Skip to main content

शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार

लेखक चिन्या१९८५ यांनी बुधवार, 06/08/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दिसुन येते. त्यापैकी काही उद्गारांचे भाषांतर करत आहे. Thevenot म्हणतो- शिवाजी राजांचे डोळे तीक्ष्ण होते,आणि त्यातुन असामान्य बुध्दिमत्ता दिसुन येत असे.राजे दिवसातुन एकदाच जेवण करतात आणि ते निरोगी आहेत. Cosmo Da Guarda म्हणतो- शिवाजी राजांच्या कृतीत धडाडी होतीच पण त्याचबरोबर त्यांच्या आचरणात्,चालीत एक जिवंतपणा व उत्साह होता.त्यांचा चेहरा स्वच्छ आणि गोरा होता,निसर्गाने त्यांना सर्वोत्तम गुण दिले होते मुख्य म्हणजे त्यांचे काळे डोळे ज्यातुन जणुकाही अग्निज्वाळा येत असत्,आणि याला जोड होती तीव्र्,तीक्ष्ण बुध्दिमत्तेची. Orme म्हणतो- शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण होते.सैन्याचा प्रमुख म्हणुन त्यांनी जितके जमिनीवर जितके अंतर पार केले तितके दुसर्‍या कुठल्याही सेनापतीने केले नसेल.आणीबाणीचा प्रसंग कितीही आकस्मिक अथवा मोठा असला तरीही शिवाजी राजांनी त्याचा विवेकाने व धैर्याने त्वरीत यशस्वीपणे सामना केला. General Sullivan म्हणतो- ज्या संत्रस्त काळात शिवाजी महाराज रहात होते त्या काळात सफल होण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक गुण त्यांच्यामधे होता.ते सतर्क होते आणि त्यांची कृती प्रखर व धाडसी असे.त्यांच्यातील सहनशीलता,उर्जा आणि निर्णयक्षमतेमुळे कुठल्याही काळात त्यांच्याकडुन गौरवास्पद कार्य झाले असते.तो एक हिंदु राजा होता ज्याने आपल्या देशी घोड्यांच्या सहाय्याने प्रचंड मुघल घोडदळाला पाणी पाजले.त्यांचे मावळे गनिमी काव्यामुळे त्याकाळातले जगातील सर्वात चांगले पायदळ होते J. Scott म्हणतो- शिवाजी राजे एक योध्दा म्हणुन असामान्य होते,राज्यकर्ता म्हणुन निपुण होते तर सद्गुणी लोकांचे मित्र होते.त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली तर दृढतेने ती अमलात आणली.कोणीही कधीही त्यांच्या ध्येयाबद्दल अवगत नसे तर प्रत्येक जण त्या ध्येयाच्या पुर्तीबद्दल अवगत असे. Douglas म्हणतो- कुठल्याही आणीबाणीच्या समयाच्या वेळी सजग राहुन शिवरायांनी त्याला तोंड दिले.या कलेमध्ये त्यांच्या करंगळीत जेव्हढ होत तेव्हढ औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हता.जणुकाही शिवाजी राजे एक डोळा उघडा ठेवुनच झोपत.त्यांनी आपल्या जादुई स्पर्षाने आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने त्यांच्या गरीब्,आज्ञाधारक,दैववादी महाराष्ट्रातील जनतेला अलौकीक कृत्ये करण्यास प्रेरीत केले.ही जनता सर्वोत्तम सैनिक्,पक्के सरदार्,कुशल राजनिती विशारद बनली जिने शेकडो युध्दे जिंकलेल्या मुघलांचा सामना केला. Abbe Carre म्हणतो- शिवाजी राजे पुर्वेने पाहिलेल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक आहेत.त्यांच्या धाडसीपणामुळे ,त्यांच्या युध्दातील चपळाईमुळे व इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्विडनच्या महान राजा ऍडॉल्फसशी होउ शकते.त्यांच्या जलद गतीने आणि दयाशीलतेने ज्युलियस सीझरप्रमाणे त्यांनी त्यांच्या शत्रूंचीही मने जिंकली ,जे शत्रु त्यांच्या शस्त्रांमुळे दहशतीत होते. Dr. John F. G. Careri ( 1695 A. D. ) म्हणतात- हे शिवाजी राजे इतके बलाढ्य आहेत की ते एकाच वेळी प्रचंड मुघलांबरोबरही लढतात आणि पोर्तुगिजांबरोबरही लढतात. ते रणांगणावर ५०००० घोडे आणतात आणि त्याहुनही जास्त पायदळ आणतात.त्यांचे सैनिक मुघलांपेक्षा कितीतरी चांगले आहेत. हे सैनिक अतिशय थोड्या अन्नावर दिवस काढतात तर मुघल बायका,विविध साधनसामग्री,तंबु घेउन जातात जणुकाही ते एक चालत फिरत शहरच असत. Daughlas म्हणतो- शिवाजी महाराज खडकांमधे रहात.त्यांची शक्ती म्हणजे डोंगर दर्‍या होत्या.हा किल्ल्यांमधला माणुस होता ज्याचा जन्मही किल्ल्यामधे झाला होता.किल्ल्यांनी त्याला बनवल आणि त्यानी किल्ल्यांना बनवल.हे किल्ले म्हणजे भारताची दहशत होती,शिवरायांच्या राज्याचे उगमस्थल होते,त्यांच्या युध्दांचा आधार होते,त्यांच्या ध्येयांच्या पायर्‍या होते,त्यांचे घर आणि आनंद होते.त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि सर्व किल्ले त्यांनी बळकट केले.ही फारच कृपेची गोष्ट होती की शिवाजी राजे दर्यावर्दी नव्हते.नाहीतर जमिनीप्रमाणे समुद्रावरही त्यांनी वर्चस्व गाजवले असते जे वर्चस्व त्यांनी जवळजवळ प्रस्थापित केले होते.त्यांना समुद्र आवडत असे पण समुद्राला ते आवडत नसत.त्यांचे खार्‍या पाण्यावर इतके प्रेम होते की असे म्हणतात की त्यांनी सिंधुदुर्ग बांधताना स्वतःच्या हातानी हातभार लावला होता.त्यांच्या पावलांचे ठसे अजुनही तिथे दाखवता येतात्,काळाच्या वाळुत नाही तर ठोस खडकात. Da Guarda म्हणतो- शत्रुमध्ये असा दृढ विश्वास निर्माण झाला होता की शिवाजीराजे सगळीकडे आहेत.ते एकाच वेळी अनेक ठिकाणि चढाई करत असत आणि सर्वच ठिकाणी सैन्याचे नेत्रुत्व तेच करत असत.ह्या प्रश्नाला अजुनही उत्तर मिळालेले नाही की शिवाजी राजे स्वतःच्या नावानी दुसर्‍या कुणालातरी पाठवत असत का त्यांना जादु टोना येत असे का स्वतः सैतान त्यांच्या जागी कार्यरत होता. Sir E. Sullivan म्हणतात- शिवाजी राजे हिंदु इतिहासातील सर्वोत्कृष्ठ राजकुमार आहेत.त्यांनी आपल्या ज्ञातीचा पुरातन गौरव वापस आणला जो अनेक शतकांच्या पराधिनतेमुळे नष्ट झाला होता.आणि मुघल साम्राज्याच्या परमोच्च बिंदुला त्यांनी आपले साम्राज्य बनवले,वाढवले जे की हिंदुस्तानातील मुळ लोकांनी काढलेले आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ साम्राज्य आहे. Kincaid म्हणतो- शिवाजी राजे हे मराठा देशाचे मुक्तिदाते होते,त्यांचे गुण विभिन्न होते,जीवन नियमीत होते,स्वभाव सहनशील होता त्यामुळे यात काही आश्चर्य नाही की त्यांचे लोक त्यांना त्यांच्यापैकी एक न मानता त्यांना देवाचा अवतार मानतात.ज्याप्रमाणे अथेन्सचे रहीवासी त्यांचे साम्राज्य लयास जाउन भरपुर कालखंड गेला असुनही भक्तीभावाने Theseus चे पुजन करतात त्याचप्रमाणे मराठे ,शिवरायांच साम्राज्य संपुन भरपुर काळ लोटला तरी अजुनही राजगड्,मालवण मधे त्यांचे पुजन करतात. Elphinstone म्हणतो- शिवाजी राजांसारखा प्रतिभासंपन्नच औरंगजेबाच्या चुकांचा फायदा उठवु शकतो त्यानंतर धर्मासाठी प्रेरीत करु शकतो व यातुन मराठ्यांमधे राष्ट्राभिमान जाग्रुत करु शकतो.या भावनांमुळे त्यांचे साम्राज्य अशक्त हातांमधे गेल्यानंतरही तग धरुन होते आणि अनेक अंतर्गत समस्या असुनही भारताच्या एका मोठ्या भागावर त्याने नंतर प्रभुत्व निर्माण केले. Owen म्हणतो- वीरता,देशाभिमान्,धर्माभिमानाची प्रभावळ त्यांच्या(जनतेच्या) कार्यवाहीत होती ज्यातुन ते प्रेरीत झाले.त्यामुळे शहाजी राजांच्या पुत्रास ते पुर्वनिश्चित,दैविक कृपापात्र मुक्तिदाता मानत होते.त्यामुळे शिवाजी राजे व त्यांचे अनुयायी असे मानु शकतात व मानत की त्यांच्या पध्दतीने मुस्लिमांबरोबर केलेल्या युध्दामुळे ते देवासाठी व मनुष्यासाठी एक चांगले कृत्य करत आहेत.ज्यामुळे त्यांचा गौरव झाला,त्यांचे फक्त स्वागतच झाले नाही तर प्रशंसनिय रीत्या प्रतिकात्मक लाभही झाला. टिप्-मुळ इंग्रजीतील वाक्यांमधे Shivaji असा उल्लेख आहे.त्याचे शब्दशः भाषांतर केल्यास शिवाजी असा एकेरी उल्लेख येतो.वाचनकर्त्यांच्या सोईसाठी वर शिवाजी महाराज्,शिवाजी राजे व शिवराय असे शब्द वापरले आहेत.वाक्यांचे शब्दशः भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे पण हा माझा पहीला अनुवाद असल्याने काही चुका असण्याची शक्यता आहे.त्याबद्दल क्षमस्व. सर्व परदेशी लोकांच्या उद्गारांनंतर शेवटी एक भारतीयाने काढलेले उद्गार देतो. कविराज भूषण म्हणतो- जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चित्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16027
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

वाह ! वाह !! किती छान माहिती दिलीत तुम्ही. शिवाजी महाराज थोरच! आम्हा मराठी मावळ्याचं तर ते दैवतच. आम्ही त्यांना आमच्या हृदयात तर अढळ स्थान दिलेलंच आहे, मात्र त्यांची थोरवी अशी परक्यांच्या तोंडून ऐकून आमची छाती आता सुध्दा फुगतेय. सोबतच डोळ्यांच्या कडा सुध्दा पाणावतात. अश्या संकलनाबद्दल तसेच सुरेख भाषांतराबद्दल धन्यवाद. नीलकांत

In reply to by नीलकांत

अश्या संकलनाबद्दल तसेच सुरेख भाषांतराबद्दल धन्यवाद. (तुकोबाचा वारकरी-शिवबाचा धारकरी) -इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

खूप चांगले संकलन. या संदर्भात एक विनंती नक्की कराविशी वाटते: जर ही वाक्ये आपण कुठल्या विशिष्ठ पुस्तकातून घेतली असली तर त्या पुस्तकाचा अथवा जेथून प्रत्येक वाक्य घेतली त्याचे संदर्भ येथे सांगीतले तर बरे होईल. कृपया यात कुठे अविश्वास दाखवतोय असा गैरसमज करून घेउ नका कारण तो उद्देश नाही. पण हे संग्राह्य वाटले आणि उद्या जर मला कुठे वापरायची असली तर संदर्भाविना देणे शक्य होणार नाही म्हणून.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्कीट धन्यवाद. या सर्व इतिहासकारांनी वेगवेगळ्या ठिकाणि मतप्रदर्शन केले आहे. त्यांच्यापैकी काहींनी शिवरायांवर पुस्तकेही लिहिली आहेत

In reply to by विकास

धन्यवाद विकास. बाल कृष्ण यांच्या 'शिवाजी द ग्रेट' पुस्तकात विविध ठिकाणी ही वाक्ये आलेली आहेत.

संकलन आवडले. बुद्धिमान आणि लांबचे पाहू शकणारा राजा, हेच खरे.

In reply to by चित्रा

धन्यवाद चित्रा. शिवाजी महाराजांची तुलना ज्युलियस सीझर्,हनिबल्,नेपोलियन्,सिकंदर या सर्वांबरोबर केली जाउ शकते.

वरील संकलन आवडलं. शिवाजी महाराजांचा अभिमान कोणालाही वाटावा. मराठी माणसांना तर वाटायलाच हवा. मुसलमानी सत्तांशी लढताना सुद्धा त्यांचे धर्मग्रंथ, मशिदी, श्रद्धास्थाने यांना हात न लावणारा, मुसलमानांना आपल्या सैन्यात मोक्याची पदे बहाल करणारा हा राजा खरोखरी द्रष्टा म्हणायला हवा. त्यांच्याकडून अद्यापही शिकण्यासारखे बरेच आहे. - मिपा.

In reply to by विकेड बनी

धन्यवाद मिपा. बरोबर आहे तुमच. खुप काही शिकण्यासारख आहे शिवचरित्रातुन.

In reply to by मेघना भुस्कुटे

खरोखर उत्तम संकलन आणि विषयही! >> मुळ इंग्रजीतील वाक्यांमधे Shivaji असा उल्लेख आहे.त्याचे शब्दशः भाषांतर केल्यास शिवाजी असा एकेरी उल्लेख येतो.... यात तुम्ही जसे भाषांतर केले आहे तेच मला जास्त भावले. प्रत्येक भाषेची एक पद्धत असते आणि इंग्लिशमधे (राजा) शिवाजी असं एकाच प्रकारे महाराजांचं नाव लिहिता येईल. पण मराठीमधे मात्र आपण म्हटल्याप्रमाणे शिवाजी राजे, महाराज, शिवराय असं म्हणता येईल. कोणीतरी म्हटलंच आहे, Translation is like a lady, when faithful not beautiful and when beautiful not faithful. पण तुम्ही भाषांतर/रुपांतर करताना ते मराठीमधे नैसर्गिकरीत्या आणलं आहेत, म्हणून प्रामाणिकही आहे! संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद यमी. इंग्रजीमधे Shivaji, Shiva, Siva, Sewajee अशा पध्दतीने लिहिले जाते.पण इंग्रजीतहि मराठी माणसानी लिहिताना Shivajiraje लिहायला सुरुवात करावी असे मला वाटते.

In reply to by चिन्या१९८५

"शिवाजी" ला "शिवाजी" म्हणण्यात आपलेपणा जास्त वाटतो आणि त्यात आदर कमी होतो असं अजिबात वाटत नाही. हाच आपलेपणा त्याकाळातल्या सामान्यलोकांना भावला म्हणून या राजाला जिवाला जीव देणारी माणसं मिळाली ना? त्यांना शिवाजी म्हणजे कोणी परका आहे असं वाटत नव्हतं. आपण देवाला नाही का एकेरी हाक मारत? आजच्या काळात "लालू" ने तेच तत्त्व वापरलं आहे. तसही आजच्या काळात हे "जी" लावण्याचं फॅड फारच बोकाळलं आहे. उगाच ओढाताण करून "शिवाजी राजे", "महाराज" लिहिणारे कधी कधी भोंदू वाटतात. बाकी उत्तम संकलन केलं आहे. साठ्वून ठेवण्याजोगं.

In reply to by एक

एक्,प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पण शिवाजी राजे किंवा शिवाजी महाराज म्हटल की आपलेपणा वाटत नाही अस कोणी सांगितल???आपल्या वडीलांनाही आपण अहो जाहोच करतो ना???मग काय तिथे आपलेपणा नसतो का???आता आपली जी आदरस्थाने आहेत त्यांना आपण आदरार्थीच संबोधतो. सावरकर्,आंबेडकर्,टागोर्,विवेकानंद इत्यादींना आपण आदरार्थीच संबोधतो ना???मग शिवरायांबद्दलही तसच केल तर कुठे चुकल्??आणि देव ही संकल्पना वेगळी आहे. भक्तीमधे देवाला आपण मित्र्,पुत्र,प्रियकर म्हणुन त्याची भक्ती करु शकतो म्हणुन तिथे एकेरी हाक मारणे चालते.

In reply to by एक

अनादर होणार नसेल तर एकेरी संबोधायला हरकत नाही.पण बर्‍याचदा लोक एकेरी संबोधताना अनादराने बोलतात

In reply to by चिन्या१९८५

आपल्या वडीलांनाही आपण अहो जाहोच करतो ना???मग काय तिथे आपलेपणा नसतो का???
आईला अरे तुरे म्हणतो मग तिथे आपले पणा नसतो का?
सावरकर्,आंबेडकर्,टागोर्,विवेकानंद इत्यादींना आपण आदरार्थीच संबोधतो ना???मग शिवरायांबद्दलही तसच केल तर कुठे चुकल्??
चुकलं असं कुणी ही म्हटलं नाही. मी मामाला अरे तुरे म्हणत असेल तर त्याची माझ्याच वयाची मुले त्याला अहोजाहो म्हणत असतात. दोन्ही आपापल्या जागी बरोबर आहेत.
आणि देव ही संकल्पना वेगळी आहे. भक्तीमधे देवाला आपण मित्र्,पुत्र,प्रियकर म्हणुन त्याची भक्ती करु शकतो म्हणुन तिथे एकेरी हाक मारणे चालते.
का वेगळी ? संकट काळी धाउन आलेल्या माणसाला देवासारखा धाउन आलास रे बाबा! असा उल्लेख करतोच ना! शिवाजी हा महाराष्ट्र संकटात असताना देवासारखा धाउन आलेला थोर पुरुष नव्हे काय? तात्पर्यः- एकेरी उल्लेख म्हणजेच अनादर नव्हे वा तुम्ही म्हणजेच आदरार्थी नव्हे . संवाद- पोलिस (कडक सॅल्युट ठोकत) नमस्कार साहेब! मनातल्या मनात- च्यायला **ल्या**ने रजा मंजुर नाही केली. त्या ... झेल्याची बराब्बर केली साहेब- काय रे ड्युट्या सोडुन कुठ फिरता रे बोंबलत! आन ते *** साहेबांच काम केल का? शिपाई- ह्य कोन तिकडच चाल्लोय मनात - च्यायला या साहबाची काम म्हंजी आमच्या खिशाला खड्डा*** साहेब - झाल्यावर मला रिपोर्टिंग करायचं . शिपाई- व्हयं साहेब! मनात- *********( सभ्य भाषेत- तुझ्या नानाची टांग) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

शिवाजी हा महाराष्ट्र संकटात असताना देवासारखा धाउन आलेला थोर पुरुष नव्हे काय? जरुर आहे.पण तो पुरुष आहे देव नाही.देवाची भक्ती ही आध्यात्मिक गोष्ट आहे. एकेरी उल्लेख म्हणजेच अनादर नव्हे वा तुम्ही म्हणजेच आदरार्थी नव्हे . बरोबर आहे. तुमच्या ह्या पोस्टच्या बरोबर वरची माझी पोस्ट वाचा.त्यात मी याला उत्तर दिले आहे

In reply to by चिन्या१९८५

मला असं वाटतं की प्रत्येक भाषेचा एक फॉर्म असतो आणि त्याचं भाषांतर नाही होऊ शकत. उदाहरणार्थ, इंग्लीशमधला "द फ्रेंड" मराठीत आणायचा असेल तर "द" चं मराठी रूपांतर फार चांगलं होईल असं वाटत नाही; "अ फ्रेंड" मधला "अ" सोपा आहे. किंवा मराठी (आणि इतर भाषांमधे) जे आदरार्थी अनेकवचन आहे ते इंग्लिशमधे नाही जमत! अर्थात यामुळे शिवाजीराजांचा अपमान होत नाही ना त्यांचं कर्तृत्व कमी होतं!

असे शिवराय आता होणे नाही! दंडवत...! (नतमस्तक) तात्या.

In reply to by चिन्या१९८५

आरे कोनीतरी आज च्या राज्य कर्त्याना शिव शाही राज्यकारभार शिकवा

-
मुळ इंग्रजीतील वाक्यांमधे Shivaji असा उल्लेख आहे.त्याचे शब्दशः भाषांतर केल्यास शिवाजी असा एकेरी उल्लेख येतो.वाचनकर्त्यांच्या सोईसाठी वर शिवाजी महाराज्,शिवाजी राजे व शिवराय असे शब्द वापरले आहेत.
व्याकरणात देखील आई, राजा, मित्र व देव यांच्या साठी एकेरी उल्लेखच आहे. एकेरी उल्लेख म्हणजे अनादर नव्हे. पण काही शिवप्रेमींच्या बौद्धिक क्षमता व उपद्रव मुल्य लक्षात घेता विद्वान देखील एकेरी उल्लेख टाळतात. "धाव रे रामराया" विठु माझा लेकुरवाळा" " आई तुझे थोर उपकार" "सर्किट आहे का रे तुझा मित्र जरा" "मित्राचा मित्र हा आपला मित्र" " दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा" वगैरे........ शरद पवार हा एकेरी माणुस ते शरदरावजी पवार, शरदचंद्रजी पवार पर्यंतचा साहेबी माणुस हा एकच असतो . "आज शिवाजी राजा झाला !राजा झाला! " अस राज्याभिषेकाच्या वेळच गाणं ऐकताना मराठी माणसाचा उर भरुन येतो. इथ शिवाजी राजे ,महाराज, शिवराय नसतात. तो आपल्या मनातला आदरार्थी एकेरी शिवाजी च असतो. पुलंच्या पुस्तकात कुठेतरी उल्लेख आहे. शाळेत पाहुण्यांचा परिचय करुन देताना ती पाहुणी ही स्री साहित्यिक असते. तिचे वडिल ही साहित्यिक असतात. या पार्श्वभुमिवर शाळेतला मुलगा म्हणतो "आजचे पाहुणे हे सुप्रसिद्ध साहित्यिक अमुक अमुक यांच्या मुलग्या आहेत." आता एवढ्या मोठया बाईला मुलगी असं एकेरी कसं म्हणायच हा त्याच्या बालबुद्धीला पडलेला प्रश्न असतो. पुर्वीच्या कथेतील विभावरीला देखील " पण हे विभाकरांना आवडत नाही! आता काय करावे बरे!" असे स्वगत म्हणावे लागायचे. अवांतर- आता आम्ही बी टिंब मारतोय नाही यखांद्या बारीला मान्स म्हनायची लई आधाव हाय बेनं. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुलंच्या पुस्तकात कुठेतरी उल्लेख आह ही ओळख इरावती कर्व्यांची एक सुंदर गोश्ट आहे. "आपल्या वर्गातल्या ***ची आई" असा उलेख इरावतीबाईंना त्यांच्य इतर कुठल्याही ओळखीपेक्षा आवडते. बाकी पूर्ण सहमती, हे सांगणे न लगे. - सर्किट

In reply to by प्रकाश घाटपांडे

एका अर्थाने बरोबर आहे.पण जर काही लोकांना शिवाजी महाराज्,राजे असे म्हणावयाचे असल्यास त्यात काय चुक आहे???मला तरी त्यात काही चुक वाटत नाही. शिवाजी हे नाव अनेक लोकांचे असते . त्यामुळे अनेक लोक 'तो शिवाजी असा होता' वगैरे म्हणत जणुकाही त्यांच्या नोकराबद्दल बोलत आहेत असे बोलतात .त्यामुळे माझ्यामते शिवाजी महाराज म्हटल की आपोआप आदरार्थी बोलण सुरु होत.मी स्वतः शिवाजी असा एकेरी उल्लेख करत नाही.शाळेत असताना देखील शिवाजी महाराज अस सारख सारख लिहायला वेळ जातो म्हणुन शिवाजी न लिहिता मी शिवराय लिहायचो.

In reply to by प्रकाश घाटपांडे

एके ठि़काणी मी शरदचंद्रजीरावजी पवारसाहेब वाचल होतं. :)

In reply to by रविराज

हां यांना इतक्या आदरानी बोलवायच आणि शिवरायांना शिवाजि अस एकेरी बोलवायच मला तरी बरोबर नाही वाटत

काही शिवप्रेमींच्या बौद्धिक क्षमता व उपद्रव मुल्य लक्षात घेता =)) उच्च प्रतिसाद!

In reply to by मेघना भुस्कुटे

सहमत! इथे महाराष्ट्र देशी तर काही लोकांना शिवाजीचं नाव वापरून राजकीय फायदा करू पाहणाय्रांना झोडपलं तरी राग येतो!

शिवरायांच्या अभिमानाने उर भरून आला... शिवाजींच्या अजून शौर्यकथांच्या प्रतीक्षेत आहोत.... मस्त! :)
वन्दे त्वां भूदेवी आर्यमार्तरम.......... जयतु जयतु पदयुगुलम ते निरन्तरम.........

In reply to by मृगनयनी

धन्यवाद मृगनयनी. मधुन मधुन शिवरायांबद्दल अजुन अशा गोष्टी टाकत जाईल.

अश्या संकलनाबद्दल तसेच सुरेख भाषांतराबद्दल धन्यवाद.
हेच म्हणते. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

मराठी मनावर राज्य करणार्‍या त्या जाणत्या राजाचे गुण, हलकट टोपीकरांनाही वाखाणण्याची बुध्दी व्हावी असाच तो एक द्रष्टा राज्यकर्ता! ह्या भाषांतरीत संकलनाबद्दल आभार.

मस्तच आहे! निकालाओ मनुचीबद्दलही लिहा चिनॉयशेट! अवा॑तरः मला सध्या वेळ नाही, पण मिळाल्यावर मला माहीत असलेला मनुची आणि नेताजी पालकराचा किस्सा लिहीन.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धन्यवाद डॉ.दाढे. मनुचीबद्दल लिहायची इच्छा आहे पण सध्या माझ्याकडे संदर्भ नाहीत्.संदर्भ मिळाल्यावर नक्की लिहिन

संकलन आवडले. भाषांतरही छान झाले आहे, विकास्ने म्हटल्याप्रमाणे संदर्भ दिले तर अजून चांगले! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

धन्यवाद स्वातीजी. या मधील इतिहासकारांनी वेगवेगळी पुस्तके लिहिलि आहेत. मी ही वाक्ये 'बाल कृष्ण यांच्या 'शिवाजी-द ग्रेट' पुस्तकातुन घेतलेली आहेत

मस्त संकलन. आवडले. असा राजा आता होणे नाही. शिवाजी राजे खरोखर एक महान व्यक्तिमत्व होते.

In reply to by पक्या

बरोबर आहे मक्या. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

व्वा..फारच सुंदर..... (जय भवानी जय शिवाजी) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मस्तच रे चिन्या !! छान सन्कलन , आणी अजुनही काही सन्कलन ,माहिती आणी अजुन दुवे देता आले तर वाचायला आनन्द होइन .... " !! जाणता राजा !! " !!जय भवानी , जय शिवाजी !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

फार छान संकलन. येथे प्रकाशित केल्याबद्दल आभार. शिवाजी राजांचे डोळे तीक्ष्ण होते,आणि त्यातुन असामान्य बुध्दिमत्ता दिसुन येत असे. चालीत एक जिवंतपणा व उत्साह होता.....मुख्य म्हणजे त्यांचे काळे डोळे ज्यातुन जणुकाही अग्निज्वाळा येत असत्, ही वाक्ये वाचल्यावर शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाचे सलगी देणे कैसे असे या समर्थ उक्तीची आठवण झाली. निवडक वेचे आणि अनुवाद आवडला. --लिखाळ.