दाट संशय आहे की त्याकाळच्या पोर्तुगीज धर्मसभेच्या मागे सापडलेल्या ह्या निर्जल विहिरीत ख्रिश्चन धर्म न स्वीकारणाऱ्या हिंदुंना तेलात बुडवून जिवंत जाळण्यासाठी करत असावेत. (वाचकांसाठी टीप - श्रीदत्त राऊत ह्यांनी त्या भागातील विस्मरणात गेलेले अनेक किल्ले शोधून काढून, तिथे शास्त्रोक्त खोदकाम करून अनेक ऐतिहासिक पुरावे गोळा केले आहेत. तसेच तिथे शिलालेख शोधून काढून त्यांचे लिप्यंतर करून नवे ऐतिहासिक पुरावे गोळा केलेले आहेत.) पण काही पोर्तुगीज प्रेमी मंडळींच्या दबावाखाली येऊन आजही पुरातत्त्व खाते ही मागणी मान्य करीत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. (मात्र ट्रेकर्सनी/इतिहासप्रेमींनी ती विहिर अवश्य जाऊन पाहावी.)

In reply to by सृष्टीलावण्या

अरेरे,तेलाच्या विहिरीतून प्रल्हादाला भगवंतानी वाचवलं , मग ते भगवंत यान्ना का बरे वाचवत नव्हते?

In reply to by उद्दाम

नॉन ख्रिस्चन लोकांचे आयुष्य हमखास सुखाचे करु शकणारा येशू जसे कॅथॉलिक - प्रॉटेस्टंट लढ्यात दोघांपैकी कोणालाच मदत न करता, कोणाचेच दु:ख दूर न करता शांत बसून राहिला होता, अगदी तस्सेच बघा.

In reply to by बॅटमॅन

असल्या वादात निरपेक्ष प्रभूच परवडतो.. प्रभू कुणाची बाजू घेऊन कुणाच्या तरी रथावर चढून शानपना करत बसला असता तर मूळ बायबल बाजूलाच राहून नवे धर्मकाव्य जन्माला आले असते. :)

In reply to by उद्दाम

असं कसं? असं कसं? प्रभूने सांगीतलेल्या बायबलच्याही अनेक आवृत्या कालाच्या सोईप्रमाणे बदलत गेल्या आहेतच !

In reply to by यशोधरा

किंवा येशू ची बायको मेरी मॅग्डलीनचा येशू च्या मृत्यू नंतर चर्च कडून होणारा छळ जसा गॉड थांबवू शकला नाही तसाच. किंवा महम्मदाचे सहा वर्षांच्या मुली बरोबर चे लग्न जसे अल्ला थांबवू शकला नाही तसाच. किंवा मुसलमानांतर्फे बामियान च्या मूर्तींचे विध्वंस बुद्ध जसा थांबवू शकला नाही तसाच. "शिकायचा हक्क दिला तरी अक्कल येतेच असे नाही"

फेसबुकवर माझी प्रतिक्रिया देण्यापूर्वी मी हा लेख वाचला नव्हता कारण चेपूवर याची फक्त लिन्क होती. आपला शेरा वाचल्यानंतर मिपावर हा लेख आणि यावरील प्रतिक्रिया वाचल्या. इतिहासाचा त्रयस्थ आणि निष्पक्ष दृष्टीकोनामधून अभ्यास करून त्यातून काही बोध घेता आला तर ती चांगली गोष्ट आहे. त्याचा उपयोग भावना भडकावून द्वेष पसरवण्यासाठी केला तर ती गोष्ट घातक ठरते. कोणी तरी कोणाचा तरी अनन्वित छळ केला म्हणून आज मी कोणाचा तरी द्वेष करावा असे मला वाटत नाही. याचे कारण माझ्या गरजेच्या वेळी माझ्या ओळखीच्या किंवा अनोळखी अशा मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांनीसुद्धा मला निरपेक्षपणे मदत केली होती असे प्रसंग माझ्या आयुष्यात आले आहेत. इतिहासकाळात कोणकोणत्या प्रकारे किती लोक बाटवले गेले, त्यातले किती लोक आमिषांना बळी पडले, किती लोकांनी अन्य धर्मीयांनी केलेल्या छळामुळे भयापोटी धर्म बदलला, किती लोकांना हिंदू बांधवांनीच छळले, किती लोकांना बाहेर ढकलले गेले वगैरेची आकडेवारी मिळणे तर अशक्य आहेच, त्या बद्दल आज आपण काहीही करूही शकत नाही. एक अभ्यासविषय म्हणून तो ठीक आहे, पण त्यावर होत असलेली बाचाबाची पाहता त्यातून काही भले होण्याची शक्यता दिसत नाही.

In reply to by आनंद घारे

सहमत आहे. असल्या लेखांचा उद्देश परधर्मियांच्या ऐतिहासिक चित्रात काही ग्रे* भाग राहिलेले दिसतात तेही काळ्या रंगाने रंगवून चित्र पूर्ण काळे दाखवणे हा असतो. *नोटः ग्रे लिहिले आहे. पांढरे लिहिलेले नाही.

In reply to by नितिन थत्ते

इन्क्विझिशन हा ग्रे भाग? मग काळा भाग कशाला म्हणायचं? असोच आता.. बाकी माझ्यामते बाटगे लोकं पोर्तुगीज कसे चांगले होते वेग्रे करुन काहीतरी राजकारण करताहेत म्हणुन हा धागा काढलाय असं मला वाटतंय.

In reply to by शिल्पा ब

ऐला ! इन्क्विझिशनला कोण ग्रे म्हणतंय? इन्क्विझिशनख्रीज अन्य मार्गाने घर्मांतर झाले असू शकेल अशी शक्यता असणारी पाव थिअरी हा ग्रे भाग. या लेखाचा उद्देश "छे, पाव थिअरीने धर्मांतर झाले असणे शक्यच नाही केवळ इनक्विझिशननेच/छळानेच धर्मांतर झाले आहे" हे सांगण्याचा आहे हे स्पष्ट दिसत आहे. म्हणून ग्रे उरलेला भाग काळा करणे असे म्हटले आहे.

In reply to by आनंद घारे

अगदी खरे आहे. शिवाय आणखी काही गोष्टी. १)वसईत इन्क्वि़ज़िशनची शाखा नव्हती. २)वसई आणि साष्टी इथल्या लोकांची धर्मांतरे झाली हे खरेच पण त्यांची वेषांतरे म्हणजे सुटाबुटाची सक्ती वगैरे, झाली नाहीत. उलट त्यांच्या चर्चचे मराठीकरण करण्यात आले. पोर्ट्युगीज़ची सक्तीही अजिबात नव्हती. ३)मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घ्यावे असे चर्चचे मत होते. ४)वसई हा सुपीक प्रांत होता. पोर्ट्युगेज़ांच्या इतर वसाहतींना म्हणजे चिंचणी, तारापूर, अशेरी(वर आपण दिलेल्या पेशव्यांच्या लिप्यंतर केलेल्या पत्रातले असेरी) दमण इ.ना धान्य,फळफळावळ वगैरेंचा पुरवठा वसईतून होई. या पुरवठादार शेतकर्‍यांशी त्यांचे संबंध चांगले होते. ५)आज वसईत हिंदू आणि क्रिस्टिअन हे दोन्ही समाज अत्यंत सलोख्याने नांदत आहेत. ६)या लोकांत 'नव्याने उफाळून आलेल्या पोर्ट्युगीज़् प्रेमा' विषयीची आपण चौकटीत दिलेली कहाणी नव्या काळात म्हणजे निदान गेल्या पन्नास वर्षांत घडलेलीच नाही असे वसईतल्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. हे नागरिक समाजकार्यात सहभागी असतात. ७) मालाड, भिवंडी वगैरे ठिकाणी परंपरागत वतनदार पाठारेप्रभूंची वतने पोर्ट्युगीज़ांनी घेतली. (नंतर ब्रिटिशांनी संस्थाने खालसा केली तशीं) यामुळे प्रभूंमध्ये असंतोष निर्माण झाला. अणजूरचे नाईक हे त्यापैकीच. त्यांनी या पोर्ट्युगीज़ांचे पारिपत्य करावे म्हणून पेशवे दरबारात सुमारे पंचवीस वर्षे प्रयत्न केले. पण या काळात एक तर पेशवे निज़ामाला नेस्तनामूद करण्यात गुंतले होते आणि दुसरे म्हणजे या मुंबई,साष्टी,वसई प्रदेशाचे महत्त्व तितकेसे जाणवले नसावे. वसईच्या लढाईतही या एके काळच्या वतनदारांनी मोठे शौर्य गाजवले याचा वृत्तांत 'साष्टीची बखर' या छोटेखानी पुस्तकात आहे. पण या शौर्याच्या मानाने श्रेय त्यांच्या पदरात पडले नाही अशी खंतही आहे. आपल्या हिसकावून घेतलेल्या वतनांसाठी त्यांना बर्‍याच अर्जविनंत्या कराव्या लागल्या. अणजूरकर नाईकांना ती वतने परत दिल्याचे पत्र आपण उद्धृत केले आहेच. ८) जुनी वैमनस्ये आता विसरायला हवीत. ब्राह्मण-मराठे, सवर्ण-दलित यांच्या सध्याच्या भांडणांनाही हाच न्याय लावला पाहिजे. ९)पूर्वीच्या धर्मछळासंबंधात जागृती व्हावी म्हणून हे लेखन आहे असे धागाकर्तीने एका प्रतिसादात म्हटले आहे. हे लेखन वाचणारे तुम्ही-आम्ही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून धर्मांतर करू हे शक्य वाटत नाही, जिथे जागृती आवश्यक आहे, जे वल्नरेबल आहेत, त्यांच्यापर्यंत 'ते' लोक केव्हाच पोचले आहेत. १०)डी लॉन नावाच्या लेखकाचे इन्क्विज़िशनवरचे लेखन प्रसिद्ध आहे. (ज्याचा थोडाफार आधार प्रियोळकरांनीही घेतला आहे) पण त्यावर एक आक्षेप असाही आहे की तो स्वतः प्रॉटेस्टंट होता आणि कॅथलिकांनी केलेल धर्मछळ त्याने जाणूनबुजून भडक रंगविला, काही गोष्टी फॅब्रिकेट केल्या. हे म्हणजे शेजवलकरांनी राजवाड्यांच्या लिखाणावर टीका करावी तसे झाले. टीकाही खरी आणि मूळ लेखनही प्रामाणिक. असो.

In reply to by राही

पोर्तुगीज प्रेम पण अतोनात दिसते आहे. तरी त्यातील अगदी पहिल्याच वाक्याविषयी लिहिते.
वसईत इन्क्वि़ज़िशनची शाखा नव्हती.
वसई किल्ल्यात खोदकाम करताना एक विहिर मिळाली. त्या विहिरीला कोणताही जिवंत पाण्याचा स्रोत नाही. मात्र त्या विहिरीत काही मानवी हाडे/सांगाडे मिळाले. त्यावर श्रीदत्त राऊत ह्यांचे म्हणणे असे की पुरातत्त्व खात्याने त्या हाडांचे कार्बन डेटिंग करावे आणि तेथील मातीचे रासायनिक पृथक्करण करावे. कारण त्यांना असा दाट संशय आहे की त्याकाळच्या पोर्तुगीज धर्मसभेच्या मागे सापडलेल्या ह्या निर्जल विहिरीत ख्रिश्चन धर्म न स्वीकारणाऱ्या हिंदुंना तेलात बुडवून जिवंत जाळण्यासाठी करत असावेत. (वाचकांसाठी टीप - श्रीदत्त राऊत ह्यांनी त्या भागातील विस्मरणात गेलेले अनेक किल्ले शोधून काढून, तिथे शास्त्रोक्त खोदकाम करून अनेक ऐतिहासिक पुरावे गोळा केले आहेत. तसेच तिथे शिलालेख शोधून काढून त्यांचे लिप्यंतर करून नवे ऐतिहासिक पुरावे गोळा केलेले आहेत.) पण काही पोर्तुगीज प्रेमी मंडळींच्या दबावाखाली येऊन आजही पुरातत्त्व खाते ही मागणी मान्य करीत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. (मात्र ट्रेकर्सनी/इतिहासप्रेमींनी ती विहिर अवश्य जाऊन पाहावी.) जर वसई भागात इन्क्विझिशन झाले नाही तर अशा ऐतिहासिक पुराव्यांची निरपेक्ष तपासणी का होत नाही, तो होऊ नये ह्यासाठी दबाव का टाकण्यात येतो....

In reply to by राही

मुद्दा १०) हा डेलॉन कॅथ्लिकच होता पण उदारमतवादी होता. प्रॉटेस्टंट योरपमध्ये त्याचे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाले. एकदोन शतके ते प्रचारकी म्हणूनही गणले गेले. पण नवीन संशोधनानुसार त्यातले तपशील खरे असण्याची शक्यता दिसू लागली आहे.

In reply to by आनंद घारे

त्याचा उपयोग भावना भडकावून द्वेष पसरवण्यासाठी केला तर ती गोष्ट घातक ठरते. कोणी तरी कोणाचा तरी अनन्वित छळ केला म्हणून आज मी कोणाचा तरी द्वेष करावा असे मला वाटत नाही. याचे कारण माझ्या गरजेच्या वेळी माझ्या ओळखीच्या किंवा अनोळखी अशा मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांनीसुद्धा मला निरपेक्षपणे मदत केली होती असे प्रसंग माझ्या आयुष्यात आले आहेत. इथे माझ्याकडून कोणत्याही धर्माचा द्वेष चाललेला नाही. हे आपल्याच मनातून निघालेले पिल्लू आहे. इथे केवळ क्रूर आक्रमकांचा आणि त्या आक्रमकांचा अनाठायी पुळका आलेल्या द्वेष आहे आणि तो का नसावा हे सांगाल का... धर्माचा द्वेष पाहायला गेलात तर ह्या लेखावरील प्रतिसादांत आपल्या संदर्भरहित, विसंगत प्रतिसादांद्वारे हिंदु धर्माच्या द्वेष्ट्यांनीच धुमाकुळ घातलेला आहे असे प्रथमदर्शनी तीव्रतेने दिसते.

In reply to by आनंद घारे

त्याचा उपयोग भावना भडकावून द्वेष पसरवण्यासाठी केला तर ती गोष्ट घातक ठरते. कोणी तरी कोणाचा तरी अनन्वित छळ केला म्हणून आज मी कोणाचा तरी द्वेष करावा असे मला वाटत नाही. याचे कारण माझ्या गरजेच्या वेळी माझ्या ओळखीच्या किंवा अनोळखी अशा मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांनीसुद्धा मला निरपेक्षपणे मदत केली होती असे प्रसंग माझ्या आयुष्यात आले आहेत.
इथे माझ्याकडून कोणत्याही धर्माचा द्वेष चाललेला नाही. हे आपल्याच मनातून निघालेले पिल्लू आहे. इथे केवळ क्रूर आक्रमकांचा आणि त्या आक्रमकांचा अनाठायी पुळका आलेल्या द्वेष आहे आणि तो का नसावा हे सांगाल का... धर्माचा द्वेष पाहायला गेलात तर ह्या लेखावरील प्रतिसादांत आपल्या संदर्भरहित, विसंगत प्रतिसादांद्वारे हिंदु धर्माच्या द्वेष्ट्यांनीच धुमाकुळ घातलेला आहे असे प्रथमदर्शनी तीव्रतेने दिसते. > > मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे। सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥ ३॥ - समर्थ रामदास स्वामी

धागा वर आला म्हणून मिसळीचे धुरीण माझ्यावर रागावतील पण नाइलाज आहे. धर्मांतर या विषयाचा शोध घेताना हा अतिशय माहितीपूर्ण धागा सापडला. अशाच ख्रिस्ती धर्मांतरावर आधारीत एक पुस्तक मराठीत आलेले आहे. त्याचे नाव कुणी सांगू शकेल का ! मागच्या वर्षभराच्या कालावधीत त्या पुस्तकाचा परिचय वृत्तपत्रात आला होता. गोव्याला लागून असलेल्या कोकणातील घटना इतिहास यांची पार्श्वभूमी त्यामधे होती.