Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राजघराणं on Fri, 09/07/2012 - 21:40
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
थोड्या दिवसापूर्वी एका वाद विवाद स्पर्धेला परिक्षक म्हणून गेलो होतो. आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धा होती. २० ते २५ वर्षाची मुलं - मुली स्पर्धक होती. धर्माच्या आधारावर आरक्षण द्यावे का ? दिल्यास ते देशाच्या एकतेला बाधक होईल का ? - असा विषय होता. प्रत्येक कॉलेज मधून दोन्ही बाजूंनी बोलण्यासाठी एक - एक विद्यार्थी पाठवायचा नियम होता. - तरुणांची भाषणं ऐकून टाळकं भणाणून गेलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी मी समारोपाला थोडसं बोललो. जे बोललो त्यात भर टाकून लिहतो. रामभाउ म्हाळगी प्रबोधिनी च्या मुंबईतल्या कार्यालयात झाली स्पर्धा. विनय सहस्त्रबुद्धे, रविंद्र साठे आणी लोकसत्तेचे मुकुंद संगोराम कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. मी म्हणालो - तुमची भाषणं मी ऐकली. टाळकं भणाणून गेलं. घोर निराशेनी - पण थोडा आशेचा किरणही दिसला. आशेचा किरण हा की - अतिशय जिव्हाळ्याच्या - भावनिक - अस्मितेच्या प्रश्नावर; चर्चा वाद - विवाद करण्याची तुमची तयारी आहे. नाहीतर सध्या मुद्दे - गुद्द्यांनी आणी लाथांनी सोडवायची पद्धत आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात आहे. मधल्या खाण्याच्या वेळेला तुम्ही एकत्र हसत खेळत होता. नंतर स्टेजवर येउन तावातावाने भांडत होता. लोकशाहीचा पप्पा आणी पुरोगामिपणाचा फादर म्हणजे व्हॉल्टेर हा फ्रेंच विचारवंत. तो म्हणाला होता. "I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it" . तुझे विचार मला अजिबात मान्य नाहित. पण वेगळे विचार बाळगण्याच्या - तुझ्या हक्काच्या - रक्षणासाठी - मी मरण पत्करायला तयार आहे. याला म्हणतात पुरोगामीपणा ! माणूस विचार करणारा प्राणी आहे यावर श्रद्धा बाळगणार्‍याला मी पुरोगामी म्हणेन. चर्चा करून समोरच्याचे विचार बदलता येतात हा पायाच आहे आहे पुरोगामीपणाचा. अशा प्रकारे ज्ञानाचे आदान प्रदान करत समाज प्रगतीच्या दिशेने पुढे न्यायचा. गामी म्हणजे जाणारा पण जायच कुठे ? पुरो - प्रगतीच्या दिशेला. पुरो - गामी. आता निराशेबद्दल आणी डोकं भणाणण्या बद्दल - तुम्हा सर्वांचीच एक गोष्ट मला जाम खटकलीय. जातीय आरक्षण आणी धार्मिक आधारावरच आरक्षण - यात जमीन आस्मानाचा फरक आहे. हा फरक कुणीच नीटपणी ध्यानात घेतला न्हवता. आरक्षणाचे समर्थक दोन्ही प्रकारच्या आरक्षणाला पाठिंबा देत होते. आणी विरोधक दोन्हीला विरोध. आजचा विषय 'आरक्षण योग्य का अयोग्य ? ' असा न्हवताच मुळी. मित्रांनो ! विषय धार्मिक आरक्षणाबद्दल होता. त्याहून गंभीर गोष्ट म्हणजे अभ्यासाऐवजी - "स्व" जास्त डोकावत होता. ज्यांना आरक्षण मिळतय ते त्याच्या बाजूचे आणी मिळत नाही ते विरोधक अशी स्पष्ट विभागणी दिसली ! काहि अपवाद होते. पण मोजकेच. त्याहून धक्कादायक म्हणजे , भारताचे संविधान, त्यातले धर्मस्वातंत्र्य , सेक्यूलर, सर्वधर्मसमभाव आणी धर्मनिरपेक्षता याबद्दल सर्वांनीच दाखवलेले भीषण अज्ञान. तुम्ही सर्व राज्यशास्त्र, इतिहास अशा कलाशाखांचे विद्यार्थी आहात तेंव्हा तुमच्याकडून काही नवे शिकण्यासाठी आलेला मी .....विज्ञानाचा विद्यार्थी.....असो. एक गोष्ट मात्र तुम्ही मला आज शिकवलीत. कोणती ? ते शेवटीच सांगतो भाषणाच्या. आरक्षणाच्या विरोधकांनी आर्थिक आरक्षणाचा बूट वारंवार उगारला. सगळ्याच गरिबांना द्या वगैरे वगैरे. आरक्षण म्हणजे काय - गरिबी हटाव चा सरकारी कार्यक्रम वाटला की काय तुम्हाला ? का भीक वाटली ? गरिबांना मदत म्हणून भरपूर सरकारी योजना असतात. वेगळ्या रंगाच रेशनकार्ड असतं, सबसिड्या असतात. बहुसंख्य दलित गरिब आहेत हे खरे आहे. पण ते गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं नाही. सामाजिक गरजेतून दिलेलं आहे. बर... आरक्षणाची सुरवात कोणी केली ? आंबेडकरांनी ? अजिबात नाही ! शाहू महाराजांनी ? बिल्कूल नाही ! आरक्षणाची सुरवात केली भगवान मनूनी ! किती टक्के ? तर १०० % ...कोणाला ? तर उच्चवर्णीयांना. हे विपरीत आरक्षण होतं मित्रांनो. ब्राह्मण, क्षत्रीय आणी इतर पुढारलेल्या जातींनी गेली हजारो वर्षे या विपरीत आरक्षणाची मजा घेतली. १००% सत्ता, १००% धर्माधिकार, १००% न्यायव्यस्था, १०० % उच्च उत्पादनाचे उद्योग, १००% शेतजमीनी गेली हजारो वर्षे ठराविक जातींच्याच हातात होत्या. पुण्याच्या एका विद्यार्थ्यानं मगाशी लंगड्या घोड्यांची गोष्ट सांगितली. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेल आहे. घोड्यांची शर्यत लावली. सगळे घोडे तगडे. एक मात्र लंगडा. मुद्दाम लंगडा केलेला घोडा. कुणी केला त्याला लंगडा ? तर तगड्या घोड्यांनी. ही काय स्पर्धा झाली ? मेरीट माय फूट ! त्या लंगड्या घोड्याला आरंभरेषेच्या थोडं पुढे उभ कराव लागेल. तेंव्हाच खरी स्पर्धा होईल. हे आहे सामाजिक आरक्षण. २२.५ %. लोकसंखेच्या प्रमाणात. दलित आणी आदिवासिंना , भटक्या आणी विमुक्तांना दिलय. रेषेच्या पुढं उभ केलय. काय चुकलं ? गेली हजारो वर्षे अभ्यासाची परंपरा नाही. पाढे बापानी शिकवले नाहित. आईनी अभ्यास घेतला नाही. देवळात यायला बंदी. शिकायला बंदी. अस्पृष्यता. मग रेषेच्या पुढे उभ करा त्याना. त्यालाच म्हणतात सामाजिक आरक्षण. सरकारी जावई न्हवे. दुबळा भाउ म्हणा. दुसरी गोष्ट आर्थिक आरक्षणाची. तेही आहेच की दिलेलं . फक्त गरीब व्यक्तींना ते दिलेलं नाही. गरीब जातींना दिलय. त्याला म्हणायच ओ. बी. सी. आरक्षण. गरीब व्यक्तींना कसं देणार आरक्षण ? गरीब शोधायचा कसा ? माझ हॉस्पिटल आहे. भावाचा कारखाना आहे. बायकोच्या नावावर काही नाही. ती झाली की गरीब ! माझ होस्पिटल बायकोच्या नावावर केलं की मी झालो गरीब ! समजा एक श्रीमंत व्यापारी आहे. सोन्याच्या दागिन्यांच दुकान आहे त्याचं. . डान्स बार मधे उधळल्या - गड्याच्या गड्या - नोटांच्या. दारू प्याला.शौक केला. बाई ठेवली. उधळले सगळे पैसे. झाला गरीब. बोला.. देणार त्याला आरक्षण ? एक महा मूर्ख आहे महिपतराव , एक आळशी आहे सुस्तराव ... दोघेही गरीब आहेत. देताय आरक्षण ह्या दोन रावांना ? म्हणे आर्थिक आधार ! सरसकट गरीबांना आरक्षण देता येत नाही हो. तो का गरीब झाला हे पहाव लागत. तो त्याच्या वैयक्तिक दुर्गुणांमुळे गरिब आहे का ? की त्याला संधी नाकारलीय व्यवस्थेनं. श्रीमंत होण्याची संधी. भारतात जातिव्यवस्था आहे. ते एक भयानक वास्तव आहे. जेंव्हा जातीच्या जाती गरीब रहातात. तेंव्हा नक्कीच त्याना संधी नाकारलेली असते. समाजान. व्यवस्थेन. अरे सुतारान सुतारच राहायच. लोहारान लोहार. जास्त पैशे मिळणारे धंदे करायचेच नाही त्यानं. कोणी नाकारली संधी ? - पैशे मिळवण्याची संधी? व्यवस्थेन. म्हणून अनेक जाती गरीब राहिल्या. मग आला मंडल आयोग. मंडल न काय केलं ? निकष लावले. शैक्षणीक, सामाजिक आणी आर्थिक. मंडल ने पहाणी केली सगळ्या जातींची. शिक्षणाचं प्रमाण कुठल्या जातित कमी आहे ? कोणत्या जाती गरीब आहेत ? त्यांना म्हटलं ओ.बी.सी. आणी दिलं आरक्षण. या ओबिसीत माळी आणी कुणबी यासारख्या शेतकरी जाती आहेत. दैवेज्ञ ब्राह्मण ही उच्चवर्णीय जात ही आहे ओबीसी आरक्षणात. तेंव्हा गरीब किंवा मागास उच्चवर्णीयांना आधीच आरक्षण मिळालेलं आहे. पुन्हा द्यायचा प्रश्नच कुठे येतो ? तेंव्हा लक्षात ठेवा आर्थिक आधारावर आरक्षण व्यक्तीला देता येत नाही. गरीब जातीना देता येत - ते दिलेलंच आहे. मग आर्थिक आरक्षणाचा बूट काय म्हणून? जातिय आरक्षणाचा काहिना - काही व्यक्तीना गैर फायदा होतो म्हणे. मागासवर्गीय कलेक्टरचा मुलगाही आरक्षण मिळवतो. अरेच्च्या पुन्हा तेच तेच. जातिच्या लॉब्या असतात की नाही ? ज्यांच्या लॉब्याच नाहीत सत्ताकारणात. त्याना पुढे आणायला आहे आरक्षण. ते व्यक्तीला नाहीच - समाजाला आहे. बटाट्याची तुलना बटाट्याशी करा हो - टोमेटोशी नको. जर ठराविक समाजाला आरक्षण आहे तर - "व्यक्ती गैरफायदा मिळवतेचा" - टॉमेटो आणला कुठून ? हरेक व्यक्तीच्या मागासपणाची कारण शोधणं सरकारला शक्य नाही. जातींच्या मागासपणाची कारणं शोधता येतात आणी त्यावरचा उपाय म्हणजे आरक्षण. मग विचारता हे संपेल कधी ? प्रश्न विनोदी आहे. आरक्षण म्हणजे सत्ताकारणातला न्याय्य वाटा. तो संपायला कशाला पाहिजे ? जेव्हढे टक्के हक्काचा वाटा आहे. तो मिळालाच पाहिजे. कायम.निरंतर.मिळाला पाहिजे आणी अनुशेष म्हणजे काय ? मागासांना आरक्षण आहे २२.५ % + २७.५ % ओबीसींना = ४९ %. एकूण आरक्षण ४९ % बर हे आरक्षण कागदावर आहे. खरोखर जागा भरल्या किती. दिल्लीत कॅबिनेट सचीव दर्जाच्या ९६ पोस्ट आहेत. दलित किती त्यातले १ . फक्त एक. म्हणजे एक टक्का. ओबीसी कीती. अ ग्रेडचे केंद्र सरकारी अधिकारी घेतले तर त्या ओबीसी ४% हून कमी आहेत. म्हणजे ४९% आरक्षण फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात ते आलेलच नाही. राखीव जागांचा अनुशेष भरून काढणे अजून बाकी आहे. आधी अनुशेष भरा नंतर तोंड वर करून विचारा की - संपेल कधी ? पदोन्नती मध्ये आरक्षण दिलं पाहिजे ते म्हणूनच. अनुशेष भरण्यासाठी. घरात घुशी झाल्या म्हणून कोणी घर जाळत नाही. तस कुठल्याही सरकारी योजनेत काही दोष रहाणारच. म्हणून कुणी योजनाच बंद करत नाही. शिवाय श्रीमंत ओबीसींना म्हणजे क्रीमी लेयरला आरक्षणाचे लाभ मिळतही नाहीत. तशी तरतूदच कायद्यात आहे. प्रथम अनुशेष भरला पाहिजे. सत्तेत हक्काचा वाटा मिळाला की हळूहळू लंगडा घोडा तगडा होईल. स्वतःच्या हिमतीवरच पळू लागेल. स्पर्धा करेल ओपनशी. माझ्या एका मित्राची गोष्ट. विजय. तो ओबीसी आहे. ओबीसीच्या सीटांचे मार्क क्लोज झाले ओपनच्या वर. त्याला आरक्षणाचा काहिच उपयोग झाला नाही. ओपनलाही काही तोटा नाही. त्या कॉलेजपुरत तरी - आरक्षण नसल्यातच जमा. या एव्हढ्या शर्यतीपुरता घोडा तगडा झालाय. आरक्षण अस संपतं. आपोआप. हा मुद्दा एका एकाही स्पर्धकान मांडला नाही. आता आपण आजच्या खर्‍या विषयावर येवू. धार्मिक आरक्षण. म्हणजे मुस्लिम आरक्षण. कारण मुसलमान अल्पसंख्यातले बहुसंख्य आहेत. मुस्लिमांना आरक्षण द्यावे का ? दिल्यास भारतातली एकात्मता वाढेल का कमी होईल ? संविधान आणी सर्वधर्म समभाव हा विषय प्रत्येकाने चघळला. आणी प्रचंड घोळ घातला. सभ्य स्त्री - पुरुष हो - आपल्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव नाही. धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य ही घटनेत नाही. घटनेत सेक्यूलारिझम आहे. सर्वधर्मसमभाव आणी सेक्युलारिझम या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत. सर्वधर्म समभाव. सर्व धर्म सारखेच आहेत. त्यांची शिकवण एकच आहे. सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छती - ही हिंदुधर्माची शिकवण आहे. संविधानातला कायदा न्हवे ! उलट धर्मपालनाचे कोणतेच हक्क संविधान देत नाही. तुम्ही सगळे प्रेमात पडायच्या वयाचे आहात. आणी कुणाच्यातरी प्रेमात पण असणार. जो - जी नसेल त्यान कार्यक्रम संपल्यावर मला येऊन भेटावं. शनिवारवाड्यावर जाहिर सत्कार करण्यात यील. असो ..समजा तुम्ही ट्रेन नी कुठेतरी प्रवास करत आहात. समोर एक अप्सरा बसली आहे. यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली. अप्सरा दिसली. तुम्ही मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करत आहात. असे प्रेम करण्याचे स्वातंत्र्य ती अप्सरा तुम्हाला अवश्य दील. पण मनातल्या मनात. मांडे खा. पण मनातल्या मनात. तिला ट्रेनमधे डोळा मारला ; की काय खायच ? सँडल ! भारताच्या राज्यघतनेत सेक्युलारिझम आहे. म्हणजे इहवाद आहे. कुठल्याही धर्मावर तुम्ही श्रद्धा ठेवू शकता. प्रेम करू शकता पण कसं ? मनातल्या मनात ! तुम्ही म्हणाल आमच्या धर्मात अस्प्रुश्यता आहे. आम्ही ती पाळणार... मग काय खायचं ? सँडल. तुम्ही म्हणाल आमच्या कुराणात लिहिलिय . मूर्त्या फोडा. काफरांविरुद्ध जिहाद करा. म्हणा की. पण. मनातल्या मनात म्हणायच. खरोखर कुणी जिहाद करू लागला- तर काय खायच ? ....सँडल. धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायच ? ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ? कायदा ठरवेल धर्म नाही. सर्व धर्म चांगले आहेत ते जवळ घ्या म्हणजे सर्वधर्म समभाव. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजे च इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे. आणी अशा प्रकारचा पारलौकिक श्रद्धेसाठीचा कोणताही धर्म तुम्ही पाळू शकता. नवा धर्म बनवू शकता. धर्म बदलू शकता. धर्मांतराचे स्वातंत्र्य ही आहे. आता मला सांगा. शासकीय निर्णयात धर्म आणायचा नाही हाच जर सेक्युलारिझम चा अर्थ आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे काय देता यील ? दुसरं धर्म ही ऐच्छीक गोष्ट आहे. धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे देता यील ? नीट विचार करा. समजा मुस्लिमांना आरक्षण दिलं. तर मुस्लिम कोण ? हे ठरवायचं कसं ? सुन्नी म्हणतात की शिया हे खरे मुसलमान नाहीत. कादियानी / अहमदिया पंथाचे लोक खरे मुसलमान नसून ते काफिर आहेत. त्यांच्या विरुद्ध जिहादचे फतवे ही निघतात पाकिस्तानात. मुसलामान कोण ? व्याख्या काय मुसलमानाची ? नाव ? समीर आणी कमल नावाच्या मुसलमानांना मी ओळखतो. अंतुले आडनावाचे मुसलमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सरकारने मुसलमानाची पहिल्यांदा व्याख्या करावी लागेल. टोपी, दाढी, नमाज हे सर्व नाकारणारे ही मुसलमान असतातच. म्हणजे शेवटी सरकारला अ‍ॅफीडेव्हीट घ्यावे लागेल की मी मुसलमान आहे. आणी मगच आरक्षण देता यील. पण गोची अशी आहे की घटनाकारांनी धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आरक्षण मिळवण्यासाठी मी काय करावे ? एक अ‍ॅफीडेव्हीट करावे. मी मुसलमान आहे. आरक्षणाचा लाभ मिळाला की पुन्हा धर्म बदलावा. हिंदू व्हावे. आता सरकार काय करणार ? माझी नोकरी काढून घेणार ? बर मी समजा सुमडीत धर्म बदलला. गुपचूप. तर सरकारला कसे कळणार ? आरक्षणाचा लाभ मिळालेले लोक इस्लाम पाळतात का ? यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकार मौलवींची कमीटी नेमणार आहे काय ? अहो दिवसातून पाच वेळा धर्म बदलता येतो. एक अ‍ॅफीडेव्हीट खेळ खलास. जी गोष्ट ऐच्छीक आहे ती गोष्ट कुठल्याही सवलतीसाठी अट म्हणून घालता येत नाही. एवढी साधी गोष्ट सरकारला कळू नये. जातीचे खोटे दाखले मिळवून सवलती लाटणार्यांवर कायदेशीर कारवाई करता येते. कारण जात बदलता येत नाही. त्यात जन्म घ्यावा लागतो. पण धर्म ही ऐच्छीक बाब आहे. त्यावर आधारित सवलती देता येत नाहीत. धर्मांतराचे स्वातंत्र्य आणी धार्मिक आधारावर सवलती एकाच वेळी कशा देता येतील. समजा उद्या तोगाडीयांनी हिंदू बांधवांना आवाहन केल - कोर्टात अ‍ॅफीडेव्हीट करून सवलती आणी आरक्षण लाटण्याच.. काय करणार तुम्ही ? याउलट सरकार मौलवींची सुपारी घेउन इस्लामच्या प्रचारासाठी असे कायदे करत आहे असा कोणी आरोप केला तर ? धार्मिक आरक्षणाने एकता वाढेल का कमी होईल ? सर्वात महत्वाच - आज मुस्लिमांना आरक्षण आहेच. मुस्लिमातल्या मागास जातींना आरक्षणाचा लाभ मिळतोच आहे. सर्वच धर्मातल्या मागास आणी गरीब जातींना आरक्षण आहे. ते तसेच राहिले पहिजे. पण सरसकट सर्व मुस्लिमांना आरक्षण मिळू शकत नाही. कोणत्याच धार्मिक आधारावर आरक्षण मिळू शकत नाही. फक्त एका स्पर्धकाने हा मुद्दा मांडला त्याला पहिलं बक्षिस देत आहोत. मुस्लिमांना समजायला हव की धार्मिक आधारावरच आरक्षण घटनाविरोधी तर आहेच पण; ते देता येणंही अशक्य आहे. त्यामुलेच ते कोर्टात टिकणार नाही. सरकार तुम्हाला उल्लू बनवते आहे. तुमच्या सर्वांकडून शिकलेली एक गोष्ट म्हणजे वक्त्याने उगीच बडबड करत बसू नये वेळ संपली की भाषण बंद करावं. तुम्ही सर्वांनी बरोब्बर दिलेल्या वेळेत भाषण संपवलीत. तुम्च्याकडून मी हे शिकलो. आता आचरणात आणतो आणी भाषण संपवतो.
  • Log in or register to post comments
  • 14534 views

प्रतिक्रिया

Submitted by कपिलमुनी on Mon, 09/10/2012 - 13:51

Permalink

सरकारी नोकरी मध्ये १०० % आरक्षण हवे

आणि याला विरोध करणार्यांना बी ग्रेड तर्फे समजावले जाईल ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 09/10/2012 - 14:10

Permalink

माफ करा.

आरक्षणाची सुरवात कोणी केली ? आंबेडकरांनी ? अजिबात नाही ! शाहू महाराजांनी ? बिल्कूल नाही ! आरक्षणाची सुरवात केली भगवान मनूनी ! किती टक्के ? तर १०० % ...कोणाला ? तर उच्चवर्णीयांना. हे विपरीत आरक्षण होतं मित्रांनो. ब्राह्मण, क्षत्रीय आणी इतर पुढारलेल्या जातींनी गेली हजारो वर्षे या विपरीत आरक्षणाची मजा घेतली.
हे वाचले आणि भडभडून आले. डॉळ्यात पाणी दाटले आणि पुढचे वाचवलेच नाही. प्रतिक्रियांमधील काही मनापासून दिलेल्या 'सिधी बात नो बकवास' प्रतिक्रिया अतिशय आवडल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Tue, 09/11/2012 - 16:28

In reply to माफ करा. by परिकथेतील राजकुमार

Permalink

विपरित

इतर पुढारलेल्या जातींनी गेली हजारो वर्षे या विपरीत आरक्षणाची मजा घेतली. जैसी करनी वैसी भरनी ! घ्या, १००० वर्षे मजा केलीत ना ? आता हजार वर्षे तुम्ही पण अन्याय सोसा. 'विपरित करणी' नांवाचे योगासन आहे काहो ?
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Tue, 09/11/2012 - 16:31

In reply to विपरित by तिमा

Permalink

याच न्यायाने पुढील हजार वर्ष

याच न्यायाने पुढील हजार वर्ष "सता" जाण्यास तयार रहा, म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Tue, 09/11/2012 - 10:22

Permalink

असं आहे.."problems cannot be

असं आहे.."problems cannot be solved by the same level of thinking that created them" पूर्वीच्या पिढ्यांनी अन्याय केले (मनू वगैरे !!) म्हणून ज्यानी अन्याय केले त्यांच्या पुढच्या पिढ्यांना भोगायला लावणे ही त्याच पातळीची विचारसरणी नव्हे काय ? जातीय किंवा धार्मिक समस्यांबाबत असेच दिसून येते. सर्वांना जुने उकरुन काढ्ण्यात जास्त रस आहे. nobody is ready to start from scratch..
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Tue, 09/11/2012 - 12:25

Permalink

भाषण आहे हे

भाषण आहे हे, भाषणासारखेच आहे. फार काही सापडलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वराजित on Tue, 09/11/2012 - 12:38

Permalink

मुद्दे बरेच स्पष्ट मांडलेत.

मुद्दे बरेच स्पष्ट मांडलेत. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Tue, 09/11/2012 - 22:29

Permalink

२००० वर्षे तुम्ही आमची मारलीत

२००० वर्षे तुम्ही आमची मारलीत म्हणून आता आम्ही तुमची मारतो असे म्हणणॅ हे सूडाचे राजकारण करण्यासारखे वाटते. घटना जरी टुकार लिहिली असली तरीसुद्धा घटनाकाराने इतक्या खालच्या पातळीवरचा विचार केला नसेल अशी आशा आहे. हाच जंगली न्याय लावायचा झाला तर भारतीय मुसलमानांचे काय होईल असा विचार डोक्यात येउन गेला. प्रशासनात सूडबुद्धीला स्थान असू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 09/12/2012 - 10:19

In reply to २००० वर्षे तुम्ही आमची मारलीत by अप्पा जोगळेकर

Permalink

+१००

चांगला प्रतिसाद, अर्थात अशा प्रकरणात काही फारसं गम्य नाही मला, आणि जेंव्हा केंव्हा आपल्या अंगाशी येईल तेंव्हा जसं जमेल तसं निभावुन नेता येईल याची तयारी करावी हे बरं, उगा वाद अन चर्चा करुन काय मिळणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Wed, 09/12/2012 - 12:37

Permalink

मला वाटते की जात/धर्म हे निकष

मला वाटते की जात/धर्म हे निकष लावण्यापेक्षा 'आई-वडलांचे शिक्षण' हा निकष लावणे जास्त योग्य ठरेल. ज्या पालकांचे शिक्षण मॅत्रि़कच्या खाली असेल, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी जास्तीत जास्त सवलती, फी माफी इत्यादी मिळणे आवश्यक आहे. मग जात कुठलीही असो. अश्या घरांमधून सवलत दिली, तरच शिक्षणाचे महत्व रुजेल. बहुतेक वेळेस मुलांनी अपल्यापेक्षा जास्त शिकावे अशीच इच्छा पालकांची असते. त्यामुळे ज्या घरात आईवडील भरपूर शिकलेले आहेत, त्यांच्या मुलांना 'बालमजूरीची' भिती नाही! ते पालक आधीच 'समानतेला' येउन मिळाले आहेत. अर्थात 'सूड/ राजकारण' हा हेतू विकासकार्यात न ठेवता ' सामाजिक समानता' हा हेतू ठेवला तरच हे शक्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Wed, 09/12/2012 - 13:18

In reply to मला वाटते की जात/धर्म हे निकष by कवितानागेश

Permalink

ज्या पालकांचे शिक्षण

ज्या पालकांचे शिक्षण मॅत्रि़कच्या खाली असेल, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी जास्तीत जास्त सवलती, फी माफी इत्यादी मिळणे आवश्यक आहे. मग जात कुठलीही असो.
अहो पण आपल्याच राज्यात अशिक्षीत जमीनदार / राजकारणी हि आहेत आणि पूजेला जाऊन पोटभर खायला मिळत + थोडेसे पैसे मिळतात, असं म्हणून अगदी ५-६ वीत शाळा सोडणारी ब्राम्हण मुलं हि आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 09/13/2012 - 20:41

In reply to ज्या पालकांचे शिक्षण by sagarpdy

Permalink

घोड्याला पाण्यापर्यंत नेता

घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते. पुढे......... :( शैक्षणिक समान पातळीनीच सामाजिक समता + उन्नाती होईल असे माझी भाबडे मत आहे. कारण या समानते शिवाय सामाजिक / आर्थिक समानता येणार नाही. आणि त्याशिवाय कागदावरची जात पुसली जाणार नाही. आणि कागदावर आहे तोपर्यंत , नको असली तरी, मनात देखिल रहाणारच.
  • Log in or register to post comments

Submitted by कवटी on Wed, 09/12/2012 - 15:31

Permalink

राजघराणंसाहेब, बाकीचे सगळे

राजघराणंसाहेब, बाकीचे सगळे मरू द्या. मला आधी हे सांगा की या स्पर्धेत विजेत्यांना किती आरक्षण दिलत? ३ नं आणि १ उत्तेजनार्थ अशी बक्षिसे गुणांनुसार दिलीत की २ नंबर ओपन वाल्यांना आणि उरलेल्या २ नंबरावर आरक्षण (४९%)? की ओपन मधिल पहिला मागास मधिल पहिला... ओपन मधला दुसरा व आरक्षित दुसरा.... असे ४+४ नंबर लावलेत?
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Fri, 09/14/2012 - 11:09

In reply to राजघराणंसाहेब, बाकीचे सगळे by कवटी

Permalink

Liked

Liked
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Fri, 09/14/2012 - 11:43

In reply to राजघराणंसाहेब, बाकीचे सगळे by कवटी

Permalink

कल्पक

कल्पक, मार्मिक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Fri, 09/14/2012 - 13:14

In reply to राजघराणंसाहेब, बाकीचे सगळे by कवटी

Permalink

आरक्षण चूक कि बरोबर हा वेगळा

आरक्षण चूक कि बरोबर हा वेगळा मुद्दा पण, आता दिलेल्या आरक्षणात च्या तरतुदीत शेवटचा निकाल हा आरक्षणानुसार नाही. उदा. विद्यापीठे, बोर्ड यांच्या निकालात आरक्षित उमेदवारास ३० % ला पास आणि ईतरास ३५ % ला पास असे नाहीये. (अथवा अमुक % आरक्षित व अमुक % ईतर उमेदवार पास, बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आरक्षण अशा भानगडी नाहीयेत - आणि तसं नाहीये तेच बरे) आरक्षण केवळ समान संधी देते, समान निकाल नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्या on Sat, 09/22/2012 - 12:55

In reply to राजघराणंसाहेब, बाकीचे सगळे by कवटी

Permalink

खूपच छान प्रतिसाद.

खूपच छान प्रतिसाद. एकदम आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by इष्टुर फाकडा on Fri, 09/14/2012 - 19:41

Permalink

राजघराणं साहेब,

बाकीचे सर्व 'चष्मे' आवडले होते...हा चष्मा भयानक out of focus आहे असे वाटले !
  • Log in or register to post comments

Submitted by बापू मामा on Sun, 09/16/2012 - 14:35

Permalink

आलस्य अवघाचि दवडावा.

आजच्या काळात घटनेने सर्व स्त्री पुरुष भारतियांना आर्थिक उत्कर्ष साधण्याची समान संधी दिलेली आहे. फक्त त्यासाठी श्रमाची गरज आहे. आज ब्राम्हणांना कोणत्याही सवलती नाहीत, म्हणून तो समाज दारिद्र्यात खितपत पडलेला नाहीये. उलट शतकानुशतके ऐतखाऊ राहिलेल्या या समाजाने कार्यप्रवण होउन सर्व भौतिक प्रगती कोणत्याही आरक्षणाविना साध्य केली. इतकी प्रगती केली की अजून ही ईतर जाती त्यांच्या प्रगतीचा मत्सर करतात ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ईतर सर्व भारतीयांनी याचा बोध घ्यावा व कार्यप्रवृत्त व्हावे. माझे स्वतःचे वडिल सरकारी खात्यात सुपर क्लास वन अधिकारी होते. पण ते मला म्हणत की मी तुला कोठेही साधी झाडुवाल्याचीही नोकरी देवू शकणार नाही. माझे शिक्षणही म्युनिसिपालिटीच्या शाळेत झाले.परंतू त्याचा कोणत्याही कुबड्याशिवाय स्वतःची भौतिक प्रगती करण्यास अडथळा आला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 09/22/2012 - 13:42

Permalink

ऐतखाऊ?

बापूमामा, >>>>उलट शतकानुशतके ऐतखाऊ राहिलेल्या या समाजाने ...<<<< शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या काळापासून राजांचे, पेशव्यांचे फड (कार्यालय) सांभाळणे, तलवार गाजविणे, सावकारी व्यवसायातून पेशव्यांना थेट दिल्लीपासूनच्या सैन्य हालचालीच्या बातम्या पुरविणे, ते आधुनिक काळापर्यंत दुकाने चालविणे, पूजापाठ सांभाळणे, शेती व्यवसाय करणे, शिक्षकीपेशा, किर्तनकाराच्या भूमि़कांमधून, पुस्तक लेखन/प्रकाशनातून समाजप्रबोधन करणे, राजकारणात, समाजकारणात, स्वातंत्र्यलढ्यात स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून सक्रिय भाग घेणे, वैद्यकिय व्यवसायातून अर्थार्जन आणि मोफत समाजसेवा करणे, व्यायामशाळा चालवून तरूणांना आरोग्य महत्त्व जाणवून शरीर सुदृढ बनविण्यास उद्युक्त करणे आणि ह्या सर्व विधायक कार्याबरोबर आधुनिकतेच्या प्रवाहात स्वतःत आवश्यक बदल घडविणे ही 'ऐतखाऊ' समाजाची लक्षणे वाटत नाहीत.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com