Skip to main content

वेलकम टु इंडिगो...

सर्वसाक्षी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
सध्या विमानकंपन्यांचे धोरण पर्यटन व्यावसायिकापेक्षा थेट ग्राहकाला आकर्षित करण्याचे दिसते. प्रवासभाडे आणि सुविधा हे दोन्ही जर ग्राहकाने विमानकंपनिच्या संकेतस्थाळावर जाऊन थेट आरक्षण केले तर पर्यटन संस्थेपेक्षा बरे मिळते असा सध्या माझाही अनुभव आहे. चिरंजिवांसाठी इंडिगो एअरलाइन्समध्ये थेट आरक्षण करताना आलेला माझा हा अनुभव. कदाचित तुम्हालाही उपयोगी पडेल. इंडिगोच्या संकेतस्थळावर तिकिट बनविताना गाडं एका ठिकाणी अडलं. मी तिकिट प्रकल्प तिथेच थांबवुन पडद्यावर संकेतस्थळ खुले ठेवुन इंडिगोच्या ग्राहकसेवेशी संपर्क साधला. तिकिटसेवा बहुधा बाहेरुन घेतलेली असावी. असो. दूरध्वनीवर आलेल्या मुलीने जशी हवी तशी रुपरेषा बनविली आणि पी एन आर मला दिला. ही रुपरेषा दुसर्‍या दिवशी सकाळी ११.४० पर्यंत अबाधित राहणार होती. ती वेळ भरायच्या आधी आवश्यक ती माहिती जमा करुन व भरुन मला पक्के तिकिट आजच्याच दरात मिळणे शक्य होते. दुसर्‍या दिवशी पुन्हा संकेतस्थळ उघडले, पी एन आर टाकला आणि ग्राहकसेवेला दुरध्वनी लावला. आज एक मुलगा हजर होता. काल मी जे तिकिट बनविण्यास दिले आहे त्यात केवळ मधले नाव इतकाच बदल आहे असे सांगताच त्या मुलाने असे सांगितले की नावात काय पण कोणताही छोटासा देखिल बदल असला तरी ते तिकिट रद्द ठरेल व नवे तिकिट घ्यावे लागेल. मी आदल्या दिवशी तपशिल भरताना मुलाचे नाव व आडनाव असे लिहिले होते मात्र पारपत्रावर नाव मधले नाव व आडनांव असे असल्याने उगाच खेकटे नको म्हणुन मी नवे तिकिट बनविण्यास मान्यता दिली. अगोदरच्या तिकिटाचे मूल्य १९३११.०० होते. त्या मुलाने नवा व्यवहार अधिक फायदेशिर असून नवे तिकिट १८५९३.०० असल्याचे सांगितले. कमी काय नी जास्त काय तिकिट तर काढायचेच होते. 'नावात बदल' हे कलम सोडता बाकी सर्व तपशिल कालच्याच रुपरेषेनुसार ठेवण्याची सूचना मी दिली. त्य मुलाने भयंकर घाईत मला येण्याची व जाण्याची तरिख वाचुन दाखविली. घाई इतकी, की सत्यनारायणाची पूजा सांगताना गुरुजी श्री विष्णु सहस्रनाम तरी बरे उच्चारत असतील. मी त्याला अडवुन तारखा विचारल्या. तिकिट झाले आहे असे सांगुन त्याने पैसे चुकते करण्यासाठी आय वी आर सेवेकडे मला वळविले. कार्डाचा नंबर सिविसी कूट एकवर्ती कूट हे सर्व सोपस्कार झाले, आय वी आर सेवेकडुन धन्यवाद आणि क्रिया पूर्ण झाल्याचे उत्तर आले. पाठोपाठ हस्तसंचावर बँकेचा संदेश आला. बघतो तर १९६७९.७६ ची रक्कम! सुदैवाने आय वी आर ने मला पुन्हा तिकिट सेवेकडे सुपुर्द केले होते. मी सांगितलेली रक्कम व प्रत्यक्ष आकारण्यात आलेली रक्कम यात एवढी तफावत का असा सवाल करताच त्याने सांगितले की प्रवास परदेशातुन सुरु होत असल्याने तिकिटाची रक्कम त्या देशाच्या चलनात घ्यावी लागते, अर्थात त्या देशाच्या चलनाचा आपल्या रुपयाशी असलेला विनिमय दर पाहता अशी तफावत येते. हे रास्त मानले तरीही मी ही बाब माझ्या निदर्शनास तिकिट देण्याआधी न आणणे योग्य नसल्याचे त्याच्या निदर्शनास आणुन दिले व निषेधही नोंदवला. त्या मुलाने वरकरणी दिलगिरी व्यक्त केली आणि तिकिटाचा तपशिल पुन्हा एकदा सांगतो असे म्हणत जे सांगितले ते ऐकुन मी चकित झालो. परतीच्या प्रवासाची तारिख ही चुकिने हवी त्या महिन्या ऐवजी आधिच्या महिन्यातील होती. चूक १००% त्याची होती कारण मी स्पष्ट सांगितले होते की 'नावात बदल' याव्यतिरिक्त कसलाही बदल नाही. तारिख मी चुकिची सांगायचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मी खडसावताच त्याने मला काही वेळ टांगुन ठेवले आणि परत आला. आपण आपल्या वरिष्ठांशी बोललो असून त्यांनी परतीचे तिकिट रद्द करण्याचे रुपये १७५० इतके शुल्क माफ केल्याचे सहर्ष सांगितले. मात्र मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो. रद्द करण्याचे कारण तिकिट्सेवेची सदोष कामगिरी असल्याने विनाशुल्क ते तिकिट रद्द करुन नवे तिकिट देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे मी बजावले. मात्र जितका उशीर होइल तितके तिकिट महाग होत जाइल हे लक्षात घेउन नव्या दराने परतिचे इच्छित तारखेचे तिकिट बनविण्यास सांगितले. त्या तारखेचे तिकिट थोडे महाग असून मला सुमारे ७६०.०० रुपये इतका भुर्दंड होणार होता. मी मान्य केले व तिकिट बनवुन घेतले. पुन्हा आय वी आर सोपस्कार झाले व तिकिट बनले. मी पुन्हा नव्याने संपर्क साधला व तक्रार नोंदविण्यासंबंधी विचारणा केली. मला तक्रार मेल करण्यासाठी ग्राहकसेवेचा ईपत्ता देण्यात आला. मी लगोलग त्या पत्यावर माझी तक्रार तपशिलवार मेल केली. दुसर्‍या दिवशी उत्तर आले की माझी तक्रार त्यांना मिळाली असून ते लवकरच उत्तर देतील. त्याच्या दुसर्‍या दिवशी उत्तर आले. त्यात भरपूर दिलगिरी, घडलेल्या प्रसंगाचे गांभिर्य व असे पुन्हा घडु नये म्हणुन घेण्यात येणार असलेली खबरदारी, चूक करणार्‍या व्यक्ति/ विभागाला समुपदेशन वगैरे अनेक गोड गोष्टी होत्या मात्र मुद्द्याचे एक नाही. मी तसे उत्तर दिले व स्पष्ट केले की मला माझी नाहक गेलेली रक्कम परत केली जावी. मी त्यांना लिहिले की ग्राहकसेवेशी बोलताना संभाषण सुरू होण्यापूर्वी असे सूचित केले जाते की ते संभाषण धव्निमुद्रीत केले जाणार आहे, म्हणजेच माझे व त्यांच्या कर्मचार्‍याचे संभाषण हे ध्वनिमुद्रण स्वरुपात उपलब्ध असलेच पाहिजे. हे संभाषण ऐकुन एकतर त्यांनी आपली चूक मान्य करुन भरपाई द्यावी किंवा जर माझी चूक असेल तर 'चूक तुमची असून आम्ही तुमचे देणे लागत नाही' असे ठणकावुन सांगावे.' पुन्हा आश्वासक मेल. पुन्हा दोन दिवसांनी मेल. आता मात्र एक सुधारणा होती. पवित्रा जरा बदलला होता. 'आम्ही संभाषण ऐकले, व बहुधा चूक आमच्याच कडुन घडली असण्याची शक्यता आहे' असे त्यात लिहिले होते. मात्र भरपाई विषयी अक्षरही नाही! मी पुन्हा मेल केली ' चूक तुमची आहे, भरपाई मिळालीच पाहिजे, नपेक्षा मला हे प्रकरण तुमच्या वरिष्ठांकडे न्यावे लागेल, जर तुम्हाला भरपाईचे अधिकार नसतिल तर हे प्रकरण तुम्ही वरिष्ठांकडे पाठवावे, व विनाकारण माझा वेळ व श्रम वाया घालवु नयेत तसेच कारवाई करण्यास भाग पाडु नये. या नंतर तिसर्‍या दिवशी मला त्यांच्या गुरगाव येथिल मुख्यालयातुन दूरधव्नी आला. त्या अधिकार्‍याने चूक त्यांची आहे, ते त्यांना मान्य आहे व ते भरपाई देण्यास तयार आहेत असे सांगितले. रकमे बाबत त्यांनी बराच घोळ घातला व नाना खुलासेही दिले मात्र मी ठाम होतो - "मला द्यावी लागलेली रक्कम उणे मूळ रक्कम यातिल फरक" मिळालाच पाहिजे आणि तोही रोख , प्रवास सवलतपत्राद्वारे नव्हे. सदर अधिकार्‍यांना मी नम्रपणे सांगितले की त्यांनी त्यांच्या उच्च्पदस्थांशी विचार विनिमय करुन दोन दिवसांनी उत्तर दिले तरी हरकत नाही मात्र माझी मागणी न्याय्य आहे आणि मी त्यावर ठाम आहे. जर तुमच्या धोरणात ते बसत नसेल तर तसे कळवा कालच त्यांची मेल आली. सर्वप्रथम दिलगिरी. मग पुन्हा एकदा असे प्रकार न घडण्याचे आश्वासन, मग कर्मचारी प्रशिक्षण.... आणि अखेर 'कळविण्यांस आनंद होत आहे की आपल्या मागणीनुसार रुपये ११२०.० येत्या सात दिवसात आपल्या कार्डावर जमा करण्यात येतील, याखेरीज आमच्या तर्फे सदिच्छाभेट म्हणून रुपये २००.०० चे सवलतपत्र आपल्याला पाठविण्यात येत आहे' ग्राहकराजा, जागा हो.
स्वाती दिनेश

साक्षीदेवा, नेटाने मागे लागून चुकीची भरपाई मिळवल्याबद्दल अभिनंदन! स्वाती
01/05/2012 - 17:33 Permalink
मुक्त विहारि

छान यशस्वी लढा दिलात. जय महाराष्ट्र...
01/05/2012 - 17:35 Permalink
परिकथेतील राजकुमार

सर्वसाक्षी काकांचा विजय असो !
01/05/2012 - 17:51 Permalink
पैसा

आपण बरेचदा "या मंडळींच्या मागे लागून कोण मनस्ताप वाढवून घेणार", अशा विचाराने गप्प रहातो, म्हणून त्यांचं फावतं. तुम्ही सगळ्यानाच हा छान धडा दिला आहेत!
01/05/2012 - 18:33 Permalink
अँग्री बर्ड

छान आहे, एकंदरीत भारी काम केलेत. आम्ही अधून मधून असा गंडा ebay ला मारत असतो. बाकी जनरल शब्द सुद्धा मराठीतून लिहिले गेलेत त्यामुळे जरा अडखळत वाचले, हरकत नाय.
01/05/2012 - 19:56 Permalink
यकु

सेम किस्सा माझ्‍यासोबतही घडला होता, पण ट्रॅव्हल्समध्‍ये सीट बुक करताना. मी मागे इंदूरहून पुण्‍यात गेलो आणि शनि-रवि दोनच दिवस तिथे रहाणार असल्याने चिंचवडला उतरलो की लगेच रविवारी रात्रीचे परतीचे बुकींग केले. लिफाफ्यात घालून दिलेल्या तिकिटावर काय खरडलंय ते मी वाचून पाहिले नाही. शनिवारी रात्रीच ट्रॅव्हलवाल्यांकडून फोनाफोनी सुरु झाली - 'तुमचं आजचं इंदूरचं बुकींग आहे, कुठून बसणार?' च्यामारी आज सकाळीच गाडीतून उतरलेला माणूस आज रात्रीच परत कसा जाईल? बरं, मी आत्ता इंदूरहून ज्या गाडीने आलोय तिचंच रविवारचं तिकिट पाहिजे वगैरे त्या काऊंटरवरच्या ठोंब्याला बोललो होतो. मग फोनवरच शक्य होती तेवढी तणतण केली. ते ट्रॅव्हल्सवाले (प्रसन्न) म्हणे तुम्ही बुकींग एजंटकडून उद्याचं नवं तिकिट घ्‍या. तिथे गेलो तर तो त्याच्याकडून चूक झाली हेच मानायला तो तयार नाही. तो मला म्हणे, तुम्हाला नीट वाचून पहाता येत नव्हतं का? म्हटलं बरोबर आहे, मी नालायक आहेच. पण फक्त मी वाचून पाहिलं नाही या महत्पातकामुळे सहाशे रुपयांची चाट मारताना तुम्हाला काहीच लाज वाटत नाही का? तो म्हणे तुम्ही आला नाहीत, मग तुमचं सीट तसंच रिकामं राहिलं, आम्हाला काय त्याचे एक्स्‍ट्रा पैसे मिळाले नाहीत. प्रसन्नवाल्यांशी पुन्हा फोनवर बोललो, तर ते म्हणे अर्धे पैसे द्या आणि नवं तिकिट घ्‍या. गुपचूप पैसे दिले आणि त्याच तिकिटावर त्या बुकींगवाल्यानं काहीतरी खरडून ते 'वैध' करुन दिलं. यावेळी तारीख तपासली तर ती त्या मूर्खानं शनिवारची जुनी तारीखच ठेवली होती. मग त्याचा एकदा फर्मास अपमान करुन, तुम्ही सगळे लुटारु हे सांगून ती पुन्हा सहीनिशी दुरुस्त करुन घेतली. (पैसे देऊन पुण्‍यात अक्कल विकत घेतलेला) यक्कू
01/05/2012 - 19:59 Permalink

हॅहॅहॅ चिंतामणी काका अहो बाहेरुन पुण्‍यात येणार्‍याला चिंचवड हे पुणंच किमान बोलताना तरी . :p कृ हलकेच घेणे. पुणेकर पुण्यावरची टिका हलकेच घेतील तो अंतर्जालावरचा सुदिन ! :p :p :p :p
01/05/2012 - 23:44 Permalink
चिंतामणी

In reply to by यकु

पुणेकर पुण्यावरची टिका हलकेच घेतात. नाहीतर रणकंदन झाले असते ना. असो. पुणे आणि पुणेकर द्वेष्टे पुण्याला टारगेट करणे सोडती तो खरा अंतर्जालावरचा सुदिन !;)
02/05/2012 - 15:24 Permalink
बॅटमॅन

In reply to by चिंतामणी

>>पुणे आणि पुणेकर द्वेष्टे पुण्याला टारगेट करणे सोडती तो खरा अंतर्जालावरचा सुदिन ! ;) पुण्याला टार्गेट नाय, पुणेकरांना :P या दुरुस्तीमुळे १) पुणे आणि पुणेकर द्वेष्टे टीका करतात(पुणे आणि/किंवा पुणेकरांवर). २) पुणेकर पुण्यावरची (खरे तर स्वतःवरची) टीका लाईटलि नै घेत. या दोन्हींमध्ये कार्यकारणभाव म्हणजे कोंबडी व अंडे यांमधील कार्यकारणभावाप्रमाणे जाहला आहे असे बरीक नमूद करून ठेवतो ऐसाजे ;) एक काडी: २) मुळे १) ला उठाव जास्त मिळतो [अर्थात १) तसेही स्वयंसिद्ध आहेच म्हणा :P]
02/05/2012 - 18:39 Permalink

असं म्हणू नका चिंतुकाका. काही वर्षांपूर्वी पुणे विरूद्ध सारे जग अशा भांडणात चिंचवडकरांनी चांगली साथ दिल्याचे स्मरते.;) जालीय भांडणात एंटरण्यास उशीर झाल्यावर सहमाफी त्यांनी किल्ला लढवला होता. बाकी, यकुंचा प्रतिसाद गांभिर्याने घेऊ नका. ते सुक्ष्म देहाने आले आणि पुन्हा इंदोरास गेले.;)
02/05/2012 - 00:43 Permalink
स्पंदना

अभिनंदन सर्वसाक्षीजी! आता मला सांगा हे सर्व करताना तुमच्या अर्धांगाची काय प्रतिक्रिया होती. कारण माझ्या घरी पण आमच 'ह्येनी' असच प्रत्येक प्रकरण ताणत रहातात, अन त्याच ते फोन वर परत परत एकच गोष्ट दहा लोकांना समजावुन सांगण माझ डोक उठवुन जात. मग मी 'सोड ना! तु पण ...काय शंभरदा एकच गोष्ट सांगतोयस , सोड!' अस तुणतुण घेउन बाजुला बसते. पण अक्षय फार चिकट! एकदा जर का एक मुद्दा पकडला तर जीव जाइल पण सोडणार नाही. उद्या मी हे तुमच लिखाण त्याला सांगणार अन मग मी तुम्हाला कस काय 'लय भारी! ' अन त्याला कंजुष मारवाडी म्हनते अस व्हायला नको म्हणुन आपल प्रामाणिक पणे सांगुन टाकल झाल.
02/05/2012 - 06:38 Permalink
सर्वसाक्षी

In reply to by स्पंदना

अपर्णा, हे सगळे प्रकरण मी वसुली झाल्यावर मगच अर्धांगाला सांगितले :) मुळात मी फोनवर बोललो तो फक्त तक्रार कुठे करावी यापुरताच. बाकी सर्ब व्यवहार लेखी (मेलवर) होता. उगाच तोंड कशाला वाजवा? लेखी व्यवहार आवश्यक आहे. जर आपल्याकडे समोरच्या पक्षाचा जबाब/ विधान लेखी असला (आणि तो आपल्या फायद्याचा असला) तर ते सर्वात उत्त्तम. माझ्या प्रकरणात त्यांची चूक असल्याचे लेखी निवेदन मेलरुपात माझ्याकडे होते त्यामुळे मला भरपाई देण्याव्यतिरिक्त त्यांना गत्यंतरच नव्हते. जर मी ग्राहक न्यायालयात गेलो असतो आणि त्याबरोबरच प्रसारमाध्यमांकडे गेलो असतो तर त्यांचा पैसाही गेला असता आणि लाजही गेली असती.
02/05/2012 - 10:31 Permalink
सोत्रि

In reply to by सर्वसाक्षी

विमान उडाले पाहिजे हे महत्वाचे
हे मात्र लाखमोलाचे बोललात! लेखाबद्दल धन्यवाद, ह्यापुढे, नेटाने प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची उर्मी मिळाली. - ('विमान उडाले पाहिजे' ह्यावर भक्ती असणारा) सोकाजी
02/05/2012 - 19:51 Permalink
प्रभाकर पेठकर

अभिनंदन सर्वसाक्षीजी. तुमचा ह्या धाग्याला 'दस्तऐवज' म्हणून सांभाळून ठेवण्यात येत आहे. भविष्यात (म्हणजे १००-१५० वर्षांनी) कोणी तुमच्या प्रमाणे महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर काही लेखन करताना, 'सर्वसाक्षी' ह्या नांवाशी येऊन अडेल तेंव्हा त्यांना, ह्या 'दस्तऐवजा'चा फार उपयोग होईल.
02/05/2012 - 11:39 Permalink
इरसाल

चिकाटीला सलाम. असाच एक किस्सा. रिलायंस बिग टीव्हीचा १००० चा ऑनलाइन रिचार्ज करताना ३ वेळा ट्रान्झक्शन फेल + १ वेळ पास दाखवले पण ४००० कापले. मागे पडलो हात पाय धुवून मग जवळपास दीड महिन्यात ३००० वापस केले.
02/05/2012 - 11:47 Permalink
कुंदन

बाकी काही म्हणा , पण इंडिगो च्या फ्लाईट फार वक्त्शीर असतात. त्यासाठी इंडिगो ला १००/१००
02/05/2012 - 13:09 Permalink
मस्त कलंदर

आमची बँक ऑफ बडोदा ही अतिशय कार्यक्षम बँक असल्याने गेल्या दीड वर्षापासून प्रत्येक वेळी काही ना काही नवीन अडचण दाखवून अद्याप माझे नेटबँकिंग चालू झाले नाहीय. त्यामुळे क्रेडिट कार्डाचे हिशेब मी अजूनही चेकने चुकते करते. पूर्वी शेवटच्या तारखेच्या अगदी दोन-तीन दिवसही आधी कोणत्याही बँकेच्या ड्रॉपबॉक्समध्ये चेक टाकले तरी ते नीट जायचे पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांचेही घोळ चालू झाले आहेत. म्हणून मग मुद्दाम लक्षात ठेऊन हे चेक मी सिटीबँकेच्याच एटीएममध्ये टाकते. त्यात माझे ऑफिस चालत दहा मिनिटांवर असल्याने त्यासाठी खास वाकडी करून जावे लागते हेही आहेच. तर एकदा यांच्याच एटीएममधला चेक त्यांच्यापर्यंत दहादिवसांपर्यंत न पोचल्याने त्यांच्याकडून फोन आला. अर्थात फोन करणारणीला आणि तिच्या वरिष्टाला झापून ही तुमची चूक आहे आणि झालेल्या उशीराबद्दल दंड भरणार नाही असे मी ठणकावून सांगितले, तेव्हा ते प्रकरण तेवढ्यापुरतं मिटलं. पुढच्या वेळॅस चेक सिटीच्या एटीएममध्ये टाकल्याच्या दिवशीच सर्व तपशीलासह मेल करून ' अत्यंत प्रेमाने' चेक टाकला आहे तेव्हा तो कलेक्ट करण्याची तसदी घ्यावी असे कळवले. चेक मिळाल्याचा संदेश पुढचे पाचेक दिवस न आल्याने पुन्हा एक मेल टाकला, आधीच सगळे तपशील कळवलेले असूनदेखील पुन्हा त्यांच्याकडून विचारणा झाली. हे मेले लोक एकतर सकाअळी सकाळी फोन करतात, फोन उचलला गेला नाही तर बिन्धास्त तुमचा फोन बंद आहे असंही कळवतात, आणि काहीतरी गडबड चालू आहे म्हणून आपण फोन केला तर त्यांच्या फोनला इनकमिंगची सुविधाच नसते. तर असो.. हे सगळे झाल्यानंतर दोन दिवसांनी फोन आला, "आम्ही झाल्याप्रकाराबद्दल दिलगीर आहोत, तुम्ही आमच्या गेल्या साडेचार वर्षांपासूनच्या कस्टमर आहात इ. इ. " शेवटी वैतागून माझा चेक पोचला की नाही हे मला विचारावं लागलं. पुन्हा दिवसाभरातून त्यांचे अशाच अर्थाचे तीन फोन येऊन गेले. सिटीबँकवाले सुधारले वाटतं, असं म्हणत घरी पोचले तर एक भला मोठा लाल गुलाबांचा गुच्छ वॉचमनने हाती दिला. त्याला सिटीबँकेच्या माणसाचं कार्ड जोडलं होतं. मेल चेक केल्यावर याचा उलगडा झाला. माझा तसा बर्‍यापैकी मोठ्या रकमेचा तो चेक 'चुकून' दुसर्‍याच्याच नावाने वर्ग झाला होता. आणि मी मेलवरून पाठपुरावा केल्यावर हे उघडकीस आलं होतं. मग यावेळेस आणखी एक खरमरीत पत्र लिहून त्या कस्ट्मर केअर वाल्याची हजेरी घेतली. या सगळ्या गोंधळात मला त्या महिन्याचं बिल आलंच नाही. आणि त्यामुळे या महिन्याच्या बिलात दीडहजार रूपये व्याज आकारणी झाली. पुन्हा एकदा मेल लिहिण्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर लगेच व्याज माफ केल्याचे मेल आणि मेसेजेस आले आहेत. इतके दिवस या क्रेडिट कार्डाचा काही त्रास झाला नव्हता, पण सध्याचे हे गेल्या दोन तीन महिन्यातले प्रकार पाहून ते बंद करण्याच्या विचारात आहे.
02/05/2012 - 13:42 Permalink
amit_m

एका ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या आणि 'Strongest Bank in Asia Pacific' असा बिरूद मिरवणाऱ्या बँकेच्या आम्ही चांगलेच नाकी नऊ आणले होते. फोनवर बोलण्याच्या भानगडीत पडूच नये सरळ ई- मेल करावा, काम झटकन होते असा अनुभव आहे.
02/05/2012 - 20:16 Permalink