✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुलं - काही नोंदी

म
मितान यांनी
Mon, 10/21/2013 - 12:40  ·  लेख
लेख
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे. अवनी. वय १७. गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय.. मला नको असं जगणं.." स्वार्थी नातेवाईक, एकटेपणा, अकाली प्रौढत्व, मित्र मैत्रिणी आणि हिच्या जगण्याच्या शैलीतली तफावत, अपरिपक्व निर्णक्षमता अशा अनेक गोष्टींनी नैराश्याच्या गर्तेच्या तोंडाशी उभी ही ! नीरव,वय १९. लहाणपणापासून प्रत्येक हट्ट पुरवला गेला. अकरावीत असताना अनेक व्यसने लागली. त्यातून बहेर पडला तेव्हा बारावीच्या परीक्षेला ३ महिने उरले होते.१० वीला ९२% मिळवणारा हा मुलगा १२ वीत कसाबसा पास झाला.हट्टी हेकेखोर स्वभाव मात्र तसाच आहे. लाड पुरवणे तसेच आहे. वडिलांचा व्यवसाय. आई नोकरदार. नीरव ने मागच्या आठवड्यात नवे गेम खेळण्यासाठी नवा लॅपटॉप मागितला. त्याला हवा असलेला लॅपटॉप मिळाला नाही तर आत्महत्येची धमकी दिली. घरातून दोन दिवस गायब झाला. वडिलांनी घाबरून लॅपटॉप घेऊन दिला. आई हतबद्ध ! रचिता. १५ वर्षे. घरात आईबाबांची सतत भांडणं. हिच्याकडे होणारे दुर्लक्ष हे या संवेदनशील मेधावी बुद्धिमत्तेच्या मुलीला सहन झालं नाही. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. सरयू.२१ वर्षे. ११ वर्षांपूर्वी दिल्लीतल्या एका डॉक्टरने ही स्लो लर्नर आहे असे सांगितले. मग स्पेशल स्कूल, रेमिडियल क्लासेस असे चक्र सुरू झाले. आत्ता टेस्ट केली तर बुद्ध्यांक सामान्यांपेक्षा वरचाच आहे. पण लेखनातली अध्ययन अकार्यक्षमता आहे असे आढळले. ही नुकतीच १० वी झाली. पुढे काय हा निर्णय घेता येत नाही. संकेत आणि संध्या. १४ वर्षे. एका महागड्या प्रसिद्ध कोचिंग क्लास मध्ये गेलं वर्षभर लैंगिक शोषणाला बळी पडलेली ही मुलं. आई बाबांचे खूप पैसे वाया जातील असे वाटल्यामुळे सहन करत राहिली. असह्य झाल्यावर बोलण्याचे धाडस केले. विरेन.१४ वर्ष. अती बुद्धिमान. त्याच्या मते ही शिक्षणपद्धत, राजकारण, समाजरचना 'होपलेस' आहे. त्याला याचा भाग होण्याची इच्छा नाही. त्याने शाळेत येणं सोडून दिलंय. गेले सहा महिने केवळ शास्त्रीय संगीत ऐकतोय. कोणाशीही संवादाची इच्छा नाही. अक्षता. १५ वर्षं. गेली २ वर्षं तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणार्‍या मुलाच्या प्रेमात(?) आहे. आता त्याला दुसरी मैत्रिण भेटली आहे. म्हणून हिने अभ्यास शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला.हट्टाने घरातून बाहेर पडली नि होस्टेलवर आहे. तिथे तिच्याबद्दल चोरीच्या तक्रारी पुराव्यांसह येताहेत. रीमा. वय ८. कॉलनीत एक टोळी आहे. त्या टोळीची ही लीडर. ५ ते ८ वयातल्या या मुली रोज ठरवून एकीच्या घरून पैसे चोरून आणतात. ते जंक फूडवर खर्च करतात. जी मुलगी याला विरोध करेल तिला वाळीत टाकलं जातं. पालक हैराण.. अर्णव.वय ६. आई सतत आजारी असते म्हणून त्याला ती अज्जिबात आवडत नाही. घरी असलेल्या वेळापैकी ६-७ तास हा टी व्ही किंवा व्हिडिओ गेम्स खेळतो. ते बंद केले तर याला खूप उलट्या सुरू होतात. हे व्यसन कसं घालवायचं या संभ्रमात पालक. निधी. वय ५. दत्तक मुलगी. आई बाबा ५० च्या वरचे. ही चंचल आहे. दिवसाला ३ बिस्किटांशिवाय काहीही खात नाही. अचानक अंथरुण ओले करणे सुरू झाले आहे. बोलण्यात तोतरेपणा यायला लागला आहे. अंकुर. वय ४. बोलत नाही ही तक्रार घेऊन पालक आले. चाचणीनंतर समजले तो कर्णबधीर आहे. आई म्हणाली आमच्या लक्षातच आलं नाही. राधा . वय ६.उत्तम चित्र काढते. अचानक तिने घरावरून वाहणारी नदी आणि घराखाली जळणारे डोंगर एवढीच चित्रं काढायला सुरुवात केली आहे. पालकांना समुपदेशकाकडे यायला गेली ५ महिने वेळ मिळत नाही. सारिका वय ११ वर्गात शेजारी कोणालाही बसू देत नाही अशी सतत तक्रार. आई सांगते घरीही कोणाला हात लावू देत नाही. आणि सतत हात धूत असते. लाईटच्या बटणाला हात लावताना बोटाला रुमाल गुंडाळायचा. बेसीनमध्ये हात धुताना आधी नळावर वारंवार पाणी टाकायचं, दार उघडलं की हात धुवायला पलायचं.... दिवसातून ३४ वेळा हात धुतल्याची नोंद केली आहे त्यांनी ! दोन वर्षांपूर्वी एका सहलीत तिला कोणीतरी 'बॅड टच' केला होता म्हणाली. तेव्हापासून तिला कोणत्याही स्पर्शाची भिती वाटते. मामाने गालाला हात लावलेला तर सहनच होत नाही. आई वडील अल्पशिक्षित श्रीमंत. ' तिच्यावर वाटेल तेवढा पैसा खर्च करतो पण हे खुळ तिच्या डोक्यातून काढा " असे म्हणतात. त्यांच्याजवळ पैसा आहे. पण संवाद साधण्यासाठी वेळ नाही. :( केतन. वय १७. वडील एका अती महत्त्वाच्या सरकारी खात्यात उच्चपदस्थ आहेत. आई मानसशास्त्राची पदवीधर. दोघेही अतिशय प्रामाणिक आणि सरळ साधे जगायला आवडणारे. केतनचा स्वभावही साधा. काहीसा भाबडाच. आता त्याला त्याचे मित्र 'सरकारी तोर्‍यात रहा, गाड्या वापर, पैसे उधळ.." असा आग्रह करतात. आई बाबा समजावून बोलून थकलेत. केतनला मित्र हवेत म्हणून त्यांचे ऐकावे लागेल असे ठामपणे वाटतंय. तो आता घरातून किरकोळ चोर्‍या करायला लागला आहे. स्वतःच्या स्टेटस साठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करतोय. बाबांना ते अजिबात मान्य नाही. याच्या काळजीने ते त्रस्त आहेत. संकल्प, वय १२ आई बाबा दोघे नोकरीवर गेल्यावर घरी एकटा असताना इंटरनेटवर पॉर्न पाहण्यात आले. मग आवडले. मग वारंवार बघण्याची सवय लागली. बाबांना समजल्यावर खूप मार खावा लागला. आता घरात नाही बघत. सायबर कॅफे मध्ये बघतो. त्यासाठी लागणारे पैसे चोरतो. दिवास्वप्नात राहणं खूप वाढलंय. भाषा आणि नजर बदलली आहे. तो आता मुलामुलींना नको तिथे स्पर्श करण्याची संधी शोधत असतो. आई बाबांच्या पापभीरु विश्वाला हा प्रचंड मोठा हादरा आहे. ते म्हणाले की आम्ही त्याचा तिरस्कार करतो. ही चटक संकल्पला विकृत बनवतेय. कळतंय पण वळत नाही. तो एकटा पडलाय. मृण्मयी वय १५. दहावीत शिकणार्‍या मृण्मयीच्या आई बाबांचा घटस्फोट होतोय. मार्च मध्ये शेवटची सुनावणी आहे. ती आईच्या पाठीशी ठाम उभी आहे. बुद्धिमान आहे. कष्टाळू आहे. आता तिला ताण आहे तो लोकांच्या प्रश्नांचा, मित्रमैत्रिणी दुरावण्याचा. तिला निद्रानाशाचे निदान झाले आहे. सारंग, वय ८ मोठ्या एकत्र कुटुंबातला मुलगा. आई बाबा आपापल्या व्यवसायात मग्न. आई त्याला भेटतच नाही. सकाळी ८ ते रात्री १०-११ ती ऑफीसात असते. सारंग भेटला की मनातल्या अपराधीपणाला घालवण्यासाठी वाट्टेल ते लाड होतात. आता शाळेतून तक्रारी येतायत. आई सोडून सारंगचा आवाज कधीच कोणी ऐकला नाही. माझ्याकडे पहिले सेशन झाले तेव्हा ४० मिनिटांनी पहिला शब्द त्याने उच्चारला. "बाय" ! आता आपणहून येतो. समोर नुसता बसतो. चित्र काढतो. मेकॅनो किंवा टूलकिट काढून खेळतो. अवघड पझल्स लीलया सोडवतो. बाय म्हणतो नि जातो. निनाद, वय ८ ६ महिन्यांपूर्वी अचानकच याच्या समोरच याची आजी गेली. तेव्हा घरात निनाद नि आजीच. याने आईला फोन केला. " बहुतेक आजी वारली. कारण ती आता जप करत नाहिये." निनादला तान्हा असल्यापासून आजीनेच सांभाळलं. काहीशी अती काळजी घेणारी पण शिस्तीत नि प्रेमळ धाकात वाढवणारी आजी निनादसाठी सर्वस्व होती. ती गेल्यानंतर निनाद रडला नाही. सकाळी उठल्यापासून जी कामे आजी करायची ती स्वतःहून करायला लागला. रांगोळी, पूजा, स्वतःची आंघोळ.... आई बाबांशी संवाद नाही. चिडणे नाही. बोलणे नाही. अभ्यास उत्तम. शाळेतून काही तक्रार नाही. अकल्पिता, वय ४ घरात आई बाबांचे सतत होणारे वाद बघते. बहुतेक मारहाणही. एक दिवस शाळेत तिच्या मनाविरुद्ध काहीतरी झाले म्हणून हिने शिक्षिकेसमोर बेंचवर स्वतःचे डोके आपटून घेतले. सगळा वर्ग स्तब्ध ! शिक्षिका हतबद्ध ! आता तिने पुन्हा असे करू नये म्हणून घरात नि वर्गात सगळे तिच्या मनासारखे वागतात. तरीही अकल्पिता आनंदी नाही. मनाच्या जंगलात हरवलेली ही मुलं सतत काहीतरी सांगू पहातायत. ते आपल्याला कधी ऐकू येणार ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
35839 वाचन

💬 प्रतिसाद (111)

प्रतिक्रिया

कधी कधी वाटते की आपल्या

बाहुली
Tue, 10/22/2013 - 13:24 नवीन
कधी कधी वाटते की आपल्या बदलत्या जीवन शैलीचा हा परिणाम आहे.
  • Log in or register to post comments

+ १

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 14:51 नवीन
"आपल्या बदलत्या जीवन शैलीचा हा परिणाम आहे." आणि आपल्या हिंदू संतवाणी कडे झालेले दुर्लक्ष... (आता हिंदू म्हणाल्याने काही मुद्दाम गहन विचार करणारे इथे मतांची पिंक टाकायला येतीलच... पण त्यांनी येवू नये...ही विनंती....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाहुली

नाही हो मु वि

अनिरुद्ध प
Tue, 10/22/2013 - 17:39 नवीन
एव्हडे दुखी नका होवु,नक्किच काही तरी चान्गले होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

प्रश्र्न फक्त माझ्या घरापुरता असता तर

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 18:01 नवीन
गोष्ट निराळी होती.... पण आज बराच सामाजिक आणि वैचारिक गोंधळ सुरु आहे. जगणेच इतके कठीण झाले आहे की आपण जगणेच विसरून चाललेले आहोत. दोन-दमडीच्या मालिका बघायला वेळ आहे पण मुलांच्या अमुल्य आयुष्याकडे बघायला वेळ नाही.हे पचवणे फार जड जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

अगदी सहमत. बाकीच्या मुलांच्या

रेवती
Tue, 10/22/2013 - 18:37 नवीन
अगदी सहमत. बाकीच्या मुलांच्या आणि पालकांच्या विचित्र वागण्यानं आपल्यावर जे प्रेशर येतं त्याचं गणित कसं आणि कुठं मांडावं कळत नाही. इथं घरी कितीही शिस्तीचा प्रयत्न केला तरी बाहेर वाट्टेल ते बघून आपली मुलं खरंतर गोंधळात पडतात. घरी अमूक गोष्ट शिकवावी तर बाहेर तसं न वागताही इतरांना मिळणारे चार फायदे बघून मुलं कोड्यात पडतात. तात्पुरता फायदा आणि कायम्स्वरुपी चांगली सवय यासाठी समजूत घालताना नाकी नऊ येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

भारतात वाढलेल्या आई

धन्या
Tue, 10/22/2013 - 18:59 नवीन
भारतात वाढलेल्या आई वडीलांच्या अमेरिका/युरोपात वाढणार्‍या मुलांवर होणारे संस्कार हा खुप गुंतागुंतीचा विषय आहे. घरामधील भारतीय संस्कार आणि घराबाहेरील बरंचसं अनिर्बंध आणि भोगवादी जीवनशैली उचलून धरणारं वातावरण यातून भारतीय पालकांची मुलं एबीसीडी अर्थात अमेरिकन बॉर्न कन्फ्युज्ड देसी होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

एबीसीडी अर्थात अमेरिकन बॉर्न कन्फ्युज्ड देसी होतात.....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 21:24 नवीन
खरे तर हा एक वेगळा विषय आहे... तरी पण...उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.... तेल आणि पाणी एकत्र मिसळायचा प्रयत्न केला तर चालत नाही. पण माणसांत आणि तेल-पाण्यात खूप फरक आहे.तेलाला पाणी होण्याशिवाय गत्यंतर नाही.जर तुम्ही तिथे राहणार असाल तर कशाला २ भाग करता? तिथलेच जीवन आहे तसे स्वीकारणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.तितले पाणी, हवा , सुखी आयुष्य चालते तर मग तिथली संस्क्रुती का नको? मी स्वतः गुजरातमध्ये ५ वर्षे होतो.तिथली संस्क्रुती महाराष्ट्रापेक्षा खूप वेगळी आहे.तरी पण मला त्रास झाला नाही.कारण तिथली संस्क्रुती मी मनापासून स्वीकारली होती. तुमच्या मुलाचे/मुलींचे मित्र-मैत्रीणी अमेरिकन्,तुमचे सहकारी अमेरिकन, मग अडचण येते कुठे?मध्यंतरी एक सुंदर पुस्तक वाचले होते.(बहुदा श्रीनिवास ठाणेकरांचे). त्यात त्यांनी ह्या प्रश्र्नाची छान उकल केली आहे. असो, हे विश्र्वची माझे घर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अहो धनाजीराव, ती कन्फ्युज्ड

रेवती
Tue, 10/22/2013 - 22:43 नवीन
अहो धनाजीराव, ती कन्फ्युज्ड मुलंही आता मोठी झाली असतील. आमची मुलं सध्यातरी कन्फ्युज्ड वाटत नाहीत. मी एकंदरीतच भारतात किंवा कुठेही दिसणार्‍या जीवनशैलीबद्दल म्हणतीये. भारतात राहणारे आमचे भाचे पुतणे पाहते तर एकदम भारी ष्टाईलीत वावरताना दिसतात. त्यामुळे कधीकधी माझा मुल्गा कन्फ्युज्ड असतो. भारताचं वर्णन केल्याप्रमाणे त्यालाच काय आम्हालाही आता दिसत नाही. ;) तेवढे बदल आता जमेत धरूनच टाकलेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

भारतात राहणारे आमचे भाचे

धन्या
Wed, 10/23/2013 - 12:36 नवीन
भारतात राहणारे आमचे भाचे पुतणे पाहते तर एकदम भारी ष्टाईलीत वावरताना दिसतात. त्यामुळे कधीकधी माझा मुल्गा कन्फ्युज्ड असतो
रेवतीताई, हे खासच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+१

संदीप चित्रे
Wed, 10/23/2013 - 19:42 नवीन
सहमत आहे रेवती! आता प्रत्येक भारत भेटीत आम्हाला 'उलटा सांस्कृतिक धक्का' (रिवर्स कल्चर शॉक) बसतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मेरेकू भी. माझ्या घरात तर

स्पंदना
गुरुवार, 10/24/2013 - 05:15 नवीन
मेरेकू भी. माझ्या घरात तर कोणीच शुभंकरोती म्हणत नाही. अन कपडे म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर नुसत्या होरो हिरॉइनीच असल्या सारख वाटत. बोलायच्या गप्पा सिरीयल्सवर. कोणीही वर्तमानपत्रातल्या बातम्या किंवा टीव्हीवरच्या बातम्या ऐकुन त्यावर चर्चा करत नाही. बघावे तेंव्हा बाहेर जाऊन खाण्याचा कल दिसतो. काहे बनवुन खाव अस दिसतच नाही इनस्टेड हे इथे छान मिळत ते तिथे छान मिळत अश्या गप्पा असतात, अन तस विकत आणुन खाल्लही जात. सकाळी सकाळी ते तळकट वडे चहाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

अस्वस्थ करणाऱ्या नोंदी

भ ट क्या खे ड वा ला
Tue, 10/22/2013 - 18:50 नवीन
हे थांबायला हवे , काय करता येईल ?
  • Log in or register to post comments

साधे सोपे आणि सरळ....

मुक्त विहारि
Tue, 10/22/2013 - 21:27 नवीन
थेंबे थेंबे तळे साचे...... आणि एक उत्तम घर एका गावाला सुधारून टाकते एक गांव एका राज्याला सुधारु शकते. आणि एक राज्य एका देशाला सुधारु शकते. बापूंचे वाक्य आहेच... खेड्यात जा आणि खेडी सुधारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भ ट क्या खे ड वा ला

सरयूला जर संगणकाची आवड असे तर

अग्निकोल्हा
Wed, 10/23/2013 - 00:49 नवीन
सरयूला जर संगणकाची आवड असे तर ती नक्किच छान करीअर करु शकते. संगणक ही सध्या एकमेव अशी गोश्ट आहे जी कोणतीही गोष्ट कितीही वेळा न चिडता, न हिणवता जो पर्यंत आकलन होत नाही तो पर्यंत पुन्हा पुन्हा शिकवते. हा अनुभव वर्गातील गुरुजींनी वैयक्तिक लक्ष देणे, अथवा आपल्यालाच कळाले नाही याबाबतचा भिडस्तपणा जो इतर मुलांमुळे वाढलेला असतो यावर अतिशय रामबाण उपाय आहेच परंतु अध्ययन अकार्यक्षमतेवरही याचा सुरेख उपयोग होतो, अन मुख्य म्हणजे अभ्यासत असलेल्या विषयाचीसुध्दा गोडी वाढवतो. जरुर प्रयत्न व्हावा. केतनवर मुळातच संस्कार चांगले असल्याने जरा गोंधळलाय इतकच. अन तो जर स्वतःच्या स्टेटस साठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग वगैरे करतोय तर छानच आहे, फक्त आता फक्त दुरूपयोग का करावा अन केंव्हा करु नये याबाबतचा विवेक पुश्ठ झाला की विषय संपला. पोरग अतिशय कृतिशील दिसत आहे, मनानेही चांगला आहे, असले टोणगे दोस्त केंव्हा अन कशी साथ सोडतात, का सोबत असतात याची अक्कल आली की तोच यांना बरोबर तालावर नाचवेल (अथवा दुर राहिल). फक्त या ज्ञानाची फार मोठी किंमत चुकवावी लागु नये म्हणून आइ वडिलांनी थोडं जागरुक राहणे पुरेसं आहे. विरेन हा दुर्दैवाने (?) त्याच्या सभोवताली असलेल्यांमधे सर्वात चलाख अन बुध्दीमान प्राणी आहे ज्यामुळे एका निरस आयुष्याला सामोरा जातोय अन फक्त ही निरसता हे एकमेव वास्तव समजतोय, अतिशय हुशार असल्याने अनुभवातुन उमजायच्या अनेक प्रश्नांची उकल निव्वळ बुध्दीमत्तेने (पण यशस्वी) करुन अजुन निरसता निर्माण करतोय, याला ताबडतो मिपाचे सदस्यत्व देणे अत्यावश्यक . निनाद आजीच्या जाण्याने अतिशय रिता झाला आहे, तरीही त्याच्या खंबीर व काहिशा संतुलीत भासणार्‍या जिवनशैलीची पायाभरणीही आज्जिनेच केली आहे. फक्त आता तीची रिकामी पोकळी भरुन काढणारे व्यक्तिमत्व सोबत दिसत नसल्याने, त्याला स्वतःचे व्यक्तिमत्वही तितकेच रिते भासत आहे, आइ वडिलांसोबत सुटलेले बोलणे ही एकमेव चिंतेच बाब असेल तर हळु हळु इंटीग्रेटी वाढावायच्या प्रयत्नाने व वाढत्या वयासोबत तो पुन्हा सबोल होइल असे वाटते. इतरांच्या (व बहुतेकांच्या) मनात कोणत्या ना कोणत्या कारणाने निर्माण झालेली पराकोटीची असुरक्षितता हा एक समान धागा आहे, ज्यामागील कारण जाणून योग्यती फुंकर मारणे साध्य झाले तर नक्किच हे लोक एक तणावरहित आयुष्य जगतिल. असो... जे वाटलं ते लिहलं... हे योग्य आहेच असा कोणताही दावा नाही.
  • Log in or register to post comments

अवघड आहे

रामपुरी
Wed, 10/23/2013 - 02:32 नवीन
प्रत्येक मूल वेगळं असतं आणि आई-वडीलच त्याला सर्वात जास्त समजून घेऊ शकतात अर्थात समजून घेणारे असतील तर ... मग समुपदेशकाची / मानसोपचार तज्ञाची गरजच पडणार नाही
  • Log in or register to post comments

विचित्र

मन१
Wed, 10/23/2013 - 07:28 नवीन
विचित्र. परवाच आलेला राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त इन्व्वेस्टमेंट हा मराठी चित्रपट पाहिलाय का कुणी? फारच थोड्या लोकांनी पाहिला असावा; थेट्रात दहा-बाराच्या वर डोकी दिसत नव्हती पहिला आथवडा असूनसुद्धा.
  • Log in or register to post comments

आजकाल स्वघरांत कोण जेवेल?

मुक्त विहारि
Wed, 10/23/2013 - 13:05 नवीन
आम्ही इंग्रजी हॉटेलांत जेवतो.बरेच जण खानावळीत जेवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

फारच थोड्या लोकांनी पाहिला

धन्या
Wed, 10/23/2013 - 13:16 नवीन
फारच थोड्या लोकांनी पाहिला असावा; थेट्रात दहा-बाराच्या वर डोकी दिसत नव्हती पहिला आथवडा असूनसुद्धा.
चित्रपताची म्हणावी तशी जाहीरात झाली नव्हती. मला वाटतं हे एक कारण असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

मला एक प्रश्न पडलाय..

पिलीयन रायडर
Wed, 10/23/2013 - 13:24 नवीन
मला एक प्रश्न पडलाय.. इथे कुणीतरी वर लिहीलय की "मुलांना मारु / ओरडु नका". ते मला पटतं सुद्धा. पण माझा मुलगा (वय दिड वर्ष) जेव्हा खुप चेकाळतो तेव्हा सगळ्यांना चावत सुटतो. आम्ही नको नको म्हणुन ओरडतो ती त्याला मज्जा वाटते. किंवा मग बोचकारे काढत असतो. आत्ता हे लिहिताना माझ्या डोळ्याखाली मस्त जखम आहे त्याच्या नखाची. आता ह्या प्रकाराला कसे रिअ‍ॅक्ट करावे? म्हणजे राग येतो.. म्हणुन ओरडुन पाहिलं तर त्याला कळतच नाही की आपलं काही चुकलय म्हणुन हे ओरडत आहेत. डॉक्टर म्हणतात ओरडु नका, तो अजुन जोरात ओरडायला शिकेल. मारुन पाहिलं तर त्याला हे ही कळालं नाही की अमुक गोष्ट करायची नाहीये म्हणुन मारलं. पुढच्या सेकंदाला तो परत चावतो/ बोचकारतो/ केस ओढतो.. जे त्याचं चाल्ल होतं तेच कंटिन्यु करतो.. भरीस भर हे पाहुन तो आम्हाला मारायलाही शिकला. ह्ट्ट करतो तेव्हा जोरात रडापड सुरू होते. कितीही दुर्लक्ष करायचं म्हणलं तरी ते जमत नाही. कधी कधी कुणाला खेळणी देत नसला आणि "असं करु नये, द्यावी आपली खेळणी..दे बरं" असं शांतपणे सांगितलं तर गपचुप खेळणी देतो. पण हीच मात्रा चावणे/ बोचकारणे ह्या प्रकाराला लागु पडत नाही. मग नक्की करायचं काय म्हणजे त्याला हे समजेल की मारु नये, चावु नये.. डॉक्टरांच म्हणणं की हे लोह कमी पडतय मेंदुला म्हणुन असा वागतोय. अंडी द्या / नॉन व्हेज द्या..भाज्या वाढवा इ..
  • Log in or register to post comments

आहराबरोबरच

हवालदार
Wed, 10/23/2013 - 14:39 नवीन
http://www.supernanny.co.uk/TV-Show.aspx ही वेबसाइट देखिल पहा. आम्हला जुळे आहेत अनि या वेबसाइटवरच्या टिप्स खुप उपयोगी पडल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पि रा ताई,

सुबोध खरे
Wed, 10/23/2013 - 19:04 नवीन
पि रा ताई, प्रतिसाद द्यावा कि नाही या संभ्रमात होतो. जसे मुलाला त्यःच्या सद्वर्तनाबद्दल बक्षीस द्यावे तसेच दुर्वर्तनाबद्दल शिक्षा सुद्धा द्यावी. मुलांचे मानसशास्त्र हे एका पातळी पर्यंत ठीक असते. दीड दोन वर्षाची मुले हॉटेलात आईच्या थोबाडीत मारताना पाहतो तेंव्हा आयांना किती कानकोंडे होते ते आपल्याला दिसून येते. दीड वर्षाच्या मुलाला आपण करतो आहे हे चूक आहे हे नक्की कळते.पण आक्रस्ताळे पन केला कि मनासारखे होते हे कळून आले कि ती आपल्याला पाहिजे ते करण्यासाठी तसेच परत परत करीत राहतात. एक लहानसा फोक/ छडी आणून ठेवा आणी तो आक्रस्ताळे पण करायला लागला तर प्रथम दोन वेळा स्पष्ट शब्दात सांगून पहा. (त्याने तो बहुधा सुधारणार नाही त्याने तुमचे पाणी जोखले आहे. यानंतर त्याचे हात धरून त्याला घट्ट जमिनीशी दोन ते तीन मिनिटे दाबून ठेवा याने हि त्याने ऐकले नाही तर त्या फोक किंवा छडीने एक वळ उठेल इतके जोरात मारा. आणी या वेळेस त्याला कोणतीही दया दाखवणे चुकीचे ठरेल. त्याला हि गोष्ट स्पष्ट पणे सांगणे जरुरीचे आहे कि कोणालाही चावणे किंवा ओरबाडणे खपवून घेतले जाणार नाही.त्याने परत चावले किंवा ओरबाडले तर परत एक छडी ओढा. तिसर्या छडी पर्यंत मुलाला नक्की कळून येते कि आपला आक्रस्ताळे पणा खपवून घेतला जाणार नाही. मुलगा दहा मिनिटे रडेल तर त्याला रडू द्या मुळीच सहानुभूती दाखवू नका. तुम्हाला हे झेपणार नसेल किंवा तुम्हाला रडायला येणार असेल तर तुमच्या यजमानांना सांगा. मध्येच तुम्ही कच खाल्लीत तर मुलगा तुमचे पाणी जोखेल आणी पुढच्या वेळेस आणखी आक्रस्ताळे पणा करेल. पुढच्या वेळेस मुलाने याची पुनरावृत्ती केली तर परत छडीचा वापर करण्यास कचरू नका एकदा मुलाला हे स्पष्टपणे कळले कि आई वडील भलत्याच गोष्टी खपवून घेत नाहीत कि तो आपोआप सुधारेल. हे आपल्याला जमणार नसेल तर सोडून द्या. या गोष्टीची मुलाचे आजी आजोबा असतील तर त्यांना स्पष्ट शब्दात कल्पना देणे आवश्यक आहे अन्यथा दुसरा मोठा यात पडणार असेल तर आपले प्रयत्न व्यर्थ जातील. कारण हीच गोष्ट मुलगा पुढे बाहेरच्या मुलांबरोबर करेल तेंव्हा ते ती मुले खपवून घेणार नाहीत आणी एक तर त्याच्याशी कोणी खेळायला येणार नाही किंवा त्याला मार खावा लागेल. मुलांना वेळेत शिस्त लावणे आणी कोणती गोष्ट खपवली जाणार नाही हे स्पष्ट शब्दात सांगणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा पुढे आई वडिलांना रडायची पाळी येउ शकते. वरील गोष्ट मी माझ्या स्वतःच्या आक्रस्ताळ्या मुलाला सरळ करण्यात यशस्वीपणे वापरली आहे. सुदैवाने माझ्या घरी माझी पत्नी आई आणी वडील यांच्या कडून मला पूर्ण पाठींबा होता. माझी आई एम ए बी एड आणी एका शाळेची मुख्याध्यापक होती मुलाचे मानस शास्त्र घेऊन बी ए झालेली होती. माझ्या आई वडिलांपैकी एक मुलाला रागवत असेल तर दुसरा कधीही मुलाला पाठीशी घालत नसे. आणी जरी पालकाची चूक असे तरीही मुलासमोर कधीही पाणउतारा करीत नसे. हीच गोष्ट मी माझ्या मुलांबाबत करतो. बाबा वेडेच आहेत आई वाईटच आहे असे मुलांचे सांत्वन कधीही करू नये (असे न केल्यास मुलांना आई किंवा वडिलांची किंमत राहत नाही) माझ्या आईवडिलांची एक शिस्त होती कि शिस्तीच्या वेळेस शिस्त आणी लाडाच्या वेळेस लाड त्यात सरमिसळ नाही. हा उपाय आजच्या पिढीतील नव्या आईबापाना पटेल असे नाही म्हणून मी प्रतिसाद द्यायला कचरत होतो. आपल्याला पटेल तर करा नाही तर सोडून द्या. मुलांचे मानसशास्त्र या विषयावर एखाद्याला पिंक टाकायची असेल तर टाका मी प्रतिसाद देणार नाही.कारण यावर कितीही वितंडवाद घालता येईल. मी बरोबर कि चूक हे मी माझ्या मुलांच्या बाबतीत स्वताला सिद्ध केले आहे इतरांना सिद्ध करायची मला गरज वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

भारी

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/24/2013 - 07:44 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

छडी पायावर मारा. हाताने

सुबोध खरे
Wed, 10/23/2013 - 19:08 नवीन
छडी पायावर मारा. हाताने थोबाडीत मारण्यापेक्षा दुप्पट जोराने पायावर मारलेली छडी हि जास्त परिणामकारक आणी कोणताही शारीरिक अपाय न करणारी असते.रागाच्या भरात हात शिवशिवतात पण थंड डोक्याने छडी घेऊन यावी म्हणजे पुढच्या वेळेस छडी पहिली कि मुल आपोआप वळणावर येते. नंतर नंतर मारण्याची गरजच पडत नाही. फक्त छडीचे नाव पुरते. पण छडी खुंटीवर मात्र असावी
  • Log in or register to post comments

तुमचं बरोबर आहे की आज कालच्या

पिलीयन रायडर
Wed, 10/23/2013 - 19:42 नवीन
तुमचं बरोबर आहे की आज कालच्या पालकांना हे पटणार नाही. मलाही पटले नाही. म्हणजे मला मुद्दा पटलाय पण उपाय नाही. मी माझ्या मुलाला छडीने मारु शकणार नाही. अर्थात मी त्याला पाठीत धपाटा घालणे हा प्रयोग केलाय. मग त्याला ओरडणे आणि त्याच्याशी न बोलणे. त्याने बोचकारलं तर हातावर फटका मारणे इ. पण मुळात त्याची बुद्धी (जी एरवी महा स्पीड्ने चालत असते) ती ह्या वेळेला का चालत नसेल? त्याला हे लक्षातच येत नाहीये की समोरचा ओरडतोय तर ते करायच नाही. त्याला समजेल अशी शिक्षा कोणती? त्याला शिक्षा केलीच पाहीजे ह्या मताशी मी पण सहमत आहेच. कारण जे चांगलं असेल त्याला लग्गेच "वा वा वा" करुन आम्ही त्याची पाठ थोपटतो. तर तो उत्साहाने ती गोष्ट करतो. आता असच काही करुन त्याला हे ही समजावायचे आहे की चुक केली की शिक्षा मिळते. पण छडीचा उपाय माझ्याचाने होणार नाही. कादाचित नवरा करु शकेल. मग मला ते पहावणार नाही. आणि तुमचं हे ही अगदी बरोबर आहे की त्यानी आमचं पाणी जोखलय. आणि त्यने अजुन पब्लिकली ह्युमिलिएट करणे वगैरे सुरु केलं नसलं तरी ह्या मार्गाने लवकरच सुपुत्र श्रीमुखात भडकावुन देतील अशी चिन्हे दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अम्ही देखिल छडीने

हवालदार
Wed, 10/23/2013 - 19:52 नवीन
मारण्याच्या बाजूने न्हवतो म्हणून वर दिलेल्या लिन्क मध्ल्या टिप्स वपरल्या अनि मुलाना न मारता शिस्त लवण्याचा प्रयत्न आत्ता पर्यन्त यशस्वी झाला आहे. डोक्टरनी सन्गितल्याप्रमणे मेसेज जाणे महतत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

टाईम आऊट!

चतुरंग
Wed, 10/23/2013 - 22:02 नवीन
घरातली एक जागा ठरवून घ्या. समजा खोलीचा कोपरा. तुमच्या मुलाने मारले, ओचकारले की प्रथम त्याचे दोन्ही हात घट्ट पकडा. त्याला अतिशय ठाम आणि स्पष्ट शब्दात सांगा "माझ्याकडे बघ!" त्याने तुमच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघेपर्यंत हेच वाक्य जरबेने म्हणत राहा (ओरडून नव्हे). मुलांना आवाजातला बदल ताबडतोब समजतो. एकदा त्याने बघितले की मग त्याला सांगा "तू जे आत्ता केले आहेस ते चुकीचे आहे. मला आवडलेले नाही. त्यासाठी तुला या कोपर्‍यात भिंतीकडे तोंड करुन ५ मिनिटे उभे राहावे लागेल." त्याला तिथे जबरदस्तीने नेऊन उभे करा. तो परत येईल पुन्हा उभे करा, रडेल, ओरडेल, आदळआपट करेल बिलकूल लक्ष न देता पुन्हा पुन्हा कोपर्‍यात नेऊन उभे करत राहा. ही प्रक्रिया तुमच्या पेशन्सचा कस पाहणारी असते. परंतु एकदा त्याला समजले की आई-बाबा अजिबात ऐकत नाहीत आणि चूक केली तर ते कोपर्‍यात उभे करतात की तो राहायला लागेल. (या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आजी-आजोबांसकट इतरांनी तटस्थ राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मूल रडत त्यांच्याकडे गेले तर त्यांनी स्पष्ट सांगायला हवे की "आई-बाबा जसे सांगताहेत तसेच कर." एकदा आपल्या चुकीला कोणाचाही आधार नाही हे समजले की मुले चट सरळ येतात!) पुढचा भागही तितकाच महत्त्वाचा आहे. एकदा तो पाच मिनिटे उभा राहिला की त्याला जवळ बोलवा आणि प्रेमाने समजावून सांगा की त्याला तिकडे का उभे केले होते. तो तुमचा लाडका आहे परंतु त्याने चूक केली तर ती अ‍ॅक्सेप्ट केली जाणार नाही आणि त्याला दरवेळी असाच टाईम आऊट मिळेल. याहीवेळी बोलणे हे डोळ्यात बघूनच व्हायला हवे, हे फार महत्त्वाचे आहे. कारण त्याशिवाय त्यांचं संपूर्ण चित्त तुमच्या सांगण्याकडे नसतं आणि मुलांच्या मनात तो प्रसंग घर करुन बसत नाही! काही मुले जाम टारगट असतात. पुढेपुढे ओचकारुन किंवा मारुन स्वतःच कोपर्‍यात जाऊन उभी राहतात! तर त्यावरचा उपाय म्हणजे एकतर टाईम आऊटची वेळ वाढवणे किंवा त्यांची आवडती वस्तू काही काळासाठी लपवून ठेवली जाईल असे सांगून ती काढून घेणे. इथपर्यंत बहुतेक वळण लागलेले असते! प्रसंगी एखादा जोरदार धपाटा किंवा पार्श्वभागावर सटका ठेवून देणेही चुकीचे नाहीये. परंतु टाईम आऊट आणि आवडती वस्तू, खेळ न मिळणे, इतरांपासून वेगळे पडणे याचा धाक मोठा असतो. एकूणच तुमच्या वागण्यात सातत्य हे फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय चालते आणि काय चालत नाही यांच्या सीमारेषा अतिशय स्पष्ट हव्यात. -रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आम्हि देखिल

हवालदार
Mon, 10/28/2013 - 19:17 नवीन
टाइमआउट वपरले आहे अनि तेच मी वर दिलेल्य लिन्क मध्ये शिकवले आहे. त्यामुळे न मारता चान्गली शिस्त लागते याला अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

पी रा ताई

निम
Mon, 10/28/2013 - 18:39 नवीन
पी रा ताई जर छडी मारणे जमणार नसेल तर नारळाच्या / काथ्याच्या दोरीने हातपाय घट्ट बांधून ठेवणे हासुद्धा एक चांगला पर्याय आहे. मुलगा पहिल्यांदा रडेन, आरडा-ओरड करेन, मग शांत होईल. तोपर्यंत whos the boss here ?? या प्रश्नाचे त्याच्या बालमनाने आकलन केले असणार . त्यानंतर तुम्ही त्याला त्याची चूक समजावून पुन्हा असे न करण्याच्या अटीवर मुक्त करावे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आता मी सांगते की ह्या

पिलीयन रायडर
Mon, 10/28/2013 - 18:56 नवीन
आता मी सांगते की ह्या धाग्यावरुन बोध घेऊन मी काय केले आणि त्याचे काय परिणाम दिसत आहेत.. मी मुलाने चावले, ओरबाडले, मारले तर आधी धपाटा देऊन पाहीला. त्याला हे अजिबात कळले नाही की का मारलाय (मुळात मला असं वाटतय की हेच पाहुन तो मारायला शिकलाय..). मग त्याचे केस ओढले की आपण पन त्याचे केस हलकेच धरुन ठेवायचे म्हणजे तो माझ्या केसांच्या नादी लागत नाही हे लक्षात आले. पण ते चावणे आणि बोचकारणे ह्यांना लागु होत नाही. मग शेवटचा उपाय म्हणजे, बाथरुम मध्ये नेऊन दार लावुन घेणे. असं केल्यावर तो रडतो. "बायको.. बायको" म्हणुन हाका मारतो (ही त्याची थिअरी आहे, की आई ऐवजी बायको म्हणलं तर ही बाई पिघळते). ३० सेकंदात मी दार उघडते कारण तो भलताच धाय मोकलुन रडतो. अशानी बाथरुमची हकनाक भिती मनात बसत आहे असही वाटतय. मला असं खुप मनातुन वाटतय की त्याला "शिक्षा" ही गोष्ट कळालीच नाहीये. त्याला "वेदना" झाली तर त्याला ते कळेल (जे अभिप्रेत असते जेव्हा आपण मुलांना मारतो). पण ती वेदना मी माझ्या मुलाला देऊ शकत नाहीये. त्याला वळन लावलं पाहीजे हे ही मला समजतय. पण मी तेवढी कणखर नाही. तो चावतो तेव्हा मला अशीही शंका येतेय की हा दात सळसलत असल्याने असं करतोय का? कारण तो चिडुन चावत नाही. मस्ती म्हणुन मागे लाग्तो. त्याला बोचकारणे पण मस्ती वाटतेय बहुदा. पण तो मारतो ते मात्र चिडुन.. त्याच्या मनविरुद्ध झालं की तो मारतो (त्याला काही लागलं तर त्याला "हात रे" करायला आम्हिच शिकवलय.. राग आला की आम्हि मारतो, त्यामुळे राग आला की मारायचं / ओरडायचं हे हि तो आमच्या कडुन शिक्लाय ) आता बोला काय करु.. आणि हो, दोरीने हात पाय बांधने वगैरे तर मी इतर कुणा सोबत पण करणार नाही, तो तर माझा पोटचा गोळा आहे. मला समजतय की शिस्त लवायलाच हवी, पण १.५ वर्षाच्या मुलासाठी काही सोप्पं नाही का सांगता येणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निम

अजिबात मारू नको

पैसा
Mon, 10/28/2013 - 19:09 नवीन
एवढ्या लहान मुलाला अजिबात मारू नको. काही वेळ न बोलणे आणि मुद्दाम दुर्लक्ष करणे हा उपाय करून बघ. तो चावतो ते दात येत असल्यानेच असेल. पण काही मुलाना सवय असते. आमच्या सोसायटीतला एक मुलगा अगदी ५ वीत जाईपर्यंत दुसर्‍या मुलाना चावायचा. नंतर हळूहळू सुधारला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

येथे हळवेपणा कामाचा नाही.

सुबोध खरे
Mon, 10/28/2013 - 20:11 नवीन
मुलांना दात वयाच्या सहाव्या महिन्यापासून येतात त्यामुळे मुले त्या वयात कोणतीही गोष्ट तोंडात घालतात. दीड वर्षाचे मुल दात येण्यामुळे चावत नाहीत( ते कुत्र्याचे पिल्लू नाही गल्लत करू नका). त्याला आपण चावतो ओरबाडतो किंवा केस ओढतो या गोष्टी कळत नाहीत हा आपला गैरसमज आहे. स्पष्ट शब्दात सांगतो आपण स्वताची फसवणूक करीत आहात. दीड वर्षाच्या मुलाला स्पष्टपणे आपण काय चूक करीत आहोत ते कळले पाहिजे. अन्यथा ते तीच गोष्ट बाहेरच्या माणसाबरोबर करू शकेल आणि यातून आपल्याला अत्यंत अडचणीची किंवा अवघड (embarrassing/ awkward) उद्भवू शकते. मी आपल्याला प्रथमच सांगितले होते कि जर आपल्याला जमत नसेल तर आपल्या यजमानांना सांगा. मुलाला त्रास होईल म्हणून आपण लस टोचणे(इञ्जेक्शन) थांबविले आहे काय? मुलावरील प्रेम हे अंतिमतः मुलाच्या हितासाठी असावे.येथे हळवेपणा कामाचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

@ डॉ. साहेब,

प्यारे१
Tue, 10/29/2013 - 13:40 नवीन
@ डॉ. साहेब, माझा मुलगा उद्याच्या ३ तारखेला एक वर्षाचा होतोय. अजून एकही दात आलेला नाही. काय कारण असेल? दात न आलेला माणूस नसतो मान्य. येतीलही. पण दात वेळेत न येण्यानं खाता न आल्यानं शारिरीक वाढ कमी होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दाताचा आणि अकलेचा काहीही संबंध नाही

सुबोध खरे
Tue, 10/29/2013 - 18:24 नवीन
दात येण्यास सुरुवात होण्याची साधारण वेळ म्हणजे ३ ते १ २ महिने. परंतु काही मुलांना जन्मजात सुद्धा दात आलेले असतात त्यामुळे आईला स्तनपान देताना त्रास पण होतो. याउलट काही मुलांना दीड वर्षापर्यंत दात येत नाहीत. दाताचा आणि अकलेचा काहीही संबंध नाही. दुधाचेच नव्हे तर अक्कलदाढेचा आणि अकलेचा काहीही संबंध नाही. मुलाला सर्व गोष्टी खायला द्या. दात नसलेले म्हातारे सुद्धा चिक्की कुटून खातात मग तुमच्या बाळाला द्या की कशाला घाबरता?एक वर्षाच्या मुलाला आई बाप जे जेवतात ते पूर्ण जेवण द्यावे. आपल्याकडे संगणक आहे म्हणजे आपण मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गात मोडता तेंव्हा मुलाचे पोषण कमी होईल हि भितीसोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मुलावरील प्रेम हे अंतिमतः

मदनबाण
Tue, 10/29/2013 - 14:04 नवीन
मुलावरील प्रेम हे अंतिमतः मुलाच्या हितासाठी असावे.येथे हळवेपणा कामाचा नाही. अगदी मनापासुन सहमत ! आमचं पिल्लु हल्ली फार दंगा करत ! घरातला जो कप्पा /खण दिसला की त्यातल्या सगळ्या वस्तु अत्यंत वेगाने बाहेर फेकणे हा आवडता छंद झाला आहे.{ आत्ता पर्यंत १०-१५ वेळा चिकटपट्या लावुन खण बंद केले होते ज्याचा टिकाव लागला नाही.} मी एकदा झोपलो होतो तेव्हा पायाच्या कंरगळीचा हळुच चावा घेउन बघितला ! मी ओरडलो नाही तेव्हा अंगठा कडकडुन चावला ! बरं हे सर्व करुन हसुन दाखवायच ! एक नंबरी वस्ताद आहे,मध्यंतरी जेव्हा थोडासा पाउस पडत होता आणि ढगांचा कडकडाट होत होता, तेव्हा खिडकी जवळ येउन हीने ढगालाच एयय्य करुन दम दिला. :) ती जे काही नविन शिकते / करुन दाखवते तेव्हा मी अगदी मनभरुन कौतुक करतो, पण जेव्हा मोकाटपणा वाढतो तेव्हा इवल्याशी ढुंगीवर अगदी अलगदच चापटी मारतो आणि ती काय चुकीचे करते आहे ते सांगतो... आत्ता पर्यंतचा अनुभव आहे की तिला चुकीचे काय आहे ते सांगितले की कळते ! आत्ता पर्यंत फक्त १-२ दाच अशी चिंटकली चापटी मारावी लागली आहे,आता मी फक्त तीच्या कौतुक करण्यासाठी ठेवलेल्या अनेक नावांपैकी एखादे घेऊन दणका हवा का ? असे विचारतो त्यानेच काम भागते ! :) जास्तीत जास्त बुवाजीला बोलवुन आणु का ? असा पोकळ धाक दाखवतो. ;) {कोमल पिल्लाचा कोमल हॄद्य असलेला बाबा}
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दोरीने हात पाय बांधने वगैरे

रेवती
Mon, 10/28/2013 - 20:32 नवीन
दोरीने हात पाय बांधने वगैरे बापरे! हे कसं करणं शक्य आहे? नकोच! मीही कल्पना करू शकत नाही. दीड वर्षं म्हणजे लहान आहे तो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

छडी पायावर मारा

रामपुरी
Wed, 10/23/2013 - 20:08 नवीन
किंवा निसर्गाने फक्त शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावर... बाकी वरच्या प्रतिसादाशी हजार वेळा सहमत. मारू नये वगैरे मानसशास्त्र एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे. असो ज्याचा त्याचा प्रश्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

किंवा निसर्गाने फक्त शिक्षाच

धन्या
Wed, 10/23/2013 - 20:14 नवीन
किंवा निसर्गाने फक्त शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावर...
मी असं गॄहीत धरतोय की तुम्हाला इथे पार्श्वभाग अभिप्रेत आहे. तो भाग निसर्गाने शिक्षा करण्यासाठी निर्माण केला आहे हे कशावरुन ठरतं?
मारू नये वगैरे मानसशास्त्र एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे.
एखादी न करण्यासारखी गोष्ट लहान मुलांनी केल्यानंतर जर त्यांना मारले तर कदाचित पुन्हा मार मिळेल या भीतीपोटी ती गोष्ट मुलं करणार नाहीत. परंतू असा मार खाल्ल्यानंतर मुलांच्या मनात भीती कायमची घर करुन बसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

सहमत .

लौंगी मिरची
Wed, 10/23/2013 - 20:24 नवीन
सहमत . मुलं भितीपोटी काहि चुकिचं केलं आणि अंगाशी आलं तरि घरी सांगणार नाहित आणि हे फार धोकादायक असतं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हा हा हा मौज आहे

रामपुरी
Wed, 10/23/2013 - 23:05 नवीन
"तो भाग निसर्गाने शिक्षा करण्यासाठी निर्माण केला आहे हे कशावरुन ठरतं?" पु ल देशपांडें या लेखकाचा "माझे शालेय जीवन" हा लेख वाचला असता तर वरील वाक्याचा संदर्भ लक्षात आला असता. असो... मुलांना केव्हा, कशासाठी, किती, कुठली शिक्षा करायची हा तारतम्याचा भाग असतो. "मार खाल्ल्यानंतर मुलांच्या मनात भीती कायमची घर करुन बसत", "ती घरी कुठलीही गोष्ट सांगत नाहीत" असे सरसकट म्हणता येत नाही. कुठल्या वेळी समजावून सांगायचं कधी शिक्षा करायची आणि कधी चक्क दुर्लक्ष करायचं हे प्रत्येक मुलासाठी वेगळं असतं. थोड्याश्या निरीक्षणाने आई वडीलांना ते लक्षात येत असतं. शेवटी मुलाला कसं वाढवायचं हा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि पालकांसाठी आयुष्यभराचा अनुभव. मुलांना मारणं/शिक्षा करणं पूर्णपणे चुकीचं किंवा अजिबात न मारता फक्त समजावून सांगणं हेच बरोबर अशी सरसकट विधानं मी तरी करू शकत नाही. ती पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पु ल देशपांडें या लेखकाचा

धन्या
Wed, 10/23/2013 - 23:16 नवीन
पु ल देशपांडें या लेखकाचा "माझे शालेय जीवन" हा लेख वाचला असता तर वरील वाक्याचा संदर्भ लक्षात आला असता.
"अरे इसने पुलं का माझे शालेय जीवन नही पढा" असं म्हणायचंय का तुम्हाला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

:)

रामपुरी
Wed, 10/23/2013 - 23:33 नवीन
अरे ये पीएसपीओ नही जानता असं म्हणायचं आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पोरांना शिस्त ही लावलीच

बॅटमॅन
Wed, 10/23/2013 - 20:22 नवीन
पोरांना शिस्त ही लावलीच पाहिजे-प्रसङ्गी मारूनही. पोराच्या अङ्गाला हात लावणे म्हणजे टॉर्चर नव्हे. तितपत निर्दय होणे म्हणजे मुलांचे घातकर्ते होणे नव्हे.
  • Log in or register to post comments

मुलांना शिस्त लावण्यासाठी

धन्या
Wed, 10/23/2013 - 20:42 नवीन
मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांना मारणं हा "क्विक फिक्स" असतो. मारल्याने मुलांच्या मनात भीती निर्माण होते आणि ती गोष्ट पुन्हा करावयास मुलं धजावत नाहीत. परंतू असं केल्याने मुलं त्या कृतीच्या परीणामांपासून अनभिज्ञ राहतात. तसेच कृती आणि तिचे परीणाम यांची सांगड घलणं शिकण्याची संधीही मुलं गमावतात. याला पर्याय हाच की मुलांना त्यांच्या कृतीचे भले-वाईट परीणाम समजावून सांगणं. मुलांना विश्वासात घेऊन हे केलं की मुलंही समजून घेतात. समजावल्यानंतरही मुलं समजत नसतील तर त्या छोटया मुला किंवा मुलीला बालरोगतज्ञाकडे नेणे उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्या साहेब, मुलांना

सुबोध खरे
Wed, 10/23/2013 - 21:23 नवीन
धन्या साहेब, मुलांना अभ्यासाला बसविण्यासाठी मारणे आणी मुल दुसर्या माणसाच्या चेहऱ्यावर थुंकत असेल तर त्यासाठी मारणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपले मुल जर आपल्या आई वडिलांच्या किंवा शिक्षकाच्या चेहऱ्यावर थुंकत असेल तर आपण त्याला काही प्रमाणात दहशत बसविणे अत्यंत आवश्यक आहे.मग त्या स्थितीत मुलाला त्याचा अर्थ समजत नसेल तरीही पण उठ सूट मुलाला मारत सुटणे हे वेगळे. आपण म्हणता तशी परिस्थिती हि आदर्श आहे आणी कदाचित अमेरिकेत स्वीकृत केली जाईल. प्रत्येक गोष्ट हि स्थलकाल सापेक्ष आहे. दुर्दैवाने लोक पूर्णपणे वर्ज्य अशा गोष्टींची आणी करू नयेत अशा गोष्टींची गल्लत करताना आढळतात. चूक आणी गुन्हा यातील अंतर समजावून देणे हे अत्यंत आवश्यक आहे. असा प्रयत्न एका मुलाने सरकारी कार्यालयात केला असता( मुलाने संगणकाच्या ups ची तार खेचली आणी त्यांची सिस्टीम क्रेश झाली. त्याच्या बापाला( हा आमचा मित्र होता) सरकारी माणसाने हाकलून दिले आणी अर्थातच पुन्हा कार्यालयात पाऊ ल ठेवू नका अशी तंबी दिली त्यानंतर आपल्या मुलाला शिस्त न लावल्याचा पश्चात्ताप त्या बापाला करायची पाळी आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आपले मुल जर आपल्या आई

धन्या
Wed, 10/23/2013 - 22:53 नवीन
आपले मुल जर आपल्या आई वडिलांच्या किंवा शिक्षकाच्या चेहऱ्यावर थुंकत असेल तर आपण त्याला काही प्रमाणात दहशत बसविणे अत्यंत आवश्यक आहे.
हा परिस्थीती हाताबाहेर गेल्याचा प्रकार आहे. आई वडीलांनी मुल समजावून सांगण्याच्या वयाचं असताना लाडावून ठेवल्यावर ते मुल थोडं मोठं झाल्यावर असे प्रकार होणारच. असं मुल एकदा धपाटा देऊन शांत बसण्याऐवजी अजून एकदा आई वडील किंवा शिक्षकांवर थुंकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

धन्या

सूड
Wed, 10/23/2013 - 22:59 नवीन
अरे एखादा धपाटा घालणे याचा अर्थ मारणे असा करत असशील तर ते तसं नाहीये. मूल राग आला म्हणून चावत असेल आणि समजावूनही ऐकत नसेल तर पुन्हा कोणाला चावलं तर तिथल्या तिथे एक धपाटा घालणे थोबाडीत मारणे म्हणजे चूक नव्हे. मुलाच्या कलानं घेऊ म्हणता म्हणता मुलं डोक्यावर बसायला वेळ लागत नाही. आणि लहानच कशाला मोठ्या मुलांनाही कळलं की आईबाप आपल्या तालावर नाचतायेत की मग मिर्‍या वाटायला कमी करत नाहीत डोक्यावर. अगदी पाहण्यातलं उदाहरण आहे. मुलाला स्टमक अल्सर झाला म्हणून तो बरा होईस्तवर नोकरी सोडायला लावली घरच्यांनी, विशेषत: आईने! याआधीही खुट्टं काही झालं की कित्येक नोकर्‍या सोडायला लावल्याच होत्या. आता अल्सर बरा होऊन दीडेक वर्ष उलटलं मुलगा घराबाहेर पडायचं नाव घेत नाही की आई ठामपणा दाखवत नाही. कोणी विचारलंच तर मुलाला पाठीशी घालणं असतंच. आता स्वत:चेच पाय स्वतःच्या गळ्यात पडलेत, पण सांगणार कोणाला अशी गत आहे. मुलांवर प्रेम नक्कीच असावं पण फाजील लाड हे असे अंगाशी येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

सुडक्याशी पूर्ण सहमत!

बॅटमॅन
गुरुवार, 10/24/2013 - 01:08 नवीन
सुडक्याशी पूर्ण सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

Mr. चाणक्य says..

यसवायजी
Wed, 10/23/2013 - 21:00 नवीन
Fondle a son until he is five years of age, and use a stick for another ten years, but when he has attained his sixteenth, treat him as a friend. Image removed. मारलं, अन त्याच्या मागचं कारण जर समजावता आलं.. तर लै बेष्ट. न्हाईतर पॉर गेलं कामातन.. (आजोबांचा दररोज न चुकता मार खाऊन मोठ्ठा झालेला.. अन अजुन त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा..)
  • Log in or register to post comments

सहमत.

बॅटमॅन
गुरुवार, 10/24/2013 - 01:10 नवीन
लालयेत् पञ्चवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् | प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् || खरे तर मारण्याची फारशी गरज पडू नये इतपत धाक असला तरी बास. पण हा धाक असणे आणि पोराला कुत्र्यागत जखडून ठेवणे यात तारतम्याने फरक केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

आधी स्वतःचं वागणं चेक करून

खटासि खट
गुरुवार, 10/24/2013 - 01:13 नवीन
आधी स्वतःचं वागणं चेक करून बघायला लागेल असं वाटलं. घरातलं आपलं वागणं एकवेळ कंट्रोल करू. पण बाहेर काय होतं यावर लक्ष ठेवणं हे तितकं सोपं नाही. पण मुलांमधल्या बदलांवर लक्ष ठेवणं, त्याला बोलतं करणं हे जमू शकतं. शक्यतो, ज्या मुलांना आईचं प्रेम मिळतं तिथे कमी समस्या येत असाव्यात (घरचं इतर वातावरण नॉर्मल असल्यास). काही घटना (मृत्यू वगैरे) घडल्यास उदाहरणाने समजावून सांगाव्या लागतात. या समस्यांबद्दल मितान यांच्याकडून अधिक जाणून घ्यावंसं वाटतंय. बरेच कन्सेप्टस क्लिअर व्हायला मदत होईल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा