✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक प्रतिसाद - "बोगस अध्यात्माची सुरसकथा-१" ला

ध
धन्या यांनी
Sun, 06/12/2011 - 22:53  ·  लेख
लेख
हा लेख श्री. ईश आपटे यांच्या "बोगस अध्यात्माची सुरसकथा-१" या लेखाचा प्रतिसाद आहे. माझा प्रतिसाद लिहिता लिहिता मूळ लेखापेक्षा मोठा झाल्यामुळे स्वतंत्र लेख म्हणून देत आहे. १. गेल्या शतक भरात, साधारण १८९३ पासुन भारतभरात नव्या आध्यात्मिक गुरुंची मोठी लाट आली. अगदी खरंय. नव्हे, तुमचा "लाट आली" हा शब्दप्रयोग खुप काही सांगून जातो. ईंग्रजीमधील "फॅड आलंय" हा शब्दप्रयोग सुद्धा चालला असता. पण... लाट किंवा फॅड हे हे खुप अल्पजीवी असतं. ते येतं, थोडा वेळ राहतं आणि निघून जातं. अध्यात्मिक गुरूंच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही. म्हणजे गुरू आले आणि गेले, पण गुरु ही संकल्पना मात्र टीकून राहिली. रोज नवे नवे गुरू बाजारात दिसू लागले. काही स्वयंप्रकाशित तर काही दत्तगुरुंपासून शिर्डीच्या साईबाबांच्या अवताराच्या रुपात. अर्थात याला आपलं संतसाहित्य बर्‍यापैकी कारणीभूत आहे. संतसाहीत्यामध्ये अध्यात्मिक गुरुला खुपच महत्व दिलं गेलंय आणि आपण त्या संकल्पनेचा संतांना जो अर्थ अभिप्रेत आहे त्याचा आपण विपर्यास केला आहे. ज्ञानेश्वरी मध्ये जागोजागी ज्ञानदेवाने गुरुबद्दल लिहिलं आहे. विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी । ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥ २ ॥ तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी । जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥ ३ ॥ योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे । सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥ ४ ॥ आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं । हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥ ५ ॥ प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं । आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥ सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी । समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥ ७ ॥ म्हणौनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं । या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥ ८ ॥ अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी । तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥ ९ ॥ श्री ज्ञानेश्वरी - अध्याय बारावा. ज्ञानदेवाचा गुरु कोण तर त्याचा सख्खा मोठा भाऊ जो त्याच्यापेक्षा चार पाच वर्षांपेक्षा जास्त मोठा नसावा. आणि तरीही गुरू या संकल्पनेचा पगडा ईतका जबरदस्त की ज्ञानदेवासारख्या ज्ञानियांच्या राजाचीसुद्धा ही अवस्था झाली. अर्थात ज्ञानदेवाचा गुरु हल्लीच्या गल्लेभरु गुरुंसारखा नसल्यामुळे त्याने ज्ञानदेवाला लगेच भानावर आणले. इये विनवणीयेसाठीं । अवलोकिलें गुरु कृपादृष्टी । म्हणे गीतार्थेंसी उठी । न बोलें बहु ॥ १८ ॥ श्री ज्ञानेश्वरी - अध्याय बारावा. ज्ञानदेवाचा गुरू म्हणतो, बास झालं गुरुवर्णन. पुढे बोल. आणि आताचे गुरु? एकेकांचे सुखसोहळे पाहून घ्यावेत. हरीपाठाच्या पाचव्या अभंगातही ज्ञानदेव गुरुची महती सांगतो, योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।। भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।। तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।। ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।। संत तुकाराम म्हणतात, सदगुरुवाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी नाही काळ वेळ तया लागी, आपणासारीखे करी तो तात्काळ लोहपरीसाची न सोहे उपमा, सदगुरू महिमा अगाधची अगदी रामदासांनी सुद्धा जागोजागी गुरुवर्णन केले आहे. उदाहरणार्थ, आमुचा तो देव एक गुरुराव । द्वैताचा तो ठाव नाही जेथे ॥१॥ गुरुने व्यापिले स्थिर आणि चर । पहा निर्विकार कोंदलासे ॥२॥ रामीरामदास उभा तये ठायी । माझी रामाबाई निराकार ॥३॥ अर्थात या सार्‍या संतांना गुरु म्हणजे "सत"गुरु अपेक्षित होता. आपल्या चुका दाखवणारा, आपल्याला सत्याच्या मार्गावर नेऊन सोडणारा, आयुष्य सचोटीने कसे जगावे हे शिकवणारा. बास, आपण मात्र फक्त गुरु ही संकल्पना उचलली. त्या संकल्पनेमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे हेच आपण विसरुन गेलो. जणू काही गुरु करणे म्हणजे मोक्षाला नेऊन सोडणार्‍या गाडीचे तिकिट काढणे होय. केला गुरु की झाली मोक्षप्राप्ती. झाली त्या चौर्‍याएंशीच्या फेर्‍यातून सुटका. आणि यातूनच आजच्या या तथाकथित गुरुंचे फावले. आमचे गुरू कोण तर केवळ "राजदंड" विमानातून नेऊ दिला नाही म्हणून आकांडतांडव करणारे, भगवी वस्त्रे परीधान करणारे तथाकथित धर्माचार्य. अरे तुम्ही गुरु ना, साधू संन्याशी ना? मग तुमच्यात निवृत्ती कुठे आहे? "राजदंडा" सारख्या क्षुल्लक भौतिक गोष्टीमुळे तुमच्या वृत्ती विचलित होतात? आमचे गुरु कोण तर वह्याच्या वह्या "राम राम" लिहून भरायला लावणारी माणसं. यांच्या नावाने गुगलवर शोध घेतला तर श्रीधर कवींनी त्यांच्या श्रीरामविजय, श्रीहरीविजय आणि पांडवप्रताप या ग्रंथांमधून केलेली विष्णूची वर्णने झक मारतील अशा तेज:पुंज अवतारात अर्थात फोटोशॉप एडिटेड हे दिसतील. हे ईश्वराचे अवतार पण राहणीमान असे की एखाद्या राजालाही लाजवेल असे. लोक पण ईतके भ्रमिष्ट झाले आहेत की, त्यांना पुजेसाठी तेहतीस कोटी देव सुद्धा कमी पडू लागले आहेत. त्या देवांना बाजुला ठेवून आता या सदगुरुंची चित्रे भिंतीवर लटकवायला लागले आहेत. आमच्या सदगुरुंपैकी कुणावर लहान मुलांवर अत्याचार केल्याचे आरोप, कुणावर समलैगिकतेचे आरोप. कुणी स्वतःला साधू, संन्याशी म्हणवून घेतोय आणि स्वतःच्या हेलीकॉप्टरमधून फिरतोय. पहिल्या रांगेत बसायचे पन्नास हजार घेतोय. रोज टीव्हीवर चमकत आहेत. बाईट्स देण्यासाठी धडपडत आहेत. आपली चित्रे असलेले पेन आणि बिल्ले विकणे हे यांच्या ईश्वरभक्तीचे रुप. हे आमचे सदगुरू. नुकताच एक ईश्वरी अवतार समाप्त झाला. माझं अवतारकार्य वयाच्या ९६ व्या वर्षी संपवेन म्हणताना ८४ व्या वर्षीच गेला. या भवसागराला तो ईतका विटला की बारा वर्षे आधीच त्याने आपले अवतारकार्य संपवलं. आणि विषेश म्हणजे हा ईश्वराचा अवतार मरणाच्या आधी जवळपास एक महीनाभर त्यानेच उभारलेल्या एका अत्याधुनिक इस्पितळात "लाईफ सपोर्ट सिस्टीम" वर होता. हा आमचा ईश्वराचा अवतार. झुकती हैं दुनिया झुकानेवाला चाहिये. अर्थात हे तथाकथित साधू संताच्या नादी आपण का लगलो आहोत याची कारण मिमांसा करण्यासाठी फार खोलात जायची गरज नाही. आपली अवस्था समर्थ म्हणतात तशी झाली आहे, अनुदिन अनुतापे तापलो रामराया आजचं आपलं आयुष्य धकाधकीचं झालं आहे. सुखाच्या, समृद्धीच्या मागे धावताना आपण मनाची शांती हरवून बसलो आहे. उजाडणारा प्रत्येक दिवस नवी समस्या घेऊन उगवत आहे. नात्यांमधील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या सार्‍यांतून सुटका करुन घेण्यासाठी आम्हाला जादूची कांडी हवी आहे. आणि ती कांडी केवळ आमच्याकडे आहे अशी जाहीरातबाजी हे आजचे तथाकथित सदगुरू करत आहेत. आणि आपण मात्र परमदीन दयाळा निरसी मोहमाया म्हणायच्या ऐवजी या तथाकथित सदगुरूंच्या मायाजाळात अधिकाधिक फसत चाललो आहोत. २.चार्वाकवादामुळे व पाखंडामुळे , मृत्यूनंतर जीवन संपते हा विचार सर्वत्र फैलावलेला होता. आधुनिक गुरुनी प्रसिध्दी साठी पारंपारिक हिन्दु धर्म पाखंडानुसार अ‍ॅड्जस्ट केला, व ते ही बोलू लागले, लोकांनो स्वर्ग-नरक जे काही आहे ते ह्या पृथ्वीवरच आहे, ह्या जीवनातच अनुभवायचे आहे. पारंपारिक अध्यात्म स्वर्ग-नरकांचे मरणोत्तर अस्तित्व सांगत होते. ईथे मी तुमच्याशी सहमत नाही. तसे स्वर्ग आणि नरक या संकल्पना जगाच्या पाठीवर सगळीकडे प्रचलित असाव्यात. ती आपल्या पारंपारिक अध्यात्माची देणगी नाही कारण तसं नसतं तर ईतर भाषांमध्ये "जन्नत - जहन्नम", "हेवन - हेल" अशा समानार्थी जोड्या नसत्या. खरंच स्वर्ग आणि नरक अस्तित्वात असावेत? मला नाही वाटत तसं. आपण ते आहेत म्हणून दाखवू शकत नाही. केवळ आपली पुराणं म्हणतात म्हणून त्यावर विश्वास ठेवायचा का? या पॄथ्वीतलावर जी काही कोटी लोकसंख्या आहे त्यात आपण एक व्यक्ती दाखवू शकणार नाही की जिने याची देही याची डोळा स्वर्ग किंवा नरक पाहिला आहे. या केवळ संकल्पना आहेत. या विश्वाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जुन्या समाजधुरीणांनी जन्माला घातलेल्या. सत्प्रवृत्तींना प्रोत्साहन देणार्‍या, दुष्प्रवृत्तींना मज्जाव करणार्‍या. चांगले वागलात, स्वर्ग मिळेल. सुखसोयी पायाशी लोळण घेतील. रंभा उर्वशी पाय दाबतील. वाईट वागलात, मेल्यानंतर हालहाल होतील. थोडक्यात काय तर चांगलं वागावं म्हणून स्वर्गाचं आमिष आणि वाईट वागू नये म्हणून नरकाची भीती. आईने पाच सहा वर्षाच्या मुलाने त्रास देऊ नये, अभ्यास करावा म्हणून चॉकलेटचं आमिष दाखवावे आणि द्वाडपणा केलास तर फटके देईन अशी भीती दाखवावी ईतकं सोपं लॉजिक आहे हे. ३.चमत्कार हा पारंपारिक सिध्दत्वाची निषाणी होती. चमत्कार तेथे नमस्कार हा साधा नियम होता. ज्यांच्या जवळ कुठले ही सामर्थ्य नव्हते, अशा गुरुंनी सांगायला सुरुवात केली , चमत्कार म्हणजे हातचलाखी, ते दुय्यम दर्जाचे ! .................. विचार बघा...उच्च मानसिक अनुभव घ्या...समाधि अनुभवा. सर्व पारंपारिक संतांजवळ, योग्यांजवळ असामान्य दैवी सामर्थ्य होते, सिध्दी होत्या. त्याची विस्तृत वर्णने सगळ्या जुन्या चरित्रात उपलब्ध होती. नव्या गुरुंकडे सिध्दींचा अभाव असल्यामुळे , त्यांनी केवळ मानसिक अनुभवांवर भर द्यायला सुरुवात केली असहमत. जो चमत्कार करून दाखवतो त्याला साधू, योगी किंवा सदगुरु म्हणायचे? सत्यसाईबाबा जे करायचे ती हातचलाखी होती की योगबलावर केलेले चमत्कार? अर्थात हातचलाखी. युटयुबवर असलेले व्हीडिओ आपले सारे पुर्वग्रह बाजूला ठेवून पाहीले, बाबा फक्त श्रीमंतांना सोन्याच्या अंगठया हवेतून काढून दयायचे, गरीबांच्या हातावर मात्र राख टेकवायचे ही वस्तूस्थिती ध्यानात घेतली की ते जे काही करायचे ती निव्वळ हातचलाखी होती हे लगेच कळते. ही चर्चा पुढे नेण्यासाठी आपण ज्ञानदेवाचे उदाहरण घेऊ. ज्ञानदेव नाथ परंपरेतला एक नाथ. निवृत्तीनाथांचा शिष्य. आता हे नाथ कोण तर चमत्कार करणारे योगी किंवा सिद्ध. ज्यांनी गुरुचरीत्र वाचले आहे त्यांना माझे म्हणणे लगेच पटेल. आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।1।। मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला । गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।2।। गहिनीप्रसादे निवृत्ती दातार । ज्ञानदेवा सार चोजविले ।।3।। या सार्‍या नाथांचे जीवन केवळ चमत्कार कथांनी भरलेले आहे. यातून ज्ञानदेवासारखा ज्ञानियांचा राजासुद्धा सुटला नाही. कारण तोही एक नाथ होता. जेमतेम एकवीस वर्षांचं आयुष्य जगलेला हा अगाध प्रतिभावंत. पण चरीत्र ईतक्या जबरदस्त चमत्कारांनी भरलेले की त्याच्या ज्ञानेश्वरीला प्रमाण मानणार्‍या बुद्धिनिष्ठांची बोलती बंद व्हावी. वाघावर भेटीला येणार्‍या चांगदेवाला सामोरं जाण्यासाठी भींत चालवणे, छोटया बहीणीची गावकर्‍यांनी केलेली हेटाळणी पाहून जठराग्नी प्रज्वलित करून पाठीवर मांडे भाजून देणे, रेड्यामुखी वेद बोलविणे, प्रेतयात्रेमधील प्रेताला जिवंत करून त्याच्याकडून आपला अजरामर असा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून घेणे. काय आणि काय... सन १२७५ ते १२९६ हा ज्ञानदेवाचा जीवन कालावधी. तेराव्या शतकाचा उत्तरार्ध. महाराष्ट्रात तेव्हा देवगिरीच्या यादवांचे राज्य होते. रामदेवराय हा धर्मपरायण राजा तेव्हा राज्य करत होता. इकडे ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी पुर्ण करून आपली लेखणी खाली ठेवली आणि तिकडे अल्लाउद्दिन खिलजी केवळ दहा पंधरा हजारांचे सैन्य घेऊन विंध्य पर्वत ओलांडून दख्खनवर चालून आला. देवगिरीचे साम्राज्य त्याने बुडवले. ज्ञानदेव सिद्धयोगी असूनही त्याने हा सद्धर्मावर झालेला "यवनी" हल्ला का परतवून लावला नाही? ज्याने निर्जीव भींत चालविली, ज्याने रेडयामुखी वेद बोलाविले, ज्याने प्रेतयात्रेतील प्रेताला जिवंत केले त्याला यवनी हल्ला परतवून लावण्यासाठी रामदेवरायाला मदत करणे शक्य नव्हते का? या प्रश्नांची उत्तरे कुणी देऊ शकणार नाही आणि दिली तरी ती बुद्धीला पटणार नाहीत. ज्ञानदेवाच्या जबरदस्त चमत्कारांच्या कथा कधी किर्तन, प्रवचनांमध्ये तर कधी छोटयांच्या गोष्टींच्या रुपात पुढच्या पिढीला सांगत, त्याला "अवतार पांडुरंग" असं लेबल लावून, त्याच्या ज्ञानेश्वरीची हरीनाम सप्ताहामध्ये घोकंपट्टी करण्यात आपण धन्यता मानू लागलो. त्याने दिलेली विश्वबंधूत्वाची शिकवण मात्र आपण सोयिस्कररीत्या इंद्रायणीच्या डोहात बुडविली. हे असं काही वाचलं की मनाच्या गोंधळ उडतो. काय खरं आणि काय खोटं हेच कळेनासं होतं. अशावेळी काय करायचं? याचंही उत्तर या बालयोग्यानेच दिले आहे. हरीपाठाच्या दुसर्‍याच अभंगात तो म्हणतो, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ ४. अजुन थोडा काळ गेला, आता समाधी अनुभवायला देणे ही नव्या गुरुंना जमेना, मग त्यांनी ध्येय अजुन खाली आणले. मानसिक शांती, रिलॅक्सनेस, चिन्तामुक्ती , आरोग्य ही नवीन ध्येये बनली सहमत. तुम्ही समाधी अनुभवायला देण्याचीच गोष्ट करत आहात. मी तर गुरुंनी समाधी घेण्याच्या शक्यतेचा विचार केला. आणि नजरेसमोरून झरझर वृत्तपत्रांमधील वृत्ते आठवली. अगदी धर्माचार्यांपासून साईबाबांच्या अवतारांपर्यंत सार्‍यांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. आणि त्या त्या वेळी हे गुरु आपला जीव वाचवण्यासाठी जीव खाऊन पळाल्याचे वृत्तपत्रांमधून वाचले आहे. ईथे पुन्हा एकदा ज्ञानदेवाचा उल्लेख करावासा वाटतो. जगाला भावार्थदिपीका, अमृतानुभव यासारखं ज्ञानाचं अनमोल भांडार खुलं करून हा ज्ञानसूर्य वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी स्वतःहून अस्ताला गेला. ५. शिष्याला १००% अनुभव देऊन जन्म-मरण चक्रातुन सोडवणे ही भारतीय अध्यात्माची परंपरा. नव्या गुरुंनी अनुभवाची जबाबदारी शिष्यांच्या वरच ढकलायला सुरुवात केली. सर्व प्राचीन व ऐतिहासिक गुरुंनी शिष्याची संपूर्ण जबाबदारी स्वता:वर घेतल्याचे त्यांच्या चरित्रातुन दिसते. नवे सामर्थ्यहीन गुरु नेमके उलटे करु लागले, कारण त्यांना स्वतःलाच आपल्या आध्यात्मिक उन्नती बाबत खात्री नव्हती. नवे गुरू अनुभवाची जबाबदारी शिष्यांवर ढकलतात ही गोष्ट थोडा वेळ बाजूला ठेवूया. आपल्या पुरातन, प्राचिन गुरुंनी आपल्या शिष्यांना १००% अनुभव देऊन जन्म मरण चक्रातून सोडवले, याची खात्री कशी करायची? त्यांना निश्चितच मोक्षप्राप्ती झाली याला पुरावा काय? की ईथेही पुन्हा आपली पुराणे म्हणतात म्हणून आपण ते खरं मानायचं? माझ्या मते आपलं अध्यात्म ज्याला "अनुभव" म्हणतं त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीच्या खर्‍या स्वरूपाची जाणिव होणं असा असावा. कपिलवस्तूच्या राजकुमार सिद्धार्थाला "सा़क्षात्कार" होऊन त्याला सत्याचं ज्ञान होऊन त्याचा गौतम बुद्ध बनला. हाही एकप्रकारे त्याला गुरुविना आलेला "अनुभवच" नाही का? ६.१९४० च्या सुमारास अशांचा उदय झाला की ज्यांनी तत्वज्ञानाच्या नावाखाली मूर्तिभंजन सुरु केले. सर्व अनुभवांना विरोध करुन, शब्दच्छ्ल सुरु केला. स्थितीहीन स्थिती, कालातीत जगणे, वर्तमानात जगणे, हे सोपे असल्याचे लोकांना भासवुन उच्च बौध्दिक वर्तुळात महान तत्वज्ञ म्हणून मिरवायला सुरु केले. अनाकलनीयता व पाखंडीपणा ह्यामुळे विदेशात लोकप्रिय होण्यास ह्यांना फार वेळ लागला नाही. असहमत. म्हणजे मी मूर्तीभंजनाशी सहमत आहे असं नाही. पण मूर्तीपुजा म्हणजेच देवपुजा हे मात्र मला मान्य नाही. खरा देव तर निर्गुण निराकार आहे. या विश्वाला, चराचराला तो व्यापून उरला आहे. प्रत्येक चेतन जीवामध्ये तो आहे. प्रत्येक अचेतन वस्तूमध्ये तो आहे. ज्ञानदेव हरीपाठाच्या तिसर्‍या अभंगात म्हणतो, त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥ सगुण निर्गुण गुणाचे अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ॥ २ ॥ अव्यक्‍त निराकार नाही ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजे ॥ ३ ॥ ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मानी पुण्य होय ॥ ४ ॥ ईश्वर तर अव्यक्‍त निराकार नाही ज्या आकार असा आहे. मग मुर्तीपुजा आली कुठून? आपण त्या दगडाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होतो, म्हणून तिला देवत्व प्राप्त होते. आपली श्रद्धा त्या दगडाला देवपण देते. देव जसा देवळातल्या दगडी मूर्तीत आहे तसा तो देवळाबाहेरच्या "माय, पोटाला दोन पैसे दया" म्हणणार्‍या केविलवाण्या चेहर्‍याच्या याचकांमध्येही आहे. आपली ही मूर्तीपुजेवरील चर्चा पुढे नेण्यासाठी आपण पंढरपुरच्या श्रीविठ्ठलमूर्तीचे उदाहरण घेऊया. स्कंद पुराणांतर्गत येणारे पांडुरंगमाहात्म्य आणि त्यानंतर दोन अडीच शतकानंतर लिहिलेले पाद्म पांडुरंगमाहात्म्य ही पंढरपुरच्यी श्रीविठ्ठलाची सर्वात जुनी चरीत्रे. या दोन्ही चरीत्रानुसार श्रींच्या मूर्तीच्या छातीवर कूट्श्लोकाच्या रुपात अर्थात कोडयाच्या स्वरुपात षडाक्षरी मंत्र लिहीला आहे, ज्या मंत्राची उकल आहे "श्रीकृष्णाय नमः". पण आताच्या पांडुरंगाच्या मुर्तीच्या छातीवर असा काहीच श्लोक नाही. किंबहूना महाराष्ट्रातील फक्त एक मंदिर सोडले तर असा छातीवर मंत्र असलेली श्रीविठ्ठलाची मूर्ती कुठेच नाही. मग ती एकमेव मूर्ती कुठे आहे जी दोन्ही पांडुरंगमाहात्म्यांमधील वर्णनाशी मिळती जुळती आहे? ती आहे पंढरपुरापासून जेमतेम वीस मैलांवर असणार्‍या सोलापूर जिल्ह्यामधीलच माढे या गावी. सन १६५९ साली अफजलखान महाराष्ट्रात शिवरायांवर चालून आला. तुळजापूर, शिखर शिंगणापूर या देवस्थानांची मोडतोड करत त्याने आपला मोर्चा पंढरपूराकडे वळवला. या सुलतानी संकटापासून श्रीविठ्ठलाची मुर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी ती गुपचुपपणे माढे येथे हलविण्यात आली. पुढे जेव्हा राजांनी अफजलखानाचा वध केला, तेव्हा सारं आलबेल झाल्यावर ही मूर्ती पुन्हा पंढरपुरात आणण्यात आली. आणि या घटनेची आठवण म्हणून माढे येथे श्रीविठ्ठल मंदिर बांधले गेले. श्रींच्या मूळ मूर्तींची प्रतिकृती असणारी मूर्ती या मंदिरात बसवण्यात आली. याचाच अर्थ निदान सन १६५९ सालापर्यंत तरी पंढरपुरामध्ये पांडुरंगमाहात्म्यातील वर्णनाशी मिळतीजुळती मूर्ती होती. स्कांद पुराणातील पांडुरंग माहात्म्यानुसार मूर्तीची अजून दोन वैशिष्टये आहेत. ती म्हणजे मूर्तीच्या भाळावर तृतीय नेत्र आहे. आणि मूर्ती दिगंबर बाळगोपाळाची आहे. याही दोन गोष्टींशी माढे येथील विठ्ठलमूर्ती मिळती जुळती आहे. पंढरपूरची मूर्ती मात्र अशी नाही. अजून एक गोष्ट म्हणजे, आपण आता पाहिलेल्या मूळ मूर्ती वर्णनाला दुजोरा देणारा संत सावतामाळी यांचा अभंग आहे. विठ्ठ्लाचे रुप अतर्क्य विशाळ । ह्रदयकमळ मंत्रसिद्ध ॥ दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायीं वाळी मनगटीं ॥ कटीवरी हात, हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलींत ॥ सावता माळी म्हणे शब्दब्रम्ह साचें । नाम विठ्ठलाचें कलीयुगीं ॥ मग ती मूळ मूर्ती आता कुठे आहे? एकोणविसाव्या शतकात पंढरपूरात श्री काशीनाथ उपाध्याय किंवा बाबा उपाध्ये म्हणून एक प्रख्यात धर्मशास्त्रज्ञ होऊन गेले. आता जी पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात श्रींची जी दैनंदिन पुजाअर्चा होते, तिच्यात सुसुत्रता बाबा उपाध्ये यांनीच आणली. सन १८०५ साली बाबा उपाध्ये यांनी "विठ्ठलध्यानमानसपूजा" नामक स्तोत्र लिहिले. त्यात श्रींच्या वक्षःस्थळाचे वर्णन बाबांनी खालील शब्दांत केले आहे: षडक्षरं कृष्णमंत्रं वक्षस्थलगतं स्मरेत ॥ श्रींच्या वक्षःस्थळावर कोरलेला षडक्षर कृष्णमंत्र स्मरावा. याचाच अर्थ, अगदी सन १८०५ पर्यंतसुद्धा मूळ मूर्ती पंढरपूरात होती. मग ती मुळ मूर्ती आता कुठे आहे हा प्रश्न कायम राहतो. इ. स. १८७३ साली कुणा माथेफीरुने मूर्तीवर धोंडा फेकला होता आणि त्या आघाताने मूर्तीचा एक पाय भंगला होता. अशी बातमी त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये आली होती. त्यानंतर काय झाले याचा उल्लेख मात्र कुठे नाही. अर्थात हिंदू धर्मशास्त्रानुसार मूर्ती भग्न झाल्यानंतर तिचे विसर्जन करायचे असते, आणि नवी मूर्ती घडवून तिचे विधिवत प्राणप्रतिष्ठा करायची असते. नव्हे हा धर्मशास्त्राचा दंडकच आहे. मला वाटतं श्रींच्या मूळ मूर्तीचे काय झाले या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या घटनाक्रमांमधून मिळते. मग आता जर श्रींविठ्ठलाची आताची मूर्ती मूळ मूर्ती नाही असं म्हणायला जर जागा आहे तर मग आपल्या, दरवर्षी आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जाणार्‍या लाखो वारकर्‍यांच्या श्रद्धेचं काय? तुम्ही कुठलीही शंका मनात न आणता श्रद्धेनं श्रीचरणावर नतमस्तक व्हा. विठ्ठल तिथेच आहे. दगडाची मूर्ती बदलली की काय या शंकेनं विश्वास उडण्याईतका देव हलका नाही. आणि हो, मूर्तीपुजेचं कितपत अवडंबर माजवायचे हे ही ज्याचं त्याने ठरवायचं... ७.१९८० च्या दशकात काही असे नवे संत जन्मले, जे वेदान्ताच्या नावाखाली बेधडक सांगु लागले, पुनर्जन्म वगैरे काही अस्तित्वात नाही, जे काही आहे आता इथेच . मृत्युनंतर आपण सगळेच सत्यामध्ये परत जाऊ व जन्मापूर्वी ही आपण सत्यच होतो. काही तर तुम्ही ह्या क्षणाला मुक्तच आहात, साधनेची वगैरे कोणती ही गरज नाही इ. बेलगाम असत्य प्रतिपादन करु लागले . असले पाप कृत्य करताना व बरोबर संतत्व मिरवताना त्यांना काही वाटले नाही. हे तथाकथित संत काय म्हणतात ते सोडून द्या. थोडा वेळ पुनर्जन्म आहे हे गृहीत धरूया. काय फरक पडतो त्याने आपल्या आयुष्यात? मेल्यानंतर आपण स्वर्गाला जाणार आहोत की नरकाला हा विचार केल्याने काय होईल? या जन्मी तरी स्वर्ग काय आणि नरक काय हे अनुभवायला मिळणार नाही. त्यासाठी मरावेच लागणार. आपल्या शास्त्रानुसार आपण जेव्हा नऊ महिने आईच्या पोटात असतो तेव्हा आपण "रजस्वलेच्या विटाळात" असतो. आपल्या आजुबाजूला कातडी, आतडी आणि पू, दुर्गंधीची खाणी असते. पण जन्म झाल्यानंतर यातल्या कशाची जाणिव आपल्याला राहते? की हा बाबा, तिसर्‍या महिन्यात मला हात आले, चौथ्या महिन्यात मला पाय आले. सातव्या महिन्यात एक आतडी माझ्या नाकाजवळ आली होती तेव्हा मी गुदमरलो होतो... काही म्हणजे काही आठवत नाही आपल्याला. ना आपल्याला आता त्याच्या काही जाणिवा आहेत. हेच स्पष्टीकरण "मेल्यानंतर काय होते?" या प्रश्नाला लागू होत नाही का? ८.ह्या सर्व नव्या गुरुंमध्ये एक समानता होती, अलौकिकतेला , चमत्कारांना ह्यांचा विरोध होता. कारण ह्यांच्या स्वतःजवळ ते सामर्थ्य नव्हते. सर्व सामान्य लोकांची दु:खे दुर केल्याच्या कोणत्या ही घटना ह्यांच्या चरित्रात दिसत नाहीत. सिध्दीहीन, सामर्थ्यहीन असे हे बोलबच्चन गुरु भारतीय महान योग्यांच्या परंपरेला कलंक बनुन राहिले. योगसामर्थ्य नसणे हे ह्या सर्वांचे कॉमन लक्षण होते. पुन्हा एकदा आपण या नव्या गुरुंना थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि आपल्या महान योग्यांचा विचार करूया. ज्ञानदेव. नाथ संप्रदायातला एक महान नाथ. वयाने लहान असला तरी कर्तुत्वाने महान होता. नाथ संप्रदायातील चमत्कारांच्या परंपरेला शोभेशे चमत्कार याही नाथाच्या नावावर जमा आहेत. का वाचवू शकला नाही रामदेवरायाचे धर्माचे राज्य अल्लाउद्दिन खिलजीच्या "यवनी" आक्रमणापासून आपल्या योगसामर्थ्याच्या आणि सिद्धीच्या जोरावर? जगद्गुरु तुकोबाराय आणि संत रामदास हे शिवरायांचे समकालीन. संत रामदास तर शिवरायांचे अध्यात्मिक गुरू. शिवरायांचा "मी या जनतेचा पोशिंदा" हा अहंकार दूर करण्यासाठी त्यांनी दगड फोडून त्यामध्ये जिवंत बेडूक दाखवला. शिवराय तुकारामांना भेटायला गेले तेव्हा औरंगजेबाचे सैन्य चालून आले. तुकाराम माहाराजांचे किर्तन चालू होते. ईश्वरी चमत्कार झाला, देऊळ फीरले. औरंगजेबाच्या सैन्याला किर्तनामधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये शिवाजी दिसू लागला... हेच तुकाराम महाराज पुढे सदेह वैकुंठाला गेले. ईतके ताकदीचे आणि अधिकारी पुरुष शिवकालात असुनही औरंगजेब महाराष्ट्राचे लचके तोडत होताच ना? ब्रिटीशांच्या काळातसुद्धा खुप योगी अधिकारी पुरुष होउन गेले. का त्यांनी आपल्या योगसामर्थ्याच्या जोरावर ही ब्रिटीशांची जुलमी राजवट संपवली नाही? का भगतसिंग सारख्या क्रांतीकारकांना फासावर जावे लागले? का महात्मा गांधींना सत्याग्रह करावे लागले? आपले संतकवी प्रतिभाशाली विचारवंत होते. भल्याबुर्‍याची जाण असणारे समाजसुधारक होते. पण त्यांच्या नंतरच्या पिढयांमधील हरदास आणि कथेकर्‍यांनी संतकवींची चरीत्रे कथा, किर्तने आणि प्रवचने यामधून जनसामान्यांना सांगायला सुरुवात केली. या कथनात रोचकता यावी म्हणून चरीत्रांच्या जोडीने दंतकथा सांगितल्या जाऊ लागल्या. पुढे पुढे या दंतकथाच संतकवींचे चरीत्र होऊन बसल्या. संतांना देवत्व प्राप्त झाले. संतांनी दिलेली शिकवण बाजूला ठेवून लोक या चमत्कारीक कथांमध्येच रममाण होऊ लागले, त्यालाच ईतिहास मानू लागले. कालाय तस्मै नम: हे झालं आपल्या संतांच्या बाबतीत, ज्यांना आपण ईश्वरी अंश मानतो. आताच्या सदगुरुंची थोरवी काय वर्णावी महाराजा. त्यांची कोटीच्या कोटींची उडडाणे ऐकून आपली छाती दडपून जाते. आताचे संन्याशी सशस्त्र सेना उभारण्याच्या गोष्टी करतात. संन्याशी या शब्दाची ईतकी क्रुर थट्टा ईतिहासात याआधी कुणी केली नसेल. आजचे आमचे धर्माचार्य आणि साईबाबांचे अवतार आपली चित्रे असणारे पेन आणि बिल्ले विकण्यालाच धर्मकार्य समजत आहेत. लोकांच्या घरांच्या भींतींवर सहकुटुंब सहपरिवार देवाच्या गेटपमध्ये विराजमान होत आहेत. पण... या बाबांच्या आणि सदगुरुंच्या गजबजाटात दिनांक २३ फेब्रुवारी १८७६ साली या महाराष्ट्रात, विदर्भात एक आधुनिक पण सच्चा संत जन्माला आला. डेबुजी त्याचे नांव. दुनिया आज या संताला संत गाडगेबाबा म्हणून ओळखते. आयुष्यभर हा संत अंगावर चिंध्या पांघरून, एका हातात खापर घेऊन महाराष्ट्र सुधारण्यासाठी फीरला. या संताने कसले चमत्कार केले नाहीत. कुणाला आपल्याला नमस्कार करू दिला नाही. कुणाला गुरुपदेश केला नाही. किंबहूना माझा कुणी शिष्य नाही असं लेखी लिहून दिलं. खेडयापाडयातील अडाणी जनतेला शिक्षणाचं, स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी या सिद्धाने देह झिजवला. या थोर महात्म्याचं चरीत्र वाचलं की आपल्याला आताच्या बुवाबापू बाबामहाराजांची कीव करावीशी वाटते... असो. लेख बराच लांबला आहे. तेव्हा आता मूळ मुद्द्याकडे येतो. गुरु कसा असावा, कसा नसावा, गुरु कोणाला म्हणावे याचे छान वर्णन समर्थांनी दासबोधाच्या पाचव्या दशकात, दुसर्‍या समासात, गुरुलक्षणांच्या समासात केले आहे. मी ते वर्णन विस्तारभयास्तव ईथे देत नाही. जिज्ञासूना ते श्री दासबोध ईथे वाचता येईल. मायबाप वाचकहो, हा लेख लिहिताना होता होईलतो कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश असणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. लेखन करताना माझे पुर्वग्रह बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांनी आपल्या देव, धर्म, सदगुरू, संत यांच्यासंबंधीच्या कल्पना पुन्हा एकदा चाचपडून पाहाव्यात. खर्‍या देवाची ओळख करून घ्यावी, सानेगुरुजींनी केलेली "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे" हीच धर्माची खरी व्याख्या आहे हे समजून घ्यावे यासाठी हा लेखनप्रपंच. याउपरही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो !!! संदर्भ ग्रंथः १. श्री ज्ञानेश्वरी २. श्री ज्ञानदेवांचे हरिपाठाचे अभंग ३. श्री दासबोध ४. श्री तुकाराम गाथा ५. विज्ञाननिष्ठ निबंध भाग १ व २ - समग्र सावरकर वाड्मय खंड ६ - वि. दा. सावरकर ६. श्रीविठ्ठलः एक महासमन्वय - डॉ. रा. चिं. ढेरे ७. ज्ञानेश्वरांची प्रतीतिविश्रांती - ज्ञानेश्वरी: नवे आकलन - डॉ. द. भि. कुलकर्णी ८. मोगरा फुलला - गो. नी. दांडेकर ९. लोकसखा ज्ञानेश्वर - आनंद यादव १०. दास डोंगरी राहातो - गो. नी. दांडेकर ११. श्री गाडगेमहाराज - गो. नी. दांडेकर १२. धार्मिक - डॉ. अनिल अवचट १३. संभ्रम - डॉ. अनिल अवचट
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास
समाज
जीवनमान

प्रतिक्रिया द्या
19760 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

छान

JAGOMOHANPYARE
Sun, 06/12/2011 - 23:12 नवीन
छान
  • Log in or register to post comments

लेख अजून वाचला नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/12/2011 - 23:18 नवीन
लेख वाचला नाही, पण आपल्याकडील असलेल्या संदर्भ ग्रंथाची यादी मला आवडली. बाकी, लेखन वाचून प्रतिक्रिया कळवेनच. तो पर्यंत ही केवळ पोच. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वाचतोय.......... मी वैयक्तिक

ईश आपटे
Sun, 06/12/2011 - 23:51 नवीन
वाचतोय.......... मी वैयक्तिक वादावादी होऊ नये म्हणून नावे टा़ळली होती ............ तरी आता ठीक आहे............. सानेगुरुजींनी केलेली "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे" हीच धर्माची खरी व्याख्या आहे हे समजून घ्यावे यासाठी हा लेखनप्रपंच. धर्माची व्याख्या फक्त येवढीच नाही. इह आणि सर्वात महत्वाचे परलोकी कल्याण साधणे हा धर्माचा हेतु आहे. असो . आपण ज्याला धर्म समजत आहात तो समाजवाद आहे किंवा फारतर भूतदया आहे, ती धर्माची फक्त एक बाजु आहे. दुसर राजकीय स्थिती, आक्रमणे , युध्दे ह्यांचा विचार ज्याला अध्यात्मामध्ये रस आहे त्याने न करणेच चांगले. त्याने नाहक गोंधळ निर्माण होतो...... पुन्हा एकदा विनंती धर्म म्हणजे निव्वळ नीति नव्हे . परलोकजीवन व कर्मसिध्दान्त हा धर्माचा मूळ पाया आहे.
  • Log in or register to post comments

धर्माची व्याख्या...

धन्या
Mon, 06/13/2011 - 05:13 नवीन
इह आणि सर्वात महत्वाचे परलोकी कल्याण साधणे हा धर्माचा हेतु आहे. असो. धर्म म्हणजे काय तर जीवन जगताना कसे वागावे किंवा कसे वागू नये याची नियमावली जी हजारो वर्षांपूर्वी आपल्या पुराणांमधून, वेदांमधून लिहिली गेली आहे. या नियमावलीचा हेतू हा की माणसाने काही मर्यांदांमध्ये राहून जगावे, जेणेकरुन या सृष्टीचा गाडा व्यवस्थित चालेल. आता ही नियमावली हजारो वर्षांपूर्वी लिहिली. ती तेव्हाच्या जीवनशैलीशी अनुरुप अशीच होती. पण काळ बदलला. माणसाची जगण्याची पद्धत किंवा जीवनशैली बदलली. पण जीवन जगण्याची नियमावली किंवा धर्म मात्र तोच. अगदी हजारो वर्षांनंतरही? असं कसं चालेल? त्या नियमावलीत काळानुरुप बदल व्हायला नकोत का? एक साधं उदाहरण. आपली ग्रंथसंपदा ईतकी समृद्ध आहे तीच्यातून कुठलाच विषय सुटलेला नाही. त्यामुळे युद्धशास्त्रावरही खुप लेखन झालं असणार. या पुरातन ग्रंथांमधून युद्ध कसे, शत्रूला नामोहरम कसे करावे याचे विस्तृत लेखन झालं असणार. पण या सार्‍या ग्रंथांमध्ये विमाने, रणगाडे आणि बाँब यांचे उल्लेख नक्कीच नसतील. कारण प्राचिन काळात जेव्हा हे ग्रंथ लिहिले गेले असतील तेव्हा या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या त्यामुळे त्यांचा उल्लेख या ग्रंथांमध्ये येणे शक्य नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ग्रंथांमध्ये जी व्युहरचना आहे ती जुनी व्युहरचना, ते युद्धकौशल्य वापरुन जर आज लढाई केली तर शत्रू विमानातून बाँबहल्ला करून कधी आपल्या सैन्याचा निकाल लावून जाईल हे आपल्यालाच कळणार नाही. थोडक्यात काय तर, काळानुरुप धर्माची व्याख्या बदलायली हवी. हजारो वर्षांपूर्वी जे लिहिलं आहे ते अनुसरुन आज ईहलोकी कल्याण नाही साधता येणार. त्यासाठी आजच्या काळाशी सुसंगत अशीच धर्माची व्याख्या हवी. दुसरा मुद्दा परलोकी कल्याण साधण्याचा. परलोक काय तर माणूस मेल्यानंतर ज्या लोकात जातो तो परलोक. मी हा मुद्दा माझ्या मूळ प्रतिक्रियेत मांडण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा पाहूया. माणूस आईच्या पोटातून बाहेर येऊन त्याचा जन्म होण्याआधी तो नऊ महिने गर्भावस्थेत असतो. आपल्या शास्त्रात, धर्मग्रंथांमधून या नऊ महिन्यांत जीवाचे किती वाईट हाल होतात हे खुप विस्तॄतपणे वर्णन केले आहे. पण अशी एकही व्यक्ती आपण दाखवू शकणार नाही जी सांगू शकेल बाब त्या नऊ महिन्यांत गर्भात माझे असे असे हाल झाले. कारण ती जाणिवच आपल्याला नसते. मग गर्भात असताना हाल होतात हे कशाच्या जोरावर म्हणायचे तर आपली पुराणे सांगतात म्हणून. हेच स्पष्टीकरण "परलोकीचं कल्याण" या गोष्टीला लागू करायला हरकत नसावी. दुसर राजकीय स्थिती, आक्रमणे , युध्दे ह्यांचा विचार ज्याला अध्यात्मामध्ये रस आहे त्याने न करणेच चांगले. त्याने नाहक गोंधळ निर्माण होतो...... ईशराव, केवळ गोंधळ उडतो म्हणून अध्यात्माच्या अभ्यासकाने किंवा साधकाने राजकीय स्थिती, आक्रमणे आणि युद्धे यांचा विचार न करुन कसं चालेल? तसं केलं तर ती वास्तवापासून दूर घेऊन जाणारी पळवाट होईल नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

उत्तम

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/12/2011 - 23:49 नवीन
फार उत्तम प्रतिसाद लिहिलात...आपल्यात असलेल्या नम्रतेला शतशः प्रणाम...
  • Log in or register to post comments

छान

राजेश घासकडवी
Mon, 06/13/2011 - 00:20 नवीन
अध्यात्मवादाला धादांतवादाचं उत्तर आवडलं. आत्मा चिरंतन आहे की नाही, मृत्यूनंतर नक्की काय होतं, स्वर्ग मिळणार की नरक, गुरू योगबलसिद्ध चमत्कार करतो की नुसतीच भाषणं देतो, खरे चमत्कार कोणते वगैरे प्रश्नांवर उगीचच ऊहापोह होतो. 'एका टाचणीच्या टोकावर किती एंजल्स नृत्य करू शकतील' या प्रश्नांइतकाच निरर्थक... मग जगाला प्रेम अर्पावे हे धर्माचं सार बाजूला राहातं. देवता व धार्मिक भावना केवळ इतरांनी अपमानास्पद वर्तन केल्यावर दुखावण्यापुरत्याच राहातात.
  • Log in or register to post comments

धादान्तवाद

मूकवाचक
Mon, 06/13/2011 - 20:58 नवीन
धादान्तवाद हे कुठल्याही 'वादा'वरचे तसे रामबाण उत्तर आहे. (ज्या मूळ वादाला असे धादान्तवादी उत्तर दिले जाते त्याबद्दल आपल्याला अजिबात जिव्हाळा नसेल तर तो दुग्धशर्करा योगच म्हणायचा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

कोणी तरी समरी द्या रे !

टारझन
Mon, 06/13/2011 - 00:33 नवीन
कोणी तरी समरी द्या रे !
  • Log in or register to post comments

+१

आत्मशून्य
Mon, 06/13/2011 - 01:51 नवीन
असच म्हणतो... लेखकानं बरच काही लीहलय... पण नक्की काय सांगायच आहे ते स्वत:च्या शब्दात ऊतरलच नाहीये....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

शक्यता आहे...

धन्या
Mon, 06/13/2011 - 04:16 नवीन
तुम्ही जे म्हणत आहात त्याची शक्यता आहे. बरंच काही लिहल्यामुळे, बरेच संदर्भ दिल्यामुळे मला नक्की काय सांगायचं आहे ते माझ्या स्वतःच्या शब्दात कदाचित उतरलं नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. मला असं म्हणायचं होतं, आपल्या संतांच्या आयुष्यात आपण दंतकथा घुसडून त्यांना देवत्व दिलं आणि संतांची शिकवण मात्र बाजूला ठेवली. आपले संतकवी प्रतिभाशाली विचारवंत होते. भल्याबुर्‍याची जाण असणारे समाजसुधारक होते. पण त्यांच्या नंतरच्या पिढयांमधील हरदास आणि कथेकर्‍यांनी संतकवींची चरीत्रे कथा, किर्तने आणि प्रवचने यामधून जनसामान्यांना सांगायला सुरुवात केली. या कथनात रोचकता यावी म्हणून चरीत्रांच्या जोडीने दंतकथा सांगितल्या जाऊ लागल्या. पुढे पुढे या दंतकथाच संतकवींचे चरीत्र होऊन बसल्या. संतांना देवत्व प्राप्त झाले. संतांनी दिलेली शिकवण बाजूला ठेवून लोक या चमत्कारीक कथांमध्येच रममाण होऊ लागले, त्यालाच ईतिहास मानू लागले. या लेखाचं सार श्री राजेश घासकडवी यांनी वरच्या एका प्रतिक्रियेत अतिशय उत्तम आणि मोजक्याच शब्दांत दिलं आहे. अध्यात्मवादाला धादांतवादाचं उत्तर आवडलं (हे उत्तर आहे). आत्मा चिरंतन आहे की नाही, मृत्यूनंतर नक्की काय होतं, स्वर्ग मिळणार की नरक, गुरू योगबलसिद्ध चमत्कार करतो की नुसतीच भाषणं देतो, खरे चमत्कार कोणते वगैरे प्रश्नांवर उगीचच ऊहापोह होतो. 'एका टाचणीच्या टोकावर किती एंजल्स नृत्य करू शकतील' या प्रश्नांइतकाच निरर्थक... मग जगाला प्रेम अर्पावे हे धर्माचं सार बाजूला राहातं. देवता व धार्मिक भावना केवळ इतरांनी अपमानास्पद वर्तन केल्यावर दुखावण्यापुरत्याच राहातात. - धनाजीराव वाकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

सामाजीक सूधारणा आणी आत्मीक प्रगती हे दोन वेगळे विषय नाहीत काय ?

आत्मशून्य
Mon, 06/13/2011 - 07:24 नवीन
तसच आत्मीक प्रगती तूमच सामाजीक स्थान कोणत आहे याचा विचार करत नसते. सामाजीक सूधारणा या अत्यावश्यक आहेतच पण त्याचा संदर्भ वैयक्तीक आत्मीक/अध्यात्मीक प्रगतीशी का जोडावा ? उदाहरणासाठी हेच वाक्य घ्या :- "जगाला प्रेम अर्पावे हे धर्माचं सार बाजूला राहातं". मला वाटत नाही हे कोणत्याही धर्माच सार असावं. कारण की हे तर संपूर्ण माणूसकीचं सार आहे, आणी माणूसकी हा केवळ शरीराभोवतीच गूंफलेला समज आहे. मूळात जिथ आपल्या वाट्याच काही उरतच नाही आणी ठेवायचच नाही अशा अध्यात्मीक प्रवासाला जेव्हां साधक निघतो तीथे तो अर्पणार काय आणी मिळवणार काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

सामाजीक सूधारणा आणी आत्मीक

ईश आपटे
Mon, 06/13/2011 - 08:09 नवीन
सामाजीक सूधारणा आणी आत्मीक प्रगती हे दोन वेगळे विषय नाहीत काय ? अचुक मुद्दा पकडला आहे .... जगाला प्रेम अर्पावे , संपत्तीचे समान वाटप करावे, वगैरे समाजवादाच्या व मार्क्सवादाच्या गोष्टी झाल्या. (अर्थात जगाला प्रेम अर्पावे वगैरे मार्क्सवादात ही येत नाहीच :)) ही केवळ धर्माची एक बाजु झाली. जरा विचार करा... प्रेमच का अर्पावे... द्वेष का नको ??????????? तुम्ही नीतिमुल्यांचा विचार सुरु केला व तुम्ही जर प्रामाणिक असाल तर तुम्हाला शरीरापलीकडे जावे लागते. मला चांगल वाटतय म्हणून मी चांगल वागतो, झाडे लावतो, संपत्ति दान करतो असे होऊ शकत नाही. त्याचे काही तरी कारण असते व केल्यास व न केल्यास काही तरी फल मिळणार असते. दुसर एका बाजुला तुम्ही अल्लाउद्दिन खिलजीने केलेल्या आक्रमणाबाबत चिड व्यक्त करताय व दुसरी कडे सानेगुरु़जींचे शत्रुवर ही प्रेम अर्पण्याच्या विचारांचे दाखले देताय. हा परस्परविरोध नाही का ???
  • Log in or register to post comments

गडबड होतीय...

धन्या
Mon, 06/13/2011 - 09:16 नवीन
ईशराव, गडबड होतेय... तुम्ही जे समाजवाद किंवा मार्क्सवाद वगैरे म्हणत आहात त्यातलं काहीही मला ईथे अभिप्रेत नाही. वैयक्तिक पातळीवर बोलायचं झालं तर, मी विज्ञान शाखेचा विदयार्थी असल्यामुळे मला या शब्दांचे अर्थही माहिती नाहीत. मला ईथे फक्त साने गुरुजींची ती कविता अपेक्षित आहे. तुमच्या माहितीसाठी ती ईथे देतो. खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।। जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे।। सदा जे आर्त ‍अति विकल जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे। जगाला प्रेम अर्पावे।। कुणा ना व्यर्थ शिणवावे कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्ता बंधु मानावे। जगाला प्रेम अर्पावे।। प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे।। असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्था प्राणही द्यावे। जगाला प्रेम अर्पावे।। हे काव्य सरळ सरळ तुकाराम महाराजांच्या, जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥ या अभंगांला दुजोरा देते. आणि गुरुजींनी ज्याला फक्त धर्म म्हटलंय, तुकाराम महाराज अजून पुढे जाऊन त्याला देव म्हणतात. मी जी वर कविता उद्धृत केली आहे तिचा सरळ साधा अर्थ अडल्या नडलेल्यांना, दीन दुबळ्यांना मदत करा असा आहे. पुर्ण कवितेत कुठेही शत्रूवर प्रेम असा अर्थ निघत नाही. नव्हे पुढील ओळी पुन्हा एकदा पहा, कुणा ना व्यर्थ शिणवावे कुणा ना व्यर्थ हिणवावे उगाच कुणाला त्रास देऊ नका. हे झालं कवितेविषयी. साने गुरुजींनी इतरत्रही कुठे म्हटलेलं नाही की शत्रूवरही प्रेम करा. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकर्‍यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध केल्या. त्यातील ‘बलसागर भारत होवो’ सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. जर शत्रूवर प्रेम करा या विचाराचे साने गुरुजी असते तर त्यांनी हे सगळं केलं असतं का? असो. आता तुमच्या "सामाजीक सूधारणा आणी आत्मीक प्रगती हे दोन वेगळे विषय नाहीत काय ?" या आक्षेपाविषयी. तुमची "आत्मिक प्रगती" ची नेमकी व्याख्या काय हे सांगितलंत तर मी नक्कीच त्यावर माझे मत मांडण्याचा प्रयत्न करेन. - धनाजीराव वाकडे
  • Log in or register to post comments

एवढा मोकळा वेळ आमचे मित्र

टारझन
Mon, 06/13/2011 - 09:49 नवीन
एवढा मोकळा वेळ आमचे मित्र नाना यांच्या कडे होता . इंद्राज आणि डॉणराव यांचेकडे काही वर्षांपुर्वी एवढा मोकळा वेळ असे. डॉणराव पार मेगाबाईट्स वरुन बिट्स मधे आलेत ;( देव सर्वांना मुबलक काम देवो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हाहाहा...

धन्या
Mon, 06/13/2011 - 11:28 नवीन
त्याचं काय आहे, आता कोकणात जबरदस्त पाऊस पडतोय, त्यामुळे घरचे बाईकवर ताम्हीणी घाटातून घरी येउ देत नाहीत. मरापमच्या येश्टीने जायला आमच्या जीवावर येतं. आणि कार घेऊन जावी तर एकटयासाठी चार माणसांची कार घेऊन जायची, दोनशे रुपयांमध्ये होणार्‍या प्रवासाला हजारे बाराशेचं पेट्रोल जाळावे हे मनाला पटत नाही (आणि खिशालाही परवडत नाही :) ) त्यामुळे शनिवार रविवार पुण्यातच झोपा काढणे उत्तम ठरते. असो. जोक्स अपार्ट, बरेच दिवसांपासून या विषयावर लिहायचे होते, विशेषतः ज्ञानदेवाने केलेल्या चमत्कारांवर. नेमकं काय आणि कसं लिहावं हे कळत नव्हतं त्यामुळे थांबलो होतो. काल सतिशरावांनी याच विषयावर भाष्य करणारा लेख लिहिला आणि आम्हाला काय लिहायला हवं याचा "साक्षात्कार" झाला. (ज्ञानदेवानेच हे घडवून आणलं म्हणा ना :P) चान्स पे डान्स करत आम्ही रविवार सत्कारणी लावला. जाता जाता - या प्रतिसादाने ज्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे त्यांनी हलकेच घेणे. ज्ञानदेवाबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. किंबहूना त्याचे हरिपाठाचे अभंग हा आमच्या अध्यात्मिक बैठकीचा पाया आहे. लोभ असावा. - धनाजीराव वाकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हॅहॅहॅ

टारझन
Mon, 06/13/2011 - 11:53 नवीन
पुण्यात असता होय .. भेटा की मग कधी मधी :) बाकी जरा सर्व्हर डाउन असल्याने नेमका लेख वाचायचा टाईम भेटला :) आणि गंमत म्हणजे विचार अगदी तंतोतंत आमचेच वाटले. ते स्वर्ग नर्काचं लॉजिक फार पुर्वी एका लेखात अगदी तसंच्या तसं लिहीलेलं .. ते आठवलं :) बाकी एवढं मोठं लिहीणार्‍यांचं कौतुक वाटतं म्हणुन प्रतिक्रीया होती. लेखण रटाळ नव्हतं ... त्याबद्दल खास अभिनंदन - पुणोजीराव वाकड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

उद्या अण्णा हजारे ही महान साधनेच्या (साप्ताहिकाच्या) संकल्पनेत ध

ईश आपटे
Mon, 06/13/2011 - 10:52 नवीन
संतश्रेष्ठ तुकारामांच्या सहस्त्र अभंगातील केवळ एक अभंग निवडुन तो ही संदर्भ सोडुन, व साने गुरुजींचे चरित्र जे आता मला अत्यंत हिंसक वाटु लागले आहे :) , ते घेऊन धर्मावर चर्चा होऊ शकत नाही. उद्या अण्णा हजारे ही महान साधनेच्या (साप्ताहिकाच्या) संकल्पनेत धार्मिक ठरतील. असला धर्म दाभोळकर, अवचट, साने गुरुजी,इ. ना लखलाभ असो. जगातील सर्व धर्मांच्या परिभाषेत ह्याला पाखंड व नास्तिकता म्हणतात. अगदी ख्रिश्चन,इस्लाम,ज्यू कुठ्ला ही धर्म घ्या मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तुमचा धर्म तुम्हाला लखलाभ..

शैलेन्द्र
Mon, 06/13/2011 - 11:02 नवीन
तुमचा धर्म तुम्हाला लखलाभ.. आमचा आम्हाला.. आणी आमच्या धर्मात याला पाखंड नाही म्हणत.. मुळात पाखंड व नास्तिकता वाईट का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

वा...

धन्या
Mon, 06/13/2011 - 11:10 नवीन
संतश्रेष्ठ तुकारामांच्या सहस्त्र अभंगातील केवळ एक अभंग निवडुन तो ही संदर्भ सोडुन, व साने गुरुजींचे चरित्र जे आता मला अत्यंत हिंसक वाटु लागले आहे, ते घेऊन धर्मावर चर्चा होऊ शकत नाही. बेक्कार हसलो मी सतिशराव तुमचा प्रतिसाद वाचून. आता कुठे चर्चेला रंग येत होता आणि तुम्ही तर शस्त्रेच खाली ठेवून दिलीत. (माफ करा, अभिनिवेशात हिंसात्मक भाषा वापरली. :) ) असो. लोभ असावा. - धनाजीराव वाकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

आता तुमच्या "सामाजीक सूधारणा

आत्मशून्य
Mon, 06/13/2011 - 22:06 नवीन
आता तुमच्या "सामाजीक सूधारणा आणी आत्मीक प्रगती हे दोन वेगळे विषय नाहीत काय ?" या आक्षेपाविषयी. तुमची "आत्मिक प्रगती" ची नेमकी व्याख्या काय हे सांगितलंत तर मी नक्कीच त्यावर माझे मत मांडण्याचा प्रयत्न करेन.
वा.. सूरेख यूक्तीवाद करता आपण ... पण स्पश्ट बोलू ? आधीच पानभर लिखाण माथी मारून मग आपल्याला जर शेवटी हेच म्हणायच आहे तर आता पून्हा कशाला मत मांडायचय व काय समजून घ्यायचय ? कारण आमची आत्मीक/अध्यात्मीक प्रगतीची व्याख्या आपल्याला अजून लक्षात आली नाही यातच तूमच्या व माझ्या मतांमधे फारकत आहे हे स्पश्ट होत नाही काय ? (किम्बहूना त्याचा अवाका वा अंदाजच अजून आपणास आला नाही असं समजायला पूर्ण वाव आहे.) मग मत मांडले काय आणी नाही मांडले काय एकच नाही काय ? म्हणजे आपल्या मतात तफावत असेल तर तूम्ही आत्मीक/अध्यात्मीक न्हवे तर सामाजीक गोश्टीबाबत बोलत होता हे सिध्द होहिल... व जर एकमत झाले तरी सूध्दा तेच सिध्द होइल.. मग उगीच मिपासर्वरवर ताण देऊन तूम्ही कशी मूद्दा समजण्यात कशी गल्लत केलीत हे उघड गूपीत जाहीर करायला आता आपण दोघांनीही परत आणखी वेळ,पैसा व कश्ट कशाला वाया घालवायचे ? बघा बूवा... मी फक्त कश्ट वाचवायचा मार्ग दाखवत आहे इतकच... तरीही जर आपण ज्ञानेश्वरी वाचलीच आहे तर तर आता मला सखेद आश्चर्य वाटल्या शिवाय रहाणार नाही की तूमच्या व मला अभिप्रेत असलेल्या धर्माच्या व्याखेमधे फरक येतोच कसा ? असो जर चर्चाच करायची आहे तर होऊद्या सूरूवात ओम तत् सत् चा ज्ञानेश्वरीमधे दीलेला अर्थ विशद करण्यापासून.. तसच मला हीसूध्दा खात्री आहे की ज्ञानेश्वरीमधे ज्याच्या स्वरूपाला उदाहरणात अग्नी जसा लाकडमधे सूप्त स्वरूपात असतो अथवा तूप ज्यास्वरूपात दूधामधे अधीच अस्तीत्वात असते असे म्हटले आहे त्यास्वरूपाच्या अनूशंगाने धर्माच्या तूमच्या व माझ्या व्याखेत लवकरच एकमत होणार यावर ठाम विश्वास आहे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आधीच पानभर लिखाण माथी मारून

धन्या
Tue, 06/14/2011 - 10:33 नवीन
आधीच पानभर लिखाण माथी मारून मग आपल्याला जर शेवटी हेच म्हणायच आहे तर आता पून्हा कशाला मत मांडायचय व काय समजून घ्यायचय ?
माझा लेख तुम्ही स्वखुशीने वाचला आहे. मी काही तुम्हाला खरड टाकली नव्हती किंवा व्यनी केला नव्हता की माझा लेख वाचा म्हणून. त्यामुळे लिखाण माथी मारण्याचा प्रश्नच येत नाही. :)
कारण आमची आत्मीक/अध्यात्मीक प्रगतीची व्याख्या आपल्याला अजून लक्षात आली नाही यातच तूमच्या व माझ्या मतांमधे फारकत आहे हे स्पश्ट होत नाही काय?
,मी मला कळलेला आत्मीक/अध्यात्मीक प्रगती चा अर्थ "माझ्या मते आपलं अध्यात्म ज्याला "अनुभव" म्हणतं त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीच्या खर्‍या स्वरूपाची जाणिव होणं असा असावा. कपिलवस्तूच्या राजकुमार सिद्धार्थाला "सा़क्षात्कार" होऊन त्याला सत्याचं ज्ञान होऊन त्याचा गौतम बुद्ध बनला. हाही एकप्रकारे त्याला गुरुविना आलेला "अनुभवच" नाही का?" या शब्दांत मांडला होता. तुम्हालाही थोडयाफार फरकाने हेच अपेक्षित असावे. मी प्रश्न विचारताना "नेमकी व्याख्या" हा शब्दप्रयोग वापरला होता. त्यातून मला तुम्हाला अपेक्षित असलेली या विषयाची नेमकी व्याप्ती जाणून घ्यायची होती.
म्हणजे आपल्या मतात तफावत असेल तर तूम्ही आत्मीक/अध्यात्मीक न्हवे तर सामाजीक गोश्टीबाबत बोलत होता हे सिध्द होहिल... व जर एकमत झाले तरी सूध्दा तेच सिध्द होइल.. मग उगीच मिपासर्वरवर ताण देऊन तूम्ही कशी मूद्दा समजण्यात कशी गल्लत केलीत हे उघड गूपीत जाहीर करायला आता आपण दोघांनीही परत आणखी वेळ,पैसा व कश्ट कशाला वाया घालवायचे ? बघा बूवा... मी फक्त कश्ट वाचवायचा मार्ग दाखवत आहे इतकच...
शक्यता आहे. झकास मोर्चेबांधणी केलीये राव. आणि मी उत्तर देण्याआधीच दोन्ही शक्यतांचा विचार करुन मी प्रत्त्युत्तर देण्याआधीच निष्कर्षही काढून मोकळे झालात तुम्ही. मान गये उस्ताद !!! :) असो. सतिशरावांच्या आणि माझ्या लेखाच्या निमित्ताने चार सज्जनांचे विचार वाचायला मिळाले. ज्ञानाचे चार कण वेचायला मिळाले. आमच्या रविवारचा पूर्ण दिवस कळफलक बडवण्याचे आणि दहा-बारा पुस्तके उलथी पालथी करण्याचे सार्थक झाले.
तरीही जर आपण ज्ञानेश्वरी वाचलीच आहे तर तर आता मला सखेद आश्चर्य वाटल्या शिवाय रहाणार नाही की तूमच्या व मला अभिप्रेत असलेल्या धर्माच्या व्याखेमधे फरक येतोच कसा ? असो जर चर्चाच करायची आहे तर होऊद्या सूरूवात ओम तत् सत् चा ज्ञानेश्वरीमधे दीलेला अर्थ विशद करण्यापासून.. तसच मला हीसूध्दा खात्री आहे की ज्ञानेश्वरीमधे ज्याच्या स्वरूपाला उदाहरणात अग्नी जसा लाकडमधे सूप्त स्वरूपात असतो अथवा तूप ज्यास्वरूपात दूधामधे अधीच अस्तीत्वात असते असे म्हटले आहे त्यास्वरूपाच्या अनूशंगाने धर्माच्या तूमच्या व माझ्या व्याखेत लवकरच एकमत होणार यावर ठाम विश्वास आहे.....
चक्क शंकराचार्य श्टाईल च्यायलेंज. जाऊ दया. मी हरलो :) लोभ असावा. - धनाजीराव वाकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

:)

आत्मशून्य
Tue, 06/14/2011 - 18:20 नवीन
हलके घ्या.
कपिलवस्तूच्या राजकुमार सिद्धार्थाला "सा़क्षात्कार" होऊन त्याला सत्याचं ज्ञान होऊन त्याचा गौतम बुद्ध बनला. हाही एकप्रकारे त्याला गुरुविना आलेला "अनुभवच" नाही का?
- खरोखर मस्त बोललात. आपण व्यनिमधे निश्चीत चर्चा करूया. अगदी "ओम तत् सत्" पासून ते भक्ती वा कर्म योगा पर्यंत काहीही... वा एखाद्या अभंगावरही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

झकास ...

छोटा डॉन
Mon, 06/13/2011 - 09:34 नवीन
चर्चा वाचतो आहे, बरेच नवे काही कळते आहे :) व्यासंगाला सलाम !!! - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

धनाजीराव... +१०००००००

शैलेन्द्र
Mon, 06/13/2011 - 09:47 नवीन
धनाजीराव... +१०००००००
  • Log in or register to post comments

खुपच छान

निखिलचं शाईपेन
Mon, 06/13/2011 - 10:43 नवीन
धनाजीराव, खरचं, एक नंबर. प्रथम थँक्स.. काय आहे की, पुलं म्हणतात तसं " हि इज द यु इन द आय ऑफ द यु इन विच यु ऑफ द यु अँड आय ऑफ द यु आर यु इन द यु.." असलं अगम्य काहितरी सांगून ..गंडवणारे बाबा कमी नाहित.. कल्ट तयार करून पद्धतशिरपणे फसवणारेपण भरपुर ... समाजचं व्यक्तीपुजेवर आधारीत असल्यामुळे, मग लोक एक बाबा ते दुसरे बाबा असे फिरत राहतात. लहान मुलांच्या आर्ट ऑफ लिव्हींग मध्ये हे (sri sri sri) त्यांचे गुरू आहेत .. आणि म्हणुन मग ..."जय गुरुदेव" घोकून घेनारेही कमी नाहित... आता यात बरेचशे शहाणे लोक .. जाउदेत मला माहित आहे नं हे सगळं चुक आहे ..करुदेत त्यांना काय करायचे असे वागतात किंवा काही मग असे लेख लिहीण्याचे कष्ट घेतात ... छान लिहिलेत .. अभिनंदन.. -निखिल.
  • Log in or register to post comments

हि इज द यु इन द आय ऑफ द यु इन

आत्मशून्य
Mon, 06/13/2011 - 12:14 नवीन
हि इज द यु इन द आय ऑफ द यु इन विच यु ऑफ द यु अँड आय ऑफ द यु आर यु इन द यु..
अरे वा अगम्य वाटलं ना हे वाक्य आपल्याला ? कदाचीत झेपलं नसेल म्हणूनही तसं वाटत असेल... आता तूम्हाला झेपेल असं एक वाक्य सांगतो... हमं असं ते वाक्य आहे, फार सोपयं.
काळे राळे गोरे राळे काळ्यात राळे मिसळले.
आता हे फक्त सलग २५ वेळा न चूकता न अडखळता डोळे मिटून स्पश्ट व मोठ्या आवाजात म्हणून दाखवावे. नाही जमलं तर तक्रार करू नका की ही काही तरी अगम्य फसवणूक आहे. अहंकाराचा त्याग करून कमीपणा मानता आला तरच आपण जी प्रतीक्रीया दीलीत त्याचे पाइक होण्याची पात्रता मिळवलीत याचे प्रमाण मिळण्यास पूश्टी मिळेल. आणी जरी हे घडलं तरीसूध्दा कसं आहे ना ... की मूळ मूद्दा समजून घेण्यावर कश्ट वाया न घालवता हीकडचे तिकडचे ग्रंथातील ऊतारे कॉपी+पेस्ट करून छापून टाकून पोपट्पंची आपणसूध्दा फार सहज करू शकाल, त्यात काही अवघड नाहीच मूळी, पण,ते समर्थनीय नाही कारण.. ती गोश्ट तीतकीच त्याज्य समजावी जीतके त्याज्य अशा पोपटपंचीला अनूमोदन देणे आहे. __________________________________________________________ अवांतर :- आपण इथले बरेच जूने व जेश्ठ सदस्य जाणवता, म्हणून सदरील प्रतीक्रीयेबाब जी आधीच लीहली आहे त्याबाबत "विथ ऑल ड्यू रीस्पेक्ट" ही गोश्ट विषेश नमूद करू इच्छीतो, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिलचं शाईपेन

ते वाक्य मुद्दामच हास्यास्पद

Nile
Tue, 06/14/2011 - 03:50 नवीन
ते वाक्य मुद्दामच हास्यास्पद रीत्या अगम्य आहे. अगम्यतेच्या बुरख्यात सांगितल्या जाणार्‍या थोर तत्वज्ञानाचा तो उपहास आहे हे 'असा मी..' चा तो भाग पाहून स्पष्ट कळावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

अगम्य आहे की हास्यापद आहे इतकेच ठरवा

आत्मशून्य
Tue, 06/14/2011 - 18:22 नवीन
हास्यापद असले की अगम्यता संपली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

काहीपण

Nile
Wed, 06/15/2011 - 16:00 नवीन
तो विनोद आहे हे कळले आहे का? पुलंच्या वाक्याचा उद्देश कळतो आहे का? नाहीतर सोडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

पुलंच्या वाक्याचा उद्देश कळतो

आत्मशून्य
Wed, 06/15/2011 - 17:20 नवीन
पुलंच्या वाक्याचा उद्देश कळतो आहे का
फार चांगला माहीत आहे, पण त्याचा वापर जेव्हां नकोत्या ठीकाणी गंभीर चर्चेत केला जातो तेव्हां तो करणार्‍याची कशी फेरकी घेता येते हे मला दाखवायचे होते ते कळलं का हे सांगा ? नाहीतर सोडा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

का वाचवू शकला नाही रामदेवरायाचे धर्माचे राज्य ?

नेत्रेश
Mon, 06/13/2011 - 16:24 नवीन
ज्ञानेश्वर रामदेवरायाचे धर्माचे राज्य किंवा समर्थ रामदास महाराष्ट्राला यवनी आक्रमणापासुन का वाचउ शकले नाहीत या प्रश्णाचे उत्तर बहुतेक 'देवाची ईच्छा' हेच असावे अन्यथा सर्व शक्तीमान परमेश्वराला सर्व लोकांना चांगले, न्यायाने, बंधुभावाने वागण्याची बुद्धी देणे कीतीसे कठीण आहे? मग अत्याचार, लढाया होणारच नाहीत. जर झाडावरचे पान ही परमेश्वराच्या ईच्छेशिवाय हलु शकत नाही, तर मग अत्याचारी, अन्यायाने वागणार्‍या लोकांना तसे वागण्याची बुद्धी कोण देतो? जर परमेश्वरच तसे करीत नाही, तर संतानी आपल्या योगसामर्थ्याने राज्याचे रक्षण केले नाही म्हणुन त्यांना दोश देणे कीती बरोबर आहे?
  • Log in or register to post comments

असेल माझा हरि...

धन्या
Tue, 06/14/2011 - 10:03 नवीन
नेत्रेशभाऊ, असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी ही म्हण तुम्हाला माहिती असेलच. असो. तुमचा "अन्यथा सर्व शक्तीमान परमेश्वराला सर्व लोकांना चांगले, न्यायाने, बंधुभावाने वागण्याची बुद्धी देणे कीतीसे कठीण आहे?" हा प्रश्न खरेच विचार करण्यासारखा आहे. कदाचित तो काहींना सदबुद्धी आणि काहींना दुर्बुद्धी देऊन मग त्यांच्यात होणार्‍या भांडणांची मजा बघत असावा. आणि मग परिस्थिती हाताबाहेर गेली की "परित्राणाय साधूनां" वगैरे म्हणत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी अवतार घेत असावा. :) - धनाजीराव वाकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

" ज्याने रामाला या जगात आणले

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/15/2011 - 15:45 नवीन
" ज्याने रामाला या जगात आणले त्यानेच रावणालाही या जगात आणले " हे जाणले म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

वाकडे साहेब

रणजित चितळे
Mon, 06/13/2011 - 16:41 नवीन
आपला लेख वाचायला घेतला मग समजले की आधी आपट्यांचा वाचावा लागेल. तो वाचला. त्यांचा लेख आवडला. आता आपला वाचायला घेतला आहे. वेळ लागेल, कारण आपण एवढा अभ्यास पुर्ण प्रतिसाद दिला आहे तो हळू हळू वाचून साग्रसंगित जेवणासारखा लाभ घ्यावा म्हणतो. उगाच मुगाच्या डाळीची खिचडी खाल्यागत भर भर वाचून मजा नाही येणार. तो पर्यंत - म्हणतातना थोर महात्म्यांना तेवढेच महान शिष्यगण पण लाभले पाहीजेत. द्रोणाचार्यांना कोणालाही अर्जून बनवता आले नसते. व द्रोणाचार्य नसते तर कदाचित अर्जून झाला नसता. हल्ली सर्वच श्रोते वक्ते सावधान आहेत काय करावे त्यासी. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह्विर्यम् करवावहे तेजस्विना वधितम् अस्तु मा विद् विशावाहे ॐ शांति शांति शांति.
  • Log in or register to post comments

सायन्स

तिमा
Mon, 06/13/2011 - 18:37 नवीन
आपल्या शास्त्रानुसार आपण जेव्हा नऊ महिने आईच्या पोटात असतो तेव्हा आपण "रजस्वलेच्या विटाळात" असतो. आपल्या आजुबाजूला कातडी, आतडी आणि पू, दुर्गंधीची खाणी असते. पण जन्म झाल्यानंतर यातल्या कशाची जाणिव आपल्याला राहते? की हा बाबा, तिसर्‍या महिन्यात मला हात आले, चौथ्या महिन्यात मला पाय आले. सातव्या महिन्यात एक आतडी माझ्या नाकाजवळ आली होती तेव्हा मी गुदमरलो होतो... अध्यात्माचे मला काही कळत नाही. पण वरील परिच्छेदात जे वर्णन आहे ते सायन्स चा विद्यार्थी म्हणून पटले नाही. बाळ गर्भाशय नांवाच्या स्वतंत्र पिशवीत असते. त्यामुळे त्याच्या नाकातोंडाशी आईची आतडी, पू, कातडी हे कसे पोचू शकेल ते उमगले नाही. तज्ञ वैद्यकीय शाखेच्या सभासदांनी आणखी खुलासा करावा.
  • Log in or register to post comments

बरोबर !!!

धन्या
Tue, 06/14/2011 - 09:37 नवीन
पण वरील परिच्छेदात जे वर्णन आहे ते सायन्स चा विद्यार्थी म्हणून पटले नाही. विज्ञान शाखेचा विद्यार्थी म्हणून ते मलाही पटत नाही. पण मी परिच्छेदाची सुरुवात "आपल्या शास्त्रानुसार" अशी केली आहे. गर्भावस्थेत किती हाल होतात याची वर्णने आपल्या ग्रंथात जागोजागी केलेली आहेत. हा परिच्छेद एका प्रसिद्ध ग्रंथामधील ओव्यांवर आधारीत आहे. आणि मी तो संदर्भग्रंथ म्हणून वापरलाही आहे. पण शेवटी ज्ञानदेव म्हणतात तसं, मंथूनी नवनीता, तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ पुराणांमध्ये, वेदांमध्ये आणि ग्रंथांमध्ये खुप काही लिहिलेले आहे. काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. - धनाजीराव वाकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

धनाजीरावाना नम्र विनन्ती

मूकवाचक
Mon, 06/13/2011 - 20:05 नवीन
योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे । सोऽहंसिद्धीचे लळे। पाळिसी तूं ॥ ४ ॥ आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं । हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥ ५ ॥ प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं । आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥ सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी । समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥ ७ ॥ यात समाजसेवा, मानवता, जगाला प्रेमभाव अर्पावा वगैरे फारसे नसले तरीही यावर सविस्तर लिहाल तर उपयुक्त ठरेल. साक्षात ज्ञानदेवच हा सगळा विषय व्यर्थ, निरर्थक आणि रद्दी मानत असावेत असे दिसत नाही. योगसुख, सोऽहंसिद्धी, आधारशक्ती, प्रत्यक्ज्योती, मनपवनाची खेळणी, सतरावियेचे स्तन्य वगैरेचा अर्थही अवश्य उलगडून सान्गावा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

नुसत्या धादांत शब्दाने काय अर्थ बोध होतो हे ही सांगावे

ईश आपटे
Mon, 06/13/2011 - 21:58 नवीन
योगसुख, सोऽहंसिद्धी, आधारशक्ती, प्रत्यक्ज्योती, मनपवनाची खेळणी, सतरावियेचे स्तन्य वगैरेचा अर्थही अवश्य उलगडून सान्गावा. धन्यवाद. धादांतवादामध्ये असले काही बसत नसते. आम्ही फक्त जगाला प्रेम देतो. (व्हॅलेंटाईन डे ला लोक दुसर काही तरी देत असावेत ) दुसर धादांत असत्य बोलतो असे म्हणण्याची प्रथा आहे. धादांतवाद हा नवीन प्रकारचा पुणेरी वाद आहे काय ?? नुसत्या धादांत ;) शब्दाने काय अर्थ बोध होतो हे ही सांगावे.................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

धन्यवाद...

धन्या
Tue, 06/14/2011 - 09:55 नवीन
श्री आत्मशून्य आणि ईतर सन्माननिय वाचक ही चर्चा अतिशय मुद्देसुद लेखन करुन पुढे नेत आहेत. आणि तुम्ही मात्र हा लेख तुमच्याच लेखाला प्रतिसाद असुनही अतिशय उथळ प्रतिसाद देत आहात. संतश्रेष्ठ तुकारामांच्या सहस्त्र अभंगातील केवळ एक अभंग निवडुन तो ही संदर्भ सोडुन, व साने गुरुजींचे चरित्र जे आता मला अत्यंत हिंसक वाटु लागले आहे, ते घेऊन धर्मावर चर्चा होऊ शकत नाही. असला धर्म दाभोळकर, अवचट, साने गुरुजी,इ. ना लखलाभ असो. धादांतवादामध्ये असले काही बसत नसते. आम्ही फक्त जगाला प्रेम देतो. (व्हॅलेंटाईन डे ला लोक दुसर काही तरी देत असावेत ) आत्मा- परमात्मा, ईहलोक - परलोक, आत्मिक अनुभूती वगैरे शब्द वापरणार्‍यांनी अशी उथळ विधाने करणे म्हणजे... धादांतवाद हा शब्द मीही पहिल्यांदा वाचला. हा शब्द जुना असेल, नसेल. श्री घासकडवींना त्यातून "पुराणातील वांगी पुराणात ठेऊन आयुष्य चांगल्या रितीने जगावं" असं सांगणारा विचार अपेक्षित असावा. असो. आपले विचार मुद्देसुदरित्या मांडलेत तर अधिक आवडेल. बाकी हरिची ईच्छा :) - धनाजीराव वाकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

स्वतः संदर्भशून्य कोणते ही

ईश आपटे
Tue, 06/14/2011 - 10:38 नवीन
स्वतः संदर्भशून्य कोणते ही उतारे देऊन (साने गुरुजींचे चरित्र, कविता, ) व अभंग देऊन चर्चा भरकटवत आहात . वरती मूकनायक ह्यांनी ज्ञानेश्वरीतील ओव्या दिल्या आहेत आपल्या साठी "धनाजीरावाना नम्र विनन्ती " ह्या प्रतिसादात , स्पष्टीकरण करण्याकरीता, त्याचे स्पष्टीकरण करुन " खरा तो एकची धर्म " वाचकांना समजावुन सांगितला तर बर होईल. धादांतवाद हा शब्द मीही पहिल्यांदा वाचला. हा शब्द जुना असेल, नसेल. श्री घासकडवींना त्यातून पुराणातील वांगी पुराणात ठेऊन आयुष्य चांगल्या रितीने जगावं" असं सांगणारा विचार अपेक्षित असावा धादांतवाद म्हणजे हे असे कोणत्या मराठी शब्द कोषात दिले आहे , हे ही जरा कळू द्या. आणि आत्मशून्य नी जे प्रश्न उपस्थित केले , सामाजिक व आत्मिक ध्येयासंबंधी त्या ही बाबत आपण मौन आहात.(नाहीतर चक्क शंकराचार्य श्टाईल च्यायलेंज.जाऊ दया. मी हरलो हे असल काही तरी उत्तर देत आहात) ह्यावरुन आपला मुख्य हेतु, मूळ लेखावर चर्चा करणे नसुन मार्क्सवादी व समाजवादी विचार उगीचच मध्ये घुसडणे हा आहे हे स्पष्ट आहे. त्या साठी आपण नवीन धागा काढून चर्चा केलीत तर अधिक चांगले झाले असते. मूळ लेखाचा हेतु मी लेखात स्पष्ट केला आहे, तो आपण व ह्या धाग्यावर प्रतिक्रिया देणार्‍यांनी ही कृपया पुन्हा एकदा वाचावा http://misalpav.com/node/18228 ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

काय करायचं...

धन्या
Tue, 06/14/2011 - 10:54 नवीन
अहो मी सॉफ्टवेअर ईंजिनीयर आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, मला मार्क्सवाद आणि समाजवाद या शब्दांच्या व्याख्यासुद्धा माहिती नाहीत.
धादांतवाद म्हणजे हे असे कोणत्या मराठी शब्द कोषात दिले आहे , हे ही जरा कळू द्या.
सतिशराव, तुम्ही माझ्या ज्या ओळी वर दिल्या आहेत त्यात मी स्पष्ट लिहिलं आहे की, धादांतवाद हा शब्द मीही पहिल्यांदा वाचला. हा शब्द जुना असेल, नसेल. श्री घासकडवींना त्यातून पुराणातील वांगी पुराणात ठेऊन आयुष्य चांगल्या रितीने जगावं" असं सांगणारा विचार अपेक्षित असावा. हा शब्द "डिक्शनरी वर्ड" असेल, नसेल. नसला तर तो श्री. घासकडवींनी तयार केला असावा. ह्रकत नाही ना. भाषांमधले शब्द हे फार पूर्वी कुणीतरी बनवलेलेच असतील. बाकी चालू दया. :) - धनाजीराव वाकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

धादांतवाद

राजेश घासकडवी
Wed, 06/15/2011 - 04:23 नवीन
धादांतवाद हा शब्द मी सर्वसाधारणपणे मराठीत ज्याला आपण 'कॉमनसेन्स' म्हणतो त्या अर्थाने वापरलेला पाहिला आहे. चक्षुर्वैसत्यम गोष्टींचा विचार करणे व ज्या तपासून पहाता येत नाहीत, केवळ कविकल्पनाच असण्याची शक्यता आहे अशा गोष्टी केवळ मनोरंजनासाठीच वापराव्यात असा दृष्टीकोन त्यातून अपेक्षित आहे. 'हम को मालूम है जन्नत की हकीकत लेकिन दिल को बेहलाने गालिब ये खयाल अच्छा है' (शब्दांची चूभूद्याघ्या) या शेरात गालिब जे सांगतो त्याला मी धादांतवाद म्हणतो. धनाजीराव यांनीदेखील 'स्वर्ग किंवा नरक, परलोक, पूर्वायुष्य वगैरे कल्पना तपासून बघता येत नाहीत, तर मग कशाला उगाच त्याबद्दल डोकेफोड करायची? त्यापेक्षा सर्वच थोर लोकांनी जे आचरण सांगितलं आहे ते लक्षात ठेवावं' असा मुद्दा मांडला आहे. म्हणून मी त्याला धादांतवाद म्हटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

उत्तर द्या असा आग्रह नाही...

मूकवाचक
Tue, 06/14/2011 - 21:07 नवीन
एखाद्या तबलजीनी फ्युजनची लाट कशी हानिकारक आहे यावर तळमळीने लेख लिहावा.... त्यावर लखनौ घराण्याचे चार कायदे, बनारसची उठान, पन्जाबचे दोनचार त्रिपल्ली चक्रदार असा ऐवज पुरवून मग उस्ताद झाकिर हुसेन हे सर्वसामान्य, निरागस, प्रेमळ, कुटुम्बवत्सल माणसाच्या दृष्टीने बघता एक अभिनेते आहेत. 'साज' मधला त्यान्चा अभिनय पाहून त्यान्चे मूल्यमापन करा. बाकी तबला, ताल, लयकारी वगैरे अगम्य आणि निरूपयोगी गोष्टी कशाशी खातात ते आम्हाला माहित नाही/ त्याचा कुणाला उपयोग नाही/ तबला ही अगम्य बाजू वगळूनही झाकिर हे एक विनम्र इसम आहेत. त्यान्च्याकडून विनम्रपणा, वक्तशीरपणा आणि प्रसन्न हास्य एवढेच शिकण्यासारखे आहे. मला सन्गीतातले ओ की ठो काही कळत नसूनही झाकिर हे काय रसायन आहे ते नेमके समजले आहे. नव्हे, आनिन्दोजी, स्वपनजी, शफात अहमद वगैरे सगळेच तबलजी विनम्र, वक्तशीर, रोज आन्घोळ करणारे, दर आठवड्याला नखे कापणारे आणि नेहेमी प्रसन्न असतात एवढेच काय ते महत्वाचे आहे. बाकी फ्युजन, कनफ्युजन ने काहीही बिघडत नाही. उलट रागदारी, लयकारीच्या चर्चेत प्रत्येक तबलजीने आठ दिवसात एकदा तरी नखे कापावी, रोज आन्घोळ करावी हा मूळ विषय बाजूला पडतो असा अफलातून धादान्तवादी(!) प्रतिसाद यावा तसे या धाग्यावरची चर्चा वाचून वाटले. असो. (धनाजीराव, स्वतन्त्र लेख असे पाहिले तर तुम्ही सुरेख लिहीले आहे. पु, ले. शु.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

हा हा हा... मस्तं प्रतिसाद.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/15/2011 - 15:50 नवीन
हा हा हा... मस्तं प्रतिसाद. मस्तं दॄष्टांत दिला आहे. :) (वारकरी कीर्तनात उदाहरणाने तत्व पटवणे याला दृष्टांत म्हणतात)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

छान

स्मिता.
Mon, 06/13/2011 - 20:24 नवीन
धनाजीराव, प्रतिसाद जरा जास्तच दीर्घ असला तरी आवडला. एरव्ही एवढा मोठा लेख मी वाचलाच नसता, पण आज बाय चान्स वाचला आणि जवळ-जवळ सगळे विचार पटले. खरं तर माझेही विचार काहिसे याच दिशेने जाणारे आहेत.
  • Log in or register to post comments

पिंक टाकतो !!

अर्धवटराव
Tue, 06/14/2011 - 22:32 नवीन
ईष आपट्यांचा मूळ लेख वाचला, आणि त्यावरची हि प्रतिक्रिया सुद्धा. पटलेले, न पटलेले मुद्दे अनेक आहेत, पण एका मुद्द्यची मला नेहमी गंमत वाटते... ज्ञानदेवांनी देवगिरीचे साम्राज्य का वाचवले नाहि? रामदेवरायाला अल्लाउद्दीनच्या आक्रमणाची पुर्वकल्पना का दिली नाहि? समर्थांनी शिवाजीला औरंगजेबाची कैद कशि काय होउ दिली? त्यांच्या शिष्यांनी, इतर आध्यात्मीक गुरुंनी औरंगजेबाला परस्पर का संपवला नाहि? पु.लंचा खास प्रश्न... पंढरीच्या विठुरायाला पंढरपूरचा प्लेग का बरा करता आला नाहि... इ. इ. सिंपल उत्तर... या सगळ्या गुरुंनी हि राज्यरक्षण्याची कामे का करावीत? रामदेवरायाला जी माहिती त्याच्या गुप्तचर विभागाकडुन बर्‍याच अगोदर समजायला हवी ति ज्ञानदेवांनी ऐनवेळी का द्यावी? राज्यव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, न्यायव्यवस्था, आरोग्यनियमन, व्यापार-उद्योगधंदे... इ हजारो व्यवस्था मनुष्याने शेकडो वर्षांच्या मेहनतीने, शिक्षणाने, चुका करुन-त्यासुधारुन, कल्पकता वापरुन तयार केल्या. त्यांचा उद्देश जीवन सुखी-सुरक्षीत करणे आणि दु:ख टाळणे हा आहे. मग या व्यापाची जबाबदारी संतांनी आपल्या खांद्यावर का घ्यावी? त्यातल्या वाईट प्रसंगात अमिताभ बच्चन (रजनीकांथ म्हणा हव तर) स्टाईलने एंट्री घेऊन प्रोब्लेम सोल्व्ह करायचा आणि समाजाला नवीन प्रोब्लेम तयार करायला मोकळं करायचं, अशी संतांकडुन अपेक्षा का ठेवावी? त्यांनी कुठल्या प्रसंगी कोणाला - कुठल्या स्वरुपात - किती मदत करावी वा करु नये, याचा निर्णय त्यांनी स्वतः का घेउ नये ? समजा ज्ञानदेवांनी रामदेवरायाला वेळीच सुचना दिली असती... मग पुढली अपेक्षा, युद्धात योगसामर्थ्याने विजय मिळवुन द्यावा, मग पुढली अपेक्षा- पुन्हा असं आक्रमण होउ नये याची व्यवस्था करावी, मग पुढील अपेक्षा- राज्यात कधी दुष्काळ पडु नये, मग काहि रोगराई येउ नये, मग दूध ऊतु जाउ नये, कुत्रे चाउ नये, चप्पलेचा अंगठा तुटु नये, प्रसुती वेदना होउ नये.... आपल्या दु:खाचे ओझे कुणी दुसर्‍याने किती उचलावे याची काहिच लिमीट नाहि. आणि जर ती त्याने नाहि उचलली तर तो भोंदू... हा शुद्ध करंटेपणा नाहि काय? तमीळ भाषेत एक म्हण आहे कि भिंतीवर पाल धावतेय, ति तुम्ही आपल्या धोतरात टाकली- आणि वर ओरडता कि ति तुम्हाला त्रास देतेय... मनुष्याचे ९९% प्रोब्लेम्स स्वकृत असतात ( आता कर्मसिद्धांताच्या बोजड थेअरीत पडतो म्हटलं तर वाचताना झोप यायची ) मग त्या प्रोब्लेम्स्ची जबाबदारी संतांच्या माथी का मारावी ? बरं, वर आपली कंडीशन अशी कि संतांनी माझ्या समस्या सोडवाव्या पण मी कसं वागावं हे शिकवत बसु नये. दुसरा मुद्दा, संतांच्या चमत्कारी शक्तींचा... कुठलीही विद्या, शक्ती हि अभ्यासाने मिळते. त्याकरता आवशयक ते प्रयत्न करावेच लागतात. कुणी ज्ञानदेव आपल्या परिने प्रयत्न करुन त्या सिद्धी प्राप्त करतो. आता त्या त्याने कशा कुठे वापराव्या हे त्याने ठरवायचे ना... कि मी सांगेल तश्या त्या शक्ती वापरल्या तर त्या खर्‍या, नाहि तर ते थोतांड ?? राहिली गोष्ट स्वर्ग-नरकाच्या पुराव्यांची, पुनर्जन्माच्या सत्यासत्यतेची... समजा अशे पुरावे कुणी दिले... तरी काय फरक पडणार आहे? अभ्यास करुन पास होता येतं, नाहि केला तर फेल होउन वर्ष वाया जातं हे ढळढळीत डोळ्यसमोर दिसतानासुद्धा शेकडो विद्यार्थी फेल होतात ( फेल होण्याचं हेच एक कारण आहे असं म्हणणं नाहि.. भावनाओको समझो... ). रोज व्यायाम करावा, तेलकट तुपकट अति खाउ नये वगैरे गोष्टी माहित असुनही रोज बी.पी आणि हार्ट पेशंट्स्ची संख्या वाढतेय. आय पाहुन खर्च करावा, काहि शिल्लक असु द्यावी हे कळुन सुद्धा दिवळखोरी होते, आपल्याला कुणी वाईट बोललं तर राग येतो, अहंकार दुखावला तर संबंध खराब होतात हे कळत असुनसुद्धा आपण दुसर्‍याचं मन दुखवायला मागे पुढे पाहात नाहि... सांगायचा मुद्दा असा, कि सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ, अगदी डोळ्या समोर दिसणार्‍या "पुराव्यांना" आपण खिसगिणतीत धरत नाहि, तर मग उगाच इतर गोष्टींचे पुरावे घेऊन काय दिवे लावणार? ज्याला जाणुन घ्यायची उत्सुकता असेल तो समुद्राच्या तळातुनही पुरावे शोधेल, ज्याला नाहि गरज तो अगदी समोरासमोर असलेल्या गोष्टींकडे देखील दुर्लक्ष्य करेल... आयला, तोंडातलं पान चघळुन चघळुन चोथा झाला राव... पिंक टाकणे थांबवावे लागणार. -अर्धवटराव
  • Log in or register to post comments

अत्यंत समंजस उत्तर

ईश आपटे
Tue, 06/14/2011 - 23:12 नवीन
सहमत .................. ह्या बाबत बायबल मध्ये का दुसरीकडे कुठे एक किस्सा दिलेला आहे. स्वर्गातुन जॉन का कुणी एक देवदुत खरोखर येउन जिब्राईलला म्हणतो, मी आता लोकांना जाउन सांगतो, मी स्वर्गातुन आलो आहे, व स्वर्ग खरोखर अस्तित्वात आहे. त्याला जिब्राईल म्हणतो " काही उपयोग होणार नाही लोक म्हणतील कुणी वेडा आला आहे व थापा मारत आहे " रामकृष्ण परमहंसांचे ही असेच विवेकानंदाना सांगितलेले सुंदर वाक्य आहे" विश्वास हा नेहमीच अंध असतो डोळस विश्वास असु शकत नाही "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

सहमत आहे अर्धवटराव. अक्षरशः

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/15/2011 - 15:53 नवीन
सहमत आहे अर्धवटराव. अक्षरशः सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+१

मूकवाचक
Wed, 06/15/2011 - 16:21 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

कसें?

Nile
Wed, 06/15/2011 - 16:09 नवीन
सांगायचा मुद्दा असा, कि सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ, अगदी डोळ्या समोर दिसणार्‍या "पुराव्यांना" आपण खिसगिणतीत धरत नाहि, तर मग उगाच इतर गोष्टींचे पुरावे घेऊन काय दिवे लावणार?
असंबंध मुद्दा. खिजगणतीत न धरण्याचा संबंध कुठे येतो? तुम्ही दिलेल्या पुराव्यांना प्रश्न केला तर काय हा मुद्दा आहे. पुराव्याने साबित झालेल्या गोष्टीं न पटणे वेगळे आणि त्या अनुसरणे वेगळे. अभ्यास केला नाही तर नापास होण्याची शक्यता खुप आहे याबद्दल वाद नाही, पण एखाद्याला अभ्यासाचा कंटाळा असने म्हणजे अभ्यास करणे आणि पास नापास होणे याचा परस्पर स्ंबंध नाही असा होत नाही.
ज्याला नाहि गरज तो अगदी समोरासमोर असलेल्या गोष्टींकडे देखील दुर्लक्ष्य करेल...
हे एकवेळ ठीक, जाणून बूजून दुर्लक्ष करता दुर्लक्षिताच्या अस्तित्वाबद्दलचा प्रश्न दुर्लक्षिणार्‍याच्या मनात नसतो. पण जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती आहे असे धरून आयुष्य जगणे म्हणजे भास, हॅल्युसीनेशन वगैरे. अशा अनेक असंबंध पण सहजी खोडता न येणार्‍या वाक्यांचाच "ही ईज द यु.." मध्ये उपहास केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा