✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

१९७१ चे युद्ध - पाकवरील विजयाचा ४० वा स्मृतिदिन

स
सर्वसाक्षी यांनी
Fri, 12/16/2011 - 22:32  ·  लेख
लेख
आज १६ डिसेंब्रर २०११. आज १९७१ च्या पाकिस्तान युद्धातील भारतिय विजयाला चार दशके झाली. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाक सरकारने युद्धाला सुरुवात केली. पाकी हवाईदलाच्या विमानांनी आपल्या ११ हवाई तळांवर आणि रडार केंद्रांवर हल्ले चढविले आणि पाठोपाठ भारताला युद्ध घोषीत करावे लागले आणि या युद्धाला सुरुवात झाली. १३ दिवस चाललेल्या युद्धात पाकला नामुष्की पत्करावी लागली, बांगला देश हे नवे राष्ट्र जन्माला आले. मोठ्या वल्गना करणार्‍या कुरापती पाकला अवघ्या १३ दिवसात दाती तृण धरुन शरण यावे लागले. ले. ज. ए.ए.के. नियाझी यांनी ढाका येथे १६ डिसॅंबर रोजी शरणागती पत्करली, ९०,००० पाक सैन्य शरण आले. या युद्धात पाकतर्फे भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेचे सातवे आरमार आले होते. एंटरप्राईज या युद्धनौकेचा मोठा गाजावाजा झाला होता मात्र इंदिराजींच्या मुत्सद्देगिरीमुळे त्या आरमाराला हात चोळीत जावे लागले. सॅम माणेकशा, 'स्पॅरो' जगजीतसिंग अरोरा, अ‍ॅडमिरल नंदा आणि एअर चीफ मार्शल पी सी लाल यांच्या अधिपत्याखाली भारतिय सेनांनी पराक्रम गाजविला आणि अवघ्या तेरा दिवसात पाकचा निकाल लावला. या युद्धात अनेक भारतिय सैनिकांना व सेनाधिकार्‍यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या युद्धातील असामान्य पराक्रमासाठी मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल (मरणोत्तर), लान्स नाईक अल्बर्ट एक्का (मरणोत्तर) व फ्लाईंग ऑफिसर निर्मजित सिंग सेखों (मरणोत्तर) यांना परवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. पैकी अरुण खेत्रपाल केवळ २१ वर्षांचा व अवघ्या सहा महिन्यंपूर्वी सैन्यात अधिकारी म्हणुन दाखल झाला होता. बसंतरच्या निकराच्या युद्धात प्राणांची पर्वा न करता लढताना युद्धाच्या अखेरच्या दिवशी त्याला हौतात्म्य प्राप्त झाले. त्याची आई आज ८९ वर्षांची आहे, तिच्या डोळ्यातले अश्रू आजही खळत नव्हते. मेजर होशियारसिंग यांचा मुलगा सैन्यात ले. कर्नलच्या हुद्द्यावर आहे. आय बी एन लोकमतवरील कार्यक्रमात त्यांना व या युद्धात पराक्रम गाजविलेल्या अनेक अधिकार्‍यांना पाहायची संधी मिळाली. युद्ध झाले तेव्हा मी लहान होतो. मात्र या युद्धाच्या अनेक आठवणी आहेत. रोज रेडीओवरच्या बातम्या, सकाळी बाबा वर्तमानपत्र वाचत असताना डोके घालुन घालुन बातम्या व फोटो पाहायची उत्सुकता, शाळेत एकमेकांशी युद्धाच्याच गप्पा आणि 'आपणच जिंकणार' असा एकमेकांना दिलेला दिलासा, संध्याकाळची काळोखी - युद्धकाळात मुद्दाम केलेला अंधार, मोटारींनाही महामार्गांवर दिवे न लावण्याच्या सूचना, मुंबईवर हवाई हल्ल्याच्या अफवा आणि आकाशात उडालेले लाल दिवे, युद्ध जिंकल्यावर शाळेत सर्वांनी केलेला जयघोष, मग अनेक दिवस रेडीओवर येणार्‍या भारतिय सैनिकांच्या पराक्रमाच्या हकिगती... काही काळातच '१९७१ चे अभिमन्य' या नावाचे एक पुस्तक वाचनात आले होते. लेखक/ लेखिका आठवत नाही मात्र मेजर रमेश दडकर, कॅप्टन प्रकाश पेठे, फ्लाईट लेफ्टनंट भडभडे अशा अनेकांच्या पराक्रमाच्या कथा त्यात होत्या. रविवारी रेडीओवर लागणार्‍या 'गंमत जंमत'कार्यक्रमात ऐकलेली आय एन एस कुकरी या विनाशिकेचे अधिपत्य करणार्‍या व पाकिस्तानी पाणबुडीने केलेल्या हल्ल्यात बुडालेल्या 'कुकरी' बरोबर जलसमाधी घेणार्‍या कॅप्टन महिंद्रनाथ मुल्लांची कथा चटका लावुन गेली होती. आज चाळीसाव्या स्मृतिदिनी १९७१ च्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
12046 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

ले. ज. ए.ए.के. नियाझी यांनी शरणागती पत्करली,

रामदास
Fri, 12/16/2011 - 23:02 नवीन
ह्या शरणागतीचा फोटो आजही डोळ्यासमोर ताजा आहे. अमेरिकेचे सातवे आरमार आले होते. अमेरीकेला कायम स्वरुपाचा तळ टाकण्याची संधी मिळू नये यासाठी इंदीराजींची मुत्सद्देगीरी कामास आली असे वाचल्याचे आठवते. १९७१ च्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन
  • Log in or register to post comments

त्या सुमारास माझा जन्मही झाला

गणपा
Fri, 12/16/2011 - 23:13 नवीन
त्या सुमारास माझा जन्मही झाला नव्हता. सॅम माणेकशा, 'स्पॅरो' जगजीतसिंग अरोरा, अ‍ॅडमिरल नंदा आणि एअर चीफ मार्शल पी सी लाल ही नावंही कळली ती जालावरुनच. ज्येष्ठ मिपाकरांकडुन या बद्दल अजुन वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

....१९७१ चे युद्ध - पाकवरील विजयाचा ४० वा स्मृतिदिन..!!!!

विनोद१८
Fri, 12/16/2011 - 23:29 नवीन
१९७१ च्या युध्धातील विजयाच्या शिल्पकाराना प्रणाम. सर्वसाक्षी तुमच्या ह्या धाग्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.. ते दिवस मलाही आठवतात. तो युध्धाचा काळ भारावलेला असाच होता. एक विचार मनात येतो 'आम्ही युध्ध जिन्कलो व तहात हरलो ' यावर कोणी अधिक प्रकाश टाकू शकेल काय ??? ...जय हिन्द... विनोद१८
  • Log in or register to post comments

अभिवादन!

विकास
Sat, 12/17/2011 - 00:19 नवीन
१९७१ च्या भारतीय वीरांना अभिवादन! आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! या निमित्ताने इंदिराजींची बीबीसीवरील खालील मुलाखत पाहीली नसेल तर अवश्य पहा...
  • Log in or register to post comments

छान लेख. माझी भर/दुरुस्त्या.

मन१
Sat, 12/17/2011 - 01:28 नवीन
भारत जिंकला, महत्वाचा दिवस आहे, हे खरेच. पण ३ डिसेंबर १९७१ रोजी पाक सरकारने युद्धाला सुरुवात केली. पाकी हवाईदलाच्या विमानांनी आपल्या ११ हवाई तळांवर आणि रडार केंद्रांवर हल्ले चढविले आणि पाठोपाठ भारताला युद्ध घोषीत करावे लागले आणि या युद्धाला सुरुवात झाली. हे मान्य नाही. भारतात तेव्हा केवळ भारत सरकारच्या वतीने बातम्या प्रसारित करण्यात येत व त्यात साहजिकच वर आपण म्हणता तशी बातमी दिली गेली/पसरवली गेली. वस्तुस्थिती ही की ३ डिसेंबरच्या आधीच भारताने स्वतःच हल्ला केला होता.किंवा असा हल्ला करण्यास पाकिस्तानने आपल्याला भाग पाडले होते. ह्याबद्दल एक रोचक किस्सा इकॉनॉमिक टाइम्स चे माजी संपादक व तेव्हा सामान्य पत्रकार असणारे एम एस स्वामिनाथन ऐय्यर ह्यांनी आठवणीतून नमूद केला आहे. त्यांना विदेशी सूत्रातून व बी बी सी वरून भारताने हल्ला केला आहे हे स्पष्टपणे माहित असूनही तशी बातमी छापण्यास मनाइ करण्यात आली! व पाक ने ३ डिसेंबला हल्ला केल्यावर आपण फक्त त्याला उत्तर म्हणून युद्धात उतरलो आहोत असे दाखवले. अर्थात राजनैतिक दृष्ट्या,कूटनितिक दृष्ट्या हे तेव्हा बरोबर असेलही पण भारताच्या proactiveness आजतरी आपण उघड उल्लेख व गौरव केला पाहिजे. १९७१ चे यश हे लश्करी यश आहेच. पण अगदि त्यालाच अनुरूप असे तेव्हाचे कूटनितीक्,राजकिय कार्यही आहेदिसणारीहे वर्श म्हणजे तोफेतून गोळा फुटून आवाज व्हावा तसे झाले. प्रत्यक्षात तोफेत दारूगोळा मागील कित्येक वर्षे निय्मितपणे बह्रला जात होताच. कधी क्रूर्,बिन्डोक,सत्तापिपासू व भेदरट (हो एकाचवेळी हे सर्व असणारे) पाकिस्तानी शासक तर कधी साळसूदपणाचा आव आणून भारताने केलेल्या उचापत्या ह्या सर्वांनीच १९७१ ची स्थिती आणून ठेवली. झाले काय, की बंगाल(त्यातही पूर्व बंगाल) हा मुळात अतिदाट व प्रचंड लोक्वस्तीचा प्रदेश. आपल्या युपी -बिहार पेक्षाही दाट असणारा. म्हणजेच फाळणीनंतर साहजिकच सर्वात मोठ्या भाषिक गटाचा दावेदार. पण ह्यांचे स्थान नाकारले जाउ लागले. पाकिस्तानमधील पंजाब्यांचा व त्यांनी स्वीकार केलेल्या उर्दुचा प्रभाव सरकारात वाढू लागला. बंगल्यांची उपेक्षा होउ लागली. पूर्व बंगालमध्ये सरकारी नोकर्‍याही ह्या भ्रष्ट सरकारच्या पश्चिम पाकिस्तानातील लोकांनाच दिल्या जाउ लागल्या. बंगाली माणूस हिंदू असो वा मुस्लिम, हा कट्टर भाषाप्रेमी,भाषाभिमानी,भावनिक. (स्वातंत्र्यापूर्वी एकवेळ तर अशी आली होती की कुठले तरी क्रांतीकारक वैतागून ओरडले होते, फाळणीच करायची असेल तर आमचा आख्खा बंगाल(पूर्व्+पश्चिम) स्वतंत्र करा. आम्ही राजीखुशी राहू पण आम्हाला तोडू नका, तुमच्या हिंदीची वा उर्दुची आमच्यावर सक्ती करू नका.) भरीस भर म्हणजे पूर्व पाकिस्तनात (बांग्लादेशात) पश्चिम पाकिस्तानच्या तुलनेत तिप्पट चौपट हिंदू होते. बरे,नुसते होते असे नव्हे तर चांगले well settled होते. सुशिक्षित्,पुढारलेले समाजातील "अभिजन" म्हणता यावेत असे. समाजात ह्यांना मान होता. पाकी सैन्याने ह्यांच्यावर अत्याचार केल्यावर ह्यांचे समर्थक (हिंदु+मुस्लिम बंगाली झेंड्याखाली) पेटून उठले. भारताने "मुक्तीबाहिनी" ह्या मुजीबूर ह्यांच्या संघटनेला "नैतिक पाठिंबा" द्यायला १९६० च्या दशकापासूनच सुरुवात केली होती. तशातच १९७० च्या आसपास पाकिस्तानमध्ये त्यांच्या lower hous(लोकसभा) च्या निवडणुका झाल्या. एकूण देशभरातल्या जागा मोजल्या मुजीबूर बहुमतात होते.(ह्यांच्यावर "भारताचे एजंट" असा आरोप होइ.) बंगाल मधील जवळजवळ सर्व जागा ह्यांनी जिंकल्या. पश्चिम पाकिस्तनातही १-२ मिळाल्या. पण पश्चिम पाकपुरते बहुमत पंजाब्यांच्या/उर्दुच्या पक्षाकडे होते. आता? आख्ख्या पाकिस्तानचा पंतप्रधान मुजीबूरला करणार का काय असा प्रश्न विचारला जाउ लागला. भीतीपोटी मुजीबूर ह्यांना तुरुंगात डांबले गेले. त्याने जनता अधिकच भडकली . मुक्तीबाहिनीचे कित्येक कार्यकर्ते भूमिगत होउन सरकारला जेरीस आणू लागले. परिस्थिती आणिबाणीसदृश झाली. स्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिकाधिक पाक (पंजाब्यांचे व थोडे पश्तुनांचे)लष्कर तिथे आणण्यात आले. जनतेचा आवाज दडपायला व दहशत बसायला म्हणून क्रूर अत्याचारांची मालिकाच सुरु झाली. पाक लश्कराने खून्,लुटालूट व बलात्काराचे थैमानच घातले. लोक असहाय होउन बांग्लादेश सोडून शेजारच्या भारतात येउ लागले. भारतीय व्यवस्थेवर निर्वासितांचा ताण वाढू लागला पण..... पण ह्या सगळ्यादरम्यान भारताची भूमिका काय होती? वर वर बघता ह्या गोष्टी शिगेला चालल्य अहोत्या मार्च १९७१ ते नोव्हेंबर १९७१ तेव्हा भारत सरकार शांत होते. पण इकडे पंतप्रधान इंदिरा गांधींनी आंतरराष्ट्रिय पातळिवर पाठिंबा जमवायला सुरुवात केली होती. पाक सरकारचे अत्याचार जगात लख्खपणे व जमेल तितके अतिरंजित करून सांगितले जात होते. आंतरराश्ट्रिय जनमत आपल्याकडे झुकत होते. खुद्द पंतप्रधानांनी कित्येक राश्ट्रांचे दौरे केले. इतरत्र राजदूतांमर्फत खुंटी हलवून बळकट केली. अशाप्रकारे भक्कम पायावर जय्यत तयारीनिशी भारताने थेट युद्धात उतरायचे ठरवले. प्रत्यक्ष युद्धाला तोंड लागले. पुढील गोष्टी आपण दिल्या आहेतच.
  • Log in or register to post comments

वस्तुस्थिती ही की ३

मराठी_माणूस
Sat, 12/17/2011 - 11:10 नवीन
वस्तुस्थिती ही की ३ डिसेंबरच्या आधीच भारताने स्वतःच हल्ला केला होता.किंवा असा हल्ला करण्यास पाकिस्तानने आपल्याला भाग पाडले होते. प्रत्यक्षात काय घडले होते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

असहमत

सर्वसाक्षी
Sat, 12/17/2011 - 12:37 नवीन
"भारताने हल्ले केले व ते लपविले गेले आणि प्रत्यक्षात पाकने हल्ल केला व भारताने प्रत्युत्तर म्हणुन युद्ध पुकारले असे दाखविले गेले" या विधानाशी सहमत नाही. "पाकने हल्ला करावाच अशी परिस्थिती आपण निर्माण केली" या विधानाशीही मी सहमत नाही. "भारताने पाकच्या बांग्लादेशमधील अत्याचारांचा अतिरंजीत प्रचार केला" हेही खरे नाही. या कृत्याचा योग्य तो वापर आपण जगाच्या नजरेत पाकला दोषी ठरविण्यासाठी अर्थातच केला व ते रास्त व सनदशीर होते, याला भारताचे कारस्थान म्हणता येणार नाही. युद्धाच्या आधीच्या साधारण एक वर्षापूर्वीच्या कालखंडातील घटना तपासून पाहता स्पष्ट समजुन येते की पाकिस्ताननेच ह्ल्ला केला. १) ३० जानेवारी १९७१ रोजी श्रीनगर ते जम्मु असे उड्डाण करणारे इंडियन एअरलाइन्सचे विमान दोन स्वयंघोषीत काश्मिर मुक्तिवाद्यांनी अपहरण करुन लाहोर येथे नेले. २ फेब्रुवारीला प्रवाशांना सोडण्यात आले व हिंदुस्थानात परत धाडले गेले मात्र विमान लाहोर येथे उध्वस्त करण्यात आले. यात पाकिस्तानचा हात असल्याने कठोर उपाय योजना म्हणुन भारताने पाकच्या विमानांना भारतिय हवाई हद्दीवरुन उडण्यास प्रतिबंध लागु केला. इथे पाकिस्तानची मोठी गोची झाली. एकिकडे मुक्तिवाहिनी व बांग्ला देशच्या स्वातंत्र्याचे वारे वाहत असताना आपल्या लष्कराची व युद्धसामग्रीची हवाईमार्गे जलद हालचाल करने पाकला अशक्य झाले. २) २५ मार्च १९७१ रोजी पाकने स्वातंत्र्यवादी बांग्ला देशी, विचारवंत व अर्थातच हिंदु तसेच बांग्लाभाषिक मुस्लिम यांना नष्ट करण्यासाठी 'ऑपरेशन सर्चलाईट' सुरु केले व त्यात भयानक अत्याचार व नृशंस हत्याकांड केले गेले ज्याची तुलना नाझींनी ज्यूंवर केलेल्या अत्याचाराशी केली गेली. ३) भयभीत व उद्ध्वस्त बांग्ला नागरिकांचा भयंकर ओघ भारताकडे सुरू झाला व त्याचा ताण भारतावर पडला. ४) २५ मार्चला केलेले हे पाकी कृत्य हा शिशुपालाचा जणु शंभरवा अपराध ठरला. शेख मुजीब यांनी बांग्ला विद्यार्थ्यांना रेडीओवरून स्वतंत्र बांग्लाची ग्वाही दिली. अनेक विद्यार्थी व मुक्तिप्रेमी झिया उर्रेहमान यांच्या ताब्यातील कालुरघाट भागात आले. २६ मार्च ला पहाटे दिड वाजता अटक केल्याचे पाक रेडीओ ने २९ मार्च ला जाहिर केले. ५) मर्यादित प्रक्षेपण क्षमता असलेल्या कालुरघाट रेडीओ केंद्रावरुन झियांनी 'मी रेडीओ शाधीन बांग्लावरुन स्वतंत्र अशा प्रजासत्ताकाची घोषणा करीत आहे अशी जाहिर घोषणा केली" हा संदेश बंगालच्या उपसागरातील एका जपानी जहाजाने ग्रहण केला व नंतर तो रेडीओ ऑस्ट्रेलिया व बी बी सी वरुन पुनर्प्रक्षेपित करण्यात आला. ५) अधिकृतरित्या २६ मार्च हा बांग्ला देशचा स्वातंत्र्यदिन मानला जातो. जुलै ७१ मध्ये तत्कालिन भारतिय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहिररित्या पूर्व पाकिस्तानचा उल्लेख बांग्ला देश असा केला होता. ६) बांग्लाच्या स्वातंत्र्यसमराला भारताचा पूर्ण पाठिंबा होता. मुक्तिवाहिनीला भारताकडुन मदत होत होती. पाक लष्कराच्या ताब्यातुन मुक्तिवाहिनीने बळकावलेल्या लालमोनीरहाट व शालुतिकार या दोन विमानतळांचा वापर भारताकडुन रसद व शस्त्रसामुग्री मिळविण्यासाठी केला गेला. पाकला द्राविडी प्राणायाम करुन पश्चिम पाकिस्तानातुन अधिकाधीक लष्करी बळ पाठवावे लागत होते. ७) आता भारताशी पूर्व सिमेवर भिडावे लागणार हे पाकिस्तानला समजले होते. आणि आपण एकाच वेळी पूर्व व पश्चिम अशा दोन आघाड्यांवर भारताशी लढु शकणार नाही हेही पाकिस्तानला पक्के माहिते होते. भारताचे पूर्वेवरील लक्ष विचलीत करणे व पश्चिमेकडील भारतिय वायुसेनेचे विमानतळ व रडार केंद्रे भारत बेसावध असताना उध्वस्त करण्याच्या हेतुने पाकने इस्रायलचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवुन हवाई हला केला. मात्र भारत पूर्ण सावध व तयारीत असल्याने पाक इरादे धुळीस मिळाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

माझ्याकडच्या माहितीची भर घालतोय.

मन१
Sat, 12/17/2011 - 16:03 नवीन
युद्धाची सुरुवात http://swaminomics.org/?p=698 इथे माझ्या माहितीला पूरक असा एक स्त्रोत आहे. शिवाय टी व्ही वर अनेकदा भरत वर्मा ह्या भारताच्या defence strategist च्या बोलण्यात पुसटसा उल्लेख होताना दिसतो. In 1971, Pakistani forces fortified cities en route to the capital, but Indian forces bypassed these and went straight for Dhaka. The US did the same in Iraq, bypassing cities and going straight for Baghdad. Many readers may think that the 1971 war was started by Pakistan, not India. On December 3, 1971, Pakistani bombers attacked Indian military targets, and Indian mass media declared that this started the war. In fact Indian troops had invaded East Pakistan two weeks earlier, on November 21. The Indian invasion was widely reported in the global press, but suppressed by the tame Indian press, which toed the official Indian line that its troops had not crossed the border. Incidentally, the US press this time is also being accused of tamely toeing the official line. The Mukti Bahini had started an insurrection against the Pakistan Army in 1971. हा एक अंश देत आहे. दुसरा दुवा सध्या सापडला नाही. जिथे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की त्यांना खरी बातमी देण्यापासून थांबवण्यात आले. (सुरक्षेच्या व राजकिय दृष्टीकोनातून ते तेव्हा योग्यही असेल.) भारताची भक्कम strategy व पूर्वतयारी दुसरे असे की भारताने दिलेले आकडे हे भारतानेच प्रथम प्रसृत केले होते. UN च्या कुठल्याही संघटनेला मूळ रेफ्युजींच्या ठिकाणापासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते. शिवाय मुक्ती बाहिनी ही काही १००% नि:शस्त्र संघटना नव्हती. काही भूभाग ह्यांनी ताब्यात घेतला. मग ह्यांना पाक लष्कराशी लढायचे धैर्य कुठून आले? पैसे अन् ट्रेनिंग अन् हत्यारे कुठून मिळाली? हे असल्याशिवाय असे भूभाग वगैरे कुणी ताब्यात घेउच शकत नाही. वस्तुस्थिती अशी होती की बंगाली जनता नाराज आहे, अन्यायित आहे खरे होतेच. पण त्यातील लढवय्यांना भारताने आपल्याकडे बोलावून ट्रेनिंग दिले! लढायला शस्त्रे दिली.१९६८ मध्ये म्हण्जए, प्रत्यक्ष युद्धाच्या तीनेक वर्षे आधी खुद्द मुजीबूर भारतात येउन आगरतळ्याच्या ट्रेनिंग कॅम्पची पाहणी करून गेल्याचे व काही उच्चस्तरिय बोलणी करून गेल्याचे कित्येक पुरावे नंतर पाकने जगभर दाखवायला सुरुवात केली.भारताने अर्थातच त्यात काही तथ्य असल्याचे सभ्यपणे नाकारले. आता, रेफ्युजी म्हणून जी आकडेवारी भारत सरकार देत होते, त्यातील एक मोठा भाग होता भारतानेच आयात केलेल्या मुक्तीबाहिनीच्या कार्य्कर्त्यांचा.सगळेच काही निव्वळ निर्वासित नागरिक नव्हते. कित्येक कार्यकर्ते पुन्हा लढण्यासाठी बांग्लादेशात गेल्यावरही त्यांच्या नोंदी मानभावीपणाने कागदोपत्री तशाच ठेवल्या. त्यांची नावे वगळलिच नाहित. कामानिमित्त शेकडो वर्षापासून इकडून तिकडे येणारे बांग्लादेशी मजूर व घुसखोर जे आधीही होतेच, त्यांनाही आताच दाखवायला सुरुवात केली. साहजिकच आकडा वाढला.फुगला. अजून एक आपल्या कुटिलपणाची कमाल म्हणजे, मुक्तीबाहिनीचे प्रभावक्षेत्र म्हणजे कुठला ठराविक असा एकच प्रांत न ठेवता, एक मूळ मोक्याचे ठिकाण सीम्लगत होतेच, त्याशिवाय आख्ख्या बांग्लादेशात, गावागावात त्यांचे कार्यकर्ते विखरून टाकेल. ते यथाशक्ती सरकारविरुद्ध असंतोष पसरवू लागले, विरोध करू लागले. काहिशी अनागोंदी निर्माण झाली. ह्यांना दहशत बसावी म्हणून पाक लष्कराने ह्यांच्यासकट सामान्यजनतेवरही क्रूर अत्याचार सुरु केले. दहशत बसवून गप्प बसवण्याची वेळ कधीच गेली होती, इतकी बंगाली अस्मिता पेटली होती. अत्याचाराने उलट वणवा भडकावा तसे झाले. दहशत बसणे दूरच उलट पाक लष्करास विरोध अजूनच प्रखर झाला. हे सर्व उपद्व्याप करण्य्साठी पाक लष्कर गावागावात पसरले होते. प्रत्यक्ष युद्ध बंगाल हा मुळात त्रिभुज प्रदेश आहे.प्रचंड नद्यांनी भुसभुशीत गाळाची जमीन व प्रचंड दाट जंगले तिथे तयार केली आहेत. पद्मा, ब्रम्हपुत्रा अशा कित्येक नद्या आहेत. एका गावातून दुसर्‍याअ गावात जाणे सोपे नाही. त्या काळात अजूनच अवघड. पाक हे काही विकसित देश नव्हते. कित्येक ठिकाणी वाहतूक करणे कटकटीचे व जिकिरिचे होते. आता म्हणाल ह्याचा काय संबंध? संबंध असा की अत्याचारी पाक लष्कर विचित्र् स्थितीत पोचले,विस्कळित झाले होते. संघटित असे रूप त्याला राहिले नाही. गावागावात विखुरलेले तुकडे असे काहिसे ते रूप होते. भारताने मग जेव्हा हल्ला केला तेव्हा अशा एकेकट्या ठिकाणी जाउन लढण्यापेक्षा कित्येक ठाण्यांना सरळ सरळ bypass करत व मोजक्याच पण यशस्वी लढाया,चकमकी करत वीजेच्या वेगाने सुसूत्रपद्धतीने थेट राजधानी ढाका गाठले! योग्य तिथे हवाइदलाचाही विशेषतः हेलिकॉप्टरचा वापर केला.पाकचे विघटित सैन्य पूर्ण कुचकामी ठरले. ढाक्यात होते जनाब जनरल नियाझी बांग्लादेशातील उपलब्ध फौजपैकी फारतर निम्मीच फौज ह्यांच्याकडे होती. वर भारताने जमीन मार्गाने घेरले होतेच्.समुद्री मर्गानेही supply line बंद. मियाँ नियाझी लढणार तरी किती दिवस , खाणार तरी काय व दारू गोळा तरी कुठून आणणार? साहेबांची बसली पाचावर धारण. व त्यांनी प्रतिकार थांबवत शरणागती पत्करली. ह्याक्षणी ते फार तर शेवटच्या सैनिकाच्या शेवटच्या गोळिपर्यंत लढा देउ शकत होते(जे तुटपुंज्या भारतीय सैन्याने १९६२ मध्ये काही ठिकाणी केले होते. हे बोलायला व ऐकायला सोपे, प्रत्यक्षात अशक्यप्राय.) किंवा पाक सरकारला दुसरी आघाडी(पश्चिम आघाडी )उघडण्यास विनवू शकत होते. असे केल्यास भारताचे बळ विभागले जाउन आणखी लढा देता येण्याची शक्यता होती.दुसर्‍या पर्यायाचा त्यांनी प्रयत्नही केला पण सपशेल आपटी खाल्ली.पंजाब व राजस्थानच्या सीमेवर ते चालून आले व आल्यापावली पळत सुटले.(Border सिनेमा आठवतोय? लोंगोवाला पोस्ट आठवतेय?) aftermaths युद्धोत्तर स्थिती भारतीय लश्कर परत फिरल्याने अमेरिकेचे भारताकडे सरकणे निरर्थक ठरले.खरोखर भारत्-अमेरिका किंवा भारत्-चीन असे काही भिडले असते तर आपल्या बाजूने थेट रशिया उतरला असता. तिसर्‍या जागतिक महाविनाशी युद्धाला सुरुवात झाली असती. हे न झाल्याने जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला. अफाट पाकिस्तानी सैन्याला अगदि निर्धोकपणे (सुमारे ९० हजार) भारताने सुरक्षितपणे जिवंत सोडले. भारताचे काही सैनिक ह्याम्णी पकडले होते.सगळा राग त्यांच्यावर काढायला पाकने सुरुवात केली. अत्यंत विकृत वागणूक ,छळ करत अनेक भारतीय सैनिक कायमचे पाक्सितानमध्ये खितपत पडले. ते तिथे असल्याचे अर्थातच हरामखोरांनी नाकारले. छळ म्हणजे फक्त युद्धकैदी म्हणून सक्त मजूरी नव्हे तर विकृत मने जे काही करू शकतात ते केले.(लिंग कापणे , शारिरिक हाल, डोळे फोडणे वगैरे. कारगिल युद्धातही सौरभ कालिया ह्या भार्ताच्या जवानाला असेच केल्याचे उघड झाले होते.काही युद्धकैद्यांना वेड लागले. कुणाला वेड न लागताच वेड्यांच्या दवाखान्यात टाकले.असो.) झालेल्या अपमानाने पेटून पाकने अण्वस्त्रसज्ज होण्याची तयारी सुरु केली. अनेक मने बदल्यासाठी धगधगू लागली.इतके दिवस असणारा "आम्हाला काश्मीर हवा" हा हट्ट जाउन "आम्हाला काश्मीर नाही मिळाला तरी चालेल, पण भारतापासून तोडून तो स्वतंत्र करायचाच्.बांग्लादेश युद्धाचा बदला घ्यायचाच." ह्या इर्षेने ISI पेटले. इंदिरा गांधी ह्यांच्या व्यक्त्मिमत्वाने कित्येकांचे डोळे दिपले. त्यांचे कौतुक झाले. कदाचित ह्यामुळेच त्यांनी पुढे काही धाडसी किंवा घोडचूक म्हणावीत अशी जी पावले उचलली त्याचे बीज त्यांच्या मनात आत्म्विश्वासाचे बीज रोवले गेले. अवांतर पण पूरक मला संभ्रमात टाकणारी अजून एक माहिती काल एका विश्वसनीय स्थळावर दिसली. economictimes की economist ते आठवत नाही. त्यानुसार अमेरिकन सैन्य भारताच्या किनार्‍याकडे निघाले हे खरे. पण विचित्र गोम अशी होती की अमेरिकेने चीनने युद्धात भरताविरोधात थेट आघाडी उघडली तर पार कोलांटी उडी मारून भारताचे साह्य करायचे ठरवले होते असे तेव्हाच्या आता उघड केलेल्या गोप्नीय कागदपत्रातून दिसत आहे. चीनला त्यावेळेस ती बुद्धी झाली नाही, अन्यथा त्यांनाही ते महागातच पडले असते इतकी भारताची जय्यत तयारी होती. अजून एक हे की पाक सेनाधिकार्‍यांनी नंतर सातत्याने आरोप केले की अमेरिकेने अनिच्छेने का होइना बांग्लादेश निर्मितीस व भारताच्या लष्करी कारवाइस खाजगीत मंजूरी दिली होती. अमेरिकन सैन्य फक्त इतकीच खातरजमा करण्यासाठी आले होते की चढ्या व मज्बूत स्थितीचा गैरफायदा घेत भारताने पूर्व बंगाल पुन्हा भारतात जोडू नये. किंवा पूर्व बंगाल मुक्त झाल्यावर पार दुसर्‍या टोकाला पश्चिमेकडे काश्मीरपासून गुजरात पर्यंत जो भूभाग पाकिस्तानला लागून आहे त्यात काही अनुचित कारवाइ करत तिथला भूभाग ताब्यात घेउ नये किंवा नासधूस करू नये. अर्थातच भारताने ते केले नाही. बांग्लादेश स्वतंत्र देश झाला.भारतीय सैन्याने तातडिने माघार घेतली. अत्यंत मुत्सद्दी चाल. पाक ला झालेली जखम इतकी जिव्हारी बसली की तिथे अणुबॉम्बसाठी जनमत अनुकूल होउ लागले. कित्येक टाळकी भडकली व अण्वस्त्रसज्ज देश बनवायचाच ह्या विचाराने धगधगती झाली. विदेशी विद्यापीठात शिकणार्‍या भारतीय मूळ असणार्‍या सर्मिला बोस नावाच्या प्राध्यापिकेने त्रयस्थपणे प्रचंड आकडेवारी शोधून, ठिकठिकाणी गावात जाउन, नावांची व लोकांची शहानिशा करून हा निष्कर्ष काढला की भारताने निर्वासितांचा आकडा प्रचंड फुगवून सांगितला.(आकडा अत्याचारांचा फुगवला नाही. ते खरेच होते. पण त्याने moral right to attack मिलत नव्हतां निर्वासितांमुळे मिळत होता.) http://en.wikipedia.org/wiki/Sarmila_Bose ह्याच धर्तीची माहिती देणारा कुतुबुद्देन अझीझ ह्याम्चाही रिपोर्ट होता.(पाकिस्तान सरकारने नंतर पराभवाची कारणे शोधण्यासाठी त्यांना अहवाल तयार सांगितला होता.)blood and tears नावाच्या पुस्तकात त्यांनी यथासांग आकडेवारी दिली आहे. पण अर्थातच ते पाकिस्तानी असल्याने ग्राह्य मानण्यास शंका उपस्थित होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

विनम्र अभिवादन.

आत्मशून्य
Sat, 12/17/2011 - 10:52 नवीन
'१९७१ चे अभिमन्यु' हे माझं अत्यंत आवडीचं पूस्तक आहे.... लहानपणी वाचलं असल्याने लेखक आठवत नाही. मन१ यांनीही बरीच रोचक माहीती पूढे आणली आहे... किम्बहूना सर्वप्रथम हल्ला न करणारा देश अशी जी भारताचे प्रतिमा आहे ती भारताने कशीकाय म्यानेज केली यावर विस्तृत लेखच येउदे. बाकी इंदिराजींनी फाळणी करून जी त्वरीत माघार घेतली (२ दिवसात भारतीय लष्कर बांग्लादेशातून काढून घेतलं) त्यांमुळे अम्रिकेला युध्द नौकापाठवूनही प्रत्यक्षात काही कृती करायला सक्रिय होता आलं नाही हे मात्र जबरदस्तच.
  • Log in or register to post comments

१९७१ चे अभिमन्यु चे लेखक सु ग

सूर्याजीपंत
गुरुवार, 02/16/2012 - 08:26 नवीन
१९७१ चे अभिमन्यु चे लेखक सु ग शेवडे आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

पुढाकार....

प्रभाकर पेठकर
Sat, 12/17/2011 - 11:42 नवीन
सर्वसाक्षीजी, लेख नेहमी प्रमाणेच मुद्देसुद आणि प्रभावी झाला आहे. त्याच बरोबर, श्री मन१ ह्यांच्याशी ही सहमत. पाक बरोबर झालेल्या सर्व युद्धांमध्ये भारतानेच पहिले पाऊल उचलले असल्याचे ७१ ह्या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या एका कॅप्टनेच सांगितले होते.
  • Log in or register to post comments

लेख मस्तच

अमोल खरे
Sat, 12/17/2011 - 11:43 नवीन
पण दुर्दैवाने आपले अनेक सैनिक युद्धकैदी म्हणुन पाकिस्तानातच राहिले. ह्यामागचे लॉजिक मला आजपर्यंत कळले नाही. आधी काँग्रेस, नंतर बीजेपी, कोणीही त्यांना परत आणले नाही. मध्यंतरी मनोज वाजपेयीचा ह्यावर एक अप्रतिम सिनेमा आला होता. त्या बिचा-या युद्धकैद्यांपैकी आता कितीजण जिवंत असतील देव जाणे. त्यांना परत आणायचे गट्स फक्त ईंदिरा गांधींमध्येच होते. नंतरचा एकही पंतप्रधान त्या कॅलिबरचा नव्हता. बांग्लादेश युद्धाच्या गौरवशाली ईतिहासाला लागलेले हे एक मोठ्ठे गालबोट आहे.
  • Log in or register to post comments

काय पडले पदरात?????? बांगला

अविनाशकुलकर्णी
Sat, 12/17/2011 - 13:33 नवीन
काय पडले पदरात?????? बांगला देश जन्माला घातला... अन पाकिस्तान आपला कायमचा शत्रु झाला.. आतंकवाद मार्गाने भारताला त्याने पळता भुई थोडी केली आहे हे न विसरणे योग्य.. अन ज्या बंगाल्यांना मदत केली ते पण आपल्यावर उलटले आहेत.. भारत त्यांचा एक नंबर शत्रु आहे.. तिकडच्या हिंदुना त्यांनी हाल हाल करुन मारले व भारतात हाकलले. ते कमी म्हणुन कि काय कोट्या वधी बंगाली मुसलमान अवैध्य मार्गाने भारतात रहात आहेत.. इकडुन पाकडे अन तिकडुन बंगाली.. सॉलिड बुच मारुन ठेवले आहेत. सिनेमाच्या तिकिर्टावर जो युद्ध कर बसवला तो कायमचा बोडक्यावर बसला. पाकि व बांगला देशीना हाकलले तर अन्न समस्या सुधारण्यास मदत होईल... सैन्याने कमवले ते राजकारण्यांनी मातित मिळवले. जय हो...गांधि नेहरु परीवार
  • Log in or register to post comments

काय साध्य झाले?

चौकस२१२
Mon, 10/21/2019 - 09:18 नवीन
काय साध्य झाले? = पाकिस्तान चे २ देश झाले हे साध्य झाले,, बांगलादेश अगदी लंगोटीयार होईल असे काही कोणी त्यावेळी विचार केला नसेल... भाजप त्याकाळी सत्तेत असते तर कदाचित त्यांनी हेच केले असते , बांगलादेश, त्यामानाने मवाळ वाटणारे मुस्लिम बहुल इंडोनेशिया येथे जो इस्लामिक धर्मवाद चालू आहे तो वहाबी इस्लाम च्या पैस्यातुन फोफावला आहे ... त्यामुळे पुढे बांगलादेश कसा वागेल हे इंदिराजींना कसे काय कळणार.. काही चुकले असे वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

खास करून शेजार्यांशी

चौकस२१२
Mon, 10/21/2019 - 09:25 नवीन
आणि हि अशी रणनीती नेहमीच देश करतात खास करून शेजार्यांशी .. इंडोनेशिया बहुल आहे मुस्लिम त्यात तिमोर LESTE ( ईस्ट तिमोर) हे त्याचे पूर्वे कडचे टोक , ख्रिस्ती आणि जुनी पोर्तुगीज कॉलनी ,, TELASATTHI आणि वरील र्नीटी ला अनुसरून ऑस्ट्रेलिया नि नाही का हात मारून घेतला ईस्ट तिमोर चळवळी ला मदत करून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

या युध्दातील सर्व वीरांना

जाई.
Sat, 12/17/2011 - 14:02 नवीन
या युध्दातील सर्व वीरांना विनम्र आदरांजली नियाझीच्या शरणागतीवर मिलींद सोमणचा १६ डिँसेबर चित्रपट निघाला होता
  • Log in or register to post comments

काहीही हं

जॉनविक्क
Mon, 10/21/2019 - 23:44 नवीन
16 डिसेंबर स्वतंत्र हेर कथा होती चित्रपट काळाच्या बराच पुढील होता हे मात्र खरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

बांगलादेश..

प्रभाकर पेठकर
Sat, 12/17/2011 - 16:45 नवीन
बांगलादेश मुक्ती मध्ये भारताचा सहभाग भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचाच होता. भारताला दोन बाजूंनी पाकिस्तान्यांचा जोर नको होता. तिसर्‍या बाजूला चीन होताच. सर्व बाजूंनी शत्रुंच्या घेर्‍यात राहणे संरक्षणाच्या दृष्टीने सोयिस्कर नव्हते. त्यामुळे बांगला देशच्या निर्मितीत, पूर्व पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तान पासून तोडणे अत्यंत गरजेचे होते. अमेरिकेचे सातवे आरमार तयारीनीशी भारतिय समुद्रात आले होते तसेच इंदिरा गांधींच्या विनंतीस मान देऊन रशियन आरमारही येऊन ठेपले होते. अमेरिका युद्धात हस्तक्षेप करते तर रशियन आरमारानेही युद्धात अमेरिकेविरुद्ध सहभाग घेतला असता. कांहीसे असेच लष्करी राजकारण श्रीलंकेस लष्करी मदत पुरविण्यात होता असे वर्तमानपत्रात वाचले होते. युद्धजन्य परिस्थितीत कुठलाही देश जी विधाने करतो ती सर्व कधीच खरी नसतात. युद्धात (आणि प्रेमात) सर्व माफ असते.
  • Log in or register to post comments

भारताने पुढाकार घेण्याचा निर्णय काही महीने आधीच घेतला होता.

रामदास
Sun, 12/18/2011 - 00:15 नवीन
पण पाऊस आणि पूर्व पाकीस्तानाची भौगोलीक स्थिती लक्षात घेऊन मूळची योजना पुढे ढकलण्यात आली होती. प्रत्येक हल्ला करताना ही भौगोलीक स्थिती बघून केल्यामुळे ढाक्यापर्यंत पोहचणे फार लवकर झाले . नियाझींचे सैन्य विभागले गेले. १९६५ सालच्या युध्दात दोन्ही देशांनी जिंकल्याचा दावा केला होता पण १९७१ चे युध्द निर्णायक ठरले. परंतू या लढ्यात भारताने जी मदत बांगला देशाला केली त्याची परतफेड तर नाही पण उपकाराची जाणीव पण बांगला देशाला नाही हे पुढच्या काही वर्षातच स्पष्ट झाले.सुरुवातीला निधर्मी असलेले राष्ट्र मुस्लीम राष्ट्र म्हणून जाहीर करण्यात आले आणि मुजीबुर रहेमान यांची किंवा अवामी लीगची पकड निसटून सत्ता पुन्हा लष्कराच्या हातात गेली. तरीसुध्दा मुजीबुर रेहमान यांची हत्या झाली त्या रात्री एका गुप्त कारवाईत भारतीय हवाई दलाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण जे विमान या कारवाईत भाग घेत होते ते कोसळले आणि मुजीबुर रहमान यांची हत्या झाली .त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या एका बाजूस उर्दु पाकीस्तान आहे तर दुसर्‍या बाजूस बंगाली पाकीस्तान आहे. भारतीय उपखंडातील समतोल कायम रहाण्यासाठी फार मोठी किंमत भारताला नेहेमीच चुकवावी लागली आहे .
  • Log in or register to post comments

?

नितिन थत्ते
Sun, 12/18/2011 - 12:44 नवीन
विजयदिनानिमित्त भारतीयांचे अभिनंदन. >>परंतू या लढ्यात भारताने जी मदत बांगला देशाला केली त्याची परतफेड तर नाही पण उपकाराची जाणीव पण बांगला देशाला नाही हे पुढच्या काही वर्षातच स्पष्ट झाले.सुरुवातीला निधर्मी असलेले राष्ट्र मुस्लीम राष्ट्र म्हणून जाहीर करण्यात आले ऑ? आपल्या उपकाराची जाणीव म्हणून त्यांनी निधर्मी राष्ट्रच रहायला हवं होतं का?
  • Log in or register to post comments

छे !छे !

रामदास
Sun, 12/18/2011 - 13:32 नवीन
दोन वाक्यात परीच्छेद बदलायला हवा होता तो राहीला.
  • Log in or register to post comments

त्या युद्धाचं प्रत्यक्ष वर्णन

सुधांशुनूलकर
Mon, 12/19/2011 - 11:24 नवीन
या युद्धात लढलेले कॅप्टन विवेक नूलकर यांचा लेख रविवार, १८ डिसेंबर च्या दै. सकाळमधल्या सप्तरंग पुरवणीमध्ये या दुव्यावर वाचता येईल : http://www.esakal.com/eSakal/20111218/5710530141354475705.htm
  • Log in or register to post comments

अतिशय माहितिपुर्ण धागा अन

५० फक्त
गुरुवार, 02/16/2012 - 11:00 नवीन
अतिशय माहितिपुर्ण धागा अन अतिशय धन्यवाद त्याबद्दल. ही सगळी युद्धं झाली तेंव्हा मी जन्मलो नव्हतो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात एक कारगिलची लढाई हीच काय ती हिंदुस्थान प्रत्यक्ष वाचनातुन अनुभवलेली. त्यामुळं ह्या धाग्यावर लक्ष ठेवुन आहे. युद्ध नीती आणि त्याबद्दल वाचायचं राहुन गेलंय, याबद्दल मार्गदर्शन अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments

मुजीबुर रहमान यांची हत्या का

diggi12
गुरुवार, 10/17/2019 - 00:33 नवीन
मुजीबुर रहमान यांची हत्या का झाली ?
  • Log in or register to post comments

काही प्रश्न चिन्ह

Rajesh188
Sun, 10/20/2019 - 20:54 नवीन
पाकिस्तान आणि बांगला देशाच्या सीमा एकमेकांना मिळत नाहीत. एकसंघ भूभाग नसताना कोणत्या शाहण्याने त्यांना एक देश म्हणून मान्यता दिली? १९७१ च्या अगोदर तिथे स्वतंत्र चळवळ किती वर्ष चालू होती आणि कोणत्या मार्गाने? १९६५ मध्ये भारत पाकिस्तान मध्ये युद्ध झाले होते मग त्यांना एकमेकाच्या युद्ध सामर्थ्य चा अंदाज नव्हता का? श्रीलंकेत सुद्धा तमिळ लोक स्वतंत्र साठी लढत होते आणि तेथील सरकार त्यांच्या वर अत्याचार करत होते . तमिळ लोकांचा लोंढा भारतात प्रवेश करत होता . मग तिथे लष्करी ताकत वापरावी असे भारताला का वाटले नाही? ह्या युद्ध मधून भारताला काय फायदा झाला? एक लाख ४७ वर्ग किलोमीटर भु भाग असलेला आणि १६ कोटी लोकसंख्या असलेला देश बांगलादेश . आणि आठ लाख नव्वद हजार वर्ग किलोमीटर भूभाग आणि जवळ जवळ बांगला एवढीच लोकसंख्या असलेला पाकिस्तान निर्माण करून आपण पाकिस्तान ला प्रगतीच्या मार्गाने घोड दीड करायला मदत केली असे वाटत नाही का? प्रचंड लोकसंख्येचे लोढणे पाकिस्तान नी गळ्यातून फेकून दिले. हे युद्ध जाणूनबुजून बांगलादेशाच्या भूभागावर च लढवून ३०००००० लोकांचे हत्याकांड तिथे झाले आणि युद्धाच्या नावाखाली ते पचल सुधा. विरोधी मत असलेल्या लोकांची कत्तल करण्यासाठी च ह्या युद्धाचा पाकिस्तान वापर करून घेतला आणि हेतू साध्य झाल्यावर शरण आला हे पूर्व नियोजित कशा वरून नसेल. नाहीतर पाकिस्तान निमलष्करी दल तिथे ठेवून काश्मीर किंवा राजस्थान च्या सीमेवरून भारतावर हल्ला चढवला असता . जो भूभाग पाकिस्तान शी जोडलेला नाही तिथे क्षत्रू असलेल्या भारताशी लढणे म्हणजे आत्म् हत्या करून घेणे हे युद्ध वीरांना समजले नसेल का? आणि शेवटचा प्रश्न ज्या काश्मीर साठी पाकिस्तान नी भारता वर असंख्य हल्ले केले त्याचा पाकिस्तान नी बांगला देशावर परत कधीच हल्ला केला नाही . तिथे aatangvadi हल्ला सुद्धा घडवून आणला नाही ह्याचे आश्चर्य वाटत नाही का?
  • Log in or register to post comments

मूर्ख पनाची व्याख्या इथे आहे

Rajesh188
Mon, 10/21/2019 - 21:26 नवीन
पाकिस्तान आणि बांगला देश फक्त समुद्र मार्ग जोडले आहेत ते पण समुद्र मार्ग नी भारताच्या हद्दी मधून . भारताच्या तुलनेने दोन्ही देश खूपच कमजोर आहेत .. दोन्ही बाजूला दुश्मन नको म्हणून बांगला देश निर्माण केला ह्या युक्ती वादावर हसावे की रडावे ते समजत नाही . Maharshtra chya अर्था गरीब बांगलादेश . मुस्लिम भाषा वेगळी असेल तर हिंदू वर प्रेम करतात असे समजणारे महामूर्ख. अरबी बोलणाऱ्या लादेन नी इंग्लिश बोलणाऱ्या अमेरिकी वर हल्ला केला होता .. स्वतःची बुध्दी चालवायची असते हे भारतीय उपखंडातील लोकांना मान्य नाही ..
  • Log in or register to post comments

प्रेयसी पत्वण्यास भाडोत्री गुंड

Rajesh188
Mon, 10/21/2019 - 21:52 नवीन
हे सिनेमा मध्ये प्रेयसी पटवायची असेल तर भाडोत्री गुंड पाठवले जातात आणि ठरल्या प्रेमाने हिरो वाचवतो. हाच फॉर्म्युला इंदिरा जी नी बांगलादेश विषयी वापरलं. पाकिस्तान चे तुकडे होण्या पेक्षा एकसंघ राहिला असता तर गृह युद्ध नी कमजोर झाला असता . पण हिरो आहे हे दाखवण्याची खुमकमी. पंजाबी लोकांनी भारतातील सर्व जमाती पेक्षा जास्त प्राणाची आहुती भारता साठी दिली आहे . महाराष्ट्र सुद्धा पाठी आहे . तिथे स्व फायद्या साठी राजकारण करून . शीख लोकांना ( देशातील सर्वात जास्त देश प्रेमी) वेगळा देश मागण्या पर्यंत त्यांना निराश करण्याचे काम इंदिराजी ह्यानेच केले . आणि नंतर असंख्य सैनिकांचा बळी खेतल्या वर बुलेट प्रूफ गाड्या तून हल्ला करून . असंतोष दडपला पण देश द्रोही शीख लोकांना ठरवून . भारतात खरोखर स्वतःची बुध्दी असणारी लोक कमी आहेत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा