Skip to main content

पंचम पुरीवाला.. एक श्रद्धास्थान..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 03/05/2013 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबैचा पंचम पुरीवाला. पंचम पुरीवाला हे एक हॉटेल आहे..परंतु खुद्द मालक मात्र त्याला पुरीचं दुकान असं म्हणतो.. बोरीबंदर स्थानकासमोरच बजारगेट स्ट्रीटच्या तोंडाशी हा पंचम पुरीवाला गेली दीडशेहून अधिक वर्ष उभा आहे.. अतिशय साध्या पद्धतीनं सजवलेलं साधंसुधं हॉटेल. लाकडी बाकं..अगदी प्रसन्न वातावरण. प्यायला थंडगार पाणी. प्रत्येक टेबलावर लिंबूमिरच्यांचा एक मोठा वाडगा ठेवलेला..! अतिशय सुरेख गरमगरम पुर्‍या. पानात पडलेली छान गरमगरम फुगलेली पुरी हळूच फोडावी अन् बोटाला वाफेचा चटका बसावा याहून अधिक सुंदर ते काय?! पुर्‍या तळण्याचा हा महायज्ञ दिवसभर सुरू असतो.. पुर्‍यांसोबत खायला आलुमटर, आलूमेथी, छोले असे मोजकेच परंतु चवदार पदार्थ... राईसप्लेटचीही व्यवस्था आहे. साधी राईसप्लेट मागवलीत तर साधारण ५० रुपायांमध्ये पोटभर जेवण होतं..गरमागरम ५ पुर्‍या, एक कोणतीतरी आपल्या आवडीची पातळ भाजी, चांगल्या तांदळाचा भात, सोबत कढी आणि वरण..अगदी ताजं आणि गरमागरम आणि मुख्य म्हणजे सोडा न मारलेलं जेवण असतं..! दहीही अगदी मधूर असतं.. डीलक्स थाळी ७० रुपायांपर्यंत मिळते. तुम्ही नुसती गरमगरम पुरीप्लेट मागवलीत तर सोबत तोंडी लावायला बटाट्याचा रस्सा फुकट..! - : ) हा काँप्लिमेटरी मिळणारा बटाट्याचा रस्साही चवीला अगदी सुरेख असतो.. साधी जिर्‍याची फोडणी..चवीपुरती मीठमिरची.. अगदी साधा असा हा रस्सा गरमागरम पुरीसोबत तुम्हाला खाता येईल.. तेलाची क्वालिटी अतिशय उत्तम.. कधी कुठल्या पुरीला तेलाचा खराब वास आलाय किंवा कधी मैद्याची पुरी दिली गेल्ये असं मला तरी आजतागायत आठवत नाही.. त्याशिवाय मसालापुरी, भटुरे हे देखील पदार्थ अतिशय उत्तम मिळतात.. पंचमचा जगनसेठ.. (मी त्याला जगनसेठ म्हणतो.. त्याचं खरं नांव मला माहीत नाही.. ) जग्नसेठचे कुणी आजोबा की पणजोबा त्याकाळी मुंबैत आले आणि एका लाकडी फळीवजा टेबलावर रस्त्यावरच उभं राहून त्यांनी पुर्‍या तळण्याचा व्यवसाय सुरू केला..तो यज्ञ आजही अव्याहत सुरू आहे..फक्त अलीकडे दोनेक वर्षांपूर्वी काही दिवस पंचमपुरीचं दुकान नुतनिकरणाकरता बंद होतं.. pp आजतागायत अनेकदा पंचमपुरीच्या पायर्‍या अगदी भक्तिभावाने झिजवल्या. आताशा जगनसेठ फारसा दुकानात येत नाही..आता त्याचा मुलगा सांभाळतो..(चवथी की पाचवी पिढी!) पण पूर्वी जगनसेठ असताना कधी पंचमपुरीच्या दुकानात गेलो की माझं अगदी, 'आओ भाई.. आज बहोत दिनोंके बाद दर्शन दिये.. " असं अगदी तोंड भरून स्वागत करायचा. मग लगेच स्वत: माझ्या टेबलापाशी येऊन ऑर्डर घेईल..माझं जेवण झालं की मी मागवलेला नसतानाही एखादा छानसा गुलाबजाम माझ्या पानात ठेवेल.. वर 'ये हमारी तरफसे.. ' - असंही मिश्किलपणे सांगेल.. सांगायचा मुद्दा हा की हल्लीच्या काळात या शेट्टी हॉटेलवाल्यांनी मांडलेल्या प्रचंड महागड्या हॉटेलच्या तुलनेत आजही आमचा पंचमपुरीवाला त्या मानाने खूप उजवा आहे.. शेट्टी हॉटेलातल्या महागड्या सोडा मारलेल्या पदार्थांपेक्षा पंचमपुरीचीवाल्याची पुरीभाजी अथवा राईसप्लेट केव्हाही उजवी, अधिक समाधान देणारी आणि मुख्य म्हणजे पोटभरीची..! असो... तात्या. आगामी : इडलीडोश्याची पंढरी - माटुंग्याचं मणिज लंच होम..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 44967
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by पिवळा डांबिस

झणझणीत पुरी-भाजीची भूक फ्ल्याट ब्रेड अन पोट्याटो स्ट्यू वर भागणार तरी आहे का? :( अवांतरः अवांतराशी सहमत. जो तो विषय ज्या त्या जागी! तिथे गल्लत करण्यात काही हशील नाही.

In reply to by पिवळा डांबिस

जुन्या आठवणी ताज्या केल्यास.
तोच तर प्रॉब्लेम आहे ना! नुसत्या आठवणीच नाही, तर सवयी पण कुणाच्या जाग्या झाल्या तर?

लंबूटांगच्या प्रतिसादाशी सहमत. अवांतर ह्याच परिसरातील पंचतारांकित हॉटेलात प्रशिक्षण घेतल्याने ह्या उपाहारगृहात जायचा योग बरेचवेळा आला आहे. सात्त्विक जेवण हीच त्याची खरी ओळख , असेच दाक्षिणात्य सात्त्विक जेवण येथे मिळते. अनेक जुने आयडी येथे जुने हिशेब चुकते करण्यासाठी आवर्जून आले, एरवी मिसळपाव चे त्यांना वावडे का असते हें समजू शकत नाही.. मिसळपाव वरील नित्य नियमित राबता असणार्या सभासदांचा जिलबी पाडू प्रवृत्तीवर राग मी समजू शकतो व त्यांच्याशी अंशतः मी सहमत आहे.

चित्रगुप्त, संदिप चित्रे, उपास, श्रीरंग जोशी, लंबुटांग, चावट मेला, डांबिस, धमाल मुलगा, निदान मुक्काम, आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे...

ह्या लेखातील वर्णनाचा काही भाग जमला नाही. १ पंचम चे दुकान साधेसुधे पण न सजवलेले आहे. २ स्वच्छता नाही. ताटं वाट्या तेलामुळे आणि व्यवस्थित न धुतल्यामुळे ओशटच असतात. ३ हॉटेल मुमनपाच्या ग्रेड प्रमाणे ग्रेड /३ चे आहे त्यामुळे वेटर स्वछ युनीफॉर्ममध्ये नसतात. ४ पंचम पुरी प्रसिध्द आहे ते त्याच्या झोलवाल्या झांसी ररश्शासाठी आणि वाडग्यात ठेवलेल्या वाफवलेल्या मिर्च्यांसाठी. रश्शाच्या सोबत लाल भोपळ्याची भाजी असते. ५ पंचमच्या लेखात मसाला पुरीचा उल्लेख नाही त्यामुळे लेख अर्धाच राहीला असे वाटते. ६ माझी वैयक्तिक ओळख नाही पण माझ्या माहीतीप्रमाणे पंचमवाला आता सिरीअल फायनान्सींगच्या व्यवसायात आहे. पण ही माहीती अवांतर आहे.

पंचमसोबत बाज्च्या गल्लीतल्या भारतीय मिष्टानला कढी-खिचडी खाण्यासाठी जरूर भेट द्यावी.

रामदास साहेब, मसालापुरीचा उल्लेख आहे..आपल्या नजरेतून सुटला असे वाटते.. असो.. प्ररिसादाबद्दल धन्यवाद..

खरतर आपण प्रत्येक वेळी सर्वच हॉटेलात मिष्ट्टान्न खाण्यास जात नाही. जवळ जवळ ९०% लोक आपआपले पोट भरण्यासाठी जातात.पण अजुनही त्यात सरळसाधी अशी कित्येक हॉटेल टिकुन आहेत कि त्याची चव व जिव्हाळा त्यात्या हॉटेलात आपल्याला पुन्हा पुन्हा ओढुन घेवुन जातो.मुंबईत किंवा मोठ्या शहरात अशी खुप हॉटेल ,ठेले आहेत कि त्यात खुप रुचकर पदार्थ मिळतात. ५ रुपयात मिळणार बॉम्बेवडापाव हा तर माझ्यासाठी खुपच आवडणारा पदार्थ आहे. कोल्हापुर ला मिळणारी राजाबापुची भेळ,किंवा फडतरेंची मिसळपाव हे नादखुळाच.तसेच काही हॉटेलात मटकी उसळ ,चपाती,लोणचे,वरण.भात व पापड असा साधा मेन्यु देखिल खुप सुंदर बनवतात. तात्यांनी खुपच सुंदर लेख बर्‍याच दिवसानी लोहल्याबद्दल त्याचे आभार मानतो तसेच सुंदर लेखाला बर्‍याच ठिकाणी काही प्रतिसादानी गालबोट लावले आहे,ते जर टाळता आले असते तर खुप बरे झाले असते. कारण वडापाव किंवा पुरीभाजी खाताना चुकुन खडा आला तर चव बिघडते तसे झाले आहे. असो तात्या तुम्ही असेच लिहित रहा.

पण तात्याबांचे लेख आले, की अनेक मृत आयडी* पुन्हा जिवंत होतात आणि मिपावरती वावरायला लागतात ह्याचे मला कायमच कौतुक वाटत आले आहे. *म्हणजे जे कधी लॉग-ईन केलेले देखील दिसत नाहीत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

छान निरिक्षण रे परासायबा.. खरं आहे तुझं. येतात ती मंडळी माझ्यावरील मायेपोटी आणि कीबोर्ड सरसावत कौतुकाचे (?!) दोन गोड (?!) शब्द लिहितात झालं..! सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत आहे...! :-)

या पुरीवाल्याबद्दल फारसे माहीत नाही पण आगामी लेख खरेच मनीज इडलीवाल्याचा असेल तर वाट बघतोय.. आम्ही बाजूच्याच राजाशिवाजीचे.. परीक्षा संपल्यावरच्या कित्येक पार्ट्या तिथेच झाल्यात.. तेथील आकर्षण म्हणजे एकच... हवे तितके सांबार चटणी .. पोटभर आणि मोफत... ये उ द्या लेख...

आता टिव्हिवरील कोणत्याही भाषेतील कुकिंगवरचे कार्यक्रम पाहा १कांदा तळणे २गरम मसाला आणि टोमेटो घालून रगडणे ३गुळ सोडून किचिनमधल्या सर्व पदार्थ घालणे ४पुढे त्यात पनीर ,चिझ (तीन प्रकार),ओलिव ओईल ,अजिनोमोटो ,चायनिज सॉस वगैरे महागडे पदार्थ घालणे याशिवाय काही कमी पदार्थात खायचे जिन्नस होत नाहित हा समजायचा जमाना आहे विसोबा . माहेश्वरचे खुराक लाडू अथवा अबू स्टेशनची मटक्यातली रबडिची मलापण आठवण येते .

खर तर मी तुमचे आधीचेही लेख वाचले आहेत. मला ते मनापासुन आवडले. खर तर लेख किती येतात त्यापेक्षा लेखांची वाचनीयता किती आहे, वाचणार्‍याला आनंद देण्याची ताकद किती आहे ह्याला महत्त्व द्यायला हवे. तुमचे सगळेच लेख वाचनीय असतात. त्यामुळे ते येत रहावेत व आम्हाला वाचन आनंद मिळ्त रहावा ही नम्र विनंती.