Skip to main content

महालक्ष्मी च्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी

लेखक अजातशत्रु यांनी शुक्रवार, 15/04/2011 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
मानवमुक्तीचा लढा अधिक गतिमान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापुरातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात स्त्रीमुक्तीच्या लढय़ाचे पहिले पाऊल पडले. वस्तुत: याचे रनशिन्ग म.न,से. आमदार श्री.राम कदम यानी फुन्कले होते, पण इथेही भा.ज .पा. ने राजकरण करत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून देवीच्या पहिल्या गाभाऱ्यात प्रवेश केला कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी हि गेली अनेक वर्षे चालु आहे, अपवाद फक्त राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया मुळात मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी का? याचे समाधानकारक उत्तर तेथिल ब्राम्हण पुजारि का देउ शकत नाहित.... तथापि अलीकडच्या काळात हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि आज बुधवारी तर महिलांनी आंदोलन करीत सत्याग्रहाने एक नवे पाऊल पुढे टाकले.

वाचने 31435
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

देवाच्या मंदिरात प्रवेशाबाबत कोणताही भेदभाव करणं हे देवाला लाजिरवाणंच आहे. त्यात देवीच्या दर्शनाला स्त्रियांना मागे ठेवणं हे आणखीनच विचित्र. ही प्रथा मोडून पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत याचा आनंद आहे. अशा चांगल्या गोष्टी करण्यात जर राजकारण्यांमध्ये चढाओढ झाली तर उत्तमच. मग ते राजकारण न रहाता लोककारण होईल.

In reply to by राजेश घासकडवी

देवीच्या मंदीराच्या गाभार्‍यात स्त्रियांनाच प्रवेश बंद ही बाब मला मजेशीर वाटली. तिथे, गाभार्‍यासारख्या पवित्र ठिकाणी देवी तरी का चालते असा प्रश्न उभा रहातो. देवीची इतर मर्त्य स्त्रियांशी नकळत तुलना करण्याचं घोर पातक माझ्या हातून घडतं आहे याची जाणीव मनात ठेवावी लागते. एकदा देवत्व बहाल केलं की मग स्त्री आहे का पुरूष याचा विचार करावा का न करावा? म्हणजे पुरूषांच्या राज्यात, जिथे स्त्रियांसाठी ३३%, ५०% असं आरक्षण ठेवावं लागतं, बालकांच्या तुलनेत बालिकांच्या घटत्या प्रमाणाची चिंता करावी लागते, तिथे देवत्व बहाल केलेल्या "व्यक्ती"चं लिंग तपासावं का? देवत्वामुळे ही सवलत मिळाली तर मग भक्ताच्या बाबतीत हाच न्याय लावावा का? अर्थात पुन्हा एकदा देवाची मर्त्य माणसांशी तुलना करण्याचं पातक घडत आहे. जिथे गुन्हेगार असला तरीही पुरूष आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला प्रवेश आहे तिथे कितीही पापभीरू असली तरी स्त्री आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला प्रवेश मिळणं कितपत न्याय्य आहे? देवावर विश्वास ठेवणार्‍यांना, गाभार्‍याची पवित्रता मानणार्‍यांना याचा विचार करावासा वाटत नाही का? महागड्या, श्रीमंती रेस्तराँ, क्लब्जमधे, इंग्रजांच्या काळात "भारतीय आणि कुत्र्यांना प्रवेश नाही" अशा पाट्या दिसायच्या, आजच्या काळात ड्रेसकोड असतो याची आठवण झाल्याशिवाय रहावत नाही. निदान या ठिकाणी मंदीर, गाभारा अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे पावित्र्य, शुचिता असे बोजड शब्द वापरून "अध्यात्मिक" उच्चपणाचा बेगडी अभिमान नसतो. अर्थात हे असं काही बोललं तर आपण विचारवंत आणि हिंदूद्वेष्टे ठरण्याची भीती असते. पण सामान्यतः सगळीकडे असतो तशा सुजाण/अजाणांचं मिश्रण असणार्‍या, समाजात झुंडशाही, दडपशाही, बहुमत इत्यादींना 'घाबरून' आपण आपले विचार मांडायचेच नाहीत का? का "आपल्याला काय फरक पडतो" असा बुरखा पांघरायचा? का उगाच चारचौघं म्हणतात तसंच आपणही म्हणायचं?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदितीशी सहमत. देवीच्या देवळात बायकांनाच बंदी ही जाचक अट राहीलीच कशी इतकी वर्षे याचं आश्चर्य वाटतय.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

देवीच्या मंदीराच्या गाभार्‍यात स्त्रियांनाच प्रवेश बंद ही बाब मला मजेशीर वाटली.
+१. दुसरा असाच प्रकार म्हणजे मंदिरात बायकांच्या आणि पुरुषांच्या वेगळ्या रांगा / वेगळ्या बसायच्या जागा. (स्वामिनारायण मंदिरात हा प्रकार पाहिलेला आहे.) बरे, हे सेपरेशन इतके, की एकत्र आलेल्या कुटुंबातील स्त्रीने वेगळे बसायचे आणि पुरुषाने वेगळे बसायचे इतकेच नव्हे, तर लहान मुलाने आईबरोबर किंवा लहान मुलीने बापाबरोबर बसायचे नाही, बसल्यास त्याबद्दलही नम्र विनंती-कम-आक्षेपवजा सूचना दिली गेलेली अनुभवलेली आहे. (एकटा/टी पालक विरुद्धलिंगी अर्भकास घेऊन आल्यास काय करत असतील, तेच जाणोत.) बरे, 'याचे कारण काय' असे मंदिरास भेट देणार्‍या कोण्या अभारतवंशीयाने एकदा विचारले, तर तिला चक्क 'तुमच्या सुविधेकरिता' असे उत्तर दिले गेलेले ऐकलेले आहे. हा प्रकार काही कळलेला नाही.

In reply to by पंगा

दुसरा असाच प्रकार म्हणजे मंदिरात बायकांच्या आणि पुरुषांच्या वेगळ्या रांगा / वेगळ्या बसायच्या जागा.
या नियमाचा गाभार्‍यातील देवाशी संबंध नसतो तर ही सोय(!) रांग आणि गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांना होणारे किळसवाणे स्पर्श टाळण्यासाठी असतो :) त्यामुळे वेगळ्या रांगा योग्यच आहेत.

In reply to by विंजिनेर

एखादा लहान मुलगा आपल्या स्वतःच्या आईला किंवा एखादी लहान मुलगी आपल्या स्वतःच्या बापाला किळसवाणा स्पर्श करू शकते? तेही 'आपल्या संस्कृती'त? गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांना होणारे किळसवाणे स्पर्श टाकण्यासाठी वेगळ्या रांगांचे प्रयोजन अर्थातच समजू शकतो. मात्र देवळाच्या मुख्य खोलीत गाभारा वगळता जी सभागृहासारखी वापरता येण्याजोगी जागा असते, जिथे सणासुदीच्या दिवशी जमलेले दर्शनेच्छू बसू शकतात, क्वचित धार्मिक कार्यक्रम किंवा भजने किंवा तत्सम काही होऊ शकते, अशा ठिकाणी पुरुषांकरिता आणि स्त्रियांकरिता बसण्याकरिता वेगवेगळ्या जागा असता (हेही समजू शकलो नाही तरी एक वेळ दुर्लक्ष करू शकतो), तेथे एखादा लहान मुलगा (घटनासमयी वय वर्षे अंदाजे तीन ते चार) आपल्या आईबरोबर स्त्रियांच्या जागेत बसला असता त्याबद्दलही 'नम्र सूचना' मिळण्याचा स्वानुभव आहे. अर्थात, हा असा अनुभव सार्वत्रिक नाही हेही नमूद करतो. कदाचित हे विशिष्ट मंदिर ज्या समाजाचे किंवा पंथाचे आहे (स्वामिनारायण मंदिर) त्यातील रूढी याला कारणीभूत असू शकतील. आणि त्या समाजाच्या किंवा पंथाच्या रूढी काय असाव्यात हे मी ठरवू शकत नाही - त्या समाजाचा किंवा पंथाचा घटक असल्याखेरीज तो अधिकार मला आहे असे वाटत नाही. त्या मंदिरात गेलेच पाहिजे असे माझ्यावर कोणते बंधनही नाही, आणि माझी इच्छा नसल्यास तेथे जाणे मी टाळूही शकतो. (मंदिराशी संलग्न असलेल्या दुकानात चांगल्या प्रतीच्या मिठाया आणि फरसाण विकत मिळते, आणि निदान या कारणासाठी तरी अधूनमधून तेथे जावेसे वाटते.) मात्र, इतक्या टोकाचा भेदभाव (जेणेकरून एखादे बालक आपल्या विरुद्धलिंगी पालकाबरोबर विरुद्धलिंगी लोकांकरिता आयोजित केलेल्या जागेत बसू शकत नाही) का केला जात असावा, याबद्दल कुतूहल वाटते, आणि ते काही केल्या मरत नाही. दुसरी एक गोष्ट मला कळलेली नाही. वर उल्लेख केलेले मंदिर हे अमेरिकेत आहे. गर्दीतले स्त्रियांना होणारे घाणेरडे स्पर्श टाळण्यासाठी महिलांच्या वेगळ्या रांगांचे प्रयोजन जरी मान्य केले, तरी मग अमेरिकेत इतक्या वेगवेगळ्या धर्मांची वेगवेगळी धर्मस्थळे आहेत, तेथे अशा वेगळ्या रांगा करण्याची गरज भासताना का दिसत नाही? गर्दीत महिलांना किळसवाणे स्पर्श ही भारतीय उपखंडातून आलेल्या - आणि त्यातही विशेष करून हिंदू - पुरुषांची खासियत आहे काय? हेही काही केल्या मनाला पटत नाही.

In reply to by पंगा

इथल्या स्वामीनारायण मंदीरात अस नेहमीच बघीतलं आहे, एकदोनवेळेस तिथल्या लोकांकडून चारचौघांसमोर संस्कृती आणि धर्म यावर लेक्चर्सचा प्रसादही मिळाला आहे. मला हे मंदीर अतिशय आवडतं पण असे उपदेश ऐकायला नको वाटतं. गांधीनगरचं स्वामीनारायण मंदीर त्यामानानं बरच पुढारलेलं आहे. अजून एक मंदीर मी अलीकडेच पाहिलं, राधा-कृष्णाचं. मंदीरात प्रवेश केल्यावर २ वेगवेगळे हॉल..आत अगदी सगळं सेम टू सेम देवाच्या मूर्तीसुद्धा दोन्हीकडे वेगळ्या. मी इकडे बायकांच्या हॉलमधे कॄष्णाची मूर्ती कशी चालते असं विचारणार होते पण बरोबर असणार्‍या इतरांनी गप्प केलं !

In reply to by पुष्करिणी

आमच्या इथल्या स्वामिनारायण मंदिरातही स्त्री आणि पुरुषांना वेगळाल्या जागा आहेत. दोन दरवाजे वगैरे. आरती झाल्यावर सगळ्या महिला साधा नमस्कार करतात तर पुरुष मंडळी अनेकवेळा साष्टांग नमस्कार करतात. हे असावे की नसावे यापेक्षा सोय अशी होते की गुढग्याचे त्रास असलेल्या ज्येष्ठ महिला, गरोदर महिला इ. ना खुर्च्या पुरत नसल्या तर त्या खाली बसतात व थोड्यावेळाने पाय परसता येतात. पाठीचे त्रास असणार्‍यांसाठी वेगळी आसने आहेत. आजूबाजूला कोणी पुरुष असतील तर त्यांना संकोच वाटेल हे नक्की. मंदीरात हे आरक्षण असू नये. त्यासाठी वेगळ्याल्या जागा असल्या तरी एकत्र बसणार्‍या कुटुंबासाठीही सोय असावी. अर्थात मी काही मंदीरात नेहमी जात नाही. एवढ्यात तीनवेळा जायचा योग आला म्हणून हे पाहण्यात आले. देवळात येणारे लोक घाणेरडे स्पर्श करायला कश्याला लाजतील (जे तसलेच आहेत त्यांच्याबद्दल म्हणतीये मी). तिथल्या चपला चोरी करणारेही आहेत तसे पाकिटमारही आहेतच की!

मुख्य गाभार्‍यातील तेज महिलांना सहन न होऊन त्यांना ओटीपोटीचे त्रास होऊ शकतात असे टीव्हीवरील कुठल्यातरी चर्चेत सनातन प्रभातचा एक माणूस सांगत होता :) कदाचित राजघराण्यातील आणि सेलिब्रिटी बायका पावरबाज असाव्यात. बाकी विषय एन्कॅश करायची राजकारणी पक्षांची धडपड पाहून मौज वाटली.

जर काहीही कारण नसताना महालक्ष्मीच्या मंदीरात स्त्रीयांना प्रवेश मीळत नव्हता हे सत्य असेल तर या पेक्षा मोठा जोक फक्त मीपा वरतीच घडेल.

काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही. उगाच नको तिथे पुरोगामी पणाचं अवसान कशाला आणायचं?

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही.
खरं तर धर्मच मानवी समानतेच्या बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करत असतो. तो नको तिथे घातलेला हात बाजूला ढकलून देणं हेच चालू आहे. फुले, कर्वे, आंबेडकर यांनी ते केलं. आजच्या काळात पुढचं पाऊल न टाकता स्वस्थ राहिलो तर त्यांचे कष्ट वाया नाही का जाणार?
उगाच नको तिथे पुरोगामी पणाचं अवसान कशाला आणायचं?
निरर्थक प्रथा पाळून उगाच धार्मिकपणाचं अवसान आणण्यात तरी काय तथ्य आहे?

In reply to by राजेश घासकडवी

मुळात अनेक धार्मिक प्रथांमधेच तथ्य आहे का नाही याची शहानिशा करायची वेळ पुन्हा एकदा* आली आहे काय? * उदा: आद्य शंकराचार्यांनी ब्राह्मणांना शाकाहारी 'बनवलं', ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधलं तत्वज्ञान मराठीत, सामान्यांच्या भाषेत आणलं, इ.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रथाच का, मुळात धर्मामध्येच (कुठच्याही) काय तथ्य आहे? जगात इतकी दुःखं धर्मामुळे आलेली आहेत. मी तर म्हणतो धर्मांमधले सणवार, उत्सव वगैरे ठेवावे आणि बाकी सगळं सोडून द्यावं. कोणी स्वतःला हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम म्हणवू नये... आख्खं जग सुखी होईल.

In reply to by राजेश घासकडवी

सहमत. धर्म ही संकल्पना एक मूर्ख तर धार्मिक हे शतमूर्ख. ह्या प्रतिसादात असभ्य काहीही नाही, धार्मिक संपादकांनी लगेच संधीचा फायदा ऊठवू नये!

In reply to by राजेश घासकडवी

कोणी स्वतःला हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम म्हणवू नये... आख्खं जग सुखी होईल.
:)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बुच मारल्या गेले आहे. बाकी
मुळात मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी का? याचे समाधानकारक उत्तर तेथिल ब्राम्हण पुजारि का देउ शकत नाहित....
देवीच्या पुजार्‍यांमध्ये फक्त ब्राम्हणच आहेत? नक्कीच नाहीत :) मग ह्या वरच्या भिकारचोट वाक्याची सदर लेखनात काय गरज होती? विषय काय आहे आणि नक्की चर्चा कशावर घडवुन आणायची इच्छा आहे ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

जाणीवपूर्वक केलेला 'ब्राह्मण पुजारी' हा उल्लेख खटकला. चर्चा करताना मिपाकर मित्र-मैत्रिणींचे प्रतिसाद भरकटत गेल्याचे जाणवले. दूरचित्रवाणीवरील चर्चा मीही लक्षपूर्वक ऐकली. त्यात सहभागी झालेल्या पुजार्‍यांचे म्हणणे कुणीही नीटपणे ऐकून घेत नव्हते. स्त्रिया अपवित्र किंवा पुरुषांपेक्षा दुय्यम दर्जाच्या म्हणून त्यांना गाभार्‍यात प्रवेश देणारच नाही, अशी हट्टी भूमिका पुजार्‍यांनी घेतलेली नव्हती. ते एवढेच म्हणत होते, की अशी प्रथा अत्यंत जुनी आहे आणि आम्ही तिचे केवळ पालन करत आहोत. प्रथा बदलायची असेल तर देवस्थान समितीचे विश्वस्त, शंकराचार्यांसारखे संत-महंत, पुजार्‍यांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींनी एकाच व्यासपीठावर यावे आणि सामूहिक निर्णय घ्यावा, आम्ही त्याचे पालन करु. दुसरे म्हणजे याच विषयावरील याचिका न्यायालयात गेली दहा वर्षे प्रलंबित आहे. तिचा न्यायानुसार होणारा निर्णय आम्ही मान्य करु किंवा देवस्थान समिती ज्यांच्या अधिकारात येते त्या सरकारने तसा स्पष्ट आदेश द्यावा म्हणजे त्याची अंमलबजावणी करता येईल. पुजारी हे अंबाबाईचे सेवक (श्रीपूजक) असल्याने ते स्वतःच्या मनाने निर्णय घेऊ शकत नाहीत. आता सरकार आदेश काढत नाही, न्यायालय निर्णय देत नाही, धर्मपंडित पुढे येत नाहीत तर मग चेंडू पुजार्‍यांच्या हद्दीत ढकलून सगळे खापर ब्राह्मणांवर फोडण्याचे काय कारण आहे? हे म्हणजे आपल्याला सार्वजनिक बागेत जाहीर कार्यक्रम करायचा आहे तर महापालिका आणि पोलिस खात्याची रीतसर परवानगी घेण्याऐवजी बागेच्या दारावरील रक्षकाला दमदाट्या करुन त्याच्या नावाने बोंब मारण्यासारखे आहे. बरं घडलेल्या घटनांकडे आपण कसे बघितले पाहिजे. महिलांना गाभार्‍यात प्रवेश देण्याबद्दल जनतेच्या भावना तीव्र आहेत, हे लक्षात आल्यावर देवस्थान समिती, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची तातडीने बैठक होऊन प्रवेश खुला झाला. 'ब्राह्मण पुजार्‍यांनी' लगेच नव्या नियमाप्रमाणे अंमलबजावणी केली. याचे अभिनंदन आपण करणार आहोत, की नाही? मी या ब्राह्मण पुजार्‍यांचे अभिनंदन एका वेगळ्या अर्थाने करतो. मंदिर प्रवेशाबाबत झालेल्या आंदोलनांचा इतिहास तपासला तर असे दिसून येते, की त्यावेळी ब्राह्मण समाजातही जी धार्मिक कट्टरता होती, तिचा आता मागमूसही राहिलेला नाही. पूर्वीच्या काळात काय काय प्रकार झाले आहेत त्याची माहिती घ्या. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश खुला करावा म्हणून साने गुरुजींनी प्राण पणाला लावले होते. तिथे लोकशाही निर्णय घेतला गेल्यावर पंढरपुरातील सनातनी ब्राह्मणांचे पित्त खवळले. 'विठोबा बाटला' म्हणून अनेकजणांनी देवळात जाणे सोडले. याहीपेक्षा वाईट म्हणजे मंत्रशास्त्रात पारंगत काही विद्वानांनी मूर्तीतील दैवत्व काढून घेतले व ते पाण्यात उतरवून एका घरी 'घागर विठोबा'ची स्थापना केली. पुढे अनेक वर्षांनी या ब्राह्मणांना केलेल्याचा पश्चाताप झाला. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या पुजार्‍यांनीही डॉ. आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहात अशीच हटवादी भूमिका घेतली होती, ती आयुष्यभर बदलली नाही. या पुजार्‍याच्या नातवाने (सध्याचे महंत) दोन वर्षांपूर्वी आजोबांच्या दुराग्रहाबद्दल माफी मागितली. या तुलनेत कोल्हापूरचे आंदोलन झाल्यावर कुणाही पुजार्‍याने झारीतील शुक्राचार्याची भूमिका घेतली नाही. रीतसर सरकारी निर्णय होताच पुढच्याच दिवसापासून सर्व महिलांना सकाळच्या अभिषेकासाठी गाभार्‍यात प्रवेश खुला केला आहे. ही सकारात्मक आणि बदललेल्या मनोवृत्तीचे द्योतक नाही का? असे प्रश्न चर्चेला येतात तेव्हा आपण त्यातील चांगली बाजू बघण्यापेक्षा पुन्हापुन्हा पुरुषांनी स्त्रियांवर केलेला अन्याय, ब्राह्मण समाज कसा दोषी आहे, हेच मुद्दे का चघळत बसतो? (अवांतर आणि विनोदी : रामकृष्ण मिशनच्या मंदिरांपैकी सारदामातांच्या मंदिरात फक्त स्त्रियांना पुढे प्रवेश देतात. तिथे पुरुषांनी मागे उभे राहायचे असते. याबद्दल पुरुष कुरकूर करत नाहीत. आम्ही गेलो असताना मला नम्रतेने मागे उभे राहायला सांगण्यात आले. मी पत्नीला चिमटा काढण्याच्या हेतूने म्हटले, 'बरंय बुवा. मजा आहे तुम्हा बायकांची. बघा सारदामातांना आपल्या मुलींचे जास्त कौतुक.' त्यावर शेजारच्या एका माणसाकडे निर्देश करत माझी पत्नी कानात कुजबुजली, 'ते बघ. या माणसाने देवळात येण्याआधी फूटपाथवर गुटखा थुंकला आणि त्याच तोंडाने मंदिरात आलाय. उग्र वासानेच मळमळतंय. असल्या लेकरांपेक्षा आईला प्रामाणिक लेकी कधीही चांगल्या.' :)

In reply to by योगप्रभू

अतिशय संयमित व अभ्यासु प्रतिसाद. धन्यवाद. खरेतर वरती मी देखील थोडी असभ्य भाषा वापरणारच नव्हतो, मात्र मिपावर सध्या वारंवार जे द्वेष करणारे आणी भडक प्रतिसाद येत आहेत ते बघता राहावले नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अतिशय संयमित व अभ्यासु प्रतिसाद.

In reply to by योगप्रभू

एक नंबर प्रतिसाद आहे. सर्व ब्राम्हण पुजारी आणि प्रथा बदलण्यासाठी ज्यानी हातभार लावला त्या सर्वांचेच अभिनंदन. पुरोगामी म्हणवणार्‍या अनेकांचे वरती जे प्रतिसाद वाचले त्यापेक्षा कित्येक पट चांगला प्रतिसाद आहे.

In reply to by राजेश घासकडवी

कोणी स्वतःला हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम म्हणवू नये... आख्खं जग सुखी होईल. अजबच प्रकार म्हणायाचा. स्त्री-पुरुष समानता यावी म्हणून पुरुषांनी स्वतःला पुरुष म्हणवून घेउ नये असंही उद्या कोणी म्हणेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

जिथे आवश्यकता नाही तिथे पुरूषांनी स्वतःला पुरूष म्हणवून घेण्याची (आणि स्त्रियांनी स्त्रिया म्हणवून घेण्याची) गरज नाही; उदा: एखाद्या देशाचे दुसर्‍या देशातले राजदूत. राजदूताचं काम आहे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं, सदर व्यक्ती स्त्री आहे वा पुरूष याने काही फरक पडू नये. (धर्म असण्यानसण्याबद्दल वेळ मिळेल तसं लिहीण्याची इच्छा आहे. पण हा त्यासाठी टाकलेला रूमाल नव्हे!)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

उदा: एखाद्या देशाचे दुसर्‍या देशातले राजदूत. राजदूताचं काम आहे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं, सदर व्यक्ती स्त्री आहे वा पुरूष याने काही फरक पडू नये. ठीक आहे. तर मग जिथे अनावश्यक आहे तिथे स्वतःला मी हिंदू धर्माचा आहे इत्यादीउल्लेख टाळावेत इतपत अपेक्षा ठेवणे रास्त आहे. त्याहीपुढे जाऊन धर्मच नष्ट करावेत किंवा कोणी स्वतःला हिंदू,ख्रिश्चन्,मुसलमान म्हणवून घेउ नये हा आततायीपणा नाही का ?

In reply to by अप्पा जोगळेकर

... कोणी स्वतःला हिंदू,ख्रिश्चन्,मुसलमान म्हणवून घेउ नये हा आततायीपणा नाही का ?
एका शब्दात उत्तर... नाही. किंचित स्पष्टीकरणः हा आततायीपणा नाही असं मला वाटतं कारण स्त्री आणि पुरूष हा भेद नैसर्गिक आहे; धर्माधारित भेद अनैसर्गिक आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कारण स्त्री आणि पुरूष हा भेद नैसर्गिक आहे; धर्माधारित भेद अनैसर्गिक आहे. ठीकाय. भारतीय-अभारतीय, महाराष्ट्रीय-अमहाराष्ट्रीय हे कन्सेप्ट्ससुद्धा मानवनिर्मित आहेत. कदाचित तुमच्या हिशोबाने कोणी स्वतःला भारतीय्,महाराष्ट्रीय म्हणवून घेणे हासुद्धा अपराधच ठरेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

भारतीय-अभारतीय, महाराष्ट्रीय-अमहाराष्ट्रीय हे कन्सेप्ट्ससुद्धा मानवनिर्मित आहेत.
अर्थातच, या संकल्पना मानवनिर्मित आहेत.
कदाचित तुमच्या हिशोबाने कोणी स्वतःला भारतीय्,महाराष्ट्रीय म्हणवून घेणे हासुद्धा अपराधच ठरेल.
संदर्भ पाहून हे ठरवता येतं. पासपोर्ट पाहून किंवा एखादी व्यक्ती कोणती भाषा बोलते हे पाहून तिचं श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व ठरवणं हे मला पटत नाही. पण विविध भाषा बोलणार्‍या किंवा वेगवेगळ्या देशांतल्या व्यक्तींशी बोलून मला बरंच काही नवं शिकता येतं, तेव्हा मला अभारतीय आणि/किंवा अमराठी मित्रमंडळ असण्याचा आनंद होतो. भेदभाव करायचाच असेल तर तो कसाही करता येतो. अगदी मराठी लोकांमधेही पुणे-मुंबई भांडणं होऊ शकतात, मुंबई विरूद्ध ठाणे होऊ शकतात, ठाणे पूर्व विरूद्ध ठाणे पश्चिम, काय वाट्टेल ते! पण त्यातून काय मिळतं, काय चांगलं घडतं? अमक्या देशाचे नागरीक असणं किंवा एक कोणतीतरी मातृभाषा असणं यात मला काही अभिमानाची गोष्ट वाटत नाही, ना शरमेची बाब वाटते. जसं व्यक्ती स्त्री किंवा पुरूष असते तसाच हा ही एक भाग.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पासपोर्ट पाहून किंवा एखादी व्यक्ती कोणती भाषा बोलते हे पाहून तिचं श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व ठरवणं हे मला पटत नाही. तर मग ते चांगलंच आहे. हाच न्याय धार्मिक बाबतीत अनुसरणेसुद्धा शक्य आहे. आणि अनेक माणसे तशा व्यवस्थित पद्धतीने वागतदेखील असतात. अमक्या देशाचे नागरीक असणं किंवा एक कोणतीतरी मातृभाषा असणं यात मला काही अभिमानाची गोष्ट वाटत नाही, ना शरमेची बाब वाटते. ठीकाय चालू द्या तर मग. भारताने विश्वचषक जिंकला, अभिनव बिंद्राने सुवर्णपदक मिळवले, भारताने एखादी अंतराळ मोहीम यशस्वी केली तर एक भारतीय म्हणून अभिमान वाटणे किंवा २-जी स्पेक्ट्रम सारखे घोटाळे बाहेर आल्यावर एक भारतीय म्हणून लाज वाटणे अशा भावनांचा अनुभव तुम्हाला नसेल कदाचित.

In reply to by अप्पा जोगळेकर

हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे लेबलं अनावश्यक आहेत, भाषा २० मैलांवर बदलते तेव्हा संपूर्ण जगाची/देशाची भाषा एकसारखी असणं शक्य नाही.
भारताने विश्वचषक जिंकला, अभिनव बिंद्राने सुवर्णपदक मिळवले, भारताने एखादी अंतराळ मोहीम यशस्वी केली तर एक भारतीय म्हणून अभिमान वाटणे किंवा २-जी स्पेक्ट्रम सारखे घोटाळे बाहेर आल्यावर एक भारतीय म्हणून लाज वाटणे अशा भावनांचा अनुभव तुम्हाला नसेल कदाचित.
माझ्या व्यक्तीशः काय भावना आहेत त्याचा इथे काहीही संबंध नाही. मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजलेलं नाही आणि ते समजावून देण्याइतका माझ्याकडे आत्ता वेळ नाही. कधी ना कधी जमेलच मला ते! विचार समजले तरी पटावेच असाही काही आग्रह नाही. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव, नील आर्मस्ट्राँग, याचं एक वाक्य मला आवडतं, "That's one small step for [a] man, one giant leap for mankind." त्याला तेव्हा आपण अमेरिकन आहोत, इंग्लिश भाषा बोलतो वगैरे वगैरे नाही आठवलं.

In reply to by अप्पा जोगळेकर

'कोणी स्वतःला हिंदू,ख्रिश्चन्,मुसलमान म्हणवून घेउ नये' हे मी धर्मच नसावेत या अर्थाने म्हटलं होतं. धर्म ठेवावे, पण लपवावे या अर्थाने नाही. प्रश्न उल्लेखाचा नाही. धर्मयुद्ध, धार्मिक दंगली, ज्यूंचं हत्याकांड, फाळणीच्या वेळी झालेली अपरिमित मनुष्यहानी... या सगळ्या गोष्टी धर्माधिष्ठित भेदभाव नसते तर कशा झाल्या असत्या?

In reply to by राजेश घासकडवी

या सगळ्या गोष्टी धर्माधिष्ठित भेदभाव नसते तर कशा झाल्या असत्या? धर्म ही एक मानवनिर्मित संज्ञा आहे आणि जवळपास सगळ्याच धर्मश्रद्धा हे मनाचे खेळ आहेत. त्यामुळे जर धर्मांचे अस्तित्व नसते तर दुसरी एखाद्या क्ष संज्ञा अस्तित्वात आली नसतीच हे कशावरुन. कुणास ठाउक, त्या क्ष संज्ञेचे धर्माधिष्ठित भेदभावांहूनही भयंकर परिणाम कदाचित घडले असते. त्यामुळे जर धर्मच नसते तर अशा कल्पनाविलासाला काही अर्थ आहे काय ? जे अनिष्ट धार्मिक प्रकार आहेत तेवढेच काय ते थांबवण्याचा प्रयत्न करणे हा व्यवहारी शहाणपणा आहे असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.

In reply to by अप्पा जोगळेकर

जर धर्मांचे अस्तित्व नसते तर दुसरी एखाद्या क्ष संज्ञा अस्तित्वात आली नसतीच हे कशावरुन. कुणास ठाउक, त्या क्ष संज्ञेचे धर्माधिष्ठित भेदभावांहूनही भयंकर परिणाम कदाचित घडले असते.
याला मी आत्याबाईची भलीमोठी दाढी म्हणेन :) हा तुमचा क्ष काय असेल, काही अंदाज? तुम्ही 'चांगलं व्हावं' या इच्छेला कल्पनाविलास म्हणताहात, उद्या तुम्ही ज्ञानेश्वरांनासुद्धा 'अंधार रहाणारच. हा गेला तर दुसरा येणार नाही कशावरून? तेव्हा दुरितांचे तिमिर जावो या कल्पनाविलासाला काय अर्थ आहे?' असं म्हणाल. धर्मातल्या चांगल्या गोष्टी ठेवा (सणवार, उत्सव) हे मी आधीच म्हटलं होतं. पण त्यापलिकडे विश्वउत्पत्तीचं तत्त्वज्ञान, विचित्र कर्मकांडं, भेदभाव पाळण्याच्या पद्धती वगैरे सगळी अडगळ आहे. तसल्या अनिष्ट गोष्टी काढून टाकाव्यात असं तुम्हीसुद्धा म्हणता. मग नक्की या दोनमधलं काय आहे जे शिल्लक ठेवावं?

In reply to by राजेश घासकडवी

याला मी आत्याबाईची भलीमोठी दाढी म्हणेन तुम्ही एक चुकीचा हायपोथिसिस मांडलात. म्हणून तो खोडून काढण्यासाठी एका बरोबर हायपोथिसिसचाच आधार घ्यावा लागला. त्यामुळे या दाढी-मिशांचे पातक माझ्या माथी कशाला मारता? अंधार रहाणारच. हा गेला तर दुसरा येणार नाही कशावरून धर्म म्हणजे अंधार असे मी मानत नाही. त्यामुळे असा प्रश्न माझ्या डोक्यात येण्याची शक्यताच नाही.

In reply to by राजेश घासकडवी

धर्मयुद्ध, धार्मिक दंगली, ज्यूंचं हत्याकांड, फाळणीच्या वेळी झालेली अपरिमित मनुष्यहानी... या सगळ्या गोष्टी धर्माधिष्ठित भेदभाव नसते तर कशा झाल्या असत्या?
अधोरेखित बाब ही धर्माधिष्ठित भेदभावांमुळे घडली की वांशिक द्वेषामुळे (किंवा, यात धर्माधिष्ठित भेदभावांचा भाग असलाच, तर तो कितीश्या प्रमाणात) याबद्दल साशंक आहे. बाकी चालू द्या. (अवांतर: वेगवेगळे वंश असल्यामुळे वांशिक द्वेष निर्माण होतात. सबब, वंश त्याज्य आहेत, हे आर्ग्युमेंट कसे वाटते? हा प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळे अप्रोच घेऊन यापूर्वी प्रयत्न झालेले आहेत. जसे, 'वेगवेगळे वंश असणे हे निश्चितपणे वाईट नाही, पण ते एकत्र आले की गडबडी सुरू होतात. सबब, वेगवेगळ्या वर्णांना वेगवेगळेच राहू द्या, आणि वेगवेगळे राहून आपला विकास साधू द्या' हा एक अप्रोच. या प्रेमाइसवर पूर्वी दक्षिण आफ्रिकेत आणि काही अंशी दक्षिण र्‍होडेशियात महान प्रयोग झाले. दुर्दैवाने पुढे त्यांचा पाठपुरावा होऊ शकला नाही. 'मुळात वेगवेगळे वंश असणे हीच समस्या आहे' हा अप्रोच घेऊन समस्येचे निर्मूलन करण्याकरिता १९४०च्या दशकाच्या आसपास जर्मनीत काही निर्णायक पावले उचलण्याचे प्रयत्न झाले. दुर्दैवाने आंतरराष्ट्रीय विरोधामुळे (आणि काही अंशी अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे) त्या प्रयत्नांना यश आले नाही.)

In reply to by राजेश घासकडवी

जगात इतकी दुःखं धर्मामुळे आलेली आहेत. धर्मामुळे बरीचशी सुखं आणि आनंदसुद्धा जगामध्ये आलेला आहे. याचा पुरावा म्हणजे तुमचंच हे वाक्य. मी तर म्हणतो धर्मांमधले सणवार, उत्सव वगैरे ठेवावे आणि बाकी सगळं सोडून द्याव

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

काहिहि असेल तरि धार्मिक बाबतीत उगाच अकारण हस्तक्षेप करण्यात काहिहि तथ्य नाही. आमच्या नात्यात एक अत्यंत आगाउ पुरोहित आहे. आम्ही पालीला त्याच्या घरी गेलो होतो. तेंव्हा त्यांच्या घरी मोलकरणीचे काम करण्यासाठी येणार्या बाईला त्याने सगळी माणसे बसली असताना उघडपणे दरडावून विचारले होते,''काय ग आज कितवा दिवस आहे ?" तेंव्हा ती बाई घाबरत घाबरत म्हणाली,"तिसरा." "ठीकाय. जा अमुक अमुक खोलीतून. इकडे तिकडे शिवलीस तर याद राख." तो प्रकार बघून मला किळस आली. अशा प्रकारच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करु नये असे ज्यांचे मत असेल त्यांना काय बोलणार ?

In reply to by इंटरनेटस्नेही

सदर पुरोहित केवळ आगवु नसुन हलकट देखील आहे, असे निरीक्षण नोंदवतो. अगदी अगदी. आणि दुसर्‍याच एका कारणामुळे त्याला घरी आलेला असताना दारातूनच हाडतुड करत हाकलून देण्याचा आसुरी आनंदसुद्धा मी अनुभवलेला आहे.

In reply to by इंटरनेटस्नेही

त्या पुरोहिताला हलकट म्हणण्यात काहिही वावगे नाही. इंटरनेटस्नेहींच्या या प्रतिक्रियेला नकारत्मक मत मिळालेलं पाहून आश्चर्य वाटलं!

एका स्त्री च्या मंदीरात स्त्रीयांनाच बंदी ? कमालंच्चे .. मला हे आत्ता कळलं .. दोन पावलं पुढे जाऊन मी तर म्हणेन .. कार्तिक स्वामी च्या मंदिरातही स्त्रीयांना प्रवेश द्या ;) - टार्तिक स्वामी सुंदर स्त्रियांचे आमच्या मठात स्वागत आहे.

In reply to by टारझन

>>दोन पावलं पुढे जाऊन मी तर म्हणेन .. कार्तिक स्वामी च्या मंदिरातही स्त्रीयांना प्रवेश द्या. टारुभौशी अगदी सहमत. हे पाऊल राजकीय पक्ष कधी उचलतायत हे तो कार्तिक स्वामीच जाणे. असो, महिलांना सरसकट प्रवेश नव्हता महालक्ष्मी मंदिरात हे मात्र खरं, त्यामुळे झालं हे योग्यच !! अवांतर: महालक्ष्मीच्या देवळात नवविवाहित जोडपी (सपत्नीक) गाभार्‍यात गेल्याचे एक दोनदा पाहिलं आहे, गेल्याच वर्षीच्या भेटीत एका दोन महिन्याच्या मुलीला देवीच्या पायावर ठेवून सुखरुप तिच्या आईकडे सुपूर्द केल्याचंही पाह्यलंय.

मी लहान असताना ऐकले होते कि एका पुजार्‍याकडे एक २ महिन्याची मुलगी देवीच्या पायावर ठेवायला दिली होती. तिथे स्त्रीयांना आत प्रवेश नसतो हे कदाचित त्या बालिकेच्या मातेला माहित नसावे. पुजारी बालिकेला देविच्या पायाशी बाळाचे डोके लावत असताना त्याच्या लक्षात आले कि हि मुलगी आहे त्या क्षणी त्याने हात झटकले आणि ते बाळ खाली पडले.... पुढे काय झाले असावे याची आपणच कल्पना करावी. स्त्रीयांना प्रवेश नाही हे कबूल.. पण असा अमानुषपणा ?? जगदंब !! जगदंब !!!!

In reply to by सांजसखी

लावत असताना त्याच्या लक्षात आले कि हि मुलगी आहे त्या क्षणी त्याने हात झटकले आणि ते बाळ खाली पडले.... पुढे काय झाले असावे याची आपणच कल्पना करावी.
पुढे काय झाले? मुलीच्या आईने मुलीला सावरायला स्वतः गाभार्‍यात धाव घेतली? पुजार्‍याला खडसावले की आपली चूक झाली हे लक्षात आल्याने खजील होऊन मागे फिरले?

२ महिन्याचा कोवळा जीव तो.... बाप्पाघरी गेला :( ऐकीवात आहे कि कोर्ट कचेर्‍या झाल्या पण शेवट नाही माहीती...असो.

In reply to by सांजसखी

असे नाही मनात आले माझ्या. खाली पडले असे म्हटल्यावर लक्षात यायला हवे होते पण तसे वाटले नाही. असो. बायकांना त्यांच्या मर्जीनुसार कुठेही जाण्यास प्रत्यवाय नसावा. बार असो किंवा मंदिर!

मदिना आणि मक्का ह्या संपूर्ण शहरांत, मशिदीत, गाभार्‍यात वगैरे नाही गैर मुस्लिमांना प्रवेश नाही. निदान गेली १०० वर्‍षे तरी ही परंपरा चालू आहे. सौदी सरकारचे हे अधिकृत, सरकारी धोरण आहे. खात्री नाही पण हा नियम तोडणार्‍याला मृत्युदंड होऊ शकतो. ह्या भेदभावाबद्दलही असाच निषेध व्यक्त होईल का? हा बोर्ड बघा http://3.bp.blogspot.com/_b1Z4ZCpAGag/SUgpBQqPjSI/AAAAAAAAAPI/rgLMYmyhG… आपल्या परंपरांवर टीका करायचा सर्वांना अधिकार आहेच. पण उर्वरित जगात अशा प्रकारचे काही होते आहे का हे ही माहित असावे म्हणून हा प्रपंच. आणि शिवाय हा माझा आवडता विषय!

In reply to by हुप्प्या

असला भेदभाव वाईटच. दयाळू, सर्वशक्तिमान ईश्वराच्या नावाने केला तर तो आणखीनच वाईट. मग तो कुठच्याही का धर्मात होईना. व्यवहारात निव्वळ अंगी असलेल्या कौशल्यासाठीच व त्या गरजेपोटीच भेदभाव असावा. (म्हणजे डॉक्टरकडे जायचं असेल तर गवंड्याकडे न गेल्याने भेदभाव होत नाही अशा अर्थाने) मुळात आपल्या परंपरा, त्यांच्या परंपरा असे ग्लोबल भेद करून धर्मच 'आपण व ते' अशी फूट पाडतात.

In reply to by हुप्प्या

आपल्या परंपरांवर टीका करायचा सर्वांना अधिकार आहेच.
आपल्या परंपरा?? जिथे आपल्याच आया बहिणींनी प्रवेश नाही त्या प्रथेला आपली प्रथा कसे म्हणवते बरे? मंदिर व्यवस्थापनाची एक मूर्ख अट इतकेच. (मक्का मदिनाच काय पण मंदिरातही फारशी जायची वेळ येत नाही. मक्का मदिनावाले तर सहस्त्र मूर्ख आहेत, एका उल्केसाठी एव्हढं. असो. पण त्याविषयी इथे शंखानाद करून काही फरक पडणार आहे का? ते योग्य ठिकाणी करूच. इथे सदर अटींमुळे इथल्या आणी संबंधित व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आलेली असल्याने इथे मत व्यक्त करणे जास्त सयुक्तिक.)

In reply to by हुप्प्या

आपल्या परंपरांवर टीका करायचा सर्वांना अधिकार आहेच. पण उर्वरित जगात अशा प्रकारचे काही होते आहे का हे ही माहित असावे म्हणून हा प्रपंच. आणि शिवाय हा माझा आवडता विषय!
त्याचे असे आहे, माझ्या उर्वरित आयुष्यात मी मक्केला किंवा मदिनेला सोडा, पण सौदी अरेबियालासुद्धा जाण्याची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे तिथे काय चालते याच्याशी मला फारसे घेणेदेणे नाही. ज्याला जायचे आहे त्याने बघून घ्यावे. उलटपक्षी, उर्वरित आयुष्यात मी मंदिरात एकदा नव्हे तर अनेकदा जाण्याची शक्यता त्या मानाने खूपच अधिक आहे. त्यामुळे, प्रत्यक्ष संबंध येत असल्याने जास्त खटकते. (तितकाच त्रास होऊ लागला, तर जाणार नाही. पण तूर्तास कधीमधी जावेसे वाटूही शकते.)

In reply to by पंगा

काळ्यांविरुद्धचा भेदभाव हा भारतीय लोकांनाही निषेध करण्याजोगा वाटला होता. अगदी अधिकृत पातळीवर. भारतात काळ्या गोर्‍याचा भेदभाव नाही. तरी त्यांना तसे वाटले. एखाद्या उच्चवर्णियाने असे म्हटले की मी उच्चवर्णीय आहे. मी ह्या जन्मात हरिजन बनणार नाही तस्मात हरिजनांविरुद्ध होत असलेल्या भेदभावाविषयी मला काही देणे घेणे नाही. तर त्याला नाक मुरडले जाईल. पण इथे मात्र हात झटकून मोकळे होण्याची वृत्ती जास्त आढळते हे का? मुस्लिमांच्या रोषाला घाबरून का पुरोगामीत्वाच्या साच्यात हे बसत नाही म्हणून? हेही निषेधनीय आणि तेही निषेधनीयच असे म्हणायला माझ्या मते हरकत नसावी. देवाधर्माविषयी काडीचीही आत्मीयता नसताना वादासाठी तशी ती असण्याचा आभास निर्माण करायची आवश्यकता नाही. व्यक्तीशः मी ना मक्केला जाणार आहे ना कोल्हापूरच्या देवळात. मला अतोनात गर्दी असलेल्या देवळात जाण्यात काडीचाही रस नाही. पण मला दोन्ही जागी असणारे भेदभाव खटकतात.

In reply to by हुप्प्या

तुम्हाला खरोखरच मक्केला जाण्याची इच्छा असेल तर इस्लाम स्वीकारून तिथे जाण्याचा पर्याय तुलनेने सहजरित्या उपलब्ध आहे. पण महालक्ष्मीच्या गाभार्‍यात जाण्यासाठी एखाद्या मुलीने लिंगबदलाचं ऑपरेशन करून घ्यावं काय? मक्केची आणि महालक्ष्मीच्या गाभार्‍याची तुलना मला रास्त वाटत नाही. तरीही निषेध व्यक्त व्हावा अशी इच्छा असेल तर त्यावरही स्वतंत्र चर्चा होऊ शकते. धर्म बदलता येतो, नवनवीन भाषा शिकता येतात, नागरिकतत्व बदलता येतं, पण वंश आणि जात (स्त्री-पुरूष या अर्थानेही) कसे बदलणार? भेदभाव 'करणं' मूळातूनच नष्ट होणंच समाजासाठी उत्तम नाही का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुस्लिम धर्म स्वीकारणे हे इतके सरळ नाही. कायदेशीररित्या तो एक वन वे स्ट्रीट आहे. एकदा मुस्लिम बनलेला मनुष्य पुन्हा धर्म बदलता झाला तर त्याला मृत्युदंड आहे. जर आपल्याला मक्केत प्रवेश मिळवाण्याकरता इस्लाम स्वीकारणे हा सोपा मार्ग वाटतो तर मग खोट्या मिशा लावून, तात्पुरते वेषांतर करून पुरुष असल्याचा आभास करुन कोल्हापूरच्या देवळात जाणेही अशकय नाही. देवावरील भक्तीपोटी इतके वेषांतर म्हणजे काहीच नाही नाही का? देवळात येणार्‍यांची "कसून" तपासणी करुन तो पुरुष आहे ह्याची खातरजमा केली जात नाही. मुसलमानांनी केलेला भेदभाव तितकासा बोचत नाही पण हिंदूंचा मात्र असह्य होतो असे मानणे हे पुरोगामीत्वाचे निदर्शक आहे का? आणि हो, ही बंदी आता उठवलेली आहे. अशाच प्रकारे मक्का मदिनेतील बिगरमुस्लिमांची प्रवेशबन्दी उठेल असे आपणास वाटते का?

In reply to by हुप्प्या

मुस्लिम धर्म स्वीकारणे हे इतके सरळ नाही.
लिंगबदल करण्यापेक्षा सोपं असावं. ("असावं" अशासाठी लिहीलं की दोन्ही गोष्टींचा मला काडीमात्र अनुभव नाही.)
कायदेशीररित्या तो एक वन वे स्ट्रीट आहे.
त्याचा या चर्चेशी काय संबंध?
... पुरुष असल्याचा आभास करुन कोल्हापूरच्या देवळात जाणेही अशकय नाही
ही फसवणूक आहे आणि त्याला माझा विरोध आहे. अवांतर माहिती अशी की सर रिचर्ड बर्टन नामक एक हरहुन्नरी पण बिगरइस्लामिक मनुष्य मक्केत जाऊन आला आहे. देवावरच्या भक्तीचा इथे काहीही संबंध नाही. इथे मानवाकडून होणार्‍या भेदभावावर चर्चा सुरू आहे.
मुसलमानांनी केलेला भेदभाव तितकासा बोचत नाही पण हिंदूंचा मात्र असह्य होतो असे मानणे हे पुरोगामीत्वाचे निदर्शक आहे का?
दुसर्‍याने केलं तर चालतं, मी केलं काय बिघडतं; अशा प्रकारचं विनोदी आणि तर्कहीन प्रत्युत्तर दुर्लक्षित करण्यात येत आहे. (ad populum?)
आणि हो, ही बंदी आता उठवलेली आहे. अशाच प्रकारे मक्का मदिनेतील बिगरमुस्लिमांची प्रवेशबन्दी उठेल असे आपणास वाटते का?
बंदी उठवली हे उत्तम झालं. त्यासाठी थोडा का होईना आटापिटा करावा लागला हे क्लेषकारक असलं तरीही सध्या विसरण्यास हरकत नाही. इतरांच्या देशात काय चालतं याची पर्वा मी का करावी? इराकमधे लोकशाही असावी म्हणून अमेरिकेचे सैनिक तिथे लढत आहेत त्यासारखंच झालं हे! मुळात धर्मच रद्दबादल केले की हा प्रश्न येणार नाही. (वर प्रतिसाद लिहीणार होते, पण काही बूचप्रेमी सदस्यांमुळे दुसर्‍या ठिकाणी रूमाल टाकावा लागणार आहे.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इराकमधे लोकशाही असावी म्हणून अमेरिकेचे सैनिक तिथे लढत आहेत त्यासारखंच झालं हे!
अधोरेखिताशी किंचित असहमत आहे. बाकी चालू द्या. (उर्वरिताशी बहुतांशी सहमत.)
मुळात धर्मच रद्दबादल केले की हा प्रश्न येणार नाही.
अगोदर इतरत्र म्हटल्याप्रमाणे, हम्म्म्म्.... :) शक्यतांनी अतिशय गरोदर असे विधान आहे हे. ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुळात धर्मच रद्दबादल केले की हा प्रश्न येणार नाही. कॄपया धर्म रद्दबातल करणे याचा अर्थ स्पष्ट करावा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>इतरांच्या देशात काय चालतं याची पर्वा मी का करावी? धार्मिक स्थळी होणारा भेदभाव असा विषय आहे. मी नास्तिक आहे मला देवळात जायची गरज नाही. मग मला महालक्ष्मीच्या देवळातील प्रवेशबंदी का जाचावी? असे पुरोगामी म्हणू शकले असते पण नाही. तसेच मक्केच्या बाबतीत का नाही? मला मक्केला जाण्यात काडीचाही रस नाही परंतु हा भेदभाव चुकीचाच आहे असे म्हणायला नक्की काय अडचण आहे? मला मक्का मदीनेला जायचे नसले तरी एकीकडे इतर धर्माचे गोडवे गाणे. येशू, आब्राहम, डेव्हिड, मोझेस अशा लोकांना आदरणीय मानायचे ढोंग करायचे. आणि दुसरीकडे त्या धर्माच्या अनुयायांना बंदी घालायची हा दुटप्पीपणा हा देवीच्या देवळात स्त्रियांना बंदी घालण्याच्याच तोडीचा आहे.

In reply to by हुप्प्या

मी नास्तिक आहे मला देवळात जायची गरज नाही. मग मला महालक्ष्मीच्या देवळातील प्रवेशबंदी का जाचावी? असे पुरोगामी म्हणू शकले असते पण नाही.
ज्या लोकांचा देवावर विश्वास आहे, त्यांना देवळात जायचं असतं, फक्त स्त्रिया आहेत म्हणून तिथे जाता येत नाही ही गोष्ट काही पुरोगामी लोकांना अन्याय्य वाटते. त्यात पुरोगामी लोकांच्या स्वतःच्या देव-धर्मविषयक विचारांचा काय संबंध? सौदीची गोष्टच वेगळी आहे, सौदी ही राजेशाही आहे, संपूर्ण देश ही राजाचीच खासगी मालमत्ता आहे. आणि खासगी मालमत्तेत कोणी काय करावं याबद्दल इतरांनी बोलणं हा थोडा ग्रे-एरिया वाटतो.

In reply to by हुप्प्या

मी टीव्हीवर पाहिलेल्या चर्चेत सनातनचा माणूस याच मुद्द्यामागे लपायचा प्रयत्न करत होता..त्यावर कदम साहेब म्हणाले की जर मुस्लिम भगिनी आमच्यावर अन्याय होतोय म्हणत आल्या तर आम्ही मशिदवाल्यांनाही निवेदन देऊ. बॉल इज इन मुस्लिम भगिनी'ज कोर्ट !

In reply to by शाहरुख

हाच न्याय लावायचा तर महर्षी कर्व्यांच्या कार्याविषयी काय म्हणाल? त्यांनी विधवांच्या उद्धाराकरता खूप कार्य केले. पण त्यांच्याकडे विधवा स्त्रिया "आमच्यावर अन्याय होतो आहे. काहीतरी करा" असे म्हणत आल्या होत्या का? कर्व्यांना त्यांची स्थिती दिसली आणि त्यावर काहीतरी करावे असे वाटले आणि त्यांनी त्यांचे कार्य केले. अन्याय झालेला गट/समाज तक्रार घेऊन यायची वाट बघितलीच पाहिजे असा काही नियम नाही.

In reply to by हुप्प्या

हिंदू धर्मात चालू असलेल्या सुधारणांचं कौतुक करणाऱ्या धाग्यावर इतर धर्मांत त्या सुधारणा आहेत की नाहीत याचा संबंधच काय? आपल्या घरातला कचरा काढायला लावल्यावर एखाद्या पोराने 'मग, त्या शेजारच्या बंडूच्या घरात कचरा आहे त्याचं काय?' अशी पिरपीर करण्यासारखं आहे. अरे, आपलं घर स्वच्छ झालं आहे त्याचा आनंद माना. का एके काळी ते घाण होतं हे कबूल करायची लाज वाटते? खरंच, सगळेच धर्म नष्ट झाले तर मूर्ख परंपरांना काही आधार रहाणार नाही. मग राज्यघटनेने जी समानता बहाल केली आहे ती खऱ्या अर्थाने सर्वांना मिळू शकेल.

In reply to by राजेश घासकडवी

आपल्या घरातला कचरा काढायला लावल्यावर एखाद्या पोराने 'मग, त्या शेजारच्या बंडूच्या घरात कचरा आहे त्याचं काय?' अशी पिरपीर करण्यासारखं आहे. यात पिर्पिर काय ? बंडू चु* आहे आणि मी नीटनेटका आहे असे ठसठशीतपणे म्हटले तर राग येण्याचं काय कारण आहे. अरे, आपलं घर स्वच्छ झालं आहे त्याचा आनंद माना. का एके काळी ते घाण होतं हे कबूल करायची लाज वाटते? काही जण घर आज स्वच्छ झालं आहे. जरुर असेल तर अधिक स्वच्छ करु असं म्हणतात. काही जण ते पूर्वी कसं घाणेरडं होतं याबाबत गळे काढत बसतात. तुम्ही दुसर्‍या कॅटेगरीतले आहात असे वाटते. खरंच, सगळेच धर्म नष्ट झाले तर मूर्ख परंपरांना काही आधार रहाणार नाही. तसं झालं तर कोणताच धर्म न मानणारा असा एक नविन धर्म जन्माला येईल आणि त्या धर्मातदेखील नविन अनिष्ट प्रथा निर्माण होतीलच. मूर्तिपूजेला कडाडून विरोध असणार्‍या गौतम बुद्धाचे असंख्य पुतळे आज जगभरात अनेक ठिकाणी भक्तिभावाने पूजले जात आहेत यावरुनच काय ते समजून चाला. शिवाय कोणताच धर्म न मानणार्‍या डॉ. आंबेडकरांचे नवबौद्ध अनुयायी किती पुरोगामी आहेत हे आपण पाहतोच.

खरं तर देवीच्या देवळात पुरूषांनाच प्रवेशबंदी केली पायजे. दक्षीना बुडेल पण पन देवीच्या गाभार्‍यात असले घाण लोक बरोबर नाही वाटत. काय काय लपडी चालतात या देशात. आपला देश लय भारी.

अशी काही बंदी वगैरे आहे हेच मला माहित नव्हतं. मी एकदाच गेलेय कोल्हापुरात, खास चपला घेण्यासाठी अन महालक्ष्मीच मंदिर बघण्यासाठी. मंदिरात खूप मोठी रंग होती अन कुणालाच आत जाऊ देत नव्हते. बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत होते म्हणून मंडपातून मूर्ती दिसल्यावर बाहेरच्या दुकानात पेढे घेऊन घरी यायला निघालो. अशी बंदी म्हणजे मूर्खपणाच आहे. एका बातमीत वाचलंय कि इंदिराबाई, सिंधीयाबाई वगैरेना सुद्धा प्रवेश नाकारला होता. धार्मिक भावना कशाला दुखवा म्हणून त्या काही बोलल्या नाहीत. सनातनचा खुलासा हास्यास्पद. जाई कोल्हापुरीचा प्रतिसाद फारसा विचार न करता दिलेला वाटला आणि असाच विचार इतक्या काळ लोक (स्त्रिया) करत असतील त्यामुळेच हि बंदी वगैरे चालू राहिली. अर्थात या मोर्चेवाल्या बायासुद्धा गाभाऱ्यात गेल्या नाहीत असे एका बातमीत वाचले. खरं खोटं मोर्चेवाल्या, तो पुजारी अन ती देवीच जाणे. बाकी चर्चा नेहमीप्रमाणेच.

महालक्ष्मीमंदीर हा काही अपवाद नाही. माझा ऊडुपीच्या कृष्णमंदीरातला अनुभव काही वेगळा नाही. आम्ही (बायको आणी मुलगी बरोबर होती)दर्शनघेऊन बाहेर आल्यावर ही म्हणाली की प्रसाद घेउनच जाऊ म्हणून आम्ही प्रसादाच्या रांगेत उभे राहीलो. तेंव्हा एक कळकट माणूस आला आणी मला तुझं गोत्र काय, जानवं दाखव वगैरे प्रश्न विचारु लागला. का तर म्हणे ही पहिली रांग फक्त ब्राम्हणांसाठी असते. त्यांची जेवणं झाल्यावर मग बाकीच्यांना! आम्ही तडक पाठ फिरवून परत हॉटेलवर गेलो. सांगायचा मुद्दा असा की अजुनही लिंगभेद / जातिभेद आहेच आणी नजिकच्या काळात देखील तो दूर होईल असं वाटंत नाही. वरीलपैकी काही प्रतिसादांवरून तरी असंच वाटतं.