मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुमचं आमचं सेम नसतं - भाग १२

५० फक्त · · जनातलं, मनातलं
तुमचं आमचं सेम नसतं - भाग १२ हर्षद.-- लग्न, सत्यनारायण आणि तुळजापुरचं देवदेव सगळं व्यवस्थित पार पडलं. आज सकाळी लाडोबा तिच्या कॉलेजच्या शिबिराला गेली आणि दुपारी आई पंढरपुरला. मी ऑफिसात बसलोय. शनिवारचं फारसं काम नाहीये, पण पाच वाजेपर्यंत तरी बसुन रहायला पाहिजे. आज लेबर पेमेंटचा दिवस आहे त्यामुळं. सगळे पैसे चार वेळा मोजुन झालेत. दोनदा चुकीचे आणि दोनदा बरोबर.८ वेळा घरी फोन करुन झालाय.मैत्री ते प्रेम ते लग्न हा प्रवास फार थोडक्यात आटोपला आमचा. मैत्री तर कधी नव्हतीच असं वाटतंय, प्रेम झालंय असं वाटेपर्यंत आम्ही लग्न केलं. आता हा मैत्रि आणि प्रेमाचा गाळलेला पोर्शन कसा पुर्ण करणार आहोत काय माहिती. संध्याकाळी फिरायला जाणार आहोत, स्कुटी टाकलीय आज रिपेअर करायला, मला एकट्याला पिकप घेत नाही दोघांना काय होईल काय माहित. चला, चार झालेत आता सगळॆ मुकादम यायला सुरु होतील. आठ सत्तर, लेबर पेमेंट माझ्याकडे आल्यापासुनचं सर्वात मोठं पेमेंट आहे आज. तरी बरं हिशोबाप्रमाणे नोटा वेगळ्या काढुन ठेवल्या आहेत तरी शेवटी आहेतच घोळ. बरं झालं मी लगेच जॉईन झालो आता याच्या परसेंट मधुन काही देणी उडवता येतील, का ऑफिसने गिफ्ट दिलंय म्हणुन काहीतरी घेउन जावं घरी का कुठंतरी फिरुन यावं, घराच्या कर्जाला तर भरता येणार नाहीच.उगी भावनेच्या भरात डोळ्यावर यायला नको. आणि माधवीला कुठं जायचं नाही हे समजवता समजवता जाम त्रास झालाय आणि आता एकदम जायचं म्हणलं तर तिला पण नसत्या शंका यायच्या. या अशा वेळी पैसे नाहीत म्हणुन कुठं जाता येत नाही हे वाईटच पण काही उपाय नाही. बाजारात फक्त नोटाच चालतात, भावना नाही. साहेबाचा बंगला आहे पण तो कुठं टिटवाळा का शहापुर आणि तिथं असल्या उन्हाळ्यात जाउन काय करणार, परत त्यानं हो म्हण्लं पाहिजे ना, लग्नाहुन यायला गाडी दिली हेच पुढची ४ वर्षे ऐकवणार आहे. सगळी कामं संपवुन घरी फोन केला, माधवीला तयार व्हायला सांगितलं, ऑफिस बंद करुन स्कुटी घेतली गॅरेज मधुन आणि घरी आलो.दोन तीन वेळा बेल वाजवल्यावर माधवीनं दार उघडलं, माझं आवरुन होईपर्यंत चहा केला होता तो घेउन निघालो. साडी नेसल्यानं ति एका बाजुला बसणार होती, मला असं गाडी चालवायची सवय नव्हती, एकदा पडल्यानंतर आई कधी गाडीवर बसलेली नव्हती आणि लाडोबा ड्रेस घालुन बसायची. बिल्डिंगच्या पार्किंगबाहेर आलो आणि जमलं एकदाचं. हे जमलं म्हणजे संसार करायला पण जमेलच. पैसे खिशातच होते, घरी ठेवले तर कशाचे म्हणुन सांगणार माधवीला हा प्रश्न होता.हुतात्मा बागेत गेलो,फिरलो बोलणं आजच्या पेक्षा कालच्या बद्दलच जास्त. तसे दोघांकडे बरेच कॉमन मुद्दे होते , बाबांचं जाणं, आईनं ठाम उभं राहणं वगैरे. आपल्या आपल्या पालकांबद्दलचा हा अभिमान कधीतरी मुद्द्यावरुन गुद्द्यावर येणार आहे याची जाणिव होत होती. पण बहुधा यालाच संसार म्हणतात. बागेतुन बाहेर येउन चव्हाणकडं कचोरी, भेळ खाउन घरी आलो. दुपारी स्वयंपाक जास्त झालाय तो संपवणं भाग होतं, कारण घरातलं अन्न वाया घालवण्यावरुन मार खाल्लेला असणं हा एक कॉमन मुद्दा आत्ताच चर्चिला होता. घरी आलो, आता पैसे काढुन ठेवणं भागच होतं, लाडोबाच्या खोलीतल्या कपाटात पैसे ठेवतानाच माधवीनं विचारलं ’अन्याच्या खोलीत काय करतोस?’ ’घरातली सगळी महत्वाची कागदपत्रं, पैसे वगैरे याच कपाटात असतं’ तिला सांगितलं. तिनं जेवायला घेतलं होतं, आता जास्त जेउ नये असं वाटत होतं पण ’आमच्याकडं’ या सदराखाली जगातल्या बहुतेक चांगल्या गोष्टींची यादी ऐकवल्यानंतर न जेवणं म्हणजे माघारी होती, जी मला पहिल्याच दिवशी नको होती. करपलेल्या मोहरीची आमटी आणि भात खाउन ’मी जरा जाउन येतो’ असं सांगुन बाहेर पडलो. स्कुटी काढली आणि घरापासुनच्या जरा लांबच्या मेडिकलमध्ये जाउन आलो. एवढ्या रात्रीपण जाम गर्दी असते मेडिकल दुकानात. घरी येताना ५-६ गजरे घेउन आलो. घरी आलो, दरवाजा उघडुन माधवी आत पळाली आणि अत्तराचा घमघमाट जाणवला. आत जाउन पाहिलं तर माधवी स्प्रेच्या फुटलेल्या बाटलीचे काचा गोळा करत होती, ’अरे मी खुर्चीवर उभं राहुन उडवत होते तर पडलीच खाली’ हे सांगताना तिचा चेहरा जाम लाडिक+त्रासिक झाला होता. तिचं काचा गोळा करुन होईपर्यंत कॉटवर बसुन होतो, सगळा कचरा टाकुन ती पुन्हा आत आली, आमच्या आयुष्याच्या खरी सुरुवात का ख-या आयुष्याची सुरुवात काही सुचत नव्हतं. कारण माधवी पुढं आलीच नव्ह्ती दारातच उभी होती खाली बघत. अक्षरक्ष: काही मिनिटं गेली अशीच, एकदम भानावर आल्यासारखं झालं मीच उठुन तिच्याकडं गेलो, तिचे हात हातात घेतले, दोघंही कॉटकडं आलो. बाजु बाजुला बसलो, एक शब्द नाही फक्त पंख्याचा आवाज होता. अजुन ही दोघात बरंच अंतर होतं यापेक्षा जवळ लग्नात बसलो होतो. तिचे हात सोडुन टेबलावरचा गज-याचा पुडा उघडुन तिच्यासमोर धरला, तिची काहीच हालचाल नाही,हे क्षण काय करावं हे कळु नये असेच असतात का काय करावं हे कळत नाही म्हणुन असे असतात. दोन गजरे काढुन तिच्या समोर धरले, तिनं घेतले आणि तसेच हातात ठेवुन बसली ’घाल ना’, कोरड्या घशातुन कसाबसा आवाज आल्या माझ्या. तिनं हात मागं घेउन केसात अडकवले. अगदी माधवीला स्वप्नात कल्पुन पण बरीच स्वप्नं पाहिली होती, पण आता ती खरी होत आहेत असं वाटतानाच खुप दुर आहेत असं वाटत होतं. तिचं गजरे घालुन झालं पुन्हा हात खाली घेउन बसली,हसली पण नाही माझ्याकडे बघुन. हळुच मागं सरकुन डोक्याखाली हात घेउन एका कुशीवर झोपलो. तिनं मागं पाहिल्यावर ये ना इकडं असा हातानंच इशारा केला. माधवी -- कशी असते ख-या संसाराची सुरुवात, अशीच की वेगळी, सुमतीचे बाकी सल्ले आठवत नव्हते ,नको म्हणु नकोस एवढंच आठवत होतं. मागं सरकले, पाय वर घेउन हळुच झोपले, त्यानं वाकुन गज-याचा पुडा घेतला आणि उरलेले गजरे तोडुन फुलं सगळ्या कॉटवर पसरली, काही माझ्यावर सुद्धा. मी चेह-यावरची फुलं बाजुला करायला लागले तर म्हणाला ’ थांब मी टाकलीत मीच काढतो’ पटकन एका बाजुला वळले, त्याचा हात माझ्या हातावर होता, बोटात बोटं गुंतली होती, कानात काहीतरी बोलला आणि... पहाटे जाग आली तेंव्हा जेवढं रात्रीचं आठवतंय तशीच झोपले होते, त्याच्या डाव्या हातावर माझा डावा हात ठेवुन त्यावर डोकं ठेवुन, मानेच्या खाली पाठीवर त्याचे श्वास अजुन जाणवत होते. माझा उजवा हात धरुन त्यानं मला घट्ट धरुन ठेवलेलं. म्हणजे सुमतिचा सल्ला डावलुन मी नको म्हणाले होते तिथंच तो थांबला होता. त्याच्याकडं पहावं म्हणुन वळायला गेले, लगेच त्याची पकड अजुन घट्ट झाली. अजुन थोडी हलले तर त्याला जाग येईल म्हणुन तशीच पडुन राह्यले, डोक्यावरच्या खिडकितुन गार वारं येत होतं. एवढा वेळ वाजली नाही पण आता थंडी वाजत होती, आपसुकच मागं सरकले, त्याला जाग आलीच, मान वर करुन त्यानं मला जागा करुन दिली आणि पुन्हा हात घट्ट पकडला. डाव्या हातानं मंगळसुत्राशी खेळत पडले होते. दहा मिनिटानी हॉलमधल्या घड्याळाचा अलार्म वाजला, पाच वाजले असावेत. हात सोडवुन उठत तो म्हणाला ’अलार्म बंद करु दे सरक’ थोडं कोरडंसच. उठुन खाली पडलेली साडी गोळा करत होते तेवढ्यात तो आला आणि दरवाज्यात थांबुनच माझ्याकडं बघत होता, रात्री नाही म्हणलं होतं पण आता त्याला नाही म्हणायची गरज वाटली नाही. बहुधा दुधवाला ४-५ वेळा बेल वाजवुन निघुन गेला, मी तशीच त्याच्या मिठित होते. उजाडलं पण होतं आता, त्याचा हात ढकलुन उठले पण त्यानं मागं ओढली, अजुन अर्धा तास तसंच बोलत होतो. बाहेर हॉल मध्ये फोन वाजल्यावर उठणं भागच होतं. मी त्याच्या अंगावरची चादर ओढुन घेतली तसं तो उठुन गेला बाहेर. मि पण उठुन आवरलं, केसाची पिन आणि टिकली सोडुन सगळं सापडलं. बाहेर गेले, हा फोनवर बोलत बसला होता, मी हातानंच कुणाचा आहे विचारलं ’बहिणाबाई आहेत तुझ्या, घे फोन’, असं म्हणुन फोन पुढं केला. मी फोन घेतला हा समोरच बसलेला, त्याला हातानंच आत जा म्हणलं तर गाल फुगवुन हुप्प केलं आणि नाही अशी मान हलवली. तिकडुन ताइ हॅलो हॅलो करत होती, आता मला दोन महिन्यापुर्वीचं तिचं चिडणं समजत होतं. मी पुन्हा त्याला ’ आत जा प्लिज’ असं खुणेनंच सांगितलं,त्यावर त्यानं २ बोटं ओठांवर ठेवली आणि मला एकदम हसु आलं, तो उठुन आत गेला. मी जरा थांबुन ’ हॅलो बोल ग तायडे’, अशी सुरुवात केली. तायडीचा पहिला प्रश्न ’ काय ग कीति बिस्किटात पटला सौदा?’ ’दोन’ मी पटकन बोलुन गेले, तेंव्हा हा मागं उभा राहुन हसत होता. --- * ---- * ----- * ----- तुमचं आमचं सेम नसतं - भाग -११ http://misalpav.com/node/17647 तुमचं आमचं सेम नसतं - भाग -१० http://misalpav.com/node/17575 तुमचं आमचं सेम नसतं - भाग -९ http://misalpav.com/node/17518 तुमचं आमचं सेम नसतं - भाग -८ http://misalpav.com/node/17421 तुमचं आमचं सेम नसतं - भाग -७ http://misalpav.com/node/17341 तुमचं आमचं सेम नसतं - भाग -६ http://misalpav.com/node/17104 तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ५ http://misalpav.com/node/17011 तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ४ http://misalpav.com/node/16771 तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ३ http://misalpav.com/node/16697 तुमचं आमचं सेम नसतं - भाग - २ http://misalpav.com/node/16340 तुमचं आमचं सेम नसतं - भाग - १ http://misalpav.com/node/16083

वाचने 19499 वाचनखूण प्रतिक्रिया 44

नि३ Tue, 04/19/2011 - 21:26
काय ग कीति बिस्किटात पटला सौदा?’ ’दोन’ मी पटकन बोलुन गेले ??????... बाकी लेख नेहमीप्रमाणे जबरदस्तच. ही मालीका बघताबघता संपली...

In reply to by प्रचेतस

नि३ Wed, 04/20/2011 - 04:13
आता आम्ही पडलो बॅचलर आम्हाला काय माहीती ही बिस्कीटे काय असतात ते?? आमच बिस्कीट म्हणजे पारले जि.. असो.. आता तुम्हाला माहीतच असेल तर तुम्हीच का नाही सांगुन टाकत.. एवढेच confidential असेल तर मालकांनी दमड्या खर्च करुन खरडवही/व्यनी ची व्यवस्था केली आहे.

गणेशा Tue, 04/19/2011 - 21:43
खुपच छान ... ओघवत्या शब्दातील सत्य दर्शविनारी... आपल्याच अवतीभोवती घडते आहे घटना अशी वाटणारी ही कादंबरी संपुच नये असे वाटत होते ... अतिशय आवडले लेखन तुमचे .. बाकी लिहिण्यास शब्दच नाहियेत ... फक्त पुस्तक काढा राव याचे .... पहिले पुस्तक विकत माझ्याकडुनच असेन नक्की ... पुढील लिखानास शुभेच्छा.. असेच लिहित रहा .. आतुरतेने लिखानाची वाट पहात आहे ...

प्रचेतस Tue, 04/19/2011 - 21:51
मस्त मस्त मस्त. एका सुरेख मालिका तितकीच सुरेखरित्या संपवलीस. एकदम संयतपणे. आता एका नविन मालिकेची वाट बघतोय हे सांगणे न लगे.

प्रास Tue, 04/19/2011 - 21:55
आजच्या पेक्षा कालच्या बद्दलच जास्त. तसे दोघांकडे बरेच कॉमन मुद्दे होते , बाबांचं जाणं, आईनं ठाम उभं राहणं वगैरे. आपल्या आपल्या पालकांबद्दलचा हा अभिमान कधीतरी मुद्द्यावरुन गुद्द्यावर येणार आहे याची जाणिव होत होती. पण बहुधा यालाच संसार म्हणतात.
हे मस्त! कसं एकदम वास्तवाची (आणि कदाचित पुढे येणार्‍या विस्तवाची ;-)) जाणीव दिल्यागत वाटतंय. बाकी एका छान वळणावर थांबलीय गाडी. उत्तम! आवडेश..... :-)

रामदास Wed, 04/20/2011 - 09:18
कोरड्या घशातून कसाबसा.. हा... हा.. परफॉर्मनन्स अँक्झायटी . घरातली सगळी महत्वाची कागदपत्रं, पैसे वगैरे याच कपाटात असतं या मुद्द्यावरुनही गुद्द्यावर येणार पालकांबद्दलचा हा अभिमान कधीतरी मुद्द्यावरुन गुद्द्यावर येणार एक दिवसाआड राडा व्हायला पुरेसे कारण . एकदा पडल्यानंतर आई कधी गाडीवर बसलेली नव्हती. मला पाडलंन.आता हिला घेऊन मिरवतोयस बरा.. केसाची पिन आणि टिकली सोडुन सगळं सापडलं. काळजाला भिडलेलं वाक्य. बाकी हे वाचल्यावर गंगा जमनाचा आख्खा सिन गाण्यासकट डोळ्यासमोर आला. बाला मोरा -बाली उमरीया -ठगवाने डाका डाला

प्यारे१ Wed, 04/20/2011 - 09:18
अप्रतिम बॉस.... टोप्या खाली पडलेल्या आहेत. सटल्टी अशीच असावी.... थांबावं कुठं हे समजल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. बाकी, आज मीठे में क्या है?

सविता००१ Wed, 04/20/2011 - 11:23
हर्षद्जी, मस्त लिहिता तुम्ही. असेच खूप खूप लिहित रहा. एकदम रापचिक मालिका

स्मिता. Wed, 04/20/2011 - 14:27
एका सुरेख कादंबरीसारखी मालिका छान संपली. आणखी येऊ द्या अशीच एखादी कथा. पु. ले. शु.

प्यारे१ Wed, 04/20/2011 - 17:15
पूर्वीच्या दूरदर्शनच्या १३ भागांच्या मालिका आठवल्या. नेटक्या, आटोपशीर, जिवंत आणि नैसर्गिक वाटणार्‍या. आमचा हर्षद तसा एम एच्च १३चा. पण हल्ली १२ चे बरेच गुण आलेत. त्यामुळे १२मध्येच सगळं व्यवस्थित बसवलं आहे.

धमाल मुलगा Wed, 04/20/2011 - 18:20
ब्येष्ट रे! एकदम फुलवत फुलवत नेलीएस गोष्ट. मस्त मजा आली वाचायला. फक्त....फक्त....नको त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या ना राव! आणि मग त्या दिवसांच्या घटना स्वप्नांसारख्या तरळायला लागल्या.... अरे...अरे...अरे... एक मिनिट हां, मोबाइल बोंबलतोय, "अं? काय काय? हो हो! लगेच..हो नक्की..ह्यॅ:! लगेच येणार की." असो, चला हर्षदराव, गोष्ट भारी लिहिलिये.. असेच सुखात रहा म्हणावं त्या दोघांना. आम्ही जातो जरा दळण घेऊन घरी पोचायचंय म्हणून आत्ताच फोन होता ना. ;)