धिक्कार ते अधिकार : माझा प्रवास व्हाया...२
धिक्कार ते अधिकार : १ http://www.misalpav.com/node/17920
शेवटी DUला Law मधे अॅठडमिशन घेऊन ऑगस्ट २००५ मध्ये मी दिल्लीत डेरेदाखल झालो...
********************************************************
दिल्लीत तर आलो. आता UPSC च्या मागे लागायचं होतं. सुरुवातीच्या दिवसात हाल होते सगळे.. कधी इथे रहा, तर कधी तिथे रहा. हे खा नि ते खा. शेवटी दिल्लीनी हिसका दाखवला....
एक दिवस ताप आला. असेल काहीतरी म्हणून दुर्लक्ष केलं. ताप सकाळी कमी व्हायचा आणि संध्याकाळी, रात्री सणकून वाढायचा. गेलो डॉक्टरकडे. त्यानी व्हायरलची औषधं दिली. काही फायदा झाला नाही. नंतर आणखी एका डॉक्टरकडून मलेरीया साठीही औषधं घेतली. अंहं, उपयोग शुन्य.. बेकार हालत होती. डोळ्यांसमोर अंधारी यायची, वर्गात पहील्या बेंचावर बसुनही अटेंडन्स द्यायला पुर्ण जोर लावायला लागायचा. शेवटी एका मैत्रिणीने सांगितलं की," बाबा रे तुझी लक्षणं काही ठीक नाहीत. मला वाटतं की तुला टायफॉईड झालाय." मी म्हटलं, तुला कसं माहीत? तिने सांगितलं की तिला तो दिर्घ टायफॉईड का काय म्हणतात तो झाला होता. मी तिचं मानलं आणि घरी आलो. टायफॉईडच निघाला. पंधरा दिवसांनी परत दिल्ली..
कॉलेज जवळ पडावं, म्हणून Christian Colony नावाच्या एका जागी राहत होतो. ही कॉलनी अनाधिकृत रित्या, अक्षरशः थडग्यांवर, जुन्या स्मशान भुमीत बांधली आहे. नुस्त्या पैशांवर डोळा ठेवून बांधलेल्या, सिंगल विटांच्या पाच-सहा मजली इमारती. लाथ मारली तर थरथरायच्या भिंती ! रुम्स म्हणजे बाथरुम एवढ्या, दोन्ही हात पसरले तर दोन्ही भिंतींना लागायचे. तिथुन मी DU Students' Union च्या स्टडीहॉल मध्ये अभ्यासाला जात असे...
फर्स्ट टर्म जवळ आली नी कळलं की, लोचा होतोय. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स चे sections आणि भारतीय संविधानाचे Articles ह्यांची सरमिसळ व्हायला लागली. ह्यात ते नी त्यात हे... म्हटलं बोंबलणार आपण. शेवटी विचार केला की, Law किंवा Civil Services दोन पैकी एकच करावं. घरच्यांशी बोललो. आई-पप्पांचं म्हणणं होतं की परीणामांचा विचार करुन निर्णय घे आणि एकदा घेतला की पार पाड. दादाचंही असंच म्हणणं पडलं. मी विचार केला, च्यायला जाऊ दे ना ! वाईटात वाईट काय होईल? बोंबलू पुन्हा. देखते है ! शेवटी सिव्हिल्स मागे लागायचं नक्की केलं.
It was Nov-Dec 2005. भिडलो अभ्यासाच्या मागे ! प्रिलीम्स मे २००६ मधे. घास घास घासली. नुस्ते पेपर्सच दोन-अडीच तास वाचायचो. मुर्खासारखा काहीपण नोट्स काढायचो. "द हिंदू" मधे न्युज यायच्या, स्पोर्ट्स पेज वर, "Lightening Prince wins, Lucky Star wins" वगैरे. मी ते पण लिहून काढायचो. एकदा विचार केला, की जरा डिटेल मधे वाचू काय आहे ते? चक्क डर्बी-रेसच्या बातम्या होत्या त्या ! ;-) मी डोक्याला हात लावून घेतला.
असा हातघाईवर येऊन अभ्यास करत होतो. प्रिलीम्स जवळ आली. आम्ही अजुन जोरात भिडलो. नुस्ता फडशा पाडायचो. मेंदुत काही जात होतं की नाही, कोण जाणे. २००६ च्या रिझल्ट्स मध्ये "आदेश तितरमारे" नावाच्या कॉलेजच्या सिनिअर व मित्राने IAS मध्ये झेंडा फडकवला. खुप आनंद झाला.
नंतर आमची प्रिलीम्स.. दिली. आशा होती की क्लीयर होणार. (ती असतेच पहिल्यांदा). घरी आलो, नी दुसर्याच दिवशी कळलं , की कुठल्याश्या सेंटर वर पेपर्स वेळेवर न पोहोचल्याने माझ्या ऑप्शनलची पुन:परीक्षा होणार म्हणुन. दमलोच मी.. शेवटी जुन २००६ मध्ये पुन्हा प्रिलीम्स देवून दिल्लीत परतलो...
दिल्लीला परत आल्यावर प्रिलीम्स पार करुन Mains ला पोहोचू, ह्या अपेक्षेने क्लास जॉईन केला. क्लासला पोहोचलो आणि....
समोर "ती" दिसली. (आहे, आहे. आमची "लव स्ष्टोरी" पण आहे. आणि आता अंतही झालाय ;-).... लग्नात ! :-))
आवडली तर पहील्या नजरेत, पण ओळख कशी काढणार? नशिबानं ती दुसर्यांशी बोलत असतांना कळलं, की ती पण मराठी आहे. मग काय, चान्सची वाट बघायला लागलो. शेवटी एका टेस्टमुळे चान्स गावला. पेपरनंतर आमचं पहीलं बोलणं झालं ते "Prime Minister is the most powerful executive of Union Govt of India. Comment." ह्या प्रश्नावर! मी प्रिलीम्स साठी अभ्यास केलेला होता, आणि तिने नुकतीच सुरुवात केली होती, म्हणुन मलाही भाव खाता आला. (तेव्हा मी तिला खुप स्कॉलर वाटलो होतो, असं ती सांगते.) हळुहळु मैत्री वाढत गेली. शेवटी एक दिवस मी हिम्मत करुन तिला "प्रपोज" केलं. तिने शांतपणे मला "नाही" म्हटलं. हे सगळं झाल्यावर ३ दिवसांनी माझा प्रिलीम्सचा रिझल्ट आला. मला UPSC नी अभ्यास करण्यासाठी आणखी एका वर्षाची मुदत दिली होती. सरळ शब्दात, मी प्रिलीम्स क्लियर झालो नव्हतो...:-(
दरम्यानच्या काळात आम्ही दोघांनीही एकमेकांना समजून घेतल्यामुळे आमची मैत्री टिकून होती. शेवटी मम प्रयत्नासी फल आले. शिव्या देत का होईना, पण माझ्या प्रपोजलच्या दोन-अडीच महीन्यांनी तिने माझे प्रेम मान्य केले.:D तिच्या प्रेमाची, भरवशाची आणि आधाराची मला पुढच्या प्रवासात प्रचंड मदत झाली.
पुन्हा एकदा "ये रे माझ्या मागल्या" करत माझा अभ्यास सुरु होता. फक्त आता थोडा बेसीक अभ्यास झाला असल्याने, आणि हाताशी वेळ असल्याने अभ्यासाच्या रुंदीसोबतच त्याच्या खोलीचाही विचार करायला लागलो होतो. काही दिवसांनी ही मुंबईला परत गेली. मी प्रिलीम्सच्या तयारीला लागलो. एवढ्यात पुढच्या नोटीफिकेशनमधे UPSC ने आमच्या डोक्यावर बॉम्ब फोडला. त्यावर्षीपासुन म्हणजे २००७च्या प्रिलीम्स पासुन Negative Marking सुरु करण्यात येणार होतं. :-( आम्ही "आलीया भोगासी" (खरंतर भोकाशी आली होती) करत प्रिलीम्स दिली.
प्रिलीम्सचा माझा भुतकाळ आणि निगेटीव्ह मार्किंगचं भुत ह्यामुळे कॉन्फिडन्स नव्हताच, त्यामुळे प्रिलीम्स ते तिचा निकाल ह्या काळात अभ्यास काही बरोबर झाला नाही.(तरी ह्या वेळेचा पुरेपुर उपयोग करण्यासाठी दादा वारंवार बजावत होता.) मग प्रिलीम्सचा रिझल्ट आला आणि मी पास झालो. मी हवेत! पण जमिनीवर आल्यावर टर्कीश व्हायला लागली. समोर फक्त अडीच महीने, त्याच्यात २ ऑप्शनल्स, जनरल स्टडीज चा ढीग उपसायचा. (एस्से चं टेन्शन वेगळचं)....
मग मेन्स दादाकडे अभ्यास करुन आसामहून द्यायची ठरवलं. दादा आणि वहीनींच्या मार्गदर्शनाचा खुप उपयोग झाला. पण सुरुवातीचे अडीच महीने वाया घालवल्याची किंमत मोजावी लागली. ह्याच दिवसात मला आसाममधील "दुर्गा-पुजेचं" महात्म्य कळलं..
मी मेन्स गुवाहाटीतून देणार होतो, व त्यासाठी दादाकडे आसामला होतो. दादा-वहीनींना काही दिवसांनी घरी जावं लागल्याने मी तिकडे एकटाच होतो. परीक्षेला दोनेक आठवडे बाकी असतांना मला ताप आला. मी सरकारी डॉक्टरकडे जाउन औषध घेतलं, पण आराम नाही... म्हणून दोन-तीन दिवसांनी कुठल्या प्रायव्हेट डॉक्टरकडे जायचं म्हणून बाहेर पडलो. कुठलाच दवाखाना उघडा दिसेना.. दादाचा ड्रायव्हर म्हणाला की दुर्गापुजेत डॉक्टरपण सुट्टी घेतात. :P एका दवाखान्यापुढे आल्यावर तो मला म्हणाला," सर, इथे एक आयुर्वेदीक डॉक्टर आहे, पण तो अॅलोपॅथिक औषधं पण देतो." म्हटलं मारणार हा... शेवटी दादाला फोन केला, व एका सिनिअर डॉक्टरकडे गेलो.. तब्येत आणि टेंशनपाई हालत खराब होती. जी. एस. च्या पेपरच्या वेळी अंगातून घाम नुस्ता टपटपत होता.. त्यात पेपरचा आणि आमच्या न झालेल्या अभ्यासाचा फार मोठा वाटा होता म्हणा ;-)
मेन्सचा रिझल्ट आल्यावर कळले, की ३४-३५ मार्कांनी इन्टरव्ह्यू कॉल हुकला. (तेव्हा ते फक्त ३०-३५ मार्क्स वाटले, पण नंतर पुढे त्यांचं महत्त्व कळालं...
क्रमशः
Book traversal links for धिक्कार ते अधिकार : माझा प्रवास व्हाया...२
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचतोय
मस्त ......वाचत आहे.
वाचते आहे. आयुष्य वेगाने
बरिच वेगवान आहे की कथा!
+१
मस्त रे मस्त वाटतंय एकदम
वाचतो आहे........
५० फक्त
सविता यांच्याशी सहमत..
सही रे मित्रा!
मस्त रे .... पुभालटा
सही...
सही...
चिगो भाय,
भाय..
वाचतोय मित्रा !!