चार्वाक - एक न-दर्शन
चार्वाक या दर्शनाला थोडंसं झुकतं माप देण्याचा एक ट्रेंड दिसतो. या दर्शनाला बंडखोर दर्शन मानले जाते. भाकडकथांवर विश्वास न ठेवणारे, परलोक न मानणारे, केवळ प्रत्यक्ष प्रमाण मानणारे, शब्दप्रामाण्यावर विश्वास न ठेवणारे असे हे दर्शन आधुनिक वैज्ञानिक विचारधारेशी मिळतेजुळते आहे असे अनेकांना प्रथमदर्शनी वाटते. (भोंदू) वैदिक विचारांवर आघात (!) करणारे दर्शन म्हणून ब्राह्मणेतर (ब्राह्मणविरोधी) मंडळींमध्ये या दर्शनाविषयी प्रेम दिसते. जातीपातींचा विचार सोडून दिल्यासही एकूणच सुशिक्षित वर्गामध्ये अंधश्रद्धेच्या ठाम विरोधात असलेल्या या दर्शनाविषयी सॉफ्ट कॉर्नर असतो. त्यामुळे सहसा रॅशनल वगैरे लेखन करणारी माणसे चार्वाकाला विरोध करताना दिसत नाहीत. रादर चार्वाकाला भारी म्हणणे फॅशन आहे.
खरे तर या लेखातला बराच भाग हा प्रतिसाद (श्री शरद यांच्या धाग्यावरचा) आहे. पण हा केवळ प्रतिसाद न राहता माझे वेगळे मत बनल्याचे लिहिताना मला जाणवले, त्यामुळे हा प्रतिसादवजा वेगळा धागा काढत आहे. श्री शरद यांचा मूळ लेख इथे आहे.
अगोदर प्रतिसाद लिहिला आहे. शेवटी माझे मत मांडले आहे.
(१) हे तर्कसंगत वाटत नाही... वेदकालीन ऋषींना/विचारवंतांना दुसर्याचे विचार पटले नाहीत तर खंडन-मंडन पद्धतीने वाद घालावयाची पद्धत मान्य होती.म्हणून वेदकाळापासूनच वेदविरोधी विचार (उदा. उपनिषदे) मान्य केली गेली. त्यांच्याबद्दल योग्य तो आदरही दाखविण्यात आला. पण पुराणे-बौद्ध यांचा विरोध तसा नव्हता. त्यांना जनसामान्यांना, विचारवंतांना नव्हे, "लोकायत चूक" सांगावयाचे होते. जवळचे उदाहरण द्यावयाचे म्हणजे तो "भांडारकर संस्थे"वरचा हल्ला होता. ऋणं कृत्वा धृतं पिबेत् असा खोटा उल्लेख माधवाचार्यांनी केला तो ही याचेच द्योतक.एका वेळी तुम्ही म्हणता प्राचीन भारतात ग्रंथ जाळण्याची परंपरा नव्हती. पुढे भांडारकर संस्थेवरच्या हल्ल्याचा दृष्टांत देता. म्हणजे अगोदर म्हटलेल्याच्या विरोधी विधान. माधवाचार्यांच्या खोट्या दृष्टांतावर देखील मी बोललेलो आहे. असा एखादा विकृतीकरण केलेला श्लोक सामान्यीकरण करता येणार नाही. असे बरेच विकृतीकरण अनेकांनी आपल्या विरोधकांचे केलेले आहे. लोकायतावरच असला “अन्याय” झालेला आहे, आणि लोकायत त्याला बळी पडले असा एक्स्लुझिव्ह निष्कर्ष त्यातून निघू शकत नाही. पुराणे, बौद्ध यांनी कडाडून विरोध केला लोकायताला, मान्य. भिक्कूंनी लोकायत वाचू नये म्हटले, मान्य. इतरांना लोकायत वाचायला मनाई नव्हती ना? ग्रंथ जाळले गेले नाहीत ना? मग लोकायताचा अभ्यास बंद कसा काय पडला, हा माझा प्रश्न आहे. सगळेच लोक पुराणे, बौद्धांना मानणारे खचितच नव्हते. लोकांना मान्य असणारे ते लोकायत. असे लोकायत कसे काय पडद्याआड गेले, हा माझा प्रश्न आहे. ग्रंथ जाळले नाहीत. अभ्यास बंद पडला. म्हणजे, लोकायत मानणारे कन्व्हर्ट झाले असे म्हणायचे का? ते तसे कन्व्हर्ट का झाले? काही पटल्याशिवाय झाले का? की त्यांना स्वत:ची बुद्धी वापरता येत नव्हती? कन्व्हर्ट झालेच कसे? परलोक न मानणारे इहवादी एकदम भाकडकथा कसे काय मानू लागले? फक्त प्रत्यक्ष प्रमाण वापरणारे अचानक इतर (उपमान, अनुमान, शब्द) प्रमाणे कसे काय मानू लागले? काही अल्पसंख्य नसतील झाले कन्व्हर्ट. पण त्यांचे ऐकणारे कुणीच राहिले नाही? आश्चर्य नाही वाटत? बरे, एवढे उल्लेख आहेत, तर असा कुठे उल्लेख आहे का, की लोकायत अभ्यासणारे लोक आजकाल राहिले नाहीत बुवा, गेले ते दिवस, आता पुस्तकं पण मिळेनात; अशा प्रकारचा? इतर दर्शने उतरतीला लागली त्याचे स्पष्ट संदर्भ आहेत. लोकायताचे नाहीत.
(२)कशावरून असा सन्मान दिला गेला होता. बृहस्पतीचा काळ कोणता ? बृहस्पती हा सुरगुरू. फार पुरातनकाळचा. कौटलीय अर्थशास्त्र, पाणिनी याची उदहरणे दिली आहेतच. "सांख्य योगो लोकायतं चेत्यान्वीक्षिकी" असे कौटिल्य म्हणतो; आन्विक्षिकी म्हणजे तर्कशास्त्र. सांख्य व योग ह्या दोन महत्वाच्या दर्शनांच्या पंक्तीत लोकायताला बसविले आहे. महाभारतातील आणखी एक उदाहरण घेऊ. गंगेने जन्माबरोबर भीष्माला स्वर्गात नेले होते व त्याच्या शिक्षणाची सोय तेथे केली होती. ती भीष्माला शंतनूच्या हवाली करतांना सांगते त्यात "याला बृहस्पतीनीती माहीत आहे" असे आवर्जून सांगितले आहे. एकदा बृहस्पती इंद्रावर रागावून असूरांकडे जातो. त्यावेली ब्रह्मदेव देवांना संगतो की "बृहस्पतीनीती तुमच्याकडे नाही, असूरांकडे आहे; तेव्हा ते तुम्हाला वरचढ झाले आहेत". या सन्मानाच्या सर्व गोष्टी बुद्धपूर्व.सुरगुरु (हे सुर कोण?), स्वर्ग(म्हणजे काय, कुठे?), गंगा (म्हणजे कुणी मानव स्त्री की नदी? बाकीची माणसे मेल्यावर स्वर्गात जायची, ही मंडळी जिवंतपणीच ये जा कशी काय करायची?), इंद्र हा काय प्रकार आहे? ही मंडळी, ही ठिकाणे, या घटना बुद्धपूर्व होत्या का? यात काही ऐतिहासिक तथ्य आहे का? असो. महाभारत (तुमच्या म्हणण्याप्रमाणे) इसपू २-३ शतके या काळातले. अगदी त्या काळात या कथा लिहिल्या गेल्या असे समजले, तरी हे उल्लेख बुद्धपूर्व होत नाहीत. दुसरे असे, की लोकायत या कथांना भाकडकथा मानतील. अॅतण्ड व्हाइस व्हर्सा. भाकडकथा मानणारे/ लिहिणारे, लोकायताचा उल्लेख सन्मानाने कशाला करतील? तर सन्मानाचे स्थान होते हे दाखवून देण्यासाठी केवळ (सन्माननीय) उल्लेखाचे संदर्भ देणे पुरेसे नाही. ते दर्शन स्वीकार्य होते, असे दिसले पाहिजे. की हे दर्शन केवळ बाउंसिंग बोर्ड म्हणून वापरले जात होते? बृहस्पतीनीति माहीत असणे आवश्यक, कारण ते खोडून काढणे आवश्यक, असे तर नव्हते? खोडून काढणे आवश्यक म्हणजे लगेच सन्माननीय होत नाही. यात सहिष्णुता दिसते, अभ्यासाची शिस्त दिसते, प्रत्येक मताचा आदर करण्याची वृत्ती दिसते. असे असे विचार अमुक अमुक विचारधारा मांडते, ते असे असे खोडून काढता येतात, हे दाखवण्यासाठी लोकायताचा उल्लेख अनिवार्य ठरतो. ते दर्शन फार श्रेष्ठ आहे, म्हणून नव्हे. लोकायताने कुठलेच दर्शन खोडलेले नाही. फक्त वेद मूर्खंची बडबड आहेत असे म्हटले आहे. यात कसला दार्शनिक विचार आहे? ग्रंथ लुप्त झाले म्हणे. लिहून ठेवलेले नसताना वेद ज्या देशात लुप्त झाले नाहीत, तिथे लोकायतांचे (नसलेले) ग्रंथ लुप्त झाले! (हे म्हणजे आमच्याकडे ते विमान बनवणारे, अणुभट्ट्यांची डिझाइन असणारे ग्रंथ होते, ते लुप्त झाले असे म्हणण्यासारखे आहे. रामायणात पुष्पक विमानाचा सन्माननीय उल्लेख येतो म्हणजे ते विमान असणारच ना, त्या विमानाचे मॅन्युअल उपलब्ध नसले म्हणून काय झाले, लुप्त झाले काळाच्या ओघात, असे म्हणल्यासारखे आहे.) [बृहस्पतीनीतिविषयी एक वेगळी कथा वाचण्यात आली आहे – असुरांना अध्यात्मविद्येपासून वंचित ठेऊन खच्ची करायचे कारस्थान म्हणून बृहस्पती इंद्राशी भांडल्याचे खोटे नाटक करुन असुरांकडे गेला, आणि त्यांना लोकायत शिकवले, आणि हेच खरे दर्शन, मी देवांना शिकवण्याऐवजी तुम्हाला सांगतो, असे म्हणाला. असुरांना ते खरे वाटले, इत्यादि. ]
(३) वेद इहवादी नाहीत. असे बघा वेदातील परलोक, स्वर्ग हा मोक्ष नव्हे की जेथून परत यावयाचे नाही. तुम्ही स्वर्गात जाता, तेथील सुख भोगता व परत मृत्युलोकात येता. म्हणजे पृथ्वी-स्वर्ग यातला फरक काय ? तुम्ही धारावीतील झोपडपट्टीतून आदर्शमधील एकतिसाव्या मजल्यात रहावयाला जाता. क्रेडिट संपले की परत धारावीला. दोहोतील फरक म्हणजे फक्त सुखातला तरतम भाव. माहीत आहे ? धर्मार्थकाममोक्ष यांपैकी धर्मार्थकाम ही त्रयीच वेदकाळी होती.लेखात इहवाद आणि भोगवादातला फरक स्पष्ट केलात. पण इथे तुम्ही तीच गल्लत करताय. वेद सुखाची कामना करतात, इथे आणि परलोकात, म्हणजे, (फारतर) भोगवादी होतील; इहवादी नाही. इहवाद म्हणजे, “नो परलोक, पिरियड”. मोक्ष कल्पना नाही वेदांत, म्हणजे इहवाद होत नाही. परलोक कल्पना आहे ना? भोगासाठी का होइना, मोक्षासाठी नसेना का, परलोक आहे. म्हणजे इहवाद नाही. इहवाद फक्त लोकायतामध्येच आहे. वेदकाळी त्रयी होती असे म्हणता ना, धर्म, अर्थ, काम, बरोबर? लोकायत धर्म कुठे मानते? फक्त अर्थ आणि काम मानते. धर्म मानत नाही, परलोक मानत नाही, मग ते वेदाच्या विचारसरणीबाहेरचे कसे काय होत नाही?
(४) "लोकायत हे वेदांच्या विचारसरणीच्या बाहेरचे कारण लोकायत इहवादी" हे पटत नाही.वर लिहिले आहे. माझे मत – लोकायत हा जनसाधारणांचा दृष्टीकोन आहे. ज्याने कुठल्याच दर्शनाचा अभ्यास केलेला नाही, अशा साधारण विचारी व्यक्तीला काय वाटेल, असा तो दृष्टीकोन आहे. सकृद्दर्शनी कॉमन सेन्सला पटतील असे मुद्दे मांडलेले असल्याने हे दर्शन आकर्षक (मधुर वाणीचे – चार्वाक) वाटते. धर्म (पुरुषार्थ अशा अर्थाने) नावाची भानगड नाही. (बाय द वे, देव मोडीत काढणारे लोकायत एकमेव दर्शन नाही. धर्म आणि मोक्ष मानणारे बरेच आहेत, जे ईश्वर संकल्पना फेटाळतात, किंवा अनावश्यक समजतात, किंवा ईश्वराला वन अमंग मेनी असे सामान्य स्थान देतात.) डू’ज आणि डॊण्ट’स (वेगळ्या शब्दांत पुण्य-पाप) नाहीत. मेल्यावर काय होईल ही काळजी मोडीत निघते. जगणे एकदम सोपे होते. कुणी काही म्हणो, ते बंधनकारक नाही. कुणीच एवढा शहाणा नाही, की त्याने सांगितले आणि आपण डोळे झाकून ऐकले. काही कॉम्प्लिकेशन्सच नाहीत. डोळ्यांनी दिसते (ज्ञानेंद्रियांना जाणवते ते) तेवढेच स्वीकारायचे. पण अगदीच दुर्लक्ष करण्याइतके पण त्यातील मुद्दे टाकाऊ नाहीत. पण खोडून काढणेबल आहेत. म्हणून त्याचा उल्लेख. असा उल्लेख आहे, म्हणून ते एक बांधीव दर्शन आहे असा आभास होतो. लोकायत हे बांधीव दर्शन नाही. धर्म नसल्याने नीति नाही. नीतिला आधार हवा ना. चांगले का वागायचे याचे उत्तर नाही. बळी तो कान पिळी हे तत्त्व हानीकारक का, याचे उत्तर नाही. “जगणे म्हणजे काय”, हा प्रश्न कसा अनावश्यक आहे, याचे स्पष्टीकरण नाही. समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असा कोणताच विचार या दर्शनातून निघत नाही. दर्शन नाही, त्यावर आधारित संघटित धर्म (विशिष्ट डॉग्मा मानणारा गट अशा अर्थाने) नाही. त्यामुळेच, लोकायत दर्शन उपलब्ध नाही ते नाही, त्यावर आधारीत नीतिशास्त्रही उपलब्ध नाही. थियरी ऑफ एरर नाही. ज्ञानेंद्रिये चकवली गेली तर प्रत्यक्ष प्रमाणाचे काय करायचे याची क्लॅरिटी नाही. कार्यकारणभाव नाही. उपमान मानत नाहीत. अनुमान मानत नाहीत. काही प्रमाणात अनुमान मानतात, ते प्रमाण किती ते निश्चित नाही. इतर दर्शनांचा अभ्यास करता करता हे दर्शन आपोआप खोडले जाते. त्यासाठी वेगळे प्रयास घेण्याची गरज पडत नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खंडन-मंडनासाठी अर्धरथी / रथी
मी शिर्षक काहीतरी वेगळेच
उत्तम आढावा. माझ्या मनातले
चूक मान्य !
वाचत आहे..
योग्य विचार
या दृष्टीने 'लोकायत' प्रवाह
आपण भारतीय*/ पक्षी हिंदू
बापरे! दोन्ही बाजूंचे मुद्दे
श्री. रा. रा. आ. रा. जी, आपला
सहमत
बाकी, या विषयावर काही
टाळ्या.... एकदम मुद्देसूद
चांगला विषय
केवळ आपलेच मत आहे का कुठे
लोकायत, चार्वाक... दर्शन/न-दर्शन
थँक्स!
थोडी भर..
वेदांची अर्थहीनता
>>>मॅक्समुल्लरनेही वेद म्हणजे