आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
आयटीच्या गोष्टी - नमन
कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. आता जोपर्यंत हे पुढचं काम येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीच कधी येता कधी जाता, ऑफीसमध्ये काय करता हे विचारत नाही. कंपनीची अपेक्षा एव्हढीच असते की तुम्ही ऑफीसला नऊ तास भरायचे. तुम्ही सकाळी नऊ वाजता ऑफीसला जाता. दहा वाजेपर्यंत तुमच्या एखादया त्रागा किंवा वैताग करणार्या मित्राबरोबर चहा आणि मसाला डोश्याबरोबर अध्यात्म, धर्म, जागतिक महायुद्धे, मानसशास्त्र असले विषय चघळता. दहा ते बारा या वेळात यच्चयावत वृत्तपत्रांच्या आंतरजालीय आवृत्त्या चाळता. बारा वाजता सबवे काउंटरवर जाऊन मस्त एक फुट लाँग हाणता. जमलं तर बाहेर येऊन मोसंबीचा रस वगैरे पिता. डोळे मिटू लागले आहेत याची जाणिव होताच डॉर्ममध्ये अगदी संध्याकाळचे चार वाजेपर्यंत ताणून देता. चार वाजता उठून फ्रेश होता. कँटीनला येऊन मस्त एक चहा घेता. थोडा वेळ जिमला जातात. नंतर क्रिकेट ग्राऊंडला एखादा फेरफटका मारता. साडे सहा वाजायला थोडा वेळ असेल तर एखादा बकरा पकडून त्याला पकवत बसता. आणि साडे सहा वाजताच बाईकला किक मारून घरी सुसाट सुटता. एव्हढं सारं करुनही तुम्हाला महिना अखेरीस पुर्ण पगार मिळतो.
कशी वाटली कल्पना?
आता अ़जून एक कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. तुम्ही ऑफीसला येऊन नुसती हजेरी लावण्याला प्रचंड कंटाळले आहात. अचानक एक दिवस एचारचा फोन येतो. तो किंवा ती तुम्हाला सांगते की वूई हॅव सम प्रोजेक्टस इन पाईपलाईन बट वुई आर नॉट शुअर व्हेन दे विल गो ऑन फ्लोअर. जोपर्यंत पुढचा प्रोजेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही ऑफीसला येऊ नका. कदाचित अजून दोनेक महिने तुम्हाला घरी राहावं लागेल. महिना अखेरीस तुमचा पुर्ण पगार तुमच्या खात्यात जमा होईल. तुमच्यासाठी काम आलं की आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ.
कशी वाटली कल्पना?
आता तिसरी कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. एक दिवस एचारचा फोन येतो. तो किंवा ती तुम्हाला सांगते की वूई हॅव सम प्रोजेक्टस इन पाईपलाईन बट वुई आर नॉट शुअर व्हेन दे विल गो ऑन फ्लोअर. जोपर्यंत पुढचा प्रोजेक्ट येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला अमुक अमुक ट्रेनिंगला नॉमिनेट करतो. तुम्ही आनंदाने उडया मारायला लागता. हे तेच ट्रेनिंग असतं जे त्याची फी जास्त असल्यामुळे आणि ऑफीसमधून एक महिना सुटटी मिळणे शक्य नसल्यामुळे तुम्ही पुढे ढकललेलं असतं. आणि इथे तर कंपनी चक्क त्यांच्या पैशाने ते ट्रेनिंग द्यायला तयार असते. ते ही तुम्हाला महिन्याचा पुर्ण पगार देऊन.
कशी वाटली कल्पना?
तुम्ही जर नॉन आयटी इंडस्ट्रीत असाल तर या कल्पना कल्पनाच राहतील. पण तुम्ही जर आयटीत असाल तर मात्र या कल्पना वास्तवात उतरू शकतात. नव्हे, मोठया आयटी कंपन्यांमध्ये जवळपास वीस ते तीस टक्के कर्मचार्यांना हे भाग्य (किंवा दुर्भाग्य; कसे ते पुढे पाहू) लाभण्याची दाट शक्यता असते.
आयटी कंपन्यांमध्ये काही कर्मचारी राखीव असतात. या कर्मचार्यांना बेंच रीसोर्सेस असं म्हणतात. मोठया आयटी कंपन्यांमध्ये तर अगदी एकुण कर्मचारी संख्येच्या वीस ते तीस टक्के कर्मचारी राखीव असतात. हे राखीव कर्मचारी सहसा उत्पादक काम करत नसल्यामुळे कंपनीला त्यांच्यापासून थेट उत्पन्न असे नसतेच. आणि तरीही या राखीव कर्मचार्यांना कंपनीला महिना अखेरीस पुर्ण पगार द्यावा लागतो.
आयटीतील बेंच ही संकल्पना सांघिक खेळांमधील बेंच या संकल्पनेवर आधारीत आहे. काही सांघिक खेळांमध्ये प्रत्यक्ष खेळणार्या खेळाडूंबरोबर न खेळणारे पण गरज पडली तर खेळू शकणारे खेळाडू संघात ठेवावे लागतात. आयटीतील बेंच असाच आहे. आयटी कंपन्यांना प्रत्यक्ष काम न करणारे परंतू गरज पडल्यावर लगेच काम करु शकणारे काही राखीव कर्मचारी ठेवावे लागतात.
हे सारं आपण जरा अधिक विस्ताराने पाहूया.
आयटी कंपन्या दोन प्रकारच्या असतात.
१. स्वतःची विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणार्या (प्रोडक्ट बेस्ड)
२. ग्राहकाच्या गरजेनुसार संगणक क्षेत्रातील सेवा पुरवणार्या (सर्व्हीस बेस्ड)
प्रोडक्ट बेस्ड कंपन्या म्हणजे स्वतःचे सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन बनवून ते बाजारात विकणार्या कंपन्या. उदा. मायक्रोसॉफ्ट जी एमएस ऑफीस, एमएस विंडोज असे प्रोडक्ट्स बनवते. किंवा टॅली सोल्युशन्स ही भारतीय आयटी कंपनी जी टॅली नावाचं प्रोडक्ट बनवते.
सर्व्हीस बेस्ड कंपन्या म्हणजे ग्राहकाच्या गरजेनुसार संगणकीय सेवा देणार्या आयटी कंपन्या. बर्याचशा भारतीय आयटी कंपन्या आणि भारतातू काम करणार्या बर्याचशा परदेशी कंपन्या या प्रकारात मोडतात.
काही वेळा एकच आयटी कंपनी प्रोडक्ट बेस्ड आणि त्याच वेळी सर्वीस बेस्ड असू शकते. पण अशा कंपन्या खुपच कमी असतात.
सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांचे तेल आणि नैसर्गिक वायू, औषध निर्माण, दुरसंचार, मिडीया अशा इतर विविध उद्योगक्षेत्रातील कंपन्यांबरोबर संगणकीय सेवा पुरवण्याचे करार असतात. इथे आयटी कंपनी सर्व्हीस प्रोव्हायडर असते आणि कोअरमधील कंपनी क्लायंट. आयटी कंपनीसाठी ते एक प्रकारचं खातंच असतं. म्हणून या कराराला अकाऊंट म्हणतात. एका अकाऊंट मध्ये म्हणजेच एका क्लायंटकडे त्याच्या व्यवसायाचे सेल्स, मार्केटींग, एचार, प्रोडक्शन असे अनेक विभाग असतात. आणि या वेगवेगळ्या विभागांना सर्व्हीस प्रोव्हायडरकडून त्यांचे काम संगणकीकृत करायचे असते. त्यासाठी अनेक छोटया मोठया संगणक प्रणाल्या बनवल्या जातात. सर्वसाधारणपणे एक संगणक प्रणाली बनवण्याचे काम किंवा बनवल्यानंतर तिची देखभाल करण्याचे काम म्हणजे एक प्रोजेक्ट असा हीशोब असतो. या प्रोजेक्टवर अॅप्लिकेशन डीझाईन, प्रोग्रामिंग, टेस्टींग, डेटाबेस असे विविध कौशल्य असणारी एक किंवा एकापेक्षा अधिक माणसं कार्यरत असतात.
बरेच वेळा होतं काय, सर्व्हीस प्रोव्हायडर आयटी कंपनीकडे एखादा नवा क्लायंट येतो. किंवा जुन्या क्लायंटला त्याच्या एखाद्या विभागासाठी एखादी अदययावत संगणक प्रणाली बनवून हवी असते. किंवा त्या क्लायंटला त्याचा आधीचा सर्व्हीस प्रोव्हायडर चांगल्या दर्जाची सेवा देत नाही म्हणून दुसर्या सर्व्हीस प्रोव्हायडरकडून ते काम करुन घ्यायचे असते. ईथपर्यंतही ठीक आहे. पण ह्या क्लायंटला त्याचे काम आज आणि आताच सुरु व्हायला हवे असते. कारण त्यासाठी तो भरमसाट किंमत मोजायला तयार असतो. जर एखाद्या सर्व्हीस प्रोव्हायडरने काम लगेच सुरु करण्यात असमर्थता दाखवली तर क्लायंट लगेच दुसर्या सर्व्हीस प्रोव्हायडरकडे जाण्याची शक्यता असते.
क्लायंट लाख म्हणेल की मी जर एव्हढे पैसे मोजतोय तर माझे काम आज आणि आताच सुरु व्हायला हवे. पण सर्व्हीस प्रोव्हायडरने त्या कामासाठी आवश्यक असणारे कौशल्य असणारी माणसे अगदी आताच कुठून आणायची? आयटी मधला नोकर भरती हा प्रचंड वेळखाऊ प्रकार आहे. नविन भरतीची जाहीरात देणे, उमेदवारांचे नोकरीच्या अर्जांची छाननी करुन त्यातल्या त्यात योग्य वाटणार्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणं, मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांशी पगाराची घासाघीस करुन त्यांना निवडपत्र देणं, तो उमेदवार आधीच दुसर्या आयटी कंपनीत काम करत असल्यामुळे त्याच्यासाठी दोन तीन महिने थांबणं याच्यात कधी कधी अगदी सहा महिनेसुद्धा जातात. बरं एहढं सारं केल्यानंतर तो उमेदवार दुसर्याच कंपनीत जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मग क्लायंटला आज आणि आताच नविन माणसं कुठून द्यायची.
या समस्येवरचा उपाय म्हणजे बेंच.
प्रत्यक्षात कर्मचार्यांची गरज नसतानाही नविन भरती करुन ठेवायची. जसे काम येईल तशी ही नविन भरती केलेली माणसं त्या कामावर रुजू करायची. मोठया आयटी कंपन्यांमध्ये वर्षाचे बारा महिने नोकर भरती सुरु असते ती यामुळेच.
बरेच वेळा एखादा चालू असलेला प्रोजेक्ट संपतो. त्या प्रोजेक्टमधल्या माणसांना दुसरे काम मिळेपर्यंत ती माणसेही बेंचवर जातात.
ही बेंचवरची माणसे वर कल्पना म्हणून वर्णन केलेल्या सोयींचा लाभ घेऊ शकतात. अर्थात ते बरंचसं कंपनीवर अवलंबून असतं सार्याच कंपन्यांत हे असं होतंच असं नाही. किंवा होत असलं तरी अगदी असंच होतं असंही नाही.
बेंचवर असलेल्या कर्मचार्यांना पुर्ण पगार द्यावा लागत असल्यामुळे आयटी कंपन्यांसाठी बेंच हा प्रकार "असून अडचण नसून खोळंबा" असा असतो.
ही झाली कंपनीची बाजू. बेंचवर असलेल्या कर्मचार्यांचं काय?
ते ही पाहूया. वरच्या तीन प्रकारच्या बेंच वर्णनांवरुन नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांचा नक्कीच हेवा वाटेल. पण आयटीत बेंचवर येणं ही तितकीशी चांगली गोष्ट नाही.
१. सुरुवातीचे एक दोन महिने चांगले जातात. पण नंतर प्रचंड कंटाळा यायला लागतो. दिवसभर काय करायचे हा प्रश्न पडतो.
२. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी हा असा प्रकार आहे की जर तुम्ही एक दोन महिने त्यापासून दूर राहीलात तर ते सारं तुम्ही विसरुन जाण्याची दाट शक्यता असते. महिनाभर रीयाज केला नाही तर गायकाला त्याचा गळा साथ देत नाही तसंच काहीसं आहे हे.
३. बरेच वेळा बेंचवर असल्यानंतरही नको असलेला प्रोजेक्ट नाकारण्याचा अधिकार असला तरी कधी ना कधी प्रोजेक्ट घ्यावाच लागतो. बरेच वेळा समोर येईल तो प्रोजेक्ट घ्यावा लागतो. आपली कामाच्या वेळा, आपल्याला काम करायची ईच्छा असलेली टेक्नॉलॉजी यात तडजोड करावी लागते.
४. खुप दिवस बेंचवर राहील्यास कंपनी आपल्या दुसर्या शहरातील ऑफीसला बदली करु शकते. केव्हा केव्हा टेक्नॉलॉजीमधल्या माणसाला कंपनीच्या बीपीओ आर्मलाही पाठवले जाते.
५. सर्वात महत्वाचे म्हणजे, आर्थिक मंदीच्या काळात पहिली तडी बेंचवरील कर्मचार्यांवर पडते.
वरवर चांगला वाटणारा हा प्रकार तसा कर्मचार्यांसाठीही वाईटच असतो. एक दोन महिन्यांसाठी बेंचवर येऊन लगेच हवा तसा प्रोजेक्ट मिळाल्यास मात्र मज्जानू लाईफ. पण असे खुपच कमी वेळा होते. वर्ष - दिड वर्ष बेंचवर असलेले किस्से आयटीत ऐकायला मिळतात.
आता समारोपाच्या काही ओळी लिहून हे प्रकरण आटोपतं घेतो. शंभराच्या आतबाहेर कर्मचारी संख्या असलेल्या आयटी कंपन्यांमध्ये बेंच हा प्रकारच नसतो. त्याचे क्लायंटही कधी घोडयावर येत नाहीत. हजाराच्या आसपास कर्माचारी संख्या असलेल्या कंपन्यांमध्ये खुपच कमी कर्मचारी बेंचवर असतात. कारण त्यांना बेंच परवडतच नाही. आणि मोठया आयटी कंपन्या बेंच ठेवतात कारण ती त्यांच्या व्यवसायाची गरज असते.
Book traversal links for आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दोघांनीही छान माहिती दिलीय.
विमे, The Blub Paradox हे
तसं नाय धनाराव
आयटीत लिहिलाय लेख..
बेंचवर बसलेले आयटीतले नवरे.
सकु आणि संखंचं ' स्पायडरमॅन
लिंक मिळु शकते का ?
http://www.hulkshare.com
हम्म..
लै लोकं बसले बेंच मोडला तर नै
चिंता नसावी...
आयबीएम मध्ये तुम्ही बेन्चवर
आयबीएम मध्ये तुम्ही बेन्चवर
हत्ती आणि अनेक डोळस
(अनेक वर्षे आयटी कंपन्यामध्ये
प्रतिसाद
छान माहिति
प्रोडक्ट बेस्ड आयटी