Skip to main content

पद्म पुरस्कार - 'टू लिट्ल अँड टू लेट'?

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 29/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतातील एक दिग्गज गायिका एस. जानकी यांनी या वर्षीचा पद्मभूषण पुरस्कार नाकारल्याची बातमी अलीकडेच वाचली. आपल्याला दिलेला पुरस्कार आपल्या लौकिकाला साजेसा नाही आणि तो देण्यात खूप उशीर झालेला आहे ('टू लिट्ल अँड टू लेट') असे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले आहे. हिंदुस्थानी संगीतशैलीतल्या कलाकारांपैकी उ. विलायत खाँ यांनी अशाच भावना व्यक्त करून पद्म पुरस्कार नाकारला होता, तर पं. रविशंकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यावर पं. जसराज यांनी उघडपणे नाराजी दर्शवत पं. रविशंकर यांच्यावर कंपूबाजी केल्याचा/ दबावतंत्र वापरण्याचा ('लॉबिंग' केल्याचा) आरोप केला होता. ही उदाहरणे आहेत फक्त शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातली. पद्म पुरस्कार देताना लावले जाणारे निकष अत्यंत वादग्रस्त आहेत - The selection criteria, however, has been heavily criticized as many highly deserving artists have been left out in order to favor certain individuals असा उल्लेख विकीपेडियावरच्या पद्मश्री पुरस्काराबद्दलच्या माहितीत केलेला आढळला. मिपाकरांची याविषयीची मते जाणून घ्यायला आवडेल.

वाचने 3463
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

मला वाटतं की क्रायटेरिया, कंपूबाजी किंवा जे काय असेल ते वेगळं, पण निदान शेवटी पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी त्या त्या व्यक्तीला गोपनीय पत्रव्यवहाराद्वारे (उदा. रजिष्टर्ड पोष्ट) "आम्ही आपणांस असा असा पद्म --- पुरस्कार देण्याचा बेत करत आहोत, सबब आपणांस हा पुरस्कार घेणे योग्य, साजेसे, मानवणेबल वाटते का? हे आम्हास लेखी कळबाबे, अन्यथा आम्ही अन्य इच्छुकांस तो देऊ शकू.." अशी विचारणा केली पाहिजे. म्हणजे डिक्लेअर झालेला पुरस्कार नाकारण्यातून सरकार तोंडघशी पडणे आणि पुरस्काराचा डेकोर बिघडणे हे दोन्ही टाळता येईल...

बर्‍यापैकी सेटिंग केल्याशिवाय हे असले पुरस्कार मिळत नाहीत्. हे पुरस्कार म्हणजे कुठली प्रवेश परीक्षा नाही की अभ्यास केला आणि मिळाला प्रवेश गुणवत्तेवर.

In reply to by चिरोटा

सेटींग वरून "गाय द मोपाँसा" याची ही लघुकथा आठवली. http://classiclit.about.com/library/bl-etexts/gdemaupassant/bl-gdemaup-… एका गृहस्थाला "लिजाँ दॉनर" हा फ्रान्समधला "पद्म" पुरस्कार मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असते. त्याला बिचार्याला असं वाटत असतं की लोकोपयोगी कामं, समाजसेवा वगैरे केली की आपल्याला हा पुरस्कार मिळेल. तो जंग जंग पछाडतो, पण पुरस्कार काही मिळत नाही. तो अजून जोमाने काम करतो. त्यापायी घरात दुर्लक्ष करतो. परिणाम व्हायचा तोच होतो - त्याच्या बायकोचं एका प्रतिथयश राजकारण्याबरोबर सूत जुळतं. एकदा ते दोघं "रंगात" आले असताना हा बाबा आपलं समाजकार्य लवकर आटपून घरी येतो. पळापळ. त्या गडबडीत राजकारण्याचा कोट घरातच रहातो. तो विचारतो - बाई गं, हा कोट कोणाचा? ती जरा बावचळते, पण प्रसंगावधान राखून सारवासारव करते. म्हणते "मी आजच नवीन घेतला तुमच्यासाठी!" नवरा कौतुकाने कोट हातात घेतो, आणि त्याला धक्काच बसतो. "कुल्टा..." तो गरजतो "कोणाचा आहे खरं खरं सांग! यावर तर लेजाँ दॉनरचा बिल्ला आहे!" बायको लय धीराची. "अहो, तुमचाच आहे, तुम्हालाच मिळणार आहे अजून महिन्या-दीड महिन्यात! मला आगोदरच कळलं म्हणून तुम्हाला सरप्राईज देणार होते." ती म्हणते "तुम्हीच लवकर येऊन काशी कढवली!" (इथे मात्र ती खरं बोलते!) पुढच्या आठवड्यातच त्याला "लेजाँ दॉनर" जाहीर होतं! (जय सेटिंग!)

त्यांनी ही तक्रार पण केली आहे, की पुरस्कार मिळाला आहे, हे सुद्धा दुसर्‍या कुणाकडूनतरी कळले. सरकारकडून रितसर कळवले नाही.

या पुरस्कारा अन्तर्गत नक्की काय काय फायदे मिळतात, कुणी साम्गेल का? ( माझे नागरीकशास्त्र फारच कच्चं राहिलय)

माझ्या माहितीनुसार पद्म पुरस्कार जाहीर होण्याआधी त्या विजेत्याची सम्मती घेतली जाते. सम्मती नसल्यास पुरस्कार दिला जात नाही... पण तरीही अशा केसेस होतात.. हा निषेध व्यक्त करायचा मार्ग असावा. आधी सम्मती द्यायची आणि ऐनवेळेस बॉम्ब टाकायचा...

सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार हवा आहे म्हणे. तसं तर बर्‍यापैकी नाव झालेल्या सगळ्यांनाच असं काही ना काही वाटत असेल. पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना. एस जानकी काही वर्षांपूर्वी आशा भोसलेसारखा आवाज असलेली एक सौदिंडियन गायिका म्हणून आम्हाला माहिती झाली. आशाताई त्याच्या खूप पूर्वीपासून जगभर माहित आहेत.पण त्यानाही अजूनपर्यंत भारतरत्न नाहीये. त्यांना पद्मविभूषण मिळालं आहे ते २००८ साली आणि ६५ वर्षांच्या कारकीर्दीनंतर तर लताबाईंना भारतरत्न मिळालं ते ६० वर्षांच्या कारकीर्दीनंतर. या दोघींच्या तुलनेत एस जानकी यांची कारकीर्द ५० वर्षांची आहे. अर्थात संगीताच्या क्षेत्रात फक्त ज्येष्ठता हा निकष नसला तरी भीमसेन जोशी यानाही ६८ वर्षांच्या कारकीर्दीनंतर आणि एम एस सुब्बुलक्ष्मी यांना ६५ वर्षांनंतर भारतरत्न मिळालं होतं हे लक्षात घेता जानकी यांना देऊ केलेला पद्मभूषण सन्मान योग्य होता असं मला तरी वाटतं.

In reply to by पैसा

जानकी यांना देऊ केलेला पद्मभूषण सन्मान योग्य होता
योग्य/अयोग्य ह्याची कल्पना नाही. पण 'मला 'भारतरत्न' पुरस्कार मिळायला हवा' असे स्वतः त्या व्यक्तिने म्हणावे हे जरा विचित्र वाटते. पुरस्कार मागून मिळविण्यात काय अर्थ आहे. त्यांच्यावतीने रसिकांनी अशी टिपण्णी केली असती तर समजण्यासारखे आहे. जर पुरस्कार पसंद पडला नसेल तर शांतपणे नाकारावा. 'ह्या' ऐवजी 'तो' द्या असे म्हणणे चुकीचे आहे.

In reply to by पैसा

लता, भिमसेन (इतरांचे देखील असेच असावे) ह्यांना पायर्‍या पायर्‍यांनी विविध पद्म पुरस्कार मिळाले आहेत. लताला ६९ साली पद्मभूषण आणि ९९ साली पद्मविभूषण मिळाला. तेच भिमसेन यांच्या बाबतीत - ७२ पद्मश्री, ८५ पद्मभूषण आणि ९९ पद्मवुभूषण आणि नंतर २००१ साली लतास तर ०८ साली पंडीतजींना भारतरत्न मिळाले. पद्मविभूषण हा सर्वोच्च पद्म पुरस्कार आहे. (मनमोहन सिंग यांना १९८७ साली मिळाला होता). नंतर एकदम भारतरत्नच. मात्र आशाताईंच्या बाबतीत त्यांना २००० साली प्रथम भारत सरकारचा पुरस्कार मिळाला तो दादासाहेब फाळके आणि प्रथम पद्मपुरस्कार त्यांना २००८ ला मिळाला. गंमतीत त्या इतकेच म्हणाल्या की "मी मरण्याआधी मिळाले आणि ते देखील स्ट्रेचरवर नसताना" याचा आनंद आहे. अर्थात कुठेच कडवटपणा नाही...

सैफअली खान यांचं नाव अशा पुरस्कारांच्या यादीत आलेलं जेव्हा पाहिलं तेव्हाच आम्ही हाय खाऊन हा विषय अनाकलनीय आहे आणि ह्यात डोकं झिजवण्यात अर्थ नाही हे उमजुन घेतलं.

या पुरस्कारांच्या यादीवर नजर टाकलीत (फार पूर्वीपासून )तर लक्षांत येईल की अनेक योग्य माणसाना हा पुरस्कार देण्यात आला आहे. व अनेकाना तो लायकीपेक्षा अगोदर मिळाला आहे व लायकी पेक्षा उशीराही. पण सैफ अली सारखा अपवाद सोडला तर अगदी टाकाउ ला हा पुरस्कार मिळालेला नाही. हीच गोष्ट फिल्मफेअर पुरस्कार, साहित्य संमेलन अध्यक्षपद या बाबतीतही झालेली दिसेल.

In reply to by चौकटराजा

काय काका.. मिपारत्न च्या निवडणुकीला उभे राहणार आहात का? सगळ्या दगडांवर एकदम पाय ठेवून वावरताय.. :-D १)अनेक योग्य माणसाना हा पुरस्कार देण्यात आला आहे २)अनेकाना तो लायकीपेक्षा अगोदर मिळाला आहे ३)व लायकी पेक्षा उशीराही ४) सैफ अली सारखा अपवाद सोडला तर अगदी टाकाउ ला हा पुरस्कार मिळालेला नाही

In reply to by मोदक

मिपारत्न ला उभे राहिलो असतो पण आमची अवस्था यशवंत सिन्हा यांच्या सारखी झाली आहे. नरेंद्र मोदी सारखे मास अपील असलेल्या " स्पावड्या" चे नाव अगोदरच जाहीर झाल्याने " स्पावड्या की जय हो " असेच आम्ही म्हणणार !

काही नाही हो, हि मस्ती आहे मस्ती. ठीक आहे, झाला असेल सरकारकडून उशीर पुरस्कार देण्यात! पण नाकारायची काय गरज आहे. उशिरा का होईना पण कौतुकाच तर करत आहेत ना! एकतर पुरस्कार नाकारायचा आणि वर परत म्हणायचे कि जनतेकडून मिळालेला प्रतिसाद आणि प्रेम हाच खरा पुरस्कार म्हणे. हा दुटप्पीपणा कशाला?

In reply to by बोलघेवडा

देश (अनेक देशवासीयांच्या भावना) व देशाची विविध प्रतीके यांना हीन लेखण्याची प्रवृत्ती निंदनीय आहे. यापुढे असाच अनुभव आल्यास (प्रथम खाजगीरीत्या होकार देऊन नंतर माध्यमांपुढे मखलाशी करणे) भविष्यात अशा व्यक्तीचा कुठलाही सरकारी पुरस्कारासाठी / मान सन्मानासाठी विचारही करू नये. आपल्या संस्कृतीचे मूलभूत मूल्य आहे - विद्या विनयेन शोभते. ज्यांच्याकडे विनय नाही त्यांचा विचार सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारासाठी केला जाणे हि त्या मूल्याशी प्रतारणा आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

आपल्या संस्कृतीचे मूलभूत मूल्य आहे - विद्या विनयेन शोभते. ज्यांच्याकडे विनय नाही त्यांचा विचार सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारासाठी केला जाणे हि त्या मूल्याशी प्रतारणा आहे. रंगा . यकदम करेट !

In reply to by श्रीरंग_जोशी

उपरोक्त विचाराशी सहमत आहे. ज्यांना असे पुरस्कार नाकारुन वर मिडियाद्वारे सरकारची बेइज्जती करायची हौस आहे किंवा त्यांनी तसे केले आहे त्यांना इथुन पुढे कसलाही सरकारी सन्मान देताना फाट्यावर मारावे. त्यांचा विचारही केला जाऊ नये. कुणाला कुठला पुरस्कार द्यावा किंवा कुणाच्या आधी कुणाला कुठला पुरस्कार मिळावा हे ठरवण्याचा हक्क सरकारकडेच रहावा, त्यात उगाच कुणाचाही आगंतुक मत विचारात घेतले जाऊ नये. पुरस्कार नाकारल्याचा राग नाही आला, मात्र त्यादरम्यान 'दाक्षिणात्यांवर नेहमीच अन्याय होत आला आहे' ही ओरड होती ती आश्चर्यकारक होती. - छोटा डॉन

सरकारी पुरस्कारांमध्ये होणारी वशिलेबाजी आणि केवळ तात्विक मतभेदावरून गाळलेली नावे या काही फार गुपीत गोष्ट नाहीत. या पार्श्वभूमीवर सरकारविरुद्ध ब्र देखील काढला तरी त्या कलाकाराला पूर्ण डावलायचा हक्क सरकारला आहे अशी मते वाचून आश्चर्य वाटले. आज भारतातली सगळ्यात मोठी समस्या आहे ती राजकारण्यांची सर्व क्षेत्रांवरची घट्ट पकड. मग ते खेळाचे क्षेत्र असो वा कलेचे. आणि या पकडीकरीता राजकारणातले वजन हेच पुरेसे आहे... त्या त्या क्षेत्रातली जाण दुय्यम समजली जाते. गम्मत अशी की ह्या गोष्टींचे समर्थन करणारे लोक भारत या सगळा क्षेत्रांत जगात किती मागे आहे ही खेदाची गोष्ट आहे याची तावातावाने चर्चाही करतात. लोकाशाहीत निवडून आलेल्या नेत्यांनी जनकल्याणाकरिता योग्य अशी वाट (कायदे व नियम) तिचे ज्या सगळ्यावर परिणाम होणार असतील त्या सगळ्यांबरोबर विचारविनीमय करून बनवून देऊन प्रत्यक्ष कारवाई त्या त्या क्षेत्रातील तज्ञ माणसाकडे सोपवून कारवाई करवून घ्यायची अशी पद्धत अपेक्षीत आहे. याला सर्वसामान्यपणे inclusive and consultative लोकशाही म्हटले जाते. अशीच लोकशाही जास्तीतजास्त लोकाभिमुख व लोकल्याणकारी होऊ शकते. लोकशाहीत निवडून आलेल्या लोकप्रतिनीधींनी बनलेली लोकसभा जरी वरीष्ठ असली तरी; ही "लोक"शाही आहे आणि लोक (जनता) सर्वोच्च आहेत हे जाणूनच लोकसभेने आपला कारभार करणे अपेक्षीत आहे. सद्या भारतात एकदा निवडून आलो की आपण पाच वर्षांकरता एकप्रकारचे राजे झालो आणि मग "फक्त निवडून आलेल्या प्रतिनिधींनीच काय ते निर्णय घ्यायचे... याबाबत आक्षेप घ्यायला इतर कोणालाही अधिकार नाही" असे तारे कसलेला कायदेपंडीत असलेला केंद्रीय मंत्री उघडपणे करू शकतो आणि त्याबद्दल फारसा गदारोळ होत नाही... यातच भारताच्या लोकशाहीचे यशापयश दडलेले आहे. नेत्यांनी जनतेचा (त्यांत प्रत्येक नागरीक स्वतंत्रपणे व सर्वजण एकत्रीतपणे... indivisually and collectively... आला आहे) आवाज ऐकण्याची गरज नाही असे म्हणणे किंवा त्यापुढे जाऊन तो आवाज बंद व्हावा यासाठी काही उपाययोजना करणे (यात योग्य कारणासाठी आवाज ऊठवणार्‍यांविरूद्धची कारवाई सामाविष्ट आहे) याला साध्या शब्दात "लोकशाहीचा गळा घोटणे" असे म्हणता येईल.