✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१८५७ अ हेरीटेज वॉक

व
विजुभाऊ यांनी
Tue, 06/14/2011 - 21:33  ·  लेख
लेख
भारताच्या नव्या जन्माची ही कथा. खरेतर या कथेला सुरुवात होते ११ मार्च १६८९ पासून मराठी साम्राज्याचा समूळ नायनाट करायचा निर्धार करून औरंगझेब महाराष्ट्रात उतरला खरा.पण त्याला ते तितकेसे जमले नाही ते त्याच्या अंगलटच आले. ११ मार्च ल औरंगझेबाने छ. संभाजी महराजाना हालहाल करून ठार मारले. छ. संभाजी महाराजांच्या मुलाला शाहू महाराजाना कैदेत ठेवले. चिडलेल्या मराठ्यांनी मग औरंगझेबाला स्थिर बसूच दिले नाही त्याला हर प्रकारे त्रास देणे सुरू केले. सन १६९७ सालात छ. राजाराम महाराजानी तह करण्याचा प्रयत्न केला पण तो औरंगझेबाने धुडकावून लावला. इस १७०७ मध्ये औरंगझेब मरण पावला त्या नंतर त्याच्या वंशजांच्यात मुघल राजवटीच्या वारसांमध्ये राजा होण्याची चुरस सुरु झाली. औरंगझेबाने भारताचा बराचसा मोठा भूभाग एकछत्री करभाराखाली आणला होता. आज ज्याला आपण अफगाणीस्तान , पाकिस्तान , बंगलादेश आणि भारत म्हणून ओळखतो या सर्व भूभागावर औरंगझेबाचे साम्राज्य पसरले होते. औरंगझेबाने पसरवलेले हे एवढे मोठे साम्राज्य कोण पेलणार हा एक प्रश्नच होता.त्याच्या मुलांच्यात ना त्याच्या एवढी बुद्धीमत्ता होती ना कुवत. साम्राज्य स्वतःच्याच ओझ्याखाली चिरडून जाऊ लागले. मराठ्यानी छ. शाहु महाराजाना स्वतन्त्र केले आणि मराठे आणी दिल्लीच्या गादीची मराठा सत्तेची थेट वैर यात्रा अल्पकाळ तरी थांबली. वयाच्या ८० व्या वर्षी सतत ४८ वर्षे एकछत्री सत्ता उपभोगून औरंगझेब गेल्यानन्तर मुघलसाम्राज्याचा मात्र झपाट्याने अस्त होऊ लागला. दिल्लीच्या सिंहासनावर बादशहा अक्षरशः ये जा करू लागले. कोणीतरी यावे गादीवर बसावे आणि कपटाने दुसर्‍याने त्याचा काटा काढत स्वतःला राजा म्हणून घोषीत करावे हा नित्य परीपाठ झाला. मुहम्मद रंगीला असा ज्याचा उल्लेख होतो तो मुहम्मद शाह सतत कोणा ना कोणा कडुन हरतच होता . १७३९ मधे नादीर शहा दुर्राणी ने तर कळसच गाठला . मुहम्मद रंगील्याने दिल्ली दरावाज्याच्या किल्ल्या स्वतः होऊन नादीरशहा च्या ताब्यात दिल्या नादीरशा दिल्लीत घुसला त्याने दिल्ली अक्षरशः कफल्लक केली . पाहुणा म्हणून राहिला आणि जाताना दिल्लीतील ३३ हजार लोकांचे शिरकाण करत मयूर सिंहासन ,कोहीनुर हीरा ,दर्या ई नूर हीरा अशी बरीच मोठी लुट घेवुन गेला . मुहम्मद रंगील्या बद्दल लोकांच्या मनात इतका तिरस्कार होता की त्याच्या नर्तकी असलेल्या बायकोने बांधलेल्या मशीदीला लोक "रंडी की मस्जीद" म्हणून सम्बोधत. मुघलांचे अफगाणीस्थान पासून बंगाल पर्यन्त पसरलेले राज्य आकसत जाऊन अवघ्या लाल किल्ल्याच्या भिंतीत सिमीत झाले. १६९७ साली काबूल पासून कलकत्त्या पर्यन्तच्या २४ मुलुखातून एकुण ३८,६२४,६८० इतक्या पौंडाचा महसूल गोळा करणारे साम्राज्य अक्षरशः भिकेला लागले. १७६५ सालच्या बक्सरच्या लढाईनंतर तर तात्कालीन बादशहा शाह आलम ने इस्ट इंडीया कंपनी बंगाल बिहार आणि ओरीसा बरेच काही गमावले. लॉर्ड क्लाईव्हने मुघल साम्राज्याची नाणी देखील इस्ट इंडीया कंपनी ठरवू लागली. हिंदुस्थानात कंपनी सरकारचे बस्तान व्यवास्थीत बसवले. छ शाहु महाराजानी पेशव्याना पंतप्रधान केले त्यांच्या निधना नंतर छ रामराजानी नाममात्र राजा रहाणे पसंत केले आणि राज्यकारभार पुर्णपणे पेशव्यांच्या स्वाधीन केला. १७६१ च्या पानिपतच्या युद्धा नंतर मराठेशाही काही काळ दुर्बळ झाली मात्र माधवराव पेशव्यानी मराठा साम्राज्याला पुन्हा वैभवाचे दिवस दाखवले. पण त्यंच्या निधना नंतर मराठा साम्राज्याने एक द्रष्टा गमावला. पेशवे शूर होते पण अंतर्गत कलहांमुळे पेशवाई देखील दुबळी होत गेली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात तर राज्य कारभार इतरांच्या हाती गेला. त्या नंतर गादीवर आलेला पेशवा दुसरा बाजीराव हा तर पळपुटा बाजीराव म्हणूनच इतिहासात ओळखला जातो. अटकेपर्यन्त झेंडे फडकवणार्‍या पेशव्याना पुण्याहून पळून जायची वेळ आली. अहमदनगरच्या तहानंतर तर पेशव्यांचे सत्ता जवळजवळ संपुष्टात आली. १८१८ साली खडकी आणिकोरेगावच्या लढाईनंतर तर पेशव्यांची सत्ता संपुष्टात आली. इस्ट इंडीया कंपनीने पेशव्यांची रवानगी कानपूरजवळील बिठूर नावाच्या एका खेड्यात केली. पेशवाई लयास नेणार्‍या इश्टुर फाकड्याने म्हणजे माउन्ट स्टुअर्ट एल्स्फिन्टनने सातार्‍याच्या गादीवर छ.प्रतापसिंहांना बसवले. दत्तक वारसाच्या प्रश्नावरून १८४९ सातार्‍याची गादी खालसा देखील केली. एका व्यापारी कंपनीची ,इस्ट इंडीया कंपनीची भारताच्या विशाल भूभागावर सत्ता प्रस्थापित झाली ( क्रमशः )
  • १८५७ अ हेरीटेज वॉक (२)
  • १८५७ अ हेरीटेज वॉक (३)
  • १८५७ अ हेरीटेज वॉक (४)
  • १८५७ अ हेरीटेज वॉक (५)

Book traversal links for १८५७ अ हेरीटेज वॉक

  • १८५७ अ हेरीटेज वॉक (२) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
11661 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

माहित असलेला पण रोचक इतिहास.

मस्त कलंदर
Tue, 06/14/2011 - 22:00 नवीन
माहिती तीच असली तरी पुढे अधिक आणि सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहित नसलेले तपशील येतील अशी आशा आहे. लेखमालेस शुभेच्छा. जाता जाता: पहिले दोन परिच्छेद वगळता नंतरची जवळजवळ प्रत्येक्/एक आड एक वाक्य नवीन ओळीवर सुरू होतेय. हवेतर बुलेट्स द्या किंवा नीट परिच्छेदांत मांडणी केल्यास अधिक चांगले वाटेल.
  • Log in or register to post comments

लवकर येऊ द्या!

पैसा
Wed, 06/15/2011 - 09:50 नवीन
पुढे एक छान लेखमालिका येणार असा अंदाज आहे. थोडं मकीने लिहिल्यासारखे परिच्छेद तयार करायचं बघा, आणि हो, लवकर द्या!
  • Log in or register to post comments

८० व्या वर्षी सतत ४८ वर्षे

मृत्युन्जय
Wed, 06/15/2011 - 10:02 नवीन
८० व्या वर्षी सतत ४८ वर्षे एकछत्री सत्ता उपभोगून औरंगझेब गेल्यानन्तर मला वाटते औरंगजेब ९६ व्या वर्षी मेला. बाकी लेखमाला रोचक होणार अस दिसतय. पुलेशु
  • Log in or register to post comments

९०

मिहिर
Wed, 06/15/2011 - 12:39 नवीन
मला वाटले औरंगजेब ९० व्या वर्षी मेला. त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसावेळीच १६६६ साली शिवाजी महाराज आग्र्याला गेलेले ना!! म्हणून मला वाटते ९० किंवा ९१ असावे. माझ्या माहितीप्रमाणे शाहूला मराठ्यांनी सोडवले नाही. खुद्द शाह आलमनेच मराठ्यांमध्ये दुफळी माजावी म्हणून सोडल्याचे स्मरतेय. अवांतरःआग्र्याला हा शब्द नीट कसा लिहायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

>> इस्टूड फाकडा म्हणजे

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/15/2011 - 11:12 नवीन
>> इस्टूड फाकडा म्हणजे एल्फिन्स्टन नव्हे. त्याला तेव्हा एतद्देशीयात अलपिस्टन म्हणायचे. हा इस्टुड फाकडा म्हणजे इंग्रजी फौजेतला तथाकथित शूर कॅप्टन. त्याला शिंद्या-पेशव्यांच्या सैन्याने ब्रिटीश सैन्य मुंबईकडून पुण्याकडे येत असताना मार्गातच पारव्याप्रमाणे टिपले. पुढे ब्रिटीशांनी त्यांच्या सैन्याचे मनोबळ उंचावण्यासाठी त्या शूर वगैरे म्हणून हिरो बनवले. त्याचे थडगे जिथे आहे तिथे त्याच्या मृत्यूदिनी उरूस वगैरेही भरतो. प्रसनदा आहेत का इथे. ते अधिक प्रकाश टाकू शकतील. कदाचित अलपिस्टनच्या स्टुअर्ट या नावामुळे हा घोळ झालेला असावा.
  • Log in or register to post comments

+१

नगरीनिरंजन
Wed, 06/15/2011 - 11:55 नवीन
हेच लिहायला आलो होतो. त्याने वडगावच्या लढाईत महादजीच्या सैन्याकडून सपाटून मार खाल्ला होता. "पुणे टाईम्स" मध्ये त्याच्या समाधीची माहिती छापताना "इंडियन" फौजेतल्या आणी मराठा सैन्याशी लढताना धारातीर्थी पडलेल्या शूर लेफ्टनंटची समाधी आहे असे छापले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

टाईम्सच तो शेवटी.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/15/2011 - 12:06 नवीन
टाईम्सच तो शेवटी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

तथाकथित?

सुनील
Wed, 06/15/2011 - 12:24 नवीन
इस्टुड फाकडा म्हणजे इंग्रजी फौजेतला तथाकथित शूर कॅप्टन ह्या "तथाकथित" शूराला मराठेदेखिल "फाकडा" म्हणून का संबोधीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

त्याचे नाव बहुधा जेम्स

मृत्युन्जय
Wed, 06/15/2011 - 13:34 नवीन
त्याचे नाव बहुधा जेम्स स्टुअर्ट. वडगावच्या लढाईच्या आधी त्याला महादजींच्या "शार्प शूटर्स" नी कंठस्नान घातले. जेम्स स्टुअर्ट मूळचा स्कॉटीश होता पण अनेक लढायांमध्ये त्याने इंग्रजांच्या बाजूने मर्दुमकी गाजवली. वडगाव च्या आधी झालेल्या छोट्या मोठ्या लढायांमध्ये त्याच्यामुळेच इंग्रजांना विजय मिळाला. वडगावला मात्र शिंदे, होळकर आणि पेशव्यांची फौज एकत्र झाली त्यामुळे इंग्रजांना नाक मुठीत धरुन शरण यावे लागले. इष्टुर हा बहुधा स्टुअर्टचा अपभ्रंष असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

विजूभाऊ

रामदास
Wed, 06/15/2011 - 12:27 नवीन
हेरीटेज वॉक आवडला. थोड्या फार चुका असल्याने पाठ्य पुस्तकात समावेश करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

मेलो...

श्रावण मोडक
Sun, 06/19/2011 - 11:53 नवीन
मेलो... एका दगडात किती पक्षी? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

आपला लेख

रणजित चितळे
Wed, 06/15/2011 - 13:12 नवीन
आपला लेख वाचत आहे. हा भाग आवडला. पुढच्या भागाची वाट पहात आहे. नविन पिढीला हा इतिहास सुद्धा 'नवा' असेल. इतिहास जेव्हढा जागाराहिल तेवढा चांगला. “Those who don’t learn from the history are condemned to repeat it”
  • Log in or register to post comments

मराठा साम्राज्याचा वैभवाचा काळ..

योगप्रभू
Wed, 06/15/2011 - 13:57 नवीन
मराठा साम्राज्याचा वैभवाचा काळ केवळ नानासाहेब पेशव्यांच्या राजवटीत होता. थोरल्या बाजीराव पेशव्यांचा काळ पराक्रमाचा आणि ताकदीचा प्रभाव दाखवून देण्याचा होता. नानासाहेब पेशवा गादीवर येईपर्यंत मराठ्यांचा दरारा हिंदुस्थानात प्रस्थापित झाला होता. राज्यात स्थिरता असेल तर भरभराट होते.अशी स्थिरता फक्त नानासाहेबाच्या काळात मिळाली. पुणे ही राजधानी शोभायला लागली. पानिपतच्या लढाईतील पराभवाने, तसेच सदाशिवरावभाऊ व विश्वासरावाच्या मृत्यूमुळे खचलेल्या नानासाहेबांचे पुण्यात निधन झाले. माधवराव पेशव्यांनी विस्कळित मराठेशाहीत कठोर शिस्त आणून कारभार सावरला, पण मरताना त्यांना दौलतीला झालेल्या कर्जाची काळजी लागून राहिली होती. या कर्जाचे हवाले कारभार्‍यांनी घेऊन राज्य कर्जमुक्त केले तेव्हाच माधवरावाने समाधानाने डोळे मिटले. त्यामुळे माधवराव पेशव्याने पुन्हा वैभवाचे दिवस दाखवले, हे थोडेसे अतिप्रशस्तीचे वाटते. असो. लिहित राहा. आवडीने वाचतोय. :)
  • Log in or register to post comments

"नानासाहेब पेशवा गादीवर

शैलेन्द्र
Sun, 06/19/2011 - 10:31 नवीन
"नानासाहेब पेशवा गादीवर येईपर्यंत मराठ्यांचा दरारा हिंदुस्थानात प्रस्थापित झाला होता. राज्यात स्थिरता असेल तर भरभराट होते.अशी स्थिरता फक्त नानासाहेबाच्या काळात मिळाली. पुणे ही राजधानी शोभायला लागली." नानासाहेबांना एक ऐतीहासीक संधी मिळाली होती ती त्यांनी त्यांच्या हाताने दवडली, बाजीरावाने जी मराठी दौलत मागे ठेवली होती ती पुर्ण खिळखीळी करुन नानासाहेबांनी माधवरावाकडे दिली. नानासाहेबांच्या अल्पदॄष्टीने मराठ्यांचे आरमार बुडाले. उत्तरेच्या राजकारणात मराठ्यांबद्दल विश्वासहर्ता निर्माण करण्याऐवजी नानासाहेबांनी खंडणीखोरीचे राजकारण केले. पाणिपतची लढाइ ही मला तरी ओढवुन घेतलेली आपत्ती वाटते. मराठाशाहीत जातीय तेढ पडली, कर्मठपणा वाढला ते नानासाहेबांच्याच काळात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

त्यामुळे माधवराव पेशव्याने

विजुभाऊ
Wed, 06/15/2011 - 15:32 नवीन
त्यामुळे माधवराव पेशव्याने पुन्हा वैभवाचे दिवस दाखवले, हे थोडेसे अतिप्रशस्तीचे वाटते. माधवराव पेशवे हे कर्तबगार शूर आणि द्रष्टे राज्यकर्ते होते. त्यानी प्रसंगी निझामासारख्या कट्टर शत्रुशी तह करायचा विचार केला होता. पण तो डाव अंगाशी येतो आहे हे समजताच निझामाला राक्षसभुवनाच्या लढाईत पळता भूई थोडी केली होती.माधवरावानी मराठा साम्राज्याला शिस्त लावली. हैदर अलीला नेस्त नाबुत करण्यात अपयश आले या घटनेचा त्यांच्या मनावर बराच परीणाम झाला ग्रान्ट डफ माधवराव पेशव्यांच्या बाबतीत लिहीतो की पानिपताच्या रणाने मराठेशाहीची जितकी हानी झाली असेल त्याही पेक्षा कितीतरी अधीक हनी या तरूण तडफदार राजाच्या अल्प वयीन मृत्यूने झाली आहे. अवांतर : मी जी डॉक्यूमेन्ट्स रेफर करत होतो त्यात नामसाधर्म्यामुळे इश्टूर फाकड्या संदर्भात लिहीताना चूक झाली हे कबूल करतो. मला म्हणायचा होता तो स्टूअर्ट म्हणजे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा माउन्ट्स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुलात एक स्कॉटीश व्यापारी होता. त्या नंतर इस्ट इंडीया कंपनीत तो मुम्बैचा गव्हर्नर झाला. त्याचा पुतण्या लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन देखील मुम्बईचा गव्हर्नर झाला.( त्याच्याच नावे मुम्बईतले इल्फिन्स्टन रोड स्टेशन आहे) भारतातील नेटीवाना शिकवण्यासाठी केलेल्या ब्रीटीश शिक्षण पद्धतीचा जो पाया मानला जातो त्या एल्फिन्स्टन कोड चा जनक हा माउन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टन कॉलेजला याचेच नाव दिले गेलेले आहे. अती अवांतरः मुम्बैच्या मलबार हील वर बांधला गेलेला पहीला बंगला या माउन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टनचा होता
  • Log in or register to post comments

छान लिहिता आहात .. लिहित

गणेशा
Wed, 06/15/2011 - 20:04 नवीन
छान लिहिता आहात .. लिहित रहा.. वाचत आहे
  • Log in or register to post comments

मस्त

सविता००१
Sun, 06/19/2011 - 09:47 नवीन
लेखमाला आहे. आजच वाचायला सुरुवात केली आता दोन्ही भाग एकदमच वाचते
  • Log in or register to post comments

लेख छान. पण इतके शूर लोकं

शिल्पा ब
Sun, 06/19/2011 - 09:58 नवीन
लेख छान. पण इतके शूर लोकं असूनही मराठ्यांची दैन्यावस्था का झाली असावी? मरगळलेली मनस्थिती का झाली असावी? आमचे पूर्वज यंव अन त्यांव हेच सांगत बसायची वेळ का आली?
  • Log in or register to post comments

इंग्रजांनी १८५७ च्या लढ्या

विजुभाऊ
Fri, 10/23/2020 - 12:07 नवीन
इंग्रजांनी १८५७ च्या लढ्या नंतर एक मोठे नामी काम केले ते म्हणजे सामान्य भारतीयाला शस्त्र बाळगण्यास बंदी केली. तोपर्यंत प्रत्येक भारतीय हाती काही ना काही शस्त्र घेऊनच असायचा. पण १८५७ च्या बंडाची इंग्रजांनी इतकी धास्ती घेत्ली की त्यांनी सर्वांनाच निशस्त्र केले. अगदी संस्थानीक देखील यातून सुटले नाहीत ( त्यांना तर डोक्यावर राजमुकूट बाळगण्यासही बंदी होती) यातून जे झाले ते म्हणजे शौर्य दाखवण्याची संधी सामान्य माणसासाठी लोप पावली. मग साहजीकच गतकाळाची आरती चालू झाली.
  • Log in or register to post comments

छान लेखमालिका

हेमंतकुमार
Fri, 05/13/2022 - 07:59 नवीन
छान लेखमालिका
  • Log in or register to post comments

धन्यवाद. मस्त आहे. वाचतो

रणजित चितळे
Fri, 05/13/2022 - 10:45 नवीन
विस्मृतीत गेली होती म्हणा मला दिसली नव्हती. अत्यंत सुंदर सुरवात. मी एक एक धागा वाचत आहे
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/14/2022 - 22:36 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा