माझी मार्गाथा (नेक्श्ट)
माझी मार्गाथा http://www.misalpav.com/node/16640
पाचवीनंतर मी जवाहर नवोदय विद्यालयात शिकायला, हॉस्टेलला गेलो.. त्यानंतर मात्र आईने मार दिला नाही. मात्र नवोदयात आमच्या काड्या नी खोड्या करण्याला नवे धुमारे फुटले, आणि तिथे मास्तरांनी आम्हाला मस्तपैकी फोडले..
*************************************************************
नवोदयमध्ये दिवसाचे शेड्युल अगदी टाईट असते. (रात्रीच्या शेड्युलचा विचार करायचे ते वय नव्हते.. ;-)). सकाळी ५ ला उठून १० मिनिटांत मैदानात "फॉल-इन" व्हावे लागते. जर उशीर झाला तर आमचा पी.टी. मास्तर हातात छडी घेऊन किंवा नुस्ता हात (आभारः सूर्यपुत्र) घेऊन आम्हाला आमच्या बंकर-बेड मधेच झोडायला सुरुवात करायचा. (ह्या बंकर-बेड्सची पण एक गंमत होती. वरच्या बेड वर उभं राहीलं, तर फॅन बरोबर मानेपाशी यायचा. मग आम्ही हा फॅन हातानी अडवून बंद करायला शिकलो. सरळ बटन बंद करायला आम्ही काय सरळमार्गी नव्हतो. :-))
पी.टी. ६ वाजता सुटायची आणि असेम्बली साठी फॉल-इन होतं ७.१५ला.. मी ग्राऊंडवरुन आल्याआल्या सरळ ताणून द्यायचो. ७ वाजता उठून सरळ युनिफॉर्म घालून खाली तोंड धुवत उभे रहायचो. नजर समोर हाऊस-वॉर्डनच्या घराकडे.. ते बाहेर आले की पटकन तोंड धुवून, आंघोळीची गोळी घेवून, परत पळत दप्तर घ्यायचो. बरोबर हॉस्टेलच्या दारात गुर्जींना "गुडमॉर्निंग" करुन, भ्भो पळत सुटायचो ग्राऊंडकडे. तिथे पुन्हा पीटी मास्तर शिकारीला हजर असायचा. पुन्हा एकदा त्याच्याकडून शेक..
ह्या मारातुन वाचण्यासाठी मग मी असेम्ब्लीच्या दुसर्या भागाने शिरायला बघायचो.. काही दिवस मास्तरला कळलंच नाही, की मी तावडीत का सापडत नाहीये? मग तो पण दुसर्या बाजूला उभा रहायला लागलो... आठवीत मात्र आम्ही त्याचे बाप निघालो. आमच्या वर्गाच्या मागेच ही असेम्ब्ली असायची. त्याबाजुच्या खिडकीची एक सळी निघालेली होती. आम्ही काड्या करुन तिच्या बाजुची सळी कशीबशी वाकवली, आणि मग आमचा तो नवीन राज-दरवाजा झाला...
*************************************************************
नवोदयची स्थापना राजीव गांधींच्या काळात (१९८६ची शिक्षण पॉलिसी) झाली. त्यामुळे २० ऑगस्ट (सद्भावना दिन) ला फेरी-बिरी निघायची. आम्ही मारे बेशरमच्या काड्यांचे फलक बनवायचो. आठवीत असतांनाची गोष्ट...
फलक बनवल्यावर ते वर्गात ठेवण्याची जबाबदारी मला देण्यात आली. असेम्ब्ली नंतर फेरी निघणार होती. असेम्ब्ली झाल्यावर मी फलक घ्यायला गेलो, तर ते गायब... माझी तंतरली. एक तर हाऊस वार्डन आधीच भडकू होता, त्यातल्या त्यात राजीव गांधींच्या जयंतीला "राजीव हाऊस"च्याच हातात बोर्ड्स नाहीत म्हणजे काय?? मास्तरनी मला केस धरुन वाकवला. मी ओठ गच्च दाबून ओणवा उभा होतो. त्यानी बद्दकन माझ्या पाठीत बुक्की घातली आणि माझाच सुळा काच्चकन माझा ओठ फाडून आत घुसला !! टपटप टपटप रक्त सुरु... तेवढ्यात दुसरा एक मुलगा धावत आला, आणि त्यानी सांगितलं की त्यानेच बोर्डस दुसरीकडे हलवले होते...
"आपलेच ओठ नी आपलेच दात" म्हणजे काय ते आम्हाला त्या दिवशी कळलं.. ;-)
*************************************************************
खरा होलसेल मधला मार (धमु म्हणाला तसा) मी दहावीत खाल्ला. (पोरं अभ्यास करायचे नि मी चिं.वि. जोशी वाचायचो. इश्यु करत नव्हते तर नववीतल्या पोरांना इश्यु करुन घ्यायला सांगायचो.)
आमच्या नवोदयमध्ये चार हाऊसेस होती. राजीव, जवाहर, तिलक आणि सुभाष (आता नावं बदलली आहेत.) तर मी सुभाषमधल्या माझ्या मित्राला भेटून रुमवर येत होतो. लाईट नव्हती. आमचा वार्डन अंधारात रुमबाहेर उभा राहून पोरांच्या गप्पा ऐकत होता. मी जोरात त्याला विश केलं, "गुड इव्हिनिंग, सर". झालं. पोरं चुप झाली. मास्तरपण काही न बोलता निघून गेला.
दुसर्या दिवशी नाश्त्याच्या आधी मला तोच मित्र बेसीन जवळ भेटला. मी त्याला उत्साहाने सांगायला लागलो, "अबे, कल तेरेसे मिल के मै हाऊस पे वापस गया ना, तो भेकाड (मास्तरचे टोपणनाव) साला दरवाजे के पास छुप के पोट्टोंकी बातें सुन रहा था." मी हे करत असतांना माझा एक मित्र मला सारखा हटकत होता. मी आपला माझ्यात तारेत...
सांगून झाल्यावर मागून आवाज आला, "चिन्मय." मी मागे पाहतो तर खुद्द भेकाड तिथेच उभा !! माझी टर्राटर्रा टरकली.
मास्तर मला म्हणे, "नाश्ता झाल्यावर मला भेट." माझी हादरलेली... नाश्ता केला नाही. घड्याळ, चश्मा काढून मित्राजवळ दिला..
नाश्त्यानंतर मास्तरनी मला बोलावलं. मी गेल्यावर "हां, काय म्हणत होता तू मला? असेच चिडवता मला?" असं म्हणून गोल गोल फिरवत, इकडून तिकडे ढकलत मनसोक्त मारायला सुरुवात केली. पार धा-पंधरा फुटापर्यंत माझी वरात इथून तिथे नी तिथून इथे अशी सुरु होती. गोरा असलेला माझा हा मास्तर पार लाली-लाल होऊन गेला होता. मारुन मारुन थकल्यावर २०-२५ मिनिटांनी त्यानी मला "जा, बस वर्गात" म्हणून ढकलून दिले.
वर्गात गेल्यावर मित्रांनी मला "क्यु बे, बोहोत मारा क्या" वगैरे विचारायला सुरवात केली. (हलकट साले ! त्यांच्यासमोरच धुलाई सुरु होती तरी...) मी म्हणालो, " अबे मेरी छोड. वो भेकाड साला खुदईच इतना लाल हो गया था, कि सुई टोच दी होती तो सारा खुन निकल गया होता बॉडी से.." बेशरमपणाचे आणखी एक शिखर आम्ही त्या दिवशी सर केले. :tongue:
नंतर घरुन आई-पप्पांना बोलावण्याचा सोहळा झाला. पप्पांनी इतके कमी मारल्याबद्दल निषेध करीत आणखी फोडायला कसे हवे होते ते सांगितले. आईनी " नालायक कार्ट्या, गुरुजींना "शाकाल" म्हणतोस?" म्हणून शिव्या घातल्या. त्यावर मी आईला मास्तरला "शाकाल" नव्हे तर तर "भे़काड" म्हणत असल्याची माहिती दिली, आणि नंतर पुन्हा "भेकाड साला खुदको शाकाल बोलता है" म्हणत बोंबा ठोकल्या... ;-)
*************************************************************
ह्यानंतर एका बिनसुंदर पोरीच्या डेस्कवर "गुंफा रानी, बडी सयानी.. आजा आजा" असे लिहून आमच्यातल्या कवीला वाट करुन दिली. बायलॉजीच्या गुर्जींनी "साल्या, दुसर्यांच्या वर्गात येऊन पालथे धंदे करतोस" म्हुण हाणला.. (मास्तर तरुण आणि पोरगी बिनसुंदर असे कॉम्बी असल्याने थोडक्यात आटपलं, नाहीतर वाट लागली असती...)
*************************************************************
नवोदयनंतर मात्र आमची मार्गाथा खुंटली. कॉलेजात बरेच उद्योग केलेत, पण हॉस्टेलाईट असल्याने कोणी कधी भिडला नाही. पोरींनी (बर्याचदा मध्यस्थीत) "माझा भाऊ खुप टेरर आहे. तो त्याचे मित्र घेऊन येईल" असं काही सांगितलं तर "चल वट बे, तुझा भाऊ खुपच खुप १५-२० जण आणेल. आम्ही ऐंशी जण आहोत हॉस्टेलवर" असं म्हणत त्यांच्यावर (म्हणजे त्याच्या टशनवर ; गैरसमज नको) गार पाणी वतायचो.. :-)
********************* शं पा *******************************
प्रतिक्रिया
लई भारी......
शाकाल चा किस्सा वाचुन खुप हसु
ए वन
>>> आंघोळीची गोळी घेवून, परत
'' गुंफा रानी ची कविता लई
धमाल!!!!
छान.
हा हा हा!!!
किडा...