मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका गाजलेल्या पुस्तकाचे परिक्षण

दशानन · · जनातलं, मनातलं
आज प्रदर्शनात दुपारी थोडावेळ मिळाला म्हणून एक पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतले. प्रथमदर्शनी पुस्तकाचे निर्माण कसे करु नये? याचे उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक नक्कीच खपून जाईल, त्यामुळेच तर याला उत्कृष्ट वाडमयीन त्यावर्षी मिळाला होता. कव्हर ३०० जीएसम च्या जागी ३०५ आणि आतील पाने ५८ जीएसम च्या जागी ६० वापरली असती तर अजून हे पुस्तक चांगले घडू शकले असते, मॅथलीतो च्या जागी नॅचरल असता तर जगात भारी पुस्तक निर्माण झाले असते. पुस्तकाचे वजन अंमळ जास्त आहे, थोडी काही शे पाने कमी केली असती तर वजन नक्कीच कमी झाले असते. असो. लेखकाचे लेखक म्हणून नाव जरी मार्केट मध्ये चांगले असले तरी, तो काही चांगला लेखक नाही, हे मी छातीठोक पणे सांगतो. अहो त्याने लिहलेली ओळ आणि ओळ, पुस्तके आणि पुस्तके वाचली आहेत मी. ही ईज जस्ट गुड ... बेस्ट नाही होऊ शकत. एक भारी लेखकाची प्रस्थावना व चार पत्रकार हाती असले तर कोणी पण मोठा लेखक होईल त्यात काय एवढे नवल. लेखकाने वेळोवेळी विविध अंगाने आपण लिहू शकतो हे दर्शवण्यासाठीच विविध प्रकारचे लेखन वेळोवेळी केले आहे, त्यातून त्यांची ठाम अशी वैचारिक बैठक नाही हे आपल्याला सहज समजते, नाही तुम्हाला लगेच समजेल असे नाही, पण आमच्या सारख्या समिक्षकांना नक्कीच ते समजते. याच लेखकाच्या मागील पुस्तकामध्ये त्याने प्रवासवर्णन आणि पाककला याचे समिश्र दर्शन घडवणारी कथा कादंबरी स्वरुप मांडली होती. त्यामागे योजना ही ज्यांना प्रवासवर्णन हवे आहे ते देखील पुस्तक घेतील व ज्यांना पाककृती हवी आहे ते देखील घेतील अशी सरळ साधी मांडणी होती, हे आता समिक्षकांना लगेच समजते. पण बाकीचे लोक डोक्यावर पुस्तक घेऊन नाचतात त्यात प्रवासवर्नन वाले पण व पाककृतीवाले पण! मग जनमत रेट्याने २-३ बक्षिसे सहज मिळुन जातात पण त्यामागचे आर्थिक गणित काय आम्हाला समजत नाही काय! पण यावेळी लेखकाने मागचा फॉर्मुला वापरणे सोडलेले दिसत आहे, नवीन एवढेच काय ते नवीन. कथेत जरी आशय असला तरी कथा मांडताना आशय हातातून लेखकाच्या सारखा सराखा सुटतो आहे हे ओळीओळीतून जाणवते. शब्दबंबाळ हा शब्द मी वापरणार नाही पण अनेकजागी काही शब्दांचा अट्टहास लेखक टालू शकत नाही हे मराठीचे द्रुदैव! कथेत तसा काही दम नाहीच आहे पण दमदार शब्द वापरुन थोडीफार तरी कथा दमदार होईल असा लेखकाचा कयास असावा असे वाचताना जाणवते. आता कथेतील पात्रेच पहा ना. त्यांच्या वाक्याला ठराविक एक असा लहेजाच नाही आहे. कोणी शुद्ध भाषेत बोलतो आहे, कोणी ग्रामिण तर एक पात्र तर चक्क विदेशी भाषा बोलतो की काय असा भास होतो. सामाजिक विषयावर कथा लिहताना ग्रामिण भाषेचा पगडा असणे आपण एकेळ समजून घेऊ पण ते वाचकाला पचणी पडेल काय याचा विचार लेखकाने करणे गरजेचे असते. मी वडगाव-बुद्रुक मध्ये जेव्हा मराठी साहित्य, साहित्यिक व वाचक या विष्यावर बोलताना याच विषयावर भर दिला होता. लेखकाने वाचकांना काय हवे ते पहावे कथेला काय आवश्यक हे पाहण्यात काय हाशील? आता या कथेतील घरगडी गेली कित्येक वर्षे जर एका सुसंकृत घरात काम करत आहे तर त्याची बोली भाषा ग्रामीण राहीलच कशी? यावरुन मी असा अनुमान काढला आहे की लेखकाला अजून अभ्यास करण्याची गरज आहे. पहिली चार पाने वाचल्यावर वर असे वाटले की पुढे वाचू नये, पण लेखकाने घेतलेल्या कष्टावरुन मनात असे आले की घ्यावी वाचून म्हणून पुर्ण वाचली कथा! पण कणेकरांचे शब्द मनात पिंगा घालत राहिले.........दम नाय! असो, कधीमधी चूकुन ही कथा वाचावी लागणारच असेल तर आधी माझी ही समिक्षा वाचून काढा. मराठी वाचकाचा काहीवेळ वाचवल्याचे पुण्य तरी मला लाभेलच. पुस्तक कोठे मिळेल? लेखकाकडे नाही तर प्रकाशकाकडे... बेचार्‍याकडे थप्पा पडल्या असतीलच... काही दिवसानी जावा, सूट चांगली मिळेल. तुमच्या पुस्तक परिक्षण करुन हवे आहे? मला ईमेल करा, मी कॅश स्विकारतो. वरील पुस्तकाच्या लेखकाने दिलेला चेक बॉन्स झाला म्हणून आजकाल रोख!

वाचने 4090 वाचनखूण प्रतिक्रिया 10

In reply to by विजुभाऊ

दशानन 28/08/2013 - 22:01
हेच तर वाचकांचे चूकते.. लगेच शिक्का मरुन मोकळे होता तुम्ही. समिक्षक नजरेने पहा, लेखकावर शिक्का मारुन तुम्ही मोकळे होऊ शकत नाही, ते काम आमचे.

In reply to by धन्या

दशानन 28/08/2013 - 22:57
योग्य मार्गावर आहेस, काहीच दिवसात किमान ऑनलाईन समिक्षक होशीलच.. मार्गदर्शनाचे माझे क्लास व त्याची फी याबद्दल मी तुला व्यनि करेनच ;)

पैसा 28/08/2013 - 23:04
त्याने दुसरा चेक दिलाय माझ्याकडे.

आशु जोग 29/08/2013 - 00:11
कशाबद्दल चालू आहे. सगळे बुरख्यात.