✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हे शाश्वत ज्ञान नव्हे !

ध
धन्या यांनी
Fri, 10/18/2013 - 16:49  ·  लेख
लेख
आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो: 'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. 'अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम | एतद ज्ञानमिती प्रोक्तं अज्ञानं त्दतो न्यथा|' म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी. जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित. पत्र वाचले आणि पत्रलेखकाबद्दल वाईट वाटले. लोक कुठल्या भ्रमात जगत असतात आणि "ग्रंथप्रामाण्याच्या" गुलामगिरीचं जोखड किती आनंदाने वाहत असतात याचं हे पत्र प्रातिनिधीक उदाहरण ठरावं. पत्रलेखकाच्या दृष्टीने अध्यात्म काय असेल ते असो, त्यांनी भगवदगीतेची साक्ष काढून वैज्ञानिक ज्ञानाला ज्या पद्धतीने निकालात काढलं आहे ते मात्र खरंच विचार करायला लावण्यासारखं आहे.
नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.
आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल? पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका. थोडा वेळ चौर्‍यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्‍यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?
म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.
कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.
वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.
नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.
जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
57913 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

क्षुद्र पत्र आहे!

विद्युत् बालक
Fri, 10/18/2013 - 22:38 नवीन
क्षुद्र पत्र आहे!
नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा!
पण ओबामाला जर नोबेल मिळत असेल तेही शांतते साठी आणि वैश्विक ऐक्यासाठी तर हे अत्यंत हास्यास्पद आहे !!
  • Log in or register to post comments

पण ओबामाला जर नोबेल मिळत असेल

धन्या
Fri, 10/18/2013 - 23:54 नवीन
पण ओबामाला जर नोबेल मिळत असेल तेही शांतते साठी आणि वैश्विक ऐक्यासाठी तर हे अत्यंत हास्यास्पद आहे !!
इथे थोडासा प्रकाश टाकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्युत् बालक

जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर

बलि
Sat, 10/19/2013 - 00:46 नवीन
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित
खरा मोक्षं म्हणजे मी पणा , अहं भाव सोडणे . ते कोणी मोजावे ? आणि नोबेल चा आणि अध्यात्माचा काय संबंध ?
  • Log in or register to post comments

अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान.

अग्निकोल्हा
Sat, 10/19/2013 - 01:11 नवीन
अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.
असे कुठे म्हटलेले आहे याचा रेफरन्स हवा होता... तसेच, जर अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान आहे तर बाकि सगळे खोटे ज्ञान अथवा भ्रम ठरते तर मग या भ्रमाला संपुर्ण "अज्ञान" कसे म्हणावे ? हवे तर असमग्र ज्ञान म्हणता येइल, कारण अज्ञान म्हणजे मुळात ज्ञानाचे अस्तित्वच नसणे होय. अन ते कदापि शक्य नाही, कारण ज्ञानाचे अस्तित्व नसणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व नसणे होय.
  • Log in or register to post comments

उपहासात्मकता टोकाला नेली की

राजेश घासकडवी
Sat, 10/19/2013 - 01:53 नवीन
उपहासात्मकता टोकाला नेली की तो विरुद्ध बाजूचा खराखुरा युक्तिवादच वाटायला लागतो याचं हे पत्र म्हणजे उत्तम उदाहरण आहे. मला धन्या यांचा लेखही सुरूवातीला त्याच धाटणीतला वाटला होता. पण प्रतिसादांवरून त्यांना यनावालांचा उपहास कळला नाही की काय अशी शंका वाटायला लागली आहे.
  • Log in or register to post comments

अजून पुरते हुच्चभ्रू विचारवंत

प्यारे१
Sat, 10/19/2013 - 02:43 नवीन
अजून पुरते हुच्चभ्रू विचारवंत नाहीत झालेले धन्या शेठ! वेळ द्या त्याना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अस्मादिकांस हुच्चभ्रू

धन्या
Sat, 10/19/2013 - 15:07 नवीन
अस्मादिकांस हुच्चभ्रू होण्याचे काही एक प्रयोजन नाही. विचारांचा दांभिकपणा आम्ही कधीच करत नाही. मात्र हा टोकाचा उपहास असल्यामुळे तो अस्मादिकांस कळला नाही ही वस्तूस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

उपहासात्मकता टोकाला नेली की

प्रकाश घाटपांडे
Sat, 10/19/2013 - 08:51 नवीन
उपहासात्मकता टोकाला नेली की तो विरुद्ध बाजूचा खराखुरा युक्तिवादच वाटायला लागतो याचं हे पत्र म्हणजे उत्तम उदाहरण आहे.
अगदी हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

शाश्वत बदल !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/19/2013 - 10:39 नवीन
बदल हीच एकुलती एक शाश्वत गोष्ट या जगात आहे :) (Change is the only thing constant in this world.)
  • Log in or register to post comments

य. ना वालावलकरांशी सहमत

विटेकर
Sat, 10/19/2013 - 10:46 नवीन
हे खरेच की आत्म ज्ञानांशिवाय बाकी सारे अशाश्वतच, अगदी नोबेल विजेते ज्ञान असले तरिही ! ऐहिक ज्ञान फक्त भौतिक साधनांसाठीच उपयोगी आहे, चिरंतन सुखासाठी नाही , याच्याशी लै वेळा सहमत. हा ग्रंथप्रामाण्याचा विषय नसून आत्मप्रचितीचा आहे. साखरेची गोडी सांगून कळत नाही ती खावी लागते... बाकी चालू द्या ... समास पाचवा : बहुधाज्ञान निरूपण ||श्रीराम || जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ| तंव सर्व कांहीं निर्फळ |ज्ञानरहित तळमळ| जाणार नाहीं ||१|| ज्ञान म्हणतां वाटे भ्रम| काये रे बा असेल वर्म |म्हणौनि हा अनुक्रम| सांगिजेल आतां ||२|| भूत भविष्य वर्तमान| ठाऊकें आहे परिछिन्न |यासीहि म्हणिजेत ज्ञान| परी तें ज्ञान नव्हे ||३|| बहुत केलें विद्यापठण| संगीतशास्त्र रागज्ञान |वैदिक शास्त्र वेदाधेन| हेंहि ज्ञान नव्हे ||४|| नाना वेवसायाचें ज्ञान| नाना दिक्षेचें ज्ञान |नाना परीक्षेचें ज्ञान| हें ज्ञान नव्हे ||५|| नाना वनितांची परीक्षा| नाना मनुष्यांची परीक्षा |नाना नरांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||६|| नाना अश्वांची परीक्षा| नाना गजांची परीक्षा |नाना स्वापदांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||७|| नाना पशूंची परीक्षा| नाना पक्षांची परीक्षा |नाना भूतांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||८|| नाना यानांची परीक्षा| नाना वस्त्रांची परीक्षा |नाना शस्त्रांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||९|| नाना धातूंची परीक्षा| नाना नाण्यांची परीक्षा |नाना रत्नांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१०|| नाना पाषाण परीक्षा| नाना काष्ठांची परीक्षा |नाना वाद्यांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||११|| नाना भूमींची परीक्षा| नाना जळांची परीक्षा |नाना सतेज परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१२|| नाना रसांची परीक्षा| नाना बीजांची परीक्षा |नाना अंकुर परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१३|| नाना पुष्पांची परीक्षा| नाना फळांची परीक्षा |नाना वल्लींची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१४|| नाना दुःखांची परीक्षा| नाना रोगांची परीक्षा |नाना चिन्हांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१५|| नाना मंत्रांची परीक्षा| नाना यंत्रांची परीक्षा |नाना मूर्तींची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१६|| नाना क्षत्रांची परीक्षा| नाना गृहांची परीक्षा |नाना पात्रांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१७|| नाना होणार परीक्षा| नाना समयांची परीक्षा |नाना तर्कांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१८|| नाना अनुमान परीक्षा| नाना नेमस्त परीक्षा |नाना प्रकार परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||१९|| नाना विद्येची परीक्षा| नाना कळेची परीक्षा |नाना चातुर्य परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२०|| नाना शब्दांची परीक्षा| नाना अर्थांची परीक्षा |नाना भाषांची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२१|| नाना स्वरांची परीक्षा| नाना वर्णांची परीक्षा |नाना लेक्षनपरीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२२|| नाना मतांची परीक्षा| नाना ज्ञानांची परीक्षा |नाना वृत्तींची परीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२३|| नाना रूपांची परीक्षा| नाना रसनेची परीक्षा |नाना सुगंधपरीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२४|| नाना सृष्टींची परीक्षा| नाना विस्तारपरीक्षा |नाना पदार्थपरीक्षा| हें ज्ञान नव्हे ||२५|| नेमकेचि बोलणें| तत्काळचि प्रतिवचन देणें |सीघ्रचि कवित्व करणें| हें ज्ञान नव्हे ||२६|| नेत्रपालवी नादकळा| करपालवी भेदकळा |स्वरपालवी संकेतकळा| हें ज्ञान नव्हे ||२७|| काव्यकुशळ संगीतकळा| गीत प्रबंद नृत्यकळा |सभाच्यातुर्य शब्दकळा| हें ज्ञान नव्हे ||२८|| वाग्विलास मोहनकळा| रम्य रसाळ गायनकळा |हास्य विनोद कामकळा| हें ज्ञान नव्हे ||२९|| नाना लाघवें चित्रकळा| नाना वाद्यें संगीतकळा |नाना प्रकारें विचित्र कळा| हें ज्ञान नव्हे ||३०|| आदिकरूनि चौसष्टि कळा| याहि वेगळ्या नाना कळा|चौदा विद्या सिद्धि सकळा| हें ज्ञान नव्हे ||३१|| असो सकळ कळाप्रवीण| विद्यामात्र परिपूर्ण |तरी ते कौशल्यता, परी ज्ञान- | म्हणोंचि नये ||३२|| हें ज्ञान होयेसें भासे| परंतु मुख्य ज्ञान तें अनारिसें |जेथें प्रकृतीचें पिसें| समूळ वाव ||३३|| जाणावें दुस-याचें जीवीचें| हे ज्ञान वाटे साचें |परंतु हें आत्मज्ञानाचें| लक्षण नव्हे ||३४|| माहानुभाव माहाभला| मानसपूजा करितां चुकला |कोणी येकें पाचारिला| ऐसें नव्हे म्हणोनी ||३५|| ऐसी जाणे अंतरस्थिती| तयासि परम ज्ञाता म्हणती |परंतु जेणें मोक्षप्राप्ती| तें हें ज्ञान नव्हे ||३६|| बहुत प्रकारींची ज्ञानें| सांगों जातां असाधारणें |सायोज्यप्राप्ती होये जेणें| तें ज्ञान वेगळें ||३७|| तरी तें कैसें आहे ज्ञान| समाधानाचें लक्षण |ऐसें हें विशद करून| मज निरोपावें ||३८|| ऐसें शुद्ध ज्ञान पुसिलें| तें पुढिले समासीं निरोपिलें |श्रोतां अवधान दिधलें| पाहिजे पुढें ||३९|| इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बहुधाज्ञाननाम समास पंचवा ||५||५. ५
  • Log in or register to post comments

सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे

ग्रेटथिन्कर
Sat, 10/19/2013 - 11:11 नवीन
सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण । वेदविरहित तें अप्रमाण । अप्रिये भगवंता ॥ १०॥ ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें । ब्राह्मणीं सकळ तीर्थाटणें । कर्ममार्ग ब्राह्मणाविणें । होणार नाहीं ॥ ११॥ ब्राह्मण वेद मूर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत । पूर्ण होती मनोरथ । विप्रवाक्येंकरूनी ॥ १२॥ ब्राह्मणपूजनें शुद्ध वृत्ती- । होऊन, जडे भगवंतीं । ब्राह्मणतीर्थे उत्तम गती । पावती प्राणी ॥ १३॥ लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण । आन यातिसि पुसे कोण । परी भगवंतासि भाव प्रमाण । येरा चाड नाहीं ॥ १४॥ असो ब्राह्मणा सुरवर वंदिती । तेथें मानव बापुडें किती । जरी ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य ॥ १५॥ याला काय म्हणायचे पोथीवाद अध्यात्मवाद कि आणखि काही?मूढमती जगदवंद्य कसा?? इटेकरशास्त्री उत्तर द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

आणि

प्रसाद गोडबोले
Sat, 10/19/2013 - 12:04 नवीन
शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप ।भूमंडळी ।।१।। शिवरायांचे कैसें बोलणें ।शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे । कैसी असे ।।२।। सकल सुखांचा केला त्याग ।म्हणोनि साधिजें तो योग । राज्यसाधनाची लगबग ।कैसीं केली ।।३।। याहुनी करावें विशेष ।तरीच म्हणवावें पुरुष । या उपरीं आता विशेष ।काय लिहावे ।।४।। शिवरायांसी आठवावें ।जीवित तृणवत् मानावें । इहलोकी परलोकीं उरावे ।कीर्तीरूपें ।।५।। निश्चयाचा महामेरू ।बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु ।श्रीमंत योगी ।।६।। >>> याला काय म्हणायचे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

@ गिरीजा....

मुक्त विहारि
Sat, 10/19/2013 - 12:23 नवीन
इ स ३००० "हे असे लिहिणारे वेगळे आणि ते तसे लिहीणारे वेगळे" असा पण शोध लागेल. त्यावेळी सावरकरांना पोहता येत न्हवते.राजांना लिहीता येत न्हवते म्हणून त्यांनी त्यावेळी ज्यांना लिहीता-वाचता येत होते, त्यांनाच कामावर ठेवले.त्या लोकांना संगनमत केले आणि परमदयाळू औरंगजेब आणि राजे ह्यांच्यात बेबनाव घडवून आणला.इ.इ. मुद्दाम केलेले गहन विचार = नविन शोध आणि नविन समाज हाताला घड्याळ कशाला? प्रार्थनेची वेळ लक्षात ठेवायला.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

याला काय म्हणायचे पोथीवाद

धन्या
Sat, 10/19/2013 - 15:28 नवीन
याला काय म्हणायचे पोथीवाद अध्यात्मवाद कि आणखि काही?मूढमती जगदवंद्य कसा?? इटेकरशास्त्री उत्तर द्या..
तुमच्या या प्रश्नाचे उत्तर दयायला कोणी धजावणार नाही. जे प्रश्न उत्तर दयायला अडचणीचे वाटतात त्यांची उत्तरे देणे टाळले जाते. ज्ञानदेव, एकनाथ, समर्थ, तुकाराम ही सारी तुमच्या-आमच्यासारखी माणसेच होती. काही बाबतीत ते सर्वसामान्यांच्या चार पावले पुढे होते. पण म्हणून काही ते सर्वज्ञ नव्हते. त्यांच्या अशा स्वतःच्या धारणा होत्या ज्या आता कालविसंगत असल्या तरी ज्या काळात हे थोर पुरुष होऊन गेले त्या काळचा तो "धर्म" होता. त्यामुळे त्या वेळच्या रुढी परंपरांचा या सार्‍या संतांवर पगडा असणे साहजिक होते. त्यासाठी त्यांना दोष देता येणार नाही. उदा. आज स्त्री पुरुष समानतेचे युग आहे. पण एकनाथ भागवतात काय म्हणतात स्त्रीबद्दल?
नको स्त्रियांशी बोलणे | नको स्त्रियांसि भेटणे | स्त्री देखतांचि पळणे | उठाउठी ||
किंवा ही तुकारामांची ओळ पाहा:
स्त्रियांचा तो संग नको नारायणा | काष्ठ या पाषाणा मृत्तिकेच्या ||
यात एकनाथ किंवा तुकारामांना व्यक्तीशः दोष देण्यासारखे काहीच नाही. त्यांच्या काळात अध्यात्माच्या क्षेत्रातील सार्‍याच व्यक्तींची अशीच धारणा होती. इथे ज्ञानदेवांची हरीपाठातील ओळ लिहाविशी वाटते,
मंथूनी नवनीता तैसे घे अनंता | वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू ||
तुकाराम, एकनाथ किंवा ज्ञानदेवांनी जे काही लिहून ठेवलं आहे ते त्यांच्या काळानुरुप असेल. त्यातलं सारंच्या सारं तसंच्या तसं आचरणात आणता येणार नाही. त्यासाठी आपली अक्कल वापरुन त्यांचं काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे ठरवावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

धन्याशेठ वर लिहीलेला प्रतिसाद

प्यारे१
Sat, 10/19/2013 - 15:52 नवीन
धन्याशेठ वर लिहीलेला प्रतिसाद पटलेला आहे. उत्तर द्यायला धजावण्या न धजावण्यापेक्षा त्या उत्तर देण्याचा उपयोग कुणाला कसा किती होतोय ह्याचा विचार व्हायला पाहिजे. तत्कालिन सामाजिक परिस्थिती काय होती समर्थांच्या काळात? जातींच्या उतरंडी आजदेखील जशाच्या तशा आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. खुद्द शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करुन घ्यावा लागला. अशा परिस्थितीमध्ये जुन्या रुढी फेकून नव्या रुजवण्यासाठी ट्रान्झिशन/ ओव्हरलॅप लागतो तो सुद्धा विचारात घेतला पाहिजे. एकनाथांनी श्राद्धावेळी १००० महार जोडपी जेवायला घातली, गंगेचं पाणी गाढवाला प्यायला दिलं, रामदासांच्या शिष्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या स्त्रीपुरुषांचा समावेश होता, तुकाराम महाराजांनी घरी चालून आलेली स्त्री नि संपत्ती नाकारली ह्या सगळ्या गोष्टींचा विसर सोयिस्कर पडतो. चांगलंय. समर्थांचंच वचन आहे येर महार चांभार त्यांचे राखावे अंतर (राखावे म्हणजे जपावे आणि अंतर म्हणजे त्यांचे मन नाहीतर इथे पण कीप सेफ डिस्टन्स म्हणाल) आजही गावामध्ये त्या त्या समाजाच्या वस्त्या त्या त्या नावाने उल्लेखिल्या जातात. ४०० वर्षांपूर्वी संतमंडळी बाहेरुन तसं म्हणत असली तरी त्यांची मनःस्थिती काय होती ह्याचा विचार करावा. ह्याच दासबोधात म्हटल्याप्रमाणे 'समूळ ग्रंथ पाहिल्यावीण उगाच ठेवी जो दूषण.... तो एक मूर्ख' असंही म्हटलेलं आहे. आपण असंच करत नाही आहोत का? बाकी ज्यांना फक्त फोलकटांमध्येच रस आहे त्यांनी तीच चिवडत बसावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हे पत्र लिहुन पत्र लेखकाने

मृत्युन्जय
Sat, 10/19/2013 - 10:54 नवीन
हे पत्र लिहुन पत्र लेखकाने स्वत:चे हसे करुन घेतले आहे बाकी काही नाही. जर हे गंभीरपणे लिहिलेले असेल तर हा तद्दल मुर्खपणा आहे. आणि जर हे उपहासात्म लिहिले असेल तर मुर्खपणाचा कळस आहे. १. उपहासात्मक लिहिताना किमान तुम्ही तसे लिहित आहात हे वाचकांना समजणे अपेक्षित आहे. २. उपहास करण्यामागे एक विवक्षित भूमिका असणे अपेक्षित आहे. वर्तमानपत्रात उगा काही आगापिछा नसताना आणि काही प्रयोजन नसताना असले लेख लिहिणे हे रिकामटेकडेपणाचे उत्तम लक्षण आहे. ३. लेखाचे प्रयोजन नक्की कळत नाही. आस्तिकांच्या आस्तिकतेवर काही करुन आसूड ओढायचा हा एकमेव उद्देश असेल तर हरकत नाही. एरवी गीतेचे दाखले देउन नोबेल पारितोषिक विजेत्यांचा उपमर्द , उपहास किंवा निंदा करणारा अजुन मला भेटलेला नाही. जो भेटेले तो एक महामुर्खच असेल. ४. गीतेत काय लिहिले आहे याचा विपर्यास करण्यापेक्षा अजुन काही भरीव कामगिरी केल्यास नक्कीच बरे होइल. ५. अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करायचा प्रयत्न जरुर करावा परंतु श्रद्धा, अध्यात्म आणि अविचारी अंधश्रद्धा यामधील सीमारेखेचे भान न ठेवता सरसकटीकरण करुन अर्धवट उपहास करायला गेल्यास हे असले पत्ररुपी अपत्य जन्माला येते. विज्ञान आणि वैज्ञानिकांच्या कार्याचा आदर नक्कीच आहे. आणि प्रत्येक माणसाने मानवजातीच्या कल्याणासाठी पूरक असे वैज्ञानिक संशोधन आणि अभ्यास नक्कीच करावे. जमत नसेल तर त्या कार्याचे मोल जाणून त्याला सहाय्य करण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्या कार्याचा आदर करण्यासाठी जे काय करता येइल ते सर्व करावे. हाच संदेश या उपहासातुन द्यायचा असेल तर तो स्तुत्य आहे पण त्यासाठी हा उपहास आणि गीतेचे अनावश्यक आणि अस्थायी दाखले देण्याची आणि त्याची टर उपडवण्याची काहिच गरज नव्हती. गीतेच्या प्रस्तुत श्लोकांचा पत्रलेखकाने लावलेला अर्थ घेउन मुक्ताफळे उधळणारा महात्मा माझ्या पाहण्यात नाही. तसा तो पत्रलेखकाच्या पाहण्यात असेल तर एवढे सग्ळे लिहिल्याबद्दल मी त्यांची बिनशर्त माफी मागतो.
  • Log in or register to post comments

नोबेल

ज्ञानव
Sat, 10/19/2013 - 11:26 नवीन
गेल्या १०५ वर्षात सर्वात जास्त नोबेल्स ज्यू लोकांना मिळाली आहेत.(१५ डझन नोबेल्स १४ मिलीओन ज्यू लोकांपैकी). अमेरिकन्सना नाही. बाकी अध्यात्म,शाश्वत नश्वर वगैरे बाबत अस्मादिकांचे अज्ञान शाश्वत आहे. अमेरिकन्स ठरवणार कोण नोबेल ते.....हेच विनोदी नाही का ?
  • Log in or register to post comments

एकाच फ्यामिलीत सहा

चौकटराजा
Wed, 10/23/2013 - 09:49 नवीन
एकाच फ्यामिलीत सहा नोबेल मिळालेली फ्यामैली कंची ? मादाम मेरी क्यूरी ची !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

याला काय म्हणायचे ते सांगतो

ग्रेटथिन्कर
Sat, 10/19/2013 - 12:49 नवीन
याला काय म्हणायचे ते सांगतो , आधी ते वरचे श्लोक कशासाठी लिहलेत ते सांगा! ||वेद विरहीत ते अप्रमाण || असे समर्थ सांगतात, याचा अर्थ काय! विज्ञान अप्रमाण????....मग प्रमाण काय ..लक्षभोजणावळ्या कि मूढमती विप्र?
  • Log in or register to post comments

मग प्रमाण काय ?

मुक्त विहारि
Sat, 10/19/2013 - 13:19 नवीन
अरेच्चा!!! तुम्ही अद्याप ते "चुर्ण" घेतले नाहीत का? आणि ट्रोल म्हणजे काय? इ. जुने प्रश्न आहेतच...आधी ती उत्तरे दीलीत तर बरे बाकी तुम्ही स्मायल्यांची साथ सोडलीत ते बरे झाले... त्याचे काय आहे, स्मायल्यांची गरज तुम्हाला नाही... निदान हे तरी तुम्हाला पटले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

एकालाही प्रतिवाद करता येत

ग्रेटथिन्कर
Sat, 10/19/2013 - 13:25 नवीन
एकालाही प्रतिवाद करता येत नाही, फक्त घूमजाव. बरं, ते समर्थांनी मूढमतीला जगतवंद्य मानावे असे का सांगितले असावे बरे.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

काय बोलणार?

मुक्त विहारि
Sat, 10/19/2013 - 13:38 नवीन
जरा खालील कविता वाचलीत तर बरे... http://www.misalpav.com/node/25870 बाकी नेहमी प्रमाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

तूमीपण हे वाचा फायदा होईल

ग्रेटथिन्कर
Sat, 10/19/2013 - 14:02 नवीन
तूमीपण हे वाचा फायदा होईल
  • Log in or register to post comments

बरं ते मूढमतीला जगतवंद्य का

ग्रेटथिन्कर
Sat, 10/19/2013 - 14:04 नवीन
बरं ते मूढमतीला जगतवंद्य का मानायचे? आणि वेदाबाहेरचे अप्रमाणित ..असे समर्थ का बरे म्हणाले?
  • Log in or register to post comments

लेखाचा विषय 'शाश्वत ज्ञान',

सोत्रि
Sat, 10/19/2013 - 15:24 नवीन
लेखाचा विषय 'शाश्वत ज्ञान', लेखक धन्या आणि प्रतिसाद संख्या ६९ म्हणून उत्सुकतेने धागा उघ्डला तर काय... 'संक्षीं'चा एकही प्रतिसाद नाही! हे बघून सगळा उत्साह मावळला. - (हताश झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

इतके हताश नका होवू....

मुक्त विहारि
Sat, 10/19/2013 - 16:35 नवीन
आज शनिवार की रात है मँगोला घर में है व्होडका तय्यार है एक एक जाम हो जाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

@ (हताश झालेला) सोकाजी>>>

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/19/2013 - 17:48 नवीन
@ (हताश झालेला) सोकाजी>>> :-D मला कंसा'तल्या शब्दांचा अर्थ 'हतोत्साह' असा का ऐकु येत आहे? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

असे काही वेगळे ऐकू यायला लागले की,,,,

मुक्त विहारि
Sat, 10/19/2013 - 20:33 नवीन
सोत्रींकडे जा. त्यांच्या बरोबर औषध घ्या आणि डुलत डूलत घरी या.... (तुम्ही औषध घेत नाही हे माहीत आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@त्यांच्या बरोबर औषध घ्या आणि

अत्रुप्त आत्मा
Sun, 10/20/2013 - 00:38 नवीन
@त्यांच्या बरोबर औषध घ्या आणि डुलत डूलत घरी या....>>> :-D ह.....त! .... उत्साह घालवलात माझा! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

टीआरपी

धर्मराजमुटके
Mon, 10/21/2013 - 23:29 नवीन
धाग्याचा टीआरपी वाढविण्यासाठी तुम्ही सुपारी / विडा घेतलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

'संक्षीं'चा एकही प्रतिसाद नाही!

संजय क्षीरसागर
Sun, 10/20/2013 - 12:28 नवीन
सोत्रि, एकतर खुद्द यनावालांना शाश्वत ज्ञान म्हणजे काय ते माहिती नाही. ते फक्त लॉजिकप्रविण आहेत. त्यात ते स्वतः गैरहजर. दुसरी गोष्ट, हे पत्र त्यांनी विज्ञान विरूद्ध अध्यात्म या नेहेमीच्या हिट विषयावर लिहीलंय. मूळात विज्ञान आणि अध्यात्मात वादच नाही. शास्त्रज्ञ शोध लावून मानवतेवर उपकार करत आले आहेत आणि सिद्ध `स्व'चा उलगडा करण्याचा मार्ग सांगतात. थोडक्यात, शास्त्रज्ञ प्रकट जगाचं नंदनवन करण्याचा प्रयत्न करतात आणि सिद्ध त्या नंदनवनात सुखानं कसं जगावं ते सांगतात. यनावालांनी निर्माण केलेला `शाश्वत ज्ञान विरुद्ध अज्ञान' हा बखेडा
"अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे"
केवळ त्यांचं अध्यात्मिक अज्ञान दर्शवतो. आता इथे सदस्यांनी शाश्वत ज्ञान आणि मोक्ष याच्या ज्या बहुविध छटा दाखवल्या आहेत त्याबद्दल मी काही लिहीलं तर `स्वतःला शहाणा समजणे, अहंकार, विचार लादणे इतकंच काय तर नार्सिसिझम, मानसोपचारांची गरज' वगैरे नेहेमीचा खेळ सुरु होईल. मला त्या गोष्टींनी फरक पडत नाही पण ज्या विषयावर मी स्वतंत्र लेख लिहू शकतो तिथे गैरहजर सदस्याच्या लेखावर दंगा करणं अनुचित आहे. तस्मात प्रतिसाद दिला नाही.
  • Log in or register to post comments

गीतेतील श्लोक

यनावाला
Sun, 10/20/2013 - 21:40 नवीन
श्री.धन्या यांनी म.टा.पुणे.तील एक पत्र उद्धृत केले आहे.पण त्यातील श्लोक त्यांनी दिला आहे. तो गीतेत आहे असे पत्रात म्हटले आहे.पण अध्याय आणि श्लोक यांचे क्रमांक, तसेच श्लोकाचे अन्वयार्थ मूळ पत्रात दिलेले नाहीत या त्या पत्रातील त्रुटी आहेत.तो श्लोक आणि माझ्या समजुतीप्रमाणे अन्वयार्थ असे: ...... अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनं । एतत् ज्ञानमिति प्रोक्तं अज्ञानं यदतोSन्यथा॥ (अ.१३. श्लो.११) ..... अन्वयार्थ: अध्यात्मज्ञान(स्य) नित्यत्वम्.....अध्यात्मज्ञानाची शाश्वतता (जाणणे), तत्त्वज्ञानस्य दर्शनम्...........तत्त्वज्ञानाचे (सम्यक)यथार्थ आकलन होणे, एतत् ज्ञानं (अस्ति) इति प्रोक्तम्....हेच ज्ञान होय असे म्हटले आहे. यत् अत: अन्यथा (स्यात्)......जे याहून वेगळे असेल , तत् अज्ञानं ।.......ते अज्ञान (होय).
  • Log in or register to post comments

ते पत्र मी इथे जसंच्या तसं

धन्या
Sun, 10/20/2013 - 22:29 नवीन
ते पत्र मी इथे जसंच्या तसं इटालिक अक्षरांमध्ये दिलं आहे. फक्त पत्रामध्ये उद्धृत केलेला श्लोक टंकताना मी "तदतो" हा शब्द "त्दतो" असा चुकीचा टंकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला

अगदी बरोबर!!! या गोष्टी

बॅटमॅन
Sun, 10/20/2013 - 23:23 नवीन
अगदी बरोबर!!! या गोष्टी गीताकारांच्या मते अज्ञान आहेत. बर मग???????? गीताकार काही म्हणोत, काय कसं ते आपलं आपल्याला माहितीये, आपला आपण निर्णय घ्यावा , हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला

तो श्लोक आणि माझ्या समजुतीप्रमाणे अन्वयार्थ...

संजय क्षीरसागर
Mon, 10/21/2013 - 01:01 नवीन
अध्यात्मज्ञानाची शाश्वतता (जाणणे), तत्त्वज्ञानाचे (सम्यक)यथार्थ आकलन होणे, हेच ज्ञान होय. जे याहून वेगळे असेल ते अज्ञान (होय). `अज्ञाना'चा अध्यात्मिक अर्थ असा की `ते तुम्हाला तुमच्या स्वरुपाचा उलगडा करु शकत नाही' आणि तुम्ही हा अर्थ काढलायं -
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा!
जो संपूर्ण विपर्यस्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला

+११११. अगदी अगदी.

प्यारे१
Mon, 10/21/2013 - 01:04 नवीन
+११११. अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पूर्ण सहमत. (चक्क)

बॅटमॅन
Mon, 10/21/2013 - 11:29 नवीन
पूर्ण सहमत. (चक्क)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तीन शब्द आहेत आणि त्यांच्या अध्यात्मिक अर्थ छटा भिन्न आहेत

संजय क्षीरसागर
Mon, 10/21/2013 - 11:21 नवीन
ज्ञान : `स्व'चा उलगडा अज्ञान : `स्व'चं विस्मरण किंवा `स्व'च्या ज्ञानाप्रत नेऊ शकत नाही असं ज्ञान विज्ञान : (कोणत्याही विषयाचं) विषेश ज्ञान उदा. मेडिकल सायन्स, फिजिक्स, कंप्युटर सायन्स... विज्ञान मानवतेला उपकारक आहे. अध्यात्मिक अर्थानं त्यानं स्वचा उलगडा होऊ शकत नसला तरी ते व्यर्थ निश्चित नाही (यनावलांनी अज्ञानचा तसा अर्थ काढला आहे आणि पत्र लिहीलं आहे). थोडक्यात, अध्यात्म विज्ञानविरोधी नाही. ते स्वविस्मरणाचं भान देतं. गीतेतल्या श्लोकाच्या `अज्ञानाचा' तो अर्थ आहे. अध्यात्म नोबेल विनर्सचा उपहास करत नाही. (ते यनावलांचं अज्ञान आहे! :-) ) तस्मात, `विज्ञान विरूद्ध अध्यात्म' असा बखेडा या संकेतस्थळावर पुन्हा होऊ नये.
  • Log in or register to post comments

+११११

अनिरुद्ध प
Mon, 10/21/2013 - 12:49 नवीन
+११११ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

`स्व'चा उलगडा

बाळ सप्रे
Mon, 10/21/2013 - 14:06 नवीन
`स्व'चा उलगडा
याला ज्ञान, परमज्ञान काहिही म्हणा.. पण बाकीचे सगळे ज्यात स्व चा उलगडा नाही त्याला अज्ञान का म्हणावे?? विज्ञान तिसरी कॅटॅगरी करुन तुम्ही सोयीस्कररीत्या पळवाट काढलेली आहे :-) एखाद्याला विशेष ज्ञान असेल (कुठल्याही क्षेत्रातील) पण अध्यात्मिकदृष्ट्या त्या व्यक्तिला "स्व" चा उलगडा झाला नसेल तर ते ज्ञान की अज्ञान? हे तुमचं विवेचन म्हणजे गीतेतल्या श्लोकाला बरोबर ठरवण्यासाठी केलेली सारवासारव वाटली.. एका अर्थाने हेही ग्रंथप्रामाण्यच की!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमच्या युक्तीवाद अयोग्य आहे

संजय क्षीरसागर
Mon, 10/21/2013 - 15:18 नवीन
१)
विज्ञान तिसरी कॅटॅगरी करुन तुम्ही सोयीस्कररीत्या पळवाट काढलेली आहे
नाही. विज्ञान ही अध्यात्मिकदृष्ट्या ज्ञानाचीच वेगळी शाखा आहे. विज्ञान प्रकट जगाशी संबंधित आहे तर (अध्यात्मिक) ज्ञान अप्रकट जगाशी. उदा. संगीतशास्त्र `ध्वनी' या शांततेच्या प्रकटरुपाशी संबंधित आहे तर अध्यात्म शांतता या अस्तित्वाच्या अनिर्मित स्थितीशी संबंधित आहे. २)
याला ज्ञान, परमज्ञान काहिही म्हणा.. पण बाकीचे सगळे ज्यात स्व चा उलगडा नाही त्याला अज्ञान का म्हणावे? एखाद्याला विशेष ज्ञान असेल (कुठल्याही क्षेत्रातील) पण अध्यात्मिकदृष्ट्या त्या व्यक्तिला "स्व" चा उलगडा झाला नसेल तर ते ज्ञान की अज्ञान?
विषेश ज्ञान त्याला जगणं सोयीचं करेल पण स्व गवसलेला नसल्यानं तो सर्वस्वी निश्चिंतपणे जगू शकणार नाही. इथे तुम्ही म्हणता तशी `ज्ञान आणि अज्ञान' अशी तफवात नाही. ३)
हे तुमचं विवेचन म्हणजे गीतेतल्या श्लोकाला बरोबर ठरवण्यासाठी केलेली सारवासारव वाटली.. एका अर्थाने हेही ग्रंथप्रामाण्यच की!!
गीता हा अध्यात्मावरचा एकमेव ग्रंथ नाही. माझा आक्षेप "विज्ञान श्रेष्ठ आणि अध्यात्म फोल" या यनावालांच्या (रिवर्स) लॉजिकला आहे. आणि मला विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीही उपयोगी आहेत असं म्हणायचंय. पेशीविज्ञान शरीराला उपकारक आहे कारण देह आहे तोपर्यंत देहाची काळजी घ्यावीच लागणार आणि अध्यात्म श्रेष्ठ आहे कारण ते तुम्हाला तुमच्या विदेहत्त्वाचा उलगडा घडवतं. याचा अर्थ विदेहत्त्वाचा उलगडा झालेला डॉक्टरकडे जाणार नाही असा नाही. आणि एखाद्याला शरीरशास्त्राच्या संपूर्ण ज्ञानाबद्दल नोबेल मिळालं तरी त्याला स्वतःचं विदेहत्त्व समजेललं असेल असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

यनावालांचं रीव्हर्स लॉजिक

बाळ सप्रे
Mon, 10/21/2013 - 15:44 नवीन
यनावालांचं रीव्हर्स लॉजिक बाजूला राहु द्या.. ज्यात "स्व" उलगडत नाही ते अज्ञान याला माझा आक्षेप आहे.. तुमच्या पूर्वीच्या प्रतिसादाप्रमाणे.. तुमच्या आत्ताच्या प्रतिवादाप्रमाणे प्रकट जगातील कशालाही ज्ञान कींवा अज्ञान म्हणणे अ‍ॅप्लिकेबलच नाही.. हा दावा म्हणजे ज्ञान आणि अज्ञान यांच्या रुढ अर्थांना काहीच अर्थ नाही असे म्हणणे होते.. यालाच मी पळवाट म्हटले आहे.... साधं उदाहरण द्यायचं झाल्यास रुढार्थानं नाग विषारी असतो हे माहीत असणं म्हणजे ज्ञान . आणि नाग विषारी की बिनविषारी हे माहित नसणं म्हणजे त्याविषयीचं अज्ञान .. तुमच्या आत्ताच्या म्हणण्याप्रमाणे नाग प्रकट जगाशी संबंधित असल्यामुळे नाग विषारी असतो हे माहीत असणं म्हणजे ज्ञान नव्हे.. किंवा माहित नसणं हे अज्ञान नव्हे.. हा युक्तिवाद नुसता अयोग्यच नव्हे तर हास्यास्पददेखिल आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

साहेब थोडंस्सं मी सांगू?

प्यारे१
Mon, 10/21/2013 - 17:21 नवीन
साहेब थोडंस्सं मी सांगू? मला एखाद्या गोष्टीबाबत ज्ञान (माहिती, माहिती कशी वापरायची ते) आहे अथवा नाही हे ज्यामुळे-ज्याच्या बेसवर-अधिष्ठानावर- सत्तेवर (जे असल्यानंतरच) कळतं ते ज्ञान. ही अध्यात्मातली व्याख्या आहे. ह्यालाच शुद्ध ज्ञान म्हणतात. कुणामुळं अथवा कशामुळं तरी झालेलं ते वृत्ती ज्ञान. ज्याबद्दल आपण बोलत आहात. काहीही अगदी स्वतःचं शरीर पण दिसत नसताना काळ्याकुट्ट अंधारात उभे राहिलात तर कदाचित मी काय म्हणतोय ते समजेल. :) ही अस्तित्वाची जाणीव म्हणजे ज्ञान. नि ते आत चैतन्य असल्यावर त्याच्या सत्तेवर 'कळतं' कोमातल्या माणसाला समजलं नाही तरी ते 'असतं'. आणखी थोडा विचार केला तर ते कॉमन फॅक्टर म्हणून सगळीकडेच असतं फक्त अभिव्यक्त नसतं. :) ते ओळखलं तर सगळं ओळखलं असं भगवान म्हणत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

+१११११

अनिरुद्ध प
Mon, 10/21/2013 - 17:29 नवीन
+१११११ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ज्ञान ते ज्ञान.. त्याच्या आत

बाळ सप्रे
Mon, 10/21/2013 - 17:32 नवीन
ज्ञान ते ज्ञान.. त्याच्या आत जाउन ते शुद्ध की वृत्ती ते महत्वाचं नहिये.. एखाद ज्ञान की अज्ञान असा प्रश्न आहे.. गीतेच्या त्या श्लोकाप्रमाणे ते अज्ञान ठरतय.. जे मला पटत नाहिये.. संक्षी त्याला प्रकट जगातलं असेल तर "नॉट अ‍ॅप्लिकेबल" असं उत्तर देतायत.. जे ज्ञानाच्या/ अज्ञानाच्या रुढ अर्थाने अयोग्य उत्तर आहे.. तुम्हीही शुद्ध ज्ञान / वृत्ती ज्ञान वगैरे पद्धतीने सरळ उत्तर ने देता फाटे फोडताय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

_/\_

प्रसाद गोडबोले
Mon, 10/21/2013 - 17:39 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ज्ञान आणि अज्ञान यांच्या रुढ अर्थांना काहीच अर्थ नाही: करेक्ट!

संजय क्षीरसागर
Mon, 10/21/2013 - 20:24 नवीन
कारण विषय गीतेतल्या श्लोकाशी संबंधित आहे याचं भान ठेवाल तर उलगडा होईल.
तुमच्या आत्ताच्या म्हणण्याप्रमाणे नाग प्रकट जगाशी संबंधित असल्यामुळे नाग विषारी असतो हे माहीत असणं म्हणजे ज्ञान नव्हे.. किंवा माहित नसणं हे अज्ञान नव्हे..
नागाचं विषारी असणं माहिती असणं किंवा नसणं तुम्हाला स्वतःप्रत आणत नाही हा मुद्दा आहे. नाग विषारी आहे हे कळणं प्रकट जगात उपयुक्त आहे यात वाद तो काय? ते स्वचा उलगडा झालेल्या किंवा न झालेल्या दोघांनाही उपयोगी आहे. पण अध्यात्मिक दृष्ट्या (म्हणजे गीतेतल्या श्लोकाच्या संदर्भात) ते स्वचा उलगडा होण्यासाठी निरुपयोगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

नागाचं विषारी असणं माहिती

धन्या
Mon, 10/21/2013 - 20:29 नवीन
नागाचं विषारी असणं माहिती असणं किंवा नसणं तुम्हाला स्वतःप्रत आणत नाही हा मुद्दा आहे.
नागाचं विषारी असणं माहिती असणं किंवा नसणं तुम्हाला स्वतःप्रत आणत नसलं तरी जगापासून कायमचं दूर नेऊ शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जगापासून कायमचं दूर नेऊ शकतं?

संजय क्षीरसागर
Mon, 10/21/2013 - 23:28 नवीन
तुम्हाला एकतर अध्यात्म काय आहे हे अजून कळलेलं नाही. उगीच माझ्या प्रतिसादावर बालिश प्रतिसाद देण्यापुढे तुमची मजल नाही (तुमचा वरचा प्रतिसाद पाहा). तुमचं लेखन तुम्हाला स्वतःला सपोर्ट करता येत नाही याची पूर्ण जाणीव ठेऊन लिहीत चला. जे तुम्ही स्वतःपासून वेगळे होऊ शकत नाही याचा बोध घडवतं ते शाश्वत ज्ञान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तुम्हाला एकतर अध्यात्म काय

धन्या
Mon, 10/21/2013 - 23:49 नवीन
तुम्हाला एकतर अध्यात्म काय आहे हे अजून कळलेलं नाही.
असं तुम्हाला वाटतं. वस्तूस्थिती वेगळी असू शकते.
उगीच माझ्या प्रतिसादावर बालिश प्रतिसाद देण्यापुढे तुमची मजल नाही (तुमचा वरचा प्रतिसाद पाहा)
तुमच्याकडे विनोदबुद्धी नाही.
तुमचं लेखन तुम्हाला स्वतःला सपोर्ट करता येत नाही याची पूर्ण जाणीव ठेऊन लिहीत चला.
माझ्या लेखनातल्या चुका कुणी दाखवून दिल्या तर मी त्या मान्य करतो. तुमच्यासारखं "गीरे तो भी टांग उपर" असं म्हणत स्वतःचंच घोडं पुढे दामटत नाही.
जे तुम्ही स्वतःपासून वेगळे होऊ शकत नाही याचा बोध घडवतं ते शाश्वत ज्ञान.
व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर असलेलं परंतू काहीही अर्थ नसलेलं वाक्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा