✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आकाशातल्या ठोम्ब्या बद्दल ....!

स
सुधीर मुतालीक यांनी
Tue, 09/06/2011 - 19:36  ·  लेख
लेख
काल जिम मधून खाली उतरलो. साडे आठ वाजले होते. गाडी जवळ पोचताना जिम कडे जाणारा मित्र भेटला. हा बहुदा माझ्या बरोबर असतो, सातच्या सुमारास. आज इतक्या उशिरा येतोय म्हटल्यावर गुड मॉर्निंग ऐवजी साहजिकच माझ्या कडून त्याच्यावर प्रश्न आपटला गेला, "अरे, आज इतका उशीर का ?" त्याचे स्पष्टीकरण चालु झाले. " काल श्रावण संपला ना. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत 'बसलो' होतो. श्रावणाच्या म्हैना भरात सॉलिड तहान लागली होती. मित्र ही होते बरेच. दहा दिवस आधीच ठरवून ठेवले होते. फार मजा केली. एकदम आउट ! पार कल्ला केला. आता आणि दहा दिवस बंद ना. गणपती आहे, बाप्पा. आपण नाही गणपतीत घेत. त्यामुळे आज जरा उशीर झाला." मी " ओके, गुड डे." एवढंच म्हणालो. मित्राच्या निवेदनाला लॉग आउट केलं आणि गाडी कडे सटकलो. गाडीत नेमका गुलाम अली ' हंगामा है क्यो बरपा, थोडीसी जो पीली है ..' ची अर्धवट राहिलेली गझल संपवत होता. त्यामुळे मित्राच्या काल पर्यंत दाटून आलेल्या कंठाची पुन्हा एकदा आठवण झाली. प्यायची तर बिनधास्त प्यायची ना. श्रावण किंवा गणपती साठी स्वत:वर बलात्कार कशाला ? दहा दिवस आधी प्लानिंग म्हंजे त्याही वेळी इच्छा झालीच असेल ना. प्यावेसे वाटले असेलच ना. आणि गणपती यायच्या आधी एकच दिवसाचा चान्स मिळाल्यावर आधीच्या महिना भराची आणि नंतरच्या दहा दिवसांची एकत्र पिऊन घ्यायची हा केव्हढा त्रास ? आणि कशासाठी ? आणि त्या दिवसांमध्ये इच्छा होऊन प्यायची का नाही ? तो एकच दिवस जो मध्ये होता त्या दिवशीच का चालते ? माझा मान्सीक त्रास असा होता की त्या महिन्यात आणि नंतरच्या दहा दिवसात असा काय फरक असतो ज्यामुळे आपल्या इच्छांचे दमन माझ्या मित्रांना करावे लागते? या श्रद्धाळू लोकांची गणितं मला कधीच कळत नाहीत. वर्ष भर कुणाचा ना कुणाचा असा त्रास असतोच. परवा पार्टी करू असं ठरवायचं असेल तर एकजण तरी म्हणतोच ' मित्रा परवा गुरुवार आहे बरं का, दत्ताचा वार आहे. दुसरा दिवस निवडा.' श्रद्धेचा आणि या बलात्काराचा नैतिक सबंध काय ? गणपतीच्या आदल्या दिवशी काय नसतं जे त्या दहा दिवसात असतं ? म्हंजे आदल्या दिवशी गणपती पिताना बघत नाई का ? तो आलेला नसतो म्हणुन त्याला चालतं की तो आलेलाच नाही त्यामुळे त्याला विचारायचा संबंधच काय ? किंवा तो आलेला नसल्यामुळे तो बघू शकत नाही, त्याला समजतच नाही. या पिण्याच्या पार्श्वभूमीवर तर एक भारी किस्सा आहे माझ्या कडे. आमच्या गावात म्हंजे निपाणीला एक देवी असते. बहुतेक ग्राम देवता वगैरे असते. कारण ती एका किल्ल्यात असते. जुना भुईकोट किल्ला असतो. नवरात्रतात मोठा उत्सव असतो. असणारच. देवी आहे. दसऱ्याच्या पूजेला देवीला चक्क दारूचा नैवेद्य दाखवतात. आणि नैवेद्य म्हंजे असं छोट्याश्या वाटीत चमचाभर वाढून नाई देत. डायरेक्ट बाटली - म्हंजे क्वार्टर - उघडतात आणि देवीच्या नाकाला लावतात. तशी पद्धतच आहे. आणि मग तिचा चेहरा भक्तांना दाखवतात. पुण्यवान लोकांना म्हणे तिचा झिंगता चेहरा आरशात दिसतो. खूप लहान असताना मला खूप टेन्शन यायचं. कारण मला ती झिंग कधीच दिसली नाही. आता बोला. देवाला हवी की नको ? त्याच्या समोर चालते की नाही ? माझा त्याचा फारसा सबंध भर यौवना पासुन नाहीच. म्हंजे त्यांच्या पैकी - गणपतीआदी - कुणाचाच संपर्क नाही, फारसा परिचय ही नाही. त्यामुळे त्यांच्या संदर्भात पाळायची पथ्ये ही फारशी माहिती नाहीत. पण वाचना मुळे त्यांच्या - म्हंजे दिवाबिवाच्या - काही खास बाबी माहिती आहेत. म्हंजे परमेश्वराने चराचर व्यापलेले आहे. आणि तो सगळीकडे असतो.आणि आपण जे जे करतो त्याची म्हणे तो नोंद ठेवतो. आणि त्या नोंदींचा रेफरन्स घेऊन मेल्यावर आपल्या पाप पुण्याचा म्हणे हिशोब तो मांडतो. आणि मग आपले डीपार्टमेंट ठरवतो. म्हंजे नरक की स्वर्ग वगैरे. आता एव्हढी लांबलचक श्रद्धा ठेवणा-यांना हे माहिती नसतं का ? एखादे पाप करताना आपल्याला तो पाहतोय ? गुप्तपणे ! त्यामुळे तो घरी आला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. त्याचा वार असला काय किंवा नसला काय, फरक नाई पडला पाहिजे. कारण तो चराचर व्यापुन राहिलाय ना. भक्त प्रह्लादाने नाई का त्याच्या उद्दाम बापाला, हिरण्यकश्यपुला सांगितलं होतं की माझा नारायण सगळी कडे आहे. या खाम्बामध्येही आहे. त्याच्या बापाने मग खांबाला लाथ मारली. लाथ लागल्यामुळे रागावून त्यातून नरसिंह नामक नारायणाचा अवतार बाहेर आला .त्याने हिरण्यकश्यपुला मारून टाकलं. हे सगळ्यांना मीहिती असेलच ना. म्हंजे श्रद्धाळूना तरी. पण तरीही हेच श्रद्धाळू " चोरून" एखादी गोष्ट कशी करू शकतात ? चोरून म्हंजे इकडे तिकडे कुणी बघत नाही असं बघून. वा समजून. हो, म्हंजे डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजरी सारखं. शिर्डीच्या एका भक्ताने कमाल केली. एक सोन्याने मढवलेली शाल बनवली. किमती हिऱ्यांचा भराव असलेली.एकदम महागडी. तशी सगळी कडे बातमी फुटली. टीवी वर, पेपरात, इमेल वर दणका चालु झाला. करोडो रुपयाची शाल. भल्या भल्या भक्तांना फ़्रस्ट्रेट करून टाकलं. त्याना वाटलं हा सगळ्यात जवळ जाणार बाबांच्या. आपल्या पुढे. आपण तर फक्त चांदीचा मुकुटच चढवलाय. पण थोड्याच दिवसात गम्मत झाली.ती सोन्याची शाल खोटी असल्याची देवस्थानाला कुणीतरी सांगितलं. तो हिरो हे 'प्रामाणिक' पणे कबुल करून रिकामा झाला. मला तेच म्हणायचंय. देवावर आहे ना तुमचा विश्वास? मग तो सगळी कडे आहे हे कसं काय बुवा ही जनता विसरू शकते ? कित्येक चोरांच्या बातम्या टीवी वर वगैरे असतात ना. अमकी चादर चढवली. तमकी पूजा बांधली. या जनतेवर भ्रष्टाचाराचे, धमकी दिल्याचे वा अन्य कसले तरी हमखास आरोप कसे असतात? त्या जेडे च्या मारेक-या चा कुठल्यातरी देवावर विश्वास होता. खून केल्यावर तो पहिल्यांदा त्या देवाला गेला असे कुठेतरी वाचलं. म्हंजे येडं कोण आहे ? जनता की देव ? भक्ती बरोबर येणारी नैतिकता मला कधी दिसत नाही त्यामुळे ही त्याचे आणि आपलं कधी जमलंच नाही. तो एकतर नसावाच किंवा असला तर अत्यंत अकार्यक्षम म्हंजे ढिम्म असावा. कुठे दिसला नाही त्यामुळे आपण नाई त्याच्या मागे धावणार असे म्हटलं तर हमखास एक टोमणा कानावर येतो की तो पापी लोकांना दिसत नाही. हो पण माझे जाऊ द्या हो. तो असेल तर काही ठिकाणी त्याने त्याचा प्रताप दाखवायलाच हवा होता. पंधरा वीस दिवसापूर्वी असेल, एका कार्यालयात वाट बघत मुंबईत बसलो होतो. वेळ घालवायला समोर टेबलावर पडलेला टाइम्स ऑफ इंडिया चाळायला घेतला. ती बातमी वाचायची नव्हती पण परत परत तिकडे डोळे जात होते. शेवटी डोळ्यांनी माझ्या मनाला घट्ट पकडलं आणि त्या बातमीवर घेऊन गेले. घटना मुंबईतली. एक चिमुरडी सुमारे आठ नऊ वर्षाची. बिस्कीट आणायला घराजवळच्या दुकानाकडे उड्या मारत चाललेली. वाटेत तिचा बाप भेटला. तो हल्ली फारसा घरी नसतो. बाबा भेटल्यावर चिमुरडीला आनंद झाला. तो म्हणाला चल माझ्याबरोबर. तश्याच उड्या मारत ती बाबा बरोबर गेली. एक २० - २१ वर्षाच्या पोराकडे तो बाप तिला घून गेला. त्याला म्हणाला ही घे तुला. हिचे काय करायचं ते कर. त्या हरामखोर बापाला आई ने घराबाहेर काढलं होतं. कारण आपल्याच तीस वर्षाच्या पोरीबरोबर त्याला झोपायचं होतं. घराबाहेर काढलं म्हणुन तो बायकोवर चिडला होता. तिचा बदला घ्यायचा होता. तो २० - २१ वर्षाचा गुंड तिला एका स्टेशन वर घेऊन गेला. वारंवार तिच्यावर बलात्कार त्याने केला. काम झाल्यावर रुळा शेजारच्या एका नाल्यात तिला फेकून दिली. वेदनेनं बेजार झालेली चिमुरडी आक्रोश करत त्या दलदली मध्ये गटांगळ्या खाऊन मेली. मला वाचुन दरदरून घाम फुटलेला. शरीर प्रचंड थरथरत होतं. पळत फ्रेश रूम मध्ये जाऊन उलटी होते का पाहिलं. जमलं नाई. धावत गाडी कडे गेलो. बसलो. सुरु केली. लांबवर गेलो. काचा बंद केल्या जोरजोरात पाच मिनिटं. किंचाळलो. थोडा मोकळा झालो. ....... मला आकाशातला मायबाप दिसत नाही. हे मान्य. पण त्या चिमुरडीचा काय हो दोष? पाप आणि पुण्याच्या चक्रात अजुन अडकलेलाही नव्हता तो जीव. मग तिच्या वर एव्हढा भीषण अत्याचार होताना चराचर व्यापलेला तो परमेश्वर करत काय होता, शेजारी उभा राहुन? तो असेल वा नसेल. मी दखल घेण्याच्या लायकीचा तो नक्की नाही, माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच. sudhirmutalik@gmail.com
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
28110 वाचन

💬 प्रतिसाद (117)

प्रतिक्रिया

परमेश्वरावर श्रद्धा हा पर्याय

शुचि
Tue, 09/06/2011 - 20:16 नवीन
परमेश्वरावर श्रद्धा हा पर्याय नाही तर माझा "निर्णय" आहे. एकदा पर्याय नसून निर्णय आहे म्हटले म्हणजे मग कोणतीही घटना श्रद्धा डळमळीत करू शकत नाही. आपण वर्तमानपत्रात वाचतो - अवतीभवती "हीन / नीच" कृत्ये घडतच असतात पण त्याबरोबरच मंगल, चांगल्या, शुभ घटनादेखील घडत असतात. कोर्‍या कगदावरचा काळा ठीपकाच बघायचे म्हटले तर कोणीही काहीच करू शकत नाही. मला एक इंग्रजी गाणे आठवते - "I beg your pardon, I never promised you a rose garden Along with the sunshine There will be rain sometime" तद्वतच ईश्वराने कधी सर्व चांगलेच घडेल अशी गॅरेंटी दिल्याचे ऐकीवात नाही मग या अपेक्षा का? नास्तिक म्हणवणारे देखील कुठेतरी या अपेक्षा करतात आणि त्या पूर्ण न झाल्याने बिथरून देवाविरुद्ध जातात.
  • Log in or register to post comments

लेख आवडला आणि विचारांशी सहमती.

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/06/2011 - 21:33 नवीन
नास्तिक म्हणवणारे देखील कुठेतरी या अपेक्षा करतात आणि त्या पूर्ण न झाल्याने बिथरून देवाविरुद्ध जातात.
शुचिताई, नास्तिक किंवा निरीश्वरवादी बनेपर्यंत नास्तिकांचे विचार समजणं कठीण आहे. बिथरून देवाविरुद्ध गेलेले नास्तिक नसतीलच असंही नाही, पण माझ्या ओळखीतली एकही नास्तिक व्यक्ती बिथरून, प्रतिक्षिप्त क्रियेतून किंवा आततायीपणामुळे नास्तिक झालेली नाही. नास्तिकांचा ना देवावर विश्वास असतो ना सैतानावर. त्यांना काळा ठिपकाही दिसतो आणि त्यांना त्याचा आकारही मोजता येऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

भाग्यवान आहात...

मूकवाचक
Fri, 09/16/2011 - 10:32 नवीन
पण माझ्या ओळखीतली एकही नास्तिक व्यक्ती बिथरून, प्रतिक्षिप्त क्रियेतून किंवा आततायीपणामुळे नास्तिक झालेली नाही.... भाग्यवान आहात. प्राग्जन्मीची पुण्याई नाही तर आणखी काय म्हणावे याला? असे भाग्य सगळ्यान्च्याच वाट्याला का नसावे हे तो परमेश्वरच जाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

फारच भोळ्या ब्वॉ तुम्ही काकू!!

Nile
Sat, 09/10/2011 - 14:59 नवीन
कोर्‍या कगदावरचा काळा ठीपकाच बघायचे म्हटले तर कोणीही काहीच करू शकत नाही.
One contradiction and there goes your theory in dust bin.
"I beg your pardon, I never promised you a rose garden Along with the sunshine There will be rain sometime"
'ऐदी मनाला बरं असतं काव्याचं मालीश'! ;-)
तद्वतच ईश्वराने कधी सर्व चांगलेच घडेल अशी गॅरेंटी दिल्याचे ऐकीवात नाही मग या अपेक्षा का?
त्याने काही म्हणलेलं तुम्ही कोणत्या स्पीकरवर कधी ऐकलंय का? आं? मग त्याच्या अस्तित्वाच्या अपेक्षा का? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

लेख

मुक्तसुनीत
Tue, 09/06/2011 - 20:21 नवीन
लेख आवडला. त्यातल्या मतांशी नि विचारांशी पूर्ण सहमती व्यक्त करतो. असे करताना माझ्यापेक्षा वेगळी मते असणार्‍यांचा अनादर होणार नाही अशी आशा बाळगतो.
  • Log in or register to post comments

सहमत

विनीत संखे
Tue, 09/06/2011 - 20:36 नवीन
अगदी मनातलं बोल्लात. मीही नास्तिक आहे. श्रद्धा आहे ती निसर्गावर ... म्हणून आईवडिलांना खूश करण्यासाठी देवाला हात जोडतो तेव्हा निसर्गाला "जे चालू आहे ते चालू रहावं" एवढंच सांगतो. (हे लिहिताना गौरी गणपती विसर्जनाला निघालेत आणि 'तेरी भाई से बात करादू आ चलती क्या?' ह्या गाण्यावर आया, काक्या, माम्या नाचताना दिसतायंत...)
  • Log in or register to post comments

शेवटी भयानक प्रसंग सांगितलाय.

रेवती
Tue, 09/06/2011 - 20:39 नवीन
शेवटी भयानक प्रसंग सांगितलाय.
  • Log in or register to post comments

भक्ती बरोबर येणारी नैतिकता

मदनबाण
Tue, 09/06/2011 - 21:17 नवीन
भक्ती बरोबर येणारी नैतिकता मला कधी दिसत नाही त्यामुळे ही त्याचे आणि आपलं कधी जमलंच नाही. ज्याच्याकडे नैतिकताच नसेल तो भक्ती कशी करु शकेल ? त्याला तर भक्तीच ढोंग म्हणता येईल. अत्याचार होताना चराचर व्यापलेला तो परमेश्वर करत काय होता, शेजारी उभा राहुन? ह्म्म... ह्या विचाराला मी चूकीचा विचार म्हणणार नाही. देव दर्शनाला जाताना किंवा तिथुन परत येताना भक्त मंडळी अपघातात ठार झाल्याची अनेक उदाहरणे वाचनात येतात... तेव्हा ही अश्या प्रकारचा विचार मनात येणे सहाजिक आहे.परंतु भोग भोगल्या शिवाय सुटका नाही हा विचार जर मनात आला तर मनाचा त्रागा होत नाही. जे काही क्लेष / पिडा होते ती त्या नश्वर शरीराला. ज्या प्रमाणे आपण वेग वेगळी वाहने वापरुन प्रवास करतो आणि इच्छित स्थळी पोहचतो,त्याच प्रमाणे आत्मा त्याच्या कर्मा नुसार विविध देह धारण करतो...ज्याचे इच्छित स्थळ हे मोक्ष असावे लागते. मनुष्य आजन्म या नश्वर जगाचा विचार करत राहतो, आणि जन्म मॄत्युच्या फेर्‍यातुन बाहेर पडण्याचा विचार करण्या पेक्षा भौतिक जगातील सुख मिळवण्याचाच विचार करतो... कठीण समय येताच त्याला भगवंताची आठवण येते, इतर वेळी त्याला त्याच भगवंताचा विचार करायला वेळ मिळत नाही ! तुम्ही जे पाशवी अत्याचाराचे उदाहरण दिले आहे ते या युगाचे द्योतक आहे असे म्हणीन... कलियुगाचे वर्णन वाचल्यास याहुन भयानक घटना भविष्यात घडतील असे समजुन येइल. जाता जाता :--- फक्त येव्हढेच म्हणावेसे वाटते की हायेस्ट लेव्हल ऑफ नॉलेज इज नॉलेज ऑफ गॉड...
  • Log in or register to post comments

प्रश्न

मुक्तसुनीत
Tue, 09/06/2011 - 22:19 नवीन
तेव्हा ही अश्या प्रकारचा विचार मनात येणे सहाजिक आहे.परंतु भोग भोगल्या शिवाय सुटका नाही हा विचार जर मनात आला तर मनाचा त्रागा होत नाही. जे काही क्लेष / पिडा होते ती त्या नश्वर शरीराला. मूळ लेखात जो लहान मुलीचा प्रसंग वर्णिला आहे त्यातल्या मुलीने कसले भोग भोगणे अभिप्रेत होते ते कळले तर बरे होईल. बरे हे अभिप्रेत असणे कुणी ठरवले ? हे जे कुणी ठरवतो/ठरवते/ठरवतात त्यांनी कुठल्या निकषावर ठरवले ? नक्की कुठला विचार मनात आणला असता त्या मुलीला मरणाच्या आधी "त्रागा" झाला नसता तेही कळले तर आनंदच होईल. "त्रागा होणार नाही/त्रागा करून घ्यायचा नाही " या विधानाला पूरक असं एक फार जुनं विधान मला याक्षणी आठवलं : "धर्म ही अफूची गोळी आहे." :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

साधी उत्तरं

राजेश घासकडवी
Tue, 09/06/2011 - 21:47 नवीन
पण त्या चिमुरडीचा काय हो दोष? पाप आणि पुण्याच्या चक्रात अजुन अडकलेलाही नव्हता तो जीव. मग तिच्या वर एव्हढा भीषण अत्याचार होताना चराचर व्यापलेला तो परमेश्वर करत काय होता, शेजारी उभा राहुन?
अहो, असले क्षुद्र प्रश्न तुम्हाला कसे पडतात कोण जाणे! एवढं साधं कसं उसकटून सांगावं लागतं तुम्हाला? तो तिथेच होता. तिच्यात होता, तसाच त्या नराधमातही होता. त्या मुलीने गेल्या जन्मात जी पापं केली त्याचं प्रायश्चित्त त्या नराधमाकरवी देत होता. ज्याने बलात्कार केला त्याचा काहीच दोष नाही. त्याला त्याच्या पुढच्या जन्मात अशाच अभागी मुलीचा जन्म दिला की झालं. इतक्या सगळ्या पापांचा बॅलन्स पूर्ण करण्यासाठीच नवीन नवीन मानवांना जन्म देऊन नाईलाजाने त्यांच्याकडून पापं करवावी लागतात. तोच ती करवतो. तुम्ही हे सगळं फारच मनावर घेत आहात. शरीर नश्वर आहे, तेव्हा अभागीपण व नराधमपण हेही नश्वरच आहे. कर्ता करवता तोच आहे.
तो असेल वा नसेल. मी दखल घेण्याच्या लायकीचा तो नक्की नाही, माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच.
ही बुद्धीसुद्धा तुम्हाला त्यानेच दिली की नाही? हे विचार मांडण्याची इच्छाही त्यानेच दिली ना... मग म्हणा 'जय तो!' आणि वर लोकांना प्रश्न पडतात परमेश्वर ती का नसेल म्हणून. मातेच्या हृदयाची परमेश्वर कळवळेलच ना आपल्या लेकरांकडून असलं काही करवून घ्यायला? पण ते केलं नाही तर इतक्या लोकांच्या गेल्या जन्मीच्या पापांचा बॅलन्सचं काय करायचं? परमेश्वर झाला म्हणून काय झालं, देणी चुकवावीच लागतात.
  • Log in or register to post comments

पहिलं पाप

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/09/2011 - 20:38 नवीन
बरं तर मग पहिलं पाप कोणी आणि का केलं याचं काही उत्तर? पाप म्हटल्यावर पुन्हा जॉन अब्राहम... असो. तो पिक्चर बघण्याचं पाप मी कसं फेडू? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पहिलं?

मन१
Fri, 09/09/2011 - 20:47 नवीन
पाप्-पुण्य, जन्म मरण हे अनादि आहे, अनंत आहे. त्यात पहिलं असं काही नाही. जे पाहिलं तुम्ही समजाल त्याच्याहूनही आधी काहीतरी आहे, जे शेवटचं समजाल त्याच्याही पलीकडे काही आहे, बालिके. भौतिक दु:ख हे अपादान कारण तसेच उपादान कारनातुन होते. यष्टी समष्टी आणि परदृष्टी ह्यासमाधी लावुन पाहिल्या की सृष्टीचे गूढ उकलत जाते. चित्तभ्रांती दूर होउन जिवात्म्याला शिवाचे दर्शन होते. दर्शनमात्रे वेदनलवणसागर पार करणारा भगवंत मग तुमच्यावर प्रसन्न होतो. प्रसन्न झाल्यावर तुम्हाला कळते की जो प्रसन्न झालाय तो वस्तुतः कुणीच नाही, तुम्ही स्वतः आहात. ह्या गोष्टीवरही तुम्ही बेहद्द खुश झालात की कळते की तुम्हीही नाही आहात आणि भगवंतही नाहिये! ("नेति नेति" , "हेही नाही हेही नाही" असे हे वेदांताचे अद्भुत सार आहे!) ह्यालाच अद्वैत सिद्धांत म्हणतात. एकदा "ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या" हे शंकराचार्यांच्या सुप्रसिद्ध अद्वैतसिद्धांताप्रमाणे मान्य केलं की घडणारे अत्याचार आणि किळसवाण्या गोष्टींचा त्रास अगदि दूर होतो; कारण मुळात तसं काही घडतच नाहिये हे समजु लागतं. म्हणजे हा धागाही खोटा, त्यातल्या घटनाही खोट्या, माझं लिहिणंही खोटं, तुझं वाचणं त्याहुनही मिथ्या---खोssssssटंच. मुळात असं काही होतच नाहिये, सगळाच भ्रम आहे. तिकडे फुटलेले बाँब खोटे, मेलेली माणसे आणि त्यांच्या वेदना खोट्या. बादवे, सगळ्या जगाला खोटं म्हणणार्‍यांना कुणी बेदम मरेस्तोवर खोट्या जगातला खोटा मार दिला आणि त्यात त्यांचा खोट्या वेदनेने कळवळत खोटा मृत्यु झाला तर त्यांना चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत
Fri, 09/09/2011 - 20:51 नवीन
पारलौकिकाचे इंद्रजाल निर्माण करणार्‍या व्यवस्थेमागच्या "तत्वज्ञाना"ची खिल्ली आवडली. "परमेश्वराला रिटायर करा" या श्रीराम लागूंच्या (त्यावेळी प्रक्षोभक ठरलेल्या) विधानाची प्रकर्षाने आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

इंद्रजाल का मायाजाल?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/09/2011 - 21:48 नवीन
पाप-पुण्य, जन्म मरण हे काय ऊर्जा आहे काय, neither be created nor be destroyed? बरं पुन्हा एखाद्याने ते तुम्ही (म्हणजे मनोबा) म्हणता तसं तर तसं; पण 'जन्म मरणाचा फेरा चुकविला' तर त्याच्या खात्यात बेरीज काय होते? शून्य असते का पुण्य जास्त असतं? पुण्य (किंवा पाप) भोगून संपलं नसेल तर त्याच्या खात्यातलं पुण्य-पापाचं काय होतं? ते नष्ट होतं का इतर कोणाच्या खात्यावर वळतं होतं? शून्य कसं होतं? बालिकेच्या वाटेचं पाप संपलं पण कोणाच्या नावावर, ज्याला आपण कलियुगातले मर्त्य लोक नराधम म्हणतो आहोत ते आलंच की!
तिकडे फुटलेले बाँब खोटे, मेलेली माणसे आणि त्यांच्या वेदना खोट्या. बादवे, सगळ्या जगाला खोटं म्हणणार्‍यांना कुणी बेदम मरेस्तोवर खोट्या जगातला खोटा मार दिला आणि त्यात त्यांचा खोट्या वेदनेने कळवळत खोटा मृत्यु झाला तर त्यांना चालेल का?
त्यांना चालेल का हे त्यांनाच विचारा? सध्याच्या कायद्यापासून मार देणार्‍यांना कसं वाचवायचं हे आधी शोधा.
"परमेश्वराला रिटायर करा" या श्रीराम लागूंच्या (त्यावेळी प्रक्षोभक ठरलेल्या) विधानाची प्रकर्षाने आठवण झाली.
(बहुदा) स्टीफन हॉकिंगने सर्वशक्तीमान देवासंदर्भात एक प्रश्न विचारला आहे तो आठवला, "Can god make a stone which he cannot lift?" भीतीच्या आधारावर उभा असणारा धर्माचा डोलारा नाकारणारा बर्ट्रांड रसल खूप तार्किक वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

येकदम बेस आर्ग्युमेण्ट ओ

क्राईममास्तर गोगो
Sat, 09/10/2011 - 13:27 नवीन
येकदम बेस आर्ग्युमेण्ट ओ बाई! चरकाला आपण सगळे धन्वंतरीचा अवतार मानतो. पण तोच स्वत: नास्तिक होता. आपल्या 'चरक संहितेत' सरळसरळ म्हणायचा की, "स्वर्ग आणि नरक प्रत्यक्ष पाहिलं नसताना सुद्धा आपण ते कसं काय मानू शकतो आणि जर स्वर्ग आणि नरकच मिथ्या असतील तर पाप पुण्याचा हा सारा तपशीलच चुकीचा आहे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडी भर ...

मूकवाचक
गुरुवार, 09/15/2011 - 17:49 नवीन
ब्रह्म सत्य, जगत मिथ्या इतकाच तो सिद्धान्त नाही. त्यापुढे 'सर्वम खलु इदम ब्रह्म' हेही येते. भौतिक दु:ख हे अपादान कारण तसेच उपादान कारनातुन होते. यष्टी समष्टी आणि परदृष्टी ह्यासमाधी लावुन पाहिल्या की सृष्टीचे गूढ उकलत जाते. चित्तभ्रांती दूर होउन जिवात्म्याला शिवाचे दर्शन होते. दर्शनमात्रे वेदनलवणसागर पार करणारा भगवंत मग तुमच्यावर प्रसन्न होतो. प्रसन्न झाल्यावर तुम्हाला कळते की जो प्रसन्न झालाय तो वस्तुतः कुणीच नाही, तुम्ही स्वतः आहात. ह्या गोष्टीवरही तुम्ही बेहद्द खुश झालात की कळते की तुम्हीही नाही आहात आणि भगवंतही नाहिये! ("नेति नेति" , "हेही नाही हेही नाही" असे हे वेदांताचे अद्भुत सार आहे!) ह्यालाच अद्वैत सिद्धांत म्हणतात.... हा पोरकट अन्वयार्थ अलीकडे काही स्वघोषित ज्ञानी जरी जोरजोराने सान्गत असले, तरी हा मूळ अद्वैत सिद्धान्त नाही. मुळात अद्वैतानुभूती ही वैचारिक कसरत, बौद्धिक निष्कर्ष नाही. शिवाय अद्वैतानुभूती आलेला फक्त जागतिक घडामोडीबद्दल उदासीन असतो असे नव्हे, तर तो आपल्या इन्द्रिय उपभोगापासूनही पूर्णपणे मुक्त असतो, मानसिक वासना, इच्छा, अपेक्षा या पलीकडे असतो. जेमतेम देहधारणेपुरती भिक्षा स्वीकारून एखादे वस्त्र लपेटून तो निरपेक्षपणे जगतो. ती बाजू सोयिस्करपणे का विसरायची? पराकष्ठेचे वैराग्य असल्याशिवाय ज्ञानमार्ग, अद्वैतानुभूती, अपरोक्षज्ञानाच्या गमजा मारू नयेत असे सगळे सन्त उच्चरवाने सान्गतात. नैष्कर्म्य सिद्धी (खरीखुरी) मिळेतोवर कर्तव्य टाळू म्हणता अधःपात होईल, अध्यात्मिक प्रगती नाही हा इशाराही ते देतात, ते कशासाठी? कुणासाठी? असो. (आद्य शन्कराचार्य - वेध एका महावताराचा या पुस्तकात, रमण महर्षी यान्च्या सन्दर्भातल्या 'डे बाय डे' या पुस्तकात तसेच परान्ड्याच्या हन्सराज स्वामी यान्च्या 'वेदेश्वरी' सारख्या ग्रन्थात याविषयी सविस्तर उहापोह आहे. अवश्य वाचा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

हा उपहास अनाठायी नाही ...

मूकवाचक
गुरुवार, 09/15/2011 - 17:54 नवीन
पण इथे ज्या तत्वज्ञानाचा उपहास केला आहे, ते निदान भगवद्वीतेशी तरी विसन्गत आहे. उत्तरे इतके साधी, सोपी नाहीत म्हणून तर कर्म, ज्ञान, उपासना, प्रत्येक व्यक्तीचा स्वधर्म, कर्तव्यकठोरपणा, द्वैत, अद्वैत वगैरे तत्वविचार हे सगळे ओघानेच येते. काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात असे वाटते - गेल्या जन्मीचे भोग असल्याने कौरव तुमचे भाउबन्द झाले, तेव्हा त्याना सारे साम्राज्य देऊन भीक मागा/ तेरापन्थी लोकान्सारखे जे जे घडेल ते निव्वळ तमाशासारखे बघत बसा असा उपदेश कृष्णाने केलेला नाही. तत्वतः अद्वैत असले (त्याच्यात, तुझ्यात आणि कशाकशात जरी एकच चैतन्य खेळत असले) तरी व्यावहारिक पातळीवरचे द्वैत लक्षात घेऊन त्या सन्दर्भाने येणारे आपले कर्तव्य मोह, ममत्व त्यागून सर्वस्व पणाला लावून बजावले पाहिजे असा उपदेशच गीतेत पदोपदी केलेला आहे. तत्वतः अद्वैत मान्य असेल तरच व्यक्तिगत असूया, स्वार्थ आणि निव्वळ हेवेदावे यापलीकडे जाऊनही, तुझे आणि माझे, तू शहाणा की मी शहाणा यासारख्या खालच्या पातळीवरच्या द्वैतभावनेपलीकडे जाउनही कर्तव्यभावनेने, व्यापक दृष्टीकोनातून क्षात्रधर्म (ज्याचा त्याचा स्वधर्म) पाळता यायला मदत होते. कर्माचा सिद्धान्त मान्य करा/ न करा - कर्मबन्ध टळत तर नाहीच. उलट पदोपदी अनुभवता येतो. मीपणाने वागणार्याला तर तो जास्तच नाडतो, पिडतो. तो मान्य करणे कर्तव्य बजावण्याच्या आडही येत नाही/ येता कामा नये. असो. एकसमयावच्छेदेकरून जगभरच्या प्रत्येक जीवमात्राचे आत्ताच्याआत्ता विनाअट आणि सरसकट परमकल्याण झाले तरच परमेश्वरी सत्ता आहे असे मानेन अशी कुणाची अट असेल, तर तो नास्तिक/ अज्ञेयवादी वगैरे होणारच. ते स्वाभाविक आहे. इथे जी बाजू प्रकर्षाने मान्डली गेली आहे, त्याच नाण्याची दुसरी बाजू अशी की सगळेच आस्तिक स्वार्थ साधणे, भीतीपोटी, फुकटात काहीतरी मिळण्याची आशा, आपला मानसिक त्रास टळावा यासाठी काहीतरी पारलौकिक कल्पना बफर सारख्या वापरणे हे प्रकार करत नाहीत. साक्षात्कारी सन्त, प्रचितीचे बोल बोलणारे खरे भक्त, ज्ञानीजन, निष्काम कर्मयोगी यापैकी कुणीही त्या कॅटेगरीमधे मोडत नाहीत. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातूनच साकार करणारे कित्येक सत्पुरूष भारतात (आणि इतरत्रही) होऊन गेले, आहेत आणि होतील. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पण इथे ज्या तत्वज्ञानाचा

मदनबाण
गुरुवार, 09/15/2011 - 18:09 नवीन
पण इथे ज्या तत्वज्ञानाचा उपहास केला आहे, ते निदान भगवद्वीतेशी तरी विसन्गत आहे. अहो, मूकवाचकराव कोणाला सांगत आहात तुम्ही हे सर्व ? भगवद्वीता वगरै सर्व झूठ आहे,जमल्यास रंणागाणात कृष्णाने अर्जुनाला दिलेली अफूची गोळी होती असे समजा कसे ! ;) बहुतेक काही जणांचा SQ मिसिंग असावा... किंवा नसावाच बहुधा. ! ;) (http://en.wikipedia.org/wiki/Spiritual_intelligence / http://en.wikipedia.org/wiki/Spiritual_quotient ) असो, उगाच समर्थांनी सांगितलेली पढत मूर्खांची लक्षणे आठवली... ;) जाता जाता :--- गुरुत्वाकर्षण कशाने उत्पन होते हे अजुन नासावाले सुद्धा सांगु शकले नाहीत! ;) ते काम कसे करते येवढेच त्यांना माहित ! (इस्कॉन प्रेमी) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

गुरुत्वाकर्षण कशाने उत्पन

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 19:34 नवीन
गुरुत्वाकर्षण कशाने उत्पन होते हे अजुन नासावाले सुद्धा सांगु शकले नाहीत! ते काम कसे करते येवढेच त्यांना माहित !
नासा ही संस्था सर्वसाधारण माणसाला माहित असते ती आंतरिक्ष यानं आणि कृत्रिम उपग्रह या संदर्भात. तर या गोष्टींमधून गुरूत्वाकर्षण वगैरे सिद्धांतांचा अभ्यास शक्यतोवर होत नाही. गुरूत्वाकर्षण हा सैद्धांतिक अभ्यासाचा विषय आहे आणि त्या अभ्यासासाठी नासा हे एकमेव ठिकाण नाही. गुरूत्वाकर्षण विश्वात सगळीकडे आहे आणि सैद्धांतिक अभ्यास करणार्‍या संस्थाही जगात सगळीकडे आहेत. पण हा मुख्य मुद्दा नव्हे. विज्ञानाची मर्यादा आहे की 'का' हा प्रश्न विचारला तरी 'कसं' या प्रश्नाचं उत्तर मिळतं. गुरूत्वाकर्षण वस्तुमानामुळे येतं, ग्रॅव्हीटॉन्स या कणांचा सिद्धांतही मांडला गेला आहे. वस्तूमान असेल तर गुरूत्वाकर्षण का असतं हा विज्ञानाच्या अभ्यासाचा भागच नाही. हातात एकच फूटपट्टी देऊन, आता सांगा हवेचा दाब किती, असा प्रश्न विचारण्यासारखं हे उपरोल्लेखित वाक्य आहे. मदनबाण, तुम्हीसुद्धा पहिलं पाप कुठून आलं या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी मला चालेल. मूकवाचक, तुम्ही मराठीत लिहाल का प्लीज? यष्टी, समष्टी आणि परदृष्टी यात मला "यष्टी" या शब्दाचे दोन अर्थ माहित आहेत, एस.टी. नाहीतर क्रिकेटचे स्टंप. समष्टी म्हणजे सर्वच आणि परदृष्टी म्हणजे नक्की कल्पना नाही. पण हे तीन शब्द एकत्र वाचून गडबड होते आहे. "नेति" हा शद्ब अशुद्धलेखन वाटून, नेता या शब्दाचा स्त्रिलींगी शब्द "नेती" हवा असं वाटतं. काय आहे, माझा आध्यात्मिकच काय, भाषिक आणि बौद्धीक कोशंटही अंमळ कमीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

नासा ही संस्था सर्वसाधारण

मदनबाण
गुरुवार, 09/15/2011 - 20:23 नवीन
नासा ही संस्था सर्वसाधारण माणसाला माहित असते ती आंतरिक्ष यानं आणि कृत्रिम उपग्रह या संदर्भात. तर या गोष्टींमधून गुरूत्वाकर्षण वगैरे सिद्धांतांचा अभ्यास शक्यतोवर होत नाही. ह्म्म... आंतरिक्ष यान अंतराळात पाठवायला त्यांना गुरूत्वाकर्षणाचा विरोध करावाच लागत असेल नै ! ;) म्हणजे गुरूत्वाकर्षण मोडुन काढण्यासाठी किती शक्ती /इंधन इं गोष्टींचा विचार त्यांच्या टाळक्यात येत असावा असे मला वाटते. मला तर मग त्यांच्या अभ्यासासाठी गुरूत्वाकर्षण हा पाया दिसतो, आणि त्याचाच त्यांना पत्ता नाय ! ते म्हणतात We don't really know. संदर्भ :--- http://starchild.gsfc.nasa.gov/docs/StarChild/questions/question30.html जाता येता स्टीफन हॉकिंगने / आईनस्टाइन यांची उदा. देता त्यांना पण गुरूत्वाकर्षण कशाने उत्पन झाले याचे उत्तर देता आलेले नाही. पण आमच्याकडे आहे, अर्थातच परमेशवर ! ;) यासाठी संदर्भ अर्थातच गीता ! ;) गुरूत्वाकर्षण हा सैद्धांतिक अभ्यासाचा विषय आहे आणि त्या अभ्यासासाठी नासा हे एकमेव ठिकाण नाही. गुरूत्वाकर्षण विश्वात सगळीकडे आहे आणि सैद्धांतिक अभ्यास करणार्‍या संस्थाही जगात सगळीकडे आहेत. पण हा मुख्य मुद्दा नव्हे. तसेच आध्यात्म हा देखील सखोल अभ्यासाचा विषय आहे,आणि त्यासाठी आपल्या जगात अभ्यासु लोकांची देखील कमी नाही ! असो... हा देखील मुख्य मुद्दा नाही. ;) गुरूत्वाकर्षण वस्तुमानामुळे येतं, ग्रॅव्हीटॉन्स या कणांचा सिद्धांतही मांडला गेला आहे. वस्तूमान असेल तर गुरूत्वाकर्षण का असतं हा विज्ञानाच्या अभ्यासाचा भागच नाही. हातात एकच फूटपट्टी देऊन, आता सांगा हवेचा दाब किती, असा प्रश्न विचारण्यासारखं हे उपरोल्लेखित वाक्य आहे. माझ्या विज्ञान वादी टाळक्याला हे पटत नाय बॉ. का बरं अभ्यास करु नये ज्यावर सगळी गृहीतक/ गणित अवलंबुन आहेत ? तुम्हीसुद्धा पहिलं पाप कुठून आलं या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी मला चालेल. खी खी खी... थिल्लरपणे विचारलेला चिल्लर प्रश्न ! कोणत्या बाईने पहिल्यांदा साडी नेसुन स्वतःला आरशात पाहिले ? या प्रश्राचे उत्तर आधी द्या मग सांगतो हा. ;) जाता जाता :--- उद्या कोणी तरी बटर पनीर नावाच गोर माकड सांगेल की आत्मा बित्मा असतो वगरै ! तेव्हा त्यांचे वाचक लगेच ते मान्य करतील ! फिरंगी दाखवतील तीच पूर्व दिशा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अरेच्च्या!

Nile
गुरुवार, 09/15/2011 - 20:51 नवीन
>>आंतरिक्ष यान अंतराळात पाठवायला त्यांना गुरूत्वाकर्षणाचा विरोध करावाच लागत असेल नै ! म्हणजे गुरूत्वाकर्षण मोडुन काढण्यासाठी किती शक्ती /इंधन इं गोष्टींचा विचार त्यांच्या टाळक्यात येत असावा असे मला वाटते. मला तर मग त्यांच्या अभ्यासासाठी गुरूत्वाकर्षण हा पाया दिसतो, आणि त्याचाच त्यांना पत्ता नाय ! चालताना, जिने चढताना, जेवताना गुरुत्वाकर्षणाचा विरोध करावाच लागत असेल नै! म्हणजे तुमच्या टाळक्यात इ. गोष्टींचा विचार येत असावा असे मला वाटते. आणि तुम्हाला त्याचा पत्ता नाय!! गोष्टीचा उगम आणि त्याचा परिणाम हे दोन्ही दरवेळी आवश्यकच असेल असे नाही. गुरुत्वाकर्षणाचा शोधच त्याच्या परिणामाचा अभ्यास करून लागला. जसे रोजच्या जीवनात गुरुत्वाकर्णचा अभ्यास न करताही सवयीने, निरीक्षणाने आपण त्याला गृहीत धरून कामे करतो तसेच नासाचे लोक आंतराळ विज्ञानात त्याचे परिणाम कसे होतील हे निरीक्षणाने आणि इतर उपलब्ध ज्ञानाने/प्रयोगाने करत असतात. हे पुरेसे आहे का? माझे उत्तर हो, कारण तसे करून अनेक यशस्वी आंतराळ मोहिमा आपण केलेल्य आहेत. गुरुत्वाकर्षण निर्माण कसे झाले याचे ठाम उत्तर आता नसले तरी आंतराळ मोहिमा त्याशिवाय होण्यास काही अडचण नाही. विज्ञानात माहित नसलेल्या/ अस्तित्वात नसलेल्या कर्त्याला देवत्व देण्याची गरज नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 21:26 नवीन
म्हणजे गुरूत्वाकर्षण मोडुन काढण्यासाठी किती शक्ती /इंधन इं गोष्टींचा विचार त्यांच्या टाळक्यात येत असावा असे मला वाटते.
टीव्ही, मोबाईल, संगणक वगैरे वापरताना त्यात आत काय चालतं याची माहिती असण्याची गरज नसते; कोणती बटनं दाबली की काय होतं हे समजलं तरी चिक्कार असतं. गुरूत्वाकर्षणाचा नियम माहित असणं, त्याचा वापर करणं म्हणजे गुरूत्वाकर्षणाबद्दल संशोधन नव्हे. वैज्ञानिक संशोधनाबद्दल तुमचा थोडा गैरसमज झालेला आहे.
जाता येता स्टीफन हॉकिंगने / आईनस्टाइन यांची उदा. देता त्यांना पण गुरूत्वाकर्षण कशाने उत्पन झाले याचे उत्तर देता आलेले नाही. पण आमच्याकडे आहे, अर्थातच परमेशवर! यासाठी संदर्भ अर्थातच गीता !
हे तर सोडाच, कदाचित सचिन तेंडूलकरला गुरूत्वाकर्षणाचा नियमही सांगता येणार नाही. मग काय त्याने मारलेला बॉल गुरूत्वाकर्षणाचा नियम पाळणार नाही असं थोडीच आहे. ज्याचा जो अभ्यासाचा विषय नाही त्याला ते प्रश्न विचारून "बघ तुला हे येतच नाही" असं म्हणण्यात काय शहाणपण? असो. गुरूत्वाकर्षण म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर विज्ञानाभ्यासक स्टीफन हॉकिंग, आईनस्टाइन अशी देत नाही. व्याख्या देतं. तर मला काही संस्कृत येत नाही. गुरूत्वाकर्षण का आहे याचं उत्तर गीतेत दिलं आहे असं तुम्हाला समजतं तर तुम्ही सांगा की आम्हाला. आम्हाला माहिती मिळाल्याशी कारण, माहितीचा स्रोत कोणी/काही का असेना! उद्या स्टीफन हॉकिंगऐवजी मॅक्स तेगमार्कचं नाव आलं तर तो ही आमचा हीरो.
माझ्या विज्ञान वादी टाळक्याला हे पटत नाय बॉ. का बरं अभ्यास करु नये ज्यावर सगळी गृहीतक/ गणित अवलंबुन आहेत ?
अभ्यास जरूर करावा की. पण विज्ञानाच्या मुख्य मर्यांदांमधेच ही मर्यादा (का याचं उत्तर विज्ञानात नाही) आहे तर तुमच्या अभ्यासाला विज्ञान म्हणता येणार नाही. प्रश्न चिल्लर का थिल्लर ते सोडा, पण त्या मुलीच्या (म्हणे) आत्म्याने असं काय पाप गेल्या जन्मी केलं होतं की तिला असं काही भयानक मरण आलं? बरं, तुम्हाला उत्तर माहित नसेल तर उत्तर माहित नाही असं सांगा की!
उद्या कोणी तरी बटर पनीर नावाच गोर माकड सांगेल की आत्मा बित्मा असतो वगरै ! तेव्हा त्यांचे वाचक लगेच ते मान्य करतील ! फिरंगी दाखवतील तीच पूर्व दिशा
एकूण या वाक्यात तुच्छतावादाचा जो घाणेरडा भपकारा येत आहे त्यावर माझा जोरदार आक्षेप आहे. शिल्पा शेट्टीला बिग ब्रदर कार्यक्रमात शिल्पा पॉपडम म्हणणारी जेड गुडी आणि "बटर पनीर नावाच गोर माकड" यात मला काहीही फरक दिसत नाही. अर्थात यात काही व्यक्तिगत टीका नाही आणि असली तरी ती बिनबुडाच्या, व्यक्तिगत टीकेचं काय करायचं एवढा विचार मला करता येतो त्यामुळे ते अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून खपून जाईल. असो. अहो अमेरिकेत अनेक लोकं अजूनही पृथ्वी सपाट आहे असं मानतात. पण हे उदाहरण अगदीच फाल्तू/lame आहे. त्यामुळे दुसरं उदाहरण देते. काही (ज्यांच्या कातडीचा रंग मला माहित नाही अशा) लोकांचा न्यूटनने सांगितलेल्या गुरूत्वाकर्षणावर पूर्ण विश्वास नाही, ते माँड नावाचा सिद्धांत मांडतात. तर काय ते सांगतात म्हणून मी ऐकलं आणि मान डुलवली असा प्रकार होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

जाता येता स्टीफन हॉकिंगने /

मदनबाण
Fri, 09/16/2011 - 12:21 नवीन
जाता येता स्टीफन हॉकिंगने / आईनस्टाइन यांची उदा. देता त्यांना पण गुरूत्वाकर्षण कशाने उत्पन झाले याचे उत्तर देता आलेले नाही. पण आमच्याकडे आहे, अर्थातच परमेशवर ! यासाठी संदर्भ अर्थातच गीता ! परमेश्वर सॄष्टीचे रचेता असल्याने माझ्या विधानाचा आधार गीता आहे असे मी म्हंटले आहे संदर्भ :--- सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्।कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्॥९- ७॥ अधिक अभ्यासाठी अध्याय ७ आणि ९ अभ्यासुलोकांनीच वाचावा... कारण बर्‍याच जणांचा अभ्यास वेगळ्याच गोष्टीत दिसुन येतो. ! ;) त्या मुलीच्या (म्हणे) आत्म्याने असं काय पाप गेल्या जन्मी केलं होतं की तिला असं काही भयानक मरण आलं? बरं, तुम्हाला उत्तर माहित नसेल तर उत्तर माहित नाही असं सांगा की! ह्म्म्म... त्या मुलीने काय पाप केल होत हे मी सांगु शकत नाही, कारण मी " परमेश्वर" नाही. ;) परंतु या श्लोकाचा आधार घेतला तर पाप असतं असे निश्चित म्हणु शकेन... प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः।अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम्॥६- ४५॥ एकूण या वाक्यात तुच्छतावादाचा जो घाणेरडा भपकारा येत आहे त्यावर माझा जोरदार आक्षेप आहे. शिल्पा शेट्टीला बिग ब्रदर कार्यक्रमात शिल्पा पॉपडम म्हणणारी जेड गुडी आणि "बटर पनीर नावाच गोर माकड" यात मला काहीही फरक दिसत नाही. अर्थात यात काही व्यक्तिगत टीका नाही आणि असली तरी ती बिनबुडाच्या, व्यक्तिगत टीकेचं काय करायचं एवढा विचार मला करता येतो त्यामुळे ते अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून खपून जाईल. असो. खी खी खी... च्यामारी इथे लोकांच्या नावाची विडंबने केलेली चालतात,तिरके प्रतिसाद चालतात पण हे वाक्य मात्र चालणार नाय ! का ? ;) भपकारा विहरीवरती जाणार्‍यांच्या तोंडाला येतो म्हणे ! ;) शाब्दिक भपकार्‍याचे मला तरी ठावुक नाही. ! ;) बाकी जेड गुडी आणि विक्षिप्त लोक यांच्यात मला काही अंतर दिसत नाही...अर्थात मी विक्षिप्त नक्कीच नाही, ते कोण हे ज्याच त्यांनी ठरवावं किंवा मिरवावं. बाकी अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणुन इथे बर्‍याच जणांच बरचं काही खपवुन घेतलं जात असाव असं मला देखील वाटतं हो.! ;) बाकी तुम्हाला संकॄत येत नसेल तर तो माझा दोष नाही बरं का ! ;) बाय द वे गुगल बाबाचा आधार घ्यायला आयक्यु लागत नसावा बहुधा. ;) ========================================================================= बाकी जे लोग श्रद्धा वगरै काही नसतं, किंवा श्रद्धा वगरै मनाचे खेळ्,आधार त्यांच्यासाठी खालील श्लोक :--- यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति।तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्॥७- २१॥ असो... माझा हा शेवटचा प्रतिसाद कारण मुळात मला वाद-विवाद करायला आवडत नाही,दुसरे म्हणजे डोळे असुन अंधळेपणा करणार्‍यांना मला सुर्याचे तेज किती अप्रतिम आहे हे सांगावेसे वाटत नाही... जाता जाता :--- अश्या धाग्यांचा मला बराच फायदा होतो. :) समविचारी लोकांची संख्या किती हे पटकन कळुन येते, शिवाय कंपुतल्या लोकांची गम्मतही पाहता येते. ;) कितीही दुर्लक्षित केले तरी त्यांची गंमत पाहण्याची संधी अश्या धाग्याने मला मिळते. ;) (भगवंताचा दास) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ते एक असो.

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/16/2011 - 19:43 नवीन
जोपर्यंत तुम्ही निरीक्षणातून आलेले पुरावे किंवा बुद्धीला, तर्काला पटेल असा सिद्धांत देत नाहीत तुमच्या दृष्टीने विश्वरचनाशास्त्र कसं आहे यात मला काही रस नाही. विश्वरचनाशास्त्र शिकवण्यासाठी चिक्कार पुस्तकं, गॅमॉ, आपटे, नारळीकर, पद्मनाभन वगैरे लोकांनी लिहीली आहेत आणि फारच रसाळ पद्धतीने शिकवलं आहे. मराठी_माणूस - तुम्ही विज्ञानाच्या मर्यादा मानत नसलात तर तो विज्ञानाचा प्रश्न नाही. जाहीर निविदा: विडंबन आणि व्यक्तीगत टीका यांतला फरक समजवण्यासाठी होतकरू आणि हुशार माणसांची गरज आहे. या प्रतिसादाला खरड, खरडीला व्यनी आणि व्यनीला इन्स्टंट चॅट मेसेज समजून कृपया काही लिखाण व्हावे. सतीश तांबे यांनी लिहीलेलं एक सुंदर वाक्य आठवलं: लहानपणीचा ''साखळी साखळी'' खेळ आठवा, ते समाज आणि व्यक्ती संबंधांचा भयावह पण नेमकं ग्राफिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

>>लहानपणीचा ''साखळी साखळी''

नगरीनिरंजन
Sat, 09/17/2011 - 10:27 नवीन
>>लहानपणीचा ''साखळी साखळी'' खेळ आठवा कसा असतो बुवा? आम्ही आजपावेतो कधीच खेळलो नाही (आणि इथून पुढेही खेळण्याची शक्यता कमीच आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वस्तूमान असेल तर

मराठी_माणूस
गुरुवार, 09/15/2011 - 21:28 नवीन
वस्तूमान असेल तर गुरूत्वाकर्षण का असतं हा विज्ञानाच्या अभ्यासाचा भागच नाही हा मग कोणाच्या अभ्यासाचा भाग आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

रांग लंबर

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/15/2011 - 21:49 नवीन
हा मग कोणाच्या अभ्यासाचा भाग आहे ?
तो माझ्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय नाही. मला 'कसं' यातच गंमत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

वर सरसकट "हा विज्ञानाच्या

मराठी_माणूस
Fri, 09/16/2011 - 09:45 नवीन
वर सरसकट "हा विज्ञानाच्या अभ्यासाचा भागच नाही" असे म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरोबर वाचलंत तुम्ही. वाचनात

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/16/2011 - 09:47 नवीन
बरोबर वाचलंत तुम्ही. वाचनात शंभर पैकी शंभर मार्क.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

धन्यवाद बाकी विज्ञानाला

मराठी_माणूस
Fri, 09/16/2011 - 10:41 नवीन
धन्यवाद बाकी विज्ञानाला अभ्यासाच्या कसल्याच मर्यादा नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

यष्टी?

मूकवाचक
Fri, 09/16/2011 - 12:36 नवीन
त्या शब्दाचा तिसरा अर्थही असावा (उदा. शरीरयष्टी). समष्टी या सन्दर्भात व्यष्टी असा शब्द येतो. तिथे मी यष्टी अशी टायपो अनवधानाने केली असल्यास क्षमस्व. अर्थाचे म्हणाल तर व्यष्टी ही यष्टी असेल, तर समष्टी हे क्रिकेटचे अख्खे मैदान (दोन्ही बाजूच्या मिळून सहा यष्ट्या सहित) असे ढोबळमानाने म्हणता येईल. परदृष्टी असा शब्द नेमका कुठे वापरला हे लक्षात येत नाही. बाकी हल्ली कुठलीही परिभाषा समजण्यासाठी कसलाही कोशन्ट वगैरे लागत नाही. हे शब्द गुगलून काढले तरी सरासरीपेक्षा सगळेच कोशन्ट कमी असणार्यालाही (ज्यात मी पण येतो) पुरेसे सन्दर्भ मिळतात असा माझा तरी अनुभव आहे. असो. भलतेसलते शब्द वापरून वाचकाना जो काही मनस्ताप दिला (आणि यापुढेही देत राहीन) त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मनाचे खेळ

प्रियाली
Fri, 09/09/2011 - 20:50 नवीन
लेख चांगला आहे. लेखातील भावनांशी सहमत आहे. दारूमुळे नियंत्रण डळमळते यामुळे काही महत्त्वांच्या दिवशी/ वेळी/ क्षणी दारूला हात न लावणे मी समजू शकते पण श्रद्धेच्या भीतीपायी न पिणे किंवा श्रावणात मांसाहार न करणे वगैरे पटत नाही. श्रद्धा, देव इ. हे मनाचे खेळ आहेत. मानवी मनाला विरंगुळा, अभय, सुरक्षितता आणि त्यातून खोटी का होईना पण मिळवलेल्या शांततेसाठी देवाची आणि श्रद्धेची गरज असते. माझ्यामते अशांना ते करू द्यावे. जोपर्यंत त्यांचा त्रास त्यांना स्वतःला आणि दुसर्‍याला होत नाही आणि ते जे करतात ते समाजमान्य आहे तोपर्यंत तक्रार करून फारसा उपयोग आहे असे वाटत नाही. :(
  • Log in or register to post comments

म्हणजे बाबा रणछोडदास अगदी

क्राईममास्तर गोगो
Sat, 09/10/2011 - 13:29 नवीन
म्हणजे बाबा रणछोडदास अगदी बरोबर बोलून गेलेत, "मनाला बनवायचं असतं... ऑल इज वेल किंवा गोईंग टू बी वेल असं सांगत..." :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

जे होते ते चांगल्यासाठीच होते

मन१
Fri, 09/09/2011 - 21:42 नवीन
हे वाचून "जे होते ते चांगल्यासाठीच होते " असे म्हणत काही महात्मे उपटायची दाट शक्यता वाटते. त्या महात्म्यांसोबत व त्यांच्या आप्तजनांसोबतही ह्याहुनही चांगले घडले तर किती बरे होइल. त्यांच्या सोबतही असेच चांगल्याहून चांगले होत असेल तेव्हा ते त्याही वेळेस न कळवळता केवळ "जे होते ते चांगल्यासाठीच होते " असे म्हणतील काय ह्याची उत्सुकता आहे. मूळ लेखातल्या मुद्द्याबाबतः- मी शाकाहारी* आहे. कारण मी शाकाहारी आहे! मद्यपान करीत नाही; कारण मी मद्यपान करीत नाही!! कुठलाच उपास, चातुर्मास वगैरे पाळत बसणं मला जमत नाही. २४x७ मी जे उपलब्ध असेल ते, जमेल तसे खातो. चातुर्मास आहे, म्हणुन मी काही कांदा खाणे सोडत नाही. आणि चातुर्मास नाहीये, फुकटात कंपनी पार्टीमध्ये भरपूर, भारीचे मद्य मोफत उपलब्ध आहे म्हणुन काही पीत बसलोय असेही होत नाही. प्यायची नाही तर बारा महिने पीत नाही. जे खायचे ते पोळी-भाजी वगैरे तिथ्या वगैरे न बघता, फक्त तब्येत आणि भूक बघुन खातो. चांगले खाद्यान्न/प्रसाद मिळतो अशा ठिकाणी जायला मला संकोच वाटत नाही, मी शेवटचे दर्शन नक्की कधी घेतले मला आठवत नाही. ती चिमुरडी-- वाचुन तीव्र दु:ख झाले. त्या चिमुरडीबद्दलही, पण अशा घटना सतत(अगदि श्रावणातही आणि गणेशोत्स्वाच्या काळातही, गणेशासमोरही!!!) घडतच असतात हेही खरे. अजुनही वाइट वाटते आहे, आपण पुरेसे निर्ढावलो नाही, हे जाणवुन जास्तीच वाइट वाटले. * आमच्या शाकाहारात दूध आणि दुग्धजन्य वस्तु आम्ही खातो. काही इतर प्राणिज पदार्थही नकळत खाण्यात आलेले कुणी सिद्धही करेल.(औषध्-गोळ्यांमार्फत वगैरे.) पण ते आमचे मुख्य अन्न नाही.
  • Log in or register to post comments

हम्म

रमताराम
Fri, 09/09/2011 - 22:20 नवीन
हमको मालूम हैं जन्नत की हक़ीक़त लेकिन, दिलके बहलाने को ग़ालिब ये ख़याल अच्छा है.
  • Log in or register to post comments

+१

पिवळा डांबिस
Fri, 09/09/2011 - 22:43 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

म्हंजे म्हंजे??

Nile
Sat, 09/10/2011 - 15:05 नवीन
तुम्हा काका मंडळींचे मागल्या जल्माचे अनुभाव काय हो? आमाला पन सांगा नं! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हम्म

रमताराम
Sat, 09/10/2011 - 23:06 नवीन
वपुंची 'बदली' वाचली ऐकली आहेस कारे? एक छोटा संवाद तुझ्यासाठी एकबोटे (भूत): भुतांना नोकर्‍या असतात. दामले: असतील. एकबोटे: असतील नाही, असतात. दामले (घाबरून): मला कल्पना नाहीये. एकबोटे: मेल्यावर येईल. तात्पर्य घाई करू नये योग्य वेळी 'जन्नत की हक़ीक़त' कळेल. बर्‍याच जणांना जिवंतपणीच वीस ते तीस वयातही हे समजते म्हणे, खरे खोटे चित्रगुप्तालाच - आय मीन त्या जन्नत मधल्या - ठाऊक. तोवर अभ्यास करा अभ्यास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

नाही वाचलीए :-(

Nile
Sun, 09/11/2011 - 01:00 नवीन
पण एकबोटे आवडला अन अशाच एका आमच्या मित्राची, एकबोटेची आठवण झाली. ;-)
तात्पर्य घाई करू नये योग्य वेळी 'जन्नत की हक़ीक़त' कळेल. बर्‍याच जणांना जिवंतपणीच वीस ते तीस वयातही हे समजते म्हणे, खरे खोटे चित्रगुप्तालाच - आय मीन त्या जन्नत मधल्या - ठाऊक. तोवर अभ्यास करा अभ्यास.
अजाबात घाई नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अतीशय मार्मिक लेखन,,, गंमत

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/09/2011 - 23:16 नवीन
अतीशय मार्मिक लेखन,,, गंमत अशी होते की आपण कीत्तीही अंतरीच्या कळवळ्यानी या सर्व उद्वेगाकडे पाहीलं,आणी ते इतरांच्या विशेषतः धार्मिकांच्या वारंवार निदर्शनाला अणून दिलं तरी त्यांन्ना ''देव आहे,आणी तो अपल्या पाठीशी आहे'' अश्या प्रकारची शॉक-एबझॉरवर श्रद्धा कायम आधार देत असते...त्यामुळे ते अपल्याला,,,तुंम्हा लोकांना वाइटच अधी का दिसतं?चांगलंही पहायला हवं---अश्या स्वरूपाचे निरर्थक आणी आत्मविसंगत सल्ले देतात...''या लोकांच्या देव विरोधी किंवा देव चिकित्सक विचारांमुळे आपली श्रद्धा हे लोक नष्ट करतील /हिसकावतील व आपण दुबळे बनु''...अश्या प्रकारचा भयगंड त्यांना भेडसावत असतो. वरती घासकडवींनी जो मार्मिक उपहास केलाय,तो वाचला की धार्मिक व्यक्ती आपल्याला - तुंम्ही फारच(?)टोकाचे बोलता म्हणून अंगावर येतात.त्यांना आपण धर्मग्रंथात,व समाजव्यवहारातही चाललेल्या टोकाच्या धार्मिक गोष्टी दाखवल्या,की मग''हा धर्माचा खरा अर्थ नाही म्हणुन पलटी खातात, धर्मग्रंथांच्या आत्मविसंगत रचनेंमुळे ''खरा अर्थ काढता येत नाही,किंबहुना आपल्याला हवा तसा अर्थ येतो'' असं आपण दाखवून दिलं की त्यांची बोंबाबोंब उडते,,,मग ते अपल्याला नास्तिक पाखंडी सेक्युलर वगैरे,,,निरनिराळ्या स्वरुपाच्या शिव्या देतात...अश्या वेळी आपण शांतपणानी त्यांना '' देवाच्या मिळणाय्रा तात्पुरत्या नशे सारख्या आधाराची आधी अठवण करुन द्यावी व नंतर त्यापाइ तुंम्ही कशाकशाचं समर्थन करताय ते पहा'' एवढच सांगावं,,,याचा थोडाफार उपयोग होतो असा माझा अनुभव आहे,,, अर्थातच तुमच लेखन हेही अत्यंत वंदनीय/आचरणीय आहेच ते चालू राहीलच पाहीजे,,,घासकडवींनी केलाय तसा उपहासही आवश्यक आहे...निम्मे काम त्यानी होते,उरलेले शांततामय प्रबोघनाच्या मार्गानी होते...सज्जन माणसं ''धर्मरुग्ण'' बनतात,त्यांना सावध करण आपल्या सगळ्यांचं काम आहे...बाकी आपल्या मनोभुमिकेशी आंम्ही पूर्ण सहमत आहोतच...
  • Log in or register to post comments

शीव शीव शीव !!!

धन्या
Sat, 09/10/2011 - 13:47 नवीन
गंगाधरशास्त्री, तुम्ही सुद्धा या आळंदीमधल्या पाखंडयांना जाऊन मिळालात? काय होणार या धर्माचे हे तो सिद्धबेटातला सांब सदाशिवच जाणे. कुणीतरी मला इंद्रायणी वर नेऊन त्यातल्या त्यात चांगलं पाणी असेल अशा ठिकाणी नेऊन बुडवून काढा रे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कशाला?

Nile
Sat, 09/10/2011 - 14:53 नवीन
अशा ठिकाणी नेऊन बुडवून काढा रे..
कशाला काढा म्हणे?? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कशाला म्हणजे काय? आम्ही गेलो

धन्या
Sat, 09/10/2011 - 16:22 नवीन
कशाला म्हणजे काय? आम्ही गेलो तर धर्माचं रक्षण कोण करणार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

कशाला काढा म्हणे?? ....खिक्क

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/11/2011 - 00:43 नवीन
कशाला काढा म्हणे?? ....खिक्क :bigsmile: ह्हा ह्हा ह्हा ह्हा ...अग बाबो बाबो काय हा प्रतिसाद? जोरदार हसू आलं. :bigsmile: अगदी ठसका लागेपर्यंत....ह्हा ह्हा ह्हा ह्हा... अब्बाब्बाबा :bigsmile: थांबतच नाहीये...ओय ओय मेलो...वाचवा वाचवा.... :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

असं आहे होय...

धन्या
Sun, 09/11/2011 - 14:23 नवीन
हा हलकट नायल्या वाक्य नको तिथे तोडतो आणि मग असे अर्थ निघतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गोंधळ !!

अर्धवटराव
Fri, 09/09/2011 - 23:41 नवीन
मी कन्फ्युस होतोय... एव्हढा लांब-लचक लेख लेख लिहीलाय, पण मूळ मुद्दा काय हेच कळलं नाहि. समजुन घेण्याचा प्रयत्न करतो. १) मनुष्य जेव्हा दुसर्‍याला दु:ख देतो तेंव्हा देव त्याला अडवत का नाहि? --> स्वतःचे कर्म करायचे स्वातंत्र्य आपल्याला ज्या प्रमाणात उमगेल त्या प्रमाणात या प्रश्नाचे उत्तर देखील उमगेल. तेंव्हा इतरांच्या कर्माचा लेखाजोखा तपासण्यापेक्षा आपण आपल्या विवेकाला किती जागतो हे महत्वाचे. २) देवावर श्रद्धा असणारे त्याला सर्वव्यापी समजतात, मग प्रत्येक कर्म करताना 'तो' आपल्याला बघतोय याची जाणीव त्यांना का नसते? --> कळतं पण वळत नाहि- या प्रोब्लेम अक्ख्या मानवजातीचा आहे... त्यात आस्तीक, नास्तीक सर्वच आले. अहो, इथे आपल्याला मधुमेह आहे, जास्तीची साखर आपल्याकरता विष आहे , हे कळत असुन देखील पब्लीक जीभेवर ताबा ठेवत नाहित, तिथे दुसर्‍याच्या दु:खाची काय बात... कोवळ्या मुलीवर बलात्कार असो कि जागतीक महायुद्ध असो, प्रोब्लेम तोच आहे. ३) जगात जे कोणि. जे काहि दु:ख भोगताहेत, त्यात त्यांचा खरच दोष आहे काय? असलाच तर किती? हे प्रमाण ठरवणारी सिस्टीम खरच नीर-क्षीर न्यायाने वागते काय? --> कुठल्याही रिअ‍ॅलिटी शो मध्ये येऊन "ति सिस्टीम" या प्रश्नाचे उत्तर देईल अशी आपली अपेक्षा आहे काय? कुठल्याश्या अज्ञात कारणाने ति सुरु झाली (ते सुद्धा नक्की नाहि... "बीग बँग थेअरी" अस्युम करुया ). करोडो वर्षांनंतर आपली सूर्यमाला अस्तीत्वात आलि. मग वातावरण निर्मीती->पहिला एक्पेशीय सजीव->बहुपेशीय जीव->त्यांचे जेनेटीक काँबीनेशन्स-> इव्होल्युशन-> मानव निर्मीती-> मानवाची सामाजीक जाणीव-> त्यातुन साकारलेल्या, मनुष्याच्या जास्तीत जास्त सुख-दु:खाना आपल्या परिघात घेणार्‍या स्थल-कालसापेक्ष्य नैतिकतेच्या कल्पना... आता एव्हढ्या पसार्‍याचे उत्तरदायित्व आपण ठरवायचे म्हणजे जरा विचित्र नाहि वाटत? ४)" मग तिच्या वर एव्हढा भीषण अत्याचार होताना चराचर व्यापलेला तो परमेश्वर करत काय होता, शेजारी उभा राहुन? तो असेल वा नसेल. मी दखल घेण्याच्या लायकीचा तो नक्की नाही, माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच." --> आपल्या विवेकाला "त्याचे" अस्तीत्व दखल घेण्याजोगे आहे वा नाहि हे बरोबर कळते. लेखकाला ते कळले आणि त्यांनी ते मान्य केले... हे सर्वात महत्वाचे...
  • Log in or register to post comments

... आता एव्हढ्या पसार्‍याचे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/09/2011 - 23:52 नवीन
... आता एव्हढ्या पसार्‍याचे उत्तरदायित्व आपण ठरवायचे म्हणजे जरा विचित्र नाहि वाटत?
एवढा पसारा (म्हणजे नक्की किती याचा शोधही सुरूच आहे) असला तरी त्याला कोणी/काही उत्तरदायी असेलच असं मान्य करणार्‍या लोकांबद्दल मला खूप खूप आदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

नक्कीच !!

अर्धवटराव
Sat, 09/10/2011 - 01:35 नवीन
आदर तर आहेच... आणि चौकस बुद्धीने त्यावर आयुष्यभर विचार, चिंतन करणार्‍यांचे कौतुक सुद्धा वाटते. विद्यार्थी भुमिकेतुन जे लोक हा सर्व खटाटोप करतात त्यांच्या हाती बरच काहि लागतं. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आकाशातल्या ठोंब्याचा उत्सव

अप्पा जोगळेकर
Fri, 09/09/2011 - 23:56 नवीन
आकाशातल्या ठोंब्याचा उत्सव चालू जोरजोरात चालू असताना सदर लेख आणि ही बातमी लागोपाठ वाचनात यावी हा योगायोग म्हणायचा की ठोंब्याची कॄपा कोणास ठाऊक ?
  • Log in or register to post comments

लेख विचारप्रवर्तक आहे

चित्रा
Sat, 09/10/2011 - 01:20 नवीन
प्रकटनावर नेमाड्यांच्या पांडुरंग सांगवीकराची छाप वाटली. शेवटची लहानगीची भयंकर गोष्ट न देताही देव नाही आहे अशी 'केस' करता आली असती असे वाटले. पण तसे केल्याशिवाय देव नाही सिद्ध करणे अवघड गेले असते. लेखाचा थोडा अटेन्शन सीकींग बाज वगळता लेख प्रभावी आहे. अटेन्शन सीकींगचे श्रावणातला 'बलात्कार' हा शब्दप्रयोग हे उदाहरण. तेवढे वगळता लेखाची मांडणी आवडली. (मी कधीकधी (श्रावणात असे नाही) मांसाहारापासून स्वतःला लांब ठेवते. तेव्हा मला ते लक्षात ठेवायला थोडा त्रास होतो, पण स्वतःच्या अनेक बेलगाम इच्छांवर थोडा काबू ठेवण्याची थोडी इच्छा मला होते त्यापैकी ही एक. त्याचा थोडा त्रास झाला तरी झेलण्याची माझी तयारी असते. ती 'बलात्कार' या शब्दाने हिणवली जावी असे वाटत नाही. )
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा