Skip to main content

मी मोठा शहाणा...

लेखक धन्या यांनी गुरुवार, 15/08/2013 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
असतात अशी काही माणसं. स्वतःला अगदी देव नाही परंतू देवाखालोखाल समजणारी. इतरांना कस्पटासमान लेखणारी. स्वतःच्या ज्ञानाबद्दल, क्षमतेबद्दल, त्यांच्याशी निगडीत सार्‍याच बाबींबद्दल अवास्तव कल्पना असणारी. इतर व्यक्तींच्या मताला काडी ईतकीसुद्धा किंमत न देणारी. प्रत्येक संवाद हा आपल्याच वाक्याने संपायला हवा असा अट्टाहास असणारी. समोरच्याच्या बोलण्यात कितीही तथ्य असलं तरीही मी म्हणतो तेच बरोबर असा हेका धरणारी. ही यादी न संपणारी आहे. आणि एव्हाना तुमच्याही लक्षात आलं असेल की, अशी माणसं तुमच्या आजुबाजूलाही आहेत. काहींच्या घरात आहेत. काहींच्या दारात. तर काहींच्या कार्यालयात. अशी माणसं दारात असतील, कार्यालयात असतील तर आपण त्यांच्याशी जेव्हढयास तेव्हढे संबंध ठेवू शकतो. अगदीच सहन करण्याच्या पलिकडे गेलो तर त्या दारात न जाण्याचा, नोकरी बदलण्याचा पर्याय आपल्यासमोर असतो. पण अशी व्यक्ती जर घरात असेल तर? तर मात्र "आलीया भोगाशी असावे सादर" असे म्हणत त्या व्यक्तीला जशी आहे तशी स्विकारण्यापलिकडे काही पर्याय नसतो. कधी कधी अशा व्यक्तींच्या प्रवृत्ती इतक्या टोकाच्या असतात की घरातील इतर व्यक्तींच्या आयुष्याचा नरक होऊन जातो. मानसशास्त्र हे मानवी भावभावनांचा, मानवी मनाचा, मेंदूचा, मानवी स्वभावाचा अभ्यास करणारे शास्त्र. त्या शास्त्राला अशा व्यक्ती माहिती नसतील असं कसं होइल? मानसशास्त्र अशा व्यक्तींना आत्मरत व्यक्ती म्हणतं. स्वतःच्या कोशात गुरफटलेली, स्वतःपलिकडे जग नसलेली माणसं. पाश्चिमात्य मानसशास्त्र अशा व्यक्तींना नार्सिसिस्ट म्हणतं. आणि या मानवी स्वभावविकाराला नाव आहे "नार्सिसिस्टीक पर्सनालिटी डीसऑर्डर". कुठून बरं आलं हे नार्सिसिस्ट नाव? ते आलं एका ग्रीक पुराणकथेतून. बोईओटीया मधील थेस्पियाई नावाच्या शहरामध्ये नार्सिसस नावाचा एक सुंदर तरुण राहत होता. जलदेव सेफिसस आणि जलपरी लिरिओपचा हा मुलगा. त्याच्या सौंदर्यामुळे तो खुप नावाजलेला होता. परंतू अंगच्या उद्धटपणामुळे त्याला लोक टाळू लागले. त्याच्या सौंदर्यावर भाळून अनेक जलपर्‍या आणि मुली त्याच्या प्रेमात पडल्या. परंतू नार्सिसस स्वतःमध्येच इतका मशगुल होता की त्या सार्‍यांना त्याने झिडकारले. अशीच एक जलपरी ईको. नार्सिससने आपला अव्हेर केला हे सहन न होऊन तीने स्वतःला विरघळवून टाकले. एके दिवशी नार्सिसस एका तळ्याकाठी गेला असता त्याला पाण्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. नार्सिसस आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबाच्या एव्हढा प्रेमात पडला की त्याला काळाचे भान राहिले नाही. शेवटी तो तसाच मरुन गेला. narc या आत्मरत व्यक्तींची ठळक स्वभाव वैशिष्ट्ये: १. अशा व्यक्तींना किंचितही त्यांच्या विरोधी मत सहन होत नाही. अशावेळी प्रचंड राग येतो त्यांना. २. स्वतःची ध्येये गाठण्यासाठी इतरांचा शीडीसारखा वापर करतात. ३. स्वतःची प्रचंड भलावण करतात. ४. स्वतःचे यश, बौद्धीक क्षमता, सौंदर्य, बुद्धीमत्ता या विषयी अवास्तव कल्पना असतात. ५. दुसर्‍यांनी आपल्याला नेहमी चांगलंच म्हणावं, सर्व बाबतीत आपल्यालाच प्राधान्यक्रम दयावा अशी अपेक्षा असते. ६. दुसर्‍याचा सुखाचा, यशाचा, कर्तुत्वाचा यांना नेहमी मत्सर वाटतो. ७. आपण कुणीतरी "खास" असल्याची भावना मनात घर करुन असते. ८. दुसर्‍यांच्या भावनांची, अपेक्षांची मुळीच जाणिव नसते. ही यादीसुद्धा न संपणारी आहे. दुसर्‍यांच्या भावनांशी, मतांशी काही घेणंदेणं नसल्यामुळे, आपल्या ईप्सित ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी कसलाही विधीनिषेध न बाळगता माणसांना वापरण्याच्या हातोटीमुळे ही माणसं ज्या कामात हात घालतात त्या कामात बहूधा यशस्वीच होतात. नेहमी लोकांना जाळ्यात पकडण्यासाठी अशी लोकं एक हसरा मुखवटा घालून चारचौघात वावरतात. पहिल्या भेटीत अशा व्यक्ती समोरच्यावर नेहमीच छाप पाडतात. परंतू जसजसे आपण अशा व्यक्तींबरोबर वेळ घालवू लागतो तसतसे अशा व्यक्तींचे अंतरंग उघडे पडत जातात. अशी एखादी व्यक्ती जर तुमच्या कार्यालयातील साहेब किंवा साहेबीण असेल तर त्यांची अपेक्षा तुम्ही दिवसरात्र कार्यालयात राबावं एव्हढीच असते. तुम्हाला घर-दार आहे, मुलं-बाळं आहेत, तुम्हाला भावभावना आहेत हे त्यांच्या गावीच नसतं. तुम्ही महिनाभर खपून जर एखादा अहवाल बनवलात तर तो अहवाल मीच बनवला असं आपल्या वरीष्ठांना सांगून तुमच्या कामाचं श्रेय लाटणं हा अशा व्यक्तींच्या डाव्या हाताचा मळ असतो. अशी व्यक्ती जर कुटुंबात असेल तर? गरुड पुराणात वर्णन केलेला नरक जिवंतपणीच अनुभवायला मिळतो. दुसर्‍यांनाही भावना आहेत, त्यांच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत, आपलंही कधीतरी काही चुकत असेल, आपणही कुठेतरी आपल्या जबाबदार्‍या पार पाडत असताना कमी पडत असू याचं भानच त्यांना नसतं. प्रत्येक बाबतीत घरच्यांनी त्यांनाच अग्रक्रम द्यावा असा त्यांचा हेका असतो. अशा व्यक्तींचं मन ही अभेदय भिंत असते, कितीही डोकं आपटलं तरी न तुटणारी. आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत कधीच फचत नाही. त्यांच्यात ती क्षमताच नसते. जणू काही नियतीने त्यांना तसा शापच दिला असावा. पण असा स्वभाव बनतो कसा? एखाद्या असाध्य आजाराप्रमाणे तो एका पीढीतून दुसर्‍या पीढीकडे संक्रमीत होतो की लहानपणी झालेल्या संस्कारांचा तो परीणाम असावा? असा स्वभाव एका पीढीतून दुसर्‍या पीढीकडे संक्रमीत जनुकांच्या माध्यमातून संक्रमीत होत असावा याला पुष्टी देणारे पुरावा जनुकशास्त्राला अजूनतरी सापडले नाहीत. मग उरते एकच कारण. लहानपणी होणारे संस्कार. मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ञांच्या मते लहान मुल वाढत असताना मुलाच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक गरजांची अक्षम्य हेळसांड जर झाली तर ते मुल स्वतःचं मन मारायला शिकतं. आपल्या भावभावना बधिर करतं. आणि त्यामुळेच दुसर्‍यांच्या भावभावना त्याच्यापर्यंत पोहचतच नाहीत. किंवा याच्या अगदी उलटही असू शकतं. एखादया सुखवस्तू घरात मुल वाढत असताना त्याचे अवाजवी लाड झाले, ते मुल म्हणेल ती वस्तू क्षणार्धात त्याच्यासमोर हजर केली जाउ लागली तर त्याच्या मनाचा वेगळाच ग्रह होतो. आपण कुणीतरी खास आहोत, आपल्याला जे जे हवं ते ते आपल्यासमोरक्लगेच हजर व्हायला हवं, आपला तो अधिकारच आहे अशी त्या मुलाच्या मनाची समजूत होऊ लागते. हे ग्रह पुढे खुपच घट्ट होउन व्यक्तीचा स्वभाव आत्मकेंद्री होतो. स्वभावाला औषध नाही असं म्हणतात. हे म्हणणं आत्मरत व्यक्तींना तंतोतंत लागू होतं. एखादी व्यक्ती आपला स्वभाव कधी बदलते? जेव्हा त्या व्यक्तीला आपलं काहीतरी चुकतंय असं वाटतं. आत्मरत व्यक्तींच्या बाबतीत अशी काहीच शक्यता नसते. त्यांच्या दृष्टीने ते सर्वज्ञ, सर्वगुणसंपन्न असतात. जी काही वैगुण्ये असतात ती इतरांमध्ये असा आत्मरत व्यक्तींचा ठाम ग्रह असतो. त्यामुळे अशा आत्मरत व्यक्ती सुधारणे किंवा त्यांचा स्वभाव बदलणे ही जवळपास अशक्यप्राय अशी गोष्ट असते. नाही म्हणायला एखादी आयुष्य ढवळून टाकणारी घटना घडली तर एखादया आत्मरत व्यक्तीचे डोळे खाडकन उघडू शकतात. परंतू असा उ:शाप मिळालेली अहिल्या हजारात एखादीच असते. बाकीच्यांच्या नशिबी शापित शिळेचं जगणं असतं. ज्या शिळेवर कधी कधी कुटुंबच्या कुटुंब आपल्या अपेक्षांचा बळी देतात. अशा व्यक्तींसोबतचं आपलं जीवन सुसह्य करण्याचा मार्ग म्हणजे अशी व्यक्ती जशी आहे तशी स्विकारणं, त्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पुर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही याची मनाशी खुणगाठ बांधणं. गोनिदांनी ज्ञानदेवांच्या जीवनावर लिहिलेल्या "मोगरा फुलला" नावाच्या कादंबरीत एक वाक्य आहे, अपेक्षा फार नसल्या की अपेक्षाभंगाचं दु:ख सहन करावं लागत नाही. हे वाक्य आत्मरत व्यक्तींसोबत आयुष्य जगताना तंतोतंत लागू होतं. पाश्चिमात्य मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ञ "हाऊ टू डील विथ नार्सिसिस्ट?" असा प्रश्न विचारला की "रन अवे फ्रॉम हिम्/हर फॉर युवर लाईफ" असं उत्तर देतात. भारतीय मनाला हे उत्तर पटणार नाही. त्यामुळे परिस्थीतीशी जुळवून घेणं हा एकच पर्याय आपल्यासमोर असतो. असो. जाता जाता एव्हढंच लिहितो की या लेखाचा उद्देश आत्मरत व्यक्तींना सैतान ठरवणं हा नाही. केवळ वास्तवाशी ओळख करुन देणं एव्हढा हेतू हा लेख लिहिताना समोर आहे. आत्मरत व्यक्ती असे दुर्दैवी जीव असतात की आपल्यामुळे इतरांना प्रचंड त्रास होतोय याची पुसटशीही जाणिव त्यांना नसते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20333
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

नार्सिसिस्टीक पर्सनालिटी डीसऑर्डर " हा एक आजार आहे पण नार्सिसिझम एका विशिष्ट पातळीपर्यंत इष्ट किंवा वांछनीय आहे कारण अशा मानसिकतेचे लोक स्वतावर खुश असतात पण आपली वरची परिस्थिती तशी राखून ठेवण्यासाठी ते लोक कोणतेही कष्ट उचलण्यास तयार होतात. असे लोक जर आपले सहाय्यक असतील तर त्यांना थोडासा गूळ लावून बरीच कामे करून घेता येतात. पण अशी माणसे आपले वरिष्ठ असतील तर ते आपले दुर्दैव होऊ शकते. दुर्दैवाने नार्सिसिझम कुठे संपते आणि नार्सिसिस्टीक पर्सनालिटी डीसऑर्डर कुठे सुरु होते ते नक्की कळत नाही. नार्सिसिझम मध्ये दिसणारी लक्षणे म्हणजे आत्मकेंदित वृत्ती,अप्पलपोटेपणा, दुसर्या बद्दल सहानुभूती नसणे, जे लोक स्तुती करतात त्यांच्या कडे जास्त लक्ष देणे आणि जे लोक त्यांची स्तुती करीत माहित वा परखडपणे सांगतात त्यांच्या बद्दल दुस्वास करणे. स्वार्थासाठी दुसर्याचा बेदरकार पणे उपयोग करणे. त्याबद्दल कोणतीही लाज न बाळगणे, सत्तेची लालसा बाळगणे. आपल्या कामगिरी बद्दल टिमकी वाजवणे किंवा आपल्या साध्य गोष्टीची अतिशयोक्ती करून सांगणे आणि शेवटी चूक लक्षात आणल्यावर ही त्यांना त्याबद्दल कोणतीही लाज किंवा खंत नसते.कृतघ्न पण असतात. असा माणूस जर आपला वरिष्ठ असेल तर नोकरी बदलणे हे इष्ट ठरते. आणि जर तो आपला खोलीतील साथीदार(रूम पार्टनर) असेल तर कोणतीही अपराधीपणाची भावना( guilt) न ठेवता खोली बदलणे हे श्रेयस्कर आहे याचे कारण हि मानसिक स्थिती किंवा आजार सहजासहजी सुधारणारा नसतो. अगदी मनोविकार तज्ञाकडे सुद्धा यावर पूर्ण आणि कायमचा इलाज अजून तरी नाही. अगदी कितीही सद्हेतूने तुम्हि ते केलंत तरी करणार्याला त्याची कोणतीही जाणीव नसते आणि असली तरी ती बोलून दाखवण्याची सदवृत्ती त्याच्यात नसते.

मस्त रे. फक्त यावरच थांबू नकोस - मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या पैलूंवरती एक लेखमाला लिही!

अशा मनोवृत्तीचा अश पद्धतीने विचार फारच उत्तम मांडला आहे. त्या मागची कथा पण आवडली . अशा माणसाना हाताळण आणि त्याच्यावर उपाय कारण म्हणजे खरच एक कसोटी आहे कुटुंबिया साठी . तुम्ही म्हटल्या प्रमाणे त्यांच्या आयुष्यात जर त्यांच मन हलवून टाकणारी गोष्ट मुद्दाम पण खोट्या पद्धतीने घडवून आणली तर ते जास्त प्रभावी ठरावे अस मला वाटत . अशी घटना आपोआप घडण्याची वाट बघावी लागणार नाही आणि तिचे दुष्परिणाम पण टाळता येतिल.

लेख छानच. मी गेले दीड वर्ष नार्सिसिस्ट साहेबाबरोबर काम करत आहे. आणि हे सांगू शकतो तो व्यावसायिक आणि कौटुंबिक आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलेला, सतत दुसर्‍यांवर आरडाओरडा करणारा मनुष्य आहे. त्यामुळे ही माणसे नेहमी यशस्वी ठरतात हे पटले नाही. सतत दुसर्‍याच्या चुका काढणारा साहेब मिळाल्याचा मला व्यावसायिक कौशल्याच्या दॄष्टीने फायदाच झाला. मीदेखील दोन-चार वेळा चार-पाच फ्रेशर लोकांच्या समोर आरडाओरडा करत त्याच्या चुका दाखवून त्याचा पाणउतारा केल्यावर त्याने आवाज करणे बंद केले. जर आपले काम चोख असेल आणि आपली एखादी चूक दाखवून दिल्यावर ती मान्य करण्याचा मोकळेपणा असेल तर कोणत्याही साहेबा बरोबर काम करताना अडचण येत नाही असे वैयक्तिक मत आहे.

सुंदर लेख, वाचनिय चर्चा ! सगळेच प्रतिसाद अभ्यासपुर्ण आहेत. थॅन्क्यु धन्या या सहज सोप्या सुंदर लेखा साठी !