मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मृत्यु

नाना चेंगट · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मृत्यु. जीवनातील एक सत्य. कधी हलक्या पावलांनी दबकत दबकत येत हलकेच झडप घालणार तर सुसाट वेगाने येऊन पाचोळ्यासारखा उडवुन लावणार. कधी तो यावासा वाटते तर कधी त्याने येऊ नये असे वाटते. पण तो येणार नक्की येणार हे प्रत्येकाला ठाऊक असते. प्रश्न असतो तो फक्त कधी येणार आणि कसा येणार? मृत्यु म्हटले की अनेक कल्पना मनात दाटुन येतात. जीवनाचा शेवट. जगाचा अंत. पण नक्की तो असत्तो का? आपण मेल्यावर जग चालूच रहाणार असते. अगदी मानव वंश निर्वंश होऊन गेला, मानव प्राण्याचा अंत झाला तरी जीवन चालूच राहील. कदाचित रुप बदलेल. पण आपल्या दृष्टीने जीवन संपले असेल. आपल्याला जाणीव सुद्धा होणार नाही. सर्व सुखाच्या, दु:खाच्या संवेदना संपून गेल्या असतील. मी मी म्हणत आज आपण मी माझे असे स्वतःला बजावत असतो पण हा मी च नंतर शिल्लक रहात नाही. सर्व जाणीवा संपून जातात. मग नंतर जग चालू राहिले काय किंवा न राहिले काय? पण मग अशी जाणीव नाहीसे होणे झोपेत सुद्धा होते. गाढ झोप ही सुद्धा सर्व जाणीवांना स्वतःमधे विलीन करुन टाकते. कशाची सुद्धा शुद्ध रहात नाही. झोप ही एक प्रकारे मृत्युचेच रुप म्हणावे का? फक्त आपण झोपेतुन परत जागे होतो. जाणीव परत येते. मी माझे ही जाणीव परत डोके वर काढते आणि जी सुख दु:ख विहिन आनंदमयी अवस्था होती ती संपून जाते. मग मृत्यु ही झोपेची एक अवस्था म्हणावी का? आनंददायी अवस्था असावी का? सांगता येत नाही. की झोपेच्या पलीकडची अवस्था? जिचे भ्रष्ट रुप झोप आहे? मग झोप हवीसी वाटणारा जीव मृत्युच्या जाणीवेने का घाबरतो? कधी कधी फावल्या वेळात मी स्वतःच्या मृत्युनंतर जग कसे असेल याचा विचार करतो. पण स्वतःच्या जाणीवांना वगळून विचार करणे का अवघड जाते हे समजत नाही. स्व ला वगळता जगाची कल्पना करणे अवघड जाते. स्व भोवतीच सर्व जग फिरते. नातलग, मित्र, शत्रु सर्व सर्व स्व भोवतीच गिरक्या मारते. स्व ला बाजुला काढता येतच नाही. काढले तरी तटस्थपणे विचार करताच येत नाही. लप्पकन काळीज हलते आणि घशाला कोरड पडते. पाणी पिण्यासाठी हात हलतो आणि पुन्हा वास्तवाच्या जाणीवेने स्व अस्तित्व आकारात येते. बरे वाटते. मृत्युची कल्पना करणे फार अवघड आहे. त्यापासुन वाचणे फार अवघड आहे. तरी मन पुन्हा पुन्हा मृत्युचाच विचार करते. तो यावासा वाटतो की त्याने यावे असे वाटत नाही.. नक्की सांगताच येत नाही मला काय वाटते ते...

वाचने 21039 वाचनखूण प्रतिक्रिया 100

In reply to by संजय क्षीरसागर

कवितानागेश गुरुवार, 06/07/2012 - 08:47
एकदा आपण 'विदेह' आहोत हा 'बोध' झाल्या नंतर 'शरीराला अपाय होईल' ही चिंता कशाला? आणि क्लेश असोत वा आनंद, कुठलीही गोष्ट 'निष्कारण' कशी? नीती-अनीती हे 'निकष' कशावरुन, आणि 'बाह्य' कसे काय? नीती-अनिती 'बाहेर' असेल तर 'आत' मध्ये फक्त निर्लज्जपणा/ कोरडेपणा असतो का?

In reply to by कवितानागेश

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/07/2012 - 09:39
मला गवसलेलं अध्यात्म लौकिकाच्या (किंवा संसाराच्या) विरोधात नाही. जोपर्यंत आपण देहात आहोत तोपर्यंत निराकार आणि आकार दोन्ही सार्थ आहेत. >एकदा आपण 'विदेह' आहोत हा 'बोध' झाल्या नंतर 'शरीराला अपाय होईल' ही चिंता कशाला? = सत्य गवसलेल्याचा देह आणि तो बोध नसलेल्याचा देह यात फरक नसतो. फ्रॅक्चर झालं तर `मी मूळात विदेह आहे' हा बोध वेदना संपवत नाही, तो फक्त ` वेदना देहाला आहे आणि मला समजतय' इतपत अंतर निर्माण करतो. वेदनेच निराकरण वैद्यकीय इलाजानंच करावं लागतं अशा परिस्थितीत निष्कारण वेदना कोण ओढवून घेईल? >आणि क्लेश असोत वा आनंद, कुठलीही गोष्ट 'निष्कारण' कशी? = क्लेशाचं उत्तर वरच्या सारखंच आहे, निष्कारण वाद घालण्यापेक्षा समन्वय विधायक नाही का? >नीती-अनीती हे 'निकष' कशावरुन, आणि 'बाह्य' कसे काय? = नीती-अनीती हे 'निकष' मॉरल पोलिसिंग वरुन आलेत म्हणजे `हत्या अनैतिक' म्हटलं की पोलिसांचं काम कमी होतं आणि 'बाह्य' अशासाठी की `हत्येची व्याख्या' संदिग्ध आहे, युद्ध ही सर्वात निघृण आणि जाणूनबुजून केलेली हत्या आहे आणि तरीही आपल्याला ती मंजूर आहे. >नीती-अनिती 'बाहेर' असेल तर 'आत' मध्ये फक्त निर्लज्जपणा/ कोरडेपणा असतो का? = नाही, कमालीची संवेदनक्षमता असते आणि सर्व निर्णय अनाहूतपणे सार्‍या संबधीतांच हित ध्यानात ठेवून घेतले जातात.

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा ब गुरुवार, 06/07/2012 - 12:02
थोडक्यात गडबडगुंडा करुन लिहिलं / बोललं की लोकं आपल्याला "लय हुशार मानुस" समजतात (असा. सगळ्यांचा गैरसमज का आ हे हेच्च कळत नाही..)

Nile Wed, 06/06/2012 - 01:54
आम्हाला वाटलं मागच्यावेळेप्रमाणे नाना पुन्हा जालीय आत्महत्येचा विचार करताहेत म्हणून. ;-)

चित्रगुप्त Wed, 06/06/2012 - 16:38
....मरण दाराशी आल्यावर म्हणलं, तुला शंभर वर्षे आयुष्य आहे.. माझे एक अतिशय प्रिय, आनंदी वृत्तीचे, अभ्यासू नातेवाइक, सुमारे ऐंशी वर्षांचे आयुष्य अतिशय समरसून, रसिकतेने जगलेले, अनेक देशी -विदेशी भाषांचे तज्ञ, अनेकांना त्यांच्या आयुष्यात मोलाची मदत करणारे ...शेवटी वृद्धाश्रमात वर्षानुवर्षे मृत्यूची एकेक दिवस वाट बघत जगत असताना बघून काय वाटले, ते शब्दात मांडणे अशक्य आहे. दररोज किमान दोन तास पायी चालण्याचा छंद ज्यांनी ऐंशीव्या वर्षापर्यन्त जोपासला, त्यांना शेवटी पलंगावरून उठून उभे रहाणे अशक्य होते. शरीरधर्माचे भान नाहिसे झाले होते. माणसे ओळखत पण बोलता येत नव्हते... भिती वा काळजी वाटते, ती मृत्युची नव्हे, तर असले काही होण्याची.

In reply to by चित्रगुप्त

आहो! आपण विदेह आहोत आणि मी तुम्हाला उगीच दिलासा देत नाही की एकाही संताचं वचन उधृत करत नाहीये. स्वत: वेरिफाय करुन आहे ती वस्तुस्थिती सांगतोय. माझा त्यात काही स्वार्थ नाही, हे शेअरिंग आहे. तुम्ही इतरांचे दारुण दाखले दिल्यानं (ते वास्तविक असले तरी) तुमची (आणि इतरांची देखील) मानसिकता विषण्ण होईल आणि मूळ मुद्दा हुकेल. जे गेले ते कसे गेले हा प्रश्न नाही तुम्ही मृत्यूकडे कसं पहावं ते सांगायचा प्रयत्न करतोय

सदानंद ठाकूर Wed, 06/06/2012 - 19:10
ज्यावेळी या भूतलावर पहिला जीव जन्माला आला तेव्हाच मृत्युचाही उगम झाला. मृत्युच नसता तर आज जगात १००० चा एफएसआय सुध्दा पुरला नसता आणि म्हणुनच जन्माबरोबरच मृत्युची सांगता असावी. अर्थात या विषयावर विचार करावयास लागले कि मती कुंठीत होऊन जाते हेही सत्यच आहे. विषयाला फक्त फाटेच फुटत जातात. पुर्वी मृत्यु स्वस्त होता तेव्हा अनेकाना क्रिकेट टिम एवढी मुले होऊनही भारताची लोकसंख्या ३३ कोटीपेक्षा जास्त झाली नव्हती (संदर्भ १९२० ची जनगणना) कारण युध्दे, पटकी, देवी सारख्या साथी, प्रगत वैद्यकीय उपचारांचा अभाव इ. आज मृत्यु महागच झाला आहे, भारताचे सरासरी आयुर्मान ७५ पेक्षा जास्त झाले आहे. हल्लीच वाचनात आले की लवकरच माणुस १५० वर्षांपेक्षा जास्त जगू शकेल असे वैद्यकशास्त्र मानू लागले आहे. खरच असे झाले तर ३००० साली भारताची लोकसंख्या दहा हजार कोटीची सीमाही ओलांडून जाईल. (सद्या साधारणपणे दर ६० वर्षानी लोकसंख्या दुप्पट होत आहे - हा वेगही वाढेलच). एवढ्या लोकांना अन्न पाणी सोडा हवा तरी पुरेल काय? जाने दो यार. शेवटी आप मरे सारे जग मरे. आहे ते जीवन मौज मस्तीत जगुया. संध्याकाळ झालीच आहे, त्यात आज बुधवार म्हणजे हक्काचा वार. चलो ऐश करते है.

शिल्पा ब Fri, 06/08/2012 - 21:25
हल्लीच ड्रॉप डेड डीव्हा नावाची मालिका बघाला घेतलीये. त्यात मुख्य पात्र मरतं अन स्वर्गात एस्कलेटरने जातं (म्हणजे आत्मा जातो) अन तिथे तिला कस्टमर केअर मधे तिचा पाप पुण्य हिशेब द्यायच्या ठीकाणी (जो कम्प्युटरवर असतो) जो माणुस (पुढे तिचा गार्डीयन एंजल) असतो त्याच्याशी थोडा वाद होउन ति त्याच्या परवानगीशिवाय रीटर्न बटन दाबुन परत पृथ्वीवर येते अन दुसर्‍याच एका मेलेल्या बॉडीत शिरते. एक मात्र खरं - वेळेप्रमाणे स्वर्ग - नरकही बदलत असणार. नाहीतर कायम अश्मयुगीत स्वर्ग वगैरे असल्यावर कीती कन्फ्युजन होईल नै का?