"आली माहेरपणाला ('http://www.misalpav.com/node/18384) या इंदिरा संत यांच्या कवितेत आपण एका माहेरवाशीणीची व्यथा पाहिली होती.पण ही अशी एखादीच व्यथा असू शकते असे नाही. या माहेरच्या भेटीत अनेक पैलू पहाता येतात.स्वत:च्या पहिल्या मंगळागौरीकरिता वा बाळंतपणा करिता येणारी,घरातील दुसर्या एखाद्या मंगलकार्याकरिता येणारी, ... अशा आनंददायक घटनांबरोबरच घरातील एखादी वृद्ध व्यक्ती गमावणे अशा दुख:द प्रसंगाकरिताही ती माहेरी येणे अपरिहार्य असते. अनेक कवितांचे बीज ह्या भेटीत कवीला खुणावत असते. विंदा करंदीकरांनी अशीच एक हळुवार कहाणी पुढील कवितेत गायिली आहे.
थोडी सुखी, थोडी कष्ठी ....
फार दिवसांनी आली
मागारीण माहेराला ;
स्टेशनात भेटला नि
ओळखीचा टांगेवाला
ओळखीचा वाटला तो
कोण कोठचा, ही भ्रांत !
हसला तो ओळखीने
आणि चढली ती आत.
नाही वळविली त्याने
पुन्हा दृष्टि तिच्याकडे;
भरदार सुटे घोडा,
आणि चाबूक कडाडे.
ऒळखीचे आले वाडे ;
आली, आली, गेली शाळा
"अगबाई ! तोच हा का ?"
तिला चंदू आठवला !
आठवले सारे सारे,
आठवले त्याचे डोळे
आणि तिच्या काळजात
काही थरारून गेले.
फारा दिवसांनी आली
मागारीण माहेरला ;
गल्लीतल्या घरापुढे
त्याने टांगा थांबविला.
नाही वळवली त्याने
पुन्हा तिच्याकडे दृष्टि :
माहेराला भेटली ती
थोडी सुखी, थोडी कष्टी.
विंदा करंदीकर
इथे कहाणी हे मुद्दाम म्हटले आहे. विंदांनी ज्या अनेक नवीन वाटा कवितेत चोखाळल्या त्यातील एक म्हणजे कथानकप्रधान काव्य. सोपे नव्हे. एक गोष्ट घ्या, वाक्यांचे तुकडे पाडून एकाखाली एक लिहा... झाली कविता. नवशिके कवी बर्याच वेळी अशीच सुरवात करतात. यात अनेक धोके उद्भवतात. त्याची चर्चा आज करत नाही. वरील कविता ५०-६० वर्षांपूर्वीची. गावांत टांगेच होते, रिक्षा नव्हेत. बरेच दिवसांनी माहेराला आलेली मागारीण (माघारीण-नववधू) स्टेशनवरून बाहेर स्टॅंडवर आली व तिला ओळखीचा वाटणारा टांगेवाला भेटला. तो तिच्याकडे पाहून ओळखीने हसला. ती टांग्यात चढली पण तिने त्याला ओळखले नाही. ओळखीचा तर वाटतो...पण नक्की कोण ? हा तिचा संभ्रम त्याला जाणवला, त्याची निराशा, त्याचे दु:ख, त्याला स्वत:चा झाला वाटणारा अपमान... त्याने मग मागे वळूनही पाहिले नाही. भ्ररदाव सुटलेल्या घोड्यावर कडाडणारा चाबूक... खरे म्हणजे तो स्वतावरचाच राग होता. ओळखीचे वाडे भेटले, शाळा आली व गेलीही. आणि शाळा दिसल्यावर तिच्या मनात लक्ख प्रकाश पडला.. हा चंदू तर नव्हे ? त्या अल्लड वयातील आकर्षण, त्याला प्रेम म्हणणे तेव्हडे बरोबर नव्हे, त्याचे डोळे आठवले व तिच्या काळजात एक लहर थरारून गेली. पत्ता सांगावयाची गरज नव्हतीच. त्याने गल्लीत घरासमोर टांगा उभा केला. त्याने तिच्याकडे दृष्टीही फिरवली नाही. तीही मुकाटपणाने घरात शिरली. थोडी सुखी, थोशी कष्टी !
या कवितेतला संयम व नेमकेपणा वाखाणण्याजोगा आहे. वाव असूनही भडकपणा कटाक्षतेने टाळला आहे.
पन्नास-साठ बर्षांपूर्वीची एका प्रतिष्ठित घराण्यातील नववधू मुलगी व एक सामान्य परिस्थितीतील टांगेवाला यांची ही कहाणी. शेवट अटळ होता. त्याने मागे दृष्टीही न टाकणे हा मध्यबिंदु. त्याच्या मनावरील ताण दाखवावयाला भरदाव घोडा व कडाडणारा चाबूक तर तिच्या बाजूने माहेरी येऊनही थोडे कष्टी मन बस. कवी एवढेच सांगतो. कवितेचा घाट व तिची लय आकर्षक आहे. दोन गोष्टींकडे लक्ष द्या." आली, आली, गेली शाळा"
भरधाव धावणार्या टांग्यामुळे शाळा क्षणभरच दिसली पण विस्मृतीत गेलेल्या चंदूला समोर आणावयास तेव्हढे पुरे होते. तसेच "आठवले त्याचे डोळे". डोळे "बदामी". "शराबी" म्हणून नव्हेत. शाळेत दोघांचे बोलणेचालणे झाले असणे अवघडच. तेव्हा त्याच्या भावना तिने त्याच्या डोळ्यातच वाचल्या असणार. खोल मनात त्या डोळ्यांचीच प्रतिमा रुजलेली !
शरद
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5975
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
... विंदा केवळ अप्रतिम खुप
मस्तय सर.
सुखद आणि दुखद ..छान मेळसुखद
मस्त..........
रसग्रहणातील प्रत्येक
छान
थोडक्या शब्दात महाभारत
सुंदर रसग्रहण!
मस्त
सुंदर!
मस्त
विंदा ना सलाम भरधाव