Skip to main content

लग्नाआधी आणि लग्नानंतर!

लेखक दादा कोंडके यांनी शुक्रवार, 03/02/2012 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एक मित्र लग्नाच्या फायनल बोलणीसाठी गावाला जाउन आला. लग्न अगदी ठरल्यातच जमा होतं म्हणून आल्यावर मी त्याच्याकडे पार्टी मागितली पण तो म्हणाला ऐनवेळी बोलणी फिसकटली. थोडसं खोदून विचारल्यावर कळलं की त्या मुलगीला :) लग्नानंतर एक दिड वर्षेतरी तीचा पगार तीच्या घरी द्यायचा होता. हुंड्याचा वगैरे तर प्रश्नच नव्हता आणि माझा मित्रपण पगार न-देण्याबद्दल आग्रही नव्हता. पण त्या मूलीचा भाउही नुकताच इंजिनीअर होउन नोकरीला लागला होता आणि तीचा पगार कारचे हप्ते भरायला द्यावा लागणार होता. जे माझ्या मित्राच्या मते योग्य जस्टीफिकेशन नव्हतं. अजुन एक उदाहरण माझ्या ओळखीचं आहे. अश्याच कुठल्याश्या छोट्या कंपनीत नोकरी करणारी मुलीचा पगार बारा हजार होता. तीला आयटीत नोकरी लागल्यामूळे तीचा पगार एकदम पंण्णास हजार झाला. त्याच्या जोरावर त्यांनी नवीन घर (तीच्या वडिलांच्या नावावर) घेतलं, कार घेतली. एका वर्षात वडील रिटायर झाले, लहान भावंडांची शिक्षणं चालू. म्हणून ती कर्ज फेडेपर्यंत तीला पगार मग घरी देणं आलं. हिच्या लग्नाचे प्रयत्न चालूच होते पण त्या अटी मूळं खूपशा स्थळांकडून नकार आला. हीच उदाहरणं नाही, पण ह्या दोन-चार वर्षात खूप मित्रांना अशा अटी ऐकायला मिळाल्यात आणि मैत्रिणींनी अटी घातल्या आहेत. पुर्वी (म्हणजे अपने जमानमे) मूलीचे पैसे आईवडील घ्यायला अवघडत असत. अगदीच घेतले तर तुझ्याच लग्नाला होतील म्हणून बँकेत ठेवत असत. पण आता मूलींच्या शिक्षणाबाबतही जागरूक असणारे पालक मुलीच्या लग्नाआधी आणि लग्नानंतरही पैसे अगदी हक्काने घेतात असं दिसतं. अगदी गरज पडली तर मदत करणं वेगळं किंवा हेल्थ इंश्युअरन्सचे पैसे भरणं वगैरे समजू शकतो, पण सरसकट लग्नानंतर अर्धापगार किंवा पूर्ण पगार घरी देणार्‍या मूली पण बघितल्या आहेत. या अनुषंगानं मला काही पडलेले काही प्रश्न, १. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत? २. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत? या बद्दल मिपाकरांना काय वाटतं?

वाचने 41686
प्रतिक्रिया 127

प्रतिक्रिया

In reply to by वपाडाव

नवर्‍याचा हक्क असेल तर तिचाही चान्स आहे तसं नाहीये. सासू सासर्यांनी मालमत्ता मुलाच्या नावावर केली नसेल,आणि सासु सासरे हयात असतिल तर नवरा गेल्यावर सुनेला अधिकार सांगता येत नाही.नातू किवा नात असेल तर त्यांना ती मालमत्ता मिळू शकते.पण सुनेला नाही. पण माहेरी सेवा करा न करा, आई वडिलांच्या मालमत्तेत मुलीचा ५०% अधिकार असतोच.जर आई वडिलांनी आपल्या हयातीत ती मालमत्ता मुलाच्या नावावर केली असेल तर मात्र मुलीला हक्क दाखवता येत नाही.

In reply to by किचेन

सासू सासर्यांनी मालमत्ता मुलाच्या नावावर केली नसेल,आणि सासु सासरे हयात असतिल तर नवरा गेल्यावर सुनेला अधिकार सांगता येत नाही
सासू सासर्यांनी मालमत्ता मुलीच्या नावावर केली नसेल,आणि सासु सासरे हयात असतील तर बायको गेल्यावर जावयाला अधिकार सांगता येत नाही, हे पण खरे आहे ना? स्वकष्टाने कमावलेली मालमत्ता मी मृत्यूपत्र करून कोणालाही देऊ शकतो. फक्त माझ्या मुलाला किंवा फक्त मुलीला किंवा दोघांना किंवा एखाद्या अनाथाश्रमाला. मृत्यूपत्र नसेल तर मुलगा आणी मुलगी आपला वारसाहक्क सांगू शकतील. वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर नातवंडांना मालमत्ता मिळेल, मग ती वडिलांच्या बाजुने असु दे किंवा आईच्या बाजुने. एकंदरीत, मालमत्तेच्या वाटणीत सुनेवर/मुलीवर अन्याय होत आहे, असे म्हणता येणार नाही.

In reply to by Pearl

१) मूलीला भाउ नसेल आणि ती एकूलती एक असेल तर, तिचे घर कोणते. तिने आईवडिलांना भावनिक आधार द्यावा की नाही. त्यांना गरज पडेल तेव्हा धावून जावे की नाही. त्यांच्या घराला आपले घर मानून (?) त्यांचे वय जास्त असल्याने घराच्या कामांना (काही मेंटेनन्स असेल किंवा अन्य काही [धावपळीची] कामे ज्यामध्ये त्यांना मदत लागेल) मदतीला जावे की नाही. नोटः तुर्तास या उदाहरणात असे समजू की money-power आईवडिल पूरवतील. पण man-power तर लागतेच ना. - लागतेच आणि जर मुलगी एकुलती एक असेल, आणि तिच्या माहेरची इस्टेट मिळणार असेल तर तिचा नवरा अशा कामात आडकाठी न आणता मदत करेल. दुरदृष्टी म्हणतात त्याला. २) मूलीला भाउ नसेल आणि बहीणीच असतील ज्या अजून शिकताहेत आणि समजा मुलगी नोकरी करत आहे तर तिने माहेरच्याना आर्थिक मदत करावी की नाही. - करावी, पण उद्या या बहिणी शिकुन मोठ्या झाल्या नोकरीला लागल्या, त्यांची लग्नं झाली, आणि नंतर मोठ्या बहिणीला अडचण आली तर त्यांनी पण तिच्या केलेल्या कामाची मदतीची आठवण ठेवुन तिला मदत करावी. ३) आणि समजा एखाद्या मुलीने सासरचेच घर आपले मानून तिथे आपल्या नोकरीतले पैसे खर्च केले (वस्तू, फर्निचर, टीवी, फ्रीज, बाजारहाट ... etc etc) ... आणि हे घर सासर्‍यांच्या नावावर आहे. तर असा कायदा का आहे की सासर्‍यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही. - मी म्हणतो, ज्या मुलामध्ये लग्नाआधी काही वस्तु, फर्निचर, टिवी, फ्रिज अशा बेसिक गरजेच्या वस्तु घेण्याची लायकी नाही किंवा लायकी असुन त्यानं घेतलेल्या नाहीत, त्याच्याशी लग्न कराच कशाला ? कारण माझ्या माहितीप्रमाणे आज काल मुली लग्न ठरवताना घर कसं आहे यासोबत घरात काय काय आहे , कसं आहे हे सगळं पाहतात. उगा रिकाम्या प्लॅटमध्ये नाही जात कुणी राहायला. आणि एक नम्र विनंती, - माझ्या प्रतिसादातली एक ओळ विनासंदर्भ बाहेर काढुन त्याचा विपर्यास करु नका.

In reply to by ५० फक्त

पण फक्त प्रतिवाद म्हणून लिहिल्यासारखा वाटला.
आणि एक नम्र विनंती, - माझ्या प्रतिसादातली एक ओळ विनासंदर्भ बाहेर काढुन त्याचा विपर्यास करु नका.
कोणती ओळ?

In reply to by ५० फक्त

मला पण असच वाटत होत, आणी तुम्ही ते योग्य शब्दात माडंल. जाता जाता : सध्या माझा एक जवळचा मित्र याच परिस्थितीतुन जात आहे, दोघेहि नोकरी करतात एकडे, घराचा पुर्ण खर्च माझ्या मित्राच्या खात्यातुन (तिच्या शॉपिंगचा सुद्धा), महिना संपता संपता खात्यात खुळखुळाट आणी बायकोचा पगार ति काय करते सांगत नाही. आताच तिच्या भावाने खुपच महागडी दुचाकी घेतली आणी हा म्हणतोय कि तिनेच त्याला घेवुन दिली. आता या परिस्थितीत काय करावे हे ना त्याला ना मला कळत आहे.. अजुन थोडा विचार केल्यास अस दिसतय कि सध्या काही ठिकाणी नवर्या मुलांना जास्त तडजोड करावी लागतेय टिकवुन ठेवायला आणी त्यांच्या बायका ह्या विचारांचा गैरफायदा घेत आहेत. --टुकुल

उत्तम चर्चाविषय :) माझी मते: १. मुलाने लग्न नको ठरवले ते बरेच झाले. दोघांच्याही डोक्याची कटकट (आणि त्यामुळे इतरांची कटकट) मिटली. २. लग्नाआधी पगारावरून एवढी विस्तृत बोलणी होतात, हे मला फार बरे वाटले. त्यात दोन्ही बाजूंना बोलण्याची लाज बाळगण्याची गरज वाटत नाही हे फार छान. अपेक्षेपेक्षा घरात कमी पैसे आल्याने मनाचा कोंडमारा होऊन जगण्यापेक्षा अशी आधीच व्यवस्था लावलेली बरी. ३. पण, लग्न हे अधिक पैसे घरात येण्याची एक व्यवस्था आहे हे इतके स्पष्ट उघडेवाघडे बघून जरासे वाईटही वाटले. त्यातही मुख्य म्हणजे शारिरीक आणि मानसिक पातळीवर काहीच संबंध जुळलेला नाही असे वाटते. एवढी व्यापारी डील्स होणे बरे का वाईट यावर एक निबंध लिहीता येईल असे वाटले. ४. लवकरात लवकर "लिव-इन" रिलेशन्स मध्यमवर्गातही येणार यात शंका नाही.

In reply to by चित्रा

>>लवकरात लवकर "लिव-इन" रिलेशन्स मध्यमवर्गातही येणार यात शंका ना>> अगदी सहमत! मला वाटतं जगातील बदलत्या मुल्यांनुसार लग्न संस्थेत बदल करायचे म्हटल्यास आपण लिव्ह इन रिलेशन्स वरच येऊन पोहोचू. अवांतर : च्यायला अशा चर्चे मध्ये सगळे पती/पुरुषांच्या विरोधात लढायला आल्यासारखे का बोंबलतात काही कळत नाही. लग्नाआधी मुलाकडे स्वतःचं २ बीएचके फ्लॅट असावा, गाडी असावी अशा अपेक्षा कराव्यात. त्यासाठी मुलाने स्वतःच्या ढुंगणाला चिमटे काढून डाऊन पेमेंट करण्यालायक पैसे जमवावेत, घराचे हप्ते भरावेत. लग्नानंतर मात्र या सगळ्या गोष्टींवर अर्धांगिनी म्हणून पत्नीला समान हक्क द्यावा. पण त्याच वेळी पत्नीने काही संसारात काही खर्च उचलावा अशी अपेक्षा करावी तर म्हणावं तिने कमावलेल्या पैशाचा विनियोग कसा करावा हे तिनेच ठरवावं. च्यायला अजबच आहे सगळं.

आला रे आला! पाशवी धागा आला. हा प्रश्न खरा आहे आजकाल पण आपण प्रगतीशील म्हणवत फारच मर्यादित विचार करतोय. प्रत्येक जोडप्याचे आर्थिक गणित आणि कौटुंबिक प्रश्न वरवर दिसायला सारखे पण तितकेच वेगळे असणार. आपापली समजूत, सामाजिक, आर्थिक परिस्थिती ई. गोष्टी आहेतच.

माझ्याकडून ठरलेल्या एका लग्नामध्ये मुलीनी मुलाना अट घातली होती, लग्नानंतर ती तिच्या पगारातले ५ हजार दर महा आईला देईल जोपर्यंत भाऊ कमवायला लागत नाही तोपर्यंत.अर्थात हि गोष्ट फक्त त्या दोघांमध्ये होती.इतर कोणालाही याची कल्पना नव्हती(मलासुद्धा).जेव्हा नंतर हि गोष्ट जाहीर झाली तेव्हा सासूने तिच्या पगारातला निम्मा पगार (१२,५००) माहेरी द्यावा असे सुचवले.ह्या मुलीला वडील नव्हते. पण फक्त एकच...बाकी काही उपवर मुली मात्र हुंडा, अमुक तमुक तोळे सोन आणि धुमधडाक्यात लग्न वगैरे अशा कारणांमुळे नापसंत केल्या जातायत. पूर्वी हि जाईल सासरी, हिच्या लग्नासाठी पैसा कुठून आणणार अशी कारण देऊन मुळीच शिक्षण लवकर थांबवायचे.आता परिस्थिती बदलतीये.पालक मुलींनाही हौशीनी शिकवतायत.अगदी लोन वगैरे घेऊन.उपवर वाधुलादेखील कर्तव्याची जाणीव असते.आई वडिलांची जबाबदारी जसा मुलगा सांभाळतो तसाच मुलीने देखील संभाळल पाहिजे. हि जाणीव उपवर मुलाला देखील असली पाहिजे.

In reply to by किचेन

तेच तर ना. ह्या असल्या पैशाच्या गोष्टी नातं निर्माण झाल्यावर सामजस्यानं ठरवायच्या असतात. त्यात कर्तव्य असावं उपकार नको. आपुलकी असावी फक्त व्यवहार नको. लग्न वगैरे ठरायच्या आधीच ह्या असल्या अटी कसल्या घालता? मूलगा-मूलगी दोघंही सारखे वगैरे ठिक आहे पण सध्या समाजात काय स्तिथी आहे, त्याच्या कलेनं घ्यायला नको का? बदल हळू-हळू होतीलच. 'पहिल्यांदा सगळं क्लिअर असलेलंअ बरं' ह्याचा खूपदा अतिरेक होतो. "तूझा कोणी गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड होती/होता का?" किंवा "मी लग्नानंतर घरी पगार देणार, पटलं तर बघ" ही त्याचीच उदाहरणं. अश्या नाजूक वेळेला सुरुवातीलाच एकघाव दोन तुकडे करून चालत नसतं. उगिचच कुणीतरी कान भरवून दिलेली असतात अशा लोकांचे की , हा तसा निघाला, ती तशी निघाली. वास्तविक काही गोष्टींचे अंदाज बांधायचे असतात, काही गोष्टी अप्रत्यक्षपणे काढून घ्यायच्या असतात, काही गोष्टी थोड्या दिवसानंतर विचारायच्या असतात. हे सगळं व्हायला काही दिवस जाउ द्यावे लागतात. आणि पहिल्या भेटीत पुढे जाउ द्यायचंकी नाही एव्हडा अंदाज आला तरी पूरे आहे, आणि येतोच.

In reply to by दादा कोंडके

खर आहे.जस काही आपण लग्न करत नाहीयेत तर आपली जमीन विकतोय.हा भाव आहे जमल तर घे नाहीतर सोड.पण जमीन विकल्यानंतर पाणी लागणार आहे, पिक येणार आहे का, का कसलं आरक्षण येईल याबाबत विचारच करत नाही.आता वरच्या उदाहरणात समजा मुलगी भाऊ कमावता व्हायच्या आत आई झाली तर मग घरी पैसे कोण देणार?ती तिचा निम्मा पगार देईल अस ठरलं होत.पण पगारच बंद झाल्यावर काय नवरा देणार त्या वाटचे पैसे.

मुलीनी घरी माहेरी पगार द्यावा का ---इथे हे गृहीत तत्व दिसत आहे कि मुलगे त्यांच्या आई वडिलांना नेहमी पगार देतात---इथे किती मुलगे आई वडिलांना पैसे देतात? मुलाचे आई वडील आजकाल मुलावर भार टाकत नाहीत ---अजीतजी

In reply to by अजितजी

तेच म्हणायचं.लग्न झाल कि नवर्याचा पगार नवरा-बायकोचा एकत्र असतो.आई वडिलांकडे तो सहसा जात नाही.मग मुलीचा पगार का माहेरी जावा?शिक्षणच बोलायचं झाल तर, नवऱ्याच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हे कर्तव्य, आणि बायकोच्या शिक्षणावर केलेला खर्च हे उपकार.स्त्री मुक्ती, किवा स्त्री पुरुष समानता वगैरे मध्ये पुरुष भरडला जातोय.भगवान कारे तो रामलीला... सारखी अवस्था झालीये.आयला साधी बसमध्ये पण जागा नाही.लग्नाच्या वेळेसही ह्या बायका वेठीस धरतात. पुरुष म्हण्जे समजलात काय? कोणीही यावं आणि टपली मारून जावं.

१) मूलीला भाउ नसेल आणि ती एकूलती एक असेल तर, तिचे घर कोणते. तिने आईवडिलांना भावनिक आधार द्यावा की नाही. त्यांना गरज पडेल तेव्हा धावून जावे की नाही. त्यांच्या घराला आपले घर मानून (?) त्यांचे वय जास्त असल्याने घराच्या कामांना (काही मेंटेनन्स असेल किंवा अन्य काही [धावपळीची] कामे ज्यामध्ये त्यांना मदत लागेल) मदतीला जावे की नाही. नोटः तुर्तास या उदाहरणात असे समजू की money-power आईवडिल पूरवतील. पण man-power तर लागतेच ना. - लागतेच आणि जर मुलगी एकुलती एक असेल, आणि तिच्या माहेरची इस्टेट मिळणार असेल तर तिचा नवरा अशा कामात आडकाठी न आणता मदत करेल. दुरदृष्टी म्हणतात त्याला. >> प्रत्येक जण प्रत्येक गोश्ट करताना हा फायद्या तोट्याचा तराजू घेउन बसला तर खरचं जगणचं अवघड होइल. [मला वाटतं प्रत्येक गोश्टीतली व्यापारी/हिशेबी व्रुत्तीमुळेच आज मुलगी-अपत्य कोणालाही नको असते. तुमचंच गणित मांडून बघा ना तोटाच तोटा आहे. सुशिक्षित लोकही जर असा विचार करत असतील तर अशिक्षित किंवा आर्थिक दुर्बल लोकांची काय कथा. असो तो एक वेगळाच विशय आहे. आणि जाउ दे इथे विषयांतर नको. ] तुम्ही नवर्‍याच्या बाबतीत बोलताना म्हणता की 'नव-याला त्याचं घर असतंच आणि एकच असतं, त्याला त्याच्यासाठी खर्च करणं भागच आहे किंवा त्याचं ते कर्तव्यच आहे.' तेव्हा मात्र तुम्ही त्याला कर्तव्य वगैरे म्हणता. तेव्हा तुम्ही नवर्‍याच्या आई-वडिलांची काही इस्टेट आहे का, ती मिळणार आहे का याचा विचार न करता कर्तव्य म्हणून त्यांच्यासाठी करणार आणि बायकोच्या आई-वडिलांसाठी ( खर्च तर सोडाच. या उदाहरणात खर्च धरलेलाच नाहिये) मदतीला जाताना मात्र आपल्याला किती फायदा होणार याचा विचार करून आणि फायदा होणार असेल तरच नवरे जातील असं म्हणणं मला तरी दुटप्पीपणाचं वाटतं. बायको एकुलती एक अपत्य असेल तिच्या आई-वडिलांची तर तिच्या आई-वडिलांना मदत करण हे पण तिच कर्तव्यच नाही का. २) मूलीला भाउ नसेल आणि बहीणीच असतील ज्या अजून शिकताहेत आणि समजा मुलगी नोकरी करत आहे तर तिने माहेरच्याना आर्थिक मदत करावी की नाही. - करावी, पण उद्या या बहिणी शिकुन मोठ्या झाल्या नोकरीला लागल्या, त्यांची लग्नं झाली, आणि नंतर मोठ्या बहिणीला अडचण आली तर त्यांनी पण तिच्या केलेल्या कामाची मदतीची आठवण ठेवुन तिला मदत करावी. >> आपल्याला मदत करणार्‍याबद्दल प्रत्येकाने मदतीची आठवण ठेवुन तिला मदत करावी, हे बरोबरच आहे. पण समजा तुम्ही तुमच्या बहीण/भावाला मदत करताना तसे सांगता किंवा तसा करार करता का. नाही ना. तुम्हाला मदत करणे कर्तव्य वाटते म्हणून करता आणि तुम्हाला निश्चितच वाटते की तुमच्या बहिणीने/भावाने त्याची आठवण ठेवावी. पण पुढे जाउन तुमचा भाउ/बहिण त्याची जाण ठेवेल की नाही हे त्या व्यक्तिवर ठरते. त्याचप्रमाणे बायकोने तिच्या बहिणीला मदत करणे कर्तव्य वाटते म्हणून केले तर काय बिघडले. आता बहीणीने त्याची जाणीव ठेवावी. पण ती तसे करेल की नाही हे त्या व्यक्तिवर ठरते. ३) आणि समजा एखाद्या मुलीने सासरचेच घर आपले मानून तिथे आपल्या नोकरीतले पैसे खर्च केले (वस्तू, फर्निचर, टीवी, फ्रीज, बाजारहाट ... etc etc) ... आणि हे घर सासर्‍यांच्या नावावर आहे. तर असा कायदा का आहे की सासर्‍यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही. - मी म्हणतो, ज्या मुलामध्ये लग्नाआधी काही वस्तु, फर्निचर, टिवी, फ्रिज अशा बेसिक गरजेच्या वस्तु घेण्याची लायकी नाही किंवा लायकी असुन त्यानं घेतलेल्या नाहीत, त्याच्याशी लग्न कराच कशाला ? कारण माझ्या माहितीप्रमाणे आज काल मुली लग्न ठरवताना घर कसं आहे यासोबत घरात काय काय आहे , कसं आहे हे सगळं पाहतात. उगा रिकाम्या प्लॅटमध्ये नाही जात कुणी राहायला. >>आता तुम्ही माझं म्हणणं शब्दशः घेत आहात. फर्निचर नवे घेतले जाउ शकते. टिवी, फ्रिज पण जुने असतील तर नवे खरेदी केले जाउ शकतात. तरीही त्याऐवजी आपण मायक्रोवेव, डिशवॉशर, ए.सी. अशा वस्तु घेतल्या म्हणू. आणि एक नम्र विनंती, - माझ्या प्रतिसादातली एक ओळ विनासंदर्भ बाहेर काढुन त्याचा विपर्यास करु नका. >> मान्य आहे की मी तुमच्या प्रतिसादातली एक ओळ बाहेर काढली पण १) एक तर ती विनासंदर्भ मुळीच नाहिये. तुमचा पूर्ण प्रतिसाद त्या ओळीवर बेतला आहे म्हणू किंवा त्या ओळीशी संबधित आहे म्हणू. त्यामूळे मी काही विपर्यास केला आहे असे मला मुळीच वाटत नाही. २)दुसरं असं की मी ती ओळ घेण्यामागे माझा एकच उद्देश होता की माझा प्रतिसाद तुमच्या प्रतिसादावर दिलेला आहे हे कळाव यासाठी फक्त रेफरन्स म्हणून मी ती ओळ वापरली. कारण माझा प्रतिसाद मोठा होता आणि तो टंकेपर्यंत दुसर्‍या कोणी प्रतिसाद टाकला तर क्न्फ्युजन होउ नये एवढाच साधा उद्देश होता. बाकी काही नाही.

In reply to by Pearl

मुद्दा क्र. १ - तुमचा मुद्दा मान्य, पण हे आजचंच नाही तर कालचं पण कटु सत्य आहे, वास्तव आहे. ही परिस्थिती जर बदललेली असती तर हे असे पैशावरुन सुरु होणारे प्रश्न उपस्थितच झाले नसते. मुद्दा क्र.२ - माझा पहिला प्रतिसाद पुन्हा वाचा, नव-याला पक्षी पुरुषाला हा चॉईस ह्या समाज पद्धतीनंच ठेवलेला नाही, जसे या समाज पद्धतीनं त्याला तथाकथित अनिर्बंध अधिकार दिले त्याबरोबरच जवळपास तेवढीच कर्तव्यं पण त्याच्या गळ्यात मारलेली आहेत, तिथं त्यानं त्याच्या भावा बहीणिंना मदत करताना करार - मदाराचा प्रश्नच येत नाही, तिथं पर्याय नाहीत. पण बायकोच्या पक्षी स्त्रीच्या बाबतीत आहेत किंवा लग्नानंतर तयार होतात किंवा काही चाणाक्ष बायका आपलं आर्थिक स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी ह्या मार्गाचा अवलंब करतात. मुद्दा क्र. ३ - तुमचं म्हणणं शब्दश्: घेण्यामागचा हेतु थोडासा विनोदनिर्मिती होता, तो असफल झाला असे म्हणावे लागेल. कायद्याबद्दल बोलायचं झालं तर माझी तेवढी समज नाही. मुद्दा क्र. ४ - आपण ती एकच ओळ कॉपी पेस्ट केल्यानं विपर्यास झाला असं माझं मत आहे.

मुली कमवायला लागल्या त्याला पुष्क़ळ वर्ष झाली. त्या पैशावर कुणाचा हक्क यावरून गदारोळ माजले. पुरुषाची कमाई जशी प्रथम स्वत:साठी आणि नंतर त्याच्या स्वतःच्या कुटुंबासाठी तसेच स्त्रियांचेही! माहेर वा सासर सगळे नंतर..! तिला कशाला प्राथम्य क्रम दयावासा वाटतो ते महत्त्वाचे. कारण चैन आणि गरज या दोन वेगळ्या आणि व्यक्तिसापेक्ष बदलणार्‍या संकल्पना आहेत. माहेरच्या वा सासरच्यांना तिने गाडीचे हप्ते भरावे असे वाटत असेल, गाडी जर तिची आणि केवळ तिचीच असेल तर ते ठीक आहे. अन्यथा कुणाच्या हौशी-मौजी भागवण्यापेक्षा ती स्वतःसाठी पैसे साठवेल.

लग्न झाल्याबरोबर, किंवा ठरवतांनाच जॉईंट अकाऊंट काढायचे, मुलगा व मुलगी, दोघांनीही ठरवायला पाहिजे. त्यातून किती खर्च होतो हे दोघांनाही कळते, त्यामुळे लपवाछपवीचा प्रश्नच यायला नको. आतातर ऑनलाईन बँक अकाऊंट कधीही पाहता येतो.

मुलगा असेल की मुलगी जर पालकांच्या मालमत्तेत वाटा हवा असेल तर खर्चातही वाटा उचलला पाहिजे असा कायदाच हवा. कायद्याप्रमाणे मुलींना पालकांच्या मालमत्तेत बरोबरीचा वाटा असतो. अर्थात त्यात तक्रार करण्यासारखे काहीच नाही. पण त्याच न्यायाने खर्चात आपलाही वाटा देणे ही पण त्यांची नैतिक जबाबदारी असते. कर्जाने घेतलेल्या घराचे हप्ते फेडताना सर्वच भावंडांना (भाऊ/बहिण) तो देणे बंधनकारक हवे. डोक्यावर कर्ज असताना छदाम द्यायचा नाही आणि पालक गेल्यानंतर नुसता आपला वाटा मागायला येणे हे कितपत समर्थनीय आहे? अर्थात हे मुलगा आणि मुलगी दोघांनाही तितकेच लागू होते. (अवांतरः पालकांच्या मालमत्तेत वाटा मुलींना देण्यात काहीच चूक नाही. पण मग वृध्द आई-वडिलांना सांभाळायची जबाबदारी पण घ्यायला हवी. हे सरसकट विधान नाही पण माझ्या पाहण्यात किमान ३-४ केसेस (आमच्या कुटुंबात किंवा ओळखीच्यांमध्ये) आल्या आहेत. मुलीचे लग्न झाल्यानंतर आई मुलीला धाऊन धाऊन मदत करणार पण त्या आईचे हातपाय चालेनासे झाले की मात्र आई नकोशी होणार आणि मग तिला सांभाळणे ही भावाची जबाबदारी! परत मालमत्तेत वाटा मागायला मात्र सगळ्यांच्या पुढे. आणि परत यांना कोणी काही बोलायचे नाही!!)

शीर्षक वाचून कसल्या औषधाच्या जाहिरातीचा धागा असावा असे वाटले होते. :)

In reply to by नितिन थत्ते

मलाही अगदी थत्तेचाचांसारखेच वाटले.

त्यामुळे बायकांनी घरी बसून घरकामाची किंमत होत नाही म्हणत राहण्यापेक्षा नोकरी करावी हे जास्त बरं. आता नोकरी करुनही घरकाम करावंच लागेल असं म्हटलं जाईल आणि ते खरंही आहे. पुरुषांची मानसिकता बदलायला वेळ लागेल. पण निदान सुरु तरी करा प्रयत्न.. गवि..काकांशी सहमत याच विचारांतुनच मी नोकरी करु लागले.

पण त्या मूलीचा भाउही नुकताच इंजिनीअर होउन नोकरीला लागला होता आणि तीचा पगार कारचे हप्ते भरायला द्यावा लागणार होता >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> त्या भावाची बायको नक्कीच नोकरी करणारी नसणार... आई वडिलांच्यापेक्षाही असे स्वतःच्या घरातल्या लोकाना नोकरी करु न देणारेच अशा पगाराचे हिस्से मागत रहातात.. अजिबात देऊ नये... लग्न मोडले हे बरे झाले...

लाईफ टाईम जरी तीने घरी मदत केली तरी काय हरकत आहे. Emoticon

आहाहा! मजा आली. जिला घरी मदत करायचीय ती मुलगी बिनधास्त स्वतःच्या हिंमतीवर स्थळांना स्पष्ट सांगतिये आणि त्यांनी नकार दिला तरी तिला काही फरक पडत नाहीये हीच गोष्ट किती आनंदाची आहे. राहिला प्रश्न लग्नाचा तर लग्न झालेच पाहिजे असा जो अट्टाहास आहे तोच मुळात फोल आहे. लग्नाशिवाय आयुष्य व्यर्थ आहे का? आणि व्यर्थ आहे असे ज्याला वाटत असेल तो/ती त्याच्या/तिच्या प्राधान्याप्रमाणे तडजोड करेल. मुळात गृहीतक ( सर्व अटी मान्य होऊन लग्न झालेच पाहिजे) चुकीचे असल्याने चर्चेचा पायाच ठिसूळ आहे.

In reply to by नगरीनिरंजन

अगदी बरोबर.. मुलीला लग्नाची गरजच वाटत नाही आहे... लग्नानंतरही अशी मुलगी टिकणार नाही.. एखादे मूल झाले की मुलासकट माहेरीच निघून जाईल.

In reply to by नगरीनिरंजन

जिला घरी मदत करायचीय ती मुलगी बिनधास्त स्वतःच्या हिंमतीवर स्थळांना स्पष्ट सांगतिये आणि त्यांनी नकार दिला तरी तिला काही फरक पडत नाहीये हीच गोष्ट किती आनंदाची आहे.
खूपदा मुली लोभी आईवडील आणि (योग्य वेळेत व्हावेसे वाटणारे)लग्न ह्याच्या कात्रीत सापडतात.
राहिला प्रश्न लग्नाचा तर लग्न झालेच पाहिजे असा जो अट्टाहास आहे तोच मुळात फोल आहे. लग्नाशिवाय आयुष्य व्यर्थ आहे का? आणि व्यर्थ आहे असे ज्याला वाटत असेल तो/ती त्याच्या/तिच्या प्राधान्याप्रमाणे तडजोड करेल. मुळात गृहीतक ( सर्व अटी मान्य होऊन लग्न झालेच पाहिजे) चुकीचे असल्याने चर्चेचा पायाच ठिसूळ आहे.
लग्न झालेच पाहिजे का नाही वगैरे विषय वेगळा आहे. आणि अजुनही लग्न न करता राहिलेल्या लोकांना समाज वेगळ्या नजरेनं बघतो. कशासाठी तरी आयुष्य झोकून दिलेल्या लोकांचं (लता मंगेशकर, वाजपेयी) ठिक आहे पण बहुतेक सामान्य लोकांचं "सोशल वेलबिईंग" लग्नावर अवलंबून असतं . उमेदीच्या काळात लग्न करणार नाही म्हणून अडून बसलेल्यांचे चाळीशी नंतर डोळे उघडलेले पण बघितले आहेत.

In reply to by दादा कोंडके

हे दोन शब्द 'म्युचुअली एक्स्क्लुसिव्ह' आहेत असे वाटत नाही तुम्हाला? कमीतकमी ज्या शैक्षणिक दर्जाच्या मुला/मुलीच्या विवाहा संबंधी चर्चा इथे सुरू आहे त्याबद्दल तरी?

In reply to by दादा कोंडके

खूपदा मुली लोभी आईवडील आणि (योग्य वेळेत व्हावेसे वाटणारे)लग्न ह्याच्या कात्रीत सापडतात.
तो सर्वस्वी त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि प्रत्येक व्यक्ती तिच्या गरजेप्रमाणे आणि भिडस्तपणाच्या प्रमाणानुसार त्याचे उत्तर शोधेल.
लग्न झालेच पाहिजे का नाही वगैरे विषय वेगळा आहे. आणि अजुनही लग्न न करता राहिलेल्या लोकांना समाज वेगळ्या नजरेनं बघतो. कशासाठी तरी आयुष्य झोकून दिलेल्या लोकांचं (लता मंगेशकर, वाजपेयी) ठिक आहे पण बहुतेक सामान्य लोकांचं "सोशल वेलबिईंग" लग्नावर अवलंबून असतं . उमेदीच्या काळात लग्न करणार नाही म्हणून अडून बसलेल्यांचे चाळीशी नंतर डोळे उघडलेले पण बघितले आहेत.
लग्न झालेच पाहिजे का एवढाच प्रश्न नसून सगळ्या अटी पूर्ण होऊन लग्न झालेच पाहिजे का असा प्रश्न आहे. जसजशी इतर अटींची तीव्रता कमी होत जाते आणि लग्नाची गरज वाढू लागते तसतशी लग्न होण्याची शक्यता वाढत जाते. त्यात सरसकट धोरण ठरवण्याचे कारण नाही असे मला वाटते.

माझे तर परखड मत आहे की, मुलींनी, सुनांनी कुणालाही पैसे देउ नयेत. आपले पैसे आपणच कधीमधी उडवावेत/ एरवी स्वतःसाठीच नीट वापरावेत/ नियमित साठवावेत! :) शिवाय भावाला, नवर्‍याला, वडलांना आणि सासर्‍यांना व दीराला गाड्याबिड्यांवर उडवण्यासाठी बिल्कुल देउ नयेत, एकवेळ आईला, बहिणीला, सासूला आणि नणदेला त्यांच्या खर्चासाठी थोडेफार दिले तरी चालतील. शेवटी एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीच्या मदतीला येणार असते हे नेहमी लक्षात ठेवावे! ;)

In reply to by कवितानागेश

प्रतिसाद मस्तच!;) मी तर आणखीही एक गोष्ट करते. आई, सा. बा. , नणंद यांच्यामध्ये मीच वयानं लहान असल्याने त्यांच्याबरोबरच खरेदीला जाते. मला कुठ्ठे म्हणून पैसे खर्च करू देत नाहीत. बाजारात काय हवं ते घे म्हणतात. कधीकधी तर मला दोन किंवा तीन प्रकारचे कपडे फार्फार आवडतात. मोह सोडवत नाही, किंमत बघवत नाही; मग त्या "अगं घे ना!" असं म्हणतात. खरच या बायकाच माझ्यासारख्या मुलीच्या मदतीला येतात.;)

हा लेख वाचून ''बटाट्याच्या चाळीने पूर्वी मुलींची लग्ने कशी होणार ह्या विवंचनेत असणारया बापांची पिढी पहिली होती. व आता त्यांची लग्ने झाली तर आपले काय अश्या चिंतेत असणारे बाप पहिले''. ह्या विधानाची आठवण झाली. माझ्या पाहण्यात अनेक मुली माहेरी सढळ हाताने अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष मदत करतात. ह्यात नोकरी करणाऱ्या व न करणाऱ्या दोन्ही आल्या. पण मुलगा व मुलगी असलेल्या घरात मुलाने उच्च शिक्षण घेणे बहुदा अभियांत्रिकी आणी परदेशी शिकायला जाणे हे प्रमाण मुलींपेक्षा पेक्षा जास्त असते. मुली परदेशी बहुदा लग्ने होऊन जातात.( ह्यात कितीतरी वेळा भाऊ आणी बहिणी मध्ये सर्वच बाबतीत बहिण ही भावापेक्षा हुशार असली तरी ) मालमत्तेत समान वाटणी कायद्याने मान्य असली तरी प्रत्यक्षात ते घडतांना दिसत नाही. मुलींनी उदार मनाने तडजोड करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
म्हणूनच मुलीने लग्नानंतर आपला पैसा आपली मुले व स्वतःसाठी व जोडीदारासाठी राखून ठेवावा. बहुतेक पालकांनी अपत्ये जन्माला घालण्या अगोदर त्यांचे पालन पोषण, शिक्षण आपल्या पगारात होणार आहे का ? ह्याचा सारासार विचार करून ती जन्माला घातली तर ही समस्या निर्माण होणार नाही. तेव्हा '' अंथरूण पसरून पाय पसरावे'' ''जराशी सावधानी ,जिंदगी भर आसानी''

मधे मधे फुटकळ प्रतिसादही लिहिले. कोंडके दादांनी चांगला विषय चर्चेसाठी घेतलेला आहे. वरिल प्रस्तावातून वेगवेगळे सूर उमटत आहेत. १. मी कमविलेल्या पैशाचे मी काय करेन हे कोण ठरविणार. २. जोडीदार शोधून 'संसार' थाटणे हे उद्दिष्ट आहे, की हा खरेदी विक्री व्यवहार आहे? ३. उपवर्/उपवधूंनी एकमेकांस काय प्रश्न विचारले पाहिजेत? 4. How to decide priorities. मला वाटते, ४था प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. अन या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरात एक 'इगो' गुंफिला गेलेला आहे. पहिला प्रश्णः मी कमावते. मी 'माझ्या घरी' देणार. 'तू' विचारायचं नाहीस. हा म्हणतो, तू 'माझी' बायको. (होणार) मग हे चालणार नाही.. मग 'सौदा' फिसकटतो..!? प्रायॉरिटी कशाला? तिने पैसे कमवून आणण्याला? तुझ्यावर प्रेम करण्याला? तुझ्या मातापित्यांची काळजी घेण्याला? तुझी पिल्लं जन्माला घालून मोठी करण्याला? की तिच्या आईबापांना पैसे देण्याला? इथे येतो मुद्दा २. संसार सुरू करता आहात की सौदा? Starting a family. असा एक सुंदर शब्दसमूह इंग्रजीत आहे. तुम्ही एका कुटुंबाची सुरुवात करीत आहात. सुरुवातीला, आधी तुमच्या अन तिच्या कुटुंबाची 'काँटेक्स्ट' असणारच आहे. (हे पाश्चात्य जग नाही. तिकडे मुले/मुली १६-१८ ची झाली की घरटे सोडून उडून जातात म्हणे?) हळू हळू, तुमचे घर, अन तिचे घर पक्षी सासर्/माहेर मोडून एक नवे 'तुमचे' घरटे तयार होते. त्याचे घर होते. कुटुंब होते. मग तुमच्यावर तुमच्या पिलांची जबाबदारी येते. तुम्हाला समजते मुलगा/मुलगी असल्यावर तुमच्या जिवाचे काय होते ते. तोवर तुमचे आई/बाबा तुम्हाला 'समजायला' लागलेले असतात.या स्टेजला पोहोचल्यावर मग 'तुझ्या' बाबांना हार्ट अ‍ॅटॅक आला अन 'मी' बिल भरलं हे उरतच नाही. ते तोपर्यंत आपल्या पोरांचे आजोबा झालेले असतात. अन आपलेही मित्र, गाईड. बायकोचे वडील असोत की नवर्‍याचे. हा ३डी अन दूरचा विचार केला, तर तिसर्‍या प्रश्नाचं उत्तर समजू लागतं, की एकमेकांना काय विचारलं पाहिजे. एकमेकांना प्रचंड सेल्फिश होऊन विचारा. फक्त तू अन मी बद्दल. तुम्ही दोघे काँपॅटिबल आहात की नाही त्याबद्दल. बाकी आइ/बाप, भाऊ/बहीण, पैसा क्षुल्लक आहेत. तुम्ही दोघे एकमेकांशी जुळलात तर सोनं. नाही तर सोन्याचा मुलामा दिलेलं मातीचं खेळणं. असा तो संसार आहे. शेवटी प्रश्ण प्रायॉरिटीजचा आहे? म्हातारपणी कंबर दुखत असली, की तीच 'तुमची बायको' गरम पाण्याची पिशवी आणून देते, अन कपाळावर हात ठेऊन चौकशी करते, की तिकडे तोंड करून झोपी जाते? हे महत्वाचे. तिने आयुष्यभर पगाराचे महिना १ लाख रुपडके तुम्हाला दिले असलेत तरी ते काय कामाचे? -कंबरेखाली एक गरम पाण्याची पिशवी घेऊन आनंदी झालेला- गोपाळ

In reply to by आनंदी गोपाळ

अहो, पण म्हातारपणी दोघांनाही गरम पाण्याची पिशवी मिळेल की नाही हे त्यांच्या लग्नाआधीच कसे काय कळायचे? एकमेकांच्या घरी राहून, ४ दिवस 'म्हातारा-म्हातारी' खेळून बघायची पद्धत सुरु करावी लागणार लवकरच! :P

लग्नाचा बाजार मांडला की हे व्हायचंच!!! कशाच्या बदल्यात काय मिळतंय हे लोकं पाहणारचं नै का? बाकी आनंदी गोपाळ यांच्याशी सहमती आहे.

अहो, पण म्हातारपणी दोघांनाही गरम पाण्याची पिशवी मिळेल की नाही हे त्यांच्या लग्नाआधीच कसे काय कळायचे? या साठी म्हातारं व्हायची गरज नाही, ज्यांना हे चेक करायचं आहे, त्यांनी हात पाय तोडुन घेउन पहावे (आपापले), लक्षात येईल लगेच.

In reply to by ५० फक्त

खरं तर त्याची पण गरज नाही, नुस्तीच परिक्षा घ्यावी एकमेकांची..... पाणी पुरेसे तापवता येते का? आणि तापलेले पाणी शेकण्याच्या पिशवीत ओतता येते का? ....या अशा परिक्षा उत्तीर्ण झाल्यास 'इन्वेस्टमेंट' करायला हरकत नाही! ;)

नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत? अशी तडजोड होऊ शकत नाही. न करणे चांगले.. दीड वर्षनेही माहेरच्या लोकांचा पगाराच्गा हट्ट चालूच रहाणाण्याची शक्यता असते आणि दीड वर्षाने संसार मोडण्याचीच शक्यता जास्त असते...

मी आणखी एक रन काढतो. अजून कोणीतरी दोन रन्स काढा म्हणजे सेंच्युरी होईल.

हम्म.......... सर्व प्रतिसाद,मते वाचली छान आहेत माझ एक प्रामाणीक मत नम्रपणे सान्गु इच्छीते सुनेने पगार / अर्धा पगार गरज असेल तर " माहेरी द्यावा " हे बोलायला जितक सोप्प आहे तितक आचारणात आणायला कठीण आहे , या अनुषगाने नेहमीच प्रश्न उपस्थित राहणार सुन पगार /अर्धा पगार माहेरी देतेय हे सासरच्या लोकाना ( अपवाद वगळ्ता) कितीही नाही म्हण्ले तरी कठीण जाणार हे निश्चित ! अन १००% सत्य आहे :)

In reply to by पियुशा

हे असेच असते हो... (वरील बरेच रिप्लाय वाचलेत आणि काही नाही वाचले) पण सुनेने अर्धा पगार माहेरी द्यावा हे मान्य (पण काही रिप्लाय मधुन पुरुष आणि पुरुषी अहंकार असे शब्दशः नसले तरी उच्चार/अर्थ जाणवले त्याबद्दल २ ओळी लिहितो ) सुनेने अर्धा पगार घरी द्यावा .. मान्य.. पण याला विरोध कसा होतो ते पहा .. १. सुनेने अर्धा पगार घरी दिला, तरी तीची सासु जी की आई असते, आपल्या मुलीला (लग्न झालेल्या) सआंगते.. काही इकडे पैसे देण्याची गरज नाही .. ही भवानी मग सगळाच पगार तिकडे देईन .. २. जी मुलगी सासरी जावुन पैसे देत असेन अशी आई पण आपली सुन जर असेच घरी पैसे देत असली तरी तिला नको देवु त्यांचे काय अडले असे बोलेन .. अशी बरीच वेगवेगळी चित्रे समाजात दिसतात .. त्यामुळे फक्त आणि फक्त पुरुषप्रधान संस्कृती ही एकच गोष्ट याला कारणीभुत नाही असे ध्यानात ठेवावे .. तसेच अनेक गोष्टी .. स्त्री ला मुल होत नसेन तर तिला पुरुषां पेक्षा जास्त टोचने/विटंबन केले जाते ते इतर स्त्री कडुनच.. स्त्री चे लग्न होत नसेन तर तिच्या बद्दल भलते सलते बोलले जाते ते इतर स्त्री वर्गाकडुनच ,.. तेंव्हा स्त्रीस जर खरेच उत्कर्ष हवा आहे तर त्यांनीच स्त्री बद्दल आदर बाळगावा ... आई रुपी जी पहिली स्त्री मुलांच्या(मुलगी आणि मुलगा)आयुष्यात असते त्यामुळे स्त्री बद्दल आदर कसा निभवावा हे पुरुषाला ही ठावुक असते आणि स्त्री ला पण.. पण हेवे दावे आणि अहम या कारणा मुळे उलट बिचार्‍या पुरषांना हकनाक बळी जातो

In reply to by गणेशा

१. सुनेने अर्धा पगार घरी दिला, तरी तीची सासु जी की आई असते, आपल्या मुलीला (लग्न झालेल्या) सआंगते.. काही इकडे पैसे देण्याची गरज नाही .. ही भवानी मग सगळाच पगार तिकडे देईन .. २. जी मुलगी सासरी जावुन पैसे देत असेन अशी आई पण आपली सुन जर असेच घरी पैसे देत असली तरी तिला नको देवु त्यांचे काय अडले असे बोलेन ..
बालबुद्धीला हे झेपलं नाही... इस्कटुन सांगितलंस तर कदाचित पुन्हा एखादा प्रयत्न करतो..

In reply to by वपाडाव

घर A : 'अ' ही सुन असते आणि , 'ब' ही लग्न करुन गेलेली मुलगी असते. "सा" ही सासु असते. १. अ जेंव्हा तिच्या माहेरी ' घर B' पैसे देते. त्याच वेळी 'ब' ही सुद्दा तिच्या माहेरी ' घर A' पैसे द्यायला लागली. की 'सा' जी की 'ब' ची आई असते, ती म्हणते पोरी तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव, नाहितर ही 'अ' आहे ना, ती भवानी तिचय घरी सगळे पैसे देत जाईन. घर C 'अ' ही सुन असते आणि , 'ब' ही लग्न करुन गेलेली मुलगी असते. "सा" ही सासु असते. २. 'ब' ही मुलगी लग्न करुन गेली तरी कर्तव्य म्हणुन घरी (घर C) पैसे देत असेन तर सासु ती घेत असते, आणि सेम थिंग जेंव्हा तीची सुन ' अ' तिच्या माहेरी ( घर D) पैसे देत असेन तर . तु तिकडे पैसे देवु नकोस असे सांगत असते..

In reply to by गणेशा

मालक, एकदा सुनेच्या रुपात घुसल्यास फक्त नणंद जरी लिहिले असते तरीही ते कळालेच असते... A-B-C वापर्ण्याची गरज पडली नसती. असो, A-B-C वापरुन इस्कटुन सांगितल्याने कळाल्या गेले आहे. स्वगत : चला आता केबीसी (KBC-KBC) खेळु...

नवरा गरीब, बायको माहेरकडून श्रीमंत, दोघे नोकरीला आता नवऱ्याचे माहेर गरीब म्हणून नवऱ्याचा अर्धा किंवा पूर्ण पगार त्याच्या आईवडलांना द्यावा काय ? कि हे गृहीत धरून चालले आहेत लग्न म्हणजे एनीहाऊ नवऱ्याची जिम्मेदारी.

In reply to by इरसाल

मुलाचे आईवडील मुलाकडे राहतात किंवा हवे तेव्हा येऊ जाऊ शकतात आणि मुलगाही त्यांना हवी तेवढी, हवी तशी मदत करू शकतो हे गृहीत धरलेले आहे नेहमीप्रमाणे, प्रत्यक्षात स्थिती काहीही असली तरी. :) (युयुत्सुंची तीव्र आठवण होते आहे. ;-))

- फिर ना कहना मेरे दोस्त माइकल दारू पीके दंगा करता है Smiley

. लिहिण्यासारखे भरपूर अहे