निवृत्त नाथांच्या कथा
आज पहाटे मी दचकून जागी झाले. तशी माझी झोप सावधच असते पण आज काहीतरी विचीत्रच झालं.
माझ्या गालावर कुणीतरी हलकेच हात फिरवतंय असं आधी वाटलं.
मग झोपेतच ओळखीचा सुगंध आल्यासारखं वाटलं.
बर्याच वर्षांनी असं काहीतरी झालं पण गालावर पिस फिरवणारा स्पर्श हळूहळू सगळ्या चेहेर्यावरच फिरायला लागला आणि मी दचकून ..दचकून कसली जवळजवळ किंचाळतच उठले.
डोळे उघडले तर काय ह्यांचाच चेहेरा समोर .
मी म्हटलं "काय हो हे !!! घाबरवून टाकलंत मला"
आणि काही काळवेळ .."
असं म्हटल्यावर ह्यांचा चेहेरा आणखीच ओशाळगत झाला.
"अगं मी उठवणार नव्हतो तुला पण अगदी नाईलाजच झाला."
बेडरुमच्या निळ्या अंधारात मला नक्की काही कळेना.
"अहो चक्क गालावरून हात फिरवताय आणि ...
मग माझं लक्ष ह्यांच्या हाताकडे गेलं .
मी उठले बाई पटकन आणि दिवे लावले.
ह्यांचे हात ओलसर दिसत होते .
"काय हो हे हातावर "?
"अगं आजपासून मी सकाळी फिरायला जाणार होतो ना .बाहेर बर्यापैकी थंडी असेल म्हणून म्हटलं जरा तुझं क्रीम लावू या "
"बरं मग" ?
"अगं थोडं हातावर घ्यावं म्हटलं तर बाहेरच येईना"
- मग ?
मग काही नाही अंधारात ट्युब जरा जास्तच पिळली तर फस्कन तळाहातापासून कोपरापर्यंत उडलं ".
"आता एव्हढं महागडं क्रीम वाया का घालवा म्हणून तुझ्या चेहेर्यावर लावत होतो तर ....
आता हळूहळू मी वर्तमानात आले.
गेले साताठ दिवस हा सकाळी फिरायला जाण्याचा कार्यक्रम अमलात आणण्याची तयारी चालाली होती.
सुरुवातीला मी पण सोबत यावं म्हणून आग्रह चालला होता.
मग काल रात्री मला म्हणाले "तर मग तू येणार नाहीस ना सकाळी "
मी नाही म्हटल्यावर " मी एकटाच जाईन ची " घोषणा करून हे झोपले .
अगदी झोप लागता लागता माझ्या लक्षात आलं की मला सोबत न्यायचा प्लान नव्हताच पण मी अगदी माझ्या तोंडानी नाही म्हणेपर्यंत आग्रह चालला होता .
आपल्याला हवे ते दुसर्याकडून वदवून घेण्याची ही ट्रीक तीस वर्षं जुनी आहे आणि सालाबाद प्रमाणे यंदाही मी फशी पडलेच.
पण हे कळेपर्यंत मेली झोपच लागली.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
..... नंतर हे कधी बाहेर पडले हे कळायच्या आतच मला पुन्हा एकदा झोप लागली ती अगदी मानसीने दारावर टकटक करून आणि आई उठताय ना ? असं चार वेळा विचारल्यावर जाग येईपर्यंत .
तो पर्यंत महाराज सकाळचा फेरफटका आटपून आलेले नव्हते.
अर्थात मला हे काही नविन नव्हतं .यांच्या उपक्रमाचं वेळापत्रक असंच असणार हे मला इतक्या वर्षाच्या संसारानंतर माहीती होतं .
शाळेच्या भूगोलाच्या बाईंनी शिकवलेलं ज्ञान संसारात वापरणारी गृहीणी बहुतेक मी एकटीच असेन.
बाईंनी वर्गात शिकवलेलं मला अजूनही लख्ख आठवतं. "समजा आज चंद्र साडेसहा वाजता उगवला तर दुसर्या दिवशी तो पसतीस मिण्टं उशीरा मग तिसर्या आणखी पसतीस मिण्टं उशीरा ....आणि पंधरा दिवसानी गायब म्हणजे उगवणारच नाही "ह्यांच्या उत्साहाचं अगदी अस्संच असतं .दर दिवशी थोडी थोडी घट होत शेवटी उपक्रम बंद करण्याच्या कारणांची यादी जाहीर होते आणि उपक्रम संपतो आणि दुसरा सुरु होतो.
आणि हे अगदी पुराव्यानिशी शाबीत करण्यासाठी कपाटात सगळी एक्झीबिट एक ते अनंत ज्ञानेश्वरी-जपाची माळ आणि काउंटर- शाखेचा गणवेश- एक दुर्बीण -चार कसलेतरी दगड -दहा बारा सिड्या - अॅमवेचं किट - शेरबाजाराची पुस्तकं मी जपून ठेवलीत.
हा विचार मनात येईस्तो श्वासाची मेली लय चुकलीच.
मला यांची काळजी वाटायला लागली .
आधी बिस्कीट जास्तच भिजलं आणि कपाच्या तळाशी गेलं मग चहाच सांडला.
बाबा म्हणतात ते अगदी खरंय लय हटी -दुर्घटना घटी.
तोपर्यंत माझ्याकडे मकरंद -मानसी -मुकुल एकाच वेळी बघतायत हे पण लक्षात आलं नव्हतं .झालं मग प्रश्नोत्तरं सुरु .
"आई बाबा कुठे गेलेत "? मकरंद
"कुणाबरोबर फिरायला जाणारेत सांगीतलंय का"? मानसी
"आबा एकटेच गेले ? म्हणून तू रागावलीस ? "मुकुल
आणि हे प्रश्न संपेस्तो मकरंदनी एक लांब श्वास घेऊन सोडला .
आज घरात सुंगध कसला येतोय ?
ह्यांनी पिळलेल्या ट्युबचा घमघमाट आता बाहेरपर्यंत आला होता.
मी बापडी सांगणार तरी काय ?
मग मुकुलच म्हणाला "हा आज्जीच्या क्रीमचा वास "
आता शहाण्या सुनेनी गप्प बसावं ना ?
पण नाही तिच्या डोक्यात चौकशीचं रक्त सळसळायला लागलं आणि त्यातला वाईट्ट प्रश्न म्हणजे "आई तुम्ही नाईट क्रीम सकाळी लावलंत का ? "
मग मुकुल म्हणाला " नाही काई .आज्जी बसली टुबवर आणि मग ....
खरं काय ते सांगणारंच होते तेव्हढ्यात महाराज आले .
अहाहा काय ध्यान. चित्पावन संघाच्या सभेत मिळालेला केशरी टी शर्ट -शाखेत घालून जायची हाफ पँट..आणि बहीणीनी चार वर्षापूर्वी अमेरीकेतून पाठवलेले स्पोर्ट शूज ...
आता यातली एकेक वस्तू म्हणजे यांचे एकेक उपक्रम ..
खाकी हाफ पॅट म्हणजे त्यातल्या त्यात नविनच .ती पण एक मोठी कथाच ...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मध्यंतरी कधीतरी एकदा सकाळी हे स्टेशनवर गेले होते. कुठलंतरी पथक काहीतरी मोहीम यशस्वी करून मुंबईत परत आलं होतं त्याच्या स्वागतासाठी.
ह्यांच्याच भाषेत सांगायचं तर संकीर्ण उद्योग.
पहाटे बाहेर पडले होते ते साडेसात आठला घरी परत आले. ह्यांचा चेहेरा वाचून मला कळलं की काहीतरी नविन संकीर्ण उद्योगाचा शोध लागला आहे
ह्यांचे संकीर्ण उद्योग म्हटले की माझ्या डोक्याचा तवा हलके हलके गरम व्हायला लागतो. काही दिवसानी मोहरी तडतडावी इतका गरम होतो पण आताशा या उद्योगांकडे मी अगदी तटस्थ नजरेनी बघते.
या उद्योगाचे खिळे स्क्रू बिजागर्या हळूहळू ढिल्या - मोकळ्या करत राहते.
मग संकीर्ण उद्योग कोसळला तरी मी बापडी नामानिराळी.
एकूण परीस्थितीचा अंदाज घेता चहा पिता पिता त्या उद्योगाची अधिकृत घोषणा कानावर पडणार आहे असा तर्क बांधला आणि अगदी तस्संच झालं.
"तुला माहीत्ये अंजू आज सकाळी येताना मी काय पाह्यलं ?"
मी श्वास छातीत पूर्ण भरून घेतला. बाबा टिव्हीवर सांगतात तसं माझं लक्ष कपाळाच्या मध्यभागी आणून म्हटलं
"अहो मला कसं कळणार काय ते तुम्हीच सांगा ."
श्वास सोडला आणि यांचं उत्तर ऐकण्यापूर्वी डब्ब्ल श्वास आत घेतला.
"अगं -पडवळनगर मध्ये सकाळची शाखा चालू आहे."
प्रकरण फारसं धोकादायक नसल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी फसक्न श्वास सोडला आणि म्हटलं
"अहो काहीतरी काय शाखा काय सकाळी उघडत नाही. बाळासाहेब गेले त्याच आठवड्यात सकाळी उघडल्या असतील "
आता यांचा चेहेरा जरा चमकायला लागला.
मला म्हणाले "अगं सेनेची शाखा नाही गं .शाखा म्हणजे राष्टीय स्वयंसेवक संघ."
आता माझ्या माहेरी सगळेच संघे.त्यामुळे मला काही फारसा धक्का बसला नाही पण हे शाखेत जाणार म्हणून जरा काळजी वाटायला लागली.
हे तिकडे गेले की चारपाच तरी माणसं शाखेत येण्याची बंद होतील याची मला खात्री होती.
फार वर्षांपूर्वी हे आमच्या कडे आले होते आणि यांची आणि माझ्या भावाची राजूची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल चर्चा चालू होती.
त्याचं बोलून झाल्यावर ह्यांनी समाजवादावर बोलायला सुरुवात केली.
नंतर संक्रांतीला गेले तेव्हा कळलं की राजू आता युक्रांदमध्ये गेलाय !!!! मी म्हटलं अहो हा सगळ्या तुमच्या चर्चेचा परीणाम.त्यावर हे म्हणाले मी कुठे युक्रांदचा सदस्य आहे. मला फक्त राजूच्या मनातला वैचारीक गोंधळ दूर करायचा होता म्हणून मी थोडीशी माहीती त्याला दिली.
थोडक्यात काय तर इतर संकीर्ण उद्योगाप्रमाणे हा खटाटोप थोड्याच दिवसात आटपेल हे कळल्यावर माझा श्वास आपोआप नॉर्मल !!! बाबा म्हणतात ते खरंय .श्वास म्हणजे जीवन .जसे जीवन तसा श्वास .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------त्या दिवशी बहुतेक मंगळवार होता.
शुक्रवारी खाकी हाफ प्यांटी आणि पांढर्या शर्टाचे कडक घडीबंद जोड घरात आले.
रात्री झोपण्यापूर्वी यांचे चिटोरी सर्वीस चालू होती.
घरातल्या सगळ्यांच्या हातात हे अधून मधून बारीक सारीक चिठ्ठ्या देत असतात.
म्हणजे माझा वाढदिवस असला तर माझ्या नकळत मकरंदच्या हातात एक चिटोरं :
'आईचा वाढदिवस २९ तारखेला आहे."
मी विचारलं "काय हो आज कुणासाठी "? हे म्हणाले "माझ्यासाठीच"
"म्हणजे काय ? "मी विचारलं
" रविवारी कित्येक वर्षांनी शाखेत जाणार आहे म्हणून तयारी करतो आहे."
असं म्हणत माझ्या हातात एक चिटोरं दिलं
त्यावर लिहीलं होतं " केशरी गुहे समीप मत्त हत्ती चालला."
मी म्हटलं अहो मोठ्यांच्या शाखेत काय हे गाणं म्हणतील का ?
त्याला उत्तर म्हणून दुसरं चिटोरं भारता जागा रहा
नविन संकीर्ण उद्योग जरा जडच जाणार हे माझ्या लक्षात आलं पण मी बापडी काय करणार होते ?
उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं अहो तुम्हाला काही आठवतंय का आता ?आणि लक्षात आलं की आपलं चुकलंच गड्या .
नंतर अर्धा तास सायं शाखा -प्रभात शाखा -प्रदोष शाखा आणि चर्म वेत्र -छुरीका -दंड ह्या विषयावर व्याख्यान.
मी चार जांभया दिल्यावर यांच्या डोक्यात प्रकाश पडला .दिवे मालवून माझ्या शेजारी पडले आणि माझ्या गळ्यात हात घालून विचारतात कसे ? " मला अजूनही क्रमीका एक -दोन -तीन सगळं काही येतं ?आणि बळेच माझा चेहेरा स्वतःकडे वळवून म्हणाले "मग " " काय विचार आहे ?"
मी म्हटलं
"काही नाही .संघ विकीऱ."
आणि पाठमोरी होतं झोपून गेले. जागरणाचा उत्साह माझ्यात काही शिल्लक नाही.
( क्रमशा )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा हा हा!
आयला!!!
+१
हम्म!
वायले
नर्मविनोदी !
छान लेख
केवळ अप्रतिम.
शीर्षकांच्या नावावरून ते
मस्त
४दा तरी लेख उघडुन वाचला असेल..
बेहद्द खुष !
"काही नाही .संघ विकीऱ."- हा हा हा ....मजेदार !