Skip to main content

सावध रहा नकली खवा बाजारात आला आहे.

लेखक आप्पा यांनी शुक्रवार, 29/10/2010 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ बातमी : दिवाळीच्या तोंडावरच औरंगाबादसह लातूर, बीड, उस्मानाबाद, पुणे, धुळे येथून हजारो किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा बनावट खवा 'मेड इन गुजरात' असून देशभरात तो पोहोचवला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईनंतर उघड झाले असून गुजरातच्या आणंद येथील 'ऑनेस्ट डेअरी प्रॉडक्ट'ने हा खवा बनवला होता. आणंदहून खासगी ट्रॅव्हेलने दररोज नकली खवा येत असल्याची खबर मिळाल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी जालना रस्त्यावरील ट्रॅव्हल कंपनीवर छापा घालून १२४० किलो 'मिठास' खवा पकडला. अटक झालेल्या गोपालसिंग लज्जाराम पाल आणि राजूसिंग वैद्यसिंग पाल या दोघांच्या जबानीवरून ठिकठिकाणी छापे घालण्यात आले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील कोल्ड स्टोअरेजमध्ये दडवून ठेवलेला १६४० किलो खवाही पकडण्यात आला. या आरोपींच्या जबाबाआधारे गोरखपूर, फिरोजपूर, दिल्ली, मथुरा येथेही बनावट खवा सापडल्याचे औरंगाबाद गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. कांचन चाटे यांनी सांगितले. पुणे शहरात गुरुवारी चार छाप्यांमध्ये अडीच लाखांहून अधिक किंमतीचा २८०० किलो खवा पकडण्यात आला. अशा प्रकारची शहरातील ही पहिलीच कारवाई आहे. त्यापैकी मांगेलाल चिमणलाल चौधरी यांच्या दुकानातून जप्त केलेला खवा इंदूरहून आला होता. त्याशिवाय गुजरातहून आलेल्या दोन बसमधूनही १७५० किलो भेसळयुक्त खवा पकडण्यात आला. .................... गुजरातच्या 'ऑनेस्ट डेअरी प्रॉडक्ट'च्या खव्यात फक्त पाच टक्के दूध व बाकी रंग, बटाटे, हाडांचा चुरा, युरिया, आरारूट मिश्रण. किंचित हिरवट रंगाच्या या खव्यात पाणी टाकताच फेस होतो. बनावट खवा बनवण्यासाठी किलोमागे जेमतेम आठ-दहा रुपयांचा खर्च. खऱ्या खव्याचा भाव अडीचशे रु. किलो असताना बनावट खव्याची किंमत ऐंशी ते शंभर रु. आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11106
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

हे तर हिमनगाचे टोक असावे. काय काय आपण खात असतो ते समजत नाही.

आप्पा, खव्यात हाडांचा चुरा आणि अन्य काही पदार्थांची भेसळ होती अशी बातमी आमच्या औरंगाबादपासून सुरु झाली आणि आज महाराष्ट्रभर गुजरातचा बनावट खवा पोहचत होता अशीही बातमी वाचनात आली. च्यायला, बातमी वाचून गेल्या काही महिन्यात आपण ’गुलमंडीत’ [बाजारपेठेचे नाव] काय काय गोडधोड खाल्ले त्या आठवणीने मळमळल्यासारखे झाले राव. :( -दिलीप बिरुटे

१) असली/नकली खवा ओळखण्याची पद्धत कोणास माहित असेल तर इथे द्यावी. २) हा नकली खवा खाल्याने काय अपाय होतो हे जाणकारांनी नमूद करावे. ३) असा नकली खवेवाला सापडल्यास तातडीने कोणाकडे संपर्क करावा. सदर माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. जाणकारांनी जनहित रक्षणार्थ लागलीच ह्या विषयावर प्रकाश टाकावा. धन्यवाद.

In reply to by गांधीवादी

हाडांचा चुरा पोटात गेल्याने माणूस मरणार नाही पण युरिया पोटात गेला तर किडनी फेल होऊ शकतात. तसेच बरेचसे रंग हे विषारी असतात. वर्ख हा चांदीचा नसून अ‍ॅल्युमिनियमचा असतो तेंव्हा सावधान. मरायचं तर नॅचरल डेथने मरा, असे नको.

अरे वा. मस्तच. >>गुजरातच्या 'ऑनेस्ट डेअरी प्रॉडक्ट'च्या खव्यात फक्त पाच टक्के दूध व बाकी रंग, बटाटे, हाडांचा चुरा, युरिया, आरारूट मिश्रण. किंचित हिरवट रंगाच्या या खव्यात पाणी टाकताच फेस होतो. खुपच छान. आप्पा, यालाच काही लोकं प्रगती असे म्हणतात. प्रगतीच्या नावाखाली चांगल्या वाईट गोष्टी होणारच ना, वाईट गोष्टी घेऊ नका हव तर ;) असो, आणी बनावट खवा खाल्ला तर बिघडते कुठे, उलट माणसाची रोगप्रतिकारशक्ती वाढेलच ना. म्ग करु देत की भेसळ, मी तर म्हणतो की अधिकाधिक गोष्टींमधे भेसळ करुन वस्तु बनवाव्यात त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल आणि प्रगतीलाही हातभार लागेल.

मधे भेसळ हा रोजचाच प्रकार आहे. परंतू दिवाळी-दसरा या सारखे सण आलेत की हे प्रमाण वाढतं. दिवसें दिवस खवा/पनीर या पासून तयार होणार्‍या मिठायांचा खप वाढतच आहे आणि त्याच प्रमाणे ह्या प्रकारची मिठाई विकणारी दुकाने सुद्धा वाढतंच आहे. अशी वाढणारी दुकाने, दुकानातील वाढणारी ग्राहकांची गर्दी, मिठाईंचा खप बघून नेहमीच माझ्या मनात हा विचार येतो की एवढया मोठठ्या प्रमाणावर खवा/पनीर तयार करण्या करीता लागणारं दुध, तसेच दुधावर अवलंबून असणारी इतर उत्पादने जसे की, दही, श्रीखंड, लस्सी, ताक तसेच रोजच्या घरगुती वापरण्याकरीता लागणारं दुध हे सगळं विचारात घेतलं तर एकूण दुधाचं उत्पादन केवढं असायलं हवं? आणि खरंच एवढ्या मोठया प्रमाणावर दुध उत्पादन होतंय का? मला नाही वाटत एवढ्या मोठया प्रमाणावर दुध उत्पादन शक्य असेल आणि हे शक्य नाही तर अर्थातच दुधाची ही कमतरता भेसळ करूनच पुर्ण केली जात असणार. जेव्हा केव्हा मी खव्याची/पनीरची मिठाई खातो तेव्हा त्यात भेसळ असेलच हे गृहीत धरूनच खातो :)

In reply to by समंजस

>>एवढया मोठठ्या प्रमाणावर खवा/पनीर तयार करण्या करीता लागणारं दुध, तसेच दुधावर अवलंबून असणारी इतर उत्पादने जसे की, दही, श्रीखंड, लस्सी, ताक तसेच रोजच्या घरगुती वापरण्याकरीता लागणारं दुध हे सगळं विचारात घेतलं तर एकूण दुधाचं उत्पादन केवढं असायलं हवं? आणि खरंच एवढ्या मोठया प्रमाणावर दुध उत्पादन होतंय का? मिठाईचा आणि तदनुषंगाने खव्याचा/पनीरचा खप किती आहे माहिती नाही. दुधाच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. गुजरात राज्यातच सुमारे १ कोटी लीटर दूध दररोज अमूल*कडे येते. गुजरात मध्ये एकूण दुधाचे अंदाजे उत्पादन २ कोटी लीटर दररोज इतके असावे. त्यापैकी अर्धे दूध म्हणून विकले जाते. बाकीचे इतर उत्पादने बनवण्यासाठी + लीन सीझनची बेगमी -पावडर लोणी वगैरे बनवण्यसाठी वापरले जाते. अमूल खेरीज इतर उत्पादकांकडे डेअरी यंत्रणा फारशी नसल्याने हे बाकीचे १ कोटीलीटर दररोज दूध मिठाई-खवा-पनीर आणि आइसक्रीम/कुल्फी आणि गुजरातचे आवडते तूप बनवण्याच्या उद्योगात जात असावे. *अमूल कडे म्हणजे गुजरात स्टेट को ऑप मिल्क मार्केटिंग फेडरेशन कडे.

In reply to by नितिन थत्ते

माझ्या कडे सुद्धा नक्की काही आकडे उपलब्ध नाही मिठाईचा आणि तदनुषंगाने खव्याचा/पनीरचा खप किती आहे हे ठरवायला. फक्त मुंबई, ठाणे, नवि मुंबई याच परिसराचा विचार करूनच (या परिसरात फिरत असल्यामुळे मागील काही १०-१५ वर्षातील मिठाईंची वाढती दुकाने, ग्राहकांची गर्दी, दुकानातील मिठाईंचा साठा हे बघत असल्यामुळे) मी हा अंदाज वर्तवला. गुजरातचा खवा हा ऐकीव माहिती प्रमाणे महाराष्ट्रातील इतरही भागात जातो. तसेच गुजरात मध्ये सुद्धा दुधाचा वापर भरपूर प्रमाणावर होत असेलच. त्यामुळेच मला ही शंका आहे की जेव्हढं दुधाचं उत्पादन होतंय महाराष्ट्र/गुजरात मध्ये ते कमी पडत असावं या दोन राज्यांमधील दुधाची गरज भागवीण्याकरीता. अर्थातच व्यापार्‍यांना व्यवसाय बंद ठेवून चालणार नाहीच कारण मागणी सतत असल्यामुळे, म्हणजे भेसळ करणे आलेच :)

आमच्या तरुण पणी सुंदर मुलीस..."खवा" ...म्हणायचे.. खव्या वरचा धागा वाचुन दिवाळीच्या तोंडावर मन भुत काळात गेले..

मी एका मिठाईच्या दुकानात जुनीच (शिळी) मिठाई कुस्करून नविन मिठाई बघतांना बघीतलेले आहे. मिठाईच्या बॉक्सवर '२४ तासात खाणे' असे लिहीलेले असतांना तिच मिठाई दुकानात ४-४ दिवस कशी ताजी राहू शकते? उपायः १) शक्यतो पेढे तेही केवळ पांढरेच असलेले घ्यावे. काही ठिकाणी मलई पेढा असे म्हणतात. पक्का पेढा घेवू नये. २) रंगीत मिठाई कितीही आकर्षक असली तरी घेवू नये. शिळी मिठाईच कुस्करून अन रंग टाकून नविन मिठाई बनवतात. ३) जिलेबीला कितीही नावे ठेवत असलात तरी ती जास्तीत जास्त ताजी असू शकते. (रंग चांगल्या प्रतीचा टाकलेला असावा) ४) दिवाळीच्या सणात घरच्या पदार्थांना महत्व द्यावे. (अवांतर: मिठाईच्या क्षेत्रात परप्रांतीयांनी कब्जा केलेला आहे. जास्त मिठाईवाले राजस्थानी असतात. राज ठाकरेंचा मुद्दा येथे लागू होवू शकतो. म्हणजे शक्यतो महाराष्ट्रीय कारागीराकडून मिठाई घ्यावी. सुदैवान आमच्या गावात आमच्याकडील खेडेगावाचाच मिठाईवाला मोठा कारखानदार मिठाईवाला झाला आहे. त्याच्याकडच्या मिठाईची आम्हाला खात्री आहे. - जय महाराष्ट्र)

हल्ली खाली दाखवल्यासारखी मिठाई बर्‍याच दुकानात मिळते तीत खवा नसतो. ती मुख्यतः स्टार्च वगैरे पिष्टमय पदार्थ आणि नट्स वापरून बनवलेली असते. ती खाता येईल. त्यात रंग वगैरे कसले असतात ते माहिती नाही.

In reply to by नितिन थत्ते

बापरे , केवढा वर्ख लावलाय. हल्ली चांदी वर्खामध्ये ही भेसळ असते त्यामुळे वर्ख लावलेली मिठाई शक्यतो टाळावीच किंवा खात्रीलायक दुकानातून घ्यावी. चांदीच्या नावाखाली दुसर्‍याच धातूचा (बहुतेक अल्यु.) वर्खासाठी वापर करतात.

अज्ञानात सुख असतं म्हणतात तेच खरं, आपण सर्वांनी मागच्या वर्षी या आणि अशांच प्रकारच्या खव्याच्या मिठाया खाल्या होत्या ना किती जणांना त्रास झाला होता याची काय आक्डेवारी. खवाच काय नुसता पुणे आणि मुंबैत जेवढा खरवस विकला जातो तो सगळा खरा आणि शुद्ध असेल तर त्याच्या हिशोबानं पुर्ण एक्सप्रेस वे च्या दोन्ही बाजुला फक्त गाइ - म्हशिंचे गोठेच असावे लागतील. हि बातमी म्हणजे बहुराष्ट्रिय मिठाइ कंपन्यांनी तसेच इथल्या corporate मिठाई वाल्यांनी लोकल मिठाई करण्यां विरुद्ध केलेलं कारस्थान आहे अशी पण एक थेरी असु शकते. हर्षद

बनावट खवा बनवण्यासाठी किलोमागे जेमतेम आठ-दहा रुपयांचा खर्च. खऱ्या खव्याचा भाव अडीचशे रु. किलो असताना बनावट खव्याची किंमत ऐंशी ते शंभर रु. आहे. किंमतीवरून शुद्धता ठरवणं कठीण आहे. बनावट खवा अडीचशे रुपये भावाने विकला तर .....! खव्याची शुद्धता पहाण्याचा घरगुती उपाय हवाय!!

आजकाल बरेचदा नकली खव्याच्या बातम्या पाहिल्या. नकली खव्यात काय असते हे आज समजले. एरवी खवा नकली कसा काय असू शकतो बुवा? असा प्रश्न पडला असता. तात्पर्य, घरच्या जेवणाला पर्याय नाही. काही वर्षांनी घरगुती स्वयंपाक करणे, घर व्यवस्थित सांभाळणे हेच प्रसिद्ध करियर असणारे असं वाट्टय. म्हणजे पुन्हा आज्जीचे दिवस येणार!;) घरगुती पापड, पापड्या, सांडगे, कुर्डया, मसाले यांचे दिवस!

In reply to by रेवती

नकली खवा बाजारात मिळत असला तरी मिठाई-पेढे-बर्फी खाणे बंद करावे अशी परिस्थिती आली नसावी. अशा प्रकारचे सगळेच भेसळयुक्त खाद्यपदार्थ मिळत असतात. मध्यंतरी मिपावर एक धागाही आला होता. त्यात तिखट, केशर, मिरे वगैरे पदार्थांमधल्या भेसळीविषयी लिहिले होते. यावर उपाय म्हणून आपण ब्रँडेड मसाले घ्यावे असा विचार करतो. त्याप्रमाणे मिठाई घेताना ती प्रसिद्ध दुकानातून घ्यावी वगैरे विचार आपण करू शकतो. (उदा. चितळे, हल्दीराम किंवा आपापल्या गावातील/शहरातील जुना प्रसिद्ध हलवाई) परंतु सगळीकडे भेसळ आहे या नावाखाली पुरुषांनी महिलांकडून सगळे घरी बनवण्याची अपेक्षा करू नये असे वाटते. रेवतीताईंना वाटणारी आज्जीचे दिवस पुन्हा येण्याची- घरात पापड सांडगे लोणची कुर्डया बनवण्याची वेळ येऊ नये. अगदीच ज्यांना 'बाहेरच्या' पदार्थांची भीती वाटत असेल त्यांनी वाटल्यास असे पदार्थ खाणे बंद करावे. (हा प्रतिसाद ज्या पुरुषांना या गोष्टी स्त्रीने घरात कराव्या असे मनातून वाटते पण नाइलाज आणि लोकलज्जा म्हणून बाहेरून खाद्यपदार्थ आणणे स्वीकारलेले असते त्यांच्यासाठी आहे).

साला, सगळाच बाजार मांडला आहे... झटपट पैसे मिळवुन श्रीमंत होण्यासाठी लोक आता कोणत्याही स्तराला जात आहेत... भाज्या / फळे मिळतात ते देखील केमिकल किंवा कीटकनाशक युक्त... पांढर्‍या दुधाचा काळा कारोबार तर आता रोजचीच गोष्ट झाली आहे... (१ रु.च्या शॅपुचे पॅकीट,वनस्पती तेल,युरिया एकत्र आले की झाले तयार दूध) जाता जाता :--- महाराष्ट्रात (विशेषतः मुंबईत ) येणारा खवा हा राजस्थान मधुन येतो असे ऐकुन आहे...आणि तो उंटणीच्या दुधापासुन बनवलेला असतो.