✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

युवकांच्या चश्म्यातून - आरक्षण.

र
राजघराणं यांनी
Fri, 09/07/2012 - 21:40  ·  लेख
लेख
थोड्या दिवसापूर्वी एका वाद विवाद स्पर्धेला परिक्षक म्हणून गेलो होतो. आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धा होती. २० ते २५ वर्षाची मुलं - मुली स्पर्धक होती. धर्माच्या आधारावर आरक्षण द्यावे का ? दिल्यास ते देशाच्या एकतेला बाधक होईल का ? - असा विषय होता. प्रत्येक कॉलेज मधून दोन्ही बाजूंनी बोलण्यासाठी एक - एक विद्यार्थी पाठवायचा नियम होता. - तरुणांची भाषणं ऐकून टाळकं भणाणून गेलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी मी समारोपाला थोडसं बोललो. जे बोललो त्यात भर टाकून लिहतो. रामभाउ म्हाळगी प्रबोधिनी च्या मुंबईतल्या कार्यालयात झाली स्पर्धा. विनय सहस्त्रबुद्धे, रविंद्र साठे आणी लोकसत्तेचे मुकुंद संगोराम कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. मी म्हणालो - तुमची भाषणं मी ऐकली. टाळकं भणाणून गेलं. घोर निराशेनी - पण थोडा आशेचा किरणही दिसला. आशेचा किरण हा की - अतिशय जिव्हाळ्याच्या - भावनिक - अस्मितेच्या प्रश्नावर; चर्चा वाद - विवाद करण्याची तुमची तयारी आहे. नाहीतर सध्या मुद्दे - गुद्द्यांनी आणी लाथांनी सोडवायची पद्धत आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात आहे. मधल्या खाण्याच्या वेळेला तुम्ही एकत्र हसत खेळत होता. नंतर स्टेजवर येउन तावातावाने भांडत होता. लोकशाहीचा पप्पा आणी पुरोगामिपणाचा फादर म्हणजे व्हॉल्टेर हा फ्रेंच विचारवंत. तो म्हणाला होता. "I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it" . तुझे विचार मला अजिबात मान्य नाहित. पण वेगळे विचार बाळगण्याच्या - तुझ्या हक्काच्या - रक्षणासाठी - मी मरण पत्करायला तयार आहे. याला म्हणतात पुरोगामीपणा ! माणूस विचार करणारा प्राणी आहे यावर श्रद्धा बाळगणार्‍याला मी पुरोगामी म्हणेन. चर्चा करून समोरच्याचे विचार बदलता येतात हा पायाच आहे आहे पुरोगामीपणाचा. अशा प्रकारे ज्ञानाचे आदान प्रदान करत समाज प्रगतीच्या दिशेने पुढे न्यायचा. गामी म्हणजे जाणारा पण जायच कुठे ? पुरो - प्रगतीच्या दिशेला. पुरो - गामी. आता निराशेबद्दल आणी डोकं भणाणण्या बद्दल - तुम्हा सर्वांचीच एक गोष्ट मला जाम खटकलीय. जातीय आरक्षण आणी धार्मिक आधारावरच आरक्षण - यात जमीन आस्मानाचा फरक आहे. हा फरक कुणीच नीटपणी ध्यानात घेतला न्हवता. आरक्षणाचे समर्थक दोन्ही प्रकारच्या आरक्षणाला पाठिंबा देत होते. आणी विरोधक दोन्हीला विरोध. आजचा विषय 'आरक्षण योग्य का अयोग्य ? ' असा न्हवताच मुळी. मित्रांनो ! विषय धार्मिक आरक्षणाबद्दल होता. त्याहून गंभीर गोष्ट म्हणजे अभ्यासाऐवजी - "स्व" जास्त डोकावत होता. ज्यांना आरक्षण मिळतय ते त्याच्या बाजूचे आणी मिळत नाही ते विरोधक अशी स्पष्ट विभागणी दिसली ! काहि अपवाद होते. पण मोजकेच. त्याहून धक्कादायक म्हणजे , भारताचे संविधान, त्यातले धर्मस्वातंत्र्य , सेक्यूलर, सर्वधर्मसमभाव आणी धर्मनिरपेक्षता याबद्दल सर्वांनीच दाखवलेले भीषण अज्ञान. तुम्ही सर्व राज्यशास्त्र, इतिहास अशा कलाशाखांचे विद्यार्थी आहात तेंव्हा तुमच्याकडून काही नवे शिकण्यासाठी आलेला मी .....विज्ञानाचा विद्यार्थी.....असो. एक गोष्ट मात्र तुम्ही मला आज शिकवलीत. कोणती ? ते शेवटीच सांगतो भाषणाच्या. आरक्षणाच्या विरोधकांनी आर्थिक आरक्षणाचा बूट वारंवार उगारला. सगळ्याच गरिबांना द्या वगैरे वगैरे. आरक्षण म्हणजे काय - गरिबी हटाव चा सरकारी कार्यक्रम वाटला की काय तुम्हाला ? का भीक वाटली ? गरिबांना मदत म्हणून भरपूर सरकारी योजना असतात. वेगळ्या रंगाच रेशनकार्ड असतं, सबसिड्या असतात. बहुसंख्य दलित गरिब आहेत हे खरे आहे. पण ते गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं नाही. सामाजिक गरजेतून दिलेलं आहे. बर... आरक्षणाची सुरवात कोणी केली ? आंबेडकरांनी ? अजिबात नाही ! शाहू महाराजांनी ? बिल्कूल नाही ! आरक्षणाची सुरवात केली भगवान मनूनी ! किती टक्के ? तर १०० % ...कोणाला ? तर उच्चवर्णीयांना. हे विपरीत आरक्षण होतं मित्रांनो. ब्राह्मण, क्षत्रीय आणी इतर पुढारलेल्या जातींनी गेली हजारो वर्षे या विपरीत आरक्षणाची मजा घेतली. १००% सत्ता, १००% धर्माधिकार, १००% न्यायव्यस्था, १०० % उच्च उत्पादनाचे उद्योग, १००% शेतजमीनी गेली हजारो वर्षे ठराविक जातींच्याच हातात होत्या. पुण्याच्या एका विद्यार्थ्यानं मगाशी लंगड्या घोड्यांची गोष्ट सांगितली. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेल आहे. घोड्यांची शर्यत लावली. सगळे घोडे तगडे. एक मात्र लंगडा. मुद्दाम लंगडा केलेला घोडा. कुणी केला त्याला लंगडा ? तर तगड्या घोड्यांनी. ही काय स्पर्धा झाली ? मेरीट माय फूट ! त्या लंगड्या घोड्याला आरंभरेषेच्या थोडं पुढे उभ कराव लागेल. तेंव्हाच खरी स्पर्धा होईल. हे आहे सामाजिक आरक्षण. २२.५ %. लोकसंखेच्या प्रमाणात. दलित आणी आदिवासिंना , भटक्या आणी विमुक्तांना दिलय. रेषेच्या पुढं उभ केलय. काय चुकलं ? गेली हजारो वर्षे अभ्यासाची परंपरा नाही. पाढे बापानी शिकवले नाहित. आईनी अभ्यास घेतला नाही. देवळात यायला बंदी. शिकायला बंदी. अस्पृष्यता. मग रेषेच्या पुढे उभ करा त्याना. त्यालाच म्हणतात सामाजिक आरक्षण. सरकारी जावई न्हवे. दुबळा भाउ म्हणा. दुसरी गोष्ट आर्थिक आरक्षणाची. तेही आहेच की दिलेलं . फक्त गरीब व्यक्तींना ते दिलेलं नाही. गरीब जातींना दिलय. त्याला म्हणायच ओ. बी. सी. आरक्षण. गरीब व्यक्तींना कसं देणार आरक्षण ? गरीब शोधायचा कसा ? माझ हॉस्पिटल आहे. भावाचा कारखाना आहे. बायकोच्या नावावर काही नाही. ती झाली की गरीब ! माझ होस्पिटल बायकोच्या नावावर केलं की मी झालो गरीब ! समजा एक श्रीमंत व्यापारी आहे. सोन्याच्या दागिन्यांच दुकान आहे त्याचं. . डान्स बार मधे उधळल्या - गड्याच्या गड्या - नोटांच्या. दारू प्याला.शौक केला. बाई ठेवली. उधळले सगळे पैसे. झाला गरीब. बोला.. देणार त्याला आरक्षण ? एक महा मूर्ख आहे महिपतराव , एक आळशी आहे सुस्तराव ... दोघेही गरीब आहेत. देताय आरक्षण ह्या दोन रावांना ? म्हणे आर्थिक आधार ! सरसकट गरीबांना आरक्षण देता येत नाही हो. तो का गरीब झाला हे पहाव लागत. तो त्याच्या वैयक्तिक दुर्गुणांमुळे गरिब आहे का ? की त्याला संधी नाकारलीय व्यवस्थेनं. श्रीमंत होण्याची संधी. भारतात जातिव्यवस्था आहे. ते एक भयानक वास्तव आहे. जेंव्हा जातीच्या जाती गरीब रहातात. तेंव्हा नक्कीच त्याना संधी नाकारलेली असते. समाजान. व्यवस्थेन. अरे सुतारान सुतारच राहायच. लोहारान लोहार. जास्त पैशे मिळणारे धंदे करायचेच नाही त्यानं. कोणी नाकारली संधी ? - पैशे मिळवण्याची संधी? व्यवस्थेन. म्हणून अनेक जाती गरीब राहिल्या. मग आला मंडल आयोग. मंडल न काय केलं ? निकष लावले. शैक्षणीक, सामाजिक आणी आर्थिक. मंडल ने पहाणी केली सगळ्या जातींची. शिक्षणाचं प्रमाण कुठल्या जातित कमी आहे ? कोणत्या जाती गरीब आहेत ? त्यांना म्हटलं ओ.बी.सी. आणी दिलं आरक्षण. या ओबिसीत माळी आणी कुणबी यासारख्या शेतकरी जाती आहेत. दैवेज्ञ ब्राह्मण ही उच्चवर्णीय जात ही आहे ओबीसी आरक्षणात. तेंव्हा गरीब किंवा मागास उच्चवर्णीयांना आधीच आरक्षण मिळालेलं आहे. पुन्हा द्यायचा प्रश्नच कुठे येतो ? तेंव्हा लक्षात ठेवा आर्थिक आधारावर आरक्षण व्यक्तीला देता येत नाही. गरीब जातीना देता येत - ते दिलेलंच आहे. मग आर्थिक आरक्षणाचा बूट काय म्हणून? जातिय आरक्षणाचा काहिना - काही व्यक्तीना गैर फायदा होतो म्हणे. मागासवर्गीय कलेक्टरचा मुलगाही आरक्षण मिळवतो. अरेच्च्या पुन्हा तेच तेच. जातिच्या लॉब्या असतात की नाही ? ज्यांच्या लॉब्याच नाहीत सत्ताकारणात. त्याना पुढे आणायला आहे आरक्षण. ते व्यक्तीला नाहीच - समाजाला आहे. बटाट्याची तुलना बटाट्याशी करा हो - टोमेटोशी नको. जर ठराविक समाजाला आरक्षण आहे तर - "व्यक्ती गैरफायदा मिळवतेचा" - टॉमेटो आणला कुठून ? हरेक व्यक्तीच्या मागासपणाची कारण शोधणं सरकारला शक्य नाही. जातींच्या मागासपणाची कारणं शोधता येतात आणी त्यावरचा उपाय म्हणजे आरक्षण. मग विचारता हे संपेल कधी ? प्रश्न विनोदी आहे. आरक्षण म्हणजे सत्ताकारणातला न्याय्य वाटा. तो संपायला कशाला पाहिजे ? जेव्हढे टक्के हक्काचा वाटा आहे. तो मिळालाच पाहिजे. कायम.निरंतर.मिळाला पाहिजे आणी अनुशेष म्हणजे काय ? मागासांना आरक्षण आहे २२.५ % + २७.५ % ओबीसींना = ४९ %. एकूण आरक्षण ४९ % बर हे आरक्षण कागदावर आहे. खरोखर जागा भरल्या किती. दिल्लीत कॅबिनेट सचीव दर्जाच्या ९६ पोस्ट आहेत. दलित किती त्यातले १ . फक्त एक. म्हणजे एक टक्का. ओबीसी कीती. अ ग्रेडचे केंद्र सरकारी अधिकारी घेतले तर त्या ओबीसी ४% हून कमी आहेत. म्हणजे ४९% आरक्षण फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात ते आलेलच नाही. राखीव जागांचा अनुशेष भरून काढणे अजून बाकी आहे. आधी अनुशेष भरा नंतर तोंड वर करून विचारा की - संपेल कधी ? पदोन्नती मध्ये आरक्षण दिलं पाहिजे ते म्हणूनच. अनुशेष भरण्यासाठी. घरात घुशी झाल्या म्हणून कोणी घर जाळत नाही. तस कुठल्याही सरकारी योजनेत काही दोष रहाणारच. म्हणून कुणी योजनाच बंद करत नाही. शिवाय श्रीमंत ओबीसींना म्हणजे क्रीमी लेयरला आरक्षणाचे लाभ मिळतही नाहीत. तशी तरतूदच कायद्यात आहे. प्रथम अनुशेष भरला पाहिजे. सत्तेत हक्काचा वाटा मिळाला की हळूहळू लंगडा घोडा तगडा होईल. स्वतःच्या हिमतीवरच पळू लागेल. स्पर्धा करेल ओपनशी. माझ्या एका मित्राची गोष्ट. विजय. तो ओबीसी आहे. ओबीसीच्या सीटांचे मार्क क्लोज झाले ओपनच्या वर. त्याला आरक्षणाचा काहिच उपयोग झाला नाही. ओपनलाही काही तोटा नाही. त्या कॉलेजपुरत तरी - आरक्षण नसल्यातच जमा. या एव्हढ्या शर्यतीपुरता घोडा तगडा झालाय. आरक्षण अस संपतं. आपोआप. हा मुद्दा एका एकाही स्पर्धकान मांडला नाही. आता आपण आजच्या खर्‍या विषयावर येवू. धार्मिक आरक्षण. म्हणजे मुस्लिम आरक्षण. कारण मुसलमान अल्पसंख्यातले बहुसंख्य आहेत. मुस्लिमांना आरक्षण द्यावे का ? दिल्यास भारतातली एकात्मता वाढेल का कमी होईल ? संविधान आणी सर्वधर्म समभाव हा विषय प्रत्येकाने चघळला. आणी प्रचंड घोळ घातला. सभ्य स्त्री - पुरुष हो - आपल्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव नाही. धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य ही घटनेत नाही. घटनेत सेक्यूलारिझम आहे. सर्वधर्मसमभाव आणी सेक्युलारिझम या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत. सर्वधर्म समभाव. सर्व धर्म सारखेच आहेत. त्यांची शिकवण एकच आहे. सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छती - ही हिंदुधर्माची शिकवण आहे. संविधानातला कायदा न्हवे ! उलट धर्मपालनाचे कोणतेच हक्क संविधान देत नाही. तुम्ही सगळे प्रेमात पडायच्या वयाचे आहात. आणी कुणाच्यातरी प्रेमात पण असणार. जो - जी नसेल त्यान कार्यक्रम संपल्यावर मला येऊन भेटावं. शनिवारवाड्यावर जाहिर सत्कार करण्यात यील. असो ..समजा तुम्ही ट्रेन नी कुठेतरी प्रवास करत आहात. समोर एक अप्सरा बसली आहे. यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली. अप्सरा दिसली. तुम्ही मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करत आहात. असे प्रेम करण्याचे स्वातंत्र्य ती अप्सरा तुम्हाला अवश्य दील. पण मनातल्या मनात. मांडे खा. पण मनातल्या मनात. तिला ट्रेनमधे डोळा मारला ; की काय खायच ? सँडल ! भारताच्या राज्यघतनेत सेक्युलारिझम आहे. म्हणजे इहवाद आहे. कुठल्याही धर्मावर तुम्ही श्रद्धा ठेवू शकता. प्रेम करू शकता पण कसं ? मनातल्या मनात ! तुम्ही म्हणाल आमच्या धर्मात अस्प्रुश्यता आहे. आम्ही ती पाळणार... मग काय खायचं ? सँडल. तुम्ही म्हणाल आमच्या कुराणात लिहिलिय . मूर्त्या फोडा. काफरांविरुद्ध जिहाद करा. म्हणा की. पण. मनातल्या मनात म्हणायच. खरोखर कुणी जिहाद करू लागला- तर काय खायच ? ....सँडल. धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायच ? ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ? कायदा ठरवेल धर्म नाही. सर्व धर्म चांगले आहेत ते जवळ घ्या म्हणजे सर्वधर्म समभाव. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजे च इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे. आणी अशा प्रकारचा पारलौकिक श्रद्धेसाठीचा कोणताही धर्म तुम्ही पाळू शकता. नवा धर्म बनवू शकता. धर्म बदलू शकता. धर्मांतराचे स्वातंत्र्य ही आहे. आता मला सांगा. शासकीय निर्णयात धर्म आणायचा नाही हाच जर सेक्युलारिझम चा अर्थ आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे काय देता यील ? दुसरं धर्म ही ऐच्छीक गोष्ट आहे. धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे देता यील ? नीट विचार करा. समजा मुस्लिमांना आरक्षण दिलं. तर मुस्लिम कोण ? हे ठरवायचं कसं ? सुन्नी म्हणतात की शिया हे खरे मुसलमान नाहीत. कादियानी / अहमदिया पंथाचे लोक खरे मुसलमान नसून ते काफिर आहेत. त्यांच्या विरुद्ध जिहादचे फतवे ही निघतात पाकिस्तानात. मुसलामान कोण ? व्याख्या काय मुसलमानाची ? नाव ? समीर आणी कमल नावाच्या मुसलमानांना मी ओळखतो. अंतुले आडनावाचे मुसलमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सरकारने मुसलमानाची पहिल्यांदा व्याख्या करावी लागेल. टोपी, दाढी, नमाज हे सर्व नाकारणारे ही मुसलमान असतातच. म्हणजे शेवटी सरकारला अ‍ॅफीडेव्हीट घ्यावे लागेल की मी मुसलमान आहे. आणी मगच आरक्षण देता यील. पण गोची अशी आहे की घटनाकारांनी धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आरक्षण मिळवण्यासाठी मी काय करावे ? एक अ‍ॅफीडेव्हीट करावे. मी मुसलमान आहे. आरक्षणाचा लाभ मिळाला की पुन्हा धर्म बदलावा. हिंदू व्हावे. आता सरकार काय करणार ? माझी नोकरी काढून घेणार ? बर मी समजा सुमडीत धर्म बदलला. गुपचूप. तर सरकारला कसे कळणार ? आरक्षणाचा लाभ मिळालेले लोक इस्लाम पाळतात का ? यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकार मौलवींची कमीटी नेमणार आहे काय ? अहो दिवसातून पाच वेळा धर्म बदलता येतो. एक अ‍ॅफीडेव्हीट खेळ खलास. जी गोष्ट ऐच्छीक आहे ती गोष्ट कुठल्याही सवलतीसाठी अट म्हणून घालता येत नाही. एवढी साधी गोष्ट सरकारला कळू नये. जातीचे खोटे दाखले मिळवून सवलती लाटणार्यांवर कायदेशीर कारवाई करता येते. कारण जात बदलता येत नाही. त्यात जन्म घ्यावा लागतो. पण धर्म ही ऐच्छीक बाब आहे. त्यावर आधारित सवलती देता येत नाहीत. धर्मांतराचे स्वातंत्र्य आणी धार्मिक आधारावर सवलती एकाच वेळी कशा देता येतील. समजा उद्या तोगाडीयांनी हिंदू बांधवांना आवाहन केल - कोर्टात अ‍ॅफीडेव्हीट करून सवलती आणी आरक्षण लाटण्याच.. काय करणार तुम्ही ? याउलट सरकार मौलवींची सुपारी घेउन इस्लामच्या प्रचारासाठी असे कायदे करत आहे असा कोणी आरोप केला तर ? धार्मिक आरक्षणाने एकता वाढेल का कमी होईल ? सर्वात महत्वाच - आज मुस्लिमांना आरक्षण आहेच. मुस्लिमातल्या मागास जातींना आरक्षणाचा लाभ मिळतोच आहे. सर्वच धर्मातल्या मागास आणी गरीब जातींना आरक्षण आहे. ते तसेच राहिले पहिजे. पण सरसकट सर्व मुस्लिमांना आरक्षण मिळू शकत नाही. कोणत्याच धार्मिक आधारावर आरक्षण मिळू शकत नाही. फक्त एका स्पर्धकाने हा मुद्दा मांडला त्याला पहिलं बक्षिस देत आहोत. मुस्लिमांना समजायला हव की धार्मिक आधारावरच आरक्षण घटनाविरोधी तर आहेच पण; ते देता येणंही अशक्य आहे. त्यामुलेच ते कोर्टात टिकणार नाही. सरकार तुम्हाला उल्लू बनवते आहे. तुमच्या सर्वांकडून शिकलेली एक गोष्ट म्हणजे वक्त्याने उगीच बडबड करत बसू नये वेळ संपली की भाषण बंद करावं. तुम्ही सर्वांनी बरोब्बर दिलेल्या वेळेत भाषण संपवलीत. तुम्च्याकडून मी हे शिकलो. आता आचरणात आणतो आणी भाषण संपवतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
14534 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

व्वा राजघराणं !!

अर्धवटराव
Fri, 09/07/2012 - 22:01 नवीन
बरेच स्पष्ट मांडलेत मुद्दे. भले शाब्बास. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

आवडलं, बरंचसं पटलं.

कवितानागेश
Fri, 09/07/2012 - 23:19 नवीन
आवडलं, बरंचसं पटलं. :)
  • Log in or register to post comments

वैचारिक चर्चेचा अवघड विषय...

बहुगुणी
Fri, 09/07/2012 - 23:35 नवीन
वैचारिक चर्चेचा अवघड विषय, लेखकाच्या इतर लिखाणाप्रमाणेच खटकेबाज पद्दतीने मांडलेला आहे. काही कळलं त्यापैकी काही पटलं, काही कळलं नाही ते चर्चेतून कळेल अशी आशा आहे. तेंव्हा पुढे वाचेनच. फक्त secularism म्हणजे इहवाद का हे तपासून पहावं लागेल, मला वाटतं secularism म्हणजे निधर्मीपणा, आणि materialism म्हणजे इहवाद. तज्ञ मंडळी खरं काय ते सांगतीलच. (रेकॉर्ड केलेलं भाषण घाईघाईत transcribe करून लेख टाकला आहे असं शुद्धलेखनाच्या ढोबळ चुकांवरून वाटलं. अर्थात्, मिपाला शुद्धलेखनाचं फारसं आग्रही स्वारस्य नाही हेही खरंच ;-), आधीच्या इतर लेखनाच्या वाचनावरून या लेखकाकडून त्या अपेक्षित नव्हत्या इतकंच.)
  • Log in or register to post comments

+१ आणि पुढे

विकास
Sat, 09/08/2012 - 00:12 नवीन
वैचारिक चर्चेचा अवघड विषय, सहमत फक्त secularism म्हणजे इहवाद का हे तपासून पहावं लागेल, मला वाटतं secularism म्हणजे निधर्मीपणा, आणि materialism म्हणजे इहवाद. तज्ञ मंडळी खरं काय ते सांगतीलच. हेच वाटत होते. आता मूळ लेखातील काही मुद्यांबद्दलः समजा एक श्रीमंत व्यापारी आहे. सोन्याच्या दागिन्यांच दुकान आहे त्याचं. . डान्स बार मधे उधळल्या - गड्याच्या गड्या - नोटांच्या. दारू प्याला.शौक केला. बाई ठेवली. उधळले सगळे पैसे. झाला गरीब. बोला.. देणार त्याला आरक्षण ? एक महा मूर्ख आहे महिपतराव , एक आळशी आहे सुस्तराव ... दोघेही गरीब आहेत. देताय आरक्षण ह्या दोन रावांना ? आर्थिक आरक्षण असावे का नाही हा मुद्दा तुर्तास बाजूस ठेवूयात. पण आपला वरील युक्तीवाद अजिबात पटला नाही. आरक्षण हे त्यांच्या पेक्षा त्यांच्या मुलांसाठी होऊ शकते ना? पण ते देखील नको. जर कोणी प्रकल्पग्रस्त आहे, संपातून पोळलेल्या गिरणी कामगारांची मुले आहेत, नैसर्गिक आपत्तीत बेघर होऊन रस्त्यावर आलेले आहेत, रोजगारी शोधत शहरात रहायला आलेले आणि झोपडपट्टीत रहाणारे आहेत, यांच्या मुलांनी अथवा त्या पालकांनी काय पाप केले आहे? फक्त त्यांच्य बापजाद्यांमुळे मिळालेली जात सोडून? म्हणूनच वर बहुगुणींनी म्हणल्याप्रमाणे अवघड विषय आहे. आणि उत्तर जितके सोपे केले जाईल तितका त्यातला प्रश्न अवघडच होत जाईल असे वाटते. आरक्षण म्हणजे सत्ताकारणातला न्याय्य वाटा. तो संपायला कशाला पाहिजे ? हिंदू समाजातील शताकानुशतके चालत आलेल्या जातियतेच्या विष जर जायला हवे असे वाटत असेल तर समाज एक नको का होयला? जो पर्यंत समाजात जातीनिहाय घटक ठेवले जातील तो पर्यंत हे विष कसे जाणार? जेव्हढे टक्के हक्काचा वाटा आहे. तो मिळालाच पाहिजे. कायम.निरंतर.मिळाला पाहिजे म्हणजेच जातीयता निरंतर रहायला हवी आहे असे म्हणायचे आहे का? आज आम्ही परदेशात रहातो. अगदी व्यक्तीगत उदाहरणच देयचे झाले तर, शाळेतल्या लेकीसाठी बाकी सभोवताल हा जरी अमेरीकन असला तरी संस्कार, रहाणीमान भारतीय आणि हिंदू पद्धतीचेच असते. तरी देखील आजपर्यंत तिला जात हा शब्द माहीत नाही... मग आमची जात काय हा मुद्दा लांबच राहीला. पण उद्या त्याच मुलीस घेऊन भारतात आलो आणि कॉलेजात अ‍ॅडमिशन घेयची असेल तर काय सांगायला लागणार? जात? आता हे माझे व्यक्तीगत दूर राहूंदेत, पण ज्या पुढच्या पिढीतून जातीयता नष्ट होयला हवी त्यांच्यात ह्या शिक्षणाच्या रुपाने आणि सरकारी पद्धतीने जात जिवंत ठेवली जाते असे वाटत नाही का? थोडक्यात तुम्हीच लिहील्याप्रमाणे, "धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायच ? ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ? कायदा ठरवेल धर्म नाही. " म्हणजे याचाच अर्थ आज लोकांच्या मनात जातीयता जागी ठेवायचे काम कायदा आणि संविधानच करते असे वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

आरक्षणाला आक्षेप नाही. मात्र

निनाद मुक्काम …
Sat, 09/08/2012 - 00:28 नवीन
आरक्षणाला आक्षेप नाही. मात्र त्याचा लाभ दुसर्‍या पिढीला देऊ नये. व ते आर्थिक निकषावर द्यावे असे मनापासून वाटते. मी बारावीत असतांना विज्ञान शाखेतील एका प्रख्यात क्लास मध्ये जायचो तेथे मुंबई मधील प्रख्यात कॉलेज मधील मुले यायची. आरक्षणामुळे सरकारी नोकर्या ( मलाईदार खात्यांच्या ) वर रुजू असलेलेया पहिल्या पिढीच्या पालकांची श्रींमत मुलेबाळे गाड्या उडवीत रुईया व रुपारेल कॉलेजात कमी टक्के मिळवून दाखल झाली होती. आता त्यांच्या वडिलांच्या कमाई व त्याने आलेली श्रीमंती ह्यावर आक्षेप नाही. कारण ह्या खात्यावर कोणीही काम केले तरी त्यांना लक्ष्मी प्रसन्न होते. मात्र आक्षेप ह्या गोष्टींचा कि ह्यांची मुले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली असतांना ह्यांना मेडिकल व अभियांत्रिकी कॉलेजात किंवा सरकारी नोकरीत आरक्षण कशाला मिळावे ? ह्या उलट चेंबूर मधील भीम नगरात अनेक विद्यार्थी बारावी ला चांगले मार्क मिळवून सुध्धा अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेऊ शकत नाहीत. कितीतरी जण दहावी नंतर शाळा सोडून दिवसभर केरेम क्लब मध्ये घालवतात. ह्या लोकांना खरे तर सरकार व सामाजिक संस्थेतर्फे शिक्षण साठी आर्थिक मदत व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण साठी प्रवृत्त केले पाहिजे. तेव्हा आरक्षणाचा खरा उद्देश सफल होईल.
  • Log in or register to post comments

अतिशय छान वैचारिक मांडणी...

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/12/2012 - 15:51 नवीन
अतिशय छान वैचारिक मांडणी... :)
  • Log in or register to post comments

पटत नाहि.. निशेध

सुजित पवार
Sat, 09/08/2012 - 01:31 नवीन
आरक्षण म्हणजे काय - गरिबी हटाव चा सरकारी कार्यक्रम वाटला की काय तुम्हाला ? - आरक्षण याचे कारन हे पन अहे कि समाजाला वर आला पहिजे. वर येने समज म्हन्जे त्याचि आर्थिक स्थिथि सुधारने पन आहे. जे गरिब आहे त्यान सुध्धा आरक्षण मिलाले पहिजे. तुम्हाल मागास जातिना आरक्षण मिलले पाहिजे असे वाटते, पन जो गरिब आहे तो सुध्धा मागस आहे हे सोयिस्कर विसरता? जेव्हा सर्व गरिबाना आरक्षण मिलेल त्यात मागास जतिना पन मिलेल, हे साधे सुध्धा कलत नहि ? दारिद्र्य रेशे खालिल लोकना द्या आरक्षण त्याना शोधवे लागनार नाहि. मागास जतिना ६० वर्शे आरक्षण मिलुन जर वर येता येत नहि तर दोश कोनाचा? कलेक्टअर बापचा मुलाला पन आरक्षण पहिजे असेल, तर या पेक्शा दुर्देव ते कोन्ते? या अस्ल्या टुच्क्या गोश्टि सुध्धा ब्रैन ड्रेन साठि कारन आहेत. माफ करा पन अत्यन्त एकतर्फि लेख वाटला.
  • Log in or register to post comments

लेख अतिशय एकांगी आहे

रामपुरी
Sat, 09/08/2012 - 01:48 नवीन
बरेच मुद्दे पटले नाहीत.
  • Log in or register to post comments

शब्दांचा कीस पाडण्यपलीकडे यातून काहीही उत्पन्न होत नाही

लॉरी टांगटूंगकर
Sat, 09/08/2012 - 01:53 नवीन
सरकार तुम्हाला उल्लू बनवते आहे. +१०० मला या बाबतीत सर्व लोकांच्या बाजू पटतात.शेवटी असे वाटते कि शब्दांचा कीस पाडण्यपलीकडे यातून काहीही उत्पन्न होत नाही .आरक्षण आहे हि वस्तूस्थिती आहे ते संपणार नाही .जे आहे ते स्वीकारावे . आणि हो ;आरक्षण आपोआप संपल्याचे कधी बघितले गेले नाहीये शतकी धाग्याच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments

कुठेतरी वाचले होते की

इरसाल
Sat, 09/08/2012 - 09:34 नवीन
आरक्षण हे "मागासलेल्या" (आर्थिकदृष्ट्या मागे) असलेल्या लोकांना "पुढारलेल्या" (आर्थिकदृष्ट्या पुढे) असणार्‍या लोकांच्या बरोबरीने आणण्यासाठी असलेले तंत्र आहे. समजा एकजण (क्ष) व दुसरा (क्ष-१) आहे तर (क्ष) = (क्ष-१) करण्यासाठी सरकार (+१) हे आरक्षण (क्ष-१) ला देते. आता (क्ष) = (क्ष-१ )+(+१) म्हणुन क्ष = क्ष. पण हेच जर कायम चालु राहीले तर (क्ष) हा (क्ष) च राहील व (क्ष-१) हा नंतर नंतर (क्ष+१), (क्ष+२), (क्ष+३).........असा होत जाईल मग हा असंतुलितपणा कसा दुर करायचा. वर निमुपोज ने म्हटल्याप्रमाणे एका पिढीनंतर त्यांचे आर्थिकमुल्यमापन करुन नंतरच्या पिढीसाठी आरक्षण द्यावे की न द्यावे हे ठरवावे.
  • Log in or register to post comments

खुप आधीही सांगितले तेच

भरत कुलकर्णी
Sat, 09/08/2012 - 09:40 नवीन
खुप आधीही सांगितले तेच सांगतो: भारत देश अ‍ॅक्सल नसलेले चाक पळणारे आहे....दिशाहीन. बाकी लेख उत्तम आहे. चांगले लिहीतात आपण.
  • Log in or register to post comments

दुरुस्ती...

मन१
Sat, 09/08/2012 - 10:07 नवीन
माझ्या एका मित्राची गोष्ट. विजय. तो ओबीसी आहे. ओबीसीच्या सीटांचे मार्क क्लोज झाले ओपनच्या वर. त्याला आरक्षणाचा काहिच उपयोग झाला नाही. ओपनलाही काही तोटा नाही. त्या कॉलेजपुरत तरी - आरक्षण नसल्यातच जमा. या एव्हढ्या शर्यतीपुरता घोडा तगडा झालाय. आरक्षण अस संपतं. आपोआप.
मी बारावीपासून जे विज्ञान शाखेत नि वाणिज्य शाखेत जायला जी चढाओढ पाहतोय दहावीच्या मार्कांची; आसपास आरक्षण बघतोय; centralised admission process(CAP) ; त्यात असे तत्व नाही. माझ्या माहितीत इतरत्र असे नाही. . अभियांत्रिकीला(इंजिनियरिंगला) मी प्रवेश घेतला तेव्हा नियम काय होता? तुम्ही आरक्षित गटातील असाल तर आधी तुमचा खुल्या गटातून( ओपन मधून) क्रमांक लागतो का ते पाहिले जाते. लागत असेल, लागलिच अ‍ॅड्मिशन देउन टाकतात. तो जर लागला नाही, तर आरक्षित गटातून लागतोय का हे पाहिले जाते? कारण? ओपनच्या जागांवार सर्वांचाच न्याय्य हक्क आहे, असा दावा केला जातो./ आरक्षित जागेला अर्ज करत असाल तरी तो आधी खुल्या जागांसाठीच गृहित धरला जातो. तुम्ही सांगितलेली व्यवस्था नक्की कुठे कुठे आहे ठाउक नाही. ती तशी इतरत्र आली नाही तर आरक्षण संपणार नाही आपोआप. . माझं इंजिनियरीम्ग वगैरेचं शासनाचं (directorate of technical education चं)अधिकृत ब्राउअचर अजून घरिच असावं. महाराष्ट्रात जाणं झालं की/तर सापडावं> . बाकी चालु द्या.
  • Log in or register to post comments

२०१२ चे माहितीपुस्तक,महाराष्ट्र DTE

अभि
Sat, 09/08/2012 - 12:53 नवीन
इथे पहा २०१२ चे माहितीपुस्तक आहे, महाराष्ट्र DTE.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

२००१ ते २००६

मन१
Sat, 09/08/2012 - 13:05 नवीन
२००१ ते २००६ दरम्यानचे हवे आहे.(बादवे, अशा गोष्टी माहितीच्या अधिकारात मागवता येतात का म्हणे?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभि

२००५ चे आहे

अभि
Sat, 09/08/2012 - 13:54 नवीन
२००५ चे आहे , त्या साइटवरच२००५
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

भाषण म्हणुन आवडले. एक

मृत्युन्जय
Sat, 09/08/2012 - 10:54 नवीन
भाषण म्हणुन आवडले. एक परीक्षक म्हणुन तुम्ही त्या मुलांसमोर बोलत होता. तेव्हा त्यांनाही फारसा ऑप्शन नव्हता. त्यांनीही टाळ्या वाजवल्या असाव्यात. एक वाचक म्हणुन मला पर्याय आहेत. पण तरीही मला आवडले. काहि तथ्य नक्कीच आहे. पण सरसकट सगळे मुद्दे पटलेच असे नाही. ज्या निकषांवर जातिनिहाय आरक्षण वैध आहे त्याच निकषांवर धर्मनिहाय आरक्षण देखील वैध ठरु शकेल. प्रश्न आहे की ते औचित्यपुर्ण आणि न्य्याय्य ठरेल की नाही. असो. काही मुद्दे पटले काही अजिबात नाही. पण एकुण भाषण म्हणुन उत्तम.
  • Log in or register to post comments

मर्यादित

तिमा
Sat, 09/08/2012 - 11:53 नवीन
आपल्या मायबाप सरकारने आरक्षण हे फारच मर्यादित ठेवले आहे. फक्त शिक्षण व नोकरीतच आरक्षण का ? ते रेल्वेतल्या आरक्षणात, चित्रपटगृहातल्या आरक्षणात, बँकेच्या व्यवहारांत, जिथे जिथे लाईन लागते त्या सर्व खिडक्यांवर, उपहारगृहात, रस्त्यावरच्या लेन्समधेही ४९ टक्के आरक्षण ठेवावे.
  • Log in or register to post comments

इथे एकतर लेखकाने स्वतःच

चेतन माने
Sat, 09/08/2012 - 12:32 नवीन
इथे एकतर लेखकाने स्वतःच आरक्षण मिळते त्यांना "लंगडे घोडे" म्हटले आहे. ठीक आहे चालेल, लेखाचा सारांश म्हणजे "आरक्षण आहे तसंच राहूद्या"!! कदाचित त्यामुळे आर्थिक मागासलेपण दूर होईल. म्हणजे शर्यतीत नेहमी ते रेषेच्या पुढेच सुरुवात करतील पण, जेव्हा बौद्धिक निकष लावले जातील तेव्हा कदाचित लंगड्या घोड्यांची पंचाईत होईल . भारतात तसं सर्वशिक्षा अभियान एकीकडे राबवले जात असताना हा इतका मोठा विरोधाभासच म्हणावा लागेल. म्हणजे शारीरिक दृष्ट्या कमकुवत असलेले सुद्धा एकत्रच शर्यतीला सुरुवात करतायत पण आरक्षण असलेले मात्र रेषेच्या पुढून!!! "सर्वधर्म समानता" , "सामाजिक समतोल" , "आर्थिक विषमता" असल्या किचकट गोष्टी फक्त शाळेतल्या मुलांना मार्क कमवायला शिकवल्या जातात, प्रत्यक्षात भलतीच शर्यत सुरु असते. असल्या शर्यतींचे विजेते कुठल्या प्रकारचे असतील हाच काळजीचा विषय आहे,असो पण माझ्या सारख्या युवकाला मात्र माझ्या आर्थिक परिस्थितीपेक्षा माझ्या बौद्धिक क्षमतेविषयीच जास्त काळजी आहे.
  • Log in or register to post comments

मुद्द्याच

प्रकाश घाटपांडे
Sat, 09/08/2012 - 14:09 नवीन
"सर्वधर्म समानता" , "सामाजिक समतोल" , "आर्थिक विषमता" असल्या किचकट गोष्टी फक्त शाळेतल्या मुलांना मार्क कमवायला शिकवल्या जातात, प्रत्यक्षात भलतीच शर्यत सुरु असते.
खर आहे.निसर्गात एक व्यक्ती दुसर्‍यासारखी नसते.निसर्गातील विविधता जेव्हा असह्य व्हायला लागते त्यावेळी आपण त्याला विषमता म्हणायला सुरवात करतो. शक्य तितकी समानता ठेवण्याचा आपला प्रयत्न असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन माने

हम्म...

मन१
Sat, 09/08/2012 - 14:15 नवीन
समानता... संधींची समानता की उत्पन्नाची समानता... भूक एकसमान नसेल तरी सर्वांना एकसमान भोजन द्यावे का वगैरे वगैरे मुद्दे. (भुकेची समानता नसेल तर अन्नाची समानता कशाला हवी? जो अधिक टॅक्स भरतो त्यास अधिक सवलत मिळणार.(जो हजार भरतो, त्यास १० टक्के सवलत मिळाल्यास त्यास १००चा फाय्दा होतो. जो मुळातच दोनशे रुपये टॅक्स भरतो, त्यालाही १०% सूट दिली, तर त्याचा फायदा २०च रुपयांचा होतो. आता तुम्ही एकसमान टाक्के फायदा देणार की एकसमान आकार फायदा(दोघांनाही १०० रुपये माफ. म्हनजेच, हजारवालयला १०% च फायदा पण २०० वाल्याला ५०%, पाच्पट फायदा!) देणार, हा प्रश्न. )) ठराविक मुद्दे येत रहतील. ठराविक उत्तरंही येत राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

तडाखेबंद भाषण

विसुनाना
Sat, 09/08/2012 - 13:50 नवीन
एक भाषण म्हणून आवडले. पण काही मुद्द्यांना खिंडारे पाडता येतील. आरक्षण द्यावे आणि ते आर्थिक निकषांवरच द्यावे असे माझे मत आहे. स्पर्धेत तुम्ही परीक्षकाऐवजी स्पर्धक असता तर तुम्हालाच पहिले बक्षीस मिळाले असते. :) आता, दुसर्‍या बाजूनेही एक भाषण लिहा.. म्हणजे मुळात आरक्षण नकोच पण दिलेच तर धर्माधारीतच हवे -या बाजूने! ;)
  • Log in or register to post comments

आता, दुसर्‍या बाजूनेही एक

भडकमकर मास्तर
Sat, 09/08/2012 - 15:33 नवीन
आता, दुसर्‍या बाजूनेही एक भाषण लिहा.. म्हणजे मुळात आरक्षण नकोच पण दिलेच तर धर्माधारीतच हवे -या बाजूने! मग त्यावर परीक्षणाचे भाषण विसुनाना करतील... आणि तुम्हाला नंबर देतील... त्या विसुनानांच्या भाषणाचे आपण पुन्हा परीक्षण करू ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

एक भाषण म्हणून

सुहास..
Tue, 09/11/2012 - 17:27 नवीन
एक भाषण म्हणून आवडले.>>> नेहमीप्रमाणे ( आणि विसुनानांच्या ख्यातीने ) एकाच वाक्यात लेखाचा परामर्श, समीक्षा, सारांश महाप्रचंड आवडला !! बाकी लेखाबद्दल , जरा प्रॅक्टीकल अभ्यास वाढवुन मग ( पलीकडे असलेल्या ३% टक्क्यांसाठी )आंजावर लिहीत चला शेठ, एखाद्या दिवशी प्रकरण अंगाशी येईल, हे भाकित ई.ई. नाही. अनुभव आहे ! धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

प्र का टा आ

उगा काहितरीच
Sat, 09/08/2012 - 20:15 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments

दहावी बोर्डाचा फॉर्म भरताना

मदनबाण
Sat, 09/08/2012 - 20:08 नवीन
दहावी बोर्डाचा फॉर्म भरताना पहिल्यांदा मी जात लिहली,तो पर्यंत कोणाला जात सांगायची असते,ते माहित नव्हते ! जर जात संपवयाची असेल तर कुठल्याही प्रकारच्या फॉर्मवर त्याची विचारणा असता कामा नये असे मला वाटते... बाकी "आरक्षण" हा विषय जनते पेक्षा "राजकारण्यांचा" जिव्हाळ्याचा विषय आहे,कारण त्यावरच त्यांना सत्तेची पोळी भाजता येते... अगदी वर्षानु वर्ष !
  • Log in or register to post comments

राजघराणं यांचं आधीचं लिखाण

अप्पा जोगळेकर
Sat, 09/08/2012 - 22:38 नवीन
राजघराणं यांचं आधीचं लिखाण वाचलेलं आहे. त्यामुळे हे भाषण त्यांचं आहे यावर विश्वास बसत नाही इतकं प्रचारकी आहे. मी खाजगी आस्थापनात काम करतो. पाच वर्षात मला एकाही सहकार्‍याने आजवर कधी जात विचारली नाही. मलादेखील इतर कोणा सहकार्‍याला ती विचारण्याची गरज वाटली नाही. यामुळे कोणावर अन्याय झाला ? भीक मागायची आणि भिकारी म्हटल्यावर ओरड करायची हे कोणत्या प्रामाणिकपणात बसते ते मला कळत नाही. पुन्हा हे सगळे लादणार्‍या टिकोजीरावला आम्ही ग्रेटेस्ट इंडियन म्हणून डोक्यावर घेउन नाचायचे. जातविरहीत व्यवस्था या देशात कधी अस्तित्वात येईल अशी शक्यता नाहीच.
  • Log in or register to post comments

अप्पा जोगळेकर, भीक मागायची

प्राध्यापक
Sun, 09/09/2012 - 11:58 नवीन
अप्पा जोगळेकर, भीक मागायची आणि भिकारी म्हटल्यावर ओरड करायची हे कोणत्या प्रामाणिकपणात बसते ते मला कळत नाही. मुळात ही भिक नाही दलीतांचा तो हक्क आहे हे ज्या दिवशी तुम्हा लोकांना समजेल तो सुदिन ..,राजघराण,म्हणतायेत त्यामध्ये १००% तथ्य आहे,हेच आरक्षण पिढ्यानपिढ्या आधी उपभोगनार्‍यांना आता दुसर्‍यांना देण्याची वेळ आल्यानंतर मात्र पोटशुळ उठतो,अजब आहे, पुन्हा हे सगळे लादणार्‍या टिकोजीरावला आम्ही ग्रेटेस्ट इंडियन म्हणून डोक्यावर घेउन नाचायचे बरोबर आहे म्हणा,तुमचे हे सर्व अनिंयत्रीत आधीकार उभोगनार्‍यावर नियंत्रण बसवणार्‍या ला तुम्ही टीकोजीरव म्हणनार,आणी सर्वात महत्वाचे डॉ.आंबेडकर हे कोणी काहीही म्हणोत ग्रेटेस्ट इंडियन आहेतच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

मस्त भाषण!

दादा कोंडके
Sat, 09/08/2012 - 23:02 नवीन
सर्वच मुद्दे पटले नसले तरी भाषण खूपच मस्त आहे. पण वादविवाद स्पर्धेत फक्त एक (कितीही महत्वाचा असला तरी) मुद्दा आला म्हणून एखाद्याला बक्षीस देणे काही पटलं नाही. मुद्यातून आभ्यास दिसतो. पण त्याच बरोबर बोलणार्‍याची भाषा, बॉडीलॅग्वेज, बोलण्यातले चढ-उतार (मॉड्युलेशन), बांधणी, आत्मविश्वास याही गोष्टी येतात.
  • Log in or register to post comments

भाषण आवडले

पैसा
Sat, 09/08/2012 - 23:15 नवीन
सगळेच मुद्दे पटले नाहीत पण भाषण नेहमीप्रमाणे मुद्देसूद आणि चटपटीत!
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/09/2012 - 12:16 नवीन
भाषणातले मुद्दे विस्कळीत असले तरी पटणारे आहेत. आरक्षण गरजेचेच आहे. खासगी क्षेत्रातही आरक्षण असले पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

का ? उद्या तुम्ही स्वतः

sagarpdy
Tue, 09/11/2012 - 12:12 नवीन
का ? उद्या तुम्ही स्वतः घराच्या पेंटिंग चं काम काढलं तर त्यात ४९ % आरक्षण द्याल का ? कि त्या कामगारांचे कामाचे कौशल्य पाहाल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

का म्हणजे..........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/11/2012 - 17:19 नवीन
>>>> का ? का म्हणजे ? मला वाटतं खासगी क्षेत्रातही आरक्षण असलं पाहिजे. शासकीय-निमशासकीय स्तरावर जसे आरक्षण आहे आणि असलेला अनुशेष भरुन काढला पाहिजे त्यासाठी जसे प्रयत्न चाललेले असतात तसे खासगी क्षेत्रातही (मोठ मोठ्या खासगी कंपन्या-बिंपन्या ) आरक्षण असले पाहिजे. तिथेही असलेला अनुशेष भरुन काढला पाहिजे, असं माझं मत आहे. आपलं मत आरक्षण असुच नये असे असेल आणि असलेच तर ते खासगी क्षेत्रात आणु नये असे असेल तर आपल्या मताचा आदर आहेच. इतका लोड कशाला घ्यायचा. >>>>>उद्या तुम्ही स्वतः घराच्या पेंटिंग चं काम काढलं तर त्यात ४९ % आरक्षण द्याल का ? कि त्या कामगारांचे कामाचे कौशल्य पाहाल ? किमान कौशल्य असणार्‍यास ( हे कौशल्य कमालच असते) माझ्या घराच्या पेंटींगचे काम देईन. समाजातील दुर्बल घटकांना विकासाची संधी द्यायला मला आवडेल. इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळण्याचे आरक्षण एक साधन आहे, आरक्षण काही कोणावर उपकार नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

खाजगी क्षेत्र हे मुळात

sagarpdy
Tue, 09/11/2012 - 17:55 नवीन
खाजगी क्षेत्र हे मुळात समाजकल्याणापेक्षा आर्थिक नफा या मुद्द्यावर चालतं. नफा कमावल्यावर त्यातील हिस्सा समाजासाठी खर्च करणे (पक्षी : बिल गेटस, टाटा ई.) हि पूर्णतया वेगळी गोष्ट.
किमान कौशल्य असणार्‍यास ( हे कौशल्य कमालच असते) माझ्या घराच्या पेंटींगचे काम देईन.
येथे तूम्हीच म्हणता कि तुमच्या स्वतःच्या कामासाठी कौशल्य हा निकष आहे. समजा दोन समान कौशल्य असणारे कामगार तुमच्या समोर आले, तर तुम्ही उच्चवर्णीय कामगारास नाकाराल. पण समजा त्या उच्चवर्णीय कामगाराची कौशल्ये अधिक चांगली असल्यास ? माझा मुद्दा एव्हढाच कि काम मिळवण्यास लागणारी कौशल्ये मिळवण्यासाठी तुम्ही आधीच आरक्षणाद्वारे शिक्षण संधी आणि आवश्यक फी माफी दिल्यानंतर नोकरीच्या जागीदेखील आरक्षण देणे योग्य आहे का ? त टी : शाळा-महाविद्यालये जेव्हा फी माफी पुरवतात तेव्हा हि आर्थिक मदत माझ्या माहितीप्रमाणे सरकार त्या संस्थेस पुरवते. समजा माझ्या कंपनीस आरक्षणामुळे तोटा आला तर तो सरकार भरून देईल का ? त टी २ : हे विवेचन केवळ आर्थिक मुद्द्यावर आधारित आहे. समजा एक अमेरिकन कंपनी भारतात एक शाखा काढू ईच्छिते. त्यांच्या दृष्टीने विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किमान कौशल्य असणार्‍यास ( हे

मृत्युन्जय
Tue, 09/11/2012 - 18:31 नवीन
किमान कौशल्य असणार्‍यास ( हे कौशल्य कमालच असते) माझ्या घराच्या पेंटींगचे काम देईन. समाजातील दुर्बल घटकांना विकासाची संधी द्यायला मला आवडेल. इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळण्याचे आरक्षण एक साधन आहे, प्रचंड सहमत. माझ्या गल्लीतली काही निम्न्जातीय मुले उत्तम क्रिकेट खेळतात. मागच्याच वर्षी त्यांच्यापैकी एकाने एकाच सामन्यात २ चौकारांसकट तब्बल १३ धावा देखील केल्या. किमान कौशल्यामध्ये हे येत असल्याने सचिन तेंडुलकर (कायस्थ प्रभू ना? म्हणाजे उच्चवर्णीयच) ला हाकलुन देउन त्याच्या जागी त्या मुलांना भारतीय संघात घ्यावे असा प्रस्ताव मी मांडतो आहे. त्याला अनुमोदन द्यावे अशी विनंती करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मृत्या !! ह ल क ट !!

सुहास..
Tue, 09/11/2012 - 20:38 नवीन
मृत्या !! ह ल क ट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

खासगी क्षेत्रात आरक्षण

बॅटमॅन
Tue, 09/11/2012 - 12:46 नवीन
खासगी क्षेत्रात आरक्षण पटण्याजोगे नाही. काही क्षेत्रे तरी फक्त गुणाधिष्ठित ठेवलीच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शंका...

मन१
Tue, 09/11/2012 - 20:26 नवीन
सध्या भारतीय लष्करात आरक्षण नाही असे कर्नल मोडक हयंच्या भाषणातून्,लेखनतून ऐकले आहे. लष्करास उत्पन्नाचा , सक्षमतेचा मार्ग मानावे का? (खाजगी क्षेत्राप्रमाणे)त्यातही आरक्षण असावे का? "हो " असे उत्तर असेल तर काहीच हरकत नाही. "नाही" असे उत्तर असेल तर का "नाही "? . तीन चार तास झाले बुवा प्रश्न विचारुन. उत्तर न येण्याइतका अवघड प्रश्न आहे की, दुर्लक्षिला जावा इतका क्षुल्लक्/निरर्थक वगैरे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अन्याय अन्याय म्हणत शिमगा

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 09/11/2012 - 21:15 नवीन
अन्याय अन्याय म्हणत शिमगा करणे सोपे असते. तार्किक वाद घालणे कठीण असते बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

फुकट बॅन्डबिथ म्हणत शिमगा

सुहास..
Tue, 09/11/2012 - 21:23 नवीन
फुकट बॅन्डबिथ म्हणत शिमगा करणे सोपे असते. वास्तवात काम करणे कठीण असते बाबा. =========================== तुम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं और दोंनो के दोंनो भी गड्डे मैं जायेंगे ===========================
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

काही कळले नाही भाऊ...

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 09/12/2012 - 13:30 नवीन
काही कळले नाही भाऊ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

लेख आवडला..

गुरुनाथ्काळे
Sun, 09/09/2012 - 23:30 नवीन
छान आहे तुमचा लेख.. फेस बुक वर पोस्ट करतो हि लिन्क.. नक्किच शेअरेबल आहे..
  • Log in or register to post comments

मि.पा.वर आरक्षण लागू.......

नाखु
Mon, 09/10/2012 - 09:59 नवीन
करावे काय? ह्या धाग्यांपासून आ (आमचे) रक्षण .
  • Log in or register to post comments

अत्यंत टुकार आणि नाटकी लेख

वेताळ
Mon, 09/10/2012 - 10:18 नवीन
मुळात आरक्षण गरजवंताला हवे माजोर्‍या लोकाना न्हवे,आजकाल आरक्षण किंवा त्याला विरोध करणार्‍याना वापरलेली भाषा बघितली तर मी काय म्हणतो ते लक्षात येईल.इंदु मील बाबत राज ठाकरेनी कोणतेही आक्षेप घेतले नसताना त्याच्या बद्दल वापरण्यात आलेली भाषा पहा.आता त्याना आरक्षण म्हणजे घटनेने दिलेला मुलभुत हक्क वाटु लागला आहे.
  • Log in or register to post comments

+ १

llपुण्याचे पेशवेll
Mon, 09/10/2012 - 11:33 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

१००% सहमत

नेत्रेश
Mon, 09/10/2012 - 10:42 नवीन
संपुर्ण सहमत. अगदी मनातील विचारच वाचत असल्यासारखे वाटत होते. ईतके सुस्पष्ट आणी मुद्धेसुद लिहिलेले समजायला बर्‍याच उच्चशिक्षित सदस्यांना होणारा त्रास पाहुन खंत वाटली. ---------------------------------------------- डिस्क्लेमरः मी कोणत्याही सरकारी आरक्षणास पात्र नाही.
  • Log in or register to post comments

सरकारी कागदपत्रातील जातीची नोंद...

नेत्रेश
Mon, 09/10/2012 - 10:58 नवीन
जाती व्यवस्था फार पुर्वीपासुन चालत आली आहे. ती काही सरकारने तयार केली नाही. तेव्हा सरकारी कागदपत्रातुन जात काढुन टाकल्याने जाती नष्ट होतील असे मानणे म्हणजे भाबडेपणा आहे. काही लोक म्हणतात त्यांना नोकरीचा ठीकाणी / सामाजीक जीवनात जात विचारण्यात आली नाही. त्यांना एवढेच सांगणे आहे की अजुनही बर्‍याच शंकराच्या / देविच्या देवळात गाभार्‍यात फक्त काही उच्च जातीच्या लोकांनाच प्रबेश असतो. अशा ठीकाणी जात न सांगता प्रवेश करण्याचा प्रयत्न करावा. स्वतःचे / मुलांचे लग्न ठरवताना कुणी जात विचारली नाही व स्वतः ही पाहीली नाही असे सांगु शकातील का? जो पर्यंत प्रत्येक देवळात गाभार्‍यात हाताना, तसेच लग्न जमवताना जात पाहीली जाते तोपर्यंत तरी जातीव्यवस्था नष्ट होणार नाही.
  • Log in or register to post comments

@काही लोक म्हणतात त्यांना

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/10/2012 - 11:15 नवीन
@काही लोक म्हणतात त्यांना नोकरीचा ठीकाणी / सामाजीक जीवनात जात विचारण्यात आली नाही. त्यांना एवढेच सांगणे आहे की अजुनही बर्‍याच शंकराच्या / देविच्या देवळात गाभार्‍यात फक्त काही उच्च जातीच्या लोकांनाच प्रबेश असतो. अशा ठीकाणी जात न सांगता प्रवेश करण्याचा प्रयत्न करावा. स्वतःचे / मुलांचे लग्न ठरवताना कुणी जात विचारली नाही व स्वतः ही पाहीली नाही असे सांगु शकातील का?>>> ++++++++११११११११ अता याचा प्रतिवाद मुद्दे मांडलेल्यांना करता येतो का?, ते पाहू...! कारण उपरोक्त दोन्ही घटना मी आजही नेहमी अनुभवतो./पहातो. जात संपलीये,,,कुठे र्‍हयलीये जात? कशाला आरक्षण आणि आकाशपाताळ एक करताय,असं म्हणणार्‍यांच्या अकलेची कीव करावी तेवढी कमीच... आमच्या वेदपाठशाळांमधे सगळ्या हिंदू समाजातली मुलं/मुली (ज्यांना शिकायची इच्छा असेल..) त्यांना घ्या...असं मी गेली काहि वर्ष जमेल तिथे नीटपणे बोलतोय,,,तेंव्हा सुद्धा सनातनी कोल्ह्यांना हे ऐकायचाही त्रास होतो, काहि जणांचे चेहेरे ,आपल्याला अता एखादं महापाप करावं लागणार आहे ... असं वाटून बारिक होतात. मी एकदोन ब्राम्हणेतरांना शिकवलय,असं म्हटलं तर अत्यंत बैचेन होतात... याला काय म्हणावं???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

वेदपठण !!

अर्धवटराव
Tue, 09/11/2012 - 01:38 नवीन
आता तुम्ही स्वतःच वेदविद्या शिकवता म्हटल्यावर आपल्याला काहि बोलता यायचं नाहि... पण वेदविद्या शिकण्याचे नियम हे केवळ जात्याधारीत नसुन त्यामागे इतरही बरेच कन्स्ट्रेण्ट्स असतात असं ऐकुन आहे. मध्यंतरी तिरुपती बालाजीच्या काहि उपासना/पठण वगैरे कार्यक्रम तेथील पुजार्‍यांनी (कि कुठल्याश्या ब्राह्मण मंडळाने) ब्राह्मणेतरांसाठी खुल्या केल्या... पण तसे करताना त्यातले काहि भाग वगळले. पठणकर्त्याला त्रास होऊ नये म्हणुन. आजही अनेक ब्राह्मण मंडळी गुरुचरित्र पारायण मुद्दाम टाळतात... कारण तेच, कि जरी जन्म ब्राह्मणांच्या घरात झाला असेल तरी गुरुचरित्र वाचायला आपण पात्र आहोत हा हि शंका. (आता मुळात या गोष्टी शिकाव्याच का हा मुद्दा वेगळा... किंबहुना कुठलिही गोष्ट शिकण्याच्या वगैरे भानगडीत पडुन वेळ का व्यर्थ दडवावा हि आमची प्रामाणीक शंका :) ) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

जो मुद्दा धार्मिक

बाळ सप्रे
Mon, 09/10/2012 - 11:43 नवीन
जो मुद्दा धार्मिक आरक्षणाच्याविरोधासाठी वापरलात त्याच मुद्द्याचा जातीय आरक्षणाच्यादृष्टीने विचार करा. जसं हिंदू/मुसलमान ठरवणे कठिण.. तसेच कुणबी/ मराठा/ महार कसे ठरवणार?? मूळ आहे जन्मावरून जात धर्म ठरवण्यात. आरक्षण आपोआप कधीच संपणार नाही.. जिथपर्यंत जन्माने जात ठरवणं संपणार नाही. काळाप्रमाणे माणसाच्या उद्योगधंद्यात बरेच बदल झाले.. खरंतर आजच्या काळाला अनुसरून "सॉफ्ट्वेअर इंजिनिअर", "सरकारी कर्मचारी" , "ड्रायव्हर" या जाती आहेत प्रॅक्टकली पहाता.. पण मनातून जाती पाती बदलल्या नाहीत.. मराठा म्हणजे समजा क्षत्रिय.. तर या काळात फक्त सैन्यातील जवनांना क्षत्रिय म्हणायला हवे.. पण सैन्यात असला तरी माणूस ओळखला जातो दलित किंवा ब्राह्मण. त्याच्या जन्माच्या जातीवरून.. त्यामुळे आरक्षण तेव्हा संपेल जेव्हा कुठल्याही सरकारी महितीतून जात हा कॉलम काढून टाकला जाईल. धर्म हादेखिल कॉलम काढून टाका .. धार्मिक आरक्षणाची देखिल गरज रहाणार नाही. पण हे २ कॉलम सरकारी माहितीतून तेव्हाच काढून टाकता येतिल जेव्हा ते लोकांच्या मनातून काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. सद्ध्या एकाही पक्षाचे राजकीय समीकरण या कॉलमशिवाय नाही हेच दुर्दैव!!
  • Log in or register to post comments

आरक्षणापेक्षा समान संधीच

शिल्पा ब
Mon, 09/10/2012 - 12:03 नवीन
आरक्षणापेक्षा समान संधीच जास्त उपयुक्त आहे. आरक्षणाने नुसताच धुराळा उठणार अन राजकारण होणार दुसरं काही नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा