Skip to main content

प्रजासत्ताक (?) दिन

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 26/01/2011 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रजासत्ताक दिन. आज त्याचा आनंद आपण साजरा करणार. पण काल एका दिवसभरातील ह्या बातम्या वाचल्या ऐकल्या तर वाटते काय चालले आहे देशात. खरंच प्रजेची सत्ता आहे का आपल्या देशात? तसे म्हणायला प्रजेचीच सत्ता आहे पण ती सामान्य प्रजा नाही तर फक्त ’त्यां’च्या मर्जीतील प्रजा. ते कोण सांगायची गरज वाटत नाही. सर्वांनाच माहित आहे. ह्या एकाच दिवसात घडलेल्या गोष्टी आहेत. २५ जाने २०११. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. वास्तविक त्या कधीही घडल्या असत्या तरी त्यांची तीव्रता तेवढीच राहीली असती. पण एक दिवस आधीच घडलेल्या असल्याने प्रजासत्ताकावर मोठे प्रश्नचिन्ह दिसतेय. पहिली गोष्ट तशी लहान वाटते, पण हळू हळू अशाच गोष्टींची शेवटच्या गोष्टीमध्ये परिणती व्हावयास वेळ लागणार नाही अशीच भीती वाटते. प्रश्न हा ही पडतो की जर अधिकार्‍यांवर हल्ले होऊ शकतात तर आपण सामान्य लोकांचे काय? अजून एक घटना: आरूषीच्या वडिलांवर हल्ला कोणत्याही गोष्टी बदलायच्या असतील तर लहान गोष्टींपासून सुरूवात करावी लागते. समजा लहान गोष्ट घेतली की रिक्षाचालकांच्या मनमानीचा आपण काही विरोध करायला गेलो तर त्यांच्यापुढेही एकदोघांचे काही चालत नाही. तिथे मोठा गट पाहिजे किंवा एकत्रित दबाव. पण इथेही आजकाल भीती वाढत चाललीय. काही महिन्यांपुर्वी कागदपत्रे मागणार्‍या एका वाहतूक पोलिसाला मारल्याची घटना घडली होती. त्यामुळे सामान्य माणूस ह्यातही विरोध करण्याआधी विचार करायला लागतो, मी त्या फंदात का पडू? सरकारमध्ये असणारे नेते आणि मंत्री ह्यांबाबत तर आता काही बोलायलाच उरले नाही. काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणतात, "तुम्ही तिरंगा फडकवला आणि काही झाले तर आम्ही जबाबदार नाही". कसाब आणि अफजल गुरू ह्यांबाबत अजून निर्णय घेण्यात वेळ लागतो. त्यांना काही कमी पडणार नाही ह्याची खात्री केली जाते. प्रधानमंत्री, अर्थ मंत्री म्हणतात की काळा पैसा असणार्‍यांची नावे सांगणार नाही. नारायण राणेंनी मोठ्या आवेशात सांगितले होते की "किती मंत्र्यांचे अतिरेक्यांशी संबंध आहेत ते मला माहित आहे आणि मी ती नावे उघड करेन" अजून ती नावे समोर आली नाहीत की कोणी त्याचा पाठपुरावा केला नाही. २ वर्षांपूर्वी दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री शीला दिक्षित म्हणाल्या होत्या की "मुलींनी/स्त्रियांनी रात्री बाहेर पडायला नाही पाहिजे" सीबीआय तर काय एक एक प्रकरण पुरावे नसल्याच्या कारणाने बंदच करीत चालले आहेत. ही काही ठळक उदाहरणे आहेत. हे असे जर मुख्य, जबाबदार नेते जर जबाबदारी झटकायला लागले तर वरील गोष्टी होतच राहणार आणि आपण फक्त प्रजासताक दिनाचे, स्वातंत्र्य दिवसाचे गुणगाण गायचे का? मला इथे काय करावे हे सांगायचे नाही आहे. कारण ते सुचत नाहीच आहे आता. सध्या फक्त प्रश्नच आहेत. की हे कधीपर्यंत चालणार? आपण कसे ते थांबवायचे? प्रजासताक दिनाबद्दल माहिती शोधताना काही लेख दिसले. विचार करण्यासारखे.

वाचने 3699
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

'आम्ही देतो आमचे लोकप्रतिनिधी निवडून? तसे असते, तर निवडणुकीच्या आदल्या रात्री लुगडी, धोतरजोड्या, दारू आणि पाचशेच्या नोटा वाटण्याची गरज का पडली असती? बरे, दारोदार फिरून मतांचा जोगवा मागणारे हे दास हनुमान मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी वीर हनुमान का बनतात? पुढची पाच वषेर् ते कुठे गायब होतात? ते पोलिस स्टेशनात गंुडांना जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करताना आणि बिल्डर्सबरोबर एफएसआय वाढवून घेण्याच्या योजना आखतानाच का दिसतात? मुंबईत प्रलय झाला, तेव्हा ते कुठल्या बिळात शिरून बसतात? आणि अतिरेक्यांचा हल्ला झाला, तेव्हा तोंडे का लपवतात? ते प्रजेसाठी कारभार करतात, तर यूएलसीचा कायदा बहुमताच्या जोरावर कसा संमत होतो? आणि एका भ्रष्ट न्यायमूतीर्विरुद्धच्या अभियोगाच्या कारवाईविरुद्ध मतदान कसे होते? 'पोटा'चा आवश्यक कायदा केवळ राजकारण म्हणून बहुमताच्या जोरावर कसा रद्द होतो? संसद भवनावर हल्ल करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी लोकप्रतिनिधी आग्रह धरत नाहीत पण स्वत:चे वेतन व भत्ते वाढवण्याची विधेयके कशी बिनविरोध संमत होतात? लोकसभेत सर्वांसमक्ष नोटांची बंडले ओतली जातात, तरी दोषी कोण याचा पत्ता मात्र लागत नाही... ही सगळी प्रजेच्या राज्याची लक्षणे आहेत का, बाबा?' प्रजासत्त्ताक चिरायु होवो असे खुप म्हणावेसे वाटले तरी वर उल्लेखलेले सगळे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात कायमच गर्दी करत असतात...प्रजासत्ताकदिनाच्या पुर्वसंध्येला एका सचोटीने आपले कर्तव्य पार पाडणार्‍या कार्यक्षम व सच्च्या अधिकार्‍याची कर्तव्य बजावत असताना दिवसाढवळ्या जिवंत होळी पेटवली जाते .....आणि हतबल प्रशासन फक्त त्याकडे निर्जिव व हताशपणे बघत राहते.. नेते व मुख्यमंत्री फक्त कारवाईचा आदेश दिला असे सांगत स्वत्:ची जबाबदारी पार पाडल्याचा आव आणतात...केवळ राजकारण म्हणून व कुणाच्यातरी भावना दुखावल्या जातील या कारणास्तव जम्मूकाश्मिर मधे तिरंगा यात्रेला व तिरंगा फडकवण्याला विरोध केला जातो.... आंतरजालावर तिरंगा यात्रेवर चर्चासत्र पार पडतात व त्यामधे स्वत:ला विचाररवंत म्हणवणार्‍यांची वैचारिक दिवाळखोरी अधोरेखित होताना दिसते....एखाद्या ठराविक पक्षाची विचारसरणी अंगिकारली म्हणून निव्वळ अखंड हिंदुस्थानचा अविभाज्यभाग म्हणवल्या जाणार्‍या जम्मूकाश्मिर मधे विरोधी पक्षामार्फत सुरु करण्यात आलेल्या युवकांच्या मोहिमेला अखंड हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकाचे व स्वातंत्र्याचे प्रतिक असलेला तिरंगा झेडा फडकवण्यास विरोध करताना सभासद दिसतात तेंव्हा त्यांची किव येते इतकच......देशाबाहेर राहताना आपापल्यापरीने प्रजासत्ताकदिन साजरा करण्याचा प्रयत्न करताना प्रत्येक स्वाभिमानी व देशाभिमानी नागरिक करताना दिसतो .....देशाबाहेर मोठ्या होणार्‍या हिंदुस्थानच्या नव्या पिढीसमोर जे हिंदुस्थानचे चित्र येते आहे ते नकारात्मक आहे त्यामुळेच आईवडिलांनी कितीही राष्ट्रप्रेम ,देशाभिमान तत्सम भावना आपल्या पाल्यांनी देखिल जोपासाव्यात यासाठी अट्टाहास करत जिवाचा आटापिटा केला तरी वयात आलेल्या मुलांचे प्रश्न वर नमुद केल्या प्रमाणेच असतात....या विवंचनेतुन हिंदुस्थानात राहणारे पालक देखिल सुटले नाहीत .... अवांतर्---सध्या ज्या देशात वास्तव्यास आहे त्या देशाचा येत्या २५ फेब्रुवारीला लिबरेशन डे साजरा होतोय त्यापार्श्वभुमीवर तेथिल सरकारने माणशी हजार कुवेती दिनार देशातील स्थानिक नागरिकांना सढळहस्ते वाटलेत .... 1,000 Kuwaiti Dinar = 165,417 Indian Rupee ..अर्थात आता सगळे म्हणतील त्यांच्याकडे तेलाचा काळा पैसा आहे .पैसा ढिग असेल पण तो देशाच्या नागरिकांना वाटण्याइतपत इच्छाशक्ती आणि दानत देखिल असायला हवी ..इथे सहसा स्थानिकांची कुटुंबे मोठीच असतात .सरासरी १० माणसे प्रत्येक घरात ...पैसा हातात आल्यामुळे सध्या इथे सगळे मॉल्स व शाँपिग सेंटरस मधे स्थानिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली आहे... या विरुद्ध चित्र भारतात दिसतय लोकांचा पैसा कसा स्विस बँकांमधे धनदांडग्यांनी दाबुन ठेवलाय आणि तो परत आणण्यात सरकारची अनास्थाच दिसते आहे.... हि परिस्थिती कधीतरी(?)बदलेल असा आशावाद बाळगायला हरकत नाही ......आणि म्हणुनच प्रजासत्ताक चिरायू होवो असे म्हणत देशबांधवांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा!

In reply to by अनामिका

जम्मूकाश्मिर मधे विरोधी पक्षामार्फत सुरु करण्यात आलेल्या युवकांच्या मोहिमेला अखंड हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकाचे व स्वातंत्र्याचे प्रतिक असलेला तिरंगा झेडा फडकवण्यास विरोध करताना सभासद दिसतात तेंव्हा त्यांची किव येते. लोकांचा पैसा कसा स्विस बँकांमधे धनदांडग्यांनी दाबुन ठेवलाय आणि तो परत आणण्यात सरकारची अनास्थाच दिसते आहे.... ख्ररे आहे रे बाबा तुझे म्हणणे.

In reply to by अनामिका

योग्य मुद्दा मांडला तू अनामिका मी १ वर्ष अबू धाबी मध्ये होतो . तेलाचा पैसा हा हा त्यांच्या नशिबाचा भाग आहे . तसे भारताला सुजलाम सुफलाम भूमी लाभली आहे . त्याहून सुपीक जमीन पाकिस्तानी पंजाब मध्ये आहे . पण राज्यकर्त्यामध्ये दानत लागते . येथे राजेशाही आहे .पण प्रजेवर मुलासारखे प्रेम करणाऱ्या राजावर जनता जीव टाकते .आखतात सर्वात जास्त तेल भांडार हे सौदी नन्तर माझ्या मते इराक व इराण कडे आहे .पण राज्यकर्ते स्वताच्या महत्वाकांशेपायी जनतेच्या नशिबी हालाकीचे जीवन देतात .तेच आपल्या भारतीय खेड्यातील जनतेच्या नशिबी भोग आहेत (एकेकाळी ह्या देशातून सोन्याचा धूर निघायचा ) येथील भूमिपुत्रासाठी अनेक सोयी आहेत . येथील जनता लोकशाही नसल्याने कदाचित परराष्ट्र धोरण देशाचे काय असावे ह्याबाबत स्वताचे मत देऊ शकत नाही (मनात असून फिलीस्तानी बांधवाना मदत करू शकत नाही ) पण ह्याने त्यांच्या रोजच्या जीवनात काहीही फरक पडत नाही .एक उत्तम प्रतीचे आयुष्य जगतात .( बाकी लोकशाही असलेल्या देशात किंवा अमेरिकेत तरी सामान्य नागरिक परराष्ट्र धोरणात आपले मत मांडतो .पण त्याचा काही उपयोग होतो का ? ). चीन वर टीका करायची एक ट्रेड आपल्याकडील बुद्धीजीवी व अमेरिकन खुश मस्कारायांकडे आहे कि मानवी हक्काची पायमल्लि ...... माझ्या पाहण्यात लंडनला शिकायला सोबत असलेले चीनी मुळे मुली स्वताच्या देशाच्या प्रगतीबद्दल प्रचंड अभिमान बाळगून आहेत . प्रगत शहर म्हणजे काय हे एका चिंकीने मला तिचे जन्मगाव शांघाय दाखवून प्रचंड न्यूनगंड दिला .आज तेथील जनता एका इर्षेने झपाटून पुढे जात आहे .एक राष्ट्र म्हणून आपले तथाकथित लोक लोकशाहीची राजकारण्यांनी घातेलेली उत्तर पूजा पाहूनही .डोळे मिटून तिचे गुणगान करतात . देश प्रगती करतोय .पण देह चीत्याचा पण वेग कोंबडीचा अशी अवस्था आहे आपल्या देशाचि .गुजरात मध्ये भाजप व आंध्र मध्ये कोन्ग्रेज ( गाव पातळीवर ) प्रगती करतोय . असे वाचून आहे . बाकीच्या राज्यातील जनतेने काय पाप केले आहे .

लेख आवडला देवदत्त. तुझ्या मतांशी सहमत आहे. म्हणुनच स्वतःहुन कुणाला आजच्या दिवशी शुभेच्छा द्यावाश्या वाटत नाहीत. एकीकडे आर्थिक महासत्ता होण्याची नुसतीच स्वप्न पहाणारा आणि मिडियातुन तसा निव्वळ प्रचार करणारा आपला देश उलट्या दिशेने प्रवास करतोय अशीच चित्रं दिसतायत सध्या.

म्हणुनच स्वतःहुन कुणाला आजच्या दिवशी शुभेच्छा द्यावाश्या वाटत नाहीत मलाही असेच वाटते .

देवदत्त, तुम्ही लेखात म्हटल्याप्रमाणे खरंच सगळ्या देश उदासीन झाल्यासारखा वाटतो आहे. अभिमान बाळगावा अशी कोणतीच गोष्ट होत नाही असं नाही पण तुम्ही वर सांगितलेल्यां आणि तत्सम घटनांमुळे अभिमान झाकोळून फक्त उद्विग्नता शिल्लक उरली आहे. सर्व भारतीय नागरीकांना निर्भयतेचे वरदान मिळो हीच ह्या प्रजासत्ताक दिनी ईश्वरचरणी प्रार्थना.

In reply to by मराठे

खरे आहे ! हा दिन भारतीय कायम आपल्या मनात ठेवतील. आजचा दिनच वेगळा. एरवी व्यक्तिगत मेल बॉक्स मध्ये शुभेच्छांचा पाउस पडतो. पण आज मेल बॉक्स सुद्धा उदास दिसला.

कुठे तरी वाचलं होतं, "चर्चिल म्हणाला होता: की इंडिया अजुन स्वातंत्र्य भोगण्यास तयार नाही"... ह्याचा अर्थ मी त्याचा चाहता वगैरे नाही..सो इथे तो वाद नकोच. पण ह्या देशाचा आम्हाला इतका अभिमान वाटायचा त्या देशात असले प्रकार बघुन हाच का तो माझा भारत देश असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही...अभ्यासाखातर जेव्हा आपण नॅशनल जिऑ. वरच्या डॉक्युमेंटरीज पहातो तेव्हा कळतो की ज्यांना आपण बारबेरीयन्स म्हणतो त्यांनी आपापले देश कीती सुस्थीतीत ठेवले आहेत आणि ज्याची आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही (डेमॉक्रसी) म्हणुन शेखी मिरवतो त्या देशाची अवस्था आज कुत्रंसुद्धा खाणार नाही...शुभेच्छा कसल्या डोंबलाच्या देणार? - वाटाड्या...

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार. काल सकाळी ह्या बातम्या वाचल्यावर नकारात्मक विचारच समोर आले. प्रजासत्ताकाचा आनंद मानावा असे नव्हते वाटत. :( (दुरूस्ती: २५ जाने २०११. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. हे वाक्य २५ जाने २०११. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी असे हवे होते. पण टंकनाच्या आणि मग नजरचुकीने राहून गेले)

देवदत्त यांनी दिलेल्या बातम्यांनी विषाद वाटतो, हे खरेच आहे. सुधारण्यासारखे खूप आहे, त्याच्याबाबत डोळेझाक नकोच. पण असे करताना सुक्या-मेल्या सारणासह जिवंत-ओला वृक्षच आपण जाळून टाकायला नको. प्रजासत्ताक मुळीच नव्हते, आणि स्वातंत्र्य मुळीच नव्हते, त्या वेळी सत्ताधीशांची मुजोरी होती, त्यातील काही भाग मर्यादित-स्वराज्यामुळे (म्हणजे आता पूर्ण स्वराज्य नाही हे मान्य), आणि मर्यादित-प्रजासत्ताक शासनामुळे (म्हणजे आता थोडा कमी झाला आहे. आज मर्यादित स्वातंत्र्य आणि मर्यादित प्रजासत्ताकसुद्धा नाही, अशी हताश धारणा आपण अंगीकारली, तर ही वाट सोडून आमूलाग्र नवी कुठली शासनपद्धती चोखळण्याबद्दल विचार आपल्या पुढल्या पिढीला येऊ लागतील. आणि आपल्याला मार्ग हवा आहे, तो प्रजासत्ताक मुळापासून उपटण्याचा नव्हे! तर या वृक्षाला जिवंत ठेवून त्याला पोखरणारी वाळवी नियंत्रित करायचा मार्ग हवा आहे. अर्थात प्रजासत्ताक शाबूत ठेवून टीका करायची असेल, तर जितकी तिखट आणि जहाल टीका केली, तितकी चांगलीच. आणि तशा प्रकारे टीका करायला, चळवळ करायला, कायदेशीर क्रांती करायला आपली राज्यघटना मुभाच देत नाही, तर प्रोत्साहनही देते.