Skip to main content

आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच

लेखक धन्या यांनी मंगळवार, 19/02/2013 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
आयटीच्या गोष्टी - नमन कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. आता जोपर्यंत हे पुढचं काम येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीच कधी येता कधी जाता, ऑफीसमध्ये काय करता हे विचारत नाही. कंपनीची अपेक्षा एव्हढीच असते की तुम्ही ऑफीसला नऊ तास भरायचे. तुम्ही सकाळी नऊ वाजता ऑफीसला जाता. दहा वाजेपर्यंत तुमच्या एखादया त्रागा किंवा वैताग करणार्‍या मित्राबरोबर चहा आणि मसाला डोश्याबरोबर अध्यात्म, धर्म, जागतिक महायुद्धे, मानसशास्त्र असले विषय चघळता. दहा ते बारा या वेळात यच्चयावत वृत्तपत्रांच्या आंतरजालीय आवृत्त्या चाळता. बारा वाजता सबवे काउंटरवर जाऊन मस्त एक फुट लाँग हाणता. जमलं तर बाहेर येऊन मोसंबीचा रस वगैरे पिता. डोळे मिटू लागले आहेत याची जाणिव होताच डॉर्ममध्ये अगदी संध्याकाळचे चार वाजेपर्यंत ताणून देता. चार वाजता उठून फ्रेश होता. कँटीनला येऊन मस्त एक चहा घेता. थोडा वेळ जिमला जातात. नंतर क्रिकेट ग्राऊंडला एखादा फेरफटका मारता. साडे सहा वाजायला थोडा वेळ असेल तर एखादा बकरा पकडून त्याला पकवत बसता. आणि साडे सहा वाजताच बाईकला किक मारून घरी सुसाट सुटता. एव्हढं सारं करुनही तुम्हाला महिना अखेरीस पुर्ण पगार मिळतो. कशी वाटली कल्पना? आता अ़जून एक कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. तुम्ही ऑफीसला येऊन नुसती हजेरी लावण्याला प्रचंड कंटाळले आहात. अचानक एक दिवस एचारचा फोन येतो. तो किंवा ती तुम्हाला सांगते की वूई हॅव सम प्रोजेक्टस इन पाईपलाईन बट वुई आर नॉट शुअर व्हेन दे विल गो ऑन फ्लोअर. जोपर्यंत पुढचा प्रोजेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही ऑफीसला येऊ नका. कदाचित अजून दोनेक महिने तुम्हाला घरी राहावं लागेल. महिना अखेरीस तुमचा पुर्ण पगार तुमच्या खात्यात जमा होईल. तुमच्यासाठी काम आलं की आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ. कशी वाटली कल्पना? आता तिसरी कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. एक दिवस एचारचा फोन येतो. तो किंवा ती तुम्हाला सांगते की वूई हॅव सम प्रोजेक्टस इन पाईपलाईन बट वुई आर नॉट शुअर व्हेन दे विल गो ऑन फ्लोअर. जोपर्यंत पुढचा प्रोजेक्ट येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला अमुक अमुक ट्रेनिंगला नॉमिनेट करतो. तुम्ही आनंदाने उडया मारायला लागता. हे तेच ट्रेनिंग असतं जे त्याची फी जास्त असल्यामुळे आणि ऑफीसमधून एक महिना सुटटी मिळणे शक्य नसल्यामुळे तुम्ही पुढे ढकललेलं असतं. आणि इथे तर कंपनी चक्क त्यांच्या पैशाने ते ट्रेनिंग द्यायला तयार असते. ते ही तुम्हाला महिन्याचा पुर्ण पगार देऊन. कशी वाटली कल्पना? तुम्ही जर नॉन आयटी इंडस्ट्रीत असाल तर या कल्पना कल्पनाच राहतील. पण तुम्ही जर आयटीत असाल तर मात्र या कल्पना वास्तवात उतरू शकतात. नव्हे, मोठया आयटी कंपन्यांमध्ये जवळपास वीस ते तीस टक्के कर्मचार्‍यांना हे भाग्य (किंवा दुर्भाग्य; कसे ते पुढे पाहू) लाभण्याची दाट शक्यता असते. आयटी कंपन्यांमध्ये काही कर्मचारी राखीव असतात. या कर्मचार्‍यांना बेंच रीसोर्सेस असं म्हणतात. मोठया आयटी कंपन्यांमध्ये तर अगदी एकुण कर्मचारी संख्येच्या वीस ते तीस टक्के कर्मचारी राखीव असतात. हे राखीव कर्मचारी सहसा उत्पादक काम करत नसल्यामुळे कंपनीला त्यांच्यापासून थेट उत्पन्न असे नसतेच. आणि तरीही या राखीव कर्मचार्‍यांना कंपनीला महिना अखेरीस पुर्ण पगार द्यावा लागतो. आयटीतील बेंच ही संकल्पना सांघिक खेळांमधील बेंच या संकल्पनेवर आधारीत आहे. काही सांघिक खेळांमध्ये प्रत्यक्ष खेळणार्‍या खेळाडूंबरोबर न खेळणारे पण गरज पडली तर खेळू शकणारे खेळाडू संघात ठेवावे लागतात. आयटीतील बेंच असाच आहे. आयटी कंपन्यांना प्रत्यक्ष काम न करणारे परंतू गरज पडल्यावर लगेच काम करु शकणारे काही राखीव कर्मचारी ठेवावे लागतात. हे सारं आपण जरा अधिक विस्ताराने पाहूया. आयटी कंपन्या दोन प्रकारच्या असतात. १. स्वतःची विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणार्‍या (प्रोडक्ट बेस्ड) २. ग्राहकाच्या गरजेनुसार संगणक क्षेत्रातील सेवा पुरवणार्‍या (सर्व्हीस बेस्ड) प्रोडक्ट बेस्ड कंपन्या म्हणजे स्वतःचे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन बनवून ते बाजारात विकणार्‍या कंपन्या. उदा. मायक्रोसॉफ्ट जी एमएस ऑफीस, एमएस विंडोज असे प्रोडक्ट्स बनवते. किंवा टॅली सोल्युशन्स ही भारतीय आयटी कंपनी जी टॅली नावाचं प्रोडक्ट बनवते. सर्व्हीस बेस्ड कंपन्या म्हणजे ग्राहकाच्या गरजेनुसार संगणकीय सेवा देणार्‍या आयटी कंपन्या. बर्‍याचशा भारतीय आयटी कंपन्या आणि भारतातू काम करणार्‍या बर्‍याचशा परदेशी कंपन्या या प्रकारात मोडतात. काही वेळा एकच आयटी कंपनी प्रोडक्ट बेस्ड आणि त्याच वेळी सर्वीस बेस्ड असू शकते. पण अशा कंपन्या खुपच कमी असतात. सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांचे तेल आणि नैसर्गिक वायू, औषध निर्माण, दुरसंचार, मिडीया अशा इतर विविध उद्योगक्षेत्रातील कंपन्यांबरोबर संगणकीय सेवा पुरवण्याचे करार असतात. इथे आयटी कंपनी सर्व्हीस प्रोव्हायडर असते आणि कोअरमधील कंपनी क्लायंट. आयटी कंपनीसाठी ते एक प्रकारचं खातंच असतं. म्हणून या कराराला अकाऊंट म्हणतात. एका अकाऊंट मध्ये म्हणजेच एका क्लायंटकडे त्याच्या व्यवसायाचे सेल्स, मार्केटींग, एचार, प्रोडक्शन असे अनेक विभाग असतात. आणि या वेगवेगळ्या विभागांना सर्व्हीस प्रोव्हायडरकडून त्यांचे काम संगणकीकृत करायचे असते. त्यासाठी अनेक छोटया मोठया संगणक प्रणाल्या बनवल्या जातात. सर्वसाधारणपणे एक संगणक प्रणाली बनवण्याचे काम किंवा बनवल्यानंतर तिची देखभाल करण्याचे काम म्हणजे एक प्रोजेक्ट असा हीशोब असतो. या प्रोजेक्टवर अ‍ॅप्लिकेशन डीझाईन, प्रोग्रामिंग, टेस्टींग, डेटाबेस असे विविध कौशल्य असणारी एक किंवा एकापेक्षा अधिक माणसं कार्यरत असतात. बरेच वेळा होतं काय, सर्व्हीस प्रोव्हायडर आयटी कंपनीकडे एखादा नवा क्लायंट येतो. किंवा जुन्या क्लायंटला त्याच्या एखाद्या विभागासाठी एखादी अदययावत संगणक प्रणाली बनवून हवी असते. किंवा त्या क्लायंटला त्याचा आधीचा सर्व्हीस प्रोव्हायडर चांगल्या दर्जाची सेवा देत नाही म्हणून दुसर्‍या सर्व्हीस प्रोव्हायडरकडून ते काम करुन घ्यायचे असते. ईथपर्यंतही ठीक आहे. पण ह्या क्लायंटला त्याचे काम आज आणि आताच सुरु व्हायला हवे असते. कारण त्यासाठी तो भरमसाट किंमत मोजायला तयार असतो. जर एखाद्या सर्व्हीस प्रोव्हायडरने काम लगेच सुरु करण्यात असमर्थता दाखवली तर क्लायंट लगेच दुसर्‍या सर्व्हीस प्रोव्हायडरकडे जाण्याची शक्यता असते. क्लायंट लाख म्हणेल की मी जर एव्हढे पैसे मोजतोय तर माझे काम आज आणि आताच सुरु व्हायला हवे. पण सर्व्हीस प्रोव्हायडरने त्या कामासाठी आवश्यक असणारे कौशल्य असणारी माणसे अगदी आताच कुठून आणायची? आयटी मधला नोकर भरती हा प्रचंड वेळखाऊ प्रकार आहे. नविन भरतीची जाहीरात देणे, उमेदवारांचे नोकरीच्या अर्जांची छाननी करुन त्यातल्या त्यात योग्य वाटणार्‍या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणं, मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांशी पगाराची घासाघीस करुन त्यांना निवडपत्र देणं, तो उमेदवार आधीच दुसर्‍या आयटी कंपनीत काम करत असल्यामुळे त्याच्यासाठी दोन तीन महिने थांबणं याच्यात कधी कधी अगदी सहा महिनेसुद्धा जातात. बरं एहढं सारं केल्यानंतर तो उमेदवार दुसर्‍याच कंपनीत जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मग क्लायंटला आज आणि आताच नविन माणसं कुठून द्यायची. या समस्येवरचा उपाय म्हणजे बेंच. प्रत्यक्षात कर्मचार्‍यांची गरज नसतानाही नविन भरती करुन ठेवायची. जसे काम येईल तशी ही नविन भरती केलेली माणसं त्या कामावर रुजू करायची. मोठया आयटी कंपन्यांमध्ये वर्षाचे बारा महिने नोकर भरती सुरु असते ती यामुळेच. बरेच वेळा एखादा चालू असलेला प्रोजेक्ट संपतो. त्या प्रोजेक्टमधल्या माणसांना दुसरे काम मिळेपर्यंत ती माणसेही बेंचवर जातात. ही बेंचवरची माणसे वर कल्पना म्हणून वर्णन केलेल्या सोयींचा लाभ घेऊ शकतात. अर्थात ते बरंचसं कंपनीवर अवलंबून असतं सार्‍याच कंपन्यांत हे असं होतंच असं नाही. किंवा होत असलं तरी अगदी असंच होतं असंही नाही. बेंचवर असलेल्या कर्मचार्‍यांना पुर्ण पगार द्यावा लागत असल्यामुळे आयटी कंपन्यांसाठी बेंच हा प्रकार "असून अडचण नसून खोळंबा" असा असतो. ही झाली कंपनीची बाजू. बेंचवर असलेल्या कर्मचार्‍यांचं काय? ते ही पाहूया. वरच्या तीन प्रकारच्या बेंच वर्णनांवरुन नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांचा नक्कीच हेवा वाटेल. पण आयटीत बेंचवर येणं ही तितकीशी चांगली गोष्ट नाही. १. सुरुवातीचे एक दोन महिने चांगले जातात. पण नंतर प्रचंड कंटाळा यायला लागतो. दिवसभर काय करायचे हा प्रश्न पडतो. २. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी हा असा प्रकार आहे की जर तुम्ही एक दोन महिने त्यापासून दूर राहीलात तर ते सारं तुम्ही विसरुन जाण्याची दाट शक्यता असते. महिनाभर रीयाज केला नाही तर गायकाला त्याचा गळा साथ देत नाही तसंच काहीसं आहे हे. ३. बरेच वेळा बेंचवर असल्यानंतरही नको असलेला प्रोजेक्ट नाकारण्याचा अधिकार असला तरी कधी ना कधी प्रोजेक्ट घ्यावाच लागतो. बरेच वेळा समोर येईल तो प्रोजेक्ट घ्यावा लागतो. आपली कामाच्या वेळा, आपल्याला काम करायची ईच्छा असलेली टेक्नॉलॉजी यात तडजोड करावी लागते. ४. खुप दिवस बेंचवर राहील्यास कंपनी आपल्या दुसर्‍या शहरातील ऑफीसला बदली करु शकते. केव्हा केव्हा टेक्नॉलॉजीमधल्या माणसाला कंपनीच्या बीपीओ आर्मलाही पाठवले जाते. ५. सर्वात महत्वाचे म्हणजे, आर्थिक मंदीच्या काळात पहिली तडी बेंचवरील कर्मचार्‍यांवर पडते. वरवर चांगला वाटणारा हा प्रकार तसा कर्मचार्‍यांसाठीही वाईटच असतो. एक दोन महिन्यांसाठी बेंचवर येऊन लगेच हवा तसा प्रोजेक्ट मिळाल्यास मात्र मज्जानू लाईफ. पण असे खुपच कमी वेळा होते. वर्ष - दिड वर्ष बेंचवर असलेले किस्से आयटीत ऐकायला मिळतात. आता समारोपाच्या काही ओळी लिहून हे प्रकरण आटोपतं घेतो. शंभराच्या आतबाहेर कर्मचारी संख्या असलेल्या आयटी कंपन्यांमध्ये बेंच हा प्रकारच नसतो. त्याचे क्लायंटही कधी घोडयावर येत नाहीत. हजाराच्या आसपास कर्माचारी संख्या असलेल्या कंपन्यांमध्ये खुपच कमी कर्मचारी बेंचवर असतात. कारण त्यांना बेंच परवडतच नाही. आणि मोठया आयटी कंपन्या बेंच ठेवतात कारण ती त्यांच्या व्यवसायाची गरज असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 38694
प्रतिक्रिया 168

प्रतिक्रिया

In reply to by धन्या

त्यात कौतुक करुन घेण्यासारखं काहीच नाही. कुणाला लगेच प्रोजेक्ट मिळतो, कुणाला नाही मिळत.
वेल. असेच काही नाही. प्रोजेक्टवर असतानाच आपले स्किलसेट नेहमी अद्दयावत ठेवले की प्रोजेक्ट संपण्यापूर्वीच दुसरा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता वाढते. मात्र 'मला एवढेच येते आणि मी त्याच गोष्टीवर (आहे त्या ज्ञानावर अवलंबून राहून) एवढेच काम करणार अशी हटवादी भूमिका घेणारे महिनोन्महिने बेंचवर राहतात.) त्यामुळे या ज्या कुणाला प्रोजेक्ट मिळत नाहीत त्यांचे स्किल्स फारच स्पेशलाईज्ड असतात (जे फार कमी भारतीय आय टी कंपन्यांमध्ये आहे) किंवा त्यांचे स्किल्स रेडिली ट्रान्सफरेबल नसतात (जे सर्वच कंपन्यांमध्ये आहे)). शिवाय टेक्निकल स्किल बाजूला ठेवले तरी इतर डोमेन्स किंवा वर्टिकल्समधील प्रोजेक्ट मॅनेजर, रिसोर्स मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून राहणे वगैरे सॉफ्ट स्किल्सही डेवलप करणे आवश्यक असते. त्यामुळे थोडेफार कौतुक करण्यासारखे आहे असे वाटते. बेंचवरील बहुतेकांचा अटिट्यूड हा 'असेल माझा हरी तर देईल प्रॉजेक्ट खाटल्यावरी' असा असतो.
बाकडयावर बसलेल्या १५ - २० टक्के पब्लिकमुळे बिलेबल पब्लिकच्या वेरियेबल पेवर कसा काय परीणाम होईल?
कारण हे 15-20 टक्के पब्लिक काहीच बिलिंग कमावत नसल्याने, जे बिलिंग कमावतात त्यांचा वेरिएबल पे अफेक्ट होतो! १०० रुपये बिलिंग कमावणारे १०० लोक असतील, आणि त्याचे वाटप ११५ लोकांमध्ये होत असेल तर बिनकामाच्या लोकांमुळे काम करणाऱ्यांचा पे अफेक्ट होतोच. सुदैवाने माझ्या कंपनीत काही वर्षांनंतर वेरिएबल पे फक्त बिलेबल रिसोर्सेसनाच मिळेल अशी धोरणअंमलबजावणी केल्यावर, बेंचवरच्या अनेक पब्लिकने आळस झटकून मिळतील ते प्रोजेक्ट करायला सुरुवात केलीच. बाकी 15-20 टक्के बेंच ठेवण्यामागचा आतबट्ट्याचा व्यवहार ध्यानात आल्यावर आता अनेक कंपन्या बेंचची साईज कमी करत आहेतच.

In reply to by आजानुकर्ण

प्रतिसादातील पहिला परिच्छेद नक्कीच माहितीपुर्ण आणि ऑप्टीमिस्टीक आहे. बेंचवर जाणार्‍यांनी असा दृष्टीकोन ठेवला तर बेंच कालावधी नक्कीच कमी होईल.
बेंचवरील बहुतेकांचा अटिट्यूड हा 'असेल माझा हरी तर देईल प्रॉजेक्ट खाटल्यावरी' असा असतो.
हे वाक्य मात्र सरसकटीकरण केल्यासारखं आहे त्यामुळे असहमत. बेंचवरील सारीच जनता अशी नसते. खुप जणांना काम मिळावे अशी प्रामाणिक ईच्छा असते आणि ते त्या दृष्टीने प्रयत्नही करत असतात.
कारण हे 15-20 टक्के पब्लिक काहीच बिलिंग कमावत नसल्याने, जे बिलिंग कमावतात त्यांचा वेरिएबल पे अफेक्ट होतो! १०० रुपये बिलिंग कमावणारे १०० लोक असतील, आणि त्याचे वाटप ११५ लोकांमध्ये होत असेल तर बिनकामाच्या लोकांमुळे काम करणाऱ्यांचा पे अफेक्ट होतोच. सुदैवाने माझ्या कंपनीत काही वर्षांनंतर वेरिएबल पे फक्त बिलेबल रिसोर्सेसनाच मिळेल अशी धोरणअंमलबजावणी केल्यावर, बेंचवरच्या अनेक पब्लिकने आळस झटकून मिळतील ते प्रोजेक्ट करायला सुरुवात केलीच.
काम करणार्‍या लोकांनी मिळवलेल्या उत्पन्नातूनच बेंचवाल्यांना पगार मिळत असला तरी तो व्यवसायाचा भाग आहे हो. त्यामुळे बिलेबल मंडळींनी आमच्या कमाईवर बेंचवाले बसून पगार घेतात असा टाहो फोडण्याला काहीच अर्थ नाही. जर बेंच नाही ठेवला तर त्याचा नविन येणार्‍या प्रोजेक्ट्सच्या संख्येवर (काही वेळा नविन क्लायंट मिळण्यावरही) परीणाम होईल आणि त्याचा थेट परिणाम कंपनीच्या प्रगतीवर होईल हे आयटी व्यवसायातील वास्तव आहे.

In reply to by धन्या

बाकड्यावर नसणार्‍यांनी बाकड्यावरच्यांना कंपनीच्या आर्थिक नुकसानासाठी दोष देणे म्हणजे एखादया गाडीच्या चार टायर्सनी स्टेपनीला दोष देण्यासारखे आहे? अचानक नवे काम आले तेव्हाच नव्हे तर काम करणार्‍यांपैकी कुणी आजारी पडला, कुणाला अपघात झाला, कुणाला अचानक अध्यात्माचा झटका आला तर बाकड्यावरचीच मंडळी कामी पडतात. मा.त. मध्ये अनेकांना सरळसोट काम मिळत नाही. नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे काम अंगावर पडत असते त्यामूळे वर्षा दोन वर्षांतून जर दोन तीन आठवडे बाकड्यावर बसायला मिळाले तर अनेकांना ते हवेच असते. त्यातून ताजे तवाने झाल्यावर नव्या प्रकल्पात अधिक जोमाने कामगिरी करता येते.

In reply to by धन्या

माझा आक्षेप गॅरंटीड पे बाबत नसून वेरिएबल पे बाबतच आहे. वेरिएबल पे हे एका स्वरुपाचे प्रॉफीट शेअरिंग असते. कंपनीला झालेला अधिकचा फायदा हा तो फायदा करुन देणाऱ्या लोकांमध्येच शेअर करावा हे न्याय्य आहे - आणि अशीच अंमलबजावणी आता अनेक कंपन्या करत आहेत.- बेंचवर असूनही प्रॉफीट शेअरिंगमध्ये हिस्सा देणाऱ्या कंपन्या आता मला माहीत नाहीत. मात्र दहा वर्षांपूर्वी बेंचवर असणारे आणि नसणारे यांमध्ये काहीच फरक केला जात नसल्याने स्वतःहून प्रोजेक्टवर जायला काहीच इन्सेंटिव नसायचा. एखाद्या व्यक्तीला प्रॉजेक्ट मिळवून देणे ही केवळ कंपनीच्या रिसोर्सिंग/फुलफिलमेंट टीमची जबाबदारी असल्याचा आभास निर्माण होऊन पब्लिक निवांत टंगळमंगळ करत राहत असे. दहा वर्षापूर्वी अगदी दीड-दीड वर्षे बेंचवर राहूनही ३०० ते ४०० टक्के वेरिएबल पे घेतलेली मंडळी मी पुण्यात पाहिली आहेत. आता प्रॉफिट शेअरिंग फक्त काम करणाऱ्यांंसोबतच होत असल्याने अशा टंगळमंगळ करणाऱ्यांना स्वतःहून प्रॉजेक्ट शोधण्यासाठी एक दट्ट्या मिळतो. आर्थिक नाड्या आवळल्या जात असल्याने झटापट नवनव्या गोष्टी शिकून लवकर प्रॉजेक्ट मिळवण्यासाठी खटपटी केल्या जातात. - जे योग्य आहे. इतर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये अशी लक्झरी नसते. मुळात ही बेंचची भानगड ही या कंपन्यांच्या दोन-तीन महिने नोटीस पीरिअडच्या धोरणामधून आली आहे असे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

आज जरी परिस्थिती कमालीची बदलली असली तरी पूर्वीही खूप काळ बाकड्यावर बसणार्‍यांना वार्षिक गुणांकनात मार खावा लागायचाच. अन पदोन्नातीही पुढे ढकलली जायची.. बाकी वैयक्तिक स्तरावरचे तोटे मूळ लेखात व चर्चेमध्ये उल्लेखिले आहेतच.

In reply to by श्रीरंग_जोशी

आयटीतले वार्षिक गुणांकन हा एक जोक आहे असे वाटते (हे कोणताही आयटीवाला मान्य करील). एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक कामगिरी त्या बेल कर्व आणि नॉर्मलायझेशनमध्ये अगदी गुळगुळीत होते. त्यामुळे ३.२ चे ३.१ होण्याव्यतिरिक्त फारसा फरक पडत नव्हता. शिवाय 'कंपनी माझ्यासाठी प्रॉजेक्ट शोधू शकत नाही ही कंपनीची चूक आहे माझी नाही' असे स्पष्टीकरण तयार असायचेच. मात्र सध्या कंपन्या करत असलेला आर्थिक उपाय हाच सर्वात परिणामकारक आहे.

In reply to by आजानुकर्ण

दहा वर्षापूर्वी अगदी दीड-दीड वर्षे बेंचवर राहूनही ३०० ते ४०० टक्के वेरिएबल पे घेतलेली मंडळी मी पुण्यात पाहिली आहेत.
या आयटीवाल्यांची दुःखं पाहून काळजाचं अगदी पाणी पाणी होतंय...

In reply to by राजेश घासकडवी

आपल्या जालिय वावरावरून आपण मा.त. क्षेत्रात जुने जाणते तज्ञ असाल असा गैरसमज झाला होता. आपण तसे नाहीत हे पाहुन जरा आश्चर्य वाटले...

In reply to by आजानुकर्ण

मी दुसर्‍या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे बेंच --> युटिलायझेशन --> अप्रेझल --> रेटिंग --> व्हेरिएबल पे पर्सेंटेज असा परिणाम होत जातो. रेटिंग प्रमाणे युनिट्चा आणि वैयक्तिक व्हेरिएबल पे कमी मिळणे हे नेहमीचे आहे. बेंच मुळे रेटिंग नाही आणि म्हणून उर्वरित काळात उत्तम काम करुनही प्रमोशन नाही हे बरेचदा घडते. मुळात इतर इंडस्ट्री ही इतक्या प्रमाणात पीपल बेस्ड नाही ज्यात इतकी वाढ / घसरणही होते. प्रॉडक्शन मध्ये वाढ झाल्यास बाहेरून काम केलं जातं / ओव्हरटाईम होतो / ऑर्डर बॅकलॉग होतो. घसरण झाल्यास बहुतेक वेळा टेम्पररी कामगार कमी केले जातात. त्यामुळे एकूणात बेंच ही संकल्पना फॉर्मल नाही. पण कुठलही मशीन १००% युटिलायझेशन केलं तर त्यात गरजेप्रमाणे वाढवण्यास वाव कमी राहतो. आय टी सोडून इतर इंडस्ट्री ही सगळा वेळ १००% वापरते आणि फक्त आयटी वालेच मजा करतात आणी टंगळ मंगळ करतात असे नाही. आय टी प्रमाणे पूर्ण प्रोजेक्ट बेस असलेली इंडस्ट्री म्हणजे ईपीसी - इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स -- ही मोठ्या प्रमाणावर आउटसोर्सिंग / सब काँट्रॅक्टिंग / टेंपररी कामगार यावर चालते आणि यातही परमनंट एम्प्लॉइजचं काम कमी जास्त होतं बेंचप्रमाणे.

In reply to by आजानुकर्ण

… वगैरे सॉफ्ट स्किल्सही डेवलप करणे आवश्यक असते.
या मुद्द्याशी १००% सहमत. आइटी मधील बहुतेक लोक्स नवनवीन बाबी शिकण्याची तयारी, मौखिक आणि विशेषतः लेखी संवादकौशल्य, निर्णयक्षमता, नेतृत्वक्षमता, पेहराव आणि दृश्यव्यक्तिमत्त्व इ. सॉफ्ट स्किल्सबाबतीत अपेक्षेपेक्षा दोन पावले मागेच असतात असा माझा अनुभव आहे. आइटीमध्ये पुढारलेल्या विशेषतः दक्षिणेतील राज्यांतील ताज्या दमाच्या (fresher) आणि अनुभवी दोन्ही प्रकारच्या लोकांची कथा सारखीच!

In reply to by आजानुकर्ण

ट्रान्स्फरेबल स्किल्स -- बरेचदा असे विविध स्किल्स वर काम केलेले लोक एक ना धड भाराभर चिंध्या होऊन जातात आणि प्रोजेक्टस मिळत गेले तरी कोअर स्ट्रेंग्थ आणि रेझ्युमे तयार होत नाही. आजूबाजूचे स्किल्स असावेत आणि वाढवावेत. पण "फ्लेक्झिबिलिटी" च्या नावाखाली आयटी मद्ध्ये जे काही चालतं त्याचं दु:ख त्यातून गेलेल्य व्यक्तीला चांगलंच माहीत असतं. इतर मॅनेजर्सशी संपर्क वगैरे सॉफ्ट स्किल्स -- सॉफ्ट स्किल्स हे बिहेविअरल स्किल्स असतात असा अंदाज आहे पॉलिटिकल नसावेत. बेंचवरच्या अनेक पब्लिकने आळस झटकून मिळतील ते प्रोजेक्ट करायला सुरुवात केलीच. -- बहुतेक ठिकाणी बेंचमुळे युटिलायझेशन पर्यायाने अप्रैजल रेटींग आणि म्हणून भविष्यातले प्रमोशन्स / पगार वाढ यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे बेंचवरचे सर्व आळशी असतात हा काही सर्वसामान्य नियम नाही. बेंचवर काही महिने गेल्यावर माणसे कशी असहाय होऊन वाटेल ते काम घेतात याची कल्पना असावी. त्याचा फायदा घेऊन अनेकदा काहीही असंबद्ध कामे गळ्यात मारली जातात. सीए मनुष्य युनिक्स वर आणि एमबीए टेक्निकल डिझाईनवर काम केलेले पाहिले. कर्मचारी आणि काम दोघांची वाट लागते. काही आडमुठे लोक असतात आणि त्यांना थोड्या अनुभवावर सगळं रेडीमेड हवं असतं हे खरं आहे. २००८-०९ मध्ये मंदीच्या काळात अनेक उत्तम लोक प्रोजेक्ट बंद झाल्याने बेंचवर आले. पुढचे प्रोजेक्टस नसल्याने लगेच काम मिळणे अशक्य होते ज्याचा त्यांचे स्किल्स/ अपग्रेडस / सॉफ्ट स्किल्स याचा काही संबंध नव्हता. या काळात ज्या कंपन्यांनी उत्तम युटिलायझेशन दाखवले आहे ते सपशेल खोटे होते. बरेचदा कॉफीबरोबर युटिलायझेशनचे आकडे कसे वाढवायचे आणि कुठल्या सब प्रॅक्टिसमध्ये किती वाईट स्थिती आहे आणि तरी त्यांनी काय भारी आकडा दाखवला आहे याची चर्चा व्हायची. अनेक कंपन्या बेंचची साईज कमी करत आहेत -- असावेत पण आत्तापर्यंत हा व्यवहार आतबट्ट्याचा नव्हता. अंगठ्याचा नियम -- सुमारे चार ते पाच दिवसाला कंपनी जेवढे बिलिंग तुमच्यावर क्लायंटला करते तेवढे त्या लेव्हलला महिन्याला ग्रॉस पगार असतो. यात थोडे कमी जास्त होते. बरेचदा ज्युनियर लेव्हलला कमीच. हा ढोबळ नियम आहे अगदी काटेकोर नाही पण वस्तुस्थितीपासून खूप दूरही नाही. या स्थितीत १५% बेंच अवघड नाही. इतर कॉस्ट वाढत आहेत आणि गेल्या तीन वर्षात पगार बरेच वाढले आहेत त्यामुळे बेंच परवडेनासा झाला आहे.

In reply to by मैत्र

त्यामुळे बेंच परवडेनासा झाला आहे. - मग आता काय सतरंज्या देणार काय कंपन्या यापुढं, अभ्या, काढतोस कारे एक चित्र, मोठा एसि हॉल आहे, चार बाजुला चांगल्या सतरंज्या, लोड,तक्के ठेवलेत, मधेच एक दोन पानाचे तबक आहेत, सकाळ ते संध्यानंद इकडं तिकडं विखुरलेत, एक दोन टिव्हीत इंद्रा द टायगर लावलाय,

In reply to by ५० फक्त

५० भाऊ.. चित्र डोळ्यापुढे आलं .. झक्कास :) इंद्रा द टायगर वाचून फिस्सकन हसू आलं. मस्त.. एकूणात मार्जिन्स कमी झाले आहेत. प्रचंड CAGR असण्याची वर्ष केव्हाच मागे गेली आहेत. आतल्या गोटातली बातमी अशी ऐकली आहे की २८% पेक्षा कमी ऑपरेटिंग मार्जिन्स नसतील तर बिड न करणारी एक प्रसिद्ध कंपनी सुद्धा आता बरेचदा या तत्त्वाला मुरड घालू लागली आहे - याला अर्थात वाढती स्पर्धा, वाढलेल्या कॉस्टस, एकूणात थोडी खराब आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. उदाहरण म्हणून सांगतो -- २००५ पर्यंत तरी चहा कॉफी पूर्ण फुकट होतं. काही ठिकाणी अजून काही स्नॅक्स वगैरे फुकट होते. आता बहुतेक कंपन्यांमधून फुकट मिळणारी चहा कॉफी बंद झाली आहे. काही ठिकाणी पुर्वी कँटीन मध्ये बनवलेला चहा फुकट होता त्याजागी अतिशय टुकार चवीची पेये देणारी मशिन्स आली आहेत डीप टी बरोबर. अशाच एका कर्मचार्‍यांच्या सोयी सुविधांसाठी प्रसिद्ध कंपनी मध्ये २००८ पर्यंत प्रत्येक मजल्यावर वर्तमानपत्रे असायची. २००९ च्या मंदीनंतर ती फक्त तळमजल्यावर ठेवण्याची पद्धत सुरू केली. (बहुतेक इमारतींना २-३ मजलेच असण्याची पद्धत आहे त्यामुळे ते शक्य झाले). पूर्वी एम्प्लॉई डिपेंडंट्सचा मेडीकल इन्शुरन्स कंपन्या सरसकट करत होत्या. आता वयाच्या आणि इतर अनेक अटी घालून त्यात बरीच कपात केली आहे. काही ठिकाणी आई वडीलांचा मेडीकल इन्शुरन्स कंपनीच्या कॉस्ट्मधून काढून टाकण्यात आला आहे. एका प्रसिद्ध मोठ्ठ्या कंपनीत पूर्वी कॉस्ट सेंटर्स होती. (त्याचं नाव सांगितल्यास बहुतेक जुन्या लोकांना समजेलच -- स्वॉन SWON) त्या धोरणात मोठे बदल झाले आहेत आणि पूर्णपणे कॉस्ट सेंटर असण्याला परवानगी दिली जात नाही. बहुतेक कंपन्यांनी पूर्वी नसलेले व्हेरिएबल पे अमलात आणून कमी झालेला नफा हा एम्प्लॉइजच्या कॉस्ट मध्ये काही प्रमाणात वाचवला आहे. वरच्या पदांवर व्हेरिअबल पे चे प्रमाण खूप वाढले आहे. कँटीन सबसिडीज आता कंपन्या भरणे टाळतात आणि ती कमी केलेली किंमत त्या केटररला बिझनेस देण्याच्या बदल्यात गळ्यात मारतात असे काही वेळा पाहिले आहे.

In reply to by मैत्र

एका प्रसिद्ध मोठ्ठ्या कंपनीत पूर्वी कॉस्ट सेंटर्स होती. (त्याचं नाव सांगितल्यास बहुतेक जुन्या लोकांना समजेलच -- स्वॉन SWON) त्या धोरणात मोठे बदल झाले आहेत आणि पूर्णपणे कॉस्ट सेंटर असण्याला परवानगी दिली जात नाही.
SWON वर invoice रेज करता येतो आता ?? नक्की ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अभ्या, काढतोस कारे एक चित्र, मोठा एसि हॉल आहे, चार बाजुला चांगल्या सतरंज्या, लोड,तक्के ठेवलेत, मधेच एक दोन पानाचे तबक आहेत, सकाळ ते संध्यानंद इकडं तिकडं विखुरलेत, एक दोन टिव्हीत इंद्रा द टायगर लावलाय,
पन्नासदादा मला आयटीकंपनीचं चित्र काढायला सांगताय का झेड्पीजवळच्या काँग्रेस भवनाचे? बाहेर ताई आणि साह्यबाचे दोन डिजीटल पण लावतो मग ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

नाही नाही.. स्वॉन वर इन्व्हॉस करुन बिलिंग होत नसावे.. मी आता तिथे नाही. त्यामुळे नेमके सांगता येणार नाही. उलट अनेक / जवळजवळ सर्व स्वॉन बंद केल्याचे समजले आहे. त्यामुळे इंटर्नल कॉस्ट वर बिलिंग दाखवणे बंद झाले आणि युटिलायझेशन हे पूर्णतः क्लायंट बिलिंगवरच होते असे ऐकले आहे.

In reply to by मैत्र

कॉस्टसेन्टर्स पूर्ण बंद करणे शक्य नाही. HR, Admin या सारखे विभाग हे पूर्णपणे कॉस्टसेन्टर्स असतात. इतकेच कशाला प्रत्येक बिल्डींगचे पण स्वॉन असते. या सगळ्या कॉस्ट त्या त्या विभागातील वॉन्स वर विभागून जातात. त्यामुळे तो खर्च कमी झाला कि आपसूकच युटिलायझेशन वाढते. यापेक्षा जास्त इथे लिहिता येणार नाही. Confidentiality चे बंधन आहे. व्यनित या, मारू गप्पा :-) (खूप लहान वयात वरील सिस्टीम्स आतून पाहिलेला) विमे ;-)

लेख आवडला. बेंचवर असणे काही काळासाठी खुप सुखाचे असेल यात शंका नाही. पण बेंचवर असण्याची काही तोटे कदाचित नॉन आय्टी पब्लिकला लक्षात यायचे नाहित: १. काही काळ बेंचवर असणे हे लगेच काम उपलब्ध नसल्याने होउ शकते. मात्र ६-७ महिने काम दिले जात नसेल तर बेंचवरचा इंजिनीयर माठ असणार असा समज होउ शकतो (तसे नसेल तरी). की माठ आहे म्हणुनच एवढे दिवस काम मिळत नाही. २. बेंचवर असणार्‍या माणसाची नौकरी रिसेशनमध्ये सगळ्यात आधी जाणार हे उघड आहे. ३. बेंचवरचा माणुस जर ७-८ महिने बेंचवर असेल तर त्याला नविन नौकरी शोधणेही अवघड जाणार. कारण ७-८ महिने अनुभव असा काहिच नाही. आयटी मध्ये पब्लिक लवकर आउट ऑफ नॉलेज जाते. शिवाय ८ महिने काम का दिले गेले नाही ह प्रश्न मुलाखत घेणार्‍याच्या मनात येणारच.

आयटीत आल्यापासून बाकड्यावर जायची संधी मिळालेली नाही. बाकी पहिले उदाहरण इन्फी बेन्च ला अगदी तन्तोतन्त लागू पड्ते आहे.

मस्त सुरु आहे. दहा वाजेपर्यंत तुमच्या एखादया त्रागा किंवा वैताग करणार्‍या मित्राबरोबर चहा आणि मसाला डोश्याबरोबर अध्यात्म, धर्म, जागतिक महायुद्धे, मानसशास्त्र असले विषय चघळता कोण बुवा अशी ही माठ नि निरुद्योगी त्रागाधारी मंडळी?

In reply to by ५० फक्त

बिचारा आधीच खुप सार्‍या गोष्टींना वैतागला आहे. त्यात आम्ही असा काही धागा काढला आणि त्यातला आमच्या मुक्ताफळांनी त्याचा अधिक त्रागा झाला तर?

वरील काही प्रतिसादांबाबतः- बेंचमुळे करिअरची, रेझ्युमेची वाट लागते असे काही वर लिहिलेले दिसले. किती जण रेझ्युमीवर मी दोन्-चार महिने बेंचवर होतो असे लिहितात? (माझ्या पाहणयत असा एकही रेझ्युमे नाही. सो चिल.) . बेंचसाठी सात जन्माचा उपाशी

In reply to by मन१

बेंचमुळे करिअरची, रेझ्युमेची वाट लागते असे काही वर लिहिलेले दिसले. किती जण रेझ्युमीवर मी दोन्-चार महिने बेंचवर होतो असे लिहितात?
बेंचवर गेल्याने तंत्र कौशल्याची वाट नक्कीच लागते. कारण विशिष्ट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचं ज्ञान कापरासारखं उडून जाणारं असतं. जर एखादया संगणक तंत्रज्ञानावर तुम्ही महिना दोन महिना काम केले नाहीत तर ते तुम्ही विसरु शकता. नविन नोकरीसाठी अर्ज करताना सहसा दोन महिन्यांपेक्षा जास्त बेंच कालावधी दाखवला जात नाही. कारण दोन महिने मॅनेजेबल असतात. किंबहूना गेले दोन महिने बेंचवर आहे म्हणून दुसरी नोकरी शोधतोय अशी मखलाशी केली जाते. खरं कारण असतं, एवीतेवी बेंचवर आलोय तर थोडं नॉलेज रीफ्रेश करुन बाहेर ट्राय करायला काय जातंय. मिळाली दुसरी नोकरी तर तीस टक्के पगारवाढ कुठेच जात नाही. पंचवीस टक्के तर डोळे झाकून देते समोरची कंपनी. दोन महिन्यांपेक्षा जास्त बेंच कालावधी रीझ्युमेवर दाखवणं म्हणजे आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेण्यासारखे आहे. ही व्यक्ती दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी बेंचवर आहे याचा अर्थ बरेच वेळा ही व्यक्ती प्रोजेक्ट मिळण्यास लायक नाही असा सरळ सरळ अर्थ घेतला जातो.

In reply to by धन्या

मिळाली दुसरी नोकरी तर तीस टक्के पगारवाढ कुठेच जात नाही. पंचवीस टक्के तर डोळे झाकून देते समोरची कंपनी.
तुमच्या दुःखांची यादी वाचून मला आणखीनच भरून येतं आहे. म्हणजे बेंचवर दोन महिने काढून आधीच वर्षाचा १६ टक्के पगार फुकट घ्यावा लागतो. त्यात फक्त २५ टक्के पगारवाढीची नोकरी शोधायला वेळ मिळतो.
ही व्यक्ती दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी बेंचवर आहे याचा अर्थ बरेच वेळा ही व्यक्ती प्रोजेक्ट मिळण्यास लायक नाही असा सरळ सरळ अर्थ घेतला जातो.
आणि मग काय, नाइलाजाने फक्त १० टक्के पगारवाढीची नोकरी स्वीकारावी लागते? इतके दुःखप्राय अनुभव गाठीशी नसल्याने 'सहानुभूती' देणं शक्य नाही.

In reply to by मन१

मुळात किती लोक खरे रेझ्युमे लिहितात ते पाहावे. आयटीमधील खोटे रेझ्युमे (आमीरपेट, बेगमपेट मु.पो. हैद्राबाद येथील विद्यापीठे) याबाबतही एखादा लेख यावा.

In reply to by आजानुकर्ण

आयटीमधील रेझ्युमेंचा खरेपणा हा संशोधनाचा विषय ठरावा. एखादयाला या विषयात पीएचडीही मिळू शकेल. या विषयावरही नक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करेन.

बेन्च १५% च्या आसपास असावा. ज्यायोगे नवीन प्रोजेक्ट सुरु करायलाही प्रॉब्लेम नसतो आणि मार्जिन्सही योग्य रहातात. १५% च्या खाली असेल तर रिक्रुटमेन्ट वाले जोरात कामाला लागतात. बेंच २०-३० % झाले तर सेल्स वाल्यांना आणि टॉप मॅनेजमेंटला रेड अलर्ट असतो. रेव्हेन्यु असुनही ग्रॉस मार्जिन्स २५-३०% च्या खाली आल्यास शेअर चा भाव लगेच कोसळतो.

च्यायला हे बेंच म्हंजे साल डोक्याला शॉट असतो. मी आधी मुंबई मध्ये एका टेलिकॉम कंपनी मध्ये होतो, पगार मनासारखा वाढत नव्हता म्हणून कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हिंजवडी मधल्या एका नामवंत आय टी कंपनी मध्ये गेलो . त्यावेळी पगार चांगला मिळाला पण साला एक नंबर टुकार काम दिले होते (अंडर व्ह्यालू म्हणतात तसे). तसे पण आय टी कंपनी मध्ये सध्या काहीच काम नसते,नुसते सपोर्ट चे काम असते, ८-१० वर्षापूर्वी भरपूर आणि चांगले काम होते तो प्रोजेक्ट संपल्यावर बेंच वर,१५ दिवसात डोक्याचा नुसता भुगा झाला मग एक महिन्यातच एचारचाने अचानक मिटिंग साठी बोलावले, मला वाटले नवीन प्रोजेक्ट असेल तर म्हणाला कंपनीची पॊलिसि बदलली आहे पुढच्या एका महिन्यात नवीन प्रोजेक्ट शोध नाहीतर नोटीस दिली जायील . रिसोर्स एचार म्हणे सध्या कंपनी कडे नवीन प्रोजेक्टच नाही आहेत. मग म्हंटल काशी करा मी चाललो १५-२० दिवसात परत दुसऱ्या टेलिकॉम कंपनी मध्ये रिसर्च आणि देव्हलपमेन्त मध्ये नोकरी मिळवली. सध्या मजेत डोक्याला जास्त शॉट नाही, वर्षातून एक दोनदा परदेशात ऑनसायीट काम आणि परत आल्यावर इकडचे काम. आता आय टी वाले चांगले काम नाही म्हणून रडणारे मित्र बघितले कि कॉलेज चे दिवस आठवतात; आय टी कंपनी चा कॅम्पस अटेंड केला नाही म्हणून आम्हाला युसलेस आणि टाकावू म्हणायचे लेकाचे. पुण्यात असताना हिंजवडी मधल्याच दुसर्या एका नामवंत आय टी कंपनीतला ८ महिने बेंच वर असलेला मित्रपण बघितला होता.

मस्त झाला आहे हा भाग... ;) वाचताना मजा वाटली

बाकी लेख कडक लिहिलाय.. चर्चा देखील त्याला अनुसरून.. बेंच प्रकार खरेच कंटाळवाणा आणि धोकादायक असावा.. कितीही एसीची हवा खा, नेटसर्फिंग करा, गपशप करा आणि या सार्‍याच्या बदल्यात फुकट पगार खा.. तरीही आयुष्यात जोपर्यंत सतत काही काम नाही करत तोपर्यंत आयुष्य सरकतच नाहिये, कुठेतरी अडकले आहे अशी भावना मनात येत असणारच.. सहा आठ महिने सरकारी नोकरीत तासाभराचेही काम न करता फुल्ल पगार घेऊन अन तरीही कंटाळून बाहेर पडलेला, एक माजी सहाय्यक अभियंता - बांधकाम विभाग.

In reply to by आनंदी गोपाळ

आता थोडक्यात लिहितो. "आयटी" ही अंब्रेला टर्म आहे. आयटी या नावाखाली हजार भानगडी येतात. यातल्या कुठल्या भानगडींशी तुमचा संबंध आहे यावर तुमचा पगार अवलंबून असतो. नॉनवाल्यांसाठी आयटी म्हणजे सॉफ्टवेअर निर्मिती असंच समिकरण असतं. ते तसं नाही. सॉफ्टवेअर निर्मिती हे आयटीचं प्रमुख अंग आहे. सॉफ्टवेअरची निर्मिती (डेव्हलपमेंट), त्याला वापरात आणणं (इंम्प्लिमेंटेशन) आणि नंतर वापर चालू असताना त्याची देखभाल करणं (मेंटेनन्स / सपोर्ट) आणि अशाच बर्‍याच बाबी असतात. तुम्ही यातलं कुठलं काम करता, त्या कामाचा तुम्हाला किती वर्षांचा अनुभव आहे यावरही बरेचसं अवलंबून असतं. तुम्ही "विंजिनेर" शब्द वापरला आहे प्रतिसादात. त्याबद्दल थोडंसं. आयटीत काम करणार्‍याला सर्वसाधारणपणे आयटी ईंजिनीयर म्हटले जाते. परंतू हे सारेच शिक्षणाने ईंजिनीयर (बीई/बीटेक, एमई/एमटेक) असतातच असे नाही. काही जण बीएस्सी, एमएस्सी, बीसीए, एमसीए (काही वेळा चक्क बीए, बिकॉमही) या पदव्या मिळवलेले असतात. बर्‍याचशा आयटी कंपन्यांमध्ये पगार देताना शिक्षणाने ईंजिनीयर आहे का हा मुद्दा विचारात घेतला जातो. बीई/बीटेक, एमई/एमटेक या पदवीधारकांना बर्‍याच वेळा झुकते माप दिले जाते.
साधारण कितपत पगार असतो हो आय्टी वाल्या विंजिनेर लोकांस्नी?
पोटापाण्याची सोय होण्याईतकापासून ते कितीही. (या कितीहीच्या जागी तुम्हाला जो मोठयात मोठा आकडा वाटेल तो टाका. कदाचित एखादया आयटीवाल्याला तुमच्या आकडयापेक्षाही जास्त पगार असू शकेल.)

In reply to by धन्या

काही जण बीएस्सी, एमएस्सी, बीसीए, एमसीए (काही वेळा चक्क बीए, बिकॉमही) या पदव्या मिळवलेले असतात यातल्या "बीए बीकॉमला" चक्क का केले ते कळाले नाही. आयटी / आयटीईस / सर्व्हिस बेस्ड / प्रॉडक्टबेस्ड कंपन्यांमधल्या लोकांचा परफॉर्मन्स ट्रॅक करणारी / प्रोजेक्ट रेव्हेन्यू कॅल्क्यूलेट करणारी व्यक्ती बीकॉम वाली असू शकते. गारेगार एसीमध्ये, गुबगुबीत खुर्चीवर बसून, फारसे कष्ट न करता मिळालेला पगार एखाद्या बीकॉम वाल्याने प्रोसेस केलेला असू शकतो. ;-)

In reply to by मोदक

तो "चक्क" शब्द आयटीशी थेट संबंध असण्याच्या संदर्भात आहे. एचार, फॅसिलीटी, फायनान्स वगैरे विभागात काम करणार्‍यांचा थेट आयटीशी संबंध नसतो.

In reply to by मोदक

यातल्या "बीए बीकॉमला" चक्क का केले ते कळाले नाही.
अगदी अगदी !!! हे सो कॉल्ड इंजिनीअर्स पण भारी असतात. हल्लीच एक इंटरव्यू घेतला. साडेपाच वर्षे अनुभव. आणि Array searching चे प्रकार सांग असे म्हटल्यावर कॉलेजनंतर ते कधी लागले नाही असे सांगितले. ही ज्ञानाची पातळी असेल तर बीए-बीकॉमलाच कशाला १२वीतील अनेक पोरांना जास्ती चांगले काम करता येईल. (इंजिनीअर्स या जमातीवर एकदा लिहायचे आहे) (नॉन इंजिनीअर्स) विमे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बीए-बीकॉमलाच कशाला १२वीतील अनेक पोरांना जास्ती चांगले काम करता येईल.
मुळात भारतीय सर्विस इंडस्ट्रीमधील आयटी कंपन्यांमध्ये ८० ते ९० टक्के कामासाठी इंजिनियर (बीई) वगैरे लोकांना बसवणे हेच मोठे अंडरयुटिलायझेशन आहे. सपोर्ट, मेंटेनन्स, ticket resolution वगैरेसाठी Data Entry Operator levelचे प्राथमिक ज्ञान असलेला कोणताही ग्रॅज्युएट चालेल. डेवलपमेंट वगैरे कामे सुद्धा अशा लोकांना गूगल सर्च किंवा वेगवेगळ्या टेक्निकल फोरम्स वरील सॅम्पल कोड वापरुन करता येतील. नाहीतरी बऱ्याच आयटी कंपन्या बीएस्सी बीकॉम वगैरेंना घेऊन चारचार वर्षाच्या बाँड्सवर ही कामे करुन घेतच आहेत. माझ्या आठवणीनुसार पाचसहा वर्षापूर्वी अशा 'सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना' आठएक हजार रुपये महिना पगार मिळत असे. आताची कल्पना नाही.

In reply to by आजानुकर्ण

एका कंपनीच्या २०१३ च्या अधिकृत माहितीनुसार ११५००/- पहिल्या वर्षी व त्यात तीन चार हजारांची वाढ प्रतिवर्षी. http://careers.wipro.com/pdfs/WASE_brochure_2013.pdf

In reply to by आजानुकर्ण

अच्युत गोडबोले जवळ जवळ अशीच मते मांडत फिरत असतात. भारतात या क्षेत्रात नव्याने काम करत असताना मलाही असेच काहीसे वाटले. अमेरिकेत येऊन एकाहून एक आव्हानात्मक कामे अंगावर पडल्यावर ते मत बदलले. असो, हा मुद्दा या लेखमालिकेच्या पुढील भागांत येईलच तेव्हा रोचक चर्चा होईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

अच्युत गोडबोल्यांचे माहीत नाही. पण मी एका प्रोजेक्टवर दहा बारा नवशिकी बीएससी मुले घेऊन काम केले आहे. काहीही अडचण येत नाही. उलट ही मुले आपल्याला सर-सर वगैरे म्हणतात, सांगेल ते काम झटून करतात आणि कंपनीला भरपूर पैशे मिळवून देतात. शिवाय त्याचा फायदा मॅनेजर लोकांना (कमी खर्चात जास्त फायदा मिळवून घेतला वगैरे) अप्रेजलमध्ये होतोच. त्यांच्या जागी चारपाच वर्षाचा अनुभव असलेला इंजिनियर बसवला की त्याला 'मला एवढे येते', 'मला अमुकतमुकच करायचे' असा इगो असतो. पुन्हा तो बाहेर नोकऱ्याही शोधत असतो आणि सोडून जाईन अशा धमक्याही देत असतो. असो. या विषयावर तुमच्याशी एकदा चर्चा होईलच ;)

In reply to by आजानुकर्ण

आमच्या इथंही जगातल्या विविधं ठिकाणी उत्पादन करणार्‍या प्लांटला सपोर्टसाठी आधी इंजिनीअर होती आता बिएससी इलेक्ट्रॉनिक्स घेतात. या लोकांना मस्ती कमी असते. आणि काम पण छान करतात. हे बहुतांशी आयटीत होत असेल असं वाटतं कारण माझे बरेच मित्र आयटीत जाउन आता दहा-बारा वर्षे झालियेत. त्यांना झकत म्यानेजरीयल क्यारीयर पाथ घ्यायला लागतोय. कारण तेव्हडा अनुभव असणारी इंजिनीअर्स आपल्याकडे लागतच नाहीत.

In reply to by आजानुकर्ण

मुळात भारतीय सर्विस इंडस्ट्रीमधील आयटी कंपन्यांमध्ये ८० ते ९० टक्के कामासाठी इंजिनियर (बीई) वगैरे लोकांना बसवणे हेच मोठे अंडरयुटिलायझेशन आहे.
परत तेच. मुळात या इंजिनियर लोकांना फार काही येत नसेल तर त्यांना अशी कामे दिली तर ते अंडरयुटिलायझेशन कसे ?? कठीण कामे दिली तर काय तीर मारणार आहेत हे ? की इंजिनियर ही डिग्री आहे म्हणून त्यांना भारी मानायचे ?? (एक वैयक्तिक प्रश्न :- तुम्ही इंजिनियर आहात का, शिक्षणाने?? )
सपोर्ट, मेंटेनन्स, ticket resolution वगैरेसाठी Data Entry Operator levelचे प्राथमिक ज्ञान असलेला कोणताही ग्रॅज्युएट चालेल. डेवलपमेंट वगैरे कामे सुद्धा अशा लोकांना गूगल सर्च किंवा वेगवेगळ्या टेक्निकल फोरम्स वरील सॅम्पल कोड वापरुन करता येतील.
विचारांची पातळी लक्षात आली..... आधी कीव वाटली मग खाली वाचून कळले की आपण मॅनेजर आहात. तेव्हा तुम्हाला माफ. चालू द्या जे काही चालू आहे ते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हो मी इंजिनियर आहे. अगदी ट्युरिंग मशीन, ऍडवान्स्ड युनिक्स प्रोग्रॅमिंग, कंपाईलर कन्स्ट्रक्शन, एन पी हार्ड प्रॉब्लेम वगैरे शिकलेला कॉम्प्युटर इंजिनियर. मात्र गेल्या बारा वर्षात एकदाही मला सर्चिंग अल्गोरिदम वापरावा लागलेला नाही आणि केवळ दोनतीन वेळा सॉर्टिंग अल्गोरिदम वापरून शून्यापासून कोड लिहावा लागला आहे. याचे कारण भारतातल्या आयटी कंपन्यांमध्ये package customization, enhancements, वगैरेच कामे होतात. त्यामुळे एवढे सगळे शिकूनही या ज्ञानाचा कुठेही practical उपयोग झाला नाही.
विचारांची पातळी लक्षात आली..... आधी कीव वाटली मग खाली वाचून कळले की आपण मॅनेजर आहात. तेव्हा तुम्हाला माफ. चालू द्या जे काही चालू आहे ते.
यात पातळीचा काय संबंध आहे? भारतात ज्या कंपन्यांना आयटी लीडर्स वगैरे म्हटले जाते तिथली ऐंशी नव्वद टक्के कामे सपोर्ट आणि मेंटेनन्सची असतात. ती कामे हाताळण्यापुरते ज्ञान आजकाल गूगलवर सहज मिळते. असो तुमची माफी मिळाल्याने धन्य झालो. माफ केल्याबद्दल शतशः आभारी आहे.

In reply to by आजानुकर्ण

हो मी इंजिनियर आहे....... शून्यापासून कोड लिहावा लागला आहे.
ते ठीक आहे पण म्हणून ते न येण्याचे समर्थन करता कामा नये. हे म्हणजे एखाद्या फिजिक्स शिकलेल्याने मला न्यूटन चा नियम येत नाही कारण तो मला कधी थेट वापरावा लागला नाही असे म्हणण्यासारखे झाले.
याचे कारण भारतातल्या आयटी कंपन्यांमध्ये package customization, enhancements, वगैरेच कामे होतात. त्यामुळे एवढे सगळे शिकूनही या ज्ञानाचा कुठेही practical उपयोग झाला नाही.
सपोर्ट, मेंटेनन्स, ticket resolution वगैरेसाठी Data Entry Operator levelचे प्राथमिक ज्ञान असलेला कोणताही ग्रॅज्युएट चालेल. डेवलपमेंट वगैरे कामे सुद्धा अशा लोकांना गूगल सर्च किंवा वेगवेगळ्या टेक्निकल फोरम्स वरील सॅम्पल कोड वापरुन करता येतील.
तुमचे मत बदलल्यात मला व्यक्तिश: रस नाही पण तिथे माझ्या प्रोफेशन बद्दल चुकीचा संदेश जात आहे म्हणून लिहितो आहे. यातले कुठलेही काम गूगल सर्च ने करता येत नाही. गूगल सर्च बद्दल बोलायचेच झाले तर ते Development साठी पण करता येते. कसलेले प्रोग्रामर्स सुद्धा online reference शोधतात आणि वापरतात. आणि त्यात काहीही गैर नाही. नक्की काय आणि कुठे शोधायचे आणि ते कसे वापरायचे हेच माहित नसेल तर काय करणार? शिवाय reinventing wheel चा प्रकार कशाला करायचा? हे म्हणजे hardware मध्ये काहीतरी नवीन करणाऱ्याला तू डायोड किंवा IC स्वतः तयार करतोस का असे विचारण्यासारखे आहे* अजूनही मुद्दा कळला नसेल तर एक आव्हान आहे. मी काही बिसिनेस प्रोब्लेम्स देतो. त्यांची उत्तरे मला द्या. पण अट अशी की गुगल करूनच प्रोग्राम शोधून दाखवायचे. स्वतः १०% पेक्षा जास्त कोड लिहायचा नाही किंवा बदल करायचे नाहीत. स्वीकारताय ??? अंडरयुटिलायझेशन बद्दलच्या प्रश्नांना शिताफीने बगल दिलीत ते लक्षात आले हं माझ्या :-) त्यांना मुळात काहीच फारसे येत नसते हे एकदा कबुल केले की अंडरयुटिलायझेशनचा मुद्दा रद्दबातल होतो. * उदाहरण चुकले असेल पण आशय समजून घ्या.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

ते ठीक आहे पण म्हणून ते न येण्याचे समर्थन करता कामा नये. हे म्हणजे एखाद्या फिजिक्स शिकलेल्याने मला न्यूटन चा नियम येत नाही कारण तो मला कधी थेट वापरावा लागला नाही असे म्हणण्यासारखे झाले.
न येण्याचे समर्थन कुठे आहे? मी अमुकतमुक गोष्ट शिकलो होतो. ती मला त्यावेळी चांगली येत होती हे माझ्या तत्कालीन गुणांवरुन वगैरे वगैरे कळू शकते. मात्र माझ्या प्रोफेशनमध्ये मी ती कधीही वापरली नाही त्यामुळे मला ती आता तितकीशी चांगली किंवा अजिबातच येत नाही हा साधा कार्यकारणभाव आहे. शिकलेली एखादी गोष्ट जर वापरली नाही, वारंवार आठवली नाही (recite), तर मेंदू ती विसरतो हे साधे फंक्शन आहे. मात्र तुम्ही प्रत्येक गोष्ट डिफेन्सिवली घेतली तर तुम्ही दुसऱ्या माणसाची नक्की काय क्वालिटी आहे हे तपासू शकणार नाही. उदा. मी सुद्धा फिजिक्स शिकलो आहे. दोनवर्षे हायर सेकंडरी आणि एक वर्षे इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला. मलाही न्यूटनचे जे काही चार नियम आहेत ते पूर्णपणे येत नाहीत. न्यूटनचा नियम येण्याने किंवा न येण्याने मी आता जे काम करतो आहे त्याच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडत नाही. तीच गोष्टऍरे सर्चिंग आणि सॉर्टिंगची. या गोष्टी कशा केल्या जातात याची थियरी मी शिकलो होतो ती मला माहीत होती. मात्र तो अल्गोरिदम मी स्वतः इंप्लिमेंट करण्यासाठी क्वचितच वापरला आहे. त्यामुळे जर तो पुन्हा वापरायचा असेल तर मला तो एकदा घासूनपुसून घ्यावा लागेल. आता मी दहा वर्षापूर्वी फिजिक्स किंवा अँरे सॉर्टिंग शिकल्याने दर सहा महिन्याला (किंवा जी काही स्मरणशक्तीची क्षमता असेल त्यानुसार मला रोजच्या कामासाठी आवश्यकता नसूनही) मी न्यूटनचा नियम किंवा अँरे सॉर्टिंग पाठ करत राहावे अशी अपेक्षा वेडगळपणाची आहे. त्याऐवजी माझ्या क्षेत्रात जे काही नवे चालू आहे ते शिकत राहणे मला फायद्याचे वाटते.
तुमचे मत बदलल्यात मला व्यक्तिश: रस नाही पण तिथे माझ्या प्रोफेशन बद्दल चुकीचा संदेश जात आहे म्हणून लिहितो आहे. यातले कुठलेही काम गूगल सर्च ने करता येत नाही. गूगल सर्च बद्दल बोलायचेच झाले तर ते Development साठी पण करता येते. कसलेले प्रोग्रामर्स सुद्धा online reference शोधतात आणि वापरतात. आणि त्यात काहीही गैर नाही. नक्की काय आणि कुठे शोधायचे आणि ते कसे वापरायचे हेच माहित नसेल तर काय करणार? शिवाय reinventing wheel चा प्रकार कशाला करायचा? हे म्हणजे hardware मध्ये काहीतरी नवीन करणाऱ्याला तू डायोड किंवा IC स्वतः तयार करतोस का असे विचारण्यासारखे आहे*
तुमचे प्रोफेशन जर टिकेट रिझॉल्युशन, सपोर्ट आणि मेंटेनन्स प्रकारचे असेल आणि तुम्ही गूगल सर्च वगैरे वापरत नसाल तर तुम्ही work smart ऐवजी work hard करत आहात एवढेच म्हणेन. तुमचे प्रोफेशन मी याआधी लिहिलेल्या कामापेक्षा जर थोड्या वेगळ्या प्रकारचे असेल तर तशी जरा बरी १०-१५ टक्के कामे भारतात होतातच की. मी ते कुठे नाकारले आहे? तरीही तुम्हाला वाटत असेल की भारतातील आयटी प्रोफेशन हे अगदी उच्च दर्जाचे innovational आणि ground breaking वगैरे काहीतरी आहे आणि तिथे अतिउच्चशिक्षित व्यक्तीच लागतात तर तुम्ही तो गैरसमज दूर करुन घेतल्यास तुम्हालाच फायदा होईल.
शिवाय reinventing wheel चा प्रकार कशाला करायचा? हे म्हणजे hardware मध्ये काहीतरी नवीन करणाऱ्याला तू डायोड किंवा IC स्वतः तयार करतोस का असे विचारण्यासारखे आहे*
एक्झॅक्टली. कसे बोललात. सगळ्या न्यू जनरेशन लँगवेजेस हे अत्यंत एफिशियंट सर्चिंग आणि सॉर्टिंग एपीआय देतात. नव्या ३-४-५ जी एल प्रॉग्रॅमिंग लँगवेजेसच्या लायब्ररीजचा अभ्यास करुन ऑलरेडी ट्राईड अँड टेस्टेड एपीय लगेच वापरता येतो. साडेपाच वर्षे अऩुभव असलेल्या इंजिनियरला 'तुला हे एपीआय वापरता येतात का? असल्यास कसे वापरायचे ते एक्सप्लेन कर' वगैरे प्रश्न विचारणे मला सयुक्तिक वाटते. मात्र त्याला सर्चिंग अल्गोरिदम सांग हे reinventing wheel आहे. मात्र नुकताच कॉलेजमधून पासआऊट झालेल्या मुलाला अधिक थिअरेटिकल असा अल्गोरिदमबाबतचा प्रश्न विचारला तरी चालेल.
अजूनही मुद्दा कळला नसेल तर एक आव्हान आहे. मी काही बिसिनेस प्रोब्लेम्स देतो. त्यांची उत्तरे मला द्या. पण अट अशी की गुगल करूनच प्रोग्राम शोधून दाखवायचे. स्वतः १०% पेक्षा जास्त कोड लिहायचा नाही किंवा बदल करायचे नाहीत. स्वीकारताय ???
तुम्ही अजूनही माझ्या प्रतिसादाचे मर्म समजावून घेतलेले नाही. बिझिनेस प्ऱॉब्लेमची उत्तरे ही support, maintenance, ticket resolution. server availability, data failure वगैरे जी ब्रेड अँड बटर म्हणतो त्या स्वरुपाची कामे आहेत का? भारतात जशी टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, पटनी, वगैरे बॉडी शॉपिंग कम कन्सल्टन्सी करणाऱ्या कंपन्या आहेत तशाच थॉटवर्क्स, मॅथवर्क्स, इंट्यूट वगैरे कंपन्याही आहेत. मात्र एकूण आयटी एम्पलॉईजचा रेशो पाहिला तर जास्त प्रकारची कामे कोणती चालतात हे तुमच्या लक्षात येईल. बिझिनेस प्रॉब्लेमची उत्तरे गूगल करुन मिळतात हे मी कुठे लिहिले होते ते दाखवावे. ज्या स्वरुपाची लो-एंड कामे मुख्यत्वे होतात त्याची उत्तरे गूगलवर सहज मिळतात हा माझा दावा होता.
मुळात या इंजिनियर लोकांना फार काही येत नसेल तर त्यांना अशी कामे दिली तर ते अंडरयुटिलायझेशन कसे ??
अंडरयुटिलायझेशनच्या मुद्द्याला बगल दिलेली नाही. इंजिनियर लोकांना फार काही येत नाही हे तुमचे इंटरप्रिटेशन साडेपाच वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तीला साडेपाच वर्षापूर्वी शिकलेला अँरे सर्चिंग अल्गोरिदम येत नाही या गृहितकावर अवलंबून असल्याचे मला दिसले. त्या इंजिनियरला इतर काही येते की नाही याबाबचा अधिक डेटा तुम्ही दिलेला नाही. जर त्या इंजिनियरला दुसरे काही येत नसेल तर त्याला ही कामे देणे अंडरयुटिलायझेशन नाही.

In reply to by आजानुकर्ण

दोन प्रोजेक्टसमध्ये बीई आणि बीएस्सी अशा दोन्ही प्रकारच्या डेव्हलपर्स बरोबर काम केलं आहे. (मी टेक्निकल / प्रोजेक्ट मॅनेजर नाही). बीएस्सी बद्दल कसलाही आकस / कमी भाव नाही. एका पातळीपर्यंत दोन्ही ग्रॅड्स एकाच दर्जाने काम करतात. काही विशेष अवघड लॉजिक आले की बरेचदा बीएस्सी ग्रॅड्सना झेपत नाही असा अनुभव आहे. क्लायंट अजिबात हँडल करता येत नाही. काही प्रॉब्लेम आला की बावरून जातात. नॉन टेक्निकल - फंक्शनल / अ‍ॅनालिस्ट ने सांगितलेले तांत्रिक परिभाषेत सहजपणे करता येत नाही. मध्ये परत एक तंत्रज्ञ लागतो टेक्निकल फ्लोचार्ट सांगणारा. अर्थात हा विदा दोन प्रोजेक्ट्सच्या आणि भारतातील पहिल्या दोन मोठ्या कंपन्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे. म्हणून तो सर्वच बीएस्सी ग्रॅड्स आणि सर्व ठिकाणी लागू होईल असे नाही. सपोर्ट मध्ये बरेचदा हे ग्रॅड्स मनापासून काम करतात आणि बीई लोक जेमतेम चार वर्षात ६-८ लाखाची स्वप्ने पाहत चांगलं काम आणि अगदी बेसिक अनुभव असूनही रोज ब्रेकफास्टला नवीन जॉबचीच चर्चा करतात हा अनुभव आहे. काम गळ्याशी असताना प्रोजेक्ट पूर्ण करण्याऐवजी थापा मारून इंटरव्ह्युला जाणे हे नेहमीच पाहिले आहे. पीएमला काम नाही. फंक्शनल ला टेक्निकल माहीत नाही पण पगार मिळतो. मला मिळाला पाहिजे हे असते पण जबाबदारीची जाणीव या मधल्या वयातल्या इंजिनिअर्समध्ये कमी दिसते. ती जबाबदारी घेणारे झपाट्याने पुढे जातात. पण हे विश्व असं आहे की अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले किंवा खोटा अनुभव सांगणारे अनेक लोक वर्ष काढत तरून जातात. इतरत्र कोणी म्हटल्याप्रमाणे आयटी मध्ये रिस्क आणि त्रास कमी आहे. कित्येक तासांचं काम तर आता अनेक क्षेत्रात आहे पण सर्व ठिकाणि आयटी प्रमाणे पैसा/सोयी सुविधा/मान मिळत नाही. वैयक्तिक रिस्क कमी असते. जेव्हा कंपन्यांना गरज असते तेव्हा घाईमध्ये लोक उचलले जातात यात अनेक कमी दर्जाचे लोक भरती होतात. १ लाखाहून जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांमद्ध्ये असे असंख्य लोक दिसतात. कँपस मधून जेव्हा ५०-१००+ उचलले जातात तेव्हा असे ओले सुके पुष्कळ घुसतात.

In reply to by मैत्र

अगदी सरसकटीकरण नाही करायचं म्हटलं तरीही बीएस्सी वाले बीई झालेल्यांच्या पुढे तुम्ही म्हणतात तसा बरेच वेळा कमी पडतात हे वास्तव आहे. एमसीए झालेले मात्र तांत्रिक ज्ञानाच्या बाबतीत खुपच चांगले असतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. कदाचित म्हणूनच आयटी इंडस्ट्री एमसीए ही पदवी बीईला समकक्ष समजते.

पेटलाय धागा... आय.टी. वाले आपापसांतच भांडायला लागले तर आम्ही नॉन आय.टी. वाल्यांनी काय प्रतिक्रिया द्यावि??

In reply to by नानबा

तुम्ही आयटीवाल्यांच्या भांडणाची मजा घ्यायची. ;) विनोदाचा भाग बाजूला ठेवूया. या भांडणातूनही नॉन आयटीवाल्यांना एकाच गोष्टीकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टीकोन वाचायला मिळतील.

या धाग्यावर प्रतिसाद द्यायचा होता. मी लिहीपर्यंत बरीच चर्चा झाली आहे. माझ्या बाबतीत उदाहरण द्यायचं तर मी बेंचवर बराच काळ घालवला आहे. मी कंपनी ऑक्टोबर मधे जॉइन केली. त्यानंतर साधारण माझी ट्रेनिंग संपायला डिसेंबरचा मध्य उजाडला. डिसेंबर ह्या महिन्यात वर्षअखेर आणि ख्रिसमस या दोन्ही गोष्टिंमुळे फारसे नवीन प्रोजेक्ट येत नाहीत. प्रोजे़क्ट चालू व्हायला साधारण दोन महिन्याचा काळ गेला. या काळात नॉन आय टी बॅग्राउंड मधुन आलेलो असल्यामुळे काय शिकायचे ह्या बाबत संभ्रमच होता. ह्याकाळात टेबल टेनिस खेळणे, कॅरम खेळणे, लायब्ररीत जाऊन सगळे पेपर वाचून काढणे असेच दिवस काढले. ह्या नंतर हातात आलेले प्रोजेक्ट मधे बिलेबल असुन सुद्धा आम्ही बेंचवरच होतो. त्याचे कारण म्हणजेच जास्त रिसोर्सेस दाखवुन क्लायंट कडुन जास्त बिलिंग उकळणे असेच होते. हे इतके पद्धतशीर होते की आमच्या डेडलाईन सुद्धा जास्त बिलिंग साठी अ‍ॅडजस्ट केलेल्या होत्या. या काळात सगळ्यात मोळा अ‍ॅडव्हांटेज होता. इ-लर्निंग पोर्ट्ल चा अ‍ॅक्सेस. त्यातुन बर्‍याच चांगल्या प्रकारे स्किल्स बिल्ड करता आल्या. ह्यानंतर कंपनीच्या गरजेनुसार आम्हाला काम करत असलेली टेक्नोलॉजी बदलायची संधी मिळाली. मी प्रोजे़क्ट मधुन रिलीज झाल्यावर साधारण पंधरा दिवसांनी ट्रेनिंग सुरु होणार होती. तिथे परत एकदा बेंच अनुभवायला मिळाला. या ट्रेनिंग नंतर साधारण २-३ दिवसातच मला नवीन प्रोजे़क्ट मिळाला. पण माझ्या सोबतच्या पंधरा लोकांना प्रोजे़क्ट न मिळाल्यामुळे बळजबरी बंगळुरू ला हलवले. अजुन एक प्रकारचा बेंच अनुभवायाला मिळाला आहे तो म्हणजे BGC Bench. या प्रकारात क्लायंट स्वतः प्रत्येक रिसोर्स चा एका थर्ड पार्टी कंपनी कडुन बॅक्ग्राउंड तपासुन घेते. ह्या प्रोसेस ला साधारण दोन ते तीन आठवडे जातात. आणि त्या काळात क्लायंटचे काम जिथुन होते त्या आपल्याच कंपनीच्या ऑफिस मधे आपल्यालाच अ‍ॅक्सेस नसतो. माझ्या केस मधे BGC झाल्याचा निरोपाचा मला फोन आला त्याबेळेस माझा साखरपुडा चालू होता. सो बेंच चा असाही वापर करता येतो. :-) यानंतरच्या सर्व प्रोजेक्टमधुन बाहेर पडताना पुढ्ची सोय अधिच करुन ठेवलेली असायची ओव्हरऑल म्हणाल तर मी बेंच एन्जॉय केलाय. यापुढे आयुष्यात अनुभवावा लागेल का माहित नाही आणि इच्छा हि नाही. सध्या छोट्या कंपनीत काम करातान बेंच हा शब्दच बाद झालाय. आठ तास पुरेल एवढे काम नक्कीच प्रत्येकाकडे असते. जाता जाता :- आय टीतल्या फेक रेझ्युमे बद्दल हैद्राबादचा उल्लेख आला आहे. माझा सगळ्यात वाईट अनुभव म्हणजे एका दिवसात चाळीस फेक रेझ्युमे वाल्यांचा सामना करावा लागला होता. त्यातल्या चार लोकांनीच फक्त कबुल केले की त्यांचा रेझ्युमे खोटा आहे. बेंच चा धागा पहाताच आम्हाला आमचे मित्र धमालरावांची आठवण झाली. त्यांच्या आणि आमच्या बेंचच्या काळातल्या आमच्या खरडसंवादाच्या आठवणीने आमचे डोळे पाणावले.

माझे ६ महिन्यांचे ट्रेनिंग झाले. मग १ महिना बेंच, पण इंटर्नल काम असल्याने त्रास झाला नाही. आणि त्यानंतर जो सपाटा चालू झालाय तो आजतागायत थांबयचे नावच घेत नाही. मध्यंतरी ३ प्रोजेक्ट बदलूनही झालेत. एकदा तर २ प्रोजेक्टवर १ महिना एकसाथ काम केले. (मी >१,००,००० कर्मचारी वाल्या कं.त आहे.) माझा अनुभव असा राहिला आहे कि तुम्ही जर चांगले काम करत असाल तर शक्यतो बेंच वर नाही बसू देत. (स्वतःची स्तुती करत नाहिये :) ) पण रोज चहावर भेटणारे बेंचवाल्या मित्रांचे त्रासिक चेहरे बेंचची भितीच घालत असतात. ते दिवसभर मौजमजा करत असतात पण त्यांना कुणीतरी काम करणारा भेटला कि त्याला तासभर यांचे रडगाणे ऐकावे लागते. (आम्हाला टोमणे मारायची सोय असते "तुझ्यासारखा मी बिनकामाचा नाहिये, चल निघतो" वगैरे वगैरे) बाकी लेखाशी पुर्ण सहमत. ----------- जातवेद

In reply to by जातवेद

मी >१,००,००० कर्मचारी वाल्या कं.त आहे.
तुम्हाला बेंचवर येऊ देत नाहीत तेच चांगलं आहे. एकदा आलात की कुठून झक मारली आणि प्रोजेक्टमधून रिलीज घेऊन बेंचवर आलो असं होऊन जाईल. :) > १,००,००० कर्मचारीवाल्या कंपन्यांचा बेंच २५,००० च्या आसपास असतो. या पंचवीस हजारात माणूस कुठे हरवून जातो त्याचं त्यालाच कळत नाही.

धागा मस्त आहे... अगदी अद्भुत आणि सुरस अरेबियन नाईट्स वाचल्याचा आनंद मिळतोय!! :) पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक आहे...

In reply to by पिवळा डांबिस

असेच म्हणतो :) (नॉन-आयटी विंजिनेर)

In reply to by नंदन

हेच बोल्तो. पुभाप्र

साला सगळा फास्टफूडचा जमाना. तब्बेतिने लाईफ चघळत चघळत लुफ्त घ्यायचा सोडुन मरमर करायची कसली हौस म्हणायची ही. आयला... आम्हि तर बेंचवर नसुन देखील बेंचवाल्यांपेक्षा जास्त (रिकामटेकडे) उद्योग करतो, आणि वरुन चांगलं काम केलं म्हणुन मॅनेजरची शाबाशी देखील मिळवतो =)) अर्धवटराव

बेंच वर फार दिवस फुकट घालवले असतिल तर मुलाखतीच्यावेळी अशा व्यक्तिचा रीझ्युमे खोटा असेल तर पकडणे सरावाने शक्य होते असे अनुभवाने सांगता येईल. लेख आणि त्याच्यावरची चर्चा मस्तच. (नोकरी ब्दलण्याचा महिन्या-दोन महिन्यांचा काळ सोडता, गेल्या १३ वर्षात एकदाही बेंचवर आणि नॉनबिलेबलही नसलेला) - उपास

मस्त रे ! दुसरी कल्पना जास्त आवडली...एकदा संपूर्ण सह्याद्री हिंडायची घालायची इच्छा आहे...अश्या प्रकारे जर बेंच वर गेलो तर नक्कीच पूर्ण होईल :) बाकी धनाजीराव यंदाच्या सिझनला फुल फार्मात...

In reply to by मालोजीराव

मस्त रे ! दुसरी कल्पना जास्त आवडली...एकदा संपूर्ण सह्याद्री हिंडायची इच्छा आहे...अश्या प्रकारे जर बेंच वर गेलो तर नक्कीच पूर्ण होईल :) बाकी धनाजीराव यंदाच्या सिझनला फुल फार्मात...

भारततल्या सगळ्या फॉरेक्स ट्रेडर्सना रीजर्व बँकेने डीसेंबर २०११ पासुन बेंच वर बसवलेले आहे अजुन काम देण्या बद्द्ल काही बोलत नाही.

एवढे सगळे बोंबलत आहेत तर शेवटचे सांगुन टाका की हा बेंच (बाकडा) ज्यावर बशित्यात त्यो कंपनी पुर्विते की घरुन्श्यान घिवुन जावा लागतो ?

एवढे सगळे बोंबलत आहेत तर शेवटचे सांगुन टाका की हा बेंच (बाकडा) ज्यावर बशित्यात त्यो कंपनी पुर्विते की घरुन्श्यान घिवुन जावा लागतो ?