✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आहे मी ब्राह्मण!! मग??

व
वडापाव यांनी
Sat, 11/09/2013 - 16:34  ·  लेख
लेख
आठवीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो होतो. तिकडे एका मित्राबरोबर पैज लाऊन सात वाट्या ताक प्यायलो होतो (तेव्हाची कॅपॅसिटी तेवढीच होती). आम्हांला ताक वाढणा-या मावशींनी सहाव्यांदा वाटीत ताक ओतताना 'तुझी जात कोणती रे?' असं हळूच विचारलं. "ब्राह्मण!!" "वाटलंच मला!" असं हसत म्हटलं आणि निघून गेल्या. सातव्यांदा ताक ओतताना, "राग नाही ना आला?" असं विचारलं आणि मी "नाही, राग का येईल?" असं म्हटल्यावर पुन्हा हसत हसत निघून गेल्या. नवीन नवीन मैत्री झालेल्या मित्रमंडळात मी एक गोष्ट नेहमी पाहिलीये. गप्पा मारताना सणवार, लग्न, किंवा घरातल्या इतर कोणत्यातरी समारंभाच्या विषयावरून "आम्ही अमुक अमुक जातीचे आहोत ना, आमच्यात असं असतं" असं कोणीतरी म्हटलं, की त्यावरून जातीचा विषय निघतो, आणि मग ग्रूपमधल्या निदान एकालातरी सगळ्यांची जात विचारायची खाज सुटते. तसं त्याने एक-दोघांना विचारल्यानंतर बाकीच्यांच्या चेह-यावर त्यांची पाळी आली की लगेच आपली जात सांगण्याची तयारीही दिसून येते. तशी ती माझ्यावर आली, आणि मी ब्राह्मण म्हटलं, की "तू ब्राह्मण आहेस???" अशी कोरसमध्ये प्रतिक्रिया ब-याचदा येते. मग त्यापाठोपाठ 'वाटत नाही तुझ्याकडे बघून', 'तुझ्या बोलण्याच्या स्टाईलवरून कळतं', 'वाटलंच होतं मला' अशा प्रतिक्रिया येतात. त्यांचं मला विशेष असं काही वाटत नाही. गंमत वाटते, ती 'सही रे!!!' या प्रतिक्रियेची. मी ब्राह्मण आहे, यात 'सही' काय आहे? मला कळत नाही. एकदा आमचा एक ग्रूप क्लासच्या दिशेने चालला होता. त्यात एक 'सुबक ठेंगणी' मुलगीही होती. मी अर्थात तिला कंपनी देत होतो. आणि आमचा बोलण्याचा विषय आमच्याच ग्रुपमध्ये आमच्या पुढे चालणा-या एका मुलाचा होता. ती मुलगी म्हणाली, 'तो मला अजिबात आवडत नाही. डोक्यात जातो.' 'का गं, काय झालं?' 'तो ब्राह्मण आहे आणि सगळे ब्राह्मण बायले असतात.' मी थबकलो. आणि त्या मुलीकडे बघून हसलो. तशी तीही चमकली. 'तू ब्राह्मण आहेस?' 'हो!!' 'सॉरी सॉरी सॉरी... तू बायल्या नाहीयेस. पण बरेच ब्राह्मण बायले असतात.' मी वाद घातला नाही. तिने सुद्धा माझ्या आडनावाचं एका भंडारी आडनावाशी साधर्म्य असल्याने मी ब्राह्मण कसा असा प्रश्न विचारला आणि मग तो विषय तिथेच थांबला. त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही. गप्पा मारताना मध्येच मला, 'तू ब्राह्मण आहेस का?' असं निदान पंधरा-वीस लोकांनी तरी आत्तापर्यंत विचारलं असेल. 'नाही काय आहे, तू जे नॉर्मल मराठी बोलतोस ना ते सुद्धा खूपच हाय लेवलचं आहे ना म्हणून विचारलं!' काय संबंध???? माझे कितीतरी मित्र असे आहेत, ज्यांचं मराठी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगलं आहे. त्यातला एक आग्री आहे, एक क्षत्रिय आहे आणि एक महार आहे(आणि यांनासुद्धा लोक 'तू ब्राह्मण आहेस का?' असं विचारतात). इतकच नाही, तर कितीतरी ओळखीची मंडळी अशी आहेत ज्यांचं मराठी भंगार आहे आणि ते ब्राह्मण आहेत. पुण्याच्या गोडबोले नावाच्या एका मित्राची टोपी हरवली होती. ती सापडली का, असं विचारलं तेव्हा तो 'हो भेटली!' असं म्हणाला होता. माझं स्वतःचं मराठीसुद्धा तितकसं चांगलं आहे असं मला वाटत नाही. चिरणे आणि कापणे, यात माझा नेहमी गोंधळ उडतो. भाजी चिरतात, फळं कापतात हे माहितीये, पण तरीही ब-याचदा मी उलटं बोलतो. आमच्या घरी नॉन-व्हेज खाण्यावर बंदी नाही. पण घरी आम्ही सहसा नॉन-व्हेज खात नाही, कारण कुणाला करताच येत नाही. त्यामुळे आम्हांला आमच्या शेजा-यांनी, वहिनीच्या माहेरच्यांनी, कधी हौसेने चिकन-मटन आणून दिलं, की आम्ही त्यावर मस्त ताव मारतो. वडिलांचे एक मित्र तर ब-याचदा आम्हांला त्यांच्या घरी मासे खायला बोलावतात. तरी माझे आई-वडील 'शक्यतो आपण जास्त नॉन-व्हेज खाऊ नये' असं म्हणतात. त्यामागे कारण हे, की लहानपणापासून शाकाहाराची सवय असलेल्या शरीराला एकदम नॉन-व्हेजचा पुरवठा झाला, तर त्याचे परिणाम खाल्ल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी दिसून येतात. हॉटेलात मित्रमंडळींबरोबर नॉन-व्हेज खात असताना मात्र बरेच अब्राह्मण मित्रच माझ्या नॉन-व्हेज खाण्यावर आक्षेप घेताना दिसतात. मी तर श्रावणात सुद्धा नॉन-व्हेज खातो. 'तू ब्राह्मण ना, मग नॉन-व्हेज कसा काय खातोस?' अशी मला विचारणा होते. 'काही फरक पडत नाही. हल्ली सगळेच ब्राह्मण खातात.' असं मी म्हटलं, की माझ्या वाक्याला पुष्टी जोडणारी उदाहरणं सुद्धा मिळतात, आणि, 'नाही हा, आमच्याइकडे एक ब्राह्मण आहेत, जे नॉनव्हेज असलेल्या टेबलावर बसत सुद्धा नाहीत' 'आमचा एक ब्राह्मण मित्र नॉन-व्हेज तर खातो, पण घरी जाऊन स्वत:वर गोमुत्र शिंपडून घेतो.' असे किस्सेसुद्धा ऐकायला मिळतात. 'तुझ्या घरी माहितीये का तू इथे नॉन-व्हेज खातोस ते? तुला घरचे काही बोलत नाहीत?' असं लोक विचारायला लागले, की माझं एक लांबलचक उत्तर रेडी असतं. "पूर्वी शिक्षणाची मक्तेदारी ब्राह्मणांकडे होती. शिक्षण घेण्याची, किंवा देण्याची सगळ्याच जातीच्या लोकांना अनुमती नव्हती. आता बघा, शिक्षण देण्या-घेण्याचा अधिकार हा सगळ्या जातीच्या लोकांना समान आहे. तसंच पूर्वी ब्राह्मणेतर नॉन-व्हेज खायचे. आता सगळ्यांबरोबर ब्राह्मणही नॉन-व्हेज खाऊ लागले तर काय बिघडलं?" शरीराला पचत नाही, वासाचा त्रास होतो, दुस-या जीवाला मारून खाणं पटत नाही, म्हणून नॉनव्हेज कुणी खात नसलं तर ठीक आहे. पण 'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार?? विशिष्ट भाषा-जाती-धर्म-प्रांताच्या लोकांतील काही गुणांत-अवगुणांत साधर्म्य आढळतं हे मान्य!! पण ते एखाद्या जातीच्या सर्वच व्यक्तींत, सर्वच बाबतीत आढळून यावं असं तर नाही ना. आज समाजात अशी ब्राह्मण मंडळी आहेत, जी स्वतःला ते ब्राह्मण असल्यामुळे जास्त श्रेष्ठ समजतात. आणि त्यांचं हे मत उघडपणे मांडतात सुद्धा. बरीच अशी मंडळीही आहेत, जी ब्राह्मण असूनही ब्राह्मणांनाच शिव्या घालतात. पण काही अशी मंडळीसुद्धा आहेत, ज्यांना आपण ब्राह्मण असल्याचा गर्वही नाही, लाजही नाही. ब्राह्मणतेरात काही अशी मंडळी आहेत, जी ब्राह्मणांचा ते ब्राह्मण आहेत म्हणून द्वेष करतात. तर काही अशी मंडळी आहेत, ज्यांच्या मनात एखादा माणूस ब्राह्मण आहे हे कळल्यावर त्याच्याविषयी कौतुक आणि आदर वाटायला लागतो. जातीवरून माणूस चांगला की वाईट, हुशार की मठ्ठ, हे ठरवणं चुकीचं आहे. जातीचा दुराभिमान बाळगणारे, जातीवरुन लोकांना संघटित करणारे, जातीविषयी लाज बाळगणारे, जातीच्या अशा मानल्या गेलेल्या जुन्या रुढी परंपरा जपणारे, आणि जातीची यत्किंचितही पर्वा नसणारे असे लोक हे सगळ्या जातींत असतात. तेव्हा ठरावीक लोकांच्या स्वभावावरुन अख्ख्या जातीचं चारित्र्य ठरवणं हा मूर्खपणा आहे. हे फक्त ब्राह्मणांच्या बाबतीत होतं असं नाही. त्यामुळेच इथे ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा मुद्दाही मांडायचा नाही. सगळ्याच जातींच्या बाबतीत होतं. मी ब्राह्मण जातीचा आहे त्यामुळे मी ब्राह्मणांबद्दल माझ्या अनुभवातून सांगितलं. दुस-या जातीचा असतो, तर फक्त नाव आणि उदाहरणांचं स्वरूप बदललं असतं, मुद्दा तोच राहिला असता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
44516 वाचन

💬 प्रतिसाद (170)

प्रतिक्रिया

एकदा उदाहरणा साठी म्हणुन कुठली स्थिर तत्वे आहेत ती सांगणार का ?

मारवा
Sat, 11/09/2013 - 21:51 नवीन
थोड विस्तारांन सांगा कुठली स्थिर तत्वे आणि ब्राम्हणांचा त्याच्याशी असलेला संबंध सांगितला तर मलाही थोडीफ़ार माहीती होइल.दुसर म्हणजे तुमच्या लेखात दुर दुर पर्यंत स्थिर तत्वांविषयी काही सांगितलेलं दिसत नाहीये!

तुम्हीच सांगा प्लीज

वडापाव
Sat, 11/09/2013 - 22:02 नवीन
मला त्यातली घंटा माहिती नाही. मुळांत ही स्थिर-चल तत्त्वांची संकल्पना प्रतिक्रियांमधून कळली. कुतुहूल निर्माण झालं, म्हणून तर तुम्हांला शंका विचारतोय... तुम्ही जाणकार दिसता. आणि माहिती असती तरी लेखात त्याबद्दल काही दिलं नसतं कारण मला विशिष्ट जाती आणि त्या जातीबद्दलच्या लोकांच्या विचारसरणीवर लिहायचं होतं, त्यात उदाहरण म्हणून मी ब्राह्मण जातीची निवड केली कारण मग मला आलेले अनुभव मला सोयीने मांडता आले.
↩ प्रतिसाद: मारवा

मी पण जंगी कुस्ती सामना

ग्रेटथिन्कर
Sat, 11/09/2013 - 21:58 नवीन
मी पण जंगी कुस्ती सामना बघायच्या उद्देशाने आलेलो, परंतु इथे तर चमचालिंबु सामना चालू होता... ( सामाजीक इषयावर टंकायची खुमखुमी भागवायला आजकाल संकेतस्थळ मिळत नाहीत ,अशी संकेतस्थळं असल्यास, लिहा अथवा समक्ष भेटा-ग्रेटथिंन्कर)

आता या धाग्यात तुमच्यासारख्या

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 11/09/2013 - 22:20 नवीन
आता या धाग्यात तुमच्यासारख्या रथीमहारथींनीसुद्धा कामदेवी बाण मारले तर मग रणधुमाळी माजून त्याचं महाभारत कसं होणार रावसाहेब? काही धाग्यांचं नशिबच तसं बघा ;) पण एक नक्की. या धाग्यावरचे तुमचे विचार आवडले. याबाबत धन्यवाद आणि अभिनंदन ! (समतोल विचार करणारे सभासद बहुसंख्येने आहेत म्हणून मिपावर टिकून राहिलेला) इए
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

खुमखुमी

अन्या दातार
Sat, 11/09/2013 - 22:57 नवीन
सामाजीक इषयावर टंकायची खुमखुमी भागवायला आजकाल संकेतस्थळ मिळत नाहीत ,अशी संकेतस्थळं असल्यास, लिहा अथवा समक्ष भेटा
स्वतःचेच संस्थळ काढा! ;)
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

@स्वतःचेच संस्थळ काढा!>>>

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/09/2013 - 23:08 नवीन
@स्वतःचेच संस्थळ काढा!>>> =))
↩ प्रतिसाद: अन्या दातार

...

आशु जोग
Sat, 11/09/2013 - 22:14 नवीन
आम्ही तसे हॉटमेलच्या जमान्यातले... आजवरच्या नेट आयुष्यात जात पात विषयक अनेक चर्चा वाचायला मिळाल्या, ब्राह्मण देशस्थ कोकणस्थ कंजूष, दानशूर पुणेरी सदाशिवपेठी अशी ठरलेली स्टेशने यायला लागली की गाडी कुठे जाणार याचा अंदाज यायला लागतो... २००४ पासून बी-ग्रेडने त्यात आणखी नवे रंग भरले... असो चालू द्या

खरी जात

अशोक पतिल
Sat, 11/09/2013 - 22:46 नवीन
खर सागांयच म्हणजे आजकाल रोजच्या व्यवहारात जातपात अगदी मनात पण येत नाही . सर्वांना इतर जातीतले मित्रमंडळीच जास्त असतात.आणी संकट काळी आपल्या नात्यागोत्या पेक्षा हे मित्र व शेजारच जास्त कामी येतात. ही जात पात बहुतेक १०००-१५०० वर्षात विकसीत झालेलि दिसते.त्यापुर्वी आर्य, द्र्विड इ. असेच वर्गीकरण असावे.

सहमत

मंदार कात्रे
Sat, 11/09/2013 - 23:16 नवीन
खर सागांयच म्हणजे आजकाल रोजच्या व्यवहारात जातपात अगदी मनात पण येत नाही . सर्वांना इतर जातीतले मित्रमंडळीच जास्त असतात.आणी संकट काळी आपल्या नात्यागोत्या पेक्षा हे मित्र व शेजारच जास्त कामी येतात.
१००% सहमत
↩ प्रतिसाद: अशोक पतिल

वाचतेय ...

कवितानागेश
Sat, 11/09/2013 - 22:52 नवीन
वाचतेय ... बाकी रेवतीताईशी सहमत. -(रेवतीताईची जातवाली) माउ :P

लेख आवडला. संतुलित आहे.

नगरीनिरंजन
Sat, 11/09/2013 - 22:56 नवीन
लेख आवडला. संतुलित आहे. मला चक्क "तू ब्राह्मण नाहीस? वाटत नाही!" अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या आहेत. बाकी "आपल्यातला" हा शब्द ऐकला की तिथून काढता पाय घेणे सवयीचे झाले आहे.

लेख आवडला.

मुक्त विहारि
Sat, 11/09/2013 - 23:19 नवीन
संतुलित आहे.

बर्गात पहिल्या मुलाच्या कानात

खटासि खट
Sun, 11/10/2013 - 08:31 नवीन
बर्गात पहिल्या मुलाच्या कानात मेसेज सांगायचा आणि तो पास करायचा. शेवटच्या मुलाकडे काय मेसेज पोहोचला ते पहायचं या खेळाची आठवण झाली. शेवट इंटरेस्टिंग असायचा. एकदा एका माणसाने नेटवर लिहीलं. जात तोडायला पाहीजे. एकत्र आलं पाहीजे. त्यासाठी आंजा लग्न झाली पाहीजेत. पहिलं उत्तर : म्हणजे आमच्या मुलींवर डोळा आहे तर दुसरं उत्तर : समाजवाद्यांची थेरं अजून चालू आहेत ? तिसरं उत्तर : समाजवादी :हसून हसून लोळणारी स्मायली: चौथं उत्तर : ओ धागाकर्ते , तुम्ही मुसलमान का हिंदू ते नाही लिहीलं ? पाचवं उत्तर : अगदी हेच म्हणतो. लव जिहाद वाले इथं पण आले ? पुन्हा पहिल्याचं उत्तर :सहमत तिसरा : काय संबंध इथं लव जिहादचा ? पहिला : जरा डोळे उघडे ठेवा. ब्ला ब्ला ब्ला ब्ला

मिपाकर बरे आहेत ना? काड्या

मृत्युन्जय
Sun, 11/10/2013 - 09:19 नवीन
मिपाकर बरे आहेत ना? काड्या टाकण्याच्या उद्देशाने पण निरागसपणाचा अविर्भाव असणारे २ प्रतिसाद वगळता इतर सगळे प्रतिसाद सोज्ज्वळ आहेत चक्क. त्यामुळे मी पण " त्या " २ प्रतिसादांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळतो. बाकी आपल्याला तर ब्राह्मण असल्याचा अभिमान आहे ब्वॉ. जसा भारतीय असल्याचा, महाराष्ट्रीयन असल्याचा, हिंदु असल्याचा आहे तसाच ब्राह्मण असल्याचा पण आहे. तळाटीपः मी ब्राह्मण असल्याचा अभिमान आहे या अर्थी: १. इतर लोकांनी त्यांच्या जाती धर्म आणि पंथाचा अभिमान बाळगु नये असे काही माझे मत नाही. २. प्रत्येकाने आपल्या जाती धर्म आणि पंथाचा अभिमान बाळगावा असे माझे मत आहे (अर्थात अभिमान बाळगण्याचे कारण नाही असे मानणार्‍या वर्गाशी माझा काही आकस नाही) ३. मी माझ्या जाती धर्माचा अभिमान बाळगतो म्हणजे इतर जाती धर्मांना तुच्छ मानतो असे नाही.

बास का राव.

खटासि खट
Sun, 11/10/2013 - 09:36 नवीन
बास का राव. मोजून २ प्रतिसाद होते. त्यातला एक डिलीट झाला. आमची कुठेही शाखा नाही हे दिलखेचक वाटल्याने दिला होता तो.. मग नेटवर काय करताय वाला चंबूगबाळं आवरून निघायची वेळ झाली भौतेक.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आयला तुम्हीही असले २ प्रतिसाद

मृत्युन्जय
Sun, 11/10/2013 - 10:03 नवीन
आयला तुम्हीही असले २ प्रतिसाद दिले होते काय? नज्रेतुन सुटले बहुधा किंवा मी बघण्याची आधीच डिलिटले. :)
↩ प्रतिसाद: खटासि खट

गेल्याच महिन्यात अशाच चर्चा

सूड
Sun, 11/10/2013 - 11:07 नवीन
गेल्याच महिन्यात अशाच चर्चा सुरु झाल्या. मग रितीभाती, लग्नाच्या पद्धती असं सगळं चालू असताना एका मित्राने मध्येच माझं बोलणं तोडलं "म्हणजे, तू ब्राह्मण नाहीस ??" म्हणलं "नाही, पण तुला असा प्रश्न का पडला?" मित्रः "नाही, तुझं बोलणं कसं सात्विक सात्विक आहे, त्यात जानवं सुद्धा आहे की तुझं" यावर काय बोलावं कळलं नाही. हां, यावरुन आमची मैत्री वैगरे काही तुटली नाही. पण मी ब्राह्मण वाटू नये म्हणून जानवं काढून ठेवावसं वाटलं नाही किंवा माझ्या बोलण्यात बदल करावा असंही वाटलं नाही. मी आहे हा असा आहे, ज्यांना पटतं त्यांनी बोलावं, नाय त्यांना लांब ठेवण्यास माझा खवचटपणा पुरेसा आहे. ;)

आमच्या वडिलानी मी सामिष खायला

सुबोध खरे
Sun, 11/10/2013 - 12:02 नवीन
आमच्या वडिलानी मी सामिष खायला सुरुवात केल्यावर एक गोष्ट सांगितली होती. आपण ब्राम्हण आहोत यात आपले कर्तृत्व काही नाही. कारण जन्म घेणे कोणाच्या हातात नाही. पण कर्म स्वतःच्या हातात आहे. ब्राह्मण्य हे केवळ जानवे किंवा शेंडीवर नसून ते तुमच्या आचार विचारात असते. ब्राम्हण म्हणून जन्माला आलात पण ब्राम्हणांच्या चांगल्या गोष्टी मात्र पुढे चालू ठेवा. यात शरीर(रोज स्नान करणे) आचार(स्वच्छ आणि शुद्ध आचरण) आणि विचारांची शुद्धता(दुसर्याचा द्वेष न करणे आणि स्त्रियांना समान हक्क देणे-- आमच्या आत्याचे नाव घराच्या सात बारा मध्ये मुद्दाम टाकून घेतले तलाठी उलट सुचवत असताना सुद्धा) हे सर्वात महत्त्वाचे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाचे महत्त्व लक्षात ठेवा. विद्या हि जगात कुठेही पुज्य मानली जाते. त्यांनी स्वतः सुरुवातीला नातेवाईकांच्या घरी राहून आणि नंतर नोकरी करून आपले शिक्षण त्रि पदवीधर पर्यंत पूर्ण केले.त्यानंतर आमच्या आई चे शिक्षण (द्विपदवीधर होई पर्यंत) पूर्ण झाले. जर वरील गोष्टी आपण आयुष्यात आचरणात आणू शकलात तर आपण कर्माने ब्राम्हण आहात अन्यथा नुसते जन्माने ब्राम्हण असून काय उपयोग?

अनुमोदन

lakhu risbud
Sun, 11/10/2013 - 17:00 नवीन
जर वरील गोष्टी आपण आयुष्यात आचरणात आणू शकलात तर आपण कर्माने ब्राम्हण आहात अन्यथा नुसते जन्माने ब्राम्हण असून काय उपयोग? खरे सर तुमच्या म्हणण्यास १००० % अनुमोदन.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१११११ सहमत

खटपट्या
Wed, 11/13/2013 - 02:05 नवीन
+१११११ सहमत
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक निरीक्षण -

आशु जोग
Sun, 11/10/2013 - 12:43 नवीन
जाती पातींना पब्लिकली विरोध करणारे, जातीपाती गेल्या पाहिजेत असे म्हणणारे लोक खरे डेंजरस. हे लोक व्यवहारात जाम जातीयवादी असतात.

माझे बरेच जिवलग मित्र अ

काळा पहाड
Sun, 11/10/2013 - 13:37 नवीन
माझे बरेच जिवलग मित्र अ-ब्राम्हण आहेत (कुणबी, जैन, महार इत्यादी). त्यांच्याकडे "तुम्ही बामन म्हंजे बारा बोड्याचे" असे सरळ बोलण्याचा मोकळेपणा आहे. आणि "तुम्ही मराठा म्हणजे गुढघ्यात" हे ऐकण्याचाही. अर्थात हे सगळे मित्र बि-ग्रेड च्या राजकारणापूर्वीचे आहेत. पण गेल्या काही वर्षात "गड्या आपुली जात बरी" असे माझे मत झाले आहे. सर्वसाधारणपणे ब्राम्हण लोक अ-ब्राम्हण लोकांचा जितका द्वेष करतात, त्यापेक्शा कैक पटीने अ-ब्राम्हण लोक ब्राम्हणांचा द्वेष करतात असे मला आढळून आले. दादोजी प्रकरणानंतर तर शिवाजी तुमचा, बाजीराव आमचा हेच बरे आणि यामुळे निदान जातींमधील शांतता तरी कायम राहील असे वाटते.

मला

फारएन्ड
Mon, 11/11/2013 - 02:07 नवीन
मला माझे लहानपणीचे मित्र आठवले हे वाचून. टोटली असेच वातावरण होते. एका बाजूने "गोड आमटी" तर दुसर्‍या बाजूने "ताटात हात (धुणे)" याबद्दल यथेच्छ टिंगली होत. नंतर एक दोन दिवसांत एकमेकांच्या घरी जेवताना ते आठवतही नसे. त्यात आमच्यातील एक मराठा मित्र सुपर ब्रिलियंट होता, तर एक ब्राह्मण कुस्तीत कोणाला हरत नसे. हे खरेच होते, उगाच काहीतरी बॅलन्स्ड लिहायचे म्हणून लिहीलेले नाही. आमचे सगळ्यांची आधीची पिढी त्यांच्या लहानपणापासून एकाच वाड्यातली, त्यामुळे नाती घट्ट. बामणांचे बामणपण व मराठ्यांचे मरहट्टेपण तितकेच रोकठोक व ओपन होते. भांडणेही होती पण त्यात जात नव्हती. २००४ नंतर काय फरक पडला आहे माहीत नाही, आता बरेच लोक विविध ठिकाणी विखुरले आहेत.
↩ प्रतिसाद: काळा पहाड

ब्राह्मण या जातीची काही

श्रीगुरुजी
Sun, 11/10/2013 - 15:16 नवीन
ब्राह्मण या जातीची काही वैशिष्ट्ये आहेत. कमालीची लवचिकता, वास्तविकता स्वीकारून व परिस्थितीशी जुळवून घेऊन पुढे जाण्याची तयारी व सातत्याने आधुनिकतेचा स्वीकार करून स्वतंत्र विचार करून स्वतःला पटलेल्या कालबाह्य गोष्टींचा त्याग करण्याची वृत्ती ही त्यांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पूर्वी बहुसंख्य ब्राह्मण व्रतवैकल्यात गुंतलेले होते. शिवाजी महाराजांच्या काळात ते राजकारणात आले. काही काळ तलवारही गाजविली. नंतर ब्रिटिशांच्या काळात शिक्षणाचे महत्त्व ओळखून लेखणी हातात धरली. शेती व्यवसायातही ब्राह्मण होते. १९४७ नंतर राखीव जागांमुळे संधी कमी झाल्या. १९४८ ला गांधीवधानंतर झालेल्या दंगलीत खेड्यातील ब्राह्मणांची घरे जाळल्यावर व कूळकायदा करून शेतजमिनी हिसकावून घेतल्यावर काळाची पावले ओळखून ते शहराकडे वळले. राजकारणातून हद्दपार झाल्यावर आता परत आपल्याला सत्तेत स्थान नाही हे ओळखून स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत केले. पुढे मंडल आयोग आल्यावर अजून संधी कमी झाल्या. साधारणपणे १९७५-८० पर्यंत शालेय शिक्षकी पेशात असणारे ब्राह्मण त्यापेक्षा अधिक आकर्षक अशा प्राध्यापकी पेशात व खाजगी शिकवणीच्या क्षेत्रात गेले. नंतर पुन्हा एकदा काळाची पावले ओळखून संगणक क्षेत्र, माध्यमे, आर्थिक क्षेत्र, अभिनय क्षेत्र इ. क्षेत्रात शिरकाव केला. शेंडी, घेरा, जानवे इ. गोष्टी बहुतांशी ब्राह्मणांनी सोडल्या. पूर्वी परदेशगमन पाप मानून प्रायश्चित्त घेणार्‍या ब्राह्मणांची नवीन पिढी वेगाने परदेशात स्थायिक होण्यास उत्सुक आहे. वास्तविकता स्वीकारून लवचिकता दाखविल्यामुळेच हे शक्य झाले आहे. पूर्वीच्या पिढ्यांनी केलेल्या जातीयवादामुळे मनात काहीशी अपराधी भावना असूनसुद्धा, राखीव जागांमुळे संधी कमी झालेली असताना सुद्धा, कूळकायदा करून शेती हिसकावून घेतलेली असताना सुद्धा, १९४८ साली घरे जाळली गेलेली असताना सुद्धा आणि राजकारणातून हद्दपार झालेले असताना सुद्धा ही जमात नेस्तनाबूत होत नाही हे काहींना बघवत नाही. म्हणूनच ब्राह्मण समाजातले संत (उदा. संत रामदास), नेते (उदा. स्वातंत्र्यवीर सावरकर), पूर्वीचे लढवय्ये (थोरले बाजीराव पेशवे, शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव) इ. ची यथेच्छ बदनामी करून त्यांच्या श्रद्धास्थानावर आघात करण्याचे प्रयत्न सरकारी आशिर्वादाने सुरू आहेत. ब्राह्मण आपल्या स्वभावानुसार याविरूद्ध प्रतिकार न करता व अस्मितेचा मुद्दा न करता याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून केवळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत करताना दिसतात.

कूळकायदा इंदीरा गांधीने

ग्रेटथिन्कर
Sun, 11/10/2013 - 15:37 नवीन
कूळकायदा इंदीरा गांधीने म्हणजेच ,ब्राह्मणाच्या कन्येने केला आणि आरोप मात्र ब्राह्मणेत्तरांवर लावायचा, कसब चांगले आहे. गांधीहत्येनंतर तूरळक ठिकाणी, अगदी दहापंधरा घरे जाळली असतील तीही पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी .परंतु आजही त्याचे भांडवल करणारे कमी नाहीत, असे भासवतात की जणु खैड्यातून ब्राह्मणांचे तांडेच्या तांडे शहराकडे गेले..
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आभ्यास वाढवा!

कवितानागेश
Sun, 11/10/2013 - 15:44 नवीन
आभ्यास वाढवा!
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

गांधीहत्येनंतर तूरळक ठिकाणी,

मृत्युन्जय
Sun, 11/10/2013 - 17:43 नवीन
गांधीहत्येनंतर तूरळक ठिकाणी, अगदी दहापंधरा घरे जाळली असतील तीही पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी " गांधीजी २७ खून आणि ५२ बलात्कार करणारे एक विकृत सिरियल किलर होते " या वाक्याएवढेच वरील विधान हास्यास्पद, खोटे आणि चुकीचे आहे.
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

ग्रेटस्टिन्कर,

श्रीगुरुजी
Sun, 11/10/2013 - 20:24 नवीन
ग्रेटस्टिन्कर, तुमचे अज्ञानही तुमच्या प्रतिसादातून दरवळणार्‍या स्टिंकइतकेच ग्रेट आहे. असो. बहुत काय लिहिणे.
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

कुळकायदा

सुबोध खरे
Mon, 11/11/2013 - 10:37 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे कुळकायदा हा स्वातंत्र्याच्या आसपास आलेला आहे (१ ९ ४ ८ - ४ ९). व्यंकटेश माडगुळकर यांचे वावटळ हे जगप्रसिद्ध (भारतात त्यामानाने कमी प्रसिद्ध असलेले) पुस्तक वाचावे. यामध्ये गांधीहत्येच्या नंतर झालेली जाळपोळ याचे चक्षुरवै सत्यं हकीकत आहे. आपली माहिती त्रोटक आहे असे वाटते.सत्याचा विपर्यास होऊ नये इतकीच इच्छा असो आपले मत आपल्यापाशी
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

कूळकायदा इंदीरा गांधीने

खटपट्या
Wed, 11/13/2013 - 02:08 नवीन
कूळकायदा इंदीरा गांधीने म्हणजेच ,ब्राह्मणाच्या कन्येने केला
इंदिरा गांधी हि ब्राम्हणाची मुलगी ??????
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

हो तिचा पिता जवाहर हा मोतीलाल

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/13/2013 - 12:59 नवीन
हो तिचा पिता जवाहर हा मोतीलाल नामक कास्मिरी पंडीताचा मुलगा होता. नेहरू असं त्याचं आडनाव.
↩ प्रतिसाद: खटपट्या

खालील लिंक वर काही वेगळीच

खटपट्या
गुरुवार, 11/14/2013 - 01:34 नवीन
खालील लिंक वर काही वेगळीच माहिती आहे. कोणाला अजून काही माहिती असेल तर सांगा. http://blog.sureshchiplunkar.com/2007/04/blog-post_18.html
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

गुरुजी तुमचच खर

मारवा
Sun, 11/10/2013 - 17:09 नवीन
सर्वं स्वं ब्राम्हणस्य इदं यत किंचिद जगती-गतम. श्रेष्ठ्येन अभिजनेन इदं सर्वं वै ब्राम्हण: अहर्ती. स्वम एव ब्राम्हण: भुड्क्ते स्वं वस्ते स्वं ददाति च. आनृशंस्याद ब्राम्हणस्य, भुज्ज्ते हि इतरे जना: ( मनुस्मृती १.१००-१०१) अनुवाद- या जगामध्ये जी काही संपत्ती असते, ती संपत्ती ब्राम्हणांची असते.श्रेस्ष्ठत्वामुळे आणि जन्माच्या उच्चतेमुळे या सर्वांसाठी ब्राम्हण योग्य असतो. ब्राम्हण स्वत:चेच खातो, स्वत:चेच नेसतो आणि स्वत:चेच देतो. ब्राम्हणाच्या दयेमुळे इतर लोक (त्यांनी स्वत: कमावलेल्या संपत्तीचा) उपभोग घेतात. विश्लेषण- जगातील सर्व च संपत्ती ही ब्राम्हणाचीच आहे त्यामुळे त्याने दुसर्याा एखाद्याची संपत्ती वापरली तर ती त्याने चोरी केली आहे असे होउच शकत नाही. तो दुसर्यातची अर्जीत केलेली संपत्ती वापरत असतो ती त्याचा जगावरील प्रत्येक संपत्ती वर त्याला जन्मजात श्रेष्ठत्वामुळे जो मालकी हक्क प्राप्त झाला आहे त्यामुळेच. म्हणुन ब्राम्हण दुसर्याकचे नव्हे तो स्वत:चेच खातो ,स्वत:चेच नेसतो आणि स्वत:चे देतो त्यामुळे ब्राम्हणाने कोणाची चोरी वगैरे केली असा प्रश्न च उपस्थित होत नाही. या उलट एखाद्या दुसर्याेने कष्ट करुन काही संपत्त्ती मिळविली आणि जर का तो तिला ब्राम्हणांची दया नसतांना परवानगी नसतांना वापरु बघत असेल तर ही त्या माणसाची चोरी मानली जाते. कारण मुळ मालक हा ब्राम्हण असता या माणसाने त्याच्या दये-परवानगी शिवाय अशी संपत्ती वापरणे ही चोरीच नव्हे का ? चोरी न करणे हे धर्माच्या एका महान अशा स्थिर तत्वांमध्ये येते. मनुस्मृती हे महान असे धर्माचे शास्त्र त्यावर महान असा स्थिर नियम घालुन देते.आणि स्थिर नियम कधीही बदलत नाहीत त्यावरच धर्म शतकानुशतके स्थिर टिकुन ही राहतो. बाकी मुर्ख लोक म्हणी बनवित राहतात उदा. एव्हरीथींग चेंजेस एक्सेप्ट द लॉ ऑफ़ चेंज. तरीही काही बिनडोक लोंक ब्राम्हणां च्या चोरी विरुध्द न्याय मागण्यासाठी एखाद्या राजा किंवा न्यायाधीशांकडे जातातच मग राजा किंवा न्यायाधीश ही कधीकधी अशा बिनडोक लोकांच्या नादी लागुन ब्राम्हणांविरुध्द निकाल देण्याची शक्यता निर्माण होउ शकते. आणि मग न्याय हे दुसरे महान असे स्थिर तत्व धोक्यात येउ शकते. कारण न्याय हा ही जगातल्या सर्वच धर्मांमधील एक महत्वाचं अस स्थिर तत्व आहे. मग काय करावे बरे ? चला तैत्तिरीय संहीता आली की हो न्याय करायला काय म्हणते बघु या यद ब्राम्हण: च अब्राम्हण:च प्रश्नम इयातां ब्राम्हणाय अधिब्रुयात. यद ब्राम्हणाय अधि-आह आत्मने अधि-आह. यद ब्राम्हणं परा-आह आत्मानं परा-आह. ( तैत्तिरीय संहीता २.५.११.९ ) अनुवाद- जर एखाद्या कडे एक ब्राम्हण आणि एक अब्राम्हण आपला प्रश्न (तक्रार) घेउन आला तर ,ब्राम्हणाच्या बाजुने निर्णय द्यावा. ब्राम्हणाच्या बाजुने बोलणे म्हणजे स्वत:च्या बाजुने बोलणे होय.ब्राम्हणाच्या विरोधात बोलणे म्हणजे स्वत:च्या विरोधात बोलणे होय. म्हणुन ब्राम्हणांच्या विरोधात बोलु नये. विश्लेषण- हे काय हो गडे आता विश्लेषण ही तुम्हीच करणार का तुम्ही कीनई फ़ार फ़ार पुर्वग्रह दुषीत आहात.,आम्हाला ना आमचे धुंडीराज बापट शास्त्रीजी जे आहेत ना त्यांनी स्वत: या श्लोकाच केलेल भाषांतरच हवे कारण त्यांच्या इतका या विषयावरील अधिकारी माणुस शोधुन सापडायचा नाही तुम्ही तेच द्या बर. अहो अस काय करता मी पण ब्राम्हण च आहे की , हो पण तुम्ही कीनई बिघडलेले नास्तिक आहात ठिक आहे त्यांच्याच शब्दात.. धुंडीराज बापट शास्त्रिंचे या श्लोकाचे विश्लेषण " ब्राम्हण व अब्राम्हण या दोहोंमध्ये " मी तु्झ्याहुन श्रेष्ठ आहे, मी तु्झ्याहुन श्रेष्ठ आहे, असा वाद जेव्हा उत्पन्न होईल आणि या वादाच्या निर्णयासाठी ते दोघेही एखाद्या तिर्हााइता कडे येउन प्रश्न विचारतील, तेव्हा निर्णय करणार्याश तिर्हासइताने ब्राम्हण श्रेष्ठ आहे असाच निर्णय द्यावा. म्हणजे त्याने स्वत:ला श्रेष्ठत्व मिळविल्यासारखे होते. ब्राम्हण हा पराभुत म्हणजे अब्राम्हणाहुन कमी योग्यतेचा आहे, असा निर्णय दिल्याने तो निर्णय देणार्याश तिर्हााइताने स्वत:चाच पराभव बोलुन दाखविल्याप्रमाणे होते. यास्तव ब्राम्हण हा अब्राम्हणापेक्षा कमी योग्यतेचा आहे असे कधीही बोलु नये. (कृष्ण यजुर्वेद-भाग १-तैत्तिरीय संहीता पृष्ठ क्रमांक-३३०-३३१ प्रकाशक:- चि.धुं बापट- कानपुर-१६- १९९४) समारोप- १-जगातील सर्व संपत्ती ही ब्राम्हणांचीच आहे कोणी दुसरा ब्राम्हणांच्या दये अथवा परवानगी शिवाय जर ती वापरत असेल आणि स्वत: कष्टाने कमविली म्हणुन माझीच असा गैरसमज करुन घेत असेल तर ही त्याने केलेली ब्राम्हणांच्या संपत्तीची चोरी च आहे आणि चोरी करणे हे पाप आहे आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे. आणि हे धर्माचे स्थिर तत्व आहे. २ चल तत्वे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वेदना उदा सति या धर्माच्या चल तत्वा ने स्त्रियांना जळतांना होणार्या थोडयाफ़ार वेदना हे म्हणजे फ़ार च बिनमहत्वाच आणि किरकोळ आहे त्या तुलनेने स्थिर तत्वे ज्याने धर्म स्थिर राहतो ते फ़ार फ़ार महत्वाचे आहे. आणि केशवपन काय उकरुन काढता हो कीती कीती क्षुद्र विषय होता तो काय ते चल तत्व किरकोळ हे बघा आपण बालाजीला नाही बघत का मुली केशवपन करतात ते आणि त्याने उवा वगेरेंचा ही त्रास होत नाही शिवाय केशवपना ने स्त्रियांच्या सौंदर्यात ही वाढ च होते नाही का ? आणि बंद झाल हो ते सर्व आता तुम्ही सोडा बर ती चल तत्वे आता महान अशा स्थिर तत्वांवरच बुध्दी स्थिर करु या!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हायला. मनू म्हनाला काय हे?

गब्रिएल
Sun, 11/10/2013 - 17:21 नवीन
हायला. मनू म्हनाला काय हे? सध्या हेच्च म्हण्ण एका सम्प्रदायाच आहे... ते म्हनतात आमीच पैले आन काही लोक वाट चूकून दुसरीकडे गेले. म्हणजे आमि त्याम्चि सम्पत्ति आणी जमिन लुटली तर ते बरोबरच आहे. सेक्युलरपन त्यांच्या बाजुने बोलताना दिसतात.
↩ प्रतिसाद: मारवा

@मारवा,

वडापाव
Sun, 11/10/2013 - 17:25 नवीन
मनुस्मृती आणि तैत्तरीय संहितेत मांडलेल्या या विचारांशी तुम्ही स्वतः सहमत आहात का?? कारण हे विचार मला तरी कालबाह्य वाटतात. फक्त आपण ब्राह्मण आहोत म्हणून जसे वाईट ठरत नाही, तसंच आपण फक्त ब्राह्मण आहोत म्हणून कोणीतरी मोठे लागून गेलो आहोत असंही मला वाटत नाही. स्थिर आणि चल तत्त्वांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक होतो, ती दिल्याबद्दल आभार. रसच उरला नाहीये आता.
↩ प्रतिसाद: मारवा

वडापाव

विटेकर
Mon, 11/11/2013 - 14:54 नवीन
वडापाव यांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत.. श्री मारवा यांनी जी आवतरणे दिली आहेत, त्यातील " ब्राह्मण" हा शब्द "ब्रह्म जाणणारा" या अर्थी असावा असे मला वाटते आणि मग श्लोकाची संगती ही लागते. ब्राह्मण = ब्रह्म जाणणारा = ज्ञानी = ज्याच्या कडे आप- परं भाव नाही, ज्याचे द्वैतच नाहीसे झाले आहे, त्याच्या दृष्टीने त्याचे स्वतः चे ही काही नाही आणि दुसर्याचे ही काही नाही.. अवघा रंग एक झाला !तो चोरी कशाला करेल? आणि लौकिकार्थाने अथवा सामान्य माणसाच्या नजरेने जरी ती चोरी असली तरी त्यात ज्ञानी पुरुषाला स्व:तला काहीही आसक्ती नसल्याने ते कर्म देखील "ज्ञानोत्तर कर्मच" असले पाहीजे, जागाच्या अथवा समष्टीच्याच कल्याणाकरता असले पाहीजे म्हनून ती चोरी ठरत नाही. आणि स्वाभाविक "अशी" चोरी जर राजांसमोर आली तर त्याने सहज पुराव्यांच्या आधारे, निवाडा न करता हे ज्ञानोत्तर कर्म आहे हे समजून ज्ञानी माणसाच्या बाजूने निवाडा करावा असे सांगितले आहे.. अर्थात हेच बरोबर आहे असा माझा अजिबात दावा नाही. श्री मारवा यांचा हेतु आणि भूमिका विधायक आहे असे ग्रूहीत धरुन हा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. बी-ग्रेडी धुमाकुळ घालायचा असेल तर आमचा प्रतिसाद खुषाल उडवावा.
↩ प्रतिसाद: वडापाव

@मारवा

एच्टूओ
Fri, 11/15/2013 - 12:24 नवीन
१-जगातील सर्व संपत्ती ही ब्राम्हणांचीच आहे कोणी दुसरा ब्राम्हणांच्या दये अथवा परवानगी शिवाय जर ती वापरत असेल आणि स्वत: कष्टाने कमविली म्हणुन माझीच असा गैरसमज करुन घेत असेल तर ही त्याने केलेली ब्राम्हणांच्या संपत्तीची चोरी च आहे आणि चोरी करणे हे पाप आहे आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे. आणि हे धर्माचे स्थिर तत्व आहे.
असे मानणारे ब्राह्मण सध्या तरी बहुतेकांच्या पाहण्यात नाहीत. आपल्या पाहण्यात असतील तर आपण अजूनही मध्ययुगात आहात असे वाटते. खरे तर सध्या ९९% ब्राह्मणांना "मनुस्मृती" पेक्षा management च्या तत्वांमध्ये जास्त स्वारस्य आहे. काही मध्ययुगीन कालबाह्य ग्रंथांचे संदर्भ देऊन, अवास्तव आणि निरर्थक गोष्टींवर चर्चा कितीही केली तरी त्याला अंत नाही. बाकी सध्या ब्राह्मणांपेक्षा इतर जातींचाच "मनुस्मृती" चा दांडगा अभ्यास चाललाय, असं दिसतयं. असो. बाकी चालु द्या...
↩ प्रतिसाद: मारवा

फार छान

मंदार कात्रे
Sun, 11/10/2013 - 17:17 नवीन
फार सुन्दर विवेचन ...आभार गुरुजी!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वा ! गुरुजी ..

विटेकर
Mon, 11/11/2013 - 15:27 नवीन
फारच छान आणि समतोल प्रतिसाद !
.....केवळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत करताना दिसतात.
पण हे बरोबर नाही! हा ब्राह्मणांचा स्वार्थीपणा आहे. स्वार्थी असणे हे पाप नसले तरीही समाजाच्या द्रुष्टीने हे भले नव्हे. ज्यांनी समाजासाठी मार्गदर्शन करायचे त्यांनी गांधीवधानंतर आणि कुळकायदानंतर गाव सोडला ..गावांचे संतुलनच बिघडले. ब्राह्मणांसाठी गांधीवध आणि कुळकायदा ही इष्टापत्ती ठरली ! परंपरेने आलेली विद्या आणि तैल बुद्धीच्या जोरावर ब्राह्मणांनी आपली उन्नती करुन घेतली. पण मागे राहीलेल्या समाजाचे काय ? गावोगावचे दैवी उत्सव बंद पडले. पुराण-श्रवणाने माणसांची दु:ख हलकी होत. दुष्काळ पडत, लोक कर्ज-बाजारी होत पण आत्महत्येचा अघोरी मार्ग कोण स्वीकारत नव्हते ! दुष्काळ पडला तर पाट्लाच्या शेतावर कोणी उपाशी मरत नव्हते ! पाटील ही ती वेळ येऊ देत नसत ! पाटिल -कुलकर्णी हे गावाचे तारणहारच होते ! गांधी हत्येनंतर : १.ब्राह्मणांनी स्वत:चा फायदा करुन घेतला. ज्यांची घरे जळाली त्यांची अमेरिकेत घरे झाली. २.सर्वात जास्त वाताहात झाली ती मराठ्यांची ( अपवाद सोडून ) ! सगळेच मराठे काही सधन शेतकरी नव्हते आणि राजकारणातही नव्हते !पण आपला आब ठेऊन होते. विद्येची कास धरली नाही , किबहुना तशी परंपरा नव्हतीच, त्यांना शेतमालकावरुन शेतमजूर असे पाय-उतार व्हावे लागले किंवा कारखान्यात कामगार व्हावे लागले. पांढर्या कपड्यातील काळ्या ईंग्रजांनी त्यांचेही कंबरडे मोडले.आणि त्यांनाही आरक्षणाची कटोरी घेऊन सरकार दरबारी उभे रहावे लागले. ! ३. बी सी आणि ओ बी सी ना तर घटनेनेच आरक्षण दिले होते. किती प्रगती झाली त्यांची ? उलट आरक्षणांमुळे अन्य समाजाच्या रोष मात्र ओढून घ्यावा लागला ! जाति- व्यवस्था मोडून आपण नक्की काय मिळवले ? जुनी ( सदोष होती पण त्याचे फायदेही होते) व्यवस्था मोडली आणि नवी,समकक्ष व्यवस्था आपण उभी करु शकलो नाही हे खरे अपयश होय . झालेला एकमेव फायदा म्हणजे अस्पृश्यता जनातून नाहीशी झाली ( मनात अजून आहेच ) , पण ती तशी आमच्या संतांनी नष्ट केलीच होती ना ? ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी ही आपली नैसर्गिक जबाबदारी टाळून आप-आपले भले करुन घेण्याचा खटाटोप केला , त्याचे दीर्घकालीन परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतील. गावे ओस पडत आहेत आणि शहरांची बजबजपुरी वाढते आहे हा जाति व्यवस्था अनैसर्गिकपणे मोडल्याचाच परिणाम आहे !
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कुठे बरं वाचलं होतं ते वाक्य

बॅटमॅन
Mon, 11/11/2013 - 15:35 नवीन
कुठे बरं वाचलं होतं ते वाक्य आठवेना. "कूळकायद्याने गमावले ते सिलिकॉन व्हॅलीने कमावले", पर्फेक्ट वर्णन. बाकी अशी स्थित्यंतरे होतच असतात. दरवेळेस जुन्या व्यवस्थेच्या नावाने कढ काढण्याचे कारण नाही. उलट आधीच्या व्यवस्थेत झापडबंद नियमांमुळे अंगभूत कौशल्याला वाव न मिळणार्‍यांसाठी नवी व्यवस्था वरदान आहे. यात ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र सर्वच वर्णांचे लोक आले. जे लोक जुन्या व्यवस्थेत कोळपून गेले असते ते लोक नव्या व्यवस्थेत मानाने जगू शकतात. अशी उदाहरणे पाहिली आहेत.
↩ प्रतिसाद: विटेकर

....नवी व्यवस्था वरदान आहे.

विटेकर
Mon, 11/11/2013 - 15:56 नवीन
...नवी व्यवस्था वरदान आहे.
समाजाच्या हिताची परिणामकारकता मोजताना " अधिकांचे अधिक सुख " हा मापदंड वापरावा लागतो. "काही लोकांचे अधिक बरे" असा विचार केल्यास " आहे रे आणि नाही रे " मधील दरी वाढते ! निसर्गतः काही जीव दुर्बळ असतात, बळी तो कान पिळी हा जंगलाचा नियम आहे , समाजाची धारणा धर्माने होते आणि त्याची भूमिका " सर्वेपि सुखिनं संतु " अशी असायला हवी ! नवी व्यवस्था बळी तो कान पिळी आहे तर जुनी व्यवस्था " अधिकांचे अधिक सुख " पाहणारी आहे.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

रामदास काकांच्या

lakhu risbud
Mon, 11/11/2013 - 16:18 नवीन
"कूळकायद्याने गमावले ते सिलिकॉन व्हॅलीने कमावले" रामदास काकांच्या लेखात आहे को वो ते वाक्य.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद हो लखूशेठ.

बॅटमॅन
Wed, 11/13/2013 - 16:57 नवीन
धन्यवाद हो लखूशेठ.
↩ प्रतिसाद: lakhu risbud

मी अशी बरीच माणसे बघितली आहेत

रेखा जोशी
Sun, 11/10/2013 - 17:30 नवीन
मी अशी बरीच माणसे बघितली आहेत की ज्यांना स्वतःला मांसाहार भयंकर पसंत असतो तीच लोक मांसाहार न करणार्यांची चेष्टा करत असतात त्यात ब्राम्हणहि आले. ते कायम विचारात असतात कि तुम्ही मांसाहार करता का ? ह्यावर माझ्या ओळखीत घडलेला किस्सा पुढील प्रमाणे :श्री गोखले ह्यांना सतत एकजण विचारत असे कि तुम्ही मांसाहार करता का ? त्यावर त्यांनी सांगितले कि मी तुला सुद्धा खाऊ शकतो.

माझा एका मित्राची आई मराठा

garava
Sun, 11/10/2013 - 18:03 नवीन
माझा एका मित्राची आई मराठा.वडिल को.ब्रा. ह्याच सगळं शालेय आणि कॉलेजच शिक्षण परदेशात झालेलं. आणि आता सगळे भारतात आलेत. त्याच्या भावाचं arranged marriage झालं.मुलगी देशस्थ.भावाचं लग्न झाल्यावर ह्याची रोज ऑफिस मध्ये यॆऊन बडबड आणि चेष्टा केल्यासारखं,' देशस्थी घोळ आलाय आमच्या घरात. माझ्या भावाला पण काय सुचल. .!' अरे पण तुझ्या भावाला काही प्रॉब्लेम नव्हता ना देशस्थ मुलीशी लग्न करण्यात मग तुला काय त्रास होतोय? तू कर को.ब्राच मुलीशी लग्न. तुझ्या स्वतःच्या आई-वडिलांचा आंतरजातीय विवाह अस्ताना, तू इतकी वर्ष परदेशात असताना तुझे विचार असे कसे रे? तर म्हणे आमच्या जातीतल्या मुली काय संपल्यात का..! आता हिला शिकवत बसा को.ब्रां.ची शिस्त आणि पध्धत.माझ्या आईच आणि तिचं पटणारच नाही बघ. आता त्याने को.ब्रा. सदाशिव पेठी मुलीशीच लग्न केलय. आणि वर म्हणतोय, बघ आता माझ्या बायकोच आणि आईच कसं गुळपिठ जमेल. आपापल्या पोट्जातीतच कसला एव्हडा दुस्वास?

हायला

आशु जोग
Sun, 11/10/2013 - 23:12 नवीन
हायला का कळत नाही पण कुणी संस्कृत फेकून मारायला लागला की आम्ही गप्प होतो

Same with me…

देवांग
Mon, 11/11/2013 - 11:12 नवीन
माझ्याबरोबर असेच होते …. जेव्हा मी लोकांना सांगतो कि महाराष्ट्रीयन नाही …पण माझे मराठी ऐकून कोणाला तसा संशय येत नाही. मी कोणाला सांगत हि नाही , म्हणतात ना झाकली मुठ सव्वा लाखाची

चुलीत घाल तूझी जात ! आस

ईन्टरफेल
Tue, 11/12/2013 - 20:51 नवीन
चुलीत घाल तूझी जात ! आस म्हणून आझा मित्र मला पार चुली पासी नेतो ! तेची आई आमच्या दोघांकडे पाहून मंद मंद हासत एकाच प्याल्यात चाहा वतून देते ! हा हरामखोर तो चहा दोन ठिकाणी करून मला प्यायला देतो ! मी नको म्हणतो तरी ! ती माउली म्हणते घेरे बाळा ........ मग काय ............

मस्त चर्चा !!

खटपट्या
Wed, 11/13/2013 - 02:13 नवीन
मस्त चर्चा !!

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/13/2013 - 06:42 नवीन
Image removed.
↩ प्रतिसाद: खटपट्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा