Skip to main content

प्यार हुआ इकरार हुआ...

लेखक अवलिया
Published on गुरुवार, 10/06/2010
कधी कधी अचानक रेडीओवर म्हणा किंवा येता जाता कुठे अवचित काही जुनी हिंदी गाणी अचानक कानावर पडतात. सुमधुर संगीत आणि तितकेच अर्थवाही शब्द यांचा सुंदर मिलाफ होतो. कधी कधी एखादे गाणे आपल्यावरच लिहिले आहे असाच भास होतो. काही गाणी मनाला आनंद देतात, दिलासा देतात. जगण्यासाठी कारण देतात. रागदारी, सा रे ग म यातलं काही मला कळत नाही. उगाच लै भारी असा भाव खाण्यासाठी एकुलता एक कळणारा राग पन्नास ठिकाणी लिहुन भास का मारायचा? नाही कळत म्हणजे नाही कळत. सगळ्याच गोष्टी आपल्याला कळल्याच पाहिजेत असे जरुरी नाही. फुलाचा वास येतो, अत्तराचा वास मोहवितो. बास. फुलामधले सुगंधीपरागकण श्वासोच्छ्वासावाटे घ्राणेंद्रियात विशिष्ट जागी जातात. त्यामुळे मेंदुमधील विशिष्ट जागेला काही संवेदना पोहोचतात. त्यामुळे आपल्याला वास येतो. पुर्वसंस्कारांमुळे विशिष्ट वास चांगला आणि वाईट असं वर्गीकरण होवुन आपल्यास आनंद वा त्रास होतो.. इत्यादी कवतिकं हवीत कशाला ? आपण सामान्य माणसं. आपली बुद्धि येवढी नाही. येवढा विचार करेपर्यंत हातातले फुल सुकुन जाणार, अत्तर उडुन जाणार. नकोच तो वाह्यातपणा. तर मुद्दा होता गाण्याचा. काल संध्याकाळी फिरत फिरत येत असतांना अचानक स्वर आले. "प्यार हुआ इक़रार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल" खरंय. प्रेम कुणावर जडावं याचा काही नेम नसतो. आजुबाजुला अनेक सुंदर सुंदर चेहरे असतात, पण सगळेच आवडतात असं नाही. आवडलेला चेहरा रुढार्थाने सुंदर असतोच असे नाही. मनाला काय आवडेल हे सांगणे खुप मुश्किल असते. कित्येक वेळा मनाला आवडलेले मुखातुन बाहेर पडेलच असे नाही. मग मुक प्रेमाचा खेळ चालतो आणि अप्राप्यतेच्या ज्ञानाबरोबर संपुन जातो. नंतर कधी तरी कळतं कदाचित जमलं असतं. पण उशीर झालेला असतो. त्यामुळे प्रेम जडणं सोपं असतं आणि ते सांगणं मात्र खुप अवघड असतं. खरं प्रेम अबोल असतं असं म्हणतात. डोळ्यांनी डोळ‍यांची भाषा, चेहरा समजतो असं म्हणतात. पण काय असेल ते असो. काही जण नशीबवान असतात. त्यांचं प्रेम जडतं. समोरच्याला सांगितलं पण जातं. आणि काय गंमत की समोरुन चक्क होकार सुद्धा येतो. पण इथंच कुठंतरी भय सुद्धा वाढायला लागतं. भय कसलं असतं हे ? अज्ञाताचं? पण तसा तर येणारा प्रत्येक क्षण अज्ञात असतो. तरी आपण फार भय बाळगत नाही. मग प्रेमात पडलेल्यालाच का भय वाटावे ? मला तरी अजुन नीटसं उत्तर मिळालेले नाही. पण पुढचे बोल ते भय सांगुन गेले "कहता है दिल, रस्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंज़िल ". खरंच ! एकत्र रहायचे, जीवन जगायचे तर ठरवले आहे. पण पुढे काय कसे होईल माहित नाही, घरचे परवानगी देतील का? समाज मानेल का ? आणि जर घरच्यांनी परवानगी नाही दिली तर काय करायचे? पळुन जायचे ? मग आजवर त्यांच्या असलेल्या ऋणानुबंधांचे काय? त्यांनी काही स्वप्न पाहिलेली असतील, कदाचित त्यांना आपल्यापेक्षा भल्याबु-याची अधिक जाण असेल. पण आपण तर एकत्र रहायचे ठरवले आहे. त्याचे काय? एकमेकांना वचन देउन बसलो आहे. त्याचे काय ? कुठे घेवुन जाणार आहे जीवन आपल्याला ? आयुष्याचे ध्येय काय ? एक ना अनेक प्रश्न केवळ त्या एका प्रेमामुळे उभे राहिले आहेत. पण भय केवळ इतकेच नाही. मनापासुन ज्याच्यावर प्रेम केले. आपल्या सुखदुःखाचा साथीदार ज्याला मानले, आयुष्याचा पुढला काल ज्याच्याबरोबर व्यतीत करायचे ठरवले तो आणि आपण मिळुन चालत असलेला रस्ता, वाट, त्या रस्त्याने जे एकसुर एकतानतेने निर्व्याज बंधनाचे गीत गात आहोत ते तर बदलणार नाही? न जाणो रस्त्यातल्या मोहमयी वाटांचे आकर्षण वाटुन जोडीदार आपल्याला सोडुन दुस-याच वाटेने निघुन जाणार तर नाही? भय सुखाचे किंवा दुःखाचे नाही, तर भय आहे एकाकी पडण्याचे, एकटेपणाचे. जे आयुष्य एकत्रित व्यतीत करायचे ठरवले आहे ते अचानक दोन रस्त्यात विभागले तर जाणार नाही ? मग समोरच्याला बजावुन सांगितले जाते. प्रेम तुटले तर तो प्रेमिकांचा साथीदार चंद्र, तो चांद तो सुद्धा म्लान होईल. त्याला सुद्धा हे आवडणार नाही, तो चमकणारच नाही. कहो कि अपनी प्रीत का, गीत न बदलेगा कभी तुम भी कहो इस राह का, मीत न बदलेगा कभी प्यार जो टूटा, साथ जो छूटा चाँद न चमकेगा कभी पण ही अवस्था फार काळ टिकत नाही. दोघांनाही परस्परांवर विश्वास आहे. परस्परांबद्दल प्रेम आहे. आपले प्रेम चुकीच्या स्थानी नाही याची दोघांनाही जाणीव आहे. मग एकमेकांना खात्रीपुर्वक सांगतात की आपली कहाणी ही आता केवळ आपली कहाणी नाही. ही केवळ तुझी माझी प्रेम कथा नाही. तर ही कथा आता सगळ्या जगाची आहे. आणि ती जगाला सांगणार आहे ही रात्र. आपल्या दशदिशांमधल्या अंधकाराला दुर सारत आशेचा किरण पसरवत रात्र आपली कथा जगाला ऐकवेल. आपल्या प्रेमाच्या पावलांवर पाउल टाकत येणारी पिढी परस्परांवर प्रेम विश्वास दर्शवत त्याच पद्धतीने प्रेमाचा अंगिकार करेल आणि आयुष्याच्या वाटेवर सुखदुःखांचा सामना करत, वाटचाल करेल. आणि मग मी नसेल, तु नसेल पण तुझ्या माझ्या प्रेमाच्या खुणा या पृथ्वीवर वास करतील. जीवन चालुच राहिल. रातों दसों दिशाओं से, कहेंगी अपनी कहानीयाँ प्रीत हमारे प्यार की, दोहराएंगी जवानीयाँ मैं न रहूँगी, तुम न रहोगे फिर भी रहेंगी निशानीयाँ प्रेमामधला दुर्दम्य आशावाद, भयार्तता पण तरीही न ढळलेला विश्वास, आणि सुख येवो दुःख येवो साथ सोडायची नाही ही परस्परांना दिलेली वचने, आणि जगाचे राहणारे सातत्य जपण्याची धडपड. पण ... आता जग बदलले आहे. तो आणि ती पुर्वीसारखे राहिले नाहीत. आता ध्येय आधी ठरवुन त्यानुसार जोडीदार निवडला जातो. ध्येयापुर्तीला बाधा ठरणारे जोडीदार मेलेल्या उंदराला धरुन बाजुला फेकावे त्याप्रमाणे फेकुन दिले जातात, अडगळीत टाकले जातात. प्रेम, बांधिलकी या शब्दांना केवळ शब्दकोशात स्थान आहे. हे जग दुस-यासाठी त्रास सहन करणे हा मुर्खपणा समजते. मला याची कल्पना आहे. माझ्यासारख्याला हे जग पटत नाही, रुचत नाही. म्हणुनच परमेश्वराकडे एकटेपणाचा आशीर्वाद मागत मी भणंगासारखा फिरत असतो स्वतःशीच गुणगुणत " प्यार हुआ इकरार हुआ है... "
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 8205
प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

गाणे छान आहे! नाना यार लग्न कर! फार तर अशीच कोणीतरी टाकून फेकून दिलेली. एक तरी तुझी ध्येतपुर्तीला पूरक अशी सापडेलच की. बिचारीला आधार व तुला पण म्हातारपणी सांभाळायला तरी असेल कोणतरी. जिंदगी बहोत हसीन है मेरे दोस्त!

मनातील भावनांचे प्रकटन आवडले... :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

मान्सूनच्या आगमनाला समर्पक गाण्याचे सुंदर विवेचन. गीतकार, संगीतकार, गायक - गायिका, दिग्दर्शक, कलाकार यांचा मेळ जमून आला की असे गाणे प्रकटते. फार तर अशीच कोणीतरी टाकून फेकून दिलेली. एक तरी तुझी ध्येतपुर्तीला पूरक अशी सापडेलच की. बिचारीला आधार व तुला पण म्हातारपणी सांभाळायला तरी असेल कोणतरी. आपला मानसिक वकूब दाखवणारी ही प्रतिक्रिया संपादकांच्या नजरेतून सुटली कशी? समस्त स्त्री मुक्तीवाले कुठे आहेत? सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह

In reply to by सन्जोप राव

>फार तर अशीच कोणीतरी टाकून फेकून दिलेली. एक तरी तुझी ध्येतपुर्तीला पूरक अशी सापडेलच की. बिचारीला आधार व तुला पण म्हातारपणी सांभाळायला तरी असेल कोणतरी. संपादक उडवा प्लीज. आमचे हे नाना एकवेळ समजुन घेतील पण माकडांच्या हातात कोलीत नको. नाय कां? कृपया संपादकांनी माझी ओरीजीनल वैयक्तिक प्रतिक्रीया उडवावी. अवलियाजी सॉरी हा!

In reply to by सहज

आधी खाऊ नये ते खाणे आणि मग मानभावीपणाने 'हे उडवा हो, ते उडवा हो' असे करणे. वाहवा! लगे रहो! टीआरपी वाढत आहेत! सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह

In reply to by सन्जोप राव

टिआरपी काय? :-) मग तुम्हाला जे काही बोललो नाही, त्याकरता मोर्चा तुम्ही कधीपासुन काढायला लागलात? स्त्रीमुक्तीचा कुठला परिसंवाद पाहुन येताय वाटतं. मी व अवलिया फार तर संपादक बघुन घेउ. तुम्ही कशाला बेगाने शादीमे अब्दुल्ला बनत आहात.

In reply to by सहज

वैयक्तिकरित्या मला सहजरावांच्या प्रतिक्रियेत काहीही गैर वाटत नाही, कारण त्यांनी लेखातील वाक्यांवरुनच प्रतिक्रिया दिली आहे. --अवलिया

In reply to by अवलिया

=)) =)) येथे पुण्हा एकदा संजोपरावांचा चेहरा पाहायची इच्छा झाली आहे ;) बाकी णाण्या लेख पुन्हा वाचुन मजा आया डोस्त !! :) -- सावज

In reply to by सन्जोप राव

यात स्त्री-मुक्ती वाल्यांनी मध्ये पडण्यासारखे काही दिसले नाही माझ्या नजरेला. सहज काय म्हणतात ते दोन मित्रांमधले काहीबाही संभाषण आहे असे पाहिल्यास त्यांचा वकूब काढण्याचीही गरज नसावी. लेख आवडला. प्रेम, बांधिलकी या शब्दांना केवळ शब्दकोशात स्थान आहे. हे जग दुस-यासाठी त्रास सहन करणे हा मुर्खपणा समजते. मला याची कल्पना आहे. माझ्यासारख्याला हे जग पटत नाही, रुचत नाही. काय की जाणे. प्रेम आणि बांधिलकी मानणारे सर्वच लोक जगातून नाहीसे झाले असे मात्र वाटत नाही. तेव्हा आशा सोडण्याची गरज नाही.

In reply to by चित्रा

यात स्त्री-मुक्ती वाल्यांनी मध्ये पडण्यासारखे काही दिसले नाही माझ्या नजरेला. सहज काय म्हणतात ते दोन मित्रांमधले काहीबाही संभाषण आहे असे पाहिल्यास त्यांचा वकूब काढण्याचीही गरज नसावी. बहोत अच्छे! संपादकीय ममत्व म्हणतात ते हेच असावे काय? 'ऑल आर इक्वल, बट सम आर मोअर इक्वल दॅन अदर्स' हे पटले. काही असो, आमचेही टीआरपी वाढत आहेत. ते पुरेसे वाढले की आमच्या प्रतिसादातील आक्षेपार्ह वाक्ये काढून टाका अशी विनंती आम्ही संपादकांना करणार आहोत... सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह

In reply to by सन्जोप राव

बघा बघा शिका लेको शिका टिआरपी. बर का मुलांनो असे आपण कायम शिकायचे असते, शिक्षणाला वय नसते हेच खरे. एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. -------------------------------------- तरी म्हणलं आजकाल नवे विद्यार्थी तयारीचे का नाहीत, शिक्षकांना पुरेसे येत नसेल तर विद्यार्थ्यांना काय कप्पाळ शिकवणार..

वाचताना मूड बनत गेला. आठवणीत मागे-मागे गेलो. सेन्ट्रल टॉकीजला राज-नर्गीसच्या पिक्चरांची मालिका पाच दिवस चालू होती. एकापाठोपाठ एक सिनेमे. सगळे बघून आलो.

एक सत्य कथा : मी ;प्यार हुवा इकरार हुवा हे गाणे एकदा बासरीवर वाजवत होतो. शेजारची एक छोटी मुलगी ( वय वर्षे ४)घरात खेळत होती तिने पटकन मला म्हंटले " काका मला माहितीये तुम्ही कोणते गाणे वाजवताय ते" मला आश्चर्य वाटले इतक्या छोट्या मुलीला एवढे जुनी गाणे माहीत असावे याचे . मी काही बोलणार त्या अगोदरच ती मुलगी म्हणाले" काका मला महितेय. हे गाण एत्या निरोध च्या झैरातीत असते टीव्हीवर ... ;)

In reply to by विजुभाऊ

=)) =)) =)) हाण्ण तिच्यायला ... आणि असली पोरं सगळ्यांसमोर विचारतात .. आमुक आमुक झैरात कसली आहे म्हणुन ... आणि त्यांची तोंड पाहाण्यासारखी होतात ... :) लहाण मुलांचे निरागस प्रश्ण म्हणजे ... बरं ते अश्लिल वाटतात म्हणुन संपादितही करता येत नाहीत =))

In reply to by टारझन

एकदा असेच माझ्या मुलाला माझ्या मित्राने (तो चार वर्षाचा असताना--म्हणजे मुलगा )घरी आल्या वर गाणे म्हणण्याचा आग्रह केला तर त्याने माला डी ही तेंव्हा प्रसिध्द जाहीरात म्हणून दाखविली. त्याला रागविता येइना आणि संपादित करण्याचा प्रश्नच नाही.

गाण्याचं रसग्रहण छानच. फिरभी रहेगी निशानियॉ ला चालणारी तीन मुलं हे हिंदी सिनेमातल्या अजरामर दृश्यांपैकी. शेवटच्या परिच्छेदातला - आजकाल पूर्वीसारखं राहिलं नाही - हा स्वर पटला नाही. पण तो काहीसा गौण मुद्दा आहे.

In reply to by राजेश घासकडवी

नाना... मस्त.. मस्त .. मस्त..रसग्रहण आवडले.. फिरभी रहेगी निशानियॉ ला चालणारी तीन मुलं हे हिंदी सिनेमातल्या अजरामर दृश्यांपैकी. ती तीन मुलं म्हणजे शशीकपूर, रणधीरकपूर आणि कोणतरी असे कोठेतरी वाचले होते.. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

ती तीन मुलं म्हणजे शशीकपूर, रणधीरकपूर आणि कोणतरी.. तिसरा राजीव कपुर.. रसग्रहण आवडले...एक अजरामर गाणे... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

तिसरा राजीव कपुर..
म्हणजे 'कोणतरीच" ;)

In reply to by शिल्पा ब

"....ती तीन मुलं म्हणजे शशीकपूर, रणधीरकपूर आणि कोणतरी.. तिसरा राजीव कपुर...." नाही, अशी ती तीन मुले नव्हेत, तर ती आहेत ~~ रणधीर, ऋषी आणि या दोघांची बहिण "रितू कपूर" जी पुढे "रितू नंदा" होऊन दिल्लीत स्थायिक झाली. राजीव कपूरचा जन्म १९६२ चा आणि "श्री ४२०" आहे १९५५ चा, त्यामुळे राजीवचे नाव येऊच शकत नाही. शशी कपूर १९५१ च्या "आवारा" मध्ये बाल कलाकार म्हणून चमकला होता... "श्री ४२०" मध्ये नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by शिल्पा ब

******* ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

नानाचा लेख ही एक पर्वणी असते... यावेळी लगेच मिळाली. लेख आवडलाच. गाणेही अतिशय आवडते असल्याने अजून मजा आली. लेखाचा शेवट तर खासच, नाना टच. नान्या, फुडचा लेख कधी? बिपिन कार्यकर्ते

"...पण ... आता जग बदलले आहे. तो आणि ती पुर्वीसारखे राहिले नाहीत. ... श्री. अवलिया यांनी फार काव्यात्मकरितीने केलेले लेखन आहे, ज्याला भूतकाळाचा एक "टच" आहे. या गाण्यापाठीमागील त्यांच्या भावनाचा आदर ठेवून मी इतकेच म्हणेन की, गाण्यातील नायकापेक्षा नायिकेच्या प्रती प्रितीविषयी खूप आशावादी भावना दिसतात, विशेषतः "तुम भी कहो इस राह का, मीत न बदलेगा कभी..." या ओळीत. मला या गाण्याचे चित्रीकरण आठवले. नायिकेला माहित आहे की नायकाकडे चहावाल्यालादेखील द्यायला एक पैसा नाही आणि तो आव आणत आहे की आपण खूप श्रीमंत आहोत. ती आपल्याकडील एक बंदा रुपया काढून त्याच्याकडे देताच त्याच्या डोळ्यात ज्या भावना चित्रीत झाल्यात त्यावरून जीव ओवाळून टाकावा अगदी. शब्दांनी दिलेल्या एका सुंदर अनुभवाबद्दल श्री.अवलिया यांचे मनःपूर्वक आभार ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

राज कपूर तो रुपया लगेच देत नाही चहावाल्याला.. एक क्षण मुठीत तो रूपया धरून ठेवतो.. गाण्याचं रसग्रहण उत्तमच. आमच्या पिताश्रीं ना वाचायला दिलं पाहिजे.. ते डाय-हार्ड फॅन आहेत राज चे.

In reply to by एक

"....राज कपूर तो रुपया लगेच देत नाही चहावाल्याला.. एक क्षण मुठीत तो रूपया धरून ठेवतो....." होय, अगदी योग्य निरिक्षण आहे. या क्षणाच्या अगोदर त्याने नायिकेवर "भाव" मारलेला असतो की, "काय करू, आमच्या ह्या चहावाल्या काकाकडे शंभर रुपये सुट्टे नाहीत..." आणि ती छोटेसे स्मित करून त्यातील गोम ओळखते आणि आपली पर्स उघडते. फार सुंदर ! "जाने कहाँ गये वो दिन...!" (मोठ्या पडद्यावर किती छान दिसले असतील असे खर्‍या अर्थाने भारतीय मातीतील काव्यात्म चित्रपट !!!.... आणि आता आमच्या नशीबी आलेत "आठ पॅक्स" "तुटक्या काईट्ची फुसकी हाईट" पाहणे.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मस्तच रे नाना... शेवट टिपीकल नाना ट्च मधे केलास. :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

लेख आवडला. नर्गीस चे भावपूर्ण , बोलके, मूकपणे प्रेमाचा वर्षाव करणारे डोळे, राजकपूर - मन खूप तरल होतं दोघांची गाणी पहाताना. काहीतरी चांगलं आणि उत्कट पहातोय असं वाटतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

माझ्यासारख्याला हे जग पटत नाही, रुचत नाही. म्हणुनच परमेश्वराकडे एकटेपणाचा आशीर्वाद मागत मी भणंगासारखा फिरत असतो स्वतःशीच गुणगुणत " प्यार हुआ इकरार हुआ है... "
अश्वत्थामा म्हणे तेल मागत फिरतो अजुनही. चिरंजीवीचा शाप. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

आजकाल नाही हो असे आढळत. आज ही प्रेम आहे फक्त त्याची व्याख्या बदलली आहे. आजकाल त्याला लिव्ह इन रिलेशनशिप असे काहीतरी बोलतात. वेताळ

वाह नाना सुंदर प्रकटन . गाणे मस्त आहेच. "कहता है दिल, रस्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंज़िल ". ह्यातला ठेका मस्तच.

वा ! वा !! लेख अत्यंत आवडला. रसग्रहण उत्तमच. नितिन थत्ते

प्रकटन सुंदर, आवडले.. स्वाती

तुम्ही इतके Romantic आहात तर मग इतके निराशावादी का ?? परमेश्वराकडे एकटेपणाचा आशिर्वाद मागत आहात की शाप ?? वरती सहज रावांनी सांगितल्या प्रमाणे आम्हीही म्हणतो जिंदगी बहोत हसीन है मेरे दोस्त! :-) शुभं भवतू !! ~ वाहीदा

"रहेंगी निशानियाँ" शब्द गात असताना चित्रण छोट्या मुलांचे आहे. ही गंमत आठवली. छान गाणे.

सर्व वाचकांचे आभार. :) --अवलिया

In reply to by अवलिया

सर्व वाचकांचे आभार. >> धन्यवाद ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

In reply to by II विकास II

मराठी अंतरजालावरचा आजतागायत चा सर्वांत उत्कृष्ठ प्रतिसाद ... शाणबाला ही जळजळ व्हावी असा :) ||उगाच|| ज्या दिवशी माणव जमात एड्स मुक्त होईल, तो मानव जमातीसाठीचा सुदिन.

In reply to by टारझन

मराठी अंतरजालावरचा आजतागायत चा सर्वांत उत्कृष्ठ प्रतिसाद >> धन्यवाद श्री टारझण तुमच्या प्रतिसादामुळे हुरुप वाढला. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

अप्रतिम लेख.. गाण्याइतकाच सुंदर्र!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/