माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - अंतीम भाग..

विसोबा खेचर जनातलं, मनातलं
माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - भाग १ बापरे..! 'मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?' मला काही खुलासा होईना.. 'बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं..' अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी! समोरच्या डिशमधलं थोडंफार खाल्लं मी. जरा वेळ तसाच तिथे बसून राहिलो. 'आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं' असा मनाशी विचार केला आणि उठलो.. तोच तो मगासचा टकल्या हिजडा आणि इतर दोघेचौघे हिजडे पुढे सरसावले. त्यापैकी एकाच्या हातात मोठासा स्वच्छ नॅपकीन! "आओ तात्यासेठ, अब न्हानेका और पूजा करनेका..!" न्हानेका और पूजा करनेका? मला काहीच समजेना. अल्लाजान होताच माझ्यासोबत. तो त्यांच्यातलाच.. त्याच्याशी बोलताना मला कळलं की आज मी त्यांचा पेश्शल पाहुणा आहे आणि मला पूजा करायच्ये किंवा सांगायच्ये! ही कुठली पद्धत? कुणाला विचारून? मला क्षणभर काय करावं ते कळेचना! 'सगळं झुगारून निघून जावं का इथून?' हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. पण माझ्या आजुबाजूला जमलेल्या, माझी इज्जत करणार्‍या त्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला खूप आनंद दिसत होता, उत्साह दिसत होता.. 'देखे क्या होता है.. जो भी होगा, देख लेंगे..' या माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी ती मंडळी म्हणतील ते करायचं ठरवलं. अधिक माहिती विचारता अल्लाजानकडून मला असं समजलं की मी एक पांढरपेशा उच्चभ्रू आहे असा त्यांचा समज आहे आणि माझ्या हातून आज त्यांच्या गणपतीची पूजा व्हावी अशी त्या मंडळातल्या हिजड्यांची इच्छा आहे आणि तशी पद्धतही आहे..! साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू?! :) त्या गल्लीच्या मागल्या बाजूसच एका चाळवजा इमारतीत वेश्यायवसाय चालतो.. मला त्या लहानश्या खुराड्यातील तेवढ्याच लहानश्या मोरीवजा बाथरुमात नेण्यात आले.. त्या घरची मावशी अन् आजूबाजूच्या वेश्या यांनी मला वाट करून दिली.. एरवी बाराही महिने फक्त पोटातल्या भुकेच्या डोंबाचा अन् पर्यायाने केवळ वासनेचाच वावर असणार त्या खोलीत.. परंतु त्या दिवशी मला तसं काही जाणवलं नाही.. सण-उत्सवाचा, गणपतीच्या वातावरणाचा परिणाम? भोवती त्या वेश्यांची दोन-चार कच्चीबच्ची घुटमळत होती. कुणाच्या हातात गणपतीच्या पुढ्यातलं केळं तर कुणाच्या हाताता आराशीमधली चुकून सुटलेली रंगेबेरेंगी नकली फुलांची माळ, कुणाच्या हातात साखरफुटाणे तर कुणाच्या हातात कुठुनशी आलेली एखादी झांज! मला क्षणभर अभिमान वाटला तो माझ्या उत्साही व उत्सवप्रिय मुंबापुरीचा! काय काय दडवते ही नगरी आपल्या पोटात! सोबत तो टकला हिजडा होता. त्यानं माझ्या हातात एक नवीन साबणाची वडी आणि स्वच्छ टॉवेल ठेवला.. मी स्नान करून, टॉवेल नेसून बाहेर आलो.. आसपासच्या वेश्यांचं तोंड चुकवून अंगात शर्टप्यान्ट चढवली.. त्या टकल्या हिजड्याचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटत होतं.. तो मोरीच्या बाहेरच थांबला होता.. 'हा आज आपला पाहुणा आहे आणि याला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे.' एवढी एकच तळमळ दिसत होती त्याच्या चेहर्‍यावर..! उच्चभ्रू समजातल्या सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटीचा त्यानं कोणताही कोर्स केलेला नव्हता..! तेवढ्या पाच मिनिटात त्या मावशीने चा करून माझ्या पुढ्यात कप धरला.. कोण ही मावशी? ८-१० वेश्यांचं खुराड सांभाळणारी.. तिनं मी अंघोळीहून येईस्तोवर माझ्याकरता चा देखील टाकाला?! कपडे घातल्यावर त्या टकल्यानं ते अय्यप्पाचं पवित्र मानलं गेलेलं कुठलंसं वस्त्र उपरण्यासारखं माझ्या खांद्यावर घातलं.. आम्ही त्या खोलीतून बाहेर गणपतीपाशी आलो आणि मी मुख्य गाभार्‍यात शिरलो.. "तात्यासेठ, ये लक्ष्मी है.. इसको बोलो पूजा कैसे करनेका, क्या करनेका..!" त्यांच्यातला एक लक्ष्मी नावाचा एक तरूण रूपवान हिजडा छानशी साडीबिडी नेसून तिथंच पूजा करायला म्हणून उभा होता.. माझं सहजच समोरच्या तयारीकडे लक्ष गेलं.. फुलं, अक्षता, अष्टगंध, समया, उदबत्त्या.. सगळी तयारी अगदी अपटूडेट होती.. ते सगळं पाहिल्यावर मी स्वत:ला विसरलो.. आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत पांढरपेशे आहोत आणि मुंबैच्या कामाठीपुर्‍यात उभे आहोत ही गोष्ट मी विसरून गेलो. माझं मन एकदम प्रसन्न झालं.. सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?! "प्रारंभी विनती करू गणपती.." दशग्रंथी तात्या अभ्यंकराने पूजा सांगायला सुरवात केली.. तशी त्या पार्थिवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे पहिल्या दिवशीच झाली असणार.. मी सांगत होतो ती केवळ संध्याकाळची धूपार्ती! 'प्रणम्य शिरसा देवं', 'शांताकारं भुजगशयनं.', गणपती अथर्वशीर्ष...' च्यामारी येत होते नव्हते ते सारे श्लोक तिथे बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने म्हटले! अगदी गेला बाजार शिवमहिन्म स्तोत्रातल्याही सताठ ओळी मला येत होत्या त्याही म्हटल्या - महिन्मपारंते परमविदुषो यद्यसदृषि स्तुतिर्ब्रह्मादिनाम् अपितदवसंनास्त्वयिगिरा: अथावाच्य.. आता आठवत नाही पुढलं काही.. पण कधी काळी ल्हानपणी मामांकडून शिवमहिन्माची संथा घेतली होती ती आता कामी येत होती. आपल्याला काय हो, शंकर तर शंकर.. तो तर बाप्पाचा बापुसच की! :) ओल्या बोंबलाच्या कालवणाने चलबिचल होणारा मी, अगदी पूर्णपणे एका भिक्षुकाच्या भूमिकेत शिरलो होतो... सहीसही ती भूमिका वठवत होतो.. 'काय साला विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आज आपल्याला लाभला आहे!' असे भाबडे कृतज्ञतेचे भाव आजुबाजूच्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला दिसत होते.. त्यांचा तो म्होरक्या टकला हिजडा तर अक्षरश: कृतकृत्य होऊन रडायचाच बाकी होता.. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे दुसरं तरी काय असतं हो?! 'गंधाक्षतपुष्पं समर्पयमि..' असं म्हणून लक्ष्मीला गंध, अक्षता व फुलं वाहायला सांगितलं.. "अबे भोसडीके उस्मान गांडू.. वो फुल उधर नजदिक रख ना..!" फुलाचं तबक थोडं दूर होतं ते रागारागाने एका हिजड्याने कुणा उस्मानला नीट गणपतीच्या जवळ ठेवायला सांगितलं..! गणेशपुजन सुरू असतांनाच, "अबे भोसडीके उस्मान गांडू"? :) पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात..! :) "धूपं समर्पयामि, दीपं सर्पमर्पयामि.." दशग्रंथी अभ्यंकर सुरूच होते! आणि माझ्या सूचनांनुसार लक्ष्मी सगळं काही अगदी यथासांग, मनोभावे करत होती..की होता?! सरते शेवटी पूजा आटपली, आरती झाली.. मला पुन्हा एकदा आतल्या एका खोलीत नेण्यात आलं.. त्या मंडळातले सारे कमिटी हिजडे अगदी कृतकृत्य होऊन माझ्याभोवती जमले होते.. 'अब मुझे जाना होगा..देर हो गई है..' असं मी म्हटल्यावर थोडं तरी काही खाऊन गेलंच पाहिजे असा मला त्या टकल्यासकट इतर हिजड्यांनी आग्रह केला.. पाचच मिनिटात कुणीतरी गरमागरम पुर्‍या, छोले, गाजरहलवा असा मेनू असलेलं ताट माझ्या पुढ्यात घेऊन आला.. अखेर दशग्रंथी विद्वान तात्या अभ्यंकर अल्लाजनसोबत तेथून निघाले.. एक वेगळाच अनुभव घेतला होता मी.. गणपतीकडे त्या यजमान हिजड्यांकरता काय मागणार होतो मी? 'यांचा शरीरविक्रयाचा धंदा चांगला होऊ दे' - हे मागणार होतो? आणि मुळात त्यांच्याकरता देवाकडे काही मागणारा मी कोण? माझीच झोळी दुबळी होती.. त्यांच्या झोळीत माप टाकायला गणपती समर्थ होता..! निघण्यापूर्वी त्या टकल्या हिजड्यानं माझ्या हातात एक पाकिट आणि हातात एक पिशवी ठेवली आणि मला नमस्कार करू लागला.. वास्तविक मलाच त्याच्या पाया पडावसं वाटत होतं..वयानं खूप मोठा होता तो माझ्यापेक्षा...! तेथून निघालो. पाकिटात शंभराची एक कोरी नोट होती.. सोबत ही पिशवी कसली? 'आमच्याकडे जाताना भिक्षुकाला शिधा द्यायची पद्धत आहे..' अल्लाजानने माहिती पुरवली.. मी पिशवी उघडून पाहिली तो आतमध्ये एका पुढीत थोडे तांदूळ, दुसर्‍या पुडीत थोडी तूरडाळ..आणि दोनचार कांदेबटाटे होते.. डाळ-तांदुळाचा तो शिधा पाहून मला क्षणभर हसूच आलं.. 'अरे हे काय? डाळ-तांदुळाचा शिधा?' मी अलाजानला विचारलं.. "डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!" अल्लाजानच्या तोंडून सहजच निघालेलं ते वाक्य बी ए, एम ए, पीएचडी... सार्‍या विद्यांना व्यापून त्यांच्या पल्याड जाणारं होतं, गेलं होतं.. ! मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत..! -- तात्या अभ्यंकर.
वर्गीकरण

65 टिप्पण्या 25,729 दृश्ये

Comments

श्रावण मोडक नवीन

वाचनीय अनुभव. यातला 'मी' थोडा कमी आणि 'इतर' थोडे अधिक असते तर अधिक खुलले असते हे लेखन. पण पुलंचा आदर्श असल्याने त्यांच्या, प्रवासातील त्यांच्याविषयीच्या लेखनाला प्रवासवर्णन म्हणतात, तसे इथेही मानून घ्यायचे.

विसोबा खेचर नवीन

In reply to by श्रावण मोडक

पण पुलंचा आदर्श असल्याने त्यांच्या, प्रवासातील त्यांच्याविषयीच्या लेखनाला प्रवासवर्णन म्हणतात,
असहमत.. असो.. (कट्टर पुलंभक्त) तात्या.

विश्वनाथ मेहेंदळे नवीन

In reply to by स्वानन्द

असहमत असण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण हे मत खुद्द पुलंचे आहे. अधिक माहिती साठी वाचा अपूर्वाई ची प्रस्तावना. शंका :- कट्टर भक्त आता त्यांचे मत बदलणार काय ?

श्रावण मोडक नवीन

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

चालायचेच विश्वनाथराव. हिजडे (किंवा वेश्या) माणसात नसतात, अशी गृहितके घेऊन आपल्या भाषाविषयक ताकदीच्या जोरावर रंजकरित्या केलेले लेखन आहे हे. तेव्हा हे असेही चालायचेच.

शेलार मामा मालुसरे नवीन

In reply to by श्रावण मोडक

हिजडे (किंवा वेश्या) माणसात नसतात, अशी गृहितके घेऊन आपल्या भाषाविषयक ताकदीच्या जोरावर रंजकरित्या केलेले लेखन आहे हे.. माझ्या मते या लेखाचा उद्देश हिजड्यांचे रंजक लेखन किंवा भाषाविषयक ताकद दाखविणे हा खचितच नाही.

शेलार मामा मालुसरे नवीन

In reply to by श्रावण मोडक

आवश्यक आहे तितकाच मीपणा यात आढळला. माझ्या मते हा यातील गौण मुद्दा आहे. लेखन खुप प्रभावी आहे.विषय चांगला आहे.मांडणी नेट़की आहे.पाल्हाळ टाळण्यात यश मिळाले आहे.काही शब्दांची पुनरोक्ती टाळता आली असती तर लेख अधिक कसदार वाटला असता. मी कामाठीपुरात असताना मला आलेले काही अनुभव डोळ्यापुढे लगेच तरळून गेले हे या लेखाचे यश. भावनांची तरलता आणी मनातले द्वंद्व छान रेखाटले आहे. असेच लिहा . आपला शेलारमामा.

विसोबा खेचर नवीन

In reply to by शेलार मामा मालुसरे

आवश्यक आहे तितकाच मीपणा यात आढळला.
माझ्या मते या लेखाचा उद्देश हिजड्यांचे रंजक लेखन किंवा भाषाविषयक ताकद दाखविणे हा खचितच नाही.
जाऊ द्या हो शेलारमामा..मी माझ्या कुवतीप्रमाणे लिहिले आहे.. काही वाचक त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रतिसाद देतात..! शिंपल..:) धन्यवाद.. तात्या.

अवलिया नवीन

उत्तम लेखन. असेच विविध प्रकारचे लेखन येउ दे तात्या. >>>मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत..! असेच आयुष्यभर पुरो ! आणि सर्व अडचणींवर मात करुन पुन्हा आयुष्य बहरो !! गणेशाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच.. प्रयत्नांची कास सोडु नको.. !!

छोटा डॉन नवीन

एकदम ताकदवान लेखन. नक्कीच वाचनीय अनुभव आणि तो ही मस्तपण वर्णन केलेला. असेच अजुन येऊद्यात ही विनंती. :) - छोटा डॉन

प्रचेतस नवीन

>>>सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?! क्या बात है. अजून येउ द्यात.

स्वाती दिनेश नवीन

दोन्ही भाग वाचले, अर्थातच आवडले. पण भाग १ असं काल वाचलं तेव्हाच ठरवलं की वाचून श्रीखंडाच्या चक्क्यासारखं टांगून घ्यायचं नाही.(रोशनी, शिंत्रे गुरुजी, सालस... यादी मोठी आहे) म्हणून काल वाचायचा मोह टाळलाच. आज अंतिम भाग असे दिसल्यावर सुखद धक्का बसला आणि दोन्ही भाग वाचले. स्वाती

प्रियाली नवीन

In reply to by स्वाती दिनेश

अंतिम भाग लगेच टाकल्याबद्दल धन्यवाद. अनुभव आवडला हे वे.सां. न.

तिमा नवीन

लेखन लाजवाब, शेवटच्या पिशवीतल्या शिध्याबद्दल लिहिलेले वाचून डोळ्यात पाणी आले. वा! गायक तात्या, संगीतप्रेमी तात्या, खवैय्या तात्या आणि लेखक तात्या. दंडवत , सगळ्याच प्रांतात तुमची उत्कटता मनाला भिडते.

राजेश घासकडवी नवीन

वाचनीय अनुभव. लेखकाच्या बहुआयामी अनुभूतीची कल्पना येते. चारचौघांना न दिसणारा एक कोपरा उलगडून दाखवण्यात यशस्वी.
यातला 'मी' थोडा कमी आणि 'इतर' थोडे अधिक असते तर अधिक खुलले असते हे लेखन.
हे श्रामोंचं पटलं. तसंच काही ठिकाणी जे उघड सत्य वाचकाला जाणवतं त्याची द्विरुक्ती केल्यामुळे मजा जाते....
गणेशपुजन सुरू असतांनाच, "अबे भोसडीके उस्मान गांडू"?
अवतरणातलं वाक्य एकदा येतं तेव्हा परिणाम साधतं. दुसऱ्यांदा येतं तेव्हा साधलेल्यातला निम्मा परिणाम जातो.
पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात..!
हे काहीसं पोकळ, ओढून ताणून निष्कर्ष काढणं वाटतं. अनुभवाची जातकुळी इतकी अस्सल आहे की त्यावर निवेदनाचा कृत्रिमपणा उठून दिसतो.

अर्धवट नवीन

In reply to by राजेश घासकडवी

>>अनुभवाची जातकुळी इतकी अस्सल आहे की त्यावर निवेदनाचा कृत्रिमपणा उठून दिसतो. ह्म्म्म.. दुसर्‍यांदा वाचल्यावर असं वाटलं खरं.

श्रावण मोडक नवीन

In reply to by राजेश घासकडवी

अनुभवाची जातकुळी इतकी अस्सल आहे की त्यावर निवेदनाचा कृत्रिमपणा उठून दिसतो.
वेल, गुर्जी... ! ते कसलेसे दागीने असतात ना तसा प्रकार होत चाललाय हे लेखन म्हणजे. अनुभवाच्या सच्चेपणाविषयी लेखकाचा स्वतःचाच विश्वास नसावा बहुदा. स्वतःचे भिकारचोट, हरामखोर या जोडीने पांढरपेशा उच्चभ्रू वगैरे (अंडरएस्टिमेटेड) वर्णन केले की बहुदा अनुभवांपेक्षा स्वतःविषयीचा विश्वास वाढत असावा. एरवी अनुभव सच्चा असेल तर अगदी व्यक्तीचित्रांमध्ये त्या व्यक्तींचे "सौंदर्य दाखवण्यासाठी" छायाचित्रे टाकण्याची वेळ येत नसते. इथल्या लेखनात ती द्विरुक्ती गरजेची नसते. पण हे सांगणे म्हणजे... !!!

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by श्रावण मोडक

... समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही काळापूर्वी आलेलं बिपिनचं 'खोबार' असो वा अलिकडचं अर्धवट यांचं 'आफ्रिका'वर्णन, इथून तिथून माणसं सारखीच असा जो काही समज होता तो पक्का होत चालला आहे. शुचिर्भूतपणाच्या व्याख्या असोत अथवा कसलं तत्त्वज्ञान, प्रत्येक समाजगटाला त्याची गरज असावी. अर्थात हे तत्त्वज्ञान वेगळं असतंच का नाही याचा मागोवा राजेशच्या 'खमंग थालिपीठ' धाग्यावर घेण्याचा प्रयत्नही झाला आहे. श्रद्धेची गरज आणि श्रद्धेचं दृष्य स्वरूप याबद्दलही मिपावर अनेकदा चर्चा झालेल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर, असलेल्या एका अनुभवातून माणसांची/च्या श्रद्धा, माणसां-माणसांतलं आणि/किंवा दोन समाजगटांमधलं वेगळेपण यावर खरोखर भाष्य करता येईल काय असा प्रश्न पडला आहे. एक गोष्टदा सांगून लिखाण थांबवलं असतं तर अधिक उठावदार झालं असतं या मताशी सहमत आहे.

विसोबा खेचर नवीन

In reply to by राजेश घासकडवी

माझ्या लेखनातील उणीवा दाखवणार्‍या प्रतिसादाबद्दल धन्यवाद घासकडवीसाहेब, मी मला जसे जमले तसे लिहिले आहे.. तात्या.

सहज नवीन

होमपीचवर तात्याची तुफान फलंदाजी. फोरास रोड, वेश्यावस्ती, झमझमबार एरीया हा तात्याच्या लेखनाचा बालेकिल्ला. तात्यांच्या अश्या गिर्रेबाज लेखनाने त्यांचे नवे नवे फॅन निर्माण होतात यात वादच नाही. मागच्या बॅचला तात्याच्या 'रौशनी'ने भुरळ घातली होती. नविन बॅचसाठी आता 'शाहीन'. तात्या नुकताच म्हणाला आहे खरा की लवकरच नवे संकेतस्थळ काढेल व खात्री आहे की तो हे करुन दाखवेलच. तात्याचे लेखन हे भुरळ घालणारे असतेच. अर्थात भुरळ घातली की इंग्रजी भाषेतली एक म्हण मला नेहमीच सावध करते. म्हण आहे, Fool me once, shame on you; fool me twice, shame on me. सर्व नव्या-जुन्यांनी ही म्हण जरुर लक्षात ठेवावी. (भाईकाकांच्या 'एक शुन्य मी'चा पंखा) सहज ------------------------------- मराठी संस्थळाचा इतिहास विसरु नका.

मदनबाण नवीन

In reply to by सहज

तात्याचे लेखन हे भुरळ घालणारे असतेच. अर्थात भुरळ घातली की इंग्रजी भाषेतली एक म्हण मला नेहमीच सावध करते. म्हण आहे, Fool me once, shame on you; fool me twice, shame on me. सर्व नव्या-जुन्यांनी ही म्हण जरुर लक्षात ठेवावी. सहमत...

श्रावण मोडक नवीन

In reply to by सहज

तात्याचे लेखन हे भुरळ घालणारे असतेच. अर्थात भुरळ घातली की इंग्रजी भाषेतली एक म्हण मला नेहमीच सावध करते. म्हण आहे, Fool me once, shame on you; fool me twice, shame on me. सर्व नव्या-जुन्यांनी ही म्हण जरुर लक्षात ठेवावी.
भुरळच ती. त्यामुळं मग सावधानता आवश्यक ठरतेच. म्हण ध्यानी घ्यावी अशीच आहे. इतिहासाची पुनरावृत्ती घडतेच म्हणतात. एकूण लेखनाचा उपयोग "बहुआयामी" असतोच. छान. त्यामुळंच हल्ली मी लेखनाचा फॅन असतो. लेखकाचा नाही. हल्ली क्रेमर दिसत नाहीत कुठंही? ;)

सुनील नवीन

पूजा घालतानाचा फोटो पहायला मजा आली असती! अवांतर - तात्या जानवं घालतो का?

विनायक प्रभू नवीन

लेख. बाकी काही नाही.

प्रसन्न केसकर नवीन

तात्या परत लिहिते झाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे लिखाण वाचायला मिळायला लागले हे उत्तम झाले. शाहिन पेक्षा मला स्वतःला हे लिखाण जास्त भावले. (ज्याची त्याची आवड.) हे जग वेगळे नक्कीच आहे आणि त्याबाबत फार थोडे लोक लिहितात. त्यामुळेच अश्या लिखाणाचे महत्व वाढते. लेखकाचा दृष्टीकोण वगैरे खटकले तरी ज्यांनी हे जग पाहिलेले नाही अश्यांना ते नजरेआड करुन बरेच काही समजावुन घेता येते अश्या परिस्थितीत. हिजड्यांच्या गणेशोत्सवाबाबत वाचताना माझ्या डोळ्यासमोर आले पुण्यातले बुधवार पेठेतले चोळखण आळी मंडळ. एरवी ज्यांना वेश्या, रंडी अश्या विषेशणांनी संबोधले जाते त्या महानंदांचे हे मंडळ विविध सामाजिक उपक्रम, सामाजिक प्रश्नांना हात घालणारे देखावे आणि शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुकीकरता गाजले आहे. नो कंडोम नो सेक्स ही घोषणा, एडस वरचे देखावे याद्वारे या मंडळाने एडस विरोधी जनजागृतीचे बरेच काम केले. शेवटी हिजडे असोत, तात्यांनी लिहिलेल्या रोशनी, शाहिन असोत की पुण्यातल्या दाणेआळीतल्या वेश्या असोत, माणसेच ती. समाजाने आपल्यातुन खड्यासारखी वगळलेली असली, जनावरासारखे किंवा त्यापेक्षाही भयानक जीवन ती जगत असली तरी माणसे माणसेच रहातात याचेच हे उत्तम नमुने.

शिल्पा ब नवीन

कोणी काहीही म्हणो...लेखन आवडले. एका वेगळ्या विश्वाबद्दल थोडीशी माहिती मिळाली.. सहज एक वाटून गेले : असे कितीही वाचले तरी आपले समाजमन "त्या " वर्गाबद्दल असणारे मत बदलणार आहे का? ती सुद्धा माणसेच आहेत एवढे लक्षात ठेवले तरी पुरे. अशा लोकांची समाजालाहि गरज असतेच...नाहीतर वासनांध कुठे त्यांची वासना शमवणार? आपल्यासारख्या पांढरपेशा मुलीबाळींचे घराबाहेर फिरणे अशक्य व्हायचे..

विंजिनेर नवीन

) हे जग वेगळे नक्कीच आहे आणि त्याबाबत फार थोडे लोक लिहितात. त्यामुळेच अश्या लिखाणाचे महत्व वाढते. लेखकाचा दृष्टीकोण वगैरे खटकले तरी ज्यांनी हे जग पाहिलेले नाही अश्यांना ते नजरेआड करुन बरेच काही समजावुन घेता येते अश्या परिस्थितीत.
ऐसाईच बोल्ता है. लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा त्या चुका प्रत्येक उपप्रतिसादातून दाखवण्याचा अट्टहास (की व्हेनडेटा?) च मला खड्यासारखा लागतोय.

विसोबा खेचर नवीन

In reply to by विंजिनेर

लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा त्या चुका प्रत्येक उपप्रतिसादातून दाखवण्याचा अट्टहास (की व्हेनडेटा?) च मला खड्यासारखा लागतोय.
हा हा हा..अस्तित्वासाठीची केविलवाणी लढाई! दुसरं काय?! धन्यवाद विंजिनेरसाहेब.. :) तात्या.

पांथस्थ नवीन

In reply to by विंजिनेर

लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा त्या चुका प्रत्येक उपप्रतिसादातून दाखवण्याचा अट्टहास (की व्हेनडेटा?) च मला खड्यासारखा लागतोय.
सहमत आहे.

यशोधरा नवीन

In reply to by विंजिनेर

लेखकाच्या तथाकथित चुकांपेक्षा त्या चुका प्रत्येक उपप्रतिसादातून दाखवण्याचा अट्टहास (की व्हेनडेटा?) च मला खड्यासारखा लागतोय. अगदीच सहमत. लेख आवडला. अगदी लेखकाने केलेल्या निवेदनासकट.

ऋषिकेश नवीन

छान लेखन.. नेहमीच्या विषयावरचे तरीही वेगळे.. मला आवडले. अजून येऊ दे! खरंतर श्रामो म्हणतात तो मीपणा या लिखाणापेक्षा मला "शाहीन" मधे जाणवला होता.. ते तिचं व्यक्तीचित्र न वाटता तिच्याबरोबरच्या तात्यांचं चित्रण वाटत होतं :)

मिसळभोक्ता नवीन

प्वाईंटचा मुद्दा असा, की हिजडे गणेशोत्सव करतात, आणि त्यांना त्यातले शष्प कळत नसल्याने तात्याला पूजा सांगायला बोलवतात. तात्या त्यांच्या श्रद्धेचा पुरेपूर उपयोग करून "सदा सर्वदा" वगैरे म्हणून वेदातल्या ऋचा वगैरे म्हटल्याचा आभास निर्माण करतो, म्हणून हिजडे खूष होऊन त्याला बक्शीस देतात. ह्या दोन वाक्यांसाठी दोन भागात लेख टाकणे ही तात्याची कलाकारी. श्रामो, जानी, समझा करो.

श्रावण मोडक नवीन

In reply to by मिसळभोक्ता

अच्छा, असं आहे होय! आत्ता सगळं नीट समजलं. 'टाळ्यां'चे आवाज ऐकू येऊ लागले, मिभोकाका... ;)

सन्जोप राव नवीन

In reply to by मिसळभोक्ता

मिभोसाहेबांचे असे हे 'आपुन तुमको दोईच मारा, लेकिन सॉलिड मारा के नई' असते. आता या लेखाला 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' अशीच प्रतिक्रिया द्यावी म्हणतो

समंजस नवीन

हिजडयांच्या गणेशोत्सवाबद्दल ऐकून(वाचून) होतो. तुमच्या या लेखामुळे त्या बद्दल थोडी आणखी माहिती मिळाली. हिजडयांशी आपण फटकून वागत असलो किंवा त्यांचा तिरस्कार करत असलो किंवा त्यांची चेष्टा करत असलो तरी त्यांच्या एकंदरीत राहणीमाना बद्दल, त्यांच्या विश्वाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता ही कायम असतेच. ह्या प्रकारचे काही लेख ती उत्सुकता थोडीफार शमवण्याचा प्रयत्न करतात :) अर्थातच प्रस्तुत लेख हा स्वानुभवातून आलेला असल्यामुळे तसेच अनुभवकथन या प्रकारातील असल्यामुळे लेखकाच्या लेखातील टिप्पणींना जसे आहे तसे मान्य करणे आवश्यक आहे. हे असे का? तसे का नाही हा आग्रह धरणे म्हणजे दुसर्‍याचा अनुभव, दुसर्‍याचा दृष्टीकोण स्वतःच्या शब्दात, स्वत:च्या दृष्टीकोणातून मांडणेच आहे. हे कितपत योग्य? विचार करतोय :) [अवांतरः तात्या एक विनंती, ह्या पुढे कुठलंही अनुभव कथन, ललित लेखन हे जरी २-४ पानांचं होत असलं तरी १-२ पानांची प्रस्तावना नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करा बुवा :) त्यात हे सांगायला विसरू नका की ह्या लेखा मागची प्रेरणा काय? अनुभव व्यक्तीगत आहे की दुसर्‍याचा, कल्पनाविलास आहे की सत्य, कुठे काय स्वातंत्र्य घेतलंय, वाचकांनी कितपत गंभिरतेने घ्यावे वै. वै. म्हणजे काय माझ्या सारख्यांना कसलाही संभ्रम राहणार नाही आणि काय अपेक्षा ठेवावी काय नाही हे प्रस्तावना वाचूनच ठरवता येईल आणि त्यामुळे पुढे लेख/कथा वाचावी की नाही हे ठरवायला सोप्प जाईल :) ]

विसोबा खेचर नवीन

In reply to by समंजस

तसेच अनुभवकथन या प्रकारातील असल्यामुळे लेखकाच्या लेखातील टिप्पणींना जसे आहे तसे मान्य करणे आवश्यक आहे.
आपल्या सूज्ञतेबद्दल बरे वाटले..
हे असे का? तसे का नाही हा आग्रह धरणे म्हणजे दुसर्‍याचा अनुभव, दुसर्‍याचा दृष्टीकोण स्वतःच्या शब्दात, स्वत:च्या दृष्टीकोणातून मांडणेच आहे.
जे हास्यास्पद आहे! :)
म्हणजे काय माझ्या सारख्यांना कसलाही संभ्रम राहणार नाही आणि काय अपेक्षा ठेवावी काय नाही हे प्रस्तावना वाचूनच ठरवता येईल आणि त्यामुळे पुढे लेख/कथा वाचावी की नाही हे ठरवायला सोप्प जाईल
अवांतर आवडले.. :) धन्यवाद समंजसराव.. तात्या. तात्या.

समंजस नवीन

प्रकाटाआ

बाबा योगीराज नवीन

मला मिपा वर प्रवेश मिळल्याचा खूप आन्॑द आहे................... सु॑दर लिखान्..................माझी वाचन खाज पुर्णपने भागतेय.................... ____________________________

पक्या नवीन

घासकडवी , श्रामो यांच्या सारख्यांचे बोजड लिखाण वाचण्यापेक्षा तात्यांचे सुटसुटीत लिखाण वाचायला चांगले वाटते.

परिकथेतील राजकुमार नवीन

In reply to by पक्या

घासकडवी आणि श्रामो आजकाल आमंत्रणपत्रिका वाटतात का, 'लेखन वाचायला या' म्हणुन ? मला का नाही पाठवत एखादी पत्रिका ?

विसोबा खेचर नवीन

In reply to by पक्या

घासकडवी , श्रामो यांच्या सारख्यांचे बोजड लिखाण वाचण्यापेक्षा तात्यांचे सुटसुटीत लिखाण वाचायला चांगले वाटते.
पक्याराव, इतरांच्या लेखनाबद्दल इथे काही भाष्य करणं मला उचित वाटत नाही.. बाय द वे, माझं लेखन आपल्याला चांगलं वाटतं, या बद्दल आभारी आहे! :) तात्या.

चिगो नवीन

अतिशय सुरेख लेखन... काँग्रॅट्स तात्या. अगदी सहजपणे कामाठीपु-यातला सोज्वळ दिवस रेखाटलाय तुम्ही. थॅंक्स...

स्मृती नवीन

छानच लिहिलंय तात्या... हिजडे जेव्हा त्यांच्या''एलिमेंट' मध्ये नसतात तेव्हा तुमच्या आमच्यासारखेच असतात याचा अनुभव अनेक वर्षांपुर्वी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये मला आला... तेव्हापासून त्यांच्याबद्दलची भिती साफ पळाली माझी... असो.. त्याविषयी पुन्हा केव्हातरी :)

विशाल कुलकर्णी नवीन

"डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!">>>> जगण्याचे एकमेव सत्य सांगितलेत तात्या. खरेच हे असं काही वाचलं की तुम्हाला प्रत्यक्ष भेटायची इच्छा उफाळुन येते.

विसोबा खेचर नवीन

थोड्या विलंबाने प्रतिसाद नोंदवणार्‍या पांथस्थ,यशोधरा, मेघवेडा, पक्या, चिगो, स्मृती आणि विशाल यांचा मी ऋणी आहे.. तात्या.