मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आहे मी ब्राह्मण!! मग??

वडापाव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आठवीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो होतो. तिकडे एका मित्राबरोबर पैज लाऊन सात वाट्या ताक प्यायलो होतो (तेव्हाची कॅपॅसिटी तेवढीच होती). आम्हांला ताक वाढणा-या मावशींनी सहाव्यांदा वाटीत ताक ओतताना 'तुझी जात कोणती रे?' असं हळूच विचारलं. "ब्राह्मण!!" "वाटलंच मला!" असं हसत म्हटलं आणि निघून गेल्या. सातव्यांदा ताक ओतताना, "राग नाही ना आला?" असं विचारलं आणि मी "नाही, राग का येईल?" असं म्हटल्यावर पुन्हा हसत हसत निघून गेल्या. नवीन नवीन मैत्री झालेल्या मित्रमंडळात मी एक गोष्ट नेहमी पाहिलीये. गप्पा मारताना सणवार, लग्न, किंवा घरातल्या इतर कोणत्यातरी समारंभाच्या विषयावरून "आम्ही अमुक अमुक जातीचे आहोत ना, आमच्यात असं असतं" असं कोणीतरी म्हटलं, की त्यावरून जातीचा विषय निघतो, आणि मग ग्रूपमधल्या निदान एकालातरी सगळ्यांची जात विचारायची खाज सुटते. तसं त्याने एक-दोघांना विचारल्यानंतर बाकीच्यांच्या चेह-यावर त्यांची पाळी आली की लगेच आपली जात सांगण्याची तयारीही दिसून येते. तशी ती माझ्यावर आली, आणि मी ब्राह्मण म्हटलं, की "तू ब्राह्मण आहेस???" अशी कोरसमध्ये प्रतिक्रिया ब-याचदा येते. मग त्यापाठोपाठ 'वाटत नाही तुझ्याकडे बघून', 'तुझ्या बोलण्याच्या स्टाईलवरून कळतं', 'वाटलंच होतं मला' अशा प्रतिक्रिया येतात. त्यांचं मला विशेष असं काही वाटत नाही. गंमत वाटते, ती 'सही रे!!!' या प्रतिक्रियेची. मी ब्राह्मण आहे, यात 'सही' काय आहे? मला कळत नाही. एकदा आमचा एक ग्रूप क्लासच्या दिशेने चालला होता. त्यात एक 'सुबक ठेंगणी' मुलगीही होती. मी अर्थात तिला कंपनी देत होतो. आणि आमचा बोलण्याचा विषय आमच्याच ग्रुपमध्ये आमच्या पुढे चालणा-या एका मुलाचा होता. ती मुलगी म्हणाली, 'तो मला अजिबात आवडत नाही. डोक्यात जातो.' 'का गं, काय झालं?' 'तो ब्राह्मण आहे आणि सगळे ब्राह्मण बायले असतात.' मी थबकलो. आणि त्या मुलीकडे बघून हसलो. तशी तीही चमकली. 'तू ब्राह्मण आहेस?' 'हो!!' 'सॉरी सॉरी सॉरी... तू बायल्या नाहीयेस. पण बरेच ब्राह्मण बायले असतात.' मी वाद घातला नाही. तिने सुद्धा माझ्या आडनावाचं एका भंडारी आडनावाशी साधर्म्य असल्याने मी ब्राह्मण कसा असा प्रश्न विचारला आणि मग तो विषय तिथेच थांबला. त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही. गप्पा मारताना मध्येच मला, 'तू ब्राह्मण आहेस का?' असं निदान पंधरा-वीस लोकांनी तरी आत्तापर्यंत विचारलं असेल. 'नाही काय आहे, तू जे नॉर्मल मराठी बोलतोस ना ते सुद्धा खूपच हाय लेवलचं आहे ना म्हणून विचारलं!' काय संबंध???? माझे कितीतरी मित्र असे आहेत, ज्यांचं मराठी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगलं आहे. त्यातला एक आग्री आहे, एक क्षत्रिय आहे आणि एक महार आहे(आणि यांनासुद्धा लोक 'तू ब्राह्मण आहेस का?' असं विचारतात). इतकच नाही, तर कितीतरी ओळखीची मंडळी अशी आहेत ज्यांचं मराठी भंगार आहे आणि ते ब्राह्मण आहेत. पुण्याच्या गोडबोले नावाच्या एका मित्राची टोपी हरवली होती. ती सापडली का, असं विचारलं तेव्हा तो 'हो भेटली!' असं म्हणाला होता. माझं स्वतःचं मराठीसुद्धा तितकसं चांगलं आहे असं मला वाटत नाही. चिरणे आणि कापणे, यात माझा नेहमी गोंधळ उडतो. भाजी चिरतात, फळं कापतात हे माहितीये, पण तरीही ब-याचदा मी उलटं बोलतो. आमच्या घरी नॉन-व्हेज खाण्यावर बंदी नाही. पण घरी आम्ही सहसा नॉन-व्हेज खात नाही, कारण कुणाला करताच येत नाही. त्यामुळे आम्हांला आमच्या शेजा-यांनी, वहिनीच्या माहेरच्यांनी, कधी हौसेने चिकन-मटन आणून दिलं, की आम्ही त्यावर मस्त ताव मारतो. वडिलांचे एक मित्र तर ब-याचदा आम्हांला त्यांच्या घरी मासे खायला बोलावतात. तरी माझे आई-वडील 'शक्यतो आपण जास्त नॉन-व्हेज खाऊ नये' असं म्हणतात. त्यामागे कारण हे, की लहानपणापासून शाकाहाराची सवय असलेल्या शरीराला एकदम नॉन-व्हेजचा पुरवठा झाला, तर त्याचे परिणाम खाल्ल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी दिसून येतात. हॉटेलात मित्रमंडळींबरोबर नॉन-व्हेज खात असताना मात्र बरेच अब्राह्मण मित्रच माझ्या नॉन-व्हेज खाण्यावर आक्षेप घेताना दिसतात. मी तर श्रावणात सुद्धा नॉन-व्हेज खातो. 'तू ब्राह्मण ना, मग नॉन-व्हेज कसा काय खातोस?' अशी मला विचारणा होते. 'काही फरक पडत नाही. हल्ली सगळेच ब्राह्मण खातात.' असं मी म्हटलं, की माझ्या वाक्याला पुष्टी जोडणारी उदाहरणं सुद्धा मिळतात, आणि, 'नाही हा, आमच्याइकडे एक ब्राह्मण आहेत, जे नॉनव्हेज असलेल्या टेबलावर बसत सुद्धा नाहीत' 'आमचा एक ब्राह्मण मित्र नॉन-व्हेज तर खातो, पण घरी जाऊन स्वत:वर गोमुत्र शिंपडून घेतो.' असे किस्सेसुद्धा ऐकायला मिळतात. 'तुझ्या घरी माहितीये का तू इथे नॉन-व्हेज खातोस ते? तुला घरचे काही बोलत नाहीत?' असं लोक विचारायला लागले, की माझं एक लांबलचक उत्तर रेडी असतं. "पूर्वी शिक्षणाची मक्तेदारी ब्राह्मणांकडे होती. शिक्षण घेण्याची, किंवा देण्याची सगळ्याच जातीच्या लोकांना अनुमती नव्हती. आता बघा, शिक्षण देण्या-घेण्याचा अधिकार हा सगळ्या जातीच्या लोकांना समान आहे. तसंच पूर्वी ब्राह्मणेतर नॉन-व्हेज खायचे. आता सगळ्यांबरोबर ब्राह्मणही नॉन-व्हेज खाऊ लागले तर काय बिघडलं?" शरीराला पचत नाही, वासाचा त्रास होतो, दुस-या जीवाला मारून खाणं पटत नाही, म्हणून नॉनव्हेज कुणी खात नसलं तर ठीक आहे. पण 'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार?? विशिष्ट भाषा-जाती-धर्म-प्रांताच्या लोकांतील काही गुणांत-अवगुणांत साधर्म्य आढळतं हे मान्य!! पण ते एखाद्या जातीच्या सर्वच व्यक्तींत, सर्वच बाबतीत आढळून यावं असं तर नाही ना. आज समाजात अशी ब्राह्मण मंडळी आहेत, जी स्वतःला ते ब्राह्मण असल्यामुळे जास्त श्रेष्ठ समजतात. आणि त्यांचं हे मत उघडपणे मांडतात सुद्धा. बरीच अशी मंडळीही आहेत, जी ब्राह्मण असूनही ब्राह्मणांनाच शिव्या घालतात. पण काही अशी मंडळीसुद्धा आहेत, ज्यांना आपण ब्राह्मण असल्याचा गर्वही नाही, लाजही नाही. ब्राह्मणतेरात काही अशी मंडळी आहेत, जी ब्राह्मणांचा ते ब्राह्मण आहेत म्हणून द्वेष करतात. तर काही अशी मंडळी आहेत, ज्यांच्या मनात एखादा माणूस ब्राह्मण आहे हे कळल्यावर त्याच्याविषयी कौतुक आणि आदर वाटायला लागतो. जातीवरून माणूस चांगला की वाईट, हुशार की मठ्ठ, हे ठरवणं चुकीचं आहे. जातीचा दुराभिमान बाळगणारे, जातीवरुन लोकांना संघटित करणारे, जातीविषयी लाज बाळगणारे, जातीच्या अशा मानल्या गेलेल्या जुन्या रुढी परंपरा जपणारे, आणि जातीची यत्किंचितही पर्वा नसणारे असे लोक हे सगळ्या जातींत असतात. तेव्हा ठरावीक लोकांच्या स्वभावावरुन अख्ख्या जातीचं चारित्र्य ठरवणं हा मूर्खपणा आहे. हे फक्त ब्राह्मणांच्या बाबतीत होतं असं नाही. त्यामुळेच इथे ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा मुद्दाही मांडायचा नाही. सगळ्याच जातींच्या बाबतीत होतं. मी ब्राह्मण जातीचा आहे त्यामुळे मी ब्राह्मणांबद्दल माझ्या अनुभवातून सांगितलं. दुस-या जातीचा असतो, तर फक्त नाव आणि उदाहरणांचं स्वरूप बदललं असतं, मुद्दा तोच राहिला असता.

वाचने 44563 वाचनखूण प्रतिक्रिया 170

In reply to by देवांग

मला ना ह्या प्रकाराचा एकुणच कंटाळा आला आहे . काय फरक पडतो राव , शिवाय ह्या असल्या विषयांवर चर्चा करणे हे तर एरंडाचे गूर्‍हाळ चालवण्यासारखे आहे . शिवाय मी नुकतेच डिक्लेरेशन ऑफ परसनल इन्डिपेन्डन्स साईन केले आहे ( पहा : माझी फेसबुक प्रोफाईल Declaration of Personal Independence I hereby declare that , I am a free independent soul and no more bound by any social code of conduct or whatever except for few logical and natural thumb rules ! Prasad Godbole . 01 Nov 2013 ) त्यामुळे ह्या जातीपातीच्या बंधनात तर सोडाच , मला धर्म बिर्माच्याही वादात पडायची इच्छा नाहीये नाहं मनुष्यो न च देवयक्षौ,न ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्राः। न ब्रम्हचारी न गृही वनस्थो,भिक्षुर्न चाहं निजबोधरूपः ॥२॥

स्पंदना Sat, 11/09/2013 - 17:01
बरच संतुलीत लिखाण! रोजच्या समाजातल्या व्यवहारातले अनुभव विशेष फोडणी न देता मांडल्याने विषय जहाल झालेला दिसत नाही आहे. अर्थात प्रतिसाद सुद्धा असेच येवोत.

उत्तम विचार. जातियवादाने भारताचे अगणित नुकसान केले आहे आणि करत आहे. सुजाण व पुढारलेल्या समाजात फक्त गुणवत्तेवर आधरित व्यवस्था (Meritocracy) असते, जन्मावर आधारलेली नसते असेच वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उत्तम विचार. जातियवादाने भारताचे अगणित नुकसान केले आहे आणि करत आहे. सुजाण व पुढारलेल्या समाजात फक्त गुणवत्तेवर आधरित व्यवस्था (Meritocracy) असते, जन्मावर आधारलेली नसते असेच वाटते. सहमत. परंतु असा पुढारलेला समाज अजून अस्तित्वात यायचा आहे जगात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तत्व आणि वास्तविकता यांची सांगड साधारणपणे अशी असते... माणसाचा जो सहज स्वभाव आहे (ज्यात आप-पर भाव, हेवेदावे, इ अंतर्भूत आहेत) त्यावर मात कारणे समाजाच्या १००% व्यक्तींना शक्य नाही. त्यामुळे या जगात १००% सुजाण असणार्‍या मानवांचा समाज पूर्वी कधी नव्हता, आताही नाही आणि पुढेही होण्याची शक्यता नाही. पण या गोष्टीचा मला समजलेला त्याचा व्यावहारिक अर्थ असा: १. जेव्हा आपण एखाद्या पाश्चिमात्य देशाचा आर्थिक दृष्टीने संपन्न म्हणून उल्लेख करतो तेव्हा तेथली प्रत्येक व्यक्ती श्रीमंत आहे आणि एकही गरिब नाही असा अर्थ नसतो, तर सरासरीने तेथील नागरिक संपन्न आहेत असा असतो. सुजाण समाजातल्या मेरिटोक्रसीचे परिमाण तसेच आहे. २. जगात १००% पांढरे अथवा १००% काळे असे काही नाही... सगळ्या करड्या रंगाच्या छटा आहेत... सुजाण समाज पांढर्‍या टोकाच्या शक्य तेवढे जवळ राहण्याचा जाणीवपूर्वक सतत प्रयत्न करत असतो. ३. अजून थोडे पुढे जाऊन असेही आहे की, सुजाण समाज म्हणजे एका जागेवर थांबलेला समाज होऊच शकत नाही... कारण त्याच्या सुजाणतेपणामुळे त्याचा पुढेपुढे जसा विकास होत जाईल तसतश्या मेरिटोक्रसीच्या कल्पनाही अजून विकसित होत जातील... म्हणजे १००% ची केवल किंमतही (अ‍ॅबसॉल्यूट व्हॅल्यू) सतत वाढत राहिल. त्यामुळे १००% टक्क्याचे स्थान कधीच गाठले जाणार नाहीत, ते क्षितिजाप्रमाणे पुढेच जात राहील. किंबहूना १००% गाठण्याचा जोराचा प्रामाणिक प्रयत्न चालू असतानाही १००% टक्क्याचे स्थान सतत पुढे जात असल्याने ते न गाठले जाणे हेच प्रगतिशील सुजाण समाजाचे मुख्य लक्षण आहे.

शिद Sat, 11/09/2013 - 17:43
त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही.
माझ्या बाबतीत ही असाच किस्सा झाला होता. आमच्या ऑफिस मध्ये एका मुलीला माझ्या बोलण्यावरून मी ब्राह्मण आहे असे वाटले पण ज्या वेळी तिला (असेच गप्पांमध्ये) माझी खरी जात कळली त्यावेळे पासुन तिचे माझ्या बरोबर बोलणे एकदम कमी झाले. तसेच दिवसभरात १०-१५ वेळा येणारे Whatsapp messages एकदम शून्यावर आले. असो, तसा पण आपल्याला काय फरक पडतो अश्या फालतू गोष्टींचा ?

चौकटराजा Sat, 11/09/2013 - 17:49
जात म्हणजे जन्माने आलेली नव्हे तर संस्काराने आलेली. म्हणजे जात ही असतेच. एका विशिष्ट ब्राह्मण जातीचा कंजूस पणा व भारतातील एका विशिष्ट राज्यावरून असलेल्या जातीचा कंजूसपणा वेगळा. त्याची कारणेही वेगळी कारण जीवनदृष्टी संस्काराने निर्माण होते. ईदच्या दिवशी दहा हजाराचा बोकड कापला व गरीबाना वाटला. असे ऐकले तेंव्हा या वाक्याचा पहिला अर्ध ऐकून कसेसेच वाटले. कारण मी संस्काराने शाकाहारी आहे. सबब माझी एक त्या अर्थाने जात आहेच. दुसरा अर्ध ऐकून बरे वाटले कारण त्याही अर्थाने माझी एक जात आहेच.

मंदार कात्रे Sat, 11/09/2013 - 18:45
'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार??
या वाक्याशी सहमत नाही ...........!

In reply to by वडापाव

मंदार कात्रे Sat, 11/09/2013 - 19:31
हा फरक विचारसरणी चा आहे . मी स्वतः जन्माने ब्राह्मण असून अनेक देश पालथे घालूनही शुद्ध शाकाहारीच आहे , याचे कारण लहानपणी झालेले सन्स्कार. मला स्वतःला असे मुळीच वाटत नाही की नॉन-व्हेज न खाल्ल्याने मी कोणत्याही स्वरूपात मागासलेला आहे. याचे कारण जग कितीही बदलले आणि कितीही वैज्ञानिक प्रगती झाली तरी धर्माची काही स्थिर आणि काही चल तत्त्वे असतात . चल तत्त्वे कालानुरूप बदलतात ,जसे की १९ व्या शतकात चालू असलेल्या सतीप्रथा / विधवा केशवपन इत्यादि कुप्रथा आज बन्द झाल्या म्हणून धर्म बुडाला नाहीए . पण धर्माची स्थिर तत्त्वे असलेले व्यक्तिगत सन्स्कार ,जसे की चोरी करणे हे पाप आहे ,आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे पशुहत्या / जीवहत्या करून त्यावर उपजीविका करणे हे पाप असल्याचा सन्स्कार अन्तर्मनावर अतिशय प्रभावीपणे कोरला गेला असल्याने जर ब्राह्मण नॉन-व्हेज खात नसतील, तर याचा अर्थ ते मागासलेले आहेत ,असा होत नाही !

In reply to by मंदार कात्रे

वडापाव Sat, 11/09/2013 - 19:39
मी असं लिहीलंय.
शरीराला पचत नाही, वासाचा त्रास होतो, दुस-या जीवाला मारून खाणं पटत नाही, म्हणून नॉनव्हेज कुणी खात नसलं तर ठीक आहे. पण 'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार??
पशुहत्या / जीवहत्या करून त्यावर उपजीविका करणे हे पाप असल्याचा सन्स्कार अन्तर्मनावर अतिशय प्रभावीपणे कोरला गेला असल्याने जर ब्राह्मण नॉन-व्हेज खात नसतील, तर याचा अर्थ ते मागासलेले आहेत ,असा होत नाही !
नाहीच होत. पण पशुहत्या / जीवहत्या करून त्यावर उपजीविका करणे हे पाप असल्याचा सन्स्कार ब्राह्मणेतर अन्तर्मनावर सुद्धा होऊ शकतो. माझ्या मावसभावावर झालाय(तो ब्राह्मण नाहीये). आणि फक्त 'मी ब्राह्मण आहे' या एवढ्याच कारणापोटी 'मी नॉनव्हेज खाणार नाही, कारण ब्राह्मणांत नॉन-व्हेज खात नाहीत', असं जर कोणी म्हणालं तर त्याला मी तरी मागासलेलाच म्हणेन.

In reply to by मंदार कात्रे

मारवा Sun, 11/10/2013 - 14:36
जग कितीही बदलले आणि कितीही वैज्ञानिक प्रगती झाली तरी धर्माची काही स्थिर आणि काही चल तत्त्वे असतात . चल तत्त्वे कालानुरूप बदलतात ,जसे की १९ व्या शतकात चालू असलेल्या सतीप्रथा / विधवा केशवपन इत्यादि कुप्रथा आज बन्द झाल्या म्हणून धर्म बुडाला नाहीए . पण धर्माची स्थिर तत्त्वे असलेले व्यक्तिगत सन्स्कार ,जसे की चोरी करणे हे पाप आहे ,आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे सर्वं स्वं ब्राम्हणस्य इदं यत किंचिद जगती-गतम. श्रेष्ठ्येन अभिजनेन इदं सर्वं वै ब्राम्हण: अहर्ती. स्वम एव ब्राम्हण: भुड्क्ते स्वं वस्ते स्वं ददाति च. आनृशंस्याद ब्राम्हणस्य, भुज्ज्ते हि इतरे जना: ( मनुस्मृती १.१००-१०१) अनुवाद- या जगामध्ये जी काही संपत्ती असते, ती संपत्ती ब्राम्हणांची असते.श्रेस्ष्ठत्वामुळे आणि जन्माच्या उच्चतेमुळे या सर्वांसाठी ब्राम्हण योग्य असतो. ब्राम्हण स्वत:चेच खातो, स्वत:चेच नेसतो आणि स्वत:चेच देतो. ब्राम्हणाच्या दयेमुळे इतर लोक (त्यांनी स्वत: कमावलेल्या संपत्तीचा) उपभोग घेतात. विश्लेषण- जगातील सर्व च संपत्ती ही ब्राम्हणाचीच आहे त्यामुळे त्याने दुसर्याा एखाद्याची संपत्ती वापरली तर ती त्याने चोरी केली आहे असे होउच शकत नाही. तो दुसर्यातची अर्जीत केलेली संपत्ती वापरत असतो ती त्याचा जगावरील प्रत्येक संपत्ती वर त्याला जन्मजात श्रेष्ठत्वामुळे जो मालकी हक्क प्राप्त झाला आहे त्यामुळेच. म्हणुन ब्राम्हण दुसर्याकचे नव्हे तो स्वत:चेच खातो ,स्वत:चेच नेसतो आणि स्वत:चे देतो त्यामुळे ब्राम्हणाने कोणाची चोरी वगैरे केली असा प्रश्न च उपस्थित होत नाही. या उलट एखाद्या दुसर्याेने कष्ट करुन काही संपत्त्ती मिळविली आणि जर का तो तिला ब्राम्हणांची दया नसतांना परवानगी नसतांना वापरु बघत असेल तर ही त्या माणसाची चोरी मानली जाते. कारण मुळ मालक हा ब्राम्हण असता या माणसाने त्याच्या दये-परवानगी शिवाय अशी संपत्ती वापरणे ही चोरीच नव्हे का ? चोरी न करणे हे धर्माच्या एका महान अशा स्थिर तत्वांमध्ये येते. मनुस्मृती हे महान असे धर्माचे शास्त्र त्यावर महान असा स्थिर नियम घालुन देते.आणि स्थिर नियम कधीही बदलत नाहीत त्यावरच धर्म शतकानुशतके स्थिर टिकुन ही राहतो. बाकी मुर्ख लोक म्हणी बनवित राहतात उदा. एव्हरीथींग चेंजेस एक्सेप्ट द लॉ ऑफ़ चेंज. तरीही काही बिनडोक लोंक ब्राम्हणां च्या चोरी विरुध्द न्याय मागण्यासाठी एखाद्या राजा किंवा न्यायाधीशांकडे जातातच मग राजा किंवा न्यायाधीश ही कधीकधी अशा बिनडोक लोकांच्या नादी लागुन ब्राम्हणांविरुध्द निकाल देण्याची शक्यता निर्माण होउ शकते. आणि मग न्याय हे दुसरे महान असे स्थिर तत्व धोक्यात येउ शकते. कारण न्याय हा ही जगातल्या सर्वच धर्मांमधील एक महत्वाचं अस स्थिर तत्व आहे. मग काय करावे बरे ? चला तैत्तिरीय संहीता आली की हो न्याय करायला काय म्हणते बघु या यद ब्राम्हण: च अब्राम्हण:च प्रश्नम इयातां ब्राम्हणाय अधिब्रुयात. यद ब्राम्हणाय अधि-आह आत्मने अधि-आह. यद ब्राम्हणं परा-आह आत्मानं परा-आह. ( तैत्तिरीय संहीता २.५.११.९ ) अनुवाद- जर एखाद्या कडे एक ब्राम्हण आणि एक अब्राम्हण आपला प्रश्न (तक्रार) घेउन आला तर ,ब्राम्हणाच्या बाजुने निर्णय द्यावा. ब्राम्हणाच्या बाजुने बोलणे म्हणजे स्वत:च्या बाजुने बोलणे होय.ब्राम्हणाच्या विरोधात बोलणे म्हणजे स्वत:च्या विरोधात बोलणे होय. म्हणुन ब्राम्हणांच्या विरोधात बोलु नये. विश्लेषण- हे काय हो गडे आता विश्लेषण ही तुम्हीच करणार का तुम्ही कीनई फ़ार फ़ार पुर्वग्रह दुषीत आहात.,आम्हाला ना आमचे धुंडीराज बापट शास्त्रीजी जे आहेत ना त्यांनी स्वत: या श्लोकाच केलेल भाषांतरच हवे कारण त्यांच्या इतका या विषयावरील अधिकारी माणुस शोधुन सापडायचा नाही तुम्ही तेच द्या बर. अहो अस काय करता मी पण ब्राम्हण च आहे की , हो पण तुम्ही कीनई बिघडलेले नास्तिक आहात ठिक आहे त्यांच्याच शब्दात.. धुंडीराज बापट शास्त्रिंचे या श्लोकाचे विश्लेषण " ब्राम्हण व अब्राम्हण या दोहोंमध्ये " मी तु्झ्याहुन श्रेष्ठ आहे, मी तु्झ्याहुन श्रेष्ठ आहे, असा वाद जेव्हा उत्पन्न होईल आणि या वादाच्या निर्णयासाठी ते दोघेही एखाद्या तिर्हााइता कडे येउन प्रश्न विचारतील, तेव्हा निर्णय करणार्याश तिर्हासइताने ब्राम्हण श्रेष्ठ आहे असाच निर्णय द्यावा. म्हणजे त्याने स्वत:ला श्रेष्ठत्व मिळविल्यासारखे होते. ब्राम्हण हा पराभुत म्हणजे अब्राम्हणाहुन कमी योग्यतेचा आहे, असा निर्णय दिल्याने तो निर्णय देणार्याश तिर्हााइताने स्वत:चाच पराभव बोलुन दाखविल्याप्रमाणे होते. यास्तव ब्राम्हण हा अब्राम्हणापेक्षा कमी योग्यतेचा आहे असे कधीही बोलु नये. (कृष्ण यजुर्वेद-भाग १-तैत्तिरीय संहीता पृष्ठ क्रमांक-३३०-३३१ प्रकाशक:- चि.धुं बापट- कानपुर-१६- १९९४) समारोप- १-जगातील सर्व संपत्ती ही ब्राम्हणांचीच आहे कोणी दुसरा ब्राम्हणांच्या दये अथवा परवानगी शिवाय जर ती वापरत असेल आणि स्वत: कष्टाने कमविली म्हणुन माझीच असा गैरसमज करुन घेत असेल तर ही त्याने केलेली ब्राम्हणांच्या संपत्तीची चोरी च आहे आणि चोरी करणे हे पाप आहे आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे. आणि हे धर्माचे स्थिर तत्व आहे. २ चल तत्वे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वेदना उदा सति या धर्माच्या चल तत्वा ने स्त्रियांना जळतांना होणार्या थोडयाफ़ार वेदना हे म्हणजे फ़ार च बिनमहत्वाच आणि किरकोळ आहे त्या तुलनेने स्थिर तत्वे ज्याने धर्म स्थिर राहतो ते फ़ार फ़ार महत्वाचे आहे. आणि केशवपन काय उकरुन काढता हो कीती कीती क्षुद्र विषय होता तो काय ते चल तत्व किरकोळ हे बघा आपण बालाजीला नाही बघत का मुली केशवपन करतात ते आणि त्याने उवा वगेरेंचा ही त्रास होत नाही शिवाय केशवपना ने स्त्रियांच्या सौंदर्यात ही वाढ च होते नाही का ? आणि बंद झाल हो ते सर्व आता तुम्ही सोडा बर ती चल तत्वे आता महान अशा स्थिर तत्वांवरच बुध्दी स्थिर करु या!

In reply to by मारवा

lakhu risbud Sun, 11/10/2013 - 16:46
मारवा शेट हे नक्की काय लिहिले आहे ? तुमचा प्रतिसाद उपसाहात्मक असावा असे गृहीत धरले तर माझा पास. उपसाहात्मक नसेल तर
जगातील सर्व संपत्ती ही ब्राम्हणांचीच आहे
या समारोपातील तुमच्या वाक्यांनुसार एखाद्या बिल्डर किवा दुकानदाराकडे जाऊन आणि तुमचे हे तत्वज्ञान त्याला ऐकवून हिम्मत असेल तर त्याच्याकडून जास्त नाही पण फक्त १ लाख रुपये मिळवून दाखवा,त्या रकमेत तेवढीच रक्कम घालून आम्ही तुमचा अलका चौकात जाहीर सत्कार करण्यास तयार आहोत.

In reply to by lakhu risbud

मंदार कात्रे Sun, 11/10/2013 - 16:59
मारवा जी तुम्ही नक्की काय म्हणू पहात आहात ते ,कुणालाच नीटसे कळलेले नसावे . मी स्वतः मनुस्म्रुति मानत नाही ,याचे कारण जे जे काही सन्स्क्रुत मध्ये लिहिले आहे ,ते सगळे धर्मशास्त्र असे मानणारा मी नाही . वेद्काळ ,पुराणकाळ आणि इतिहासकाळ हे निराळे आहेत.विशेशतः पुराणकाळात धर्मग्रन्थात अनेक प्रक्षिप्त गोश्टी घुसडून दिल्या गेल्या आहेत. मनुस्म्रुति सुद्धा पुराणकाळात निर्माण झालेली असल्याने अनेक फालतू व तद्दन बाजारू टाकावू गोश्टी त्यात दिल्या आहेत , जसे की ''अतिथी देवो भव'' म्हणून अतिथी च्या मनोरन्जना साठी यजमानाने आपली स्त्री अतिथीस एक रात्रीपुरती द्यावी इत्यादी...... यास्तव मनुस्म्रुति सर्वथैव त्याज्य आहेच !

In reply to by मंदार कात्रे

मारवा Sun, 11/10/2013 - 17:37
धर्माची कुठली तत्वे स्थिर आहेत? कुठली चल आहेत ? या संदर्भात आपण लिहीले आहे ना ? नेमके कुठल्या ग्रंथात सती हे चल तत्व आहे असे आलेले आहे ? हे चल आणि स्थिर हा भेद कुठुन आला ? की जी परंपरा पाळण मुश्कील झाल ती झाली चल जी अजुन धकविता येते ती स्थिर असे काही आहे का ? तुम्ही च म्हटलेल आहे ना चोरी न करणे हे धर्माचे स्थिर तत्व कालही होते आज ही आहे मग याच धर्माचा पवित्र ग्रंथ चोरी या संदर्भात जो पक्षपाती नियम करतो त्याचे काय ?

In reply to by मारवा

मंदार कात्रे Wed, 11/13/2013 - 11:20
मूळ वैदिक धर्मात असे भेदाभेद नव्हते, तेच तर सान्गतो अहे ना .... हे जे पक्षपाती किम्वा भेदाभएद करणारे नियम नन्तर घुसडन्यात आले, त्यामुळे धर्मास ग्लानी आली . आजही धर्मात अनेक विक्रुत गोश्टी आहेत जशा की तन्त्र मार्गास धर्माचा एक भाग मानला जातो, परन्तु प्रत्यक्षात तसे नाही . वामाचारी /आसुरी तान्त्रिक मार्ग हा त्याज्ज्य आहे. परन्तु स्वार्थासाठी काही मण्डळी तन्त्राचा पुरस्कार करताना दिसतात . प्रत्यक्षात वामाचारी तान्त्रिकाना फाशीच दिली पाहिजे इतकी माणुसकीला काळिमा लावणारी क्रुत्ये ही मण्डळी करतात . यास्तव धर्माची स्थिर आणि चल तत्त्वे कोणती हे समजून घेण्यासाठी प्रथम धर्म म्हणजे काय ते समजुन घ्यवे लागेल .... तेवढा अभ्यास करण्याचि पात्रता ,कुवत आणि जिद्द असल्यास नक्की सर्व प्रश्नान्चि उत्तरे मिळतील.!

In reply to by lakhu risbud

मारवा Sun, 11/10/2013 - 17:27
अहो हा पवित्र धर्मग्रंथाचा आदेश आहे याचे काटेकोर पालन झालेच पाहीजे तुम्ही टर उडवित आहात का ? मनुस्मृतीची पवित्र तैत्तीरीय संहीतेची? आणि जो पाळणार नाही त्या पाप्याला कुठली शिक्षा दिली जाईल याची कल्पना असुन ही ? तुम्ही फार धाडसी आहात हं

In reply to by मारवा

वडापाव Sun, 11/10/2013 - 17:31
अहो हा पवित्र धर्मग्रंथाचा आदेश आहे याचे काटेकोर पालन झालेच पाहीजे तुम्ही टर उडवित आहात का ? मनुस्मृतीची पवित्र तैत्तीरीय संहीतेची? आणि जो पाळणार नाही त्या पाप्याला कुठली शिक्षा दिली जाईल याची कल्पना असुन ही ? तुम्ही फार धाडसी आहात हं
कशाला उगाच कॉमेडी करताय राव??

लेख आवडला. यात ब्राह्मण- ब्राह्मणेतर एलिमेंट आला की धाग्याचे शतक होईल. आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे हे सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवायचे वाक्य आहे. आजचा सुधारक या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात लिहिणार्‍या लोकांची आडनावांवरुन जात काढून बघा येथे ब्राह्मणांचे प्राबल्य आहे असे आमच्या पुरोगामी मित्रांनी सिद्ध केले होते. आता काही आडनावे ही सर्व जातीत असतात त्यामुळे ती संभ्रमात टाकतात पण असे प्रमाण फार कमी. आपल्याकडे जात ही जन्मानुसारच ठरते वृत्तीनुसार नाही. समाजावर जातीचा पगडा मोठा आहे हे विसरुन चालणार नाही. जाती तील उच्चनीचता नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह केले पाहिजेत. अंनिस ने यासाठी मोहिम राबवलेली आहे. कारण जात हीच एक अंधश्रद्धा आहे अशी भुमिका अंनिसची आहे. असो.....

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुहास.. Sun, 11/10/2013 - 14:58
आजचा सुधारक या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात लिहिणार्‍या लोकांची आडनावांवरुन जात काढून बघा येथे ब्राह्मणांचे प्राबल्य आहे >>>> मिपा वर ज्या तर्‍हेने नावासकट आडनाव घेतात त्यांच्याबाबतीत काय मत आहे पका काका ? {( म्हणाल की नाव सेम असल्याने आयडी मिळत नाही ....म्हणून आडनाव ही घेतले जाते ....मग मला काही उदा. कांबळे , डिसुजा , शेख (हा एक अपवाद सोडला तर ......), अडागळे, अशी नावे का दिसत नाही ....बाकी आडनावे मला मिपावर दिसतात ...त्यामध्ये टक्केवारी पाहिली तर .....करा अभ्यास ..बाकी विषय कट्ट्यावर घेवु यात ....ईथे लिहायचे म्हणजे बॅलन्स ची च लागायची .. कट्ट्याला .मिपाकराने तीन वेळा विचारून देखील आडनाव सांगायला ठामपणे नकार देणारा .... वाश्या

रेवती Sat, 11/09/2013 - 19:16
दिवाळी अंकाचे संपल्यावर संपादकांना नवे काहीतरी काम तयार करून ठेवायला नको का? ;) त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही. हां, यामुळे खरंतर वाईट वाटलं आहे.

अनन्न्या Sat, 11/09/2013 - 19:44
खाण्याच्या सवयीपेक्षा वर्तणुकीतील आधुनिकता महत्त्वाची! तुमच्या मनातील विचार सिध्द करण्यासाठी आपल्याला न पटणाय्रा गोष्टी करून पुढारलेपण दाखवणे आवश्यक नाही. जसे नॉन व्हेज खाणारा माणूस त्याच्या जन्मापासून ते अन्न खात असतो तसेच व्हेज खाणाराही! व्हेज खाणारा प्रत्येक माणूस जात मानतो असा होत नाही. आपण ज्या कुटुंबात जन्माला येतो त्याचे संस्कार कळत नकळत आपल्यावर होत असतात. त्यातले आपल्याला पटतील ते आपण आत्मसात करावे न पटतील ते सोडून द्यावे.

ग्रेटथिन्कर Sat, 11/09/2013 - 20:01
ब्राह्मण असल्याचे तोटे कमी आणि फायदे कितीतरी जास्त आहेत. आमच्या कालिजातल्या तथाकथित उच्चवर्णीय समाजातल्या मुली ब्राह्मण आणि मराठा मुलांना सभ्य समजायच्या .माझ्याच एका मैत्रीणीने मला ब्राह्मण समजून 'ईतर' मुलांविषयी जे अगाध ज्ञान दाखवले ते बघून मी फक्त झीट यायचा बाकी राहीलो होतो. मुलांपेक्षा मुली जास्त जातीयवाद करतात या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. तूझी जात कोणती हा प्रश्न थेट न विचारता तू ब्राह्मण ना?, तू मराठा ना? असे वाकडे प्रश्न विचारायचे कसब मुलींकडे असते. मग एकदा उच्चवर्णीय आहे हे समजले की मग फ्रेंडशीपला उत येतो .असो ,राग येण्याऐवजी यांची किव येते.

In reply to by ग्रेटथिन्कर

प्रभाकर पेठकर Sun, 11/10/2013 - 02:18
मुलांपेक्षा मुली जास्त जातीयवाद करतात या निष्कर्षाप्रत मी आलो आहे.
लग्नाच्या बाजारात, मुलांपेक्षा, मुलींच्या जातीबाहेर लग्न करण्याच्या विचारांना घरच्यांचा विरोध जास्त सहन करावा लागतो. त्या समस्या टाळण्यासाठी मुली मुलांच्या जातीविषयी जास्त जागरूक असाव्यात.

'तू ब्राह्मण आहेस का?'
आठवड्यातुन तीन वेळा विचारला जाणारा प्रश्ण. "दातार तु कोकणस्थ ब्राम्हण ना?" आणि त्यावर "वाटत नाही तुझ्याकडे बघुन" असं उत्तर. :)...!! शिवाय त्यावर काही लोकांच्या "तुमच्या मुळे नॉन-व्हेज महाग झालयं अश्या प्रतिक्रिया" ;)..!! मग वाकड्या आणि तिखट को.ब्रा. जिभेनी उत्तर दिलं गेलं की "झाली कोब्र्याची फुसफुसायला सुरुवात" अशी चड्डी मित्रांची कॉमेंट... :).!! ह्या सगळ्या गोष्टींना मी हलकचं घेतो. आपलेचं मित्र आहेत आपल्या अडीनडीला तेचं कामाला येतात. खरी डोक्यात जाणारी लोकं म्हणजे "बी"ग्रेडी लोकं. दोन-तीन "बी"ग्रेड्यांना त्यांच्या आई-बहीणीची आठवण करुन दिल्यावर त्यांचं टोचुन बोलणं बंद झालं. ;) (को.ब्रा.)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅटमॅन Sat, 11/09/2013 - 20:22
मलाही "तू ब्राह्मण??? वाटत नाही" अशा प्रतिक्रिया एकदोनदा ऐकाव्या लागल्या आहेत. मजा वाटलेली तेव्हा, काही काळाकरिता तरी का होईना आपण मूलनिवासी आहोत या आनंदात अजून एक कोंबडी खाऊन मटण अजून महाग करावे अशी उबळ आली होती. बाकी या मटणाला शिक्षणाचे उत्तर परस्पर दिल्या गेलेलेही पाहिले आहे. ;) असो, बाकी ब्राह्मणांतसुद्धा एकूणच कोब्रांवर लोकांचा जास्त दात असतो असे दिसते. तुलनेने देशस्थ पोटजात ही मराठी आंजावर काय किंवा जण्रल चर्चेत काय, असून नसल्यासारखी आहे. त्यात देशस्थ गोरे घारे वैग्रे नसल्याने अजूनच ;) शिवाय गोरे घारेपणाबद्दल बोलताना लोकांचा संयम जो सुटतो तो पाहणे रोचक असते. सरळ सरळ सेक्शुअल फ्यांटसीज दाखवतात असेच वाटते त्यावरून =))

In reply to by बॅटमॅन

बाकी ब्राह्मणांतसुद्धा एकूणच कोब्रांवर लोकांचा जास्त दात असतो असे दिसते.
शिवाय गोरे घारेपणाबद्दल बोलताना लोकांचा संयम जो सुटतो तो पाहणे रोचक असते.
+ १०१
त्यात देशस्थ गोरे घारे वैग्रे नसल्याने अजूनच
बहुतेक सगळे दे.ब्रा. लोकं (त्यात निम्मे कुलकर्णी, इथ्ल्या कुलकर्ण्यांनी हलकं घ्या.) मल्लखांबाच्या रंगाचे आहेत. :D :D :D

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रेवती Sat, 11/09/2013 - 20:34
अगदी अगदी. मी कुलकर्णी नसले आणि मल्लखाम्बाच्या रंगाची नसले तरी देशस्थ असल्याने माझ्या लग्नात लोक म्हणत होते की मुलीपेक्षा मुलगा रंगानं गोरा आहे. किंवा कोकणस्थांच्या संघात अष्टमीच्या पूजेला लोक माझ्याशी फारसं बोलायला येत नाहीत त्यावरून मी पक्की देशस्थ असल्याची खात्री पटली. तरी नवर्‍याच्या मावशीबाई म्हणाल्या की आपल्यात खपून जाईल. मग पैसाताईने पहिल्यांदा माझा फटू पाहिल्यावर "हो, आमच्यात खपून जाशील" असे म्हटले होते. ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅटमॅन Sat, 11/09/2013 - 20:35
कोब्रांच्या जीन्समध्ये काही भूमध्यसमुद्रीय कांपोनंट आहे हे तर संशोधनांती सिद्धच झालेले आहे.त्यात कोब्रा, देब्रा, मराठा आणि धनगर या चार जातींचा अ‍ॅनॅलिसिस केलेला आहे. पेपर लिंक. मुद्दा इतकाच, की भारताबाहेरच्या जीन्सचे अ‍ॅडमिक्श्चर असणे हे कोब्रांचे एकट्याचे वैशिष्ट्य नाही, उच्चजातीय म्हणवल्या जाणार्‍या कैक जातींची हीच कथा आहे, मराठा जातीतही बापाकडून मुलाकडे जाणारा जो जेनेटिक कांपोनंट आहे तो पश्चिम आशियातला आहे हे सिद्ध झालेले आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रेवती Sat, 11/09/2013 - 20:38
हा हा हा. भारी विनोद आहे. असाच विनोदी प्रकार म्हणजे आमच्याकडचे काही नातेवाईक शेती करतात त्यावर कोणाचाही विश्वास नाही. पूर्वी जातीप्रमाणे व्यवसाय असतील पण अजूनही असेच मानावे म्हणजे कम्माल झाली बुवा!

In reply to by बॅटमॅन

यसवायजी Sat, 11/09/2013 - 21:48
@मलाही "तू ब्राह्मण??? वाटत नाही" अशा प्रतिक्रिया एकदोनदा ऐकाव्या लागल्या आहेत>> मलाही.. बर्‍याचदा.. ------ बुधवारी मेसमधे चिकन असते.श्रावणा-बुधवारी आज चिकन का नाही? असे विचारले तर मेसवाल्या ताईने चार्-चौघात लायकीच काढली राव.. म्हणे "अरे काय लाज बीज वाटते का नाही? सगळं गाव श्रावण पाळतंय आणी कुलकर्ण्यांना चिकन पाहीजे झालंय.." :D

In reply to by बॅटमॅन

प्रभाकर पेठकर Sun, 11/10/2013 - 02:23
त्यात देशस्थ गोरे घारे वैग्रे नसल्याने अजूनच Wink
गोरा देशस्थ आणि काळा कोकणस्थ, लै डेंजरस असाही एक समज आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मंदार कात्रे Sat, 11/09/2013 - 23:22
खरी डोक्यात जाणारी लोकं म्हणजे "बी"ग्रेडी लोकं. दोन-तीन "बी"ग्रेड्यांना त्यांच्या आई-बहीणीची आठवण करुन दिल्यावर त्यांचं टोचुन बोलणं बंद झालं.
अगदी बरोबर !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

योगी९०० Sun, 11/10/2013 - 00:01
शिवाय त्यावर काही लोकांच्या "तुमच्या मुळे नॉन-व्हेज महाग झालयं अश्या प्रतिक्रिया" ;)..!! असे मला कोणी म्हणाले तर मी म्हणतो ..." तुम्ही तुमच्या हातातली तलवार आमच्या हातात दिलीच का? आता दिलीत ना, मग आम्ही आता नॉन्वेज खाऊ नाहीतर मस्तानीला ठेऊ. काही विचारायचे नाही.".

In reply to by योगी९००

भुमन्यु Sun, 11/10/2013 - 10:39
+१ ... हाच अनुभव खूप ठिकाणी आलाय!!! तुमच्यामुळे नोन-व्हेज महाग झालंय (जरी मी शाकाहारी आहे तरी) ---- रागा ---

In reply to by भुमन्यु

सुबोध खरे Sun, 11/10/2013 - 11:47
माझ्या चुलत भावाला त्याच्या सी के पी मित्राने सांगितले कि तुम्ही भट लोक नॉन व्हेज खायला लागल्यापासून नॉन व्हेज महाग झालंय. त्यावर माझा भाऊ म्हणाला तुम्ही परभट भाज्या खायला लागल्या पासून भाज्या महाग झाल्या आहेत. यावर त्याने तसे बोलणे सोडून दिले.

In reply to by सुबोध खरे

मला कोणी असे म्हणाले तर मी म्हणतो "आम्हाला परवडते म्हणुन खातो, तुम्हाला जे परवडते ते तुम्ही खा, उगाच आमच्या खाण्याकडे बुभुक्षीतासारखे पाहु नका." एकदा असे उत्तर मिळाले की परत कोणी नादाला लागत नाही.

वडापाव Sat, 11/09/2013 - 20:34
एका गो-या आणि घा-या मित्राला कोब्रा समजून देब्रांची उडवायला गेलो तर तोच देब्रा निघाला. सावरासावर करताना पळता भुई थोडी झाली पण मित्रच होता त्यामुळे फारसं मनाला लाऊन घेतलं नसावं त्यानं

In reply to by बाबा पाटील

हे मात्र प्रत्यक्ष पाहीलयं. माझा एक पाटील नावाचा मित्र चांगला वैद्य आहे. त्याच्या सुरुवातीच्या दिवसात त्याला पण लोकं असचं विचारायचे आणि आता तेचं लोकं त्याच्याकडुन पथ्य-पाणी लिहुन घेतात. ;). जातीवर काय असतय हो. सगळं डोक्यात आणि हातातल्या कौशल्यावर आहे.

In reply to by बाबा पाटील

रेवती Sat, 11/09/2013 - 20:51
अहो डॉक्टर माझे तेच म्हणणे आहे. या गोष्टींना खरेच कितीसा अर्थ उरलाय? माझ्या एका मैत्रिणीची म्हातारी काकू पहिल्या भेटीतच "आम्हाला तुम्ही आयुष्यभर कमी का लेखलत?" असे विचारत होती. अश्चर्याचा धक्का बसला होता. आपण ज्यांना पहिल्यांदा भेटतोय त्यांनी असे बोलावे? टोचून तुम्हाला, मला, आणि शेकडोजणांना बोलले गेले आहे. अगदी स्वजातीयही त्यातल्यात्यात पोटजातीतल्यांनाही बोलतात, अगदी तीच जात असली तरी आर्थिक कारण, रंग, रूप, मालमत्ता, फक्त मुली होणे असे बोलायला काय काहीही चालते. ;)पण आजकाल लगेच भावना दुखावतात आणि हातात तलवारी येतात त्याचे वाईट वाटते. मी देशस्थ असल्याने माझ्या सासरचे कोकणस्थ नातेवाईक (सासूसासरे नव्हेत.....त्यांनीच पसंत केल्याने ते काय बोलणार? ;) ) बोलल्याशिवाय राहिले असतील का? किती मनाला लावून घ्यायचे याबद्दल म्हणतीये.

In reply to by रेवती

प्रभाकर पेठकर Sun, 11/10/2013 - 02:41
माझ्या एका मित्राबरोबर, त्याच्या ओळखितल्या, श्री. वरूणगावकर नांवाच्या गृहस्थांच्या घरी गेलो असता दरवाजातच माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिल्यावर माझ्या मित्राने ओळख करून दिली. 'हा माझा मित्र, प्रभाकर पेठकर'. त्यावर त्यांची प्रतिक्रिया 'पेठकर? म्हणजे बाय कास्ट?' मी खवटपणे 'देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण' असे खणखणीत शब्दात सांगितले. मला आपादमस्तक न्याहाळत पण उत्तरातील कडवटपणा जाणवून त्यांनी घरात तर घेतले. पण मित्राचे काम संपून पुन्हा निघेपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत. बाहेर आल्यावर मित्राला मी म्हणालो, 'पुढच्या खेपेस मी खालीच पानवाल्याजवळ उभा राहीन तुझे काम आटपेपर्यंत.' सुदैवाने तेवढी वेळच आली नाही. माझ्या आयुष्यातला हा एवढा एकच प्रसंग. बाकी, मित्रमंडळी कधी प्रेमाने, कधी कौतुकाने तर कधी 'खेचताना', 'अरे! भटा.' असे सहज म्हणायची. पण ते मैत्रीच्या नात्यातील प्रेमळ संबोधन असे, म्हणून कधी गांभिर्याने घेतलेच नाही.

ग्रेटथिन्कर Sat, 11/09/2013 - 20:49
भारतात प्रत्येक गोष्ट जातीय फिल्टर लावून बघितली जाते, उकडीच्या मोदकाच्या मालकीवरुन आंजावर जातीय भांडणं करणारे लोकही आहेत ,हे बघुन कदाचीत ऑक्सीजनपेक्षाही जात महत्वाची असावी असे वाटते... (उकडीचे ,कणकेचे कोणतेही मोदक हादडून मिळतील-ग्रेथिं )

अंतरजातीय विवाह हे जे जात तोडण्याचं हत्यार आहे,त्याची परिपूर्णता अपत्याची जात ,आई/वडिलांची मिळून.. अशी मिश्र सांगितली गेली(च) पाहीजे. (उदा-ब्राह्मण मराठा/कायस्थ माळी/सोनार शिंपी)..... नाहीतर असे विवाह हे नुसतेच सोपस्कार होऊन बसतील!

In reply to by अत्रुप्त आत्मा

वडापाव Sat, 11/09/2013 - 21:00
असं नाही काही. समजा उदाहरणादाखल आई मराठा आणि बाप ब्राह्मण असेल, तर अपत्याला दोन्ही जातीच्या माणसांच्या बाजू समजतील आणि दोन्ही जातीतील जी काही दरी असेल, ती कमी करण्यात आणि निदान आपल्या परिवारापुरता त्यांच्यात समेट घडवण्यात त्याला यश येऊ शकतं. इतकंच नाही तर वादाच्या प्रसंगांत दोन्ही जातींपैकी कोणत्यातरी एका जातीची बाजू घेणं म्हणजे एका पालकाच्या विरोधात जाण्यासारखं झाल्याने, अपत्य हे जातींच्या बाबतीत तटस्थ भूमिका घ्यायला शिकेल. आंतरजातीय विवाहांचं प्रमाण वाढलं की अशी तटस्थ भूमिका घेणारी नवी पिढी जन्माला येईल आणि आपोआपच अगदी वैयक्तिक स्वरुपातल्या जातीभेदालासुद्धा खीळ बसेल. आणि मग सामाजिक स्तरावर, आपली राजकीय पोळी पिकवू पाहणा-यांना जातीवादाचा बोभाटा करता येणार नाही.

In reply to by वडापाव

वडापाव, तुंम्ही व्यवहारात सांगताय,तेच मी 'तत्वात' पूर्ण करावं असं म्हणतोय. आपल्याकडे व्यवहार बदलतात, आणि तत्व तशीच रहातात. बरीचशी टीका ,ही तत्वावरूनच होते...आणि त्यामुळे मग 'बदललेली' माणसेपण 'बिघडायला' लागतात! म्हणुन तत्व(ही) बदलणं आवश्यक आहे. दुसरं असं की , हा नवेपणा समाजावर संस्कारित होण्यासाठी सांगितला जाणं ही आवश्यक आहे. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

असहमत :( यात धोका असा की त्यामुळे "ब्राम्हण-मराठा" ही जात "ब्राम्हण-माळी" जातीपेक्षा जास्त भारी आहे अशी नविन प्रकारची जातीरचना तयार व्हायची ! :( त्यापेक्षा जात अशी सांगायला पाहिजे: बाप : माणूस आई : माणूस अपत्य : माणूस काही दिवसांनी (पिढ्यांनी) जात सांगायचे / विचारायचे कारण आपोआप नाहिसे होईल. +D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यसवायजी Sat, 11/09/2013 - 22:51
@ त्यापेक्षा जात अशी सांगायला पाहिजे: बाप : माणूस आई : माणूस अपत्य : माणूस >> असेच वाटते. सरकारी कागदपत्रांतुनसुद्धा जात/धर्म विचारणे बंद होईल असा दिवस बघायची इच्छा आहे..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@यात धोका असा की त्यामुळे "ब्राम्हण-मराठा" ही जात "ब्राम्हण-माळी" जातीपेक्षा जास्त भारी आहे अशी नविन प्रकारची जातीरचना तयार व्हायची ! Sad>>> होय! असल्या तूलना होत राहतील. पण त्यानंतर पुढच्या/पुढच्या पिढित जात लांबत जाऊन जात सांगणं निर्रथक व तापदायक होइल,आणि आपल्याला अपेक्षित असलेली माणूस-हीच जात सांगावी/पाळावी लागेल. :) त्यापेक्षा जात अशी सांगायला पाहिजे:>>> सांगायला नव्हे,पाळायला पाहीजे. पण ते आपोआप होणं शक्य नाही.त्या साठि जाति 'मोडण्याचे' कार्यक्रमच हवेत. @बाप : माणूस आई : माणूस अपत्य : माणूस>>> हा भाबडा आशावाद आहे... असो! :) @काही दिवसांनी (पिढ्यांनी) जात सांगायचे / विचारायचे कारण आपोआप नाहिसे होईल.>>> ते मी म्हटलं तश्याच 'कार्यक्रमांनी' शक्य होणार आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

@काही दिवसांनी (पिढ्यांनी) जात सांगायचे / विचारायचे कारण आपोआप नाहिसे होईल.>>> ते मी म्हटलं तश्याच 'कार्यक्रमांनी' शक्य होणार आहे. नो प्रॉब्लेम ! एका किंवा अनेक कोणत्याही प्रकारे भारतातील अयोग्य रुढी-परंपरा जर दूर झाल्या तर आनंदच आहे... त्या भूतकाळात जाणे जास्त महत्वाचे. (एखादी गोष्ट करण्याचे एकापेक्षा जास्त प्रकार बरोबर असू शकतात यावर विश्वास असणारा) इए

रेवती Sat, 11/09/2013 - 21:00
माननीय वडापावजी, तुमच्या धाग्याच्या विषयामुळे एका संपादकाला हितं तळ ठोकून र्‍हावं लागतय व प्रतिसाद देत बसावं लागतय. असे धागे विकांताला काढून संपादकांना सुट्टीचा आनंद मिळू देत नाही तुम्ही! आता निदान तुमच्या धाग्याला चार प्रतिसाद दिलेत हे लक्षात ठेऊन माझा धागा येईल तेंव्हा सव्याज परतफेड करावी.

In reply to by रेवती

संपादकीय अधिकारांचा वापर करून "माझा कंपू" ही जात बनविण्याचा अशक्त प्रयत्न असल्याचा वास या प्रतिसादाला का ब्रे येतोय ? ;) (मिपा जमातीच्या रितीभातींप्रमाणे टीव्र णीशेढ वेग्रे करावा काय या विचारातला) इस्पीकचा एक्का (हघ्या)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती Sat, 11/09/2013 - 21:29
मिळाला, नव्या धाग्याचा विषय मिळाला! "आहेच मी कंपूबाज!!! मग?" ;) मदनबाण, वडापाव यांना एवढ्यात चार प्रतिसाद देऊन झाल्याने त्यांच्याकडून किमान दोन दोन प्रतिसाद, तुम्ही एखादा द्या, मउवा, बाबा पाटील यांना आत्ताच एक उपप्रतिसाद दिलाय त्यामुळे तेही देतील. संपादकांना चावडीवर आणि महिलांना अनाहितामध्ये आवाहन केल्यास बघता बघता शंभरेक प्रतिसाद मिळतील.

In reply to by रेवती

वडापाव Sat, 11/09/2013 - 21:49
प्रतिसादांबद्दल आभारी आहे. :) तुमच्या कंपूत यायलाही आवडेल, तसंही सांजसंध्यांनी माझा मित्रपरिवार वाढावा असा आशीर्वाद दिलेलाच आहे.

In reply to by रेवती

मतांची जमवाजमव करण्याची कोष्टकं पाहून निवडणूका जवळ आल्याची खात्री झाली ;) आमीपण तुमच्या कंपूत. तेवढेच दोनचार छानछान प्रतिसाद मिळले तर कोणाला नको आहेत? +D

मारवा Sat, 11/09/2013 - 21:14
'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार?? अहो प्राचीन काळापासुन ब्राम्हण अगदी व्यवस्थित मांसाहार करीत असत त्याला धर्माची पुरेपुर मान्यता होती. म्हणुन ब्राम्हण जर मांसाहार करीत नसतील तर ते आधुनिक ठरतात कारण ते आपल्या पुर्वजांची जुनी मांस खाण्याची परंपरा मानायला नकार देत आहेत. ते आधुनिक आणि बंडखोर आहेत म्हणुन आपल्या पुर्वज ब्राम्हणांची मांस खाण्याची परंपरा नाकारुन शाकाहार करीत आहेत. आता यझ संचालन करण्याचा अधिकार केवळ फ़क्त ब्राम्हणांना च होता हे तुम्हाला माहीत आहे हे गृहीत धरुन चालतो. क्षुद्र आदींना त्याच्या आसपास ही येण्यास मनाई होती हे ही माहीत असेल असे समजतो. एतरेय ब्राम्हण आपण वाचलेच असेल. आणि हा त्यातील प्रसिध्द श्लोक ज्यात यज्ञात बळी दिलेल्या प्राण्याच्या अवयवांची वाटणी यझ संचालित करणार्याक ब्राम्हणांत कशी करावी याचे स्वच्छ वर्णन केलेले आहे. याचा मुळ संस्कृतश्लोका ची लिंक ही देतो आणि त्याचा इंग्रजी अनुवाद ही देतो. हे समजण्यास काही अडचण आली तर अजुनही खोलात जाउ शकतो. तुर्तास एवढे पुरेल बहुधा आणि एक मधुपर्क म्हणजे काय ? तो कोणी कोणाला द्यायचा असतो ? आणि त्याच्या व्याख्येत नांमासो मधुपर्क भवति असे का म्हटलेले आहे हे जरा शोधुन काढा. Indology चा अगदी पहीला प्राथमिक धडा जरी अभ्यासला तरी चालेल. http://hinduonline.co/Scriptures/Brahmana/AitareyaBrahmana.html "Now follows the division of the different parts of the sacrificial animal (among the priests). We shall describe it. The two jawbones with the tongue are to be given to the Prastotar; the breast in the form of an eagle to the Udgatar; the throat with the palate to the Pratihartar; the lower part of the right loins to the Hotar; the left to the Brahma; the right thigh to the Maitravaruna; the left to the Brahmanuchhamsi; the right side with the shoulder to the Adhvaryu; the left side to those who accompany the chants; the left shoulder to the Pratipasthatar; the lower part of the right arm to the Neshtar; the lower part of the left arm to the Potar; the upper part of the right thigh to the Achhavaka; the left to the Agnidhra; the upper part of the right arm to the Aitreya; the left to the Sadasya; the back bone and the urinal bladder to the Grihapati (sacrificer); the right feet to the Grihapati who gives a feasting; the left feet to the wife of that Grihapati who gives a feasting; the upper lip is common to both, which is to be divided by the Grihapati. They offer the tail of the animal to wives, but they should give it to a Brahmana; the fleshy processes (maanihah) on the neck and three gristles (kikasaah) to the Grahvastut; three other gristles and one half of the fleshy part on the back (vaikartta) to the Unnetar; the other half of the fleshy part on the neck and the left lobe (Kloma) to the Slaughterer (Shamita), who should present it to a Brahmana, if he himself would not happen to be a Brahmana. The head is to be given to the Subrahmanya, the skin belongs to him (the Subrahmanya), who spoke, Svaah Sutyam (to morrow at the Soma Sacriice); that part of the sacrificial animal at a Soma sacrifice which beloings to Ilaa (sacrificial food) is common to all the priests; only for the Hotar it is optional. All these portions of the sacrificial animal amount to thirty-six single pieces, each of which represents the paada (foot) of a verse by which the sacrifice is carried up..." "To those who divide the sacrificial animal in the way mentioned, it becomes the guide to heaven (Swarga). But those who make the division otherwise are like scoundrels and miscreants who kill an animal merely." "This division of the sacrificial animal was invented by Rishi Devabhaaga, a son of Srauta. When he was departing from this life, he did not entrust (the secret to anyone). But a supernatural being communicated it to Girija,the son of Babhru. Since his time men study it." [Aitareya Brahman, Book 7, Para 1, ]

In reply to by मारवा

बॅटमॅन Sat, 11/09/2013 - 21:25
ब्राह्मणांच्या मांसाहाराचे पुरावे वेदकाळापासून आहेत- नाकारत कोणीच नाही. पण शाकाहार करणे हा प्रकार गेली दीडेक हजार वर्षे तरी सुरू आहे. त्यामुळे अगोदरची मांसाहारी परंपरा मोडली अन शाकाहारी परंपरा सुरू झाली त्यालाही लै वर्षे झाली, त्यामुळे सद्यस्थितीत मांसाहार करणे हे आधुनिक आहे इतके सांगून मी आपली (फुल्लि पेड) रजा घेतो.

In reply to by बॅटमॅन

आनंदी गोपाळ Sat, 11/09/2013 - 21:44
अख्खी मानवजातच शाकाहारी होती आधी, नंतर ऑम्निवोरस म्हणून उत्क्रांत झाली, असे पुरावे आहेत. मांसाहार चुकीचा नाहीच. अन आपण मानव १००% मांसाहारी ही नव्हेत. आधुनिक, अर्वाचिन, प्राचीन, नक्की कोणत्या काळापासून हे फक्त चष्मे आहेत. खाण्याचाच विषय आहे, तर जातींशी जोडलेला आहार हा एक चष्मा छानही आहे अन वाईटही. रामग्याचं/शेंडीचं मटन, अन उकडीचा मोदक, किंवा आमटी-पाटवड्या, किंवा पाया सूप... जे असेल ते. एका विशिष्ट समाजघटकाच्या नेहेमीच्या खाण्यापिण्याचा भाग म्हणून विकसित झाले, अन त्या त्या 'जाती'ची ओळख म्हणून प्रसिद्ध झालेत. पूर्वी 'क्षक्षक्ष हिंदू मटन खाणावळ' अशी पाटी कुणाला खटकत नसे, तसेच शिंप्याचे दुकान, भटाची ओसरी, वाण्याची लबाडी, तांबोळ्याचे दुकान, किंवा खाटिकखाना इ. वाक्प्रचार/शब्दही खुपत नसत... लेखापाठचा मुद्दा, 'आजकाल अस्मिता जास्तच हुळहुळ्या झाल्यात', हा असावा.

In reply to by आनंदी गोपाळ

बॅटमॅन Sat, 11/09/2013 - 21:48
मान्य आहे ओ साहेऽबं, ते यकदोन स्मायल्या र्‍हाऊन गेल्या बगा अम्मळ :) लै शिरेस न्हौतो आमी. बाकी ते हुळहुळ्या अस्मितांबद्दल सहमत आहे. अस्मितेची गळवे लै ठसठसलेली आहेत अलीकडे ;)

In reply to by आनंदी गोपाळ

ग्रेटथिन्कर Sat, 11/09/2013 - 23:30
जातीशी संबंध फक्त आहाराचाच नाही, पत्येक गोष्टीचा लावला जातो ,जसे की 'देवता'... गणपती, दत्त, श्रीराम- ब्राह्मणांचे म्हसोबा, खंडोबा- धनगरांचा तुळजाभवानी ,ज्योतिबा -मराठ्यांचे एकविरा देवी- कोळ्यांची शंकर- लिंगायतांचे परशुराम -कोकणस्थांचे... (जातिअनुषंगाणे टिपाकल आहेत)

In reply to by ग्रेटथिन्कर

चेतनकुलकर्णी_85 Sun, 11/10/2013 - 00:13
तुळजाभवानी ,ज्योतिबा -मराठ्यांचे काय राव कैच्या काय ? दोन्ही आमच्या कडे कुलदेवता व कुलदेव आहेत देवाला तरी जातीच्या बंधनात बांधू नकोस रे ग्रेट्या तुम्हाला कोणी अडवलेय दत्त गुरुन्जी, गणपतीची किंवा परशुरामाची भक्ती करायला ?करत जावा कि ! (काही भाग अप्रकाशित) - संपादक मंडळ. स्वतःला फक्त (शाकाहारी )हिंदू समजणारा

In reply to by चेतनकुलकर्णी_85

प्यारे१ Sun, 11/10/2013 - 00:55
कुलकर्णी साहेब, त्यांनी फक्त जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. नि त्यात 'थोडंसं' तथ्य आहे. तुळजाभवानीचे पुजारी हे जन्मानं ब्राह्मण नसतात. तिथं 'वशाटा'च्या सवासणी जेवायला घातल्या जातात नि तुलनेने ब्राह्मणांची संख्या खरंच कमी असते. ज्योतिबालासुद्धा पुजारी ब्राह्मण नाहीत. तिथं सुद्धा ब्राह्मणांची संख्या तुलनेनं कमी असावी. कुलदेव/देवी म्हणून दर्शनाला जाणं हा भाग वगळता 'आवड' म्हणून देवाला जाणारा वर्ग पाहिला तर वरचं स्टेटमेंट लक्षात येईल. मी वाईचा. मांढरदेवी (काळूबाई) इथं जाणारा वर्ग हा मुख्यत्वे गावाकडचा नि त्यातसुद्धा हरिजन वर्गातला असा असतो. तिथं मराठा समाज सुद्धा कमीच पहायला मिळतो. विठोबाच्या दर्शनाला जाणारा माणूस काळा, रापलेला, सुरकुतलेल्या चेहर्‍याचा कष्टकरी शेतकरी असतो. नि कृष्णाच्या दर्शनाला जाणारा गोरा, श्रीमंती छटा असलेला असतो. हे 'सामान्य' विधान आहे. जनरल स्टेटमेण्ट. असाच फरक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या, आश्रमांच्या विषयी करता येतो. -इतरांपेक्षा मागास म्हणून इतरमागास ;) प्यारे

In reply to by प्यारे१

अभ्या.. Sun, 11/10/2013 - 01:02
तुळजाभवानीचे पुजारी हे जन्मानं ब्राह्मण नसतात
हे जण्रल असेल स्टेट्मेण्ट तर ओके. अन्यथा चूक आहे. ;) -मागास प्यारेचा अतिमागास मित्र ;) अभ्या

In reply to by अभ्या..

प्यारे१ Sun, 11/10/2013 - 01:14
अबे अभ्या, आम्ही गेलो ते 'कदम' म्हणून होते... अगदी देवळासमोर. त्यांनी अगदी देवीची पूजा वगैरे सगळं सांगितलं नंतर मंगळावर म्हणून सवाष्णं आहेत म्हणे, मटण होतं. आम्ही पुरणपोळ्या घेतल्या बांधून. ते कदम पूजा करतात ना? देवीच्या पुजार्‍यांना काय म्हणतात ते नेमकं विसरलो बघ. (पंढरपूरचे विठोबाचे बडवे, रुक्मिणीचे उत्पात तसे) बाकी ज्योतिबाचे पुजारी नक्की ब्राह्मण नाहीत.

In reply to by प्यारे१

अभ्या.. Sun, 11/10/2013 - 01:19
भोपी भोपी. कदम असतात ते भोपी किंवा भोप्या. कोंडो, पोफळे आहेत ते उपाध्ये. पूजेची वर्णी त्यांना असते. जातवार डिट्टेल लैच आहेत पार आदिलशाही, निजामशाहीपासून चालत आलेत. असल्या अधिक माहितीसाठी दै. सकाळ ची उस्मानाबाद आवृत्ती वाचावी नवरात्रात. ;)