Skip to main content

"वेडी"

लेखक अमेय६३७७ यांनी शनिवार, 09/11/2013 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
येताजाता शिव्या सारख्या गाड्यांवरती दगड मारते जरतारीच्या आवेशाने लक्तर दैवी ती सावरते केस पांढरे - जटाच भारी मिचमिच डोळे लुकलुकताना तोंड चालते हातांसोबत तारस्वराने ओरडताना येणारा अन् जाणाराही वाट वाकडी दुरून करतो मधमाश्यांच्या मोहोळाशी कोण कशाला उगाच भिडतो? हसते वेडी सदा मुखाने आनंदी परि कधी न दिसते मूल पाहुनी कुणी गोजिरे तळमळताना अश्रू पुसते स्थळकाळाशी तुटले नाते एकच आठव गतकाळाचे रहदारीने ठोकरलेल्या शिशुदेहाच्या कलेवराचे प्रेत टांगुनी वेशीवरती कुणी चौकशी, कुणी सांत्वना दुःखामागे धिंडवड्यांच्या नको जाहल्या उरी यातना वेड पांघरुन विसरू पाही दैवगतीची बधिर कहाणी जगता, झिजता कणाकणाने तेव्हापासुन मरे 'शहाणी' … -- अमेय
लेखनविषय:

वाचने 5640
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

In reply to by मनीषा

हुबेहूब कोणा एका वेडीला समोर ठेऊन असे नाही पण अनुभवलेल्या दोन तीन घटनांची आपसूक सरमिसळ झाली आहे ही कविता लिहिताना.

यापूर्वीच्या कवितेप्रमाणेच प्रभावोत्पादक कविता. तुम्ही एकादे महाकाव्य लिहायला घ्या राव. मोठे आव्हान घ्या अंगावर.

In reply to by चित्रगुप्त

महाकाव्य ... बाप रे. नित्याचे व्यवहार सांभाळून -- केवळ आवड म्हणून-- हे असलं लिहिणं वेगळं आणि महाकाव्य वेगळं. त्यासाठी प्रदीर्घ चिंतन, अभ्यास आणि वेळ हवा.

In reply to by अमेय६३७७

केवळ आवड म्हणून-- त्यासाठी प्रदीर्घ चिंतन, अभ्यास आणि वेळ हवा.
म्हणूनच लिहिलं, मोठं आव्हान घ्या अंगावर. सुरुवात करून बघा, जीवनाचा एक वेगळाच अर्थ उलगडू लागेल. शुभेच्छा.

अस्वस्थ करून गेली ही कविता. बर्याच वेळा माणसं कुठल्याश्या आठवणी विसरू पाहतात, काही आठवणी खरच विसरायच्या असतात तर काही आठवणी जगण्याचा एक भाग बनून जातात. काही लोक आपलं शहाणपण टिकून ते वेडपण दडून ठेवतात तर काही हे करू शकत नाही. काही आठवणी ह्या पाण्यातल्या भोवर्यासारख्या असतात, बरेचजण त्यातून बाहेर पडून पुढे जातात, काही अडकतात आणि त्यात गुंतून राहतात. अशांनाच आपण वेडे म्हणून प्रवाहातून वेगळे पाहतो. "वेड पांघरुन विसरू पाही दैवगतीची बधिर कहाणी जगता, झिजता कणाकणाने तेव्हापासुन मरे 'शहाणी' …" जबरद्स्त...

कविता आवडली.... उत्कृष्ट लिखाण..... शाळेत असतांना एका कवितेत म्हटले होते कि जे मनी आहे ते पूर्णतः कवितेत उतरत नाही.... तुमची हि कविता त्यास अपवाद

In reply to by नगरीनिरंजन

मुद्दाम करुणरस म्हणून नाही पण या काही कविता अश्या झाल्या आहेत खर्‍या. बाई गेली किंवा इतर कवितेशी वाचक म्हणून केलेली तुलना समजू शकतो पण कवी म्हणून अभिव्यक्तीत थोडा फरक आहे. बाई गेलीमध्ये निव्वळ त्रयस्थपणे काहीश्या चिडीच्या सुरात विषय मांडलाय पण या कवितेत वेडामागील कारण शोधण्याचा प्रयत्न आहे. असो. पुढची नर्म- शृंगाराची रचना जरूर वाचून बघा.

निशब्द ! घडे भोगणे सर्व ही कर्म योगे मतिमंद ते खेद मानी वियोगे