मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हरवली पोर माझी कविता नावाची !

गणेशा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काय सांगु कहानी या वेड्या बापाची हरवली पोर माझी कविता नावाची ! कामाच्या ओझ्यामंधी भान हुतं गेल सरुन डोळ्यात टिपुस ना परि ओढ पोरी तुझीच तिथुन कारभारनीच तुकडं काही ग्वॉड लागना शेतांमधी पाटाच काही पाणी वाहिना वाटच्या धुळीसंग कोणी चालना चिमण्यांही आज कुठं दाणं टिपना सांगतो मी कहानी या वेड्या बापाची हरवली पोर माझी कविता नावाची ! दारातल्या अंगणात काही रात निजना पारिजाताचा सडा आज काही सांगना चंद्राची कोर बी कुठ दिसना आभाळाची माया आज काही बोलना उसवल मन आज इचार करवाना हरवली पोर माझी कुठ सापडना.. - शब्दमेघ ( ३ मार्च २०११) भाषेचे स्थान : बारामती २. नको बोलु बाबा काही :- http://www.misalpav.com/node/17097

वाचने 4696 वाचनखूण प्रतिक्रिया 13

पैसा गुरुवार, 03/03/2011 - 20:45
नवीन कविता दिल्याबद्दल अभिनंदन! माझा अंदाज बरोबर असेल तर तू वेगवेगळ्या बोलींमधे कविता देणार आहेस. बरोबर का?

In reply to by पैसा

गणेशा गुरुवार, 03/03/2011 - 21:09
पैसा ताई.. प्रथम धन्यवाद ... खरे तर तसे आधी ठरवले नव्हते पण छान वाटला तुझा रीप्लाय कारण आता तसाच प्रयत्न केला होता मी. कविता बोलतेय असे दाखवुन .. पण बाकीच्या बोली भाषेचे ज्ञान खुपच तोकडे आहे माझे त्यामुळे डिलीट केली कविता ( आधीच्या कंपणीत अकोल्याचा मित्र झाला होता त्याच्या भाषेत उत्तर होते ते (निशानी डावा अंगठा ह्या सिनेमात पण तीच भाषा वापरली आहे ) पण सगळीकडे व्यव्स्थीत येइना .. मग नाही लिहिले .. थोडीफार नगरी येते कारण शिरुर ला होतो ४ वर्षे ) वरील भाषा माझी बोली भाषा आहे .. म्हणुन लिहिली . आणि खरे म्हणजे कविता खरेच लिहिणे बंद झाले आहे ती भावना पण आहे.. आणि नाविण्यात आनंद आहे म्हणुन काहीतरी वेगळे असेच विरंगुळा म्हणुन .. येव्हडे लिहायला कारण की कोणी तरी त्यांच्या बोली भाषेत उत्तर द्यावे .. नगरी भाषेचा उल्लेख केला कारण नगरीनिरंजन यांनी वाचले तर दोन पुष्पे त्यांच्याकडुन येतील .. बघु ..

प्रकाश१११ गुरुवार, 03/03/2011 - 21:02
गणेशा - सांगतो मी कहानी या वेड्या बापाची हरवली पोर माझी कविता नावाची ! दारातल्या अंगणात काही रात निजना पारिजाताचा सडा आज काही सांगना एकदम भन्नाट कविता.कोठेतरी लपलेली व्यथा डोकावतेय हरवलेली पोर सापडल्याचा आनंद डोळ्यात पाणी आणतो. शुभेच्छा. !!.

राघव गुरुवार, 03/03/2011 - 22:27
तुमची कविता बघून अगदी लगेच सुचलेल्या काही ओळी खाली दिल्याहेत. अर्थात् हरवलेली अशी माझी कविता नाही. पण ती आतून स्फुरण्याची वाट बघत असतो. अन् सध्या माझी मुलगीही माझ्या जवळ नाही. तीच भावना इथं आलेली आहे... :) माझं आणि कवितेचं तसं बरंच जुनं नातं..पण.. गोजिरं म्हणता म्हणता उगाच मन खातं.. चुचकारावं, गोंजारावं, हळूच कवेत घ्यावं हृदयापासून साद आली तरच खरं उमलावं या सादेची वाट बघणं.. मोठं जहरी पातं गोजिरं म्हणता म्हणता उगाच मन खातं.. ये गं ये गं म्हणतांना जीव सारा कसनुसा मीच येतो म्हटले तरी, वाट.. तुटका वसा आस लावून बसल्यानं अंतर कमी होतं?? गोजिरं म्हणता म्हणता उगाच मन खातं.. आज जरी दूर तुझं गोजिरं रूपडं उद्या तरी येशील ना हळूच माझ्याकडं!! "तिघं" मिळून करू दंगा.. जम्माडी जम्मत! ;) ..कवितेशी गुंफलेलं आपलं गोड नातं!! राघव

In reply to by राघव

गणेशा Fri, 03/04/2011 - 11:25
आज जरी दूर तुझं गोजिरं रूपडं उद्या तरी येशील ना हळूच माझ्याकडं!! "तिघं" मिळून करू दंगा.. जम्माडी जम्मत! ..कवितेशी गुंफलेलं आपलं गोड नातं!! अतिशय सुंदर .. खुप छान लिहिले आहे राघव जी

नगरीनिरंजन Fri, 03/04/2011 - 13:51
काय सांगू कसं सांगू सुरुवात करू कुठून कविता लै हट्टी आमची बसली असंल हटून जवा मी येतो स्वच्छपैकी आंघोळ कधी करून तवा ही येती केस पिंजारत गावभर उंडारून जवा मी म्हण्तो आराम करावा थोडंसं पडून तवा ही बया ओढत म्हण्ती चल डोंगर चढून जवा मी बस्तो लपवत सल कडीकुलूप लावून तवा हळूच जवळ येती अन जाती मलम लावून. काय सांगू कसं सांगू सुरुवात करू कुठून बाहेर जाय्चं म्हण्ल्यावर बघ कशी निघाली नटून.

नगरीनिरंजन Fri, 03/04/2011 - 13:51
काय सांगू कसं सांगू सुरुवात करू कुठून कविता लै हट्टी आमची बसली असंल हटून जवा मी येतो स्वच्छपैकी आंघोळ कधी करून तवा ही येती केस पिंजारत गावभर उंडारून जवा मी म्हण्तो आराम करावा थोडंसं पडून तवा ही बया ओढत म्हण्ती चल डोंगर चढून जवा मी बस्तो लपवत सल कडीकुलूप लावून तवा हळूच जवळ येती अन जाती मलम लावून. काय सांगू कसं सांगू सुरुवात करू कुठून बाहेर जाय्चं म्हण्ल्यावर बघ कशी निघाली नटून.

अरुण मनोहर Sun, 03/06/2011 - 09:14
गणेशा, तुमची इतकी सुंदर कविता वाचायला जरा उशीर झाला. होता तो वेळ उगा काही धाग्यांवर भंकस वाचण्यात (आणि त्यात सामील होण्यास) केला, ह्याचे थोडे दु:खही वाटत आहे. मला वाटते प्रत्येक कविला अशा हुरहुरयुक्त क्षणांना सामोरे जावे लागतेच. आपल्याला सगळ्यात प्रिय असलेली ही जादुची छडी न जाणे का अशा वेळी दूर दूर पळते. तिला पकडायला आपल्याला वेळ देखील नसतो. तिच्या विरहाचे दु:ख असतेच, पण त्यापेक्षा कितीतरी जास्त बोच ह्याची असते, की आपण त्या प्रियेला जवळ घेऊ शकत नाही, केवळ आपल्या रुक्ष कारणांचा बडेजाव केल्यामुळे! हेच गणेशा तू सांगतोस- >> कामाच्या ओझ्यामंधी भान हुतं गेल सरुन डोळ्यात टिपुस ना परि ओढ पोरी तुझीच तिथुन आणि ज्या कामाचे कारण तुला दूर तिच्यापासून दूर ठेवते, त्या कामाला तरी तू पूर्ण न्याय देऊ शकतोस? नाहीच! >> कारभारनीच तुकडं काही ग्वॉड लागना शेतांमधी पाटाच काही पाणी वाहिना अप्रतिम. लिहीत रहा. तिला जास्त वेळ दूर ठेवलेस, तर रुसून नेहमीसाठीच लपून बसायची! जाता जाता- कोरीया मधे असतांना कामाच्या ओझ्याखाली माझी अशीच ओढाताण झाली होती. तेव्हाच्या काही तुकड्यांमधले वेचलेले कण असे होते- ------ रात्रीची दोन क्षणांची झोप दहा तुकड्यांमधे उरकल्यावर उद्या पुन्हा कर्म यज्ञात जळायचे असल्याची आठवण होतांना, धाडदिशी गाडीचे दार पराधीनतेच्या तोंडावर बंद करतांना, अचानक पूर्ण चंद्र दिसला होता मला. ताटलीत वितळलेले तांबे वाढून बसलेला. तो मला हसला हा भास होता, की वेड्यांच्या गदारोळात आपणही सामील झालो असण्याची खूण? -------

In reply to by अरुण मनोहर

गणेशा Mon, 03/07/2011 - 15:34
अरुण जी मनापासुन धन्यवाद .. कविता छान .. जर विषय आधी सांगितलेला नसता तर गुढ कविता ही म्हणता आले असते ह्या कवितेला ..