खरेच या लाल पिवळ्या गाड्या महाराष्ट्राच्या जीवनवाहिन्याच आहेत. मी ट्रेकिंगच्या निमित्तने बरेच वेळा दुर्गम भागात ह्या गाड्यांनी प्रवास केला आहे. जिथे ह्या गाड्या जाउ शकतात तिथे तश्या सो-कॉल्ड महागड्या लक्झरी बस जायचे धाडस करणारच नाहीत.
मस्त लेख. एस्.टी. मध्येही काही प्रकार होते- सुपर एक्स्प्रेस आणि नॉन स्टॉप.ह्या बसेसना मधल्या पिवळ्या पट्ट्याऐवजी पांढरा पट्टा असायचा.लाल अ़क्षरांत जलद्/अतिजलद लिहिलेले असायचे.प्रत्येक एस.टी.वर BOM46 असे का लिहिले असते कधी कळले नाही.
मुख्य कार्यालय परळला(४०००१३) आहे असे वाटायचे.४०००४६ हा पिनकोड एस्.टी. सोडली तर अनेक वर्षात कोठेही दिसला नव्हता. नेटवरुन तो पिनकोड माटुंग्याचा आहे असे कळले.सहसा माटुंग्याचा कोड-४०००१९(मध्य) किंवा ४०००१६(ले.ज्.मा) असतो.
BOM46 यात BOM म्हणजे बॉम्बे या अर्थाने नाही. बॉम्बे चे मुंबई कधीच झाले अन एस्टी वाले तर आधी पासूनच मुंबईच म्हणायचे म्हणा. तर BOM म्हणजे Bill of Material. गाडीचा मेटेंनन्स च्या हिशेब ठेवण्यासाठी BOM मेंटेन ठेवतात. आमच्या कडच्या साखरकारखान्याच्यादेखील प्रत्येक गाडीवर असे BOM लिहीलेले असते. मलाही असलाच प्रश्न पडला होता त्या वेळी. नंतर समजले की ते Bill of Material असते म्हणून.
फारच सुंदर लेख. समाजजीवनाशी अतूट असे नाते असलेली एस.टी. ~~ शहराकडे जाण्यासाठी फाट्यावर उभे राहुन "यस्टी" ची वाट पाहणे ही किती गंमतीदार बाब आहे तिचे वर्णन करण्यासाठी धाकटे माडगुळकर किंवा आजचे बिनीचे अनिल अवचटच हवेत. आता "ग्राम सडक सुधार" धडक मोहिमेंतर्गत खेड्यापाड्यातील अप्रोच रोड बर्यापैकी सुधारले आहेत, पण ज्या काळात रस्ता म्हणजे धुळीचा खकाणा अशी व्याख्या होती त्याकाळात रणरणत्या उन्हात, मोडक्यातुटक्या शेडचा आसरा घेतला ना घेतला असे करत, "दिलिप जर्द्या" ची देवाणघेवाण करत असलेली डोक्याला लाल-पिवळे-गुलाबी फेटे गुंडाळलेले रामराव, तानाजीराव, सदानंद, वसंतराव ही मंडळी आणि त्यांचे "उसाचे राजकारण, केडीसीच्या म्यानेजरला कसा तोडतो बघच उद्या" या खडाजंगीच्या बोलाचाली....
त्या शेडच्या बाजुला असलेल्या झाडाला टेकुन बसलेल्या हौसाक्का, बायाक्का, शांताकाकु, शकी, वच्छी, शारदी यांच्या दबक्या आवाजातील गप्पा ::
("व्हय गं, आंवदा सरूला दिवस गेल्याती न्हव?",
"व्हय बया, बघ तर, म्या म्हटलंत तिला यल्लमाला जावून्शी डोकं टेक तिच्याम्होर ! गेल्ली की म्हायल्या जत्रला, आनि आता बघ कशी मोरासारखी टण्णाना उड्या मार्तिया...."
"आसू दे मारू दे, माझ्या म्हायीरचीच हाया ती. लई केलया तिच्या आईनं माझ्यासाठी...")
हे चित्र लोभसवाणे आहे, आणि ते आणखीन पाहावे तोच गलका.... "आली आली रं"
लांबून निळा-पांढरा धुर आणि राखी रंगाची धूळ मागे बेदरकारपणे उडवत शेडकडे येणारी लालपिवळी "आपुली" यस्टी दिसली की, बस्स ! काय तो आनंद..... काय त्या कंडक्टराची मिजास..."ज्यादा जागा न्हाई, चारच चढा.." मग डझनभरांची अजिजी.... ड्रायवरभाऊंच्या बाजुने वशीला लावणे.... मग उपकार केल्याच्या भावनेने दोन्ही रावसाहेबांची सर्वांना जागा देण्याची तयारी.... ढिगभर गाठोडी पाहुन त्याचा उठणारा मस्तकशूळ.. मग "आसु दे रे राज्या, पोरीकडं सरकारी दवाख्यान्यात चाल्लोया, लई शिक हाया ती. घोंगडीच हाईती त्यात.." अशी एखाद्या जनाबाईची विनवणी....मग कंडक्टरचं ढेकळासारखं विरघळून जाणं.
फार सुंदर... घरचे चित्र आहे.... "एस.टी." म्हणजे.
एकदम बारीक निरीक्षणाचे वर्णन. अशा जनाबाईची विनवणी ऐकून विरघळणार नाही तो कंडक्टर कसला? तो ही त्याच मातीतून आलेला असतो. त्याची नाळ अशीच एखाद्या जनाबाईशी जुळलेली असते. म्हणूनच एस्टी एक समाजजीवन जोडणारी रेषाच आहे.
अजूनही मी काहीच काम नसले की उगाचच एसटी स्टँड वर भटकतो. वेगळा न राहता प्रवाशांमध्ये मिसळतो.
एकदम झक्कास लेख
ट्रेक संपवून आडनिड्या गांवात कोसळल्यावर, धुरळा उडवत येणार्या ला. पि. बशीला पायल्यावर कांय आनंद होतो ते अनुभवींनाच कळेल..
कोकणात आजही या बस म्हणजे प्राणवायू आहेत. . सकाळी पावणेसहाची कोल्हापुर- मालवण टपाल बस.. घाटी अन् मालवणीची झकास सरमिसळ असलेला प्रवास...
सध्याची परिवर्तन १ लंबर.. सुरुवातीला भाडं जास्त असेल या विचाराने लोक या बशीत जायला कचरायचे, म्हणून महामंडळाला बसवर लिहावं लागलं...'साध्या दरात' .
व्वा! पाषाणभेदी साहेब एसटी वर सुंदर लेख टाकलाय. अभिनंदन !!
एसटीचं महत्त्व खुप आहे ग्रामीण भागात प्रवास करायला. एवढी स्वस्त आणि पक्के रस्ते नसलेल्या ठिकाणी जाण्याकरीता अर्थातच एसटी शिवाय पर्याय नाही. कित्येक दुर्गम ठिकाणी एसटी तोटा सहन करून चालवल्या जाते ती फक्त प्रवाशांच्या प्रवास सुविधेकरीता.
मला स्वतः ला तरी एसटीने प्रवास करणे आवडतं. जेव्हा शक्य असेल तेव्हा मी एसटीनेच प्रवास करतो.
खाजगी गाडयांनी (अवैध प्रवासी वाहने) यांच्या पेक्षा एसटी खरंच खुप सुरक्षीत वाटते.
वाह पाभे.. जबराट मस्त लेख.. एसटी ची मजाच निराळी. लाल डब्बा पाहिला की मुंबई ते सावंतवाडी केलेल्या फेर्या आठवतात. एसटी बस स्थानक पण खुप आवडीचे ठिकाण. ते कानिफनाथ रसवंती गृह... :-)
मन फ्रेश केलेस गड्या..
लोक नेहमीच परिवाहन महामंडळ सेवेबद्दल आठ्या घालताना दिसतात पण मला हे एस.टी. चे चालक वाहक दिवाळी, गुढीपाडवा या मोठ्या सणांनासुद्धा आपल्या घरच्यांसमवेत न राहता हे एस.टी. कर्मचारी ’प्रवाशांच्या सेवेसाठी’ कामावर असलेले दिसतात तेंव्हा वाटतं की कोण प्रवासी कधी यांना सुखरूप सेवेबद्दल त्यांना धन्यवाद तरी देत असतील काय? हो काही ठिकाणी गरज आहे ती व्यवस्थापन विकासाची. अमेरिकेतल्या बस सेवांकडुन बरेच काही घेण्यासारखे आहे. उदा. ज्याप्रमाणे तिथले वाहक प्रत्येक सुरुवातीच्या थांब्यावर बसमधील सर्व प्रवाशांचे स्वागत करून त्यानंतर आपली ओळख, आणि मग शेवटच्या थांब्यापर्यंत कितीवेळ लागेल, बस कुठे-कुठे आणि कितीवेळ थांबेल याची माहीती देतो, थांब्याआधी त्यांच्याजवळ असलेल्या माइक्रोफोनद्वारे त्या थांब्याची सुचना देणे इ. गोष्टी सुरू करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. काही लोक एस.टी. वाहकांना त्यांच्या उर्मट वागणुकीमुळे त्यांना Customer Relationshipचे शिक्षण देण्याचे सल्ले देतात पण हाच वाहक रोज जवळ जवळ २००+ हौशे, नवशे, गौशे, अडाणी, सुशिक्षीत, म्हातारे, तरणे, गाववाले, शहरी, वाडी-वस्तीवाले, अशां लोकांबरोबर ’डील’ करतो. सकाळी जर आपल्या मनाला न पटणारी गोष्ट झाली तर आपली दिवसभर तावाताव होते. तिथे हा माणुस, दिवसभर यांच्या वाटयाला असलीच कामे येत असतात. त्यातुन महत्वाचं एस.टी.ची अर्थिक जबाबदारी या वाहकाकडे. कोण पासवाले, कोण जेष्ठ नागरीक, कोण १/२ तिकीट, त्यातून प्रत्येकाचा थांबा त्याच्या लक्षात ठेवणं..आपल्याला नसतं बाबा जमलं.
एस.टी. चा प्रवास सुरक्षीत प्रवास, गाव तिथे एस.टी., प्रवासात कुठे बरं-वाईट झालं तर फुल नाय फुलाची पाकळी १-२ लाख तरी मिळतात. प्रवाशांची असली काळजी कारते काय खाजगी वाहतुक? वर या खाजगी वाहतुकींच्या वक्तशीरपणाबद्दल सर्वांनाच अनुभव असावा यावर यांचे ड्रायवर कधी-कधी तर्री लावुन, बेशिस्त वाहने चालवताना दिसतात. याउलट जर का एस. टी. चालकाने ठराविक वेळेआधी बस आणली तर त्याच्यावर वेगाच्या उल्लंघनाचे कारणे दाखवा शीट बनते असे एका एस.टी. कर्मचा-याकडून ऐकीवात आहे. एवढं असुनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे उन्हाळा, दिवाळीच्या ’सिझन’मध्ये अवैध वाहतुक बंद करण्यासाठी एस.टी. महामंडळाला पोलिसांना पैसे (लाच) द्यावी लागते हे ही मला एस.टी. कर्मचा-याकडुनच सांगण्यात आले. असो महाराष्ट्राची ही ’लाईफलाईन’(१५५०० बसेस १२००० कर्मचारी, ७०लाख रोजचे प्रवासी) धडधाकटपणे प्रवाशांच्या सेवेसाठी प्रगतशील राहो आणि दुसरे काय म्हणणार.
यांच्या जालावर कधी गेलोच नव्हतो ..झकास बनवली आहे साइट..http://www.msrtc.gov.in/msrtc_live/index.html
मस्त लेख रे पाभे...आमचा बाप यास्टीतच कामाला असल्याने (कारकून) मस्त वर्षातून दोन महिने पास मिळायचा....मला १८ पुर्ण झाल्यापासून मिळत नाही आता.. :( पण त्यामुळे जी लहानपणापासून सवय लागलीय यास्टीची ती अजूनही आहे.
कुठुनही कुठेही कितीही तास यास्टीने प्रवास करू शकतो... :)
लेख फार मस्त लिहिलात राव तुम्ही. विषयही जिव्हाळ्याचा आहे. एष्टी आणि पोष्टमन ह्या दोनच गोष्टी, कामाच्या निमित्ताने का होईना पण, खेड्याशी नाते जोडून आहेत.
महाराष्ट्रात कुठेही जायचं असेल तर स्वताची गाडी नाहीतर यष्टी याशिवाय प्रवास करूच नये...फारतर ट्रेनने जाता येईल...
एक दोनदा नीता का काय travel ने नाशिक ते सीबीडी असं यायचं होता, यष्टीला उशीर होता म्हणून.....गाडी चेम्बुरला स्वस्तिक पार्क जवळ थांबवणार होते...रात्रीची वेळ होती ...आणि आम्हाला त्या लोकांनी "पुलावरून गाडी जाणार म्हणून इथंच उतरायचं " असं करून उतरून दिलं .... अर्धवट झोपेत उतरलो आणि स्वतिक पासून बरेच लांब कि...रिक्षावाले एक दोनच...फारच त्रास झाला...
पुन्हा काही असल्या भानगडीत नाही पडणार.
लेख भारी आवडला...दिलेल्या वेळेवर यष्टी सुटते आणि ठरलेल्याच जागी नेऊन सोडते... आता लाल डबा थोडा (म्हणजे बरेचदा खूपच ) साफ केलेला नसतो...त्यामुळे फारतर एशियाडने जाते...शिवनेरी वगैरे भानगड अगदीच एशियाड नसेल तरच.. लहानपणच्या खूप चांगल्या आठवणी आहेत येष्टीच्या..
महाराष्ट्रात कुठेही जायचं असेल तर स्वताची गाडी नाहीतर यष्टी याशिवाय प्रवास करूच नये
मान्य. स्वतःचे वाहन उत्तम. अर्थात, जिथे जाणार तिथे जर ओली पार्टी अपेक्षित असेल, तर स्वतःचे वाहन न नेणे (किमान स्वतः न चालवणे) हेच इष्ट!
अन्यथा, सरकारी उपक्रमाच्या वाहनांना (येथे एसटी) प्राधान्य देणे हेच योग्य. त्याची प्रमुख कारणे -
१) सरकारी उपक्रमांच्या तिकिट भाड्यात विमा अंतर्भूत असतो.
२) वाहन बिघडले तर पर्यायी वाहन उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते.
३) वाहन ठरलेल्या मार्गावरून, ठरलेले थांबे घेत जाण्याची खात्री असते.
बाकी, पाभे, लेख उत्तम. खिडकीची जागा मिळाली असेल तर, लाल डब्बादेखिल लांबच्या प्रवासात विलक्षण आनंद देऊन जातो!
पवारांची बारीक निरीक्षणंही आवडली.
महाराष्ट्राच्या खेडोपाडी पोचून अतिशय अल्प दरात सर्वांना प्रवास घडवणाऱ्या एसटीला सलाम.
या भारतवारीत दापोलीला जाताना लाल डब्बा प्रवासाचा अनुभव खूप वर्षांनी पुन्हा एकदा आला. भन्नाट वेगाने जाणाऱ्या बसच्या खिडकीत बसून केस भुरभुरल्याचं अजूनही आठवतंय. तीन तास तसं बसल्यानंतर केसांवरनं हात फिरवला की होणारा कडक स्पर्शही. बसचा धडाकेबाज प्रवास, मागच्या सीटवर बसायला लागलं तर बसणारे गचके, सिटांच्या मागच्या बाजूला करून ठेवलेल्या 'संजू (हृदयातून बाण) जयश्री' टाईप प्रेमाच्या घोषणा... खूप काही आठवलं.
धन्यवाद राजेश जी....
खरं तर खूप काही लिहिण्यासारखे आहे या ह्र्दयस्पर्शी विषयावर, विशेषतः ज्यांनी एस.टी.ने ये-जा करून आपले शिक्षण पूर्ण केले आहे, नोकरी केली आहे (माझी थोरली मावशी - जी जि.प.च्या प्रा. शाळेत सुमारे ४० वर्षे नोकरी करून हेड मिस्ट्रेस (गाव उच्चारी "थोरल्या मास्तरीणबाई") या पदावरून निवृत्त झाली, तिने तर नोकरीचे सारे आयुष्य एस.टी. प्रवास करून काढले, म्हणजे तीने जर लिहायचे मनात आणले तर याच विषयावर फार सुंदर लेखन करेल, इतकी साथ दिली आहे "यस्टी" ने प्रा.शिक्षक मंडळीना. ज्या दिवशी, ज्या गावातून, ती रिटायर झाली त्या दिवशी रितिप्रमाणे सरपंचाच्या हस्ते तिचा सत्कार तर झालाच, पण त्या दिवशी त्या रूटवर असलेल्या एस.टी.कंडक्टर आणि ड्रायव्हर या दोघांनीही तितक्यात एक फुलांचा गुच्छ प्राप्त करून "एस.टी. आगाराकडून आमच्या रोजच्या ताईंना....ज्यांनी इतक्या वर्षाच्या प्रवासात एस.टी.बद्दल एकही वाईट शब्द बोललेला नाही." असे भावपूर्ण उद्गार काढून तिच्या हातात दिला. उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आलेले आम्ही पाहिले. (मावशीही रडत होती).
ही खरी एस.टी.ची आत्मियता !
"सिटांच्या मागच्या बाजूला करून ठेवलेल्या 'संजू (हृदयातून बाण) जयश्री' टाईप प्रेमाच्या घोषणा"
हा एक वेगळाच वाङ्मय प्रकार (किंवा ग्राफिटी) आहे. खूप मजेशीर.
इन्द्र
गर्दीत चेंबून घेत, खिडकीतऊन रुमाल टाकुन जागा "पकडून", लहानपणी एकदोनदा तर सरळ खिडकीतून आत घुसून, डायव्हरच्या केबिनमधे बसून, असा विविध प्रकारे केलेला प्रवास आठवला.. खरंच मजा होती यस्टी प्रवास म्हणजे..
एस टीचा आता एक नवीन ब्रँड आला आहे शीतल
पुणे - दादर रुट वर. थोडक्यात एसी एशीयाड . शिवनेरी पेक्षा स्वस्त आणि एशियाड पेक्षा महाग
रेल्वे स्टाइल गरिबरथ :)
अमोल
श्री. पाषाणभेद यांचा लेख आवडला. त्यांनी शेवटच्या परिच्छेदात वर्णन केल्याप्रमाणे 'यष्टी'तून नेल्या जाणार्या विविध वस्तूंचे आणि एकंदरीत कोकण यष्टी प्रवासाचे छान वर्णन पु. लं. च्या म्हैस या कथेतदेखील आहे.
बर्याचदा ग्रामीण भागात ठराविक मार्गांवर ठराविक नंबरांच्या बसेस सोडत असत. आम्ही जेवणाच्या सुटीत घरी निघालो की स्टॅंडवर नेहमी MHQ 8840 ही बस थांबलेली दिसायची. तीही बरेच (तीनेक वर्षे तरी) दिवस.
श्री. बेभान यांचा प्रतिसादही आवडला.
एस. टी. मग ती लालपिवळी असो, हिरवी एशियाड असो किंवा निळी शिवनेरी असो कधीच मनातून जाणार नाही. शाळेच्या सहलीच्या वेळी हार घालून सजवलेली एस. टी बघितली की आम्ही मुले हरखून जायचो आणि सहल संपताना आम्हाला न्यायला आलेले सगळे आई-बाबा मंडळी कधी एकदा आमची एस. टी. दिसतीय याची वाट बघताना दिसत.
आमच्या लहानपणी सिटीबसचे तिकिट १० पैसे आणि एस. टीचे तिकीट सव्वा रुपया असे बघितले आहे. ते मोजून दिलेले पैसे हरवू नयेत म्हणून घामेजलेल्या मुठीत धरुन ठेवायचे.
लक्षात राहायची ती एस.टी. ची हिरव्या रंगाची रेक्झिनची खरखरीत सीट कुशन्स. बहुतेक ड्रायव्हर-कंडक्टर याच कव्हरच्या पिशव्या वापरत आणि स्टाफचा माणूस या पिशव्यांवरुन ओळखत. एका मराठी चित्रपटात अशोक सराफ धांदरटासारखा रेखा रावच्या मांडीवर बसतो. ती त्याच्यावर डाफरते. त्यावर माफी मागून अशोक म्हणतो, 'तरी म्हणलं यश्टीच्या शिटा येवड्या मऊ केव्हापासून झाल्या?'
सुटीत सायकलची तुटलेली घंटी आणि दोरी वापरुन घरातच एस. टी. चा आभास तयार करणे किंवा दिवाळीच्या सुटीत रिकाम्या काडेपेट्यांच्या एस. टी. बस तयार करुन, रंगवून किल्ल्यापुढे मांडणे.
कॉलेजच्या दिवसात आमचा वात्रटपणा चालायचा. बसमध्ये शेजारी वही ठेऊन बसायचे. कुणी विचारले तर 'बसलंय कुणीतरी 'असं बिनदिक्कतपणे सांगून टाकायचं आणि कॉलेजातला एखादा छान चेहरा येताना दिसला, की हळूच वही उचलायची आणि मग अर्धा तास छान जायचा.
तर हा आमचाही आठवणींचा कोलाज. मस्त विषय छेडला पाषाणभेद यांनी. :)
लहानपणी मला कोणी विचारले कि मोठ झाल्यावर काय होणार तर मी सांगायचो की एस. टी. ड्रायवर होणार.
ड्रायवरच्या मागच्या सीट वर बसुन तो गाडी कशी चालवतो हे पहाण्यात धन्यता वाटे (अजुनही वाटते) . जुन्नर - घाटघर हा प्रवास ट्रेकर्स मंडळी बर्याच वेळेला करतात. त्या मंडळींचा हा प्रवास केल्या नंतर एस. टी. बद्दलचा आदर द्विगुनित होतो.
तेवढं ते ३रा, ४था आणि ५वा गियर टाकतानी डायवर मामा क्लच दाबत नाही हे बघुन फार वाइट वाटे. डायवर मामा हि एक आळशी जमात आहे असा आमचा आजही समज आहे.
लहानपणीचे एकट्याने केलेले पुणे- उस्मानाबाद प्रवास आठवले. प्रत्येक स्थानका वरील ते कानिफनाथ रसवंती गृह आणि नौशाद कोल्ड्रिंक्स सुद्धा आठवले..:)
सर्व आठवणींमुळे अंमळ हळवा झालो आहे.
प्रतिक्रिया
सुरेख लेख
जिथे ह्या गाड्या जाउ शकतात
मस्त लेख
मु. ४६
धन्यवाद
BOM46 यात BOM म्हणजे बॉम्बे
लाल डब्बा
फारच सुंदर लेख. समाजजीवनाशी
एकदम बारीक निरीक्षणाचे वर्णन.
+१
अप्रतिम
झकास लेख
एक नंबर...........
गांव तिथं रस्ता आन् रस्ता तिथं यष्टी...!
व्वा!
सही
मस्तच लिहिलंय ... आमच्या
य स्टी
मला यस्टी लागते. त्यात आंबा,
मृत्युंजय
मृत्युंजय
मजा आली..
मस्त लेख रे पाभे...आमचा बाप
जयभीम प्रभो दादा
लेख आवडला
महाराष्ट्रात कुठेही जायचं
मस्त..
लेख आवडला
सुंदर लेख.
मस्त लेख. लहानपणीच्या यष्टी
मस्त लेख
४० वर्षे एस.टी.तून मास्तरकी
वा !
मस्तच...
आमच्या सासुरवाडीला अजुन यस टी जात नाही.
एसटीचा गरीब रथ
छान लेख.
एस. टी. : आठवणीतून न जाणारी
एस. टी. च्या आठवणी...
न.१ ड्राईव्हर...... एस टी ड्राईव्हर
मस्तच हो पाभे..