✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मला समजलेले गांधीजी (भाग - १ ) - गांधीहत्या आणि मी

र
राजघराणं यांनी
गुरुवार, 01/31/2013 - 12:35  ·  लेख
लेख
मला समजलेले गांधीजी (भाग - १ ) - गांधीहत्या आणि मी मला समजलेले गांधीजी (भाग - १ ) १. गांधीहत्या आणि मी विद्यार्थिदशेत मी मुंबई ला राहायचा . बांद्रे . मातोश्री पासुन पाच मिनिटावर . हिंदुत्वान भारलेलं वातावरण होत . रुद्राक्षाच्या माळा . गंध . शाल . खणखणाट. शिवसेनेच्या शाखेवर कोलनितलि पोरं पडिक असत. कैरम खेळताना तिथं चाललेल्या देशभक्तीच्या चर्चा कानावर पडत असत. त्यात गांधिजिंचा उल्लेख टकल्या असाच हमखास होत असे. त्यानं देशाची वाट लावली असं ठाम मत सोंगट्या उडवताना व्यक्त केल जाई . आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला होता. त्यांची बकरी , पंचा, मुसलमानांच लांगुलचालन हे सारे आमच्यासाठी विनोदाचे विषय होते. गांधिंनि सगळ्या हिंदुना बकरी बनवायचा ध्यास घेतला होता . मुसलमानांच्या बकरी ईद ची सोय करायला ... किवा ... हो गांधीजी हे राष्ट्र पिता आहेतच कारण - त्यांनी देशाची आई **ली...... . किंवा याहून घाणेरड्या विनोदांना आम्ही धो धो हसून दाद देत असू. पुढे कुठल्यातरी पुस्तक प्रदर्शनात गोपाळ गोडसे यांच पुस्तक हाती लागलं . पुस्तकाच्या कव्हरवर आगीच्या ज्वाळा होत्या . विकत घेऊन वाचल. त्या पुस्तकांनी त्यावेळी मनात आग पेटली होती . देशाची फाळणी करणाऱ्या आणि दुश्मन पाकड्यांसाठि पंच्चावन्न कोटीचे दान देणार्या या अधमाला नथुराम गोडसे मारतो ते एक राष्ट्रीय काम होते असे मला वाटत असे. देशभक्ती हे पाप असेल तर मी पापी घोर भयंकर । मात्र पुण्य ते असेल जर मग नम्र माझा अधिकार तयावर ! a अहिंसे चे बाळकडु पाजून गांधीने देश षंढ बनवला. हिंदुस्थान च्या नामर्द पणाचा हा बाप आणि पाकिस्तानचा राष्ट्रपिता - त्याविषयी आदर वाटणं मला शक्यच न्हवतं . वाचनाच्या गोडितुन पुढे मला विज्ञानाविषयी प्रचंड आकर्षण आणि कुतूहल निर्माण झालं . प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो आणि मानवी बुद्धीला अधिक प्रयत्नाने आज ना उद्या तो उलगडू शकतोच असे मला वाटे. पूर्वी वरुणराजा पाउस पाडत असे. त्यानं तो पाडावा म्हणुन ऋषी यज्ञ करत असत . आता समुद्रातल्या वाफेचे ढग बनून नैऋत्य मोसमी वार्यांमुळे पाउस पडतो हे ठौक झालय. आपण कृत्रिम पाउसही पाडू लागलोय . जगातली सर्व रहस्ये विज्ञान उलगडू शकते ... आज नाही तर उद्या पण मानवी तर्कशास्त्राला सारे उलगडेल .. अशी आमची विज्ञान निष्ठ - बुद्धिवादी दृष्टी विकसित होत होती . त्यामुळे तर गांधी विषयीच्या तीरस्कारात भरच पडत गेली. अस्पृश्यता काढता म्हणुन भुकंप होतात असे म्हणणारे सनातनी आणि अस्पृश्यता पाळता म्हणुन भुकंप होतात असे म्हणणारे गांधी.... दोघेही सारखेच मूर्ख आहेत असे मला वाटे . गांधिजिंचे अध्यात्म - आत्मशुद्धीचे उपास, श्रद्धावानांचा सेनानी होण्याचा त्यांचा मनसुबा, त्यांची विज्ञान विरोधी भूमिका , हिंद स्वराज मध्ये त्यांनी रेल्वे पासून सर्व तंत्रद्न्यानाला केलेला विरोध त्यांचे ब्रह्मचर्य आणि सत्याचे प्रयोग सार - सार बालिश खेडवळ आणि बावळटपणाच आहे असा मजबूत ग्रह मी करून घेतला होता. समग्र सावरकर साहित्याचे वाचन केल्यावर (थोड्याकाळासाठि का होईना) पण सावरकर वाचले असते तर खुद्द मोहनदास करमचंद गांधीही -- गांधिवादाचे विरोधक बनले असते असे वाटे. b पुढे वाचन वाढलं तसतसं देशासमोरचे अधिक प्रश्न नजरेस पडु लागले. डॉ आंबेडकरांच कीर लिखित चरित्र वाचल्यावर- जातिव्यवस्था हा रोग संपविल्याशिवाय देशाच भल होणार नाही हे मनापासून पटल. तिथेही व्हिलन गांधीच होता. चातुर्वणाचा समर्थक गांधी हा सनातनी होता आणि म्हणुनच त्याचे विचार आपल्या देशाला जातिमुक्त होऊ देत नाहीत असेही वाटे. पुढे सावरकर लिखित गांधी गोंधळ , अरुण सारथिंचे गांधिंवरिल टिकास्त्र आणि डॉ आंबेडकरांचे - गांधी आणि कोंग्रेस ने अस्पृश्यांसाठी काय केले ? हि पुस्तके माझ्या मनातला गांधी विरोध अधिकाधिक प्रबळ करत गेली . एक वेळ अशी आली कि वेगवेगळ्या पुस्तकातली उलट सुलट मते आणि तर्क वाचण्या बरोबरच ... माणसं वाचण अधिक आवश्यक आहे अस मला वाटु लागलं. कारण मत बनत ते माणसाच्या अनुभवातून . माणसं वाचू लागलो तसे नवे गांधी कळत गेले ... आणि गांधिंच हे पुस्तकाबाह्य आकलन फार वेगळ होतं . आज गांधीचा स्मृतिदिन .त्यानिमित्ताने ३ भागात माझे गांधिंविषयि आकलन लिहिण्याचे ठरवले आहे. हिंदुत्व वादी आणि आंबेडकरवादी या दोघांचाही गांधी हा प्रमुख आणि समान शत्रू आहे. तरीही या मुद्द्यापुराता का होईना पण या दोन प्रवाहांचा संगम झाल्याचे आढळत नाही. ते का ? हा चिंतनिय प्रश्न आहे. आणि लेखमालेच्या उद्याच्या दुसर्या भागात त्याचा उहापोह आपण करू . हिंदुराष्ट्र वादाच्या ध्येयाने पछाडलेल्या बहुसंख्य अतृत्प आत्म्यांना मात्र गांधी "वध " हा समर्थनीय आणि वधकर्ता पूजनीय वाटतो . ( कधी उघड पण निदान मनात तरी कायम ! ) साधारणत : पाच वर्षापूर्वी पुण्यातल्या एका हिंदुत्व वादी मंडळाने २ ऑक्टोबर ला समारंभाचे आयोजन केले होते. . कडव्या हिंदुत्व वादी मंडळिंनि गांधिजयंतिचा कार्यक्रम ठरवला या धक्क्यातून कसाबसा सावरत मी कार्यक्रमस्थळि पोचलो . तिथे ढोल ताशांचा गजर चालू होता . गुलाल उधळला जात होता. मंडळी नाचत होती . अध्यक्षांना भेटलो. अध्यक्षसाहेब म्हणाले " अभिनंदन ". "?". " आज गोडसेंनि गांधीला ठोकला !" . मी कपाळावर हात मारून घेतला. जयंती आणि पुण्यतिथि यातला फरक सांगण्यापासून सुरवात करावी लागणार होती ! विनोदाचा भाग सोडाहो . पण अज्ञान हा दोष नाही . गडबडीत चूक होऊ शकते . ३० जानेवारी हि गांधिंचि पुण्यतिथि साजरी केली जात नाही . कारण त्या दिवशी त्यांचा खून झाला होता. २ ऑक्टोबर हि एकच गांधी तारीख जनतेत बहुदा ड्राय डे मुळे फ़ेमस आहे. बिचार्यां अध्यक्षांनि गांधी विषयीच्या अज्ञानामुळे हा गोंधळ घातला होता. नथूरामच्या नाटकाने आणि गोपाळ गोडसेंच्या पुस्तकाने असे भरपूर अज्ञान पसरले आहे. मुख्य गोंधळ आहे तो वध - हत्या - खून या शब्दावरून .संस्कृतात किवा मराठीत कोणत्या अर्थाने हे शब्द वापरले जातात ? इथपासून गोंधळ सुरु होतो. संस्क्रुत डिक्शनरी - १) http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?page=424&table=molesworth&display=utf8 २) http://www.andhrabharati.com/dictionary/sanskrit/index.php#ws-1 वध आणि हत्या यात फारसा फरक नाही . वध म्हणजे वाइट व्यक्तीला ठार मारणे असा अर्थ तर बिलकुल नाही . 'पाञ्चजन्य'मध्येसुद्धा 'गोवधबंदी' असा शब्द वापरला गेलेला आढळला. गोवध हा शब्द कसा रुढ झाला मग ? गाय हि आपल्या पूर्वजांच्या मते दुष्ट होती काय ? दोन व्यक्तींच्य समोरासमोरच्या द्वंद्वात होतो तो वध. आणि युद्धात सामुहिक होतात त्या हत्या . साधरणत: असे वापरण्याचा प्रघात आहे. मी नथुराम बोलतोय नाटकाचे मराठीला योगदान काय ? असा प्रश्न कोणि विचारला तर वध शब्दावरून घातलेला घोळ असे त्याचे उत्तर येईल. c नाटकातला नथुराम म्हणतो : " आपण शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला असे म्हणतो - हत्या नाही - म्हणुन मी पण गांधीचा वध केला असे म्हणावे" असे नाटकातल्या नथूरामचे म्हणणे आहे. कंसवध हा शब्द वापरला जातो ते दोन व्याक्तीतले द्वंद्व युद्ध होते म्हणुन . चांगल्याचा वाइटावर विजय या अर्थाने नव्हे. हे नाटकातल्या नथुरामला कळलेले दिसत नाही . इथे त्या नथुरामचे संस्कृत भाषेविषयीचे अज्ञान दिसून येते. नाहीतर वध हा शब्द अनेकदा वाइट अर्थानेही वापरला जातो हे त्याच्या लक्षात आले असते. निदानपक्षि गोवध , अभिमन्यू वध, पितृवध, मातृवध, इत्यादी शब्द तरी "पंडित" नथुरामला ठाउक नकोत का? मुळ मुद्दा असा आहे कि इथे नथुरामला स्वत: ला शिवरायांची आणि गाधिंना अफझलखानाची उपमा द्यायची आहे. नथूरामची उपमा चुकली आहे. कंसवध , जरासंधवध , अफझलखान वध इत्यादी वधांच्य प्रसंगी समोरासमोरचे द्वंद्व युद्ध झाले होते . दोन्ही बाजू सशस्त्र होत्या . युद्धसज्ज होत्या . तूल्यबळ होत्या. एका शक्तिहीन निशस्त्र म्हातार्या माणसावर गोळ्या झाडणे हे समोरासमोरचे द्वंद्व आहे काय ? पुरुषार्थ आहे काय ? निदान नथुराम ने गांधिंना प्रतिकाराची संधि तरी दिली होती काय ? गांधिंनि प्रतिकार केला नसता हि गोष्ट वेगळी .. पण जिथे द्वंद्व् झालेच नाही तिथे वध होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही . तो एक भ्याड खून होता. गांधिंना हरवण्याचा द्वंद्वात्मक मार्ग होता . - तो म्हणजे लोकशाही मार्गाने कोंग्रेसला पराभूत करणे. हि लोकशाही गांधीची कोंग्रेसच देऊ पाहात होती. नथुरामला प्रतिकार करण्याची संधि गांधीच देत होते. पण नथुरामला आणि त्याच्या हिंदुमहासभेला गांधिंना निवडणुकीत हरवणे शक्य वाटत न्हवते. म्हणुन त्यांनी निवडणुकांच्या लढाइतुन पळ काढला . आणि खुनाचा शोर्ट कट स्वीकारला. राजकीय खून हे इतिहासात घडलेले आहेत. जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा खुनाचा पर्याय शिल्लक राहतो. मदनलाल धिंग्रा किंवा भगतसिंग यांनीही राजकीय वध केले होते . पण इंग्रजांशि लढण्यासाठी तेंव्हा लोकशाहीचे कोणतेहि मार्ग शिल्लक न्हवते. त्यामुळे ते समर्थनीय वाटतात . bk मग नथुरामचा शोर्ट कट त्याच्या अनुयायांना का समर्थनीय वाटतो ? देशाची फाळणी हा हिंदुत्व वाद्यांच्या लेखी एका महान गुन्हा आहे. आणि मातृभूमीचे तुकडे करणार्याला त्यांच्या लेखी एकच शिक्षा आहे - वध ! ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे. अखंड भारतात बांग्लादेश तर येतोच पण पाकिस्तान सकट ची सर्व मुस्लिम लोकसंख्या ही येते. अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्या ४०% च्या आसपास जाते. आज १२% मुस्लिमांसमोर हतबल झालेले राजकीय हिंदू नेत्रुत्व अखंड भारतात शिल्लक तरी राहिल का? हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे. खरे पाहता हिंदू समाजात आणी धर्मात तुलनेने राष्ट्रवादी गोष्टी कमी आहेत. हिंदूधर्माची मूलभूत शिकवण - परधर्म सहिष्णुता विरुद्ध इस्लामी जिहाद आणी उम्मत( कुराणसिद्ध मुस्लिम बंधुभाव) विरुद्ध हिंदू ची जातिव्यवस्था. ही लढाईच विषम आहे. हिंदुंकडची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांची लोकसंख्या. अखंड भारतात त्या एकमेव जमेच्या बाजूचे महत्व झपाट्याने कमी होणार होते. फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली . अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व झटकन उतरले. मुस्लिमांचे पायचाटे म्हणून गांधींना अहोरात्र शिव्या देणारे लोकमान्य टिळकांना मात्र पूजतात. . कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे हिंदुत्ववादी का विसरतात ?" फाळणीमुळे अखंड भारताच्या धोक्यापासून हिंदूंचे रक्षण झाले. हे वास्तव समजून घेतले पाहिजे. bb १५ ऑगस्ट १९४७ ला झालेल्या फाळणीला जवाबदार कोण ? हा प्रश्न गेली गेली ६५ वर्षे हिंदुस्थानी विचारवंतांना छळतो आहे. हिंदुत्ववादी अखंड हिंदुस्थानचा जप करत यासाठी गांधींच्या अहिंसक स्वभावाला जवाबदार ठरवतात. तर सेक्यूलर विचारवंत फाळणीसाठी संघाचा आक्रमक हिंदुत्ववाद आणी सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाला दिलेली मान्यता या गोष्टी दोषपूर्ण मानतात. सर सय्यदांनी प्रथम १८८७ साली द्विराष्ट्रवादाची तुतारी फुंकली होती त्यावेळी गांधिजी शाळकरी वयाचे होते आणी चार वर्षाचे सावरकर नुकतेच बोलायला शिकले होते. द्विराष्ट्रवादाच्या मागणीसाठी या दोन्ही लहानग्यांना जवाबदार ठरवणे हे बालिशपणाचेच ठरेल. द्विराष्ट्रवादाची मागणी फाळणीसाठी न्हवतीच ती अखंड भारतासाठी होती. सर सय्यदांची द्विराष्ट्रवादी भुमिका एकदा समजली की फाळणीची अपरिहार्यता चटकन लक्षात यील. मुस्लिम अल्पसंख्य आहेत. पण ती एक राज्यकर्ती जमात आहे. भारत स्वतंत्र झाला की लोकशाही आलीच. संख्येच्या बळावर हिंदू ही राज्यकर्ती जमात बनेल. डोक्याचे वजन न मोजता डोक्यांची फक्त संख्या मोजणारी भुक्कड लोकशाही सय्यद अहमदांना मान्य न्हवती. हिंदू आणी मुसलमान हे भारत नावाच्या वधूचे दोन सुंदर डोळे आहेत म्हणून राजकीय सत्तेचे वाटप दोन्ही डोळ्यांना समान झाले पाहिजे. आणी म्हणूनच सर्व सत्ताकेंद्रात (लोकसभा ते ग्रामपंचायत) ५० % राखीव जागा मुस्लिमांसाठी असल्या पाहिजेत असे सय्यदांचे म्हणणे होते. ३०% मुस्लिमांसाठी ५०% जागा आणी हिंदूच्या भावनेसाठी अखंड भारत. असा द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा आशय आहे. मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्‍याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली ! सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:! (अर्थः सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली तर शहाणा माणूस अर्ध्याचा त्याग करतो आणी उरलेल्या अर्ध्या चा स्वीकार करतो ! ) त्यामुळे गांधिंनि फाळणी करून हिंदुचा घात केला आणि म्हणुन त्यांचा वध समर्थनीय आहे असे म्हणणारे डबल ढोलकी ठरतात. मग गांधी हत्येचे समर्थन करण्याचे काही कारण उरते काय ? गांधिंनि हिंदुचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीने योजनापूर्वक फाळणी केली असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही . पण गांधिहत्येच्या समर्थकांनाहि ते कारण पुढे करता येणार नाही कारण सकृत दर्शनी तरी फाळणी हिंदुना हितकारक ठरली आहे. ५५ कोटीचे कारण तसेच फुसके आहे. गांधीना मारायचे प्रयत्न ५५ कोटीच्या आधीपासूनचे आहेत. असे अनेक प्रयत्न नथुराम गटाने बरीच वर्षे केलेले आहेत. डॉ आंबेडकरांचे पाकिस्तान ओर पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक अशाच डबल ढोलकी विचारवंता कडुन अनेकदा वापरले जाते. वस्तुत: आंबेडकरांनि हे पुस्तक फाळणीचे समर्थन करण्यासाठी लिहिलेले आहेत. दार उल हार्ब आणि दार उल इस्लाम अशी जगाची वाटणी इस्लामी धर्मशास्त्राने केलेली असल्याने मुस्लिमांचे हिंदुबरोबर सहजीवन अशक्य आहे - फाळणी अपरिहार्य आहे असे आंबेडकर म्हणतात. अखंड भारतात धार्मिक प्रश्न उग्र बनून राहतील आणि मग सामजिक सुधारणांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच उरणार नाही . या भावनेतून वेगळ्या चुली मांडणे बरे म्हणत आंबेडकरांनिहि फाळणीला पाठिंबा दिला आहे. नथुरामला आणि त्या विचारसरणीच्या लोकांना हिंदु समाजाचे आकलन झालेलेले न्हवते . आजही झालेले नाही . हिंदु समाज अहिंसक वगैरे कधीच न्हवता. महाभारतातलि भाउबंदकि आधुनिक भारतापर्यंत सनातन चालू आहे. शेतिच्या बांधावरुन भाऊ भावाचे खून करतो. राज्यावरून चुलत्यांचे रक्त वाहवले जाते. जातिपातिंचा आजचा संघर्ष थेट एकलव्य किवा शंबुक किंवा परशुराम पर्यंत भिडवला जातो. हिंदु लोक एक राष्ट्र - एक जीव नाहीत. आधुनिक राष्ट्रवादाच्या, लोकशाहीच्या परिप्रेक्षातुन हिंदुना पहायला शिकवणे हि काळाची गरज होती. त्यासाठी गांधिंनि अहिंसा हे उपकरण वापरले. त्यानेच त्यांनी हिंदु लोकांची मने जिंकली. महाराष्ट्रातले उदाहरण द्यायचे झाले तर ब्राह्मणेतर चळवळीचे देता येईल . टिळकांची जहाल कोग्रेस ब्रहमणेतर चळवळीला कधीच आपली वाटली नाही. त्या जहाल्पणात काहिंना ब्राह्मण्याचा वास येत होता. पण अहीसक गांधिंच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर पक्ष कोंग्रेस मध्ये आला हे विसरता येईल काय ? गांधिजिंच्या अहिंसेबद्दल आपण तिसर्या भागात अधिक सविस्तर चर्चा करू. फाळणी झाल्यानंतरहि मुस्लिमांना दंगलीची झळ पोचू नये म्हणुन हा महात्मा वणवण फिरत होता. पाकिस्तानातल्या हिंदुवर होणार्या अत्याचाराने नथुराम पेटुन उठला होता. त्याला इथल्या मुस्लिमांवर सुड उगवायचा होता ...... आणि हिंदुसमाजाला सुडाच्या तत्वाद्न्यानापासून दूर नेणारा महात्मा त्याला नको होता असाही तर्क लढवता येईल . सूडाचे तत्व अस्तनिताल्या निखार्यासारखे असते ते स्वत:लाही जाळतेच . दशतावादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानात आज तोच जिहाद अंतर्गत भस्मासुर बनला आहे हे दिसत नाही काय ? तरी क्षणभर युक्तिवादासाठी मान्य करू ...कि नथुरामला सुड घ्यायचा आहे. गांधिहत्येचा परिणाम काय झाला ? गांधीला गोळी घालताच एका क्षणात भारतातल्या मुस्लिम विरोधी दंगली थांबल्या हे खरे नाही काय ? नथुरामच्या गोळीने असंख्य मुस्लिमांचे जीव वाचले . त्याचे सुडाचे तत्व फेल झाले . पाकिस्तान ची निर्मिती हा गांधिविचाराचा पराभव आहे असे कोणास म्हणायचे असेल तर गांधिहत्येचा परिणाम हा नाथुरामि बदला तत्वाचा पराभव आहे हे हि मान्य करावे लागेल . पाकिस्तानची निर्मिती हा गांधीच्या सर्वधर्म समभावाचा पराभव होता असे म्हणणारे लोक कुराणाचा दाखला देण्यात पटाईत आहेत . कुराणातला जिहाद. काफ़िरांना मारण्याच्या आज्ञा . इस्लाम धर्माची ( कुराण प्रणित ) इतर धर्माप्रती असहिष्णुता याचे दाखले - कुराणातल्या आयतिंचे क्रमांक देत अवश्य देता येतील . गांधिजिंचि सर्वधर्म समभाव नावाची एक छोटीशी पुस्तिका आहे. त्यात गांधीजी विनम्रपणे म्हणतात कि दास आणि दस्युंविरोधातल्या ऋग्वेदातल्या ऋचांचे क्रमांक हि असेच दाखवता येतील . मानुस्मृतीतली शुद्रविरोधी टिपणे श्लोकांच्या क्रमांकासहित प्रसिद्ध झालेली आहेत . त्याचा नेमका अर्थ वेगळाच आहे असा वाद सर्व धर्म मार्तंड घालत बसतात. गांधीबाबा हि सुट - धर्माचा आधुनिक अन्वयार्थ काढण्याची सुट .... सर्वच धर्मांना देतात आणि त्याला - सर्वधर्म समभाव असे नाव देतात . आर्य समाजाचे संस्थापक , दयानंद सरस्वतिंनि आपल्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात मानुस्मृतीतली समता (!) उलगडली आहे. आंबेडकरांनि दयानंद सरस्वतिं बद्दल अनेकदा आदर व्यक्त केलेला आहे. फुलेंनी त्यांची पुण्यात मिरवणुकाही काढली होती. शाहू महाराज तर आर्य समाजिस्टच! कारण ग्रंथात काय आहे यापेक्षा ... भाष्य काराचा हेतू काय आहे हे महत्वाचे असते. गांधिंच्या मौलाना आझाद नामक शिष्याने कुराणातला सर्वधर्म समभाव उलगडला आहे ! गांधिंचा सर्वधर्म समभाव हा असा आहे. hkj थोडक्यात गांधिहत्येचे हिंदु म्हणुन समर्थन करता येत नाही हे मला उमगले आहे. त्यांच्या सर्व धर्म समभावा वर टिका करताना भान सोडले जाते हेही समजले आहे . तरी अधुनिक दृष्टिकोनाचे बुद्धिमान विचारवंत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यात वाद का झाले त्याचे खरे स्वरुप काय होते ... हा प्रश्न मला अस्वथ करतो. .. (क्रमश:) आगामी २) डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी ३) पुस्तकांपलिकडचे गांधी
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
37454 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

हा हा हा

रामपुरी
Fri, 02/01/2013 - 21:27 नवीन
जसं 'ते' शीखांचं शिरकाण काँग्रेसनं 'योग्य आणि उचित' ठरवलं होतं तसंच याचं पण आहे. दोन्ही माणसे एवढी "महान" होती की किरकोळ लोकांच्या एवढ्या हत्या कमीच म्हणाव्या लागतील. उगाच काहीच्याकाही अपेक्षा ठेऊ नका हा एक आगंतुक सल्ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मोठे झाड

विकास
Fri, 02/01/2013 - 21:36 नवीन
योग्य आणि उचीत नव्हते ठरवले हो.... तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी तर तात्काळ जनतेची समजूत घालायला म्हणले होते: "When a giant tree falls, the mother earth below shakes." :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

खरंच!

रामपुरी
Sat, 02/02/2013 - 02:32 नवीन
समजूत घालावी ती अशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

नाटक अथवा चित्रपट

मन१
Fri, 02/01/2013 - 22:57 नवीन
एलकुंचवारांचं गाजलेलं "वाडा चिरेबंदी" हे नाटक. ह्यात त्याच घटनेची पार्श्वभूमी वापरलेली आहे म्हणतात. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

वाडा चिरेबंदी - अवांतर

विकास
Fri, 02/01/2013 - 23:47 नवीन
मला नाही वाटत "वाडा चिरेबंदी" गांधी हत्या संबंधातील नाटक होते म्हणून. ते एक अतिशय आर्टीस्टीक गूढ नाटक होते. आठवते त्याप्रमाणे एलकुंचवार लिखित, विजया मेहता दिगदर्शित आणि तसेच दिग्गज कलाकार होते. त्यात जे दाखवले होते त्याचा थोडक्यात सारांश असा होता, की जुन्या प्रथा/रुढी आणि त्याच प्रमाणे एका कुटूंबाच्या चिरेबंदी वाड्यातील सर्व आठवणी / कल्चर हे त्या वाड्याशी मनाने संलग्न असलेल्या कोणालाच सोडवत नसते. त्या संदर्भात वर्षानुवर्षे तेथेच रहाणार्‍या व्यक्ती, बाहेरच्या जगाची साथ ऐकू येणारी (किंचीत अर्धवट) मुलगी,बाहेरच्या विश्वात रहायला गेलेला अधुनिक मुलगा, त्याचे कुटूंब,हे सर्वच कुठल्यानकुठल्या पद्धतीने त्या चिरेबंदी कल्चर मधे अडकलेले असतात.... त्याचा संबध होता तो रुढीत जखडलेल्या मनोवृत्तीशी. गांधी हत्येशी काही संबंध नव्हता. असलाच कदाचीत तर पासिंग उल्लेख असेल... नाव आठवत नाही पण, सुहास जोशी - श्रीराम लागू या दोघांनी संस्थानिक पतीपत्नीची भुमिका केलेले एक नाटक होते त्यात दोघे जण (नाटकाच्या) शेवटी (गांधी हत्येनंतर) जेंव्हा दंगलखोर वाडा जाळायला येतात आणि त्यात ते आपखुषिने भस्मसात होण्याचा निर्णय घेतात असा किस्सा आहे. अर्थात तो नाटकाचा मुख्य विषय नव्हता. तसेच माझ्या मुळच्या प्रतिसादात "नाटक्/चित्रपट" का काढला नाही अशी तक्रार नाही, तर एकंदरीत गांधीहत्येचा आजही वापर करताना नंतरचे तथाकथीत सुधारकी वर्तन त्यावेळच्या हिंसाचारासंदर्भात कसे कानाडोळा करत आले ह्याचे विश्लेषण म्हणून होते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

त्या नाटकाचे नाव 'अग्निपंख'

योगप्रभू
Sat, 02/02/2013 - 00:21 नवीन
अग्निपंख हे त्या नाटकाचे नाव. डॉ. लागू आणि सुहास जोशींचा जबरदस्त अभिनय होता. नंतर त्याचे प्रयोग झाले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

धन्यवाद

विकास
Sat, 02/02/2013 - 00:41 नवीन
बरोबर "अग्निपंख" असेच नाव होते. त्याचे विशेष प्रयोग झाले नाहीत. नाटक पण फार ग्रेट नव्हते, पण त्यातील दोघांच्या अभिनयामुळे लक्षात राहीले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

गंमत?

आजानुकर्ण
Fri, 02/01/2013 - 23:21 नवीन
एकंदर प्रतिसादाबाबत ढोबळ सहमती असली तरी हे वाक्य खटकले
सगळ्यात गंमत म्हणजे हे ज्यांच्या हत्येमुळे झाले ते अहींसावादी .... झाले
यात गंमत कशी ते कळले नाही. गांघी अहिंसावादी आणि दंगल करणारे गांधीवादी यात गंमत नक्की दोन्ही गोष्टींची आहे की फक्त वाक्याच्या उत्तरार्धाची? गांधींची हत्या होऊन नंतर दंगल होणे याचा गांधी अहिंसावादी होण्याशी काही संबंध नसावा. फारतर गांधींच्या नावावर हिंसा करणारे स्वतःला अहिंसावादी म्हणत होते ही गंमत ग्राह्य मानता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उपरोधाने

विकास
Fri, 02/01/2013 - 23:35 नवीन
"गंमत" हा शब्द उपरोधाने वापरलेला आहे. तरी देखील आत्ता परत वाचताना वाक्य एकूणच गंडल्याचे लक्षात आले. (चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद). सगळ्यात गंमत म्हणजे हे ज्यांच्या हत्येमुळे झाले ते अहींसावादी आणि नंतरचे सामान्य जीवनाची हत्या करणारे हत्येकरी हे गांधीटोपीधारी गांधीवादी झाले. हे वाक्य त्या दंगलखोरांना लागू आहे (अर्थातच गांधीजींच्या बाबतीत "गंमत" म्हणलेले नव्हते) . थोडक्यात अर्थ असा: "हे ज्यांच्या (म्हणजे गांधीजींच्या) हत्येमुळे झाले ते नंतर सामान्य जीवनाची हत्या करणारे हत्येकरी हे अहींसावादी गांधीटोपीधारी गांधीवादी झाले." असे हवे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

तेव्हाचे (ब्राह्मण)

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/01/2013 - 23:27 नवीन
तेव्हाचे (ब्राह्मण) मुख्यमंत्री (हा आजघडीचा प्रचलित शब्द) बाळासाहेब खेरांनी दंगलग्रस्तांना मदत केली तशीच दंगलखोरांवर फार कारवाई होऊ न देण्याची भूमिका घेतली. डॉ. सदानंद मोरेंच्या 'लोकमान्य ते महात्मा'च्या दुसर्‍या खंडात यासंदर्भात विवेचन आहे, ते काहीसं असं की उत्तर पेशवाईपासून ब्राह्मण विरूद्ध कायस्थ, मराठा, अन्य जाती असा विद्वेष सुरू झालेला होता. तेव्हाचं कारण अर्थातच नाकर्ते आणि घाबरट (paranoid) पेशवे. त्याशिवाय ब्राह्मणांचं इंग्रजी राजवटीतही असणारं महत्त्वाचं स्थान, धार्मिक अधिष्ठान इत्यादींमुळे ब्राह्मण विरोधात तेल पडत गेलं. टिळकांच्या, शाहूंच्या वेदोक्त-शास्त्रोक्त प्रकरणात असणार्‍या पारंपरिक तरीही दुराग्रही भूमिकामुळेही त्यात आणखी भर पडली. मराठी ब्राह्मणांमधे जसे कट्टर गांधीवादी होते, विनोबा, (आणखी बरीच नावं आहेत, आता विसरले) इ. तसे कट्टर गांधीविरोधकही होते. टिळकांचा राजकीय वारसा चालवणार्‍या नरसोपंत केळकरांनीही 'तळ्यात-मळ्यात' करत कधी एक ठाम भूमिका घेतली नाही, पण ते मनाने नेहेमीच गांधीविरोधक होते. कट्टर गांधीविरोधकांमधे अर्थातच नथुराम आणि असे अनेक ब्राह्मण होते. त्यांचा मुख्य राग जातीय आणि प्रांतीय प्रकारचा होता, मराठी ब्राह्मणाकडून गुजराथी बनियाकडे नेतृत्त्व जाणे (हे डॉ. सदानंद मोरेंचं मत.) त्याशिवाय मनाचा कौल, अहिंसा, या गोष्टी होत्याच. गांधींच्या खूनामुळे काही शतकं चाललेल्या या ब्राह्मणद्वेषाला ठिणगी मिळाली. सूड किंवा न्यायबुद्धीने दोषींवर कारवाई केली असती तर ब्राह्मणांविरोधातला राग आणखी धुमसता राहिला असता. त्यामुळे तत्कालिन गृहमंत्री, सरदार पटेलांचा राग पत्करूनही बाळासाहेब खेरांनी कठोर कारवाई टाळली. (पुस्तक वाचून आता बराच काळ झालाय. त्यामुळे तपशीलात गफलती असण्याची बरीच शक्यता आहे. पण मुख्य मुद्दा, जातीकलह टाळणे, तो मोरेंच्या मताशी प्रामाणिक आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

?

विकास
Fri, 02/01/2013 - 23:58 नवीन
ज्यांचे कुणाचे हे लेखन असेल आणि जे कोणी त्याच्याशी सहमत असेल (मोरे यांच्या पासून आपल्या बद्दल सर्वांचाच आदर ठेवत) त्यांच्याशी पूर्णपणे असहमत. कुठल्याही सामाजीक हिंसेचे कुठल्याही पद्धतीने जर समर्थन अथवा बचाव करायचा ठरवले तर ते अशा कुठल्याही घटनेचे समान पद्धतीने करायला हवे. कारण जाती-जमातीतील आणि भिन्न धर्मातील वैर हे अनेक बाबतीत अनेक शतके असलेला आपला देश आहे. (तेच इतरत्र देखील). मग ते दुधारी शस्त्र ठरून त्यातून समाजात हिंसा करणे हे जनमान्य होऊ शकते. मग त्यातून त्या भूगाची, मग देशाची घडी विसकटू शकते, त्याचाच पुढे परीणाम सगळ्या जगावर देखील होऊ शकतो... असे अनेक दाखले जगभर पहाता येतील... म्हणूनच इतिहासातील selective घटनांचा, स्वतःच्या राजकीय/सामाजीक/वैचारीक स्वार्थासाठी कुणाचे तरी selective victimaization करत कुणालातरी सतत राक्षस ठरवत बोंब मारणे बंद झाले पाहीजे अशा मताचा मी आहे. ती परीपक्वता आणि प्रगल्भता जेंव्हा स्वतःला विचारवंत म्हणवणार्‍या तथाकथीत समाजधुरीणांमधे, माध्यमांमधे येईल तो सुदीन.. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

समर्थन नाही, कारणमीमांसा

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/02/2013 - 00:16 नवीन
पुस्तक वाचताना हे हिंसेचं समर्थन वाटलं नाही. गांधींजींच्या खूनानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जी हिंसा उसळली तिच्यामागची कारणमीमांसा समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. डॉ. मोरेंच्या मताप्रमाणे हा फक्त गांधी-अंध-भक्तीचा आविष्कार नव्हता. ब्रिटीशपूर्व काळापासून महाराष्ट्र हे एक सत्ताकेंद्र/सत्तास्थान असल्यामुळे मराठी लोकांमधे एकंदरच राजकीय जागृती अधिक प्रमाणात होती. (तीच गोष्ट बंगाल आणि पंजाबमधे, कारणं काही प्रमाणात वेगळी असली तरीही). त्याशिवाय जातीभेदांची किनार या दंग्याला होती. गांधी-अंध-भक्तांनी त्यांच्या खूनाचं कारण दाखवत गांधीवादी ब्राह्मणांनाही सोडलं नव्हतं. बहुदा शंकरराव देवांना किंवा त्यांच्या वडलोपार्जित घरादाराला याची झळ बसलेली होती. गांधी या 'महापुरुषाचा पराभव' त्याच्या अनुयायांनी केलेल्या या हिंसेमुळे झाला ही 'गंमत' आहेच; पण त्याचं कारण फक्त गांधीजींच्या भक्तांना अहिंसा, गांधीजींच्या विचारांचा गाभा न समजणं एवढंच नव्हतं. गांधीजींचा खून एका मराठी ब्राह्मणाने करण्याचं निमित्त झालं एवढंच. --- त्यापुढच्या इतिहासात इंदिरा गांधींच्या खूनाचा बदला घेण्यासाठी शीखांविरोधात हिंसा उफाळली. त्याचंही कारण फक्त आंधळी इंदिराभक्ती एवढंच असेल हे पटत नाही. पण अशा घटनांमुळे वाईट प्रथा सुरू होतात हे मान्य आहे. ठाण्यातही आनंद दिघे हॉस्पिटलात गेले म्हणून शिवसैनिकांनी हॉस्पिटलाचीच तोडफोड केली. शिवसेनेला हिंसा वेगळी शिकायची आवश्यकता नव्हतीच, पण महात्मा आणि इंदिरा गांधींच्या खूनानंतर उसळलेल्या हिंसेकडे, आणि त्यापुढच्या तुम्ही उल्लेख केलेल्या राजीव गांधींच्या मुक्ताफळांकडेही याचं पितृत्त्व काही प्रमाणात द्यायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

कल्पना आहे...

विकास
Sat, 02/02/2013 - 00:52 नवीन
पुस्तक वाचताना हे हिंसेचं समर्थन वाटलं नाही.
डॉ. मोरे यांचे लेखन माहीत असल्यामुळे कल्पना आहे. त्यावेळेस सरकारने का निर्णय घेतले याची अनेक कारणे असू शकतात, त्यातील हे देखील एक आहेच. अशी कारणमिंमासा अशा सर्वच प्रसंगात देत प्रस्थापित सरकारे वागली तर तथाकथीत विचारवंत गप्प बसतील/बसतात का? नाही हे उत्तर आहे. तथाकथीतच नाही तर प्रामाणिक विचारवंताने देखील गप्प बसू नये असे मी म्हणेन. पण त्यात आधी म्हणल्याप्रमाणे सिलेक्टीव्ह राक्षसीकरण करणे आणि ते देखील एका व्यक्तीच्या गुन्ह्याबद्दल संपूर्ण जातीजमातीचे, विचारांचे, संघटनेचे, संस्कृतीचे, हे अक्षम्य आहे आणि ते आपल्याकडे सातत्याने झालेले आहे. तुम्ही आनंद दिघ्यांच्या मृत्यूनंतरचे उदाहरण दिले, त्यात देखील काय दिसते? ती घटना (आणि दुर्घटना) २००१ साली झाली. तरी देखील २०१२ साली दिलीप डिसुझाला बाळासाहेबाच्या आजारपणात त्याच्या वाचकांना पहील्यांदा त्याच घटनेची आठवण करून द्यावीशी वाटली. थोडक्यात पब्लीक कारणमिंमासेपेक्षा त्यातील हिंसा लक्षात ठेवत इतरांना लक्षात ठेवण्यास भाग पडते - हे ठिकाण योग्यच आहे, पण आधी म्हणल्याप्रमाणे, सिलेक्टीव्ह...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

समजले नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/02/2013 - 01:16 नवीन
समजले नाही. राक्षसीकरण कशाचं? कोण करतं? आणि त्याचा विचारवंतांशी संबंध काय? दिलीप डीसूजाच कशाला, माझ्या ओळखीतल्या अनेकांनी (ज्यांना सर्वसाधारण लोक म्हणून ओळखता यावं) "सिंघानिया फोडून पोट भरलं नसेलच, आता मातोश्री फोडलं पाहिजे" अशा प्रकारच्या गप्पा खासगीत मारल्या होत्या. यातले काही लोक हिंदुत्त्ववादी, गांधीविरोधकही आहेत. बहुसंख्य ठाणे आणि परिसरातले आहेत. कुठेही बाँबस्फोट झाला, विशेषतः मुंबई आणि परिसरात, तर तेव्हा १९९२ च्या दंगलींची लगेच आठवण होते, (माझी अशी अजिबात इच्छा नाही) पण समजा काँग्रेसमधल्या कोणी बड्या राजकारणी व्यक्तीचा उद्या खून झाला, तर महात्मा आणि इंदिरा गांधींच्या खूनानंतर उसळलेल्या हिंसेची त्यात आठवण येणं अपरिहार्य आहे. विचारवंतांना ती आठवण कडू आठवण म्हणून होते, तेव्हा चुका झाल्या, त्या आता होऊ नयेत अशा प्रकारची ती आठवण असते. अशा वेळेस होणारी हिंसा हे फक्त लक्षण आहे. रोग भलतीकडेच असतो आणि बहुतेकदा तो लक्षणांशिवाय शोधणंही कठीण असतं. म्हटलं तर एखादा पाकीटमार किंवा मुलीची छेड काढणारा सापडला तरी आपल्याकडे पब्लिक त्याला मरेस्तोवर मारतं. तिथे तर जात, धर्म, राजकीय बांधिलकी काही-काही आड येत नाही. तिथे कोण विचारवंत असेल आणि त्याच्या/तिच्याकडे तेवढं शारीरिक आणि मौखिक बळ असेल तरच तो चोर/छेडखानी करणारा पब्लिकच्या हाणामारीतून सुटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

वेल सेड

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/01/2013 - 23:14 नवीन
लिखाण वाचून रिचर्ड डॉकिन्सची आठवण झाली. त्याची पुस्तकं उत्क्रांतीला विरोध करणार्‍या, देवभोळ्या लोकांना उद्देशून असतात; तसा हा लेख लेखकाची पूर्वीची जी गांधीद्वेषाची धारणा होती, ती अजूनही बाळगणार्‍या लोकांना उद्देशून आहे असं वाटतं. लेख आणि मांडणी दोन्ही आवडले. आता थोडी बाल की खाल. लिखाण उत्तम आहे म्हणून शुद्धलेखनाच्या उलुश्या का होईना, चुका टोचतात. प्रूफरीडर म्हणून काम करायला मी तयार आहे.
  • Log in or register to post comments

हास्यास्पद विधान

अनुराधा१९८०
Sat, 02/02/2013 - 00:04 नवीन
मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्‍याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली >>> मुस्मिल लीग विचारत कुठे होते काँग्रेस ला आणि गांधीना? त्यांनी २ च option ठेवले होते. एकतर सत्तेत ५०:५० भागीदारी, पंतप्रधान मुस्लिम लीग चा. किंवा फाळणी. नेहरुंना तर सत्ते ची स्वप्ने १९३७ पासुन च पडत होती त्यामुळे फाळणी मान्य करण्याशिवाय काही ईलाज च नव्हता. ह्या वधा नी एका हुतात्म्याला जन्म मात्र दिला. ईंदिरा गांधी चे पण असेच. आता ह्यांचे वध झाले म्हणुन ह्यांची पापे धुवुन निघली सगळी.
  • Log in or register to post comments

आज मला फार वेळ आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/02/2013 - 00:38 नवीन
ह्या वधा नी एका हुतात्म्याला जन्म मात्र दिला. ईंदिरा गांधी चे पण असेच. आता ह्यांचे वध झाले म्हणुन ह्यांची पापे धुवुन निघली सगळी.
सगळी पापं धुवून निघाली कारण आणि/किंवा याचा अर्थ हे लोक हुतात्मे झाले. अगदी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुराधा१९८०

बाई माफ करा .....

बाबा पाटील
Sat, 02/02/2013 - 00:09 नवीन
बाई माफ करा. आपण महान आहात ! आपले आर्दश आहेत्,आमची सपशेल माघार....
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लेख!

सोत्रि
Sat, 02/02/2013 - 00:18 नवीन
अतिशय सुंदर लेख!
दार उल हार्ब आणि दार उल इस्लाम अशी जगाची वाटणी इस्लामी धर्मशास्त्राने केलेली असल्याने मुस्लिमांचे हिंदुबरोबर सहजीवन अशक्य आहे - फाळणी अपरिहार्य आहे
फाळणीसाठी कोणीही जबाबदार असो, ती होणारच होती आणि ती झाली हेच बरे झाले. द्विराष्ट्रवाद मान्य असलेल्या अखंड हिंदुस्तानापेक्षा फाळणी झालेला हिंदुस्तान ह्यातच भले होते आणी आहे. - (गांधीवादी नसलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

जवळपास सगळ्या मुद्द्यांशी

शैलेंद्रसिंह
Sat, 02/02/2013 - 00:33 नवीन
जवळपास सगळ्या मुद्द्यांशी सहमत आहे. गांधींनी एकात्मतेचे राजकारण केले. मुस्लिम विरोध टाळला हेही सत्यच आहे. कारण हिंदु-मुस्लिम एकता जास्त मह्त्वाची होती. लीगचे नेते गांधींना पर्यायाने कॉंग्रेसला हिंदुंची संघटना म्हणुन प्रोजेक्ट करायला तयारच होते. गांधींना तेच नेमके टाळायचे होते. कॉंग्रेस ही हिंदुंची नसुन सगळ्या भारतीयांची प्रतिनिधी आहे हे त्यांना सिद्ध करायचे होते. फ़ाळणीचे श्रेय मात्र नेहरु-पटेल ह्यांना द्यायला हवे. ४०% मुस्लिम लोकसंख्येबरोबर लष्करातील मुस्लिमांची संख्याही जास्त होती. सैन्यातही मुस्लिम फ़ुटीरतावाद रुजला होता. ब्रिटीश गेल्यानंतर फ़ाळणी झाली असती तर ती मुस्लिम लीगच्या शर्तीवर झाली असती. पटेल-नेहरुंनी दुरदर्शीपणा दाखवला म्हणुनच आजचा नकाशा भारताला मिळाला. शेषराव मोरेंनी त्याचे श्रेय गांधींना उगाच दिलंय. फ़ाळणीच्या काळातली परिस्थित पाहता गांधींच्या हिंदु-मुस्लिम एकात्मतेच्या राजकारणाला सुरुंग लागलेले उघड आहे. मुस्लिम लीग राजकारणात प्रबळ असतांना हिंदु-मुस्लिम एकता हे एक दिवास्वप्नं बनलं होतं.
  • Log in or register to post comments

द्विराष्ट्रवाद

प्रसाद गोडबोले
Sat, 02/02/2013 - 01:50 नवीन
शेवटी फाळणीचे खापर कोणाच्या माथ्यावर फोडायचे ते सांगा , सरांच्या , की महात्म्यांच्या की स्वातंत्र्यवीरांच्या ?? शेवटी सगळेच ग्रेट !! बाकी आंबेडकर अन सावरकर ह्यांची कधीच चर्चा झाली नाही काय राव ? फाळणी होतच होती तर क्लीन स्वीप व्हायला हवी होती ...ह्यावर सावरकरांचे आंबेडकरांशी एकमत झाले असते कदाचित असे वाटते , नाही का ? (काडी टाकणे मोड ऑन : आणि आमचा पेटंट पश्न : ह्यालेखावरुन महात्माजींचे पायही मातीचेच होते असे आम्हास वाटले , मग त्यांन्ना(च) राष्ट्रपिता का म्हणावे ? :O आणि म्हणायचेच असेल तर ह्या हिशोबाने मग सावरकर , आंबेडकर , जीना(?) ह्यांना राष्ट्रकाका / राष्ट्रमामा म्हणावे काय ? =)) काडी टाकणे मोड ऑफ)
  • Log in or register to post comments

राज्यकर्ती जमात?

श्रीरंग_जोशी
Sat, 02/02/2013 - 02:00 नवीन
राज्यकर्ती जमात हा त्या काळात ठासून वापरला गेलेला मुद्दा असला तरी तो पटण्यासारखा नाही. भारतीय उपखंडात विविध जाती धर्मांचे राजे होते व त्यांच्या अधिपत्याखाली इतर धर्मांचे सरदार, सैन्य व जनता असायची. केवळ इंग्रजांचे राज्य येण्याअगोदर काहीशे वर्षे दिल्लीचे तख्त मुस्लिम व्यक्तिंकडे असले म्हणून लगेच सर्व मुस्लिम 'राज्यकर्ती जमात' बनू शकत नाही. मुळात उपखंडातील बहुतांश मुस्लिमांचा मुळ धर्म इस्लाम नव्हताच. परकीय आक्रमकांद्वारे तो लादला गेलेला होता. लेखाच्या आशयाशी सहमत.
  • Log in or register to post comments

१. किती वर्ष राज्य केलं हे

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/02/2013 - 02:10 नवीन
१. किती वर्ष राज्य केलं हे पहायचं तर महाराष्ट्रात ब्राह्मण मुघलांच्या अर्धा काळही सत्तेवर नव्हते. पण तरीही पराभव ब्राह्मण राज्यकर्त्यांचा झाला, जणूकाही ब्राह्मणांकडुन राज्य गेलं. ही पारंपरिक लढाऊ वृत्तीचीही नाही. तरीही सुरूवातीच्या काळात स्वातंत्र्याचे प्रयत्न महाराष्ट्रात याच जातीकडून झाले. बंगालमधे ब्रिटीश सत्ता आल्यावर हिंदू, विशेषतः ब्राह्मण सुखावले कारण मुसलमान सुभेदारचं राज्य गेलं. महाराष्ट्रात उत्तर पेशवाईत ब्राह्मणांचा अत्याचार सहन करणारे दलित, आणि इतर जातीतले लोक सुखावले. २. लादलेला धर्म असतो तो पहिल्या पिढीवर. पुढची पिढी त्याच, नव्या धर्मात जन्माला येते. मुघल आणि एकंदर मुसलमान राज्यकर्ते ब्रिटीश सत्तेआधी निदान काही शतकं उत्तर भारतात होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

'राज्यकर्ती जमात'

श्रीरंग_जोशी
Sat, 02/02/2013 - 02:17 नवीन
माझा मुद्दा एवढाच आहे, की कुठल्याही जातीच्या / धर्माच्या / गटाच्या लोकांना राज्यकर्ती जमात हे लेबल लावणे भारतीय उपखंडाच्या बाबतीत संयुक्तिक नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कार्यकारणभाव हुकला आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/02/2013 - 02:39 नवीन
आधी वर्तन लोकांनी केलं, मग लेबल लावलं गेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

ठिक आहे हो!

अग्निकोल्हा
Sat, 02/02/2013 - 04:24 नवीन
मुघलांच्या आधि काही "शे" वर्षे भारतात राज्य कोणाचं होतं या बाबत तुम्हि अनभिज्ञ आहात हे कळाले.. पण पुढे काय सांगायचय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

"आपलं" राज्य आणि "आपले"

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/02/2013 - 04:34 नवीन
"आपलं" राज्य आणि "आपले" राज्यकर्ते परत आणण्यासाठी जनसामान्यांकडूनही प्रयत्न केले जातात. राज्यकर्ती जमात असं म्हणताना विशेषतः उत्तरेकडच्या मुस्लिमांचा उल्लेख करताना लेखकाला हे सुचवायचं आहे. बाकी मी इतिहासात कच्ची आहे हे खरंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

+१

अग्निकोल्हा
Sat, 02/02/2013 - 05:00 नवीन
"आपलं" राज्य आणि "आपले" राज्यकर्ते परत आणण्यासाठी जनसामान्यांकडूनही प्रयत्न केले जातात. राज्यकर्ती जमात असं म्हणताना विशेषतः उत्तरेकडच्या मुस्लिमांचा उल्लेख करताना लेखकाला हे सुचवायचं आहे.
रेफरन्स कळाला.
बाकी मी इतिहासात कच्ची आहे हे खरंच.
:) ओह! प्लिज डु नॉट माइंड. अवांतर :- मुघलांविरुध्द इतकि शतके भारतिय राज्यकर्ते केवळ पराभुत होते पारतंत्र्यात न्हवते असा गोड गैरसमज भारतिय समाजमनावर होता काय ? असल्यास त्याचे कारण मुघलांमधे "लोकशाही" न्हवते हे असावं का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

काही स्पेक्यूलेशन्स

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/02/2013 - 06:20 नवीन
माझा खरंच इतिहास या विषयाचा फार अभ्यास नाही. पण काही स्पेक्यूलेशन्स:
मुघलांविरुध्द इतकि शतके भारतिय राज्यकर्ते केवळ पराभुत होते पारतंत्र्यात न्हवते असा गोड गैरसमज भारतिय समाजमनावर होता काय ? असल्यास त्याचे कारण मुघलांमधे "लोकशाही" न्हवते हे असावं का ?
शक्य आहे. सुरूवातीला मुघलांनाही विरोध झालाच. बाबर जिंकला पण हुमायूनचं बालपण अतिशय कष्टाचं, धावपळीचं होतंच. लोकशाही हे मोठं तत्त्व आहे हे लक्षात येण्याचं कारण म्हणजे इंग्लिश शिक्षण. त्यांची भाषा शिकून त्यांचे विचार वाचल्यावर त्यांच्या लोकांना असलेलं स्वातंत्र्य आम्हाला का नाही असा एक प्रश्न सहज उपस्थित झाला. मुघल आणि अन्य आक्रमकांकडे, आधीच्या काळात हे तत्त्व नव्हतंच. त्यातही राजपूत राजघराण्यांमधे राजाशी लग्न करून, सोयरीक जमवून, मांडलिकत्त्व पत्करून अगदी समान पातळीवर नाही तरी भारतीय लोक उच्चपदस्थ होतेच. यामुळे एतद्देशीयांचा राज्यकारभारात वरचष्मा होताच. अकबराच्या उदारमतवादी राजवटीमधे परकीय आणि आपले असा फरकही बराच कमी झाला असण्याची शक्यता आहे. दुसरं असं की मुघल राज्यकर्ते आले आणि इथले होऊन राहिले. इथला कापूस, मँचेस्टरमधे नोकर्‍या आणि पुन्हा खप भारतात असा प्रकार मुघल काळात झाला नाही. कुरुंदकरांनी या संदर्भात सुरेख विवेचन 'जागर'मधे केलेलं आहे; मुसलमान आक्रमक भारतात आले आणि मुस्लिम धर्माचं भारतीयीकरण झालं. (संगीत, दर्ग्याच्या माध्यमातून मूर्तीपूजा इ.) ते मुळातूनच वाचा. तर मुसलमान बाहेरून भारतात आले पण भारतीय झाले. ब्रिटीश हे कायम ब्रिटीशच राहिले. अँग्लो-इंडीयन संततीमधेही जी मुलं गोरी होती, ब्रिटनमधे वेगळी दिसणार नाहीत अशी होती त्यांना आपल्या देशात परत नेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

ज्यांना वाढ्त्या मुस्लिम

काळा पहाड
Sat, 02/02/2013 - 04:04 नवीन
ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे. अखंड भारतात बांग्लादेश तर येतोच पण पाकिस्तान सकट ची सर्व मुस्लिम लोकसंख्या ही येते.
मी तथाकथीत हिंदुत्ववादी नाही. ते फार मवाळ असतात. पण यात विनोद काय आहे? लोकसंख्या यायची काय गरज आहे? पाकिस्तानचे तुकडे आणि बांग्लादेशचे तुकडे हे वसाह्ती म्हणून ही असू शकतात. जसे गाझा आणि वेस्ट बँक इस्त्रायल साठी होते तसे.
  • Log in or register to post comments

तशीही बांग्लादेशाची लोकसंख्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 02/02/2013 - 05:09 नवीन
तशीही बांग्लादेशाची लोकसंख्या बहुदा आपल्या आधीच कमी होईल. लोकसंख्या वाढण्याचा बांग्लादेशाचा दर आपल्यापेक्षा कमीच आहे. त्यांचा दर २००८ मधे प्रत्येक स्त्रीमागे २.४ मुलं असा होता; तो २०११ मधे प्रत्येक स्त्री मागे २.२ मुलं असा झाला. भारतात हेच आकडे २.७ आणि २.६ असे आहेत. संदर्भ वर्ल्ड बँकेचे संस्थळ वसाहती बाळगणार्‍या इस्रायलमधे भडक पक्षाचे नेतान्याहू यांची मतसंख्या रोडावल्याची अलिकडची बातमी वाचली असेलच. (बाय द वे, तो देश इस्रायल असा आहे, इस्त्रायल असा नाही. अस्त्रातला स्त्र नाही, सहस्रमधला स्र.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

गांधीजी व फाळणी

फारएन्ड
Sat, 02/02/2013 - 11:31 नवीन
माझ्या मते फाळणीचे अपश्रेय किंवा श्रेय दोन्ही गांधीजींना देणे चुकीचे आहे. त्यांचा फाळणीला जाहीर विरोध होता हे सर्वमान्य आहे व त्यांचा ज्या बहुसंख्य लोकांवर प्रभाव होता त्यांनाही फाळणी नकोच होती. पण त्या वेळी फाळणीसंदर्भात ब्रिटिश, जीना व काँग्रेस यात ज्या राजकीय खेळी चालू होत्या त्यात गांधीजींनी काही डावपेच खेळल्याचे माहीत नाही. पडद्यामागे राहून नेहरूंतर्फे ते करत होते म्हणावे तर १९४७ च्या सुमारास काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांचे सल्ले स्वीकारणे कमी केले होते असेच दिसते. गांधीजींचे हेतू निर्विवाद असले तरी तेव्हाच्या नेतृत्वाला त्यांचे राजकीय सल्ले प्रॅक्टिकल वाटले नसतील असेच वाटते. त्यामुळे ते फाळणी रोखण्यास असमर्थ होते असेच माझे मत झाले आहे. मात्र फाळणी होऊ देण्यात त्यांचा काहीतरी (बाकी भारताच्या हितासाठी) ग्रॅण्ड प्लॅन होता असे काही पोस्ट्समधे ध्वनित होते ते पटत नाही. तसे conjecture असेल काही लोकांचे.
  • Log in or register to post comments

कुरुंदकर

अवतार
Sat, 02/02/2013 - 13:27 नवीन
यांनी म्हटल्याप्रमाणे, "पुढारलेल्या देशांतील लोक ज्या बाबी खाजगी बैठकीत सुद्धा उच्चारत नाहीत त्या बाबी आमच्या देशांतील लोक जाहीरपणे बोलूनही समजून घेत नाहीत." राजकारण हे भावनिक मुद्द्यांवर होत असले तरी राजकारणाचे आकलन हे राजकीय दृष्टीकोनातून न होता भावनिक आधारावर होऊ लागले की वास्तव आणि कल्पना यांतील सीमारेषा पुसट होऊ लागतात! "आम्ही विरुद्ध ते" असा झगडा जिथे चालू असेल तिथे महापुरुषांना सोयिस्कर चौकटींमध्ये डांबून ठेवणे यापलीकडे फारसे काही होऊ शकत नाही. इतर देशांमध्ये निदान "आम्ही" आणि "ते" यांच्या व्याख्या तरी सुस्पष्ट असतात. तिथल्या महापुरुषांच्या चौकटी देखील ठरलेल्या असतात. इथे तर कोणत्या महापुरुषाला कुठल्या चौकटीत टाकायचे हेच अजून ठरत नाही. त्यातही गांधीजींसारखा सर्वांनाच कोड्यात टाकणारा विषय असला की कल्पनांना धुमारे फुटणारच. या देशातील समाजाच्या मानसिकतेलाच मुळात अनेकविध पैलू आहेत. त्यातून निर्माण होणारे गांधींसारखे रसायन समजून घेणे हे गांधीजींवर विनोद करण्याइतके सोपे खचितच नाही. कोणत्याही विचारसरणीचे समर्थन किंवा विरोध हा राजकीय विश्लेषणाचा हेतू नसून निरपेक्ष सत्याची उकल करणे हे खरे ध्येय आहे. ह्या लेखातून ते निश्चितच साध्य झाले आहे. ह्या दुव्यातून अजून काही ऐतिहासिक तथ्ये मिळू शकतील. आज-काल : गांधीजी आणि जिना एक पुनर्विलोकन
  • Log in or register to post comments

अखंड भारत

arunjoshi123
Wed, 10/16/2013 - 18:33 नवीन
कैरम खेळताना तिथं चाललेल्या देशभक्तीच्या चर्चा कानावर पडत असत. त्यात गांधिजींचा उल्लेख टकल्या असाच हमखास होत असे. त्यानं देशाची वाट लावली असं ठाम मत सोंगट्या उडवताना व्यक्त केल जाई .
अशा आठवणी आठवून उजव्या किंवा कशा मताचे लोक कसे असतात याची कल्पना इतरांना देणे याला कुमार्केतकरी विचारसरणी म्हणतात. कुमार्केतकर जेव्हा टीव्हीवर मोदी-आडवाणी द्वंद्वाच्या वेळी 'संघाचे आडवाणींबद्दल काय मत आहे?' वर बोलतात तेव्हा ते 'अहो काय सांगू मला ते शब्द बोलवत नाही, अगदी प्रायवेटमधे बोलवत नाहीत इतके घाण आहेत' असे उत्तर देतात. आमच्या दिल्लीतले प्रेक्षक जाम खूश! एकतर मोदींच्या समर्थनाचा जोर आणि वर मराठी गोरागोमटा बामन बोलतोय म्हणल्यावर नक्कीच खरं असणार! राजकीय तत्त्वज्ञान , कोणते का असेना, पचवायला फार जड असते म्हणून ते जेव्हा हस्तिदंती मनोर्‍यातून खाली आणतात तेव्हा त्यात चिकार भेसळ झालेली असते. जे लोक आयुष्यभर एकच राजकीय तत्त्वज्ञान घेऊन चालतात त्यांचे ठीक, पण जे 'अधिक अनुभवांनंतर उदार' होतात तेव्हा त्यांना त्या भेसळीचा काँट्रास्ट फारच प्रकर्षाने जाणवायला लागतो. लेखकाच्या बाबतीतही तेच झाले आहे. कारण अशा काँट्रस्टवर भूतकाळातल्या व्हिलनचे चरित्रण चालू झाले कि त्यात टिका करायला जागा उरत नाही, जे न व्हावे.
ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... अखंड भारतवादीही असतात... हा एक विनोदच आहे.
मलाही असे विचार सुचतात का पाहतो. हे केवळ विचार आहेत, सत्य नाही. केवळ साधर्म्य साधायचा प्रयत्न. ---> एकेकाळी ऐश्वर्या आपली सून व्हावी म्हणून तीव्र इच्छा असणारे सलिम खान, आज जेव्हा ऐश्वर्याच्या मुलीला त्यांची नात, फुकटात, आपल्या संपत्तीचा केवळ ५% भाग देऊ जात आहे तेव्हा कोकलत आहेत ...हा एक विनोदच आहे!!!
अखंड भारतातली मुस्लिम लोकसंख्या ४०% च्या आसपास जाते. आज १२% मुस्लिमांसमोर हतबल झालेले राजकीय हिंदू नेत्रुत्व अखंड भारतात शिल्लक तरी राहिल का?
या खंडीत भारताच्या समर्थनाचा फंडामेंटल क्रायटेरिया आहे वाटते. यामधे लेखकाने बरीच लै मोठी विधाने केली आहेत - १. सर्वात जास्त ओब्जेक्शनेबल - अखंड भारताचा निवडून आलेला उमेदवार (पी एम) जर मुसलमान राहिला असता तर तो हमेशाच हिंदूप्रती हरामखोर राहिला असता असे का? मध्ययुगात काही मुसलमान राजे (वाईट) असणे वेगळे आणि स्वतंत्र भारताचा डेमोक्रॅटिक मुस्लिम लीगचा मुस्लिम पी एम तसा असणे वगळे. २. १२% मुस्लिम असताना भारतात राज्य करणारी काँग्रेस हिंदुच नाही म्हणणे हे ही धाडसच. सगळीकडे काय भगवा रंग मारला पाहिजे का? दोन मल्लांच्या फायटीत तिसरा (एकगठ्ठा मुस्लिम) शिट्ट्या मारू लागला म्हणजे शिट्ट्या मारणारा कुस्तीत कोणाचा विजय व्हावा हे ठरवतोय. (आपण शिवाजी पार्क ला वाढलेले म्हणून एक गोष्ट सांगतो. कधी लातूरला या. एखाद्या रँडम म्हातार्‍याला कमळावर शिक्का मारायला सांगा. 'नगं बाबा, रजाकार येतील पुना' असं उत्तर येण्याची शक्यता आजही बरीच आहे.) २००२ चा दंगा इतका प्रसिद्ध असताना, माध्यमांनी मोदींना वाइट झापले असताना आज तो सर्वात फेमस पी एम उमेदवार आहे. ३. मुस्लिम खरोखरच चांगले सत्ताधारी असले, कुण्या का पक्षाचे असेना, तर त्यांना पुढे जाऊ देण्यात काय वाईट आहे? चांगले सत्ताधारी जाऊ द्या, केवळ मुसलमान चांगले (शब्द चुकला वाटतं) मतदान करतात म्हणून त्यांचे उमेदवार निवडून आले तर काय वाईट आहे? इतकी भिती का? नेहमी पाकिस्तानकडे का पाहता? मलेशियाकडे का नाही? ४. भारतीय दंगलींचं प्रमाण (१९४६-४७-४८ सोडून) स्वातंत्र्यानंतर जास्त आहे. भीषणता देखिल जास्त आहे. फाळणी नावाच्या वेळी जी कटूता निर्माण झाली ती अभूतपूर्व आहे. ५. फाळणी झाली नसती तर ३-४ युद्धं झाली नसती. ६. आणि मुसलमानांचे असे टक्के का मोजता? जास्त % मंजे जास्त डेंजर! जाऊ द्या, मी स्पष्ट म्हणतो, मुस्लिमांचं भय असणे किंबा त्यांच्यावर (सहदेशी म्हणून हो) प्रेम नसणे या दोन गोष्टी फाळणीचे समर्थन करणारांची मूळ मानसिकता दाखवतात. आता एकदा फाळणी झालीच आहे तर - १. ज्यांना एकत्र राहायचे होते त्यांना ते मिळाले, ज्या मुस्लिमांना सवते (आपल्या धर्माच्या नावाने, राजधर्माने, इ) राहायचे होते त्यांना ते मिळाले. पण ज्या हिंदूंना सवते राहायचे होते त्यांना ते मिळाले नाही. सवते राहू इच्छिणारे हिंदू कमी आहेत म्हणून त्याचा अर्थ त्यांची मागणी गैर आहे असा होत नाही. एखादेवेळी 'आज' ती असंभव आहे म्हणा, पण अशी 'शुद्ध' इच्छा असणेच अनैतिक्/बेकायदेशीर्/घटनाविरोधी/नॉन्-सेक्यूलर/भांडखोर्/भेदभावी/इ इ आहे म्हणणे अन्याय्य, एकतर्फी आणि अनैतिक आहे. गांधीजींची हत्या आणि त्यांचा वैचारिक विरोध एकत्र चर्चू नये. नथूरामाशी डिसअलाइनमेंट करण्यातच विरोधकांची ९०% उर्जा जाते. माझ्या विचारांचा स्रोत नथूरामचे पुस्तक वा शिवाजी पार्क वरचा कॅरमचा अड्डा नसताना सुद्धा मी त्यांच्या राजकीय निर्णयांवर घणाघाती टिका करू शकतो, and it may hold some water. आणि हो अखंड भारत काही नागपूरच्या लोकांचा कॉपीराईट नाही, it may make a great social, economic and political sense to some, which should be taken with due regard.
  • Log in or register to post comments

राजघराणे कोण म्हणून प्रोफाईल

खटासि खट
Sat, 10/26/2013 - 13:22 नवीन
राजघराणे कोण म्हणून प्रोफाईल चाळली तर डॉ अभिराम दीक्षित हे नाव दिसलं. ऑर्कुटपासून हे नाव वाचनात आहे असं वाटलं. या नावावरून टक्कल असलेले, गोल काड्यांचा चष्मा असलेले कुणी असतील ही अपेक्षा फोल ठरली. लेखाबद्दल : १. अत्यंत प्रामाणिक २. विचारांची प्रचंड वावटळ दिसतेय. ३. जवळपास या पिढीतल्या सर्वांचीच संभ्रमित अवस्था शब्दबद्ध झाली आहे. ४. प्रचारकी विचारांना त्यागून विश्लेषणाकडे वाटचाल हा प्रवास आवडला त्याचबरोबर काहीशी लांबण लावल्यासारखं वाटलं. मुद्देसूद असलं तरीही काटछाट करणे शक्य आहे असं वाटतं. जेणेकरून लेख नेमकेपणाने पोहोचेल.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख

एस
Sat, 10/26/2013 - 14:30 नवीन
तूर्तास केवळ पोच.
  • Log in or register to post comments

गांधी आणि सावरकर

srahul
Sat, 03/28/2020 - 19:25 नवीन
एक प्रश्न मला नेहमी पडतो तो म्हणजे जिना हे गांधींना फक्त हिंदूंचे नेते असे संबोधत. स्वत: गांधीजी मात्र स्वत:ला सर्व भारतीयांचा नेता मानत . त्या काळात स्वा.सावरकर हे स्वत:ला हिंदूंचा नेता मानत . परंतु इतिहासात सावरकर आणि जिना यांची भेट किंवा चर्चा झाल्याचे वाचायला मिळत नाही.....दोघांनी एकमेकाला दुर्लक्षीत केले का एकमेकांना भेटायला दोघांचा अहंकार आडवा आला?
  • Log in or register to post comments

मला पडलेले काही प्रश्न

हुप्प्या
Sat, 03/28/2020 - 23:13 नवीन
जर फाळणी झाली नसती आणि भारत अखंड राहिला असता तर काय झाले असते हे केवळ अंदाज आहेत. ते तसेच झाले असते ह्याची खातरजमा करायचा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे कितीही अभ्यासू माणूस असला तरी हे अंदाज केवळ अंदाज आहेत. ब्रह्मवाक्य नाही. जर फाळणी झाली नसती तर कदाचित कडव्या मुस्लिम विचारांचा नाश झाला असता. कदाचित राज्ये जास्त स्वतंत्र/स्वायत्त असती. कदाचित सरहद गांधी वगैरे राजकारणापासून धर्म वेगळे ठेवणारे लोक पुढे आले असते. कदाचित प्रत्येक प्रांताच्या प्रांतिक अस्मिता जसे भाषा, संस्कृती जास्त प्रबळ असत्या आणि त्यातून मुस्लिम देश वगैरे विचार पराभूत झाले असते. कुणास ठाऊक. गांधी नि:शस्त्र होते आणि त्यांना मारणे भ्याडपणाचे वगैरे. ठीक. मग पंजाब, बंगाल, सिंध आणि पाकिस्तानातील अन्य भागातील हिंदूना कुठलेही संरक्षण न देता, त्यांच्यावर फाळणीचा, भीषण अत्याचाराचा, देशोधडीला निर्णय लादणार्‍या काँग्रेस आणि गांधींचे काय? आज कश्मिरचे ३७० हटवल्यावर त्यांना विश्वासात घेतले नाही अशी बोंब मारणारे काँग्रेसी, फाळणीच्या वेळेस पंजाब, बंगाल सिंधमधील हिंदू लोकाना विश्वासात घेतले होते का? फाळणीच्या वाटाघाटीत मुस्लिम लीग होते मग तसेच हिंदुत्त्ववादी पक्ष का नव्हते? हिंदूंचे प्रतिनिधित्व काँग्रेसने का केले? खुट्ट झाले की उपोषण करणार्‍या लोकांनी फाळणी होऊ नये म्हणून कुणी उपोषण का नाही केले? चले जाव सारखी भारतव्यापी चळवळ का नाही केली? निमूटपणे नांगी का टाकली? सत्ता मिळवण्याकरता?
  • Log in or register to post comments

खुली चर्चा तरी होतीय

चौकस२१२
Sun, 03/29/2020 - 06:54 नवीन
"फाळणी झाली हे एकप्रकारे बरेच झाले" हे आत्ता कळतंय .. त्यामुळे अखंड भारत परत करावा याला पाठिंबा असणारे फार कमी मिळतील...तेव्हा लेखाने सर्वांचे ( म्हणजे संघ परिवाराला पाठिंबा देणाऱ्या सर्वांना असे गृहीत धरा ) मत सध्या "अखंड भारत करा" असे गृहीत धरून टीका करून नये . पण जेव्हा झाली तेव्हा दोन तीन कारणामुळे त्या पिढीला वाईट वाटणे साहजिक होते हे हि लक्षात घ्यायला नको का? १) तेव्हा मुख्य लक्ष्य हे स्वातंत्र्य हे होते आणि तेव्हा "जागतिक इसलमीकरण " चा जोर पुढे येवडः तीव्र होईल याची कल्पना नवहती २) कोणाहली घराची वाटणी होताना एक प्रकारचे दुःख होतेच तसे तेव्हा झाले असणारच आणि रणनीती म्हणून १ मोठ्या देशापेक्षा २ छोटे देश होऊन आपली जगातील पत कमी होईल असे हि जाणकारानं वाटले असेल. गांधी बरोबर कि चूक याला फक्त बरोबर किंवा फक्त चूक असं म्हणणे म्हणजे एका बाजूची आंधळी भक्ती होईल. दुर्दैवाने गेली ७० वर्षे, त्त्यांच्याबद्दल कुठलेही प्रश्न विचारले कि "काय हे महान आत्मा राष्ट्रपित्या बद्दल असे कसे बोलूच शकता " असे दरडावले जायचे .. कितपत यौग्य होता असा एकांगी पण? निदान आता या बाबत खुली चर्चा तरी होतीय ... गांधीनी स्वान्त्र्यसाठी जी पद्धत वापरली ती कदाचित इतर राज्यकर्ते ( डच ) असते तर प्रभावी ठरली नसती आणि आज तर नाहीच नाही . गांधी कितीही बरोबर असले तरी त्यावेळचे जहाल आणि मवाळ वादात गांधींनी अतिशय शिताफीने जहाल वाद्यांना बाजूल सारले ...हे मान्य करायला पाहिजे गांधी भक्तांनी . भारतीय हिंदूंच्या नैसर्गिक सहिष्णुतेचा फायदा इतर घेत असताना गांधींसारख्या नेत्यांनी बरेचदा जी पडखाऊ भूमिका घेतली ती लाखो भारतीय जनतेला आवडली हि नव्हती ( आणि ते सर्व काही चड्डीवाले नव्हते सर्वसामान्य भारतीय हि होते) याकडे कसे डोळेझाक करता येईल ? समोर शत्रू तुमहाला मारायला उभा असताना आपण हुशारी वापरून 2 गोष्टी करू शकतो १) अरे ला कारे करणे २) १) जमत नसेल तर योग्य वेळी माघार घेऊन मग परत शक्ती जमवून हल्ला करणे पण याऐवजी ३) म्हणजे शत्रूचे मन वळवू . कधीतरी तो थांबेल .. अशी धारणा ठेवणे हा अडाणीपणाचाच प्रकार म्हणावा लागेल दुर्दवीणे गांधींचं विचारसरणीला हरवायला लोकशाही मार्गाने पाहिजे हिते , त्यानं मारून नाही ... पण जसे त्यावेळीस "भारतीय राष्ट्रीय काँग्रेस " हा एकमेव धागा स्वान्त्र्यलढ्यासाठी होता आणि ध्येय फक्त स्वान्त्र्य होतं तेव्हा , गांधींना असे हरवणे शक्य नव्हते
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा