✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दर्शनेच्छा बलियसि!

ह
हरिकथा यांनी
Fri, 12/23/2011 - 17:11  ·  लेख
लेख
वृन्दावनातल्या राधा-मदनमोहन मंदिराजवळच एक आंधळे बाबाजी राहायचे. त्यांचं नाव, गाव कुणालाच माहिती नव्हतं. बहुतांशी दिवसभर त्यांचं वास्तव्य वृन्दावनाजवळच्या 'मदनटेर' या जागी असायचं म्हणून लोकं त्यांना 'मदनटेरवाले बाबा' अशीच हाक मारायचे. हे बाबा काही जन्मान्ध नव्हते. पण त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुपात होत असायचा. दिवसभर ते मदनटेरच्या घनदाट झाडीमध्ये बसून राधा-कृष्णांच्या लीलांचे स्मरण करत रडायचे. राधा-कृष्णाच्या विरहात त्यांचं अविरत अश्रुविसर्जन सुरू असायचं. संध्याकाळचे ते वृन्दावनातल्या राधा-गोविन्दजींच्या मंदिरात जावून रडत रडत त्यांना निवेदन करायचे आणि तिथून येता येता गावात केवळ चार घरची माधुकरी मागून जे मिळेल त्यात समाधान मानायचे. येता-जाता, खाता-पिता कुठल्याही वेळी त्यांचं अश्रुविसर्जन काही थांबायचं नाही. मदनटेरवाल्या बाबाजींनी अशाप्रकारे चाळीस वर्ष राधा-कृष्णांच्या विरहात रडत रडत, अश्रुपात करत काढली. सततच्या अश्रुपाताने त्यांची दृष्टी क्षीण होत गेली आणि पुढे ते पूर्णपणे आंधळे झाले. तरीही दृष्टीहीनतेबद्दल कुणी त्यांना कधीच चिडलेलं, क्षुब्ध झालेलं पाहिलं नाही. बाबाजींच्या मते, डोळ्यांची सार्थकता राधा-कृष्णांच्या दर्शनामध्ये होती आणि ते दर्शन जर त्यांचे चर्मचक्षु करून देऊ शकत नसतील तर त्यांना अशा डोळ्यांच्या असण्या नसण्याने काहीच फरक पडणार नव्हता किंबहुना असे डोळे नसलेलेच बरे, असा त्यांचा विचार होता. आता मात्र इतक्या वर्षांनी बाबाजींना आयुष्याच्या संध्याछायांची जाणीव होऊ लागली होती आणि त्यांच्या युगल दर्शन मिळवण्यासाठी राखलेल्या धैर्याचा बांध ढळू लागला होता. त्यांची राधा-कृष्णांच्या संबंधातली विरहावस्था टिपेला पोहोचलेली. त्या विरहवेदना त्यांना असह्य होऊ लागल्या होत्या. तासन्तास मदनटेरवरच्या झाडींमध्ये या वेदनांमुळे मुर्च्छित होऊन ते पडून राहत पण अशा निर्जन स्थानी त्यांची विचारपूस करायला तरी कोण येणार? तिथे असणारे मोर, कोकिळ आणि शुकादि पक्षीच आपल्या कलरवाने त्यांची सोबत करायचे. असेच एक दिवस राधा-कृष्णांच्या विरह-वेदनेने व्याकुळ होऊन बाबाजी मुर्च्छित पडले. आडरस्त्याच्या जागेत असल्याने कुणालाच त्यांच्याबद्दल काही कळलं नाही आणि ते अगदी रात्रभर तिथेच पडून राहिले. कर्मधर्म संयोगाने दुसर्‍या दिवशी सकाळी कुणा परिक्रमा करणार्‍या यात्रेकरूंच्या गटाला त्यांचा सुगावा लागला आणि त्यांनी बाबाजींना ओळखले. त्याच अवस्थेत उचलून त्या गटाने बाबाजींना राधा-मदनमोहन मंदिरात आणले. त्यांची अवस्था बघून मंदिराच्या सेवाईत गोस्वामींनी ताडले की बाबाजींना काही विशेष अनुभव आलेला आहे. त्यांनी तात्काळ बाबाजींच्या भोवती भजनी-मंडळाला पाचारण करून हरि-कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तनाचे सूर कानी पडू लागताच बाबाजींची शुद्ध परत आली. बाबाजी यथायोग्य शुद्धीवर आल्याबरोबर सेवेकरी गोस्वामीजी त्यांना घेऊन मंदिरात आतल्या बाजूच्या खोलीत गेले. तिथे त्यांच्या अणि बाबाजींच्या शिवाय आणखी कुणीच नव्हतं. अजूनही अश्रु विसर्जन करणार्‍या बाबाजींना गोस्वामीजींनी त्यांच्या इतक्या प्रदीर्घ मूर्च्छेबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी रडत रडत त्यांचा वृत्तांत कथन केला. बाबाजी म्हणाले, "नेहमी प्रमाणे काल स्नानादि प्रातर्विधी आटोपून मी पाण्याने भरलेलं एक वाडगं घेऊन मदनटेरवरच्या दाट झाडीत जाऊन बसलो. नित्याप्रमाणे लीला-स्मरण करत असताना तेव्हा मला युगल सरकारांचा विरह अधिकच जाणवू लागला आणि मी दु:खातिरेकाने तिथल्या मातीतच तळमळू लागलो. मला आतून आतून प्रचंड दु:खाचे कढ येत होते आणि अगदी सहन होईना तेव्हा मी हंबरडा फोडून रडू लागलो. नाही तरी त्या रानात माझं रडं कोणा माणसाला ऐकू जाणार होतं? आणि कुणाला त्याचा त्रास होणार होता? म्हणून पार निलाजरेपणाने मी युगलमूर्तीला आठवून आठवून लहान मुलासारखा रडत होतो. इतक्यात मला कुणाची तरी चाहूल लागली. कुणीतरी जवळपास उभं होतं. या ग्रीष्माच्या दिवसात हेमन्तातल्या सारखी थंड वार्‍याची झुळुक येत होती, जवळपास कुठेतरी शरदामध्ये फुलतो तसा सप्तपर्ण फुलल्यासारखं वाटायला लागलेलं, बहुदा त्याच्या फुलांचाच असावा असा वाटणारा गंध येऊ लागलेला. बाजूला ती दोघं आपापसात बोलत होती. एक मुलगा नि एक मुलगी." ती मुलगी त्या मुलाला म्हणाली, "अरे बघ ना हा बाबा किती रडतोय! जरा हसव की त्याला." मुलीने असं म्हणताच तो मुलगा माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, "बाबा, अरे का रडतोयस तू? तुला कुणी मारलं का? कुणी तुझं काही चोरून नेलंय का?" मी त्याला काय उत्तर देणार होतो? माझी वेदना त्याला काय सांगणार होतो? आधीच माझ्या दु:खाच्या उमाळ्यांनी मी अस्वस्थ होतो त्यात त्या मुलाचे प्रश्न ऐकून मला थोडं वैतागायलाच झालं. मी त्याला म्हणालो, "काही नाही, तुला समजायचं नाही. मुला! तू इथून जाच कसा?” त्यावर तो मला म्हणाला, "अरे बाबा, तुला काय हवंय, या उकाड्याच्या दिवसात इथे उन्हातान्हात बसलायस तर तुला थंड ताक आणून देऊ का? भाकरी आणून देऊ का? तुला काय हवंय ते सांग, आणून देतो पण तू असा रडू नकोस रे!" त्या मुलाचे प्रश्नावर प्रश्न ऐकून मला आणखीनच तिरसटायला झालं. मी तोंड फिरवून त्याला म्हणालो, "अरे गवळ्या! तुझा काय संबंध माझ्याशी? तू आपला तुझ्या गायी चारायला जा ना! सांगतोय मगापासून तुला काही कळणार नाही तरी का प्रश्न विचारून सतावतोयस?" मी असं म्हण्टल्यावर तो मुलगा त्या मुलीकडे जाऊन तिला म्हणाला, "बाबा तर काही ऐकतच नाहीये. रडतोच आहे, रडतोच आहे. काय करावं?” त्यावर ती मुलगी त्याला म्हणाली, "प्रियतम, तुला नाही जमायचं त्याला हसवणं! मीच बघ त्याला कशी हसवते ते." ती मुलगी माझ्याजवळ आली आणि आपल्या मंजुळ आवाजात मला म्हणाली, "बाबा, तू का रडतोयस? तुझी बायको मेली का रे?" मी विरह वेदनेने तळमळत असतानाही तिच्या त्या प्रश्नाने मला हसू आलं. मी तिला म्हणालो, "लाली, मला बायको वगैरे कुणीच नाही." त्यावर ती मला म्हणाली, "म्हणजे तू ज्याच्यासाठी रडतोयस ते तुझे कुणीच नाहीत तर!" मी उत्तरलो, "लाली, मी असाच कुणासाठी रडत नाहीये पण जे मला अगदी विसरून गेलेत त्यांच्यासाठी रडतोय." आमचं हे संभाषण चाललेलं तेव्हढ्यात तो मुलगाही त्या मुलीशेजारी येऊन थांबल्याचं मला जाणवलं. माझ्याजवळ बसून तिने विचारलं, "अरे, ते आहेत तरी कोण?" मी तिला म्हणालो, "तुला कळणार नाही, लाली! हा ब्रजचा छलिया, ज्याचं आयुष्यभर भजन करत करत मी आता म्हातारा झालोय, एक झलकही अजून दाखवली नाहिये त्याने! आणि तुला काय सांगू लाली, त्या बाँके-बिहारीच्या सान्निध्यात आमची राधाराणीही अगदी निष्ठूर बनून गेलीय." "मी? मी निष्ठूर बनलेय?" अचानक ती मुलगी म्हणाली, मग सावरून पुढे बोलली, "म्हणजे अरे बाबा, माझं नावही राधाराणीच आहे ना! पण मला सांग आता तुला काय हवंय?" "आता काय हवं असणार?," मी म्हणालो, "आता आयुष्याच्या सायंकाळी त्यांची एक झलक जरी बघायला मिळाली तरी खूप आहे." मी असं म्हणताच खुदकन हसून ती मला म्हणाली, "बाबा, अरे तू तर एकदम भोळाच आहेस रे, तुला डोळेच नाहीत तर तू बघणार कसा?" तिने असं म्हणताच मी बोललो, "लाली, भोळी तर तूच आहेस, जेव्हा राधाकृष्ण माझ्या जवळ येतील आणि आपल्या हाताने स्पर्श करतील तेव्हा माझ्या नेत्रज्योती तात्काळ परत नाही का येणार?" मी असं म्हणतोय तोच त्या मुलीने माझ्या एका डोळ्याला स्पर्श केला आणि दुसर्‍या डोळ्याला त्या मुलाने स्पर्श केला. त्या दोघांच्या स्पर्शाबरोबरच मला एक झगमगता प्रकाश दिसला. मला दिसायला लागलं होतं. माझ्यासमोर एका मुलाचे आणि मुलीचे चरणकमल होते. ते बघून समोर कोण आहेत हे बघण्यासाठी मी नजर उचलली तर मला माझ्यासमोर उभ्या असलेल्या राधाकृष्णांच दर्शन झालं. मी अगदी भावविह्वल झालो, तोंडातून शब्द फुटेना, हर्षातिरेकाने माझं उर भरून जातंय की काय असं वाटायल लागलं. युगलसरकारांच दर्शन होताच मी मोठमोठ्याने त्यांचा जयजयकार करू लागलो. आनंदाची भावना जणू माझं हृदय फोडून बाहेर पडू बघत होती. मी राधाकृष्णांना वंदन करण्यासाठी त्यांच्या चरणकमळाशी दण्डवत करतच होतो की आनंदातिशयाने मी तिथेच मूर्च्छित होऊन पडलो." मदनटेरवाल्या बाबाजींनी ज्याची कामना केलेली त्याची प्राप्तीही त्यांना झाली. पण तरीही त्यांचं रडणं काही थांबलं नाही तर अधिकच वाढलं. राधाकृष्णाच्या एकवेळच्या दर्शनाच्या सुखापेक्षा त्यांच्या त्यानंतरच्या अदर्शनाचं दु:ख त्यांना अधिक असह्य होत होतं. त्या दु:खातच बाबाजी आपला जडदेह सोडून सिद्धदेहाद्वारे राधाकृष्णांच्या परिकरगणांमध्ये सामिल झाले. युगल सरकार
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
9373 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

सुंदर..

किसन शिंदे
Fri, 12/23/2011 - 17:34 नवीन
ह्रदयस्पर्शी कथा!!
  • Log in or register to post comments

हरिकथाजी,

प्रास
Fri, 12/23/2011 - 18:25 नवीन
भाषा बरीच सुधारलीय की! दुर्बोधता नष्ट झालेली नाही पण कमी निश्चितच झाल्यासारखी वाटतेय. आवडलीय तुमची हरिकथा. :-)
  • Log in or register to post comments

या असल्या कथानी काय होणार? ही

विजुभाऊ
Fri, 12/23/2011 - 20:26 नवीन
या असल्या कथानी काय होणार? ही खरी घटना आहे की सांगोवांगी? या कथेतून नक्की काय बोध घ्यायचा?
  • Log in or register to post comments

या असल्या कथानी काय

हरिकथा
Fri, 12/23/2011 - 22:06 नवीन
या असल्या कथानी काय होणार?
हरिकथा श्रवण अथवा वाचन हा असल्या कथांचा हेतु आहे. हरिकथा चित्तशुद्धीकर आहे. ज्याची यावर श्रद्धा आहे त्याला चित्तशुद्धीचा फायदा होईल.
ही खरी घटना आहे की सांगोवांगी?
ही कथा ब्रजभक्तमाला या संतकथाकोशातली आहे.
या कथेतून नक्की काय बोध घ्यायचा?
हरिकथा वाचताना बोध ज्याचा त्याने घ्यायचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

+1

आत्मशून्य
Sun, 12/25/2011 - 11:15 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरिकथा

मस्त!

मधु कोळी
Fri, 12/23/2011 - 23:09 नवीन
ही कथा पण आवडली. :)
  • Log in or register to post comments

प्रचंड विचित्र (आणि भंपक)

सेरेपी
Fri, 12/23/2011 - 23:58 नवीन
प्रचंड विचित्र (आणि भंपक) कथा! राधा कृष्णाहून बरीच मोठी होती असं वाचल्याचं आठवतं... असो, आत्ता एवढंच.
  • Log in or register to post comments

सेरेपीजी, यात भंपक काय आहे

हरिकथा
Sat, 12/24/2011 - 00:05 नवीन
सेरेपीजी, यात भंपक काय आहे बरं?
राधा कृष्णाहून बरीच मोठी होती असं वाचल्याचं आठवतं
कुठे वाचलत? काही सांगाल? संदर्भ वगैरे? बरं मग काय?
असो
असो.
आत्ता एवढंच.
तेच बरं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सेरेपी

अहो राधा हेच पात्र मूळात

प्रचेतस
Sat, 12/24/2011 - 08:39 नवीन
अहो राधा हेच पात्र मूळात काल्पनिक आहे. महाभारत, भागवत, हरिवंश यात राधेचा कुठेही उल्लेख नाही. राधेचा पहिला उल्लेख १५ व्या शतकातल्या गीतगोविंद (चू.भू.दे.घे.) या रचनेत आढळतो. आणि त्यात राधा कृष्णापेक्षा मोठीच दाखवलीय. राधेचा पती अनय. पण ही दोन्ही पात्रे काल्पनिकच आहेत. कृष्णभक्तीसाठी निर्माण केलेली.
  • Log in or register to post comments

धर्माला अफुची गोळी

५० फक्त
Sat, 12/24/2011 - 09:03 नवीन
धर्माला अफुची गोळी म्हणतात,तोच प्रकार आहे हा. वर सेरेपी म्हणतात ते अगदी बरोबर आहे, अतिशय विचित्र आणि भंपकबाजी आहे ही. ही जी कोणी राधा कधी असेलच तर तिचा नवरा अनय आणि रामायणातल्या लक्ष्मणाचीबायको उर्मिला ही दोन पात्रं सर्वात जास्त अन्याय झालेली पात्रं आहेत आपल्या पोथ्या पुराणातली.
  • Log in or register to post comments

सहमत. काहीच्या काही आहे.

Pain
Sat, 12/24/2011 - 13:57 नवीन
सहमत. काहीच्या काही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

प्रतिक्रीया चुकीच्या मुद्द्यावर दिलेल्या दिसत आहेत.

चिंतामणी
Sat, 12/24/2011 - 09:19 नवीन
मुळ मुद्दा "श्रध्दा" आहे. राधा नव्हे.
  • Log in or register to post comments

राधा हे श्रद्धेचेच एक रूपक.

प्रचेतस
Sat, 12/24/2011 - 09:22 नवीन
राधा हे श्रद्धेचेच एक रूपक. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

मला एक सांग की

चिंतामणी
Sat, 12/24/2011 - 09:28 नवीन
राधा हे श्रद्धेचेच एक रूपक आहे म्हणजेच काल्पनिक आहे. बरोबर? (दोन्ही वाक्ये तुझीच आहेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो ना. राधा काल्पनिकच आहे.

प्रचेतस
Sat, 12/24/2011 - 09:37 नवीन
हो ना. राधा काल्पनिकच आहे. वरील एका प्रतिसादात मी हेच म्हटले आहे की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

वरील एका प्रतिसादात मी हेच म्हटले आहे की.

चिंतामणी
Sat, 12/24/2011 - 10:29 नवीन
मी ते माझ्या प्रतीसादात म्हणलेच आहे. त्या दोन्हीचा अर्थ एकच आहे असे माझे म्हणणे आहे. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ तुला समजला नाही असे वाटते. बहुधा माझ्याकडे तुला मुद्दा समजावण्याची पात्रता नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अर्थ समजलाच हो. मला मूळ धागाच

प्रचेतस
Sat, 12/24/2011 - 10:53 नवीन
अर्थ समजलाच हो. मला मूळ धागाच भंपक वाटला म्हणून हा प्रतिसादप्रपंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

मधुमेह !!

अर्धवटराव
Sat, 12/24/2011 - 12:44 नवीन
गोष्ट फार गोड आहे पण आम्हाला मधुमेह आहे... सिरियस प्रॉब्लेम... (मधुमेही) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

वल्ली, ५० फक्त आणि

हरिकथा
Sat, 12/24/2011 - 12:48 नवीन
वल्ली, ५० फक्त आणि चिंतामणी, तुमच्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे. चिंतामणीजी, तुम्ही म्हणताय तसं खरोखर मुद्याला सोडूनच प्रतिक्रिया दिसत आहेत. वल्ली, तुमची नेमकी अडचण काय आहे? राधा व्यक्ती आहे की रूपक आहे, रुपक आहे की काल्पनिक आहे, काल्पनिक आहे की कृष्णापेक्षा मोठी आहे? ५० फक्त, धर्म ही गोळी आहे पण अफूची नाही. किमान आपला धर्म ही एक जीवनपद्धती आहे. मला असं वाटतं, राधातत्त्व समजणं ही कठिण गोष्ट आहे कारण ते रहस्य सामान्य दृष्टिकोनातून समजण्यासारखं नाही. पण म्हणून आपण जे समजू शकतो तेच सत्य आणि आपल्याला जे पटतं तेच खरं असं मानण्याची काहीच गरज नाही. आपण मारे म्हणतो की आपला धर्म सहिष्णु आहे, सहनशील आहे. आपण दुसर्‍याच्या मताचा विरोध जरूर करतो पण कधी तिरस्कार करत नाही. पण वरच्या प्रतिक्रिया तसं दर्शवत नाही आहेत. राधातत्त्व हे कोडं आहे आणि सामान्य बुद्धिने या कोड्याचा उलगडा होऊ शकत नाही. श्रीकृष्ण स्वयं भगवान आहे आणि राधा त्याची ल्हादिनी शक्ती आहे, हा वरच्या गोष्टीतल्या मदनटेरवाल्या बाबाजींचा विश्वास होता आणि त्यावर त्यांची श्रद्धा होती. ही बाब सामान्य माणसाला समजण्यास कठिण आहे मग ती समजावी म्हणून सांगितलेल्या गोष्टींमधून आपण आपल्याला समजेल असा अर्थ काढतो आणि तो आपल्याला समजलेला अर्थच योग्य आणि खरा आहे असं गृहित धरून त्या गोष्टीलाच विचित्र आणि भंपक म्हणून मतप्रदर्शन करू लागतो हे आणखी मोठ्या असहिष्णुत्वाचं द्योतक आहे असं मला वाटतं. वरच्या हरिकथेचा विषयही राधातत्त्वाची चिकित्सा नसल्याने इथेच आवरतं घेतो. वरती एका प्रतिक्रियेत म्हंटल्याप्रमाणे 'चित्तशुद्धी' हा हरिकथेचा हेतु आहे आणि तो श्रद्धावान - अश्रद्धावान दोघांनाही मिळतो. आपण कोण होऊन तो मिळवायचा हे ज्यानी-त्यानी स्वतःचं ठरवावं.
  • Log in or register to post comments

राधा व्यक्ती आहे की रूपक आहे,

प्रचेतस
Sat, 12/24/2011 - 13:29 नवीन
राधा व्यक्ती आहे की रूपक आहे, रुपक आहे की काल्पनिक आहे, काल्पनिक आहे की कृष्णापेक्षा मोठी आहे?
प्रतिसाद वाचा त्यात दिलेलेच आहे सर्व. तरी तुम्हास समजले नसेल पुन्हा एकदा सांगतो. राधा हे पूर्णपणे काल्पनिक पात्र असून गीतगोविंद रचनेत कृष्णभक्तीचे एक रूपक म्हणून वापरले आहे. मूळ ग्रंथात त्याचा कुठेही उल्लेख नाही.
आपण दुसर्‍याच्या मताचा विरोध जरूर करतो पण कधी तिरस्कार करत नाही. पण वरच्या प्रतिक्रिया तसं दर्शवत नाही आहेत.
भंपकपणा हा शब्द तुम्हाला तिरस्कारयुक्त का वाटावा? समाजात अंधश्रद्धा पसरवणार्‍या गोष्टींना भंपकपणा म्हणू नये तर दुसरे काय?
तो आपल्याला समजलेला अर्थच योग्य आणि खरा आहे असं गृहित धरून त्या गोष्टीलाच विचित्र आणि भंपक म्हणून मतप्रदर्शन करू लागतो हे आणखी मोठ्या असहिष्णुत्वाचं द्योतक आहे असं मला वाटतं.
नाही. मुळात जो उल्लेख इतिहासात नाहीच आहे ते राधेचं काल्पनिक पात्र मध्ये घुसडून मूळ ऐतिहासिक पात्रांची मोडतोड होतेय असे वाटत नाही का? तुम्ही म्हणतात तसे राधातत्वही त्यात कुठे दिसत नाही त्यात. राधा म्हणजे मोक्ष लाभो (रा-लाभो, धा- मोक्ष . सं-युगंधर, पण त्यातही इतिहासाची थोडीबहुत मोडतोड केलेलीच आहे.) त्याविरुद्ध जरा काही बोलणे म्हणजे असहिष्णुत्वाचं द्योतक कसे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरिकथा

वल्लीजी, प्रतिसाद वाचा त्यात

हरिकथा
Sat, 12/24/2011 - 14:14 नवीन
वल्लीजी,
प्रतिसाद वाचा त्यात दिलेलेच आहे सर्व. तरी तुम्हास समजले नसेल पुन्हा एकदा सांगतो. राधा हे पूर्णपणे काल्पनिक पात्र असून गीतगोविंद रचनेत कृष्णभक्तीचे एक रूपक म्हणून वापरले आहे. मूळ ग्रंथात त्याचा कुठेही उल्लेख नाही.
खरं आहे, मी असं कधीच म्हणत नाही की मला सगळं समजलं आहे. तुम्ही पुन्हा सांगताय म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणताय की ती काल्पनिक आहे पण कृष्णापेक्षा मोठी आहे. तुम्ही कृष्ण होता हे तरी मानता ना? मग समजा राधा कल्पनिक असेल तर मग ती कृष्णापेक्षा मोठी की लहान याने काय फरक पडतो? राधा गीतगोविंदामध्ये कशाप्रकारे लिहिलीय त्यावरूनच आपण राधातत्त्वं ठरवावं असं कुणी मानायची आवश्यकता नाही. तुम्ही वाचलेल्या मूळ ग्रंथामध्ये राधेचा उल्लेख नाही म्हणून इतरांनी तेच का गृहित धरावं? आता तुम्ही मूळ ग्रंथाबद्दल म्हणतच आहात तर महाभारत, भागवत, हरिवंश यासारखाच गर्ग संहिता हादेखिल मूळ ग्रंथच आहे आणि गर्ग संहितेमध्ये राधेचा उल्लेख विस्ताराने आलेला आहे. आता तुम्ही मानता तेच मूळ ग्रंथ आणि त्याशिवाय इतर ग्रंथ मूळ नाहीत असं असेल तर प्रश्नच मिटला.
समाजात अंधश्रद्धा पसरवणार्‍या गोष्टींना भंपकपणा म्हणू नये तर दुसरे काय?
अंधश्रद्धा पसरवणार्‍या गोष्टींना जरूर भंपक माना, कोण अडवतंय? पण तुमची तीच श्रद्धा आणि आमची ती अंधश्रद्धाच असं मानूनच काही म्हणणार असाल तर त्या बोलण्याला तिरस्काराचाच वास येईल, हे नक्की!
मुळात जो उल्लेख इतिहासात नाहीच आहे ते राधेचं काल्पनिक पात्र मध्ये घुसडून मूळ ऐतिहासिक पात्रांची मोडतोड होतेय असे वाटत नाही का?
कोणत्या इतिहासाबद्दल म्हणताय वल्लीजी? जिथे अयोध्येतला रामजन्म निश्चित करण्यासाठी कोर्ट-कचेर्‍या कराव्या लागतात आणि ऐतिहासिक दस्तावेज दाखवावे लागतात तशा इतिहासाबद्दल बोलताय? पाच हजार वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींची नोंद नसेल तर त्या अस्तित्त्वात नव्हत्या असं मानणं म्हणजे इतिहास आहे का? इतिहासाचा अभ्यास करत असाल तर केवळ लेखी दस्तावेजांवर अवलंबून राहून चालत नाही हे जाणत असालंच. मौखिक परंपरांनाही ऐतिहासिक महत्त्वं असतं ना? ऐतिहासिक पात्रं आणि त्यामधिल काल्पनिक पात्राचं घुसवणं हे कशावरून? तर एखाद्या पात्राचा उल्लेख सापडत नाही म्हणून, असं म्हणणं म्हणजे वल्लीजी, तुमच्या खापर-खापर पणजोबांचा कुठेही लिखित उल्लेख आढळत नाही आणि त्यांना पाहिलेली कुणीही व्यक्ती नाही म्हणजे ते अस्तित्त्वातच नव्हते असं म्हणण्यासारखं आहे, नाही का?
(रा-लाभो, धा- मोक्ष . सं-युगंधर, पण त्यातही इतिहासाची थोडीबहुत मोडतोड केलेलीच आहे.)
हे बाकी तुमच्याकडून समजावून घ्यायला आवडेल. माझी अल्पमति यातलं काही जाणू शकत नाही आहे.
त्याविरुद्ध जरा काही बोलणे म्हणजे असहिष्णुत्वाचं द्योतक कसे काय?
विरोध हे असहिष्णुत्व नव्हेच पण तो व्यक्त करताना वापरलेल्या शब्दांमध्ये ठासून भरलेला तिरस्कार हे असहिष्णुत्वाचेच द्योतक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मग समजा राधा कल्पनिक असेल तर

प्रचेतस
Sat, 12/24/2011 - 16:19 नवीन
मग समजा राधा कल्पनिक असेल तर मग ती कृष्णापेक्षा मोठी की लहान याने काय फरक पडतो?
काहीच फरक पडत नाही. मी फक्त त्या गीत गोविंद मधल्या उल्लेखाबद्दलच बोलत होतो. मी कृष्ण मानतो पण एक व्यवहारकुशल चतुर राजनितीज्ञ म्हणून. अवतारी, चमत्कारी ही सगळी प्रक्षिप्त मिथके आहेत.
तुम्ही वाचलेल्या मूळ ग्रंथामध्ये राधेचा उल्लेख नाही म्हणून इतरांनी तेच का गृहित धरावं? आता तुम्ही मूळ ग्रंथाबद्दल म्हणतच आहात तर महाभारत, भागवत, हरिवंश यासारखाच गर्ग संहिता हादेखिल मूळ ग्रंथच आहे
मूळ ग्रंथ म्हणजे श्रीकृष्णाच्या चरित्राबद्दल जे अधिकृत मानले गेले आहेत ते ग्रंथ. उदा. महाभारत, भागवत, हरिवंश, ब्रह्मवैवर्त. तुम्ही ज्या गर्गसंहितेचा उल्लेख करत आहात ती अगदी अलीकडची. तिला मूळ ग्रंथ असे मानणे म्हणजे शिवाजी सावंतांच्या मृत्यंजयला कर्णाचे अधिकृत चरित्र मानण्यासारखेच. मूळ चरित्रे बाजूस ठेऊन तुम्ही चुकीचीच चरित्रे जर गृहित धरत असाल तर आमचा नाईलाज.
पण तुमची तीच श्रद्धा आणि आमची ती अंधश्रद्धाच असं मानूनच काही म्हणणार असाल तर त्या बोलण्याला तिरस्काराचाच वास येईल, हे नक्की!
तिरस्काराचा वास येत असल्यास ते आमचे आम्ही शब्द वापरण्यात चुकलो असे समजा.
पाच हजार वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींची नोंद नसेल तर त्या अस्तित्त्वात नव्हत्या असं मानणं म्हणजे इतिहास आहे का?
हो. लिखीत स्वरूपात का होईना पण पुरावा हवाच. राधेची परंपरा अलीकडचीच.
ऐतिहासिक पात्रं आणि त्यामधिल काल्पनिक पात्राचं घुसवणं हे कशावरून? तर एखाद्या पात्राचा उल्लेख सापडत नाही म्हणून
वरील उत्तरच पहा.
तुमच्या खापर-खापर पणजोबांचा कुठेही लिखित उल्लेख आढळत नाही आणि त्यांना पाहिलेली कुणीही व्यक्ती नाही म्हणजे ते अस्तित्त्वातच नव्हते असं म्हणण्यासारखं आहे, नाही का
वैयक्तिक प्रश्न. पण आमचे अस्तित्व हाच त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा का मानता येऊ नये?
हे बाकी तुमच्याकडून समजावून घ्यायला आवडेल
संस्कृतमध्ये माझी मातब्बरी नाही हो. राधा म्हणजे मोक्ष लाभो इतकाच अर्थ माझ्याही अल्पमतीला माहित आहे.
विरोध हे असहिष्णुत्व नव्हेच पण तो व्यक्त करताना वापरलेल्या शब्दांमध्ये ठासून भरलेला तिरस्कार हे असहिष्णुत्वाचेच द्योतक आहे.
पुन्हा तेच. तुम्हाला तो तिरस्कार वाटत असल्यास ते आमचे दुर्दैव असे समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरिकथा

वल्लीजी, मी कृष्ण मानतो पण एक

हरिकथा
Sat, 12/24/2011 - 18:11 नवीन
वल्लीजी,
मी कृष्ण मानतो पण एक व्यवहारकुशल चतुर राजनितीज्ञ म्हणून
हरकत नाही. भगवद् गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्ण म्हणतो की जो मला जसा बघतो त्याला मी तसा दिसतो.
अवतारी, चमत्कारी ही सगळी प्रक्षिप्त मिथके आहेत.
तुम्ही श्रीकृष्णाला अवतारी म्हणत नसाल तर तुम्हाला तो तसा वाटणार नाही पण जे त्याला तसा बघू इच्छितात त्याला तुम्ही का बरं प्रक्षिप्त आणि मिथक म्हणावं? श्रीकॄष्ण चमत्कारी होताच. त्याने त्याच्या आयुष्यात जे जे केलंय किंवा घडवून आणलंय तो एक चमत्कारच आहे. कुशलातला कुशल व्यवहारी, चतुर आणि राजनितीज्ञ हे करू शकेल असं म्हणताच येणार नाही. पुन्हा किमान दोन वेळेला दाखवलेलं विश्वरूपदर्शन चमत्कार नाही म्हणायचा का? की दुर्योधन म्हणतो तसा तो दृष्टिभ्रम मानायचा?
तुम्ही ज्या गर्गसंहितेचा उल्लेख करत आहात ती अगदी अलीकडची.
वल्लीजी, गर्ग संहितेचा काळ मोजणार्‍याने कोणते निकष वापरले आहेत? शेवटी आपल्याकडची लिखित साधनं तुटपुंजी आहेत आणि आपल्याकडील ग्रंथांचा काळ आपण कधीच मोजलेला नाही. अभारतीय व्यक्तींच्या चुकीच्या कालगणनेला पुस्तकात लिहिलंय म्हणून सत्य मानणं योग्य वाटत नाही. गर्ग संहिताच नव्हे तर आपल्याकडील अनेक ग्रंथ मौखिक परंपरेतून आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं गर्ग संहितेला शिवाजी सावंतांच्या कादंबरीची उपमा देता येणार नाही.
लिखीत स्वरूपात का होईना पण पुरावा हवाच.
'लिखित स्वरूपात का होईना' या ऐवजी तुम्हाला 'लिखित स्वरूपातच असलेला' असं म्हणायचं असल्यासारखं वाटतंय. तरीही ऐतिहासिकता मौखिक परंपरेतून मिळते असंच म्हणावं लागतं. अन्यथा मौखिक परंपरेतल्या ग्रीक कथांच्या संग्रहांना ऐतिहासिक मानण्यात आलेच नसते.
वैयक्तिक प्रश्न. पण आमचे अस्तित्व हाच त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा का मानता येऊ नये?
उदाहरणासाठी वापलेल्या वाक्यामधले तुम्ही हे 'वल्ली, तुम्ही' स्वतःच घेण्याची आवश्यकता नव्हती. मग वैयक्तिक काहीही वाटलं नसतं.
राधेची परंपरा अलीकडचीच.
पारंपारिक मौखिक पुरावा हे अमान्य करतो.
राधा म्हणजे मोक्ष लाभो इतकाच अर्थ माझ्याही अल्पमतीला माहित आहे.
हाच अर्थ तुमच्या मतिने आम्हालाही समजावून द्या ना!
तुम्हाला तो तिरस्कार वाटत असल्यास ते आमचे दुर्दैव असे समजा.
तुमच्या मनात तिरस्कार नसेल तर आम्हाला कशाचे दुर्दैव वाटावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पुन्हा किमान दोन वेळेला

प्रचेतस
Sat, 12/24/2011 - 22:19 नवीन
पुन्हा किमान दोन वेळेला दाखवलेलं विश्वरूपदर्शन चमत्कार नाही म्हणायचा का?
विश्वरूपदर्शनाचे दोन्ही उल्लेख हे प्रक्षिप्त आहेत. संपूर्ण महाभारत वाचल्यास मूळ 'जय' संहितेतील व्यासांची रसाळ भाषा व नंतर सौती व इतरजणांनी टाकलेल्या प्रक्षिप्त कथांची भाषा यांतील फरक सहजी ध्यानी येतो. (सौतीचा काळ इ.स.नंतरचा मानला जातो. बौद्ध धर्माच्या वेगवान प्रसाराला आळा घालण्यासाठी व हिंदू धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी राम, कृष्ण यांना देवतास्वरूप दिले गेले असे संशोधकांचे मत आहे)
आपल्याकडील ग्रंथांचा काळ आपण कधीच मोजलेला नाही.
ग्रंथांचा काळ मोजता येतो. शिलालेख, पुराणे, ग्रंथातील उल्लेख यावरून साधारणपणे ग्रंथांचा काळ काढता येतो. महाभारतातील मूळ 'जय' संहितेचा काळ इ.स.पू. ३५०० वर्षे मानला जातो. तर महाभारत हे प्रक्षिप्त कथांमुळे इ.स. २०० -३०० पर्यंत आणता येते. (शक, हूण, चीन, यवन हे उल्लेख त्या काळातले) गर्गसंहितेचा काळ तुम्ही सांगू शकाल काय? अभारतीय लोकांनी केलेली चुकीची कालगणना कोणती? उदाहरण देऊ शकाल?
अन्यथा मौखिक परंपरेतल्या ग्रीक कथांच्या संग्रहांना ऐतिहासिक मानण्यात आलेच नसते.
ग्रीक कथांना ऐतिहासिक कोण मानते? त्यांना आजही ग्रीक मिथके अथवा ग्रीक मिथोलॉजी असेच समजले जाते.
पारंपारिक मौखिक पुरावा हे अमान्य करतो.
जयदेव कवीने केलेले गीतगोविंद जनमानसात अतिशय लोकप्रिय झाल्यामुळेच राधेचे उल्लेख मौखिक परंपरेत आले.
हाच अर्थ तुमच्या मतिने आम्हालाही समजावून द्या ना!
तेच आतापर्यंत तुम्हाला समजवत आलो आहोत पण तुमच्यावर मौखिक परंपरेचा पगडा घट्ट असल्याने नीटपणे समजावून देऊ शकलो नाही.
तुमच्या मनात तिरस्कार नसेल तर आम्हाला कशाचे दुर्दैव वाटावे?
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरिकथा

वल्ली, ५० फक्त आणि

५० फक्त
Sun, 12/25/2011 - 09:19 नवीन
वल्ली, ५० फक्त आणि चिंतामणी, तुमच्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे. चिंतामणीजी, तुम्ही म्हणताय तसं खरोखर मुद्याला सोडूनच प्रतिक्रिया दिसत आहेत. वल्ली, तुमची नेमकी अडचण काय आहे? राधा व्यक्ती आहे की रूपक आहे, रुपक आहे की काल्पनिक आहे, काल्पनिक आहे की कृष्णापेक्षा मोठी आहे? ५० फक्त, धर्म ही गोळी आहे पण अफूची नाही. किमान आपला धर्म ही एक जीवनपद्धती आहे. - अफुची नसेल तर अ‍ॅस्पिरिनची आहे का लिमलेटची आहे हे सांगु शकाल काय ? मला असं वाटतं, राधातत्त्व समजणं ही कठिण गोष्ट आहे कारण ते रहस्य सामान्य दृष्टिकोनातून समजण्यासारखं नाही. पण म्हणून आपण जे समजू शकतो तेच सत्य आणि आपल्याला जे पटतं तेच खरं असं मानण्याची काहीच गरज नाही. - पण याचा अर्थ जे आपण समजु शकतो तो असत्य अन जे आपल्याला पटतं ते खोटं मानायची देखील काहीच गरज नाही, उलत जे आपण समजु शकतो तेच सत्य अन जे पटतं तेच खरं मानलं तर आयुष्य किती सोपं होतं नाही का ? राधातत्व म्हणजे काय हे संदर्भासहित स्पष्ट करु शकाल काय ? आपण मारे म्हणतो की आपला धर्म सहिष्णु आहे, सहनशील आहे. आपण दुसर्‍याच्या मताचा विरोध जरूर करतो पण कधी तिरस्कार करत नाही. पण वरच्या प्रतिक्रिया तसं दर्शवत नाही आहेत. - धर्म सहिष्णु असण्याचा अन दुस-याचा मताचा तिरस्कार किंवा विरोध न करण्याचा संबंधच येत नाही, काही इतर धर्मिय, प्रामुख्यानं मुस्लिम कट्टर मतांच्या, तितक्याच कट्टर अन कणखर तिरस्कारापायी अन विरोधापायी लाखो करोडो हिंदुनी हौतात्म्य पत्करलं आहे इथं, राधातत्त्व हे कोडं आहे आणि सामान्य बुद्धिने या कोड्याचा उलगडा होऊ शकत नाही. - इथं मिपावर भले भले लोकं आहेत, इथं एकदा ते कोडं टंकुन बघा, किमान१०-१२ उत्तरं तरी मिळतील. (संदर्भ - श्री. सोकाजी यांचा खांब आणि माराचा धागा) श्रीकृष्ण स्वयं भगवान आहे आणि राधा त्याची ल्हादिनी शक्ती आहे, - ल्हादिनी या शब्दाचा अर्थ काय सांगाल काय ? हा वरच्या गोष्टीतल्या मदनटेरवाल्या बाबाजींचा विश्वास होता आणि त्यावर त्यांची श्रद्धा होती. ही बाब सामान्य माणसाला समजण्यास कठिण आहे मग ती समजावी म्हणून सांगितलेल्या गोष्टींमधून आपण आपल्याला समजेल असा अर्थ काढतो आणि तो आपल्याला समजलेला अर्थच योग्य आणि खरा आहे असं गृहित धरून त्या गोष्टीलाच विचित्र आणि भंपक म्हणून मतप्रदर्शन करू लागतो हे आणखी मोठ्या असहिष्णुत्वाचं द्योतक आहे असं मला वाटतं. वरच्या हरिकथेचा विषयही राधातत्त्वाची चिकित्सा नसल्याने इथेच आवरतं घेतो.- म्हणजे वरच्या हरिकथेचा विषय -श्रीकृष्ण स्वयं भगवान आहे आणि राधा त्याची ल्हादिनी शक्ती आहे यावर मदनटेर वाल्या बाबाजींचा विश्वास असणं असा आहे काय ? वरती एका प्रतिक्रियेत म्हंटल्याप्रमाणे 'चित्तशुद्धी' हा हरिकथेचा हेतु आहे आणि तो श्रद्धावान - अश्रद्धावान दोघांनाही मिळतो. आपण कोण होऊन तो मिळवायचा हे ज्यानी-त्यानी स्वतःचं ठरवावं. - याबद्दल अधिक सांगु शकाल काय, बाकी धन्यवादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मलाही ही कथा जरा अनाकलनीय

मनीषा
Sat, 12/24/2011 - 14:13 नवीन
मलाही ही कथा जरा अनाकलनीय वाटली . तुम्ही जे राधा तत्व म्हणता म्हणजे भक्ती - ती नक्की काय आहे याचा उलगडा होत नाही या कथेत. नुसते दर्शनासाठी अश्रुपात करीत राहणे म्हणजे भक्ती का ? तुम्ही म्हणता धर्म ही जीवन पद्धती आहे... ही जीवनपद्धती कळली नाही . तसेच दर्शन घडले तेव्हा काय झाले .. काय अनुभूती आल्या.. त्यांच्या अयुष्यात त्या मुळे काय फरक पडला हे ही ना त्या बाबाजींना स्पष्ट करता आले , ना कथालेखकाला. बाबाजींनी ज्याची कामना केली ते त्यांना मिळाले तरीही त्यांचे दु:ख कमी झाले नाही . आपल्या धर्मात तर सांगतात श्रद्धा आणि भक्ती असेल तर सारी दु:खे दूर होतात . मग हा विरोधाभास वाटत नाही का? पुराणकथा ही फक्त कथा म्हणून वाचली तर ठीक .. पण त्यात धर्म, जीवनपद्धती वगैरे आणले तर संगती लागत नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

मनीषाताई, राधातत्त्व समजावं

हरिकथा
Sat, 12/24/2011 - 14:44 नवीन
मनीषाताई, राधातत्त्व समजावं हा या कथेचा हेतुच नाही हे मी वरही सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे वरच्याच एका प्रतिसादात मी म्हण्टलं आहे की या मदनटेरवाल्या बाबांची अशी श्रद्धा होती की श्रीकृष्ण स्वयं भगवान आहे आणि श्रीराधा ही त्याची ल्हादिनी (आनंददायिनी) शक्ती आहे. खरं तर राधातत्त्व काय आहे हे मी योग्य समजावू शकणार नाही कारण तितकी माझी पात्रता नाही पण या हरिकथेला समजावण्याचा थोडासा प्रयत्न करतो. तुम्हीही समजून घेण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. मदनटेरवाले बाबाजी हे श्रीकृष्णभक्त आहेत आणि त्यांना त्याच्या दर्शनाची आस लागलेली आहे. त्यांनी वृन्दावनवास पत्करलेला आहे आणि श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी ते नामस्मरण आणि लीलास्मरण या तपमार्गाचा अवलंब करत आलेले आहेत. श्रीकृष्णाचं दर्शन हा त्यांच्यामते संसारतापातून मुक्तीचा मार्ग आहे. त्यासाठी त्यांनी ही ठराविक प्रकारची जीवनपद्धती अंगिकारली आहे. हरिदर्शनाविना त्यांना जे दु:ख होतंय ते त्यांच्या अश्रु ढाळण्यातून व्यक्त होतंय. अनेक वर्ष याप्रकारे तप केल्यावरही श्रीकृष्णदर्शन न झाल्याने ते आता व्यथित झाले आहेत. श्रीराधा ही श्रीकृष्णाची ल्हादिनी शक्ती आहे. शक्तिवानाची कृपा हवी असेल तर शक्तीला प्रसन्न केल्याने ती लवकर प्राप्त होते हा भाव असल्याने जेव्हा श्रीराधेला बाबाजी म्हणतात की तीदेखिल श्रीकृष्णाच्या सान्निध्यात कठोर झाली आहे तेव्हा ते तिला सहन होत नाही कारण ग्रंथांमध्ये श्रीकृष्णापेक्षा श्रीराधा हरिभक्तांबद्दल अधिक दयाळू आहे असं सांगितलेलं आहे. या कथेत आधीही राधा कृष्णाला म्हणते की या बाबाचं दु:ख तीच दूर करेल म्हणून. बाबाजींचं दु:ख जेव्हा स्वतः श्रीकृष्ण दूर करू शकत नाही तेव्हा त्यांच्याशी बोलता बोलता राधा ते काम करून टाकते. एकदा सुख मिळाल्यानंतर ते सुख पुन्हा पुन्हा मिळावे ही माणसाची मागणी असतेच म्हणूनच एका दर्शनानंतर बाबाजी जास्त दु:खी झाले. वृन्दावनामध्ये अशी श्रद्धा आहे की प्रत्येक व्यक्तीचं मूळात श्रीकृष्णाच्या परिकरगणांमध्ये एक स्थान असतं आणि जेव्हा भक्तांना असा हरिदर्शनाचा लाभ होतो तेव्हा त्यांच्या त्या स्थानाचं त्यांना ज्ञान होतं आणि ते स्थान ग्रहण करण्यासाठी या जगातून 'एक्झिट' घ्यावी लागते. मदनटेरवाल्या बाबांचंही असंच झालं आणि ते या दर्शनानंतर लगेच श्रीकृष्णाच्या धामात त्याचे परिकर म्हणून रुजू झाले, असं आपल्याला म्हणता येतं. प्रत्येक जीवाची हे स्थान ओळखण्याची गरज लक्षात आली तर या कथेमधला धर्म आणि जीवनपद्धतीचा भाग समजून येईल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

>एकदा सुख मिळाल्यानंतर ते सुख

मनीषा
Mon, 12/26/2011 - 11:24 नवीन
>एकदा सुख मिळाल्यानंतर ते सुख पुन्हा पुन्हा मिळावे ही माणसाची मागणी असतेच ही आमच्यासारख्या सर्वसामान्यांना लागू होणारी गोष्ट, पण श्रध्दा आणि भक्ती मार्गाने जाणारी लोकं वेगळी असतात असे वाटले होते. ज्या श्रीकृष्ण भक्तीची ही कथा आहे .. त्यानेच "... मा फलेषु कदाचन" असे सांगीतले आहे . त्यामुळे बाबाजींच्या अतिव दु:खाचे प्रयोजन कळत नाही. असो, पण शेवटी ही कथा आहे.. त्यामुळे त्यातून काही अर्थ समजावा अथवा त्यात काही अर्थ असावा - हे जरूरी नाही. हरीकथा चांगली आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरिकथा

बाबौ काये हे पळा आता

मितभाषी
Sat, 12/24/2011 - 14:38 नवीन
बाबौ काये हे पळा आता
  • Log in or register to post comments

छान कथा.

सुप्रिया
Sat, 12/24/2011 - 16:06 नवीन
नविनच् ऐकली ही कथा. अजूनही येवून देत.
  • Log in or register to post comments

हम्म.....

दादा कोंडके
Sat, 12/24/2011 - 16:11 नवीन
१. खरंतर अश्या गोग्गोड कथा गंम्मत म्हणून वाचून सोडून द्यायच्या असतात. २. ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग. आवडली नाही तर सोडून द्या. प्रतिसाद न देण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक वाचकाला आहेच की. ३. पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या अशा कथा फक्त एक ऐतिहासीक दस्तावेज म्हणून बघणं आणि जतन करणं आवश्यक आहे. ४. काही गोष्टीत कलात्मक मूल्य पण असतात, त्याचा आस्वाद घायचा. रागाच्या बंदिशीतसुद्धा शाम, गोपी वगैरे असतात, म्हणून त्याचं सांगितीक मुल्य कमी होत नाही . ...त्यामुळे लगेच तर्ककर्कश्य प्रतिक्रिया द्यायला नकोत. हे सगळं ठिक आहे. पण च्यामारी ह्या असल्या कथांमुळेच हिंदू धर्मात "कचरा" जमा झालाय. पुढच्या पिढ्या आपल्यापेक्षा स्मार्ट आहेत. त्या प्रत्येक गोष्ट घासून तपासून बघितल्या शिवाय स्विकारणारच नाहीत. पात्र वगैरे काल्पनिक असतीलही पण त्यात काहितरी चांगला बोध (मोरल) तरी असावा. वरच्या कथेमधून काय बोध घ्यायचा? त्यापेक्षा ईसापनितीतल्या गोष्टी बर्‍या. वेळीच विवेकबुद्धीनं काही चांगलं पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवावं असं तुम्हाला वाटत नाही का हरिकथाजी?
  • Log in or register to post comments

दादासाहेब, वरच्या कथेमधून काय

हरिकथा
Sat, 12/24/2011 - 18:15 नवीन
दादासाहेब,
वरच्या कथेमधून काय बोध घ्यायचा?
वरती मनिषाताईंना दिलेला प्रतिसाद नीट वाचलात तर काही बोध होईल असं वाटतं.
वेळीच विवेकबुद्धीनं काही चांगलं पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवावं असं तुम्हाला वाटत नाही का हरिकथाजी?
असंच वाटतंय, म्हणूनच हा हरिकथाप्रपंच....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

दादा कोंडके
Sat, 12/24/2011 - 19:15 नवीन
तुमचा वरचा प्रतिसाद दोनदा वाचला पण तरीही ओ की ठो कळालं नाही. म्हणजे शब्दांचे अर्थ कळाले पण वाक्याचा अर्थच लागला नाही. हे असलं कळण्यासाठी काही प्रिरिक्विझाईट आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरिकथा

दादा,

प्रास
Sat, 12/24/2011 - 19:22 नवीन
प्रयत्न करत राहा. कधीतरी कळेलच! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

व्याख्या

विनायक प्रभू
Sat, 12/24/2011 - 17:57 नवीन
म्हटले तर लेखक लेखात आणि प्रतिसादात म्हणतो ते. नाहीतर आजच्या व्याख्येत इन्सेस्ट.
  • Log in or register to post comments

विनायक प्रभू साहेब, म्हटले तर

हरिकथा
Sat, 12/24/2011 - 18:17 नवीन
विनायक प्रभू साहेब,
म्हटले तर लेखक लेखात आणि प्रतिसादात म्हणतो ते. नाहीतर आजच्या व्याख्येत इन्सेस्ट.
तुमची प्रतिक्रिया काही समजली नाही बुवा! जरा स्पष्ट करून सांगा बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

स्पेलिंग

विनायक प्रभू
Sat, 12/24/2011 - 18:43 नवीन
प्र्काटाआ.
  • Log in or register to post comments

आय एन सी इ एस टी गुगुलुन

हरिकथा
Sat, 12/24/2011 - 18:45 नवीन
आय एन सी इ एस टी गुगुलुन बघा.
विनायकजी शब्दार्थ आम्हालाही कळतो. त्यासाठी गुगुलुन बघायचे कष्ट घ्यायची आवश्यकता नाही. तुमच्या या इथे शब्दाचा तुम्ही दिलेल्या प्रतिसादाशी असलेला संबंध तुम्हीच सांगावा. तो गुगुलुन आम्ही का काढावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

प्रतिसाद

विनायक प्रभू
Sat, 12/24/2011 - 18:51 नवीन
दोन्ही प्रतिसाद मागे. (पहीला प्रकाटाआ का होत नाही बरे)? तुम्ही म्हणताय ते सर्व काही अगदी बरोब्बर आहे. आम्हा क्षुद्र किटकांना नाही समजायचे ते.(अगदी मनापासुन बर का?)
  • Log in or register to post comments

विनायकजी, तुम्ही म्हणताय ते

हरिकथा
Sat, 12/24/2011 - 19:03 नवीन
विनायकजी,
तुम्ही म्हणताय ते सर्व काही अगदी बरोब्बर आहे.
असा माझा आग्रह नाही.
आम्हा क्षुद्र किटकांना नाही समजायचे ते.
हे क्षुद्र किटक वगैरे शब्द मी कुणासाठीही वापरलेले नाहीत आणि वापरणारही नाही. विचार करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

चित्तशुद्धी

आळश्यांचा राजा
Sat, 12/24/2011 - 21:38 नवीन
मुद्द्याला धरुन सांगितलेली गोष्ट. आवडली. चित्तशुद्धी हा मुद्दा, उद्देश असल्यामुळे ऐतिहासिकता, कृष्णाचे चरित्र, राधा या संज्ञेचा अर्थ, राधा व्यक्ती असलीच तर तिचे कृष्णाशी असलेले नाते, वय इत्यादि बाबी गैरलागू आहेत.
  • Log in or register to post comments

चालू द्या हरिकथा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/24/2011 - 22:15 नवीन
''एकदा सुख मिळाल्यानंतर ते सुख पुन्हा पुन्हा मिळावे ही माणसाची मागणी असतेच'' या उद्देशापोटी लिहिलेली कथा उत्सुकतेने वाचली आणि विविध वाहिन्यांवरील बुवांच्या कथा-कथनाची आठवण झाली. बाकी, आपण ज्या संयमाने प्रतिसादांना उपप्रतिसाद लिहित आहात ते मला विशेष आवडले. आमच्या एका अवलिया नावाच्या मित्राला अशा कथा बिथांचा लै नाद, त्यांचीही आठवण झाली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

एक राधा नक्कीच होती. मी

गणपा
Sun, 12/25/2011 - 10:54 नवीन
एक राधा नक्कीच होती. मी पाहिली होती दुरदर्शन वर. यांची ही कृष्णभक्ती बरीच गाजली होती. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

च्यामारी या प्रकारालाच

यकु
Sun, 12/25/2011 - 15:11 नवीन
च्यामारी या प्रकारालाच राधातत्त्व म्हणतात काय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

बोध नीट घेतला नाही की हे असे

कवितानागेश
Sun, 12/25/2011 - 16:36 नवीन
बोध नीट घेतला नाही की हे असे होउन बसते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

बोध घ्यायचाच कशाला? खड्ड्यात

यकु
Sun, 12/25/2011 - 23:54 नवीन
बोध घ्यायचाच कशाला? खड्ड्यात जावो तो बोध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कै च्या कै च

मन१
Mon, 12/26/2011 - 09:28 नवीन
कै च्या कै च नका ना बोलू राव. एखाद्या भाषेत पैशाला किंवा चेकला बोध म्हणत असतील तर आपण तर बुवा अवश्य "बोध" घेतला असता. बाळबोध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

लै येडपट माणूस होता हा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/25/2011 - 21:11 नवीन
च्यायला, या गंपाला काय आठवेल काय सांगता येत नाही. मी हे राधातत्त्व लै आवडीने पाहात असायचो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

All those people who listened the song from Lagan

आत्मशून्य
Sun, 12/25/2011 - 11:28 नवीन
"Kis liye Radha jale" know this song is the best proof of existence of Radha, history has ever gives us. If you have any problem with the song go and drag Ashutosh Gowarikar to the court. Whats point in creating trouble here ?
  • Log in or register to post comments

हरिकथा श्रवण अथवा वाचन हा

विजुभाऊ
Mon, 12/26/2011 - 10:11 नवीन
हरिकथा श्रवण अथवा वाचन हा असल्या कथांचा हेतु आहे. हरिकथा चित्तशुद्धीकर आहे. ज्याची यावर श्रद्धा आहे त्याला चित्तशुद्धीचा फायदा होईल. चित्तशुध्दी म्हणजे नक्की कय. ज्याच्या चित्तात द्वेश वगैरे नसेल त्याचे चित्त शुद्ध असते असे मी लहानपणी शिकलो होतो. हरीकथा हा केवळ वेळ घालवायचे एक साधन आहे. तुमच्या श्रद्धेवर घाल घालतोय असे नाही पण वहीत श्रीरामजयराम जयजयराम लिहुण उगाचच्या उगाच वह्या भरणारी माणसे पाहिली की वेडगळ हा एकमेव शब्द आठवतो. त्यातून काहीच होत नाही. वह्या भरतात आणि पेनाच्या रीफीली संपतात. एवढेच.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा